Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 7 May, 2011

पहिली ते आठवीपर्यंत आता सारेच पास...!

शिक्षण खात्याचा निर्णय
निकालात बदल करावा लागणार
दहावीच्या निकालावर परिणाम शक्य

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असून त्यासंबंधीचे परिपत्रक सर्व शैक्षणिक संस्थांना पाठवण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे निकालात बदल करून नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा द्राविडी प्राणायाम आता शैक्षणिक संस्थांना करावा लागणार आहे.
नव्या शिक्षण हक्क कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर होता, पण त्याबाबत निर्णय घेतला गेला नव्हता. आता विशेष परिपत्रक जारी करून त्याची कार्यवाही करण्याचे आदेश सर्व संस्थांना देण्यात आले असून यासंबंधी काटेकोर अंमलबजावणीचे बंधनही त्यांच्यावर राहील, असेही यावेळी सांगण्यात आले. या निर्णयामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्यापाठोपाठ गोवा हे दुसरे राज्य ठरणार आहे. २००९ पासून कार्यन्वित झालेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या कलम १६ मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. पहिली ते आठवीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे व त्यामुळेच विद्यार्थ्यांना नापास करू नये, असेही सांगण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता दहावीच्या निकालावरही बराच परिणाम होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी काही शैक्षणिक संस्थांकडून शिक्षणात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांना आठवीत नापास करण्याचे प्रकार घडत होते. यापुढे असले प्रकार घडणार नाहीत व त्याचा परिणाम दहावीच्या निकालावर होईल, असे बोलले जात आहे.

No comments: