Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 14 February, 2009

कोरोमंडल एक्सप्रेस घसरली

ओरिसातील घटना, २४ ठार, २०० जखमी

भुवनेश्वर, दि. १३ - एकीकडे, संसदेत रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी निवडणुकीचा लोकप्रिय रेल्वे अर्थसंकल्प मांडून त्यावरील शाई ओली असतानाच ओरिसातील जयपूर रोड स्थानकावर आज कोरोमंडल एक्सप्रेसचे चौदा डबे रुळावरून घसरल्याने किमान २४ प्रवासी ठार, तर सुमारे दोनशेहून अधिक जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात घडला.
पश्चिम बंगालमधील हावडा येथून ही एक्सप्रेस चेन्नईला निघाली होती. अपघाताचे वृत्त समजताच मदत पथकांनी मोठ्या प्रमाणावर साह्यताकार्य सुरू केले. जखमींना नजीकच्या विविध इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे. ओरिसाचे अर्थमंत्री प्रफुल्ल घाडई व बालकल्याण मंत्री प्रमिला मॅलिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत पथकांना मार्गदर्शन केले. जेथे अपघात झाला तेथे दाट काळोख असल्यामुळे मदत पथकांच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे मृत व जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भयंकर अपघातात रेल्वेचे डबे एकमेकांवर चढल्यामुळे मृत व जखमींना खास कटर्सद्वारे डब्यांचे दरवाजे कापून बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अपघातस्थळीचे दृश्य अत्यंत करुण दिसत होते. मदतीसाठी प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते. कोण जिवंत आहे व कोणाचा मृत्यू झाला हे समजण्यास मार्गच नव्हता. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर भीतीची छाया दिसत होती. या अपघातानंतर संबंधित मार्गावरील सर्व गाड्या रद्द करून रेल वाहतूक भुवनेश्वर व संभलपूरमार्गे वळवण्यात आली आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला हे अजून स्पष्ट झालेले नाही. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मृत व जखमींच्या नातेवाइकांना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. या अपघातात तीन डबे चक्क रेल्वेच्या इंजिनावरच चढल्यामुळे मदत पथकांचे काम आणखी कठीण झाले आहे.

आरोपी पंढेर आणि कोलीला फाशी

नवी दिल्ली, दि. १३ - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी हत्याकांडातील पहिला निकाल आज आला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरिंदर कोली या दोघांनाही रिम्पा हलधर बलात्कार आणि खून प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली.
सीबीआयच्या विशेष न्यायाधीश रमा जैन यांनी काल ५५ वर्षीय पंढेर आणि ३८ वर्षीय कोली यांच्यावर रिम्पा हलधर बलात्कार व खून प्रकरणी आरोप निश्चित केले होते. आज यातील शिक्षेची सुनावणी होणार असल्याने न्यायालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. रिम्पा या १४ वर्षीय मुलीवर अमानूष बलात्कार करून तिचे तुकडे-तुकडे करणाऱ्या पंढेर आणि कोली यांचा गुन्हा अतिशय गंभीर असल्याचे सांगून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
पीडित रिम्पासह अनेक बेपत्ता मुलांचे पालक या निवाड्याने समाधानी दिसले. यापूर्वी सीबीआयने पंढेरला आपल्या चौकशीत "क्लीन चिट' दिली होती. आता न्यायालयाने त्याला दोषी ठरविणे ही सीबीआयला मोठी चपराक असल्याचे रिम्पाच्या वकिलांनी म्हटले आहे. तिच्या वतीने ऍड. खालिद खान यांनी काम पाहिले.
पंढेर कुटुंबीय संतप्त
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निवाड्यावर पीडित रिम्पा हलधरचे कुटुंबीय एकीकडे समाधानी असताना दुसरीकडे पंढेरचे कुटुंबीय प्रचंड संतापले होते. त्याचा मुलगा करण पंढेर याने हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगून आपले पिता निरपराध असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्याने म्हटले.

वेतनवाढीची मागणी मालकांनी फेटाळली

कामगार खवळले

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - किमान वेतन वाढीस कंपन्यांचे मालक तयार होत नसल्याने अखेर आज वेतन वाढीवर निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करून दोन महिन्यात निर्णय कळवण्याचे आश्वासनानंतर किमान वेतनवाढ मंडळाची बैठक आटोपती घेण्यात आली. या बैठकीत कंपन्यांचे प्रतिनिधी "दहशतवाद्यां'प्रमाणे वागल्याचा आरोप "आयटक'चे नेते ख्रिस्तिफोर फोन्सेका यांनी केला. तसेच या दुटप्पी धोरणामुळे कामगार सरकारवर खवळले असून याला
कामगार मंत्री ज्योकिम आलेमाव जबाबदार असल्याचे यावेळी श्री. फोन्सेका म्हणाले.
" हे सरकार निर्णय घेत नसून केवळ समित्यांची स्थापना आणि वेळकाढू धोरण अवलंबून सामान्य कामगारांची पिळवणूक करीत आहे. तसेच कंपन्या गुलामासारखी वागणूक कामगारांना देऊ इच्छितात, अशी प्रखर टीका फोन्सेका यांनी केली. आज सकाळी सचिवालयात मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या अध्यक्षतेखाली कंपन्यांचे व्यवस्थापन व कामगार संघटनांच्या नेत्यांत झालेल्या या बैठकीत किमान वेतनवाढीसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ही बैठक सुरू असताना पणजी बसस्थानकाच्या समोर "आयटक'च्या कामगारांनी मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सरकारने किमान वेत २५० रुपये वेतन वाढीची मागणी मान्य न केल्यास गोव्यातील सर्व कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशारा राजू मंगेशकर यांनी दिला.
दरम्यान, आजच्या बैठकीत उद्योजकांनी मंदीचे कारण पुढे करून वेतनवाढ शक्य नसल्याचे स्पष्ट केले. प्रस्तावित अधिसूचनेत रु. १५० असे निश्चित केलेले किमान वेतन हे अत्यल्प असून अकुशल कामगारांना २२५, अर्धकुशल कामगारांना २५० रु., कुशल कामगारांना ३०० रु., व अतिकुशल कामगारांना ३५० रु. किमान वेतन दिले जावे, अशी कामगार संघटनांची मागणी आहे. सध्या १०३ रुपये रुपये किमान वेतन असून गेल्या सात महिन्यात ४० टक्के महागाई वाढल्याने कामगारांना जगणे मुश्कील होत असल्याचे फोन्सेका म्हणाले.

गोव्यात असंघटित कामगारांसाठी आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ

पणजी, दि.१३ (विशेष प्रतिनिधी)- केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे राज्य कामगार आयुक्त कार्यालय व न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीच्या सहकार्याने आज गोव्यात दारिद्र्यरेषेेखालील विभागातील असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ रोजगार मंत्री ज्योकिम आलेमाव यांच्या हस्ते करण्यात आला.
यायोजनेंतर्गत गोव्यातील दारिद्र्यरेषेखालील सुमारे ७०५४ कुटुंबांना राज्यात मान्यता असलेल्या ४० खाजगी इस्पितळात ३० हजार रु.चे वार्षिक आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकार, गोवा सरकार व न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीदरम्यान या योजनेचा करार झाल्यानंतर दत्ताराम मांद्रेकर, मिनीनो आफोन्स, द्रौपदी गावकर व गोकुळदास भंडारी या कुटुंबांना या योजनेची सवलत देण्यात आली.
पंचायत संचालनालयाने रोजगार आयुक्तांच्या सहकार्याने ग्रामसेवकामार्फत ही योजना राबवायची आहे.या योजनेतील वार्षिक हप्ता प्रती कुटुंब ७५० रु. असून केंद्र व राज्य सरकार ७५ः२५ प्रमाणे म्हणजेच केंद्र रु.५६५ तर राज्याला राहीलेला हप्ता भरावा लागेल.
या अनोख्या योजनेचा शुभारंभ करताना, मंत्री ज्योकिम यांनी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गोव्यातील सुमारे ९३ टक्के कामगारांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले. आरोग्याची काळजी घेणे हा एक अतिमहत्वाचा व नाजूक प्रश्न असून गरीबांना आजारपणात महागडी औषधे व शस्त्रक्रिया परवडत नाहीत. राष्ट्रीय आरोग्य योजना ही गरजूंसाठी उपयुक्तत योजना असल्याचे ते म्हणाले.

या योजनेची माहिता देताना, रोजगार सचिव दिवाण चंद यांनी ही रोखता विरहित व कागदपत्र विरहीत योजना असून ती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्डवर कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. या स्मार्ट कार्डचा खर्च केंद्र सरकार करणार असून लाभार्थीला वार्षिक नोंदणी फी म्हणून ३० रुपये भरावे लागतील.या योजनेअंतर्गत पाच सदस्यीय कुटुंबाला दरवर्षी वैद्यकीय उपचारासाठी ३० हजार रुपयांपर्यंत आर्थिकमदत दिली जाईल. स्मार्ट कार्डमध्ये सर्व पाचही सदस्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातील व गरज त्यावेळी हे कार्ड कुटुंबप्रमुख, किंवा कोणीही सदस्याला वापरता येईल. यावेळी स्मार्ट कार्डमध्ये मुद्रित केलेले ठसे पुरावा म्हणून उपयोगात आणले जातील त्यामुळे योजनेचा गैरवापर होणार नसल्याचे चंद यांनी सांगितले.
केंद्रीय रोजगार मंत्रालयाचे संचालक ए. व्ही. सिंग यांनी, या योजनेखाली देशात सुमारे २५ लाख स्मार्ट कार्डे वितरित करून १ कोटीपेक्षा जास्त लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यात आल्याचे सांगितले.
आतापर्यंत सुमारे ६२०० जणांनी या योजनेचा लाभ घेतला असून वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारात व्याज देऊन कर्ज घेणाऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. या योजनेमुळे इस्पितळे आता गरीब रुग्णांना उपचारासाठी टाळू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले..
या योजनेखाली विविध ७५० व्याधींवर उपचार करण्याची मुभा असून, पहिल्यांदाच या देशातील दारिद्र्यरेषेखालील जनता आरोग्य सुविधांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली.
केंद्र सरकारच्या अवर सचिव उर्मिली गोस्वामी, मजूर आयुक्त व्ही.बी.एन.रायकर, कामगार उपायुक्त बी. के. शिवाजी न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमानंतर योजनेवर आधारीत कार्यसत्र पार पडले.

कॉंग्रेस कार्यकारिणीवर डावलले; क्षत्रिय मराठ्यांत संतापाची लाट

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - नव्या प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणीवर क्षत्रिय मराठा समाजाच्या एकाही व्यक्तीला स्थान दिले गेले नसल्याने एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के असलेल्या या समाजाच्या नेत्यांनी कॉंग्रेसशी फारकत घेऊन नव्या पक्षाकडे जाण्याचा विचार चालवला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाची भव्य वास्तू पर्वरीत साकारत असून त्याबाबत जनजागृती करून निधी संकलनासाठी गावोगावी मेळावे घेतले जातात. त्यावेळी या विषयावर चर्चा होत नसली तरी उपस्थित मंडळींत या विषयावरून असंतोष व्यक्त केला जात आहे. समाज संस्थेच्या अध्यक्षपदी असलेले संतोबा देसाई हे भाजपमध्ये असल्याने या समाजाला भाजप जवळचा वाटू शकेल किंवा आजपर्यंत कधीही उघडपणे राजकीय भूमिका न घेणाऱ्या या समाजाने मुभा दिल्यास कॉंग्रेसऐवजी या समाजाचे लोक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही जाऊ शकतील असे या मेळाव्याच्या वेळी चर्चा करणाऱ्यांचा अंदाज घेता कळून येते.
गोव्यात क्षत्रिय मराठा व वैश्य यांची संख्या सुमारे २६ टक्के भरते. गेल्या कार्यकारिणीत या समाजाचे देव प्रतिनिधी होते. मात्र, यावेळी त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले आहे. ख्रिस्ती व मुस्लिम अवघे ३५ टक्के असताना त्यांच्यासाठी ५ जागा, इतर मागासवर्गीयांची संख्या २८ टक्के असताना त्यांच्यासाठी पाच जागा देण्यात आल्या आङेत. दीड ते दोन टक्के असलेल्या सारस्वतांसाठीही दोन पदे दिली आहेत.
कार्यकारिणीत अजिबात बदल केला जाणार नाही, अशी ताठर भूमिका प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी घेतल्यामुळे संतुष्ट क्षत्रिय मराठा समाज येत्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसपासून दूर जाईल, अशी एकंदर चिन्हे दिसत आहेत. कार्यकारिणीवरील मंडळींचे चेहरे पाहता ख्रिस्ती, भंडारी, खारवी एवढेच समाज गोव्यात आहेत, अशी प्रदेशाध्यक्षांची भावना झाल्याचे दिसून येते. आजवर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला असताना ठरावीक जातींना बाजूला ठेवण्याची हे प्रयत्न कॉंग्रेसला भविष्यात मारक ठरतील, असा सूर क्षत्रिय मराठा समाजात व्यक्त होत आहे.

लालूंची सुपर फास्ट "निवडणूक एक्स्प्रेस'!

७० हजार कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर


- सर्व गाड्यांच्या प्रवास भाड्यात २ टक्के घट
- मेल-एक्स्प्रेसच्या भाड्यात १ रुपया कपात
- रेल्वेला ९० हजार कोटींचा नफा
- ६ बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
- पाच वर्षांत ८ टक्के विकास दर राखला
- ४३ नवीन गाड्यांची घोषणा
- रेल्वे अपघात घटल्याचा दावा
- आगरतळा रेल्वेच्या नकाशावर
- ठाणे व भागलपूरला नवा विभाग


नवी दिल्ली, दि. १३ - लालूप्रसाद यादव यांनी आज आपले शेवटचे रेल्वे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकाच्या रूपातील लालूंची निवडणूक एक्स्प्रेस सुपरफास्ट धावली. अंदाजपत्रक सादर करताना त्यांनी सर्वच लोकप्रिय घोषणा केल्या. सर्वच गाड्यांच्या प्रवासी भाड्यात केलेली दोन टक्क्यांची कपात, ४३ नवीन गाड्यांची घोषणा, गेल्या आर्थिक वर्षांत रेल्वेला झालेला ९० हजार कोटी रुपयांचा नफा आदी अनेक वैशिष्ट्ये आज लालूंनी सादर केलेल्या अवघ्या चार महिन्यांच्या रेल्वे अंदाजपत्रकाची ठरली!
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राष्ट्रीय पक्षांसोबतच विविध प्रादेशिक पक्षांनीही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रातील संपुआ सरकारचे शेवटचे रेल्वे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करण्यात आले. निवडणुका तोंडावर आहेत आणि रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव त्याचा फायदा घेणार नाहीत, असे होणे शक्यच नव्हते. म्हणूनच की काय आजचे रेल्वे अंदाजपत्रक पाहाता तो संपुआ सरकारचा जाहीरनामा तर नाही ना, अशी शंका येते.
लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची आचारसंहिताही येत्या काही दिवसांत लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपुआ सरकारला येत्या चार महिन्यांपर्यंतचा काळ काढायचा असल्यामुळे हे हंगामी अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. दुपारी १२ वाजता रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांचे रेल्वे बजेटवरील भाषण सुरू होणार होते. मात्र, ते सुमारे १५ मिनिटे विलंबाने सुरू झाले. आपल्या सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात लालू प्रसादांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या खास शैलीत आणि मध्येच केव्हा तरी शेरोशायरी करून लालूंनी आपले हे बजेट सादर केले. एकदोन वेळा विरोधी बाकांवरील सदस्यांनी लालूंच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तो आपल्या शैलीने दूर केला. लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनीही यासाठी त्यांना सहकार्य केले.
मी नुकताच जपान, जर्मनीचा दौरा करून आलो आहे. तेथे मी ताशी ३०० किमी वेगाने चालणाऱ्या बुलेट ट्रेन बघितल्या आहेत. अशा बुलेट ट्रेन भारतातही सुरू करण्याचा विचार आल्यामुळे त्यासाठी सहा मार्गांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. या मार्गांवरील यशस्वीतेनंतरच पुढील मार्गांचा विचार केला जाणार असल्याचेही लालूप्रसाद यांनी सांगितले. आधी रेल्वे मंत्र्यांनी यापैकी काही मार्गांचे नावे जाहीर करताच विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्यांना चिमटा काढताना पाटणाचा समावेश नाही का, असे छेडले. तेव्हा "है भाई...' असे हसत सांगून दिल्ली ते पाटणा मार्गावरील बुलेट ट्रेन चालविण्याबाबत लवकरच संशोधन सुरू केले जाईल, असे जाहीर केले. याशिवाय दिल्ली-अमृतसर, अहमदाबाद-मुंबई-पुणे, हैदराबाद-विजयवाडा-चेन्नई, चेन्नई-बंगलोर-एर्नाकुलम् आणि हावडा-हल्दिया या मार्गांवर बुलेट ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव सादर करून या मार्गांच्या अभ्यासाचे काम सुरू आहे, असेही रेल्वे मंत्री म्हणाले.
रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी सर्वप्रकारच्या प्रवासी भाड्यात कपातीची घोषणा केली. साधारण पॅसेंजर गाड्यांच्या प्रवासी भाड्यात दहा किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी पन्नास रुपयांच्या एका तिकिटावर एक रुपयाची सवलत दिली आहे. सर्व मेल, एक्स्प्रेस आणि साधारण व प्रवासी गाड्यांच्या द्वितीय श्रेणी, शयनयान श्रेणीच्या ५० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त तिकीट दर असलेल्या प्रवासाच्या तिकीट दरात दोन टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि कुर्सीयान वातानुकुलित भाड्यातही दोन टक्क्यांची कपात केली आहे.
रेल्वेचा वाढता विस्तार लक्षात घेता आणि मुंबईमध्ये असलेल्या दोन विभागांमध्ये वाढलेले काम पाहता ठाण्याला वेगळा विभाग देण्याची घोषणाही रेल्वे मंत्र्यांनी आज केली. ठाण्यासह भागलपूरमध्येही रेल्वेचा वेगळा विभाग राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भारत स्वतंत्र झाल्यापासून यंदा प्रथमच पूर्वोत्तर राज्यांपर्यंत रेल्वे पोहोचविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून त्रिपुराची राजधानी असलेल्या आगरतळाला आज रेल्वेच्या नकाशावर आणण्यात आले आहे. तसेच काश्मीर खोऱ्याला रेल्वे लाईनने जोडण्याचे कामही जोमाने सुरू आहे. लवकरच अनंतनाग ते राजपंशेर या रेल्वे लाईनचे काम पूर्ण केले जाईल. नंतर बारामुल्ला, काजीगुंडपर्यंत रेल्वे लाईन वाढविली जाईल, अशी माहितीही रेल्वे मंत्र्यांनी दिली.
गेल्या आर्थिक वर्षात रेल्वेने ९० हजार कोटी रुपयांचा नफा कमाविला असून ७० हजार कोटी रुपयांचे शिल्लकीचे अंदाजपत्रक आपण सादर करीत आहोत, असे लालूंनी सांगताच सत्तारूढ बाकांवरील सदस्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आम्ही तातडीने अंमलबजावणी केली असून त्याचा १६ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना, तसेच ११ लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ झाला आहे, असेही यादव यांनी सांगितले.
२००८-०९ या सत्रात भारतीय रेल्वेने माल व प्रवासी वाहतुकीमध्ये चांगली उपलब्धी प्राप्त केली आहे. या काळात माल वाहतुकीत ९ टक्के, तर कमाईत १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर प्रवासी वाहतुकीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे, असेही रेल्वे मंत्री म्हणाले.
दहा गरीब रथांसह ४३ नवीन गाड्यांच्या घोषणेप्रमाणेच रेल्वेमंत्र्यांनी मार्ग व दिवस वाढविलेल्या प्रत्येकी चौदा गाड्यांचीही माहिती सादर केली. गेल्या वर्षात रेल्वे अपघातात घट झाली असल्याचाही दावा याप्रसंगी त्यांनी केला. आधीच्या आर्थिक वर्षात १९४ रेल्वे अपघात झाले होते, तर गेल्या आर्थिक वर्षात ११७ अपघात झाले असल्याची माहितीही त्यांनी सादर केली.
भारतीय रेल्वेने गेल्या वर्षात केलेल्या कामांची माहिती, तसेच प्राप्त उपलब्धींची माहिती सादर करताना रेल्वे मंत्र्यांनी भविष्यातील काही योजनांचीही माहिती सादर केली. शेवटी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि संपुआ प्रमुख सोनिया गांधी यांचे सहकार्याबद्दल आभार मानून आपले अंदाजपत्रकीय भाषण आपल्याच शैलीत एक शेर सादर करून पूर्ण केले.

चौकट....
विदर्भाच्या तोेंडाला पाने पुसली!
भारतीय रेल्वेच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे केंद्र असलेल्या नागपूर, विदर्भाच्या पदरात मात्र दोन दिवसांपूर्वीच विदर्भ दौऱ्यावर येऊन गेलेल्या लालूप्रसादांनी काहीच दान टाकले नाही. कामाचा व्याप लक्षात घेता नागपूर विभागाची मागणी रेल्वे मंत्री पूर्ण करतील, अशी अपेक्षा असताना लालूप्रसादांनी नागपुरातील दोन गाड्यांच्या मार्गाचा विस्तार व दिवसांची वाढ वगळता या क्षेत्राला काहीच दिले नाही. नुकतीच सुरू झालेली अमरावती-मुंबई ही गाडी आठवड्यातून तीन दिवसांऐवजी आता रोज धावणार आहे. तर नागपूर-गया दीक्षाभूमी पारसनाथ एक्स्प्रेसचा मार्ग वाढवून पारसनाथ मार्गे धनबादपर्यंत करण्यात आली आहे.

Friday 13 February, 2009

हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये लवकरच धूम्रपानबंदी

"नोट'च्या मागण्या
"शॅक्स'ना परवानगी देताना धूम्रपानविरोधी नियम लागू करावे.
हॉटेल परवानाच्या नूतनीकरणप्रसंगीत्यांनाही अटी घालाव्यात.
किनारे आणि उद्याने धूम्रपानमुक्त म्हणून घोषित करावीत.
हॉटेल्सना दंडाची रक्कम २०० वरून ५ हजार रुपये करावी.

"नोट'च्या कार्यक्रमात विस्तृत विचारमंथन


पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - पोलिसांनी कोणाचीही तमा न बाळगता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. गोव्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये धूम्रपान करण्यास बंदी असल्याची अधिसूचना येत्या आठ दिवसांत काढली जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी "नोट'च्या कार्यक्रमात जाहीर केले. "तंबाखूविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत युवकांचा सहभाग' या विषयावर आयोजिलेल्या शिबिरात श्री. राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस महासंचालक बी एस. ब्रार, "व्हॉईस नवी दिल्ली' या संस्थेचे अध्यक्ष बिजोन मिश्रा, आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, "नोट'चे सचिव डॉ. शेखर साळकर, "एनएसएस'चे श्री. वाझ व दोरंग सिन्हा उपस्थित होते.
इयत्ता नववी व दहावीत शिकणारे काही विद्यार्थी धूम्रपान करीत असल्याच्या तक्रारी येथे असून गोव्यातील विद्यार्थी संघटनांनी हा विषय व्यवस्थित हाताळण्याची गरज असल्याचे यावेळी श्री. राणे म्हणाले.
धूम्रपानाच्या विरोधात सर्व जनतेला जागृत केले पाहिजे. धूम्रपानविरोधी कारवाई ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून कोणताही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यास विरोध केला पाहिजे. जनतेच्या सहकार्याविना पोलिस यशस्वी होत नाहीत. तंबाखूचे उत्पादन बंद केल्यास देशातील १५ लाख शेतकरी अडचणीत येतील हा युक्तिवाद पळपुटा असून त्या शेतकऱ्यांना अन्य पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, असे ब्रार म्हणाले.
वर्षाला शंभर दशलक्ष लोक केवळ धूम्रपानामुळे मृत्युमुखी पडत आहेत. विकसनशील देशांत ही संख्या मोठी आहे. तंबाखू किती हानिकारक आहे, याची जाणीव जनावरांनाही आहे. कोणतेच जनावर जंगलात तंबाखूची पाने खात नाही, अशी माहिती यावेळी डॉ. शेखर साळकर यांनी आपल्या "पॉवर पॉइंट'द्वारे सादरीकरण करताना दिली. १ लाख ३० हजार टन दर वर्षी तंबाखूचे उत्पादन केले जाते. दरवर्षी देशात कर्करोगाचे ८ लाख नवे रुग्ण आढळतात. यातील ३ लाख रुग्णांना धूम्रपानामुळे कर्करोग झालेला असतो, असे ते म्हणाले. चित्रपटातील "किंग खान' हा सतत धूम्रपान करीत असतो तर, क्रिकेटमधील "किंग' सचिन तेंडुलकरला कोणतेही व्यसन नाही. त्यामुळे कोणता "किंग' आपल्याला हवा ते तुम्हीच ठरवा. "तुमचा प्रियकर धूम्रपान करीत असल्यास या "व्हॅलेंटाइन डे'ला त्याच्याकडून धूम्रपान करणे सोडायचे "गिफ्ट' घ्या, असा सल्लाही डॉ. साळकर यांनी दिला.
सिगरेट किंवा गुटखावर बंदी टाकू नये यासाठी निवडणुकीच्या काळात तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या राजकीय पक्षांना पैशांची मदत करतात. त्यामुळे यावेळी तंबाखू कंपन्यांकडून पैसे घेणाऱ्या राजकीय पक्षांना मतदान करू नये, असे यावेळी बीजोन मिश्रा म्हणाले. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या विरोधात दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयात हरल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार असल्याचे यावेळी श्री. मिश्रा म्हणाले.
धूम्रपान विरोधी जागृती करण्यासाठी आणि प्रत्येक हॉटेलात जाऊन पाहणी करण्यासाठी "एनएसएस' च्या विद्यार्थ्यांनी योगदान दिल्याबद्दल त्यांनाही यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. "नोट'ने आयोजिलेल्या भिंत्तीपत्र स्पर्धेत म्हापसा येथील सेंट. झेवियर महाविद्यालयाला प्रथम पारितोषिक मिळाले. द्वितीय पारितोषिक डॉन बॉस्को महाविद्यालय पणजी यांना, तर तिसरे दामोदर महाविद्यालय मडगाव व कार्मेल महाविद्यालय नुवे यांनी विभागून मिळाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

कचराप्रश्नी खंडपीठाकडून मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी घातलेल्या अटींच्या पूर्ततेची मुदत संपल्यानंतरही मडगाव, कुंकळ्ळी, कुडचडे, पेडणे, साखळी, वाळपई व केपे पालिकांनी त्याची पूर्तता न केल्याबद्दल या पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना हजर करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्यांची अक्षरशः खरडपट्टी काढली. या अटींचे आणि आदेशाचे पालन न झाल्यास तुम्हाला वैयक्तिक दंड ठोठावला जाईल व त्याची भरपाई तुमच्याच खिशातून केली जाईल, अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली. याविषयी पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली.
आदेश देऊनही कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारले गेले नसल्याने हा न्यायालयाचा अवमान झाल्याने तुमच्यावर खटला का भरू नये, अशी विचारणा करून याबाबत "कारणे दाखवा' नोटीस या पालिकांना बजावण्यात आली होती. त्यामुळे पेडणे, वाळपई, सांगे या पालिकांनी त्याविषयीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. सर्व अटींची नसली तरी, त्यातील काही अटींची पूर्तता झाली आहे. तसेच वाळपई नगरपालिकेकडे योग्य कामगारवर्ग नसल्याने आणि येथील स्थानिक कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्यास विरोध करीत असल्याने आमची अडचण होत असल्याचे यावेळी वाळपई पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
सांगे येथे उभारलेले कचरा विल्हेवाट केंद्र स्थानिक मोडून टाकत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून लवकरच न्यायालयाच्या अटींची पूर्तता केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी तसेच न्यायालयाने घातलेल्या अटी पूर्ण करण्यासाठी या पालिकांना चार आठवड्यांची अंतिम मुदत देण्यात आली होती. या कालावधीत या अटी पूर्ण न झाल्यास संबंधित पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर केले जाईल असेही सांगितले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत या अटी पूर्ण झाले नसल्याने न्यायालयाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे.

पोलिस महासंचालक ब्रार यांची दिल्लीत बदली

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- राज्याचे पोलिस महासंचालक बिजेंदरसिंग ब्रार यांची आज दिल्ली येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी दिल्ली पोलिस खात्यातील गुप्तहेर विभागाचे आयुक्त भीमसेन बस्सी यांची गोव्याच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आज दुपारी केंद्रीय गृहमंत्रालयाने याविषयीचा आदेश फॅक्सद्वारे काढला. बस्सी हे १९७७ तुकडीतील "आयपीएस' अधिकारी असून यापूर्वी त्यांनी चंदीगड येथे महानिरिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. श्री. ब्रार यांचा सेवा कार्यकाल संपल्याने नियमानुसार त्यांची बदली करण्यात आल्याचे पोलिस मुख्यालयाने सायंकाळी स्पष्ट केले.
ब्रार यांनी ९ सप्टेंबर २००६ मधे गोवा पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारली होती. दिल्ली पोलिस खात्यात जिल्हा पोलिस उपआयुक्त, अतिरिक्त विभाग आयुक्त, सहआयुक्त, तसेच प्रशासकीय कामकाज सेवा अशी जबाबदारी पेलून ते गोव्यात आले होते. महासंचालक नीरज कुमार यांच्यानंतर त्यांनी हा पदभार स्वीकारला होता.

बोरीत मिनी बसला अपघात

पाच गंभीर, दहा जखमी
फोंडा, दि. १२ (प्रतिनिधी) - टॉपकोला बोरी येथे आज (दि.१२) संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास मडगाव-फोंडा मार्गावरील मिनी बसला (जीए ०१ डब्लू ४५०१) झालेल्या अपघातात पंधरा जण जखमी झाले असून त्यातील पाच गंभीर जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. सदर बस बेदरकारपणे चालवली जात होती, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले.
गंभीर जखमींमध्ये आइस्क्रीम विक्रेता पारस मांगजी गुजर (बोरी), संगीता वासुदेव नाईक (वळवई), स्वेता नाईक (ढवळी), सुरेश राम (रायबंदर) आणि धनेश पंडित (रायबंदर) यांचा समावेश आहे.
जखमीमध्ये शमशाद बी (म्हार्दोळ), पंढरीनाथ पी. कुडतरकर (वारखंडे फोंडा), यशोदा गांवकर (वळवई), संजना केरकर (कुंकळ्ये म्हार्दोळ), वासंती बोरकर ( बोरी), माया गोकुळदास सतरकर ( राय सालसेत), रोझी जुझे मास्कारेन्हस ( ओपा खांडेपार), सुखदा सुभाष सिनारी (राय सालसेत), रेमेडियन डिसोझा ( शिरोडा), किशनलाल महादेव गोडकीया (गिरी म्हापसा) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.
बस भरधाव वेगाने फोंड्याला येत होती. बोरी येथे "टॉपकोला'हून बोरी सर्कलकडे जाणाऱ्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका आइस्क्रीम विक्रेत्याच्या गाड्याला आणि विक्रेता पारस गुजर याला बसने धडक दिली. त्यानंतर विरुद्ध दिशेच्या आधी एका दुचाकी वाहनाला व नंतर रस्त्याच्या बाजूच्या एका माडाला जोरदार धडक दिल्यानंतर बस बाबनी नाईक यांच्या घरावर कलंडली. यात आइस्क्रीमच्या गाड्याचा चुराडा झाला. तसेच श्री. नाईक यांच्या घराच्या छताचे नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक मंजुनाथ देसाई, वाहतूक पोलीस निरीक्षक सलीम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातील जखमींना फोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणण्यात आले. गंभीर जखमींवर प्रथमोपचार करून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविण्यात आले आहे. मिनी बसच्या चालक संजय लक्ष्मण दांडे (बेतोडा) याला फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. उपनिरीक्षक संजय दळवी, हवालदार जे. फर्नांडिस, हवालदार सुरेंद्र कोमरपंत व इतरांनी पंचनामा केला. सदर बस वेगात होती. तसेच तिचा चालक बस चालवताना मोबाईलवरून संभाषण करीत होता, असे सांगण्यात आले. जादा प्रवासी मिळविण्यासाठी बस चालकांत स्पर्धा लागते. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात, असेही नागरिकांनी सांगितले.
बोरी गावातील वाढत्या वाहतुकीमुळे टॉपकोला, बोरी पंचायत या भागात नेहमी अपघात होता. या भागातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी बोरी पंचायतीने पोलीस खात्याकडे केली आहे. ही माहिती सरपंच वीरेंद्र सावकार यांनी दिली. तसेच साकव बोरी , टॉपकोला येथे दुपारच्या वेळी विद्यालय सुटल्यानंतर मुलांची गर्दी होते. त्यावेळी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्याची गरज आहे, असेही सरपंचांनी सांगितले.

मुंबईवरील हल्ल्याचा कट पाकमध्ये शिजला

पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची कबुली
...आठ आरोपींविरुद्ध तक्रार दाखल
...सहा अतिरेक्यांना अटक
... भारताकडून हवे ३० प्रश्नांचे उत्तर


इस्लामाबाद, दि. १२ - टाळाटाळ केल्यानंतर भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरून विशेषत: अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे अखेर नाईलाजाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र पाकमध्ये रचल्याचे पाकिस्तानने कबुल केले असून याप्रकरणी सहा आरोपींना अटक झाल्याची माहिती दिली आहे.
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात भारताने दिलेल्या पुराव्यांचे उत्तर पाकिस्तानने ३० प्रश्नांच्या यादीसह भारतीय उच्चायुक्त सत्यव्रत पॉल यांना सोपविले आहे.
पाकने दिलेल्या उत्तरात पाकिस्तानने मुंबईवरील हल्लेखोरांच्या बोटांचे ठसे, डीएनए नमुने आणि आणखी पुरावे भारताकडे मागितले आहेत. मुंबईवरील हल्ल्याच्या काही भागाचे षडयंत्र पाकिस्तानमध्ये रचण्यात आले अशी कबुली पाकचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिली. पाकिस्तानी नेतृत्वाने यासंदर्भात अनेक दिवस दिशाभूल केल्यानंतर प्रथमच अशी जाहीर कबुली दिली आहे. मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात गुरुवारी दाखल तक्रारीत ८ लोकांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असून सहा जणांना अटक केल्याचे मलिक म्हणाले.
मुंबईवरील हल्ल्यात सहभागी काही अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचे सदस्य असून प्राथमिक चौकशीच्या आधारे अटकसत्र राबविण्यात आलेल्याचे मलिक यांनी पॉल यांना भेटीदरम्यान सांगितले. भारत सातत्याने प्रयत्न करीत असल्यामुळे पाकिस्तानवर लष्कर-ए-तोयबा व त्यांची मुख्य संघटना जमात-उद-दावावर कठोर कारवाई करण्याकरिता चांगलाच दबाव आहे. मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याचा या संघटनेवर आरोप असून हल्ल्यात सुमारे २०० लोक मारले गेले होते. एफआयआर दाखल केल्यामुळे आता वास्तविक चौकशीला सुरुवात होणार असे मलिक यांनी स्पष्ट केले. या भारतावरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी पैसा पुरविल्याच्या आरोपात हमद अमीन सादिकला अन्य एक पाकिस्तानी नागरिक जावेद इक्बालसह अटक झाली असून त्याने स्पेनमधून व्हीओआयपी (व्हाईस ओव्हर इंटरनेत प्रोटोकॉल) संपर्क स्थापित केला होता अशी माहिती मलिक यांनी एका पत्रपरिषदेत दिली.
मुंबईवरील हल्ल्यादरम्यान जिवंत अटक झालेला एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाबचे बयाण पाकिस्तानी न्यायालयात नोंदविले जाईल. यासाठी २२ वर्षीय कसाबला ताब्यात घेण्याची पाकची इच्छा आहे. अतिरेक्यांनी कराचीतील ज्या दुकानातून बोटींचे इंजिन खरेदी केले होते. त्या दुकानाचा शोध लागला असून दुकानाच्या मालकालाही अटक केली आहे. या दुकान मालकाला अतिरेक्यांनी मोबाईल क्रमांक दिला होता. त्या आधारे पाकिस्तानी पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कराचीतील सहकाऱ्यांचे बॅंक खाते शोधून काढले. व त्यांना अटक केल्याची माहिती मलिक यांनी दिली.
................

निठारी हत्याकांडप्रकरणी पंढेर आणि कोली दोषी

आज शिक्षा सुनावणार

नवी दिल्ली, दि. १२ - अतिशय गाजलेल्या निठारी हत्याकांड प्रकरणी स्थानिक न्यायालयाने अटकेत असणाऱ्या मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली याच्याविरुद्ध दाखल असलेल्या १९ पैकी एका प्रकरणात बलात्कार आणि हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
महिला आणि लहान मुलांच्या अमानवी हत्येच्यासंदर्भात असणाऱ्या या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. विशेष न्यायाधीश रमा जैन यांनी १४ वर्षीय रिंपा हलदार या मुलींच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज दोन्ही आरोपींवर आरोप निश्चित केले. दोघांच्याही शिक्षेची सुनावणी उद्या केली जाणार आहे.
कोली याच्यावर खून आणि बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला असून पंढेर याला या दोन आरोपांसह गुन्हेगारी कारस्थान रचल्याबाबतही दोषी मानण्यात आले आहे. यापूर्वी सीबीआयने रिंपा हलदार हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना क्लीन चिट दिली होती. त्यामुळे आता विशेष न्यायालयाचा निर्णय सीबीआयसाठी त्रासाचा ठरला आहे. सीबीआयने या हत्याकांडाशी संबंधित १९ प्रकरणांपैकी १६ प्रकरणी कोलीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

Thursday 12 February, 2009

पार्सेत बांध फुटला; ७०० शेतकरी संकटात

वायंगणी शेती पाण्याखाली; कॉंक्रीटची भिंत बांधण्याची मागणी
मोरजी, दि. ११ (वार्ताहर)- पार्से खाजन गुंडो शेताजवळील मानशीची दारे आज (बुधवारी) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास कोसळून नदीचे खारे पाणी वायंगणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. या शेतावर सुमारे ७०० शेतकरी अवलंबून असून तेथे ७० खंडी भात तसेच हळसांदे, मिरच्या आदींची लागवड केली जाते.
बंधाऱ्यांची जीर्ण झालेली दारे कोसळल्याने वायंगण शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या घटनेची माहिती मिळताच पेडण्याचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सरपंच श्रीराम साळगावकर, उपसरपंच ज्योती पाळणी, पेडणे उपनिरीक्षक उत्तम राऊत देसाई उपस्थित होते.
येथील शेतकरी पुंडलिक कांबळी, यशवंत गोवेकर, राजाराम गोवेकर, गजानन नाईक व अनंत पेटकर आदी शेतकऱ्यांनी या ठिकाणी कायमस्वरूपी कॉंक्रिटची भिंत बांधण्याची मागणी केली. या शेतात विविध पिकांची लावणी करण्यात आली होती. तथापि, बांध फुटल्याने शेतकऱ्यांच्या परिश्रमांवर खऱ्या अर्थाने पाणी फेरले गेले आहे.
मिरजकर यांनी सांगितले की, याबाबात अजून शेतकरी संघटनेने आपल्याशी संपर्क साधला नसून भरपाईची मागणी किंवा निवेदन दिल्यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण केले जातील.
यासंदर्भात आमदार दयानंद सोपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मानशीची दारे जीर्ण झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. परंतु, पाण्याची पातळी अचानकपणे वाढल्याने दारे कोसळली. आज सकाळीच या बंधाऱ्याची पाहणी करून युद्ध पातळीवर काम करण्याची सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली. बंधाऱ्यावर घालण्यासाठी नवीन दारे आणायला आपण बांदा येथे गेलो असता ही घटना घडली. शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान, दरवर्षी हा बांध कोसळून शापोरा नदीचे पाणी शेतत घुसत असल्याने काही शेतकऱ्यांनी आपली जमीन पडीक ठेवली होती. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

किरणपाणी येथील फेरी रोखून धरली

संतप्त रेती व्यावसायिकांचा दणका
मोरजी, दि. ११ (वार्ताहर)- किरणपाणी आरोंदा येथील होड्या जप्त करून पाच जणांना अटक केल्याप्रकरणी तीव्र पडसाद उमटले असून सावंतवाडी मामलेदार व महसूल विभागाच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी रेती व्यावसायिकांनी किरणपाणी आरोंदा फेरी सेवा दुपारी १२.३० ते २ पर्यंत रोखून धरली.
रेती व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष कुस्तान कोएल्हो, प्रकाश कांबळी, विठ्ठल जल्मी, संजय तारी आदी व्यावसायिकांनी संगीता परब यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. यावेळी संगीत परब यांच्यासह रेती व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, रेती कामगार, ट्रक चालक आदी ३०० लोकांच्या जमावाने किरणपाणी आरोंदा धक्क्याशेजारी सभा घेऊन सावंतवाडी मामलेदार, पोलिस आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. संगीता परब यांच्या नेतृत्वाखाली जमावाने पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली असता सदर प्रकरण सागरी पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने शिवोली किनारी पोलिसांना लेखी निवेदन सादर करण्याची सूचना त्यांनी दिली.
दरम्यान, रेती व्यावसायिक संघटनेने आपल्या वकिलांशी बातचीत करून किनारी पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी किरणपाणी येथे रेती काढणाऱ्या एकूण १६ होड्या सावंतवाडी मामलेदार व महसूल खात्याने जप्त केल्या होत्या. यावेळी अध्यक्ष कुस्तान कोएल्हो व उदय पालयेकर यांच्यासह पाच जणांना अटक करून दंडादाखल १.५८ हजार वसून केले होते.
गेली अनेक वर्षे हे व्यावसायिक तेरेखोल खाडीत रेती व्यवसाय करत असून त्यांच्या संघटनेची कायदेशीर नोंद आहे. या संघटनेकडून राज्य सरकारच्या संबंधित खात्यात शुल्क भरणा केला जातो. यामुळे संबंधित खात्याने रेती व्यावसायिकांची समस्या जाणून त्यांना संरक्षण देताना तेरेखोल खाडीत हद्द निश्चित करणे आवश्यक असल्याचे रेती व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

साई पादुकांचे २१ रोजी आगमन

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - शिर्डी साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याची तयारी जय्यत सुरू असून दि. २१ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता साई पादुकांचे आगमन मालपे - पेडणे येथे होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच अन्य आमदार व साईभक्त रथाचे स्वागत करणार असल्याची माहिती साई पादुका दर्शन सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल खंवटे यांनी दिली. यावेळी शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंधकर, अशोक खांबेकर, प्रदीप पालेकर, श्री. पार्सेकर उपस्थित होते. दि. २२ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून साई पादुकांचे दर्शन घेण्याची संधी भक्तांना लाभणार असल्याचे श्री. खंवटे यांनी सांगितले.
कांपाल येथे भव्य शामियाना उभारण्यात येणार असून याठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. तसेच पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना कोणताही अडचण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याची हमी यावेळी खंवटे यांनी दिली. सुरक्षेच्या विषयी विचारविनिमय करण्यासाठी दि. १६ फेब्रुवारी रोजी पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खास बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सुमारे एक लाख साई भक्त याठिकाणी दर्शनाला येणार असून साई भजन आणि महाभोजनाची व्यवस्था केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
शिर्डीतील चावडीला दि. १० डिसेंबर २००९ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने शिर्डी साई मंदिर संस्थानाने शताब्दी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त आयोजित देशातील पहिले साई भक्तांचे संमेलन आयोजित करण्याचा मान गोव्याला मिळाल्याचे यावेळी डॉ. गोंधकर यांनी सांगितले. देशात तसेच विदेशात साईबाबांचे मोठ्या संख्येने भक्त आहेत. सर्व भक्तांना शिर्डी येथे येऊन पादुकांचे दर्शन घेणे शक्य होत नसल्याने देशातील काही प्रमुख राज्यात साईंच्या पादुकांचा नेण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात ५२ तर देशात ४ हजाराहून जास्त साईबाबांची मंदिरे आहेत. तसेच विदेशातही अनेक मंदिरे आहेत. शिर्डीनंतर १९२२ साली कुडाळ येथे साईबाबांचे पहिले मंदिर उभे राहिले. परंतु, काही ठिकाणी साई मंदिरात बाबांची समाधी बांधली जात असून ते योग्य नसून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे श्री. खांबेकर यांनी सांगितले. तसेच काही व्यक्ती साईंचे वंश असल्याचेही सांगत असून साईंचा कोणीच वंशज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कचरा प्रकरणी सरकारचा पुढाकार

दिल्लीच्या कंपनीस प्रकल्प सादरीकरणासाठी निमंत्रण

मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी) : गोव्यातील कचराप्रश्नी तोडग्यासाठी आपण दिल्लीच्या आय.एल.एफ.एस. नावाच्या आस्थापनास त्यांच्याकडील कृतीयोजनेच्या सादरीकरणासाठी गोव्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे; तसेच या विषयावरील सभागृह समितीची बैठकही बोलावली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे गेली काही वर्षे सरकारच्या व पर्याये जनतेसाठी डोकेदुखी ठरलेल्या या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हजेरी प्रकरणावरून मडगाव पालिकेत उद्भवलेला वाद कामत यांच्या हस्तक्षेपामुळे मिटला. त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनी सोनसोडोचे पुढे काय, अशी विचारणा केली असता त्यांनी ही माहिती दिली .
ते म्हणाले, नुकत्याच दिलेल्या दिल्ली भेटीत आपण स्वतः त्यांच्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली व त्यांनी विकसित केलेल्या प्रक्रिया पध्दतीने आपण प्रभावीत झालो. या कंपनीचे एकूण तीन ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. काही ठिकाणी तर ही कंपनी स्वतः कचरा गोळा करण्याचे कामही करते. अशी पध्दत गोव्यासाठी मदतरूपी ठरू शकते व त्यासाठीच आपण त्यांना सादरीकरणासाठी निमंत्रण दिले आहे.
सदर कंपनी स्वतः च प्रकल्प उभारते व तिला कचऱ्यासंदर्भात टनामागे पैसे द्यायचे अशी पध्दत तेथे सुरू आहे. त्यांच्या अटी व शर्तींबाबत आपण काहीही बोलणी केलेली नाहीत. सादरीकरणावरच पुढील सारे अवलंबून असेल . त्यांच्या गोवा भेटीची तारीख अद्याप ठरलेली नाही अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात कचराप्रश्न जटिल बनत चाललेला असतानाही सभागृह समितीची बैठक हल्ली झालेली नाही व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या समितीची बैठक बोलावण्याची मागणी सातत्याने केली आहे.

"मागण्या मान्य करा, मगच चर्चा करू'

रेजिनाल्ड यांच्या वक्तव्याचा निषेध
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - कदंब महामंडळाला कोणत्याही परिस्थिती सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन द्यावे लागणारच आणि आम्ही ते मिळवणारच परंतु महामंडळाच्या अध्यक्षांनी कामगारांच्या काळजावर घातलेल्या घावाची जखम कधीही भरून येणार नाही. यापूर्वी स्व. बाबय प्रभू, मनोहर पर्रीकर असे नेते या मंडळाचे अध्यक्ष होऊन गेले, त्यांनी कधीच कामगारांविषयी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही अशा तीव्र शब्दात कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी कदंब मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
"वेतन वाढीची मागणी करण्यापूर्वी महामंडळाचा महसूल वाढवा' तसेच "महामंडळाला नफ्यात नेण्यासाठी कामगार काहीही करीत नाही' असे विधान करणाऱ्या रेजिनाल्ड यांच्या विरोधात कामगारांमध्येही तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यावेळी अध्यक्ष रेजिनाल्ड यांच्यावर प्रतिहल्ला चढवताना श्री. फोन्सेका म्हणाले की, त्यांनी आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले असून कामगारांच्या काळजावर घातलेली जखम कधीही पुसता येणार नाही. कदंब महामंडळ हे सर्वांत मोठे महामंडळ आहे. याठिकाणी अडीच हजार कामगार आपली सेवा बजावत आहेत. या कामगारांना प्रोत्साहन देण्याचे सोडून त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप यावेळी श्री. फोन्सेका यांनी केला. कदंब महामंडळ केवळ नफ्यातच चालवायचे असल्यास "कदंब सेवा सामान्य जनतेच्या सेवेस' हे घोष वाक्य मंडळाला बदलावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
आज कामगार आयोगासमोर झालेल्या चर्चेत महामंडळातर्फे कामगारांच्या मागण्यांवर विचार व निर्णय घेण्यासाठी खास समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. या समितीत मंडळाचे अध्यक्ष तसेच अन्य व्यवस्थापकीय संचालक आहेत. महामंडळ नफ्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी चर्चेसाठी यावे, अशी मागणी यावेळी मंडळाने ठेवली आहे. याला जोरदार विरोध करून "आधी आमच्या मागण्या पूर्ण करा, नंतर कोणत्याही चर्चेला आम्ही तयार आहोत' अशी भूमिका कदंब कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. महामंडळाने वेळकाढू धोरण न अवलंबता त्वरित यावर तोडगा काढावा अशी मागणी श्री. फोन्सेका यांनी केली आहे.
दरम्यान, या विषयीचा पुढील निर्णय १७ रोजी कामगार आयुक्तालयात होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.

Wednesday 11 February, 2009

महामंडळाकडे पैसाच नाही, 'कदंब'चे कर्मचारी खवळले, वेतन आयोगाचा मुद्दा अधांतरीच

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): आधी महसूल वाढवा मगच वेतनवाढीचे पाहू, अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतल्यामुळे कदंब महामंडळाचे कर्मचारी खवळले आहेत. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी खास समितीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली. वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी कदंबकडे निधीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कर्मचारी महामंडळाला नफ्यात नेण्यासाठी काहीही करीत नाहीत, आधी त्यांनी महसूल वाढवावा, मगच त्यांच्या वेतनवाढीचा विचार केला जाईल, असे रेजिनाल्ड म्हणाले. आज कदंब महामंडळाच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीनंतर "गोवादूत'शी बोलत होते.
कदंब कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणे कायद्यानेच बंधनकारक आहे. या शिफारशी लागू करण्यासाठी महामंडळ तोट्यात असल्याचे कारण पुढे केले तर ते अजिबात मान्य होणार नाही', अशा शब्दांत गेल्या वेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कामगार संघटनेने बजावले होते. परंतु, आज महामंडळाने अचानकपणे घूमजाव केल्यामुळे हा प्रश्न उत्तरोत्तरचिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार महामंडळाला आर्थिक साहाय्य देणार नसेल तर महामंडळ नफ्यात येणे शक्य नाही, असे कामगारांनी सरकारला सांगितले होते.
उद्या दि. ११ रोजी दुपारी कामगार आयुक्तालयात कामगारांच्या मागण्यावर निर्णय घेण्यासाठी कामगार संघटना व महामंडळ व्यवस्थापन चर्चा करणार आहेत.
महामंडळाची स्थिती सुधारावी यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांनी मंडळाला नफ्यात नेण्यासाठी काय केले आहे, ते सांगावे असे थेट आव्हान रेजिनाल्ड यांनी वेतनाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. या विषयावर कोठेही चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, शंभर नव्या बसेस घेण्यासाठी महामंडळ केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून येत्या काही महिन्यात कदंब मंडळासाठी नव्या बसेस घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी महामंडळाकडे पुरेसा निधी नसला तरी आर्थिक स्थिती सुधारल्यावर यासंदर्भात विचार केली जाईल असे ते शेवटी म्हणाले.

उत्तर गोव्याबाबत राष्ट्रवादी ठाम, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी

पणजी, दि.५ (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर गोव्याची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. एका कार्यक्रमासाठी गोव्यात आलेल्या राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते तारिक अन्वर यांची भेट घेऊन गोव्यातील राष्ट्रवादी नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर गोव्यातील जागा राष्ट्रवादीलाच मिळावी, यासाठी केंद्राकडे जोरदार मागणी केली जाणार असल्याचे अन्वर यांनी कबूल केले असून येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याची हमी अन्वर यांनी दिली असल्याचे खास सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष उत्तरोत्तर आणखी टोकदार होण्याचे संकेत मिळाले आहेत.
या निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी मागणी करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनीही आता कॉंग्रेसला पदच्युत करण्यासाठी "हाय कमांड'ने निवडलेल्या उमेदवारासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे. आज दुपारी येथील एका पंचतारांकित हॉटेलात झालेल्या या चर्चेवेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. डिसोझा, राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाचे नेते जुझे फिलिप डिसोझा, पर्यटनमंत्री मिकी पाशेको, संसदीय सचिव नीळकंठ हळर्णकर, कार्मो पेगादो, युवा अध्यक्ष राजन घाटे, प्रा. सुरेंद्र शिरसाट, एडव्हीन फर्नांडिस व अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इक्बाल शेख हजर होते.
उत्तर गोव्याच्या उमेदवारीसाठी सहा जणांची संभाव्य यादी बनवण्यात आली असून त्यात डॉ. विल्फ्रेड डिसोझा, संगीता परब, फातिमा डिसा, राजन घाटे, सुरेंद्र फुर्तादो व ऍड. अविनाश भोसले यांच्या समावेश आहे. गेल्या दि. १४ जानेवारी रोजी कांदोळी येथील "किंगफिशर व्हिला'मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ही यादी बनवण्यात आली होती. परंतु, ज्यांनी दोन वर्षापूर्वी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे, त्यांनाच उमेदवारी दिली जावी, त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील उमेदवार हा बहुजन समाजाचा उमेदवार असावा, अशी मागणी गोव्यातील नेत्यांनी पक्षाकडे केली आहे. उत्तर गोव्यात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि विद्यमान सरकारात आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणे तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार तथा सरकारमधील वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांची मदत घेण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी गेल्या महिन्यात शरद पवार यांनी या दोन्ही मंत्र्यांबरोबर एका गुप्त बैठकही घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

पणजीत १.१० किलो ब्राऊन शुगर जप्त

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): अमली पदार्थ विरोधी पथकाने आज मळा पणजी येथील तळ्याजवळ छापा टाकून १ किलो १० ग्राम "ब्राऊन शुगर' जप्त केली. सुमारे २० लाख रुपयांच्या या "ब्राऊन शुगर'ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी रुपये होत असल्याची माहिती या पथकाने दिली. या घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावर होणारे अमली पदार्थ तस्करीचे व्यवहार राजधानीपर्यंत पोचल्याचे उघड झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात "ब्राऊन शुगर' जप्त करण्याची नजीकच्या काळातील ही सर्वांत मोठी घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणात बालमर राजस्थान येथील तेज सिंग (२६) या तरुणाला रंगेहाथ अटक केले असून पोलिस कोठडी मिळवण्यासाठी उद्या सकाळी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सदर अमली पदार्थ एका विदेशी व्यक्तीला देण्यासाठी आपण येथे आल्याची कबुली संशयिताने दिली आहे. परंतु, त्याने दिलेल्या माहितीत किती तथ्य आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ४.३० वाजता हा छापा टाकण्यात आला. मिळालेल्या वर्णनानुसार मळ्यातील तळ्याजवळ एक तरुण उभा असल्याचे दिसताच आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे असलेल्या एका बॅगेमध्ये "ब्राऊन शुगर' आढळून येताच त्याला अटक करण्यात आली. सदर तरुण गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाला होता. पिळर्ण येथे एका भाड्याच्या खोलीत तो आपल्या मित्रांबरोबर राहत होता, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. "ब्राऊन शुगर' कोणत्या दर्जाची आहे, हे पाहण्यासाठी त्याचे काही नमुने हैद्राबाद येथील फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पुनाजी गावस, पोलिस शिपाई श्याम परब, हरी नाईक, दिना मांद्रेकर, साईश पोकळे, महादेव नाईक, रामदास काणकोणकर व नागेश पार्सेकर यांनी या कारवाईत भाग घेतला. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक गावस करीत आहे.

देशभर महत्त्वाची औषधे माफक दरात पुरविणार, गोव्यातही केंद्र उभारणे शक्य: पास्वान

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): 'जन औषधी' कार्यक्रमांतर्गत काही महत्त्वाची औषधे अल्प दरात दिली जाणार असून त्यासाठी देशाच्या प्रत्येक तालुक्यात एक केंद्र उभारले जाणार आहे. तसेच खनिजाच्या निर्यातीवर अंकुश न ठेवल्यास एक दिवस आम्हालाच खनिज आयात करावी लागणार असल्याने ६२ ग्रेडच्या खनिजावर निर्यातकर वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे खताचे उत्पादन वाढवण्यासाठी विदेशात खाणी सुरू करण्याचा मंत्रालयाचा विचार असल्याची माहिती आज केंद्रीय रसायन, खत व पोलादमंत्री रामविलास पास्वान यांनी आज येथे दिली.
यावेळी पास्वान यांच्यासोबत रसायने व खत मंत्रालयाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. रसायन व खत मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीच्या चौथ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पास्वान गोव्यात दाखल झाले आहेत. या बैठकीत हिंदीचा वापर आणि हिंदीचा प्रसार यावर चर्चा करण्यात आली.
गोव्यात "जन औषधी' केंद्र सुरू करण्यासाठी गोव्याच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधण्यात आला आहे. या केंद्रासाठी जागा उपलब्ध झाल्यास आणि एखादी सामाजिक संस्था पुढे आल्यास त्वरित हे केंद्र सुरू केले जाणार असल्याचे पासवान म्हणाले.
सध्या पंजाब व हरयाणा या राज्यात ही केंद्र सुरू झाली असून याठिकाणी २० रुपयात मिळणारी औषधे २.५० रुपये तर, ११६ रु. किमतीची औषधे ३१.५० रुपयांपर्यंत मिळणार आहेत. दिवसाचे चोवीस तास हे केंद्र सुरू राहणार असून समाजातील कोणत्याही व्यक्तीला या सुविधेचा लाभ घेता येईल.
स्वस्तात औषधे उपलब्ध करण्यासाठी ७६ कंपन्यांनी अर्ज दाखल केले असून ३५० प्रकारची औषधे या केंद्रात रास्त दरात उपलब्ध केली जाणार असल्याचे मंत्री म्हणाले.
देशात पोलादाच्या उत्पादनात ४५ लाख टनांवरून ५६ लाख टन वाढ झाली आहे. २०२० सालापर्यंत १२४ लाख टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. तसेच ५९ हजार कोटी रुपये खर्च करून नवीन पोलाद प्रकल्प देशात उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात गॅस तसेच खताच्या उत्पादनाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जॉर्डन, ऑस्ट्रेलिया, सीरिया, मोरोक्को आदी देशात फॉस्फेटच्या खाणी सुरू करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, हिंदी सर्वसमावेशक करण्यासाठी सरकारी खात्यातील फाईलवर शेरा मारताना हिंदीचा वापर केला जावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कोणतीही खाजगी सौंदर्य प्रसाधन कंपनी आपल्या उत्पादनाची जाहिरात तसेच त्यावरील मुद्रित मजकूर हिंदीतून देईल तर अशा कंपन्यांना १ लाख व ५५ हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती पास्वान यांनी दिली.

पं. भीमसेन जोशी यांना 'भारत रत्न' प्रदान

पुणे, दि. १० : आपल्या पहाडी आवाजाने गेली साठ वर्षे प्रभावित करणारे सुप्रसिद्ध गायक पंडित भीमसेन जोशी यांना आज दुपारी बारा वाजता त्यांच्या कलाश्री या राहत्या घरी "भारत रत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय सहसचिव जे. ई. अहमद यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, विभागीय आयुक्त दिलीप बंड व जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी हे उपस्थित होते.
प. भीमसेन जोशी यांची प्रकृती वृद्धापकाळामुळे तेवढीशी बरी नाही, त्यामुळे हा सन्मान अतिशय साध्या वातावरणात प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते व्हावा, अशी मूळची योजना होती. पंडितजींची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुण्याहून दिल्लीला विशेष विमानाने नेण्याचीही तयारी करण्यात आली होती. पण त्यांची प्रकृती अशक्त असल्याने तोही निर्णय बदलण्यात आला व पुण्यातही मोठा कार्यक्रम करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्याखेरीज पंडितजींचे कुटुंबीय व शिष्यवर्ग उपस्थित होते. तेथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश दिला नव्हता.
पं. भीमसेन जोशी यांनी राष्ट्रपती व मंत्रिमंडळाचे आभार मानले. पंडितजींच्या प्रकृतीतील अशक्तपणा कार्यक्रमात जाणवत होता, तरीही ते प्रसन्न दिसत होते. नंतर पत्रकारांशी बोलताना राज्यसरकारचे मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यशासनाने पंडितजींच्या नावाने दोन मोठ्या शिष्यवृत्त्या जाहीर करण्याचे ठरविले आहे.
भीमसेन जोशी यांच्या पुण्यातील नवीपेठ भागातील "कला श्री' या निवासस्थानी आज सकाळपासून मोठ्या समारंभाचे स्वरूप आले होते. सर्वत्र रांगोळीच्या पायघड्या व रोशणाई करण्यात आली होती.

Tuesday 10 February, 2009

सरकारी अनास्थेमुळे गोवा दूध उत्पादनात पिछाडीवर

गोवा डेअरीच्या स्टॉलला दूध उत्पादकाचे प्रथम बक्षीस
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - सरकारी योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यामध्ये दुधाचे उत्पादन सर्वांत कमी प्रमाणात होत असल्याचा सूर आज येथे पार पडलेल्या चर्चासत्रात व्यक्त झाला. यावेळी उपस्थित गोव्यातील शेतकऱ्यांनी प्रत्येक लिटरमागे सध्या सरकार देत असलेल्या अनुदानात वाढ करून ३ रुपये प्रतिलीटर अनुदान देण्याची मागणी केली.
कला अकादमीत भारतीय दुग्ध संघटनेच्या (पश्चिम विभाग) ३७ व्या दुग्ध उद्योग परिषदेचा आणि प्रदर्शनाचा आज समारोप झाल. या समारोपाच्या अंतिम सत्रात "गोव्यातील दुग्ध व्यवसायाचा विकास' या विषयावर चर्चासत्र पार पडले. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात प्रदर्शनामध्ये एकूण ७५ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये उत्तम दुग्ध उत्पादक म्हणून गोवा डेअरीला प्रथम पारितोषिक देण्यात आले. दूध उत्पादनांची उच्च गुणवत्ता, दुग्ध व्यवसायासाठी आधुनिक यंत्रसामग्री, अन्न सुरक्षा, जागतिक मंदी आदी विषयांवर तज्ज्ञांनी चर्चा केली.
अंतिम सत्रात झालेल्या गोव्यातील दुग्ध उत्पादनाच्या विषयावर गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी, पशुसंवर्धन सचिव डॉ. एम. मुदास्सीर व संचालक डॉ. एच. फालेरो यांनी आपले विचार मांडले. या सत्रात गोव्यातील सुमारे ३०० शेतकरी सहभागी झाले होते.
श्री. सहकारी यांनी गोव्यातील दूध उत्पादनाचा वर्षनिहाय अहवाल सादर करून उत्पादनात वाढ होत असल्याची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांत मात्र दुधाचे उत्पन्न कमी होते. त्यावर गोवा डेअरीने अभ्यास करून यावर्षी पुन्हा उत्पन्नात वाढ केल्याचे त्यांनी सांगितले.
"कामधेनू'सारख्या विविध योजना सरकार राबवत आहे. शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासाठी अनुदान देत आहे. तरीही गोमंतकातील शेतकरी पशुसंवर्धनापासून दूर चालला आहे. गोव्यात सध्या केवळ १६.१९ टक्के शेतकरी दूध उत्पादन करतात. गोव्यात इतर राज्यांच्या तुलनेत दळणवळणाची उत्तम सोय आहे. रस्ते, वीज, इतर यंत्रणा चांगली आहे. तरी दुधाचे उत्पादन कमी होते, असा दावा डॉ. मुदास्सीर यांनी केला.
गोव्यातील दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी भारतीय दुग्ध संघटना व गोव्यातील दूध व्यावसायिक एकत्रित चर्चा करणार असल्याचे या चर्चासत्रातून सांगण्यात आले. तसेच चालू वर्षापासून भारतीय दुग्ध संघटना पश्चिम विभागातर्फे गोव्यातील पाच उत्कृष्ट दुग्ध व्यावसायिकांसाठी ११ हजार रुपयांची पारितोषिके देण्याचे ठरवण्यात आले. ही पारितोषिके दुग्ध दिनादिवशी देण्यात येणार आहेत.
सरकार राबवत असलेल्या योजन सामान्य शेतकऱ्याला न परवडणाऱ्या आहेत. वास्तविक दुभत्या गायीची किंमत २५ ते ३० हजार रुपये असते. सरकार शेतकऱ्यांना केवळ १६ हजार रुपये कर्ज देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला कार्यालयात अनेक प्रकारचे दाखले देण्यासाठी हेलपाटे घालावे लागतात. या कटकटीमुळे शेतकरी पशुपालनाकडे वळत नाहीत. तसेच पशुसंवर्धन खात्याने प्रत्यक्ष गावपातळीवर येऊन कधीच योजना राबवण्याचा मनापासून प्रयत्न न केल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. खात्याकडे पशुंच्या आजारांवरील उपचारासाठी वेळेवर औषधेही उपलब्ध नसतात. कार्यालयात गेल्यास औषधे उपलब्ध नसल्याचे सांगून परत पाठवले जाते, असे यावेळी सांगण्यात आले. यासंदर्भात सूत्रनिवेदकांनी या स्थानिक पातळीवरच्या गोष्टी असल्याचे सांगून विषय थांबविला.
यासंदर्भात गोवा डेअरीचे संचालक उल्हास सिनारी यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेली कामधेनू योजना चांगली होती. विद्यमान सरकारने त्यात किंचित बदल करून ती तशीच पुढे सुरू ठेवली आहे. तथापि, हा बदल सोयीस्कर आहे का, हे कोणीही पाहिले नाही. सध्या महागाई वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला परवडेल अशा स्वरूपात योजना राबवायला हव्यात. गायीसाठी देण्यात येणारा कर्ज वाढवून द्यायला हवे. तसेच कागदपत्रांचा ससेमिरा कमी करायला हवा. तरच राज्यातील दूध उत्पादनात गोवा पुढे जाईल. सरकारचे लक्ष केवळ खाण व पर्यटन या दोनच उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात आहे. वास्तवात हे दोन्ही व्यवसाय पर्यावरण व संस्कृतीला घातक आहेत. यापेक्षा कृषी, पशुपालन व मत्योद्योगाकडे अधिक लक्ष दिल्यास पर्यावरण व संस्कृती या दोन्हींचे संवर्धन होऊन गोमंतकात समृद्धी नांदेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आणि शेतकरी उखडले...
गोव्यात दूध उत्पादनासाठी पुरेशा सुविधा असल्याचे विधान डॉ. मुदास्सीर यांनी केले खरे; तथापि, प्रश्नोत्तराच्या वेळी गोव्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या या विधानाचा कडक समाचार घेतला. डॉ. मुदास्सीर यांचे मुद्दे खोडून काढले.गोव्यातील दूध व्यवसाय कमी होण्यामागे सरकारची व दूध व्यावसायिकांची धोरणेच जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी ठासून सांगितले. शेतकरी आपले म्हणणे पोटतिडकीने मांडत होते आणि त्यांचा रुद्रावतार पाहून सूत्रनिवेदकाने अखेर हा विषय थांबवला.

डोंगरीतील संभाव्य कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - बायंगिणी जुने-गोवा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विविध कारणांस्तव प्रखर विरोध झाल्यानंतर, सरकारने पर्यायी जागा म्हणून मंडूर-डोंगरीची निवड केल्यानंतर आजोशी, मंडूर, डोंगरी, नेवरा भागातील गावकऱ्यांनी काल मंडूर-तिठो येथे तातडीने सार्वजनिक सभा घेऊन या प्रकल्पास जोरदार विरोध करण्याचे ठरवले.
या बैठकीस स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आजोशी-मंडूरचे सरपंच राजेश मयेकर होते. व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये उपसरपंच पावलिन पो, पंच श्री. मडकईकर, समीर नाईक, ऍना रॉड्रिगीस, सामाजिक कार्यकर्ते विठू मार्वेकर, मंडूर चर्चचे फादर दोरादो यांच्या समावेश होता.
या सभेत तुळशीदास गावडे, विवेक मयेकर, श्याम गावडे, विठू नार्वेकर, पावलिन पो, सरपंच राजेश मयेकर, संदीप वेर्णेकर, श्री. रॉड्रिगीस, पीटर वाझ व फ्रान्सिस सिल्वेरा यांची सदर कचरा प्रकल्पाला विरोध करणारी भाषणे झाली.
या वक्त्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प, सरकारी धोरण, प्रकल्पासाठी डोंगरी गावची पर्यायी निवड करण्यामागची सरकारची मानसिकता, प्रकल्पाचे दूरगामी दुष्परिणाम व प्रकल्पाविरोधातील डोंगरी गावची भूमिका यावर भर दिला. कचरा प्रकल्पाविरोधातील लढा हा आपल्या डोंगरी गावावर आलेले संकट असून ते दूर करण्यासाठी जीवाची बाजी लावून लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार सिल्वेरा म्हणाले, आपण सदोदित सांत आंद्रे मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी असून लोकांना हवे तेच होईल. त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादली जाणार नाही. सांत आंद्रे मतदारसंघातील कुडका येथे हा प्रकल्प लादण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला होता. त्याची बाधा कुडकावासीयांना झाल्यानंतर तो प्रकल्प आपण तेथून हटवण्याकामी यशस्वी झालो. अर्थात, यासाठी कुडकावासीयांनी आपल्याला सहकार्य दिले.
तशाच सहकार्याची अपेक्षा आपण यावेळी डोंगरीवासीयांकडून करतो, असेही ते म्हणाले. त्यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात योग्य ती चर्चा करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ घेऊन जाण्याचे आश्वासनही उपस्थितांना दिले.
उपस्थित गावकऱ्यांनी आपल्या गावावर येऊ घातलेल्या संकटाचा सामना करताना या कचरा प्रकल्पविरोधी लढ्यात आमदार सिल्वेरा यांना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

डोंगरीतील संभाव्य कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - बायंगिणी जुने-गोवा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विविध कारणांस्तव प्रखर विरोध झाल्यानंतर, सरकारने पर्यायी जागा म्हणून मंडूर-डोंगरीची निवड केल्यानंतर आजोशी, मंडूर, डोंगरी, नेवरा भागातील गावकऱ्यांनी काल मंडूर-तिठो येथे तातडीने सार्वजनिक सभा घेऊन या प्रकल्पास जोरदार विरोध करण्याचे ठरवले.
या बैठकीस स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आजोशी-मंडूरचे सरपंच राजेश मयेकर होते. व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये उपसरपंच पावलिन पो, पंच श्री. मडकईकर, समीर नाईक, ऍना रॉड्रिगीस, सामाजिक कार्यकर्ते विठू मार्वेकर, मंडूर चर्चचे फादर दोरादो यांच्या समावेश होता.
या सभेत तुळशीदास गावडे, विवेक मयेकर, श्याम गावडे, विठू नार्वेकर, पावलिन पो, सरपंच राजेश मयेकर, संदीप वेर्णेकर, श्री. रॉड्रिगीस, पीटर वाझ व फ्रान्सिस सिल्वेरा यांची सदर कचरा प्रकल्पाला विरोध करणारी भाषणे झाली.
या वक्त्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प, सरकारी धोरण, प्रकल्पासाठी डोंगरी गावची पर्यायी निवड करण्यामागची सरकारची मानसिकता, प्रकल्पाचे दूरगामी दुष्परिणाम व प्रकल्पाविरोधातील डोंगरी गावची भूमिका यावर भर दिला. कचरा प्रकल्पाविरोधातील लढा हा आपल्या डोंगरी गावावर आलेले संकट असून ते दूर करण्यासाठी जीवाची बाजी लावून लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार सिल्वेरा म्हणाले, आपण सदोदित सांत आंद्रे मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी असून लोकांना हवे तेच होईल. त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादली जाणार नाही. सांत आंद्रे मतदारसंघातील कुडका येथे हा प्रकल्प लादण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला होता. त्याची बाधा कुडकावासीयांना झाल्यानंतर तो प्रकल्प आपण तेथून हटवण्याकामी यशस्वी झालो. अर्थात, यासाठी कुडकावासीयांनी आपल्याला सहकार्य दिले.
तशाच सहकार्याची अपेक्षा आपण यावेळी डोंगरीवासीयांकडून करतो, असेही ते म्हणाले. त्यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात योग्य ती चर्चा करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ घेऊन जाण्याचे आश्वासनही उपस्थितांना दिले.
उपस्थित गावकऱ्यांनी आपल्या गावावर येऊ घातलेल्या संकटाचा सामना करताना या कचरा प्रकल्पविरोधी लढ्यात आमदार सिल्वेरा यांना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.

सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ नकोच

संघटनेची मागणी

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)- सरकारी खात्यातील निवृत्त होण्याच्या मार्गावर असलेल्या काही कर्मचाऱ्यांना मुदतवाढ किंवा कंत्राटी पद्धतीवर पुन्हा सेवेत ठेवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले असून त्याला राज्य कर्मचारी संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. या अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिल्यास राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा आज संघटनेचे अध्यक्ष एम. एल. शेटकर यांनी दिला. यासंबंधीचे एक निवेदनही संघटनेतर्फे आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
गेल्या काही महिन्यात अनेक अधिकाऱ्यांच्या मुदतवाढीसाठी केले अर्ज सरकार दरबारी दाखल झाले आहेत. ६० वर्षे पूर्ण होऊन निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या काही सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ द्यावी अथवा कंत्राटी पद्धतीने सेवेत ठेवावे, अशी मागणी खात्यातूनच होत असल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे येत आहेत. वास्तवात ५८ वर्षांचा सेवेचा कार्यकाल वाढवून ६० वर्षे करण्यात आला होता. तरीदेखील सेवेत कायम ठेवण्याच्या मागण्या होतात हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याचे श्री. शेटकर यांनी म्हटले आहे.
या विषयावर तोडगा काढण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. तत्कालीन वीजमंत्री दिगंबर कामत, माजी पंचायतमंत्री सुभाष शिरोडकर, राज्याचे सचिव जे. पी. सिंग, वित्त सचिव रमेश नेगी इत्यादी अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश होता. त्यावेळी झालेल्या बैठकीनुसार ६० वर्षानंतर निवृत्ती निश्चित करण्याचा तोडगा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर खात्याकडून आता होणाऱ्या वरील मागणीला सरकारने मान्यता देऊ नये, असे संघटनेने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. तरीही खात्याअंतर्गतच काही ठरावीक अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचे सरकारतर्फे प्रयत्न होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सेवेत मुदतवाढीच्या प्रकारामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे कॉंग्रेस सरकारनेच नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा मुदतवाढ न देण्याचा निर्णय धाब्यावर बसवून या अधिकाऱ्यांना सेवेत कायम ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विमानातून दाखल झालेले "हाय प्रोफाईल' चोर जेरबंद

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - विमानातून गोव्यात आलेल्या दोघा अट्टल चोरांना आज मिरामार येथील एका बंगल्यात चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. रशीद अब्दुल रौफ (३२) व खशिफ अली (३२) अशी त्याची नावे असून दोघेही रामपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत. थेट विमानातून गोव्यात येऊन मोठ मोठ्या बंगल्यात हात साफ करून पोबारा करण्याचे तंत्र या "हाय प्रोफाईल' चोरांनी अवलंबले आहे. एरव्ही खाजगी वाहन किंवा रेल्वेतून येणाऱ्या चोरांनी आपले प्रवासाचे साधन बदलल्याने पोलिसही अचंबित झाले आहेत.
याविषयी सविस्तर माहितीनुसार मिरामार येथील कीर्ती लवंदे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी घरी आल्या असता दोन चोर बंगल्यात घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी एकाला जेरबंद केले तर, त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी दुसऱ्याला पकडले. उपस्थित लोकांनी या दोघांना यथेच्छ चोप दिल्यावर पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिस कोठडी मिळवण्यासाठी उद्या सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अटक झालेले चोरटे काल सकाळी एअर इंडियाच्या विमानातून थेट दिल्लीहून गोव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पणजीतील एका अलिशान हॉटेलमध्ये आपले बस्तान मांडले आणि आज सकाळी राजधानीत चोरी करण्यासाठी बाहेर पडले. कीर्ती लवंदे यांच्या बंगल्यात घुसण्यापूर्वी त्यांनी "कामत क्लासिक'मधील एका सदनिकेत चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. परंतु, अद्याप यासंदर्भात पोलिस तक्रार करण्यासाठी कोणीही आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दुपारी १ च्या दरम्यान दोघांनी आपला मोर्चा लवंदे यांच्या बंद असलेल्या बंगल्याकडे वळवला. दुपारी बंगल्यात कोणीही नसल्याचा फायदा उठवून त्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर काही मिनिटांतच सौ. लवंदे बंगल्यावर पोचल्या. यावेळी त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दार आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या फटीतून आतमध्ये डोकावले असता त्यांना दोघांची सावली दिसली. यावेळी तिने आरडाओरडा केला असताना दोघेही पळण्यासाठी बाहेर आले असता त्यांना पकडून जमावाने बराच चोप दिला.
पोलिसांनी त्यांच्याकडून सौ. लवंदे यांच्या बंगल्यातून चोरलेले तीन नवे कोरे शर्ट, एक टी-शर्ट तसेच सात हजार रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच कुलूप तोडण्यासाठी वापरण्यात आलेले एक हत्यारही ताब्यात घेण्यात आले आहे. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक नारायण चिमूलकर करीत आहे.

Monday 9 February, 2009

खुल्या अधिवेशनात मान्यवरांचा सत्कार

मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

माशेल, दि. ८ (प्रतिनिधी) - गेले दोन दिवस माशेल येथील देवकीकृष्ण मैदानावर उभारलेल्या भव्य बा. द. सातोस्कर नगरांत उत्कृष्ट आयोजनासाठी कौतुक झालेल्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या २७ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचा सुरेख समारोप करण्यात आला.
समारोपाच्या खुल्या अधिवेशनात ज्येष्ठ तबलापटू तुळशीदास नावेलकर (माशेल), प्रसिद्ध चित्रकार दयानंद भगत (खांडोळा), वाचक चळवळीचे अर्धव्यू श्रीधर खानोलकर (फोंडा), साहित्य संगम संस्थेचे गजानन मांद्रेकर (मांद्रे) व नीलेश शिरोडकर (करमळी) यांचा संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष ऍड. विनायक नार्वेकर यांनी संमेलनाच्या दोन्ही दिवसांचा आढावा घेतला यावेळी चार ठराव टाळ्यांच्या कडकडाटात संमत करण्यात आले. त्यात मराठी गोव्याची राजभाषा करावी, गोमंतक साहित्य सेवक मंडळाने मार्गदर्शक संस्था म्हणून भूमिका बजावून येत्या दोन वर्षात आणखी वीस नवीन मराठी संस्थांची नोंदणी करावी आणि शिक्षकांअभावी बंद पडत चाललेल्या शाळा सुरू राहाव्यात यासाठी तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असे ठराव संमत करण्यात आले.
तत्पूर्वी सकाळी झालेल्या "नवे सुर अन् नवे तराळे' या युवा पिढीसाठी आयोजित कार्यक्रमांत तृप्ती केरकर (धेंपे महाविद्यालय) शुभदा चिंचवडेकर (खांडोळा महाविद्यालय), वैष्णवी हेगडे (धेंपे) केदार तोटेकर (पी. ई. एस. महाविद्यालय), कौस्तुभ नाईक (चौगुले) चिन्मय घैसास(पी. ई. एस्) यांनी भाग घेतला. यावेळी झालेल्या वार्तालापात, युवा पिढीसाठी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ""वुई आर नॉट युझलेस, बट वुई आर युझ्ड लेस' असा सूर व्यक्त केला. संवादक संगीता अभ्यंकर व रवींद्र पवार यांनी, आजची तरुण पिढी देशाचे भविष्य असून त्यांच्यावर जबाबदारी सोपविल्यास,ती पूर्ण कसोटीला उतरेल, असे सांगितले.
या वार्तालापाचा शेवट करताना, प्रा. यशवंत पाठक यांनी व्यासपीठावर उपस्थित सहाही युवकांनी आपण श्रीमंत व्हावे, या जागतिक तत्त्वज्ञ बनावे असे व्यक्त केले नसले तरी त्यांना चांगले काम करून पुढे जायचे आहे असे दिसते, त्यासाठी त्यांनी भरपूर वाचन करावे, ज्ञान मिळवावे आणि जेव्हा मोठ्या माणसाच्या सावल्या खुज्या होतात व हिमालय जेव्हा टेकडीसारखा वाटतो, तेव्हा संस्कृतीचा ऱ्हास होतो हे लक्षात ठेवावे असे आवाहन केले.
त्यानंतर विनोदी शैलीत "निसर्गसाधक' पक्षी शास्त्रज्ञ मारुती चितमपल्ली यांची प्रा. विनय बापट व प्रा. सुमेधा कामत देसाई यांनी प्रकट मुलाखत घेतली.
"वाङ्मयीन पुरस्कार समज/गैरसमज' हा परिसंवाद अपेक्षेप्रमाणे रंगला नाही तरी सहभागी डॉ. सचिन कांदोळकर, डॉ. विद्या प्रभू देसाई, ऍड. दौलत मुतकेकर व प्रा. ललिता जोशी यांनी तसेच अध्यक्ष प्रा. रवींद्र घवी यांनी पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या आवृत्तीवर आवृत्ती निघायला हव्यात पण ते आज गोमंतकात होत नाही. लेखक दुसऱ्याच्या डोळ्यांनी लेखन - पुस्तक वाचू शकत नाही कारण आजच्या समीक्षकांना पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही, ते आपल्या लेखनिकांवर वाचनाची जबाबदारी सोपवून, अभिप्राय मागवतात हे बरोबर नाही. काही लेखक गोपनीयतेने माहिती मागून घेतात. यात कधीकधी व्यक्तिनिष्ठ, व्यक्तिगत संबंध तसेच प्रादेशिकता आडवी येते. गोमंतकीय साहित्य गोमंतकाच्या सीमा ओलांडून बाहेर जात नसल्यामुळे गोमंतकीय लेखकांना पुरस्कारांची माहितीही नसते,असा सूर व्यक्त केला.
संमेलनाच्या समारोपाच्या समारंभात, साहित्य दिंडीत सहभागी झालेल्या, शाळेतील मुलांच्या आयोजित वेशभूषा स्पर्धेत अखिलेश संदीप नावेलकर (माशेल) प्रथम, देवश देवेंद्र जल्मी (तारीवाडा) द्वितीय, प्रदोन प्रदीप नाईक (भोम) यांना तृतीय तर कुमार देवधर (माशेल) व वेदांत संजय प्रभू गांवकर (तारीवाडा) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
संमेलनाच्या दोन दिवसांत झालेल्या कार्यक्रमांबद्दल, वैष्णवी हेगडे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर, स्वागताध्यक्ष डॉ. विठ्ठल ठाकूर व गोमंतक साहित्य सेवक मंडळाध्यक्ष सुरेश स. नाईक यांनी यावेळी समारोपाची भाषणे केली. प्रमुख कार्यवाह प्रेमानंद नाईक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. पसायदानाने संमेलनाची सांगता करण्यात आली,
यानंतर भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे या संस्थेने, संगीत "कट्यार काळजात घुसली' या नाटकाचा सुंदर प्रयोग सादर केला.

घराणेशाही संपविण्यासाठी हीच योग्य वेळ - मोदी

नागपूर, दि. ८ - अमेरिकेत ज्याप्रमाणे बुश आणि क्लिंटन परिवाराकडे अनेक वर्षे सत्ता असल्यामुळे जनता घुसमट अनुभवत होती. त्याप्रमाणे भारतातही एकाच घराण्याच्या वर्चस्वाने जनता गुदमरली आहे आणि जनतेला या घुस्मटीतून बाहेर पडायचे आहे. जनतेला सक्षम पर्याय म्हणून अडवानींचे नेतृत्व पुढे आले आहे. त्यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटीबद्ध व्हावे असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
देशात ६१ वर्षांपैंकी ५५ वर्ष कॉंगे्रसी गोत्राचेच सरकार होते. त्यातही ३७ वर्षे एकाच परिवाराकडे सत्ता होती. तर ५ वर्ष सत्तेत न राहताही हा परिवार सरकार चालवत होता. फक्त ७ वर्ष कॉंग्रेसी गोत्राचे नसणारे अटलजी सरकार चालवित होते. ही सात वर्षे बघा आणि एरवीची ५५ वर्ष बघा आणि तुम्ही निर्णय घ्या असे आवाहन मोदी यांनी केले. एका परिवाराच्या हितासाठी कॉंगे्रसने देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
आज या देशाला आतंकवादी कारवायांनी जर्जर केलेलेे आहे. परिणामी सामान्य माणसाचे जीवन असुरक्षित झालेले आहे. हे थांबवायचे असेल तर आतंकवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. ही ताकद भाजपच्या नेतृत्त्वातील रा.लो.आ. सरकारच दाखवू शकते, असा विश्वास मोदी यांनी केला.
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत आज दुसऱ्या दिवशी मांडलेल्या राजकीय ठरावावर बोलतांना केंद्र सरकार व्होट बॅंकेचे राजकारण करीत असल्याचा आरोप मोदींनी केला. मुंबईतील आतंकवादी हल्ल्यासंदर्भात या देशातला अशिक्षित माणूसही सांगेल की हा प्रकार स्थानिक मदतीशिवाय शक्य नव्हता. या स्थानिक मदतगारांपर्यंत सरकार का पोहोचू शकत नाही असा सवाल मोदी यांनी केला.
मुंबईतील हल्ल्यानंतर जगाला देशाच्या पंतप्रधानांच्या दुबळेपणाचे दर्शन घडले असा आरोप करीत पंतप्रधानांनी देशाला निराश केल्याची टीका मोदींनी केली. जगात भारतीय सन्मानाने जगू शकणार असेल तर पंतप्रधानांमध्ये दम आहे असे ठामपणे म्हणता येईल. अशी अपेक्षा व्यक्त करतांना सध्या देशात अदृश्य पंतप्रधान आहे अशी मल्लीनाथी त्यांनी केली.
भाजपला यशस्वी करा ः अडवाणी
केवळ राजकीय चातुर्याने देश चालविता येत नाही, त्यासाठी प्रामाणिकपणे काम करून प्रश्न विचार बाजूला ठेवून राष्ट्राच्या विकासाला सर्वोच्च स्थान देऊन काम केले तरच देश मोठा होतो. आम्हाला देश मोठा करायचा आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य घेऊन पुढे जायचे आहे. आणि आम्हाला सत्तेत येण्यासाठी जिंकायचे नाही तर आम्हाला भारत जिंकवायचा आहे. त्याकरीता आपण सारेच कटिबद्धच होऊ या, असे भावपूर्ण आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या अधिवेशनाचा समारोप आज अडवाणीच्या भाषणाने झाला. आपल्या सुमारे ४५ मिनिटाच्या भाषणात त्यांनी जुन्या जनसंघाच्या स्थापनेपासून तर आजच्या सत्तेच्या परिघात फिरणाऱ्या भाजपच्या वाटचालीचा आढावा घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत विदेशी प्रेरणास्त्रोत नसलेला भारतीय पक्ष काढायचा या हेतूने स्व. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केल्याची माहिती त्यांनी दिली. संघाची विचारधारा पूर्णपणे राष्ट्रवादावर आधारित आहे. त्याच मार्गावर मार्गक्रमण करीत आम्ही सत्ता हे केवळ साध्य न ठरवता देशहीत सर्वोतोपरी मानलेले आहे. आमची पार्टी ही नेशन फर्स्ट पार्टी आहे, असा दावा अडवाणींनी केला. भाजपला जातीयवादी ठरवणाऱ्यांचा समाचार घेत या देशात जेनुईन सेक्युलॅरिझम आणि स्यिडो सेक्युलॅरिझम अशा दोन संकल्पना अस्तित्वात असून कॉंग्रेस हा स्यिडो सेक्युलर आहे तर आमचे मात्र जेनुईन सेक्युलॅरिझम आहे, असे आग्रही प्रतिपादन यांनी यावेळी केले.

कर्नाटकात कोकणी लागू करण्याचे वचन

अ. भा. कोकणी संमेलनाचा थाटात समारोप
संतोष गावकर
कुंदापूर, दि.८ - कर्नाटकात कोकणी विषय लागू करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. व्ही. एम. आचार्य यांनी आज संध्याकाळी १९ व्या अखिल भारतीय कोकणी संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कुंदापूर येथे बोलताना दिले. यावेळी व्यासपीठावर राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक, गोवा कोकणी अकादमीचे एन. शिवदास, संमेलनाध्यक्ष रमेश वेळुस्कर, गोकुळदास प्रभू, सदानंद काणेकर, उपस्थित होते. ज्ञानपीठ विजेते रवींद्र केळेकर यांच्यावर कर्नाटक राज्यात शैक्षणिक अभ्यासक्रमात एक पाठ असावा ही साहित्य संमेलनाने केलेली मागणी पूर्ण करण्याचे आश्वासनही डॉ. आचार्य यांनी दिले.
१९ व्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी कुंदापूर येथे उद्योजक दयानंद पै यांच्या हस्ते झाले. त्यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार शांताराम नाईक, विधान परिषदेचे सदस्य श्रीनिवास पुजारी, कार्याध्यक्ष गोकुळदास प्रभू, संमेलनाचे अध्यक्ष रमेश वेळुस्कर, सदानंद काणेकर, फा. आल्बन डिसोझा उपस्थित होते. त्यापूर्वी संमेलनस्थळ ते व्यंकटरमण देवालय व परत अशी शोभायात्रा संमेलन सुरू होण्यापूर्वी काढण्यात आली.
यानंतर वेळुस्कर, खासदार नाईख, फा. डिसोझा, पै, पुजारी यांची भाषणे झाली. उद्घाटन कार्यक्रमात कोकणी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम केलेल्या संस्थांचा व व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यात अशोक कामत,. कर्नाटकातील उद्योजक दयानंद पै, फादर फ्रान्सिस्को फर्नांडिस, डॉ. शांताराम यांचा समावेश होता. गोव्यातून गेलेले लेखक तसेच कोकणीप्रेमी संमेलन संपल्यावर रेल्वे व खाजगी वाहनाने रात्री गोव्यात परतले.

बांडोळी "शिकार'प्रकरणी खुनाच्या गुन्ह्याची नोंद

एकाला अटक, दुसरा फरारी
सावर्डे व कुडचडे, दि. ८ (प्रतिनिधी) : डोंगराळ भागात काल रात्री सुमारे ८.३० वाजता शिकारीला गेले असता सावज समजून गोळी लागल्याने तेम बांडोळी येथील मोहन गोपी गावकर (२२) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर नंदा नाईक हा फरारी असून विश्वनाथ आत्मा गावकर याला अटक करण्यात आली आहे.
तेम बांडोळी किर्लपाल दाभाळ येथील डोंगराळ भागात काल रात्री घडलेल्या या घटनेत वापरलेली १२ बोअरची बंदूक, हेडलाईट व चपला घटनास्थळी सापडल्या असून विश्वनाथ आत्मा गावकर याला वैद्यकीय चाचणीसाठी बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले आहे.
कुडचडे पोलिस स्थानकाचा ताबा घेतलेले सांग्याचे पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वनाथ व मृत मोहन गावकर हे चुलतभाऊ आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा शिकारीला जाण्याचा बेत केला होता. तथापि, नंदा नाईक हा काही तास अगोदरच शिकारीला येऊन नंदा नाईक ठरल्या स्थळी जाऊन बसला होता. याची चाहूल मात्र मोहन गावकर व विश्वनाथ गावकर यांना नसल्याने ते दोघे काही तासाने शिकारीला गेले होते. तसेच त्यांच्याकडे दोन बंदुका होत्या. यावेळी सावज असल्याचा समज होऊन नंदा नाईकने बंदुकीची गोळी झाडली असता ती थेट मोहन गावकर यांच्या तोंडाला व काळजाला जाऊन भिडल्याने तो जागीच गतप्राण झाला. मग दोघांनी मिळून मोहनला उचलून डोंगराळ भागातून गावात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंतर फारच दूर असल्यामुळे ते वाटेतच थांबले. विश्वनाथ गावकर याने याची माहिती गावात येऊन इतरांना दिली. मात्र ही संधी साधून नंदा नाईक याने तेथून पलायन केले.
आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता शिकारीची बंदूक हेडलाईट व इतर सामान मिळाले.
गोळी झाडलेली बंदूक गायब
घटनास्थळी ताब्यात घेतलेल्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आलेली नसून बंदुकीत गोळी तशीच भरलेल्या स्थितीत आहे. यामुळेच दुसऱ्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली असावी व
नंदा याने त्या बंदुकीसह पलायन केल्याचा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी खुनासह अन्य विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. उद्या संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

निवडक लक्ष्यांवर हल्ला शक्य

लष्कर प्रमुखांची स्पष्टोक्ती

दिल्ली, दि. ८ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील निवडक दहशतवादी शिबिरांवर अचूक हल्ल्याचा पर्याय खुला असून असे हल्ले लष्कराद्वारे शक्य असल्याची स्पष्टोक्ती लष्कर प्रमुख जन. दीपक कपूर यांनी दिली.
निवडक लक्ष्यांवर हल्ला करणे लष्कराला शक्य असले तरी यावर अंतिम निर्णय होईल की नाही हा देखील एक वेगळाच मुद्दा आहे. निवडक दहशतवादी शिबिरांवर हल्ले शक्य आहेत काय, असे विचारले असता कपूर यांनी होय असे उत्तर दिले. ते म्हणाले विमानांद्वारे, तोफखान्याद्वारे, अगदी सरळ किंवा अन्य कोणत्याही माध्यमांद्वारे हल्ला शक्य आहे.
सरकारने अशा हल्ल्याला संमती दिली तर लष्कर यासाठी सज्ज आहे काय, या प्रश्नावर त्यांनी लष्कर तयारीत असून काश्मीरसह उत्तरेकडील आघाडीवर दक्ष असल्याचे सांगितले.
केवळ हल्ला चढवायचा आहे म्हणून ही तयारी नव्हे तर ती कोणत्याही स्थितीत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. हृदयावरील शस्त्रक्रियेमुळे मागच्या महिन्यात पंतप्रधान मनमोहन सिंग रुग्णालयात होते. त्यावेळी अण्वस्त्र कमांडबाबत अनिश्चिततेचे वातावरण होते काय, यावर बोलताना कपूर म्हणाले की, असे वृत्त कधी कधी उगाच प्रसार माध्यमांमध्ये येत असते. परंतु खरी बाब अशी की, डॉ.सिंग यावर कधीच बोलले नाहीत. यासंदर्भात कोणताही भ्रम नव्हता. डॉ. सिंग रुग्णालयात असताना अण्वस्त्राचे बटन कोणाकडे आहे याची आम्हाला माहिती होती व यासंदर्भात सर्वकाही स्पष्ट होते.
भारताने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आजवर जो शांतीपूर्ण कूटनीतिक मार्ग अवलंबला त्यामुळे अतिरेकी शिबिरांविरुद्ध कारवाई करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तसेच देशातील राजकीय नेतृत्वाद्वारे निर्धारित कार्ययोजनांना पूर्ण करण्यास लष्कर पूर्णत: सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठाचापदवीदान समारंभ

जनरल रॉड्रिगीस, रवींद्र केळेकर, डॉ. माशेलकर सन्मानित

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - "आपली शैक्षणिक व्यवस्था अजूनही वसाहतींच्या पदचिन्हांवर चालली आहे. ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी भारतात भिकारी नव्हते, चोर नव्हते. त्यामुळे भारतावर सत्ता गाजवायची असेल तर येथील व्यवस्थेवर घाव घालणे अत्यावश्यक होते. त्यामुळे त्यांनी अशी शैक्षणिक व्यवस्था तयार केली की ज्याद्वारे त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल. दुर्दैव म्हणजे आपण त्यांनी घातलेल्या पायंड्याचाच अजूनही अवलंब करत आहोत,' असे सडेतोड प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल तथा निवृत्त लष्करप्रमुख जनरल सुनित रॉड्रिगीस यांनी आज येथे केले. गोवा विद्यापीठाच्या २१ व्या पदवीदान समारंभात मानद डी. लिट. पदवी स्वीकारताना ते बोलत होते.
"एनआयओ' प्रेक्षागृहात आयोजिलेल्या २१ व्या पदवीदान समारंभात जनरल रॉड्रिगीस यांना गोव्याचे राज्यपाल डॉ. एस एस. सिद्धू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्ञानपीठ विजेते साहित्यिक रवींद्र केळेकर आणि द्रष्टे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचाही गौरव करण्यात आला. राज्याच्या या दोन्ही अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या सुपुत्रांनाही राज्यपालांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आपली मानद उपाधी आपल्या आईस समर्पित करून डॉ. माशेलकर यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांना २७ मानद उपाध्या प्राप्त झाल्या आहेत. आजची उपाधी त्यांच्यासाठी सर्वांत प्रतिष्ठेची आहे. कारण त्यांना त्यांच्या जन्मभूमीत प्राप्त झाली आहे.
अणुकरारावर झालेल्या स्वाक्षऱ्या म्हणजे भारताने त्याच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी जिंकलेले तिसरे मोठे युद्ध असल्याचे डॉ. माशेलकर यांनी नमूद केले.
गेल्यावर्षी अमेरिकेसोबत झालेल्या अणुकरारामुळे भारताला उर्जा विकसित करण्याची संधी मिळाली. २१ व्या शतकात ज्यावेळी अन्य देश विविध क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करत असतील त्यावेळी भारत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल. माहिती आणि तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञानावर अवलंबून असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी गोवा विद्यापीठाकडून भाषा विभागात ५ डॉक्टरेटस, समाजशास्ज्ञात ४, नेचरल सायन्समध्ये ५ जीवन आणि पर्यावरणात २५ तर वाणिज्य क्षेत्रात ३ उपाधींचे वितरण झाले. गोव्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक विषयांमध्ये पूर्ण संशोधनाची गरज असल्याचे मत यावेळी राज्यपाल एस. एस. सिद्धू यांनी व्यक्त केले.

Sunday 8 February, 2009

रावणफोंड येथील अतिक्रमणे हटविली

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : रावणफोंड -केपे- नावेली रस्त्याच्या संगमावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी १२ घरे व दुकाने आज पोलिस बंदोबस्तात उपजिल्हाधिकारी जॉन्सन यांनी हटविली. त्यासाठी तीन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. त्या घरातील रहिवासी व दुकानदारांनी या मोहीमेत संपूर्ण सहकार्य केले. रस्ता रुंदीकरणासाठी या लोकांना कोकण रेल्वे स्टेशनसमोरील जागेत एकूण ५ हजार चौरस मीटर जमीन दिली असून तेथे त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
रावणफोंड ते नावेलीपर्यंत १५ मीटर रुंदीचा रस्ता बनवण्यासाठी या घरांचा अडसर होत होता. कित्येकांनी तेथे एकाच घरात तीन दुकाने थाटली होती व त्यांनाही सरकारने जमिनी दिल्या आहेत. बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी ही घरे काढण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न चालविले व अखेर त्यांच्या पुनर्रवसनाची जबाबदारी घेऊन आधी त्यांना जागा दिली व आता ती हटविली.
कित्येकानी रस्त्यालगत येत असलेले अर्धेअधिक भाग मोडून टाकले आहेत. आज सुटीचा दिवस असल्याने सकाळपासून सायंकाळ पर्यंत पोलिस संरक्षणात हे काम चालु होते. उपजिल्हाधिकारी जॉनसन बरोबर संयुक्त मामलेदार गावकर, पोलिस अधिकारी उपस्थित होते व त्यांच्या दिमतीस बांधकाम खात्याचे ट्रक व बुल्डोझर होते.
या जागेतील ९० टक्के लोक बिगर गोमंतकीय असून त्याना आके बायश येथील कृषी जमिनीतील पिके काढणारी शेतजमिन दिलेली आहे त्यामुळे शेतकरी नाराज बनले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कित्येक घरांना आगाऊ नोटीस न देता ती मोडण्यात आल्याची तक्रार भाजप युवा मोर्चाचे नेते शर्मद पै रायतूकर यांनी केली आहे.

भाषेच्या अस्तित्वासाठी संघर्ष हवा डॉ. यशवंत पाठक यांचे प्रतिपादन माशेल साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन

माशेल, ता. ७ प्रतिनिधी : भाषेला जेव्हा मातृभाषा असे संबंधतो. त्यावेळी भाषेच्या मुळाशी मातृसत्व असते ते सत्व जपून त्याचे सवर्धन व जतन करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. ज्या भाषेत आज महाराष्ट्रातील गावात आणि गोमंतकात लिहिले जाते तीच मराठी भाषा असल्याचे मानले जाते. तथापि, खरी मराठी भाषा जर आम्हाला पाहायची असेल संत ज्ञानेश्वरांच्या काळात जावे लागेल. ज्या भाषेमुळे आत्मानुभूतीची जाणीव होते आणि त्यानंतर शब्द जे शब्द येतात तीच मराठी भाषा होय, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांनी माशेल येथे आयोजित २७ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर, पूर्वाध्यक्ष श्रीराम कामत, स्वागताध्यक्ष डॉ. विठ्ठल ठाकूर, कार्याध्यक्ष ऍड. विनायक नार्वेकर, प्रमुख कार्यवाह, प्रेमानंद नाईक तसेच गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष सुरेश नाईक उपस्थित होते. येथील मराठी साहित्य सहवास आयोजित गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या २७ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. पाठक यांच्या हस्ते करण्यात आले.
भाषेचा खरा नायक सर्वसामान्य माणूस आहे. या सर्वसामान्यांच्या नसानसात मराठी भिनली आहे. मराठीचा आवाका बघता विज्ञानात, नागरिकशास्त्रात तसेच भाजी बाजारांतही बोलता आले पाहिजे. भाषा वर्तमानात जगत असते. ज्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसते ते भूतकाळात जातात. मराठी हा आमचा श्वास आहे. कारण ती जाणिवेची खोली असलेली भाषा आहे. शब्द पुस्तकात असतात. पण अनुभव बाहेर मिळतो. त्याची जाणीव समाजात मिळते. भाषा ही बोलण्याच्या अनुभवाची घटक आहे. त्यातून निर्माण झालेले साहित्य माणसांना प्रगल्भ बनविते. दु:खावर मात करते. मराठीच्या संघर्षासाठी अशी संमेलने गावागावातून आयोजित करून विचारांचे मंथन करावे, असे आवाहन पाठक यांनी केले.
ऍड. विनायक नार्वेकर यांनी उपस्थित मराठीप्रेमी, साहित्यिक, स्वागत सभासद, प्रतिनिधी यांचे स्वागत करून प्रास्ताविकात, माशेल साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी सांगितली.
संमेलनाध्यक्ष पु. शि. नार्वेकर उर्फ दादा यांच्या प्रांजळ भाषणाने उपस्थित मंडळी हेलावून गेली. ते म्हणाले, माझ्याकडून फार मोठ्या मार्गदर्शनाची अपेक्षा करू नका. कारण मी विद्वान नाही. साहित्यिक ही उपाधी लोक मला लावतात. साहित्य व साहित्यिक या फार मोठ्या संकल्पना आहेत. मी केवळ पांढऱ्यावर काळे करणारा लेखक आहे. साहित्यिक म्हणून अध्यक्षपदी माझी निवड झाली असे मी मानत नाही. माझी मराठीनिष्ठा हेच माझ्या निवडीमागील कारण असावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.
याप्रसंगी स्वागताध्यक्षांचेही मराठीचा जयजयकार करणारे भाषण झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष पु.शि. नार्वेकर यांच्या हस्ते उत्कृष्ट साहित्यकृतीबद्दल डॉ. एस. एस. नाडकर्णी यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तसेच श्रीराम कामत यांच्या विश्वचरित्र कोषाच्या पाचव्या खंडाचे मेघना कुरूंदवाडकर यांच्या "एकटी' या कथासंग्रहाचे संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या "मालिनी पौर्णिमा' या स्मरणिकेचे प्रकाशन श्री. नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री पाठक यांच्या हस्ते पु. शि. नार्वेकरांचा, तर सुरेश नाईक यांच्या हस्ते श्रीराम कामत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
त्यापूर्वी सकाळी ९ वाजता ढोल, ताशे, टाळ, मृदंग यांच्या निनादात लेझीम, फुगडी, घोडेमोडणी, धालो, धनगर व मुलांच्या वेशभूषा पथकासह वरगाव -माशेल येथील श्री शांतादुर्गेच्या मंदिराकडून हजारो मराठीप्रेमींच्या सहभागाने निघालेल्या साहित्यादिंडीने संमेलनाच्या कार्यक्रमाचा दिमाखदार शुभारंभ झाला. साहित्य दिंडी माशेल मुख्य बाजारपेठेतून संमेलन स्थळी आल्यावर २७ सुहासिनीनी दिंडीचे आरती ओवाळून भव्य स्वागत केले.
यावेळी सभामंडपात प्रा. गोळ मयेकर, प्रकाश वेळीप, भिकू पै. आंगले, शशिकला काकोडकर, सुरेश वाळवे, दै. गोवादूतचे संपादक राजेंद्र देसाई, सहसंपादक गंगाराम म्हांबरे, डॉ. काशिनाथ जल्मी, उत्तर गोवा शिवसेना प्रमुख दामू नाईक आदी मान्यवर व हजारो मराठीप्रेमी मंडळी उपस्थित होती. येथील देवकीकृष्ण मैदानावर उभारलेल्या आकर्षक आणि भव्य बा.द. सातोस्कर नगरीत अनेक साहित्यिक कार्यक्रम होणार आहेत.
उद्घाटन सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी आपल्या सुंदर आवाजात प्रभावीरीत्या करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रेमानंद नाईक यांनी आभार मानले.

धवलक्रांतीसाठी खास धोरण हवे : कलाम

डेअरी संघटनेच्या परिषदेचा शानदार शुभारंभ
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): दूध उत्पादनातील धवल क्रांती साधण्यासाठी भारताला सर्वंकष दूध धोरण आखण्याची सर्वार्थाने गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आज येथे केले.
३७ व्या भारतीय डेअरी संघटनेच्या (पश्चिम विभाग) तीन दिवसीय परिषदेचे कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, सभापती प्रतापसिंह राणे, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या अध्यक्ष अमृता पटेल, संघटनेचे अध्यक्ष एन. आर. मसीन व पश्चिम विभाग अध्यक्ष अरुण पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
देशाचे दूधविषयक धोरण आखताना त्यात गुरांसंबंधी कृत्रिम गर्भधारणा, त्यांचा आहार, आरोग्य, दूध गोळा करुन त्याची वाहतूक करणे या बाबींचा विचार व्हायला हवा. राष्ट्रीय पातळीवर गुरांच्या कृत्रिम गर्भधारणेविषयीचे धोरणही आखणे आवश्यक असून देशपातळीवर अशी ३० हजारांवर केंद्रे स्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक, खासगी तसेच सरकारी सहकार्याची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.
इतर देशांच्या तुलनेत भारतीय शेतकऱ्यांना दुधासाठी कमी भाव मिळतो. त्यामुळे त्यांना प्रोत्साहीत केल्यासच धवलक्रांती साध्य करणे शक्य असून त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे व पशुखाद्य परवडेल अशा दरात उपलब्ध करणे आवश्यक आहे. पडीक जमिनी व इतर चाऱ्याच्या जमिनींचा उचित वापर केल्यास ते शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दूध उत्पादन वाढवायचे असेल तर गुरांची काळजी वाहाणे गरजेचे ठरते असे सांगून दूधाची जमवाजमव व त्याच्या वाहतुकीचे काम हे स्थानिक दुग्ध सोसायट्यांमार्फत व्हायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रक्रीया करण्याच्या प्रमाणातही वाढ होणे गरजेचे असून लघुकाळासाठी १५ तर दिर्घकाळासाठी ही वाढ ३० टक्क्यांवर गेली पाहिजे असे डॉ. कलाम म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध निर्यातीत भारताचे योगदान हे अत्यल्प आहे. त्यात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याची गरज असून शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे असे ते म्हणाले. कच्या दूधाचा दर्जा, पुरवठ्यात सातत्., पॅकेजिंग पद्धती या गोष्टींवरही भर द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.
डेअरी निर्यातीला उत्तेजन देण्याकरिता निर्यात धोरण आखणे, डेअरी व्यवस्थापन पद्धतीची स्थापना व अंमल तसेच दरांबाबतचे उत्पादनातील वैविध्यपूर्ण धोरण आखण्याकडे लक्ष द्यायला हवे, असेही डॉ. कलाम यांनी सांगितले. जागतिक मागणीच्या किमान ५ टक्के तरी निर्यात करणे हा हेतू ठेवून ग्रामीण भागात २० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशा पद्धतीने भारतीय डेअरी संघटनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या काळात या उद्योगाच्या भरभराटीसाठी संघटना पावले उचलेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री कामत यांनी ही परिषद डेअरी व्यवसायात भारताला स्वसंसिद्ध करण्यावर भर देईल, असे सांगून दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी गोव्याकरिता विशेष योजना आखण्याचे आवाहन त्यांनी भारतीय डेअरी विकास मंडळाला केले.
या उद्घाटन समारंभात डॉ. टी. के. व्हेली व डॉ. के. जी. उपाध्याय यांना डॉ. कलाम यांच्या हस्ते फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच तंत्रज्ञानातील खास कामगिरीसाठी विशाल मार्केटिंगचे बी. एन. दास यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. कलाम यांच्या हस्ते यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
योग्य साधनसुविधा उपलब्ध केल्यास भारतीय शेतकरी जागतिक स्पर्धेत मागे पडणार नाहीत, असा विश्वास सभापती प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केला. दुग्ध व्यवसायाचा विकास साधण्यास दुग्ध उत्पादकांचे हित सांभाळणे गरजेचे आहे. भविष्यात घरगुती दुग्ध उत्पादनावरच हा विकास अवलंबून असेल, असे सांगून डॉ. अमृता पटेल यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना या व्यवसायाकडे वळण्यास उद्युक्त करण्याची गरज प्रतिपादली. राज्य सरकारांनी गाईगुरांच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी कालबाह्य कार्यक्रम निश्चित करायला हवा, असे सांगून सरकारच्या सहकार्याने व्यावसायिक पद्धतीने हे काम पुढे नेण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी दिले. पशुखाद्य नियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्यावरही राज्य सरकारांनी विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. आर. भसीन यांनी, या व्यवसायात १ कोटी ६० लाख कुटुंबे असून मूलभूत सोयीसुविधांचा अभाव ही आज या व्यवसायासमोरील खरी अडचण असल्याचे सांगितले. संपर्क यंत्रणा दर्जामागील अडसर ठरली असून जागतिक आर्थिक मंदीनेही या व्यवसायाला ग्रासल्याचे त्यांनी सांगितले. युरोपीय देशांनी दुग्ध उद्योगाला अनुदान जाहीर केले असून भारतानेही ते जाहीर करायला हवे असे ते म्हणाले.
अरुण पाटील यांनी स्वागतपर भाषण केले. ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संघटनेचे सचिव के. शेजू सिद्धार्थन यांनी आभार मानले.
दुग्ध व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पाच दुग्ध व्यावसायिकांना यंदापासून पुरस्कार देण्याची घोषणा एन. आर. मसीन यांनी यावेळी केली.

आग्नेल फर्नांडिस यांना अटक करा कळंगुटवासीयांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्या गुंडगिरीसमोर सरकारने हात टेकले आहेत. रेइश-मागूशचे पंच फ्रान्सिस सेर्राव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातही त्यांचा हात आहे. सरकारने ताबडतोब या गुंडगिरीचा बंदोबस्त केला नाही तर रस्त्यावर उतरू,असा इशारा आज कळंगुटवासीयांनी दिला.
आज पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रेइश मागूशचे पंच सदस्य फ्रान्सिस सेर्राव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. गुन्हेगारांना अटक केली नाही तर कळंगुटवासीयांना आपला इंगा दाखवावा लागेल,असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कळंगुटचे माजी आमदार तथा मंत्री सुरेश परूळेकर,कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा,रेइशमागूशच्या सरपंच सुश्मीती पेडणेकर,उपसरपंच वीरेंद्र शिरोडकर,पंच सदस्य सुदेश गोवेकर,मोहन कळंगुटकर,नेरूल नागरिक कृती समितीचे अध्यक्ष मोहन कळंगुटकर,नेरूल-वेरे कृती समितीचे अध्यक्ष गजानन नाईक व इतर नागरिक उपस्थित होते.
कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्यावर भर पंचायत कार्यालयात हल्ला झाला त्याचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. कळंगुटचे पंच लक्ष्मण परब यांच्यावरही हल्ला झाला त्या चौकशीचाही पत्ता नाही व आता फ्रान्सिस सेर्राव यांना जीवे मारण्याचे प्रयत्न झाला. या राज्यात कुणाचा पायपोस कोणाच्याही पायात राहिलेला नाही. मुख्यमंत्री जणू कठपुतळी बनले आहेत. विद्यमान सरकारकडून न्याय मिळत नसल्याने आता मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणे अपरिहार्य बनल्याचे सांगण्यात आले.
आग्नेल फर्नांडिस यांच्या सर्व भानगडींची गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी,अशी मागणी करणारे निवेदन राज्य व केंद्र सरकारला सादर केले जाईल,असेही सिक्वेरा यांनी यावेळी सांगितले. आग्नेल हे सध्या कॉंग्रेसलाच भारी ठरत आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना या गोष्टीची कल्पना दिली तरी ते काहीही करीत नाहीत, गृहमंत्र्यांना तर याबाबत सगळी माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फक्त आश्वासने देतात. या स्थितीत या न्याय कुणाकडे मागावा,असा सवालही यावेळी करण्यात आला.
विधानसभा सभागृहात केलेल्या आरोपांना आव्हान देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे आग्नेल यांना एवढीच हिंमत असेल तर त्यांनी भर जनतेसमोर हे आरोप करावेत,असे आव्हान सुरेश परूळेकर यांनी दिले. पंच सदस्य भष्टाचार प्रकरणांत गुंतले आहेत व त्यामुळे त्यांना कुणीतरी मारणारच, असे विधान आग्नेल यांनी सभागृहात केले. पंच सदस्य भष्टाचार करीत असतील तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार त्यांना निवडून दिलेल्या लोकांना आहे व त्यासाठी ग्रामसभेचे व्यासपीठ आहे. येथे बुरखाधारी गुंडांकडून हल्ला झाल्याने ही चिंतेची बाब आहे,असेही परूळेकर म्हणाले.
दरम्यान,रेइशमागूशचे उपसरपंच तथा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र शिरोडकर यांनी, आग्नेल यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना त्यांचा तोल गेल्याची टीका केली. फ्रान्सिस सेर्राव यांनी "एफआयआर'दाखल केला असून त्यात आग्नेल फर्नांडिस यांच्यावर संशय व्यक्त केला होता. आपण वेश्याव्यवसायात गुंतल्याचा आरोप करणारे आग्नेल हे रात्री अपरात्री "पब'व डिस्कोबारमध्ये काय करतात हे लोकांना ठाऊक आहे,अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. विविध विकासकामांना अडथळा निर्माण केला जात असल्याने पंचायत कामांवरही परिणाम झाल्याचा तपशील पक्षाध्यक्षांना सादर केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हल्ल्याचे मूळ "कॅसिनो'परवाना
दरम्यान, फ्रान्सिस सेर्राव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मूळ कॅसिनोला दिलेला परवाना असल्याची माहिती ऍड.जतीन नाईक यांनी दिली.पूर्वीच्या पंचायत मंडळाने वेरे येथे या कॅसिनोला परवाना दिला होता.सदर पंचायत मंडळावर अविश्वास ठराव दाखल करून नवीन पंचायत मंडळाने हा परवाना मागे घेतला. हा परवाना रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्यानेच फ्रान्सिस सेर्राव यांच्यावर हा हल्ला झाला,असेही यावेळी सांगण्यात आले.
"नार्को' व "ब्रेनमेपिंग' करा
कळंगुट मतदारसंघात झालेल्या पंच सदस्यांवरील हल्ल्यांत आग्नेल फर्नांडिस यांचा हात असून त्यांची नार्को व ब्रेनमेपिंग चाचणी घेतल्यास सत्य उजेडात येईल,अशी मागणी सरपंच सिक्वेरा यांनी केली.

दोन अपघातांमध्ये दोघाजणांचा मृत्यू

फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) : येथील फोंडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार झाले.
तिस्क उसगाव येथे आरस पेट्रोल पंपजवळ आज (दि.७) संध्याकाळी टिप्पर ट्रक (जीए ०९ यू ०९१०) आणि मोटरसायकल (जीए ०९ बी ०२१७) यांच्यात झालेल्या अपघातात मोटर सायकलचालक प्रमोद अशोक धुमे (३३) याचे निधन झाले आहे. मोटरसायकल घसरल्याने चालक प्रमोद धुमे रस्त्यावर पडला. यावेळी टिप्पर ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्याचे निधन झाले.
तिस्क फोंडा येथील हॉटेल मुसाफीरजवळ आज (दि.७) संध्याकाळी सहाच्या सुमारास मारुती कारने (जीए ०५ बी ०३९९) धडक दिल्याने पादचारी दिनकर विष्णू गायतोंडे (७६) यांचे निधन झाले आहे. निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उदय नाईक, हवालदार सुरेंद्र कोमरपंत यांनी पंचनामा केला.