Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 8 May, 2010

चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई

नितीन गडकरींची पणजीत विराट सभा
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): कॉंग्रेस पक्षाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे व भ्रष्ट प्रशासनामुळे देश संकटात आहे. महागाई, आत्महत्या, बेरोजगारी व कायदा सुव्यवस्था आदी सर्व स्तरांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात बंगलादेशी घुसखोरांसाठी कॉंग्रेसने लाल गालिचाच पसरवला आहे. दहशतवादाचा संबंध थेट मतपेटीच्या राजकारणाशी करून कॉंग्रेसने देशाची सुरक्षाच डावाला लावली आहे. भ्रष्ट आणि दहशतवादाचे तुष्टीकरण करणाऱ्या कॉंग्रेसकडून जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल अनेक गैरसमज पसरवले आहेत. भाजप कोणतीच जात, पात, पंथ, भाषा इत्यादींच्या विरोधात नाही तर राष्ट्रद्रोहाच्या विरोधात आहे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन एकविसाव्या शतकात विकासाचे राजकारण हेच या पक्षाचे सूत्र राहणार आहे व त्या अनुषंगानेच हा देश जगातील पहिल्या क्रमांकाचा शक्तिशाली देश बनवणार, असा संकल्प भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रथमच दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेल्या नितीन गडकरींची आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेली आजची जाहीर सभा जबरदस्त यशस्वी ठरली. या सभेद्वारे राज्यातील भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांत एक नवा जोम व उत्साह फुंकण्यात त्यांनी यश मिळवले. गोव्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपले भाषण सुरू केलेल्या श्री. गडकरी यांनी प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले की, कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत आपला देश आतून व बाहेरूनही असुरक्षित बनला आहे. दहशतवादाचा संबंध थेट मतपेटीच्या राजकारणाशी करून कॉंग्रेस देशाच्या सुरक्षिततेकडेच तडजोड करत आहे. जनतेच्या मनात निर्माण केलेला गैरसमज दूर करण्यासाठी आता भाजपने पाच घटकांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, श्रमिक व पक्षाचे हितचिंतक या सर्वांना मुख्य प्रवाहात आणून विकासाभिमुख व वैभवशाली भारत निर्माण करण्याचा संकल्प या पक्षाने सोडला आहे. राष्ट्रप्रेमींच्या हाती बेड्या व राष्ट्रद्रोह्याला हार ही कॉंग्रेसची नीती बनली आहे. मुंबईवर हल्ला केलेल्या कसाबला फाशीची शिक्षा सुनावली गेली पण ती प्रत्यक्षात उतरेल काय, असा सवाल करून संसदेवर हल्ला केलेला अफझल गुरू हा कॉंग्रेसचा जावई लागतो म्हणून त्याला फाशी देण्यात येत नाही काय, असा संतप्त सवालही श्री. गडकरी यांनी केला. गुन्हेगारी, दहशतवाद व नक्षलवाद यामुळे देश पोखरला जात आहे व त्याचा सामना करण्याचे धाडस कॉंग्रेसमध्ये नाही. चीनकडून एका वर्षांत १४७ ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, सरकार मात्र केवळ उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ६२ वर्षे उलटली व सर्वाधिक सत्ता भोगलेल्या कॉंग्रेसच्या राजवटीत ४१ टक्क्यांनी दारिद्र्य वाढले. यांपैकी ७५ टक्के लोक हे अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक व इतर मागासवर्गीय आहेत. "गरिबी हटाव'चा नारा देऊन कॉंग्रेसने गरिबी वाढवली. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच महागाई वाढली आहे याचे पुरावे सादर करून या पक्षाने काळ्याबाजाराला उत्तेजन दिले व त्यातून कोट्यवधींचा मलिदा मिळवला, असा गंभीर आरोप श्री. गडकरी यांनी केला. देशात मद्यनिर्मिती उद्योगांना कवडीमोल दराने गहू व तांदूळ मिळतो पण ग्राहकांना मात्र हे धान्य मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले की, पुढील विधानसभा निवडणूक ही गोव्यासाठी एक महत्त्वाची घटना ठरणार आहे. सध्याच्या भ्रष्ट कॉंग्रेसच्या हाती सत्ता बहाल केल्यास आपल्या मुलांचे भवितव्य काय असेल, याचा विचार करूनच मतदारांना निर्णय घ्यावा लागणार आहे, असे ते म्हणाले. खासदार श्रीपाद नाईक म्हणाले की, गोव्याची ओळख असलेले राष्ट्रीय अध्यक्ष लाभल्याने त्याचा लाभ या प्रदेशाला निश्चितच होणार आहे. कॉंग्रेस सत्तेचा वापर केवळ पैशांसाठी करीत आहे. "सीबीआय'चा विरोधी नेत्यांमागे लावलेल्या ससेमिरा हा कॉंग्रेसच्या मुस्कटदाबी राजकारणाचा भाग आहे, असेही ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कॉंग्रेसने बेकायदा खाण व ड्रग्स इत्यादींमुळे राज्याची वाताहत केल्याचा आरोप केला. यावेळी इतर नेते, पदाधिकारी यांची भाषणे झाली. व्यासपीठावर पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निर्मला सीतारामन तसेच पक्षाचे सर्व आमदार, कार्यकारिणी पदाधिकारी हजर होते. आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर श्री. गडकरी यांनी सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. टी. बी. कुन्हा यांच्या समाधीला आदरांजली वाहिली व मग व्यासपीठावर आले.
-------------------------------------------------------------------
गोव्यात शिवशाही अवतरू द्या
गोव्यातील दलबदलू व भ्रष्ट कॉंग्रेसच्या राजवटीला जनता कंटाळली आहे. या प्रदेशात कॉंग्रेसकडून भाजपबद्दल अल्पसंख्याक व इतर लोकांत मोठ्या प्रमाणात गैरसमज व विष पेरले आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर या लोकांशी संवाद साधा व सर्वांना बरोबर घेऊन गोव्यात आदर्श व विकासाभिमुख राजवट द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वच्छ प्रशासनाची अजूनही लोक आठवण काढतात. गोव्याला प्रगतिशील व विकासाभिमुख सरकार देण्यासाठी जोमाने कामाला लागा व सर्वांच्या साथीने गोव्यात शिवशाही अवतरू द्या, असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना समई भेट देताना गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर. सोबत डावीकडून राजेंद्र आर्लेकर, निर्मला सीतारामन, मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, ऍड. फ्रान्सिस डिसोझा, गोविंद पर्वतकर, प्रकाश वेळीप, दामू नाईक. (छाया: सचिन आंबडोस्कर)

काय होते शंभूचे मनसुबे?

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): 'सरकारकडून भत्ता, रेशन मिळत नाही तर कमी शिक्षित वनवासी लोकांना संघटित करा आणि त्यांच्यामार्फत सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करून आपले ईप्सित साध्य करा'' अशी शिकवण मिळालेला जहाल तरुण नक्षलवादी शंभू गोव्यात असेच काही करू पाहत होता का, याचा तपास सध्या गोवा पोलिस घेत आहेत. आत्तापर्यंतच्या चौकशीत तो गोव्यात लपण्यासाठीच आला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिस देत असले तरी शंभूचे मनसुबे काय होते, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
शंभूसह अन्य सोळा जणांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. "माओवादी त्रिशूल मजदूर मंच' या नक्षलवादी संघटनेचा नेता शंभू बेक, त्याचा दुसरा साथीदार राजेंद्र बार्ला व अनंत कुज्म यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली तर अन्य १४ जणांना सोडून देण्यात आले आहे. या १४ जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून शंभू गोव्यात वास्तव्य करून होता. यावेळी तो दोना पावला मिरामार, तसेच गोव्यातील अन्य भागातही फिरून आल्याची माहिती मिळाली आहे. शंभू याने कट्टर नक्षलवादी नेत्यांकडून प्रशिक्षण घेतले असून त्यांच्याकडूनच त्याला गोव्यात पैसे पुरवले जात होते, अशी माहिती या मोहिमेचे नेतृत्व करणारे पोलिस अधीक्षक वेनू बंसल यांनी दिली.
बचावासाठी गोव्यात
शंभू या नक्षलवाद्याने सुंदरगड या जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून दहशत माजवली होती. त्याने अनेकांना गोळ्या घालून ठार केले आहे तर, अनेक सरकारी अधिकाऱ्यांना जिवंत मारण्याची धमकी दिली होती. धनाढ्य लोकांकडून खंडणी घेतल्याच्या तक्रारी त्याच्यावर नोंद आहेत. मार्च महिन्यातच त्याने गुप्ता नामक एका दारू विक्रेत्याला गोळ्या घालून ठार केले होते. गेल्या महिन्यात बॉम्बस्फोट करून एक इमारत उडवण्याच्या प्रयत्नात त्याचा साथीदार ठार झाला होता. यावेळी शंभू याचा शोध घेण्यासाठी ओरिसा पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. मात्र त्याचा कोठेच पत्ता लाग त नव्हता. तो लपण्यासाठी पळून गोव्यात गेल्याची माहिती मिळाल्यानंतर ओरिसा पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला. गोवा पोलिसांनी ४८ तास राबवलेल्या मोहिमेत शंभू अटकेत आल्याने पोलिस तसेच सुंदरगड जिल्ह्यातील नागरिक आनंदीत झाले असल्याचे ओरिसा पोलिस खात्याचे निरीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले.
खून प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर शंभूने नक्षलवाद्यांच्या संघटनेत प्रवेश केला. त्याच्या खुनशी स्वभावामुळे प्रभावित झालेल्या नक्षलवादी संघटनेच्या कट्टर नेत्यांनी त्याला प्रशिक्षण दिले. दर महिन्याला ते त्याला पैसेही पुरवत होते. त्याला मोबाईल घेऊन देण्यात आला होता. अद्ययावत बंदुका हाताळण्याचे खास प्रशिक्षण त्याला देण्यात आल्याची माहिती ओरिसाचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कुमार यांनी दिली.
असा अडकला जाळ्यात
आोरिसातून रेल्वेमार्गे शंभूने गोव्यात प्रवेश केल्यानंतर सर्वांत आधी तो म्हापसा करासवाडा येथे एका झोपडीत राहणाऱ्या मित्राकडे गेला. तेथून तो भोमा येथे राहणाऱ्या ओरिसा येथील काही तरुणांकडे राहण्यासाठी गेला. या दरम्यान गोवा पोलिसांनी शंभू याची माहिती पोचली होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकही स्थापन करण्यात आले होते. अशिक्षित पण अत्यंत धूर्त असलेला शंभू रोज मोबाईलमध्ये दोन - तीन सिम कार्ड बदलत होता. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोचणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते. काल दुपारी तो दोना पावला येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला परंतु तो तेथून निसटला. यावेळी पोलिसांनी भोमा येथे छापा टाकला. तेथे काही तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर तो म्हापसा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. शंभू म्हापसा येथे पोचण्यापूर्वीच पोलिस त्याच्या म्हापशातील मित्राच्या घरी पोचले. थोड्या वेळाने तो झोपडीच्या समोर असलेल्या मैदानावरून येताना दिसला. या ठिकाणी पोलिस असू शकतात याची चाहूल लागताच तो अचानक मध्येच थांबला आणि पोलिसांनी आधीच पकडून ठेवलेल्या त्याच्या मित्राशी त्याने मोबाईलवरून संपर्क साधला. ""मला तहान लागली आहे. पाणी घेऊन ये. मी मैदानात तुझी वाट पाहतो'', असे सांगून त्याने मित्राला झोपडीतून बाहेर बोलावले. यावेळी पोलिसांनी त्याला पाणी घेऊन बाहेर जाण्यास दिले. पाणी पिताना शंभूने त्याला पोलिस आले होते का, अशी विचारणा केली. हे सर्व संभाषण पोलिस त्याच्याकडे असलेल्या मोबाईलवरून ऐकत होते. परंतु, एकाएकी शंभू आलेल्या वाटेनेच पुन्हा जाऊ लागल्याने आधीच संपूर्ण मैदानाला वेढा घालून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यात म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेश कुमार, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक प्रवीण वस्त, उपनिरीक्षक सुनील गुडलर, आयआरबीचे जवान तसेच अन्य पोलिसांचा समावेश होता.

कुळेवासीयांना प्रदूषित पाणीपुरवठा

साबांखात्याला ग्रामस्थांचे निवेदन प्रसंगी आंदोलनाचा इशारा
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): दुधसागर नदीच्या काठावर वसलेल्या संपूर्ण कुळे गावात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे प्रदूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने या भागासाठी त्वरित स्वतंत्र पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणी कुळे नागरिक समितीने केली आहे. पाचशे सह्यांचे एक निवेदन आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांना आल्तिनो येथे सादर करण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. जेथे पाणी प्रदूषित होते त्याच ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी पंप का बसवण्यात आला आहे, या मागील कारण स्पष्ट होत नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.
निसर्गाची देणगी लाभलेले कुळे गाव नेहमीच देशी पर्यटकांचे आवडते स्थान ठरले आहे. दर शनिवार, रविवारी दुधसागर धबधबा, देवचारा कोंड तसेच सिग्नला कोंड येथे पर्यटकांची आंघोळीसाठी गर्दी असते. ज्या ठिकाणी पर्यटक आंघोळ करतात तेथेच गावातील लोकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पाणी सिंचन पंप बसवलेला आहे. सिग्नला कोंड येथ हा पंप बसवला असून याच ठिकाणी रोज शेकडो लोक आंघोळ करतात. दुपारच्या जेवणानंतर उरलेले जेवण, प्लॅस्टिकच्या पिशव्या, नॅपकिन्स तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्याही तेथेच टाकल्या जातात. याकडे स्थानिक पंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून स्वच्छता राखण्यासाठी कोणताही यंत्रणा पंचायत किंवा पाणीपुरवठा खात्याकडे नाही. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून येथील प्रदूषित पाणी स्थानिक लोकांना पिण्यासाठी पुरवले जात असल्याचा दावा नागरिक समितीचे अध्यक्ष संतोष मसूरकर यांनी केला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे गावात पाण्यातून रोगराई पसरण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित खात्याने आणि अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास कुळे गावातील ग्रामस्थ आपल्या हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्यास कचरणार नाहीत, असा इशारा श्री. मसूरकर यांनी दिला आहे. आज सकाळी गावातील ग्रामस्थ व समितीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयीचे निवेदन सादर केले.

गोवा-मुंबई बसमधून ७.५ लाखांची दारू जप्त

सावंतवाडी, दि. ७ (प्रतिनिधी): गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आरामबसमधून सावंतवाडी पोलिसांनी आज सुमारे ७.५१ लाखांचा विनापरवाना दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी बसचालक रिझवान खान (३५, रा. प्रेमनगर, गोरेगाव, मुंबई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सावंतवाडी पोलिस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वाखाली दर्शन सावंत, कदम व आंबेरकर यांनी मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासूनच सापळा रचून ठेवला होता. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चिराग ट्रॅव्हल्स कांदीवली, मुंबई येथील एमएच ०४ जी ६७६६ ही खासगी बस अडवून झडती घेण्यात आली. यावेळी बसमध्ये विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूचे १२९ बॉक्स सापडले. पोलिसांनी सदर दारू जप्त केली असून त्याची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये असल्याची माहिती दिली. सावंतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

म्हापसा बाजार बुधवारी 'बंद'

'ओडीपी' विरोधात पालिकेवर व्यापारी संघटना मोर्चा नेणार
म्हापसा, दि. ७ (प्रतिनिधी): म्हापसा शहराच्या बाह्य विकास आराखड्यामुळे (ओडीपी) येथील दुकानदार देशोधडीला लागणार असल्यामुळे तो रद्द केला जावा आणि म्हापसा बाजारात बसणाऱ्या पथविक्रेत्यांना बाजारातून कायमचे हद्दपार करावे या मागण्यांसाठी म्हापसा बाजारातील दुकानदारांनी बुधवार दि. १२ मे रोजी आपली दुकाने बंद ठेवून म्हापसा नगरपालिकेवर मोर्चा नेण्याचा निर्धार केला असून त्यानंतर या आंदोलनासंदर्भात बाजारातील मोकळ्या जागी जाहीर सभा घेण्याचा निर्णय म्हापसा व्यापारी संघटनेने घेतला आहे.
काल रात्री ८.३० वा. म्हापसा येथील सिरसाट सभागृहात म्हापसा शहराचा बाह्य विकास आराखडा २०१० याविषयी चर्चा करण्यासाठी येथील व्यापारी, वकील, वास्तुविशारद, शिक्षक, डॉक्टर व अन्य नागरिकांसाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हा आराखडा म्हणजे सबंध म्हापसा शहर बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान आहे. शहरात शिल्लक राहिलेल्या जमिनीमध्ये ९-१, ८-२ प्रकल्पाच्या इमारती उभारण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. मार्केटच्या आसपास असलेल्या शेतजमिनी हडप करण्याचे कट कारस्थान येथील ठकसेनांनी रचले आहे, असा आरोप यावेळी नारायण कारेकर यांनी केला.
म्हापसा शहरात गरज आहे त्या ठिकाणी २० मीटरचा रस्ता दाखवलेला नाही. मात्र मार्केटमध्येच २० मीटरचा रस्ता दाखवण्याचे प्रयोजन काय? असा सवालही यावेळी करण्यात आला. बाजारातील गटारांवर अतिक्रमण झाले आहे. शहरातील गटारे भरून गेलेली आहेत. त्यामुळे म्हापसा शहर पावसाच्या पाण्याने बुडण्याची शक्यता आहे. या आराखड्यानुसार सर्व गटार, नाले बंद केले तर सर्वत्र पाणीच पाणी होणार आहे. या आराखड्यामुळे कदंब बसस्थानकासमोरील व हॉटेल सिरसाट समोर असलेल्या बाजारातील दोन्ही बाजूची दुकाने मोडावी लागतील. तसेच हा रस्ता मार्केटयार्डमधून सरळ शेतीतून जाणार आहे. या सर्व गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून हा आराखडा रद्द करण्यासाठी म्हापशातील व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे यावेळी श्री. कारेकर म्हणाले.
याप्रसंगी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यशवंत गवंडळकर, जवाहर शेट्ये, प्रभाकर येंडे, चेतन साळगांवकर व इतरांनी आपले विचार मांडले. आराखडा रद्द करणे व म्हापसा बाजारातील गंभीर समस्या बनलेल्या पथविक्रेत्यांना हटवणे याविषयी प्रभाकर येंडे व चेतन साळगांवकर यांनी मांडलेला ठराव यावळी एकमताने संमत करण्यात आला. संघटनेचे सचिव रामा राऊळ यांनी आभार मानले.

वाटमाऱ्या करणाऱ्या तिघा चोरट्यांना फोंड्यात अटक

फोंडा, दि.७ (प्रतिनिधी): राज्यात चोऱ्या, वाटमाऱ्या आदी प्रकरणांत हात असलेल्या तिघा चोरट्यांना फोंडा पोलिसांनी गुरुवार ६ मे रोजी मध्यरात्री कारमधून पळून जात असताना पाठलाग करून पकडले.
फोंडा पोलिस स्टेशनवरील अधिकारी, कर्मचारी, गस्तीवरील रॉबर्ट आणि रॉबिनवरील पोलिस यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईमुळे तिघे चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे अनेक चोऱ्यांच्या प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चोरट्यांनी वापरलेली एक मारुती आल्टो कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित तिसवाडी, बार्देश या भागांतील आहेत. या टोळक्याने अनेक चोऱ्यांची कबुली दिल्याचे वृत्तही हाती आले आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, बायथाखोल बोरी आणि धारबांदोडा येथे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या परराज्यातील मालवाहू ट्रकांना अडवून चालकांना लुबाडण्याच्या घटना ६ मे रोजी मध्यरात्री घडल्या. ह्या घटनांची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी धावपळ करून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या संशयास्पद आल्टो कारचा शोध घेण्यास प्रारंभ केला. संपूर्ण फोंडा तालुक्यातील गस्तीवरील पोलिसांना सतर्क करून ह्या कारची माहिती देण्यात आली. सर्वच रस्त्यावर पोलिस सदर कारच्या मागावर होते. कुर्टी भागात संशयास्पद कार दिसताच पोलिसांनी सुमारे अर्धा तास तिचा पाठलाग केला. दोन तीन वेळा सदर चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी तिचा शोध घेण्याचे सुरूच ठेवले. सदर कार फर्मागुडीच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच येथील मुख्य रस्त्यावर अडथळा उभारण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली. त्याप्रमाणे पोलिसांनी रस्त्यावर अडथळा उभारून कार थांबविली. सदर कारच्या पाठोपाठ पोलिस अधिकारी पाठलाग करीत त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.
६ मे रोजी मध्यरात्री बायथाखोल, धारबांदोडा येथे पाच ते सहा ट्रक चालकांना लुबाडण्यात आल्याचे वृत्त आहे. सदर चोरट्यांना पकडण्याचा कारवाईत पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याबरोबर उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर व इतरांनी सहभाग घेतला. उत्तर गोव्याच्या पोलिस अधीक्षकांनी आज (दि. ७) दुपारी फोंडा पोलिस स्टेशनला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून या चोरट्यांची माहिती जाणून घेऊन तपासकामासंबंधी मार्गदर्शन केले आहे. उपअधीक्षक शेराफीन डायस, निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण व इतर अधिकारी तपास करीत आहेत. या चोरट्यांची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर यासंबंधी माहिती दिली जाईल, असे पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.

Friday 7 May, 2010

कसाबला फाशीच

४ फाशी, ५ जन्मठेप, ४९ वर्षांचा कारावास, दीड लाखांचा दंड
मुंबई, दि. ६ (सुनील कुहीकर): 'अजमल कसाब इज सेन्टेन्स्ड टू डेथ. ही शाल बी हॅंग्ड बाय नेक टील ही इज डेड'' असा निर्णय जाहीर करून, २६/११ प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाचे कामकाज गुरूवारी संपले. पण त्यापूर्वी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी कसाबला वेगवेगळ्या बारा गुन्ह्यांमध्ये तब्बल ४ फाशी, ५ जन्मठेप, ४९ वर्ष आणि १ महिन्याचा कारावास, आणि १,५३,४०० रुपयांचा दंड ठोठावण्याचाही निर्णय जाहीर केला.
याच आठवड्यात सोमवारी मुंबई हल्ला प्रकरणात कसाब आणि त्याच्या २० पाकिस्तानी सहकाऱ्यांना दोषी ठरविण्याचा ५२२ पानी निकाल न्यायालयाने दिल्यानंतर गुरूवारी या प्रकरणी शिक्षेची घोषणा होणार असल्याची जाहीर होताच, संभाव्य निकालाचा अंदाज बांधला जाऊ लागला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही, कसाबने केलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य बघता त्याला फाशीच दिली जावी, अशी आग्रही मागणी नोंदविली होती. नाही म्हणायला कसाबच्या वकिलांनी काही दाखले देत, त्याच्या वयाचा विचार करण्याची विनंती न्यायालयाला केली असली तरी, त्या विनंतीत तसा "दम' नव्हताच. केवळ कसाबची बाजू मांडायची म्हणून त्यांनी त्याचा बचाव करण्याचा "प्रयत्न' म्हणून ही मागणी नोंदविल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
अखेर न्यायालयाने जाहीर केलेला दिवस उजाडला. कामकाजाची वेळ बारा वाजताची ठरली असली तरी प्रेक्षकदीर्घा अकरा वाजल्यापासूनच खचाखच भरल्या होत्या. ठीक १२.४५ ला न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. या प्रकरणाचा अंतिम निकाल तयार करताना आपण कोणकोणते मुद्दे विचारात घेतले, याची माहिती न्यायमूर्तींनी कोर्टाला दिली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निकालांचा, त्या न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतांचाही दाखला यावेळी देण्यात आला. साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या २६/११ प्रकरणाची सुनावणी करताना दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व संबंधितांचे आभारही न्यायमूर्तींनी यावेळी मानले. आणि मग सुरू झाला कसाबने केलेल्या गुन्ह्यांचा पाढा आणि कोर्टाने त्याला दिलेल्या शिक्षेची घोषणा.
भारताविरुद्ध कट रचणे, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर बेछूट गोळीबार करून सात जणांना ठार करणे, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, भारतात दहशतवादी कृत्य करणे या प्रत्येक गुन्ह्यांसाठी त्याला फाशीची शिक्षा आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारताविरुद्ध कट रचणे, युद्ध पुकारणे, विनापरवाना शस्त्रांचा वापर, विस्फोटक पदार्थांचा वापर करून नुकसान पोहोचविणे, "कुबेर' बोटीचा चालक अमरसिंह सोळंकी याचे अपहरण करून त्याचा गळा चिरून खून करणे या गुन्ह्यांसाठी कसाबला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दरोड्यासाठी ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयांचा दंड, दरोड्यात संबंधित व्यक्तीला जिवे मारल्यावरून ७ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजारांचा दंड, कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना मारल्यावरून ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजारांचा दंड, संयुक्त कट रचून दहशतवादी कृत्य केले म्हणून ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि दहा हजारांचा दंड...अशा प्रकारे एकूण बारा गुन्ह्यांसाठी कसाबला तब्बल ४९ वर्ष आणि १ महिन्याचा कारावास आणि एकूण १,५३,४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात सर्वांत कमी १ महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेचा आणि शंभर रुपयांच्या दंडाचाही समावेश आहे.
दुपारी १.३३ वाजता पहिल्या फाशीची घोषणा झाली. इतर सर्व गुन्हे, त्याचे कलम, शिक्षा यांची घोषणा करता करता फाशीच्या शिक्षेचे शेवटचे वाक्य जाहीर करून न्यायालय उठले तेव्हा घड्याळात १.५९ वाजले होते. कसाबला फाशीची शिक्षा ठोठावताना न्यायालयाने अगदी स्पष्ट मते व्यक्त केली. व्यवस्थित योजना आखून हा हल्ला करण्यात आला होता. ही योजना यशस्वी व्हावी याचेही पूर्ण नियोजन "लष्कर-ए- तोयबा' या दहशतवादी संघटनेने केले होते. या दहशतवादी संघटनेचा कसाब हा सदस्य होता. भारतावर हल्ला करण्यासाठी तो कमालीचा उत्सुक होता. अशावेळी त्याचे वय कमी की जास्त हा फार दखलपात्र मुद्दा होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने यावेळी मांडली.
दुर्बल? छे! हा तर निष्ठुर!
कसाब हा भावनिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा त्याच्या वकिलांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. तो भारतावर हल्ला करण्याच्या मानसिकतेतूनच येथे आला होता. इतकेच नव्हे, तर छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर वृद्ध, महिला व बालकांवर देखील त्याने निष्ठुरपणे गोळीबार केला. त्याच्यासारख्या, नियोजनबद्ध पद्धतीने भारतावर हल्ला करणाऱ्या नराधमाला दयामाया दाखविणे समाजाच्याही हिताचे नसल्याचे मत न्या. एम. एल. तहलियानी यांनी यावेळी व्यक्त केले. त्याच्यासारख्या दहशतवाद्याकडे मानवीय दृष्टिकोनातून बघितले, तर सामान्य माणसाचा कायद्यावर विश्वासच राहणार नाही, असेही मत सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत न्यायमूर्तींनी व्यक्त केले.
मला काहीही बोलायचे नाही...!
तुझ्याविरुद्ध लावले गेलेले आरोप सिद्ध झाले आहेत. तुला किमान तीन-चार प्रकरणात फाशीची शिक्षा होऊ शकते. तुला काही सांगायचे आहे? न्यायालयाने विचारलेला हा प्रश्न ऍड. के. पी. पवार यांनी आरोपीच्या पिंजऱ्यातल्या कसाबला विचारला. तेव्हा, ""नाही, आपल्याला काहीच बोलायचे नाही'', असे त्याने सांगितले. जे व्हायचे ते होईल, अशा थाटातले त्याचे हावभाव त्यावेळी होते. फाशीची शिक्षा ठोठावली गेली तरी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले नव्हते. शेवटी त्याला कोर्टाबाहेर पाठवून देण्यात आले. आता ऍड. के. पी. पवार यांना कसाबची भेट घालून दिली जाणार आहे. न्यायालयाचा निकाल समजावून सांगून त्यावर त्याचे काही म्हणणे असेल तर ते त्याच्या वकिलामार्फत न्यायालयाला कळविले जाईल.

सीबीआयच्या गैरवापराविरोधात भाजपचे १२ पासून आंदोलन

संपुआच्या 'ब्लॅकमेलिंग'चा तीव्र निषेध
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारकडून केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना व विशेष करून भाजपचे सरकार असलेल्या राज्यांना सतावण्याचा प्रकार सुरू आहे. "सीबीआय' चौकशीत अडकलेल्या कॉंग्रेस नेत्यांना निर्दोष ठरवून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कुरघोडी करण्याच्या प्रकाराचा भाजप तीव्र निषेध करीत आहे, असे उद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काढले. येत्या १२ रोजी भाजपतर्फे देशव्यापी आंदोलन छेडले जाईल व प्रत्येक राज्यातील "सीबीआय' कार्यालयाबाहेर निदर्शने केली जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच गोवा भेटीवर आलेल्या नितीन गडकरी यांनी आज सर्वप्रथम मिरामार येथील गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी गोव्यातील पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी प्रदेश भाजपाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, उपाध्यक्ष प्रकाश वेळीप व भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांची उपस्थिती होती.
कॉंग्रेसकडून विरोधकांचे राजकीय "ब्लॅकमेलिंग' सुरू आहे व त्यासाठी "सीबीआय' यंत्रणेचा सर्रासपणे वापर होत आहे. या यंत्रणेची विश्वासार्हता व स्वायत्तताच मलिन करून ही यंत्रणा म्हणजे "कॉंग्रेस ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन' बनवल्याचा ठपकाही श्री. गडकरी यांनी ठेवला. अलीकडेच संसदेत कपात सूचनेवरील मतदानावेळी काय घडले ते संपूर्ण देशाने पाहिले. या काळात "सीबीआय'चे शस्त्र वापरून विरोधकांना धाक दाखवण्यात आला व त्यामुळेच काही "संपुआ' विरोधकांनी सरकारला साथ दिली तर उर्वरीतांना मतदानावरच बहिष्कार टाकला. भाजप वगळता इतर पक्षांत "सीबीआय'शी दोन हात करण्याचे धाडस नाही, त्यामुळे हा लढा भाजपकडूनच उभारला जाणार आहे. गुजरातेत भाजपला सत्तेवर आणल्याने या राज्याची सतावणूकच कॉंग्रेसने आरंभिली आहे. विकास व प्रगतीच्या दिशेने आघाडीवर असलेल्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा कुटील डावच खेळला जात आहे. सोहराबुद्दीन प्रकरणी गुजरात पोलिसांच्या मागे "सीबीआय'चा ससेमिराच सुरू आहे. गुजरात पोलिसांनी दहशतवाद्यांना घातलेल्या कंठस्नानाचा वापर करून खोट्या एन्काऊंटरच्या नावाखाली गुजरात पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा विडाच कॉंग्रेसने उचलल्याची टीका श्री. गडकरी यांनी केली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संपुआच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व इतर मंत्र्यांनी या सर्व घाणेरड्या राजनीतीबाबत आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. अजित जोगी, "बोफोर्स' घोटाळा प्रकरण, सज्जन कुमार, जगदीश टायटलर आदी कॉंग्रेस नेत्यांच्या चौकशीबाबत "सीबीआय'च्या धोरणावर खुद्द न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. कॉंग्रेसवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे "सीबीआय'चे भूत सोडण्याचेही प्रकार घडले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव, अमरसिंग, लालू यादव, मुलायमसिंग आदी नेत्यांविरोधातही "सीबीआय'चा वापर करून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची टीकाही श्री. गडकरी यांनी केली.
प्रगती व विकासाभिमुख राजकारण
भाजपचे राजकारण कोणताही धर्म, पंथ, भाषा, प्रांत आदींवर अवलंबून नाही तर हा पक्ष राष्ट्रप्रेमाला महत्त्व देतो. देशाची प्रगती व विकास हाच पक्षाच्या राजनीतीचा मंत्र आहे. दहशतवाद किंवा गुन्हेगारीचा संबंध कोणत्याही धर्माशी लावला जाणे भाजपला मान्य नाही. प्रगती व विकासाच्या बाबतीत कोणताही मतभेद होता कामा नये, अशी पक्षाची धारणा असल्याचे श्री. गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्षाने निवडणुकीसाठी नवी व्यूहरचना आखली आहे. एकूण मतांमध्ये १० टक्के वाढ व्हावी यासाठी निश्चित कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक तसेच बुद्धिवादी व व्यावसायिकांना या पक्षाकडे आकर्षित केले जाणार आहे. देशातील असंघटित कामगार व श्रमिक वर्गालाही पक्षाकडे जोडले जाणार आहे. कॉंग्रेसकडून अल्पसंख्याकांच्या मनात भाजपच्या विरोधात विष पेरण्याचे काम सातत्याने सुरू आहे, यासाठी अल्पसंख्याकाशी संवाद साधला जाईल. संवादाच्या साहाय्याने गैरसमज दूर होणे शक्य असल्याचा अनुभव आपल्याला आल्याचेही त्यांनी मान्य केले. येत्या काळात पाच हजार अल्पसंख्याकाचे अधिवेशन बोलावून भाजपबाबत त्यांच्या मनात असलेले सर्व पूर्वग्रहदूषित समज दूर केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राजकारणाचा वापर केवळ सत्ताकारणासाठी करण्याचा भाजपचा अजेंडा नाही तर पक्षाचा कार्यकर्ता देशभक्तीने प्रेरित असावा व समाजकार्यातही त्याचा सक्रिय सहभाग असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रबोधन व प्रशिक्षणावर भर
भाजपच्या विचार मंचातर्फे पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आदींसाठी प्रबोधन व प्रशिक्षणाचा निश्चित कार्यक्रम आखला आहे, त्यासाठीचा अभ्यासक्रमही तयार केला आहे. प्रथमा, द्वितीया व तृतीया अशा तीन भागांत या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली असून त्याअंतर्गत विविध अशा २७ विषयांची रचना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी राबवला जाईल. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांचा पक्षातर्फे सत्कारही केला जाईल, असेही श्री. गडकरी यांनी स्पष्ट केले.

नक्षलवाद्याला म्हापशात अटक

१७ साथीदार पोलिसांच्या ताब्यात
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): गोव्याला अतिरेक्यांकडून धोका असल्याच्या वावड्या वारंवार उठत असतानाच ओरिसा पोलिसांना हवा असलेला जहाल तरुण नक्षलवादी शंभू बेक (२५) याला आज अत्यंत शिताफीने अटक करण्यास अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक वेनू बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या पथकाला आले आहे. शंभू हा "माओवादी त्रिशूल मंच' या नक्षलवादी संघटनेचा अध्यक्ष असून त्याच्यावर खून, दरोडे, हत्यारांची तस्करी असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद असून तो ओरिसा येथे "मोस्ट वॉंटेड' होता.
आज सायंकाळी सहा वाजता म्हापसा येथून या नक्षलवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, म्हापसा, जुने गोवे व भोम येथे त्याच्या संपर्कात असलेल्या ओरिसा येथील सतरा जणांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सतरा जण या भागातील विविध कारखान्यांत नोकरीला होते, अशी माहिती गोवा पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. त्याचा ताबा घेण्यास ओरिसा पोलिस गोव्यात दाखल झाले असून उद्या त्यांना घेऊन ते ओरिसाला रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आठ दिवसांपूर्वी आोरिसातील सुंदरगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी शंभू बेक हा गोव्यात असल्याची माहिती गोवा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक बंसल यांच्या अध्यक्षतेखाली खास पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. त्यात गुन्हा अन्वेषण विभागाचा एका पोलिस उपनिरीक्षक व "आयआरबी'च्या पोलिस जवानांचा समावेश होता. चार दिवसांपासून विविध ठिकाणी गुप्तहेर पाठवून माहिती गोळा करण्यात आल्यानंतर शंभू हा वापरत असलेला मोबाईल क्रमांक या पथकाच्या हाती लागला. त्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यात आली. आज सायंकाळी म्हापसा येथे तो असल्याची ठोस माहिती या पथकाच्या हाती लागताच त्याठिकाणी सशस्त्र पोलिसांनी छापा ठाकून त्याला अटक केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून शंभू हा अधूनमधून या तरुणांबरोबर गोव्यात येऊन थांबत होता. मात्र, गोव्यात कोणता विध्वंस करण्याचा हेतू होता का, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार भोम येथे हे संशयित भाड्याची खोली घेऊन राहत होते व ते जवळच्याच औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीत काम करत होते. तथापि, शंभू हा नक्षलवादी कोणतेही काम न करता बेकारच होता. तो दिवसभर सर्वत्र फिरून टेहळणी करण्याचे काम करत होता. त्याचे सहकारी वसाहतीत कामाला जात असल्याने त्याच्यावर कोणालाही संशय घेण्यास वाव नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.
----------------------------------------------------------------
गोवा पोलिसांच्या सुस्त कारभारामुळे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांसाठी गोवा हे नंदनवन ठरले असून राज्यात नक्षलवाद्यांचा वावर असल्याचा दावा गेल्या वर्षी विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी गृहखात्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत केला होता. त्यावेळी कोणताही कारवाई पोलिसांनी केली नसल्यानेच आज जहाल नक्षलवाद्यांना लपण्यासाठी पोषक वातावरण हे पोलिसांच्या कारभारामुळे निर्माण झाले आहे, असा संशय प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.
कसाब, तू रडत राहा
मुंबईच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावताच कसाब म्हणे ढसाढसा रडला. रड, मानवतेवर घाला घालणाऱ्या राक्षसा मनसोक्त रडून घे, फाशीचा दोर गळ्याभोवती आवळला जाईल तेव्हा तुला रडताही येणार नाही. तुझे भेसूर रडणे जरा आसमंतात घुमू दे. जगात जिहादी दहशतवादाचा धुमाकूळ घालण्याचे किडे ज्यांच्या डोक्यात वळवळत आहेत, त्यांना जरा कळू दे की दहशतवादाची मस्ती केली, अखेर ढसाढसा रडण्याची वेळ येते. रडण्याच्या शेवटी फासाचा दोर गळ्यात पडतो. म्हणून कसाब तू फाशीपर्यंत रडत राहा. कसाबच्या रडण्याचा भेसूर आवाज त्याच्या पाकिस्तानात बसलेल्या मस्तवाल प्रमुखांपर्यंत पोहोचला पाहिजे, मरणाची भीती काय असते त्यांना कळले पाहिजे. आणखी मस्ती केली तर कसाबच्या फासाचा दोर उद्या आपल्या गळ्यापर्यंत येईल, किंवा शूर भारतीय जवान कसाबच्या इतर साथीदारांप्रमाणे खात्मा करून कयामतचा इंतजार करण्यासाठी जमिनीत गाडून टाकतील. जगाला हे समजू दे की, भारत हा भेकडांचा देश नाही, तर उदार मानवतावाद येथे आहे. तसे "स्वयमेव मृगेंद्रता' येथे आहे. येथे मानवतेशी, मूल्यांशी कोणी बेईमानी करेल, तर त्याला देहान्त प्रायश्चित्ताशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही.
अझमल कसाबला मुंबईच्या विशेष न्यायालयाने सुनावलेली फाशी एकेरी फाशी नाही, तर चार वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी फाशीला तो पात्र ठरला आहे. न्यायालयाने आज शिक्षा सुनावण्याच्या आधी कसाबला काही सांगायचे आहे काय, असे विचारत संधीही दिली होती. मात्र, काही बोलायचे नाही, असे तो म्हणाला. मात्र, फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कसाबने आणलेले उसने अवसान गळून पडले आणि तो ओक्साबोक्सी रडू लागला. ज्याने शेकडो निरपराध लोकांना गोळ्या घातल्या तो उरफाट्या काळजाचा हल्लेखोर कितीही रडला, तरी त्याचे इथे कोणाला काही कौतुक वाटायचे कारण नाही. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, तर त्याचे हे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू असल्याचे म्हटले. मात्र, असे वाटते की त्याचे हे रडणे म्हणजे जिहादी दहशतवादाची अखेर आहे. कसाब रडतच राहिला पाहिजे तर या देशातही ज्यांच्या डोक्यात जिहादी दहशतवादाचे विचार वळवळत असतील त्यांना या कसाबच्या रडण्यातून मरणाची भीतीची कल्पना येईल!
भारतात दहशत पसरवायची, निरपराध लोकांना ओलीस ठेवून भारत सरकारला झुकवायचे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेत पुन्हा जिहादी आतंक देशात पसरवायचा, असा बेत करून हे उरफाट्या काळजाचे लोक भारतात घुसले होते. मारत मारत मरण्याचा संकल्प करून हे मानवी बॉम्ब मानवतेचे लचके तोडण्यासाठी इकडे आले होते. त्यातला हा कसाब! याने न्यायालयातही अनेक माकडचेष्टा केल्या. मनमानी करीत त्याच प्रश्नाची कधी होकारार्थी, तर कधी नकारार्थी उत्तरे दिलीत. भारतीय सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटल्याप्रमाणे हा खटला जगासमोर एक उदाहरण आहे की भारतात कायद्याचे राज्य आहे. कसाबसारख्या देशद्रोही गुन्हेगाराला न्यायालयात पूर्ण संधी दिली गेली. त्याच्यावरील आरोपांची संपूर्ण शहानिशा करूनच त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली. पण आता आणखी उदार धोरण न ठेवता मकबूल भटप्रमाणे याची पुढील न्यायालयीन प्रक्रिया लवकर पूर्ण करून याला फासावर लटकविले पाहिजे. आता उच्च न्यायालय, नंतर सर्वोच्च न्यायालय आणि नंतर दयेचा अर्ज. दयेच्या अर्जाची जी औपचारिकता आहे ती जरा देशद्रोही आरोपींच्या बाबतीत वेगाने पूर्ण केली पाहिजे. सध्या राष्ट्रपतींकडे दयेचे २९ अर्ज प्रलंबित आहेत. फाशीची शिक्षा होण्यासारखा गंभीर गुन्हा करणाऱ्यांवर इतके दिवस तरी मेहेरनजर कशाकरिता करायची? मंत्रिमंडळाच्या शिफारसीनंतरच दयेच्या अर्जावर निर्णय होत असतात, तर मग या धोकादायक गुन्हेगारांवर मंत्रिमंडळ कशाकरिता दया करते आहे? विशेषत: कसाबसारखे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी फाशीच्या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी केली पाहिजे. ज्यांनी शेकडो निरपराध लोकांना गोळ्या घातल्या, ज्यांनी या सार्वभौम देशाच्या विरोधात कटकारस्थान केले, ज्यांनी या देशाच्या विरुद्ध युद्ध पुकारले, इथल्या शूर पोलिस अधिकाऱ्यांना बेसावध असताना गोळ्या घातल्या, अशा आरोपीसाठी दया हा शब्द उच्चारण्याचादेखील अधिकार नाही.
मात्र कसाबला फाशी झाली म्हणून मुंबईत फटाके फोडणे वगैरे जो प्रकार झाला त्याची संभावना बालिशपणा अशीच केली पाहिजे. हा प्रकार टाळला जायला हवा होता. आपल्या देशावरील प्रेमाचे, देशभक्तीचे असे सवंग प्रदर्शन करणे ही आपली संस्कृती नाही.
हा कसाब न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन दयेच्या अर्जाचा फार्स होईपर्यंत तुरुंगात सरकारी बडदास्त उपभोगत राहाणार, पुन्हा कंदाहारच्या विमान अपहरणासारख्या प्रकरणांची किंवा काश्मीरमध्ये रुबियाच्या अपहरणासारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याची इच्छा मस्तवाल अतिरेक्यांना होणार. ही असली लाजिरवाणी घटनांची जंत्री घडविण्याची पुन्हा कशाला संधी द्यायची? या विषयाचा गंभीर विचार करण्याची वेळ आहे. कसाबचे रडणे पाकिस्तानच्या मस्तवाल नापाकांपर्यंत गेले पाहिजे. तसे ते जगात आमचीच पोलिसगिरी चालते अशा गुर्मीत राहणाऱ्या अमेरिकेतील व्हाईटहाऊसपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून कसाब तू रडत राहा!
फजल, तू बोलत राहा
इकडे कसाब रडतो आहे तिकडे अमेरिकेत फजल पोपटासारखा बोलतो आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क कारबॉम्ब प्रकरणात अमेरिकेच्या तपास यंत्रणेने फजल शाहजाद याला अटक करून बोलते केले आहे. त्याने दहशतवादी प्रशिक्षण पाकिस्तानात घेतल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे फजल तू बोलत राहा. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जिहादी दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारताने पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांची माहिती पुराव्यासह अमेरिकेला दिली होती. मात्र, जगाच्या कानाकोपऱ्यातील दहशतवाद संपविण्याची बुश यांची घोषणा तात्पुरती तालिबान संपविण्यापुरतीच होती, असे त्यावेळी लक्षात आले. आता पाकिस्तानचा नापाक दहशतवाद अमेरिकेच्या चौकात पोहोचताच आता व्हाईटहाऊसला जाग येईल. फजल आता बोलू लागला आहे. फजलच्या बोलण्यावरून पाकिस्तानात दहशतवाद चालविणाऱ्या सात जणांना अटकही झाली आहे. दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेबरोबर आपण आहोत असे दर्शविण्यासाठी असल्या किरकोळ लोकांना अटक करण्याचे नाटक पाकिस्तानातील राज्यकर्ते तत्परतेने करतील. मात्र, या दहशतवादामागे काही व्यक्ती फक्त नाहीत, तर पाकिस्तानातील राज्यकर्ते, पाकिस्तानातील गुप्तचर संघटना, पाकिस्तानातील लष्करी अधिकारी हे सर्वजण या दहशतवादाला पोसण्यात सहभागी आहेत, हे अमेरिकेला कळेल. त्याकरिता फजल बोलत राहिला पाहिजे.
आता वेळ आली आहे की जागतिक समुदायाने आपापल्या सोयीने दहशतवादाचा विचार न करता जगातून जिहादी दहशतवाद निपटून काढण्यासाठी कृती केली पाहिजे. एकेश्वरवादातून जिहादी मानसिकतेचा जन्म झाला आहे. भारतीय जीवनदर्शन साऱ्या जगाला पावन करणारे आहे याची जाणीव ठेवून दशतवादाला मूठमाती देण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रित विचार करण्याची गरज आहे. अमेरिकेने दांभिकता आणि अहंकार सोडून शाश्वत विचार केला पाहिजे. नाहीतर त्यांनी उभे केलेले भस्मासुर त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला येतात याचे किती अनुभव घेतल्यावर त्यांना शहाणपण सुचणार आहे? हे शहाणपण जगाला सुचण्यासाठी फजल बोलत राहिला पाहिजे. पाकिस्तानी नापाक दहशतवादाची रहस्ये जगाच्या वेशीवर खोलत राहिला पाहिजे!

आज भारता झुंजणार ऑस्ट्रेलियाशी

ब्रिजटाऊन, दि. ६ : भारताचा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर आठच्या फेरीतील पहिलाच सामना उद्या ७ मे रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाजी मजबूत करायची की ज्यांच्यावर भरोसा टाकता येणार नाही, त्या फिरकीपटूंचा वापर करायचा, अशा द्विधामन:स्थितीत आज भारतीय संघ आला आहे. भारताजवळ पाचव्या गोलंदाजाची कमी भरून काढण्यासाठी अनेक फिरकीपटू आहेत.
केंसिंगटन ओवलची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे या महत्त्वपूर्ण सामन्यात तज्ज्ञ वेगवान गोलंदाजांचा वापर केला जाऊ शकतो आणि तशी योजनाही भारतीय संघ व्यवस्थापनातील "थिंकटॅंक' तयार करीत असल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेणारा झहीर खान या सामन्यात खेळणे जवळपास निश्चित आहे. दणकेबाज फलंदाज गौतम गंभीरही आजारपणातून बरा झाला असून तो सामन्यासाठी "फिट' आहे. भारतीय फलंदाजी आता मजबूत झाली आहे. मात्र, योजना आखणाऱ्यांसमोर गोलंदाजांची निवड ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
दोन्ही संघांत बिग हिटर्स आहेत. मात्र, वन-डे क्रिकेटमध्ये दोनदा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे गोलंदाजीचे पारडे जड आहे. ड्रिक नॅनीस, शॉन टेट, मिशेल जॉनसन आणि शेन वॅटसन यांनी आतापर्यंत चांगली व प्रभावी गोलंदाजी केली आहे. गौतम गंभीर सामन्यासाठी तंदुरुस्त असला तरी अद्याप पूर्णत: फॉर्ममध्ये आलेले नाही. अशास्थितीत त्याने समाधानकारक फलंदाजी केली नाही तर भारताचा पुढील मार्ग कठीण होण्याची शक्यता आहे. गंभीरला सूर गवसला नाही तर सुरेश रैनाची जबाबदारी वाढून जाईल. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शानदार प्रदर्शन करून ६० चेंडूत १०१ धावा काढल्या होत्या. रैनाचा फॉर्म आणि त्याची सामना जिंकण्याची क्षमता पाहता ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्याच्याविरुद्ध विशेष योजना आखून मैदानात उतरले तर नवल वाटायला नको. त्यामुळेच त्याला या सामन्यात जास्तीत जास्त शॉर्ट चेंडूचा सामना करावा लागणार आहे. युवराजसिंगने आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात अनुक्रमे २३ व ३७ धावा काढल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्याकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मोठ्या डावाची अपेक्षा आहे. युवराजने आपल्या बॅटची कमाल दाखविली तर तो एक धोकेबाज फलंदाज सिद्ध होऊ शकतो. हे त्याने २००० सालच्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कारकीर्दीतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ८४ धावा काढून सिद्ध केले आहे.
मुरली विजय, युसुफ पठाण, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळाला तरच भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा बळावणार आहेत. आशीष नेहरा आणि प्रवीण कुमार यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले तरच ते शेन वॅटसन, डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लार्क आणि हस्सी बंधूंना रोखण्यात यशस्वी होऊ शकतील आणि भारताचा पुढील फेरीचा मार्ग सुकर होईल.
भारतीय फिरकीपटूंची चिंता नाही : क्लार्क
बार्बाडोस, ६ मे आम्हाला भारतीय फिरकीपटूंपासून अजीबात धोका नाही, भारतीय फिरकीची चिंताही आम्ही करीत नाही, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने केले. भारताविरुद्ध होणाऱ्या सुपर आठ फेरीतील सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता. माझे फलंदाज भारतीय फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी पूर्णत: तयार आहेत, असेही तो म्हणाला.
भारतीय संघ मजबूत आहे आणि त्यात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. त्यांच्याजवळ काही चांगले फिरकीपटूही आहेत. हरभजनसिंग सारखा जागतिक स्तराचा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. असे असले तरी आमच्याकडेही काही असे फलंदाज आहेत की जे फिरकी गोलंदाजांसमोर चांगली फलंदाजी करू शकतात, असे सांगून क्लार्क म्हणाला की, हरभजनसिंग, रविंद्र जडेजासारखे नियमित आणि युसुफ पठाण व युवराजसिंगसारखे अंशकालिन फिरकी गोलंदाज सध्या चांगले प्रदर्शन करीत आहेत. या ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे म्हणणे असे आहे की, स्पर्धेत फिरकी गोलंदाज महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहेत, तर वेगवान गोलंदाजांनाही समसमान संधी आहे. येथील खेळपट्ट्या चांगल्या व मैदानही शानदार आहे. त्याचा लाभ गोलंदाज कसे उचलतात यावर सारे काही अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही खेळपट्टीबाबत सध्या कोणताही विचार केलेला नाही, असेही क्लार्क म्हणाला. येथील खेळपट्टीवर पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाने १४० ते १५० धावा केल्या तर त्या आव्हानात्मक ठरेल, असेही तो म्हणाला. आपल्या संघाच्या सध्या कामगिरीवरही कर्णधार क्लार्कने समाधान व्यक्त केले आहे. दोन्ही सामन्यात आम्ही चांगले प्रदर्शन केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सहा फलंदाज गमावल्यानंतरही आम्ही सामन्यावर पकड मजबूत करून विजय मिळविला, असेही त्याने यावेळी आवर्जून सांगितले.
प्रवीण कुमार मायदेशी परतणार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याआधी भारताला एक जबर धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याच्या सेवेला आता भारताला मुकावे लागणार आहे. पोटातील स्नायू दुखावल्यामुळे प्रवीण कुमारला मायदेशी परतावे लागणार आहे.
सरावादरम्यान प्रवीणला त्रास जाणवू लागल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला एमआरआयसाठी पाठविले असता त्याच्या पोटातील स्नायू दुखावला गेला असल्याचे आढळून आल्यामुळे त्याला मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्राथमिक साखळी फेरीचे अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन्ही सामने खेळणार प्रवीण कुमार आजच मायदेशी रवाना झाला. प्रवीणच्या जागी अन्य एका वेगवान गोलंदाजाची घोषणा बीसीसीआयतर्फे लवकरच केली जाणार आहे.
आजचे सामने
सुपर ८ फेरी)

भारत वि. ऑस्ट्रेलिया
वेळ : सायं. ७ वाजता
स्थळ : केंसिंग्टन ओवल, बार्बाडोस

वेस्ट इंडीज वि. श्रीलंका
वेळ : रात्री ११ वाजता
स्थळ : केंसिंग्टन ओवल, बार्बाडोस

Thursday 6 May, 2010

माविनची सीबीआय चौकशी करा, पर्रीकर यांची जोरदार मागणी

मद्यघोटाळा, उच्च सुरक्षा नंबरप्लेट, ड्रग्स प्रकरण,
बेकायदा खाण व्यवसायही 'सीबीआय' कडे सोपवा

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): वीज अनुदान घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे माजी वीजमंत्री माविन गुदिन्हो यांच्याविरोधात दाखल केलेल्या फौजदारी गुन्ह्यांना अधिक पुष्टी मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी निःपक्षपातीपणे व्हायची असेल तर हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग "सीबीआय'कडेच सोपवणे उचित ठरेल, असा दावा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला.
आज भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. वीज घोटाळा प्रकरणी गेल्या १३ वर्षांपूर्वी आपण केलेले आरोप पूर्णपणे खरे ठरले आहेत. या निकालामुळे सरकारचे सुमारे ५० कोटी रुपये वाचले असून वीज भक्षक उद्योगांकडून कोट्यवधी रुपयांची वीज थकबाकी वसूल करण्याची मोकळीक सरकारला प्राप्त झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेला या संबंधीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवून तत्कालीन वीजमंत्री माविन गुदिन्हो यांनी जारी केलेल्या वीज अनुदान योजनेच्या वादग्रस्त अधिसूचना घटनाबाह्य व बेकायदा होत्या, यावरही शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकरणी माविन यांच्या विरोधातील फौजदारी गुन्ह्यांचा तपास निःपक्षपातीपणे होण्यासाठी हे प्रकरण "सीबीआय'कडेच देणे योग्य ठरेल, असे मत पर्रीकर यांनी व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल उद्योजकांनी अनुदान रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर दिला आहे व त्यामुळे या निकालात माविन यांच्यावरील फौजदारी खटल्यांबाबत टिप्पणी टाळली आहे. यामुळे माविन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून "क्लीन चीट' मिळाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. हा निकाल माविन विरोधातील फौजदारी खटल्यासंदर्भात एक भक्कम पुरावाच ठरणार आहे, असा दावाही श्री. पर्रीकर यांनी केला.
सरकारी तिजोरीवर डल्ला मारून जनतेचा पैसा हडप करण्याच्या दृष्टीने घडलेल्या विविध प्रकरणांची चौकशी "सीबीआय'कडेच द्यायला हवी. मद्यघोटाळा, हाय सिक्युरिटी नंबरप्लेट, बेकायदा खाण उद्योग व ड्रग्स व्यवसाय इत्यादी प्रकरणे "सीबीआय'कडे सोपवणेच उचित ठरणार आहे. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी अस्थायी समिती बैठकांचा पुरेपूर फायदा उठवू, असे सूतोवाचही त्यांनी केले. या सर्व प्रकरणांत सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचाच प्रकार घडला आहे.
"हायसिक्युरिटी नंबरप्लेट' कंत्राट वितरणात छुपा व्यवहार झाला आहे. बेकायदा मद्यघोटाळा प्रकरणी सरकार संबंधितांना पाठीशी घालीत आहे, याचाच अर्थच सरकारही या घोटाळ्यात सामील आहे, असे सांगून त्यांनी घोटाळ्याशी संबंधित आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. अबकारी आयुक्तालयातील फॅक्स मशीनचा गैरवापर झाल्याची पोलिस तक्रार खुद्द अबकारी आयुक्त करतात याचाच अर्थ घोटाळा झाला हे उघड आहे. मग चौकशी करण्यास सरकार का कचरते, असा सवाल श्री. पर्रीकर यांनी उपस्थित केला.

गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीमुळे तटरक्षक दल व पोलिस सावध

संशयास्पद वाहन, व्यक्तींची राज्यात कसून तपासणी
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): आसाम राज्यातील गुप्तहेर यंत्रणेने १४५ प्रशिक्षित दहशतवादी २६/११ सारखाच हल्ला करण्यासाठी भारतात घुसले असल्याची माहिती पुरवल्याने आज संपूर्ण गोव्यात तटरक्षक दलाने आणि पोलिसांनी एकत्रित नाकाबंदी करून संशयास्पद व्यक्तींची आणि वाहनांची कसून तपासणी केली.
१४५ पैकी १२ दहशतवादी हे महाराष्ट्रात घुसण्याच्या तयारीत असून ते समुद्रमार्गाने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज "किनारा कवच' नावाने ही शोध मोहीम हाती घेण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र कोणत्याही प्रकारे नागरिकांत भीती पसरू नये यामुळे "मॉक ड्रिल' नावाने ही शोध मोहिम राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. परवा संपूर्ण दक्षिण गोव्यात अशीच शोध मोहीम हाती घेतली होती.
आज आपली किनारपट्टी किती सुरक्षित आहे याची चाचपणी करण्याच्या हेतूने सकाळपासूनच तटरक्षक दल आणि गोवा पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली होती. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेने भारतावर मोठा हल्ला होणार असल्याची शक्यता व्यक्त केली असल्याने याला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा आपल्या क्षमता पडताळून पाहत आहेत.

पाटील, तळेकर यांना जामीन

वास्को, दि ६ (प्रतिनिधी): दिवाळीच्या पूर्वसंध्येला साकवाळ, कुठ्ठाळी येथे सापडलेल्या बॉम्ब प्रकरणात अटक करण्यात आलेले विनायक पाटील व विनय तळेकर यांना आज वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. विशेष तपास पथक व राष्ट्रीय तपास संस्थेने या दोघा संशयितांना अटक करून १८० दिवस उलटून सुद्धा सदर प्रकरणाचे आरोपपत्र दाखल न केल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. याच प्रकरणातील अन्य दोघा संशयितांना जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१६ ऑक्टोबर २००९ रोजी मडगाव येथे झालेल्या स्फोटानंतर साकवाळ, कुठ्ठाळी येथे नरकासूर स्पर्धेच्या ठिकाणाहून एका टेम्पोतून स्फोटके मिळाली होती. या प्रकरणी संशयित म्हणून विनायक पाटील (वय २८), विनय तळेकर (वय २५), दिलीप माणगावकर व विनय अष्टेकर यांना ३१ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते. अटक करून १८० दिवस उलटूनही आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याने आज वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयाने दोन्ही संशयितांना प्रत्येकी १ लाख रुपयाची हमी व आरोपपत्र दाखल करे पर्यंत विशेष तपास पथकाच्या कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.

विश्र्वनाथ वारीक यांचे निधन

फोंडा, दि.५ (प्रतिनिधी): राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते सेवानिवृत्त पोलिस अधिकारी विश्र्वनाथ आर. वारीक यांचे आज रात्री ८ वाजता ढवळी फोंडा येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दि. ६ मे रोजी सकाळी ११ वाजता फोंडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विश्वनाथ वारीक यांचा जन्म २० ऑगस्ट १९४२ साली माशे काणकोण येथे झाला. ते गोवा पोलिस सेवेत १९६५ साली उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी नाशिक महाराष्ट्र येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी गोवा पोलिस खात्यात पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक म्हणून काम केले. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून विश्र्वनाथ वारीक ओळखले जात होते. पोलिस खात्यात काम करताना त्यांनी वाघाशी एकाकी यशस्वी झुंज दिली. त्यानंतर वाघाशी झुंजणारे अधिकारी म्हणून ते गोव्यात परिचित झाले. या शौर्याची दखल घेऊन सरकारने त्यांचा राष्ट्रपती शौर्यपदक देऊन सन्मान केला. राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त करणारे विश्र्वनाथ वारीक हे पहिले गोमंतकीय पोलिस अधिकारी आहेत. वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून विश्र्वनाथ वारीक यांनी उत्कृष्ट कार्य केले. या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्यपद सांभाळत असताना विश्र्वनाथ वारीक यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. पोलिस सेवत काम करण्यापूर्वी विश्र्वनाथ वारीक यांनी भारतीय नौदलात सेवा केली आहे. पोलिस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यानंतर विश्र्वनाथ वारीक ढवळी फोंडा येथे स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात भाऊ कमांडर शरद वारीक आणि कुटुंबीय आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त फोंडा भागात पसरताच त्यांचे हितचिंतक व नातेवाईक यांची त्यांच्या घरी रीघ लागली.

गडकरींचे आज गोव्यात आगमन

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे उद्या ६ रोजी सकाळी १०.३० वाजता गोव्यात आगमन होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट असल्याने प्रदेश भाजपतर्फे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून पक्ष कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
सकाळी दाबोळी विमानतळावर त्यांचे मुरगाव व वास्को मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत होईल.दाबोळीहून ते थेट मिरामार येथील स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीला सकाळी ११ वाजता आदरांजली वाहतील व त्यानंतरच आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतील. दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करून संध्याकाळी भाजपचे विधिमंडळ उपनेते तथा म्हापशाचे आमदार ऍड.फ्रान्सिस डिसोझा यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी ५ वाजता प्रदेश भाजप कार्यकारिणी, जिल्हा समिती, आमदार व इतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवार ७ रोजी संध्याकाळी ५.२५ वाजता आझाद मैदानावरील हुतात्म्यांना आदरांजली वाहून ते थेट विराट जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

Wednesday 5 May, 2010

२००४ इफ्फी प्रकरणी सीबीआयला नोटीस

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यातील पहिल्यावहिल्या इफ्फीच्या आयोजनात झालेल्या कथित घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री दिगंबर कामत व अन्य सदस्यांचीही चौकशी करण्याची मागणी करून सत्र न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अर्जाची दखल घेत आज न्यायालयाने केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला नोटीस बजावली आहे. या नोटिशीच्या प्रती सीबीआयचे अधीक्षक श्री. गवळी व निरीक्षक राजीव ऋषी यांना पाठवण्यात आल्या असून येत्या १७ मे पर्यंत उत्तर सादर करण्यांचेही आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. २००४ मध्ये झालेल्या पहिल्या इफ्फी आयोजन समितीत विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत व अन्य मंत्रीही होते. त्यामुळे त्यांचीही या प्रकरणात चौकशी केली जावी, अशी मागणी करणारा अर्ज काशीनाथ शेट्ये यांनी न्यायालयात केला आहे.
या तपास प्रकरणात सीबीआयने विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचीच चौकशी केली असून समितीच्या अन्य कोणत्याच सदस्यांची चौकशी केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. २००४ सालच्या इफ्फी आयोजन समितीत सध्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात, आलेक्स सिक्वेरा, मिकी पाशेको, विद्यमान सभापती प्रतापसिंह राणे, हरीष झांट्ये व फिलिप नेरी रॉड्रिगीस यांचा समावेश होता. त्यानंतर "कॅग' अहवालात या इफ्फी आयोजन समितीने सार्वजनिक पैशांची गैरवापर केला असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप केवळ मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात करण्यात आलेला नसून तो आयोजन समितीच्या विरोधात आहे. यात अनेक मंत्री आमदारांचाही समावेश आहे, असे श्री. शेट्ये यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी अहवालात त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही गैरप्रकार केला असल्याचा ठपका ठेवला आहे. २००४च्या इफ्फी आयोजन समितीत असलेले सदस्य आज सत्ताधारी पक्षात आमदार तसेच मंत्री आहेत. तर, सीबीआय तपासाचा रोख केवळ विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडेच आहे. या प्रकरणात आयोजन समितीत असलेल्या सर्व सदस्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, भ्रष्टाचार प्रकरणाचे तपासकाम पोलिस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्याने करण्याचा नियम असून सीबीआय मात्र हा तपास निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यातर्फे करीत असल्याचा आरोप श्री. शेट्ये यांनी केला आहे.
सीबीआय ही एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. परंतु, तपास संस्थेने जाणून बुजून सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांना या तपासकार्यातून वगळले आहे. त्यामुळे सीबीआय आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने घातली झडप

सांग्यात खनिज वाहतुकीने घेतला तरुणाचा बळी
सांगे, दि. ४ (प्रतिनिधी): भरधाव वेगाने सुरू असलेल्या खनिज वाहतुकीने सांगे येथे आणखी एक बळी घेतला असून मार्टिन फर्नांडिस (तारीपाटो - सांगे) हा युवक ठार झाला. शनिवार दि. ८ मे रोजी मार्टिन याचे लग्न होते, त्याच्या अपघाती निधनामुळे तारीपाटो भागावर शोककळा पसरली आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार मार्टिन आपल्या जीए ०९ सी ०७३८ क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीने कार्यीखाटे सांगे येथे आपल्या भावाकडे गेला होता. तेथील काम आटोपून परतत असता सुसाट वेगाने सावर्डेच्या दिशेने निघालेल्या जीए ०८ यू ८८१८ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. यावेळी मार्टिन ट्रकच्या चाकांमध्ये अडकला व सुमारे २० ते २५ मीटर फरफटत गेला. त्याला तत्काळ सांगे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले परंतु त्यापूर्वीचे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रिवण येथे खनिजवाहू ट्रकाखाली सापडून रिवणकर यांचा मृत्यू होण्याची घटना ताजी असताना झालेल्या या अपघातामुळे सांगे भागात संतापाचे वातावरण पसरले आहे. मार्टिन याचा विवाह शनिवार दि. ८ मे रोजी होणार होता. विवाहाची पूर्वतयारी तसेच लग्नपत्रिका वितरित करण्याच्या कामात तो गेले काही दिवस व्यस्त होता. आपले नातलग तसेच मित्रमंडळींना लग्नपत्रिका देऊन आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत असलेल्या मार्टिनवर खनिज वाहतुकीच्या रूपाने आलेल्या क्रूर काळाने झडप घातल्याने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरधाव वेगाने सुरू असलेली खनिज वाहतूक मार्टिनच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याने संतप्त नागरिकांनी घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. सांगे भागातील खनिज वाहतुकीसाठी बगल रस्ता किंवा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. उद्याही येथील वाहतूक रोखून धरण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, सांगे पोलिसांनी ट्रकचालक गोविंद चव्हाण (सुकतळे मोले) याला अटक केली आहे.

गडकरींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी

उद्या आगमन
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): राज्यात कॉंग्रेस आघाडी सरकारने सामान्य लोकांचे जगणे हैराण केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर, भ्रष्टाचाराचा कळस, बेकायदा खाणींचा उच्छाद आदी अनेक प्रकरणांमुळे जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या ७ रोजी येथील आझाद मैदानावर आयोजित होणाऱ्या जाहीर सभेतून या असंतोषाला वाट मोकळी करून दिली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.
आज प्रदेश भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच गोवा भेटीवर येणारे नितीन गडकरी यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रदेश भाजपने चालवली आहे. श्री. गडकरी यांच्या भेटीमुळे प्रदेश भाजप कार्यकर्त्यांत नवा उत्साह व जोम पसरला आहे व त्यामुळे ही जाहीर सभा विराट तर होईलच, त्याचबरोबर राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या जनताविरोधी कारवायांविरोधात या सभेतून रणशिंगच फुंकले जाईल, असा विश्वासही प्रा. पार्सेकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी, संसदीय समिती बैठक, दिल्लीतील महागाईविरोधातील महारॅली इत्यादी कार्यक्रम यशस्वी केल्यानंतर ते गोव्यात दाखल होत आहेत.
येत्या ६ रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांचे आगमन दाबोळी विमानतळावर होईल. या ठिकाणी मुरगाव व वास्को मतदारसंघातील कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील. तदनंतर सांकवाळ येथेही तेथील कार्यकर्त्यांमार्फत त्यांचे स्वागत होईल. राजधानीत पोहोचल्यानंतर ११.३० च्या सुमारास ते गोव्याचे भाग्यविधाते तथा राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिरामार येथील त्यांच्या समाधीला पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहतील. दुपारी ते पत्रकारांना संबोधित करणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता म्हापशाचे आमदार तथा भाजप विधिमंडळ गटाचे उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तदनंतर ५.३० वाजता भाजप मुख्यालयात प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा समिती तथा इतर संघटन पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता विशेष निमंत्रितांबरोबर जेवणाचा कार्यक्रम होणार आहे.
७ रोजी सकाळी प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यांच्या पर्वरी येथील निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होईल. दुपारी विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांशी वार्तालाप व जेवण होईल. संध्याकाळी ४.३० वाजता आझाद मैदानावरील विराट जाहीर सभेला ते संबोधीत करतील. या जाहीर सभेची संपूर्ण तयारी प्रदेश भाजपने केली आहे. वाहनांसाठी पार्किंगची सोय कांपाल फुटबॉल मैदानावर करण्यात आली आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या जाहीर सभेच्या आयोजनाचे व विविध कार्यक्रमांचे प्रमुख म्हणून सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर हे काम पाहत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वीज थकबाकीदार उद्योगांना सुप्रीम कोर्टाची चपराक

अनुदान घोटाळाप्रकरण
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी वीज अनुदान घोटाळाप्रकरणी तत्कालीन वीजमंत्री तथा विद्यमान उपसभापती माविन गुदिन्हो यांच्यावर ठेवलेला ठपका अप्रत्यक्षरीत्या सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरल्याने त्यांना जबरदस्त चपराक मिळाली आहे. माविन गुदिन्हो यांनी जाहीर केलेली वीज अनुदान योजना ही सरकारी तिजोरीला पेलणारी नव्हती. या योजनेसंबंधी जारी केलेल्या अधिसूचना सरकारी प्रक्रियेला धरून नव्हत्या व यासाठी अर्थसंकल्पातही तजवीज केली नव्हती. यामुळे कोट्यवधी रुपयांचे अनुदान सरकारलाच या उद्योगांना द्यावे लागणार होते. ही योजना मोडीत काढण्यासाठीच तत्कालीन राज्य सरकारने विधानसभेत १६ जानेवारी २००२ रोजी गोवा (बाकी देय प्रतिबंध व अनुदान वसुली) कायदा, २००२ विधानसभेत संमत केला. हा निर्णय जनहिताच्या व्यापक दृष्टिकोनातून घेण्यात आला असे ठामपणे सांगून वीज भक्षक कारखानदारांनी दाखल केलेली आव्हान याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काल ३ रोजी आपला निकाल जाहीर केला. या निकालामुळे वीज भक्षक उद्योगांकडून कोट्यवधी रुपयांची वीज थकबाकी वसूल करण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. माविन गुदिन्हो यांनी ही योजना एकाधिकारशाहीपणाने लागू केली होती व त्याला तत्कालीन मंत्रिमंडळाची मान्यताही नव्हती. ही योजना भाजप सरकारने निकालात काढून सर्व वीज भक्षक कारखानदारांकडून थकबाकी वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयाला काही कारखानदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. हा कायदाच अवैध असल्याचा दावा करून हे अनुदान कायम ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली होती. उच्च न्यायालयाने यासंबंधी २१ जानेवारी १९९९ रोजी दिलेल्या निकालात ही योजना रद्द करण्यासंबंधी तत्कालीन राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होता. पण २७ जुलै १९९८ रोजी सरकारने या योजनेच्या पूर्व अधिसूचना रद्दबातल ठरवण्याची अधिसूचना मात्र उच्च न्यायालयाने ग्राह्य धरली होती. या नव्या अधिसूचनेनुसार २७ जुलै १९९८ नंतर वीज भक्षक कारखानदार या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत, असे म्हटले होते. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात काही कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते व त्याबाबतचा हा निकाल काल जाहीर करण्यात आला. हा निकाल जाहीर करताना या संबंधीच्या सर्व प्रकरणांचे एकत्रीकरण करून हा निकाल देण्यात आला.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणी जनहित याचिका सादर करून माजी वीजमंत्री माविन गुदिन्हो यांनी वीज अनुदान योजनेबाबत जारी केलेल्या १५ मे १९९६ व १ ऑगस्ट १९९६ रोजीच्या अधिसूचनांनाच आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात या अधिसूचनांची दखल घेतली नसल्याचे स्पष्ट करून अधिसूचनांचा विषय निकालाशी संबंधित नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरूनच सरकारने थकबाकी वसुलीचा कायदा तयार केला असा दावा या कारखानदारांनी केला होता व सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने एकूण १२ कारखान्यांच्या थकबाकी वसुलीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी राज्य सरकारने ही स्थगिती उठवण्यासाठी वसुलीची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे ठरवले होते. विद्यमान वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मात्र या प्रकरणी कडक धोरण अवलंबिले व सरकारचे हित जपण्यासाठी ऍड. श्याम दिवान यांच्याकडे हे प्रकरण सोपवले. आलेक्स सिक्वेरा यांच्या या निर्णयामुळे उपसभापती माविन गुदिन्हो यांनीही नाराजी व्यक्त केली होती. नवीन वकील नेमून सरकार खर्च वाया घालवत असल्याचा दावा माविन यांनी केला होता पण कोट्यवधींची वसुली करण्यासाठी हा खर्च करण्याची तयारी आहे, असे प्रतिआव्हान आलेक्स सिक्वेरा यांनी दिले होते. हा निकाल सरकारचा विजय असल्याचे वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात निकालाचा अभ्यास कायदा खात्यातर्फे केल्यानंतर प्रत्यक्ष वसुलीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जामीन सुनावणीवेळी संजयला अटक होणार?

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): दोन महिन्यांपासून गुन्हा अन्वेषण विभागाला गुंगारा देणाऱ्या संजय परब याला अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आहे आहेत. हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. संजय परब याने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी येत्या गुरुवारी ठेवण्यात आली आहे तर, तुरुंगात असलेला निलंबित पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर याने केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून संजय परब याला अटक करण्यात गुन्हा अन्वेषण विभागाला अपयश आल्याने आता गुन्हा अन्वेषण विभागाला आयती संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे खंडपीठाने संजय याचा अर्ज फेटाळल्यास त्याला न्यायालयाच्या बाहेर अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे "सीआयडी' त्याला अटक करणार की जाऊ देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संजय परब याच्याकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून अजून एक पोलिस निरीक्षकही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. "ड्रग पॅडलर'कडून संजय परब याला हप्ता गोळा करण्यासाठी पाठवले जात होते. त्याला कोणता पोलिस अधिकारी पाठवत होता व तो कोणा कोणाला या हप्त्याचे पैसे पुरवत होता, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

'क्रूरकर्मा कसाबला फाशीच द्यावी'

उद्या निकाल
मुंबई, दि. ४ : मुंबईत हिंसाचाराचे थैमान घालून कित्येक लोकांचे जीव घेणाऱ्या क्रूरकर्मा कसाबला फाशीच द्यावी अशी आग्रही मागणी आज सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी शिक्षेसाठीच्या युक्तिवादात केली. कसाब हे माणसे मारण्याचे पाकिस्तानात उत्पादित झालेले यंत्र असून त्याला कुणाच्या जिवाची पर्वा नाही, अशा शब्दांत निकम यांनी कसाबच्या क्रूरकृत्याचे वर्णन केले. हा गुन्हा दुर्मिळात दुर्मीळ असल्याचे सांगून ते करणाऱ्या सैतानाला केवळ मृत्युदंडच दिला पाहिजे. कसाब हा सैतानाचा दूत आहे, अशा शब्दांत त्यांनी कसाबचे वाभाडे काढले.
विशेष न्यायाधीश एम. एल. तहिलयानी यांनी या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला असून तो गुरूवारी (ता. ६) दिला जाईल. निकम आणि त्यांच्यानंतर बचाव पक्षाचे वकील के. के. पवार अंतिम युक्तिवाद करतील.
तत्पूर्वी माध्यमांसमोर बोलताना निकम यांनी सांगितले, की कसाबला फाशी मिळावी यासाठी आठ सबळ कारणे आहेत. कसाबचे कृत्य पूर्वनियोजित आणि पूर्व संचालित होते. त्याने तरुण असो की वृद्ध, हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्चन असा कोणताही भेदभाव न करता लोकांना मारले. अतिशय नियोजनपूर्वक आणि कोणतीही दयामाया न दाखवता हे कृत्य तडीस नेले. कसाब आणि अबू इस्माईल या दोघांनी मिळून ७२ जणांना मारले. त्यात १४ पोलिसांचा समावेश आहे. बाकीचे लोक असहाय्य आणि कोणत्याच प्रकारे प्रत्युत्तर देण्याच्या स्थितीत नव्हते. या मृतांपैकी आठ महिला आणि सात लहान मुले होती. कसाबने फक्त लोकांचे शिरकाणच केले असे नाही, तर त्याने या कृत्याचा "आनंदही' घेतला. मानवी जिवाची त्याला काही पर्वा नाही, हेच त्यावेळच्या फोटोतून दिसून येते.
त्या दिवशी सीएसटीवर गर्दी कमी होती, त्यामुळे जास्त माणसांना मारता आले नाही, याचे "दुःख' त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यावरून हा प्राण्यांपेक्षाही जास्त निर्घृण असल्याचे सिद्ध होते, अशा शब्दांत निकम यांनी कसाबचे क्रौर्य मांडले. बोटीने ते एक तास उशिरा आले. त्यामुळे मोठी गर्दी त्यापूर्वीच निघून गेल्याचे दुःख त्याच्या जबानीतून दिसून येते याकडे निकम यांनी लक्ष वेधले.
कसाब आणि इस्माईलनेच कुबेर या बोटीचा मालक अमरचंद सोलंकीला कोणतीही दयामाया न दाखवता मारले. एखाद्या कसायासारखे मारून कसाब आपल्या नावाला जागला, असा घणाघाती प्रहार निकम यांनी केला.

मुंबई पूर्वपदावर

मुंबई, दि. ४ : गेले दोन दिवस मुंबईकरांना वेठीस धरणारा संप अखेर मंगळवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. एस्माचा बडगा, अटक आणि दाखल केलेले गुन्हे, शिवसेना-मनसेनेने दिलेले इशारे आणि सरकारच्या वाटाघाटी यामुळे अखेर मोटरमन संघटनेने हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेसेवा सुरू झाल्या आणि मुंबई पूर्वपदावर आली.
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज दुपारी संपकरी मोटरमनची भेट घेतली. मोटरमनच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे मध्यस्थी करेल असे आश्वासन पाटील यांनी मोटरमन संघटनेला दिले. मोटरमनच्या न्याय्य मागण्यांसाठी समिती नियुक्त करण्यात येईल, कारवाई म्हणून अटक केलेल्या मोटरमनांची सुटका करण्यात येईल, त्यांच्यावर लावलेले फौजदारी गुन्हे मागे घेण्यात येतील, रेल्वेकडून होणारी शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येणार नाही.
पगारवाढीसह इतर काही मागण्यांसाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या ८०० मोटरमननी सोमवारी उपाशीपोटी लोकल चालवण्याचे आंदोलन सुरू केले होते. शिवसेनेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या आंदोलनात नंतर भाजपनेही उडी मारली. मुंबईतील ७० लाख प्रवाशांना या संपाचा फटका बसला असून सीएसटी, चर्चगेट, दादर अशा स्टेशनांच्या परिसरात तर अराजकसदृश स्थितीच निर्माण झाली.
दरम्यान, सीएसटी स्टेशनवर बेकायदेशीररीत्या जमाव करून रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपावरून आंदोलन करणाऱ्या १७० मोटरमनना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संध्याकाळनंतरही आंदोलन सुरूच ठेवल्यास त्यांच्यावर अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत (एस्मा) कारवाई करण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार होता.

निठारीप्रकरणी कोहली दोषी

गझियाबाद, दि. ४ : निठारी हत्याकांडातील आरती या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी मोहिंदर सिंग पंढेर याचा नोकर सुरेंदर कोहली याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) दोषी ठरविले आहे. या खटल्यात ११३ सुनावण्या झाल्या. ४६ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या होत्या. त्यानंतरच न्यायालयाने आज अंतिम सुनावणी करण्याचे निश्चित केले होते. निठारीत राहणाऱ्या दुर्गा प्रसाद यांच्या सात वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी हा खटला सुरू होता.
२५ सप्टेंबर २००९मध्ये आरती शाळेतून आल्यानंतर चॉकलेट घेण्यासाठी गेली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती परतली नाही. त्यामुळे दुर्गा प्रसाद यांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर २९ सप्टेंबरला पोलिसांनी संशयावरून मोनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंदर कोहली याला अटक केली. पंढेरच्या घरातून लहान मुलांचे कपडेही जप्त केले. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले.
सीबीआयने आत्तापर्यंत १९ खटले दाखल केले आहेत. पंढेरच्या घरातून मिळालेल्या कपड्यात आरतीचेही कपडे सापडले होते. त्यावरून सीबीआयने दुर्गा प्रसाद आणि त्यांचा मुलगा सूरज यांची डीएनए चाचणी केली. त्यानंतर पंढेरच्या घरात सापडलेली कवटी आणि दुर्गा प्रसाद यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यावरून पंढेर यानेच आरतीचा खून केल्याचे उघडकीस आले. तेव्हापासून या खटल्याच्या सुनावणीबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. पंढेर याच्या शिक्षेबाबत बुधवारी निर्णय होईल, अशी शक्यता आहे.

Tuesday 4 May, 2010

कसाब दोषी, ८६ आरोप सिद्ध

मुंबई, दि. ३ - २६ / ११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल अमीर कसाबला आज विशेष कोर्टाने दोषी ठरवले. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, या अत्यंत गंभीर आरोपासह कसाबवर ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व ८६ आरोप विशेष न्यायमूर्ती एम. एल. ताहिलियानी यांनी मान्य केले आहेत. आता कसाबला काय शिक्षा द्यायची, याबाबतची सुनावणी उद्या होणार आहे.
दुसरीकडे, याच खटल्यातील अन्य दोन संशयित फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन शेखला विशेष कोर्टाने निर्दोष ठरवले आहे. अबू इस्माईलकडे मिळालेला मुंबईचा नकाशा फहीम अन्सारीने दिल्याचे पुराव्यांवरून सिद्ध होऊ शकत नाही, असे न्या. ताहिलियानी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या दोघांवर अन्य कुठलाही खटला नसेल, तर त्यांना लगेचच मुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मुंबई दहशतवादी हल्ला खटल्याचा निकाल काय लागणार ? कसाबला फाशी होणार का? याकडे आज सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. या हल्ल्यात बळी पडलेल्या १६६ निष्पाप देशी-परदेशी नागरिकांना आणि सर्व शहीद अधिकारी-जवानांना न्याय मिळावा, अशी सगळ्यांचीच इच्छा होती. विशेष कोर्टाने कसाबला दोषी ठरवल्याने ती अर्धी पूर्ण झाली आहे. भारताविरोधात युद्ध पुकारण्याचा कट रचणे, कटाच्या पूर्ततेसाठी एके-४७, ग्रेनेड, पिस्तूल, आरडीएक्स आदी शस्त्रे जमवणे, भारतीय आणि परदेशी नागरिकांचा हेतुपूर्वक आणि निर्घृण खून करणे, त्यांना गंभीर जखमी करणे, खासगी आणि सरकारी मालमत्तेची हानी करणे, हत्यारांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देणे, परवाना नसताना बेछूट गोळीबार करणे, स्फोट घडवून आणणे, असे एकूण ८६ आरोप न्या. ताहिलियानी यांनी मान्य केले आणि कसाबच्या शिक्षेची सुनावणी उद्या सुरू होणार असल्याचे जाहीर केले.
वर्षभर चाललेल्या या खटल्यातील सर्व साक्षी-पुरावे लक्षात घेऊन १५२२ पानांचे निकालपत्र न्या. एम. एल. ताहिलियानी यांनी तयार केले आहे. त्याचे वाचन आज दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी सुरू झाले आणि कसाबवरच्या एकेका आरोपावर न्यायमूर्ती महोदयांनी आपली मते नोंदवली. देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपावर त्यांनी सर्वांत जास्त वेळ भाष्य केले. एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेली साक्षही या निकालपत्रात ग्राह्य धरण्यात आली आहे.
तुकाराम ओंबळे, अंबादास पवार या पोलिस कर्मचाऱ्यांसह सात जणांच्या हत्येचा कसाबवरचा आरोप विशेष कोर्टाने मान्य केला आहे. तसेच, ताज आणि ओबेरॉय हॉटेलमधल्या दहशतवाद्यांना मदत केल्याचाही ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या खटल्यात ३५ संशयित आरोपी "वॉंटेड' असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले होते. परंतु, २० आरोपी "वॉंटेड' असल्याचं कोर्टाने मान्य केले आहे. त्यात झकीऊर रेहमान लख्वी, हाफीझ सईद, अबू हमजा यांची नावे आहेत.
आज कसाबला दोषी ठरवल्यानंतर आता उद्यापासून कसाबच्या शिक्षेबाबतचा युक्तिवाद सुरू होणार आहे. खरे तर त्याला कसाबच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. एक दिवस आणखी देण्याची विनंती त्यांनी केली होती, परंतु ती फेटाळून लावण्यात आली.

फहीम, सबाउद्दीन निर्दोष
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला मुंबईचे नकाशे पुरवून हल्ल्यात मदत केल्याचा आरोप फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन शेख या दोघा भारतीयांवर होता. नेपाळला जाऊन फहीमने हे नकाशे दहशतवाद्यांना दिले होते, असा पोलिसांचा दावा होता. त्यावेळी फहीमला पाहणाऱ्या नुरूद्दीनला साक्षीदार म्हणूनही कोर्टात सादर करण्यात आले होते. परंतु, फहीम नेपाळला गेल्याचा कुठलाही पुरावा सरकारी पक्ष देऊ शकलेला नाही, असे स्पष्ट करत न्या. ताहिलियानी यांनी फहीम आणि सबाउद्दीनला निर्दोष मुक्त केले. मुंबईची माहिती आणि नकाशे इंटरनेटवर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, त्यामुळे अबू इस्माईलकडे मिळालेला नकाशा फहीमने दिलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

कसाबची मान खालीच!
या संपूर्ण खटल्यात आपल्या विक्षिप्तपणाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारा कसाब आज पूर्ण वेळ खाली मान घालून बसला होता. कधी छद्मीपणे हसणारा, कधी रडणारा, कधी निकम यांच्याकडे पाहून हातवारे करणारा कसाब आज कशी प्रतिक्रिया देतो, याबद्दल कोर्टात सगळ्यांनाच कुतूहल होते. परंतु, निकालपत्राचे वाचन सुरू असताना आणि दोषी ठरवल्यानंतरही कसाब जमिनीकडे एकटक नजर लावून बसला होता. त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही.

देशाच्या इतिहासातील सर्वांत वेगवान सुनावणी झालेल्या या खटल्याचे कामकाज ८ मे २००९ रोजी सुरू झाले होते. यासाठी ऑर्थर रोड जेलमध्ये खास न्यायालय बनविण्यात आले होते. २७१ दिवस चाललेल्या कारवाई दरम्यान ६५८ जणांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तर ३,१९२ पानांचे पुरावे सादर करण्यात आले होते. दरम्यान, निकाल सुनावणी पूर्वी खटल्याचे कामकाज सुरू असलेल्या ऑर्थर रोड न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तुरुंगाकडे जात असलेल्या साने गुरूजी मार्गावर अनेक ठिकाणी पोलीस चौक्या बनविण्यात आल्या असून या भागातील चार कि.मी परिसरात कमांडो गस्त सुरू होती.
"फहीम व सबाउद्दीनबाबत
निकालाला आव्हान देणार'

मुंबई, दि. ३ - मुंबई हल्ल्याच्या कटातून फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्याने मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, फहीम व सबाउद्दीनबाबत दिलेल्या निकालाला वरच्या कोर्टात आव्हान दिले जाईल, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
अन्सारी आणि सबाउद्दीन हे दोघेही कुख्यात दहशतवादी आहेत. ते लष्कर ए तोयबाचे सक्रिय सदस्य आहेत. ते स्लिपर सेलचे घटक नाहीत, असे सांगून त्यांच्याविरोधात सरकार या निकालाला आव्हान देईल, असे त्यांनी जाहीर केले.
फहीम आणि सबाउद्दीन हे मुंबई हल्ल्याच्या कटात गुंतलेले केवळ दोन भारतीय होते. अन्सारीने या हल्ल्यासाठी नकाशे बनविले आणि नेपाळमध्ये ते सबाउद्दीनकडे सोपविले. पुढे सबाउद्दीनने ते लष्कर ए तोयबाकडे पाठविले असे त्यांच्यावर आरोप होते.
हे आरोप सिद्ध होण्यासाठी सरकारी पक्ष नुरूद्दीन या एकमेव साक्षीदारावर विसंबून राहिला. अन्सारीने सबाउद्दीनकडे नकाशे सोपविले, त्यास नुरूद्दीन हा साक्षीदार होता. त्यातला एक नकाशा कसाबच्या बरोबर असलेल्या आणि गिरगाव चौपाटीवर चकमकीत मरण पावलेल्या अबू इस्माईल या दहशतवाद्याच्या खिशात सापडल्याचा सरकारी पक्षाचा दावा होता.
नुरूद्दीन नेपाळला गेल्याचा कोणताही पुरावा न्यायालयाला आढळला नाही. तसेच हा नकाशा इस्माईलच्या खिशात असता तर त्याला माती लागली पाहिजे होती वा त्यावर रक्ताचे डाग पडायला हवे होते, असा बचाव पक्षाचा दावा होता. न्यायालयाने तो मान्य केला.

रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींचा विषय अखेर निकालात

विशेष पदांची निर्मिती
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- गेली पाच वर्षे सरकारी सेवेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व फक्त राजकीय दुःस्वासाचे बळी ठरलेल्या रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींना न्याय देण्याची सुबुद्धी अखेर सरकारला सुचली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रशिक्षणार्थींचा विषय अखेर निकालात काढण्यात आला. सरकारी सेवेत रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या सुमारे ७३७ प्रशिक्षणार्थींना कार्मिक खात्याअंतर्गत विशेष पदे निर्माण करून पुढील महिन्यापासून सरकारी वेतनश्रेणी लागू केली जाईल. विविध खात्यांतर्गत निर्माण होणाऱ्या पदांवर कालांतराने त्यांची नेमणूक करून टप्प्याटप्प्याने त्यांना सेवेत कायम करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली. यापूर्वी सुमारे ९४ प्रशिक्षणार्थींना विविध खात्यात कायम करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वर्षाकाठी १२.३० कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडेल. विशेष पदे निर्माण करून प्रशिक्षणार्थींना सरकारी वेतनश्रेणी लागू केली जाणार असली तरी जोपर्यंत त्यांची सेवा नियमित होत नाही तोपर्यंत हे प्रशिक्षणार्थी बढती किंवा इतर तत्सम हक्कांसाठी पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार सरकारी प्राथमिक शिक्षक - १, स्टेनो- टायपीस्ट- १०४, एल. डी. सी. - ५४२ व चालक - ९० अशी ही पदे आहेत व ती येत्या तीन वर्षांच्या कालावधीत नियमित करण्यात येणार आहेत.
पंचायत खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या वेळी दोन पंचायतींना समान प्रकल्प राबवायचा असेल तर त्यांना स्वतंत्र खासगी यंत्रणेमार्फत हा प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा प्रकल्प राबवताना त्याची जबाबदारी पंचायत संचालकांकडे असेल. या व्यतिरिक्त इतरही काही खात्यांत सुमारे शंभर पदे निर्माण करण्यात आली असून त्यांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

माओवाद्यांचा "नेपाळ बंद'

पंतप्रधानांचा राजीनाम्यास नकार
काठमांडू, दि. ३ - पंतप्रधान माधवकुमार नेपाळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सकाळपासूनच माओवाद्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. पण, यानंतरही पंतप्रधानांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने देशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
माधवकुमार नेपाळ यांचे सरकार शांतता प्रक्रियेबाबत अजिबात गंभीर नाही, तसेच राज्यघटना तयार करण्याबाबतही ते उदासीन आहे, अशी टीका माओवाद्यांचे नेते प्रचंड यांनी केली आहे. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठीच हे आंदोलन पुकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करणारे सरकार देशवासीयांना हवे आहे. सध्याच्या सरकारला जनतेचे समर्थन नाही, असा दावाही त्यांनी केला.
पण, आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढत नेपाळ यांनी पंतप्रधान पद सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, संप, आंदोलन यांनी समस्या सुटत नसतात. माओवाद्यांनी आपले आंदोलन मागे घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आजच्या या संपामुळे नेपाळमधील जनजीवन मात्र विस्कळीत झाले होते.

मांडवी पुलाखाली कामगाराचा मृतदेह

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- मांडवी पुलाखाली असलेल्या गाड्यांच्या मागच्या बाजूला ईस्माईल अब्दुल कादर (३५) या मूळ ओरिसा येथील कामगाराचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी खुनाची घटना नोंद केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी श्रीशेखर श्रीधर कांबळी (३६) याला ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली असल्याच दावा पणजी पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी संशयित कांबळी याच्याविरुद्ध भा.द.स ३०२ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
ईस्माईल व संशयित कांबळी यांचे काही दिवसापूर्वी कडाक्याचे भांडण होऊन मारामारी झाली होती. यात कांबळी याच्या डोक्याला जखम झाल्याचे चार टाके पडले होते. आज सकाळी मांडवी पुलाच्या खाली असलेल्या गाड्यांच्या मागच्या बाजूस ईस्माईल याचा मृतदेह सापडल्याने पोलिसांनी संशयित कांबळी याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून ताब्यात घेतले. आज सकाळी तो डोक्यावरील टाके काढण्यासाठी इस्पितळात गेला होता.
मयत ईस्माईल आणि कांबळी हे दोघे मित्र होते. या गाड्यांच्या मागील बाजूस टाकण्यात येणारा कचरा गोळा करून तो विकून ते आपला उदरनिर्वाह करत होते. चार दिवसापूर्वी कांबळी याला ईस्माईल याने जबर मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी कांबळीने काल रात्री ईस्माईलवर अवजड हत्याराने वार केला. यात ईस्माईल ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहेत.

डोंगरकापणी नियंत्रणासाठी भरारी पथक स्थापणार

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- डोंगरकापणी व शेतजमिनीत बेकायदेशीररीत्या भराव टाकण्यावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारतर्फे प्रत्येक तालुका पातळीवर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली नगर नियोजन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्य नगर नियोजक मुराद अहमद, नगर नियोजन सचिव, प्रादेशिक आराखडा २०२१ चे नोडल अधिकारी संजित रॉड्रिगीस व उपनगर नियोजक विनोद कुमार हजर होते. नगर नियोजन कायदा, १९७४ मध्ये बदलत्या परिस्थितीनुसार दुरुस्ती सुचवण्यासाठी कायदेतज्ज्ञांची एक विशेष समिती स्थापन करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. एखाद्या प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष मान्यता मिळवलेल्या आराखड्याव्यतिरिक्त चुकीचा आराखडा प्रसिद्ध करून जाहिराती करण्याचे प्रकार वाढल्याने त्याची गंभीर दखल घेण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. प्रादेशिक आराखडा २०२१ जलद गतीने पूर्ण करण्यासाठी तांत्रिक सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अतिरिक्त निधीची तजवीज करण्यावरही या बैठकीत एकमत झाले. पर्यावरणीय संवेदनशील भागांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारतर्फे यापूर्वीच समिती स्थापण्यात आली आहे.

महिला आयोग सुस्त, दलाल "बिनधास्त'

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - अमली पदार्थानंतर "सेक्स रॅकेट'च्या व्यवसायाने गोव्यात जम बसवायला सुरुवात केलेली असताना याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याच्या आविर्भावात सरकारी यंत्रणा वावरत आहे. राज्य महिला आयोगाने याची अद्याप कोणतीच दखल घेतलेली नाही. गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा एझिल्डा सापेको यांना याविषयी विचारले असता, "आपल्याला या विषयीची कोणतीही माहिती नाही, तसेच कोणी तक्रार दिल्यास मगच आम्ही त्यावर अभ्यास करून कारवाई करू' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या विदेशी ललनांसाठी ग्राहक पाहण्याचे काम देशी दलाल करीत असून त्यासाठी त्यांनी विशेष यंत्रणा प्रस्थापित केली आहे. संकेतस्थळावर या गोऱ्या ललनांशी संपर्क साधण्यासाठी या दलालांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच, त्या तरुणींची छायाचित्रेही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्राहकाने ठरलेली किंमत देण्याचे मान्य करताच एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान खोली आरक्षित करण्यास सांगितले जाते. यानंतर अलिशान वाहनाने त्या तरुणींना ग्राहकांपर्यंत आणून सोडले जाते.
त्याचप्रमाणे, या विदेशी तरुणींना "एस्कॉर्ट' म्हणूनही वापरले जात आहे. विमानतळ ते गोवा सोडेपर्यंत या तरुणींना बरोबर ठेवले जाते. गोव्याबाहेरून येण्यापूर्वी या "एस्कॉर्ट' तरुणींना भली मोठी रक्कम देऊन "बुक' केले जाते. त्यासाठी संकेत स्थळाचीच मदत घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्यवसायातील एखाद्या मोठ्या "डील'साठीही या विदेशी तरुणींची मदत घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अमली पदार्थ व इतर घोटाळ्यांमुळे राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम होत असताना महिलांना अनैतिक व्यवसायात ओढणारा व्यवसाय आपली पाळेमुळे घट्ट करू पाहत आहे. मात्र, महिला आयोगासारख्या संघटनांनी या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मेहसूद जिवंत आहे!

महिन्याभरात अमेरिकेवर हल्ल्याचा इशारा

नवे दोन व्हिडिओ जारी
टाइम्स स्क्वेअर हल्ल्याची जबाबदारी

वॉशिंग्टन, दि. ३ - अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला असावा, अशी ज्याच्याविषयी शंका व्यक्त केली जात होती तो पाकिस्तानी तालिबानचा नेता हकीमुल्ला मेहसूद जिवंत असून त्याने नवा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने अमेरिकेवर पुन्हा हल्ल्याची धमकी दिली आहे.
आत्तापर्यंत केवळ अल कायदानेच अशा पद्धतीने अमेरिकेवर हल्ल्यांच्या धमक्या दिल्या होत्या, त्यांचेच व्हिडिओ जारी करण्याचे तंत्र वापरून प्रथमच तालिबानने अमेरिकेला धमकी दिली आहे. जवळपास ९ मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. ४ एप्रिल रोजी तो तयार करण्यात आल्याचे अमेरिकेच्या तपास संस्थांचे म्हणणे आहे.
यात मेहसूद झळकत होता. त्याने म्हटले की, अमेरिकेच्या मोठ्या शहरांवर फियादीन हल्ले होणार आहेत. ती वेळही लवकरच येत आहे. काही दिवसात किंवा एका महिन्यातच जबरदस्त यशस्वी हल्ल्यांचा प्रत्यय अमेरिकेला येणार आहे. माझ्या मृत्यूविषयी बराच अपप्रचार करण्यात आला. पण, काही विरोधकांनी जाणीवपूर्वक हे खोटे वृत्त पसरविल्याचेही मेहसूदने म्हटले आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून अतिरेक्यांची ठिकाणे नष्ट करण्यासाठी अमेरिकेने पाक-अफगाण सीमेवर ड्रोन हल्ले सुरू ठेवले आहेत. चार महिन्यांपूर्वी केलेल्या हल्ल्यात मेहसूद मारला गेला असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर आणि अमेरिकेने केला होता. त्यानंतर सातत्याने तो जिवंत आहे की मेला, याविषयी उलट-सुलट बातम्या येत राहिल्या. पण, आता नव्या व्हिडिओमुळे मेहसूद जिवंत असल्याचा पुरावाच मिळाला आहे.

टाइम्स स्क्वेअर हल्ल्याची जबाबदारी
रविवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी फसलेल्या हल्ल्याची जबाबदारीही तेहरिक-ए-तालिबानने घेतली आहे. जारी करण्यात आलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तालिबानने या हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. अल कायदाचे आमचे बांधव आणि तालिबानचे अनेक नेते यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी न्यूयॉर्क येथे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये मेहसूदने म्हटले आहे. विशेषत: बैतुल्लाह मेहसूद याच्या हत्येचा हा बदला असल्याचेही सांगण्यात आले आहे. जितके दु:ख अमेरिकेने आम्हाला दिले आहे तितक्याच वेदना त्या देशाला आता पाहाव्या आणि सहन कराव्या लागणार आहे.
या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मात्र कारी हुसैन दिसतो आहे. हुसैन हा तालिबानच्या आत्मघाती पथकाचा प्रशिक्षक मानला जातो. आणखी एका वेबसाइटने न्यूयॉर्कवरील हल्ल्याचा प्रकार हा इराकी अल-कायदाचे नेते अबू अयूब अल मासरी आणि अबू उमर अल बगदादी यांच्या हत्येचा बदला असल्याचेही म्हटले आहे.

Monday 3 May, 2010

२६।११ च्या खटल्याचा आज निकाल

संपूर्ण जगाचे लक्ष मुंबईकडे
मुंबई, दि. २ - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर २६।११ ला झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल आमिर कसाब आणि इतर दोन आरोपींवर चालविण्यात आलेल्या खटल्याचा उद्या निकाल लागणार असून, भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
पाकिस्तानच्या फरीदकोटचा राहणारा कसाब आणि त्याच्या इतर ९ साथीदारांनी हा दहशतवादी हल्ला करून १६६ निरपराध नागरिकांचे बळी घेतले होते. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचाही समावेश होता. याशिवाय ३०४ जण या हल्ल्यात जखमी झाले होते. या दहशतवाद्यांना फहीम अन्सारी आणि शहाबुद्दीन अहमद या दोघांनी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोघांनी लष्कर-ए-तोयबाच्या सांगण्यावरून ज्या ठिकाणांना लक्ष्य करायचे होते त्यांचे नकाशे व इतर माहिती पुरविली होती.
या खटल्यात ह तिघेही दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ८ मे रोजी सुरू झालेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी आर्थर रोड कारागृहात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. यादरम्यान २७१ कामांच्या दिवसात ६५८ जणांची साक्ष नोंदवून ३,१९२ पानांचे पुरावे गोळा करण्यात आले होते. न्या. एम. एल. तहलियानी यांच्या न्यायालयात एकूण ३० साक्षीदारांनी कसाबची ओळख पटवली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबविरोधात जास्तीत जास्त पुरावे कसे सादर करता येतील यासाठी अथक परिश्रम घेतले. उद्या सोमवारपासून या खटल्याच्या निकालास सुरूवात होणार असून, ही प्रक्रिया आठवडाभर चालण्याची शक्यता आहे. एखाद्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात चालविण्यात आलेल्या खटल्याचा निकाल एवढ्‌या लवकर लागण्याची भारतातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.
आर्थर रोड कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था
दरम्यान उद्या या खटल्याच्या निकालाची प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या पाश्वभूमीवर आर्थर रोड कारागृह आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. न्यायालय परिसर आणि कसाबला ज्या खोलीत ठेवण्यात आले आहे त्याभोवती अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेल्या पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.साने गुरूजी मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय कारागृह परिसरात वाळूच्या पोत्यांच्या भिंती तयार करण्यात आल्या असून, त्याठिकाणी तैनात असलेले सुरक्षा रक्षक डोळ्यात तेल घालून चोवीस तास पहारा देत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
कारागृहासमोरील रस्त्यावर एकतर्फी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांचे क्रमांक नोंववून ठेवण्यात येत आहेत. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो-तिबेट सीमा पोलिसांचे २०० जवान तैनात करण्यात आले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

भारत "सुपर एट'मध्ये

सेंट ल्युसिया - मधल्या फळीत सुरेश रैनाने झळकाविलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १४ धावांनी पराभव करून विश्वचषक ट्वेंटी २० स्पर्धेच्या "सुपर एट' गटात प्रवेश केला. त्यापूर्वी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता.

मेगा प्रकल्पावरून चिंबल ग्रामसभेत प्रचंड गोंधळ

-वृक्षसंहाराचा मुद्दा दुर्लक्षित
-ज्वलंत प्रश्नांवर चर्चा टाळली


पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- झाडांची कत्तल करून मेगा प्रकल्प उभारण्यात येत असल्याच्या मुद्यावर सरपंचांच्या समर्थकांनी विरोधकांना रोखण्याच्या प्रयत्न केल्याने आज चिंबलची ग्रामसभा वादळी ठरली. यावेळी गोंधळ सतत वाढत गेल्याने अखेर ग्रामसभा तहकूब करण्यात आली. ग्रामसभेनंतर सरपंच चंद्रकांत कुंकळ्ळकर यांनी सभेत सर्व मुद्यांवर चर्चा झाली असल्याचा दावा केला तर, विरोधकांनी कोणतेच मुद्दे चर्चेस घेण्यात आले नाहीत अथवा एकही ठराव मांडण्यास देण्यात आला नाही, असे सांगितले.
सरपंचांनी भाड्याने आणलेल्या माणसांनी गोंधळ माजवून सभा बंद पाडली असा आरोप चिंबल ग्रामसेवा कला आणि सांस्कृतिक मंचाने केला आहे. झाडांची कत्तल करून मेगा प्रकल्प उभारू पाहणारा विषय चर्चेसाठी आला असता यावेळी सत्ताधाऱ्यांच्या माणसांनी ग्रामसभेत जोरदार गोंधळ माजवला. या गोंधळातच सरपंचानी ग्रामसभा संपल्याचे जाहीर केले. हे पूर्णपणे चुकीचे असून या विषयांवर विशेष ग्रामसभा बोलवण्याची मागणी मंचाचे अध्यक्ष रुमालियो फर्नांडिस यांनी केली आहे.
गेल्या काही ग्रामसभांत सरपंच चंद्रकांत कुंकळ्ळकर यांनी ग्रामसभेचे कामकाज अवैध पद्धतीने हाताळले असून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून ग्रामस्थांना विविध प्रश्न उपस्थित करण्यास अटकाव केला जातो व महत्त्वाच्या विषयांवर चर्चाच केली जात नसल्याचा आरोप रुमालियो यांनी केला. चिंबल पंचायतीसमोर अनेक समस्या व अडचणी आहेत. या भागातील वृक्षसंहार, मेगा प्रकल्प, अतिरिक्त झोपडपट्ट्या, कचऱ्याची दुर्गंधी, अनुसूचित जमातीच्या लोकांच्या शेतांची नासाडी अशी मुद्यांवर आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आहे. मेगा प्रकल्पासाठी कशा पद्धतीने बेकायदेशीर झाडांची कत्तल केली आहे, याची छायाचित्रे आज ग्रामसभेत ठेवली असता सत्ताधाऱ्यांनी गोंधळ माजवला, असे ते म्हणाले. बळाचा वापर करून ग्रामस्थांवर दबाव घालण्याचा प्रयत्न पंचायत मंडळाकडून केला जात आहे. असे चित्र आज ग्रामसभेत दिसले.

तीन संशयास्पद वाहने "नाकाबंदी'तून निसटली!

दक्षिण गोव्यात मॉकड्रिल

पणजी, काणकोण, मडगाव, दि.२ (प्रतिनिधी)- अमेरिकेच्या सूचनेनंतर दिल्ली "हाय अलर्ट'वर असतानाच आज अचानक दक्षिण गोवा पोलिसांनी नाकाबंदी केल्याने एकच खळबळ माजली. गोवा पोलिसांची याबाबतची तयारी पाहण्यासाठी आज दुपारी गृहखात्याने पाच वाहनांत बंदुका लपवून त्यांना कोणत्याही वाटेने कारवारला जाण्याची गुप्त सूचना दिली. तर, दुसऱ्या बाजूने संपूर्ण दक्षिण गोव्यात नाकाबंदी करून जे संशयास्पद वाहन दिसेल त्याची माहिती वरिष्ठांना द्या, अशी सूचना करून दुपारी ४ ते ९ पर्यंत नाकाबंदी करण्याचा आदेश देण्यात आला. यात पाच वाहनांपैकी केवळ दोन वाहने जप्त करण्यास दक्षिण गोवा पोलिसांना यश आले तर, तीन वाहने सहीसलामत पोलिसांची नजर चुकवून कारवारच्या दिशेने पसार होण्यास यशस्वी झाले, अशी माहिती रात्री उपलब्ध झाली.
मात्र नाकाबंदी मुळे सर्वत्र गोंधळ माजल्याने आणि लोक भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या नाकाबंदीत आर्ले व केपे येथे बंदुका असलेली दोन वाहने ताब्यात घेण्यास नाकाबंदीवरील पोलिसांनी यश आले. मात्र जी तीन वाहने ज्या मार्गातून गेली व त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली नाही, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याविषयी उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांना विचारले असता, गोव्यात कोणतेही हाय अर्लट नसून हे केवळ "मॉकड्रिल' असल्याचे त्यांनी सांगितले.
काणकोणमध्ये गैरसोय
काणकोण तालुक्यातील क्र. १७ महामार्गावर तसेच काही अंतर्गत रस्त्यांवरून धावणाऱ्या चारचाकी व अन्य मोठ्या वाहनांची तपासणी केली जात होती. या नाकाबंदी मोहिमेचे नेतृत्व पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी केले. शस्त्रसज्ज पोलिस शिपाई त्यांना या कामी मदत करत होते. यावेळी चाररस्ता येथे वाहने थांबवून प्रवाशांची व पर्यटकांच्याही सामानाची तपासणी करण्यात येत होती. तसेच वाहन क्रमांक, वाहन चालकाचे नाव व अन्य माहितीही नोंद करण्यात येत होती.
देवबाग, पोळे, पान्ना, चाररस्ता येथे मोक्याच्या जागी कसून तपासणी केल्यामुळे स्थानिक नागरिक चौकस दिसून आले. याविषयी पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाईंना विचारले असता, ही नेहमीप्रमाणे एक पोलिस कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण दक्षिण गोव्यात ही नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी ४ वाजल्यापासून नाकाबंदीला सुरुवात करण्यात आली होती. तसेच सावर्डे येथील गार्डियन एंजल चर्चमधील काही मूर्तींना अज्ञातांनी नुकसान पोहोचविल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत असल्यातेही सांगितले जात होते. तर, असोळणे येथील जेटवरून मासळीवाहू वाहने रस्त्यावर रक्तमिश्रीत पाणी सोडत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
काणकोण पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाकाबंदी करण्याविषयीचा आदेश बिनतारी संदेशाद्वारे असल्याने काणकोण पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे सांगितले.

सरकारी कर्मचारी संघटना; मंगलदास शेटकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) - सरकारी कर्मचारी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी मंगलदास एल. शेटकर यांची पुन्हा नव्याने निवड झाली. आज सकाळी पणजी येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात संघटनेच्या इतिवृत्ताला मान्यता दिल्यानंतर २०१० ते २०१२ या काळासाठी निवडणुका घेण्यात आल्या. यात अशोक शेट्ये व युसिबीयो ब्रागांझा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी ुगुप्त मतदान पद्धतीद्वारे त्यांची निवड करण्यात आली.
तर अन्य पदाधिकारी खालील प्रमाणेः जॉन नाझारेथ (सरचिटणीस), एस्टिवम पो (खजिनदार), विठ्ठल राऊत, प्रशांत देवीदास व नागेश पी. नाईक यांची सचिवपदी निवड झाली आहे. तसेच, बेनेदिता गुधीन्हो, दीपक देसाई, शैलेश फातर्पेकर, नागेश नाईक, जनार्दन आराबेकर, रोहिदास नाईक, स्नेहा मांद्रेकर व तुळशीदास यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

गोऱ्या मेमचे "सेक्स रॅकेट' तेजीत!

पोलिसांचे दुर्लक्ष की सहकार्य?

प्रीतेश देसाई
पणजी जि. २ - गोवा पोलिस खात्याच्या आणि गुन्हा अन्वेषण विभागाच्या नाकावर टिच्चून खुलेआम पणे "गोऱ्या मेम' ना हाताशी धरून सेक्स रॅकेट चालवण्याचा धंदा गोव्यात जोमाने सुरू असल्याची माहिती उघडकीस आली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून हा धंदा जोरात सुरू असून पोलिस यंत्रणा मात्र झोपी गेल्याचे सोंग घेऊन वावरत आहे. कोणाच्या आशीर्वादाने या व्यवसायाला गुप्त संरक्षण दिले जात आहे, असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिस खात्याच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वर्तमानपत्रात लेख लिहून या "धंद्या'बद्दल वाच्यता फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याकडेही या खात्याने दुर्लक्ष केले. या व्यवसायात प्रचंड पैसा असल्याने आंतरराष्ट्रीय माफिया येथील काही दलालांना हाताशी धरून हा धंदा चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, या व्यवसायातील पैसे दहशतवादी कारवायांसाठीही वापरला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोव्यात जोम धरू पाहणाऱ्या या "देशी' व "विदेशी' ललनांच्या शरिरविक्रीच्या धंद्यावर आळा बसवण्यात मात्र गोवा पोलिसांना अद्याप तरी अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमली पदार्थाच्या तस्करी आणि विक्री व्यवसायात आधीच गुंतलेल्या या रशियनांचा आता या धंद्यात मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची माहिती आहे. पोर्तुगीज जोखडातून मुक्त असलेला गोवा आता रशियनांच्या घशात जाण्याची वेळ आली आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. व्यापारानिमित्त गोव्यावर ताबा मिळवलेले पोर्तुगीज गेले आणि "व्यवसाया'निमित्त गोव्यावर नजर रोखून असलेले विदेशी गोव्याला गिळंकृत करण्यासाठी आले आहेत. केवळ राज्यातील जमिनीच नव्हे तर इथल्या संस्कृती आणि सभ्यतेलाही घशात घालण्याचा या "विदेशीं'चा डाव असावा.
राज्यातल्या गर्भश्रीमंत, आणि विदेशी पर्यटकांवर नजर केंद्रित करून खास पाश्चिमात्य भूमीवरील "ललनां'ना गोव्यात आयात करण्याचे प्रकार गोव्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. संकेत स्थळावर या गोऱ्या कांतीच्या ललनांचे छायाचित्र टाकून येथील दलालांचे दूरध्वनी क्रमांक त्यावर देण्यात आले आहे. या निळ्या डोळ्यांच्या, गोऱ्या कांतीच्या आणि सुवर्ण कुंतलधारी ललनांसाठी एका वेळेस १००० डॉलर्स म्हणजे ४५ हजार रुपये रोख रक्कम दिली जाते. त्यांचा सौदा करणारे हे राज्यातील वा देशातील मोठमोठे उद्योजक वा विदेशातील लक्ष्मीपती असतात. या विदेशी बालांचा थाट अगदी न्यारा असतो. त्यांची ने-आण करण्यासाठी लक्झरी गाडी तर त्यांना उतरण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्या आरक्षित केल्या जातात. एक स्थानिक वाहन चालक त्यांच्या योग्य ठिकाणी ने-आण करण्याची जबाबदारी स्वीकारतो. प्रथमदर्शनी कुणालाही "टुरिस्ट' भासाव्यात अशा या विदेशी वारांगना जिथे पाश्चिमात्य पर्यटक, उद्योजकांची गरज भागवतात, तिथेच स्थानिक "पैशेकारां'चीही साथ देतात. रेव्ह पार्टी व एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत त्यांच्या कुशीत बसून त्यांचा "भाव' वाढवण्याचे कार्य ते करतात. राज्यातल्या मोरजी, कळंगुट, हणजूण तसेच साळगाव आणि आता पणजी सारख्या भागातही हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
देशी धनाढ्य आणि विदेशी "क्लाईंट' यांच्यावर नजर ठेवून, जिथे अमली पदार्थांची आवक त्यांनी राज्यात वाढवली आहे, त्याप्रमाणेच मदनिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढवली जात आहे. खास "विदेशी मेम' राज्यातल्या "देशी' वारांगनांना मागे टाकत राज्यात आपला जम बसवत आहेत. विशेष सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात काही पाश्चिमात्य मुली या कामात गुंतल्या असून, सायबर कॅफेत बसून इंटरनेटच्या माध्यमातून देशी विदेशी ग्राहकांना आपल्या गळी उतरवत आहेत. त्यांना स्थानिकांची मदत मिळत असून, हे स्थानिक युवक त्यांच्या, त्यांना राज्यात आणलेल्यांच्या आणि ग्राहकांच्या दरम्यान "दुवा' साधतात.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे "या' मुलींचे एका पोलिस अधिकाऱ्याशी संबंध असून, किनारी भागात त्यांना वारंवार एकत्रही पाहिले गेले असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार कुंपणच शेत खात असल्याप्रमाणे असून, त्याला वेळीच आळा घातला गेला नाही तर राज्यात दिवसेंदिवस बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागण्यास फार काळ लागणार नाही.

Sunday 2 May, 2010

बोगस "आरसी बुक्स'चा राज्यात प्रचंड सुळसुळाट

वाहनचोरांची टोळी व वाहतूक अधिकाऱ्यांचे साटेलोटे शक्य

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- पणजी पोलिसांनी छडा लावलेल्या वाहन चोरी प्रकरणात मोठ्या प्रमाणात बोगस वाहन नोंदणी पुस्तिकांचा ("आरसीबुक्स') वापर झाल्याचे आढळले आहे. पणजीचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी यासंबंधी वाहतूक खात्यास पत्र पाठवून आरसी बुक वितरण व्यवस्थेवर नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. वाहतूक खात्याकडूनच बोगस आरसी बुकांचे वितरण झाल्याचा संशय असून त्यामुळे वाहनचोरांची टोळी व वाहतूक खात्यातील काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पणजी पोलिसांनी अलीकडेच आलिशान गाड्या भाड्याने घेण्याच्या निमित्ताने त्यांची चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. या वाहनचोरी प्रकरणाच्या तपासात मोठ्या प्रमाणात बोगस आरसी बुक्सचा वापर झाल्याचेही उजेडात आले आहे. ही आरसी बुक्स एक तर गोव्याबाहेर तयार करण्यात आली असावीत किंवा वाहतूक खात्यातीलच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचे वितरण झाले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहतूक खात्याच्या कारभाराबद्दलच संशय निर्माण झाला आहे. राज्यात सर्वांत जास्त गोलमाल या खात्यातच होतो हे उघड गुपीत आहे. अनेकांना हा अनुभव आला आहे. याबाबत "जय दामोदर' संघटनेचे नेते महेश नायक तसेच अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर, सुदेश चोडणकर आदींनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
दरम्यान, राज्यात वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे पेव फुटले असून त्यावर सरकारचे नियंत्रण उरलेले नाही. या संस्थांची कामे सर्व "आरटीओ' कार्यालयात "सुरळीत' पार पडतात. या संस्थांकडून काही वाहतूक अधिकाऱ्यांना दरमहा "बक्षिसी' दिली जात असल्याचीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या वित्तसंस्थांमुळेच राज्यात दुचाकी व हलक्या वाहनांचे पेव फुटले आहे. राज्यात विविध ठिकाणी या संस्थांची गोदामे आहेत व तिथे हजारोंच्या संख्येने जप्त केलेली वाहने ठेवण्यात आली आहेत. या गोदामातील अनेक वाहनांचे सुटे भाग तिथे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच लांबवले जाण्याचे प्रकार घडत असतात, अशीही माहिती मिळाली आहे. या वित्तसंस्थांकडून वाहन नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून वाहन हातात सोपवण्याची पद्धत असते. सध्या आरसी बुक मिळवण्यासाठी किमान एक महिना लागतो. त्यामुळे काही लोक आरसी बुक न नेता केवळ वाहन नोंदणीची पावती आपल्या पर्समध्ये ठेवून काम भागवतात. या वित्तसंस्थांकडून नोंदणी झालेल्या अनेक वाहनांत घोळ झाल्याचेही प्रकार यापूर्वी दिसून आले आहे. चुकीचा नोंदणी क्रमांक देणे किंवा वाहन नोंदणी केल्याची खोटी पावती देऊन खोट्या क्रमाकांने वाहन नोंदणी होण्याचेही प्रकार आढळले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास त्यातून अनेक भानगडी उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फर्मागुडी योग शिबिराला प्रचंड प्रतिसाद


देशातील योगक्रांतीचा शुभारंभ गोव्यातून - बाबा रामदेव


फोंडा, दि.१ (प्रतिनिधी) - भारत स्वाभिमान ट्रस्टच्या गोवा शाखेने फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित केलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या चार दिवसीय योग विज्ञान शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.
योगगुरू रामदेव यांच्या गोव्यात २००६ साली पहिल्यांदाच झालेल्या योग शिबिराचा विक्रम फर्मागुडीच्या या योग विज्ञान शिबिराने मोडला आहे. या शिबिराला आयोजकांच्या अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळालेला नसला तरी या शिबिरात वीस ते पंचवीस हजार लोकांनी भाग घेतला. "सुशोगाद' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात योगाचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात होत असल्याबद्दल बाबा रामदेव यांनी समाधान व्यक्त केले आहे.
देशातील योग क्रांतीची सुरुवात गोव्यातून होत आहे. या शिबिरामुळे गोव्यातील योगाच्या प्रचार व प्रसाराला नवी दिशा मिळेल. योगाच्या माध्यमातून गोवा हे आदर्श राज्य बनू शकते, असा विश्र्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.
या योग शिबिराला पहाटे ठीक ५ वाजता प्रारंभ झाला. योगगुरू स्वामी रामदेव यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर टाळ्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. बाबा रामदेव यांनी या शिबिरात योगाच्या विविध आसनांची सविस्तर माहिती देऊन आसने करून घेतली. विविध प्रकारच्या आसनांचे फायदे विशद करून सांगितले. तसेच लोकांनी आहार कोणता आणि कशा पद्धतीने घ्यावा, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
मनुष्याने प्रत्येक दिवसाची सुरुवात योग, आयुर्वेद आणि स्वदेशीने केली तर जीवनात सुखाची प्राप्त होऊ शकते, असे सांगून स्वामी रामदेव म्हणाले की, शरीर हे एक यंत्र आहे. योगाच्या माध्यमातून हे यंत्र कायम सुस्थितीत राखता येते. प्राणायाम केल्याने मानसिक व बौद्धिक विकासाला चालना मिळते. त्यामुळे लहान मुलांकडून जास्त प्रमाणात प्राणायाम करून घ्या. योगाच्या साहाय्याने असाध्य रोगावर उपचार केले जाऊ शकतात. योगाच्या साहाय्याने असाध्य व्याधींवर उपचार करून रुग्णांना जीवदान दिलेले आहे.
शीतपेय आरोग्याला घातक आहेत. लहान मुलांना शीतपेय देऊ नका. शीतपेय कंपन्यांनी सुध्दा हे मान्य केले असून विदेशात शाळांमध्ये शीतपेयांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. भारतात शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. गोवाही यात मागे नाही. शीतपेय घातक असून त्यापेक्षा शुद्ध पाणी, लिंबू पाणी, ताक प्या. टूथपेस्टमध्ये घालण्यात येणारी रसायने दातांच्या हिरड्यांसाठी घातक आहेत. त्यामुळे स्वदेशी टूथपेस्टचा वापर करा, अशा मौलिक सूचना बाब रामदेव यांनी केल्या.
व्यसने, अनारोग्य यावर सुमारे पंधरा लाख कोटी रुपये नाहक खर्च होत आहेत. ताण - तणावामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होते. योगामुळे व्यसने आणि औषधे सुटतील. शाकाहारी बना आणि निरोगी राहा. घरामधील वातावरण चांगले राहिले, तरच समस्या सुटतील, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.
भारत स्वाभिमानाने योग क्रांती माध्यमातून एक आदर्श नागरिक, गाव, समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गावातून योगाचा प्रसार व प्रचार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. देशातील विविध भागात योग वर्गाचे आयोजन केले जात आहे. गावात झाडे लावणे, नैसर्गिक पाण्याचे संवर्धन, औषधी वनस्पतीबाबत जागृती, शेती, अस्वच्छता याबाबत जागती करण्याचे काम हाती घेतले आहे. शिक्षणामध्ये गुणात्मक विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रासायनिक खतांच्या शेतीमुळे जमिनीचे नुकसान होते. त्यामुळे सेंद्रीय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे, असेही स्वामींनी सांगितले.
मैदानावर लावण्यात आलेल्या स्क्रीन तांत्रिक दोषामुळे बंद पडल्यामुळे मैदानावर मागच्या बाजूला बसलेल्या लोकांना काहीच दिसत नव्हते. त्यामुळे योग आसनांची प्रात्यक्षिक करताना अडचण होत होती. स्क्रीन बंद पडल्याने लोकांना झालेल्या गैरसोयीची दखल रामदेव स्वामी यांनी त्वरित घेतली. शिबिराला येणाऱ्या लोकांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय उपलब्ध होती. मात्र, फर्मागुडी सर्कल ते अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यानच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. गोव्यातील काणकोण ते पेडणे आणि वास्को ते सत्तरी या भागातील लोक शिबिरात सहभागी झाले होते. त्याचबरोबर शेजारील सिंधुदुर्ग, कारवार, बेळगाव आदी भागांतील नागरिकही शिबिराला उपस्थित होते.
शिबिराच्या ठिकाणी हरिद्वार येथील ३७ वैद्य उपस्थित आहेत. आजारी व्यक्तींची तपासणी करण्याचे काम ह्या वैद्यांनी सुरू केले आहे. रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. शिबिराच्या ठिकाणी विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधेही उपलब्ध करण्यात आली आहेत.

डॉ. सुश्रुत मार्टिन्स यांचे देहावसान

आज अंत्यसंस्कार, राज्यभरात हळहळ

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- गोव्यातील आघाडीचे समाजिक कार्यकर्ते व कोकणी भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुश्रुत मार्टिन्स यांचे काल रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जुझे मार्टिन्स यांचे ते सुपुत्र होते. कोकणी भाषा, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदान व खास करून विद्यार्थी चळवळीतील त्यांचे काम उल्लेखनीय होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
काल रात्री सुमारे १०.३० वाजता त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी त्यांना तात्काळ पणजीतील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले; तथापि, उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. बीना मार्टिन्स व दोघी कन्या असा परिवार आहे. उद्या (रविवारी) संध्याकाळी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा पैठण पर्वरी येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. सालय चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विख्यात गोमंतकीय नाट्य अभिनेत्री डॉ. मीनाक्षी मार्टिन्स यांचे ते बंधू होते. त्यांचे पूर्ण कुटुंबच डॉक्टरी पेशात होते. "ऍक्युपंक्चर व होमिओपॅथी मेडिसीन'ची "मॉडर्न क्लिनिक' या नावाने म्हापसा, पणजी व मडगाव अशा तीन ठिकाणी ते आरोग्यसेवा बजावत होते. फोटोग्राफीचे ते भारी शौकीन होते. "व्हिजन इंडिया' या बिगरसरकारी संस्थेचे ते गोव्याचे निमंत्रक म्हणूनही काम पाहत होते."लायन्स इंडिया' नामक संस्थेच्या गोवा विभागाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. विविध क्षेत्रात त्यांचा सहभाग असायचा व त्यामुळे ते सर्वपरिचित होते. स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. सुश्रुत यांना राष्ट्रसेवेचा फार अभिमान होता. त्यांच्या घरातील वातावरण सांस्कृतिक होते. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाल्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर १९६१ साली त्यांचा जन्म झाला होता. आपल्या मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करताना आपण पोर्तुगीजांना गोव्यातून पिटाळून लावल्यानंतरच जन्माला आलो, असे ते अभिमानाने म्हणत. विद्यार्थी चळवळीत ते कमालीचे सक्रिय होते. याच काळात त्यांनी कोकणी चळवळीतही भाग घेतला व कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष या नात्याने मंडळाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी अफाट परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने एक सच्चा कार्यकर्ता गमावला, अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली आहे. विविध सामाजिक संघटनांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले.

परिचारिका व दोन आयांची बदली निश्चित; उद्या आदेश?

"हॉस्पिसियू'तील दिलशान शेख मृत्यू प्रकरण

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) - नावेली - मडगाव येथील दिलशान शेख हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल हॉस्पिसियू हॉस्पिटलातील परिचारिका व दोन आया यांची अन्यत्र बदली करण्याची शिफारस आरोग्य संचालकांनी केली आहे. येत्या सोमवारपर्यंत हा आदेश लागू होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात गंभीर आजारी असलेल्या व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणाऱ्या दिलशान शेख या महिलेला प्राणवायूवर ठेवले होते. तिची प्रकृती चिंताजनक बनताच नातेवाईकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बांबोळी येथे नेण्याची तयारी चालविली. त्याचवेळी परिचारिकेने तिचा प्राणवायू काढला. थोड्या वेळाने ती गुदमरू लागताच नातेवाईकांनी धावपळ करुन प्राणवायू लावण्याची मागणी केली. तेव्हा तो परत सुरू करण्यावरून परिचारिका व दोन्ही आयांमध्ये वाद सुरू झाला. या वादातच ती मरण पावली. त्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करुन हॉस्पिटलातील सामानाची नासधूस केली. यावेळी या एकंदर प्रकरणात वैद्यकीय अधीक्षकांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. अधीक्षकांनी आपल्या अहवालात वरील तिघींना दोषी ठरवून आपला अहवाल आरोग्य संचालकांना पाठविला होता.
या घटनेच्या चार दिवस अगोदर तोतया डॉक्टर बनून आलेल्या भामट्याने प्रसूती विभागातील सविता वेळीप यांच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तेथे परिचारिका उपस्थित असतानाही लांबवले होते. यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने हॉस्पिटलांतील वॉर्डात सी. सी. टीव्ही कॅमेरा बसविण्याची शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलात येणाऱ्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मौल्यवान वस्तू घालून येऊ नये असा सल्ला द्यावा, असेही सूचित केले आहे.

माधुरी गुप्ताला न्याया. कोठडी

नवी दिल्ली, दि. १ - पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या भारतीय महिला अधिकारी माधुरी गुप्ताची रवानगी आता १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाने आज हा आदेश दिला.
आयएसआयसह तमाम पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवणारे हेरगिरी रॅकेट गेल्या मंगळवारी उघड झाले होते. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त ऑफिसमधूनच ही माहिती पुरवली गेल्याचे काही पुरावे मिळाले आणि सगळेच हादरले. कळस म्हणजे याच ऑफिसातील "सेकंड सेक्रेटरी' माधुरी गुप्ता या अधिकारी महिलेने ही गद्दारी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दिल्ली पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आणि तीस हजारी कोर्टात हजर केले. त्यावेळी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
आज पाच दिवसांची मुदत संपल्यानंतर, चौकशीसाठी आणखी दोन दिवस हवे असल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलचे म्हणणे होते. परंतु, मुख्य न्यायदंडाधिकारी कावेरी बावेजा यांनी पोलिसांची विनंती फेटाळली आणि माधुरी गुप्ताला १५ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

"ईव्हीएम'ने निकाल फिरवणे शक्य


आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाचा निर्वाळा


नवी दिल्ली, दि. १ - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने ("ईव्हीएम') निवडणूक निकालात फेरफार करून तो फिरवता येणे शक्य असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या एका गटाने दिला आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या एका गटाने या संदर्भात केलेल्या संशोधनानंतर हा निष्कर्ष सादर केला आहे.
मतदान यंत्रांशी छेडछाड करण्याची थोडी जरी संधी मिळाली, तर निवडणूक निकाल हवा तसा फिरवता येऊ शकतो. मतदान यंत्राच्या आराखड्याचा तपशील आजवर कधीच सार्वजनिक करण्यात आलेला नाही आणि यंत्राची निःपक्ष यंत्रणेद्वारा कठोर सुरक्षा चाचणीही घेण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर या निष्कर्षांना मोठे महत्त्व आहे.
भारतीय ईव्हीएममध्ये सुरक्षाविषयीचे गंभीर दोष असल्याचे तज्ज्ञांनी सिद्धच करून दाखवले आहे. हैदराबाद येथील नेटइंडिया लिमिटेड या कंपनीने अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ आणि ईव्हीएमशी संदर्भातील मुद्यांसंदर्भातील तज्ज्ञ मानल्या जाणारी नेदरलॅण्डमधील एक स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने केलेल्या संयुक्त संशोधनानुसार १४ लाख ईव्हीएम आहेत. त्या यंत्रांमध्ये केवळ कृत्रिम स्मृतीमध्ये मतदानाची नोंद होते.
एकदा मतमोजणी केल्यानंतर फेर तपासणी किंवा फेरमतमोजणी करण्यासाठी आवश्यक असलेली कागदोपत्री नोंद पुरविण्याची सोय या यंत्रांमध्ये नाही. केवळ यंत्रांचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यावरच विश्वास ठेवावा लागतो.
ईव्हीएममधील केवळ खिशात मावू शकेल एवढा एक छोटासा भाग बदलून, एखाद्या विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने पडलेल्या मतांपैकी विशिष्ट टक्के मते चोरणे सहज शक्य असल्याचे या संशोधनात आढळून आले आहे. या बदललेल्या सुट्या भागाला मोबाईलवरूनही कंट्रोल करता येते. त्याशिवाय प्रत्यक्ष मतदानाचा आणि मतमोजणीचा दिवस या दरम्यानच्या काळातही या उपकरणाच्या साहाय्याने निकाल बदलता तो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.