Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 April, 2009

भाजपच सर्वांत मोठा पक्ष ठरेल 'रालोआ'चे भवितव्य उज्ज्वल : अडवाणी

पाटणा, दि. १० : बिजू जनता दलाने (बिजद) राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडली असली, तरी आगामी लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप हाच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असा ठाम विश्वास भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी तिसऱ्या आघाडीची जोरदार खिल्ली उडवली.
बिहारमधील बक्सर, सासाराम आणि नवादा येथील प्रचारसभांत भाषण करून नवी दिल्लीकडे रवाना होण्याआधी पाटणा विमानतळ परिसरात पत्रकारांसोबत बोलताना अडवाणी यांनी हा विश्वास व्यक्त केला. "बिजद'ने ओरिसातील आपल्या क्षमतेचे अयोग्य मोजमाप केले आणि रालोआची साथ सोडली. त्यांना आपल्या या चुकीच्या निर्णयाचा भविष्यात निश्चितच पश्चाताप होईल, असेही अडवाणी म्हणाले.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक खासदार भाजपचे राहतील, याबाबत अडवाणी पूर्णत: आश्वस्त दिसून आले. विविध पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या तिसऱ्या आघाडीबाबत पत्रकारांनी विचारले असता अडवाणी म्हणाले की, ही तिसरी आघाडी लोकांमध्ये केवळ संभ्रम निर्माण करीत आहे. राजद, लोजपा आणि सपा या तीन पक्षांचीही जी आघाडी झाली आहे तोही एक मतदारांसोबत धोका आहे.
भारतीय राजकारणातील कॉंग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणण्यात भाजपचे योगदान मोठे आहे. आज भाजप ही एक मोठी शक्ती म्हणून समोर आली आहे. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपच्या सहकार्याविना सरकार स्थापन करणे अशक्य आहे आणि हीच आमच्यासाठी मोठी उपलब्धीही आहे, असेही अडवाणी म्हणाले.
रालोआचे भविष्य उज्ज्वल असल्याचा दावा करून अडवाणी म्हणाले की, अवघ्या एक महिन्याच्या काळात ज्याप्रकारे संपुआमध्ये फूट पडली आहे व घटक पक्ष विखुरले आहेत ते पाहाता, त्याचा लाभ निश्चितच रालोआला मिळणार आहे, असाही विश्वास अडवाणी यांनी व्यक्त केला.
भाजपनेच निवडणुकीचा कार्यक्रम देऊन तो पूर्ण केला. काश्मीर प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रम सादर केला. याचेही आम्हाला समाधान आहे, असेही अडवाणी म्हणालेे.
स्वच्छ व योग्य प्रशासन, विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा हे रालोआचे या लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तरांचल या राज्यांनी आपल्यावर असलेला आजारी राज्यांचा डाग पुसून काढला आहे आणि ही राज्ये आज विकासात अग्रेसर आहेत, असेही अडवाणी यांनी सांगितले.
बिहारमध्ये गेल्या १५ वर्षांत राजदचे सरकार असताना सर्वत्र पसरलेली अव्यवस्था नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने दूर केली आहे, असा दावाही अडवाणी यांनी केला.

दोन हजार कंत्राटी कामगारांचे १५ पासून तीन दिवस धरणे

सा.बां.खात्यातील कामगारांतर्फे सरकारचा निषेध
पणजी, दि.१०(प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम खात्यातील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकार पूर्णपणे बेफिकीर व बेजबाबदारपणे वागत आहे. सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ येत्या १५, १६ व १७ एप्रिल रोजी पणजीत तीन दिवस धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय कामगार संघटनेतर्फे घेण्यात आला आहे. सुमारे दोन हजार कामगारांच्या भवितव्याकडे सरकारकडून खेळ सुरू असल्याची टीका कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी यावेळी केली.
सार्वजनिक बांधकाम खाते कंत्राटी कामगार पुरवठा सोसायटीअंतर्गत गेली दहा ते बारा वर्षे सेवा करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांना सरकारकडून वेठीस धरण्यात आले आहे.या कामगारांच्या विविध मागण्यांबाबत कामगार आयुक्तांसमोर एकूण २७ सुनावण्या झाल्या तरी अद्याप सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने या कामगारांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.काल कामगार आयुक्तांसमोर सुनावणी झाली असता सा.बां.खात्याच्या अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या मागण्यांचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवल्याचे नेहमीचे निमित्त पुढे केले.मुळात या मागण्यांबाबतचा निर्णय हा सरकारला घ्यायचा आहे.सरकारने मान्यता दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे त्यामुळे सरकार जोपर्यंत या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही,अशी भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली.
दरम्यान,या बैठकीत कामगारांचे नेतृत्व करणारे ख्रितोफर फोन्सेका यांनी सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. आत्तापर्यंत या विषयावर २७ सुनावण्या झाल्या. सरकार जर केवळ या कामगारांना झुलवत ठेवणार असेल तर शेवटी आंदोलनाचा मार्ग पत्करणे अनिवार्य आहे. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी येत्या १५,१६ व १७ एप्रिल असे तीन दिवस पणजीत धरणे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कामगारांना वाढीव किमान वेतन देण्यात यावे. गेली दहा ते बारा वर्षे सेवा करणाऱ्या या कामगारांना सेवेत नियमित करावे व त्यांना "समान काम समान वेतन'हे धोरण लागू करावे,अशीही मागणी त्यांनी केली. एरवी नियमित कामगारांप्रमाणेच हे कामगार काम करतात पण तसे असतानाही त्यांना केवळ अल्प पगार देण्यात येतो.सा.बां.खात्यात नव्या पदांची भरती करताना या कामगारांना प्राधान्य देण्याचे ठरले असतानाही त्यांना नियमित सेवेसाठी डावलण्यात येते व आपल्या मर्जीतील लोकांची थेट भरती केली जाते. हा अन्याय अधिक काळ सहन करणे शक्य नाही.सरकार या कामगारांप्रति अजिबात गंभीर नाही.एखाद्या खाजगी आस्थापनांतील कामगारांच्या सुरक्षेसाठी सरकार वटहुकूम जारी करते पण इथे आपल्याच कामगारांना न्याय देण्यासाठी मात्र सरकार अजिबात पुढे सरसावत नाही, ही गोष्टच मुळी न पटणारी आहे,अशी नाराजी या कामगारांनी व्यक्त केली आहे.

सरपंच व पंचसदस्यांचा आज भाजपतर्फे मेळावा

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): भाजप पंचायतीराज विभागातर्फे उद्या ११ रोजी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, जिल्हापंचायत सदस्य तथा विद्यमान व माजी पंचायत सदस्यांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. पर्वरीतील संत गाडगे महाराज सभागृहात संध्याकाळी ३.३० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन पंचायतीराज विभागाचे भाजपचे राष्ट्रीय निमंत्रक भारतभाई गाजीपारा यांच्याहस्ते होणार असून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तथा भाजपचे इतर नेतेही यावेळी मार्गदर्शन करतील.
राज्याचा विकासात स्थानिक संस्थांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रियेत त्यांनाही सहभागी करून घेण्याची नितांत गरज आहे. पंचायतीराज संस्था मजबूत करून हे उद्दिष्ट गाठणे शक्य असल्याने सरकारने पंचायत संस्था तथा जिल्हा पंचायतींना त्यांचे हक्क बहाल करण्याची गरज असल्याचे मत गोवा प्रदेश भाजप पंचायतीराज विभागाचे निमंत्रक प्रेमानंद म्हांबरे यांनी व्यक्त केले. या मेळाव्यात अनेक महत्त्वाचे ठराव घेण्यात येतील. अलीकडेच पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत पंचायतीराज दुरुस्ती विधेयक मांडून ते घाईघाईने संमत करून घेण्याची कृती केली. या विधेयकाला सत्ताधारी तथा विरोधी आमदारांनीही हरकत घेतल्याने हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले आहे. मुळात हे विधेयक पूर्णपणे पंचायत विरोधी असून ते तात्काळ मागे घेण्याची मागणी या मेळाव्यात केली जाईल. पंचायत मंडळांचे हक्क हिरावून घेऊन ते पंचायत सचिवांना बहाल करण्याचा कट पंचायतमंत्र्यांनी या विधेयकामार्फत थाटला आहे व तो अजिबात साध्य होऊ देणार नाही, असा निर्धारही भाजप पंचायतीराज विभागाने केला आहे.
दरम्यान, या मेळाव्यात इतरही काही महत्त्वाचे विषय चर्चेला येतील. राज्यातील सर्व पंचायत तथा जिल्हा पंचायत सदस्यांना हक्काचा निधी देणे, पंचायत व जिल्हा पंचायतींना घटनेच्या ७३ व्या कलमानुसार त्यांचे अधिकार, निधी व विकासकामे मिळायला हवीत, राज्य वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार पंचायत व जिल्हा पंचायतींना त्यांचे हक्क मिळायला हवेत, जिल्हा पंचायतींना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांना महसुलाचा स्रोत मिळवून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न हवेत, आदी सर्व विषयांवर सखोल चर्चा या मेळाव्यात होणार आहे.
या मेळाव्यासाठी राज्यातील सर्व पंचायत तथा जिल्हा पंचायत सदस्यांना आमंत्रित करण्यात आले असून या सर्वांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजर राहावे,असे आवाहनही श्री.म्हांबरे यांनी केले आहे.

चर्चिलच्या डावपेचांनी कॉंग्रेस हवालदिल!

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासमोर पक्षांतर्गत भांडणाचे जबरदस्त आव्हान निर्माण झाल्याने या मतदारसंघावर सध्या भाजप व युगोडेपाने पूर्णपणे आघाडी घेतली आहे. सार्दिन यांच्या उमेदवारीला विरोध करून आपली कन्या वालंका हिच्या उमेदवारीसाठी कार्यरत असलेले चर्चिल यांचे मनसुबे धुळीस मिळाल्यानंतर त्यांनी आता नव्याने राजीनामा नाट्य सुरू केल्याने कॉंग्रेसच्या प्रचारातील हवाच निघून गेली आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सध्या कॉंग्रेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. उत्तर गोव्यात शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र देशप्रभू यांना रिंगणात उतरवले असले तरी श्रीपाद नाईक यांना टक्कर देणे शक्य नसल्याचे खुद्द सत्ताधारी नेतेच उघडपणे बोलू लागले आहेत.देशप्रभू यांना एकवेळ कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली असती तर काम करणे सोपे होते परंतु राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांना निवडून देण्याचे कितीही आवाहन केले तरी ते लोकांच्या पचनी पडणार नाही,अशी उघड चर्चा आता सरकारपक्षात सुरू आहे.दरम्यान,देशप्रभू यांनी मात्र आपली सारी भिस्त आरोग्यमंत्री विश्वजित राणे,सभापती प्रतापसिंग राणे,बाबुश मोन्सेरात व राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांच्यावर ठेवली आहे. या नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास श्रीपाद नाईक यांना टक्कर देणे सहज शक्य असल्याचा दावा ते करतात.
उत्तरेत परिस्थिती निश्चित नसताना आत्तापर्यंत कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेला दक्षिण गोवा मतदारसंघातही कॉंग्रेससाठी धोकादायक बनण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.दक्षिणेत भाजप व युगोडेपाने कॉंग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. विद्यमान मंत्रिमंडळात सासष्टी तालुक्याला जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे त्यामुळे ही जागा कॉंग्रेसपासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही,असा दावा करणारे नेते यावेळी मात्र संभ्रमात सापडले आहेत. चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सेव्ह गोवा फ्रंट पक्षाचे कॉंग्रेसमध्ये केलेले विलीनीकरण बेकायदेशीर असल्याचा निवाडा निवडणूक आयोगाने केल्याने ते कात्रीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध खुद्द पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी अपात्रता याचिका दाखल केल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सभापती राणे यांनी याप्रकरणी येत्या १६ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली असून त्यापूर्वी चर्चिल यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याबाबतचे नाटय बरेच रंगवले आहे. आम्हा दोघांचा राजीनामा तयार आहे तो योग्य वेळ आली की सादर करणार,असा दावा करून चर्चिल यांच्याकडून सध्या सरकारला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.खुद्द निवडणूक आयोगानेच हे विलीनीकरण अवैध्य ठरवल्याने सभापती राणे यांना या अपात्रता याचिकेवर तात्काळ निवाडा देणे भाग पडले आहे.चर्चिल यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेसच्या प्रचारावर त्याचे विपरीत परिणाम जाणवत आहेत. विविध ठिकाणी मतदारांकडून कॉंग्रेस नेत्यांना या प्रकाराबाबत जाब विचारली जात असल्याने आता प्रचार करणेही डोकेदुखी बनल्याची तक्रार कॉंग्रेस कार्यकर्ते करीत आहेत.
बी.के.हरिप्रसाद रविवारी येणार
दरम्यान,या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक बी.के.हरिप्रसाद यांना बोलावणे पाठवण्यात आले असून ते रविवारी गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.काही पत्रकारांनी श्री.हरिप्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चर्चिल व आलेक्स राजीनामा प्रकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याची भूमिका घेतली. आपण निवडणुकीतील व्यूहरचना आखण्यासाठी येत असल्याचे ते म्हणाले.

'कॉंग्रेसने गोव्याची सभ्यता मलिन केली'


म्हापसा येथे भाजपतर्फे आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलताना केंद्रीय सचिव स्मृती इराणी. सोबत श्रीपाद नाईक व मान्यवर. (छाया : किशोर कोलगे)

म्हापसा प्रचारसभेत स्मृती इराणींची टीका
म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी) गोव्याची सभ्यता व सौंदर्य देश पातळीवर मलिन करण्याचे काम कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहे. तेव्हा अशा पक्षांना व नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याचे पवित्रकार्य २३ तारखेला मतदान करून दाखवा असे आवाहन भाजपच्या केंद्रीय सचिव स्मृती इराणी यांनी आज (दि.१०) सकाळी म्हापसा येथे रेसिडेन्सी सभागृहात आयोजित केलेल्या प्रचार सभेत केले. त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कारभारावर व नेत्यांवर अकार्यक्षमतेचा आरोप करताना त्यांचा खरपूस समाचार घेतला. देशातील दहशतवादाला कॉंग्रेस पक्ष संपूर्णतः जबाबदार असून आज देशात आर्थिक, मानसिक व सामाजिक दहशतवाद पसरविण्याचे काम कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केले आहे. याबाबत सांगताना मुंबईच्या दहशतवादात निष्पापांचे बळी व जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयाची परिस्थिती कथन करताना लोकांच्या अंगावर शहारे आले. मुंबईवर दहशतवादी हल्ला होत असताना गृहमंत्री शिवराज पाटील व महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील बेताल व चीड आणणारी वक्तव्ये करीत होते. अशा लोकांना जनतेनेच जागा दाखविली, परंतु निवडणुकीत पराभूत झालेल्यांची मंत्रिपदी वर्णी लागली हा निर्लज्जपणा फक्त कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षच करू शकतात. रोजगार हमी योजना भाजपचे सरकार असलेल्या राज्यात यशस्वी झाली परंतु कॉंग्रेस सरकार असलेल्या राज्यात ती विफल ठरली. कॉंग्रेसचे उमेदवार जेव्हा खासदार श्रीपाद नाईकांनी गोव्यात किती लोकांना नोकऱ्या दिल्या असा प्रश्र्न उपस्थित करतात, तेव्हा त्यांनी निदान एवढा तरी विचार करायला हवा की स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम अथवा तशी परिस्थिती निर्माण करणे हे राज्य शासनाचे काम असते. राज्यात शासन कॉंग्रेसचे असल्याने ते काम तुमचेच असते असा प्रतिटोला मारल्यावर सभागृहात हशा पिकला.
उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात मतदार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना केवळ वर्तमानपत्रातून बातमी वाचून आजच्या बैठकीला इतके लोक आले. यावरून २३ तारखेला सर्व लोक मतदान केंद्रावर नक्कीच गर्दी करतील अशी आशा व्यक्त केली. आपण केलेल्या आजपावेतो कामाची जंत्रीच त्यांनी लोकांसमोर सादर केली. गोव्यातून पहिलाच खासदार जो सर्वाधिक मतांनी निवडून आला पण पहिल्याच वेळी केंद्रात मंत्रिपद ही मिळाले व त्यानंतर विविध खाती आपल्याला मिळत गेली व त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घेतला. आत्तापर्यंत ४०० प्रकल्प मार्गी लावले असून त्यापैकी ३६० प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यासाठी रु. २४ कोटी निधी विकासकामाला केंद्राकडून गोव्याला मिळविला. सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाच्या योजना आपण राबविल्या परंतु विरोधी पक्षाच्या उमेदवाराला हा विकास नको आहे. ८१६ सभागृह स्मशानभूमी अशी सार्वजनिक हिताची विकासकामे आपण केली. पेडणे तालुक्यात खेळाची मैदाने बांधण्यास पेडण्याचे जमीनदार थोडीही जमीन देत नाहीत ते काय समाजसेवा करणार असे ही त्यांनी सांगितले. आजच्या या सभेला आदर्श सुनेला ऐकण्यासाठी महिलावर्गाची खूप गर्दी होती. व्यासपीठावर स्मृती इराणी समवेत खासदार श्रीपाद नाईक, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार सदानंद तानावडे, महिला मोर्चा अध्यक्ष मुक्ता नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष शिरोडकर, उपनगराध्यक्ष ऑस्कर डिसोझा, नगरसेविका वैशाली फळारी, मंडळ अध्यक्ष रूपेश कामत, नगरसेवक रोहन कवळेकर, वैधवी नाईक, ऍड. रंजिता तिवरेकर, गोव्याच्या प्रभारी शिल्पा पटवर्धन, सचिव अविनाश कोळी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार मांद्रेकर यांनी आपल्या खोचक व विनोदी शैलीत कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादाचे वाभाडे काढले. उत्तर गोवा महिला प्रमुख शुभांगी वायंगणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुक्ता नाईक यांनी स्मृती इराणी व श्रीपाद नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजासिंग राणे यांनी सूत्रसंचालन केले तर रूपेश कामत यांनी आभार प्रदर्शन केले. स्मृती इराणी यांनी प्रथम मराठीत भाषणास सुरुवात केली, तेव्हा लोकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. सभेनंतर महिला वर्गांनी त्यांना गराडा घातला व स्वाक्षरी घेतली.

Friday 10 April, 2009

टायटलर, सज्जनकुमार निवडणूक रिंगणाबाहेर

कॉंग्रेस प्रचंड दबावाखाली, शिखांची निदर्शने सुरूच
नवी दिल्ली, दि. ९ : १९८४ च्या शीख दंगल प्रकरणी सीबीआयने "क्लीन चीट' दिल्यामुळे वादग्रस्त ठरलेले कॉंग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी आज येथील कडकडडुमा न्यायालयाने येत्या २८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टायटलर यांनी उभे न राहण्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी टायटलर यांच्यासह सज्जनकुमार यांनाही निवडणूक रिंगणाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी राकेश पंडित यांनी हा निवाडा दिला. "सीबीआय'ने दंगलप्रकरणी खुनाचा खटला दाखल असलेल्या टायटलर यांना "क्लीन चीट' दिली होती. तसेच त्यांच्याविरुद्धचा खटला बंद करण्याचीही भूमिका घेतली होती. त्या भूमिकेवर आजही सीबीआयने ठामपणा दर्शविला. टायटलर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसे साक्षी-पुरावे किंवा आधार नसल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. आज नवी दिल्लीतील कडकडडुमा कोर्टातही त्यांनी हीच भूमिका मांडली. तसेच टायटलर यांच्यावर मनुष्यवधाचा आरोप असल्याने हा खटला सत्र न्यायालयातच चालवला जाऊ शकतो, असा तांत्रिक मुद्दाही उपस्थित केला.
त्यानंतर न्या. राकेश पंडित यांनी या खटल्याची सुनावणी २८ पर्यंत स्थगित केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर तांत्रिक बाजू तपासून निर्णय दिला जाईल, असेही ते म्हणाले.
सीबीआयने ८४ च्या दंगल प्रकरणी टायटलर यांना "क्लीन चीट' दिल्यानंतर शीख समुदायाकडून या निर्णयाला प्रचंड विरोध सुरू झाला. त्यातच एका शीख पत्रकाराने या प्रकाराचा निषेध म्हणून चिदम्बरम यांच्यावर भर पत्रकारपरिषदेत जोडा भिरकावल्यानंतर हे प्रकरण आणखीनच उफाळले. त्या पत्रकाराने क्षमायाचना केली तरी शीख समुदाय मात्र या प्रकरणी टायटलर यांच्यावर जाम भडकला आहे. अशा स्थितीत टायटलर यांची लोकसभा निवडणुकीची उमेदवारीही धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज एका पत्रपरिषदेत बोलताना टायटलर म्हणाले की, माझे मन मला सांगत आहे की माझ्यामुळे पक्षाला बराच ताणतणाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा स्थितीत पक्षाला अडचणीत आणून मला निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा नाही. मी माझ्या वतीने पक्षापुढे उमेदवारीबाबत माघार घेण्याचा पर्याय ठेवला आहे. याचा निर्णय मी पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि पक्षाच्या कार्यकारिणीवर सोडला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य राहील, असेही टायटलर म्हणाले होते. त्यांच्या विचाराचे स्वागत करीत कॉंग्रेसने त्यांना निवडणुकीबाहेर राहण्याची परवानगी दिली.
सलग तीन वेळा दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आलेले ६५ वर्षीय टायटलर यावेळी ईशान्य दिल्लीतून कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्यासोबतच शीख दंगल प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात असणारे सज्जनकुमार दक्षिण दिल्लीतून उमेदवार होते. या दोघांनाही यावेळी निवडणुकीचे तिकीट न देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला. शीख समुदायाचा विरोध लक्षात घेऊन कॉंग्रेसला जनमताच्या दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे राजकीय समीक्षकांचे मत आहे.
शिखांची निदर्शने
दरम्यान, १९८४ च्या दंगलप्रकरणी सीबीआयकडून कॉंग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांना "क्लीन चिट' दिल्याप्रकरणी शीख बांधवांमधील असंतोष वाढीस लागला असून, आजही ठिकठिकाणी याविरोधात शिखांनी निदर्शने केली.
टायटलर यांच्याविषयीची सुनावणी ज्या न्यायालयात सुरू होती, त्या परिसरातही शेकडो निदर्शनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. टायटलर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ नये, ८४ च्या दंगलीतील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी, अशा मागणीही शीख संघटनांनी केली आहे. यात ऑल इंडिया शीख स्टुडण्ट्स फेडरेशन, शिरोमणी अकाली दल (बादल), खालसा रेजिमेंट आदींचा समावेश होता. शिखांची निदर्शने लक्षात घेऊन न्यायालय आणि आसपासच्या परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

निवृत्तांना सेवावाढीविरोधात प्रशासनच ठप्प करण्याचा इशारा

सरकारी कर्मचारी संघटना आक्रमक
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): विविध निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सेवावाढीविरोधात धरणे आंदोलन करूनही सरकार या निर्णयाचा फेरविचार करीत नसल्याने आता हे आंदोलन तीव्र करण्याचे गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने ठरवले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार कानाडोळा करीत असेल तर संपूर्ण प्रशासनच ठप्प करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी याप्रकरणी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली.
विविध निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या सेवावाढीविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदा लेखा कार्यालय व नंतर भूसर्वेक्षण कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. लेखा कार्यालयाचे संयुक्त संचालक ज्योकीम टेलीस व भूसर्वेक्षण खात्याचे अधीक्षक अजित तळावलीकर यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. दरम्यान,अजित तळावलीकर हे यापूर्वी सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत, त्यामुळे त्यांनी घेतलेली सेवावाढ ही संघटनेच्या नीतिमत्तेला अजिबात धरून नाही,अशी टीकाही यावेळी करण्यात आली. दरम्यान, सरकारने याप्रकरणी फेरविचार करण्याचे मान्य केले परंतु सध्या आचारसंहिता लागू असल्याने काहीही करता येणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे,अशी माहिती श्री.शेटकर यांनी दिली. सेवावाढ मागे घेण्यासाठी आचारसंहितेचा अजिबात भंग होत नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.
दरम्यान,आचारसंहितेचे निमित्त पुढे करणाऱ्या सरकारने अनधिकृतपणे दिलेली वेतनश्रेणी मागे घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी ६ मार्च २००९ रोजी आचारसंहिता लागू झाली असताना विशेष समिती कशी काय नेमली,असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार एकूण ७७ निवृत्त अधिकाऱ्यांना सेवावाढ दिल्याचे म्हटले आहे. इतरही अनेकांना सेवावाढ देण्याचा विचार सुरू असून सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांची थट्टाच सुरू असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. दरम्यान, सरकारने सेवावाढीचे आदेश ताबडतोब मागे घ्यावेत अन्यथा आंदोलनाची धार वाढवून प्रसंगी प्रशासन ठप्प करण्याचा इशारा यावेळी श्री.शेटकर यांनी दिला.

पोलिस उपअधीक्षकांच्या फ्लॅटवर चोरीचा प्रयत्न

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): राजधानीत चोऱ्यांच्या टोळक्यांनी घातलेल्या हैदोसात चक्क पोलिस उपअधीक्षकांचाही "फ्लॅट' सुटला नाही. हल्लीच निरीक्षकपदावरून उपअधीक्षकपदावर बढती मिळालेल्या या पोलिस अधिकाऱ्याच्या बंद असलेल्या फ्लॅटवर काल रात्री काही अज्ञान चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. कोणताही वस्तू चोरीला गेली नसल्याने या घटनेची पोलिस तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती खास सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
सदर उपअधीक्षकांनी उत्तर गोव्यात घर बाधले असून ते त्या ठिकाणी राहतात. निरीक्षक असताना ते पणजीतील या फ्लॅटवर राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून हा फ्लॅट बंद असल्याची माहिती मिळाली आहे. चोरट्यांनी या बंद असलेल्या फ्लॅटवर काल रात्री आपला मोर्चा वळवला.
खुद्द पोलिस अधिकाऱ्याच्याच फ्लॅटवर चोरीसाठी धडक दिल्याने आता पोलिसांनाच धडकी भरली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या असून अद्याप कोणालाच अटक करण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

कुडचडे नगराध्यक्षपदी परेश भेंडे यांची निवड

कुडचडे, दि. ९ (प्रतिनिधी): कुडचडे काकोडा पालिकेच्या अध्यक्षपदी आज परेश उर्फ गंगाधर भेंडे यांची निवड झाली. आज सकाळी पालिका सभागृहात झालेल्या मतदानात भेंडे यांना सात, तर कॅशियस फर्नांडिस यांना दोन मते मिळाली. तिसरे उमेदवार अल्बर्ट फर्नांडिस अनुपस्थित होते. माजी नगराध्यक्ष अभय खांडेकर व त्यांच्या पत्नी व नगरसेविका अमिता खांडेकर याही हजर नव्हत्या.
या निवडणुकीवेळी अधिकारी म्हणून सतिश देसाई व मुख्याधिकारी शिवाजी देसाई व अभियंता नितीन व्होडरकर उपस्थित होते. कुडटचड्याचे आमदार श्याम सातार्डेकर यांच्या पाठिंब्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या गटात नगरसेवक सोनू नाईक, प्रदीप नाईक, मारुती नाईक, नितीन काकोडकर, ऍलिसा फर्नांडिस, सौ. रुक्मिणी देसाई या नगरसेवकांचा समावेश आहे. कुडचडे गाळा वाटप, मार्केट आदी समस्या तातडीने सोडविणार असल्याचे आश्वासन श्री. भेंडे यांनी दिले आहे. स्थानिक जनतेने भेंडे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

Thursday 9 April, 2009

निवडणूक आयोगाची मुख्यमंत्र्यांना तंबी, पत्रकार परिषदेने आचारसंहितेचा भंग

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना मुख्यमंत्री दिगंबर कामत व मंत्रिमंडळातील अन्य चार सदस्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून "सीआरझेड' कारवाईच्या घेऱ्यात असलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी कल्याणकारी उपाययोजनांची घोषणा करण्याच्या कृतीची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांची ही कृती पूर्णपणे आचारसंहितेचा भंग ठरते. त्यांनी अशा प्रकारांना वेळीच आवर घालावा, यापुढे हे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत,अशी तंबीच आयोगाने दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंबंधी राज्याच्या मुख्य सचिवांना ही नोटीस पाठवली आहे. गेल्या १९ मार्च रोजी मुख्यमंत्री कामत यांनी पणजी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेला गृहमंत्री रवी नाईक, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व वीजमंत्री आलेक्स सिकेरा उपस्थित होते.
"सीआरझेड' विषयावरून सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. राजधानीत जाहीर सभा होऊन त्यात सरकारला निर्वाणीचा इशाराही देण्यात आला होता. या प्रकरणी स्पष्टीकरण करण्यासाठी सरकारतर्फे या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मुळात राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने अशा पद्धतीची परिषद घेण्यावर बंदी आहे. मुख्यमंत्री कामत यांनी मात्र आपल्या सहकारी मंत्र्यांसह याविषयी लोकांना मदत करण्याचे तसेच या कारवाईतून त्यांची सुटका करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आश्वासन या परिषदेतून दिले होते.आचारसंहितेअंतर्गत जनतेच्या एका घटकाला आमिष दाखवण्याचाच हा प्रकार असल्याने तो आचारसंहितेचा भंग ठरतो,असेही या नोटिशीत बजावण्यात आले आहे.मुख्यमंत्री तथा इतर जबाबदार मंत्र्यांनी अशी कृती करणे ही अजिबात चांगली गोष्ट नाही. या प्रकाराबाबत असमाधान व्यक्त करून निदान यापुढे तरी या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, अन्यथा त्याची गंभीर दखल घेणे भाग पडणार आहे, अशी तंबीच आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिली आहे.
विष्णू वाघांचे पद काढून घ्या
सरकारचे वृत्तपत्र सल्लागार म्हणून कार्यरत असलेले विष्णू सूर्या वाघ यांच्याकडून उघडपणे प्रत्यक्ष कॉंग्रेस पक्षाचा प्रचार सुरू असल्याची भाजपने केलेली तक्रार आयोगाने गंभीरपणे घेतली आहे. विष्णू सूर्या वाघ यांच्याकडील हे पद ताबडतोब काढून घ्या व त्यांना आचारसंहिता लागू झाल्यापासून मिळालेले वेतन वसूल करा,असा कडक आदेशच आयोगाने मुख्य सचिवांना दिला आहे. दरम्यान, श्री. वाघ यांची नेमणूक झालेल्या कार्यालयाच्या प्रमुखांनाही याप्रकरणी दोषी ठरवण्यात यावे,असाही सल्ला आयोगाने दिला आहे.
खलपांनाही प्रचारबंदी?
राज्य सरकारने अलीकडेच माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखाली कायदा आयोगाची स्थापना करून ऍड.खलप यांची अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.ऍड.खलप हे प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते असल्याने त्यांनीही उघडपणे पक्षाच्या प्रचार कार्यात भाग घेतल्याची दखल आयोगाने घेतली आहे.खलप यांना अद्याप नोटीस जारी करण्यात आली नसली तरी त्यांना प्रचारात सहभागी होण्यास बंदी घालण्याचे आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून व्यक्त करण्यात आली.

उत्तरेत ७ तर दक्षिणेत ११ उमेदवार रिंगणात

पणजी व मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. उत्तर गोव्यात एकूण सात उमेदवार तर दक्षिणेत ११ उमेदवार रिंगणात उरले आहेत. दरम्यान, उत्तरेत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मगो तर तर दक्षिणेत कॉंग्रेस, भाजप व युगोडेपा अशा तिरंगी लढती होण्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी के.एस.सिंग व मिहीर वर्धन यांनी आपापल्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करून ही माहिती दिली. उत्तरेत रिंगणात असलेल्या शेवटच्या यादीत ख्रिस्तोफर फोन्सेका(भाकप),जितेंद्र देशप्रभू(राष्ट्रवादी कॉंग्रेस),पांडुरंग राऊत(मगो),श्रीपाद नाईक(भाजप), उपेंद्र गांवकर(शिवसेना),नरसिंह सूर्या साळगांवकर(अपक्ष) व मार्था डिसोझा(अपक्ष) यांचा समावेश आहे. तर दक्षिणेत फ्रान्सिस सार्दिन (कॉंग्रेस ), ऍड. नरेंद्र सावईकर(भाजपा), ऍड. राजू मंगेशकर(भा.क.प), रोहिदास हरिश्र्चंद्र बोरकर (सेव्ह गोवा फ्रंट), माथानी साल्ढाणा (युगोडेपा), जवाहर डायस (अपक्ष) डॅरीक डायस (अपक्ष) , फ्रांन्सिस आंतोन फर्नांडिस(अपक्ष), हमजा खान (अपक्ष), साळुंखे स्मिता प्रवीण (अपक्ष), मुल्ला करीम (अपक्ष) यांचा समावेश आहे.
आता व्हल्नरेबल व क्रिटीकल मतदान केंद्रे!
संवेदनशील मतदान केंद्रांची व्याख्या बदलून आता निवडणूक आयोगाने त्याची विभागणी दोन पद्धतीत केली आहे. व्हल्नरेबल व क्रिटीकल अशा पद्धतीत या मतदानकेंद्रांना संबोधले जाईल. सध्या उत्तर गोव्यात ३९ व्हल्नरेबल तर दक्षिण गोव्यात १३ व्हल्नरेबल व ७३ क्रिटीकल मतदान केंद्रांची नोंद करण्यात आली आहे. मतदान शांततापूर्ण व निर्भय वातावरणात संपन्न होण्यासाठी दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण १२ निमलष्करी दलाच्या तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. या मागणीबाबत अद्याप मान्यता मिळाली नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दक्षिणेत व्हल्नरेबल मतदान केंद्रांत मडगावातील मोती डोंगर ,नावेलीतील रुमडामळ,जुवारीनगर येथील तीन, फोंडा येथील दोन मतदान केंद्रांचा समावेश आहे. आजवरच्या मतदानात तेथे झालेले गैरप्रकार, मतदारांना दिलेल्या धमक्या, मतदानापासून परावृत्त करण्याचा झालेला प्रयत्न व मुक्त मतदानात आलेला अडथळा यांचा आढावा घेऊन ही निवड करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
मागील निवडणुकीत एकाच मतदान केंद्रावर ७५ टक्क्यांवर मतदान एकाच उमेदवाराला झालेली केंद्रे क्रिटीकल विभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था पालनासाठी खास उपाय योजना आखताना १२०० राज्य पोलिसांची मदतही घेतली जाणार असेही यावेळी सांगण्यात आले.
राज्यात एकूण १०,१९,९७९ मतदार
दरम्यान,राज्यात दोन्ही मतदारसंघात एकूण १०,१९,९७९ मतदारांची नोंद आहे. त्यात उत्तरेत ४,८६,७८९ तर दक्षिणेत ५,३३,१९० मतदारांचा समावेश आहे. उत्तरेत एकूण ६७९ मतदान केंद्रे तर दक्षिणेत एकूण ६६० मतदान केंद्रे असतील. उत्तरेतील मतदारांत २,४४,२०८ (पुरुष) तर २,४२,५८१(महिला) मतदारांचा समावेश आहे तर दक्षिणेत २,६७,७६९ (पुरुष) व २,६५४२१ (महिला) मतदार आहेत.
यावेळी निवडणूक मोहिमेवर प्रथमच विभाग अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते राजपत्रित अधिकारी आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी १० ते १२ मतदान केंद्रे असतील व ते तेथे फिरून तेथील सुविधांची पहाणी करतील व त्या बाबतचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करतील . मतदानास आठ दिवस असताना हेच लोक तेथे दंडाधिकारी म्हणून काम पाहतील. या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षण दोन फेऱ्यांतून दिले गेले आहे.

बसवाणी कुटुंबीयांवर गोकाकला अंत्यसंस्कार हुंदके आणि गहिवर..

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): शेडगाव फाटा चंदगड येथे काल भीषण अपघातात मरण पावलेले उपनिरीक्षक बसवाणी हरिजन, त्यांच्या बबीता व भूमी दोन मुली, मेहुणा सुशांत बसलिंगाप्पा तलवार तसेच चुलत भाऊ केपाण्णा नागाप्पा हरिजन आणि भावजयीवर तळद्वा केपाण्णा हरिजन यांच्यावर आज बेळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गोकाक या मुळगावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गोवा पोलिस खात्यातील त्याच्या सहकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. एकाच कुटुंबातील सहा जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने हरिजन कुटुंबावर व त्यांच्या गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. बसवाणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांना हुंदका अनावर झाला होता. बबीता व छोटी भूमी यांना अखेरचा निरोप देताना तर उपस्थितांच्या काळजात विलक्षण कालवाकालव झाली होती. एकाच वेळी सहा जणांच्या अंत्ययात्रा हे दृश्यच अत्यंत करुणाजनक दिसत होते. बसवाणी यांच्या मृत्यूमुळे पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दुःख व्यक्त केले. एका होतकरू आणि बुद्धिमान अधिकाऱ्याला मुकल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

रोहित प्रकरणी याचिका निकालात

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): अल्पवयीन जर्मन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांनी गंभीर दखल घेऊन दाखल करून घेतलेली "सुओमुटो' जनहित याचिका आज निकालात काढली.
या प्रकरणातील संशयित रोहित मोन्सेरात याच्याविरोधात बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे, त्याचप्रमाणे त्याची जामिनावर सुटकाही झाली असल्याने 'सुओमुटो' याचिका निकालात काढली जावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती.
रोहित फरार नव्हता. केवळ सुरुवातीच्या काळात त्याची पोलिसांना पोलिस कोठडीत गरज नव्हती, त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली नव्हती. तथापि, पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात रोहित फरार होता, ही माहिती चुकीची असून त्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यात आली,' अशी माहिती ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी न्यायालयाला दिली. रोहित याला बाल न्यायालयाने दिलेला जामीन अर्ज का रद्द करू नये, असा प्रश्न करून त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोटीस बजावली होती, असेही ऍड. कंटक यावेळी म्हणाले.
२ ऑक्टोबर रोजी त्या पीडित मुलीच्या आईने कळंगुट पोलिस स्थानकावर रोहित मोन्सेरातच्या विरोधात तक्रार दाखल केला होती. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सदर तक्रारीची दखल घेऊन नोंद केली. १४ ऑक्टोबरला गुन्हा नोंद होऊनही कोणालाच चौकशीसाठी ताब्यात घेतले नसल्याने खंडपीठाने पोलिस खात्यावर जोरदार ताशेरे ओढले होते. त्याचप्रमाणे या गुन्ह्याचे तपासकाम अन्य तपास यंत्रणेकडे का देऊ नये, अशी विचारणाही त्यावेळी मुख्य न्यायमूर्तींनी केली होती.

Wednesday 8 April, 2009

कुशाग्र बुद्धीचा अधिकारी
या अपघातात ठार झालेले बसवाणी हरिजन हे बेळगाव जिल्ह्यातील मुळगाव हुळगीचे. ते कॉन्स्टेबल म्हणून पोलिस खात्यात भरती झाले. उपजतच लाभलेल्या तल्लख बुद्धीमुळे तपास कसा करावा याची त्यांना नेमकी जाण होती. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांत प्रिय होते. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरच त्यांनी कॉन्स्टेबल ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. त्यांची कारकीर्द बहरत असतानाच त्यांना अकाली मरण आले. त्यामुळे गोवा पोलिस दलातील त्यांचे कित्येक सहकारी गहिवरले. पाहताक्षणी ते पोलिस उपनिरीक्षक आहेत असे वाटायचेच नाही इतके त्यांचे चालणे-बोलणे साधे होते. अनेक पत्रकारांनाही त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण बनले होते. उमेश गावकर हे जेव्हा पणजी पोलिस स्थानकात निरीक्षक होते तेव्हा बराच काळपर्यंत बसवाणी यांनी त्यांच्यासोबत काम केले होते.

चंदगडजवळ भीषण अपघातात सहा ठार
मृतांत गोव्याचे पोलिस उपनिरीक्षक बसवाणी हरिजन व कुटुंबीय
सॅंट्रो मोटारीचा चेंदामेंदा
आंब्याच्या झाडाला धडक
राजेंद्र मकोटे

कोल्हापूर, दि. ७ - बेळगाव - गोवा महामार्गावर आज दुपारी पावणेदोनच्या दरम्यान चंदगड पोलिस स्थानकापासून सुमारे दोन किलोमीटरवर शेडगाव फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील शिवोली सागरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक बसवाणी भीमाण्णा हरिजन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन पुरुष, दोन स्त्रिया व एक लहान मुलगी असे एकूण सहा जण ठार झाले.
बेळगावहून हरिजन हे आपल्या कुटुंबीयांसह गोव्याकडे (म्हापशाला) सॅंट्रो मोटारीने (क्र. जीए ०३ सी ५२३९) येत होते. या वाहनात तीन पुरुष, दोन महिला व एक मुलगी असे एकूण सहा जण प्रवास करत होते. मृतांची नावे सुशांत बसलिंगाप्पा तलवार (वय २३ रा. शिंगेहोळ ता. गोकाक), सौ. तळद्वा केपाण्णा हरिजन (वय ४८) व केपाण्णा नागाप्पा हरिजन (वय ५२ दोघेही रा. बुद्धिहाळ जि. बेळगाव), बसवाणी हरिजन (वय ५०), भूमी हरिजन (वय चार वर्षे), बबीता हरिजन (वय १७) अशी आहेत. भूमी व बबीता या दोघी बसवाणी यांच्या कन्या होत्या.
आंबोली बेळगाव मार्गावर वाली पेट्रोल पंपाजवळ बसवाणी यांची सॅंट्रो मोटार पोहोचली असता बसवाणी यांचा मोटारीवरील ताबा गेला. त्यामुळे समोर असलेल्या आंब्याच्या एका झाडाला या वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयंकर होती की, त्यात गाडी झाडाला धडकून पुन्हा सुमारे पाचशे फूट मागे फरफटत आली. त्यात या मोटारीचा चक्काचूर झाला व आतील सर्वजण जागीच गतप्राण झाले. सर्व मृतदेह छिन्नविछीन्न झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण बनले होते. पोलिसांनी तपासणी केल्यानंतर हरिजन यांचे ओळखपत्र सापडले व त्यानंतर त्यांनी हरिजन यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यावेळी हरिजन यांचा मुलगा व पत्नी हे गोव्यातच मयडे येथे आपल्या घरी होते. त्यांना अपघाताची माहिती मिळताच ते त्वरेने चंदगडला रवाना झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच म्हापसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गोलतेकर हेही तातडीने चंदगडला रवाना झाले. सर्व मृतदेह चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून तेथेच शवचिकित्सा करण्यात येणार असल्याची माहिती चंदगड पोलिस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक श्री. कोरे यांनी दिली.
हौखूम आजपासून
मुख्य सचिवपदी

पणजी, दि. ७ - गोव्याचे नवे मुख्य सचिव म्हणून हौजेल हौखूम उद्या (बुधवारी) ताबा स्वीकारणार आहेत.
श्री. हौजेल यांनी दिल्ली व अन्य राज्यात विविध पदे भूषविली आहेत. मिझोराम येथून दिल्लीच्या प्रशासनात त्यांची नुकतील बदली झाली होती. तेथे ते वित्त सचिव म्हणून काम करीत होते. मिझोराम सरकारमध्ये त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचे सचिवपद भूषविले आहे. ऑगस्ट २००५ मध्ये त मिझोरामचे मुख्य सचिव बनले व त्या पदावर ते चार वर्षे होते. श्री. हौजल हे बुधवारी दुपारी गोव्यात दाखल होत आहेत.
स्विस बॅंकांतील भारतीयांचा पैसा
परत आणू ; भाजपचे आश्वासन

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - स्विस बॅंकांत भारतीयांनी गुंतवलेला पैसा स्वदेशी आणण्याच्या भाजपने केलेल्या मागणीबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्वीकारलेले मौन ही देशासाठी लज्जास्पद गोष्ट असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी केंद्रीयमंत्री तथा राज्यसभा खासदार रविशंकर प्रसाद यांनी केली. लोेकसभा निवडणुकीत जनतेने भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवर आणले तर हे प्रकरण गंभीरपणे हाताळून कायदेशीर तसेच कार्यवाहीच्या पातळीवर ते सोडवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
"फ्रेंडस ऑफ बीजेपी' या अनोख्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या रविशंकर प्रसाद यांनी आज येथे पत्रकारांची भेट घेतली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी आमदार राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते. विदेशांत पैसा गुंतवणाऱ्यांत भारतीय आघाडीवर आहेत. सुमारे २५ ते ७० लाख कोटी रुपये एवढी अवाढव्य रक्कम देशोदेशीच्या बॅंकांत जमा आहे. हा पैसा भारतात आणून भारतीय बॅंकांत गुंतवल्यास देश उभारणीच्या कार्यात तो उपयोगी पडू शकेल, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले. हा पैसा भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारने करावेत, अशी आग्रही मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना पत्र पाठवून केली होती. लंडन येथे नुकत्याच झालेल्या "जी-२०' देशांच्या शिखर परिषदेत हा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित करावा, असेही अडवाणी यांनी म्हटले होते; परंतु या गोष्टीकडे कॉंग्रेस अजिबात लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे "दाल मे कुछ काला तो नही' असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
सध्या जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन आदी देशांनी हा पैसा परत आपल्या देशात नेण्याची तयारी केली आहे. या देशांनी स्विस बॅंकांकडे आपापल्या देशातील गुंतवणूकदारांची यादी मागवली आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतीयांप्रमाणेच चीन, रशिया आदी देशांच्या नागरिकांनी स्वतःकडील पैसा विदेशी बॅंकांत जमा केलेला आहे. याआधी हे देश या मुद्यावर फार चिंतित नव्हते. तथापि, आता तेही चिंतित झाले आहेत. त्यांनाही वाटते की आपल्याच नागरिकांचा एवढा प्रचंड पैसा मायदेशी यावा. तो विदेशात गुंतून राहावा ही बाब देशाच्या दृष्टीने योग्य नाही. रालोआ सत्तेवर आल्यास आम्ही हा मुद्दा गंभीरपणे हाताळू, असेही यावेळी श्री. प्रसाद यांनी स्पष्ट केले.
"उलटी पुलटी आघाडी'
लोकसभा निवडणुका जवळ येत असता कॉंग्रेसची परिस्थिती एखाद्या बुडत्या जहाजाप्रमाणे झाल्याचा ठपका ठेवत केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटक पक्ष कॉंग्रेसपासून फारकत घेत आहेत, त्यामुळे ही "उलटी पुलटी आघाडी' बनल्याचा टोला प्रसाद यांनी लगावला. केवळ ममता बॅनर्जी, शरद पवार, व द्रमुक हेच काही प्रमाणात कॉंग्रेसबरोबर आहेत. त्यात शरद पवार तर थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत,असा चिमटाही त्यांनी काढला. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी दिवसेंदिवस इतिहासजमा होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून देशातील विविध भागांतून "रालोआ' बाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. सद्यस्थितीत देशाला "रालोआ' हाच योग्य पर्याय असल्याचे लोकांना पटत चालले आहे,असा विश्वासही प्रसाद यांनी व्यक्त केला.
लालू यांचा निषेध
कॉंग्रेसचे युवा नेते वरुण गांधी यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या कृतीचा धिक्कार करीत केवळ अल्पसंख्याकांच्या मतांवर डोळा ठेवून हे राजकारण केल्याचा आरोप प्रसाद यांनी केला. मुंबई हल्लाप्रकरणी अटक केलेल्या कसाबला हा कायदा लागू झाला नाही; परंतु वरुण गांधींना "रासुका' लावला. यावरून मायावती यांनी कसे सुडाचे राजकारण चालवले आहे याची जाणीव होण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले.वरुणबाबत लालूप्रसाद यादव यांनी केलेले वक्तव्य त्यांना शोभणारे नाही असे सांगत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध प्रसाद यांनी केला.
तथाकथित तिसरी व चोैथी आघाडी पाहता देशात केवळ सत्तेसाठी राजकीय साठमारी सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मुळात देशाला स्थिर सरकार,विकास व सुशासन हवे आहे. त्यासाठी "रालोआ' हाच सर्वोत्तम पर्याय आहे, हे जनता उघडपणे मान्य करीत असल्याने यापुढे सत्तेची सूत्रे भाजपप्रणीत "रालोआ'कडेच येतील,असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हा प्रकार दुर्दैवी, पण...
गृहमंत्री चिदंबरम यांच्यावर दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दैनिक जागरणच्या एका शीख पत्रकाराने बूट भिरकावून मारल्याचा प्रकार दुर्दैवी आहे. तथापि, या कृतीमुळे जनतेच्या मनात सरकाराबाबत खदखदणारा असंतोष प्रकट झाला,असे मत प्रसाद यांनी व्यक्त केले. १९८४ साली देशात हजारो शिखांचे शिरकाण झाले व त्यात सुमारे १० हजार शीख लोक मृत्युमुखी पडले. त्याची धग अजूनही या लोकांच्या मनात कायम आहे. या दंगलीत सामील असल्याचा ठपका असलेल्या कॉंग्रेस नेत्यांना "सीबीआय'ने माफ केल्याने त्याचा निषेध म्हणूनच हा प्रकार झाल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. दहशतवादाचा सुनियोजितपणे सामना करण्यासही कॉंग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून देशात बॉम्बस्फोटांची मालिका सुरूच असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
फ्रेंडस् ऑफ बीजेपी आयोजित टोंक-पणजी येथील कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद(छायाः सुनील नाईक)
सर्वांना समान न्याय हाच भाजपचा प्रमुख मुद्दा - रविशंकर प्रसाद
पणजी, दि .७ (विशेष प्रतिनिधी) - "कुणाचेही लाड न करता सर्वांना समान न्याय देणार' हा भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा आहे. सध्याच्या परिस्थितीत देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. दहशतवादाचा बीमोड, राष्ट्रीय पातळीवरील जलद विकास, रोजगार व वाढत्या महागाईचे संकट आदींना खंबीरपणे तोंड देणारे नेतृत्व सध्या देशाला हवे आहे. तांत्रिक, आर्थिक, संरक्षण व अध्यात्मिकता या सर्वच बाबतीत आपला देश येत्या काळात अग्रेसर असेल परंतु हे लक्ष्य गाठण्यासाठी लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांचे पाठबळ असलेला भाजपच हाच सध्या देशासमोर योग्य पर्याय असल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केले.
"फ्रेंड्स ऑफ बीजेपी' या अभिनव मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी "आयआयटी' क्षेत्रातील मान्यवर अमीत मालविया व राजेश जैन हजर होते. या संघटनेच्या गोव्याच्या निमंत्रक सहाना नायकही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर तथा व्यावसायिक समुदायातील जाणकार उपस्थित होते. देशाला एक ताकदवार नेत्याची गरज आहे जो दहशतवादाचा बिमोड करू शकतो.राष्ट्रीय पातळीवर विकासाला चालना,रोजगार व वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्याची कुवत असलेला नेता या देशाला मिळवून देण्यासाठी "फ्रेंड्स ऑफ बिजेपी' या संघटनेच्या सदस्यांनी या लोकसभा निवडणुकीत सक्रियपणे भाग घेण्याची गरज आहे,असेही आवाहन त्यांनी केले. दरम्यान,केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे.देशाच्या सुरक्षेकडे केवळ मतांसाठी तडजोड केली जात असल्याचे कॉंग्रेस सरकारने स्पष्टपणे आपल्या कृतीतून दाखवले आहे,अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. देशातील बहुसंख्य मतदार हे ३५ वर्षे वयोगटातील असून त्यांची टक्केवारी सुमारे ६४ टक्के आहे, त्यामुळे पुढील पाच वर्षांचे भवितव्य ठरवणे त्यांच्या हातात आहे.
या देशाला चांगले दिवस यायचे असतील तर देशाच्या भवितव्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या या गटातील मतदारांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडून प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल व पुढील काळात राजकारणात सक्रिय व्हावे लागेल,असेही श्री.प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजप हा जातीय पक्ष असल्याचा कॉंग्रेसचा नेहमीचा आरोप फेटाळून लावताना प्रसाद यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांना भाजपपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस भाजपला नेहमीच हे दूषण देत आली आहे. अशा पद्धतीने कॉंग्रेस व संपुआने अल्पसंख्याक समाजाला विकासापासून वंचित केले आहे. गुजरातमध्ये मोदी यांनी १७ टक्के विकास दर गाठला आहे, त्याचा लाभ काय मुस्लिमांना होत नाही? तो विकास काय केवळ तेथील हिंदूंसाठीच आहे? सरदार सरोवराचे पाणी अथवा "थ्री फेझ'द्वारा खेड्यापाड्यात केला जाणारा वीज पुरवठा हा केवळ हिंदूंसाठीच आहे?असे प्रश्न श्री. प्रसाद यांनी विचारले. मुस्लिमांचे सर्वाधिक दरडोई उत्पन्न गुजरातमध्ये आहे, तर मुस्लिमांचे सर्वांत कमी दरडोई उत्पन्न ३५ वर्षे डाव्यांची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आहे. भाजप ख्रिश्चन व मुस्लिमांना भारतीय नागरिक मानते केवळ मतपेढी नव्हे! असे ते म्हणाले.
कॉंग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना नेहमीच मतपेढी म्हणून पाहिले. भाजप मात्र त्यांना भारतीय नागरिक मानतो आणि तेही दुसऱ्या दर्जाचे नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. नागालॅंड, मिझोराम, मेघालय आदी ख्रिस्ती मोठ्या संख्येने असलेल्या राज्यांमध्येही भाजपला चांगले स्थान आहे. देवेगौडा आणि गुजराल यांचे दिवस संपले आहेत. मनमोहनसिंग हे अपघाताने पंतप्रधानपदी बसले आहेत, तिसरी आघाडी हा केवळ पार्किंग जागा आहे. सध्या देशाला अडवाणी यांच्यासारख्या खंबीर नेत्याची आणि रालोआसारख्या आघाडीची गरज आहे, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे आणि आता तर ते काही दूरचित्रवाणी वाहिन्यांना आणि वृत्तपत्रांना आमिषे दाखवून एकतर्फी बातम्या प्रसारित करीत आहेत, असे यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. ज्यावेळी मध्यमवर्गीयाने देशाचे नेतृत्व केले, त्यावेळीच देश संपन्नतेकडे गेला आहे, जर्मनी, जपान अथवा अमेरिका ही याची उदाहरणे आहेत. मध्यमवर्गानेच देशाचा स्वातंत्र्यसंग्राम अथवा गोव्याचा मुक्तिलढा पुढे नेला. आता याच वर्गाला पुढे येऊन भाजपसारख्या पक्षाला संधी देऊन वेगाने विकास करायची संधी द्यायला हवी, असे ते म्हणाले.
फ्रेंडस् ऑफ बीजेपी ही संघटना कशा प्रकारे स्थापन झाली, त्याबद्दल परदेशी व्यवसाय करणारे उद्योजक राजेश जैन व बॅंकर अमीत मालवीय यांनी आपले अनुभव कथन केले. संपुआच्या गैरकारभाराला जनतेने थारा देऊ नये, यासाठी चांगले नेते निवडून चांगले सरकार सत्तेवर आणा असे आवाहन त्यांनी सांगितले. हा देश आपला आहे, मुले ही आपले भवितव्य आहे, त्यामुळे सर्वात चांगल्या अशा भाजपला निवडून आणुया असे ते म्हणाले.
हा कार्यक्रम प्रश्नोत्तराने संपला, त्याचे सूत्रसंचालन डॉ.सहाना नायक यांनी केले.

जागतिक मंदीतही "एमपीटी'ची भरीव प्रगती

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - जागतिक आर्थिक मंदी असूनही मुरगाव बंदराने २००८-०९ या आर्थिक वर्षात आपली मालवाहतूक १९ टक्के वाढविली असून, जहाज मंत्रालयाने (आरटी ऍन्ड एच) निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा भरीव प्रगती केल्याची माहिती "एमपीटी 'चे चेअरमन प्रवीण अग्रवाल यांनी दिली.
२००८-०९ साली पोर्ट ट्रस्टने ४१.६८ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली जी गेल्या वर्षी म्हणजे २००७-०८ साली ३५.१३ दशलक्ष झाली होती. जहाज मंत्रालयाने निश्चित केलेली ४०.६० दशलक्ष उद्दिष्टापेक्षा ही वाढ ३ टक्क्यांनी जास्त झाली आहे.
व्यावसायिक नियोजन सल्लागाराने एमपीटीने २०१२ पर्यंत ४० दशलक्ष टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची आवश्यकता दर्शविली होती. मात्र हे उद्दिष्ट एमपीटीने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा तीन वर्षे अगोदरच व १२५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पूर्ण केल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी "एमपीटी'ने निर्यातीत २४ टक्के वाढीचा उच्चांक गाठला असून, ४१.६८ दशलक्ष टन वाहतुकींपैकी ३४.६७ दशलक्ष टन निर्यात करण्यात आली आहे तर ७.०१ दशलक्ष टन माल आयात केला आहे.
प्रमुख मालवाहतुकीत खनिज मालाची ३३.८१ दशलक्ष टन, कोळशाची ४.११ दशलक्ष टन वाढ झाली आहे. ही सर्वांत मोठी वाढ असून मंत्रालयाने निश्चित केलेल्या आर्थिक वर्षातील ३०.४० दशलक्ष टन उद्दिष्ट पार करणारी आहे. क न्टेनर वाहतूक आणि मालवाहू जहाजामध्येही यावर्षी लक्षणीय वाढ झाल्याचे ते म्हणाले.गेल्या वर्षी बंदरात ८२५ मालवाहू जहाजे लागली.त्यात वाढ होऊन यंदाच्या वर्षी ती ८९० वर पोहोचली.
शेजारी बंदरातील वाहतूक आकर्षित करण्यासाठी लागू केलेल्या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला व पश्चिम विभागात वाहतूक दुप्पटीने वाढल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
जागतिक मंदीचा फटका मुरगाव बंदरातील जलपर्यटक वाहतुकीस बसला. यंदाच्या वर्षी केवळ २४ जलपर्यटक जहाजांतून १०८७८ प्रवासी आहे, जी संख्या गेल्या वर्षी ३८ जहाजांतून १२९९७ एवढी होती.
मुरगाव बंदराचे तात्पुरते उत्पन्न यंदाच्या वर्षी २९० कोटीवर पोहोचले जे गेल्या वर्षी २६८ होते. एकूण महसुलातही आकर्षक वाढ झाली आहे.पेन्शन ट्रस्ट निधीला २८ कोटी आणि ग्रॅज्युइटी ट्रस्ट फंडला २.५० कोटी निधी देण्यात आला आहे. निवृत्तीवेतनासाठी वरील निधी काढल्यानंतर एकूण निव्वळ थकबाकी १८ कोटी राहील जी गेल्या वर्षी ३९.८५ कोटी होती.
नवीन विकासात्मक कामासंबंधी माहिती देताना अग्रवाल यांनी सध्या सुरू असलेल्या अतिरिक्त तीन मूरिंग डॉल्फिन्सचे काम ऑक्टोबर २००९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचा आत्मविश्वास दर्शविला व त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले.
बंदराला जोडणाऱ्या चारपदरी रस्त्यासंबंधी माहिती देताना श्री.अग्रवाल यांनी या संबंधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत बंदराला जोडणाऱ्या रस्त्यांची योजना हाती घेण्यात आली असून मुरगाव पोर्ट कंपनी लिमिटेड मार्फत त्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्राधिकरणाने उर्वरित ५.२० किमी. रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे ठरविले असून वरूणापुरी जोडरस्ता ते सडापर्यंतची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे.
एमपीटीने पोर्ट क्राफ्ट व लहान बोटींसाठी धक्का बांधण्याचे काम यापूर्वीच सुरू केले असून,१९० मी. लांब व १० मीटर रुंदीच्या या धक्क्याचे काम मार्च २०१० पर्यंत पूर्ण होणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
एमपीटीच्या विस्तारीकरणासंबंधी बोलताना, २५२ कोटी रुपयांचा आधुनिक कोळसा निर्यात टर्मिनल उभारण्यात येणार असून त्यासाठी पाच जणांची संक्षिप्त यादी तयार केली आहे.जागतिक मंदी असून सुध्दा श्री अग्रवाल यांनी एमपीटी आगामी काळात आपली प्रगती चालूच ठेवेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

Tuesday 7 April, 2009

आसाममध्ये ४ बॉंबस्फोट

आठ ठार; ६० जखमी

गुवाहाटी, दि. ६ - आसामातील मालिगाव, ढेकाईजुली, धुब्री आणि मातिकाछर या चार ठिकाणी आज संशयित उल्फा बंडखोरांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांत किमान आठ जण ठार तर ६० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग उद्या मंगळवारी आसामच्या निवडणूक दौऱ्यावर येत असताना हे बॉम्बस्फोट झाले आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आसामचे पोलिस महासंचालक जे. एम. श्रीवास्तव यांनी सांगितले की, गुवाहाटी शहरातील मालिगाव भागात आज दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात सात जण ठार तर ५६ जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे या भागात उभ्या असलेल्या २० मोटारसायकली व इतर वाहनांना आगी लागल्या. इतकेच नाही तर जवळच असलेल्या एका तीन मजली इमारतीलाही आग लागली. याच इमारतीत पोलिसठाणेही आहे.
या स्फोटांमागे उल्फा बंडखोरांचा हात असून त्यांनी स्फोटासाठी अतिशय उच्च दर्जाची स्फोटके व तंत्रज्ञान वापरले असल्याचे दिसून येत आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालिगाव चारीअलीजवळ असलेल्या पार्किंगच्या भागात आज दुपारी दोनच्या सुमारास एका कारमध्ये जोरदार स्फोट झाला व एकच गोंधळ उडाला. लोक सैरावैरा धावू लागले. रस्यावर किंचाळण्याचे ओरडण्याचे व कण्हण्याचे आवाज येत होते. स्फोटात जखमी झालेल्यांना संजीवनी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
स्फोटानंतर बऱ्याच उशिराने रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याने लोक संतप्त झाले होेते. स्फोटानंतर या भागाकडे लोक मोठ्या संख्येने आपापली वाहने घेऊन धावल्याने या भागात रहदारीची मोठी बिकट समस्या उभी झाली. त्यामुळे घटनास्थळाला सुरक्षा जवानांनी लगेच घेरा घातला. घेरा यासाठीही टाकला की या भागात पेरून ठेवण्यात आलेल्या आणखी काही स्फोटकांचा स्फोट होऊन अधिक जीव हानी होऊ नये.
सोनितपूरमध्येही बॉम्बस्फोट
मालिगाव स्फोटापाठोपाठ आसाममध्ये आणखी एक बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. सोनितपूरच्या धेकियाजुली बाजारात हा बॉम्बस्फोट झाला आहे. हा बॉम्ब एका सायकलवर ठेवण्यात आला होता. या स्फोटात चार ते पाच लोक जखमी झाले आहेत. यातील काहींची स्थिती चिंताजनक आहे. या स्फोटांकडे बघता राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन स्फोटांचा तपास सुरू असतानाच धुब्री आणि मातिकाछर या दोन ठिकाणी उल्फा बंडखोरांनी स्फोट घडवून आणले. यात एक जण ठार तर सहा जण जखमी झाले. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्यला हे स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली असून, स्फोट घडविणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

इटलीमध्ये भयंकर
भूकंपात १०० ठार
लाखो बेघर, आणीबाणी घोषित; दीड हजारावर जखमी
लाकिला(इटली), दि. ६ ः मध्य इटलीला आज पहाटे जबरदस्त भूकंपाचा धक्का बसून त्यात प्राथमिक माहितीनुसार किमान शंभरावर लोक मृत्युमुखी पडले आहेत तर दीड हजार लोक जखमी झाले आहेत. भूकंपाने जमीनदोस्त झालेल्या हजारो घरांच्या व इमारतींच्या ढिगाऱ्याखाली हजारो लोक अडकून पडलेले असल्याने मृतांचा व जखमींचा आकडा वाढू शकतो, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या भूकंपामुळे हजारो लोक बेघर झाले असून देशात आणिबाणी लावण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान सिलव्हिओ बरलुस्कोनी यांनी केली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू रोमपासून ११० किमी अंतरावर म्हणजे लाकिला शहराजवळ होता. स्थानिक वेळेनुसार आज पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. यावेळी लोक साखरझोपेत होते. एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच या भागाला आतापर्यंत भूकंपाचे नऊ धक्के बसलेले आहेत. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची तीव्रता ६.३ रिक्टरस्केल एवढी नोंदविण्यात आली आहे. भूकंपानंतर काही तासात इटलीचे अंतर्गत मंत्री रॉबर्टो मोेरोनी लाकिला भागात आले. हजारो घरे जमीनदोस्त झालेली असल्याने त्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर प्रारंभ झाले असून भूकंपबळींचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लाकिलाचे महापौर मासिमो सिएलेंटे यांनी सांगितले की शहर व परिसरातील कमीतकमी एक लाख लोक बेघर झाले असून अनेक ऐतिहासिक इमारती क्षतिग्रस्त झाल्या आहेत.
भूकंपाने जमीनदोस्त झालेली घरे, इमारतीच्या मलब्याखाली अडकून पडलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी व जखमींना दवाखान्यात पाठविण्यासाठी रस्त्यावर पोलिस, स्थानिक अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, मदतपथके, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते कामाला लागलेले होते. या शहरातील काही प्रमुख सरकारी तसेच खाजगी रुग्णालयेही जमीनदोस्त झाली आहेत वा कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अशा स्थितीत येथील रुग्णांना इतर शहरांत पाठविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. पोलिसांनी मृतांचा आकडा १०० सांगितला असला तरी प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार तो वाढू शकतो.

देशप्रभूंनी टाळला सहकारी कर्जाचा उल्लेख

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उत्तर गोवा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले पेडण्याचे जमीनदार तथा माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांची मालमत्ता सुमारे ६० कोटीपेक्षा जास्त असल्याचे मालमत्ता प्रतिज्ञापत्रावरून सिद्ध झाल्याने ते सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी सादर केलेल्या मालमत्ता प्रतिज्ञापत्रात गोवा राज्य सहकारी बॅंक व म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेतील कथित थकबाकीचा टाळलेला उल्लेख, त्यासंदर्भात दाखल झालेला फौजदारी गुन्हा तसेच आयकर भरणाबाबत दिलेली माहिती यावरून अनेक शंका उपस्थित झाल्याने विरोधकांच्या हाती आयतीच संधी चालून आल्याची जोरदार चर्चा आज राजकीय गोटात सुरू होती.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराने आपली वैयक्तिक मालमत्ता जाहीर करण्याची गरज असते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या देशप्रभू यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला परंतु मालमत्ता प्रतिज्ञापत्र मात्र शनिवारी सुपूर्द केले.त्यांनी सादर केलेल्या मालमत्ता प्रतिज्ञापत्रात ते सुमारे ६० कोटीपेक्षा जास्त मालमत्तेचे मालक ठरले आहेत. दरम्यान,या मालमत्तेबाबत माहिती देताना विविध ठिकाणी काढलेल्या कर्जांची माहिती देणेही बंधनकारक आहे. देशप्रभू यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केवळ आयसीआयसीआय बॅंकेतील कर्जापैकी १५ लाख रूपये बाकी असल्याचे म्हटले आहे परंतु गोवा राज्य सहकारी बॅंक व म्हापसा अर्बन बॅंकेत असलेली जुनी थकबाकी मात्र त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दाखवली नसल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी म्हापसा अर्बन बॅंकेकडून त्यांच्यावर २००३ साली फौजदारी खटला दाखल केला होता त्याचाही उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला नसल्याचे उघड झाले आहे. म्हापसा अर्बन बॅंकेत त्यांची सुमारे ९५ लाख रुपये जुनी थकबाकी असल्याची माहिती बॅंकेतील सूत्रांनी दिली. गोवा राज्य सहकारी बॅंकेलाही ते सुमारे ५६ लाख रुपये देणेकरी आहेत व या थकबाकी वसुलीसाठी बॅंकेने त्यांच्यावर केंद्रीय सहकार निबंधक लवादासमोर खटला दाखल केला आहे, याचीही नोंद त्यांनी या प्रतिज्ञापत्रात देण्याचे टाळले आहे.
दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा विभागात म्हापसा अर्बन बॅंकेने दाखल केलेल्या खटल्याबाबत या विभागाचे अधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी ही चौकशी सध्या जैसे थे असल्याचे सांगून बॅंक व त्यांच्यात समझोता झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी बॅंकेच्या अधिकृत सूत्रांकडे संपर्क साधला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. देशप्रभू यांनी या खटल्याविरोधात बॅंकेवर नागरी खटला दाखल केला आहे व बॅंकेने त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. देशप्रभू जोपर्यंत थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत हे गुन्हे मागे घेणे शक्य नाही ,अशी माहितीही बॅंकेकडून देण्यात आली. देशप्रभू यांनी आपल्या या थकबाकीबाबत प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला नसल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही सहकारी बॅंकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
आयकर भरणा शून्य
सुमारे ६० कोटी रुपयांचे मालक असलेल्या देशप्रभू यांच्याकडून एकही पैसा आयकर भरणा केला जात नाही ही गोष्टही अनेकांना तोंडात बोटे घालण्यास लावणारी ठरली आहे. देशप्रभू यांची आपला सर्व महसूल हा कृषी व्यवसायातून येत असल्याचे सांगून त्यासाठी आयकर भरणा करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आयकर विभागात केलेली प्रक्रिया १९८६-८७ साली केल्याची धक्कादायक नोंदही या प्रतिज्ञापत्रांत केली आहे. कृषी संपत्ती असल्याने संपत्ती कराची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान,देशप्रभू यांनी आपल्या या प्रतिज्ञापत्रात हातात १० लाख रुपये रोख असल्याचे सांगितले आहे. मात्र एकही बॅंक, बिगर बॅंक संस्था, वित्तीय संस्था आदी ठिकाणी ठेवी नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, देशप्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची पेडणे तालुक्यात ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची जमीन असल्याचे म्हटले आहे. मुंबई,पणजी,पेडणे आदी ठिकाणी सुमारे २ कोटी रुपये किमतीचे फ्लॅट व फार्म हाउस आहेत. सुमारे ५ कोटी ४० लाख रुपये विविध वित्तीय संस्थेत गुंतवले असून त्यांची सध्याची किंमत २ कोटी ३८ लाख रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. १ कोटी ५ लाखांच्या वडिलोपार्जित भेट वस्तू असल्याची माहिती देताना एकूण पाच अलिशान वाहनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. बाकी म्हापसा,पणजी, व मुंबई येथे असलेल्या घरांची किंमतही त्यांनी यावेळी दिली आहे.

विवाहित तरुणाला दहा वर्षांची कैद

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - पंधरा वर्षीय मुलीला पुण्यात नेऊन तिच्यावर चार महिने सतत बलात्कार केल्याप्रकरणी दीपक नान्कू सिंग या २७ वर्षीय विवाहित तरुणाला आज बाल न्यायालयाने दहा वर्षाची कैद आणि दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरल्यास ती पीडित मुलीला दिली जावी, अन्यथा सिंग याने सहा महिन्याची अतिरिक्त कैद भोगावी, असे आदेशात म्हटले आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी दीपक सिंग याला १ एप्रिल रोजी दोषी ठरवण्यात आले होते. आरोपीने आपल्या बचावत, आपण सदर मुलीशी पश्चिम बंगालमधील एका मंदिरात विधिवत विवाह केल्याचा दावा केला. तथापि, त्या मुलीने उलट तपासणीत आपण पश्चिम बंगालला गेलोच नव्हतो, अशी भूमिका घेतानाच आरोपी दीपकवर आपले प्रेम असल्याचे न्यायालयात सांगितले. अल्पवयीन मुलीच्या इच्छेनुसार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार ठरत असल्याने न्यायालयाने दीपकला दोषी ठरवले. तसेच मुलीवर बलात्कार झाल्याने वैद्यकीय चाचणीत सिद्ध झाल्याचे न्यायालयीन आदेशात म्हटले आहे.
आरोपी दीपक याला पत्नी व तीन मुले आहेत. १८ मार्च २००८ रोजी दीपक त्या मुलीला घेऊन पळून गेला होता. मुलगी आणि दीपक फरार झाल्यानंतर मुलीच्या आईने केपे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. २१ जून ०८ रोजी दोघीही पुन्हा केप्यात परतल्यानंतर दीपक याला अटक झाली होती. १८ रोजी गोवा सोडल्यानंतर आम्ही पश्चिम बंगाल येथे जाऊन एका मंदिरात विधिवत विवाह केला. त्यानंतर पुणे येथून येऊन चार महिने एका भाड्याच्या खोलीत राहिलो. विवाह करण्यापूर्वी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नसल्याचे आरोपीच्या वकिलांनी युक्तिवादात सांगितले. तथापि, मुलीने उलट तपासणीत पश्चिम बंगालमध्ये जाऊन विवाह केल्याच्या दाव्याला पुष्टी दिली नाही.

"धीरयो' कायदेशीर करण्यास सार्दिन प्राधान्य देणार

पणजी, दि.६ (प्रतिनिधी) - दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास संसदेच्या पहिल्या अधिवेशनातच "धीरयो' (बैलांच्या झुंजी) कायदेशीर करण्याबाबत खाजगी विधेयक सादर करणार असल्याचे आश्वासन कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी दिले. सरकार जर यासाठी भूसंपादन करीत असेल तर खासदार निधीतून झुंजीसाठी आखाडा तयार करण्यास अर्थसहाय्यही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आज पणजी येथील कॉंग्रेस भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष एम.के.शेख व सरचिटणीस आर्थर सिकेरा हजर होेते. "सीआरझेड' हा विषय जिथे सरकारला सोडवणे शक्य होत नाही तिथे विरोधक काय सोडवतील,असा सवाल करून हा केंद्रीय विषय आहे परंतु तरीही याबाबत तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार अभ्यास करीत असल्याचे ते म्हणाले. आपण निवडून आल्यास विशेष आर्थिक विभाग "सेझ' परत आणणार असल्याचा अपप्रचार विरोधक करीत आहेत, असे ते म्हणाले. गोव्यातील जनतेला "सेझ'नको त्यामुळे जनतेच्या भावनांचा आदर करून राज्यात एकही "सेझ'आणला जाणार नाही,असेही यावेळी ते म्हणाले.
आपण निवडून आल्यास जुवारी नदीवर नवा पुल, नुवे-वेर्णा बगलमार्ग आदी गोष्टींना प्राधान्य देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नुवे-वेर्णा बगलमार्गामुळे येथील लोकांच्या मनात भिती व्यक्त झाल्याने त्यात हस्तक्षेप करून प्रसंगी लोकांची घरे वाचवण्यासाठी मार्गही बदलण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार व राज्यातील दिगंबर कामत सरकार यांनी सामान्य लोकांसाठी बरेच कार्य केल्याने येत्या निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले.
कॉंग्रेसकडूनही निरीक्षकांची नेमणूक
येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेते,पदाधिकारी तथा कार्यकर्ते खरोखरच पक्षासाठी काम करतात काय किंवा त्यांना आखून दिलेले काम योग्य पद्धतीने करतात की नाही याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी खास निरीक्षकांची नेमणूक केल्याची माहिती सार्दिन यांनी दिली. चर्चिल आलेमाव हे कॉंग्रेससाठी काम करतील काय,असे विचारले असता ते बोलत होते. चर्चिल यांनी श्रेष्ठींचा निर्णय मान्य करण्याचे घोषित केले आहे. पक्षाचे सर्व नेते वावरल्यास सुमारे ४१ हजार मताधिक्क्याने विजयी होऊ ,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. युगोडेपा ही लोकांना गृहीत धरीत असल्याची टीका करून निवडणूक जवळ आल्या की हा पक्ष जागा होतो,असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.

राजनाथसिंग यांनी घेतली वरुणची भेट

एटा, दि. ६ - प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपामुळे कारागृहात असणाऱ्या वरुण गांधी यांना राजकीय आणि कायदेशीर अशी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासक प्रतिपादन भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केले.
आज भाजपाध्यक्षांनी एटा कारागृहात जाऊन वरुणची भेट घेतली. रासुका अंतर्गत कारागृहात असणाऱ्या वरुणला भेटल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, वरुणला राजकीय कारणाने अतोनात छळ सहन करावा लागत आहे. त्याला जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात आहे. भाजपा या प्रकरणी गप्प बसणार नाही. आम्ही वरुणला राजकीय आणि कायदेशीर अशी सर्वतोपरी मदत करू.
भाजपा वरुण मुद्याचा राजकीय फायदा घेऊ पाहत आहे का, असे विचारले असता राजनाथ सिंग म्हणाले की, वरुण हा भाजपाचा उमेदवार आहे, ही बाब आपण विसरता कामा नये. वरुणविषयी आमच्या पक्षात कोणतेही मतभेद नाही. आमच्या पक्षाच्या उमेदवाराला संकटातून बाहेर काढणे, हे आमचे कर्तव्यच आहे. आज संपूर्ण देश हा प्रकार पाहत आहे आणि सर्वांना याची कल्पना आहे की, वरुणला त्रास दिला जातोय. त्याच्या या छळाचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले.

छाननीनंतर उत्तरेत ७; दक्षिणेत १४ उमेदवार

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील दोन्ही मतदारसंघांच्या उमेदवारांची छाननी आज पूर्ण झाली. उत्तर गोव्यातून ७ तर दक्षिण गोव्यात १४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. परवा ८ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निश्चित करण्यात आला असून त्यानंतरच प्रत्यक्ष आखाड्यात किती उमेदवार राहतील हे स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी आज सकाळी दोन्ही ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.उत्तर गोवा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी सात अर्ज ग्राह्य धरण्यात आले. त्यात श्रीपाद नाईक(भाजप), जितेंद्र देशप्रभू(राष्ट्रवादी कॉंग्रेस), पांडुरंग राऊत (म.गो), ख्रिस्तोफर फोन्सेका(भा.क.प), उपेंद्र गांवकर(शिवसेना), नरसिंह सुर्या साळगावकर व मार्था डिसोझा(अपक्ष) यांचा समावेश आहे.
दक्षिण गोवा मतदारसंघासाठी (मुरगाव) सादर झालेल्या १६ उमेदवारी अर्जांतील दोन अर्ज आज छाननीवेळी फेटाळण्यात आले. आता १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आज अर्ज फेटाळण्यात आलेले दोघेही अपक्ष उमेदवार आहेत. आंतोनियो कार्व्हाल्यो व जोकीम रोझारियो रॉड्रीगीस अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान,दक्षिण गोव्यात रिंगणात असलेल्या महत्त्वाच्या उमेदवारांत फ्रान्सिस सार्दिन(कॉंग्रेस), ऍड.नरेंद्र सावईकर(भाजप), माथानी साल्ढाणा(युगोडेपा), राजू मंगेशकर(भा.क.प), आंतोनीयो गांवकर(सेव्ह गोवा फ्रंट), नामदेव नाईक(शिवसेना) आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

Monday 6 April, 2009

वास्को व पणजीत पाच लाखांची चोरी

पणजी व वास्को, दि. ५ (प्रतिनिधी) - राज्यातील चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रात्रीच्यावेळी पोलिस गस्त असताना पणजी व वास्कोत मिळून पाच लाखांवर ऐवज चोरीस गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
पणजी येथील नीलकमल आर्केडच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टरलिंग अँड व्हिल्सन प्रा. लिमिटेडच्या कार्यालयात काल पहाटे काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याविषयीची पोलिस तक्रार आज सकाळी या कंपनीचे उपव्यवस्थापक साईप्रसाद भास्कर राम चल्ला यांनी केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मुख्य प्रवेशदाराचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली असून गेल्या काही दिवसांत या टोळीने अशाच पद्धतीने चोऱ्या करून पणजी पोलिसांना हैराण केले आहे. काल रात्री पोलिस निरीक्षकासह दोन उपनिरीक्षक गस्तीवर असतानाही चोरट्यांनी आपली मोहीम यशस्वी केली.
अधिक माहितीनुसार वरील कंपनीच्या कार्यालयाच्या कपाटात असलेले १ लाख ५ हजार रुपये, एक एसर कंपनीचा लॅपटॉप, एक पासपोर्ट, २५ चांदीचे नाणे अशी एकूण १ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. आज सकाळी कार्यालय उघडण्यासाठी आले असता सदर घटना उघडकीस आली. याच कार्यालयातील एक काच फुटलेली असून त्याला रक्तही लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गोव्यातील काही प्रमुख शहरांत वाढत्या घरफोड्या आणि दुचाकी चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर बिकट समस्या निर्माण झाली आहे. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक नारायण चिमुलकर करीत आहे.
वास्कोत साडेतीन लाखांची चोरी
वास्को, (प्रतिनिधी)ः राज्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, वास्को येथे आज सकाळी दोन नामवंत दुकानांमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. वास्को पोलिस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या "रेडिओ मुंडियाल' व "बाटा' अशा दोन दुकानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख साठ हजारांची मालमत्ता लंपास केली असून रात्रीच्या वेळी वास्को पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या गस्तीबाबत पुन्हा एकदा जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे.
आज सकाळी ९.४५ च्या सुमारास वास्कोच्या अन्नपूर्णा हॉटेलसमोर असलेल्या "रेडिओ मुंडियाल'या इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या मालकाचा मुलगा दुकान उघडण्यासाठी आला असता त्याला दुकानाचे मधले कुलूप तोडण्यात आल्याचे लक्षात आले. याच प्रकारे या दुकानाच्या बाजूला असलेल्या "बाटा शोरूम'दुकानाच्या मालकालाही त्यांच्या दुकानाचे मधले कुलूप तोडण्यात आल्याचे लक्षात आल्याने त्वरित वास्को पोलिसांना याची माहिती देण्यात आली. वास्को पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी दाखल होऊन तपास करण्यास सुरुवात केली असता दोन्ही दुकानांमध्ये मिळून तीन लाख साठ हजारांची चोरी झाल्याचे दिसून आले.बाटा शोरूममधून ३५ हजारांची रोख रक्कम व रेडिओ मुंडियालमधून २२ हजारांची रोख व तीन लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल (डिजिटल कॅमेरा, हेन्डी केम, एमपीथ्री, प्ले स्टेशन इत्यादी) चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानांच्या शटरांची मधली कुलुपे तोडून नंतर शटर वाकवून आत प्रवेश केला आहे. वास्को पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्ती घालण्यात येत असताना सुद्धा सहा दिवसाच्या आत शहरातील हा दुसरा चोरीचा प्रकार असून यापूर्वी येथील एफ.एल गोम्स मार्गावर असलेल्या "अरविंद सेल्युलर' या मोबाईल संच विकणाऱ्या दुकानामध्ये चोरी झाली होती. तसेच जानेवारी ते आत्तापर्यंत २२ लाखांच्या आसपास मालमत्तेची चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने वास्कोच्या पोलिसांच्या सुरक्षेबाबत जनतेचा विश्वास उडत चालल्याचे दिसून येत आहे.
वास्को पोलिसांनी सदर प्रकरणाबाबत कडक तपासणी करण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांचे या वेळी पाचारण करून पंचनामा केला. ""रेडिओ मुंडियाल'' ह्या दुकानामधून चोरीला गेलेले इलेक्ट्रॉनिक सामानाचे खोके दुकानामध्ये फेकून माल नेण्यात आला असे तपासाच्या वेळी पोलिसांना दिसून आले. रेडिओ मंडियालच्या श्री शेखर प्रेमानंद वेर्णेकर व बाटा शोरूमच्या दीपक पागी ह्या मालकांनी आपआपली तक्रार वास्को पोलीस स्थानकात नोंदविल्यानंतर पोलिसांनी भा.द.स ४५७ व ३८० ह्या कलमाखाली अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्याच्या कडून तपास चालू आहे.दरम्यान वास्को मध्ये ह्या काळात घडलेल्या चोरी प्रकरणाची तपशील करण्यासाठी वास्को पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न येत असल्याने जनतेमध्ये प्रश्न निर्माण करत आहे. तसेच आज चोरी झालेल्या व गेल्या सहा दिवसापूर्वी झालेल्या चोरीच्या ठिकाणी इतर व्यवस्थापनांचे सुरक्षा कर्मचारी उपस्थित असताना सुद्धा त्यांना हे चोरटे कशा प्रकारे दिसून येत नाही हा एक मोठा प्रश्न आता पोलिसांना खात आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रजाक शेख पुढील तपास करीत आहे.
चोरट्यांना अटक करू-बसी
वास्कोमध्ये अलीकडे झालेल्या चोरी प्रकरणातील अज्ञात चोरट्यांना गजाआड करण्यासाठी येथील पोलिस कर्मचारी परिश्रम घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यास यश मिळणार असल्याचा विश्वास गोवा पोलिस खात्याचे महासंचालक भीमसेन बसी यांनी आज व्यक्त केला. आज संध्याकाळी श्री. बसी यांनी वास्को पोलीस स्थानकाला भेट दिली असता काही पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की गोव्याच्या बहुतेक पोलिस स्थानकावर कर्मचाऱ्यांची कमतरता असून ती दूर करण्यासाठी कारवाई चालू आहे. वास्को शहर एक प्रमुख शहर असल्याचे श्री. बासी यांनी यावेळी मान्य करून येथे असलेली मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता लवकरात लवकर दूर होईल असे आश्वासन व्यक्त केला.

आत्मघाती हल्ल्यात पाकमध्ये ३५ ठार

२०० जखमी

इस्लामाबाद, दि. ५ - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील चकवाल शहरात आज दुपारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात कमीत कमी ३५ जण ठार झाले आहेत तर २००वर लोक जखमी झाले आहेत. कालच पाकिस्तानात झालेल्या एका बॉम्बहल्ल्यात अनेक लोक ठार झाले होते. गेल्या दहा दिवसांत पाकिस्तानात अशाप्रकारचे चार हल्ले झाले असून त्यात १०५ लोक ठार झाले आहेत. आजच्या आत्मघाती हल्ल्यासाठी एका लहान वयाच्या मुलाचा वापर करण्यात आला, असे समजते.
हा आत्मघाती स्फोट इस्लामाबादपासून ९० किमी अंतरावरील चकवाल शहराच्या मधोमध असलेल्या इमामबाड्याजवळ झाला. यावेळी इमामबाड्यात शिया समुदायाचा वार्षिक धार्मिक समारंभ सुरू होता व त्यासाठी हजारोच्या संख्येने लोक जमा झाले होते. या गर्दीत आत्मघाती दलातील हल्लेखोर सहभागी झाला व त्याने स्वत:ला उडवून घेतले.
प्रत्यक्षदर्शी व पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी ३५ वर जणांचे मृतदेह आढळून आले, तर २०० वर लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोेेणत्याही दहशतवादी संघटनेनी स्वीकारलेली नाही.
प्रसिध्दी माध्यामांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक गोष्ट समोर आली आहे की, या भागात शिया व सुन्नी दोन्ही समुदायाचे लोक राहतात. या दोन्ही समुदायांना भडकविण्यासाठी हा आत्मघाती स्फोट घडवून आणला असावा.
स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेण्यात आले. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका दाखल झाल्या व त्यांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यास प्रारंभ केला.
या स्फोटानंतर पोलिसांनी या भागाला चारी बाजूंनी घेरले असून चौकशी सुरू केली आहे. या स्फोटात अनेक वाहनांचे नुकसान झाले. पंतप्रधान युसुफ रजा गिलानी व देशांतर्गत गृहमंत्रालयाचे प्रमुख रहमान मलिक यांनी या स्फोटाची निंदा केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी सिंध तसेच वायव्य सहरहद्द प्रांतातील शिया समुदायाला आपल्या हल्ल्यांचे लक्ष्य केलेले आहे. आजच्या हल्ल्याचे विशेष हे आहे की हा हल्ला पंजाब प्रांतात झाला आहे.

जितेंद्र देशप्रभूंबाबत दोन्ही पक्षांत निरुत्साह

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादी की कॉंग्रेस लढवणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असला तरी जितेंद्र देशप्रभू यांच्या उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये नाराजी असून कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसत आहे. देशप्रभू यांनी पेडणे तालुक्यातील देवदर्शनाने प्रचारास प्रारंभ केला आहे खरा पण त्यांच्यासाठी कोणत्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते काम करणार आहेत, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या खासदारकीच्या कालावधीत केलेली कामे आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क व त्यांच्यामागे उभी असलेली भाजप कार्यकर्त्यांची खंबीर फळी यामुळे त्यांना टक्कर देणे हे काम सोपे नसल्याने अनेक इच्छुक नेत्यांनी आपले घोडे पुढे दामटले नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
देशप्रभू घराणे हे मूळ कॉंग्रेसचे. स्वतः जितेंद्र देशप्रभू हे निष्ठावान कॉंग्रेस नेते मानले जातात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षत्याग करून राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारावी लागली. या "पक्षांतरा'बद्दल ते स्वतः किती समाधानी आहेत याबद्दल शंकाच आहे, शिवाय त्यांचे कार्यकर्ते आता राष्ट्रवादीचा किती आस्थेने प्रचार करतील, याबद्दल संशय आहे. उत्तर गोवा मतदारसंघाचा विचार करता, कॉंग्रेसचे अवघे दोनतीन आमदार तरी त्यांच्या प्रचारात उतरतील का हा प्रश्न आहेच. दयानंद नार्वेकर यांनी उमेदवारीच्या घोळाबद्दल डिचोली येथे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. म्हापसा, कळंगुट, शिवोली, डिचोली, मये, पणजी आदी मतदारसंघांत भाजपचे आमदार श्रीपाद नाईक यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले आहेतच परंतु पक्षाचे लहान मोठे नेते आणि कार्यकर्ते उत्साहाने श्रीपाद नाईक यांच्या प्रचारात दंग झाले आहेत. असे चित्र देशप्रभू यांच्याबाबतीत दिसत नाही. धारगळचे आमदार बाबू आजगावकर व देशप्रभू यांच्यातील "संबंध' सर्वज्ञात आहेत. सत्तरी तालुक्यातील खाशे थोडाफार हातभार लावू शकत असले तरी दुसऱ्या पक्षासाठी मते मागताना, त्यांना स्वतःच्या भविष्याचाही विचार करावा लागणार आहे. यावेळी "घड्याळा'ला मत देण्याचे आवाहन करायचे आणि पुढील निवडणुकीत "हाता'ला मते मागायची, ही स्थिती त्यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे.
उत्तर गोवा मतदारसंघात आपल्या पक्षाचा नेता उभा असला तरी तो राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभा आहे, त्यामुळे आपण पक्ष म्हणून मतदारांशी संपर्क साधू शकणार नाही, याची जाणीव अनेक कॉंग्रेस नेत्यांना झाली आहे. याउलट देशप्रभू हे "लादलेले' उमेदवार असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहे. स्वपक्षासाठी जागा मिळविली पण उमेदवार दिला तो कॉंग्रेसचा, अशी चर्चा या पक्षात सुरू असून त्याबाबत प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याचसाठी अट्टहास केला होता का, असे हे कार्यकर्ते नेत्यांना विचारीत आहेत. आता देशप्रभू यांना मत देण्यासाठी आवाहन व प्रचार करण्याची वेळ या पक्षांमधील इच्छुक उमेदवारांवर आली असल्याने त्यांची चांगलीच गोची झालेली आहे, त्यामुळेच निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचाच त्यातील अनेकांचा प्रयत्न दिसतो आहे. निवडणूक प्रचारावेळी दोन्ही पक्षांचे नेते काही ठिकाणी एकत्रित दिसतीलही पण ते केवळ श्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी. तळागाळातील कार्यकर्ते मात्र एकमेकांना मदत करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असेच चित्र अनेक ठिकाणी आहे.

असह्य उकाड्याने गोवेकर हैराण

नद्या, तलावांवर गर्दी; कलिंगडांना वाढती मागणी

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - मार्च कसाबसा गेला, पण एप्रिल सुरू झाल्यापासून राज्यभरात असह्य उकाड्याने गोवेकरांना हैराण करून सोडले असून अंगाची तलखी होत आहे. पणजी वेधशाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज कमाल तापमान ३४.८ तर किमान तापमान २७.६ अंश सेल्सियस होते; तर आर्द्रता ८१ टक्के होती.
या उकाड्याच्या चक्रातून आपली कशी सोडवणूक करून घ्यावी, असा प्रश्न लोकांना पडला आहे. एरवी दरवर्षी मार्च ते मे या कालावधीत उन्हाळा ठरलेलाच असतो. तथापि, यंदा त्याची तीव्रता अंमळ जास्तच जाणवू लागली आहे. "ग्लोबल वॉर्मिंग'चा हा परिणाम असावा, असे हवामानशास्त्रांचे म्हणणे आहे. घरात पंखे सुरू असले तरी वाढत्या उकाड्यामुळे त्यातून गरम वारा येत असतो. म्हणून पंखेही कुचकामी ठरू लागले आहेत. एअर कंडिशनर प्रत्येकाच्या घरात असणे शक्यच नाही. त्यामुळे प्रामुख्याने दुपारी व रात्री जीवाची तगमग होते त्यावर काय उपाय, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
जेथे सरकारी कार्यालये कोंदट खोल्यांत आहेत तेथील कर्मचाऱ्यांची अवस्था तर विचारू नका. शीतपेय किंवा थंड पाण्याच्या बाटल्या तरी रिचवायच्या किती? बरे थंड पाणी प्यायल्यावर एक-दोन मिनिटे बरे वाटते. पुन्हा अंगातून घामाच्या धारा सुरूच. दिवसातून दोन-तीनदा अंघोळ केली तरी घाम येणे काही थांबत नाही. शिवाय ज्या ठिकाणी प्यायला पाणी मिळण्याची मारामार आहे तेथे लोक इतक्या वेळा अंघोळ तरी कशी करणार? या दिवसांत तलाव, नद्या, तळी, विहीरी आदी ठिकाणी उकाड्यावर मात करण्यासाठी गर्दी करताना दिसतात. युवावर्ग यात प्रामुख्याने आघाडीवर आहे. उन्हाळ्यामुळे शीतपेयांना मागणी वाढत चालल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच कलिंगडासारख्या थंड फळांचीही हातोहात विक्री होताना दिसते. कलिंगडाच्या थंडगार फोडी पोटात थंडावा निर्माण करतात, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कलिंगडांच्या किंमती वाढल्या आहेत. अगदी छोटे कलिंगड घ्यायचे म्हटले तरी त्यासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. तीच गोष्ट आईस्क्रीमची. दुपारी आणि संध्याकाळी उशिरापर्यंत विविध ठिकाणी आईस्क्रीम पार्लरवर गर्दी उसळलेली असते. मात्र, आईस्क्रीमवर मस्त ताव मारून घरात पाऊल ठेवले की, पुन्हा उकाडा सुरू. याचे मुख्य कारण म्हणजे दिवसभर तापलेला स्लॅब थंड होताना आपल्या अंगातील उष्णता बाहेर सोडत असतो. त्यामुळे रात्री झोप लागणेही कठीण. चोरीमारीच्या भीतीने दारे-खिडक्या उघडी ठेवण्याचीही सोय नसते. त्यामुळे मग आहे त्या परिस्थितीत चंचल निद्राराणीची प्रतीक्षा करत अंग टेकायचे, झोप येईल तेव्हा येईल. अगदीच वेळ जाईनासा झाला तर टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करत बसायचे. खिशात भरपूर पैसे खुळखुळणारी मंडळी उन्हाळा सुरू झाला की, परदेशाची वाट धरतात. तथापि, सामान्य आणि मध्यमवर्गीयांना ते शक्यच नसते. ऐतिहासिक काळात डोकावायचे तर तेव्हा या समस्येवर मात करण्यासाठी वाळ्याचे पडदे खोल्यांना लावलेले असायचे. वाळा ही एक तंतुमय वनस्पती असून तिच्यावर पाण्याचा शिडकावा केला तर उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे सुसह्य होतात. धनिक लोक पूर्वीच्या काळी रस्त्याच्या कडेला पाणपोया घालायचे. जमिनीत पुरलेल्या रांजणातील थंडगार पाणी पिऊन तृप्त झालेला श्रमिक नकळत या पाणपोईच्या प्रवर्तकाला दुवा देऊन जायचा. आता हे संदर्भ केवळ इतिहासाच्या पुस्तकातच उरले आहेत.माठ किंवा डेरा ही संस्कृती तर रेफ्रिजरेटर आल्यापासून केव्हाच लयाला गेली आहे. एकेकाळी माठामध्ये सुवासिक वाळा टाकून ते पाणी तांब्याच्या पात्रातून चाखण्यातील मजा काही औरच असायची. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही तांब्याच्या पात्राभोवती भिजवलेले वस्त्र गुंडाळून त्यामुळे थंड झालेले पाणी पिण्याची पद्धत आहे. "मिनरल' वॉटर म्हणून बंद बाटल्यांतून विकत घेतले जाते ते नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात सोप्या उपायांचा अवलंब करून आपल्याला सहजगत्या मिळवणे शक्य असते तेच हे खरे पाणी. कळशीभोवती भिजवलेले वस्त्र लपेटून ठेवणे हा खरोखरीच सोपा उपाय असून तो प्रयोग घरी करून पाहण्यास हरकत नाही. या पाण्याचा प्रत्येक घोट तुम्हाला तरतरी आणतो आणि तुमच्या दुपारच्या जेवणाची लज्जत निश्चितच वाढवतो. तथापि, त्याऐवजी युवकांमध्ये क्रेझ दिसून येते ती पाठीला लावलेल्या "सॅक'मधील एखाद्या शीतपेयाची बाटली शाहरुख खान किंवा अक्षयकुमारच्या शैलीत तोंडाला लावण्याची. हा निव्वळ जाहिरातींचा चमचमाटातून आलेला भोंगळ उपाय आहे. कारण ही शीतपेये जास्त प्रमाणात सेवन केली तर शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.
उकाडा सुरू होताच अनेक व्याधी मागे लागू शकतात. आला उन्हाळा, असा इशारा घरातील ज्येष्ठ मंडळी देतात तो यासाठीच. म्हणूनच या व्याधी टाळण्यासाठी, नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया केलेले टाळण्यासाठी ठरावीक वेळाने भरपूर पाणी प्या आणि उकाडा दूर पळवा.

दुधसागर धबधब्यात मडगावचा विद्यार्थी बुडाला, एक गंभीर

काले, दि.५ (प्रतिनिधी) - कुळे दुधसागर धबधब्याकडे सहलीसाठी आलेल्या मडगाव हायस्कूलमधील इयत्ता दहावीत शिकणारा शेल्टन परेरा (१६) या बोर्डा मडगाव येथे राहणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा साथीदार फ्रान्सिस परेरा याला गंभीर अवस्थेत कुडचडे काकोड्याच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
आज (दि.५) सकाळी मडगाव हायस्कूलमधून सुमारे १२ जणांचा गट रेल्वेने दुधसागर नदीवर सहलीसाठी आला होता. यावेळी शेल्टन व फ्रान्सिस हे दोघे धबधब्याच्या पायथ्याशी आंघोळीसाठी गेले व पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात हे दोघेही बुडाले. उपस्थितांनी त्यांना लगेच पाण्याबाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेने काकोडा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरनी शेल्टनला मृत घोषित केले. फ्रान्सिस हा बेशुद्धावस्थेत असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शेल्टनचा मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. कुळ्याचे उपनिरीक्षक तुळशीदास नाईक अधिक तपास करीत आहेत.
अनमोड मोले रस्त्यावर
महिलेचा मृतदेह, खुनाची शक्यता


कुडचडे, दि.५ (प्रतिनिधी) - अनमोड मोले येथील मुख्य रस्त्यावर आज संध्याकाळी झुडपात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला असून सदर महिलेचा कपड्याच्या साहाय्याने गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मोले अनमोड मुख्य रस्त्याच्या झुडपात आढळलेल्या या मृतदेहाच्या बाजूस एक लहान मुलाचा कपड्याचा पाळणा आढळला असून सदर पाळण्याच्या कपड्याने सदर महिलेचा गळा दाबला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
या दरम्यान सुकतळी मोले येथील बसस्थानकावर कृष्णा बारकेलो व बरकर यांनी सकाळी साडेअकराच्या दरम्यान ६ महिन्याचे अर्भक असल्याची माहिती कुळे पोलिसांना दिली. यावेळी सदर मुलाला अपनाघरमध्ये पाठवण्यात आले असून सदर मूल त्या मयत महिलेचे असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. जिल्हा उपनिरीक्षक सेराफीन डायस व निरीक्षक मनोज म्हार्दोळकर याबाबत अधिक तपास करत आहेत.

Sunday 5 April, 2009

चर्चिल यांची कोलांटी श्रेष्ठींचा निर्णय शिरसावंद्य

पणजी, दि.४ (प्रतिनिधी): दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसची उमेदवारी आपली कन्या वालंकाला मिळवून देण्यासाठी कालपर्यंत दिल्लीत तळ ठोकून बसलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज अचानक कोलांटी मारली. विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी देण्याचा श्रेष्ठींचा निर्णय शिरसावंद्य आहे व आपण श्रेष्ठींच्या आदेशानुसार या निवडणुकीत पक्षासाठी काम करणार आहोत, अशी भूमिका घेत त्यांनी श्रेष्ठींसमोर सपशेल लोटांगण घातले.
सार्दिन यांच्या उमेदवारीवर दावा करून चर्चिल यांनी सुरू केलेल्या राजकारणाला आज अचानक कलाटणी मिळाली. सार्दिन यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला असतानाही दिल्लीत आपली कन्या वालंका हिला उमेदवारी मिळावी यासाठी "लॉबिंग' करत असलेल्या चर्चिल यांना अखेर श्रेष्ठींनी चांगलेच खडसावल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. निवडणूक आयोगाने "सेव्ह गोवा फ्रंट' पक्षाचे कॉंग्रेस पक्षातील विलीनीकरणही अवैध असल्याचा निवाडा दिल्याने चर्चिल अधिकच गोत्यात आले आहेत. आता चर्चिल व त्यांचे सहकारी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांचे भवितव्यच सभापती प्रतापसिंग राणे यांच्या हाती गेल्यामुळे त्यांची हवाच गेल्याचीही चर्चा कॉंग्रेसमध्ये सुरू आहे.
चर्चिल यांनी आज जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात आपली कन्या वालंका हिला उमेदवारी न मिळण्याचा ठपका अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्यावर ठेवला आहे. दक्षिण गोव्यातील लोकांचा वालंकाला मिळत असलेला प्रतिसाद पाहिल्यानंतर श्रेष्ठींनी सार्दिन यांच्या उमेदवारी घोषणेला स्थगिती दिली होती. तथापि, मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी सार्दिन यांची बाजू उचलून धरल्याने श्रेष्ठींनी अखेर त्यांनाच उमेदवारी देण्याचे ठरवले, असा खुलासा चर्चिल यांनी केला. पाळी पोटनिवडणुकीत गुरूदास गावस यांचे बंधू प्रताप गावस यांना विजयी करून मुख्यमंत्री कामत व शिरोडकर यांनी आपली ताकद सिद्ध केली. या निवडणुकीतून गोव्याची जनता त्यांच्या पाठीमागे असल्याचे त्यांनी श्रेष्ठींना दाखवून दिले आहे. दक्षिण गोवा लोकसभेची जागा कॉंग्रेस निसटत्या फरकाने तरी राखू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कामत व शिरोडकर हे दोन्ही नेते राजकारणात अनुभवी आहेत व आपल्यापेक्षा लोकप्रिय आहेत, त्यामुळे श्रेष्ठींनी त्यांचा शब्द मानून सार्दिन यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले, असा टोलाही यावेळी चर्चिल यांनी हाणला.
दक्षिण गोव्यातील जनतेचे आभार
दरम्यान, दक्षिण गोव्यातून राष्ट्रीय जनता दल व बहुजन समाज पक्षातर्फे वालंकाला निवडणुकीत उतरवण्याचे प्रस्ताव आपल्यासमोर आले. येथील लोकांनी तिला अपक्ष म्हणूनही रिंगणात उतरवण्याची मागणी केली. परंतु, श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे हेच आपण आपले कर्तव्य समजतो, असे सांगून चर्चिल यांनी श्रेष्ठींचा आदर राखला आहे. लोहिया मैदानावर झालेल्या बैठकीला दक्षिण गोव्यातील विविध सरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक आदींचे आभार चर्चिल यांनी मानले आहेत. त्यांनी वेळोवेळी आलेमाव कुटुंबीयांना सहकार्य दिल्याने संपूर्ण कुटुंब त्यांच्यासाठी नेहमीच कार्यरत राहील, असेही चर्चिल यांनी म्हटले आहे.

'म्हादईप्रश्नी विलींचे वक्तव्य दुर्दैवी'

पणजी, दि.४ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी "म्हादई'चा प्रश्न हा निवडणुकीचा मुद्दाच नसेल, असे वक्तव्य केल्याने म्हादई बचाव अभियानातर्फे त्याची तीव्र दखल घेण्यात आली आहे. म्हादईचा विषय हा केंद्र सरकारकडे सोडवावा लागणार आहे व हे काम निवडून येणाऱ्या खासदारांनाच करावे लागेल. यामुळे डॉ. विली यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया "म्हादई बचाव'चे निमंत्रक प्रा. राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे.
म्हादईसंदर्भात डॉ. विली यांनी केलेल्या वक्तव्यांचे तीव्र पडसाद उमटले असून डॉ. विली यांनी मुख्यमंत्री असताना म्हादईबाबत विशेष प्रयत्न केले नाहीत, असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे, त्यामुळे ही नदी वाचवण्याचा हा निवडणुकीसाठीचा विषय नसल्याचा डॉ. विली यांचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मारक ठरण्याचीच जास्त शक्यता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गंगा नदी जशी भारतीयांसाठी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे म्हादई ही नदी गोव्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी नदी आहे. कोणताही राजकीय पक्ष हा विषय टाळूच शकत नाही, असे मत माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले आहे. डॉ. विली हे डॉ. विलीच आहेत, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. गोव्यातून दिल्लीत जाणाऱ्या खासदारांनी यासंदर्भात गोव्याचे हित सांभाळावेच लागेल, असेही ऍड. खलप यांनी म्हटले आहे.

वास्को रेल्वे यार्डातून लाखोंचा तांदुळ गायब

वास्को, दि. ४ (प्रतिनिधी) : सडा वास्को येथील भारतीय अन्न महामंडळासाठी रेल्वे मार्गाने आलेल्या प्रत्येकी ५० किलोच्या ५३,९९० तांदळाच्या गोण्यांपैकी २३६ गोण्या चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. या तांदळाची किंमत दोन ते अडीच लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहिती मिळाली आहे. वास्को रेल्वे यार्डमध्ये उभ्या करून ठेवलेल्या मालगाडीच्या डब्यांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदळाच्या गोण्या गायब झाल्याने येथील सुरक्षा यंत्रणेच्या कार्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जगदलपूर - छत्तीसगड येथून वास्को येथील अन्न महामंडळाच्या शाखेसाठी २६ मार्च रोजी ९९३३४३ क्रमांकाच्या मालगाडीच्या ४३ डब्यांतून प्रत्येकी ५० किलोच्या एकूण ५३,९९० तांदळाच्या गोण्या आल्या होत्या. सदर मालगाडी वास्कोत दाखल झाल्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ४३ डब्यांपैकी १२ डबे खाली केले. त्यात असलेला माल त्यांच्या सडा येथे असलेल्या गोदामात नेला. नंतर दुसऱ्या दिवशी (दि.२७ रोजी) आणखी २१ डबे खाली करून २६,८८० किलो तांदुळ गोदामात नेण्यात आला होता. तिसऱ्या दिवशी उर्वरित दहा डब्यांतील तांदळाच्या गोण्या रेल्वे यार्डमधून नेल्या जात असता शेवटच्या डब्याचे सुरक्षा सील तोडण्यात आल्याचे लक्षात आले. यावेळी एकूण ११,८०० किलो तांदूळ (२३६ गोण्या) डब्यातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले. १०४४ गोण्यांपैकी २३६ गोण्या गायब झाल्याने लक्षात येताच वास्को रेल्वे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी सदर प्रकरण रेल्वे पोलिस फोर्सकडे (आर.पी.एफ) सोपवले आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड येथून अन्न महामंडळाचा माल वास्को रेल्वे यार्डात पोहोचल्यानंतर ४३ डब्यांची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा सर्व डबे सीलबंद होते. तथापि, २७ रोजी शेवटचे दहा डबे खाली करण्यात येत असताना एका डब्याचे सील काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे दरम्यानच्या काळात येथे चोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे यार्डमधून अन्न महामंडळासाठी आलेला तांदळापैकी ११,८०० किलो तांदूळ चोरीला गेल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली असता त्यांनी त्वरित येथे येऊन तपासणी केली व तक्रार नोंदविली. छत्तीसगड येथून आलेला माल आर.पी.एफच्या हद्दीत येत असल्याने येथे अन्न महामंडळाचा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला नव्हता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. वास्को रेल्वेच्या क्षेत्रातून अशा प्रकारे अन्न महामंडळाचा माल मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याने येथील सुरक्षेबाबत शंका निर्माण झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे.

पणजीतील कदंब बसस्थानकावरील रिक्षा स्ँटडजवळील मारुती मंदिराचा तिसरा वर्धापनदिन सोहळा देवस्थान समितीतर्फे विविध कार्यक्रमांनिशी साजरा केला जात आहे. (छाया : सुनील नाईक)

पाकमध्ये आत्मघाती हल्ल्यात ६ सैनिक ठार

इस्लामाबाद, दि. ४ : पाकिस्तानच्या इस्लामाबाद या राजधानीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयाजवळील जीना सुपर मार्केटच्या परिसरात आत्मघाती दहशतवाद्यांनी आज रात्री उशिरा चढवलेल्या हल्ल्यात फ्रंटियर कोअर ("एफसी') या निमलष्करी दलाचे सहा सैनिक ठार झाले असून पाच जखमी झाले आहे; तर "एफसी'ने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.
जेथे हल्ला झाला तेथे अनेक महत्त्वाच्या आस्थापनांची कार्यालये, अतिमहनीयांची निवासस्थाने व फ्रंटीयर कोअरच्या सैनिकांची छावणी आहे. दहशतवाद्यांनी या छावणीला लक्ष्य करण्यासाठी बॉम्बस्फोट केला. त्यानंतर एफसीच्या सैनिकांनी लगेच कारवाई केली. त्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला घेरले आहे. नागरिकांना बाहेर काढून आणखी दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध सुरू आहे. शहरातील सर्व इस्पितळांना जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
इस्लामाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच एफसीच्या सैनिकांची मोठी तुकडी इस्लामाबादहून पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर जाणार आहे. या तुकडीतील सैनिकांना दहशतवाद्यांशी लढण्यासाठी इंग्लडचे सैनिक इस्लामाबादमध्येच विशेष प्रशिक्षण देत आहेत. हे प्रशिक्षण थांबावे आणि एफसीच्या सैनिकांमध्ये घबराट पसरावी या उद्देशानेच दहशतवाद्यांनी हल्ला केला.
दरम्यान, या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेला जोरदार दणका बसला आहे. तेथे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉंबस्फोटांची मालिकाच सुरू झाली आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर झालेल्या हल्ल्यानंतर लाहोरमध्ये नव्यानेच पोलिस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला होता. त्यापाठोपाठ हा ताजा हल्ला झाला आहे.

बैतुल्लाने स्वीकारली न्यूयॉर्क गोळीबाराची जबाबदारी

अमेरिकन हल्ल्याला तालिबानचे प्रत्युत्तर
इस्लामाबाद, दि. ४ : न्यूयॉर्क बिगॅम्टनच्या इमिग्रेशन सेंटरवर झालेला हल्ला मी घडवून आणला असून संपूर्ण अमेरिकेला हादरवणारे "ते' तालिबानी अतिरेकी होते, असे शनिवारी स्पष्ट करून तालिबानचा क्रूरकर्मा कमांडर बैतुल्ला महसूदने १४ निरपराध व्यक्तींचे प्राण घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवर ड्रोन विमानांद्वारे तालिबानी अतिरेकी शिबिरांवर अमेरिका करत असलेल्या हल्ल्यांना हे प्रत्युत्तर असल्याचेही तो म्हणाला. अमेरिकेवर हल्ला करण्याची धमकी काही दिवसांपूर्वीच बैतुल्लाने दिली होती. या हल्ल्यासंदर्भात अमेरिकन गुप्तचर संस्थांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच बैतुल्ला उगाच फुशारकी मारत असल्याचे मत व्यक्त करताना जोपर्यंत सबळ पुरावा हाती येत नाही तोपर्यंत कोणावरही संशय व्यक्त करणे शक्य नसल्याची सावध प्रतिक्रियाही काही संरक्षण तज्ज्ञांनी दिली आहे.
बैतुल्लाच्या या कबुलीजबाबामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याचे आता स्पष्ट झाले असून "फुल प्रूफ' अमेरिकेला तालिबानने पुन्हा एकदा जोरदार हादरा दिला आहे. तालिबानी कमांडरने एका वृत्तसंस्थेला अज्ञात स्थळावरून पाठविलेल्या संदेशात इमिग्रेशन सेंटरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. शुक्रवारी हा दहशतवादी हल्ला असावा असा कयास वर्तविला जात होता. अमेरिकेने तालिबानी ठिकाणांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून मीच या हल्ल्याचा कट रचला होता, असेही बैतुल्लाने सांगितले. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा अभिमान बाळगणाऱ्या अमेरिकेसाठी हा हल्ला खरेच धक्कादायक बाब असून पुन्हा एकदा महाशक्तीच्या सुरक्षेबद्दल संशय निर्माण झाला आहे. भरदिवसा गजबजलेल्या व महत्त्वाच्या ठिकाणी हा हल्ला झाल्यामुळे नागरिकही भयभीत झाले आहेत.
न्यूयॉर्कजवळ असलेल्या बिगॅम्टन शहरात स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास तीन अतिरेक्यांनी हा हल्ला केला होता. अत्याधुनिक रायफल हाती घेतलेला "हिरव्या' रंगाच्या जॅकेटमधील एक तरुण भीषण गोळीबार करीत इमिग्रेशन सेंटरमध्ये घुसला. त्याने व त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी ४० जणांना ओलीस ठेवले. या गोंधळादरम्यानच घाबरून सैरावैरा पळणाऱ्या १५ जणांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंतर या अतिरेक्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. प्रारंभी गोळीबार करणारा माथेफिरू तरुण असावा असे वाटत होते. परंतु, आता हल्ला तालिबान्यांनी केल्याचे उघड झाले आहे.