Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 May, 2011

डॉ. जोशी हेच पुन्हा लोकलेखाचे अध्यक्ष

नवी दिल्ली, दि. २९
‘टू जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्याबाबत प्राथमिक अहवालावरून प्रचंड वाद झाल्यानंतरही भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी (७७) पुन्हा एकदा संसदेच्या लोकलेखा(‘पब्लिक अकाऊंटस् कमिटी’)समितीचे अध्यक्ष बनले आहेत.
शनिवारी या समितीची मुदत संपली. नियमानुसार नव्या समितीसाठी मुख्य विरोधी पक्ष या नात्याने भाजपने जोशी यांचेच नाव अध्यक्षपदासाठी सुचवले. अखेर सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर लोकसभाध्यक्ष मीराकुमार यांनी डॉ. मुरलीमनोहर जोशी यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. ही समिती संसदेशी संबंधित सर्व व्यवहारांची तपासणी करू शकते. डॉ. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती आजपासून (रविवार) कार्यरत झाली आहे. या समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.
मागच्या गुरुवारी (२८ एप्रिल) डॉ. जोशी यांनी समितीपुढे टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत प्राथमिक अहवाल सादर केला होता. यात दूरसंचारमंत्री ए. राजा यांना दोषी ठरवण्यात आले होते. घोटाळ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याप्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि घोटाळ्याची माहिती लपवण्याची धडपड केल्याप्रकरणी त्यावेळचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र समितीमध्ये असलेल्या कॉंग्रेसच्या सात, द्रविड मुन्नेत्र कळघमच्या (डीएमके) दोन आणि समाजवादी पक्ष तसेच बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराने अहवालाबाबत आक्षेप घेत, गोंधळ घातला होता. बहुमताच्या जोरावर त्यांनी अहवाल ङ्गेटाळला होता. या घटनेनंतर जोशी यांनी समितीची बैठक सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि खासदारांनी हंगामी अध्यक्षांची निवड केली होती. अखेर आज समितीची मुदत संपली आणि जोशी यांची पुन्हा एकदा लोकलेखाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
नियुक्तीनंतर आनंद व्यक्त करतानाच आपण सादर केलेला प्राथमिक अहवाल स्वीकारण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार लोकसभाध्यक्षांकडे राखीव असल्याचे डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी सांगितले.

No comments: