Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 September, 2008

राज्याचे खाण संचालक भिंगींची अखेर उचलबांगडी

पणजी, दि.१२ (प्रतिनिधी): विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी राज्यातील बेकायदा खाण व्यवसायाविरोधात केलेल्या आरोपांचा पहिला दणका आज सरकारच्या वर्मावर बसला. गेली सात वर्षे खाण संचालकपदावर असलेले जे. बी. भिंगी यांची या पदावरून उचलबांगडी करण्याचे आदेश आज कार्मिक खात्याने जारी केले. सांगे येथील तथाकथित खाण घोटाळ्यात संचालक भिंगी हे भागीदार असल्याचा संशय पर्रीकर यांनी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर आज अचानक त्यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. भिंगी यांना सामान्य प्रशासन विभागात पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी संयुक्त सचिव अरविंद लोलयेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात पर्रीकर यांनी खाण खात्याच्या भोंगळ, भ्रष्ट व बेदरकार कारभाराचे वाभाडेच काढले होते. राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा खाण व्यवसाय सुरू असून काही खाण उद्योजकांकडून कायद्यांची सर्रास पायमल्ली सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली होती. सांगे येथील इम्रान खान यांच्या खाणीबाबतचा मुद्दा उपस्थित करून हा घोटाळा असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला होता. तसेच या घोटाळ्याला खाण संचालक भिंगी व खुद्द खाणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री कामत हेही जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप पर्रीकर यांनी केला होता.
दरम्यान,गेली सात वर्षे हे खाते मुख्यमंत्री कामत यांच्याकडे आहे. ते खाणमंत्री असल्यापासून या खात्याचे संचालकपद भिंगी यांच्याकडेच होते. वेळोवेळी विविध पुरावे सादर करून खाण खात्याचा भ्रष्टाचार उघड्यावर पाडूनही कुणाही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची नाराजी पर्रीकर यांनी व्यक्त केली होती. भिंगी यांना या पदावरून ताबडतोब हटवावे,अशी मागणीही पर्रीकर यांनी केली होती त्या अनुषंगानेच त्यांना या पदावरून हटवण्यात आल्याचे सरकारी सूत्रांकडून कळते.
सांगे येथील खाणीबाबत पर्रीकर यांनी केलेल्या आरोपांचे गुळमुळीत खंडन मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी त्याबाबत खुलासा करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न केल्याचे प्रत्युत्तर पर्रीकर यांनी दिले होते. पर्रीकर हे सध्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बंगळूर येथे गेल्याने गोव्यात परतल्यावर या प्रकरणाचा पर्दाफाश करणार,असे त्यांनी सांगितले आहे. पर्रीकर गोव्यात येण्यापूर्वीच सरकारने भिंगी यांची उचलबांगडी करून खाणप्रश्नावरून तापलेले वातावरण शमवण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे दिसून येते. दरम्यान,सरकारी अधिकारी हे केवळ हुकमाचे ताबेदार असतात. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष कुठलाही घोटाळा किंवा गैरकारभार उघडकीस येतो तेव्हा या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना "बळीचा बकरा' बनवण्याचे नाटक राजकीय नेते करतात. भिंगी यांचीही हीच अवस्था झाल्याची बोलकी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
दरम्यान, सरकारने आज अन्य दोघा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून मडगावचे उपविभागीय दंडाधिकारी दीपक देसाई यांची केपे उपविभागीय दंडाधिकारीपदी बदली केली. त्याजागी केप्याचे व्हिनासियो फुर्तादो यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बिहार पूरग्रस्तांसाठी भाजपच्या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पणजी, दि.१२(प्रतिनिधी): बिहारातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १० सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे ४ लाख रुपये मदत गोळा केल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी दिली.
आज या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना पर्वतकर म्हणाले, येत्या १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात मदत गोळा करण्यासाठी विशेष रथ फिरवला जाणार आहे. बिहारातील कोसी नदीला आलेल्या पुरामुळे येथील लोकांची कशी वाताहत झाली तसेच या लोकांना कोणत्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे हे लोकांना या रथाच्या माध्यमाने पटवून दिले जाणार आहे. दरम्यान, राज्यभरातून कपडे गोळा करण्यासाठी पक्षाने एकूण ९ केंद्रांची घोषणा केली आहे. त्यात प्रदेश भाजप मुख्यालय(पणजी), विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचे कार्यालय (पणजी),आशिष शिरोडकर, हॉटेल सत्यहिरा (म्हापसा),आमदार दयानंद सोपटे यांचे कार्यालय, महादेव मंदिर जवळ (पेडणे),आमदार राजेश पाटणेकर,भाजप कार्यालय (डिचोली),उदय च्यारी,कुडतरकर नगरी (फोंडा),भाजप कार्यालय, लापाझ हॉटेल मागे(वास्को),भाजप कार्यालय,लोहीया मैदानासमोर (मडगाव),भाजप कार्यालय,मंगलवन इमारत,चावडी (काणकोण)आदी ठिकाणांचा समावेश आहे. लोकांनी जुने पण वापरता येण्यालायक कपडे दान करावेत जेणेकरून येत्या रविवारी पहिला ट्रक बिहारला रवाना करता येईल,असेही पर्वतकर म्हणाले.
दरम्यान,बिहार पूरग्रस्तांना रोख मोठी रक्कम दान करायची असेल व आयकरात ज्यांना सूट मिळवायची असेल त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष,आपदा राहत कोष(खाते क्र.१६६०१०१००१७६५४५) ऍक्सिस बॅंकेच्या कृष्णानगर दिल्ली या पत्त्यावर रक्कम पाठवता येईल. उर्वरित कमी रोख रकमेसाठी प्रदेश भाजपने कॉर्पोरेशन बॅंकेत उघडलेल्या खाते क्र.एसबी-०१-०२४००२ मध्ये जमा करावी. ही रक्कम या बॅंकेच्या कुठल्याही शाखेत जमा करता येईल,असेही ते म्हणाले.

मडगावात बनावट नोटा जप्त एकाला अटक; दुसरा फरारी

मडगाव, दि.१२ (प्रतिनिधी): वास्कोत बनावट नोटांचे घबाड सापडल्याची घटना ताजी असतानाच आज मडगावातही पाच हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त करून माल्डा (पश्चिम बंगाल) येथील एकाला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार पळाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
वास्कोत सापडलेल्या बनावट नोटातही माल्डा येथील लोकच गुंतलेले असल्याने हे सारे एकाच टोळीचे काम असावे, असा पोलिसांचा कयास आहे. आज जप्त केलेल्या नोटांत ५०० रु. ची एक तर बाकीच्या ५० रु.च्या आहेत. त्यांची संख्या ७३ आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव अजय मूरमूर (३८) असे असून तो प. बंगालमधील माल्डा विभागातील आहे. कोलमोरड -नावेली येथे एका बांधकामावरील ठेकेदाराकडे तो कामावर आहे. तेथील एका मिनी बारमध्ये हे मजूर ५० रु.च्या नोटांची बंडले घेऊन फिरतात हे पाहून कोणीतरी पोलिसांना कळविले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आपल्या सहकाऱ्याला पकडल्याचे पाहून त्याचा साथीदार मात्र पळाला.
वास्को पाठोपाठ मडगावात बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आल्याने पोलिस आता सतर्क झाले आहेत. पाकिस्तानमधून बांगला देशमार्गे हे बनावट चलन प. बंगालात येथे व तेथून ते अन्यत्र पाठविले जाते, असा कयास पोलिस व्यक्त करीत आहे.

मडगावात बनावट नोटा जप्त एकाला अटक; दुसरा फरारी

मडगाव, दि.१२ (प्रतिनिधी): वास्कोत बनावट नोटांचे घबाड सापडल्याची घटना ताजी असतानाच आज मडगावातही पाच हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त करून माल्डा (पश्चिम बंगाल) येथील एकाला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार पळाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
वास्कोत सापडलेल्या बनावट नोटातही माल्डा येथील लोकच गुंतलेले असल्याने हे सारे एकाच टोळीचे काम असावे, असा पोलिसांचा कयास आहे. आज जप्त केलेल्या नोटांत ५०० रु. ची एक तर बाकीच्या ५० रु.च्या आहेत. त्यांची संख्या ७३ आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव अजय मूरमूर (३८) असे असून तो प. बंगालमधील माल्डा विभागातील आहे. कोलमोरड -नावेली येथे एका बांधकामावरील ठेकेदाराकडे तो कामावर आहे. तेथील एका मिनी बारमध्ये हे मजूर ५० रु.च्या नोटांची बंडले घेऊन फिरतात हे पाहून कोणीतरी पोलिसांना कळविले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आपल्या सहकाऱ्याला पकडल्याचे पाहून त्याचा साथीदार मात्र पळाला.
वास्को पाठोपाठ मडगावात बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आल्याने पोलिस आता सतर्क झाले आहेत. पाकिस्तानमधून बांगला देशमार्गे हे बनावट चलन प. बंगालात येथे व तेथून ते अन्यत्र पाठविले जाते, असा कयास पोलिस व्यक्त करीत आहे.

शाळेची कौले उडाल्याने शिक्षिकेसह चौघे जखमी

पाळी चिंचवाडा भागाला वादळाचा तडाखा
पाळी, दि. १२ (वार्ताहर): पाळी पंचायत क्षेत्रातील चिंचवाडा येथे आज दुपारी पावणेबारा वाजता अचानक झालेल्या चक्रीवादळाने सरकारी प्राथमिक शाळेची कौले उडून वर्गशिक्षिका संगीता मराठे यांच्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले.
दुपारी पावणे बारा ते बाराच्या दरम्यान धो धो पडणाऱ्या पावसाबरोबर अचानक तुफान वेगाने वारा वाहू लागला. क्षणार्धात या वाऱ्याने वादळाचे रूप घेतले व सर्वप्रथम चिंचवाड्यावरील उंचवट्यावर असलेल्या स. प्रा. शाळेला दणका दिला. यामुळे शाळेच्या एका वर्गाची कौले उंच उडून कोसळल्याने शिक्षिका संगीता मराठे यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. त्याच प्रमाणे वर्गातील विद्यार्थ्यांवरही छपराची कौले पडल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले.
संगीता मराठे यांना व नारायण जाधव, दीपक कांबळी अलीन सय्यद या विद्यार्थ्यांना ताबडतोब साखळीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉ. योगेश गोवेकर यांनी जखमींवर त्वरित उपचार केले. संगीता मराठे व विद्यार्थी नारायण जाधव यांना पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे.
या घटनेत सय्यद मूसा, जावेद सय्यद, शविना सिंदगी,अनिकेत हसनकर या मुलांना किरकोळ जखमा झाल्या.
दरम्यान या शाळेसमोरील श्रीमती सुनंदा शंकर नाईक यांच्या घरावरील सिंमेटचे पत्रे उडून जाऊन शेजारील पुष्पावती वळवईकर, उषा घनःश्याम बोरकर यांच्या घरावर जाऊन पडले. त्याचप्रमाणे वादळाने या घरांवरील कौले उडून गेल्याने घरातील टी. व्ही. व संसारोपयोगी वस्तू नष्ट झाल्या. सुनंदा नाईक यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणारी सौ. सुधा सदानंद मडीवाळ यांच्या टी.व्ही.वर सिमेंटचा पत्रा पडल्याने टी. व्ही. संच निकामी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच डिचोलीचे मामलेदार प्रमोद भट यांनी त्वरित चिंचवाडा येथे जाऊन पाहणी केली. त्यांच्याबरोबर पाळीच्या सरपंच सौ. गीता परब, उपसरपंच सौ.करीश्मा कामत, दीपक कामत, दीपक नाईक, तलाठी वेर्लेकर, विविधा परिवाराचे प्रताप गावस, उद्योजक महेश ऊर्फ शांबा गावस, पाळी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, शिवा गावडे उपस्थित होते. या वादळातील नुकसानी सुमारे ३० हजार रुपये असल्याची माहिती मामलेदारांनी दिली. सुनंदा यांच्या घराचे ३० सिंमेटचे पत्रे फुटले आहेत. शाळेची सुमारे एक हजार कौले उडाली आहेत. पुष्पावती वळवईकर यांच्या घराची १०० ते १५० कौले, तर उषा बोरकर यांच्या घराची ४० ते ५० कौले उडाल्याचे सांगण्यात आले.
चौगुले कंपनीची मदत ःघटनेची माहिती मिळताच कंपनीचे कार्यालय व्यवस्थापक श्री. आफळे व खाण व्यवस्थापक संदीप मोरजकर यांनी धाव घेतली व आजच्या आज शाळेची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले.त्याचप्रमाणे येथील नागरिकांना झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यास मान्यता दर्शविली.
या वादळात सागवानाचे एक झाड जमीनदोस्त झाले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद सावंत यांनीही अपघातग्रस्त घरांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.

१४ वारसास्थळे गायब होण्याचा प्रकार

हा तर खाण उद्योगाच्या तुंबड्या भरण्याचा कट
पणजी, दि.१२(प्रतिनिधी): राज्यातील महत्त्वाची चौदा वारसा स्थळे नगर नियोजन खात्याने काढलेल्या अधिसूचनेतून गायब झाल्याचे प्रकरण खरोखरच गंभीर असून ही चूक नजरचुकीने झाल्याचा दावा सरकार करत असले तरी हा खाण उद्योगाला रान मोकळे करून देण्याचाच एक कट असावा,असा संशय भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी व्यक्त केला.
पणजी येथे भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.'गोवा हेरिटेज ऍक्शन ग्रुप" यासंबंधी घेतलेल्या आक्षेपाचे भाजपने समर्थन केले आहे. राज्यातील संरक्षित वारसा स्थळे व पुरातन वास्तूंची यादी जाहीर करण्याची अधिसूचना अलीकडेच नगर व नियोजन खात्याने काढली आहे. या यादीत एकूण १४ स्थळे गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही चूक केवळ नजरचुकीने झाल्याचे सांगून येथील अधिकारी आपली कातडी बचावण्याचा प्रयत्न करत असले तरी यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असण्याची दाट शक्यता आमदार दामोदर नाईक यांनी वर्तविली.
मुळात या चौदा स्थळांपैकी नऊ स्थळे ही खाणप्रभावीत क्षेत्रात येत असल्याने या लोकांचे हित जपण्यासाठीच हे षडयंत्र तर रचले गेले नाही ना,अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
बुद्धमूर्ती - कोलवाळ,श्री मंगेश मंदिर - कुठ्ठाळी,खोर्जुवे किल्ला, ब्रिटिश सिमेट्री,- दोनापावला,कैवल्य मठ - कायसूव, शिगावची गुहा,नारायणदेव मंदिर - विचुंद्रे,प्रस्तर रेखाचित्रे - पणसामळ, प्रस्तर रेखाचित्र - काजूर,सिद्धेश्वर गुहा - सुर्लातार,आदिलशाही मशीद, वारखंडची गुहा, दामोदर मंदिरानजीकचा तलाव - फातोर्डा,जुवे किल्ला आदी स्थळांचा समावेश या अधिसूचनेत केला नसल्याचा दावा "हेरिटेज ऍक्शन ग्रुप'ने केला आहे.

पोलिस मुख्यालयातील टाकीतून काढले तब्बल सातशे लिटर पाणीमिश्रित पेट्रोल

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): पोलिस मुख्यालयात असलेल्या पेट्रोलच्या टाकीतून तब्बल सातशे लीटर पाणी मिश्रित पेट्रोल आज काढण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे ("आयओसी') कर्मचारी या कामाला लागले आहेत. या प्रकाराची पोलिस खात्याने गंभीर दखल घेतली असून या भेसळीचा अहवाल पोलिस वरिष्ठांना देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस तक्रार करवी की, नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
या घटनेमुळे "आयओसी'चे धाबे दणाणले आहे. कालपासून कंपनीचे अधिकारी पोलिस मुख्यालयात ठाण मांडून आहेत. मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती पुरवली जात नाही.
काल सकाळी वास्कोहून आलेल्या एका टॅंकरमधील पेट्रोल या २० हजार क्षमतेच्या टाकीत रिते करण्यात आले होते. त्यानंतर आठ पोलिस वाहनांत पेट्रोल भरण्यात आले. मात्र ही वाहने पोलिस मुख्यालयाच्या बाहेरही जाऊ शकली नाहीत. काही मीटर अंतरावरच ती बंद पडल्याने त्वरित आयओसीशी संपर्क साधण्यात आला.
काल सकाळी आणि आज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या टाकीला पाणी खेचण्याचा
पंप बसवून सुमारे ६९० लीटर पाणी बाहेर काढले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी बंद टाकीत कसे पोहोचले, यामागील गूढ कायम आहे. टाकीतील पेट्रोलचे वेगवेगळे नमुने चाचणीसाठी कंपनीने घेतले आहेत.
काही दिवसांपूर्वी कदंब वाहतूक महामंडळाच्या टाकीतील पाणीमिश्रित डिझेल नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येताच संशयितांना चौकशीसाठी अटक केली जाणार असल्याचे पर्वरी पोलिसांनी सांगितले. परंतु, कदंब महामंडळाला झालेल्या डिझेल पुरवठ्यात कोणत्याही प्रकारे भेसळ झाली नसल्याचा दावा "आयओसी'ने केला आहे.

बनावट नोटांचे गोवा प्रमुख केंद्र

भाजप विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक यांचा दावा
पणजी,दि.१२(प्रतिनिधी): गोवा हे बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रमुख केंद्र बनत असल्याचा दावा भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते दामोदर नाईक यांनी केला आहे. वास्कोत तीन लाखांच्या बनावट नोटा सापडल्या व त्याचबरोबर दिवसागणिक व्यवहारांतही मोठ्या प्रमाणावर अशा नोटा सापडत असल्याने राज्यात या नोटांचा मोठा विस्तार झाल्याची भीती नाईक यांनी व्यक्त केली.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक व प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.
राज्यातील वाढत्या चोऱ्या हा चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण गोव्यातील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. तेथील जिल्हाधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व पोलिस अधीक्षकपदी भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. विद्यमान अधीक्षक व जिल्हाधिकारी ही स्थिती आटोक्यात आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत,असा ठपकाही नाईक यांनी यावेळी ठेवला.
प्रत्येक वेळी चोऱ्या झाल्या की कोकण रेल्वेच्या नावाने बोटे मोडण्याची सवय या अधिकाऱ्यांनी आता सोडून द्यावी. पोलिस खात्याची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील चोऱ्यांचा आकडा ५६० वर पोहचला आहे.मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे वास्तव्य असलेल्या मडगावातच गेल्या दहा महिन्यांत १४० चोऱ्या झाल्या. अनेक ठिकाणी पोलिस या चोऱ्यांची नोंद करून घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांचा धाकच नाहीसा झाला की काय,असा प्रश्न पडतो. दरम्यान, काही प्रकरणांत ज्या पद्धतीने पोलिस चोरांना पकडल्याचा आव आणतात व संशयितांना ताब्यात घेतात ती प्रकरणे जेव्हा न्यायालयात टिकत नाहीत त्यामुळे पोलिस केवळ चौकशीच्या नावाने धूळफेक करीत असल्याचे स्पष्ट होते. चोऱ्यांच्या अनेक प्रकरणांत पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
सरकारी संकेतस्थळावर हल्ला होणे,पॅरोलवर सोडलेले गुन्हेगार बेपत्ता होणे,तलवारींचा साठा सापडणे,बनावट नोटांचा सुळसुळाट आदी प्रकरणी सरकार उघडे पडले असून कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे श्री.नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.

बनावट नोटांचे गोवा प्रमुख केंद्र

भाजप विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक यांचा दावा
पणजी,दि.१२(प्रतिनिधी): गोवा हे बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रमुख केंद्र बनत असल्याचा दावा भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते दामोदर नाईक यांनी केला आहे. वास्कोत तीन लाखांच्या बनावट नोटा सापडल्या व त्याचबरोबर दिवसागणिक व्यवहारांतही मोठ्या प्रमाणावर अशा नोटा सापडत असल्याने राज्यात या नोटांचा मोठा विस्तार झाल्याची भीती नाईक यांनी व्यक्त केली.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक व प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.
राज्यातील वाढत्या चोऱ्या हा चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण गोव्यातील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. तेथील जिल्हाधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व पोलिस अधीक्षकपदी भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. विद्यमान अधीक्षक व जिल्हाधिकारी ही स्थिती आटोक्यात आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत,असा ठपकाही नाईक यांनी यावेळी ठेवला.
प्रत्येक वेळी चोऱ्या झाल्या की कोकण रेल्वेच्या नावाने बोटे मोडण्याची सवय या अधिकाऱ्यांनी आता सोडून द्यावी. पोलिस खात्याची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील चोऱ्यांचा आकडा ५६० वर पोहचला आहे.मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे वास्तव्य असलेल्या मडगावातच गेल्या दहा महिन्यांत १४० चोऱ्या झाल्या. अनेक ठिकाणी पोलिस या चोऱ्यांची नोंद करून घेत नसल्याच्या तक्रारी आहेत. चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांचा धाकच नाहीसा झाला की काय,असा प्रश्न पडतो. दरम्यान, काही प्रकरणांत ज्या पद्धतीने पोलिस चोरांना पकडल्याचा आव आणतात व संशयितांना ताब्यात घेतात ती प्रकरणे जेव्हा न्यायालयात टिकत नाहीत त्यामुळे पोलिस केवळ चौकशीच्या नावाने धूळफेक करीत असल्याचे स्पष्ट होते. चोऱ्यांच्या अनेक प्रकरणांत पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
सरकारी संकेतस्थळावर हल्ला होणे,पॅरोलवर सोडलेले गुन्हेगार बेपत्ता होणे,तलवारींचा साठा सापडणे,बनावट नोटांचा सुळसुळाट आदी प्रकरणी सरकार उघडे पडले असून कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे श्री.नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.

Thursday 11 September, 2008

बच्चनवरील बहिष्कार राज ठाकरेंनी मागे घेतला

सोनिया-बाळासाहेब यांच्या हस्तक्षेपाने वाद मिटला?
मात्र प्रसाद अडचणीत

मुंबई, दि. ११ : अमिताभ बच्चन यांचा माफीनामा मंजूर करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांच्या चित्रपट प्रदर्शनावर घातलेली बंदी आज मागे घेतली. जया बच्चन यांनी यापुढे तरी अशा विषयांच्या फंदात न पडता लिहून दिले असतील तेवढेच डायलॉग बोलावेत, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी अंतःकरणपूर्व मराठी जनतेकडे क्षमायाचना केल्यामुळे आणि राज ठाकरे यांनी प्रकरण चिघळू न देता बच्चन कुटुंबीयांच्या चित्रपटावरील बहिष्कार मागे घेतल्यामुळे हा वाद तात्पुरता आणि तेवढ्यापुरता मिटला असला तरी त्या निमित्ताने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन परस्परविरुद्ध व्यक्तींनी हा वाद मिटवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याचे विश्वसनीयरित्या लक्षात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाच्या भित्तीचित्रांची नासधूस करुन द लास्ट लियर या चित्रपटाचा प्रसिद्धीपूर्व खेळ होऊ न दिल्यामुळे आश्चर्य म्हणजे सोनिया गांधी चितेत पडून त्यांनी मार्गारेट अल्वा यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची गहनता जाणून घेण्यास सांगितले. त्यानुसार अल्वा यांनी विलासरावांना, - मॅडम काळजीत आहेत, प्रकरण लवकरात लवकर मिटले पाहिजे- असा निरोप दिला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ यांचा संवाद होऊन अमिताभने अत्यंत प्रामाणिकपणे माफी मागण्याचे ठरले. अमिताभ कोणताही आडपडदा न ठेवता इतक्या विस्तृतपणणे क्षमायाचना करेल की बहिष्कार मागे न घेण्याचे कोणतेही कारण उरणार नाही असा निरोप मातोश्रीवरुन राज ठाकरे यांच्यापर्यंत गेला.
मंत्रालयातून सूचना गेल्यावर राज ठाकरे यांना पोलीस आयुक्तांनी वार्ताहर परिषद घेण्याची मोकळीक दिली. राज यांनी बहिष्कार उठविल्याची घोषणा केली. जया बच्चन यांनीच कॅमेरासमोर येऊन माफी मागितली पाहिजे अशी अट असताना आणि त्यांनी माफी मागितली नसताना राजनी आंदोलन मागे का घेतले अशी पृच्छा वार्ताहरांनी मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांना केली असता त्यांनी सांगितले की, जया बच्चन यांनीच माफी मागितली पाहिजे याचा अर्थ त्यांच्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीने माफी मागून चालणार नाही. अमिताभ बच्चन हे परिस्थितीचे आकलन वगैरे विषयात आणि एकंदरीतच जयाबाईंपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असल्यामुळे आणि ते बच्चन कुटुंबीयांचे प्रमुख असल्यामुळे त्यांनी इतक्या नम्रपणे माफी मागितल्यावर मूळ अटीला चिकटून बसणे सभ्यपणाचे झाले नसते. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन यांना आपण महाराष्ट्राकडून केवढ्या मोठ्या प्रमाणात उपकृत झालो आहोत आणि महाराष्ट्राविषयी कोणताही विकल्प आपल्या मनात कधीही येणे शक्य नाही हे इतक्या सविस्तरपणे सांगावे लागले आहे की, हा त्रास आपल्यामुळे आपल्या नवऱ्याला झाला याची लाज जयाबाईंना वाटली पाहिजे. बहिष्कार मागे घेण्याचे आमचे धोरण पूर्णपणे सुसंगत आहे. हेतू साध्य झाल्यावर संघर्ष संपतो.
महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका लवकरच होणार असून त्यात मुंबईतील हिंदी भाषिकांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी जया बच्चन यांना मुलायमसिंग वापरीत आहेत आणि हा वाद कॉंग्रेसला परवडणारा नाही. असा सांगावा मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना दिल्लीहून मिळाला आहे. सोनियाजी आणि अमिताभजी यांची प्रत्यक्ष भेट नजिकच्या भविष्यकाळात होईल वा न होईल परंतु दुरावा संपविण्याची कॉंग्रेस अध्यक्षांना इच्छा आहे आणि बच्चन कुटुंबीय मुलायमसिंग यांच्या कारस्थानांपासून दूर राहिले पाहिजे यासाठी त्यांच्याशी सौहार्दपूर्णक संपर्क ठेवण्याच्या सूचना मुंबई कॉंग्रेसला मिळाल्या आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त एल. के. प्रसाद यांचे -यह सिटी किसी बाप की नही है- हे राज ठाकरे यांना उद्देशून केलेले विधान वास्तविक सर्व मराठी जनतेला उद्देशून केले आहे असा अर्थ घेतला जाऊ शकतो आणि तसे झाल्यास आगामी निवडणुकीत हे वाक्य मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात कॉंग्रेसची धुळधाण करु शकते, याकडे राजकीय निरीक्षकांनी तसेच दिल्लीतील कॉंग्रेसच्या मराठी पुढाऱ्यांनी सोनिया गांधींचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे प्रसाद यांनी हे विधान करताना अप्रासंगिकता, आयपीएस आचारसंहितेचे उल्लंघन आणि कळत नकळत शांतताभंग करण्याचा प्रयत्न यापैकी काही प्रमाद केले आहेत का याची चौकशी केली गेली पाहिजे असे अनौपचारिकरित्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आले आहे.
दिल्लीच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस आहे हा जो समज मराठी माणसाच्या मनात बद्धमूल आहे तो खरा आहे असे प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन वाटू शकते. त्यामुळे प्रसाद ज्या उद्धटपणे मराठी माणसाचा बाप काढतात ती पद्धत महाराष्ट्र शासनाला आणि कॉंग्रेसला लाभदायक नाही, असे मत मुंबईच्या अनेक सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी खाजगीमध्ये गृहमंत्रालयाकडे व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रसाद यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

अतिमहनीय नेत्यांच्या वेतनात तिपटीने वाढ

नवी दिल्ली, दि.११ : देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात तिपटीने वाढ करण्याच्या शिफारशीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
राष्ट्रपतींना सध्या दरमहा ५० हजार रुपये इतके वेतन मिळत आहे. आता त्यांना दीड लाख रुपये महिन्याकाठी मिळणार असून उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे वेतन अनुक्रमे सव्वा लाख आणि एक लाख दहा हजार इतके झाले आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात याला मंजुरी देण्यात आली. उपरोक्त वेतनातील वाढ जानेवारी २००७ पासून लागू केली जाणार आहे.

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्यापासून बंगळूरमध्ये

लोकसभा, विधानसभा, निवडणुकांवर चर्चा
नव्या धोरणांची आखणी, अणुकरारावरही चर्चेचे संकेत

बंगळूर, दि.११ : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार १३ सप्टेंबरपासून बंगळूर येथे सुरू होत असून तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत आगामी काही महिन्यात होणाऱ्या तीन राज्यातील विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकांविषयी धोरणांची आखणी होणार असल्याचे वृत्त आहे.
गुजरात, कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर भाजपा अतिशय उत्साहात असून तितक्याच योजनाबद्ध पद्धतीने पक्षाने लोकसभेचीही तयारी सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून केंद्रात सत्ताबदलाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. त्या दृष्टीने भाजप प्रयत्नशील असून लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आपल्या वाटचालीस सुरुवात केली आहे.
लोकसभा तयारीच्या बाबतीत सर्वप्रथम सुरुवात करणाऱ्या भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यातही अन्य पक्षांच्या तुलनेत बाजी मारली आहे. सर्वप्रथम भाजपच्या उमेदवारांचीच यादी जाहीर झाली होती. २००४ च्या निवडणुकीतील पराभवानंतर सावरून तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेले यश कॉंग्रेस आणि अन्य पक्षांचे डोळे दिपविणारेच ठरले आहे. मागील निवडणुकीतील काही चुकाही आता सुधारण्याचे पक्षाने ठरविले आहे.
भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी बंगलोरचीच निवड का केली, असे विचारले असता पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, कर्नाटकच्या माध्यमातूनच आमचा दाक्षिणात्य राज्यांत प्रवेश झाला आहे. त्यामुळे यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बंगलोर येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीही तीन वेळा कर्नाटकमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आहे. पण, पक्षाची सत्ता येथे आल्यानंतर प्रथमच सर्व राष्ट्रीय स्तरावरील नेते येथे एकत्र येणार आहेत.
या बैठकीत आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची रणनीती निश्चित होणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असल्याने त्यांना अधिक प्रयत्नपूर्व ही राज्ये आपल्याकडेच राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवे सहकारी पक्ष जोडणे आणि जुन्या पण, सोडून गेलेल्या सहकारी पक्षांना परत आणणे यासाठी पक्षाचे कार्य सुरू झाले आहे. त्यातही दाक्षिणात्य राजकारणात नवा झंझावात ठरलेल्या चिरंजीवीच्या नव्या पक्षाशी भाजपाची जवळीक पाहून कॉंग्रेसची झोप उडाली आहे. या पक्षांची युती कॉंग्रेसकरिता मोठा धक्का ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रमांपासून दुरावलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. पण, ते बैठकीसाठी मागील वर्षीप्रमाणे आपला संदेश पाठविणार असल्याचे समजते. पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी "विजय संकल्प रॅली'मुळे कदाचित पूर्णवेळ या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. पण, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री मात्र यावेळी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

...तर शिरगावात पाण्याचे लोंढे खाणप्रकरणी खंडपीठाकडून गंभीर दखल

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): शिरगाव येथील खाणींत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठले असून तेथील खाणींच्या ढिगाऱ्यांना चिरा गेल्या आहेत. परिस्थिती धोकादायक बनलेल्यामुळे हे ढिगारे फुटल्यास खाणींतील पाणी गावात शिरणार असल्याची माहिती सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली. त्यामुळे तेथे येत्या शनिवारी पाहणी करून सोमवारी संपूर्ण अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सादर करण्याचा आदेश खाण सुरक्षा उपसंचालकांना देण्यात आला.
या खाणींवरील पाणी रात्री गावात सोडले जात असल्याची पुरवणी याचिका मूळ याचिकादारातर्फे आज दाखल करण्यात आल्यानंतर सरकारने आज वरील माहिती न्यायालयास दिली.
या खाणीवर साठवलेल्या पाण्याची कशी विल्हेवाट लावणार, तसेच हे पाणी गावात शिरू नये यासाठी कोणते उपाय केले जाणार तेही सुचवण्याचे आदेश खाण सुरक्षा खात्याला देण्यात आला आहे. यापूर्वी गोव्यात खाणीवरील पाणी गावात शिरून मोठी समस्या निर्माण झाली होती, अशी माहितीही सरकारने न्यायालयाला दिली.
यापूर्वी खाण व्यवसायामुळे शेतजमिनीला फटका बसलेला असल्याने शिरगाव येथील जमिनीची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी तसेच उपाययोजना सुचवण्याचे काम नागपुरच्या "निरी' या संस्थेकडे काम सोपवण्यात आले आहे. तसेच खाणीतून बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी सरकारने तेथे अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असा आदेश १६ जून ०८ रोजी खंडपीठाने दिला होता. मात्र, अद्याप तेथे अधिकाऱ्याची नेमणूक केलेली नाही, असा दावा याचिकादाराने आज न्यायालयात केला; तर आम्ही पाण्याच्या पातळीची संपूर्ण माहिती ठेवली असल्याचा दावा सरकार पक्षाने केला.
"निरी'ने या संस्थेला या ठिकाणचा अभ्यास करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याची अट न्यायालयाने घातली आहे. या कामासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च येणार असून ही रक्कम तेथील तिन्ही खाण कंपन्यांनी निरीला देण्याचे मान्य केले आहे.
शिरगावात खाण व्यवसायामुळे शेत जमिनींचे अतोनात नुकसान झाले असून नैसर्गिक जलस्रोतही नष्ट झाल्याची खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे तेथील जमिनींचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी आदेश दिला आहे.

आता पोलिस खात्यालाही पाणीमिश्रित डिझेलपुरवठा तीन वाहने रस्त्यांतच बंद पडली

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : कदंब वाहतूक महामंडळाला पाणीमिश्रित डिझेल पुरवठा झाल्याची घटना ताजी असतानाच आता चक्क पोलिस खात्यालाच त्या प्रकारच्या डिझेलचा पुरवठा झाल्याने पोलिसांची तीन वाहने आज रस्त्यांतच बंद पडली. परिणामी दिवसभर पोलिस मुख्यालयात असलेल्या पेट्रोल पंपातील पाण्याचे अंश वेगळे करण्याचे काम सुरू होते. सदर डिझेलचा पुरवठा "आयओसी'तर्फे झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे सर्व पोलिस वाहनांत वेर्णा येथून डिझेल भरले जात आहे.
काही दिवसांपूर्वी कदंब महामंडळाच्या डेपोतील पेट्रोल पंपना पाणीमिश्रित डिझेलचा पुरवठा झाल्याने एकाच दिवशी ठिकठिकाणी १६ बसगाड्या बंद पडल्या होत्या. यावेळी त्यावेळी "कदंब'ने या कंपनीविरोधात पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप या प्रकरणातील दोषी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या घटनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर डिझेलचा काळा बाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता खुद्द पोलिस खात्यालाच पाणीमिश्रित डिझेल पुरवठा झाल्याने दोषींवर कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा 'ऊठ गोंयकारा' संघटनेची बाबूशविरुद्ध तक्रार दाखल

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत चुकीची माहिती दिल्याच्या दावा करून "ऊठ गोंयकारा' संघटनेने आज पणजी पोलिस स्थानकात त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या १८१, १९९, १७१(जी) कलमांनुसार तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप तक्रारीची नोंद झालेली नसून प्राथमिक चौकशीनंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पणजीचे पोलिस निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त यांनी दिली.
आज सकाळी "ऊठ गोंयकारा'चे प्रवक्ते ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी दाखल केलेल्या या तक्रारीबरोबर निवडणूक अर्जासोबतच जोडलेले प्रतिज्ञापत्र, मुंबई येथील सेंट तेरेझा विद्यालयात केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्याचे त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचे पत्र व सरकारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या मंत्री मोन्सेरात यांचा पूर्ण तपशीलाची एक प्रत या तक्रारीबरोबर जोडण्यात आली आहे.
प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची जबाबदारी स्वीकारून मोन्सेरात यांनी मंत्रिपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी या संघटनेने केली होती. त्यासाठी त्यांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ते दहावी उर्तीण झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुन्हा ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यास मोन्सेरात यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिस तक्रार करण्यात आल्याचे ऍड. आयरिश यांनी सांगितले. संघटना याप्रकरणी उच्च न्यायालयातही जाणार असल्याचे ते म्हणाले.
मोन्सेरात हे आठवीदेखील उर्तीण झालेले नसल्याने ते दहावी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. १९ जून १९७५ रोजी त्यांनी वांद्रे मुंबई येथील सेंट तेरेझा विद्यालयात सहावीत प्रवेश घेतल्यानंतर ७ सप्टेंबर १९७८ रोजी शाळा सोडली. त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक फा. अँथनी जोसेफ यांनी सर्व कागदपत्रे घेऊन गोव्यात यावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे. येत्या काही दिवसांत सदर मुख्याध्यापक गोव्यात येणार असल्याची माहिती यावेळी ऍड. आयरिश यांनी दिली.
--------------------------------------------------------
योग्य वेळी उत्तर देऊ: बाबूश
मंत्री म्हणून काम करण्यापासून माझी अडवणूक केली जात आहे. मात्र, मी या प्रकाराला बळी न पडता शिक्षण खात्यात आजपर्यंत जे कोणी केले नाही अशी कामगिरी करून दाखवणार आहे. वरिष्ठांनी मला याबाबत विचारणा केली तर त्यांना मी योग्य ते उत्तर देईन, असे बाबूश मोन्सेरात यांनी या तक्रारीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Wednesday 10 September, 2008

अमिताभची सपशेल माफी, जयाला माफी मागण्यास सांगितले

नवी दिल्ली, दि.१० : आज बच्चन कुटुंबाजवळ जे काही आहे ते महाराष्ट्र आणि मुंबईनेच दिलेले आहे. याची जाणीव असल्याने आपल्या कुटुंबाने कधीही महाराष्ट्राचा अपमान केला नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
अभिषेक बच्चनच्या 'द्रोण' या चित्रपटाच्या ध्वनीफितींच्या उद्घाटन समारंभात जया बच्चन यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. यावर अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून उत्तर दिले. ते म्हणतात की, मी लंडनहून मुंबईला परततो आहे. पण, यावेळी अंत:करण अतिशय जड झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा आणि जयाचे वक्तव्य या वादाची माहिती मला मिळाली. इंटरनेटच्या माध्यमातून मी संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. कोणत्याही मुद्यावर निर्णय घेण्यापूर्वी त्यावर समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातूनही विचार करण्याची माझी पद्धत आहे. यावेळीही मी जया आणि तिच्या वक्तव्याचा विरोध करणाऱ्यांच्या बाजूने विचार केला. त्यातून मला लक्षात आले की, या सर्व प्रकरणात भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याचे मला लक्षात आले. त्यामुळे मी जयाला एसएमएस करून माफी मागण्यास सांगितले.
या एसएमएसमध्ये लिहिले आहे की, आज आपल्याजवळ जे काही आहे ते या महान राज्य आणि शहराने दिलेलेच आहे. आपण कधीही महाराष्ट्राचा अपमान केलेला नाही आणि कधी करणारही नाही. जर अनवधानाने असे झाले असेल आणि कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी आम्ही माफी मागतो. पण, या सर्व टिप्पणीपूर्वीच जया बच्चन यांनी माफी मागितली होती.
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान आहे. आम्हाला या देशाविषयी प्रेम आहे. आपल्या जन्मस्थानालाही आम्ही तेवढाच मान देतो. हेच प्रेम आणि असाच सन्मान आम्हाला आमच्या कार्यस्थळाबद्दलही आहे. मुंबई आणि महाराष्ट्राने आम्हाला ओळख दिली. आज मी ६६ वर्षांचा आहे आणि आपल्या वयाची ४० वर्षे मुंबईत घालविली आहेत. या शहराचा अपमान आम्ही करणे शक्यच नाही.
महाराष्ट्र आणि मराठी भाषेसोबत असलेला आपला संबंध सांगताना अमिताभ म्हणाले की, जयाने आपले शिक्षण पुण्यातील फिल्म इन्स्टिट्युटमध्ये पूर्ण केलेले आहे. तिला अस्खलित मराठी बोलता येते. आमच्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश महाराष्ट्रीयन आहेत. जयाचे काही खाजगी नोकर आहेत जे गेल्या ४० वर्षांपासून आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी ती मराठीत बोलते. खुद्द गेल्या ३५ वर्षांपासून माझा मेकअप करणारा दीपक सावंत महाराष्ट्रीयन आहे. मी आणि जयाने एका मराठी चित्रपटातही काम केले. त्यासाठी कोणतेही मानधन घेतले नाही.
"श्वास' हा मराठी चित्रपट ऑस्करसाठी पाठवायचा होता तेव्हा निर्मात्याला पैशाची चणचण होती. त्यावेळी मी स्वत: त्यांना ११ लाख रुपये दिले होते. एबी कॉर्प या माझ्या निर्मिती कंपनीचा एक मराठी प्रकल्पही जयाने सुरू केला आहे. माझे फॅमिली डॉक्टर महाराष्ट्रीय डॉ. बर्वे आहेत. त्यांच्या संमतीशिवाय माझ्या कुटुंबातील कोणीही कोणताही उपचारविषयक निर्णय घेत नाही.
महाराष्ट्रातील विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मांडके यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे लोखंडवाला येथे ४०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यांच्या पत्नीने विनंती केल्यानंतर मी आणि अनिल अंबानी यांनी पुढाकार घेतला. आता ते रुग्णालय पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. माझे पिता हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा सर्वप्रथम अनुवाद मराठी भाषेतच झाला. काही मराठी लेखकांनी हरिवंशराय बच्चन यांची आत्मकथा मराठीत आणण्याची परवानगी माझ्याकडे मागितली होती. मी कॉपीराईटच्या रकमेचा विचार न करता आनंदाने त्यांना संमती दिली.
याशिवाय, आपण कोणकोणत्या महाराष्ट्रीय संस्था, संघटनांना मदत केली याचाही उल्लेख अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर केला आहे. पण, या कार्याचा आपण कधीही प्रचार केला नाही. या सर्व कार्यातून आमचा मुंबई आणि महाराष्ट्राविषयीचा अनादर दिसतो का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. अगदी शेवटी मात्र त्यांनी जया बच्चन यांची बाजू सावरीत त्यांचे वक्तव्य मराठी विरोधी नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून सादर करण्यात आला आहे. आम्ही या देशाचे साधे सरळ नागरिक आहोत. आज आम्ही जर शिखरापर्यंत पोहोचलो आहोत याचाच अर्थ आम्ही जे करतोय, त्यात काहीही गैर नाही, असाच होतो, असेही अमिताभ बच्चन म्हणाले.

ब्रह्मांडाचे रहस्य शोधणारा महाप्रयोग सुरू

२७ किलोमीटर लांब बोगद्यात एलएचसी सक्रीय
जगबुडीचा धोका नसल्याचा शास्त्रज्ञांचा दिलासा

बर्न, दि. १० : मानवाच्या दृष्टीने या ब्रह्मांडाचे अस्तित्व कायमच एक गूढ राहिले आहे. प्रयोगशील मानवाने गेल्या अनेक वर्षांपासून या रहस्याचा शोध घेण्याचा निर्धार केला. पण, आजवर ते साध्य होत नव्हते. गेल्या अनेक वर्षांच्या साधनेनंतर आता जगभरातील सुमारे ८ हजार शास्त्रज्ञांनी ब्रह्यांडाचा शोध घेण्यासाठी एक नवा मार्ग शोधला असून त्या दृष्टीने हा महाप्रयोग आज सुरू झाला. स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवर जमिनीखाली १०० मीटरवर लेक जिनेव्हा आणि जुरा डोंगररांगांच्या मध्ये २७ किलोमीटर लांबीच्या महाकाय बोगद्यात लार्ज हायड्रॉन कोलायडर अर्थात एलएचसी हे उपकरण आज कार्यान्वित करण्यात आले. यामुळे ब्रह्मांडाचे रहस्य शोधण्याच्या शास्त्रीय प्रवासाला जगातील कोट्यवधी लोकांच्या साक्षीने सुरुवात झाली.
भारतासह जगभरातील सुमारे ८ हजारांहून अधिक शास्त्रज्ञ गेल्या २० वर्षांपासून हा महाप्रयोग सुरू होण्याची वाट पाहत होते. आजपर्यंत विज्ञान जगतात विश्वनिर्मितीचे अनेक सिद्धांत मांडण्यात आले. यापैकी १९२७ मध्ये बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ आणि रोमन कॅथॉलिक धर्मगुरू जॉर्जस लेमैत्री यांनी "बिग बॅंग थेअरी' अर्थात महास्फोट सिद्धांत मांडला. जॉर्ज गॅमोव्ह यांनी या सिद्धांताला पुढे अधिक विकसित रूप दिले. या सिद्धांताकडे अनेक संशोधकांचे लक्ष वेधले गेले. हा सिद्धांत तपासून पाहण्यासाठी आल्प्स पर्वतरांगांच्या पायथ्याशी जमिनीखाली जगातील सर्वात शक्तिशाली पार्टिकल एक्सीलरेटर उभारण्यात आला आहे. पार्टिकल एक्सीलरेटर म्हणजेच मूलकणांना गती देणारे यंत्र. या यंत्रासाठी युरोपीय ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लीयर रिसर्चने नऊ अब्ज डॉलर्स खर्ची घातले आहेत. शिवाय हजारो शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे श्रम या प्रयोगाच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहेत. आज या पार्टिकल एक्सीलरेटने गती घेतली तेव्हा महाप्रयोगाला सुरुवात झाली.
भारतीय वेळेनुसार दुपारी साडे बारा वाजता हा प्रयोग सुरू झाला. त्यावेळी कोट्यवधी लोकांनी कोलाईड यंत्र सुरू होताना पाहिले. काही विशेष झाले का, असेही परस्परांना विचारणे सुरू होते. पण, मोठ्या शास्त्रज्ञांनी कोणत्याही विपरीत परिणामांची शक्यता फेटाळल्याने लोक बरेच निश्ंिचत होते.
धोका नसल्याचा शास्त्रज्ञांचा निर्वाळा
या महाप्रयोगासाठी भूगर्भात खोलवर लार्ज हायड्रॉन कोलायडर यंत्र बसविण्यात आले. २७ किलोमीटर लांबीचा बोगदाही तयार करण्यात आला. या बोगद्याचे तोंड उघडण्यात आल्याबरोबर नाभिकीय कण प्रकाश वेगाने बाहेर पडतील. हे कण प्रोटॉनवर आदळविले जातील. यामुळे भूकंपापेक्षाही कितीतरी पटीने जास्त मोठे हादरे बसण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. पण, मुळात या प्रयोगामुळे असे कोणतेही हादरे बसणार नसून त्यातून जगबुडी होण्याची अजिबात भीती नाही, असे शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. जर अशा प्रयोगाने पृथ्वी बुडण्याची भीती असती तर शास्त्रज्ञांनी इतके परिश्रम करून हा प्रयोग हाती घेतलाच नसता, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बिहारातील पूरग्रस्तांसाठी भाजपचे निधी संकलन सुरू पहिल्याच दिवशी चार लाखांवर जमा

पणजी, दि. १० : भारतीय जनता पक्षाने काल जाहीर केल्याप्रमाणे आज (बुधवारी) बिहार पूरग्रस्तांसाठी निधी संकलनास सुरुवात केली. आज पहिल्याच दिवशी दीडशे साड्या, शर्ट, चादरी अशा वस्तू लोकांनी कार्यालयात आणून दिल्या. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आपले महिन्याचे वेतन ४५,५०० रु. तसेच अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी २६,५०० रुपये दिले. अन्य हितचिंतकांनी दिलेली मदत मिळून चार लाख रुपयांवर निधी गोळा करण्यात आला.
निधी गोळा करण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडण्यात आली. त्यात दयानंद सोपटे व विनय तेंडुलकर हे जिल्हाध्यक्ष, सदानंद तानावडे, सिद्धार्थ कुंकळकर व रुपेश महात्मे यांची समिती निवडण्यात आली.
उद्यापासून सर्व मतदारसंघात कार्यकर्ते निधी गोळा करण्यासाठी फिरणार आहेत, त्यांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन श्रीपाद नाईक व मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. एसबी-०१--२४००२ या क्रमांकावर कॉर्पोरेशन बॅंकेच्या कोणत्याही शाखेतील खात्यात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना आयकरात सुट हवी असेल, त्यांनी पर्वतकर यांच्याशी संपर्क साधावा, असे पत्रकात म्हटले आहे.

मनोरंजन संस्थेला यंदा 'इफ्फी'त झुकते माप

पणजी, दि. १०(प्रतिनिधी) : यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी ०८) आयोजनात गोवा मनोरंजन संस्थेला जादा प्रतिनिधित्व देण्यास केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.
आज येथील मॅकनिझ पॅलेस येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या दिल्ली दौऱ्यावेळी गेल्या सोमवार ८ सप्टेंबर रोजी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालिका नीलम कपूर, केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव, गोव्याचे मुख्य सचिव जे.पी. सिंग व गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव हजर होते. यावेळी झालेल्या चर्चेत एकूण तीन विभागांची जबाबदारी गोवा मनोरंजन संस्थेकडे देण्याबाबत अखेर एकमत झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
"इंडियन प्रीमियम',"कंट्री फोकस'व "रिट्रोस्पेक्टीव्ह' यांची जबाबदारी गोव्याकडे असेल. चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी व तिकिटांकरिता वापरण्यात येणारी "टेडाकॉल'सॉफ्टवेअर' यंदाही वापरण्यास मंजुरी मिळाली आहे. याप्रकरणी आवश्यक करारात गरजेनुसारबदल केल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांत "इफ्फी'संदर्भातील सामंजस्य करारावर सह्या होणार असल्याचे सांगण्यात आले.
या महोत्सवानिमित्ताने गोवा मनोरंजन संस्थेतर्फे "शॉर्ट फिल्म कॉर्नर' ही अनोखी स्पर्धा आयोजिली जाणार असून चित्रपट निर्मितीत गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन देणे हा त्यामागील हेतू आहे.

सांगे येथील 'ती' खाण कायदेशीरच : मुख्यमंत्री

पणजी,दि.१०(प्रतिनिधी): विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगे येथील खाणीबाबत उपस्थित केलेल्या मुद्यांचे आपण स्पष्टीकरण केले आहे. ही खाण पूर्णपणे कायदेशीर आहे. पर्रीकर यांनी विधानसभेत सादर केलेला केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाचा दाखला कायदेशीर असून याप्रकरणी अजिबात घोटाळा नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिला आहे.
पर्रीकर यांनी विधानसभेत सांगे येथील बेकायदा खाण उद्योगाबाबत एक प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात खुद्द खाण संचालक व खाणमंत्री सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, पर्रीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या दिलेल्या इशाऱ्याबाबत मुख्यमंत्री कामत यांना छेडले असता त्यांनी हे स्पष्टीकरण केले. याप्रकरणी चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आश्वासन आपण दिले होते; परंतु सदर खाण कायदेशीर असून संबंधितांनी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय तसेच राज्य सरकारच्या संबंधित खात्यांकडून आवश्यक दाखले मिळवले असून त्यात गैरप्रकार नसल्याचे ते म्हणाले. आपण दिलेले स्पष्टीकरण याप्रकरणाचा उलगडा करण्यास पुरे असल्याचे सांगून एवढे करूनही जर आरोप होत असेल तर त्याला काय करावे,असा प्रतिसवाल त्यांनी यावेळी केला. गोवा सरकारला येणे असलेल्या रॉयल्टीचा मुद्दाही आपण पर्रीकर यांना स्पष्ट केल्याचे सांगून तो आरोपही मुख्यमंत्री कामत यांनी फेटाळला. दरम्यान, पर्रीकर यांनी विधानसभेत केंद्रीय पर्यावरण व वन खात्याचा दाखला सादर करून त्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो खोटा असल्याचा दावा केला होता. तथापि, आपण मिळवलेल्या माहितीनुसार हा दाखला पूर्णपणे कायदेशीर असल्याचे ते म्हणाले. या दाखल्यावर सर्व्हे क्रमांक नाहीत; तसेच हा दाखला संकेतस्थळावरही टाकण्यात आला नाही,याबाबत खुलासा करण्यात मात्र ते अपयशी ठरले.
खाण सुरू करण्यासाठी केंद्रीय तथा राज्य सरकारच्या अनेक खात्यांचे परवाने पाहिजे असताना त्यामुळे सहजा बेकायदा खाण चालवणे सहज शक्य नसल्याचेही कामत म्हणाले.
व्यवसायाची निवड ही प्रत्येकाचा अधिकार
कुणी कोणता व्यवसाय करावा याबाबत दुसऱ्याला सांगण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. विद्यमान कॉंग्रेस पक्षातील नेते खाण उद्योगात आहेत, याबाबत आपण बोलणे गैर असून कुणी कोणता व्यवसाय करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी आपल्याला न विचारता या नेत्यांनाच विचारलेले बरे,असे सांगून त्यांनी हा मुद्दा निकालात काढला.

गोव्याला विशेष दर्जा देण्याचा मुद्दा: मुख्य सचिवांना अहवाल तयार करण्याचे आदेश

पणजी,दि.१०(प्रतिनिधी) : गोव्याला विशेष दर्जा का मिळायला हवा, याबाबत निश्चित स्वरूपाचा अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्य सचिव जे.पी.सिंग यांना देण्यात आले आहेत. दिल्लीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेल्यानंतर या संपूर्ण अहवालाचे सादरीकरण पंतप्रधानासमोर केले जाईल व या दर्जाची पात्रता सिद्ध केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.
प्रामुख्याने विदेशींना गोव्यात जमिनी खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी गेल्या विधानसभा अधिवेशनात गोव्याला विशेष दर्जा देण्याबाबत भाजपचे उपनेते व म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा व कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मांडलेला संयुक्त ठराव एकमताने संमत केला होता. हा ठराव मंजूर केल्यानंतर आता ही मागणी धसास लावण्यासाठी सरकारने काय केले आहे, असा सवाल केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
राज्याला विशेष दर्जा मिळावा ही मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु हा दर्जा कशा पद्धतीचा हवा व तो राज्याला का मिळायला हवा आदी मुद्दे केंद्राला पटवून देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे उगाच घाई न करता पूर्ण अभ्यास करूनच हा विषय हाताळला जाईल,असेही त्यांनी सांगितले.

२३५ रिलायन्स बिग टीव्ही मडगावातील छाप्यात जप्त, वजन व माप खात्याची धडक कारवाई

मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): वजन व माप खात्याच्या येथील अधिकाऱ्यांनी आज मडगावात दोन ठिकाणी छापे घालन २३५ रिलायन्स बिग टीव्ही जप्त केले. कमाल किरकोळ किंमत व उत्पादन तारखेचा उल्लेख नसणे तसेच व्हॅट न भरणे या कारणांखाली ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मडगाव प्रमाणेच वास्को येथेही काल दोन ठिकाणी अशीच कारवाई करण्यात आली. तथापि तेथे असे किती नग जप्त झाले हे कळू शकले नाही. मडगावात विनवेल कॉर्पोरेशन व दामोदर इलेक्ट्रिकल्स यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलाला मुकावे लागल्याचे सांगण्यात येते.
वजन व माप खात्याचे संचालक किरण कोसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरुण पंचवाडकर व प्रसाद शिरोडकर यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, याच पथकाने बोर्डा मडगाव येथील जी हार्डवेअरची तपासणी करून तेथे उत्पादनाची तारीख व अन्य निर्देश नसलेला सुमारे लाखभराचा माल जप्त केला . त्यातील बहुतेक वस्तू स्वयंपाकघरात वापरण्याचे साहित्य होते, असे सांगण्यात आले.

Tuesday 9 September, 2008

सांगे बेकायदा खाणींबाबत मुख्यमंत्र्यांकडून धूळफेक: पर्रीकर यांची घणाघाती टीका

पणजी,दि.९ (प्रतिनिधी): सांगे येथील बेकायदा खाणींबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेले स्पष्टीकरण ही निव्वळ धूळफेक आहे. या महाघोटाळ्यात खाण खात्याचे संचालक जे.बी.भिंगी हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित असून या प्रकरणाला अभय देणारे मुख्यमंत्री व खाणमंत्री या नात्याने कामतही तेवढेच जबाबदार आहेत. या घोटाळ्यावर कारवाई न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा विरोक्षी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज दिला.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक व सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. सांगे येथील इमिलिया फ्रिग्रेदो यांच्या मालकीची खाण इम्रान खान नामक एका व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे प्रकरण विधानसभेत उघड केल्यानंतर मुख्यमंत्री कामत यांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी वाच्यता न करता अहवालरूपी दोन कागदाचे तुकडे विधानसभा पटलावर ठेवले. हा अहवाल प्रत्यक्षात पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी निव्वळ धूळफेक असल्याची टीका पर्रीकर यांनी केली. मुळात या घोटाळ्यात सामील असलेल्या लोकांकडूनच हे स्पष्टीकरण तयार करण्यात आल्याची टीका करून या घोटाळ्यास खाण संचालक श्री.भिंगी व मुख्यमंत्री कामत हे भागीदार ठरत असल्याने त्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा सनसनाटी आरोपही पर्रीकर यांनी केला. याप्रकरणी जर येत्या दिवसांत सरकारने काहीही कारवाई केली नाही तर सर्वोच्च न्यायालयात या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे सादर केली जातील,असा इशाराही त्यांनी दिला. खाण उद्योगाकडून सरकारी तिजोरीत जमा होणाऱ्या "रॉयल्टी'त ही मोठ्याप्रमाणात तफावत असल्याचे ते म्हणाले. सरकारला "रॉयल्टी' च्या रूपात येणारे सुमारे २५ ते ३० कोटी रूपये नुकसान झाल्याचा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला.
सर्व कागदोपत्री पुरावे सादर करूनही जेव्हा खाणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री कामत याबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याने त्यांच्याभोवती संशयाचे वलय निर्माण होणे स्वाभाविक आहे,असेही पर्रीकर म्हणाले. त्यांनी या बेकायदा गोष्टींवर प्रत्यक्ष कृती करूनच आपल्यावरील या संशयाचे वावटळ दूर करावे,असेही ते म्हणाले.
----------------------------------------------------------
बेकायदा खाण उद्योगात किमान दहा कॉंग्रेस नेते
विद्यमान कॉंग्रेस पक्षातील किमान दहा नेते बेकायदा खाण उद्योगात सहभागी असल्याचा सनसनाटी आरोप पर्रीकर यांनी केला.राज्यात कायदेशीर खाण उद्योग हा केवळ एक छोटा अंश आहे व त्याला हरकत घेण्याचे कारण नाही परंतु बेकायदा खाण उद्योगाला उधाणच आले असून त्यात प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाचे नेतेच सहभागी असल्याने सरकारकडून कारवाईची अपेक्षा काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बिहारच्या पुरग्रस्तांसाठी भाजपतर्फे निधी संकलन

१४ पासून पैसे, कपडे गोळा करणार
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): बिहार राज्यावर महाप्रलंयकारी पुराचा कहर ओढवल्यामुळे लाखो लोक बेघर झाले असून त्यांना मदत करणे हे आपणा सर्व देशवासीयांचे आद्य कर्तव्य ठरते. भारतीय जनता पक्षातर्फे राष्ट्रीय पातळीवर "बिहार पूरग्रस्त सहाय्यता निधी' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोव्यात येत्या १४ ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्वत्र फिरून पक्षाचे कार्यकर्ते पैसे, धनादेश, कपडे आदी मदत जमा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली.
आज पणजी येथे भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. बिहार राज्यातील कोसी नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे आठशे गाव कायमस्वरूपी उद्वस्त झाले आहेत. सुमारे पन्नास लाख लोक बेघर झाले असून त्यांचा संसारच पाण्यात वाहून गेला आहे. या लोकांचे पुनर्वसन करणे हे केंद्र सरकारसमोरील मोठे आव्हान असून लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे श्री.नाईक म्हणाले. या संकटाची व्याप्ती पाहिल्यानंतर केंद्र सरकारनेही ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे.
भाजपच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांना एका दिवसाचा पगार देण्याची यापूर्वी विनंती केली आहेच परंतु या संकटाची दाहकता पाहिल्यानंतर सर्व आमदारांनी आपला एका महिन्याचा पगार या निधीसाठी दान करावा, असे आवाहन श्री.नाईक यांनी केले. खासदार या नात्याने सरकारकडून मिळणारे एका महिन्याचे मानधन या निधीसाठी देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही आपल्या एका महिन्याचे सर्व मानधन या निधीत जमा करणार असल्याचे जाहीर केले. १४ सप्टेंबरपासून राज्यव्यापी मदत निधी गोळा मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत पक्षाचे कार्यकर्ते गावोगावी फिरून पैसे,धनादेश व वापरण्यालायक असलेले कपडे गोळा करतील,असे सांगून लोकांनी सढळहस्ते मदत करावी,असे आवाहनही श्री.नाईक यांनी केले. राज्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी बोलणी करून त्यांच्याकडूनही जर या लोकांना काही मदत मिळवता येईल, याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे खासदार नाईक म्हणाले. देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी गोमंतकीयांनी आपल्या दानशूरपणाची ओळख दाखवलेली आहे, यावेळीही त्यात कसूर राहणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.काही देणगीदारांना आयकर सूट हवी असेल तर त्याची सोयही केली जाणार असल्याचे स्पष्ट करून येत्या दोन दिवसांत बॅंक खाते उघडून ते जाहीर केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबद्दल उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): बेकायदा बांधकाम पाडण्याच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पंचायत उपसंचालिका संध्या कामत यांना बरेच फैलावर घेतले. या आदेशाचे पालन झाले नसल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशाराही यावेळी न्यायमूर्तीनी दिला. त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकारी न्यायालयाला खरी माहिती देत नाहीत, तसेच ते दक्षही नसतात. या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केल्यानंतरच त्यांच्याकडून पुढील कारवाई होते,असे अनेक खटल्यात सिद्ध झाल्याचे म्हणून यावेळी सरकारी अधिकाऱ्यावर न्यायालयाने कडक ताशेरे ओढले.
कुठ्ठाळीच्या सरपंचांनी केलेल्या घराचे बांधकाम बेकायदा असल्याने ते मोडून टाकावे,अशी मागणी करणारी तक्रार बायरोन झेव्हियर यांनी पंचायतीकडे केली होती. त्यावेळी पंचायत मंडळाने सदर बांधकाम कायदेशीर करण्यासाठी ठराव घेतला. परंतु, सदर बांधकाम कायदेशीर होऊ शकत नसल्याने तो ठराव नगर नियोजन खात्याने फेटाळून लावला. तरीही पंचायतीने बांधकामावर कोणतीही कारवाई केली नसल्याने अखेर श्री. झेव्हीयर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावेळी पंचायत कारवाई करीत नसल्याने न्यायालयाने या प्रकरणात पंचायत संचालकांना लक्ष घालण्याचा आदेश दिला. यावेळी सदर बांधकाम बेकायदेशीर ठरवून पंधरा दिवसांच्या आत मोडून टाकण्याचा आदेश दिला होता. तसेच सदर प्रकरण कारवाईसाठी उपसंचालिका संध्या कामत यांच्याकडे सोपवले होते.
परंतु, यावर कारवाई झाली नाही, आणि कारवाई करण्यासाठी जास्त मुदतही न्यायालयाकडे मागण्यात आली नाही. गेल्यावेळी सदर प्रकरण सुनावणीसाठी आले असता, ती फाईल नजरेआड झाल्याने कारवाई करता आली नसल्याचे कारण यावेळी न्यायालयाला देण्यात आले. हे कारण फेटाळून संबंधित उपसंचालिकेला न्यायालयात हजर करण्याचा यावेळी आदेश देण्यात आला होता. आज या उपसंचालिका न्यायालयात हजर झाल्या असता, त्यांना या आदेशाचे पालन करण्यास शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्याप्रमाणे येत्या पंधरा दिवसांत त्याचा संपूर्ण अहवाल सादर करण्याच आदेश देण्यात आला आहे.

कुंभारजुवा सांगडोत्सव उत्साहात साजरा

माशेल, दि. ९(प्रतिनिधी): कुंभारजुवे येथील पारंपरिक सांगोड उत्सव आज साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या पौराणिक सांगोड देखावा स्पर्धेतील प्रथम पारितोषिक लंकाधिशाचे स्वर्ग अभियान(पॅट्रीक ग्रुप),द्वितीय हिरण्यकशिपूची स्वर्गावर स्वारी(शांतादुर्गा युवा संघ), तृतीय गजमुखी गणराज(गणेश फुडस), तर उत्तेजनार्थ बक्षिसे संत गोरा कुंभार(सरस्वती कला मंडळ) व स्वर्गलोक(यंग स्टार) या देखाव्यांना देण्यात आली.स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रवीण नाईक व कन्हैया नाईक यांनी काम पाहिले.
श्रीशांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानात सात दिवसांचा श्रीगणेशोत्सव साजरा केला जातो. तारीवाडा-माशेल येथे विसर्जनासाठी श्रीची मूर्ती आल्यावर कुंभारजुवे येथील श्रीराम देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सजविलेल्या होडीच्या सांगडातून नेली जाते. आज हा उत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

सर्व मागण्या मार्गी लावणार: मोन्सेरात

शिक्षकांवर घोषणांचा पाऊस
पणजी, दि.९ (प्रतिनिधी): शिक्षकी पेशात २४ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकांना सिलेक्शन श्रेणी लागू करणे, उच्च माध्यमिक विद्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यावसायिक विभागातील शिक्षकांना कायम करणे, शालेय स्तरावर तात्पुरत्या पद्धतीने काम करणाऱ्या संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घेणे व तत्पूर्वी त्यांच्या मानधनात त्वरित वाढ करणे, शिक्षकांना लॅपटॉप अशा घोषणांची खैरात आज शिक्षणमंत्री आतानासियो मोन्सेरात यांनी ४७ व्या शिक्षक दिनानिमित्त कला अकादमीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात केली.
राज्यातील शासकीय व बिगर शासकीय शाळांतील वेतन, अभ्यासक्रमातील तफावती व इतर गैरव्यवहार या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर त्या योग्य रुळावर आणण्याच्या दृष्टीने शैक्षणिक आयोग स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. कला अकादमीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शिक्षण सचिव उद्दिप्त रे व शिक्षण संचालक सेल्सा पिंटो तसेच राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षक हा जीवनाला वळण देणारा महत्त्वाचा घटक असतो.आज ज्या शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे त्यांचे आभार मानताना त्यांनी सज्ञान,भावी पिढी निर्माण करण्यासाठी दिलेले योगदान खरेच अनमोल असल्याचे श्री. मोन्सेरात पुढे म्हणाले.
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आदर्श असतो, शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व जीवन म्हणजेच एक शिक्षण आहे व केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन केवळ ज्ञानी बनत नसून अनुभवाने मनुष्य शहाणा बनतो. शाळा ही केवळ चार भिंती पुरती मर्यादित न राहता ती ज्ञानाचे खुले दार असले पाहिजे व शिक्षक हा ताणमुक्त व आनंदीत असला पाहिजे या बाबी शिक्षणमंत्री बनल्यानंतर विविध शिक्षण तज्ज्ञांसोबत झालेल्या चर्चेनंतर माझ्या लक्षात आल्या असून शिक्षकांची सर्व गाऱ्हाणी व मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी कार्यरत राहणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
राज्यात शिक्षण सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचविणे, माहिती तंत्रज्ञानाद्वारे ज्ञान मिळविण्यास प्राधान्यक्रम, तिसरी इयत्तेपासून संगणक साक्षरता, ज्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण कठीण जाते अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्यात व्यावसायिक कोर्स सुरू करणे तसेच विकलांग व खास विद्यार्थ्यांसाठी खास योजना आखणे ही आपली दूरदृष्टी असल्याचे श्री. मोन्सेरात यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी प्राथमिक विभागातील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीमती इंद्रसेना शिरोडकर (स.प्रा.वि. मडकईवाडा पिळर्ण बार्देश), श्रीमती जयश्री जे.कामत( स.प्रा.वि. बोर्डा, मडगाव), माध्यमिक विभागात शेख नरुद्दीन ए. शेख(साहाय्यक शिक्षक सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे सत्तरी), व एलीयास रॉड्रीग्स(मुख्याध्यापक, सेंट रिटा उच्च माध्यमिक विद्यालय ,मायणा कुडतरी),व श्री. सदानंद हिंदे (श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय,पर्ये सत्तरी) यांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गेल्या वर्षी शिक्षक दिनानिमित्त सर्वांत जास्त निधी जमविल्याबद्दल डिचोली, सासष्टी व मुरगाव तालुका भागशिक्षणाधिकारी कार्यालयास शिक्षण सचिवांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षण सचिव उद्दिप्त रे यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात डी.आय.ई.टी.च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थना व स्वागत गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिक्षण संचालक सेल्सा पिंटो यांनी स्वागत केले. साहाय्यक संचालक के. के. नाडकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुशीला देसाई यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------------------------
'मी त्यापैकी नव्हे'
शिक्षणमंत्री श्री.आतानासियो मोन्सेरात यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात बोलताना माजी शिक्षणमंत्र्यांवर तोंडसुख घेतले व उपस्थित शिक्षक वर्गाकडून जोरदार टाळ्या मिळविल्या. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षकांच्या बऱ्याच मागण्या व गाऱ्हाणी गेल्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याचे सांगताना अनेक शिक्षणमंत्री झाले व त्यांनी फक्त आश्वासनेच दिली पण ते मागण्या व गाऱ्हाणी मान्य करण्यास कुचकामी ठरल्याचे सांगितले. या यादीत मला समाविष्ट करू नका, मी या मागण्या मान्य करण्यासाठी बांधील असल्याचे त्यांनी सांगितल्यावर उपस्थितांकडून टाळ्यांच्या गडगडाटात त्यांच्या विधानाचे स्वागत झाले.

Monday 8 September, 2008

प्रदूषणकारी उद्योगाला विरोधासाठी कालेवासीय आक्रमक, ७० अटकेत, बेकायदा पूल बांधल्याचा आंदोलकांचा आरोप

काले, दि.८ (प्रतिनिधी) : सांतोण देवनामळ काले येथील प्रदूषणकारी जैन उद्योग प्रकल्पाच्या विरोधात कालेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनात ७० जणांना अटक करण्यात आली. उपजिल्हाधिकारी वेनिसिओ फुर्तादो यांच्या आदेशानुसार पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मातीच्या खाजगी रस्त्यावरील ओहोळात सिमेंटचा पूल बांधण्यात आला. यावेळी सुमारे ३०० लोकांचा जमाव जमला होता.
अटक केलेल्यांना संध्याकाळी उशिरा सोडण्यात आले. अटक केलेल्यांत मुलांसोबत ७५ वर्षांच्या वृद्धांचाही समावेश होता. यावेळी सरकारी यंत्रणा व अधिकारी मोठ्या कंपनीच्या दबावाखाली वावरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जैन उद्योग प्रकल्पाच्या विरोधात सुमारे चार वर्षापासून ग्रामस्थांचा खटला चालू असून प्रकल्पाच्या प्रदूषणातून कालेवासीयांना फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी केली आहे. कालेतील नार्वेकर खाण कंपनीतून जाणाऱ्या एका मातीच्या रस्त्यावरून जाण्यासाठी काही वर्षापूर्वी येथील लोकांनी सिमेंटचे पाईप टाकून रस्ता निर्माण केला होता. पण सदर प्रकल्पाकडून हा रस्ता अवजड मालवाहतुकीसाठी वापरण्यात येऊ लागला. गेल्या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने पाईप वाहून गेले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडून सिमेंटचे पाईप टाकण्याचा प्रयत्न पोलिस बंदोबस्तात करण्यात आला होता. तो फसल्याने आज केप्याचे उपजिल्हाधिकारी फुर्तादो यांच्या मार्गदर्शनाखाली सांग्याचे मामलेदार पराग नगर्सेकर, पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई, कुडचड्याचे नीलेश राणे, संतोष देसाई, रोहिदास पत्रे सीआरपी जवानांच्या तुकड्या, सा. बां. खात्याचे अधिकारी सालेलकर, व जल्मी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ग्रामस्थांना यावेळी वाहनात कोंडण्यात आले. अनेकांना यामुळे इजाही झाली. सरपंच संतोष गावकर व इतरांनी दुपारी आमदार अनिल साळगावकर येणार असून कोणालाही तोवर अटक करू नये अशी मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करत ही कारवाई करण्यात आली. यानंतर या खाजगी रस्त्यावर पूल बांधण्यात आला. उपजिल्हाधिकारी फुर्तादो यांनी सांगितले की, हा पूल २४ तासांत बांधण्याचा सरकारला अधिकार असल्याने हा पूल बांधण्यात आला. याबाबत सा. बां. खात्याच्या अधिकाऱ्यांनी मात्र काहीही सांगण्यास विरोध केला. कार्यालयात याबाबत सरकारी लेखी आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सरकार ग्रामस्थांच्या विरोधात व कंपन्यांच्या आदेशानुसार वागत असल्याचे सांगितले.
आज सरकारी अधिकारी येणार असल्याचे कळताच सरपंच गावकर यांच्यासह सुमारे ३०० नागरिक विरोधासाठी जमले होते. सावर्डे काले येथील आंबेउदक ते देवनामळ पर्यंतचा मुख्य रस्ता खाण कंपनीकडे येत असल्याने मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे गावकर यांनी सांगितले. जनतेच्या विरोधात रस्ता करणे योग्य नसल्याचे गावकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही ओहोळात ठाण मांडून बसलेल्या ग्रामस्थांना अटक करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. अटक केलेल्यांना पोलिस स्थानकावर ठेवण्यात आले. सरपंच गावकर यांच्यासह इतरांनी पोलिस स्थानक गाठले. आमदार साळगावकर यांच्या वकिलांच्या साहाय्याने त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान घरातील सर्वांना अटक केल्यामुले येथील दोन घरात आज गणपतीची आरती झालीच नाही. सदर घरात सात दिवस व नऊ दिवस गणपती आहे.
याच भागातील कुड्डेगाळ फोमेंतो खाण कंपनीच्या गणेशोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत उपस्थित राहणार होते. पण येथील वातावरण तंग बनल्याने त्यांनी या कार्यक्रमाला गैरहजर राहणे पसंत केले.
या घडलेल्या प्रकाराने काले भागात वातावरण तंग बनले आहे. सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. सदर प्रकल्प बंद केल्याशिवाय जनता गप्प बसणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पॅरोलवरील कैदी मोकळेच, अनेक बेपत्ता! तुरुंग महानिरीक्षकांना न्यायालयात पाचारण

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : तुरुंगातून "पॅरोल'वर बाहेर गेलेले आणि त्यानंतर फरार झालेले कैदी विमानाचे तिकीट काढून गोव्यात येऊन तुम्हाला शरण येतील अशी अपेक्षा आहे का, असा प्रश्न करून या फरार कैद्यांना शोधण्यासाठी गेलेले पोलिस पथक सध्या कोणत्या राज्यात आहेत याची उद्या दि. ९ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण माहिती देण्याचा आदेश आज मुंबई न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिली. याची माहिती उद्या सकाळपर्यंत न मिळाल्यास त्याचे गंभीर परिणाम तुरुंग महानिरीक्षकांना भोगावे लागणार असल्याचे सांगत तुरुंग महानिरीक्षकांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे न्यायमूर्तींनी तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले.
पॅरोलवर सोडण्यात आलेल्या कैद्यांचा शोध घेण्यासाठी काय-काय करण्यात आले, याचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश यापूर्वी न्यायालयाने दिला होता. त्यानुसार याविषयाची अहवाल सादर करण्यात आला. पॅरोलवर गेलेले तेरा कैदी सध्या फरार असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. एक कैदी श्रीनगर येथील मनोविकार उपचार इस्पितळात उपचार घेत आहे, तर एकाने देश सोडल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तुम्हाला ही माहिती उपलब्ध असताना इस्पितळात दाखल असलेल्या कैद्याला अद्याप कशाला ताब्यात घेण्यात आले नाही, असा प्रश्न करून तो कोणत्या इस्पितळात आणि कशा प्रकारचा उपचार घेत आहे, याचा तपशील न्यायालयात सादर करण्याचाही आदेश यावेळी देण्यात आला. त्याचप्रमाणे जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला कैदी देश सोडून जात असल्याने "इमिग्रेशन' विभागाने त्याला देश सोडायला ""क्लिनचीट'' कशी दिली, असे यावेळी न्यायमूर्तींनी सरकारी वकिलांना विचारले.
पॅरोल सोडलेल्यांच्या शोधासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दर आठवड्याला देण्यात यावी, असे तुरुंग प्रशासनाला न्यायालयाने सांगितले आहे. फरार असलेले हे आरोपी अमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोषी ठरलेले असून सध्या ते समाजात मुक्त फिरत आहे. या आरोपींना पॅरोलवर सोडण्यासाठी एक व्यक्तीला हमीदार म्हणून ठेवले जाते. एखादा कैदी तुरुंगात परत आला नसल्यास त्या हमीदाराला एक लाखापर्यंत दंड आहे. परंतु आत्तापर्यंत अशा प्रकारची कोणत्याच हमीदारावर कारवाई केलेली नसल्याने येणाऱ्या काळात ही कारवाई केली जाणार असल्याचे असल्याचे यावेळी सरकारी वकिली विनी कुतिन्हो यांनी न्यायालयाला सांगितले. गेल्या २००३-०७ या कालावधीत पॅरोलवर सोडलेले आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

'सेझ'प्रकरणी सर्व याचिकांवर १३ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व "सेझ' प्रकल्पावरील याचिका एकत्रित सुनावणीसाठी घेण्यात आल्या. येत्या १३ ऑक्टोबर रोजी या याचिकांवर अंतिम सुनावणी होईल, असे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्पष्ट केले. "सेझ' कंपन्यांनी "काम बंद' नोटिशीला आव्हान देण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिकांवर आज सुनावणी झाली. येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत सरकारला व सर्व प्रकल्प व्यवस्थापनांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोणालाही मुदत दिली जाणार नसल्याचे यावेळी न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. "सेझ' प्रकल्प विरोधी मंचाच्या लोकांनी आज या सुनावणीला न्यायालयात गर्दी केली होती.
"सेझ' प्रकल्प रद्द झाले असले तरी, या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी याचिकादारांंनी केली आहे. सरकारने "सेझ' प्रकल्पांच्या "काम बंद' आदेशावरील बंदी उठवली आहे. तसेच याबाबत अंतिम निकाल होईपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश न्यायालयाने औद्योगिक विकास महामंडळाला दिला असल्याचे उघड झाले आहे.
"सेझ' प्रकल्पांसाठी सरकारने औद्योगिक विकास महामंडळामार्फत गोव्यात ३५ लाख चौरस मीटर अल्प दरात आणि नियमबाह्य पद्धतीने भूखंड विक्री केल्याचा आरोप करून याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यानुसार के. रहेजा कॉर्पोरेट, पेराडिगम लॉजिस्टीक आणि डिस्ट्रिब्युशन प्रा.लि, आयनॉक्स मर्कंटाईल कंपनी लिमिटेड, प्लॅनेट व्ह्यू मर्कंटाईल प्रा.ली व मॅक्सग्रो फिलीस प्रा.लि यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पाच उत्कृष्ट शिक्षकांचा आज सत्कार

डॉ. सदानंद हिंदे एलियस रोड्रिग्ज शेख नरुद्दीन सौ.जयश्री कामत इंद्रसेना शिरोडकर
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : गोवा सरकारतर्फे उद्या ९ रोजी शिक्षकदिन साजरा केला जाणार आहे. कला अकादमीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील. या सोहळ्यात यंदाच्या उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
शिक्षण खात्याच्या संचालिका सेल्सा पिंटो यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळे हा कार्यक्रम उद्या आयोजित केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून उत्कृष्ट शिक्षकांची राज्य सरकारतर्फे निवड केली जाते व त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा उत्कृष्ट पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या शिक्षकांत प्राथमिक विभागात- श्रीमती इंद्रसेना शिरोडकर (सरकारी प्राथमिक शाळा, मडकईवाडा-पिळर्ण बार्देश-गोवा) व श्रीमती जयश्री जे.कामत (सरकारी प्राथमिक शाळा, बोर्डा, मडगाव) माध्यमिक विभागांत- शेख नरूद्दीन ए. शेख (साहाय्यक शिक्षक,सरकारी उच्च माध्यमिक,सावर्डे-सत्तरी) व एलीयास रॉड्रिगीस (मुख्याध्यापक, सेंट रिटा उच्च माध्यमिक,मायणा- कुडतरी) उच्च माध्यमिक विभागांत- डॉ.सदानंद शिवनाथ हिंदे (श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय,पर्ये-सत्तरी) यांना प्राप्त झाले आहे.
शिक्षकदिनानिमित्त सर्वांत जास्त देणगी मिळवल्याबद्दल डिचोली(प्रथम),सासष्टी(द्वितीय) व मुरगाव(तृतीय) आदी तालुका भागशिक्षणाधिकाऱ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सिंगूरप्रश्नी तोडगा स्पष्ट नाही : टाटा

कोलकाता, दि. ८ : सिंगूर प्रकरणी रविवारी निघालेल्या तोडग्यात बरीच अस्पष्टता आहे. त्यामुळे कंपनीतील काम सध्यातरी बंदच ठेवण्याचा निर्णय आज टाटा व्यवस्थापनातर्फे घेण्यात आला.
गेले काही दिवस सिंगूरमधील टाटांच्या नॅनो प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर रविवारी तोडगा निघाला. तरीही सोमवारी सकाळी कंपनीत काम करणारा कोणताही कर्मचारी किंवा कंत्राटदार कामावर परतलेला नव्हता. त्यामुळे तोडग्यानंतरही आज कंपनीत शुकशुकाटच होता. दरम्यान, दुर्गापूर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी पूर्ववत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू होती. पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्या पुढाकाराने चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर रविवारी जमिनीच्या बदल्यात जमीन या मुद्यावर या प्रकल्पाबाबत तोडगा निघाला.

Sunday 7 September, 2008

पैंगीण येथे अपघातात गावडोंगरीचे दोन युवक ठार

काणकोण, दि. ७ (प्रतिनिधी) - गावडोंगरी येथील दोन युवक आज सकाळी पैंगीण येथे झालेल्या एका अपघातात जागीच ठार झाले.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार तुडल येथील अनिल फळदेसाई व नाणे येथील जानू गांवकर आज सकाळी दहाच्या सुमारास गावडोंगरी येथून मोटारसायकल (क्र. जीए-०२, ४८४५) वरून लोलये येथे जात होते. वेलवाडा पैंगीण येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरले व ते वाहन पसार झाले. मागाहून येणाऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या त्या युवकांना काणकोणच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. पण तत्पूर्वीच ते मरण पावले होते.
अपघाताचे वृत्त पसरताच काणकोण तालुक्यातील शेकडो नागरिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यात काणकोणचे आमदार विजय पै खोत, पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस, गांवडोंगरीचे माजी सरपंच धिल्लन देसाई, माजी सरपंच जनार्दन भंडारी, देवेंद्र काशिनाथ नाईक व अन्य उपस्थित होते.
काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अनिल फळदेसाई यांच्या तोंडाचा चेंदामेंदा झाल्यामुळे त्याची त्वरीत ओळख पटणे अडचणीचे झाले.
नाणे येथील जानू गांवकर हा दोन वर्षांपूर्वी पंचायत सचिव म्हणून कामाला लागला होता. गावडोंगरी पंचायतीत सध्या तो कामाला होता. पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न भगत व तेरोन डिकॉस्ता यांनी मृतदेहाचा पंचनामा केला व दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठविले.
पोलिसांनी फरारी वाहनांची शोध घेण्यासाठी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यावर अपघाताची माहिती वायरलेसद्वारे कळविली आहे.
आज सकाळपासून सुरु झालेल्या पावसात भिजतच ते दोघे युवक लोलये येथे जात असताना एखाद्या अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक देऊन ते पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काणकोणचे पोलिस निरीक्षक सुरज हळर्णकर यांनी दुपारी मोखर्ड-भाटपाल येथे रस्त्याच्या बाजूला उभा असलेला पेट्रोलवाहू टॅंकर क्रमांक एमएच०४, केए ७७२८ ताब्यात घेतला असून, त्याचा अपघाताशी संबंध आहे का, याची चौकशी सुरु केली आहे.
पोळे चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करण्यासाठी बसविण्यात आलेले "व्हिडिओ कॅमेरे' नादुरुस्त असल्याची टीका माजीमंत्री इजिदोर फर्नांडिस यांनी केली आहे.
गावडोंगरी येथे सात दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवावर या अपघाताचा परिणाम झाला आहे. संपूर्ण पंचायत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. संध्याकाळी उशिरा दोघा दुर्दैवी तरुणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री गावडोंगरी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

सिंगूरप्रश्नी अखेर तोडगा

कोलकाता, दि. ७- पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या पुढाकाराने आज झालेल्या बैठकीत राज्य सरकार व तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यात वादग्रस्त सिंगूर प्रकरणी तोडगा काढण्यात आल्याने टाटा कंपनीचा नॅनो प्रकल्प अन्यत्र हलविला जाणार नाही,अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आजची बैठक राजभवनावर दोन तास चालली आणि त्यात सर्वमान्य असा तोडगा काढण्यात आला, असे सांगण्यात आले.
आज निघालेल्या तोडग्यानुसार शेतकऱ्यांना पर्यायी जमीन दिली जाणार आहे याबाबत खास समिती ती निर्णय घेईल. सिंगूरमध्ये नॅनो प्रकल्पासाठी १५ अब्ज रुपयांच्या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर प्रथमच दोन नेत्यांनी एकत्रितपणे या विषयावर आज चर्चा केली. गेले काही दिवस टाटा कंपनीच्या छोट्या गाड्यांच्या निर्मिती प्रकल्पाबाबत वादाने शिखर गाठल्याने स्वतः रतन टाटांनी आपली नाराजी व्यक्त करीत आपला प्रकल्प अन्यत्र हलविण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे हे वृत्त आंतरराष्ट्रीय स्तरावरही झळकले. श्रीलंका सरकारने आपल्या देशात हा प्रकल्प सुरु करण्यासाठी टाटांना आमंत्रित केले.
नवी दिल्ली येथे बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी हा प्रकल्प पश्चिम बंगालमध्येच राहावा अशी पक्षाची इच्छा असल्याचे जाहीर निवेदन आज केले. सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची आज कोलकाता येथे बैठकीत मुख्यमंत्री भट्टाचार्य यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले होते.

अणुकराराविरुद्धची लढाई संपलेली नाही : माकपा

नवी दिल्ली, दि. ७ - एनएसजीकडून सवलती मिळविण्याचा प्रकार आणखी एक शरणागती पत्करण्यासारखा असून, माकपाचा भारत-अमेरिका अणुकराराविरोधातील लढा संपलेला नाही. देशात आता १२३ करार रद्द करणारे सरकार स्थापित करणे, ही आमची प्राथमिकता राहणार आहे, असे प्रतिपादन पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांनी म्हटले आहे.
आमची लढाई व्हिएन्ना किंवा अमेरिकेत नाही, तर ती येथे आहे. आम्ही सरकारचा पाठिंबा यापूर्वी काढून घेतलेला आहे आणि आता सत्तारुढ आघाडीसोबत आम्ही लढत आहोत. आता सर्वसाधारण निवडणुकीनंतर १२३ करार रद्द करणारे सरकार केंद्रात स्थापन होईल, हे आमचे ध्येय राहणार आहे. हा करार अंमलात आणण्यापूर्वी निवडणुकीला सामोरे जावे, असे आम्ही कॉंग्रेस पक्षाला सांगितले होते. पण, या सरकारने स्वत:हूनच अणुचाचणीवर बंदी टाकली. भारताला या करारातून काहीही चांगले हाती लागणार नाही, हेही तितकेच खरे आहे, असे ते म्हणाले.
एनएसजीकडून ज्या काही सवलती मिळाल्या आहेत, त्या स्वच्छ वा विनाअट नाहीत, ज्या सवलती भारताला मिळालेल्या आहेत, त्या अमेरिकेचेच नियंत्रण असलेल्या गटाकडून मिळालेल्या आहेत. भारताने अमेरिकेच्या लष्कराशी सहकार्य वाढविण्याचे सुद्धा आश्वासन दिलेले आहे. भारताने स्वत:हून अणुचाचणी करणार नाही, हे आश्वासन दिल्यानंतरच ही मंजुरी मिळू शकली आहे. त्यामुळे भारत हा एनपीटी कराराशी आपोआप बांधील झालेला आहे. भारताने इराणला अशी कोणतीही सामुग्री न देण्याचे बंधन आता आपोआप आले आहे. अमेरिकेला भारताकडून तेच हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

चोडण येथे साई मंदिरातील मूर्तीची पुन्हा मोडतोड

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - चोडण येथील साई मंदिरातील मूर्तीची नासधूस करण्याची पुन्हा एखादा घटना घडली आहे. लोक चतुर्थी उत्सवाच्या घाईगडबडीत असताना अज्ञातांनी हे कृत्य करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दि. २६ जुलै रोजी याच श्रीसाई मूर्तीचे मुकुट फोडण्यात आला होता. यावेळी पूर्ण चेहराच उडवल्याने भक्तांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी मागच्या तक्रारीवर कोणताही कारवाई केली नसल्याने या घटनेची पुन्हा तक्रार करण्यात आली नसल्याचे तेथील पुजाऱ्याने सांगितले.
तसेच यापूर्वी मंदिरातील मूर्तीवरील मुकुटही चोरीला जाण्याची घटना घडलेली आहे. अज्ञातांनी काल रात्री मंदिरात प्रवेश करून मूर्तीची तसेच ट्यूब व बल्ब फोडून टाकले. तसेच मंदिरात सिगरेटचे पाकिटेही सापडले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
दोन वर्षांपासून गोव्यात मूर्तींची मोडतोड करण्याचे सत्र अद्याप सुरू असून या प्रकरणात मात्र एकालाही अटक करण्याचे यश पोलिसांना आले नाही. परंतु, या घटना पोलिस खात्याने गांभीर्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तर, मंदिर सुरक्षा समितीने या विषयात ठोस पावले उचलण्याचे ठरवले आहे.

जया बच्चन यांनी राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले

मुंबई, दि. ७ - "हम युपीके है, हम हिंदीमेही बोलेंगे', असे विधान करून "बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. पुत्र अभिषेक बच्चनच्या आगामी "द्रोणा'चित्रपटाचा म्युझिक अल्बम रिलीज करताना जया बच्चन यांनी राज यांना आव्हान दिले.
नव्या पिढीतील मुले भलेही इंग्रजीत बोलत असतील, पण हा चित्रपट तर हिंदी आहे ना, असे त्या म्हणाल्या. त्यांच्यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीसुद्धा हिंदीतच बोलली. ती म्हणाली, जयाजीने फिल्म हिंदी मे कहा है, तो मै भी हिंदीमेही बोलना पसंद करूंगी. त्यावर जया बच्चन उद्गारल्या, हम युपीके है, तो हिंदीमेही बात करेंगे, महाराष्ट्र के लोग हमे माफ कर दे.
दरम्यान, या विधानावर मनसेच्य कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असून, त्यांनी महाराष्ट्रवासीयांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. मनसेबरोबर शिवसेनेनेही जया बच्चन यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

अणुकराराला "एनएसजी'कडून मंजुरी

व्हिएन्ना, दि. ६ : भारत-अमेरिका यांच्यात होणाऱ्या नागरी अणुऊर्जा सहकार्य कराराला अणुइंधन पुरवठा गटाची (एनएसजी) अखेर आज मंजुरी मिळाली. याआधी गेले दोन दिवस व्हिएन्ना येथे झालेल्या बैठकीत भारताला देण्यात येणाऱ्या सवलतींसंदर्भात भारतावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, अखेर ४५ देशांच्या या गटाने कराराला मंजुरी दिल्याने भारत व अमेरिका दोघांनाही खूष केले.
काल दुसऱ्या दिवशी या करारावर अंतिम निर्णय होणार होता. भारताला एनएसजी गटातील लहान लहान राष्ट्रे विरोध करीत होती. त्यांना समजावण्यासाठी भारत व अमेरिका दोन्ही देश अथक परिश्रम घेत होते. काल तर अखेरच्या क्षणी ऑस्ट्रियाने प्रस्तावाला आपला विरोध दर्शविला. अमेरिकेने काही सुधारणा करून पुन्हा या गटासमोर हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात काही बदल करण्यात यावे असा ऑस्ट्रियाचा आग्रह होता.
काल शुक्रवारी एनएसजीची बैठक सुरू होण्यापूर्वीच भारताचे परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी एनएसजीच्या सदस्य देशांना आश्वस्त करताना म्हटले की, आम्ही अण्वस्त्र प्रसारबंदीला बांधील आहोत. प्रणव मुखर्जी यांच्या या वक्तव्यानंतर भारताला सवलती मिळण्याची आशा वाढली होती. परंतु, तरीही ऑस्ट्रिया, आयर्लॅंड, न्यूझीलंड आदी छोट्या राष्ट्रांचा विरोध जारी होता. या राष्ट्रांना समजावण्याची कामगिरी अमेरिका पार पाडीत होता. भारत या गटाचा सदस्य नसल्याने त्याला बैठकीत आपली भूमिका मांडता येत नव्हती म्हणून भारत बाहेरून या गटातील सदस्य राष्ट्रांना आपली भूमिका समजावून सांगत होता. प्रणव मुखर्जी यांच्या वक्तव्यानंतर भारतविरोधी बहुतांश राष्ट्रांचा विरोध बराचसा मावळला होता.
चर्चेच्या चौथ्या फेरीनंतरही ऑस्ट्रियाने अखेर असे म्हटले की, मसुद्याला जर मंजुरी मिळत असेल तर त्यात आणखी काही बदल करणे आवश्यक आहे. काल उशिरा रात्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले होते की, आम्ही आशा सोडलेली नाही. मसुद्यात बदल करण्यात यावा या ऑस्ट्रियाने केलेल्या मागणीनंतर मुत्सद्दी संशोधित मसुदा तयार करण्याच्या कामी लागले. प्रणव मुखर्जी यांच्या वक्तव्यानंतर एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, यानंतर चर्चेत सकारात्मक गती आली आहे. तरीही संशोधित नव्या मसुद्यावर ऑस्ट्रिया व आयर्लॅंड समाधानी नव्हते.
भारताला काही सवलती द्यावयाच्या असतील तर मसुद्यात अजूनही काही सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे, असे ऑस्ट्रियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी पीटर लान्सकी यांनी म्हटले होते. काही छोट्या राष्ट्रांनी केलेल्या विरोधाकडे बघता भारत व अमेरिकन अधिकारी काल उशिरा रात्रीपर्यंत मसुद्यात बदल घडवून आणण्याच्या कामात लागलेले होते. यातून कोणताही मार्ग दिसून येत नाही असे पाहून प्रणव मुखर्जी यांनी एनएसजीच्या सदस्य राष्ट्रांना भारत अण्वस्त्रप्रसारबंदीला किती बांधील आहे हे पटवून दिले.
अण्वस्त्र प्रसारबंदीला ठोस रूप देणे व प्रथम अण्वस्त्राचा वापर करणार नाही या नीतीवर भारत दृढ आहे, हे सांगितले. अण्वस्त्र प्रसारबंदीच्या प्रमुख उद्देशांना पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर संयुक्तपणे काम करण्यास बांधील आहे. अण्वस्त्र प्रसारबंदीच्या संदर्भात म्हणाल तर भारताचा रेकॉर्ड स्वच्छ आहे.

अणू कराराच्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी...
१८ मे १९७४ : भारताने पहिली अणुचाचणी घेतली. या अणुचाचणीला उत्तर देण्यासाठीच त्यावर्षी आण्विक पुरवठादार गटाची निर्मिती झाली.
१० मार्च १९७८ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी एनपीटी करारावर स्वाक्षरी केली आणि भारताला आण्विक पुरवठा बंद केला.
११ ते १३ मे १९९८ : भारताने जमिनीखाली पाच अणुचाचण्या केल्या.
१८ जुलै २००५ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पहिल्यांदा वॉशिंग्टन येथे आण्विक करार करण्याचे सूतोवाच केले.
१ मार्च २००६ : बुश यांनी सर्वप्रथम भारताला भेट दिली.
३ मार्च २००६ : बुश आणि मनमोहनसिंग यांनी सर्वप्रथम द्विपक्षीय करार करून आण्विक सहकार्य वाढविण्यावर भर दिला.
२६ जुलै २००६ : अमेरिकन सभागृहाने हेन्री हाईड अमेरिका-भारत शांततापूर्ण अणुऊर्जा सहकार्य कायदा २००६ ला मंजुरी दिली आणि भारताला एनपीटीवर स्वाक्षरी करण्यातून सुद्धा सूट दिली.
२८ जुलै २००६ : डाव्या पक्षांनी संसदेत चर्चेची मागणी केली.
२७ जुलै २००७ : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय चर्चा पूर्ण झाली.
३ ऑगस्ट २००७ : १२३ कराराचा मसुदा दोन्ही राष्ट्रांतील सरकारांनी जारी केला.
१३ ऑगस्ट २००७ : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अणुकरारावर स्वत:हून संसदेत वक्तव्य केले.
१७ ऑगस्ट २००७ : सरकारसोबतचा हनिमून संपला, पण विवाह कायम राहील, असे माकपानेते प्रकाश कारत यांनी सांगितले.
४ सप्टेंबर २००७ : संपुआ-डाव्यांच्या समन्वय समितीची बैठक, त्यात आण्विक कराराच्या अनुषंगाने चर्चा
२५ फेब्रुवारी २००८ : अणुकरार किंवा सरकार दोनपैकी एकाची निवड करण्यास डाव्यांनी संपुआला सुनावले.
७ मार्च २००८ : डाव्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून पाठिंबा काढण्याचा इशारा दिला.
८ जुलै २००८ : डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढला.
१० जुलै २००८ : पंतप्रधानांनी लोकसभेत विश्वासमत मागितले.
२२ जुलै २००८ : संपुआने विश्वासमत जिंकले.
६ सप्टेंबर २००८ : एनएसजीकडून भारताला सवलती देण्याची अखेर घोषणा.

आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष

इस्लामाबाद, दि. ६ : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना २८१ मते मिळालीत, तर त्यांच्या विरोधात असलेल्या सैयदुजम्मा यांना १११ मते मिळालीत.
मुशहीद हुसेन या तिसऱ्या उमेदवाराला ३४ मते मिळाली आहेत. तसे या निवडणुकीचे समीकरण पूर्वीपासूनच झरदारी यांच्या बाजूने होते. पण, सुरक्षेच्या कारणांमुळे ते खुलेआमपणे प्रचारासाठी फिरू शकत नव्हते. याउलट अन्य दोन उमेदवारांनी खुलेआम फिरून जोरदार प्रचार केला. सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडल्यानंतर या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या "पीएमएल-एन'च्या उमेदवाराकडून सुद्धा तसा झरदारी यांना धोका नव्हता.
एकूण मतांपैकी ६० टक्के मते आपल्याला मिळतील, असा झरदारी यांचा दावा होता. महाभियोगाच्या भीतीने परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याचवेळी या पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. झरदारी यांना अनेक लहान पक्षांचा सुद्धा पाठिंबा मिळाला होता. मुताहिदा कौमी मुव्हमेंट, अवामी नॅशनल पार्टी, जमायत उलेमा-ए-इस्लाम तसेच पाकिस्तान मुस्लिम लीगच्या काही बंडखोरांनी झरदारी यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्राध्यक्षांचे अधिकार मर्यादित केले जातील आणि तालिबान बंडखोरांना मात दिली जाईल, अशी घोषणा झरदारी यांनी निवडणुकीपूर्वीच केली होती. या निवडणुकीत सिनेटच्या १००, नॅशनल असेंब्लीतील ३४२ आणि प्रांतिक सभागृहातील ६५ सदस्यांनी भाग घेतला.

दोन्ही युवकांची कसून चौकशी

बनावट नोटा प्रकरण
वास्को, दि. ६ (प्रतिनिधी): बनावट नोटांचे वितरण करण्यासाठी गोव्यात आलेल्या पश्चिम बंगाल येथील दोन तरुणांना काल वास्को पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. देशात बनावट नोटांचे वितरण करून येथील अर्थव्यवस्था कोलमडून टाकण्याचे षड्यंत्र काही दहशतवादी संघटनांतर्फे सुरू असल्याचे स्पष्ट संकेत यापूर्वी गुप्तहेर यंत्रणेने दिल्याने या दोन्ही तरुणांचा सर्वांगाने तपास करणार आहे, असे दक्षिण गोवा अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी सांगितले आहे. वास्को पोलिसांनी या दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांना सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
वास्को पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणांची नावे महम्मद शेख व ताहीद शेख अशी आहेत. हे दोघेही मालदा पश्चिम बंगाल येथील असून त्यांच्याकडून ५०० रुपयांचा एकूण ६०० बनावट नोटा मिळून तीन लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक श्री. प्रभुदेसाई यांनी दिली. दरम्यान, वास्को पोलिसांनी या दोघाही तरुणांना चिखली येथे एका खाजगी बसमधून ताब्यात घेतले होते. या खाजगी बसमध्ये बंगालहून कालच गोव्यात दाखल झालेले एकूण ३० कामगार होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोघांना ताब्यात घेताना या बसमधील इतर प्रवाशांची चौकशी करण्याचे भान पोलिसांना राहिले नसल्याने जर या कामासाठी ही टोळीच गोव्यात दाखल झाली असेल तर हे कामगार आता सर्वत्र पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हे दोघे तरुण काल वास्को येथील "टेलीस औषधालया'त खरेदीसाठी आले असता त्यांनी दिलेली ५०० रुपयांच्या नोटेचा संशय या दुकानातील कामगारांना आला. त्यांनी वेळीच ही खबर वास्को पोलिसांना दिली. परंतु, तोपर्यंत या दोघाही तरुणांनी तेथून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना चिखली येथे एका खाजगी बसगाडीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मिळालेल्या बॅगेत एकूण तीन लाख रुपयांचा बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आला. आज दोन्ही संशयितांना प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. गोव्यात एकीकडे बनावट नोटांची प्रकरणी वाढली असता व या प्रकरणांच्या चौकशीचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे असता पोलिसांच्या ताब्यात मिळालेल्या या दोन तरुणांच्या साहाय्याने हे संपूर्ण जाळे उघडे करण्याचे जोरदार प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. विविध पोलिस पथकांकडून स्वतंत्र चौकशी सुरू असून सर्व शक्याशक्यता पडताळण्यात येत असल्याचेही अधीक्षक श्री. प्रभुदेसाई यांनी सांगितले. खास गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे, अधीक्षक प्रभुदेसाई व वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर यांनी इन कॅमेरा या दोघाही संशयितांची जबानी नोंद केल्याची माहितीही मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही संशयित गोव्यात येण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकावरून "गोवा एक्सप्रेस'गाडीत चढल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अन्य काही जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचे ठरवले असून याबाबत स्पष्टीकरण देण्यास नकार देण्यात आला. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगून येत्या काही दिवसांत याबाबतचे धागेदोरे सापडण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

खिडकीचे ग्रील्स कापून फातोर्ड्यात लाखभराची चोरी

मडगाव, दि.६ (प्रतिनिधी): मडगावातील दुकाने व घरे फोडून ऐवज पळविण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असून अशा घटनांचे आता कोणालाच गांभीर्य राहिलेले नसल्याचे दिसून येत आहे. आज मुरीडा फातोर्डा येथे एका घराच्या खिडकीचे ग्रील्स कापून चोरट्यांनी साधारण लाखभराचा ऐवज पळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, पोलिसांना अजून कोणताच धागादोरा हाती लागलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे बाथरूमच्या खिडकीचे ग्रील्स कापून आबादे फारीया रस्त्यावरील एका घरातून चोरट्यांनी १.८० लाखांचा ऐवज पळविला होता. त्या चोरीचा कोणताही छडा लागण्यापूर्वीच ही दुसरी चोरी झाल्यामुळे एकाच टोळीचे ते काम असावे, असा कयास व्यक्त केला जात आहे.
मुरीडा येथील प्रदीप जाधव यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील्स कापून चोरटे आत घुसले. चोरट्यांनी एक लॅपटॅाप, सोन्याच्या वस्तू व काही रोकड मिळून लाखभराचा ऐवज लंपास केल्याची तक्रार जाधव यांनी नोंदविली आहे.
या दिवसात दुकाने फोडण्याचे प्रकार कमी झालेले असून त्या ऐवजी चोरट्यांनी आपला मोर्चा बंद असलेल्या घरांकडे वळविल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान काल सकाळी वजरो - राय येथे पोलिस असल्याची बतावणी करून एका कष्टकरी महिलेकडील साधारणपणे ७६ हजारांचे दागिने पळविण्याचा जो प्रकार घडला त्या प्रकरणाचा कोणताच तपास लागू शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयित स्थानिक असावेत असा कयासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सांत-ईस्तेवचा असाही गणेशोत्सव

हिंदू व ख्रिस्ती बांधव एकत्र
पणजी,दि ६(प्रतिनिधी): कला युवक संघ टोंकवाडा सांत - ईस्तेव येथील हिंदू व ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच गावात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करून केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एक वेगळा संदेश पोचविण्याचे कार्य केलेले आहे. तिसवाडी तालुक्यातील या बेटावरील दोन्ही धर्म बांधवांनी एकत्र येऊन जाती धर्माच्या तथाकथित बंधनांना बाजूला ठेवून सलोखा कसा राखला जाऊ शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण जगासमोर ठेवले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक चर्चच्या फादरनीं यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने सध्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कला युवक संघातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची कल्पना पदाधिकाऱ्यांनी पुढे आणली आणि त्यांनी या बेटावर राहणाऱ्या दोन्ही धर्मातील लोकांनी हा सण साजरा करण्याचे ठरविले. येथील चर्चचे फादर ओलावो सोझा यांना त्याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी ती लगेच उचलून धरली. एवढेच नव्हे तर चर्चच्या प्रार्थनेवेळी त्यांनी ती गावातील ख्रिश्चन बांधवापर्यंत पोचवून सहकार्याचे आवाहन केले. सुमारे दोन महिन्यांपासून त्या ठिकाणी या गणेश पूजनाची तयारी सुरू करण्यात आली होती. यानंतर सुमारे २ लाख रुपये खर्चून या ठिकाणी खास कल्पवृक्षापासून तयार केलेला ६ फुटी श्रीगणेशाचा मंगल कलशावर विराजमान झालेला देखावा सुद्धा तयार करण्यात आला. या देखाव्याच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून फादर ओलावो सोझा हेच उपस्थित होते. यावेळी बोलताना फादर सोझा यांनी, सध्या जाती व धर्माच्या नावावरून जो कलह निर्माण झालेला आहे त्याकडे पाहता कला युवक संघाने सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव सलोख्याचे प्रतीक व एक चांगला उपक्रम असल्याचे सांगितले.
यावेळी फादर बिस्मार्क डायस यांनी विघ्नहर्त्यासंबंधी माहिती दिली. कला युवक संघाचे प्रवक्ते व निमंत्रक तसेच या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाची कल्पना मांडणारे रामानंद चोडणकर यांनी आज "माणुसकी' ही सर्वांत मोठी असून ती जपण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले व सर्वांनी सलोख्याने नांदण्याची गरज असल्याचे सांगितले.
देखाव्याचे उद्घाटन मूर्ती कलाकार यशवंत शेट यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष राघू गजानन नाईक,गुरूदास गोवेकर, रामराय नाईक, नारायण नार्वेकर, पांडुरंग शेट, नीळकंठ चोडणकर, जांबुवंत सावंत व तुकाराम चोडणकर उपस्थित होते.
हा देखावा २३ सप्टेंबर पर्यंत लोकांसाठी खुला असेल. देखावा तयार करण्यासाठी तुकाराम चोडणकर या प्रमुख कलाकारास सुरेश हळर्णकर, राघू नाईक, देवानंद चोडणकर, विशाल तारी, दिगंबर चोडणकर,श्याम सावंत व दत्ता तारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.