Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 3 May, 2008

'त्या' प्रकल्पांचे परवाने मागे

बाणावलीतील बैठकीत प्रचंड गदारोळ
११ मे रोजी ग्रामसभा
अधिकाऱ्यांची भंबेरी
पंचायतीचा अजब कारभार

मडगाव, दि.२ (प्रतिनिधी): बाणावली नागरिक कृती समितीच्या मागणीवरून आज (शुक्रवारी) उच्चस्तरीय बैठकीत बाणावलीतील त्या तिन्ही वादग्रस्त महाकाय गृहनिर्माण प्रकल्पांना दिलेले परवाने मागे घेण्याचा व भविष्यात अशा प्रकल्पांना ग्रामसभेने मंजुरी दिल्याशिवाय ते विचारात न घेण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी येत्या ११ मे रोजी खास ग्रामसभा बोलावण्यात आली असून तीत या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले जाईल.
बाणावली येथे सरपंच मारिया फर्नांडिस यांनी बोलावलेल्या या बैठकीला पर्यटनमंत्री मिकी पाशेको,गटविकास अधिकारी उदय प्रभुदेसाई, सार्वजनिक बांधकाम, वीज व पाणीपुरवठा खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.
वासुवाडो, बाणावली व सोनिया या ठिकाणच्या महाकाय प्रकल्पांना दिलेले बांधकाम परवाने मागेघ्यावेत , नगरनियोजन खात्यातून या बांधकामाबाबतची सर्वकागदपत्रे मागून घ्यावीत व ती ११ रोजींच्या ग्रामसभेसमोर ठेवावी व ग्रामसभेचा निर्णय अंतिम ठरवला जावा, असे या बैठकीत निश्चित झाले. तोपर्यंत या तिन्ही प्रकल्पांचे काम बंद ठेेवावे असे सर्वानुमते ठरले.
या खास बैठकीसाठी बोलावलेल्या सरकारी अधिकाऱ्यांचीही कुचंबणा झाली. विशेषतः पाणीपुरवठा व वीजखात्याचे अधिकारी एकाही प्रश्र्नाचे निरसन करू शकले नाहीत.
-----------------------------------------------------------------
बैठक की कुस्तीचा आखाडा!
ही बैठक मंत्री मिकी पाशेकों तसेच बाणावली पंचांसाठी अत्यंत अडचणीची ठरली. उपस्थितांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला ही मंडळी समाधानकारक उत्तर देऊ शकली नाहीत. त्यामुळे परस्परांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वारंवार घडले. या पार्श्वभूमीवर येत्या ११ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत काय घडू शकते, याची झलक पाहायला मिळाली.
-----------------------------------------------------------------

निरुक्ताच्या निकटवर्तीयांवर पोलिसांची नजर

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): आत्महत्येपूर्वी चार महिने अगोदर निरुक्ताच्या निकट असलेल्या व्यक्तींवर सीआयडीने (गुन्हा अन्वेषण विभागाने) आता जास्त लक्ष केंद्रित केले आहे. या व्यक्तींनाच अनेक गोष्टी माहिती असल्याची कुणकुण तपास अधिकाऱ्यांना लागली आहे. तसेच या प्रकरणी कोणालाही अधिक माहिती असल्यास ती तपास पथकाला उपलब्ध करावी, संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
निरुक्ताच्या गर्भाशय चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आहे. तथापि, तिच्या "डीएनए' चाचणीच्या अहवालाद्वारे अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो. काही दिवसापूर्वी "डीएनए' चाचणीसाठी निरुक्ताच्या गर्भाशयात संशयास्पद सापडलेल्या "टिश्यू'चे नमुने चाचणीसाठी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पोलिस सध्या त्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या हाती लागलेल्या "त्या' फोटोबद्दल फोंड्यात आज दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती. तो फोटो निरुक्ताचाच असल्याचा दावा काहींनी केला आहे. तसेच चार महिन्यापूर्वी निरुक्ताचे काही फोटो तिच्या वर्ग मैत्रणींना दाखवण्यात आले होते, त्या फोटोंचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. आत्महत्या करण्यासाठी निरुक्ता कोणच्या दबावाखाली आली होती, हे फोटो तर त्यास कारणीभूत नाही ना, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून निरुक्ताच्या कोणत्या व्यक्तींच्या घोळक्यात वावरत होती, याचाही शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काळ्या काचांविरुद्ध धडक मोहीम सुरूच आणखी ८३६ वाहन धारकांना दंड

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): वाहतूक पोलिसांनी कालचे रेकॉर्ड मोडताना काळ्या काचांविरोधात आरंभलेल्या मोहिमेअंतर्गत आज (शुक्रवारी) ८३६ वाहन धारकांना दंड ठोठावला. काल (गुरुवारी) सुमारे ७०० जणांना दंड करून काळे फिल्मिंग काढण्यात आले होते.
या धडक मोहिमेमुळे, फिल्मिंग केलेल्या वाहन धारकांनी आज स्वतःहून वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून वाहनाच्या फिल्मिंगची चाचणी करून घेतली. वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या काचेतून ७० टक्के तर खिडकीच्या काचेतून ५० टक्के प्रकाशझोत जायला हवा, असा नियम आहे. ज्या वाहनांची फिल्मिंग नियमबाह्य होते अशांनी स्वतःहून आपल्या वाहनांचे फिल्मिंग काढून टाकल्याची माहिती वाहतूक पोलिस उपअधीक्षक जी. बी. प्रभू म्हापणे यांनी दिली.
मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी पणजीत २६३, म्हापसा ८१, फोंडा १२५, मडगाव १३४, वास्को १४५ तर कुडचडे १६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर स्वतः पोलिस उपअधीक्षक म्हापणे यांनी २२ वाहनांवर कारवाई केली.
काही पोलिसांनी शुक्रवारी यंत्राद्वारे चाचणी न करताच फिल्मिंग काढायला सुरुवात केल्याने ते वादाला निमंत्रण ठरले. पणजीत शेजारच्या राज्यातून आलेल्या पर्यटकांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने अनेकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे कोणत्याही वाहनाच्या फिल्मिंगची चाचणी न करता, त्यावर कारवाई करून नये, असा आदेश पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी पोलिसांना दिला.

वेतनातील तफावतीचा मुद्दा कर्मचाऱ्यांकडून २५ मेपर्यंत मुदत

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): सरकारी खात्यातील विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत दूर करून त्यात समानता आणली गेली नाही तर स्वस्थ बसणार नाही, असा इशारा गोवा कर्मचारी संघटनेने दिला आहे. येत्या २५ मेपर्यंत सरकारने हा विषय निकालात काढला नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल असाही निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी संघटनेच्या तालुका समित्या व कार्यकारिणीची बैठक काल संघटनेच्या कार्यालयात झाली. संघटनेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी मुदत मागितल्याने त्यांना २५ मेपर्यंत वेळ देण्यात आल्याचे सरचिटणीस गणेश चोडणकर यांनी सांगितले. या मागणीवरून सर्व सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी एकत्रितपणे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
काही कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीत दिलेली वाढ रद्द करणे अशक्य असल्याने त्याजागी सर्वांना या वाढीव वेतनाचा लाभ मिळवून देणे भाग पडणार आहे. कायदा सचिव के. एस. सिंग यांनी त्यास सहमती दर्शवली. विकास आयुक्त आनंद प्रकाश यांनीही या प्रस्तावाला हिरवा कंदील दिखवल्याची माहिती देण्यात आली. वित्त सचिव उदीप्त रे यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे त्यांना अखेरची संधी देण्याचे ठरवले. येत्या २५ मेपर्यंत यासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी अट सरकारला घालण्यात आल्याची माहिती श्री.चोडणकर यांनी दिली.
या बैठकीसाठी अध्यक्ष मंगलदास शेटकर, उपाध्यक्ष अरुण तळावलीकर यांच्यासह कार्यकारी तथा तालुका समिती सदस्य हजर होते.

आमच्या पोटावर मारू नका

त्या "८७' कामगारांचे सरकारला आर्जव
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): 'गेली दहा ते बारा वर्षे कंत्राटी पद्धतीवर का होईना इमानेइतबारे सरकारी सेवा केली. गेल्यावेळी ही कंत्राटी सेवा नियमित करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रस्तावपत्र व आरोग्य चाचणीही पूर्ण झाली. तथापि, आता केवळ राजकीय सोयीसाठी आम्हाला घरी पाठवण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आमचे संसार उघड्यावर पडणार हे नक्की. तेव्हा सरकारने जर आम्हा ८७ कामगारांना घरी पाठवले तर आत्मदहनावाचून पर्याय नाही,' असा टाहो आरोग्य खात्यातील अन्यायग्रस्त कंत्राटी कामगारांनी फोडला आहे.
आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून गेली दहा ते बारा वर्षे कंत्राटी पद्धतीवर सेवा करणाऱ्या कामगारांनी आज आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. येत्या १५ दिवसांात या कामगारांचा प्रश्न सोडवला गेला नाही तर त्यांच्यावर मोठीच आफत ओढवेल. त्यातून काही बरेवाईट झाल्यास त्याला सरकारच जबाबदार ठरेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सरकारतर्फे ऍडव्होकेट जनरल यांनी या कामगारांना सेवेत घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर या कामगारांना नेमणूकपत्र देण्यास न्यायालयानेही मान्यता देताना या याचिकेवरील अंतिम निर्णयावर या नेमणुकीचे भवितव्य ठरेल, अशी अट घातली होती. यावेळी रोजगार नियमाच्या चौकटीत न बसणाऱ्या कामगारांना सेवेत घेण्यास नकार देणारे ऍड.जनरल यांचे वक्तव्यही न्यायालयाने या आदेशावरील अंतरिम निकालात समाविष्ट केले आहे. या घटनेनंतर सरकारकडून रोजगार नियमात दुरुस्ती करून या पदांसाठी किमान शालान्त परीक्षा उत्तीर्ण व वयोगटाची मर्यादेच्या अट घालण्याची परवानगी न्यायालयाकडून मंजूर करून घेतली. त्यामुळे या नव्या भरती नियमांप्रमाणे या कामगारांपैकी बहुतांश जणांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. सरकारने गेल्या ११ जानेवारी २००७ रोजी या ८७ कामगारांसाठी खात्यात नियमित पदे निर्माण केली होती. त्याप्रमाणे प्रस्तावपत्र व आरोग्य चाचणीही घेण्यात आली. या कामगारांची सर्व कागदपत्रे आरोग्य खात्याकडे जमा आहेत. अशावेळी आता नव्याने अर्ज मागवून या कामगारांना वगळण्याचे षड्यंत्र रचले जात असून ते कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा या कामगारांनी दिला आहे.
सरकारने या पदांसाठी अतिरिक्त नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात या ८७ कामगारांनी नव्याने अर्ज करण्यास हरकत घेतली असून या लोकांना सामावून घेतल्यानंतर उर्वरित कामगारांसाठी भरती प्रक्रिया लागू करण्याची मागणी केली आहे.
सुरुवातीस ही पदे रोजंदारी पद्धतीवर भरताना त्यासाठी थेट रोजगार भरती केंद्रातून अर्ज मागवले होते. त्यानंतर या कामगारांना कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात आले. आता नव्याने दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता लादणे अन्यायकारक असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. नव्या पदांसाठी वयोमर्यादाही लादली जाणार आहे. तथापि, गेली बारा वर्षे सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी नव्याने वयोमर्यादा लादली गेल्यास या कामगारांच्या नोकरीवर संक्रांत येईल. त्यामुळे हे कामगार संतापले आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून या आपणाला न्याय मिळवून द्यावा, अशी या कामगारांची मागणी आहे.

Thursday 1 May, 2008

काळ्या काचांविरुद्ध धडक कारवाई...!

मोहीम यापुढेही सुरू राहणार
वाहनधारक धास्तावले
पाऊण लाख दंड जमा
स्वहस्ते फिल्मिंग फाडले

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): राज्यात काळ्या काचांच्या वाहनांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी छेडलेल्या मोहिमेत पहिल्याच दिवशी आज सुमारे ७०० वाहनांच्या काचांचे फिल्मिंग फाडून वाहनधारकांना दणका दिला. त्यामुळे दंडाद्वारे सुमारे पाऊण लाखाची भर सरकारी तिजोरीत पडली.
गेल्या आठवड्यात सरकारच्या कृती दलाच्या बैठकीत १ मेपासून काळ्या काचांविरोधात जोरदार मोहीम छेडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी. बी. प्रभू म्हापणे यांनी सांगितले.
काळ्या काचांच्या वाहने अनैतिक व्यवहार व गुन्हेगारी कारणांसाठी वापरण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे उजेडात आल्याने कृती दलाने याची दखल घेऊन काळ्या काचांच्या विरोधात मोहीम छेडली आहे. गेल्या काही महिन्यांत गोव्यात घडलेल्या खून प्रकरणात मृतदेह काळ्या काच्यांच्या वाहनात घालून अज्ञात स्थळी टाकण्याचा प्रकार घडला आहे. तसेच अपहरण करण्यासाठीही अशा वाहनाचा वापर केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात काळ्या काच्यांच्या विरोधात निकाल देऊन त्यावर बंदी घातली आहे.
----------------------------------------------------------------------
पणजीत ११०, म्हापसा ४८, फोंडा १३१, वास्को १४५ आणि कुडचडेत ६० वाहनांच्या काचांवरील फिल्मिंग फाडून त्यांना दंड ठोठावण्यात आला. ३१९ वाहनचालकांनी पोलिसांसमक्ष आपल्या वाहनांचे फिल्मिंग फाडून टाकले. या वाहन चालकांना दंड न देता सोडून देण्यात आले. यावेळी अनेक वाहनधारकांनी पोलिसांशी वाद घातला.
-----------------------------------------------------------------------

'चित्रनिर्मितीला युवास्पर्श व्हावा' राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

पणजी, दि. १ (सांस्कृतिक प्रतिनिधी): माहिती खाते व गोवा मनोरंजन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित केलेल्या चौथ्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाले. चित्रपटनिर्मितीत युवक पुढे सरसावत असल्याने गोव्याला त्याचा फायदा जरूर होईल, प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी त्यांच्या सोबत गोवा राज्याचे महासचिव जे. पी. सिंग, परीक्षक मंडळाचे अध्यक्ष नितीन केणी, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव राजीव यदुवंशी माहिती संचालक निखिल देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. राजीव यदुवंशी यांनी स्वागतपर भाषण केले. दर्शना व संगीता यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे रवी नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
नाईक म्हणाले, युवकांना चांगली शिकवण देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक आहे. पूर्वी कोकणी भाषेतून चांगले चित्रपट निर्माण झाले होते. परंतु माध्यमाअभावी ते सर्व लोकांपर्यंत पोहचू शकले नाही. आजच्या काळात विविध माध्यमे उपलब्ध असल्याने चांगले चित्रपट लोकांपर्यत पोहचील यात शंकाच नाही. इतर राज्यातील लोक आपली मातृभाषा कधी विसरत नाही शिवाय प्राथमिक शिक्षण व सर्व व्यवहार मातृभाषेतून करत असतात, परंतु गोव्यात मात्र चित्र उलटे दिसते. या ठिकाणी प्राथमिक शिक्षण वेगळ्या भाषेतून घेतले जाते. किंबहुना काही घरातही इंग्रजीचा मारा असतो.
मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, गोव्यातील कलाकार, निर्माते पुढे येऊन विविध विषयावर चित्रपटांची निर्मिती करायला हवी म्हणूनच पूर्ण वर्षभर उत्तर आशियाखंड चित्रपट महोत्सव बाल चित्रपट महोत्सव असे विविध चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतील. त्या करिता सुमारे १५० कोटी रु. खर्चून पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या असून, गोवा मनोरंजन सोसायटी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात सक्षम बनले असल्याचे ते म्हणाले. गोव्यातील चित्रपट निर्मात्यांनी पुढे येऊन विविध विषयावर चित्रपट निर्माण करावे व गोव्यात चित्रपट संस्कृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
चौथ्या चित्रपट महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटात स्पर्धा घेतली जाणार असून, चित्रपट विभागातील स्पर्धेसाठी रोख बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी मुंबईस्थित चित्रनिर्माते नितीन केणी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षक मंडळावर असलेले देवी दत्त, प्रा. ओलिवीनो गोम्स व व्ही. आर. नाईक यांची ओळख दयानंद राव यांनी करून दिली.
दि. २ मे ते ४ मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात माकिनीझ पॅलेसच्या स्क्रीनवर चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून ते सर्वांसाठी खुले असतील. चित्रपट विभागातील स्पर्धेत राजेंद्र तालक क्रिएशनचे "अंतर्नाद' डिकॉस्ता फिल्म प्रोडक्शनचे "अर्दे चादर', सेवी पिंटो यांचे "भितरल्या मनाचो मोनीस या चित्रपटांचा समावेश असून हे चित्रपट दुपारी ११.०० २.३०, ५.३० वाजता दाखले जातील. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले. निखिल देसाई यांनी आभार मानले.

'सेझ'ची टांगती तलवार गोव्यावर अजूनही कायम

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): गोव्यात अधिसूचित झालेले तीन "सेझ' रद्द करण्यावरून पुन्हा एकदा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आढेवेढे घेण्यास सुरवात झाली आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा या तीनही "सेझ' प्रकल्पांच्या प्रवर्तकांशी चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढावा असा सल्ला गोवा सरकारला देण्यात आल्याने "सेझ' ची टांगती तलवार अजूनही कायम आहे.
राज्य सरकारतर्फे "सेझ' रद्द करण्याबाबत केलेली शिफारस स्थगित ठेवत वाणिज्य मंत्रालयाने अजूनही तडजोडीचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. अधिसूचित झालेले "सेझ' रद्द करण्याचा अधिकार कायद्यात नसल्याचे कारण पुढे करून या कंपन्यांना भरपाई देण्याचा विषयही पुढे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गोव्यात "सेझ' नकोच, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली असली तरी "सेझ' प्रवर्तकांनी न्यायालयात धाव घेतल्याने कायदेशीर मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. "सेझ' रद्द करण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यास सरकार सज्ज असल्याचे मुख्यमंत्री कामत यांनी या अगोदरच स्पष्ट केले आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग सचिव जी. के. पिल्ले हेच "सेझ' मान्यता मंडळाचे प्रमुख आहेत. मुळात श्री. पिल्ले यांनी यापूर्वी अधिसूचित "सेझ' रद्द करण्याचा अधिकार कुणालाच नाही, असे वक्तव्य करून वादळ निर्माण केले होते. आता काल झालेल्या बैठकीतही त्यांनी अधिसूचित "सेझ' रद्द होणे नाही, अशी भूमिका घेतल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आहे.
दरम्यान, गोव्यातील तीन विशेष आर्थिक विभागांना अधिसूचित करण्यात जी घाई करण्यात आली होती त्यात "सिप्लाचा मेडिटॅब फॅसिलिटीज', "रहेजा' यांचा आयटी एसईझेड व "पेनिन्सुला फार्माचा बायोटेक एसईझेड' यांचा समावेश आहे. सरकारकडून सुरवातीस या तीनही "सेझ'चे उघडपणे समर्थन केले जात होते, परंतु वाढत्या रोषामुळे अखेर सर्व "सेझ'रद्द करण्यास सरकारने मान्यता दिली होती.
राज्य सरकारने "सेझ' रद्द करण्याचा निर्णय घेतानाही तांत्रिक खेळ केला आहे. सरकारी निर्णयानुसार सेझ रद्द करताना "सेझ इन करंट फॉर्म' (सद्यःस्थितीतील सेझ) असा उल्लेख करून याबाबतीत संशयाला जागा ठेवली आहे. त्यामुळे जोपर्यंत कायदेशीररीत्या "सेझ' रद्द होत नाहीत तोपर्यंत हे संकट खरोखरच टळले असे म्हणता येणार नाही.
-----------------------------------------------------------------
४ जून रोजी निर्णय
गोवा सरकारने "सेझ'बाबत ठाम नकार दिल्याने आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा पुढील महिन्यात मान्यताप्राप्त १२ कंपन्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ जून रोजी पुढील बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यावेळी सदर १२ ही प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव जी. के. पिल्लई यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली.
-----------------------------------------------------------------

...तर ८ मे रोजी गोवा अंधारात

वीज कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): गोवा वीज खाते कर्मचारी संघटनेने येत्या ८ मे रोजी संपावर जाण्याची नोटीस सरकारला दिली आहे. वीज खात्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी वरिष्ठ अभियंत्यांची वेतनश्रेणी वाढवली असली तरी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर वेतनवाढप्रश्नी अन्याय झाल्याने तो दूर न केल्यास संपूर्ण गोव्याचा वीजपुरवठा एक दिवस बंद ठेवण्याचा इशारा कामगार नेते राजू मंगेशकर यांनी दिला आहे.
या संपाच्या नोटिशीवरून संघटनेच्या नेत्यांना सरकारने ५ मे रोजी चर्चेसाठी पाचारण केले आहे. गोवा वीज खात्यातील कर्मचारी दोन कामगार संघटनांत विभागले गेले आहेत. या खात्यातील सुमारे ८० टक्के कामगार सरकारी कर्मचारी संघटनेचे सदस्य आहेत, तर चतुर्थश्रेणी कामगार हे "आयटक' शी संलग्नित कामगार संघटनेचे सदस्य आहेत.
माजी वीजमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या काही खास लोकांवर मर्जी राखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अभियंत्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करून त्यांना खूष केले होते. हा लाभ खात्यातील सुमारे दीडशे ते दोनशे लोकांना मिळाला आहे. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर हा अन्याय ठरतो. खांबावर चढून आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र वेतनवाढ देण्यात आली नसल्याने त्यांनाही ही वाढ देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अभियंत्यांना देण्यात आलेली वाढीव वेतनश्रेणी अन्य कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात यावी, ही मागणी वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्याच्या मागणीत असल्याने सरकारने त्याबाबत येत्या २५ दिवसांत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे.
आता ८ रोजी संपावर जाण्याचा निर्णय हा "आयटक'प्रणीत कामगार संघटनेने घेतला असून त्यांची ५ रोजी सरकारशी चर्चा असून त्यात काय निर्णय घेतला जातो, यावरून पुढील कृती ठरणार आहे.

गोव्याचा वीर 'सामनावीर' स्वप्निलचा धडाका...

३४ चेंडू, १० चौकार, एक षटकार
जयपूर, दि. १ : गोव्याचा स्वप्निल अस्नोडकर व युसूफ खान यांच्या अर्धशतकी खेळ्या व उमर गुल याची भेदक गोलंदाजीच्या बळावर इंडियन क्रिकेट लीगतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० स्पर्धेतील आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाताच्या नाईट रायडर्स संघाचा ४५ धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्स संघाच्या विजयात ६० धावांचे महत्वपूर्ण योगदान दिलेला स्वप्निल "सामनावीर'ठरला.
नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर कर्णधार शेन वॉर्नने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९.८० धावांच्या सरारीने ७ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा झोडल्या आणि प्रतिस्पर्धी कोलकाता संघासमोर विजयासाठी १९९ धावांचे आव्हान उभे केले.
विजयासाठीचे हे १९९ धावांचे आव्हान पेलणे कोलकाता संघाला कठीण गेले. त्यांचा डाव १९.१ षटकांत १५१ धावांत संपला.
त्यात सलमान बटने ७, कर्णधार सौरभ गांगुलीने ५१, अजित आगरकरने २०, डेव्हिड हसीने ४२, दासने ११, शुक्ला व गुलने प्रत्येकी २, तर सहा, शर्मा, हॉज,डिंडा यांनी प्रत्येकी एका धावेचे योगदान दिले. सौरभच्या अर्धशतकी खेळीत ४ चौकार व १ षटकाराचा समावेश होता तर हसीच्या ४२ धावांत १ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.
तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित २० षटकांत १९८ धावा केल्या.
ग्रॅमी स्मिथ व स्वप्निल यांनी राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात केली. ग्रॅमी स्मिथ २ धावा काढून शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद होऊन माघारी फिरला. तिसऱ्या स्थानावर मोहम्मद कैफ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने अस्नोडकर याला सुरेख साथ देताना ३ चौकार व १ षटकाराच्या मदतीने २१ धावा केल्या. त्याला अजित आगरकरने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या युसूफ पठाणने ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. सलामीला आलेल्या अस्नोडकरने १० चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या. आर. जडेजाने २ चौकार व १ षटकाच्या मदतीने ३३ धावांचे योगदान दिले.
धावफलक ः राजस्थान रॉयल्स
जी. स्मिथ त्रि. गो. शर्मा २, स्वप्निल अस्नोडकर झे. हसी गो. उमर गुल ६०, मोहम्मद कैफ झे. व गो. आगरकर २१, युसूफ पठाण त्रि.उमर गुल ५५, वॅटसन पायचीत गो. उमर गुल ०, आर.जडेजा त्रि. गो. शुक्ला ३३, शेन वॉर्न धावचीत (गुल/सहा) ७, एस.रणवीर नाबाद ३, एम,रावत नाबाद १, अवांतर १४. एकूण ः ७ बाद १९६
गडी बाद होण्याचा क्रम ः
१-११, २-५३, ३-१०६, ४-१११, ५-१६८, ६-१९०, ७-१९१. गोलंदाजी ः
डिंडा ४-०-३०-०, ईशांत शर्मा ४-०२६-१, अजित आगरकर ४-०-४६-१, उमर गुल ४-०-३१-३, हसी २-०-२६-०, गांगुली १-०-१४-० शुक्ला १-०-१६-१
राजस्थान नाईट रायडर्स
सलमान बट त्रि. गो. तन्वीर ७, सौरभ गांगुली झे. कैफ गो.वॉर्न ५१, अजित आगरकर झे. रावत गो. वॅटसन २०, बी. हॉज धावचीत (त्रिवेदी) १, हसी त्रि. गो. त्रिवेदी ४२, शुक्ला धावचीत (रावत) २, दास झे.वॅटसन गो. तन्वीर ११, पी.सहा त्रि.गो. त्रिवेदी १, उमर गुल धावचीत (जडेजा / रावत) २, इशांत शर्मा धावचीत १, डिंडा झे.कोहली गो. वॅटसन १, अवांतर १२. एकूण ः १५१
गडी बाद होण्याचा क्रम ः १-१५, २-४४, ३-५१, ४-११९, ५-१२०, ६-१४३, ७-१४५, ८-१४७, ९-१४७, १०- १५१. गोलंदाजी ः वॅटसन ३.१-०-२२-२, एस.तन्वीर ४-०-३०-२, एस.त्रिवेदी ४-०-३१-२, मुनाफ पटेल ४-०-२९-०, शेन वॉर्न २-०-२०-१, युसूफ पठाण २-०-१५-०.

कामगारदिनीच त्यांच्यावर नोकरी गमावण्याची पाळी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): बांबोळीतील "गोमेकॉ' इस्पितळात गेल्या पाच ते सात वर्षांपासून "स्वीपर' व सेवक म्हणून कंत्राटी सेवेत असलेल्या कामगारांना कामगारदिनीच दिवशीच घरी पाठवण्याची "नोटीस' जारी करण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
गोवा आरोग्य महाविद्यालयात गेल्या पाच ते सात वर्षांपासून स्वीपर, सेवक, सुरक्षा रक्षक आदी पदांवर कंत्राटी सेवेत असलेल्या सुमारे २५० कामगारांना आता सरकारने घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेल्या गोवा कंत्राटी कामगार भरती सोसायटी अंतर्गत नेमलेल्या कामगारांचाही यात समावेश आहे. या कामगारांना घरी पाठवून त्याठिकाणी नव्या कामगारांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्यासाठी गोवा आरोग्य महाविद्यालयातर्फे जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंत्राटी नोकर भरतीचा लाभ उठवून कामगारांना सतावण्याचे सत्र सध्या सरकारने सुरू केले असून हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

Wednesday 30 April, 2008

१५ लाखांचा मद्यसाठा जप्त; कुंकळ्ळीत छापा; दोघांची चौकशी सुरू

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): अबकारी खात्याच्या पथकाकडून आज दुपारी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत एका आस्थापनावर टाकलेल्या छाप्यात सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
कर्नाटक राज्यातील नियोजित विधानसभा निवडणुकीमुळे गोव्यातून मोठ्याप्रमाणात मद्याची तस्करी सुरू असल्याचा संशय खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाने केला होता. याप्रकरणी कर्नाटक तथा गोवा अबकारी आयुक्तालयाने गोवा कर्नाटक सीमेवर नाकाबंदी केल्याचे उदाहरण ताजे असताना आज घातलेला छापा महत्त्वाची प्राप्ती ठरली आहे. गोव्याचे अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील "व्ही. डी. पॅकेजर्स' या आस्थापनात बेकायदेशीर मद्यसाठा ट्रकातून नेला जात असल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याने अबकारी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी मद्यसाठा नेण्यासाठी तीन ट्रक सज्ज ठेवण्यात आले होते. या छाप्यात १५ खोके (मॅकडॉवेल ब्रॅंण्डी),६ खोके (ओल्ड मंक) व ३०० खोके (मॅकडॉवेल्स व्हिस्की) असा माल सापडला. त्यातील एका ट्रकात या मद्याच्या बाटल्यांवर लावण्यात येणारे लेबल, बाटल्यांचे खोके, बुचे तसेच "ओरीजिनल चॉईस',"ओल्ड मंक' आदींचे कर्नाटक व महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी तयार केलेले लेबल्सही सापडल्याने हा माल कर्नाटक किंवा महाराष्ट्रात नेण्याचा या लोकांचा डाव होता हे स्पष्ट झाले आहे.
अधिक माहितीनुसार या औद्योगिक आस्थापनात मद्याचा व्यवसाय केला जात असला तरी मद्य तयार करण्याचा परवाना अद्याप त्यांना मिळाला नसल्याची माहिती मिळाली आहे. सदर ट्रक हे हरयाणा नोंदणी क्रमांकाचे असून ते ताब्यात घेण्यात आले आहेत. अबकारी आयुक्तालयाने दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हे आस्थापन जेम्स ऍथोनी वाझ नामक व्यक्तीचे असल्याचे आढळून आले असून त्याबाबत चौकशी सुरू आहे.
या छापा सत्रात साहाय्यक अबकारी आयुक्त श्यामसुंदर परब,अबकारी अधीक्षक नवनाथ नाईक,निरीक्षक सतीश दिवकर, मिलाग्रीस सुवारिस आदींनी भाग घेतला.

डिझेल तस्करीचा पर्दाफाश

दोन लाखांचे डिझेल
असलेले २९ पिंप जप्त
तीन होड्या ताब्यात
तीन संशयितांना अटक

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): आखाडा जुने गोवे येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या डिझेलची तस्करी करणाऱ्या होड्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाने आज सकाळी छापा टाकून २९ पिंपांमधून सुमारे २ लाख रुपये किमतीचे सहा हजार लिटर डिझेल आणि तीन होड्या जप्त केल्या.
या प्रकरणात अनिबाल फर्नांडिस (३७), गोपाळ नाईक (३१) व देविदास सावंत (४२) (सर्व रा. आखाडा) यांना भारतीय दंड संहितेच्या २८५ व जीवनाअवश्यक वस्तू कायदा कलम ७ नुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता या विभागाचे उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या छाप्यामुळे मांडवी नदीमार्गे खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या बार्जच्या टाक्यांतील डिझेलची चोरी करून त्याचा काळाबाजार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बार्ज घेऊन जाणारे आणि डिझेल चोरी करणाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे.
बार्ज सुरू असतानाच त्याच्याशी समांतर छोटी होडी सुरू ठेवली जायची. त्यानंतर बार्जच्या टाकीमध्ये पाईप टाकून पंपव्दारे बार्जमधून हे डिझल होडीत असलेल्या पिंपामध्ये भरले जायचे. त्यानंतर जेवढे डिझेल काढले जात, त्याचे पैसे त्याचवेळी त्या बार्जच्या कॅप्टनला दिले जात. पोलिसांनी डिझेल काढण्यासाठी वापरला जाणारा पंपही जप्त केला आहे.
आज करण्यात आलेल्या या कारवाईत गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मंगलदास देसाई व उपअधीक्षक डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण वस्त, निरीक्षक रुपेंद्र शेटगावकर व निरीक्षक देवेंद्र गाड यांनी भाग घेतला.
-----------------------------------------
अशी व्हायची 'हाथ की सफाई'
मांडवी नदीतून अरबी समुद्रात खनिजाची वाहतूक करणाऱ्या बार्जमधून हे डिझेल काढले जायचे. बार्जच्या टाक्यांमधून डिझेल काढण्यापूर्वी एका पिंपाची बोली लावली जायची. सर्वाधिक बोली लावणाऱ्यालाच बार्जच्या टाक्यांमधील डिझेल उपसण्याची परवानगी दिली जायची. एक पिंप डिझेलसाठी सुमारे ६ हजार ३०० रुपये मोजले जायचे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतर एका पिंपामागे ३६ लीटर डिझेलचा एक कॅन बार्जची वाहतूक करणाऱ्याला मोफत दिला जायचा.
-----------------------------------------

पिळर्ण जंगलात दांपत्याचा खून मुख्य संशयित ताब्यात

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): पतीपत्नीचा खून करुन पिळर्णच्या जंगलात त्यांचे मृतदेह फेकून दिलेल्या प्रकरणातील मुख्य संशयित पर्वरी पोलिसांच्या हाती लागला आहे. उद्या त्याला गोव्यात आणले जाईल. हुबळीच्या ग्रामीण भागात पर्वरी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.
या दुहेरी खुनामुळे खळबळ माजली होती. पैशांच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. संशयिताला घेऊन पर्वरी पोलिसांचे पथक उद्या सकाळी गोव्यात पोहोचणार असल्याचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले.
२४ एप्रिल रोजी पर्वरी पिळर्ण येथील जंगलात शिवप्पा (२८) आणि शिकव्वा (२५) या पतीपत्नीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह मिळाले होते. शिकव्वा या महिलेच्या गळ्याभोवती साडी गुंडाळली होती. २१ एप्रिलपासून दोघे पतीपत्नी बेपत्ता होते. दोन्ही मृतदेह पर्वरी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हा खूनाचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. याविषयीचा अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नार्वेकर करीत आहे.

निरुक्ताला कोणी फसवले? पोलिसांची शोध मोहीम सुरूच

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): मॉडेल होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वावरणाऱ्या निरुक्ताला कोणी आणि का फसवले, याचा शोध घेण्यास गुन्हा अन्वेषण विभागाला अद्याप यश आलेले नाही. मॉडेल होण्याचे हे खूळ तिच्या मनात कोणी भरवले, याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. हे करताना फोंडा पोलिसांच्या सावलीतून बाहेर येऊन स्वतंत्ररीत्या तपास आणि शोधकार्य करावे लागेल तेव्हाच या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गुन्हा अन्वेषण विभागाला शक्य होईल, असे दिसते.
गुन्हा अन्वेण विभागाकडे या प्रकरणाची सूत्रे सोपविल्यानंतर या प्रकरणी चर्चेचा केंद्रबिंदू असलेल्या एका महाभागाचे धाबे सध्या चांगलेच दणाणले असल्याची जोरदार चर्चा सध्या फोंड्यात सुरू आहे. हे प्रकरण म्हणजे नुसती आत्महत्या असून त्यामागे कोणतेच गूढ नाही असा प्रचार करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही त्याने आपल्या काही लोकांच्या सहकार्याने चालवल्याची चर्चा आहे. फोंडा पोलिसांनी आधीपासूनच हे प्रकरण म्हणजे नुसती आत्महत्या आहे असे भासवून तपासकामात केलेली दिरंगाई लक्षात घेता गुन्हा अन्वेषण विभागाला या प्रकरणाच्या मूळाशी जाण्यासाठी तपासाचा वेग आणि क्षमता वाढवावी लागेल. केवळ हाताखालच्या पोलिस शिपायांना फोंड्यात चौकशीसाठी पाठवून या प्रकरणावर प्रकाश पडणार नाही.
दुर्दैवी निरुक्ताने एका स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी निरुक्ताचे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्यात आले होते. हे फोटो तिने आपल्या मित्रांनाही दाखवले होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, ९ मार्च रोजी निरुक्ताने आत्महत्या केल्यानंतर तिचे हे फोटो गायब करण्यात आले होते. याचा सुगावा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला लागताच हे फोटो तिच्या कुटुंबीयांकडून मागवण्यात आले आहे. हे फोटो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ते कोणी, कोठे व का काढले, याचा शोध लागणार आहे.

गोव्यातही 'खंडणी राज' पाच जणांच्या टोळीला रंगेहाथ अटक

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): खुनाच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला अट्टल गुंड आश्फाक बेंग्रे याच्या इशाऱ्यावर दहा हजार रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी गेलेल्या पाच जणांच्या टोळीाल आज पणजी पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली. त्यामुळे गोव्यालाही आता मुंबईप्रमाणे "खंडणी राज'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याविषयीची तक्रार ताळगाव येथील दाऊद बादशहा यांनी पोलिस स्थानकात दाखल केली होती. पणजीतील अनेक व्यावसायिकांकडून खंडणी वसुली करण्याचा या टोळीचा बेत होता. यात आश्फाक बेंग्रे याचा मामा शब्बीर बेंग्रे (वय ४९ रा. नेरुल), दीपक केरकर (२१, रा. कालापूर), पॅट्रिक फर्नांडिस (१९ रा. मेरशी), योगेश नाईक (२२, रा. मेरशी) व सतेंद्र सिंग (२२, रा. गझियाबाद) यांना भारतीय दंड संहितेच्या ३८७ कलमाखाली अटक केली आहे. तसेच खंडणीसाठी वापरण्यात आलेली जीए०१ सी १५०१ या क्रमांकाची मारुती व्हॅन आणि त्या वाहनातील तीन मोठ्या सळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
आश्फाक बेंग्रे याला बगीरा याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहेत. याच ठिकाणी हे संशयित त्याच्या संपर्कात आले होते. आपला मामा शब्बीर बेंग्रे याच्या मदतीने ही खंडणी करावी, असा आदेश त्यांना देण्यात आला होता.
या संशयितामधील दीपक केरकर आणि योगेश नाईक यांची दोन दिवसापूर्वी अश्फाक बेंग्रेला जेथे ठेवण्यात आले आहे त्याच न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली होती. पणजी पोलिसांच्या ताब्यात आलेले या सर्व संशयितांनी यापूर्वी घरफोडी, वाहन चोरी प्रकरणात शिक्षा भोगली आहे. ही माहिती पणजी पोलिसांनी दिली.
या पाच जणांच्या टोळीने तांबडीमाती ताळगाव येथे दाऊद बादशहा या भंगार अड्डेवाल्यांकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीचे दहा हजार रुपये न दिल्यास घरातील मुलांना आणि पत्नीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याविषयी पोलिसांना कल्पना दिल्यानंतर काल रात्री आणि दिवसभर त्याठिकाणी सापळा रचण्यात आला होता. सायंकाळी पाचच्या दरम्यान ही टोळी वाहनातून खंडणीचे पैसे वसूल करण्यासाठी आले असता, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पणजी विभागाचे उपअधीक्षक देऊ बाणावलीकर व निरीक्षक फ्रान्सिसको कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक तुषार लोटलीकर, उपनिरीक्षक प्रज्योत फडते, पोलिस शिपाई शेखर आमोणकर आणि इरमय्या गुरय्या यांनी सहभाग घेतला.
----------------------------------------------------
तुरूंगात कट शिजला
पणजी शहरात खंडणी मागून त्याचा अर्धा भाग तुरुंगात असलेल्या आश्फाकपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा डाव होता. तो काही दिवसापूर्वी आश्फाक याने तुरुंगात आखला होता. त्याच्या कारवाईची जबाबदारी या संशयितांवर सोपवली होती, अशी माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे. ही माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
----------------------------------------------------

'युपीए' सरकारकडून शिक्षणाचे विकृतीकरण आंदोलन आणखी तीव्र करणार

'अभाविप'चे अतुलभाई कोठारी यांचा इशारा
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): केंद्रातील "युपीए' सरकारने शिक्षण क्षेत्रात घातलेल्या गोंधळाविरोधात गेल्या साडेतीन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर "शिक्षण बचाव आंदोलना'तर्फे जोरदार आंदोलन सुरू असून ते अधिक तीव्र करण्याचा इशारा या "आंदोलना'चे सचिव तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय प्रचारक अतुलभाई कोठारी यांनी आज येथे दिला.
यासंदर्भात दक्षिण भारतातील परिस्थितीची आढावा घेतल्यावर गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्याच्याबरोबर परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. दत्ता भी. नाईक, प्रा. भूषण भावे व शिक्षा बचाव आंदोलना'चे गोवा प्रतिनिधी प्रा. अनिल सामंत उपस्थित होते. या आंदोलनाविषयीची गोव्यात एक बैठक झाली असून येत्या काही दिवसात त्याबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रात "युपीए' सरकार आल्यापासून शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करून भारताची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू झाला. देशाचे महापुरुष, धार्मिक नेते यांच्या विरोधात पाठ्यपुस्तकात विकृत लिखाण करण्यात आले. श्री राम, भगवान कृष्ण हे काल्पनिक असल्याचे त्याद्वारे मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झाला. देशाच्या क्रांतिकारी नेत्यांना "दहशतवादी' संबोधण्यात आले. जाट समुदाय लुटारू होते, आर्य बाहेरून आले, असा इतिहास शिकवण्याचा घाट या सरकारने घातल्याने हे आंदोलन छेडण्यात आल्याचे श्री. कोठारे म्हणाले.
इंदिरा गांधी खुल्या विद्यापीठाच्या "एम.ए'च्या अभ्यासक्रमात भगवान शंकर नग्न होते. मॉं दुर्गा मद्य प्राशन करून लढाईला जात असे, अशा प्रकारे देवतांचे विटंबना करणारा मजकूर छापण्यात आला होता. त्याविरोधात आंदोलन छेडून आठ दिवसांत हा मजकूर गाळण्यास भाग पाडण्यात आले होते. दिल्ली विद्यापीठातील एका पुस्तकाचे देशाची पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची कन्या डॉ. उपेन्द्रसिंग यांनी संकलन केलेल्या पुस्तकात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्याबद्दल विकृत गोष्टी पसरवणारा मजकूर छापण्यात आला असून त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संबंधितांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात १५ मार्च ०८ रोजी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती श्री. कोठारी यांनी दिली.
लैंगिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात तर अनेक आक्षेपार्ह गोष्टी असून ते विद्यार्थ्यांना "आरोग्य शिक्षण म्हणून दिले जावे, असे मत श्री. कोठारी यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना ते देण्यापूर्वी त्यांच्या पालकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. हा अभ्यासक्रम लागू करण्यापूर्वी त्यावर व्यापक चर्चा केली जावी, अशी मागणी विद्यार्थी परिषदेने केली आहे.

चौपदरीकरण केंद्राच्या अखत्यारीत 'चर्चिल यांची घोषणा फुसका बार'

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रीय महामार्ग १७ व ४ (अ) चे राज्य सरकारतर्फे चौपदरीकरण करण्याचे जे नाटक चालवले आहे, हा त्यांच्या स्वार्थी राजकारणाचा एक भाग असल्याचा सनसनाटी आरोप "सेव्ह गोवा फ्रंट'च्या एका नेत्याने केला आहे. कारण मुळातच, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाची बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते.
चर्चिल यांचे हे प्रयत्न केवळ लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी सुरू आहेत. कारण, गोव्यातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाची पूर्ण प्रक्रिया भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने कार्यन्वित केलेल्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेअंतर्गत या दोन्ही महामार्गांच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. चर्चिल यांनी केंद्र सरकारकडे ही योजना मार्गी लावण्यासाठी आपली ताकद वापरावी, असा सल्लाही या नेत्याने दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे महामार्गाचे काम केंद्र सरकार मार्गी लावणार आहे. चर्चिल यांनी राज्यातील अंतर्गत रस्त्यांचे विस्तारीकरण व डांबरीकरणाकडेच लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे टप्पा तीन (ब) या अंतर्गत गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग १७ व ४ (अ) चे चौपदरीकरण करण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याप्रकरणी "विल्बर स्मिथ असोसिएटस्' या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. महामार्ग क्रमांक ४(अ) चा अहवाल या कंपनीने केंद्राला सादर केला असून महामार्ग क्रमांक १७ चा अहवाल लवकरच केंद्राला सादर करण्यात येणार आहे.
चर्चिल यांनी हे काम प्राधान्यक्रमाने करण्यासाठी राज्य सरकारला परवानगी देण्याची मागणी केंद्राकडे करण्याचा जो निर्णय आहे तो अजिबात मान्य न होण्याचीच जास्त शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. चर्चिल यांनी या चौपदरीकरणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असे जे म्हटले आहे त्यालाही आक्षेप घेण्यात आला आहे. चर्चिल यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम खाते काढून घेण्याची मागणी आघाडीतील अन्य घटक पक्षांनी केल्याने केवळ आपण काहीतरी मोठ्ठे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आव आणून या खात्यावरील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
-------------------------------------------------
अंदाजित खर्च १३५६.१६ कोटी रु.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी तयार केलेला अंदाजित खर्च हा सुमारे १३५६.१६ कोटी रुपये आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ (अ)- ४४९.८८ कोटी व राष्ट्रीय महामार्ग १७ -९०६.२८ कोटी अशी विभागणी करण्यात आली आहे व त्यात पाच पुलांचाही समावेश आहे. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांनी हा रस्ता "बांधा, वापरा व परत करा' या पद्धतीवर बांधण्याचा निर्णय घेतल्याने ते काम राज्य सरकाराअंतर्गत करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगण्यात आले.
-------------------------------------------------

बोहल्यावर चढण्यापूर्वीच!

मोरजी, दि. २९ (वार्ताहर): विवाहाला केवळ एक दिवस उरलेला असतानाच मोरजी कोतोळेवाडा येथील
एक तरुणी आज (दि.२९) सकाळी ८ पासून बेपत्ता असल्याची तक्रार पेडणे पोलिसांत नोंदवण्यात आली आहे.
त्या तरुणीचा विवाह उद्या (दि. ३०) रोजी आसगाव येथील एका युवकाबरोबर विवाह निश्चित झाला होता. तथापि, त्यापूर्वीच सदर तरुणी सकाळी ८ पासून बेपत्ता झाल्याने गावात खळबळ माजली आहे. ती येथीलच एका युवकाबरोबर पळून गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. उपलब्ध माहितीनुसार ज्या युवकाबरोबर ती पळून गेली त्या युवकाचे दोन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुतीचे बनले आहे. गावात ते चर्चेचा विषय बनले आहे. ज्या युवकाबरोबर ती पळून गेली तो युवकही सकाळपासून घरातून बेपत्ता झाला आहे. पोलिस तपास करीत आहेत.

Tuesday 29 April, 2008

सोणये-तुये साई मंदिरात १ मे रोजी साई उत्सव

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): सोणये-तुये येथील नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या सिद्धी साई मंदिरात येत्या १ मे रोजी साई उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे.
येत्या गुरुवार १ मे रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसाद होईल. संध्याकाळी ५ वाजता कोल्हापूर केरवडे येथील पटबीर देवालय ग्रामस्थ मंडळातर्फे "हरिपाठ' हा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८.३० वाजता मुंबईतील सुप्रसिद्ध जादूगार जी. मनोहर व सागर यांचे जादूचे व बोलक्या बाहुल्यांची तुफान जुगलबंदी होणार आहे.
धारगळ दोन खांब येथून आत गेल्यानंतर आरोबा गावचा पुल ओलांडल्यावर तुये गाव लागतो. तुये सोणये येथे मुख्य रस्त्याला टेकूनच उभारण्यात आलेल्या सुंदर व टुमदार अशा साईमंदिरात सिद्धी साई दिंडी (परळ-मुंबई) यांच्या विद्यमाने सुमारे साडेपाच फुटांची देखणी व शिर्डीस्थीत साईबाबांची अनुभूती देणारी मूर्ती स्थापण्यात आली आहे. १३ जानेवारी २००६ रोजी परळी मुंबईहून सुमारे ५०० साईभक्तांनी ही मूर्ती मुंबई ते शिर्डी येथे पदयात्रेने साईबाबांच्या भेटीला नेली. त्यानंतर २९ साईभक्तांनी प्रथम प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाची दर्शन भेट घेऊन १ फेब्रुवारी २००६ ते १८ फेब्रुवारी २००६ या कालावधीत मुंबई ते गोवा पदयात्रेने साईंची ही मूर्ती गोव्यात आणली. ३० एप्रिल २००६ ते ४ मे २००६ रोजी साईमुर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. साई उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धी साई दिंडीचे संस्थापक गणेश पालेकर, अध्यक्ष मधुकर पालयेकर, सचिव सुभाष कवठणकर व खजिनदार सुरेश नार्वेकर यांनी केले आहे.

चौपदरीकरणाच्या प्रस्तावास मान्यता

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): पत्रादेवी ते पोळे या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील १३९ किलोमीटरचा रस्ता व अनमोड ते पणजीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) चा ६९ किलोमीटरचा रस्ता (बांधा, वापरा व परत करा) या "बुट' पद्धतीवर उभारण्याच्या प्रस्तावावर आज सर्वपक्षीय बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या योजनेवर सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली.
आज पर्वरी सचिवालयात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेंद्र फुर्तादो, संसदीय सचिव नीळकंठ हळर्णकर, उपसभापती मावीन गुदीन्हो व मुख्य सचिव जे. पी. सिंग हजर होते. संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना श्री.आलेमाव यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयासंबंधीची माहिती दिली. सा. बां. खात्याचे मुख्य अभियंते श्री. वाचासुंदर यावेळी हजर होते. चर्चिल यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, राज्य सरकारतर्फे लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून येत्या जून महिन्यात होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात या प्रस्तावासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला जाणार आहे. हा ठराव केंद्र सरकारला कळवण्यात येणार असून केंद्राच्या मान्यतेनंतर येत्या वर्षात हे काम सुरू करून चार वर्षांच्या कार्यकाळात ते पूर्ण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
विद्यमान महामार्गाचे विस्तारीकरण करून चौपदरी केल्यास स्थलांतराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही. वेर्णा, काणकोण तसेच काही इतर भागात किमान दहा ते पंधरा कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याची माहिती आलेमाव यांनी दिली. कोलवाळ, मांडवी, जुवारी, तळपण व गालजीबाग अशा पाच नव्या पुलांचा यात समावेश असून सुमारे दोन हजार कोटी रुपये अंदाजित खर्च या योजनेवर होणार आहे. हा प्रकल्प "बुट' पद्धतीवर राबवण्यात येणार असला तरी त्यासाठी गोव्यात नोंदणी झालेल्या वाहनांवर टोल आकारला जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्र सरकारच्या टोल पद्धतीचा अभ्यास केला जाणार असून हे पैसे वसूल करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने कोणता मार्गा अवलंबिता येईल,याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाणार असल्याची माहितीही आलेमाव यांनी दिली.

बेकायदा शॅक्सप्रकरणी दक्षता घेण्याचे आदेश

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): राज्याच्या समुद्र किनाऱ्यांवरील बेकायदा शॅक्स आणि सनबेड हटवल्याचे प्रतिज्ञापत्र आज पर्यटन खात्याने सादर केल्यानंतर तेथे यापुढे बेकायदा शॅक्स आणि सनबेड उभे राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, अशा हमीचे देणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व गोवा खंडपीठाचे न्या. एन. एन. ब्रिटो यांच्या खंडपीठाने दिला. मुख्य सचिव, पर्यटन खाते, पोलिस खाते, वीज खाते, महसूल खाते तसेच समुद्री पट्ट्यातील पंचायतींना एका आठवड्यात हे प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे.
गोव्यातील सागरी पट्ट्यात बेकायदा उभे राहिलेल्या "शॅक्स'ना वीजजोडणी, अन्न व औषध खाते, आरोग्य खाते तसेच त्याठिकाणी दारू विक्री करण्यासाठी अबकारी खात्याचा परवाना कसा मिळाला, असा प्रश्न करून या शॅक्सना हे परवाने देणाऱ्या सर्व खात्यांतील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. याबाबत आदेश देऊनही कारवाई केली जात नसल्याने पर्यटन खात्याच्या संचालकांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर समुद्र किनाऱ्यावरील सर्व शॅक्स आणि सनबेड हटवण्यात आले होते.

खाणींमुळे शिरगावात पाण्याचा प्रश्न गंभीर

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): खाणीमुळे शिरगाव येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून राज्य सरकार, केंद्रीय पर्यावरण खाते, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलस्रोत खाते आणि खाण व्यवस्थापन यांनी एकत्रित बसून यावर तोडगा काढावा, असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व गोवा खंठपीठाचे न्या. एन. एन. ब्रिटो यांनी दिला.
शिरगाव येथे सुरू असलेल्या तीन खाणींमुळे गावातील जलस्रोत, शेती तसेच विहिऱ्या आटल्याने शिरगाव नागरिक कृती समितीने खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्याबाबतची सत्यस्थिती पाहण्यासाठी न्यायालयाने ऍड. नॉर्मा आल्वारीस यांची नेमणूक करून अहवाल सादर करण्याच आदेश दिला होता.
ऍड. आल्वारीस यांनी या परिसरातील ९० टक्के विहिरी आटल्याची धक्कादायक माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या खाणीमुळे सात लाख चौरस मीटर शेत जमीन नष्ट झाल्याचेही न्यायालयाला सांगितले. खनिज काढण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त खोल खोदकाम केले जाते. एका खाणीवर १८ मीटर जास्त खोल खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व पाणी त्याठिकाणी साचत असून ते पाणी पंपांद्वारे बाहेर फेकले जाते. या पाण्यात खनिज माती मिसळली जात असल्याने त्याचा उपयोग होत नसल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडले.
न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन एक आठवडा खाणी बंद ठेवल्यावर तुम्हाला जाग येणार का, अशा प्रश्न करून यावर त्वरित तोडगा काढण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

बायणा किनाऱ्यावरील बांधकाम 'सुडा'च्या तिघा अधिकाऱ्यांकडून १० लाख वसूल करण्याचा आदेश

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): "सीआरझेड' नियमांचे उल्लंघन करून बायणा किनाऱ्यावर बांधकाम करण्याचे आदेश देणाऱ्या राज्य नागरी विकास संस्थेच्या
("सुडा') अधिकाऱ्याकडून त्या बांधकामाची किंमत आणि ते मोडण्यासाठी आलेला खर्च असे १० लाख ६३ हजार ३७९ रुपये एका महिन्यात वसूल करून घेण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व गोवा खंडपीठाचे न्या. एन. एन. ब्रिटो यांनी दिला आहे. या बांधकामाला परवानगी देणारे "सुडा'चे सदस्य सचिव दौलतराव हवालदार, मुख्य प्रकल्प अधिकारी जे. एन. चिमुलकर व साहाय्यक प्रकल्प अधिकारी अमित शिरोडकर या अधिकाऱ्याकडून ही रक्कम वसूल करावी, असे आदेशात म्हटले आहे. ही रक्कम एका महिन्यात आत सरकारी तिजोरीत भरावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
वास्को बायणा येथे "सुडा'तर्फे गाळे आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम "सीआरझेड' नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचे याचिकादारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावेळी दक्षता खात्याला याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यावेळी दक्षता खात्याने चौकशी करून संबंधित अधिकारी याला जबाबदार असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या बांधकामाचा खर्चाचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी याची १० लाख २७ हजार १६४ एवढी किंमत करण्यात आली होती. तसेच वास्को महापालिकेला हे बांधकाम पाडण्यासाठी ३३ हजार २१५ रुपये खर्च आला होता. हे दोन्ही खर्च १० लाख ६३ हजार ३७९ रुपये एवढे होत आहेत.

बसवाहतूकदारांतील वाद गंभीर होण्याची शक्यता

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): प्रवासी मिळवण्याच्या वादातून पणजी शहर बसवाहतूकदार व बाहेरील बसमालक यांच्यातील तिढा अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाहतूक खात्याने यासंबंधी काढलेल्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करून शहरी बसमालकांवर अन्याय झाल्यास तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शहरी बस संघटनेचे अध्यक्ष मायकल डिसोझा यांनी दिला आहे. माशेल, कुंभारजुवे,चिंबल, म्हापसा आदी शहराबाहेरील बसेस पणजी कदंब बसस्थानकावरून शहरी भागातील प्रवाशांना बेकायदा घेत असल्याने त्याचा थेट परिणाम शहरी बसेसवर होतो, असा आरोप डिसोझा यांनी केला आहे. दरम्यान, शहरातील प्रवाशांना पणजी बसस्थानकावर उतरवून त्यांना परत शहरी बसेसने पणजी बाजार किंवा पुढे जाण्यास वेगळे पैसे मोजावे लागतात व त्यांना अधिक भुर्दंड सहन करावा लागतो. तथापि, या बसेसनी बसस्थानकावर न येता थेट पुढे जाण्याचे ठरलेले आहे. बसस्थानकावर प्रवाशांना उतरवण्यासाठी या बसेस बसस्थानकावर येतात व शहरी प्रवाशांना घेऊन बाजारात जातात, असाही आरोप केला जात आहे.
दरम्यान, यासंबंधी वाहतूक खाते,मुख्य सचिव, वाहतूकमंत्री आदींना निवेदने सादर करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेने अद्याप कडक पाऊल उचलले नाही, असे सांगून या बसेसना वेळीच आवर घालावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Sunday 27 April, 2008

गालजीबाग येथे तीन बुडाले पितापुत्राचा मृतांमध्ये समावेश

गावडोंगरी, दि. २७ (वार्ताहर): गालजीबाग समुद्र किनाऱ्यावर आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास तिघेजण बुडाले त्यात एकाच घरातील वडील व मुलाचा मृत्यू झाला, त्यामुळे गुदिनो कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
कारवार येथील शेजवड भाड या गावातील वडील डानीयर काजबीर गुदिनो (वय ४५), मुलगा इनासियो गुदिनो (वय १६) आणि मित्र पेट्रीक फर्नांडिस (वय ४५) यांना मरण आले.
कारवार येथील गुदिनो परिवार सहकुटुंब आपल्या गालजीबाग येथील नातेवाईकांकडे रविवार दि. २७ रोजी सकाळी आले होते. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास फिरण्यासाठी वडील, मुलगा, मित्र मिळून गालजीबाग येथील चर्चच्या पाठीमागे असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. सर्वजण आंघोळीसाठी उतरले, त्यावेळी प्रथम मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसत असताना त्याला वाचविण्यासाठी वडील श्री. डानीयर गुदिनो मुलाच्या मदतीसाठी गेले असता नियतीने पितापुत्राचा बळी घेतला. इतक्यात आपल्या मित्राला व मित्राच्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पेट्रीक फर्नांडिसलाही आपला प्राण गमवावा लागला. हे सर्व घडत असताना आणखी एक त्यांचा दोस्त त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. सुदैवाने एका दगडाला हात ठेवून तो पाण्यात राहिला अन्यथा त्याचाही बळी गेला असता अशी माहिती त्याच्या नातेवाईक व पोलिस सूत्रांनी दिली.
श्री. गुदिनो यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व एक लहान मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
इनासियो गुदिनो हे इनासियो गुदिनो हा इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिस बना नाईक दिली. गेल्या पाच दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला होता त्यामुळे गालजीबाग येथील समुद्र किनारा धोकादायक ठरला असून आज बुडून मरण पावल्याने संख्या वाढली आहे. तीनही व्यक्तींना शवविच्छेदनासाठी मडगाव येथे दाखल करण्यात आला आहे.

हिंदुत्व जागविण्याचे कार्य मंदिरांतून व्हावे: ब्रह्मेशानंदाचार्य

पणजी, दि.२७ (प्रतिनिधी): आपल्या अवतीभोवती अनेक मंदिरे आहेत, ती सर्व धर्मस्थळे आहेत. त्याठिकाणी हिंदुत्व जागविण्याचे कार्य व्हायला हवे, असे मत कुंडई येथील तपोभूमीचे पीठाधीश स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले. मेरशी येथील धर्मजागरण सभेत ते बोलत होते.
हिंदू हा देशाचा प्राण आहे असे सांगून स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांनी आपल्या पूर्वजांची पुण्याई टिकवायची असेल तर आपली भूमाता, जमीन विदेशीना विकू नका, असे आवाहन समस्त गोमंतकीयांना केले. आपल्या देशात राहून देशद्रोही कारवाया करणाऱ्यांना नष्ट करण्याची वेळ आली आहे, असे बजरंग दलाचे गोवा समन्वयक विनायक च्यारी यांनी यावेळी सांगितले.गाईंची होणारी हत्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले न उचलल्यास हत्या करण्यासाठी आणण्यात येणारी गुरे पोलिस ठाण्यावर घेऊन येऊ, असा इशारा त्यांनी दिला. ही वेळ येऊ नये असे वाटत असेल तर सरकारने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले. हिंदू जनजागृती समितीचे नेते जयेश थळी यांचेही यावेळी भाषण झाले. सभास्थानी स्वामींचे आगनन होताच हेमंत गोलतेकर यांनी त्यांची पाद्यपुजा केली.
यावेळी प्रशांत वेंगुर्लेकर, पुंडलीक कळंगुटकर, अवधूत शिरोडकर, उल्हास नाईक, भरत नाईक, हेमंत गोलतेकर, प्रकाश नाईक, प्रमोद तुयेकर, जयवंत कळंगुटकर यांचा स्वामींच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. खास अतिथी डॉ. सी.पी.दास यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
सकाळी ९.३ वाजता स्वामींनी सातेरीमंदिर, कार्मीभाट, स्वामी समर्थ मंदिर, हनुमान मंंदिर, सातेरी मंदिरांना भेट दिली व देवदर्शन घेतले. ६५ जोडप्यांनी स्वामींची पाद्यपुजा केली.

गोव्यात सिद्धगिरी ज्ञानपीठ व अनोखे संग्रहालय साकारणार

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): गोव्यात कासरपाल अस्नोडा येथे सिध्दगिरी ज्ञानपीठ आणि गोव्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारतीय संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी अनोखे संग्रहालयाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती प.पू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज दिली.
ते आज पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर तसेच अन्य भक्तगण उपस्थित होते. या ज्ञानपीठात गुरुकुल पद्धतीने प्राथमिक शिक्षण दिले जाणार असून या विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगीत, नाटक तसेच अध्यात्माचेही शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली. या सिध्दगिरी ज्ञानपीठासाठी कोमुनिदादची सुमारे १ लाख २० हजार चौरस मीटर जागा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले. तर थिवी येथे ट्रस्टच्या मालकीची असलेल्या २० हजार चौरस मीटर जागेवर हे अनोखे संग्रहालय उभारले जाणार आहे.
शिक्षक काय शिकवतात, त्यापेक्षा शिक्षक काय करतात, हे मुले जास्त शिकतात, असे म्हणून गुरुकुल पद्धतीने देण्यात येणाऱ्या या शिक्षणाला महत्त्व दिले जाणार आहे. पाठ्यपुस्तकात असलेल्या काही चुकांसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना श्री स्वामी म्हणाले, वाईटातून चांगले कसे शिकवावे हे शिक्षकाचे कौशल्य असते.
श्री क्षेत्र सिद्धगिरी' काणेरी कोल्हापूर येथे मुख्य मठ असून याला हजार वर्षापासूनची सांस्कृतिक, धार्मिक तसेच आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. सर्व धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी "सिद्धगिरी म्युझियम' हा अभिनव असा प्रकल्प आहे. "भारतीय ग्रामीण संस्कृती' हा या संग्रहालयाचा मुख्य गाभा आहे. ग्रामीण भारत कशा समृद्ध होता, ग्रामीण भागातील ग्रामवासियांच्याकडून ग्रामवासीयांच्या गरजा व अपेक्षा कशा भागवल्या जात होत्या, याचे जिवंत दर्शन या प्रकल्पातून घडवले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा या भारतीय ग्रामीण संस्कृतीची नव्या पिढीला ओळख व्हावी, माहिती व्हावी, तिची जपणूक आणि संवर्धन करता यावे, निर्मळ जल, निर्भेळ अन्न आणि निराआलस्य कष्ट तसेच स्वावलंबी सहज सुंदर ग्रामीण, जीवनांवर प्रीती जडावी या उदात्त हेतूने हा प्रकल्प साकारला आहे. अशा प्रकारचा हा उपक्रम महाराष्ट्रातलाच नव्हे त संपूर्ण देशातील पहिलाच उपक्रम आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सांखवाळ येथील विद्यार्थी बुडाला

वास्को, दि.२७ (प्रतिनिधी): सांखवाळ येथे राहणारा एल्टन लोबो (१५) हा आपल्या इतर तीन अल्पवयीन मित्रांबरोबर आंघोळीसाठी जुवारी धरणावर आंघोळीसाठी गेला असता त्याचे बुडून निधन झाले. आपला मित्र बुडाल्याचे समजल्याने घाबरलेल्या इतर तीनही मित्रांनी सदर गोष्ट दा ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र काल उशिरा रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर आज सकाळी एल्टनचा मृतदेह त्याठिकाणी पाण्यातून वर काढण्यात आला.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कुठ्ठाळी येथील अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारा एल्टन हा आपल्या इतर तीन मित्रांबरोबर (वय सुमारे १३ ते १५) काल दि. २६ रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास बिट्स पिलानीसमोर असलेल्या जुवारी धरणावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. काही वेळातच एल्टन अचानक धरणाच्या पाण्यात बुडाला. हा प्रकार त्याच्याबरोबर असलेल्या तीनही मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी घाबरून येथून पळ काढला. आपल्या बरोबर आलेला मित्र बुडाल्याने भीतीपोटी त्यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. मात्र जसा उशीर होत गेला व एल्टन घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वेर्णा, वास्को व सांखवाळ अशा ठिकाणी शिकणाऱ्या त्याच्या बरोबर गेलेल्या मित्रांशी एल्टनच्या थोरल्या बहिणींनी उशिरा रात्री चौकशी केली, तेव्हा त्या मित्रांच्या तोंडून सत्य बाहेर आले. एल्टन जुवारी धरणात आंघोळ घेत असताना बुडाल्याचे समजताच वेर्णा पोलिसांना यांची माहिती देण्यात आली. रात्रीच्या वेळी येथे शोध घेणे कठीण झाल्याने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वेर्णा पोलिसांनी अग्निशामक दलाच्या साहाय्याने या ठिकाणी शोध घेतला असता त्यांना एल्टनचा मृतदेह आढळून आल्यानंतर तो पाण्यातून वर काढण्यात आला. एल्टन याची आई बहारिनला असून, वडील व थोरली बहिण सांखवाळ येथे राहातात.
वेर्णा पोलिसांनी यावेळी एल्टनच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागृहात पाठवून दिला. उद्या त्याच्या मृतदेहावर शवचिकित्सा करण्यात येणार असल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली. वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक जिवोबा दळवी पुढील तपास करीत आहेत.

'महागाईमुळे देशभरात कॉंग्रेसविरोधी वातावरण'

रुडी यांच्याहस्ते महिला शिबिराचा समारोप
डिचोली, दि. २७ : लोकप्रिय अर्थसंकल्प सादर केल्याच्या तोऱ्यात असलेल्या कॉंग्रेस सरकारचे जीवघेण्या महागाईमुळे देशभर हसे झाले आहे, त्यामुळे जनता सार्वत्रिक निवडणुकीची वाट पाहत आहे , असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते राजीवप्रताप रुडी यांनी भाजप पहिला मोर्चाच्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी मुळगाव - डिचोली येथे केले.
भारतीय जनता पक्षाने महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाविषयी गंभीररीत्या विचार केला असून, संघटनेत त्यांना आत्तापासूनच आरक्षित जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे महिलांचे राजकीय भविष्य भाजपतच आहे. त्यामुळे महिला मोर्चाने राजकारणात पुढे यावे, असे आवाहन श्री रुडी यांनी केले.
यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर समारोपप्रसंगी उपस्थित होते. गोव्याच्या समस्या व भारतीय जनता पक्षाचे योगदान या विषयांवर बोलताना त्यांनी वाढलेल्या महागाईस पूर्णपणे कॉंग्रेसचे निष्क्रिय सरकारच जबाबदार आहे असे सांगून, भाजपने कमी दरात जीवनावश्यक वस्तू विकून सरकारला एक चांगले उदाहरण घालून दिले आहे, पण बेमुर्वत सरकार कुठलीही चांगली गोष्ट करण्याच्या मनःस्थितीतच नाही असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे, गोव्याचे संघटन प्रभारी श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस व महिला प्रभारी गोविंद पर्वतकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. मुक्ता नाईक, सरचिटणीस सौ. वैदहि नाईक उपस्थित होत्या.
प्रशिक्षण शिबिरात चांगली सत्रे झाल्यामुळे सर्व महिला उत्साहात होत्या. रोहिणी परब यांनी समारोप कार्यक्रमांतर्गत आभार मानले व शेवटी वन्दे मातरम्ने दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली.

वाहतुकीला लवकरच 'नवा चेहरा' डॉ. पसरिचा यांच्या अहवालावर अभ्यास सुरू

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): राज्यातील रस्ता अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक खात्यानेव्यापक मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.
या पार्श्वभूमीवर अपघातांच्या नेमक्या कारणांचा शोध लावण्याबरोबरच वाहनचालकांकडून कोणत्या नियमांचे उल्लंघन होते याचे वर्गीकरण करण्याचे काम वाहतूक पोलिस व रस्ता वाहतूक विभाग यांच्याकडून जोरात सुरू आहे.
याप्रकरणी वाहतूक खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचे माजी पोलिस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा यांच्याकडून मार्गदर्शनाचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर अलीकडेच त्यांनी गोव्याला भेट देऊन राज्यातील एकूण वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला. त्यांनी गोव्यातील रस्ता अपघातांची कारणे शोधण्याबरोबर वाहतुकीची कोंडी नेमकी का व कशी होते, याबाबतही सर्वेक्षण केले आहे. यासंबंधी त्यांनी आपला एक अहवाल तयार करून राज्य सरकारकडे दिला आहे. या अहवालानुसार त्यांनी केलेल्या काही सूचना व मागण्यांबाबत सखोल विचारविनिमय सुरू आहे. दरम्यान, काही महत्त्वाच्या गोष्टींचे सर्वेक्षण करण्याची सूचना त्यांनी वाहतूक पोलिसांना दिली आहे. त्यानुसार हे सर्वेक्षण सुरू आहे. नंतर निश्चित माहिती खात्याकडे उपलब्ध होणार असून मग थेट कारवाई सुरू होणार आहे.
गोव्यातील वाहतूक व्यवस्थेसंबंधी काढलेल्या प्राथमिक माहितीनुसार गोव्याची लोकसंख्या १५ लाखाच्या जवळपास असून सुमारे ६ लाख वाहने असल्याचे म्हटले आहे. त्यात ५०४२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे जाळे आहे. राष्ट्रीय महामार्ग २६३ किलोमीटर तर राज्य महामार्ग २३२ किलोमीटरचा आहे. वाहतूक पोलिसांची संख्या २७३ एवढी असून वर्षाला सुमारे ४ हजार अपघात होतात व दरवर्षी अंदाजे ३०० लोक मृत्युमुखी पडतात,अशीही माहिती उजेडात आली आहे. पसरिचा यांनी आपल्या गोवा भेटीवेळी अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात वाहतूक खात्यातील वरिष्ठ अधिकारी,वाहतूक पोलिस अधिकारी,राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग अभियंते, नगर नियोजक, पणजी महापालिका व जिल्हाधिकारी व इतर काही संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
काही ठरावीक मुद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यावर नियंत्रण ठेवल्यास मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यात हेल्मेटसक्तीचा कायदा कडकपणे राबवण्याचा निर्णयही नमूद केला आहे. राज्यातील विविध मद्यालये ही राष्ट्रीय महामार्गाला टेकून असल्याने ती निदान ७५ मीटर दूर असावीत अशी सूचना पसरिचा यांनी केली आहे. सरकारला धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. राज्यात वाहतूक अभियांत्रिकी केडर स्थापन करून रस्ता वाहतूक व रस्ता सुरक्षेच्या सर्व गोष्टी या केडरकडून हाताळल्या जातील. राज्य महामार्ग व्यवस्थापनाअंतर्गत या विभागाची स्थापना करून पंचायत,पालिका महापालिका, विविध सामाजिक संघटना व तज्ज्ञांच्या मदतीने विविध प्रश्न वैज्ञानिक व व्यावसायिकतेने हाताळणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सुचवले आहे.या वाहतूक अभियांत्रिकी विभागांतर्गत वाहतूक नियम फलक उभारणे व त्यांची देखभाल, रस्ता दिशादर्शक, वाहतूक नियंत्रण यंत्रणा, रस्ते व पदपथांचे बांधकाम व त्यांची देखभाल, विविध वळणे,चौक व रस्त्यांच्या कडांचे नियोजन आदींचा समावेश आहे.
वाहतूक पोलिस विभागाने वाहनचालक परवाना देताना आपले धोरण कडक करावे तसेच प्रशिक्षण घेतलेल्या व सर्व वाहतूक नियम काटेकोरपणे माहीत असलेल्यांनाच परवाना देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ. पसरिचा यांनी विविध अपघातप्रवण व वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. त्यात दाबोळी विमानतळ जंक्शन, दाबोळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील एम.ई.एस जंक्शन, कुठ्ठाळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शन, पणजी दिवजा सर्कल, मडगाव जुने मार्केट चौक, नुवे जंक्शन, मळा-बेती जंक्शन, पर्वरी येथील "ओ कोकेरो' जंक्शन आदींचा समावेश आहे.
फातोर्डा जंक्शन व मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जंक्शनबाबत विशेष अभ्यास करावा लागणार आहे. येथील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचे निरीक्षण करून कृती करावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाकी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व गोष्टींची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी काटेकोर नजर ठेवून त्यात सातत्य राखण्याच्या गरजेवर भर देण्यात आला आहे.