Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 25 October, 2008

भाजपचे सरकारविरोधी २९ पासून आंदोलन

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार केवळ अंतर्गत भांडणात व्यस्त असून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे.प्रशासकीय पातळीवर सर्वत्र गोंधळ माजला असून राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट बनली आहे.मंत्रिमंडळातील सदस्यांतच एकवाक्यता नसल्याने ही परिस्थिती कायम राहणे राज्यासाठी धोकादायक असल्याने राज्यपालांनी तात्काळ हस्तक्षेप करावा,अशी मागणी भाजप करणार असल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर या सरकारविरोधात येत्या २९ पासून राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक व साळगावचे आमदार दिलीप परूळेकर हजर होते.सध्या पाळी पोटनिवडणूक जाहीर झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.सरकार चालवण्यासाठी जी संयुक्त जबाबदारी स्वीकारावी लागती ती विद्यमान सरकारात अजिबात दिसत नसून घटनात्मक जबाबदारी पेलण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यपाल एस.एस.सिद्धू यांना याप्रकरणी पुराव्यासह निवेदन सादर करणार असून त्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावयायचा आहे,असेही पर्रीकर म्हणाले.
राज्यात "कॅसिनो'जुगारी जहाजांना विरोध होत असताना आता मांडवी नदीत नव्या कॅसिनोचे आगमन होत आहे.भाजपने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केल्याने आता या विरोधात कायदेशीर तथा रस्त्यावरील आंदोलनाची रणनीती आखली जाणार असल्याचे ते म्हणाले."सेझ'रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झाली खरी; परंतु सेझ धोरणाची अधिसूचना रद्द करण्याबाबत चालढकल सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.मेगा प्रकल्पाबाबतचा वाद सोडवण्यासाठी सरकारकडून काहीही प्रयत्न होत नसल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला.विधानसभा अधिवेशनानंतर मुख्यमंत्री कामत यांनी बैठक बोलावली व सप्टेंबरपर्यंत अहवाल तयार करण्याचे ठरवले.आता महिना उलटायला आला तरी पुढे काहीही नाही अशी खंतही त्यांनी केली.
कचऱ्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विधानसभेत समिती स्थापन करण्यात आली परंतु जागांची पाहणी करायला सरकारकडून कुणालाही सवड मिळत नाही. सहावा वेतन आयोग लागू करण्याचे सरकारने ठरवले असले तरी केंद्राच्या धरतीवर तो लागू करणे राज्य सरकारला शक्य झाले नाही त्यात सगळी थकबाकी भविष्यनिर्वाह निधीत जमा करण्याचा निर्णय घेतल्याने राज्याची आर्थिक स्थिती किती बिकट बनली आहे त्याचे उघड समर्थन आहे,असेही पर्रीकर म्हणाले.एकीकडे हिंदूंच्या धार्मिक स्थळांची तोडफोड व मूर्तिभंजनाचे प्रकार वाढत असून आत्तापर्यंत कॉंग्रेसच्या राजवटीत २१ हिंदू व ७ ख्रिस्ती धार्मिक स्थळांबाबत असे प्रकार घडले आहेत.एकीकडे मंत्र्यांच्या मुलावर पोलिसांनी पोलिस तक्रार दाखल करून घेणे,एका मंत्र्यांकडून आपल्याच सहकारी मंत्र्यांवर अपात्रता याचिका दाखल करणे,आमदारांवर आरोपपत्र दाखल होणे आदी प्रकारांमुळे या सरकारने जनतेची पूर्ण सहानुभूती गमावली असून अशा सरकारला सत्तेेवर राहण्याचा कोणताच अधिकार नसल्याचे पर्रीकर म्हणाले.
प्रत्यक्षात राज्यपालांकडे निवेदन सादर केल्यानंतर ते याप्रकरणी केंद्राला कळवणार असून घटनेप्रमाणे घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरलेले राज्य सरकार बरखास्त करण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असल्याचेही पर्रीकर म्हणाले.

माथानी आदर्श लोकनेते : पर्रीकर

कासावली येथे थाटात साठावा वाढदिवस
वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): सर्व संप्रदाय, पक्ष, धर्म व विविध संस्थांच्या लोकांनी एकत्र येऊन माथानी साल्ढाणा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने यातूनच माथानींचे मोठेपण दिसून येते. माथानी हे स्पष्टवक्ते लोकनेते असून गोव्याच्या व गोमंतकीयांच्या हितासाठी त्यांनी अमौलिककाम केले आहे. यापुढेही ते असेच काम करत राहतील व त्याकरता त्यांना मी दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज कासावली येथे केले.
माजी पर्यटनमंत्री तथा कुठ्ठाळीचे माजी आमदार माथानी यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेशन ऑफ पीपल स्ट्रगल्सतर्फे आयोजित त्यांच्या सत्कार समारंभाला श्री. पर्रीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर गजानन नाईक, फ्रान्सिस रॉड्रिगीस, निमंत्रक ख्रिस्तोफर फोन्सेका, सायमन कार्व्हालो, फादर रिबेलो, ऍड. आनाक्लेत व्हिएगश, आग्नेलो रॉड्रिगीस, बेर्नादो सापेको व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री साल्ढाणा यांची पत्नी श्रीमती एलिना साल्ढाणा यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना पर्रीकर म्हणाले की, माथानीसारख्या गोमंतकीय भूमीच्या पुत्राने सदाकाळ येथील जनहितासाठी काम केले असून गोव्यात जर प्रामाणिक नेता दाखवण्याची संधी आपल्याला मिळाल्यास आपण क्षणाचाही विलंब न करता माथानींचा उल्लेख करू, असे ते म्हणाले.
माथानी सारखा लोकनेता जनहितासाठी दिवसाचे १६ तास कार्य करत असून त्यांना अशाच रितीने कार्ये करण्यासाठी आपण देवाशी प्रार्थना करत आहोत. ३५ वर्षांपूर्वी गोव्यातील जनतेला सुरक्षिततेची पूर्ण खात्री होती; मात्र आता ती राहिलेली नाही. ते दिवस पुन्हा आणण्यासाठी माथानी यांच्यासारखे नेते गोव्याच्या जनतेने निवडण्याची गरज असल्याचे पर्रीकर म्हणाले.
सत्काला उत्तर देताना माथानी म्हणाले, गोमंतकीयांनी धर्म, जात पात, सर्वकाही बाजूला ठेवून गोमंतकीय म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. तसे झाल्यासच गोवा सुरक्षित राहिल. अन्यथा सर्वत्र
अंधकार पसरण्याची भीती संभवते. जनतेने कुठल्याच दबावाखाली न येता विचार करण्याची गरज आहे.
जनतेला काहीच फायदा होत नाही ती प्रगतीच नव्हे. आपला याला सातत्याने विरोध असणार आहे, असे ते म्हणाले. गोव्यामध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारींमध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिसांना पुरेशी मोकळीक कारवाईसाठी मिळत नाही. पोलिसांना त्यांचे काम करू द्या नंतर खूप सुधारणा होईल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. गोव्याला सध्या जन्मलेल्या राक्षसांच्या तावडीतून वाचवण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. येथील जमीन बिगरगोमंतकीयांना विकण्यावर बंदी घालणाऱ्या कायद्याची गरज असल्याचे साल्ढाणा म्हणाले. तसेच आपला भव्य सत्कार केल्याबद्दल समितीचे आभार मानले.
कामगार संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर फोन्सेका, प्रा. प्रजल साखरदांडे, फादर एरामितो रिबेलो, आग्नेलो रॉड्रिगीस (रापणकार संघटनेचे अध्यक्ष) ज्युलियो डिसिल्वा (गावभावाचो एकवोट समितीचे अध्यक्ष) दत्ता दामोदर नाईक, कामिनी कुणयकर व इत्यादींची भाषणे झाली.
यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या हस्ते माथानी यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माथानी यांनी अनेक जनहिताच्या हक्कासाठी चळवळीत भाग घेतला व आज रापोणकार समितीच्या वतीने रेंदेरकार समितीच्या वतीने कुणबी गावडा वेळीप धनगर समितीच्या वतीने अशा अनेक संप्रदायांच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून माथानी यांचा सत्कार यावेळी केला. सुरुवातीला माथानी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. डॉ. विल्फ्रेड मिस्किता, शिवसेनेचे प्रमुख उपेंद्र गावकर तसेच इतर मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

'संभवामि युगे युगे'महानाट्य राज्यात ८ पासून

केरी-फोंड्याच्या विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळाची निर्मिती
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित "संभवामि युगे युगे' या महानाट्याचा शुभारंभी प्रयोग येत्या ८ नोव्हेंबर रोजी फर्मागुडी फोंडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून १४ नोव्हेंबरपर्यंत या महानाट्याचे त्याच मैदानावर एकूण सात प्रयोग होणार आहेत. बाबासाहेब पुरंदरेंच्या "जाणता राजा'नंतर विशाल स्वरूपाची अशी ही पहिलीवहिली व आगळीवेगळी महान गोमंतकीय कलाकृती आहे.
विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ केरी फोंडा या संस्थेने या महानाट्याची निर्मिती केली असून मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी या महानाट्याचे गोव्यातील वेळापत्रक आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. या महानाट्यासाठी भव्य दिव्य रंगमंच उभारण्यात येत असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरदिवशी संध्याकाळी सात वाजता प्रयोगांना सुरुवात होणार असून सुमारे आठ ते दहा हजार प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था व वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सदर संस्थेने २००२ साली बाबासाहेब पुरंदरेंच्या "जाणता राजा' या महानाट्याचे गोव्यात यशस्वी आयोजन केले होते. त्या अनुभवाच्या आधारे या संस्थेने आता महानाट्य निर्मितीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. कृष्ण जीवनाविषयी समाज प्रबोधन व गोव्यातील कला व कलाकार सातासमुद्रापार नेण्याच्या हेतूने या महानाट्याची निर्मिती केल्याचे अध्यक्ष देसाई यांनी स्पष्ट केले. या महानाट्यासाठी एकूण दीड कोटी खर्च अपेक्षित असून अनेक दात्यांनी मंडळाचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हातभार लावल्याचे ते म्हणाले.
या महानाट्याच्या रंगमंचाची लांबी २४ मीटर असून उंची १८ मीटर आहे. शिवाय भव्य दिव्य अशा रंगमंचाला ६ मजली इमारतीचे स्वरूप देण्यात आले असून हा रंगमंच फिरता, सरकता व उचलता येण्यासारखा असल्याने त्याच्या या नावीन्यामुळे तो अधिक आकर्षक ठरला आहे. शिवाय रंगमंचावर गाई, गुरे, हत्ती, घोडे यांचा प्रत्यक्ष वावर असल्यामुळे भगवान कृष्णाच्या जीवनावरील जीवनपट रसिकांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या महानाट्यामुळे लाभणार आहे. या महानाट्याचे प्रयोग केवल गोव्यातच नव्हे तर भारतभरात व भारताबाहेरही करण्याची तयारी संस्थेने ठेवली आहे.
गेल्या दोन वर्षापासून या महानाट्याची निर्मिती सुरू होती. त्यासाठी मंडळाच्या सदस्यांच्या बैठकाही होत होत्या. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून रंगमंच उभारणीला सुरुवात झाली होती अशी माहितीही अध्यक्ष देसाई यांनी दिली. या महानाट्यासाठी दात्यांकडून घेतलेला निधी दोन वर्षांच्या आत त्यांना आम्ही सव्याज परत करणार असून तसे हमीपत्रही त्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या महानाट्याच्या लेखनाची बाजू डॉ. नारायण देसाई यांनी सांभाळली असून त्यासाठी त्यांनी दोन वर्षे श्रीकृष्ण जीवनावर भरपूर वाचन व चिंतन केले आहे. वास्तविक कृष्णाच्या एकेका अध्यायावर एक महानाट्य होऊ शकते. मात्र येथे त्याचा जन्म ते प्रस्थानादरम्यानचा प्रवास केवळ तीन ते चार तासांच्या शब्दबद्ध करून महानाट्याचे लेखन करण्याचे आव्हान आपल्यासमोर होते असे डॉ. देसाई म्हणाले.
संगीतकार अशोक पत्की यांनी या महानाट्याच्या संगीताची बाजू सांभाळली असून दिलीप देसाई यांचे महानाट्याला दिग्दर्शन लाभले आहे. या महानाट्याला दयानंद भगत यांचे नेपथ्य तर दिगंबर सिंगबाळ यांची वेशभूषा लाभली आहे. तसेच प्रभाकर पणशीकर, करवीर शंकराचार्य स्वामी, मोहन वाघ, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, श्रीमती अल्का वेलिंगकर, पद्मश्री प्रसाद सावकार या दिग्गजांचे मार्गदर्शनही या महानाट्याला मिळाले आहे.
व्दारका, गोकुळ इत्यादींचे दर्शन घडवतानाच प्रेक्षकांना महाभारतकालीन वातावरणात नेण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने नेपथ्यकाराने विविध वाचनालये, संदर्भ स्थळांना भेटी दिल्या असून अथक व सखोल संशोधनातून नेपथ्य निर्मितीचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या नाट्याच्या आयोजनासाठी प्रा. भूषण भावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० स्वयंसेवक कार्यरत असून त्यांच्या वेगवेगळ्या ३२ समित्या नेमण्यात आल्या आहेत.
आजच्या पत्रकार परिषदेला रंगमंग निर्मिती प्रमुख राजीव देसाई, रंगमंच साहित्य प्रमुख संतोष देसाई, मंडळाचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र देसाई, लेखक डॉ. नारायण देसाई, प्रमुख समन्वयक प्रा. भूषण भावे उपस्थित होते.

मच्छीमारी नौका उलटून बेतूलला एकजण बुडाला, अन्य दोघे बचावले; वादळी लाटेचा तडाखा

मडगाव, दि. २४(प्रतिनिधी): बेतूल समुद्रात काल उत्तररात्री एक मच्छिमारी नौका उलटून झालेल्या दुर्घटनेत उत्कर्ष पारोडकर (२८) हा बेपत्ता झाला असून त्याच्याबरोबर असलेले अन्य दोघे जखमी झाले. बुडालेल्या उत्कर्ष याचा शोध आज (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत सुरू होता. तथापि, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
उत्कर्ष (बाप्सोरा-बेतूल), दीपक पेडणेकर (२८ ) व नयन पेडणेकर (३२) (कारवार)े असे तिघेही काल सायंकाळी होडी घेऊन बेतूल बंदरातून मच्छिमारीसाठी गेले होते. मच्छिमारी करून रात्री दीडच्या सुमारास परतताना एका मोठ्या लाटेचा तडाखा बसून त्यांची होडी उलटली. त्यामुळे तिघेही पाण्यात फेकले गेले. त्यापैकी दीपक व नयन हे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले. त्यात ते जखमीही झाले. उत्कर्ष मात्र बुडाला.
दीपकच्या डोक्याला मार बसला असून त्याच्यावर खाजगी हॉस्पितळात उपचार सुरू आहेत. नयन याला प्राथमिक उपचारांनंतर घरी जाऊ देण्यात आले. कुंकळ्ळी पोलिस तपास करीत आहेत. यंदांचा मच्छिमारी हंगाम सुरू झाल्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच दुर्घटना आहे.

खंडपीठाची सरकारला नोटीस पोलिस यंत्रणेवर कडक ताशेरे

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): अल्पवयीन जर्मन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गोव्यातील मंत्र्याचे पुत्र व पुतण्या गुंतल्याचे आरोप झाल्याने देशविदेशात गाजत असलेल्या या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला आज नोटीस बजावली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार व न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी "सुमोटो' जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली आहे. १४ ऑक्टोबरला गुन्हा नोंद होऊनही अद्याप कोणालाच चौकशीसाठी ताब्यात घेतले नसल्याने खंडपीठाने पोलिस खात्यावर जोरदार ताशेरे ओढले आहे. या संपूर्ण प्रकरणात किती चौकशी झाली, याचा संपूर्ण अहवाल दि. २७ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयात सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्याचे तपासकाम अन्य दुसऱ्या "तपास यंत्रणेकडे का देऊ नये, अशी विचारणाही खंडपीठाने केली.
२ ऑक्टोबर रोजी त्या पीडित मुलीच्या आईने कळंगुट पोलिस स्थानकावर रोहित मोन्सेरातच्या विरोधात तक्रार दाखल केला होता. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सदर तक्रारीची दखल घेऊन नोंद केली. आज २४ ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तक्रारीची नोंद झाल्यानंतर तपास अधिकाऱ्याने त्याचा त्वरित तपास लावणे केवळ आवश्यक नसून ते बंधनकारक असल्याचे मतप्रदर्शन यावेळी खंडपीठाने केले. रोहित मोन्सेरात नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पुतण्या वॉरन आलेमाव याच्यावरही आरोप झाल्यानंतर पोलिसांनी अद्याप कोणालाच चौकशीसाठी ताब्यात घेतले नसल्याची दखल खंडपीठाने घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण अन्य यंत्रणेकडे तपासासाठी का सोपवू नये, असा प्रश्न करून खंडपीठाने सरकारला नोटीस बजावली आहे.
तक्रार दाखल झाल्यापासून रोहित मोन्सेरात भूमिगत झाला असून पोलिसांनी त्याला चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

आणखी दोघांना बेळगावात अटक, मुख्य सूत्रधाराची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार

ऍड. आयरिश हल्लाप्रकरण
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): ऍड. आयरिश रॉड्रिगीस आणि प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार संदीप वायंगणकर याची ब्रेन मॅपिंग व लाय डिटेक्टर चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी आज प्रथम वर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली असता, त्यांना ती देण्यात आली आहे. या हल्ल्यासाठी कोणी सुपारी दिली होती हे त्यानंतर उघड होईल, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ला प्रकरणात काल रात्री बेळगाव येथून आसिफ बडिगर (२४) व अस्लम बडिगर (२२) या दोघांना पणजी पोलिसांनी काल रात्री एका ठिकाणी लपून बसलेले असताना अटक केली. त्यामुळे याप्रकरणी अटक केलेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे.
आसिफ व अस्लम या दोघांना व जेनिटो व्हिन्सेन कुतिन्हो याला न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे; तर अन्य संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पाचपैकी आसिफ व अस्लम यांचा प्रत्यक्ष हल्लयात सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर शब्बीर गुजराती व जेनिटो व्हिन्सेन कुतिन्हो (१८) यांचाही या हल्लयात सहभाग आहे. तसेच संदीप वायगणकर याने हल्लेखोरांची त्या रात्री अशोक बार अँड रेस्टॉरंटच्या ठिकाणी भेट घेतली होती, अशी माहिती पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली.
आतापर्यंतच्या पोलिस चौकशीत संदीप वायगणकर याने हा कट रचला होता, असे उघड झाले असून त्याला हे कृत्य करण्यासाठी कोणी पाठवले होते, याची चौकशी सुरू आहे.
संदीप याला बोलते करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील असून त्याच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी त्याला कोणत्याही क्षणी पोलिस मुंबईला घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या हल्ला प्रकरणात सामील असलेले चौघे हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा करतानाच अजून एकाला अटक होईल, असे जॉर्ज यांनी सांगितले.
या प्रकरणी १४ ऑक्टोबर पासून या प्रकरणात पोलिसांनी अकरा जणांना अटक केली असून त्यातील पाच जणांचा प्रत्यक्ष हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. १३ ऑक्टोबर रोजी जेनिटो हा जीए ०१ एस ६१०५ या क्रमांकाच्या निळ्या मारुती कारमधून पाच हल्लेखोरांना घेऊन अशोक बारच्या ठिकाणी आला होता. त्यानंतर त्याठिकाणी त्यांना संदीप वायगणकर भेटायला आला. त्यावेळी त्यांच्यात काय बोलणे झाले, हे उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर संदीप हा शब्बीर गुजरातीला घेऊन अशोक बारच्या एका खिडकीकडे गेला. तेथूनच त्याने तेथे बसलेल्या चौघांपैकी ऍड. आयरिश कोण, याची माहिती करून दिली. त्यानंतर जेनिटो, अस्लम, आसिफ, शब्बीर व आणखी एक तरुण, असे पाच हल्लेखोर त्या हॉटेलात रात्री १०.३० सुमारास शिरले. सर्वांनी बुरखे घातले होते. त्यातील एकाने ऍड. आयरिश यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. हल्ल्यानंतर सर्वजण पळत या निळ्या मारुती कारमधून पळून गेले. ही कार जेनिटो चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हल्लेखोरांनी वापरलेली हत्यारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संदीप याच्या वाहनातून एक कुकरी (नेपाळी चाकू) पोलिसांनी हस्तगत केली आहे. हा चाकू या हल्ल्यात वापरण्यात आला होता का, हे सिद्ध करण्यासाठी सदर चाकूची वैद्यकीय चाचणीसाठी पाठवला जाणार असल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.
यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणात अँथनी बार्रेटो (सांव पावलू - ताळगाव), नॉर्मन जॉन ऊर्फ बॉचो (व्हडलेभाट- ताळगाव ) व संदीप तुकाराम वायंगणकर (टोंक - करंजाळे) याना अटक केली होती. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वरला अटक केली होती.
जेनिटो व्हिन्सेन कुतिन्हो (१८), संदेश चक्रवर्ती शिंदे (१८), मायकेल जॉन्सन चकल (२३), संदीप कृष्णा पुजारी (१८) एनिसन व्हिक्टर नुनीस (२३) त्यानंतर चिंबल येथून शब्बीर गुजराती यांना अटक करण्यात आली होती. काल अजून दोघांना अटक झाली.
ऍड. आयरिश व प्रजल यांच्यावर हल्ला करणाऱ्या या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्यासह पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस, उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त, ब्राज मिनेझीस, विश्वेश कर्पे व पणजी पोलिस स्थानकाचे "एलआयबी' पथकाने परिश्रम घेतल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.

Friday 24 October, 2008

जर्मन मुलीवरील अत्याचार प्रकरण चर्चिल यांचा पुतण्याही गुंतल्याचा आरोप

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): 'त्या' जर्मन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांचा पुत्र रोहित मोन्सेरात याच्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पुतण्या वॉरन आलेमाव हाही गुंतल्याचा आरोप आज ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी केला. याविषयीचे ठोस पुरावे आपल्या हाती लागले असून ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांना वॉरनविरोधात वेगळ्या तक्रारीची गरज भासल्यास तीही दिली जाणार असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी त्याच्याबरोबर त्या पीडित मुलीची आईसुद्धा उपस्थित होती.
सध्या पोलिसांनी आपल्यावरील हल्ला प्रकरणाचा छडा लावत आणला असून बलात्कार आणि अश्लील एसएमएस प्रकरणाच्या तक्रारीवर चौकशी आठ दिवसांत पुढे गेली नाही तर बाल न्यायालयात दाद मागितली जाईल, असे ऍड. रॉड्रिगीस यांनी स्पष्ट केले.
त्या अल्पवयीन मुलीबरोबर वॉरन याची विचित्र अवस्थेतील छायाचित्रे मिळाली आहेत. काही दिवसापूर्वी ती एका संकेत स्थळावरही होती. तक्रार दाखल होताच ती तेथून काढण्यात आली. आता ती छायाचित्रे उपलब्ध करण्यासाठी त्या संकेतस्थळाच्या संपर्कात पोलिस असल्याची माहिती ऍड. रॉड्रिगीस यांनी दिली. त्याचप्रमाणे आज सकाळी त्या मुलीचा "ई मेल आयडी' पोलिसांना देण्यात आला असून त्यातूनही अनेक अश्लील "मेल' हाती लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अशा प्रकारच्या गुन्ह्यात मुलीची वैद्यकीय चाचणी होणे महत्त्वाचे असून पोलिसांनी ती चाचणी जरूर करावी, त्यासाठी त्या मुलीच्या मान्यतेची गरज नसून तिच्या आईने तिच्या वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी दिली असल्याचे ते म्हणाले. तसेच चर्चिल आलेमाव यांनी त्या अल्पवयीन पीडित मुलीबद्दल आणि तिच्या आईबद्दल अपशब्द वापरले असून त्यांनी त्वरित त्यांची माफी मागावी, अशी मागणीही ऍड. रॉड्रिगीस यांनी केली आहे.
मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा त्यांनी केला. विवादास्पद पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने आपणास चारित्र्याचाच्या गोष्टी शिकवण्याची आवश्यकता नाही. माणसाकडून चुका होतात. एखादा विषय हाताळताना आपल्याकडूनही चूक झाली असावी. तथापि, आपले व्यवहार पारदर्शक असल्याचे ऍड. रॉड्रिगीस म्हणाले.
सदर जर्मन महिला वकील पत्र घेऊन पणजीत एका नामवंत वकिलाकडे गेली होती. तथापि, त्याने बाबूश मोन्सेरात यांचे नाव वाचून वकिलपत्र घेण्याचे नाकारले. त्यानंतर त्यानेच आपले नाव सुचवले व आपण तिचे वकिलपत्र घेतले, असा खुलासा ऍड. रॉड्रिगीस यांनी केला.

वायको यांना अटक

चेन्नई, दि.२३ : लिबरेशन टायगर्सच्या कारवायांचे समर्थन करणारे प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी एमडीएमकेचे अध्यक्ष वायको यांना आज अटक करण्यात आली.
यापूर्वीही वायको यांनी लिट्टेंच्या समर्थनार्थ भाषण दिले होते. त्यावेळी राज्यात अण्णाद्रमुकचे सरकार होते. लिट्टेंच्या समर्थनाचे भाषण ठोकल्याबद्दल त्यांच्यावर पोटा लावण्यात आला होता. अण्णाद्रमुकचे सरकार गेल्यानंतर त्यांची मुक्तता झाली. पण, आता पुन्हा त्यांनी लिट्टेंच्या समर्थनार्थ भाषण करीत प्रक्षोभक विधाने केली. एकीकडे लिट्टेविरुद्ध दक्षिण भारतीय आणि तामिळांमध्ये असंतोषाचे वातावरण धूमसत असतानाच वायको यांच्या भाषणाने त्यात भर घातली आहे. त्यामुळे वायको यांना लगेचच अटक करण्यात आली.

निर्देशांक पुन्हा १० हजारांखाली दोन वर्षातील मोठी घसरण

मुंबई, दि.२३ : गेल्या दोन वर्षातील मोठी घसरण नोंदवित आज मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक पुन्हा दुसऱ्यांदा १० हजारांखाली उतरला.
एरवी भारतीय गुंतवणूकदारांच्या शेअर्स विक्रीमुळे बाजारात संकट उभे राहिले असताना आज विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला काढले. त्यामुळे गेल्या पाच दिवसात मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक दुसऱ्यांदा १० हजारांखाली आला. ३० शेअर्सवर आधारित निर्देशांकात आज दिवसअखेर ३९८.२० अंकांची घसरण होऊन तो ३.९२ टक्क्यांनी खाली आला. आज तो ९७७१.७० वर बंद झाला. यापूर्वी ही पातळी २० जून २००६ मध्ये गाठली होती. आज दिवसभरात निर्देशांक ९६८१.२८ इतका खालच्या तर १०,२६०.५५ इतक्या वरच्या स्तरावर पोहोचला होता.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज १२२ अंकांची घसरण झाली. आज तो २९४३.१५ वर बंद झाला. दिवसभरात आज निफ्टी २९१७.१५ इतका खाली आला होता.
जपान दौऱ्यावर असताना काल पंतप्रधानांनी जागतिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात का होईना परिणाम होईल, असे वक्तव्य दिल्याने आज शेअर बाजारात घबराट पसरली. आजच्या दिवसाची सुरुवात मंदीने झाल्याने अर्थमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे गुंतवणूकदारांना न घाबरण्याचा दिलासा दिला. पण, आज त्यांच्या वक्तव्यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता बदलली नाही आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली आहे.
बाजारात सर्वाधिक भाग-भांडवल असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजला आज सर्वाधिक फटका बसला. २००६ नंतर आज प्रथमच रिलायन्सचे शेअर्स १०० रुपयांनी घसरले. ही घसरण ७.६२ टक्के इतकी होती. त्यापाठोपाठ इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञानातील मोठ्या कंपनीला तोटा झाला. त्यांचे शेअर्स १.३५ टक्क्याने खाली आले. धातू क्षेत्र आज विक्रीच्या दबावाखाली होते.
मुंबई शेअर बाजारातील ३० पैकी २४ कंपन्यांचे शेअर्स आज तोट्यात राहिले. केवळ सहा कंपन्या फायद्यात राहिल्या. त्यात ग्रासीम इंडस्ट्रीज, भेल, एचडीएफसी बॅंक, लार्सन ऍण्ड टूब्रो, ओएनजीसी आणि टाटा कन्सल्टन्सी यांचा समावेश होता.

बिहारमधील गुंडागर्दी सुरूच

पाटणा, दि. २३ : महाराष्ट्रातील रेल्वे परीक्षेदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मार खावून परतलेल्या बिहारमधील विद्यार्थ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पाटणा येथे गोंधळ घालणे सुरू केले आहे. हा गोंधळ आज गुरुवारीही कायम होता. या विद्यार्थ्यांनी आपला रोष रेल्वे वाहतूक आणि रेल्वे संपत्तीवर काढल्यामुळे रेल्वे प्रशासनाला आपल्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्याचे नवे वेळापत्रक तयार करावे लागले. अनेक गाड्यांचे मार्गही वळविण्यात आले.
मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे नालंदा निवासी पवनचे निधन झाल्यामुळे नालंदा जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला.
सावधगिरीचा मार्ग म्हणून पाटणा येथून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पूर्व मध्य रेल्वेच्या दिनापूर विभागातील काही रद्द गाड्या नंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि त्यांचे वेळापत्रक बदलवून सोडण्यात आल्या. पाटणा-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आणि संपूर्ण क्रांती एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्या मात्र रद्द करण्यात आल्या.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी करीत अनेक बिहारी विद्यार्थ्यांनी आपल्या राज्यात विविध ठिकाणी धुमाकूळ घातला. आज सकाळी लखीसराय आणि मोतिहारी रेल्वे स्थानकावर संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड केली आणि रेल्वे वाहतूकही रोखून धरली. मोतिहारी येथे झाझा-पाटणा ट्रेन रोखण्यात आली. तर लखीसराय रेल्वे स्थानकावर हावडा-कठगोदाम एक्स्प्रेस थांबवून घेण्यात आली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गाड्यांमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे लखीसरायचे पोलिस अधीक्षक श्रीवेश्वर प्रसाद शुक्ल यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे रेल्वे संपत्तीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा नेमका आकडा आताच सांगणे कठीण असले तरी तो करोडोच्या वर आहे, असे दारापूर रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रणजित सिंग यांनी सांगितले.
पवनच्या निधनामुळे संतप्त झालेल्या नालंदा येथील रहिवाशांनी आज कडकडीत बंद पाळला. या लोकांनी आपला राग अनेक दुकानांची आणि वाहनांही तोडफोड करून व्यक्त केला. हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे, असे नालंदाचे पोलिस उपअधीक्षक मो. अब्दुल्ला यांनी सांगितले. आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली असल्याचे त्यांनी सांगितले.

चांद्रयान-१ चे कार्य व्यवस्थित : इस्रो

बंगलोर, दि. २३ : भारताच्या चंद्रावरील पहिल्या मोहिमेअंतर्गत सोडण्यात आलेल्या चांद्रयान-१ चे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे भारतीय अंतराळ अनुसंधान संस्थेच्या (इस्रो) तंत्रज्ञांनी सांगितले. सध्या तरी हे यान आणि प्रक्षेपक समाधानकारकरित्या काम करीत आहे, असेही ते म्हणाले.
अंतराळाकडे काल झेप घेतलेले हे यान योग्य पद्धतीने काम करीत आहे, असे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या यान अंतराळाकडे जात असताना त्याचे सर्व नियंत्रण इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग ऍण्ड कमांड नेटवर्कच्या माध्यमातून केले जात आहे.
बुधवारी २५५ किमीच्या पेरिजी (जमिनीपासूनचा सर्वात जवळचा बिंदू) आणि २३ हजार किलोमीटरच्या अपोजीच्या (जमिनीपासूनचा सर्वात दूरचा बिंदू) अंडाकार कक्षेत आपल्या पीएसएलव्ही सी-११ या प्रक्षेपकासह चांद्रयान-१ ने प्रवेश केला आहे. या पीएसएलव्ही सी-११ प्रक्षेपकाच्या साह्यानेच चांद्रयान-१ ने काल बुधवारी पहाटे श्रीहरिकोटा येथून अंतराळाकडे झेप घेतली होती. चंद्राच्या कक्षेत हे यान ८ नोव्हेंबरपर्यंत दाखल व्हावे यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यानाला लागून असलेल्या लिक्विड एपोजी मोटरमध्ये (एलएएम) वारंवार मारा करीत आहे.

आठवड्याभरात इंधनाचे भाव कमी होणार : देवरा

नवी दिल्ली, दि.२३ : जागतिकस्तरावर कच्च्या तेलाचे भाव उतरल्यामुळे येत्या आठवड्याभरात आपल्याही देशातील इंधनाचे भाव कमी करण्याचा विचार सरकार करीत आहे, असे पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी आज लोकसभेत सांगितले. इंधनाचे भाव कमी झाले तर ती सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीची भेट ठरणार आहे.
या संदर्भात सध्या अभ्यास सुरू आहे आणि येत्या आठवड्याभरात तशी घोषणा केली जाईल, असेही देवरा म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आलेल्या एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात देवरा यांनी ही माहिती दिली. जागतिक स्तरावर आलेल्या मंदीमुळे कच्च्या तेलाची मागणी घटली आहे. परिणामस्वरूप त्याचे भावही खाली आले असून आज जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा एक पिंप ६७ डॉलरचा झाला आहे. १४७ डॉलरवर प्रतिपिंपावरून घसरून ही किंमत ६७ डॉलरपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळेच संपुआ सरकारने भाव कमी करण्याच्या आपल्या आश्वासनांची पूर्तता करावी आणि इंधनाचे दर कमी करावे, अशी मागणी सदस्यांनी केली होती.
सदस्यांच्या या मागणीवर बोलताना देवरा यांनी आठवड्याभरात किमती कमी होण्याचे संकेत दिले आहे. इंधनाच्या किमती कमी झाल्यास महागाईचा दर कमी होण्यासाठीही त्यामुळे मदत मिळेल, असेही देवरा यांनी म्हटले आहे. बसपाचे सदस्य ब्रजेल पाठक यांनी सरकारला विचारणा केली की, शेतकऱ्यांना नि:शुल्क डिझेल उपलब्ध करून दिले जाणार आहे काय. त्यावर देवरा यांनी सांगितले की, सध्या विविध पेट्रोलियम पदार्थांवर सबसिडी देण्यात आली आहे. या उत्तरावर बसपा सदस्याचे समाधान झाले नाही. पेट्रोलियम मंत्र्यांच्या असमाधानकारक उत्तरामुळे नाराज झालेल्या बसपा, डाव्या आणि रालोआच्या सदस्यांनी त्यांच्या उत्तराकडे दुर्लक्ष करून बहिर्गमन केले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचाही दर हळूहळू खाली घसरू लागला आहे. ११ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर ११.०७ होता. त्याआधी हा दर ११.४४ होता. गेल्या आठवड्यात प्राथमिक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा दरही खाली येण्यास मदत झाली आहे, असे उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.
१६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्याअखेर देशातील महागाईचा सर्वोच्च दर १३.८२ टक्के नोंदला गेला होता. या आधीचा विक्रम १४.४० टक्के होता.

अडवाणी यांची सभा लांबणीवर

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार आणि संसदेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांची पणजीतील आझाद मैदानावर येत्या १ नोव्हेंबर रोजी होणारी जाहीर सभा आचारसंहिता लागू झाल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. पाळी मतदारसंघात येत्या २६ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमुळे गोव्यामध्ये निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे ही जाहीर सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी.

Thursday 23 October, 2008

राज ठाकरेंची सुटका, जामीन व अटकपूर्व जामीनही मंजूर

- २४ ऑक्टोबरपर्यंत दिलासा
- "मनसे'मध्ये प्रचंड जल्लोष
- सरकारचे मनसुबे विफल

मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी): रत्नागिरीत काल पहाटे अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (बुधवारी) सायंकाळी कल्याण येथे जामिनावर सुटका झाली. त्याचबरोबर त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत अटकपूर्व जामीनही मिळाल्याने त्यांची लगेच होणारी अटकही टळली आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्‌या प्रकरणांत अडकवण्याचा महाराष्ट्र सरकारचा डाव तूर्त फसला आहे.
ज्या प्रकरणात राज यांना कालची रात्र डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात काढावी लागली होती, त्या प्रकरणात कल्याणच्या न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देत नंतर जामीन मंजूर केला. तसेच कल्याण सत्र न्यायालयाने दोन दिवसांचा अंतरिम अटकपूर्व जामीन दिला व त्यावरील सुनावणी २४ ऑक्टोबरला ठेवली आहे. परिणामी तोपर्यंत राजला अटक करणे पोलिसांना शक्य होणार नाही.
ठिकठिकाणी गुन्ह्यांची नोंद
दरम्यान, राज यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे नोंदविण्याचा सपाटा लावला आहे.मुंबईत कांजूरमार्ग येथे, ठाण्यात, पंढरपुरात, फलटणमध्ये, साताऱ्यात, जालना भागात १०-१२ ठिकाणी, सोलापूर जिल्ह्यात ६ ठिकाणी, जळगाव जिल्ह्यात ३ आणि नाशिक जिल्ह्यात ४ ठिकाणी मिळून एकूण सुमारे ३० गुन्हे राजविरुद्ध नोंदविण्यात आले आहेत.
अशा प्रकारे हेतुपूर्वक गुन्हे नोंदविले जात असतील तर त्याविरुद्ध आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा राज यांचे वकील अखिलेश चौबे यांनी दिला आहे.
हे सर्व गुन्हे आणि राज्याबाहेरीलही या विषयावरील गुन्हे राज्यातील एकाच न्यायालयात चालवण्याची विनंती करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पत्नीचे पोलिस ठाण्यापुढे धरणे
कालची रात्र राज यांनी मानपाडा पोलिस ठाण्याच्या कच्च्‌या कैदेतच घालविली. आज सकाळी त्यांची पत्नी शर्मिला व इतर नातेवाईक त्यांना भेटायला गेले असता, पोलिसांनी एकट्या शर्मिला यांनाच आत सोडण्याची तयारी दाखविली. याचा निषेध म्हणून त्यांनी बराच वेळ ठाण्याबाहेर धरणे धरले. शेवटी, दुपारी दोनच्या सुमाराला राज यांना कल्याणच्या न्यायालयात नेण्यापूर्वी या पती-पत्नीची भेट घडवून आणण्यात आली.
नंतर सौ.शर्मिला कल्याणच्या न्यायालयात गेल्या. तेथे जामीन व अटकपूर्व जामीन मिळून राजची सुटका झाल्यानंतर त्यांना सोबत घेऊनच त्या दादरमधील "कृष्णकुंज' निवासस्थानी परतल्या. तेथे राजच्या मातोश्री कुंदाताई, पत्नी व इतर महिलांनी ओवाळून राजचे स्वागत केले, तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद साजरा केला.
दिवसभर संदिग्धता
कालच्याप्रमाणेच आजही राज यांना पुन्हा अटक केली जाते की काय, अशी शक्यता सकाळपासूनच व्यक्त होत होती. जामीन मिळाला नाही किंवा पुन्हा अटक झाली तर पुढे काय, असा प्रश्नही विचारला जात होता.
दुपारी राज यांना कल्याणच्या न्यायालयात आणण्यात आले त्याचवेळी रेल्वे पोलिसांचे एक पथक तेथे पोचले. कल्याण व ठाणे रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनांच्या संदर्भात या दोन्ही रेल्वे पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. डोंबिवलीच्या प्रकरणात न्यायालयाने राज यांना जामीन दिला तर लगेच आपण कोठडी मागायची, या तयारीतच ते आले होते. तथापि, आम्ही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे व त्यावर सुनावणी सुरू आहे. तेव्हा थोडा वेळ वाट पाहावी, अशी विनंती राज यांच्या वकिलांनी केली व न्यायालयाने ती मान्य केली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अंतरिम स्वरूपात मंजूर करून राजला २४ पर्यंत अटक करण्यास पोलिसांना मनाई केली. याबरोबरच राज यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर मनसे कार्यकर्त्यांच्या मनावरील दिवसभराचा ताण निवळला.

ऍड. आयरिश हल्ला प्रकरण एका संशयिताने जबाबदारी स्वीकारली, मुख्य सूत्रधार लवकरच जाळ्यात

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): ऍड. आयरिश व प्रजल यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची जबाबदारी पहिल्याच रात्री अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांपैकी एकाने स्वीकारली असून उद्या गुरुवारपर्यंत या संपूर्ण नाट्याचा पर्दाफाश होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी आज दुपारी दोघा तरुणांना अटक करण्यात आली, तर अजून अन्य तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. हल्ल्याचा कट ताळगाव येथील एका बंगल्यात शिजल्याचेही त्या संशयिताने पोलिसांना सांगितले. ही सुपारी कोणी दिली होती, त्याचे नाव उघड करण्याच्या तयारीत पोलिस असून उद्या पर्यंत मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात येण्याची दाट शक्यता आहे.
१३ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान ऍड. आयरिश व प्रजल यांच्यावर बुरखाधारी हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर १४ च्या पहाटे पणजी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती. त्यान्वये अँथनी बार्रेटो (सांव पावलू - ताळगाव), नॉर्मन जॉन ऊर्फ बॉचो (व्हडलेभाट- ताळगाव ) व संदीप तुकाराम वायंगणकर (टोंक - करंजाळे) या संशयितांना अटक केली होती. त्यापैकी एकाने या कटाची माहिती आज पोलिसांसमोर उघड केली.
ऍड. आयरिश यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे नाव आज मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्या संशयिताने हे काम आपल्याच मार्गदर्शनाखाली झाल्याची कबुली दिली असून त्या अन्य हल्लेखोरांनाही आपणच पैसे दिल्याचे त्याने उघड केल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसापूर्वी या तिघांना सामान्य वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले असता, त्यांना "गोमेकॉ'त दाखल करून घेण्यात आले होते. त्यांना तेथे कोण-कोण भेटायला आले होते, या दृष्टीनेही सध्या पोलिस तपास करीत आहेत.

'गोवादूतचे भवितव्य उज्ज्वल' दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): 'गोवादूत'ची आजपर्यंतची वाटचाल आणि विशेषांकांचा दर्जा पाहाता, या दैनिकाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती संचालक निखिल देसाई यांनी आज "गोवादूत'च्या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले.
"गोवादूत'च्या मुख्यालयात झालेल्या या विशेष कार्यक्रमात "दिवाळी विशेषांक २००८'चे प्रकाशन श्री.देसाई यांच्या हस्ते झाले. या अंकातील वैविध्य आणि मांडणी याची प्रशंसा श्री. देसाई यांनी केली. "भावबंध' विषयावरील ललित लेखन स्पर्धेचे परीक्षण केलेले प्रा. कृष्णाजी कुलकर्णी हे यावेळी खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्यांनी लेखनस्पर्धेचा आढावा घेताना ३४ स्पर्धकांमध्ये २४ महिलांनी भाग घेतल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विषय देऊन लेखकांना लिहिते करण्याचा "गोवादूत'चा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील दिवाळी अंकाच्या तोडीचे दर्जेदार अंक आता गोव्यातही प्रकाशित होत असून त्यात "गोवादूत'च्या दिवाळी अंकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.
संपादक राजेंद्र देसाई यांनी स्वागत केले. संचालक सागर अग्नी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. दिवाळी अंकाचे संपादक अशोक नाईक तुयेकर उर्फ पुष्पाग्रज यांनी प्रास्ताविकात "गोवादूत'च्या आजपर्यंतच्या विशेषांकांना मिळालेल्या वाचकांच्या जोमदार प्रतिसादाचा आढावा घेतला. निखिल देसाई व प्रा.कुलकर्णी यांच्या हस्ते लेखन स्पर्धेतील विजेत्या सौ.लक्ष्मी जोग, गुरुदास नावेलकर व सौ.सुचिता सामंत यांना बक्षिसे देण्यात आली.
"गोवादूत'च्या संचालक ज्योती धोंड यांनी आभार मानले. यावेळी व्यवस्थापक विलास कामत, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, प्रा. रवींद्र घवी तसेच गोवादूतचे कर्मचारी उपस्थित होते.

पाळी मतदारसंघाची पोटनिवडणूक २६ ला

पणजी,दि.२२(प्रतिनिधी): पाळी मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या २६ नोव्हेंबर रोजी घेण्याची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली.यासंबंधी आज २२ ऑक्टोबरपासून उत्तर गोव्यात आचारसंहीता लागू करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले असून गोवा राज्यासंदर्भात ही आचारसंहिता केंद्र सरकारलाही लागू होईल,असेही आदेशात म्हटले आहे.
गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अजित श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. पाळीचे आमदार प्रा.गुरूदास गावस यांचे ४ जून २००८ रोजी निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.माजी आरोग्यमंत्री तथा भाजपचे माजी आमदार डॉ. सुरेश आमोणकर यांना पराभूत करून कॉंग्रेसचे उमेदवार प्रा.गावस पहिल्यांदाच या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. तथापि त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांना एक वर्षही आमदार म्हणून कार्य करण्याची संधी लाभली नाही.प्रा.गावस यांच्या निधनानंतर आता कॉंग्रेसमध्ये त्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा या मतदारसंघासाठी केलेली नाही.
--------------------------------------------------------------
२९ रोजी मतमोजणी
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार १ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. ८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून १० रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १२ रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २६ रोजी मतदान होईल. मतमोजणी २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.

भारतीय चांद्रयान झेपावले

श्रीहरिकोटा, दि. २२ : आज बुधवारी पहाटे सहा वाजून २२ मिनिटांनी "चांद्रयान-१' यशस्वीरित्या झेपावले. भारताने आजवर अनेक उपग्रह अवकाशात झेपावले असले तरी चंद्राकडे झेपावणारे हे पहिलेच मावनविरहीत यान असल्यामुळे देशाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणून या क्षणाची नोंद होईल. विश्वातून या चंद्र अभियानाचे स्वागत झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) हजारो संशोधकांबरोबरच कोटयवधी भारतीयांचीही या क्षणाकडे नजर होती.
हे उड्डाण यशस्वी व्हावे म्हणून श्रीहरीकोटात इंजिनीअर आणि स्पेस सायंटिस्टची धावपळ सुरु होती. नियोजित वेळेनुसार श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरचे दुसरे लॉंचपॅडवरुन आज सकाळी ६.२२ मिनिटांनी चांद्रयान-१ ने आकाशाकडे झेप घेतली. चांद्रयान-१च्या यशस्वी उड्डाणामुळे या अभियानात समाविष्ट असलेल्या भारतीय संशोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. इतिहास रचलेल्या या चांद्रयानाबरोबर भारताचा तिरंगा पाठवण्यात आला आहे.

देव तारी तिला...

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): 'देव तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय आज सायंकाळी पेडण्यातील एका ३१ वर्षीय तरुणीला आला. तिने मांडवी नदीच्या पुलावरून आपली जीवनयात्रा संपवण्यासाठी उडी मारली खरी; परंतु साडीचे "पॅराशूट' झाल्याने ती पाण्यावर तरंगत राहिली. त्याचवेळी त्वरित मरिन पोलिसांनी धाव घेऊन तिचे प्राण वाचवले. सध्या तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. एका विद्यालयात ती संगणक हा विषय शिकवत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सायंकाळी पाचच्या सुमारास ती मांडवीच्या पुलावर आली. तिने आपली पर्स, छत्री व आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट करणारीचिठ्ठी तेथे ठेवली. त्यानंतर कोणाला काही कळायच्या आतच तिने पुलावरून उडी घेतली. मात्र, साडीचा फुगा झाल्याने ती पाण्यावर तरंगत राहिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेऊन तिचे प्राण वाचवले.
याविषयीचा तपास पणजीचे उपनिरीक्षक प्रज्योत फडते करीत आहेत.

Tuesday 21 October, 2008


राजधानीत एरवी गजबजलेला हा परिसर कडकडीत बंदमुळे असा सुनसान बनला होता. (छाया: ज्योती धोंड)

राज्यात अभूतपूर्व 'बंद'

'न भूतो न भविष्यती' असा प्रतिसाद; सरकारचे अपयश उघड
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): राज्य सरकारच्या दबावाला बळी भीक न घालता आणि १४४ कलम ठोकरून लावत मंदिर सुरक्षा समितीने पुकारलेल्या "गोवा बंद'ला सर्व घटकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. म्हापसा, सांगे, काणकोण याठिकाणी किरकोळ तणाव सोडल्यास बंद कसा शांततेने व शिस्तीने पार पाडता येतो हेच गोवेकरांकडून आज दाखवून दिले. तणाव निर्माण झाल्याने म्हापसा येथे १२, डिचोलीत २ तर काणकोण येथे एकाला अटक करण्यात आली. तसेच म्हापसा पोलिस स्थानकासमोर धरणे धरलेल्या जमावावर सौम्य लाठीमार करण्यात आला. सांगे येथे मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्यावर टाकून रस्ता अडवण्यात आला. तसेच म्हापसा येथे तीन, मडगाव येथे दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली तर, कोलवा येथे एका टॅक्सीवर दगडफेक झाली. काणकोण येथे रस्त्यावर तीन टॅंकरच्या टायरमधील हवा काढण्यात आल्याने कारवार - मडगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
सकाळी बसेस बंद असल्याने अनेकांनी आपल्या खाजगी वाहनांनी पणजी गाठली. मात्र पणजीतील सरकारी कार्यालये सोडल्यास सर्व आस्थापने बंद होती. त्यामुळे दुपारनंतर साऱ्या शहरात सन्नाटा पसरला होता. कदंब बसस्थानकावर तुरळक प्रवासी पाहायला मिळत होते. राजधानीतील केवळ दोन हॉटेल्स सोडल्यास बाकी सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. यावेळी राज्य सरकारने मंदिर सुरक्षा समितीने पुकारलेला गोवा बंदची हाक मोडून काढण्यासाठी जय्यत तयारी ठेवली होती. तथापि, सरकारच्या या प्रयत्नांना सपशेल अपयश आल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळाले. मालकवर्ग आपल्या दुकानांकडे फिरकलाच नाही. त्यामुळे पोलिस संरक्षणातही सरकारला दुकाने उघडता आली नाहीत. पणजीत हॉटेल "नवतारा' व "कासा मुट्टो' ही दोन्ही हॉटेल पोलिस संरक्षणात खुली ठेवण्यात आली होती. त्यामुळे सायंकाळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हॉटेलमधे घुसून मालकाला कडक इशारा दिल्याने काही प्रमाणात तणाव निर्माण झाला.
त्याचप्रमाणे म्हापसा, फोंडा व वास्को या मार्गावर एकही खाजगी बस धावली नाही. अधूनमधून वातावरणाचा कानोसा घेतला असता तुरळक प्रमाणात कदंब बसेस रस्त्यावर धावत होत्या. मात्र सकाळी १०.३०च्या दरम्यान म्हापसा, त्यानंतर काणकोण याठिकाणी कदंब बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे नंतर कदंब वाहतुकही जवळपास बंद पडली. म्हापशात नवतारा हॉटेलच्या मालकाने बंदला आव्हान देत ते खुले ठेवल्याने म्हापसा तेथे तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिस व जमाव आमने सामने आल्याने जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्या. त्यामुळे काही आंदोलकांना अटक झाल्याने संतप्त जमावाने पोलिस स्थानकासमोर धरणे धरले. तेथे पुन्हा तणाव निर्माण झाल्याने जमावावर सौम्य लाठीहल्ला करण्यात आला.
दरम्यान, ठिकठिकाणी आज सकाळी सहा वाजता मंदिरात एकत्र येऊन हिंदूंनी घंटानाद केला. तर, सायंकाळी सहा वाजता पुन्हा पणजीतील बसस्थानकावर मारुती मंदिरात महाआरती करून बंदची समाप्ती करण्यात आली.
शहरातील पेट्रोल पंप बंद असल्याने सायंकाळी सर्व पेट्रोल पंपवर प्रचंड मोठी रांग लागली होती. मळा येथील पेट्रोल पंप मात्र दिवसभर पोलिस संरक्षणात सुरू होता.
-----------------------------------------------------------------
या बंदची झळ आज पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीही बसली. अनेक परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेवर पोचले नसल्याने तसेच सर्वच बसेस बंद ठेवल्याने शेवटी गोवा शालांन्त मंडळाने दहावी व बारावीची आजची पुरवणी परीक्षा पुढे ढकलली. तसेच साळगावकर कायदा महाविद्यालयानेही आजची परीक्षा पुढे ढकलली आहे.
मारुती मंदिरात महाआरती
सायंकाळी पणजी कदंब बसस्थानकावर असलेल्या मारुती मंदिरात महाआरतीनंतर मंदिर सुरक्षा समितीचे समन्वयक राजेंद्र वेलिंगकर म्हणाले, बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याने हा गोव्यातील हिंदू समाजाचा तसेच गोव्यातील राष्ट्रवादी ख्रिस्ती व मुस्लिमांचा विजय म्हटला पाहिजे. धार्मिक सलोखा टिकवायचे कार्य मंदिर सुरक्षा समितीने शिस्तबद्धरीत्या केले आहे. आजचा "बंद' हा केवळ एक झलक असून यापुढे खरा संग्राम आहे. येत्या मार्च ०९ पर्यंत साडेतीन हजार कार्यकर्ते संपूर्ण गोव्यात योग, संस्कार तसेच सुरक्षा या विषयाचा प्रचार करणार असून मंदिरे ही शक्तिपीठे बनवण्याचा निर्धार समितीने केला आहे.
आजच्या बंदमुळे जेवढे नुकसान झाले आहे, त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. काहींनी आज बंदला आव्हान देऊन आपली आस्थापने उघडी ठेवली. त्यांनी गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याची टीका श्री. वेलिंगकर यांनी केली.
राज्यात अजूनही मंदिरांची विटंबना सुरूच असून "बंद'च्या आदल्याच दिवशी कुळे येथे एका मंदिरातील मूर्तींची मोडतोड करण्यात आली. या प्रकरणांचा शोध लावण्यास सरकार निष्क्रिय ठरल्याची टीका त्यांनी केली.

म्हापशात 'बंद'ला हिंसक वळण

म्हापसा, दि. २० (प्रतिनिधी): म्हापसा शहरात "बंद'ला आज हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीमारत हुनमंत (बाळू) वारंग, स्वप्निल शिरोडकर, श्री. शेटगावकर असे तिघे जखमी झाले. तसेच सुमारे ३०० लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संतप्त जमावाने कदंबच्या तीन बसेसच्या काचा फोडल्या. त्यामुळे दिवसभर शहरात तणावपूर्ण वातावरण होते.
खोर्ली येथील देवी सातेरीच्या मंदिरात सुमारे साठ भाविकांनी सकाळी आरती केली. नंतर म्हापसा टॅक्सी स्टॅंडवर सामूहिक आरती करून मारुती मंदिरसमोर लोक जमायला सुरवात झाली. म्हापसा बाजार पेठ, हॉटेल्स, आस्थापने पूर्ण बंद होती. त्यातच सकाळी दुधाची गाडी न आल्याने लोकांना गोवा डेअरीचे दूध मिळू शकले नाही. परिणामी लहान मुलांचे हाल झाले. म्हापसा बाजारपेठ, मासळी बाजार, भाजी मार्केट बंद असल्याचे पाहून
अन्य कोणीच आपली दुकाने उघडण्याचे धाडस केले नाही. सकाळी आठ वाजल्यावर बाहेर गावांहून येणाऱ्या कदंबच्या गाड्या येण्यास सुरवात झाली. तथापि, परंतु कदंब स्टॅंडवर या गाड्या प्रवेशद्वारावरच रोखून प्रवाशांना खाली उतरण्यास भाग पाडले गेले. नंतर रोमन फूड, पोशाख, व नवतारा हॉटेल्स काही काळ उघडे होते. ते दगडफेक करून बंद पाडण्यात आले. नवतारा हॉटेलचे मालक कार्लुस तावारो म्हणाले, आपण २२ वर्षे या व्यवसायात आहोत. या कालवधीत आपण कधीच आपले हॉटेल बंद ठेवले नव्हते. तुम्ही आपले हॉटेलची मोडतोड केलीत आणि आता हॉटेल बंद करा म्हणून का सांगता तेव्हा त्यानी पोलिस बंदोबस्त मागवला व हॉटल सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच लोकांनी हॉटेलवर मोर्चा नेला व ते बंद ठेवण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांना लाठीमार करावा लागला. लाठीमार करताच वातावरण चिघळले तेव्हा लोकांनी रस्त्यावर टायर जाळले आणि रस्त्यावर अडथळे निर्माण केले. पोलिसांनी नवतारा हॉटेलपाशी बंदोबस्त ठेवला होता. लोक ते हॉटेल बंद करण्याची मागणी करत होते व दगडफेक झाल्याने हॉटेलचे नुकसान झाले.
दरम्यान विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला असता गैरसमजातून व स्वरक्षणासाठी सौम्य लाठीमार करावा लागल्याबद्दल पोलिसांनी जनतेची क्षमा मागितली. त्यानंतर वातावरण शांत झाले. त्यानंतर मात्र नवतारा हॉटेल बंदच होते.
सकाळी ग्रीनपार्क हॉटेलजवळ सुमारे १०० ते १५० लोकांनी जमून महामार्गावर धावणारी वाहने रोखली. त्यावेळी काही वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. परिणामी
११ ते १२ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व म्हापसा पोलिसात आणून त्यांना कोठडीत टाकले. त्यांच्याविरुद्ध १५१ कलमाअंतर्गत गुन्हा नोदवण्यात आला. त्यांना अटक का केली व त्यांची तातडीने सुटका करा या मागणीसाठी म्हापसा पोलिस ठाण्यासमोर ३०० ते ४०० लोकांचा जमाव जमला होता. तेथेच त्यांनी सामूहिक आरती म्हणण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिस स्थानकावर आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा, नगराध्यक्ष सौ. स्नेहा भोबे, माजी आमदार सदानंद शेट तानावडे, नगरसोविका वैशाली फळारी, उज्ज्वला कांदोळकर, मिलिंद आर्लेकर, रोहन कवळेकर उपस्थित होते. नंतर अटक केलेल्या ११ जणांना न्यायालयात हजर करून प्रत्येकाची तीन हजार रुपयांच्या हमीपत्रावर सुटका करण्यात आली. मग म्हापसा पोलिस ठाण्यावर जमलेला जमाव पांगण्यात सुरवात झाली. नंतर हा मोर्चा नवतारा हॉटलेकडे वळला. हे हिंसक प्रकार वगळता बंद सुरळीत पार पाड पडला. नगरसेवक आशिष शिरोडकर, जीवन मयेकर, संजय वालावलकर, अच्युत वेर्णेकर, अजय पडते, सदाशिव सामंत, सिद्धेश सर्जेराव, नारायण सावंत, विवेकानंद हळर्णकर, परेश रायकर याप्रसंगी उपस्थित होते.

कुळ्यातही मूर्तिभंजन, उलगम्मा देवीच्या विटंबनेमुळे लोक खवळले

काले, दि. २० (प्रतिनिधी): मूर्तिभंजनाच्या निषेधार्थ आज विविध संघटनांनी "गोवा बंद'ची हाक दिलेली असतानाच काल रात्री कुळे रेल्वेयार्डात असलेल्या उलगम्मा देवीच्या मूर्तीची काही अज्ञातांनी तोडफोड करून मुर्तीचा वरचा भाग नाहीसा केल्यामुळे लोकांत संतापाची लाट पसरल असून मूर्ती फोडण्याचे लोण आता कुळ्यापर्यंत पोहोचल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.
हिंदू देवतांच्या मूर्ती फोडण्याचे प्रकार राज्यात वाढत असून, हिंदू बांधव त्याविरोधात संतप्त झाले आहेत. काल रात्री काही अज्ञातांनी उलगम्मा देवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याप्रकरणी येथील कन्नड समाजाचे प्रमुख बाळप्पा चंद्रप्पा यळ्ळवी यांनी कुळे पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवली आहे. प्रामुख्याने कन्नड समाजासाठी हे जागृत देवस्थान असून तेथे रोज देवीची पूजा केली जाते. तसेच काही भाविक तेथे नवसही फेडतात.
बाळप्पा यांनी या तोडफोड प्रकणांतील संशयितांच्या त्वरित अटकेची मागणी केली आहे.
याप्रकरणी समाजसेवक नीलेश पंचवाडकर यांनी संताप व्यक्त करून या भागातील मंदिरांना पोलिसांनी संरक्षण द्यावे व पोलिस बंदोबस्त ताबडतोब वाढवावा, अशी मागणी केली आहे. जर पोलिसांनी २४ तासांत संशयितांना अटक केली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कुंकळ्ळीत उत्स्फूर्त बंद

कुंकळ्ळी, (प्रतिनिधी): अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीने पुकारलेल्या"गोवा बंद'ला आज कुंकळ्ळीत भरघोस प्रतिसाद लाभला. दसऱ्यादिवशीच येथील आजोबा राखणदेव घुमटीची तोडफोड केल्यापासून गेल्या अकरा दिवसांतील आजचा बंद हा बाजारकर व जनतेने उत्स्फूर्तपणे पाळलेला या भागातील चौथा बंद ठरला आहे.
बंद मोडून काढण्यासाठी सरकारने जरी आपली सारी यंत्रणा कामाला लावली व सर्व प्रकारच्या दबावतंत्राचा वापर केला गेला तरी जनतेच्या निर्धारापुढे सरकार अक्षरशः ढेपाळल्याचे दिसून आले. येथील बाजारातील आस्थापने उघडलीच गेली नाहीत . काही कदंब बसेसचा तुरळक अपवाद वगळता अन्य एकही बस रस्त्यावर उतरली नाही.रिक्षा वाहतुकही बंद होती. येथील शैक्षणिक संस्थांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करून सर्वांनाच दिलासा दिला. मासळी तसेच भाजी बाजारही बंद होता.
असोळणा, बेतूल,वेळ्ळी, कुटबण, रंगाळी सारख्या भागातही बंद प्रखरपणे जाणवला. असोळणा येथे सकाळी फक्त दोनच दुकाने उघडी होती, तथापि, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच सकाळी दहा वाजल्यानंतर तीदेखील बंद ठेवण्यात आली.
सायंकाळी प्रमुख नागरिकांच्या झालेल्या बैठकीत कुंकळ्ळी आंदोलनाचे नेते विशाल देसाई यांनी बंद शांततेने पार पडल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले.
-------------------------------------------------------------
ख्रिस्ती बांधवांचाही पाठिंबा
ख्रिस्ती बांधव बहुसंख्याक असलेल्या दक्षिण गोव्यातील वेळ्ळी, कुटबण, रंगाळी, बाप्सोरासारख्या भागातही दुकाने १०० टक्के बंद होती. दुपारी फातोर्डाचे आमदार दामू नाईक व भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते रुपेश महात्मे यांनी तेथे भेट देऊन "बंद'चा आढावा घेतला.

यशस्वी 'बंद' ही सरकारला सणसणीत चपराक : पर्रीकर

पणजी,दि.२०(प्रतिनिधी): संपूर्ण गोव्यात आजच्या बंदला सर्व थरातील जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेधच जनतेने केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.अत्यंत शांततापूर्ण व काही किरकोळ प्रकार वगळता लोक स्वेच्छेने या बंदमध्ये सहभागी झाले. परिणामी जमावबंदीचे १४४ कलम जारी करून हा बंद मोडून काढण्यास पुढे सरसावलेल्या सरकारचे थोबाडच फुटले आहे,असेही पर्रीकर म्हणाले.
पणजी येथे भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजप सरचिटणीस सुभाष साळकर उपस्थित होते.राज्यात बळाचा वापर करून बंदमध्ये सहभागी होण्यास लोकांना भाग पाडण्याचा प्रकार अजिबात घडला नाही हे या बंदचे वेगळे वैशिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. म्हापसा येथील एका हॉटेलाबाबत घडलेल्या प्रकार हा सदर हॉटेल मालकाने काही गुडांना लोकांवर हल्ला करण्यासाठी ठेवल्याच्या गैरसमजुतीतून घडल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुळात हा वाद मिटला असताना त्याबाबतची काहीही माहिती नसलेल्यांवर पोलिसांनी अचानक मागून लाठीहल्ला सुरू केल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे पर्रीकर म्हणाले.
कुंकळ्ळी येथे घुमटी तोडफोड केल्याप्रकरणी कर्नाटकातील एका वेडसर व्यक्तीला अटक करून वेडाच्या भरात तिनेहे कृत्य केल्याची कबुली पोलिसांकडून घेतली जात असताना गुडी पारोडा येथे अत्यंत हिंस्त्र पद्धतीने मुर्तींची तोडफोड होणे म्हणजे थेट गुन्हेगारांकडून पोलिसांना आव्हान देण्याचाच प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.१४४ कलम लागू केले तरी लोक सहजपणे घोळक्यानेफिरत होते. त्यात भर म्हणजे पोलिसांनी आदल्या दिवशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही लोकांना नोटीसा पाठवून "बंद'ला पाठींबा दिल्यास गुन्हा दाखल करण्याच्या नोटीसा पाठवल्याचा प्रकारही त्यांनी उघडकीस आणला.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुभाष साळकर यांच्या नावानेही नोटीस पोहोचल्याने या नोटीसा कोणाला पाठवल्या आहेत, त्याची पडताळणीही कोणी केली नसल्याची माहिती त्यांनी दिली. या लोकांत काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश असून काही लोक गोव्यातही नाहीत,असेही ते म्हणाले.
गुन्हेगारांनाच सरकारचे अभय
विद्यमान सरकारने मूर्ती तोडफोड प्रकरणी गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाचा कितपत फायदा होईल याबाबत पर्रीकर यांनी शंका व्यक्त केली. खुद्द सरकारकडूनच जर गुन्हेगारांना अभय मिळत असेल तर हे पथक कसली डोंबलाची चौकशी करणार, असा प्रश्न त्यांनी केला. गोव्यात बाहेरून आलेल्या लोकांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. तलवारसाठा प्रकरणात सहभागी असलेल्या व मोतीडोंगरावर वास्तव्य करणाऱ्या लोकांना मुख्यमंत्र्यांकडूनच सरंक्षण मिळते तेव्हा पोलिस तरी काय करणार,असे पर्रीकर म्हणाले.
आपण मुख्यमंत्री असताना अशा लोकांची चौकशी सुरू केली होती व त्याचमुळी तत्कालीन सरकारात मंत्री असलेले दिगंबर कामत अस्वस्थ झाले होते. तेथेच त्यांची खऱ्या अर्थाने कोंडी झाली होती, असा टोला पर्रीकर यांनी हाणला. सिमी व इंडियम मुजाहीद्दीनशी संबंधीत लोक भटकळ येथे कार्यरत आहेत. त्यामुळे गोव्यात भटकळ येथील लोक सध्या कुठे राहतात त्याचा शोध घेऊन त्यांची माहिती व पूर्वीचा इतिहास याचाही अभ्यास केला जावा,असेही पर्रीकर म्हणाले. हे सर्व प्रकार मडगावच्या आसपासच्या भागातच होतात याचाच अर्थ अशा लोकांना कोणाचेतरी सरंक्षण मिळते,असा आरोपही पर्रीकर यांनी केला.
सलोखा हीच दहशतवाद्यांसाठी अडचण
गोव्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व त्यामुळे या लोकांत कलह निर्माण करण्याचे कितीही जरी प्रयत्न झाले तरी त्यात दहशतवादी संघटनांना यश मिळत नाही. दरम्यान,राज्यात मूर्तिभंजनाचे सुमारे वीसाहून जास्त प्रकार घडले असतानाही येथे हिंदूंकडून कोणतेही हिंसक प्रकार घडले नाहीत. याचा अर्थ हे प्रकार असेच सुरू राहिल्यास हिंदू गप्प राहतील,अशी सरकारची इच्छा आहे काय,असा सवाल करून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठीच हा "बंद' पुकारण्यात आल्याचे पर्रीकरांनी स्पष्ट केले. गोव्यात जोपर्यंत धार्मिक सलोखा शाबूत आहे तोपर्यंत येथे दहशतवादी संघटना कार्यरत होऊ शकत नाहीत. तथापि, लोकांत दुही माजवण्याचा प्रयत्नच अशा घटकांकडून सुरू असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला.
------------------------------------------------------------
पर्रीकरांकडून लोकांचे आभार
आजचा (सोमवारचा) 'बंद' यशस्वी केल्याबद्दल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी भाजपतर्फे जनतेचे अभिनंदन केले असून याकामी सहकार्य केल्याबद्दल लोकांचे आभारही मानले आहेत. या "बंद'ला सर्व गोमंतकीयांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा म्हणजे विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराबाबत जनतेत पसरलेल्या असंतोषाचाच हा परिपाक असल्याचे प्रतिपादन पर्रीकर यांनी केले.

Monday 20 October, 2008


नयबाग पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून आलेल्या प्रवासी बसेल बंदमुळे अशा रखडल्या होत्या. (छाया: निवृत्ती शिरोडकर)

आज गोवा "बंद'

मूर्ती तोडफोडीच्या निषेधार्थ मंदिर सुरक्षा समितीची हाक

राज्यात १४४ कलम जारी


..सर्वत्र चांगल्या प्रतिसादाची चिन्हे
..विहिंप, भाजप, शिवसेना,बजरंग दलाचा पाठिंबा
..मडगावचे मार्केट बंद राहणार
..विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - राज्यात सरकारतर्फे हिंदूच्या भावनांची होणारी पायमल्ली व मंदिरावर होणारे वाढते हल्ले आणि मूर्तींची तोडफोड याविरुद्ध मंदिर सुरक्षा समितीने सोमवारी "बंद' यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे, तर राज्य सरकारने बंद उधळून लावण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आज दक्षिण गोव्याप्रमाणे उत्तर गोव्यातही जमावबंदी (१४४ कलम) लागू करण्यात आली आहे. उद्या "बंद'च्यावेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समितीने पुकारलेल्या "गोवा बंद'ला भारतीय जनता पक्ष, बजरंग दल, शिवसेना, तसेच विविध संप्रदाय, व्यापारी संघटना व अन्य राष्ट्रवादी संघटनांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे सरकारची धांदल उडाली आहे.
"बंद'वर नियंत्रण ठेवण्यासाठी आज दुपारी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक व वाहतूक विभाग पोलिस अधीक्षक यांनी स्वतंत्र बैठका घेऊन बंदोबस्ताची आखणी केली आहे. परंतु, संघटनांची तयारी पाहिल्यास उद्याचा बंद पूर्ण यशस्वी होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
"बंद'चा धसका घेऊन गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी आज पोलिस स्थानकावर संपर्क साधून माहिती करून घेतली. तर अनेकांनी आपल्या टॅक्सी चालकांशी संपर्क साधून उद्याचे पर्यटन रद्द केल्याची माहिती टॅक्सी चालकांनी दिली. काही पर्यटकांनी बंदचे कारण जाणून घेऊन उद्यासाठी हॉटेलमध्येच थांबून वेगळ्या पद्धतीने या बंदला पाठिंबा देण्याचे बोलून दाखवले.
दक्षिण गोव्यात अधिक प्रतिसाद
मडगाव, (प्रतिनिधी)- अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीने पुकारलेल्या गोवा बंदला उद्या सोमवारी संपूर्ण दक्षिण गोव्यात उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्याची चिन्हे आज बंदच्या पूर्व संध्येला स्पष्ट झाली. जिल्हा प्रशासनाने उद्या दिवसभरासाठी १४४ कलमाखाली जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे एक प्रकारे बंद यशस्वी होण्यास मदतच होईल असा अंदाज सवार्ंनीच व्यक्त केलेला असताना जिल्हा प्रशासन व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते एकंदर चिन्हे बंद स्वयंस्फूर्तीने होण्याची आहेत व तसे झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा विशेष प्रश्र्न उद्भवणार नाही.
जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी आज सायंकाळी आपल्या चेंबरमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीत उद्याच्या बंदच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीस पोलिस अधीक्षक ऍलन डिसा उपअधीक्षक उमेश गावकर , उपजिल्हाधिकारी उपस्थित होते . मडगावासाठी सरकारने ३०० जादा राखीव पोलिस पाठविल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
दक्षिण गोव्यातील प्रमुख अशी मडगावची बाजारपेठ तसेच गांधी मार्केट बंद रहाणार असल्याची घोषणा व्यापारी संघटनांनी केल्यामुळे शहरातील सारे व्यापारी व्यवहार थंडावणार आहेत तसेच सरकारने जरी संपूर्ण संरक्षण देण्याची घोषणा केलेली असली तरी त्यावर विसंबून न राहता प्रवासी बसेस सोडावयाच्या की काय ते परिस्थिती पाहून ठरविण्याचा पर्याय बसमालक संघटनेने घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक यांनी सांगितले. सरकारी मालकीच्या कदंब महामंडळाने वाहतूक चालू ठेवण्याची घोषणा केलेली असली तरी आजवरचा अनुभव पाहता ती प्रत्यक्षात येणे कठीण आहे.
उपजिल्हाधिकारी दीपक देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय योजल्याचे तसेच संवेदनक्षम अशा ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याची माहिती दिली. गोवा पोलिसांबरोबर आय आरपी दल तैनात केलेले आहे. तालुकावार दंडाधिकारी तैनात केलेले असून ते सर्व भागात नजर ठेवून वरचेवर परिस्थितीचा आढावा घेतील.

वाचन जगण्याची कला शिकवते - आशा काळे

महिला साहित्य संमेलनात मान्यवरांचा सत्कार
तिस्क उसगाव, दि.१९ (प्रतिनिधी)- " वाचन कसे जगावे हे शिकविते. साहित्याने मला जीवनात पुष्कळ बळ दिले. स्त्री हे जगदंबेचे रूप असून तिच्यात फार मोठी शक्ती आहे. स्त्रियांनी वाचन वाढविले पाहिजे. स्त्रियांची साहित्य निर्मिती झाली पाहिजे. नाटक ही जिवंत कला आहे.'असे प्रतिपादन अभिनेत्री श्रीमती आशा काळे (नाईक) मुंबई यांनी श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे व कला आणि संस्कृती खाते,गोवा यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ६ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनात फोंडा येथील गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहात उद्घाटक म्हणून आज सकाळी बोलताना केले.
" मी गोव्याची सून आहे याचा मला अभिमान आहे. नाटक हे फक्त नटांचे नसते त्यात प्रेक्षकांचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे साहित्य हे वाचकाचे असते. विविध साहित्यिकांच्या नाटकात मला काम करायला मिळाले.'असे त्या पुढे म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. लीना सोहनी (कोल्हापूर), विशेष अतिथी म्हणून नीलिमा बोरवणकर (पुणे), गिरिजा मुरगोडी (गोवा),स्वागताध्यक्षा नीला धेंपे, आयोजन समितीच्या अध्यक्ष माधवी देसाई, श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष सौ. लक्ष्मी जोग उपस्थित होत्या.
लीना सोहनी, आशा काळे (नाईक), नीलिमा बोरवणकर, गिरिजा मुरगोडी, नीला धेंपे,माधवी देसाई यांचा यावेळी गौरव सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ.शैलजा दाबके यांच्या चैत्र पालवी (ललित लेख), कु.निर्मला शिरोडकर यांच्या शब्द वेल (कविता संग्रह), सौ. गुलाब वेर्णेकर यांच्या काय भूललासी (ललित लेख), सौ. लक्ष्मी जोग यांच्या बकुळ फुले (ललित लेख),डॉ. सौ. पूर्णिमा ना. शे. उसगावकर यांच्या किशोरवयातील पोषण (आरोग्य विषयक माहिती देणारे पुस्तक) या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
प्रमोद साळगावकर, ज्योती कुंकळ्येकर (पहिल्या मराठी चित्रपट निर्मात्या), धनश्री जांबावलीकर (कोकणी ब्रेललीपीची निर्मिती) यांचा गौरव करण्यात आला.
"अनुवाद करणे ही कला व विज्ञान ही आहे. साहित्यात विविध प्रकार आहेत.साहित्यातील प्रत्येक प्रकाराची वेगळी प्रतिभा आहे.प्रत्येक माणसाच्या अंगात कला निर्मितीची ऊर्मी असते.त्या ऊर्मीतून पुढे कलाकार घडतो.मी अनुवाद करताना मला निखळ आनंद मिळतो.ज्यात उच्च प्रतीचा आनंद मिळतो ती गोष्ट आपण करावी. साहित्यिकाला वेगळी भाषा असते. अनुवादकाला भाषा नसते.'असे यावेळी बोलताना संमेलनाध्यक्षा प्रा. लीना सोहनी म्हणाल्या.
गिरिजा मुरगोडी, नीलिमा बोरवणकर यांची यावेळी भाषणे झाली.
"आम्ही पुरुषांचा आदर करतो. पुरूषाशिवाय स्त्री अधुरी आहे. साहित्य हा आमचा परमेश्वर आहे.आज जे समाजात चालले आहे त्यामुळे आपली शाश्वती आपण देऊ शकत नाही. दूरदर्शनमुळे वाचन संस्कृती नष्ट होऊ लागली आहे. दूरदर्शन संस्कृतीला कोपरा दाखवा व घराघरांत वाचन संस्कृती रुजवा. हा संदेश आमचे हे संमेलन देते.' असे यावेळी प्रास्ताविक व आपले मनोगत व्यक्त करताना आयोजन समितीच्या अध्यक्षा माधवी देसाई म्हणाल्या.
" स्त्री अवघ्या जगाची जननी आहे.जेथे स्त्रियांची पूजा होते, तिथे देवता नांदते असे आपली संस्कृती सांगते.संस्कार देण्यासाठी ज्ञान साहित्य देते.त्यासाठी स्त्रियांनी चांगले साहित्य वाचले पाहिजे.वाचन साहित्याच्या सहवासात रममाण होण्याची प्रेरणा आपल्याला देईल. स्त्रियांनी रचलेले साहित्य काळाच्या ओघाबरोबर अजरामर झाले आहे.' असे नीला धेंपे आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना म्हणाल्या.
२००७ -०८ या काळात श्री शारदा बाल वाचनालयात सर्वांत जास्त पुस्तके वाचणाऱ्या अनिश अजय धोपेश्वरकर, श्रीराज कृष्णा नाईक, सिद्धी मनोज सामंत यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गंगाधर गाडगीळ, दामू केंकरे, मनोहर हिरबा सरदेसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आशा शेट व साथींनी ईशस्तवन सादर केले. सूत्रसंचालन संगीता अभ्यंकर यांनी केले.

समाजविघातक शक्तींचा महिलांकडून निषेध

साहित्य संमेलनात ठराव संमत
फोंडा, दि. १९ (प्रतिनिधी)- गोव्यातील फोंडा, मडगाव, पणजी सारख्या भागात तरुणाईकडून घडणाऱ्या बलात्कार, अपहरण सारखी दुष्कृत्ये, भ्याड हल्ले करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या शक्तींचा निषेध करणारा ठराव ६ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात एकमताने संमत करण्यात आला आहे.
या समारोप कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष प्रा. लीना सोहनी, सौ. आशा काळे नाईक, माधवीताई देसाई, सौ. लक्ष्मी जोग उपस्थित होत्या. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. लीना सोहनी यांनी दिवसभरातील कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला.
या संमेलनातील ठराव श्रीमती माधवीताई देसाई यांनी मांडले. फोंडा, पणजी, मडगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. ह्या वाईट कृत्यांमध्ये तरुणाईचा जास्त सहभाग आहे. तरुणाईकडून केल्या जाणाऱ्या या विचित्र प्रकारांचा धिक्कार केला पाहिजे. महिलांनी या घटनांमुळे सावध होऊन संस्कृती रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे श्रीमती देसाई म्हणाल्या.
अशा ह्या वाईट कृत्यांना बळी पडलेल्या फोंडा भागातील एका युवतीने यापूर्वी आत्महत्या केलेली आहे. त्याच्या विरोधात आवाज न उठवता संबंधित मूक गिळून गप्प बसले. ह्या घटनांचा महिलांनी धिक्कार केला पाहिजे, असे सांगून श्रीमती देसाई म्हणाल्या की, पणजी येथे लोकशाहीचा गळा घोटण्याचा एका राज्यकर्त्याने केलेल्या प्रकाराचा निषेध केला पाहिजे. पणजी येथे अँड.आयरिश रॉड्रिगीस आणि प्रा. प्रजल साखरदांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आम्हांला लोकशाहीचा आदर करणाऱ्या राज्यकर्त्यांची गरज आहे, असेही श्रीमती देसाई यांनी सांगितले. सूत्रसंचालन संगीत अभ्यंकर यांनी केले. पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.

दिल्लीत मेट्रो रेल्वेचा पुल कोसळून ३ ठार, १५ जखमी

नवी दिल्ली, दि. १९ - येथील पूर्व दिल्ली भागात आज सकाळी ६.५५ वाजता मेट्रो रेल्वेचा पुल कोसळून झालेल्या अपघातात ३ जण ठार तर जवळपास १५ जण जखमी झाले आहेत.
येथील लक्ष्मी नगर परिसरातील विकास मार्गावर मेट्रो रेल्वेचा पुल बांधण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी अचानक या पुलाचा काही भाग कोसळला. पुलाखालून जात असलेली प्रवासी ब्लू लाईन बस (बस क्र. ३९) व अन्य वाहनचालकांवर पुलाचा काही भाग कोसळला यात तीन जण जागीच ठार तर अन्य जखमी झाले. जखमींना येथील जे.बी. पंत व अन्य इस्पितळात भरती करण्यात आले आहे.
दरम्यान दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ने(डि.एम.आर.सी) या घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले असल्याचे डि.एम.आर.सी चे प्रवक्ता अनुज दयाल यांनी सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी घटना स्थळाला भेट दिली असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित तातडीची बैठक घेतली आहे.
दिल्ली पोलीस आणि डि.एम.आर.सी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
दिल्ली २०१० साली होणाऱ्या राष्ट्रकू ल क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मेट्रो रेल्वेचे कार्य सुरू आहे.

जम्मू काश्मीरच्या निवडणुका जाहीर

नवी दिल्ली, दि. १९ -निवडणूक आयोगाने आपसातील मतभेद दूर ठेवत, आज जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले, त्यानुसार ही निवडणूक १७ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान सात टप्प्यात पूर्ण होईल. मुख्य निवडणूक आयुक्त एन.गोपालस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार लेह व कारगिल या बर्फाळ प्रदेशातील मतदान पहिल्या दोन टप्प्यात होईल.
दि. १७,२३, ३० नोव्हेंबर, ७,१३,१७ व २४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
भाजप, कॉंग्रेस तसेच नॅशनल कॉन्फरन्स या प्रमुख राजकीय पक्षांनी आजच्या घोषणेचे स्वागत केले आहे. निवडणुकीविषयीचा संभ्रम दूर झाला ही चांगली गोष्ट आहे, असे सांगून राज्यपालांच्या राजवटीपेक्षा लोकनियुक्त सरकार अधिक चांगले, अशी प्रतिक्रिया बहुतेक सर्वच पक्षांनी व्यक्त केली आहे, तर ही निवडणूक एक "फार्स'ठरणार असल्याचे फुटीरतावादी नेत्यांनी म्हटले असून हुरियत कॉन्फरन्स व जेकेएलएफ या पक्षांनी बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे. मिरवाईज, मलिक आदी नेत्यांनी केंद्रावर टीका करताना, मूळ समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हटले आहे.

नेर्लोन आल्बुकर्क यांची जबानी

ऍड. आयरिश व प्रजल हल्ला प्रकरण
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - ऍड. आयरिश रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळी माजी पोलिस उपनिरीक्षक नेर्लोन आल्बुकर्क घटनास्थळी उपस्थित असल्याने पणजी पोलिसांनी त्यांची जबानी नोंद करून घेतली. नेर्लोन यांनी आपल्या जबानीत काय सांगितले, ते उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
यापूर्वी स्कार्लेट खून प्रकरणात निलंबित झालेले माजी उपनिरीक्षक आल्बुकर्क त्या रात्री अशोक बार ऍंड रेस्टॉरंटमध्ये का गेले होते, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर येथील एका हॉटेलमधून अटक करून आणलेल्या तरुणांचीही ओळख परेड यावेळी श्री. आल्बुकर्क यांच्यासमोर करण्यात आली आहे. त्या तरुणांना आपण ओळखले नसल्याचे यावेळी नेर्लोन आल्बुकर्क यांनी आपल्या जबानीत सांगितल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
दि. १४ फेब्रुवारी २००८ रोजी ब्रिटिश युवती स्कार्लेट किलींग या तरुणीचा खून झाल्यानंतर तपास कामत हलगर्जीपणा केल्याच्या आरोप करताना "ऊठ गोंयकारा' या संघटनेचे प्रवक्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी उपनिरीक्षक आल्बुकर्क यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली होती. त्याचप्रमाणे आल्बुकर्क यांचे या प्रकरणात साटेलोटे असल्याचाही त्यांनी आरोप केला होता. त्यामुळे ऍड. आयरिश यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळी आल्बुकर्क स्वतःहून घटनास्थळी आले होते की, त्यांना कोणी दूरध्वनी करून बोलावून घेतले होते, या दृष्टिकोनातून सध्या पणजी पोलिस चौकशी करीत आहे.
महाबळेश्वर येथून अटक करून आणलेल्या पाचही संशयितांकडून अद्याप कोणतेच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले नाही, असे पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस यांनी सांगितले. तपासाच्या आखणीनुसार कोणतीही माहिती उपलब्ध झाल्यास या हल्ल्यामागील संपूर्ण गुपित उलगडणार असल्याचे उपअधीक्षक तावारीस म्हणाले.

Sunday 19 October, 2008

पारोडा येथे दोन मंदिरांत मूर्तिभंजन

अपराध्यांना पकडण्यासाठी २४ तासांची मुदत; अन्यथा रास्तारोको
कुंकळ्ळी, दि. १८ (प्रतिनिधी): येथील आजोबा देवाच्या घुमटीची मोडतोड होऊन एक आठवडा पूर्ण होण्याआधीच आज केपे तालुक्यातील पारोडा गावातील दोन मंदिरांमध्ये शिवलिंगांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणातील संशयिताला पकडण्यासाठी संतप्त जमावाने पोलिसांना २४ तासांची मुदत दिली असून पोलिस अपयशी ठरल्यास रास्तारोको करण्याचे लोकांनी ठरवले आहे. दरम्यान, अशा स्वरूपाच्या सततच्या प्रकरणांमुळे गोव्यातील कॉंग्रेसच्या राजवटीत हिंदू देवालये असुरक्षित बनल्याची भावना हिंदू समाजात बळावत चालली आहे.
गुडी पारोडा गावातील मुळे येथील श्री महादेव मंदिरांत काल मध्यरात्रीच्या सुमारास छपराची कौले काढून प्रवेश केला व आतील लिंगांची मोडतोड केली, लिंगामागील पितळी, प्रभावळही वाकवली गेली आहे. लिंगासमोरीलच्या नंदीच्या मुखावर घणाचे घाव घालून तो छिन्नविछीन्न करण्यात आला आहे. नंदी मुळापासून उखडण्यात आला आहे. तसेच उत्सवावेळी वाजवले जाणारे जाणार शिंग मोडून आवाराच्या भिंतीबाहेर फेकून देण्यात आले आहे. प्रभावळीवरील संगमरवरी गणेशमुर्तीची विटंबना करण्यात आली आहे. देवालयाच्या आवारातील तुळशीवृदांवनही यातून सुटले नाही. त्याचीही मोडतोड करण्यात आली आहे. देवळासमोरील दिवजांचीही मोडतोड झाली आहे. सकाळी साडेसहा वाजता मंदिराचे पैरेकर चंद्रकांत पर्वतकर नित्याप्रमाणे देवळात आले असता सदर घटना सर्वप्रथम त्याच्या नजरेस आली. त्यांनी ताबडतोब याची माहीती देवस्थान समितीचे सदस्य जिवा नारायण देसाई यांना दिली. दरम्यानच्या काळात तेथे मोठा जमाव एकत्र आला. या घटनेची माहिती मिळताच केप्याचे पोलिस निरिक्षक संतोष देसाई तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी चौकशी सुरू केली. मंत्री ज्योकिम आलेमाव हेही घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जमावाला समजावण्याचा व शांत रहाण्याची विनंती केली असता हिंदूंची १८ देवळे मोडली तेव्हा तुम्ही काय केले, असा सवाल लोकांनी केला. त्यावर अपराधी लवकरच पकडला जाईल नपेक्षा आपण तुमच्याबरोबर राहू असे त्यांनी सांगताच कुंकळ्ळीच्या घटनेच्या वेळी तुम्ही लोकांबरोबर का नव्हता, असा प्रश्न केला असता ज्योकिम गडबडले.
यावेळी हजर असलेले दक्षिण गोवा उपजिल्हाधीकारी गोकुळदास पी. नाईक म्हणाले, याकामी आता ठोस पाऊल गरजेचे बनले आहे या जनतेच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. कुंकळ्ळीत घडलेले मूर्तिभंजनाचे प्रकरण आम्ही तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे. लवकरच अपराधी पकडला जाईल. सरकारने २४ तास सर्व २८६ प्रार्थनास्थळांभोवती रात्रीच्या वेळी सुरक्षा अधिक कडक केली जाईल. तसेच यापुढे एकाही मंदिरातील मूर्ती फोडली जाणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.
यावेळी महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत देसाई म्हणाले, आम्ही सतत संयम बाळगत आलो आहोत. या प्रकरणात तरी सरकार व संबंधित यंत्रणेकडून त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. हे सगळे योजनाबद्ध कारस्थान असल्याचे दिसून येते. सरकारने हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कारण जर हिंदू रस्त्यावर उतरले तर त्यांना आवरणे सरकारच्या हाताबाहेर जाईल.
यावेळी पोलिस अधीक्षक ऍलन डीसा, उपअधीक्षक उमेश गावकर, केपे पोलिस निरीक्षक संतोष देसाई, उपजिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, उपजिल्हाधिकारी दीपक देसाई फौजफाट्यासह हजर होते. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान श्वानपथक आणण्यात आले. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. वाहनांतून अपराधी पसार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी खास यंत्रणेमार्फत या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
मुदेश्वर मंदिरातील लिंगाचीही मोडतोड
दरम्यान, पारोडा देसाईवाडा येथील मुदेश्वर मंदिरांतील लिंगाचीही अज्ञातांनी तोडफोड करून लिंग दरवाजापाशी आणून टाकले.आतील पितळी समया व बाजूच्या काही घुमट्यांचीही नासधूस करण्यात आली.
यावेळी बजरंग दलाचे जयेश नाईक व शिवसेनेचे पदाधिकारी घटनास्थळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तेथे आले असता नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. नंतर मंत्र्यांनी आपणांस अटक करण्याची धमकी दिल्याचे जयेश नाईक यांनी सांगितले.
यावेळी सावधगिरी म्हणून बोलावण्यात आलेली पोलिस कुमक पाहून लोक बिथरले. पोलिसांना मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यास लोकांनी मज्जाव केला. त्यामुळे पोलिसांना रस्त्यावरच उभे राहावे लागले.
गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांना यावेळी पत्रकारांनी यापूर्वीच्या मोडतोड प्रकरणांतील तपासाच्या प्रगतीविषयी विचारले असता ते म्हणाले, सरकारने यातील एकही प्रकरण स्वतंत्ररीत्या तपासासाठी आमच्याकडे सोपवलेले नाही. फक्त स्थानिक पोलिस यंत्रणेस साह्यभूत अशी आमची भूमिका आहे.
मात्र त्याच वेळी दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी गोव्यात घडलेली सर्व प्रकरणे गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवल्याचे लोकांना सांगत होते.
सदर घटनेनंतर देवळाच्या प्रांगणांतच लोकानी सभेच आयोजन केले. संतोष देसाई, व्यंकटेश प्रभुदेसाई व संजय गावस देसाई यांनी सरकारने व संबंधित यंत्रणांनी २४ तासांत अपराध्याला न पकडल्यास येत्या सोमवारी "गोवा बंद'च्या समर्थनार्थ "चलो पणजी' कार्यक्रम हाती घेऊ, असा इशारा दिला

मूर्तिभंजन प्रकरण पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना

पणजी,दि.१८ (प्रतिनिधी): राज्यात होणाऱ्या मूर्तिभंजन प्रकरणांचा छडा लावण्यात अपयशी ठरलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारला वाढत्या जनक्षोभापुढे आज अखेर नमते घेणे भाग पडले. धार्मिक स्थळांच्या मोडतोड व मूर्तिभंजन प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष पोलिस पथकाची स्थापना करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी गृहमंत्री रवी नाईक,मुख्य सचिव जे.पी. सिंग,पोलिस महानिरीक्षक किशनकुमार व पोलिस महासंचालक ब्रार उपस्थित होते. गुन्हा शाखेचे अधीक्षक मंगलदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. प्रामुख्याने केवळ धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांची सखोल चौकशी करण्याचे काम त्यांना सोपवण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारच्या बदनामीचा कट
राज्यातील हिंदू लोक विद्यमान सरकारच्या राजवटीत सुरक्षित नाहीत,असा आभास निर्माण करण्यासाठी सुनियोजितपणे अशा प्रकारचे मंदिर तोडफोडीचे प्रकार सुरू असल्याचा संशय मुख्यमंत्री कामत यांनी व्यक्त केला.कुंकळ्ळी येथील घुमटी मोडतोड प्रकरणी एका कर्नाटकातील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे,असे असतानाही सोमवारी २० रोजी गोवा बंदची दिलेली हाक ही केवळ धार्मिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न आहेत.असा आरोप त्यांनी केला. कायदा कुणालाही हातात घेता येणार नाही. स्वेच्छेने जे कुणी लोक या बंदात सामील होतात त्याबद्दल हरकत नाही परंतु लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिस कारवाई करण्यास मोकळे आहेत,असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उद्योजक, दुकानदार, व्यावसायिक, वाहतूकदार व सर्वसामान्य जनता यांना पूर्ण संरक्षण देण्यात येईल,असेही ते म्हणाले. या संपूर्ण पत्रकार परिषदेत गृहमंत्री रवी नाईक यांनी मात्र चकार शब्दही काढला नाही व त्यामुळे पत्रकारही अचंबित झाले.
------------------------------------------------------------
... तर एक लाखाचे इनाम
मूर्तिभंजनासारख्या प्रकरणांबाबत खात्रीलायक माहिती देणाऱ्यांस एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचीही घोषणा यावेळी त्यांनी केली. ही माहिती गुन्हे शाखेचे अधीक्षक,पोलिस महानिरीक्षक किंवा पोलिस महासंचालकांकडे देता येईल. याबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाणार आहे.

पालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे गरीब विक्रेत्या महिलांची फरफट

पणजी, दि. १८ (विशेष प्रतिनिधी): येथील नव्या मार्केटमध्ये जागा देताना पालिकेने मोठ्या प्रमाणात पक्षपात केला गेला असून गेल्या कित्येक वर्षांपासून जुन्या मार्केटात स्थानिक भाज्या, फळे, तसेच अन्य लहान मोठ्या वस्तू विकणाऱ्या स्थानिक गोमंतकीयांच्या तोंडाला पाने पुसून बिगर गोमंतकीयांचे चोचले पुरवले असल्याचा आरोप किमान दीडशे ते दोनशे सोपोधारक गरीब महिला विक्रेत्यांनी केला आहे. यातील किमान शंभर महिलांनी आज (शनिवारी) सायंकाळी पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली व चुकीच्या पध्दतीने नव्या मार्केटात घुसडण्यात आल्याने आपले व्यापारउदीम पुरते थंडावून अक्षरशः उपासमार सुरू असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
पणजी, ताळगाव, कुरका, मेरशी, सांताक्रुझ परिसरातील या गरीब महिला गेल्या अनेक वर्षांपासून पणजी मार्केटात स्थानिक भाज्या, फळे, नारळ तसेच दैनंदिन गृहोपयोगी वस्तु विकून गुजराण करतात. यातील बऱ्याच महिलांची हा व्यवसाय करता करता वयाची साठी उलटली आहे. जेव्हा दिवसाला वीस पैसे सोपा होता तेव्हापासून आम्ही येथे आहोत, परंतु नव्या मार्केटमध्ये जागा देताना आमच्यावर अक्षरशः अन्याय करण्यात आल्याचे त्या सांगतात. पूर्वी जुन्या मार्केटमध्ये उघड्यावर बसणाऱ्या या विक्रेत्यांना पर्रीकरांनीच मुख्यमंत्री असताना नवी शेड घालून दिली होती व दुसरीकडे संपूर्ण नव्या मार्केट प्रकल्पाचीच नव्याने बांधणी सुरू केली होती. या नव्या मार्केटमध्ये शेवटच्या टप्प्यात बहुतांश या छोट्या भाजी व फळे विक्रेत्या महिलांची सोय करण्यात येणार होती, मात्र पालिकेच्या काही नगरसेवकांनी बिगर गोमंतकीय विक्रेत्यांकडून पैसे खाऊन या स्थानिक गरीब महिलांची अक्षरशः फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. नवीन जागेत वाट्टेल त्या ठिकाणी एका माणसालाही बसता येणार नाही आणि हलताही येणार नाही अशा ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली असून या जागा इतक्या उंचीवर आहेत की तेथे चढायचे कोठून येथपासून प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण वर चढण्यासाठी धड पायऱ्याही नाहीत आणि सामान ठेवण्यासाठी योग्य जागाही नाही अशा कात्रीत त्या सापडल्या आहेत. परिणामी सध्या गिऱ्हाईकही त्यांच्याकडे फिरकेनासे झाले आहे आणि त्यांची अक्षरशः उपासमार सुरू असल्याचे त्यांनी पर्रीकरांना सांगितले.
आपल्या या अवस्थेबद्दल सदर महिलांनी पणजी महानगरपालिका, महापौर टोनी रॉड्रिगीस व दोघा नगरसेवकांवर ठपका ठेवला असून या परिस्थितीला ही मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मार्केटात भाजी, फळे आणि अन्य वस्तू विकूनच आमची गुजराण होत असल्याने सध्या होणाऱ्या उपासमारीतून वाचविण्याचे आवाहन त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना केले आहे. आमच्या मागण्या अवास्तव नाहीत. एका माणसाला व्यवस्थित बसण्याइतकी जागा द्या आणि पूर्वी भाजी व फळे विकणाऱ्यांची एका रांगेत सोय करा, एवढेच आमचे मागणे आहे. पर्रीकर मुख्यमंत्रिपदी होते तोपर्यंत सगळे काही सुरळीत होते; परंतु आता आमचे ऐकणारे कोणीच राहिलेले नाही. पैशांपुढे सगळे विकत गेले असून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना देव कधीही माफ करणार नसल्याचे त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलतानाही सांगितले.
दरम्यान, सायंकाळी पर्रीकर यांनी या महिलांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर स्वतः मार्केटमध्ये जाऊन त्यांची परिस्थिती समजून घेतली व या प्रकरणी पुन्हा आवाज उठवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या गरीब महिलांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा पर्रीकर यांनी दिला आहे.
पणजी आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता पर्वरी येथील सचिवालय संकुलात या विषयावरून बैठक बोलावली असून महापौर टोनी रॉड्रीगीज यांना बैठकीसाठी पाचरण केले आहे.

जेनिफर मोन्सेरातनाही सहआरोपी करून घ्या, 'त्या' पीडित मुलीच्या आईचे पोलिसांना पत्र

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): रोहित मोन्सेरात याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत जेनिफर मोन्सेरात यांनाही सहआरोपी करून घेण्याची मागणी आज "त्या' पीडित मुलीच्या आईने केली. तिने उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना तशा मागणीचे लिहिले आहे. रोहितच्याविरोधात आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर जेनिफर, शारदा मंदिरची एक शिक्षिका व अन्य एक व्यक्ती यांनी सदर तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा ठपका तिने या पत्रात ठेवला आहे.
आज कांपाल क्लिनिक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी ही माहिती दिली. यावेळी सदर महिलाही उपस्थित होती. जेनिफर मोन्सेरात हिने परवा पत्रकार परिषदेत आपण सदर जर्मन महिलेच्या घरीच गेलो नव्हतो,असा पवित्रा घेतला होता. दरम्यान,जेनिफर यांनी या भेटीवेळी आपल्या हस्ताक्षरात आपले नाव व मोबाईल क्रमांक लिहून दिलेला कागदाचा तुकडा यावेळी सादर करण्यात आला. हा कागद सदर पत्राबरोबर पोलिसांना सादर करण्यात आला आहे. रोहित याचे कारनामे इंटरनेटवरील "फेसबुक'संकेतस्थळावर सर्वांनी पाहिल्याचेही ऍड. रॉड्रिगीस म्हणाले. दरम्यान, रोहित याच्याकडून सदर मुलीला अश्लील संदेश पाठवण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल हा बाबूश मोन्सेरात यांचा असल्याने ते याप्रकरणी सहआरोपी ठरतात असा दावा करून आता थेट तक्रारदारावर दडपण आणून तक्रार मागे घेण्याचे प्रयत्न केल्याने जेनिफर यांनाही सहआरोपी करून घेण्याची मागणी सदर विदेशी महिलेने केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत ती मुलगी बिथरली असून तिची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठवडाभरात बिगर सरकारी संस्था व पोलिसांच्या साहाय्याने पुढील आठवड्यापर्यंत तिची जबानी घेतली जाईल,असा विश्वास ऍड. रॉड्रिगीस यांनी व्यक्त केला.
राज्याचे ऍड.जनरल यांनी सरकारला सल्ला द्यायचा असतो. मात्र रोहित मोन्सेरात तक्रार नोंद केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेली प्रक्रिया चुकीची असल्याचा जो सल्ला ऍडव्होकेट जनरल यांनी मोन्सेरात कुटुंबीयांना दिला तो कसा, असा महत्त्वपूर्णसवाल ऍड.रॉड्रिगीस यांनी उपस्थित करून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याप्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
मंत्र्यांच्या आदेशावरूनच संशयित गोमेकॉत
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघा संशयितांना एकाच वेळी छातीत दुखण्याचा त्रास जाणवल्याने त्यांना "गोमेकॉ'तील अतिदक्षता विभागात दाखल केल्याच्या कृतीची चौकशी करा,अशी मागणी ऍड.रॉड्रिगीस यांनी केली. कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक बी. के. हरिप्रसाद गोव्यात पोहचले व लगेच हे तिघेही संशयित "गोमेकॉ'तील वातानुकूलित विभागात दाखल झाले. सुरुवातीस बाबूश यांनी प्रयत्न केले व नंतर एका आरोग्यमंत्र्यांच्या आदेशावरूनच ही कृती घडल्याचा आरोपही ऍड.रॉड्रिगीस यांनी केला. गोमेकॉच्या अधीक्षकांनी विविध विभागांतील डॉक्टरांना पाचारण करून या तिघांना अतिदक्षता विभागात दाखल करून घेतल्याचा आरोप ऍड. आयरिश यांनी केला.
पोलिसांच्या कार्यतत्परतेचे स्वागत
पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात सुरू केलेल्या चौकशीबाबत बाबूश यांनी समाधान व्यक्त केले.परंतु बी.के.हरिप्रसाद यांच्या भेटीनंतर या प्रकरणी पोलिस चौकशीच्या दिशेबाबत संशय निर्माण होत असल्याचे ऍड. रॉड्रिगीस यांचे म्हणणे आहे. सर्वकाही कायद्याप्रमाणे होईल,असे सांगणाऱ्या हरिप्रसाद यांनी आता काहीही बेकायदा होणार नाही, याची दक्षता घ्यावी,असा सल्लाही ऍड.रॉड्रिगीस यांनी दिला.
घरी पाठवले
दरम्यान, ऍड. रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांना आज (शनिवारी) उपचारानंतर घरी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दरम्यान,हा सुरू केलेला लढा संपवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही,असा निर्धार व्यक्त करून गोवेकरांनी दिलेल्या धीराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.