Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 August, 2009

'बंद' मोडीत काढण्यासाठी 'एस्मा' वाहतूकदारांचे सरकारला प्रतिआव्हान

भाजपचा 'बंद'ला पूर्ण पाठिंबा
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील वाहन चालक व मालकांनी सरकारच्या "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' विरोधात येत्या सोमवारी "चक्का जाम'ची घोषणा केल्यानंतर आज संध्याकाळी उशिरा सरकारने हा बंद मोडीत काढण्याच्या उद्देशाने राज्यात "एस्मा' (अत्यावश्यक सेवा कायदा) लागू केला आहे. तथापि सरकारने "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' सक्तीचा निर्णय मागे घेण्याचे ठोस आश्वासन न दिल्यास सोमवारचा नियोजित बंद होईलच, असा निर्धार व्यक्त करीत वाहनचालकांनी सरकारला प्रतिआव्हान दिले आहे. दरम्यान, सोमवारच्या "वाहतूक बंद'ला भाजपने आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.
"हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' लादण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे ठोस आश्वासन सरकारने दिल्यास ३१ ऑगस्टला प्रवासी बस, तसेच अन्य सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्याच्या निर्णयावर विचार होऊ शकतो असे मत उत्तर गोवा बस मालक संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर यांनी व्यक्त केले. मात्र, कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही तर "एस्मा' ची पर्वा न करता नियोजित बंद होईलच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आज उशीरा गृहखात्याच्या सचिवांनी सोमवारच्या बंदच्या पार्श्वभूमीवर "एस्मा' कायदा लागू केल्याचा आदेश जारी केला आहे.
वाहतूक बंद ठेवून जनतेची गैरसोय करण्याचा किंवा त्यांना वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही. परंतु, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच आज आमच्यावर ही पाळी आल्याचे ते म्हणाले. या विषयावर अनेक वेळा आम्ही चर्चा करून तोडगा काढण्यासाठी वाहतूकमंत्र्यांकडे चर्चेसाठी वेळ मागितला होता. पण आम्हाला अजूनही मंत्र्यानी चर्चेचे निमंत्रण दिलेले नाही, असे ताम्हणकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावर अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतर त्यासंदर्भातही सरकारने आम्हाला काहीही कळवले नसल्याचे त्यांनी सांगितले.
मागे तिकीट दरवाढ देताना वाहतूक खात्याने आम्हाला असंख्य अटी घातल्या होत्या. त्यात चालक व वाहकाने गणवेश परिधान करावा, तिकिटाची योग्य रक्कम आकारावी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबू नये अशा त्या अटी होत्या. या अटी अंमलात आणण्यासाठी संघटनेने अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र संघटनेच्या या प्रयत्नांना वाहतूक अधिकारीच (आरटीओ) सहकार्य करीत नसल्याने त्याचा शंभर टक्के अंमल शक्य न झाल्याचे ताम्हणकर म्हणाले. आम्ही गेल्या वर्षभरात सरकारच्या या अटींचे उल्लंघन करणारी बरीच प्रकरणे वाहतूक अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
उत्तर गोवा प्रवासी बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांना केवळ पंधरा-वीस लोकांचाच पाठिंबा आहे, असे वक्तव्य केलेल्या मंत्र्यांवर ताम्हणकर यांनी जोरदार टीका केली. वाहतूक मंत्र्यांनी श्री. कळंगुटकर यांच्यामागे किती लोक आहेत, याची काळजी करण्यापेक्षा त्यांनी केवळ आपले मंत्रिपद शाबूत कसे राहील याची काळजी करावी, असा टोलाही त्यांनी हाणला. कळंगुटकर यांच्यामागे किती लोक आहेत हे येत्या सोमवारीच कळून येईल, असेही श्री. ताम्हणकर म्हणाले.

नंबरप्लेट प्रकरणी 'बंद'मध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : खाजगी बस वाहतूक संघटनेने "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट'च्या विरोधात पुकारलेल्या "बंद'मध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी केले आहे.
आधीच महागाईमुळे भरडल्या गेलेल्या आम आदमीवर या महागड्या नंबर प्लेटचा बोजा एक मंत्री फक्त वैयक्तिक फायद्यासाठी लादत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्याचप्रमाणे विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट विषयावर फेरविचार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अधिवेशन संपताच सरकारने घाईघाईत या नंबर प्लेट लावण्याची कार्यवाही सुरू केल्याने हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचे आश्वासन आज विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
ज्या कंपनीची भलावण वाहतूक मंत्री करीत आहेत, ती कंपनी गोवेकरांना वेळेवर नंबर प्लेट पुरवूच शकत नाही. चतुर्थीच्या मुहूर्तांवर ज्या गोवेकरांनी वाहने खरेदी केली त्यांना नंबर प्लेट नसतानाच वाहने रस्त्यावर चालवावी लागत आहेत. उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील वाहतूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढून या प्रश्नाला वाचा फोडली आहे. आता ३१ ऑगस्टच्या संपानंतर सरकारने हा जुलमी निर्णय रद्द न केल्यास भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

वाहतूक खात्याचा वाहतूकदारांना इशारा

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : बस मालक संघटनेने पुकारलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी एस्मा कायदा लागू केलेला असतानाच वाहतूक खात्याने या संपात सहभागी होणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा एका नोटिशीद्वारे दिला आहे.
सार्वजनिक वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असून अशा वाहतूकदारांना संपावर जाण्यास कायद्यानुसार बंदी आहे. त्यासाठी कायम तसेच तात्पुरत्या वाहतूक परवानाधारकांनी दि. ३१ ऑगस्ट रोजी उत्तर गोवा बस मालक संघटनेच्या आंदोलनात सहभागी न होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मालवाहतुकीचा तात्पुरता परवाना असलेल्या वाहन मालकांनीही संपात सहभागी होऊ नये. या संपामध्ये सहभागी झाल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

कंटक सक्षम नसल्याचे सिद्ध : मनोहर पर्रीकर

जी व्यक्ती स्वतःचीच बाजू न्यायालयात यशस्वीपणे मांडू शकत नाही, ती व्यक्ती राज्याची बाजू न्यायालयासमोर मांडण्यास सक्षम आहे का, असा प्रश्न उच्च न्यायालयाच्या आजच्या निवाड्यामुळे उपस्थित झाल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केली. आयरिश प्रकरणी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांचा मुद्दा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे, त्यासंबंधी बोलताना पर्रीकर पुढे म्हणाले, कंटक यांनी आत्तापर्यंत युक्तीवाद कमी आणि प्रतिज्ञापत्रेच जास्त सादर केली आहेत. प्रत्येक बाबतीत तडजोडीची त्यांची ही धडपड समर्थनीय नाही.
सध्या वादग्रस्त ठरलेल्या "हायसिक्युरिटी नंबर प्लेट'संबंधी सरकार फेरविचार करीत असल्याचे कंटक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगितले होते, तथापि दुसऱ्या बाजूस मात्र नंबर प्लेट निर्णयाची कार्यवाहीही सुरू झाल्याचे दिसून आले, असे पर्रीकर यांनी पुढे सांगितले.

ऍड. जनरल कंटक यांना उच्च न्यायालयाची चपराक

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्या लौकिकासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ नयेत, असा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज रद्दबातल ठरवला. त्याचबरोबर कंटक यांनी गुदरलेल्या मानहानी खटल्याच्या सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात निश्चित करण्यात आलेल्या पुढील सुनावणीवेळी त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहाण्याचाही आदेश न्यायमूर्ती एन. ए. ब्रिटो यांनी दिला आहे. या निवाड्यामुळे कंटक यांना सणसणीत चपराक बसली आहे.
सुबोध कंटक हे ऍडव्होकेट जनरल असल्याने त्यांची कार्यक्षमता, चारित्र्य तथा त्यांच्या लौकिकासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ नयेत, असा निवाडा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निवाडा आज रद्दबातल ठरविल्याने कंटक यांची उरलीसुरली लक्तरेही चव्हाट्यावर येण्याची अपेक्षा आहे. न्यायालयाच्या या निकालाने सामन्याआधीच समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रीगीस यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऍड. कंटक यांनी गुदरलेल्या मानहानी खटल्यातील पुढील उलट तपासणीसाठी त्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर १८ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायमूर्ती एन. ए. ब्रिटो यांनी दिल्याने ऍड. रॉड्रिगीस यांना फौजदारी याचिकेच्या उलट तपासणीवेळी आता त्यांच्या लौकिकासंदर्भातही प्रश्न विचारण्याची मुभा मिळाली आहे. कंटक यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील व्ही. ए. लवंदे यांनी उच्च न्यायालयाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी चार आठवड्यांची स्थगिती देण्याची केलेली विनंतीही न्यायमूर्तींनी फेटाळून लावली.
ऍड. कंटक यांची कार्यक्षमता, त्यांचे चारित्र्य तथा त्यांच्या लौकिकासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ नयेत, असा निवाडा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी दिल्यानंतर ऍड. रॉड्रिगीस यांनी या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालायत आव्हान दिले होते.
कंटक यांना शुल्कापोटी दिल्या जाणाऱ्या अवाढव्य रकमेवर ऍड. रॉड्रिगीस यांनी प्रकाशझोत टाकल्याने कंटक यांनी पणजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यात त्यांनी रॉड्रिगीस यांनी आपले चारित्र्यहनन केल्याचा दावा करताना भरपाईपोटी १५ कोटींची मागणी केली होती. ऍड. जनरल हे जनतेचे सनदशीर अधिकारी असल्याने त्यांच्या एकूण कार्यपद्धतीची शहानिशा तथा त्यांच्या कृतीवर आपली प्रतिक्रिया नोंदवण्याचा तथा त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे हा मानहानीचा प्रकार होऊच शकत नसल्याचे ऍड. रॉड्रिगीस यांनी आपली बाजू मांडताना न्यायालयात स्पष्ट केले होते.
मानहानीचा खटला दाखल करणारे ऍड. कंटक हे भारतातील पहिलेच ऍडव्होकेट जनरल असून त्यांच्यावर दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निवाडा देण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी. शिवाय एखाद्या ऍडव्होकेट जनरलवर एका वकिलानेच याचिका दाखल केल्यानंतर त्याला सामोरे जाणारेही कंटक हे पहिलेच ऍडव्होकेट जनरल ठरलेआहेत.

'स्वाईन फ्लू' : शाळांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): चतुर्थीच्या सुट्टीनंतर येत्या दोन दिवसांत म्हणजे ३१ ऑगस्टपासून शाळा सुरू होत असल्याने "स्वाईन फ्ल्यू'विषयी विद्यालयांत शिक्षकांनी काळजी घेण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
या नियमावलीनुसार शाळा व्यवस्थापनाने स्वाईन फ्ल्यूचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच दि. ३१ रोजी विद्यार्थी शाळेत येताच वर्गशिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष पुरवून जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये फ्ल्यूसदृश लक्षणे दिसत असतील (उदा. ताप, सर्दी-खोकला, घशाचे दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या आदी) तर त्यास त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध करावेत. त्याच्या पालकांना सूचित करून सदर विद्यार्थ्याला त्वरित घरी पाठवावे. त्याला सक्तीची ७ दिवसांची सुट्टी देऊन, त्याच्यावर उपचार करण्यात यावेत. त्याला डॉक्टरी सल्ल्यानुसार उपचार दिले जावेत याबाबत पालकांना पत्राद्वारे कळवून पालकांनीही आपल्या पाल्याची संपूर्ण काळजी घ्यावी. फ्लूसदृश लक्षणे आढळली तर त्यास योग्य उपचार देतानाच त्याचा परिणाम कुटुंबातील वा आसपासच्या इतर कोणावर होणार नाही याची दक्षता घेतली जावी.
फ्ल्यू असल्याचे निष्पन्न झाल्यास त्वरित आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शाळांनी विद्यार्थ्यांना फ्ल्यूग्रस्त भागात पाठवणे कटाक्षाने टाळावे. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या अन्य शालेय कर्मचाऱ्यांनीही वारंवार आपले हात साबणाने धुऊन स्वच्छ करावे. शाळा वा अन्य शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी नाक शिंकरताना वा खोकताना "टिश्यू पेपर'चा वापर करावा. विशेष करून कफाचे निस्सारण करण्यासाठी "टिश्यू पेपर'चा वापर करावा व ते एका प्लॅस्टिक पिशवीत गोळा करावेत, जेणेकरून त्यांना सहजपणे नष्ट केले जाऊ शकेल.

सांत इस्तेव्हवासीयांनी रेती वाहतूक रोखली

रस्त्यावर रेतीची साठवणूक
माशेल, दि. २८ (प्रतिनिधी): आखाडा येथून रेतीची वाहतूक करणारे सुमारे ७० ट्रक आज जुवे सांत इस्तेव्ह येथील नागरिकांनी सकाळी ८ वाजल्यापासून अडवल्याने दुपारी १२.३० पर्यंत सांत इस्तेव्ह - आखाडा येथील अरुंद रस्त्यावरील बसवाहतूक बंद पडली होती. जुवे सांत इस्तेव्ह येथील सुमारे ५०० नागरिक तसेच जवळपासच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ८ वाजल्यापासून ट्रकवाहतूक अडवली होती. यावेळी उपस्थितांच्या हातात "आमचा पूल वाचवा', "पर्यावरण राखा' अशा घोषणा लिहिलेले फलक होते. सांत इस्तेव्ह सरपंच वैजयंती तारी, उपसरपंच ओर्लांद मिनेझीस, पंचसदस्य अजय तारी, इरास्मो मागालाज, नोलास्को मिनेझीस आदी उपस्थित होते.
नार्वे तसेच आखाडा परिसरातील सुमारे २० होडीधारकांनी नदीतून काढलेली आखाडा येथील बसथांब्याजवळ तसेच इतर ठिकाणी बेकायदा साठवणूक केली जाते. कारवारहून रेतीची वाहतूक ठप्प असल्याने दर दिवशी सुमारे १५० ते २०० ट्रक या भागातून वाहतूक करतात. जुवेच्या पुलापासून आखाड्यावर जाणारा रस्ता अरुंद असून रस्त्याच्या दुतर्फा घरेही आहेत. सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान होणाऱ्या या वाहतुकीदरम्यान कर्कश अशा हॉर्नच्या आवाजामुळे तसेच वाऱ्यासोबत उडून येणाऱ्या रेतीच्या कणांमुळे रहिवाशांना प्रदूषणातला सामोरे जावे लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे पादचाऱ्यांना येथून चालणे कठीण बनले असून रेती रस्त्यावर सांडल्याने दुचाकीस्वारांनाही अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय जुवे येथील माशेल - सांत इस्तेव्हला जोडणारा पूल मोडकळीस आलेला आहे. अवजड वाहतुकीमुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.
उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांनी दुपारी १२ वाजता घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. सरपंच सौ. तारी आणि उपसरपंच श्री. मिनेझीस यांनी नागरिकांतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. रेती काढणाऱ्यांना आमचा विरोध नसून येथून होणाऱ्या रेतीच्या वाहतुकीला असल्याचे नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले. सदर निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून आजच्या घटनेची माहिती त्यांना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे हा विषय मांडून येत्या काही दिवसांत याबद्दल निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जमलेल्या नागरिकांतर्फे ट्रकमालकांना तसेच वाहनचालकांना जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय येईपर्यंत वाहतूक करू दिली जाणार नसल्याचे नागरिकांतर्फे स्पष्ट करण्यात आले. जबरदस्तीने वाहतूक केल्यास त्याचं गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला.
यावेळी वाहतूक खात्याचे अधिकाऱ्यांनी वाहनचालकांचे परवाने तसेच वाहनांची कागदपत्रे आदींची तपासणी केली. रस्त्यावर रेती साठवून ठेवण्यासंदर्भात संबंधित मालकांकडून परवाने मिळालेले नसल्याचे यावेळी उघडकीस आले. आखाडा येथे साठवण्यात येणाऱ्या रेतीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे यावेळी बसचालकांनी सांगितले.
यावेळी जुने गोवे पोलिस निरीक्षक गुरुदास गावडे, उपनिरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. स्थानिक आमदार पांडुरंग मडकईकर यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली.

कालेचे माजी सरपंच बार्रेटो यांचे निधन

कुडचडे, दि. २८ (प्रतिनिधी): कालेचे माजी सरपंच आन्सेंटो बार्रेटो (६९) यांचे आज संध्याकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील रेल्वे स्थानकावर आज सकाळी रेल्वेखाली सापडून त्यांच्या पायाचा जबर दुखापत झाल्याने त्यांना जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ८.१५ च्या सुमारास बार्रेटो काले येथे जाण्यासाठी वास्को कुळे ट्रेनची वाट पाहत होते. यादरम्यान स्टेशनवर आलेल्या अमरावती एक्सप्रेसला लोकल गाडी समजून ते आत शिरले. गाडी सुरू झाल्यानंतर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने चालत्या गाडीतून खाली उतरण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला व डावा पाय रेल्वेच्या खाली आला. या अपघातात त्यांच्या पायाचा चुराडा झाला व बरेच रक्तही वाहून गेले. तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना सर्वप्रथम हॉस्पिसियो व नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले. इस्पितळात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
काले येथून आज सकाळी कुळे - वास्को ट्रेनमधून ते आपल्या धाकट्या मुलीसह कुडचडे येथे आले होते. यादरम्यान दोघांनी कुडचडे येथील हॉटेलमध्ये चहा घेतला व शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलीला बसमधून निरोप दिला. सकाळी ८.३० च्या ट्रेनमधून ते घरी परतणार होते. काले पंचायतीमध्ये बार्रेटो तीनवेळा निवडून आले होते. दोन वेळा त्यांनी सरपंचपदही भूषवले होते. याशिवाय काले येथील अवर लेडी ऑफ फातिमा चर्चमध्ये अनेक वर्षे अध्यक्षपद व सध्या सदस्य म्हणून ते कार्यरत होते. ज्ञान संपादन करताना गरजूंना मदतीचा हात देणारे बार्रेटो मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली व १ मुलगा असा परिवार आहे, पैकी ज्यो हा त्यांचा मुलगा विदेशात बोटीवर कामाला आहे. गोमेकॉत त्यांच्या मृतदेहावर उद्या उत्तरीय तपासणी करण्यात येणार असून रविवारी काले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बार्रेटो यांच्या निधनाने काले परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी वास्को रेल्वे पोलिस उपनिरीक्षक आनंद देसाई अधिक तपास करत आहेत.

Friday 28 August, 2009

पाकिस्तानातील नेत्यांना पैसे वाटले

"आयएसआय'चा गौप्यस्फोट

इस्लामाबाद, दि. २७ - पाकिस्तानातील अनेक राजकीय पक्षांना, तसेच राजकीय नेत्यांना पैसे वाटल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानातील गुप्तचर संघटना "आयएसआय'ने आज न्यायालयात केला. या राजकीय नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान नवाज शरीफ, गुलाम मुस्तफा जटोई, जफरुल्ला जमाली आणि महम्मद खान जुनेजो यांची नावे समोर आली आहेत.
हे पैसे प्रत्यक्ष माजी पंतप्रधानांना देण्यात आले नसले तरी, त्यांच्या पक्षाशी संबंधित लोकांना दिले गेले आहेत, असेही जाहीर करण्यात आले. या वृत्ताचा गौप्यस्फोट पाकिस्तानचे माजी न्यायाधीश सईदुज जमन सिद्दिकी यांनी केला आहे. या संदर्भातील खटला १९९९ सालापासून रखडला होता. आयएसआय प्रमुख लेफ्ट. जन. असद दुर्राणी यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळेच ही बाब उघडकीस आली आहे.
दुर्राणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक रहस्य उलगडली आहेत, असे वृत्त डेली टाईम्सने प्रसिद्ध केले आहे. दुर्राणी यांच्या मुलाखतीतील वक्तव्यानुसार माजी अध्यक्ष गुलाम ईशाक खान यांच्या कारकीर्दीत अनेक राजकीय नेत्यांना इस्लामिक जम्हुरी इत्तेहाद या पक्षात येण्यासाठी करोडो रुपये वाटण्यात आले होते. तेव्हा या पक्षाचे प्रमुख गुलाम मुस्तफा जतोई होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीला निवडणुकीत शह देण्यासाठी १९८८ साली या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. स्वत: खान यांना मात्र आयएसआयने कोणत्याही राजकीय पक्षाशी साटेलोटे करणे अजीबात मान्य नव्हते. परंतु, हा संपूर्ण व्यवहार दुर्राणी यांच्या म्हणण्यानुसार सरकारच्या संमतीनेच झाला होता. पैसे ठेवण्यासाठी कराची, रावळपिंडी, क्वेट्टा येथे अनेक खाती उघडण्यात आली होती आणि या व्यवहारात १.४ अब्ज रुपयांची देवाणघेवाण झाली होती.

पारंपरिक घरेच कायदेशीर करा

विषय "सीआरझेड'चा

लाभार्थींमध्ये धनदांडगे
नकोत - माथानी

पणजी, दि.२७ (प्रतिनिधी) - "सीआरझेड' पट्ट्यातील घरे कायदेशीर करताना त्याचा लाभ फक्त पारंपरिक घरांनाच झाला पाहिजे. बेकायदा बांधकाम केलेल्या बिगरगोमंतकीयांना मागील दाराने याचा लाभ मिळणार नाही यावर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवले पाहिजे, असा इशारा "गोंयच्या रापणकारांचो एकवट'चे सरचिटणीस तथा माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांनी आज पणजीतील पत्रपरिषदेत दिला.
ते म्हणाले, "सीआरझेड'मुळे राज्याच्या किनारी भागांतील पारंपरिक सुमारे ८५०० घरांवर संकट ओढवलेे आहे. योग्य तोडगा काढून ती कायदेशीर करावीत. ती कायदेशीर झाल्यानंतर अशी घरे इतर कुणालाही विकायला मिळणार नाहीत किंवा त्यात कोणताही व्यावसाय करण्याची मिळू नये, अशीही तरतूद झाली पाहिजे.
राज्य सरकारने पारंपरिक मच्छीमार, रेंदेर व इतर कुटुंबीयांची घरे वाचवण्याच्या नावाखाली निश्चित केलेली १जानेवारी २००७ ही तारीख बदलून ती ३१ डिसेंबर २००७ करण्यात यावी, तसेच इतर समस्यांबाबत येत्या ३० ऑगस्ट रोजी केंद्रीय पर्यावरण वन मंत्री जयराम रमेश यांना उदभवलेल्या परिस्थितीची जाणीव करून देणारे निवेदन दिले जाईल, असेही माथानी यांनी नमूद केले.
यावेळी त्यांच्यासोबत जॉन लोबो आणि फ्रान्सिस फर्नांडिस हजर होते."एमपीटी'चे कार्यक्षेत्र वाढवण्याचा जो प्रस्ताव आहे त्यामुळे गोव्यातील समुद्र किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात धोका संभवतो. म्हणूनच आमचा त्या प्रस्तावाला विरोध असल्याचेही ते म्हणाले.
किनारी भागात सध्याच्या कायद्यानुसार ३३ टक्के अर्थात केवळ एक मजली घरे उभारता येतात. राज्य सरकारने ही मर्यादा चैापटीने वाढवण्याची शिफारस केली आहे. ती पारंपरिक रहिवाशांसाठी नसून धनदांडगे व हॉटेल व्यावसायिकांचे हित जपणारी असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
गोवा हे पर्यटक राज्य असल्याने येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात
येत असतात. त्यामुळे समुद्रात कचरा व सांडपाणी सोडण्यासही त्यांनी विरोध व्यक्त केला.दरम्यान राज्यातील किनारी भागात मोठ्या प्रमाणात सीआरझेडचे उल्लंघन करून राजकीय आश्रयाने अनेक बड्या प्रकाल्पांचे काम सुरू आहे.या प्रकल्पांना सरकारी मान्यता नसली तरी ही बाधमंकामे कालांतराने कायदेशीर करण्याची हमी राजकीय नेत्यानी संबंधितांना दिल्याने त्यांच्यावर सीआरझेड प्रधिकरणही कारवाई करत नाही, असा आरोप साल्ढाणा यांनी केला.काही ठिकाणी तर स्थानिक पंचायती अशा बांधकामांना अभय देत असल्याचे ते म्हणाले.
किनारी भागातील ९० टक्के मोठी बाधंकामे बिगरगोमंतकीयांची आहेत. ती कायदेशीर झाल्यास त्याचा फटका स्थानिकांनाच बसणार आहे. त्यामुळे पारंपरिक रहिवाशांना दिलासा देण्याच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याचा डाव कदापिही यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा माथानी यांनी दिला.

फोंड्यात सापडल्या सत्तर बनावट नोटा

फोंडा, दि.२७ (प्रतिनिधी) - येथील "आयसीआयसीआय' बॅंकेच्या फोंडा शाखेला गेल्या वर्षभरात ७० हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या असून यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या बनावट नोटांमध्ये एक हजार, पाचशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. बॅंकेच्या व्यवस्थापकांनी यासंबंधी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली असून फोंडा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. बॅंकेत पैसे भरण्यासाठी ग्राहकांकडून देण्यात येणाऱ्या नोटांत बनावट नोट आढळून आल्यास बॅंकेकडून सदर नोट ताब्यात घेण्यात येते. या बॅंकेत वर्षभराच्या काळात ७० हजार रुपयांच्या बनावट नोटा जमा झाल्या आहे. सदर बनावट नोटा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर तपास करीत आहेत.

फीडर बोटींबाबत नव्याने पाहणी करा

खंडपीठाचा सरकारला आदेश

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - मांडवी नदीतील रॉयल कॅसिनोत ग्राहकांना घेऊन जाणाऱ्या फिडर बोटींची पाहणी करण्यास गेलेल्या बंदर कप्तान खात्याच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचा दावा करून याविषयीची माहिती आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला देण्यात आली. सरकारने केलेल्या या दाव्याचे खंडन करताना कॅसिनो कंपनीच्या वकिलाने, फिडर बोटींच्या पाहणीला कोणताही विरोध झाला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सरकारपक्ष आणि कॅसिनो कंपनी यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर उद्या दि. २८ आणि दि. ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा फिडर बोटींची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यावेळी बंदर कप्तान खात्याच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची सूचनाही करण्यात आली. याविषयीची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, ही तपासणी होईतोवर अन्य तीन फिडर बोट सुरू करण्यासाठी रॉयल कॅसिनो कंपनीने केलेली मागणी फेटाळून लावण्यात आली.
दि. १८ ऑगस्ट रोजी या फिडर बोटींची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच तोपर्यंत या कॅसिनोच्या चारही फिडर बोटींवर वाहतुकीसाठी बंदी घातली होती. या आदेशानुसार पाहणी करण्यासाठी गेले असता कॅसिनो कंपनीने कोणतेही सहकार्य केले नाही. त्याचप्रमाणे या बोटी "ड्रायडेक'वरही नेण्यास मनाई केली. मुंबई मरीनटाईम बोर्डची परवानगी असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. तथापि, त्या परवानगीची कागदपत्रेही दाखवण्यात आली नसल्याची माहिती यावेळी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी न्यायालयाला दिली. या बोटी ड्रायडेकवर नेण्यास आमची कोणतीही हरकत नाही, असा दावा यावेळी कॅसिनो कंपनीच्या वकिलाने केला. तसेच बंदर कप्तान कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास कोणताही विरोध केला नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
या युक्तिवादानंतर दि. २८ आणि ३१ ऑगस्ट रोजी पाहणी करून त्याच दिवशी बंदर कप्तानाचा निर्णय या कॅसिनोला कळवावा. तसेच त्या पाहणीचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला.

चिमुकल्या बालकाचा मृतदेह विहिरीत; घातपाताची शक्यता

कुडचडे, दि. २७ (प्रतिनिधी)- खांडीवाडा कुडचडे येथे चाळीत राहणाऱ्या सुमारे १ वर्षीय नागराज कुमार कामतर या चिमुकल्या बालकाचा मृतदेह घरापासून अंदाजे ५०० मीटर दूर असलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आला. यामागे घातपाताची शक्यता असल्याच्या संशयावरून कुडचडे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
यासंबंधी पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार खांडीवाडा येथील चाळीमध्ये सकाळी १० च्या सुमारास बालक घरातून गायब झाल्याची तक्रार त्याचे वडील कुमार यांनी दुपारी पोलिसात नोंदविली. पोलिसांनी सदर प्रकरण अपहरण म्हणून बाल कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून घेतला होता. यानंतर संध्याकाळी ५ च्या सुमारास शिरफोड येथील विहिरीत बाहुलीसारखी वस्तू पाण्यात तरंगत असल्याचा दूरध्वनी पोलिस स्थानकात आल्यानंतर अग्निशामक दलाच्या सहाय्याने पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व पंचनामा करून शव चिकित्सेसाठी पाठवला आहे.
कुमार हे तिस्क उसगाव येथे लॉटरी विक्रीसाठी सकाळी बाहेर पडले. आई मुलाला झोपण्यासाठी घरात झोळीत टाकून बाहेरून दाराला कडी लावून सकाळी १० च्या सुमारास कपडे धुण्यासाठी बाहेर पडली. अर्ध्या तासाने परत आल्यानंतर घरात बालक नसल्याचे तिच्या लक्षात आले. सगळीकडे शोधाशोध केली. बालकाला धड चालताही येत नव्हते. ताबडतोब वडिलांनी पोलिसांत मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंद केली.

सतत तिसऱ्या वर्षी
तिसरी घटना
गेल्यावर्षी सदर चाळीत सुमारे २ वर्षाचे मूल गायब होण्याचा प्रकार घडला होता. त्याची शोधाशोध करता करता सदर मूल घरात कोपऱ्यात कुजलेल्या अवस्थेत चादरीत गुंडाळलेले आढळून आले होते. सदर घटनेच्या एक वर्षापूर्वी अंदाजे अडीच वर्षीय मुलगी विहिरीत पडून मृत पावली होती. आजची ही घटना तिसरी असून धड चालता न येणारे बालक रेल्वे रूळ ओलांडून सुमारे ५०० मीटर अंतर जाणे शक्य नसून मीटरभर उंचीवर बांधून घेतलेल्या विहिरीत बालकाला मुद्दामहून टाकल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर विहिरीच्या चारही बाजूने घरे असल्याने यामागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक नीलेश राणे पुढील तपास करीत आहेत.
सदर बालकाच्या हत्येमागे अंधश्रद्धेचा प्रकार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वीच सदर प्रकरणे याच भागात घडल्याने यामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी कुडचडेवासीयांनी केली आहे.

ना. सी. फडके खंडरुपाने वाचकांच्या भेटीस

नरेंद्र बोडके

पुणे, दि. २७- आपल्या कथा-कादंबऱ्यांच्या जोरावर मराठीत फडके-युग निर्माण करणारे अग्रगण्य लघुकथाकार आणि कादंबरीकार ना. सी. फडके यांचे समग्र साहित्य आता खंडरुपाने उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या ना. सी. फडके फाऊंडेशनने हा उपक्रम हाती घेतला असून फडके यांचे सुपुत्र विजय यांनी या साहित्याचे संकलन केले आहे.
एकूण चौदा खंडांचा हा प्रकल्प असून त्यापैकी चार खंड तीन वर्षांपूर्वीच प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यात त्यांच्या लघुकथा वाङ्मयाचा समावेश आहे. त्यांची एकूण पृष्ठसंख्या ३५०० आहे. फडके यांनी सुमारे ५० वर्षे मराठी साहित्यजगतावर अधिराज्य गाजवले आणि १७५ ग्रंथांची निर्मिती केली. लघुकथांव्यतिरिक्त अन्य अनेक साहित्यप्रकार हाताळले. त्यात मानसोपचार आणि तर्कशास्त्रावरील प्रबंध, नाटके, लघुनिबंध, दादाभाई नौरोजी, टिळक, गांधी, किर्लोस्कर, नाट्याचार्य खाडिलकर आदींची चरित्रे, प्रतिभा साधन, पुरोगामी साहित्य आदी वाङ्मयीन प्रबंध, टीका व रसग्रहण, प्रवासवर्णन व आठवणीवजा लेखन, काव्य व्याख्याने, जीवन व समाजविषयक लेखन, आत्मचरित्रपर लेखन आदींचा समावेश आहे. हे सर्व लेखन खंड ५ ते १४ मध्ये समाविष्ट करण्यात येणार असून हे दहा खंड सुमारे ९ हजार पृष्ठांचे भरतील. फडके यांचे ६३ ग्रंथ त्यात समाविष्ट करण्यात येतील. संपूर्ण संचाचे मूल्य रु. १० हजार आहे. ते ४ ऑगस्ट २०१० रोजी प्रकाशित होतील. मात्र प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास ते ४५०० रूपयात उपलब्ध होतील. हे दहा खंड नोंदवणाऱ्या संस्थांना पहिले चार खंड रु. १२०० मध्ये देण्यात येतील. व्यक्तींना हप्त्यांची सवलत आहे. या संदर्भात सविस्तर माहिती ९८८१४९५४५२ या मोबाईलवर उपलब्ध आहे.
ललित साहित्याचा निर्माता आणि ललित साहित्याचे मीमांसक या दोन्ही भूमिका फडके यांनी कौशल्याने पार पाडल्या, कलेसाठी कला या भूमिकेचा पुरस्कार आयुष्यभर केला. वि. स. खांडेकरांनी जीवनासाठी कला हा विचार मांडला आणि मराठीत कलावाद व जीवनवाद या विचारसरणींनी कायमचे मूळ धरले. फडके यांनी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून सातत्याने साहित्यनिर्मिती केली. ललित साहित्याची निर्मिती ही एक निरामय आनंदाची भूमी आहे याची खात्री बाळगून लेखकाने लिहावे अशी फडके यांची भूमिका होती. लेखनकला ही जबरदस्त शक्ती आहे असा अमर्याद अभिमान ज्या लेखकाला वाटतो त्याच्यावर कालांतराने का होईना प्रतिभा प्रसन्न होणारच अशी ग्वाही फडके यांनी प्रतिभा साधन या ग्रंथात दिली होती. फडके यांच्या शेकडो लघुकथांनी त्याकाळी वाचकांच्या मनात रुंजी घातली. फडके यांची नायिका देखणी, आकर्षक, पुरोगामी व जीवनाचा आनंद घेणारी असावयाची. अशा अनेक नायिकांच्या अनेक कहाण्या त्यांनी लिहिल्या. हे साहित्य खंडरुपात उपलब्ध असताना आज मालिका व चित्रपटांमध्ये जे विषय-दारिद्र्य आहेत ते निमार्त्यांच्या विदग्ध वाङ्मयाकडे झालेले दुर्लक्ष आहे अशी प्रतिक्रिया दूरदर्शनवरील मालिका नित्यनियमाने पाहणाऱ्या दीप्ती नितनवरे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारने या खंडांची खरेदी मोठ्या प्रमाणात करून या युगप्रवर्तकाचे साहित्य खेडोपाडी पोहोचवावे अशी अपेक्षा फडके साहित्याचे अभ्यासक व फडके यांच्यावर "पीएचडी' करणारे समीक्षक डॉ. प्रल्हाद वडेर यांनी व्यक्त केली.

Thursday 27 August, 2009

वाहतूकदारांचा ३१ रोजी लाक्षणिक संप

विषय "नंबरप्लेट'चा
दलालीसाठीच वाहतूक मंत्र्यांकडून सक्ती?
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - राज्यात "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट' सक्तीला सर्व थरांतून कडवा विरोध होत आहे. तरीही वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून हा निर्णय सर्वसामान्य लोकांवर लादला जात असल्याप्रकरणी येत्या ३१ रोजी सर्व वाहतूकदारांनी लाक्षणिक संप पुकारला आहे. या निर्णयाची उपयुक्तता पटवून देण्यात वाहतूकमंत्र्यांना पूर्ण अपयश आले आहे. त्यांच्याकडून कशासाठी अरेरावी केली जाते,असा सवाल करून केवळ दलाली मिळवण्यासाठी तर या निर्णयाची घाई केली जात नाही ना, असा संशय उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेने व्यक्त केला आहे.
आज पणजीतील पत्रपरिषदेत उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप कळंगुटकर यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर,अखिल गोवा खाजगी बस वाहतूकदार संघटनेचे उपाध्यक्ष मॅन्युएल रॉड्रिगीस तथा विविध वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी हजर होते. या लाक्षणिक संपात राज्यातील सर्व वाहतूकदार सहभागी होणार असल्याने या दिवशी संपूर्ण व्यवहार ठप्प होणे अटळ आहे. लाक्षणिक संपानंतरही या निर्णयाचा फेरविचार झाला नाही तर यापुढे बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही याप्रसंगी कळंगुटकर यांनी दिला.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची शिष्टमंडळाने भेट घेतली होती व तेव्हा त्यांनी या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. या समितीवर वाहतूकदारांच्या प्रतिनिधीलाही स्थान मिळेल, असा शब्द त्यांनी दिला होता. प्रत्यक्षात या समितीवर वाहतूकदारांच्या प्रतिनिधीला स्थान मिळाले नाही. त्यामुळे सरकार याबाबत काहीतरी लपवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा संशय बळावतो,असे कळंगुटकर म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच हा निर्णय घेतल्याचे वाहतूकमंत्री सांगतात, पण उर्वरित राज्यांना हा आदेश लागू होत नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर एवढ्या लगबगीने केला जातो तर "सिदाद दी गोवा' हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना त्या हॉटेल मालकाचे हित जपण्यासाठी सरकारने अधिसूचना जारी करून ते बांधकाम का वाचवले,याचा जाब सरकारने द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रत्येक वाहतूकदारावर आर्थिक भुर्दंड लादणाऱ्या या निर्णयाची सरकारने जरूर कार्यवाही करावी. मात्र गोव्यात ती सर्वांत शेवटी केली जावी, अशी सूचना याप्रसंगी करण्यात आली.
हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवल्यानंतर या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही यंत्रणा संबधित कंपनीकडे नाही. या निर्णयाच्या पाठपुराव्यासाठी पायाभूत सुविधाही निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे या निर्णयाच्या कार्यवाहीसाठी केली जात असलेल्या घाईच्या मुळाशी कोणाचा तरी स्वार्थ लपला असावा, अशी शंका यावेळी व्यक्त करण्यात आली.
सध्या नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी या नंबरप्लेटची सक्ती केली जात असली तरी त्यात अनेक गैरसोयी आहेत. परिणामी अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.वास्को,फोंडा,मडगाव या भागातील लोकांना ही नंबरप्लेट बसवण्यासाठी पर्वरी येथे यावे लागते.वास्तविक ही सोय प्रत्येक वाहतूक कार्यालयात होणे गरजेचे आहे.वाहन नोंदणी झाल्यानंतर किमान पाच ते सहा दिवसांनी ही नंबरप्लेट बसवली जाते. तोपर्यंत वाहने विनानंबरप्लेट फिरवली जातात, त्यातून धोका संभवत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
माधव बोरकर(अध्यक्ष, अखिल गोवा पिकअप, रिक्षा चालक संघटना), शौकत अली (अध्यक्ष, स्वागतम ऑटो रिक्षा चालक संघटना), रेमिडिस रिबेलो (अध्यक्ष, केपे रिक्षा, मोटरसायकल संघटना), संतोष गांवकर (अध्यक्ष, मडगाव पिकअप, रिक्षा संघटना),अरुण कालेकर (सल्लागार, क्रांती ऑटो रिक्षा संघटना),अब्दुल साळस्कर (अध्यक्ष,अखिल गोवा ऑटो रिक्षा संघटना), फ्रान्सिस डिसिल्वा (अध्यक्ष, दक्षिण गोवा टुरिस्ट बस मालक संघटना), रामनाथ हरी नाईक (अध्यक्ष,मडगाव मोटरसायकल पायलट संघटना), साल्वादोर परेरा (अध्यक्ष,दक्षिण गोवा ट्रक वाहतूकदार संघटना), भूषण साखळकर (अध्यक्ष, पिकअप रिक्षा संघटना),श्रीराम नाईक (अध्यक्ष,मडगाव टेंपो ट्रक संघटना) आदी पदाधिकारी पत्रपरिषदेला उपस्थित होते.
एकाधिकारशाहीचा उच्चांक
यापूर्वी वाहतूकमंत्रीपद भूषवलेले पांडुरंग राऊत,सुभाष शिरोडकर,सोमनाथ जुवारकर आदी मंत्र्यांनी अशा निर्णयांची कार्यवाही संबंधित घटकांना विश्वासात घेऊनच केली होती. तथापि, विद्यमान वाहतूक मंत्री
मात्र वाहतूकदारांना दारातही उभे करून घेत नाहीत,अशी टीका करण्यात आली.त्यांची भेट घेण्यासाठी लेखी पत्र दिले तरी ते प्रतिसाद देत नाहीत, त्यांच्याविरोधात वक्तव्य करत असल्याने वाहतूकदारांची सतावणूक करण्याचे आदेश रस्ता वाहतूक निरीक्षकांना दिले जातात,आदी आरोप यावेळी करण्यात आले.
परवान्यासाठी हजारो रुपयांची मागणी!
विविध मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बस मालकांना परवाने देण्यात येतात.काही मार्गांवर लोकांची मागणी असल्याने त्याबाबत अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला सात दिवसांसाठी हंगामी परवाना दिला जातो. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून कायमस्वरूपी परवाना दिला जातो. या परवान्यासाठी वाहतूक मंत्र्यांकडून रस्ता वाहतूक अधिकाऱ्यामार्फत ८० हजार रुपयांची मागणी केली जाते,असा सनसनाटी आरोप उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केला. ढवळीकर सध्या म.गो पक्षाच्या विस्ताराची जाहिरातबाजी करीत आहेत, त्यामुळे नंबरप्लेट सक्तीचा याच्याशी काही संबंध नाही ना, असा सवालही ताम्हणकरांनी केला.
प्रदेश कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसचा पाठिंबा
या नंबरप्लेट विरोधातील आंदोलनाला भाजपने सुरुवात केली आहेच; परंतु आता वाहतूकदारांनी पुकारलेल्या लाक्षणिक संपाला प्रदेश कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसकडूनही पाठिंबा दर्शवण्यात आल्याची माहिती सुदेश कळंगुटकर यांनी दिली.भाजपबरोबर युवक कॉंग्रेसनेही या निर्णयाला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. ज्याअर्थी या निर्णयाला सत्तारूढ कॉंग्रेसमधूनच विरोध होतआहे त्याअर्थी हा निर्णय सरकारचा सामूहिक नसून एकट्या वाहतूक मंत्र्यांचाच असल्याचे स्पष्ट होते,असेही यावेळी सांगण्यात आले.

मंत्रिमंडळ खांदेपालट आणि नेतृत्वबदलही ?

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी) : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना राजकीय क्षितिजावर मात्र वेगळेच वातावरण पसरले आहे. दिगंबर कामत मंत्रिमंडळात खांदेपालट होणार या चर्चेला पुन्हा ऊत आला असतानाच आता नेतृत्वबदलाचेही वारे तेवढ्याच गतीने वाहू लागले आहे. दिगंबर कामत हे "लोकप्रिय' मुख्यमंत्री बनले आहेत पण प्रशासकीय पातळीवर मात्र त्यांचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा जराही वचक नसल्याने सरकारात एकसूत्रता अजिबात दिसत नाही, त्यामुळे प्रशासनात बेशिस्तीला उधाण आले आहे. या परिस्थितीत सरकारचे नेतृत्व पुन्हा एकदा विद्यमान सभापती तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडे सोपवले जावे, असा सूर सरकारातील एका गटाने नव्याने आळवायला सुरुवात केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
गेले काही दिवस प्रतीक्षेत असलेला कामत सरकारच्या मंत्रिमंडळाचा खांदेपालट या आठवडा अखेरीस होणार असून त्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा गोवा प्रभारी बी. के. हरिप्रसाद हे येत्या शुक्रवारी राज्यात दाखल होणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जात आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत मंत्रिमंडळात फेरबदल करताना किंवा खातेबदल करताना सत्तांतर होण्याची शक्यता कमी असल्याने हा प्रयोग करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, कामत यांचा आपल्या मंत्रिमंडळावर कोणताही ताबा राहिलेला नाही. त्यामुळे सरकारातील मंत्री एकमेकांवर जाहीरपणे टीका करत असल्याचे तसेच आपल्याच सरकारच्या विरोधात जाहीर भाष्य करत असल्याची प्रकरणे श्रेष्ठींकडे पोहोचली आहेत. सरकारच्या काही निर्णयांना खुद्द प्रदेश कॉंग्रेस व युवा कॉंग्रेसही विरोध करीत असल्याने याचीही गंभीर दखल श्रेष्ठींनी घेतली आहे. गत विधानसभा अधिवेशनात विरोधी व खुद्द सत्ताधारी आमदारांकडून मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खाण खात्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी खाण खात्यातील गैरकारभारांची जंत्रीच सभागृहासमोर ठेवून सरकारची बरीच नाचक्की केल्याने सरकारची बेअब्रू झालेली आहे. युवा कॉंग्रेसकडून सरकारातील काही मंत्र्यांच्या विरोधात खुद्द पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली असून त्यांना हटवले नाही तर पक्षावर गंभीर परिणाम होणार असल्याचीही त्यांना जाणीव करून दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांच्याकडून या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे व त्यानुसारच पुढील कृतीबाबत निर्णय घेतला जाणार, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, उपसभापती मावीन गुदिन्हो व केपेचे आमदार बाबू कवळेकर हे मंत्रिपदासाठीचे प्रमुख दावेदार मानले जातात. पांडुरंग मडकईकर यांच्यासाठी स्वतंत्र अनुसूचित जमात कल्याण खाते निर्माण करून त्यांची सोय करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; परंतु त्यात सरकारला अपयश आल्याने सरकारने थेट अनुसूचित जमात समाजाचा एकार्थाने रोष पत्करला आहे. यावेळी अर्थसंकल्पात या समाजासाठी राखीव भागही ठेवला नसल्याने त्याबाबतीतही या समाजाच्या नेत्यांत नाराजी पसरली आहे. नव्या मंत्र्यांची वर्णी लावण्यासाठी नेमके कोणाला वगळावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला असला तरी त्यासाठी पक्षातर्फे काही मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवालच सादर करण्यात आला असून त्यानुसार ही कारवाई करण्यात येईल, असे सूतोवाचही पक्षाकडून मिळाले आहे.
सध्याच्या परिस्थितीत आलेमावबंधूंपैकी एक मंत्री तसेच वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नावांचा समावेश संभावित अर्धचंद्र मिळणाऱ्यांत असल्याचे बोलले जात आहे. सरकारला मगो पक्षाच्या पाठिंब्याची गरजच नाही, अशीही मागणी काही नेत्यांनी केली आहे.
पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे सध्या सरकारासाठी खरोखरच डोकेदुखी बनले आहेत पण केंद्रात कॉंग्रेस- राष्ट्रवादीची युती असल्याने मिकी यांना वगळणे सरकारसाठी सोपे नाही. मिकी यांना वगळून त्यांच्या जागी नीळकंठ हळर्णकर यांची वर्णी लावण्याबाबतही प्रस्ताव असून त्याचाही विचार सुरू असल्याची खबर आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मुख्यमंत्रिपदावर असताना हे बदल करणे शक्य होणार नाही त्यामुळे नेतृत्व बदल करून मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा एकदा खाशांकडे देण्याचाही विचार पक्षातील एका गटाकडून सुरू आहे.

कुडतरी भागातही मोठे सेक्स रॅकेट

४ मुलींची सुटकाः चौघांना अटक - एकटा फरारी

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी) : या महिन्याच्या आरंभी फातोर्डा येथे भरवस्तीत सुरू असलेले सेक्स रॅकेट नष्ट केल्याची घटना ताजी असतानाच मडगाव पोलिसांनी, आज कुडतरी येथून चालवल्या जाणाऱ्या अशाच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून चार अल्पवयीन मुलींना सोडविले; तर या व्यवसायात गुंतलेल्या चौघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार फरारी आहे. या रॅकेटची व्याप्ती मोठी असून त्यात काही बडी मंडळी गुंतली असावीत, असा कयास व्यक्त केला जात आहे.
पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडतरी येथील एका हॉटेलाचा वापर या कामासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार तेथे त्यांनी पाळत ठेवली होती. त्यांनी आज बनावट गिऱ्हाईक तेथे पाठवून एका मुलीबाबत सौदा केला व तिला घेऊन तो कोलवा येथे गेस्ट हाऊसमध्ये आला. त्या मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरून मायणा कुडतरी व मडगाव पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.
तेथे सापडलेल्या ४ मुली या गोव्याबाहेरील आहेत. त्यांना "अपना घर'मध्ये पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्यांत रामबहादूर, मोहिद्दीन (कर्नाटक), अकला हक (पश्चिम बंगाल), अँथनी डायस (कुडतरी-गोवा ) यांचा समावेश आहे तर अँथनी याचा एक सहकारी बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
सदर हॉटेलचा वापर फक्त अशा मुलींना तेथे आणून ठेवण्यासाठी केला जात होता. अशा मुलींमागे प्रत्येकी पाच ते सहा हजार रु. घेतले जात होते व त्यांना ग्राहकाबरोबर पाठविले जात होते अशीही माहिती चौकशीत बाहेर आली आहे. अटक केलेल्यांविरुद्ध अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या महिन्याच्या आरंभी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी फातोर्डा येथे नेहरू स्टेडियमलगत असलेल्या एका फ्लॅटवर छापा टाकून चार मुली, चौघे तरुण व एका दलालाला अटक केली होती. सदर मुलींत काही प्रतिष्ठितांच्या होत्या, त्यामुळे मडगावात खळबळ माजली होती. नंतर सदर फ्लॅटची मालकीण हा धंदा चालवत असल्याचा आरोप करून तेथील रहिवाशांनी तिला तेथून तडीपार करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे त्या प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईही सुरू केली होती. तशातच आता हे प्रकरण उघडकीस आलेले आहे. काही वर्षांपूर्वी बायणा वेश्यावस्तीचा बीमोड केल्यानंतर तेथील वेश्या आपल्या मूळगावी नव्हे तर गोव्याच्या विविध शहरात बस्तान ठोकून आपला धंदा अशा प्रकारे चालवत असल्याचे आरोप होऊलागले आहेत.

रेमोच्या घरी गणरायाची "सुरमयी' पूजा



प्रीतेश देसाई
पणजी, दि. २६ - ""८३ सहस्त्रमुनींची भारती, प्रथमारंभी स्मरावा श्री गणपती, दृढोत्तर आहे वचनोग्ती, श्री गणनाथाय नमो नमः,'' अशा स्वरूपात ज्या गणरायाची घरोघरी पूजा केली जाते त्या गणनायकाची महती अस्सल कलाकाराच्या नजरेतून सुटल्यास नवल ते काय! सर्व कलांचा अधिपती असलेल्या गणनायकाला भजताना कोणताही निस्सीम कलाकार जाती-धर्माचे आवरण दूर सारून गणमय होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. गोमंतभूषण असलेला आणि आपल्या जादुमयी सुरांनी अपरंपार कीर्ती प्राप्त केलेला पद्मश्री रेमो फर्नांडिस त्यास अपवाद ठरूच शकत नाही. त्यामुळे असावे की या अभिजात कलाकाराने आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. रेमोच्या घरी पाऊल ठेवताच एका कलाकाराने कलेची गणरुपात थाटलेली पुजा चित्तवेधक ठरते. कलेच्या अधिष्ठानाची याहून वेगळी साधना ती काय असावी...
कळंगुटला राहणाऱ्या रेमोने शेषनागावर नृत्य करणाऱ्या मनोहारी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. रेमोच्या घरात प्रवेश करताच मंद आवाजात शास्त्रीय संगीतातील रागाची धून कानावर पडते आणि समोरील सजवलेल्या टेबलावर विराजमान केलेली गणेशमूर्ती नजरेत भरते...
मूर्तीच्या एका बाजूला एकतारी हे वाद्य ठेवले आहे तर, दुसऱ्या बाजूला पाच फळांनी भरलेले ताट ठेवण्यात आले आहे. तेथे "माटोळी' दिसली नाही तरी रंगीबेरंगी तोरण आणि "बोनेरांनी' सजवलेली मूर्ती आरास तुमचा आनंद नक्कीच द्विगुणीत करते.
""चतुर्थी आदल्या दिवशी मी म्हापशात मूर्ती आणण्यासाठी गेलो होतो. एका सभागृहात सुंदर अशा मूर्ती ठेवल्या होत्या. त्यातील सुमारे ९० टक्के मूर्तींचे आरक्षण झाले होते. मोजक्याच मूर्ती शिल्लक होत्या. त्यातील एका मूर्तीवर माझी नजर खिळली आणि मी ती घेऊन आलो. त्यानंतर त्या मूर्तीच्या हातात बासरी देण्यात आली,'' असे "गणेशपुराण' रेमो यांनी कथन केले.
एकदा प्रतिष्ठापना केल्यानंतर दर वर्षी पूजन करावे लागते, ही संकल्पना मी मानत नाही. पंधरा वर्षापूर्वी मी पहिल्यांदा गणरायाची मूर्ती आणली. त्यावेळी गणनायकाचा घरात प्रवेश होताच जो मला बदल मला जाणवला तो मी शब्दांत सांगू शकत नाही. माझी नाळ येथे जोडलेली आहे याचा मला साक्षात्कार झाला. हिंदू धर्म ५ हजार वर्षापूर्वीचा आहे. त्यानंतर अनेकांचे धर्मांतर झाले, असेही रेमोने सांगितले.
"देव व त्याचा सेवक यांच्यात मला कोणताही अडथळा मला नको आहे. मी धर्म मानत नाही. त्यामुळे संदेश वाहकाची मला गरजच भासत नाही. मुंबईत जाण्यासाठी एक व्यक्ती रेल्वेतून जाते, दुसरी बसमधून तर तिसरी व्यक्ती विमानाची निवड करते. मात्र मुंबईला फक्त विमानानेच जावे, असे म्हणणे योग्य नाही. तुम्ही रेल्वे आणि बसमधून पोहोचणार नाही, असे म्हणणे हे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण होय,' असे मत रेमो यांनी व्यक्त केले.
"येशू हे प्रेम आणि शांतीचे तर गणराय आनंद तथा उत्कर्षाचा संदेश देतो, अशी रेमो यांची श्रद्धा आहे. अंधारातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा दिवाळी हा सण मला खूप आवडतो. प्रत्येक धर्मात जे चांगले आहे घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
गणरायाला पंचारतीने ओवाळले जाते. मग धूप आणि अगरबत्ती दाखवली जाते. त्याच्या जोडीला मंत्र आणि शास्त्रीय संगीत लावले जाते. अशा सुरमयी पद्धतीने रेमो यांच्या घरात विराजमान झालेल्या गणरायाची पूजा केली जाते."मला गणनायकाकडे काहीही मागायचे नाही. गेल्या वर्षभरात मला भरपूर काही दिले आहे, त्यामुळे या देवाचे आभार मानायचे आहेत,' असे त्यांनी सांगितले.

मासेवाहू ट्रक अडवून नासधूस

चिंचीणी येथील घटना
अडीच लाखांचे नुकसान
वास्कोतील विक्रेते भयभीत


वास्को, दि. २६ (प्रतिनिधी)- खारीवाडा मच्छीमार जेटीवरुन मासे घेऊन निघालेला ट्रक "कुटबण बोट ओनर्स डेव्हलपमेंट युनियन'च्या काही सदस्यांनी चिंचीणी येथे अडवून आतील मालावर फिनाईल व ऍसिड ओतले. यामुळे "डब्ल्यूएफके' या आस्थापनाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. काल रात्री वास्कोहून मासे घेऊन निघालेल्या ट्रकला काही जणांनी चिंचीणी येथे अडवून टायर "पंक्चर' करून आतील माल खराब केल्याच्या वृत्ताला कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी दुजोरा दिला. येथून मासे घेऊन जाऊ नका, अशी धमकी ट्रक चालकाला दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकाराचा तीव्र निषेध करताना बेकायदा कृती करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी "गोवा फिशींग बोट ओनर्स असोसिएशन'च्या सदस्यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आज सकाळी खारीवाडा वास्को येथील मच्छीमार जेटीवर असलेल्या "गोवा फिशींग बोट ओनर्स असोसिएशन'च्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष सायमन परेरा यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, काल रात्री १२ च्या सुमारास खारीवाडा येथून सुमारे साडेसहा टन मासे घेऊन निघालेला ट्रक (क्रः केए २० बी ८१८५) चिंचीणी येथे पोचला असता तो "कुटबण बोट ओनर्स डेव्हलपमेंट युनियन'च्या काही सदस्यांनी अडवून चालकाला मारहाण केली. यानंतर ट्रकमध्ये असलेल्या मालावर केरोसीन, फिनाईल तसेच ऍसिड घालून तो खराब केला. त्याच प्रमाणे त्यांनी यावेळी सदर ट्रकाच्या चाकांची हवा काढल्याची माहिती परेरा यांनी यावेळी दिली. अशा प्रकारे त्यांनी अडीच लाख किमतीचा "डब्ल्यूएफके' या व्यवस्थापनाचा माल खराब केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खारीवाडा येथील मच्छीमार जेटी स्थानिक सदस्यांचे ट्रॉलर (सुमारे ३००) उभे करण्यास अपुरी पडत असल्याचे परेरा यांनी सांगितले. या कारणामुळे त्यांनी कुटबणच्या सदस्यांना येथे त्यांचे ट्रॉलर उभे करण्यास बंदी आणल्याने त्यांनी अशा प्रकारची बेकायदा कृती केल्याची माहिती यावेळी दिली. काल रात्री घडलेल्या घटनेनंतर येथून मासे घेऊन निघालेल्या इतर ट्रकांना पोलिस सुरक्षा पुरवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आज आयोजित करण्यात आलेल्या सदर पत्रकार परिषदेच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष परेरा यांच्यासह सरचिटणीस एडवीन कार्व्हालो, उपाध्यक्ष रोचा बारेटो व इतर सदस्य उपस्थित होते. दरम्यान या बाबत गोवा फिशींग बोट ओनर्स संघटनेने सदर घटनेबाबत कुंकळ्ळी पोलिस स्थानकात आपली तक्रार नोंद केली असून यात आंतोनियो रॉड्रिगीस, पॅट्रीक डिसिल्वा, मिंगेल रॉड्रिगीस, विनय तारी, शिवानंद लोटलीकर, जुलियस डिकॉस्ता, सेबी डिसिल्वा, बेंजामिन डिसिल्वा, रोझारीयो डायस, कॅप्रियानो कार्दोजो, थॉमस रॉड्रिगीस, गास्पर फर्नांडिस, अंतुश फर्नांडिस व पीटर रॉड्रिगीस कुटबण बोट ओनर्सच्या सदस्यांचा हात असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, काल रात्री सुमारे १० ते १५ अज्ञात व्यक्तींनी एक बाटली केरोसीन मालावर ओतल्याचे आल्बुकर्क यांनी सांगितले. सदर घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगून ही बेकायदा कृती केलेल्यांवर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Wednesday 26 August, 2009

शौरींकडून भाजपने
मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली, दि. २५ - भारतीय जनता पक्षातील पक्षांतर्गंत घुसळण कमालीची तीव्र झाली असून पक्षनेतृत्वावर तिखट शब्दांत हल्ला चढवल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचा निर्णय या पक्षाने घेतला आहे. तूर्त त्यांना पक्षातून काढले जाणार नाही अथवा त्यांच्यावर "कारणे दाखवा' नोटिसही बजावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती पक्षप्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मोहम्मद अली जिना यांना धर्मनिरपेक्ष ठरवणाऱ्या जसवंतसिंग यांच्या हकालपट्टीनंतर, आता शौरी यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दारूण पराभवानंतर शौरींनी पक्षनेतृत्वावर टीकेची झोड उठवली होती; पण आता त्यांनी थेट पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनाच लक्ष्य केल्याने भाजप त्यांच्यावर पक्षशिस्तीचा बडगा उगारू शकतो.
राजनाथ हे 'ऐरे गैरे' असून त्यांचे नेतृत्व म्हणजे "चुकांचा महामेरू' आहे... भाजपची अवस्था 'कटी पतंग'सारखी झाली आहे... संघानेच पक्ष ताब्यात घ्यायला हवा... पक्षाने नेतृत्वफळीच बदलण्याची गरज असून ते आता राज्यांमधून आणले पाहिजे... भाजपमध्ये नेतृत्वाचे कोंडाळे निर्माण झाले आहे... लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी निश्चित करा... असे एकापेक्षा एक कडक आसूड शौरींनी भाजपवर ओढायला सुरुवात केल्याने भाजपच्या पक्षनेतृत्वात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शौरींचा राज्यसभेतील कालावधी संपण्याच्या बेतात आहे, हे येथे उल्लेखनीय!
गेल्या आठवड्यात सिमल्यातील चिंतन बैठकीत शौरींच्या भाष्यबाजीवर नाराजी व्यक्त झाली होती. याच वेळी, जिनांना सेक्युलर ठरवत, फाळणीसंदर्भात पंडित नेहरूंच्या बरोबरीने सरदार पटेल यांचेही नाव घेतल्याने जसवंतसिंग यांना पक्षातून तडकाफडकी काढून टाकण्यात आले. त्यानंतर लगेचच, 'तुमची भूमिका स्पष्ट करा', असे आव्हान शौरींनी लालकृष्ण अडवाणींना दिले.
अडवाणींनीच पाकिस्तानभेटीत जिना "सेक्युलर' असल्याचे 'ऐतिहासिक' वक्तव्य केले होते! त्यानंतर, 'आता पुरे', असा इशारा पक्षाने शौरींना दिला होता; तरीही त्यांचे टीकास्त्र कायम राहिल्याने जनाधार नसलेल्या शौरींसारख्या नेत्याचा पक्षाला काहीच उपयोग नाही, त्यांची हकालपट्टी केलीच पाहिजे, हा सूर तीव्र होत चालला आहे! शौरी "हुतात्मा' बनू पाहात आहेत, अशी भेदक टिपण्णी करत पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी शौरींवर होणाऱ्या कारवाईचे संकेत दिले आहेत.
प्रसन्न आचार्य यांच्याकडे
मडगाव पालिकेचे शिवधनुष्य!

(प्रतिनिधी): सत्ताधारी गटातील रोषास पात्र ठरलेले मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत तावडे यांना अखेर त्या पदावरून हटविताना सरकारने दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त ताबा दिलेला आहे. उद्या बुधवारी ते या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. मात्र सत्ताधारी गटाला संतुष्ट करण्याच्या प्रयत्नात सरकार पणजी महापालिकेतील संजीत रॉड्रिक्सप्रमाणे मडगावातही एका कार्यक्षम अधिकाऱ्याला बळीचा बकरा तर बनवत नाही ना? असा सवाल अनेकांकडून केला जात आहे.
मुख्यमंत्र्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या मडगाव नगरपालिकेत गेल्या वर्षी सत्ताबदल करून कॉंग्रेसप्रणीत मंडळ सत्तारूढ झाले. परंतु, सत्तेवर आरूढ होऊनही मूळ धरण्यास अपयश आलेल्या मंडळाने सत्तांतर झाल्यापासून तावडे यांची बदली करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण, कोणताच अधिकारी येथे येण्यास तयार नव्हता, असे सांगितले जात होते.
नंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तावडे यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी तर एल्विस गोम्स यांची पालिका मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली. प्रत्यक्षात बदलीचे आदेश निघाले तेव्हा गोम्स हे सुट्टीवर विदेशात होते, आदेश मिळताच त्यांनी आपली रजा वाढवली आणि पदावर रुजू झालेच नाहीत. यामुळे मुख्याधिकारीपदी म्हणून तावडे यांनीच काम पाहिले. तावडे हे भाजप धार्जिणे, कर्मचाऱ्यांबाबत मवाळ धोरण स्वीकारणारे असे आरोप सत्ताधाऱ्यांकडून वारंवार होत होते. मागे एकदा पालिका प्रशासन संचालकांच्या परवानगी शिवाय कामावर घेण्यात आलेल्या ३५ कामगारांना वेतन देण्याबाबतच्या प्रश्र्नावरून तर तावडे हे सत्ताधाऱ्यांचे विशेष लक्ष्य झाले होते. पण ही टीका झेलूनही त्यांनी कोणाशीच व्यक्तिशः आकस येऊ दिला नव्हता. सर्वांशी ते साधेपणानेच वागत आले होते.
या पार्श्र्वभूमीवर त्या पदी आलेल्या आचार्य यांना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कसरत करावी लागणार आहे. सरकारला कोणत्याही परिस्थितीत ही पालिका आपल्या हातात ठेवणे अपरिहार्य आहे. विरोधी नगरसेवकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांकडूनही मंडळावर कामे वेगाने होत नसल्याचे आरोप होत आहेत. न्यायालयासमोर असलेली अनेक प्रकरणे, सोनसोडो येथे होऊ घातलेला नवा कायमस्वरूपी कचरा प्रक्रिया प्रकल्प व त्याबाबत विविध थरांतून घेतल्या जाणाऱ्या शंका, पालिका कर्मचारी व मंडळ यांच्यात असलेला बेबनाव, काही सत्ताधारी नगरसेवकात असलेली महत्त्वाकांक्षा या सर्व बाबी लक्षात घेऊनच आचार्य यांना पुढे जावे लागणार आहे. एक प्रकारे त्यांच्यासाठी ते शिवधनुष्य ठरेल असे मानले जात आहे.
आचार्य एक निर्णय कठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात, सरकारने निवडक तरुण अधिकाऱ्यांना एम.बी.ए.साठी पाठविलेले असून त्यात आचार्य यांचाही समावेश होतो. मडगाव पालिकेची विस्कटलेली घडी बसविण्यात तेथे मिळालेल्या अनुभवाचा कितपत उपयोग होतो यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे.
गेल्या चार वर्षांत ९ ते १० वरिष्ठ अधिकारी या पदावर आले व त्यात तावडे हे एकटेच तीनदा येऊन गेले. कोणीही वरिष्ठ अधिकारी येथे न येण्याचे मुख्य कारण येथील राजकीय हस्तक्षेप हेच असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याकडे जाऊन तावडे यांना हटविण्याची मागणी केली तेव्हा दुसरा कोणीच अधिकारी येथे येण्यास तयार नसल्याचे दिसून आल्याने सरकारची विचित्र कोंडी झाली होती व तावडे हे येथेच राहिले होते.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पालिकेतील एका कारकुनावर शिस्तभंग कारवाई करण्याची सूचना नगराध्यक्षांनी करूनही तावडे यांनी ती कारवाई केली नाही व त्यामुळे संतप्त नगराध्यक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर तावडे यांना हटविले गेले.
कुठ्ठाळीत दुकानाला आग
अडीच लाखांची हानी

वास्को, दि. २५ (प्रतिनिधी)- ठाणे-कुठ्ठाळी येथील विनायक लवंदे यांच्या दुकानामध्ये आज दुपारी शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत सुमारे अडीच लाखाची मालमत्ता खाक झाली. वेर्णा व वास्कोच्या अग्निशामक दलाने येथे त्वरित कारवाई करून आग आटोक्यात आणल्याने पंधरा लाखाचे सामान वाचवण्यात यश आले. गणेश चतुर्थीसाठी आणलेल्या आतषबाजीच्या सामानापर्यंत आगीचे लोळ पोचण्यापूर्वी आग नियंत्रणात आणल्याने संभाव्य धोका टळला.
वेर्णा अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १.४५ च्या सुमारास सदर घटना घडली. ठाणे-कुठ्ठाळी येथील व्यापारी विनायक लवंदे जेवणासाठी आपले दुकान बंद करून घरी गेल्यानंतर काही वेळाने आतून धूर येत असल्याचे येथील काही लोकांनी पाहिले. त्यांनी वेळ न दवडता याबाबत मडगावच्या पोलिस कंट्रोल रुमला माहिती दिल्याने त्वरित वेर्णा व वास्को येथील अग्निशामक दलाच्या बंबाने घटनास्थळावर दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. सुमारे एका तासाच्या अथक प्रयत्नाअंती आग विझवण्यास अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी यश प्राप्त झाले. दुकानामध्ये आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचे तपासावेळी सिद्ध झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. आगीत अडीच लाखाची मालमत्ता खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या दुकानामध्ये ठेवण्यात आलेले आतषबाजीचे सामान येथून त्वरित हटवण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. दरम्यान सुमारे पंधरा लाखाची मालमत्ता बचावण्यात आली आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे हवालदार यू. एम. भंडारी पुढील तपास करीत आहेत.
रावणाच्या मूर्तीची
पर्रा येथे तोडफोड

म्हापसा, दि. २५ (प्रतिनिधी)- राज्यात गणेश चतुर्थी साजरी केली जात असतानाच काल रात्री पर्रा - आसगाव आणि हणजूण भागातील जोड सीमेजवळ दशशीरा या रावणाच्या घुमटीची आणि मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर गोव्यातील मूर्तिभंजनाची ही पहिलीच घटना असून दक्षिण गोव्यात झालेल्या मूर्तिभंजनाच्या घटनांचा छडा अद्याप लागलेला नाही.
हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्रा - आसगाव आणि हणजूण येथील दशशीरा या रावणाच्या देवळातील घुमटी आणि रावणाची मूर्ती अज्ञातांनी फोडून बाहेर फेकून दिली होती. हा प्रकार आज (दि. २५) सकाळी येथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. या घटनेची माहिती हणजूण पोलिसांना देण्यात आली. हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर यांनी पोलिस पथकासोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच म्हापशाचे उपअधीक्षक सॅमी तावारीस आणि निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पर्रा - आसगाव आणि हणजूण गावचा राखणदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दशशीरा देवाची मूर्ती एका भक्ताने येथे बसवली होती. पर्वरी येथील वडाजवळ असलेल्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्यानंतर पोलिस बंदोबस्तात ती पुन्हा बसवण्यात आली होती. या घटनेनंतर उत्तर गोव्यातील हे पहिलेच मूर्ती तोडफोड प्रकरण आहे. दक्षिणेत मूर्तिभंजन प्रकरणाचा छडा लावण्यात सरकारला अपयश आलेले असल्याने उत्तरेत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी येथून होत आहे.
हुंड्यासाठी छळणाऱ्या
पती, सासऱ्याला अटक

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) - हुंड्यासाठी छळवणूक केल्यामुळे झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेचा पती नीलेश ऊर्फ लक्ष्मण बांदोडकर (३१) व सासरा शशिकांत बांदोडकर यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. तर, सासू आणि दीर फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याविषयीची पोलिस तक्रार मुलीच्या वडिलांनी सादर केले होती.
प्राप्त माहितीनुसार गिरी म्हापसा येथे राहणाऱ्या सदर मुलीचे चार महिन्यांपूर्वी (दि. २७ एप्रिल ०९ रोजी) नीलेश बांदोडकर याच्याशी सावंतवाडी येथील एका मंगल कार्यालयात लग्न झाले होते. दोघांचा विवाह रीतसर दोन्ही कुटुंबीयांनी ठरवून केला होता. विवाहाच्या चौथ्या दिशीच पती नीलेश बांदोडकर दुबई येथे निघून गेला होता. यानंतर सासू, सासरा आणि दिराने हुंड्यासाठी तिची छळवणूक सुरू केली. माहेरहून चार लाख रुपये आणि सोने आणण्यासाठी तिची मारहाण व छळवणूक करण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दि. २१ ऑगस्ट ०९ रोजी तिचा पती दुबईतून घरी आल्यानंतर त्यानेही आपल्या आईसोबत मिळून हुंड्यासाठी तिची छळवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती माहेरी निघून गेली होती. दि. २२ रोजी म्हणजेच चतुर्थीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले.
मुलीच्या वडिलांनी याविषयीची तक्रार म्हापसा पोलिस स्थानकात करताच पोलिसांनी चतुर्थीच्या दिवशीच नीलेश आणि त्याचे वडील शशिकांत यांना अटक करून तुरुंगात डांबले. याविषयीची अधिक चौकशी म्हापसा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक ब्रॅंडन डिसोझा करीत आहेत.
आधुनिक जगातील नैसर्गिक माटोळी
तब्बल ३११ वस्तूंची आरास

वाळपई, दि. २५ (प्रतिनिधी)- येथून सुमारे १५ किमी अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले साट्रे गाव. या गावात दीपक धानू गावकर व रामा गावकर हे युवक गेल्या चार वर्षांपासून अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. या डोंगराळ प्रदेशात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या जंगली फळाफुलांची आरास गावकर बंधू गेल्या चार वर्षांपासून गणरायासमोरील माटोळीला बांधत आले आहेत. आणि या माटोळीला यंदा तब्बल ३११ फळे व फुले बांधण्यात आली आहेत!
निसर्गसौंदर्याने नटलेल्या या तालुक्यात विविध प्रकारची फुले, फळे तसेच कंदमुळे आहेत. परंतु, त्यांची संपूर्ण माहिती क्वचितच कोणाला आहे. उत्सवाच्या निमित्ताने या फळाफुलांची तसेच कंदमुळांची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने गावकर बंधूंनी अनोखा असा उपक्रम हाती घेतला. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ साली त्यांनी ७० विविध प्रकारच्या फळाफुलांनी माटोळी सजवली आणि कला अकादमीने आयोजित केलेल्या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. या बक्षिसाने खरोखरच उत्तेजित झालेल्या गावकर बंधूंनी माटोळीला लावण्यात येणाऱ्या वस्तूंची संख्या वाढवत नेली. २००६ साली ११८ वस्तूंसह कला व संस्कृती खात्याने आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त केले. यानंतर २००७ साली २१८ वस्तूंसह दुसरे बक्षीस व २००८ साली २९१ वस्तूंसह द्वितीय क्रमांक पटकावला. यंदा मात्र तब्बल ३११ वस्तूंसह प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब करण्याचा दृढ निश्चय गावकर यांनी केला आहे.
अथक परिश्रमाने जमवलेल्या या फळांची मांडणी करण्यासाठी त्यांना घरच्या मंडळीकडून मोलाचे सहकार्य लाभले आहे. अनोख्या अशा या उपक्रमाने निसर्गाचे महत्त्व अधोरेखित व्हावे आणि आपल्या गावाला प्रसिद्धी मिळावी हाही त्यामागचा एक उद्देश असल्याचे गावकर कुटुंबीय सांगते.
म्हादई अभयारण्यात असलेल्या या गावातील युवा पिढीने निसर्गाप्रति दाखवलेली भावना इतरांसाठी प्रेरणादायी ठरावी, अशीच तर श्री गणरायाची इच्छा नाही ना?

Tuesday 25 August, 2009

बड्या बांधकामांनाही अभय देण्याचा डाव

माथानी साल्ढाणा यांचा गंभीर आरोप
वाद "सीआरझेड'चा


पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- "सीआरझेड'मुळे राज्यातील किनारी भागांतील पारंपरिक घरांवर ओढवलेल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी येत्या २८ रोजी गोवा भेटीवर येणाऱ्या केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांची भेट घेणार असून त्यांना यासंबंधी उद्भवलेल्या परिस्थितीची जाणीव करून देण्यात येणार आहे, अशी माहिती "गोंयच्या रापणकारांचो एकवट'चे सरचिटणीस तथा माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांनी दिली. राज्य सरकारकडून पारंपरिक मच्छीमार, रेंदेर व इतर शेतकरी कुटुंबीयांची घरे वाचवण्यासाठी ही धडपड सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी "सीआरझेड'चे बिनधास्त उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या इतर बड्या बांधकामांनाही अभय देण्याचे कारस्थान राजकीय पातळीवर सुरू आहे, असा गंभीर आरोप श्री.साल्ढाणा यांनी केला.
केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांची सुमारे एक हजार पिडीत लोकांसह भेट घेतली जाईल व त्यांना या समस्येबाबत सखोल माहिती देणारे निवेदनही सादर केले जाईल, अशी माहिती श्री.साल्ढाणा यांनी "गोवादूत'शी बोलताना दिली. राज्य सरकारतर्फे याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला एक निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यात या समस्येचा उहापोह करण्यात आला आहे. राज्य सरकारने अशा बांधकामांचे संरक्षण करण्यासाठी निश्चित केलेली १ जानेवारी २००७ ही तारीख बदलून ती ३१ डिसेंबर २००७ करण्यात यावी, अशी मागणीही श्री.साल्ढाणा यांनी केली. किनारी भागातील बांधकामांना सध्याच्या कायद्यानुसार ३३ टक्के (एफएसआय) अर्थात केवळ ९ मीटर उंचीचे ठेवण्याचे बंधन आहे. त्यामुळे केवळ एकमजली बांधकामालाच परवानगी आहे. राज्य सरकारने ही मर्यादा चौपटीने वाढवण्याची शिफारस केली आहे. ही सूचना पारंपरिक रहिवाशांसाठी असल्याचे सरकारकडून भासवले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ मात्र हॉटेल व्यावसायिक व इतर व्यापारी संकुलांना होणार असल्याचे श्री.साल्ढाणा म्हणाले.
दरम्यान,राज्यातील किनारी भागांत मोठ्या प्रमाणात "सीआरझेड'चे उल्लंघन करून राजकीय आश्रयाने अनेक बड्या प्रकल्पांचे काम सुरू आहे.या प्रकल्पांना सरकारी खात्यांची मान्यता नसली तरी ही बांधकामे कालांतराने कायदेशीर करण्याची हमी राजकीय नेत्यांनी त्यांना दिल्याने त्यांच्यावर "सीआरझेड' प्राधिकरणही कारवाई करीत नाही, असा आरोप श्री. साल्ढाणा यांनी केला. काही ठिकाणी स्थानिक पंचायतींकडूनही अशा बांधकामांना अभय देण्यात येत आहे. अलीकडेच मांद्रे जुनसवाडा येथील "रिवा रिसॉर्ट' चे बांधकाम बेकायदा ठरवून ते बंद पाडण्यात आले. या बांधकामाला कुठल्याही सरकारी खात्याकडून दाखला मिळाला नाही; परंतु एका मंत्र्यांने या बांधकाम व्यावसायिकाला सुरक्षेची हमी दिल्याने त्या आधारावरच हे बांधकाम केले जात असल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता.
दरम्यान,गोवा हे पर्यटक राज्य असल्याने पर्यटनाच्या उद्दिष्टाने स्थानिकांनी किनारी भागांत छोटेमोठे व्यवसाय करण्यासाठी ही बांधकामे उभारली आहेत,असा आभास निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. किनारी भागातील ९० टक्के बडी बांधकामे ही बिगरगोमंतकीयांची आहेत. त्यामुळे ही बांधकामे कायदेशीर झाल्यास त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसणार आहे, याचीही आठवण यावेळी श्री. साल्ढाणा यांनी करून दिली. पारंपरिक रहिवाशांच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याचा हा डाव हाणून पाडला जाईल, असा झणझणीत इशाराही त्यांनी दिला.

बेकायदा खाणींवरील कारवाईबाबतच संशय

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध कारणांस्तव खाण मालकांना नोटिसा व पत्रे पाठवण्याचा धडाका सुरू झाला असतानाच खाण खात्याने याप्रकरणी मौन धारण केले आहे. त्यामुळे यामागे नेमके कसले राजकारण शिजतआहे, यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही परवा या विषयावर भाष्य करण्याचे टाळून या गूढतेत अधिक भर घातल्याने सरकार खाण कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत खरोखरच प्रामाणिक प्रयत्न करीत आहे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.
गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी बेकायदा खाण व्यवसाय हाच विरोधाचा मुख्य मुद्दा केला होता. बेकायदा खाणींना राज्य सरकारकडून कशा पद्धतीने अभय मिळत आहे व त्याचबरोबर कोट्यवधींचा महसूलही कसा बुडवला जात आहे, हे पर्रीकरांनी आकडेवारीसह उदाहरणे देत स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्रीच कित्येक वर्षे खाण खाते सांभाळत असल्याने या टीकेचा रोख त्यांच्या दिशेनेच होता. त्यांनी या टीकेला उत्तर देताना अखेर येत्या सहा महिन्यात सर्व बेकायदा खाणी बंद करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते. खाण खात्याबरोबर खाणींना परवानगी देताना महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पर्यावरण खात्यावरही टीकेचे झोड उठवण्यात आली होती. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही अशा बेकायदा खाणींवर मेहेरनजर केली जाते व सार्वजनिक सुनावणीच्या नावाने फार्स केला जातो, अशीही टीका झाली होती.
विरोधी भाजपबरोबर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्याकडूनही, पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खाण कंपनींच्या नावांची यादीच सादर करण्यात आल्याने सरकारला घरचा आहेरच मिळाला होता. अधिवेशन संपताच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून खाणींविरोधात कारवाईची चक्रे सुरू झाली आहेत. सुरुवातीला सहा खाण कंपनींना नोटिसा पाठवून पर्यावरण दाखला सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर आणखी सात खाण कंपनींना कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. आता तर चक्क ७४ खाणींना पत्र पाठवून वन व पर्यावरणविषयक प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या धडाक्यामुळे खाण खातेही हादरले आहे. राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त करून देणाऱ्या या खात्याला पूर्णवेळ संचालक नाही. त्यात विद्यमान संचालक अरविंद लोलयेकर यांच्याकडे खाण व वाहतूक खात्याचा ताबा आहे. हायसिक्युरिटी नंबर प्लेटवरून उडालेल्या गोंधळामुळे ते सध्या वाहतूक खात्याचा कारभार सांभाळण्यातच व्यस्त असल्याने खाणींबाबत खाण खाते मात्र अजूनही बेपर्वा असल्याचे वातावरण आहे.
अलीकडेच दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांची भेट घेऊन त्यांना खाणींबाबत राज्य सरकारला अधिक अधिकार देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. खाणींना परवानगी देताना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला अधिक अधिकार देण्याची गरज आहे. केंद्राकडून पर्यावरण प्रमाणपत्र देताना प्रत्यक्षात येथील परिस्थितीची कोणतीच दखल घेतली जात नाही; तसेच येथील स्थानिकांच्या हरकतींचाही विचार केला जात नाही, अशी तक्रारही राज्य सरकारकडून करण्यात आली. गेल्या २००३ पासून राज्यात एकूण १४१ खाणींना पर्यावरण प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. त्यात या सर्व खाणी केवळ चार तालुक्यांत असल्याने या खाणींविरोधात स्थानिकांत मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.
राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री हेच खाणमंत्री आहेत व वेळोवेळी विधानसभा अधिवेशन काळात विरोधकांनी सर्वांत जास्त टीका खाण खात्यावर करून या खात्यातील अनेक भानगडींचा पर्दाफाश केला आहे. या खात्यावरच जोरदार टीका होत असल्याने मंत्रिमंडळातील काही नेतेही चलबिचल झाले आहेत. त्यात मंत्रिमंडळातीलच काही नेते खाण व्यवसायात गुंतल्याने मुख्यमंत्री त्यांना वाचवण्यासाठी तर गप्प बसत नाही ना, असा सवालही केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी बेकायदा खाणी बंद करण्यासाठी सहा महिन्यांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले खरे; परंतु हे आश्वासन ते कितपत पूर्ण करतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वनमंत्री हक्कभंगाच्या घेऱ्यात?
विधानसभा अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी बेकायदा खाणींवर टीका करताना अनेक ठिकाणी वनक्षेत्रात खाणी सुरू असल्याचा आरोप केला होता. वनमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून राज्यात वनक्षेत्रात एकही खाण सुरू नसल्याचा दावा केला होता. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आता अनेक खाण कंपनींना वन परवाना सादर करण्याचे आदेश दिल्याने किती खाणी वनक्षेत्रात बेकायदा व्यवसाय करीत आहेत, त्याचा उलगडा होणार आहे. वनमंत्र्यांनी केलेला दावा हक्कभंगाला आमंत्रण देण्यास कारणीभूत होऊ शकतो, असे सुतोवाच पर्रीकर यांनी यापूर्वीच केले होते त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या खाणींची कागदपत्रे तपासल्यानंतर हे गुपित उघड होणार आहे.

"त्या' रुग्णाचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे नाही

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) -बंगळूरहून काही दिवसांपूर्वी गोव्यात आलेले व येथील एका खाजगी इस्पितळात निधन पावलेल्या शिवमूर्ती (६७) या इसमाचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झालेला नाही, असे चाचणी अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे.
गोव्यात अद्याप स्वाइन फ्लूच्या अधिकृत बळीची नोंद झाली नसली तरी रुग्णांच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. काल पोहोचलेल्या चाचणी अहवालानुसार आणखी तीन संशयितांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने गोव्यातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या १९ वर पोहचली आहे. गोवा-पुणे महामार्गावरील एका खाजगी आराम बस चालकाचा त्यात समावेश आहे,अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
आरोग्य खात्याने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या संशयितांत स्वाईन फ्लूची प्रखर लक्षणे आढळल्यास त्यावर उपचार सुरू करण्याचे आदेश दिले आहे. गोव्यातून स्वाईन फ्लू संशयितांच्या लाळेचे नमुने पुणे येथे पाठवण्यात येतात व पुणे येथे सध्या या साथीने कहर केल्याने गोव्यातील चाचणी अहवाल वेळेत पोहचण्यास विलंब होत असल्याचे आढळून आले आहे.राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता थेट अशा संशयितांवर उपचार सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
धोका अजून कायम
स्वाईन फ्लूचा धोका अद्याप टळलेला नाही असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. विशेषत: थंड हवामानात याची लागण होण्याची शक्यता अधिक वाढल्याचे संघटनेच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे. थंड व पावसाळी वातावरणात या साथीचा प्रसार वाढण्याची शक्यता जादा असते, त्यामुळे भारताने विशेष काळजी घेण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. या रोगाने आत्तापर्यंत, १७९ देशांत १७९९ बळी घेतले आहेत. याखेरीज १,८२,००० व्यक्तींना याची लागण झाल्याचे प्रयोगशाळांतील चाचणीत आढळले आहे,

स्वाईन फ्लूमुळे ७२ जणांचा मृत्यू

एक चिमुकली आणि दोन मध्यमववयीन व्यक्तींचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याने आता देशातील या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ पर्यंत पोहोचली आहे. हे गेल्या २४ तासांमधील बळी महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात राज्यांमध्ये नोंदले गेले आहेत. दरम्यान, दोन आठवड्यांच्या प्रदीर्घ सुटीनंतर स्वाईन फ्लूग्रस्त पुण्यातील शाळा-महाविद्यालये आजपासून सुरू झाली. कालपासून देशातील विविध राज्यांमध्ये या रोगाचे शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली येथे सांगितले.
लिव्हरच्या त्रासामुळे अडीच वर्षाच्या एक मुलीला २१ ऑगस्ट रोजी पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. अहवाल सकारात्मक आल्यामुळे तिला स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते, असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या चिमुकलीचे काल रात्री निधन झाले. तिच्या मृत्युमुळे स्वाईन फ्लूची बळीसंख्या पुण्यात २३, तर महाराष्ट्रात ३९ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी बंगलोरस्थित तिरुमला हॉस्पिटलमध्ये ५० वर्षीय सरोजअम्मा नावाच्या महिलेला भरती करण्यात आले होते. तिला टॅमिफ्लूचा उपचारही सुरू करण्यात आला होता. मात्र, काल रात्री तिचेही निधन झाले, असे हॉस्पिटलमधील सूत्राने सांगितले.
ताप व स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे राजेश उधाड नावाच्या ५२ वर्षीय गृहस्थाला राजकोटमधील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये २० ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. राजेशचा आज सकाळी मृत्यू झाल्यामुळे या रोगाने गुजरातमध्ये दगावणाऱ्यांची संख्या ७ झाली आहे.
आतापर्यंत कर्नाटकात १३, तामिळनाडू व छत्तीसगढमध्ये प्रत्येकी तीन, दिल्लीत दोन, तर केरळ, गोवा, राजस्थान, उत्तरांचल व हरयाणा येथे प्रत्येकी एक रुग्ण या रोगाने दगावला आहे.

Sunday 23 August, 2009

गणेशाच्या स्वागताला तमाम गोवेकर सज्ज


किशोर के.नाईक गांवकर

पणजी, दि. २२ - उद्या रविवार २३ ऑगस्ट, भाद्रपद शुद्ध तृतीया; अर्थात गणेश चतुर्थीचा उत्सव. समस्त हिंदूंचे लाडके व आराध्यदैवत श्रीगणेशाच्या स्वागतासाठी गोमंतकीय जनता सज्ज झाली आहे. श्रीगणेश ही सुखाची पखरण करणारी आणि व दुःखाचा विनाश करणारी देवता. त्यामुळे दिवसेंदिवस महागाई आणि स्वाईन फ्लूसारखी संकटे ओढवत असताना त्यांचे निवारण करणारा गणराय आपल्या घरी येणार या कल्पनेनेच लोकांत आगळेचैतन्य पसरले आहे. यंदा श्री गणेशाचे केवळ स्वागत नव्हे तर जनतेकडून विघ्नहर्त्याचा धावाच केला जात आहे.
उत्सव किंवा सणाच्या बाबतीत गोमंतकीय कधीच मागे राहात नाही. त्यात गणेशोत्सव हा तर हिंदूंचा महत्त्वाचा सण. साहजिकच त्याच्या तयारीला सर्वत्र उधाण आले आहे. विविध भागांतील बाजारपेठा खचाखच भरल्या असून आर्थिक चणचण भासत असतानाही लोकांच्या खरेदीला उत्साह दिसतो. केवढेही आर्थिक संकट असले तरी उत्सवाची मजा कमी करणे किंवा हात राखून सण साजरा करणे गोमंतकीयाला कधीच जमले नाही.एकवेळ पैसे नसले तरी कर्ज काढील; पण सण साजरा करण्यात गोमंतकीय कधीच मागे राहणार नाही.यंदाची परिस्थिती अनेक दृष्टीने काहीशी चिंतनीय व उत्साहावर विरजण आणणारी ठरली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.जागतिक मंदीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. गेल्या वर्षभरात खाजगी क्षेत्रातील अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड ओढवली आहे.बाजारात विविध वस्तूंच्या किमती अव्वाच्या सव्वा दरात विकल्या जात आहेत. सणाच्या वेळी काटकसर करणेही शक्य नाही, त्यामुळे यंदा बाजार खरेदीवेळी मात्र अनेकांचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे हे मात्र नक्की.
परदेशातून भारतात आगमन झालेल्या "स्वाईन फ्लू'च्या साथीने तर सर्वत्रच भीतीचे सावट पसरले आहे.गोव्यात अद्याप या साथीमुळे अधिकृतरीत्या कोणीही दगावलेला नाही. ही साथ रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गोव्यात या साथीचा जोर काही प्रमाणात कमी झाला असे आढळल्याने सरकारी यंत्रणाही ढिली पडली आहे.यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने "गर्दी टाळा'असा मंत्र वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचे लोकांनी प्रामाणिकपणे पालन करावे .सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा उत्सवाच्या लोकप्रियतेला काही प्रमाणात आवर घालावा व या साथीचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन सरकारनेही केले आहे.
चतुर्थीनिमित्त मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून हजारो गोमंतकीय आपल्या मूळ घरी येतात. सध्या मुंबई, पुणे येथे या साथीचे थैमान सुरूच असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. स्वाईन फ्लू या रोगाची प्राथमिक लक्षणे ही सर्दी,खोकला,डोकेदुखी, ताप अशी असल्याने त्याकडे कानाडोळा करून अजिबात चालणार नाही.अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन तपासणी करून घेणेच सुरक्षित ठरणार आहे.चतुर्थीच्या या सणानिमित्ताने लोक एकत्र येतात त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त चर्चा करून या साथीबाबत एकमेकांना सावध करणे उचित ठरणार आहे.
गोव्यात घरोघरी श्रीगणेशमुर्तीचे पूजन केले जाते. हा उत्सव दीड, पाच, सात,नऊ,अकरा व एकवीस दिवस असा साजरा केला जातो. विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी भरघोस कार्यक्रमांची घोषणा केली आहे.धार्मिक उत्सव साजरा करताना भीती बाळगण्याची मानसिकता आपल्या भारतीय जनतेत नाही, त्यामुळे या उत्सवावर मोठा परिणाम होणार नाही, हे जरी बरोबर असले तरी केवळ भावनिक पातळीवर या संकटाचा विचार करणे योग्य नाही. स्वाइल फ्लू ही साथ आहे व एकमेकांच्या संपर्काने ही साथ झपाट्याने पसरू शकते त्यामुळे " देव बघून घेईल' असा विचार करून वागणे धोकादायक ठरू शकते.देव रक्षण करीलच; परंतु आपण जर स्वतःहून संकट ओढवून घेतले तर देवही काही करू शकणार नाही, याचे भान ठेवावे लागेल.
गोव्यातील विद्यमान सरकारने आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे त्यामुळे आता विविध संकटांत सापडलेले लोक आपापल्या दैवतांचा धावा करू लागले आहेत.जनतेचे प्रश्न सोडवण्याचे सोडून आपली नेतेमंडळी केवळ आपसातच झगडत आहेत. प्रशासकीय कारभार पूर्णपणे कोलमडला आहे. सर्वसामान्य जनता विविध प्रश्नांनी ग्रासली आहे व सरकारकडून त्यांना कोणताही आधार मिळत नाही,अशीच परिस्थिती बनली आहे. सरकारी पातळीवर सहाव्या वेतन आयोगाच्या निमित्ताने "खुशी' असली तरी खाजगी पातळीवर मात्र नेमके वेगळे चित्र आहे व तिथे "गम' च जास्त आहे.
या परिस्थितीतून केवळ देवच आपले रक्षण करू शकेल,अशीच भावना लोकांची बनली आहे. धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीच्या नावाखाली येथील शेतकऱ्यांची शेतजमीन व बागायती संपादन करून त्यांना आपल्या भूमिपासून वेगळे करू पाहणाऱ्या सरकारच्या कृतीविरोधात या लोकांनी या जमिनीचा राखणदार श्री देव बांदेश्वराचा धावा केला आहे. ब्रह्मकमळी या निसर्गाने नटलेल्या गावात खाण सुरू करण्याचा बेत असल्याने हे संकट दूर करण्यासाठी या लोकांनी चक्क श्री ब्रह्मदेवालाच साकडे घातले. आता तर संकटमोचन करणारे व दुःखहरण करणारे गजाननच सर्वांच्या घरात प्रवेश करणार आहेत, त्यामुळे सर्वच बाजूने हैराण झालेले लोक संकटमुक्तीसाठी गणरायाकडे प्रार्थना करणार आहेत. साहजिकच " गणा धाव रे, मला पाव रे' या गजरानेच ही चतुर्थी साजरी केली जाईल यात शंका नाही..

क्रिकेट मैदानासाठी "जीसीए'ला ५० कोटींचे अनुदान - शशांक मनोहर


"जीसीए'च्या इनडोअर अकादमीचे उद्घाटन


पणजी, दि. २२ - "गोव्यातील क्रिकेटने अधिकाधिक प्रगती करावी यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ("बीसीसीआय'चे) "जीसीए'ला संपूर्ण सहकार्य राहील. गोव्याने लवकरात लवकर स्वतःचे क्रिकेट स्टेडियम उभारावे; त्यासाठी बीसीसीआय गोव्याला पन्नास कोटींचे आर्थिक साहाय्य करेल; सरकारच्या मदतीवर जास्त अवलंबून न राहता जीसीएने क्रिकेट मैदानासाठी खाजगी जागेचा विकल्प निवडावा, जेणेकरून मैदानाचे काम वेगाने पूर्ण होऊ शकेल' अशा मोजक्याच परंतु, आश्वासक शब्दांत "बीसीसीआय'चे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आज संध्याकाळी पर्वरी येथील जीसीएच्या इनडोअर क्रिकेट अकादमीचे जागतिक क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता असलेल्या बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जीसीएचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर, सचिव प्रसाद फातर्पेकर, खजिनदार विनोद फडके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ऍड. दयानंद नार्वेकरांच्या पुढाकाराने गोव्यात इनडोअर अकादमीची स्थापना झाली आहे. याचा पुरेपूर फायदा गोव्यातील क्रिकेटपटू घेतील व लवकरच गोवा रणजीच्या "एलिट'गटात खेळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मोहाली, मुंबई व चेन्नई येथे वेगवान गोलंदाजांसाठी लवकरच बीसीसीआय क्रिकेट अकादमींची स्थापना करणार आहे. त्यात प्रथितयश माजी क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभेल. गोव्यासाठीही हे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
श्री. नार्वेकर म्हणाले की, जोपर्यंत एखाद्या राज्याच्या क्रिकेट असोसिएशनचे स्वतःचे क्रिकेट मैदान असणार नाही तोपर्यंत त्या असोसिएशनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना मिळणार नाही असा बीसीसीआयचा यापूर्वीच निर्णय झालेला आहे. त्यामुळे जीसीएचे स्वतःचे क्रिकेट मैदान असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. मैदानाच्या उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या प्राथमिक गोष्टींना याआधीच सुरुवात झाली असून येत्या सहा महिन्यात मैदानासाठी जमीन संपादन करून मैदानाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल असे आश्वासन त्यांनी उपस्थित क्रिकेट रसिकांना दिले.
गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम आरंभी पार पडले. त्यात घुमट आरती, मांडो व देखणी आदींचा समावेश होता. जीसीएचे सचिव प्रसाद फातर्पेकर यांनी स्वागत केले. खजिनदार विनोद फडके यांनी आभार मानले.

"पुढचा सामना स्वबळावर'
यापूर्वी जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जायचा त्या मडगावच्या फातोर्डा मैदानावर आता जो सामना होईल तो शेवटचा असेल; त्यानंतरचा सामना मात्र "जीसीए'च्या स्वतःच्या मैदानावरच खेळवला जाईल असे श्री. नार्वेकर यांनी सांगितले तेव्हा टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या घोषणेचे स्वागत करण्यात आले.

गर्दी टाळा हाच महामंत्र पाळा

पर्यटन हंगामासाठी लवकरच कृती आराखडा

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या काळात गर्दी टाळा, खबरदारी घ्या व स्वाईन फ्लूबाबत काळजी घेऊन हा सण साजरा करा,असा मूलमंत्र आज आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला. "स्वाईन फ्लू'बाबत सरकारने खबरदारीचे उपाय योजले आहेतच; परंतु लोकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. पुढील पर्यटन हंगामाच्या अनुषंगाने येत्या १५ सप्टेंबरपर्यंत कृती आराखडा तयार करण्यात येईल,अशी माहितीही श्री.राणे यांनी दिली. स्वाईन फ्लूबाबत कुणाला कोणतीही माहिती हवी असेल तर त्यांनी २४५८४५८ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असेही यावेळी कळवण्यात आले.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, गोमेकॉचे डिन डॉ. व्ही. एन. जिंदाल,आरोग्य संचालिका डॉ.राजनंदा देसाई आदी हजर होते.अलीकडेच याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद यांच्याशी चर्चा केल्याची माहिती श्री.राणे यांनी दिली.गोव्यात पुढील महिन्यापासून पर्यटन हंगाम सुरू होतो आहे, त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्राने गोव्याला चार थर्मल स्कॅनर्स पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत याप्रकरणी कृती आराखडा तयार केला जाईल. येत्या २५ ऑगस्ट रोजी सर्व खाजगी इस्पितळांच्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचीही मदत घेण्याचे ठरवले आहे. डॉ.ऑस्कर रिबेलो. डॉ.शेखर साळकर, डॉ.रूफिन मोतेंरो,डॉ.वीरेंद्र गांवकर आदींबरोबर चर्चा करून एक पथक तयार करून या साथीबाबत पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहितीही यावेळी श्री.राणे दिली.
राज्यभरात लवकरच किमान शंभर खाटींची सोय स्वाईन फ्लूवर उपचार करण्यासाठी केली जाणार आहे.गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला चार "व्हेंटिलेटर' खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.सध्या एखाद्या संशयित रुग्णांत "स्वाईन फ्लू'ची निश्चित लक्षणे आढळल्यास "टेमीफ्लू'गोळ्या चालू करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
गोव्यात आत्तापर्यंत ७० हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली. १०९ संशयितांची तपासणी करण्यात आली.त्यात ४८ लोकांचे चाचणी अहवाल आलेत व १८ रुग्ण स्वाईनफ्लू बाधीत असल्याचे जाहीर झाले.६१ संशयितांच्या चाचणीचे अहवाल अजून यायचे बाकी आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. चाचणीसाठी विलंब होत असल्याने त्यासंबंधी खाजगी इस्पितळाकडे करार करण्याबाबत किंवा यातून मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
साथ नियंत्रण कायद्याचा फेरआढावा घेणार
सध्याच्या परिस्थितीत साथ नियंत्रण कायदा लागू करण्याचा विचार नसला तरी या कायद्याबाबतचा आढावा घेतला जाईल,असे मंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यास आरोग्य खात्याला काही प्रमाणात जादा अधिकार प्राप्त होतात व त्यामुळे कृतीला गती मिळण्यास मदत होते,असेही त्यांनी सांगितले.

"तो' रुग्ण "स्वाईन'बाधित नाही!
दोन दिवसांपूर्वी बंगळूर येथून गोव्यात आलेला व मणिपाल इस्पितळात मृत पावलेला एक रुग्ण "स्वाईन फ्लू'बाधित होता हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्याच्या लाळेचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल हाती आल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांनी सांगितले की, ह्रदय व मधुमेहाशी संबंधित काही दोष सदर व्यक्तीत होते. त्यामुळे तिचा मृत्यू "स्वाईन फ्लू'मुळे झाला, असे एवढ्यातच म्हणणे धाडसाचे ठरेल.

"गणेशभक्त' सलमान..

मुंबई, दि. २२ - सलमान खान म्हणजे अजब रसायन. त्याचा मनोनिग्रह ठाम. एकदा एखाद्या दैवतावर त्याची श्रद्धा बसली की, तो अगदी प्राणपणाने त्याची सेवा करणार हे ठरलेलेच. एरवी सर्वधर्मसमभावाच्या गमजा अनेकजण मारतात. मात्र गणेशचतुर्थी, ईद व नाताळ हे तिन्ही सण तेवढ्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरे करून सल्लूने आपले "वेगळेपण' सिद्ध केले आहे.
सध्या त्याला वेध लागले आहेत ते येत्या १८ सप्टेंबर रोजी येऊ घातलेल्या नव्या चित्रपटाचे. तथापि, यंदाची गणेशचतुर्थीही त्याला अपवाद असणार नाही. मुंबईतील वांद्रे येथे "खानदान' या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील त्याच्या आलिशान सदनिकेत उद्या (रविवारी) "गणपती बाप्पा मोरयाऽऽ' हा जयघोष दणक्यात घुमणार आहे. सलमानची पहिली आई म्हणजे विख्यात पटकथा लेखक सलीम खान यांची पहिली पत्नी सलमा या महाराष्ट्रीयन ब्राह्मण असून सलमानची दुसरी आई हेलन (चित्रसृष्टीच्या सुवर्णकाळातील विख्यात नर्तिका) या कॅथलिक आहेत. स्वतः सलमान मुस्लिम आहे. आपल्या या दोन्ही मातोश्रींवर त्याचे जीवापाड प्रेम आहे. यंदा गणेशोत्सवाच्या काळातच रमझान हा मुस्लिमांचा पवित्र सण आला आहे. सलमान खानचे कुटंबीय रोजे म्हणजेच कडक उपवास करत नाहीत. तथापि, रमझानच्या या पवित्र महिन्यात मेजवानी व बाकीच्या मौजमजेला हे कुटुंब फाटा देत आले आहे. या काळात सलमानच्या घरात खास पदार्थ तयार करून ते प्रामुख्याने अनाथालय व वृद्धाश्रमांत पाठवले जातात. सलमानचे मित्र आणि नातेवाइक याच पदार्थांचा आस्वाद घरी घेतात. सलमानच्या मातोश्री सलमा दरवर्षी गणेशाची मूर्ती घरी आणतात व गणरायाची मनोभावी पूजा केली जाते. या काळात शूटिंगमधून वेळ काढून सलमान आरत्या, गणेशवंदना आदी धार्मिक कृत्यांसाठी हटकून हजर असतोच. किंबहुना आपले ते परम कर्तव्यच आहे, ही त्याची त्यामागील धारणा. तो म्हणतो, "देव चराचरात पाहायला मिळतो, तो एकच आहे, त्याच्याकडे पोहोचण्याचे मार्ग भिन्न असू शकतात. माझे म्हणाल तर गणरायाने मला पैसा, यश, कीर्ती, मानमरताब आदी गोष्टी भरभरून दिल्या आहेत. म्हणूनच चला गणेशाचा जयघोष करूया.. बोला - गणपती बाप्पा मोरयाऽऽ'!