Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 May, 2009

अंजनी व सुनिताचा खुनीही महानंदच!

बेतकीच्या निर्मला घाडीप्रकरणातही तोच?
कबुली दिलेली प्रकरणे ७
संशय आणखी ५ प्रकरणांचा!

फोंडा, दि.८ (प्रतिनिधी) : गवळ निरंकाल येथील कु. अंजनी अनंत गांवकर (२८) आणि बेतोडा येथील कु. सुनिता गांवकर (३०) याचा खून केल्याची कबुली युवतींच्या खून प्रकरणी अटक केलेल्या महानंद रामनाथ नाईक याने फोंडा पोलिसांना दिली असून संशयित महानंद नाईक याने आत्तापर्यंत सात युवतींच्या खुनांची कबुली दिली आहे. बेतकी येथील कु.निर्मला वसंत घाडी (३०) या युवतींच्या बेपत्ता प्रकरणी महानंद नाईक गुंतल्याचे नवीन प्रकरण फोंडा पोलिसांकडे आज (दि.८) नोंद झाले आहे. बेपत्ता असलेली निर्मला हिची आई श्रीमती प्रभावती वसंत घाडी हिने यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. संशयित महानंद नाईक आणखी पाच प्रकरणामध्ये संशयाच्या घेऱ्यात आहे. त्यात गुलाबी गांवकर, दीपाली ज्योतकर, कु. सूरत व इतर प्रकरणांचा समावेश आहे.
कु.योगिता नाईक (कुर्टी), कु. दर्शना नाईक (तरवळे), वासंती गावडे (मडकई), केसर नाईक (पंचवाडी), नयन गावकर (पंचवाडी) यांच्या खुनाची कबुली यापूर्वी दिलेली आहे.
बेतोडा येथील कु.सुनिता गावकर ही युवती गावातील दूध सोसायटीमध्ये दूध आणून घालण्याचे काम करीत होती. त्यांच्या कुटुंबाची गुरे असल्याने काही वेळा गुरांचे खाद्य आणण्यासाठी फोंड्याला ये-जा करीत होती. फोंडा भागात महानंद नाईक याचा वावर होता. त्यामुळे काहीवेळा तो बेतोडा येथे सुध्दा जात होता. यावेळी महानंद याने कु. सुनिता हिच्याशी मैत्री केली. आपण खांडेपार येथील रहिवासी आहे. तसेच एका चांगल्या कंपनीत कामाला आहे, असे सुनिता हिला सांगितले होते. आपल्या आई वडिलांना तुला पाहण्यासाठी घरी बोलाविले आहे. आपल्या घरी येताना अंगावर दागिने वगैरे घालून येण्याची सूचना महानंद नाईक याने केली. सुनिता हिने ही गोष्ट घरच्याना सांगितले. त्यावेळी मित्राला घरी घेऊन येण्याची सूचना करण्यात आली. सुरुवातीला तू आपल्या घरी ये त्यानंतर आपण तुमच्या घरी येतो, असे महानंद नाईकने सांगितले. सुनिता घरातून दागिने सोबत घेऊन गेली होती. महानंद हा कु. सुनिता हिला खांडेपार येथील डोंगराळ भागात घेऊन गेला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. कु. सुनिता बेपत्ता झाल्यानंतर घरच्यानी खांडेपार भागात चौकशी केली. त्यावेळी सुनिताचा थांगपत्ता लागू शकला नाही. सुनिताला दिलेली माहिती चुकीची असल्याचे घरच्यांना कळून चुकले.
गवळ निरंकाल येथील अंजनी गांवकर ही युवती फोंडा येथे कामाला होती. याच ठिकाणी महानंद याचा वावर होता. अंजनी हिच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर काम करण्यास सुरुवात केली. अंजनी हिच्या लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांनी काबाड कष्ट करून पैसे जमवून दागिने तयार केले होते. महानंदने अंजनी हिच्याशी मैत्री करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. अंजनी हिने घरातून जाताना पन्नास ते साठ हजार रुपयांचे दागिने आपल्या सोबत नेले होते. तिला सुध्दा ओपा खांडेपार येथील जंगलात नेऊन ठार केले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बेतकी येथील कु.निर्मला घाडी ही युवती २००७ सालापासून बेपत्ता आहे. ती माशेल येथे कामाला होती. संशयित महानंद नाईक याने वरचा बाजार फोंडा येथे निर्मला हिच्याशी पहिल्यांदा ओळख केली. यावेळी निर्मला हिच्या ओळखीच्या काही जणांची नावे घेऊन तिच्याशी बोलण्यास प्रारंभ केला. महानंद हा बोलण्यास हुशार होता. गोड बोलून दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करून घेत होता. आपली म्हार्दोळ येथे लहान कारखाना आहे, असे निर्मला हिला सांगितले. त्यानंतर त्याच्यात मैत्री झाली. त्या युवकाने आपल्याला घरच्या लोकांना दाखविण्यासाठी घरी बोलाविले आहे. आपल्या घरी येताना चांगली नटून थटून येण्याची सूचना केली. त्यामुळे निर्मला हिने आपल्या बहिणीच्या घरी ठेवलेले दागिने घेऊन आली आणि त्यांच्यासोबत गेली. त्यानंतर ती परत घरी आली नाही. कु. निर्मला हिच्या आई सौ.प्रभावती घाडी हिने संशयित महानंद नाईक याला ओळखले आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आत्मविश्र्वास कमी असलेल्या, भोळ्या युवतींना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम करीत होता. संशयित महानंद नाईक हा युवतींना आपल्याबाबत खोटी माहिती देत होता. श्रीमंत असल्याचा बहाणा करीत होता आणि मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना घरातून येताना दागिने घेऊन येण्याची सूचना करीत होता. आत्तापर्यंत खून करण्यात आलेल्या सर्वच युवती घरातून दागिने घेऊन गेलेल्या आहेत. महानंद नाईक हा शांतपणे युवतीचे खून करून समाजात वावरत होता. संशयित सांगत असलेल्या गोष्टी ऐकून अंगावर काटा येतो. युवतींची निर्दयपणे हत्या करीत होता, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
संशयित महानंद नाईक याची पत्नी सौ. पूजा नाईक हिची पोलिसांनी अद्याप जबानी नोंदवून घेतलेली नाही. सौ. पूजा नाईक या मुलींच्या खूनप्रकरणी आपणाला काहीच माहिती नसल्याचे सांगून लोकांकडून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. पूजा नाईक ही एक कलाकार असल्याने लोकांची सहानुभूती कशी मिळवियाची ही कला तिला चांगलीच अवगत आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल. पाटील, उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक निखील पालेकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, हेडकॉस्टेबल सोनू परब आदी तपास करीत आहेत.
माझ्या एकुलत्या मुलीचा लग्नाचे खोटे आमिष दाखवून घात करणाऱ्या महानंद नाईक या नराधमाला जिवंत ठेवू नका, अशी प्रतिक्रिया अंजनी गांवकर हिची आई श्रीमती शेवंती अनंत गांवकर हिने व्यक्त केली आहे. शेंवती गावकर हिला पत्रकारांशी बोलताना गहिवरून आले. घरातून सोन्याचे दागिने घेऊन गेलेली माझी मुलगी कुठे तरी सुखी असेल असे वाटत होते. माझ्या भोळ्या भाबड्या मुलीचा नराधमाने फसविले. आम्ही मोठ्या कष्टाने पैसे कमावून मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेले सोने मुलीचा खून करून चोरून नेणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, असेही तिने सांगितले.
मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या महानंद या कसायाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बेपत्ता असलेल्या कु. निर्मला हिची आई श्रीमती प्रभावती वसंत घाडी यांनी व्यक्त केली. वरचा फोंडा येथे ओळख नसताना सुध्दा महानंद याने मुलीशी बोलण्यास प्रारंभ केला. त्याने दिनेश हे आमच्या ओळखीचे नाव घेतल्याने त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून मुलींला तिच्याशी बोलण्यास मुभा दिला. त्या संधीचा महानंद याने गैरफायदा घेत माझ्या मुलगीची फसवणूक केली, असेही तिने सांगितले.
"पत्नीचीही चौकशी करा'
शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, महानंद नाईक याने शिरोडा गावाचे नाव बदनाम केले आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीची सुध्दा कसून चौकशी करण्याची गरज आहे. तसेच तिला विविध मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यासाठी अर्थसाहाय्य करणाऱ्यांची सुध्दा चौकशी करण्याची गरज आहे. तरवळे शिरोडा येथील कु. अंगना शिरोडकर हिच्या खून प्रकरणी पुन्हा तपास करण्याची गरज आहे, असेही आमदार श्री. नाईक यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------
ही संख्या कितीवर जाणार?
१९९४ पासून संशयित महानंद नाईक याने युवतींचे खून करण्याचे सत्र सुरू केले आहे. अखेरचा खून जानेवारी २००९ मध्ये केला आहे. त्यामुळे चौदा वर्षात महानंद नाईक याने किती युवतींचे खून केले हे कळणे मुश्कील आहे. यासंबंधी प्रकरणे पोलिसांकडे येत आहेत. त्याप्रमाणे तपास काम हाती घेतले जात आहे.
-----------------------------------------------------------------------------
ओपा कोडार जंगलात दोन खून
बेतोडा येथील सुनिता गांवकर ही युवती २००३ सालापासून बेपत्ता आहे. तर अंजनी गांवकर ही युवती २००५ सालापासून बेपत्ता आहे. या दोघांनी घरातून जाताना प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आपल्या सोबत नेले होते. सुनिता व अंजनी या दोघांचा ओपा कोडार भागातील जंगलात खून करून मृतदेह त्याच ठिकाणी टाकल्याचे संशयित महानंद नाईक याने पोलिसांना सांगितले असून खून करण्यात आलेली जागा पोलिसांना दाखविली आहे.
-------------------------------------------------------------------------

विश्वजितविरुद्ध अखेर आरोपपत्र दाखल

- कसून चौकशी करण्याची तपास अधिकाऱ्यांना सूचना
- मंत्रिपद राहणार की जाणार याबद्दल लोकांत उत्सुकता

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांना दिलेल्या कथित धमकी प्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध अखेर आज जुनेगोवे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ५०६(२) या कलमाखाली आरोपपत्र दाखल केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यासंबंधी दिलेल्या आदेशानुसार ७५ पानी आरोपपत्राची प्रत उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आली. आरोपपत्राचे प्रत्येक पान न्याहाळल्यानंतर न्यायमूर्ती श्रीमती रोशन दळवी यांनी जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरूदास गावडे यांना या प्रकरणाची कसून चौकशी करा व संशयित आरोपीविरोधात कायद्यानुसार कारवाई करा,अशी सूचना केली.
माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यानंतर आता आरोपपत्र दाखल होणारे विश्वजित राणे हे विद्यमान मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री ठरले आहेत. आरोपपत्र दाखल झालेल्या नेत्याने मंत्रिपदावर राहण्यास कॉंग्रेस श्रेष्ठींचा सक्त विरोध आहे, नार्वेकर यांना मंत्रिपदावरून खाली खेचण्यासाठी मुख्यमंत्री कामत यांनी हाच "फॉर्म्युला' अवलंबला होता. आता मुख्यमंत्री कामत यांच्याकडून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाही हाच फॉर्म्युला लागू करणार काय, असा सवाल केला जात आहे.
मुख्यमंत्री सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते गोव्यात परतल्यानंतरच याबाबत काय ते स्पष्ट होईल. माजी वित्तमंत्री तथा हळदोण्याचे आ मदार ऍड.दयानंद नार्वेकर हेदेखील विदेश दौऱ्यावर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. विश्वजित राणे हेदेखील गोव्यात नसल्याची माहिती मिळाली आहे.
ऍड.आयरीश यांना धमकी प्रकरणातील चौकशी अधिकारी पोलिस निरीक्षक गावडे यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ८ साक्षीदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यात तत्कालीन उत्तर गोवा अधीक्षक नीरज ठाकूर, विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या राणे, गुन्हे विभागाचे अधीक्षक विश्राम बोरकर, तत्कालीन उत्तर गोवा अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, आयडिया सेल्युलर सर्व्हिस (पणजी)चे संपर्क अधिकारी सचिन शिंदे, उत्तर गोवा जिल्हा निबंधक कार्यालयाचे निरीक्षक व्ही.साळकर, जुनेगावे पोलिस स्थानकाचे माजी निरीक्षक विश्वेश कर्पे व सध्याचे निरीक्षक गुरूदास गावडे यांचा समावेश आहे.
गोळ्या घालून ठार करण्याची धमकी ३१ जुलै २००७ रोजी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मोबाईलवरून आपणास दिल्याची तक्रार ऍड.आयरिश यांनी जुनेगोवे पोलिस स्थानकांत नोंदवली होती. मुळात ही तक्रार नोंद करून घेण्यासच २२ दिवस लावण्यात आले.नंतर ऍड.आयरिश यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर विश्वजित राणे यांच्यावर अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले. उच्च न्यायालयात सरकारी वकिलामार्फत आरोपपत्र दाखल करण्याचे वचन देऊनही जुनेगावेचे निरीक्षक गुरूदास गावडे यांच्याकडून या प्रकरणाची फाईल बंद करण्याचे प्रयत्न झाल्याने ऍड.आयरिश यांनी त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. विश्वजित राणे यांनी ही धमकी देण्यासाठी आपली पत्नी सौ. दिव्या यांचा मोबाईल वापरल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सौ. दिव्या यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून घेण्याची मागणी ऍड. आयरिश यांनी केली होती. ती मागणी फेटाळल्यानंतर आयरिश यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेस अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीसही जारी केली आहे.

वरूण गांधींवरील 'रासुका' हटवला

आढावा समितीचा निर्णय
लखनौ, दि. ८ : भाजपचे नेते वरूण गांधी यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारने लावलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा ( रासुका) हटविण्यात आला आहे. पिलिभित येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी वरूण गांधी यांच्यावर मायावती सरकारने २८ मार्च रोजी रासुका लावला होता, यासंबंधी दोन न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या आढावा समितीने ही कारवाई आज अवैध ठरविल्याने मुख्यमंत्री मायावती यांना हा जबरदस्त दणका मानला जात आहे.
सध्या वरूण गांधी पेरॉलवर मुक्त आहेत. वरूण गांधी यांना रासुका लावल्यानंतर २९ मार्च रोजी अटक कऱण्यात आली होती. वरूण गांधी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत पिलिभित जेलच्या बाहेर गोंधळ घातला होता. वरूण गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन रासुकाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर १६ एप्रिल रोजी त्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. प्रथम त्यांना १ मे पर्यंत आणि नंतर १४ मे पर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला होता. आता राज्यस्तरीय आढावा समितीने वरुण गांधी यांना रासुका लावणे बेकायदा ठरविले आहे. त्यापूर्वी या समितीने वरुण तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या समितीत न्या. प्रदीप कांत व पी.के.सरीन या वरिष्ठ न्यायमूर्तींचा समावेश आहे.

सेवावाढीला तीव्र विरोधाचा निर्धार

आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच
पणजी, दि.८ (प्रतिनिधी) : विविध निवृत्त अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवावाढीविरोधात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याचा निर्धार आज झालेल्या गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत संमत करण्यात आला.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलेल्या सेवावाढीचा निषेध करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.सरकारने या नेमणुका ताबडतोब रद्द कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला या नेमणुका मागे घेण्याचे आश्वासन दिले होते; प्रत्यक्षातील परिस्थिती नेमकी उलट आहे. निवृत्त अधिकाऱ्यांना सेवावाढ व कंत्राटी पद्धतीवर नेमण्याचे सत्र सुरूच असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी दिली.
संघटनेच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. राज्य सरकारकडून संघटनेची थट्टाच सुरू असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. निवृत्त अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवावाढीमुळे सेवेत असलेल्या खालच्या अधिकाऱ्यांचा बढतीची संधी हिरावून घेतली जाते, त्यांच्यावर हा अन्याय आहे, अशी भावना त्यामुळे संघटनेत निर्माण झाली आहे.

आचारसंहिता शिथिल; लोकांना मोठा दिलासा

पणजी, दि. ८ : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता २८ मेपर्यंत लागू राहणार असल्याने निवडणूक आयोगाने काही प्रकरणांत ती शिथिल केली आहे. त्यामुळे लोकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळवण्यासाठी २७५ पेक्षा जास्त प्रस्ताव आले व त्यातील २६० हून अधिक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तातडीने गरजेचे नसलेले व दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या योजनांचे प्रस्ताव मात्र अमान्य करण्यात आले. आचारसंहिता लागू झाल्यापासून अनेक योजना व प्रकल्पांची कामे रखडली होती. तथापि, आता आयोगाने ती शिथिल करून कल्याणकारी आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधीच्या प्रस्तावांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यासाठी विविध खातेप्रमुखांनी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांंची दखल घेऊन तसा खुलासा दैनिकांतून करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत. मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव प्रलंबित असल्यास तसे सरकारच्या निदर्शनाला आणून द्यावे. त्यासाठी खातेप्रमुखांनी श्रीमती दीपाली नाईक (ओएसडी मोबाईल क्र. ९७६३८२०१४७) यांच्याशी संपर्क साधावा, असे मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

'मुलायमसिंग यांचे वक्तव्य धक्कादायक'

भोपाळ, दि. ८ : मायावतींचे उत्तरप्रदेशातील सरकार पाडणाऱ्या पक्षालाच पाठिंबा देऊ, या मुलायमसिंग यादवांच्या वक्तव्यावर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आज पत्रकारांशी बोलताना अडवाणी म्हणाले की, मी मुलायमसिंग यादव यांच्या वक्तव्याने आश्चर्यचकित झालोय. जाहीररित्या नेतेमंंडळी अशी वक्तव्ये कशी काय देऊ शकतात? लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार विनाकारण बरखास्त करण्याचा अधिकार घटनेने केंद्र सरकारला दिलेला नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन नेतेमंडळींनी आपली प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. त्यासाठी आपली वक्तव्ये विचारपूर्वकच दिली पाहिजेे.
रालोआ संपुआच्या पुढेच राहणार
आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल हे रालोआच्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत अडवाणी म्हणाले की, भाजपा हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार यात शंकाच नाही. आमची आघाडी संपुआच्या समोरच राहणार. याचे संपूर्ण श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच राहील. कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय कोणताच पक्ष मोठा होऊ शकत नाही, असेही अडवाणी यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

Friday 8 May, 2009

पाचव्या खुनाची महानंदकडून कबुली

नयन गावकरचा खून करून मानशीत टाकले
आणखी पाच प्रकरणी संशय
फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) : फोंडा भागातील चार युवतींच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी महानंद रामनाथ नाईक (तरवळे-शिरोडा) याने अखेर पाचव्या खुनाची कबुली दिली असून अमळाय पंचवाडी येथील कु. नयन गावकर हिचा गळा आवळून खून करून मृतदेह बोरी येथील पुलाजवळील मानशीत टाकल्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपी महानंद नाईक याने केलेल्या खुनांची संख्या आता पाच झाली आहे. आणखी पाच युवतींच्या प्रकरणामध्ये महानंद नाईक संशयाच्या घेऱ्यात आहे.
युवतींच्या खून आणि बलात्कार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या महानंद नाईक याची आणखी पाच प्रकरणात कसून तपासणी सुरू आहे. संशयित महानंद नाईक याने नरेंद्र गावकर हे नाव धारण करून कु. नयना हिच्याशी मैत्री केली होती. १९ मार्च २००८ पासून नयना बेपत्ता झाली. नरेंद्र गांवकर नामक इसमाशी नयना हिची मैत्री होती, असे कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
संशयित महानंद नाईक याने १९ मार्च २००८ रोजी नयन गावकर हिला मडगाव येथे नेले. मडगाव येथे काही तास फिरल्यानंतर फोंड्याला येण्यापूर्वी संशयित आरोपी महानंद नाईक याने नयना हिच्या भावाच्या मोबाईल फोनवर मडगावातील एका कॉईन बॉक्समधून फोन केला आणि आपण दोघे बेळगावला जात असल्याचे सांगितले. महानंद नाईक याने नयना हिला घेऊन बेळगावला न जाता बोरी गाठली. तेथे बोरी पुलाजवळ नयना हिचा इतर युवतींचा खून केलेल्या पद्धतीनुसार खून करून मृतदेह मानशीत टाकून दिला आणि तिच्या अंगावरील दागिने घेऊन घरी निघून गेला.
संशयित महानंद नाईक यांनी फोंडा पोलिसांनी ज्या कॉईन बॉक्सवरून नयना हिच्या भावाला फोन केला होता" ती' जागा पोलिसांना ७ मे ०९ रोजी सकाळी दाखवली आहे. तसेच ज्याठिकाणी नयना हिचा खून करण्यात आला. ती जागा सुध्दा दाखविली आहे. मडगावच्या ज्या आइस्क्रीम पार्लर मध्ये नयना गावकर हिच्या समवेत बसून "फालोडा' खाल्ला ती जागा सुध्दा महानंद याने पोलिसांना दाखविली आहे. याप्रकरणी महानंद नाईक यांच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजनी गावकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निरंकाल येथे गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना महानंदच्या बाबत धक्कादायक माहिती मिळाली. साध्या, भोळ्या मुली त्याच्या आमिषाला बळी पडत होत्या. फोंडा भागातून बेपत्ता असलेल्या युवतींबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. संशयित महानंद नाईक यांच्या काही कर्मकहाण्यांची चर्चा लोकांत सुरू आहे. संशयित महानंद नाईक याच्या पत्नीची चौकशीची मागणी लोकांकडून केली जात आहे.
दरम्यान, महानंद नाईक यांच्या पत्नीची पोलिसांनी जबानी घेतली आहे. त्याची पत्नी ओल्ड गोवा येथे एला फार्ममध्ये कामाला आहे. त्याला दोन वर्षाची मुलगीही आहे. गोव्यात गाजत असलेल्या या युवतीच्या खून प्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील तपास करीत आहेत.
-----------------------------------------------------------------
आणि त्या दोघी वाचल्या!
गवळवाडा निरंकाल येथील कु. सुमित्रा आणि कु. कल्पना या दोन युवतींनाही संशयित महानंद नाईक याने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती उघड झाली आहे. महानंद याच्या आमिषाला या युवती बळी न पडल्याने वाचू शकल्या. महानंद नाईक मोठ्या चलाखीने युवतींना आपल्या जाळ्यात ओढत होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. गवळवाडा निरंकाल येथे महानंद नाईक याचा मोठ्या प्रमाणात वावर होता.

'स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा समाजाला ब्रह्मानंदाचार्यांनी दिली'

सातव्या पुण्यतिथीदिनी मान्यवरांचा सत्कार
फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) : श्री पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या श्री क्षेत्र तपोभूमीचे संस्थापक प.पू. सद्गुरूमाऊली ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराज यांची सातवी पुण्यतिथी आज विविध कार्यक्रमासह थाटात साजरी करण्यात आली आहे.
प.पू.ब्रह्मानंदाचार्य स्वामी यांनी भरकटलेल्या बहुजन समाजाला दिशा दाखवून त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. स्वामींचे विचारांची समाजाला आजही गरज असून स्वामींचे हे पवित्र कार्य यापुढे सुरूच राहील, असे विद्यमान पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले.
पुण्यतिथीनिमित्त तपोभूमीवर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी प्रकट कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, गोवा विधानसभेचे सभापती प्रतापसिंह राणे, ज्येष्ठ वकील मनोहर उसगावंकर, उद्योगपती अशोकराव चौगुले, साळगावचे आमदार दिलीप परूळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर, खानापूरचे आमदार प्रल्हाद रेमाणी, उजैन संस्कृत विद्यापीठाचे उपकुलगुरू श्री. मिश्रा, सौ. विजयादेवी राणे, संप्रदायाचे अध्यक्ष गुरूदास शिरोडकर, उपाध्यक्ष प्रकाश केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
प.पू.ब्रह्मानंद स्वामीचे कार्य अद्वितीय असून त्यांनी हजारो कुटुंबाचा उद्धार केला. व्यसनाधीन बनलेल्या समाजाची व्यसनातून मुक्तता केली. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर केली. समाज सुसंस्कृत आणि मूल्याधिष्ठित बनविण्यासाठी प्रयत्न केले. स्वामीचे समाज उद्धाराचे कार्य यापुढेही सुरू ठेवले जाणार आहे. भक्तगणांनी सुध्दा ब्रह्मानंद स्वामींचे विचार समाजात पोचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे,असेही स्वामींनी सांगितले.
भक्तिरसातून जीवनाचे सार्थक होऊ शकते. मनुष्याने माणुसकीची जोपासना करून आपल्या कर्तव्याचे पालन करावे, असे अँड. मनोहर उसगावंकर यांनी सांगितले. प.पू.ब्रह्मानंद स्वामींनी केलेल्या अलौकिक कार्यामुळे समाज स्थिर होत आहे, असे उद्योगपती अशोकराव चौगुले यांनी सांगितले. प.पू. ब्रह्मानंद स्वामी यांनी बहुजन समाजाला योग्य मार्गदर्शन केले, असे सभापती प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अँड. मनोहर उसगांवकर, सभापती प्रतापसिंह राणे, उद्योगपती अशोकराव चौगुले यांचा प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. विजयादेवी राणे यांची ब्रह्मानंदस्वामीच्या कन्येच्या हस्ते ओटी भरून सन्मान करण्यात आला. श्री पद्मनाभ शिष्य संप्रदायाशी निगडीत असलेल्या दिगंबर कालापूरकर कुंटुबीय, गुरूदास नार्वेकर कुटुंबीय, जगन्नाथ फडते कुंटुबीय, बन्सीलाल हडफडकर कुटुंबीय यांचा स्वामींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संप्रदाय समितीचे अध्यक्ष गुरूदास शिरोडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सच्चिदानंद नाईक यांनी केले. या पुण्यतिथी सोहळ्याला भाविक, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधी मंदिरात ब्रह्मानंद स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती.

म.गो.तील वाद मिटल्याचा दावा

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातील केंद्रीय समिती व विधिमंडळ गटातील शिगेला पोहचलेला वाद संपुष्टात आल्याचा दावा दोन्ही गटांतर्फे करण्यात आला. पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी ढवळीकरबंधुंनी धमकी दिल्याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्याचा आपला निर्णय मानवतावादी दृष्टिकोनातून मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. माजी मगो नेत्यांना पक्षात फेरप्रवेश देण्याबाबतचा केंद्रीय समितीने घेतलेला निर्णय कायम राहणार असून केंद्रीय समितीचे पंधरा सदस्य व दोन विधिमंडळ गट नेते यांच्या एकमतानेच फेरप्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईल, असाही "फॉर्मुला' काढण्यात आला. आमदार दीपक ढवळीकर, पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत व केंद्रीय समितीचे इतर नेते यांनी आज घाईगडबडीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा करून या वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.मुळात हा संपूर्ण वाद काही माजी नेत्यांच्या फेरप्रवेशाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे सुरू झाल्याचे आमदार दीपक ढवळीकर म्हणाले. या वृत्तामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांत गैरसमज पसरल्याने हा वाद चिघळत गेला,परंतु पक्षहितासाठी हा वाद योग्य नाही या विचाराने या वादावर अखेर समेट घडवून आणल्याची माहिती श्री.राऊत यांनी दिली.दरम्यान,एकीकडे समेट घडवून आणण्याची बोलणी सुरू असताना दुसरीकडे दीपक ढवळीकरांच्या काही समर्थकांकडून बैठक घेण्यात आली व त्यात मगो पक्षाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आारोप पक्षाध्यक्ष श्री.राऊत यांच्यावर करण्यात आला.श्री.राऊत यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली. दीपक ढवळीकर हे पक्षाचे खजिनदार होते व त्यांनी याबाबत खुलासा करावा,असे म्हणून श्री.राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत श्री.दीपक ढवळीकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या मागणीनंतर काही काळ पत्रकार परिषदेतच वातावरण गरम झाले.श्री.राऊत यांनी केलेल्या या मागणीमुळे ढवळीकर समर्थक नाराज बनले व त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली असता दीपक ढवळीकर यांनी हस्तक्षेप करून अखेर असा कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे सांगितले.आरोप करणाऱ्यांनी आपले म्हणणे सिद्ध करून दाखवावे,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
युवाशक्तीची बैठक
दरम्यान,आज मगोच्या युवाशक्तीने पक्षाच्या मुख्यालयाला भेट दिली असता तिथे पक्ष कार्यालयाला टाळे ठोकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच येथील नजीकच्या हॉटेलात बैठक घेतली. ही बैठक सुदेश मळकर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली व यावेळी प्रदीप बखले,जगदीश जोग व महेश पणशीकर हजर होते.ही कार्यकारिणी बैठक असल्याचे सांगून इथे तीन ठराव संमत करण्यात आले. त्यात पक्षाचा विश्वासघात करून गेलेल्यांना कोणत्याही पद्धतीत फेरप्रवेश देण्यात येऊ नये,केंद्रीय समिती बरखास्त करून ९० दिवसांच्या आत आमसभा बोलावून नवीन केंद्रीय समिती स्थापन करणे व गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निधीचा पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी गैरव्यवहार केल्याने त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्री.राऊत यांनी निवडणूक आयोग व आयकर विभागाला पाठवलेल्या एका यादीत पक्षाकडून विविध उमेदवारांना दिलेल्या अर्थसाहाय्याची यादीच यावेळी जाहीर करण्यात आली. या यादीबाबत बनावट पद्धतीने सह्या घेण्यात आल्या असे सांगून जगदीश जोग,किशोर परवार,आनंद वेळीप आदी उमेदवारांनी आपल्याला पक्षाकडून एकही पैसा मिळाला नाही,असे सांगितले.

'तडा नव्हे भेग' जुवारी पूल वाहतुकीस सुरक्षित

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : जुवारी .पुलाला गेलेला तडा अजिबात धोकादायक नसल्याने वाहनचालकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. ही भेग बुजवण्यासाठी खात्याने काम हाती घेतल्याची माहिती सरकारी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, जुवारीवरील नव्या समांतर पुलाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ खात्याला पाठवण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करून नवा पूल लवकरात लवकर बांधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले आहे.
जुवारी पुलावर नव्याने आढळलेला तडा सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी नवी डोकेदुखी बनली असली तरी या तड्याची पाहणी केली असता ती केवळ पुलावरील डांबरी थराला गेलेली भेग असल्याची माहिती सरकारी प्रवक्त्याकडून मिळाली. जुवारी पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगून हे बारीक दुरुस्ती काम लवकरात हाती घेण्यात येईल,असे सांगण्यात आले.मंत्री चर्चिल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, केंद्र सरकारला पत्र पाठवून या पुलाचे काम हाती घेण्यासाठी राज्य सरकारला परवानगी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

८५ मतदारसंघांत ५७ टक्के मतदान

नवी दिल्ली, दि. ७ : पंधराव्या लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात आज आठ राज्यांमधील ८५ मतदार संघांत झालेल्या निवडणुकीत एकूण सरासरी ५७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तिसऱ्या टप्प्याप्रमाणेच पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातही सर्वाधिक ७५ टक्के मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ८० टक्के मतदान झाले होते. हुरियतने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी केलेले ५० तास बंदचे आवाहन झुगारून जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर लोकसभा मतदार संघात आज २४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना वगळता देशातील उर्वरित भागात मतदान सुरळीत पार पडले.
दुपारी ५ वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजधानी नवी दिल्ली येथे सायंकाळी आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त बी. आर. शर्मा यांनी आज झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर केली. पश्चिम बंगालमध्ये आज १७ मतदार संघांत मतदान झाले. राज्यातील जांगीपूर मतदार संघात झालेल्या हिंसाचारात एकाला आपले प्राण गमवावे लागले. या मतदार संघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी उभे आहेत. पश्चिम बंगालखालोखाल ६५ टक्के मतदान पंजाबमधील चार मतदार संघात झाले. आज राजस्थानमधील २५, हरयाणामधील १० आणि दिल्लीतील ७ या सर्वच्या सर्व मतदार संघांत मतदान होऊन तेथे अनुक्रमे ५०, ६३ व ५० टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये आधीच्या तीन टप्प्यांप्रमाणेच चौथ्या टप्प्यातही अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. सायंकाळी निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर बिहारमध्ये अवघ्या ३७ टक्के मतदानाची नोंद झाली.
पंधराव्या लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून सुरक्षेच्या दृष्टीने उत्तर प्रदेशात या पाचही टप्प्यात मतदान घेतले जात आहे. देशातील मोठ्या व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यात आज १८ मतदार संघांत झालेल्या मतदानाची टक्के ५० टक्के होती.
चौथ्या टप्प्याच्या मतदानानंतर लोकसभेतील ५४३ जागांपैकी ४५७ जागांवरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित ८६ जागांचे मतदान पाचव्या व अंतिम टप्प्यात बुधवार १३ मे रोजी होणार आहे. या संपूर्ण जागांची मतमोजणी मात्र एकाच दिवशी म्हणजे १६ मे रोजी होणार आहे .
भाजपाचे राजनाथसिंग, राजदचे लालूप्रसाद यादव, सपाचे मुलायमसिंग या तिन्ही आपापल्या पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणेच, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्यासह १३१५ उमेदवारांचे भाग्य आज मशीन बंद झाले. यात ११९ महिला उमेदवारांचाही समावेश होता.

Thursday 7 May, 2009

विश्वजितविरुद्ध आरोपपत्राची प्रत उद्या कोर्टात सादर करा

खंडपीठाचा पोलिसांना आदेश

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांना दिलेल्या कथित धमकी प्रकरणात राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे आज जुने गोवे पोलिसांनी न्यायालयाला सांगताच, त्या आरोपपत्राची एक प्रत ८ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करण्याचे आदेश न्या. रोशन दळवी यांनी आज दिले. आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन देऊनही त्याची कार्यवाही न केल्यामुळे पोलिस निरीक्षक गुरुदास गावडे यांच्याविरोधात अवमान याचिकेवर सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी हा आदेश देण्यात आला.
माजी क्रीडामंत्री दयानंद नार्वेकर यांच्यानंतर आरोपपत्र दाखल होणारे कॉंग्रेस मंत्रिमंळातील विश्वजित राणे हे दुसरे मंत्री ठरणार आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विश्वजित यांचे मंत्रिपद जाणार काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेऊन गेल्या महिन्यात राज्य सरकारला "कारणे दाखवा' नोटीस बजावली होती.
२३ सप्टेंबर २००८ रोजी विश्वजित यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सरकारी वकील विनी कुतिन्हो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सांगितले होते. त्यावेळी या प्रकरणाचे तपास अधिकारी गुरुदास गावडे न्यायालयात उपस्थित होते. त्यानंतर मात्र प्रत्यक्षात आरोपपत्र दाखल न करता थेट या प्रकरणाची चौकशीच थांबवून फाईल बंद करण्यात आल्याने निरीक्षक गावडे यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीची फाईल प्रॉसिक्युशन संचालकांच्या सुचनेनुसार तपासाची फाईल बंद करण्यात आल्याचे गावडे यांनी न्यायालयाला सांगितले होते.
न्यायालयाला या धमकी प्रकरणात तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात
आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

सात प्रकरणी महानंद संशयाच्या भोवऱ्यात

..चार खुनांची आत्तापर्यंत कबुली
..आणखी तीन प्रकरणांची नोंद



महानंदने खुनाची कबुली
दिलेली प्रकरणे
योगिता नाईक
दर्शना नाईक
वासंती गावडे
केसर नाईक

बुधवारी नोंद झालेली
बेपत्ता तरुणींची प्रकरणे
गुलाबी गावकर
दीपाली ज्योतकर

निर्मला गावकर

फोंडा, दि.६ (प्रतिनिधी) - फोंडा भागातील चार युवतींचे खून, एका युवतीवरील बलात्काराची कबुली दिलेल्या सिरियल किलर संशयित महानंद नाईकची आणखी तीन नवीन प्रकरणे आज (६ मे) उघड झाली असून या प्रकरणात संशयित महानंद नाईक गुंतल्याचा दाट संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आत्तापर्यत सहा प्रकरणामध्ये संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. दरम्यान, कुर्टी येथील कु. योगिता नाईक खून प्रकरणी संशयित महानंद याला १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आज (दि.६) दिला आहे.
सीरियल किलर महानंद नाईक यांच्या विरोधात आणखी तीन नवीन प्रकरणे आज (दि.६) नोंद झाली आहेत. सध्या सहा प्रकरणामध्ये महानंद नाईक संशयाच्या घेऱ्यात आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून संशयिताने ह्या प्रकरणाची अद्याप कबुली दिलेली नाही. ज्या ज्या ठिकाणी संशयित महानंद नाईक याचा संबंध आला तेथील युवती गायब झालेल्या आहेत. फोंडा भागात १९९४ सालातील गाजलेल्या गुलाबी गावकर खून प्रकरणी संशयित महानंद याचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत गुलाबी हिचा मृतदेह खांडेपार येथे आढळून आला होता. मयत गुलाबी गावकर हिच्या भावाने फोंडा पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मयत गुलाबी घरातून सोन्याचे दागिने घेऊन आली होती. त्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. मयत गुलाबी ही वरचा बाजार फोंडा येथील एका टेलरिंगच्या दुकानात कामाला होती. त्याच ठिकाणी महानंद हा भाडोत्री मालवाहू रिक्षा चालविण्याचे काम करीत असल्याने महानंद यांचा याप्रकरणी गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दवर्ली हाउसिंग बोर्डे मडगाव येथून २००६ सालापासून बेपत्ता असलेल्या कु. दिपाली दत्ताराम ज्योतकर या युवतीच्या प्रकरणी सुध्दा संशयित महानंद नाईक गुंतल्याची संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. श्री. ज्योतकर यांच्या घराच्या विस्तारीत कामाचा ठेका संशयित महानंद नाईक याने घेतला होता. त्यावेळी सुमारे पंधरा दिवस त्याच्या घराचे काम करीत होता. त्यावेळी कु. दिपाली हिच्याशी त्याने मैत्री केली. कु. दिपाली घरातून जाताना रोख ८० हजार रुपये आणि सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे दागिने घेऊन गेली होती, असे कुटुंबीयांनी उघड केले आहे. आपण मित्रासोबत मुंबईला जात असल्याची चिठ्ठी दिपाली हिने लिहून ठेवली होती.
रिवण सांगे भागातून निर्मला गांवकर ह्या युवतीच्या खून प्रकरणी महानंद नाईक याचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ह्या युवतीचा मृतदेह वेर्णा येथे आढळून आला होता. घरातून जाताना तिने दागिने नेले होते, अशी माहिती मिळाली आहे.
संशयित महानंद नाईक याचा निरंकाल भागात मोठ्या प्रमाणात वावर होता. या गावातून बेपत्ता झालेल्या युवतीच्या प्रकरणात महानंद याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निरंकाल ह्या गावाचे नाव सुरुवातीला उच्चारताच संशयित महानंद नाईक याने हे गाव आपल्याला ठाऊक नसल्याचे पोलिसांना सांगितले. निरंकाल येथील कु.अंजनी गांवकर प्रकरणी संशयितांची तपासणी सुरू आहे. ही युवती वरचा बाजार फोंडा येथे टेलरिंगच्या दुकानात कामाला होती. त्याच ठिकाणी संशयित महानंद रिक्षा चालविण्याचे काम करीत होता. उसगाव येथे आपल्या वडिलांचे हॉटेल असल्याचे सांगितले होते. अंजनी गावकर हिचा मित्र संशयित महानंद नाईक याला ओळखत आहे, अशी माहिती मिळाली आहे. अमळाय पंचवाडी येथील नयन गांवकर, विझार पंचवाडी येथील सूरत गांवकर यांच्या प्रकरणी सुध्दा संशयित महानंद याची चौकशी केली जात आहे. सिरियल किलर महानंद नाईक निर्ढावलेला असल्याने गुन्ह्याची कबुली देत नाही. संशयित महानंद चार सिम कार्डाचा वापर करीत होता. त्यांच्या सर्व सिमकार्डची माहिती मिळविण्यात येत आहे. महानंद यांच्या संपर्कात आलेल्या युवती ह्या सोन्याच्या दागिने घेऊन घरातून आलेल्या आहेत आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या आहेत. संशयित गुन्ह्याची कबुली देण्यास पुढे येत नसल्याने पोलिसांना साक्षीदार व इतर पुरावे गोळा करावे लागत आहे. गुलाबी गावकर खून प्रकरणातील प्रमुख साक्षीदार मृत झाला आहे. मात्र, त्याने आपल्या जबानीत केलेले आरोपीचे वर्णन महानंदाशी मिळते जुळते आहे, असेही सूत्रांनी सांगितले. गेल्या वीस वर्षात महानंद नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अनेक युवती बेपत्ता झालेल्या आहेत. आपणा सोबत येताना सोन्याचे दागिने घालण्याची अट महानंद युवतींना घालत होता. युवतीचा एकाच पद्धतीने खून करीत होता. महानंद हा कोणतेही काम न करता गेली कित्येक वर्षे युवतीचे खून करून त्यांच्या अंगावरील दागिने चोरून चरितार्थ चालवत होता, असे उघड झाले आहे. युवतीचे खून केल्याचा त्याला खेद किंवा दुःख वाटत नाही. या सहा प्रकरणी संशयित महानंद नाईक याने कबुली न दिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. सध्या चार खून आणि एक बलात्काराचा गुन्हा त्याच्या विरोधात नोंद झालेले आहेत. निरंकाल येथील एका कुटुंबांशी महानंद याची दाट मैत्री होती. त्या कुटुंबांकडे वरच्यावर येजा करीत होता. एके दिवशी त्या कुटुंबाला एका कार्यक्रमाला घेऊन गेला. या कार्यक्रमातून महानंद अचानक निघून गेला. कार्यक्रम झाल्यानंतर सदर कुटुंब घरी आले. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे आढळून आले. घरातील लाखांचा ऐवज पळविण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक निखिल पालेकर, हेडकॉस्टेबल सोनू परब आदी तपास करीत आहेत.
कुठे आहे दीपाली?
संशयित महानंद नाईक याला दुपारी रिमांडसाठी न्यायालयात नेत असताना त्या ठिकाणी मडगाव येथून कु.दीपाली ज्योतकर हिचे आई, वडील आले होते. त्यावेळी दीपाली हिच्या आईचा राग अनावर झाला. संशयित महानंद नाईक याच्या अंगावर ती धावून गेली व तिने त्याच्यावर थप्पड लगावली. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला. कु. दीपाली कुठे आहे, असा प्रश्न तिने महानंद नाईक याला केला. याप्रकरणी पोलिसांनी तपासकाम सुरू केले आहे.

जुवारी पुलाला तडा जात असल्याचे उघड

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - जुवारी पुलाच्या गेल्या ३ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत पुन्हा एकदा पुलाला बारीक तडा जात असल्याचे उघडकीस आल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली आहे.
हा तडा गंभीर स्वरूपाचा नाही. तथापि, नव्या पुलाबाबत आता राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नव्या पुलाच्या बांधकामाला किमान पाच वर्षे लागतील. १९९८ साली जुवारी पुलाची मोठी दुरुस्ती करण्यात आली व तेव्हा सदर कंपनीकडून १५ वर्षाची हमी देण्यात आली होती. हा काळ पुढील पाच वर्षात संपतो. त्यामुळे नव्या पुलाचे बांधकाम यावर्षी सुरू झाले नाही तर उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणारा हा दुवा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
कुठ्ठाळी येथील जुवारी नदीवरील या महत्त्वाच्या पुलाबाबत पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ३ मे रोजी या पुलाची चाचणी केली असता खांब क्रमांक ६ व ७ या दरम्यान या पुलाला नव्याने तडा जात असल्याचे आढळले आहे. हा तडा गंभीर स्वरूपाचा नसल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला असला तरी या पुलाची जीर्णवस्था पाहता यापुढे या पुलाची हमी देणे कठीण बनणार असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. याप्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
राज्यात अजूनही आचारसंहिता लागू असल्याने वक्तव्य करणे योग्य नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या २००६ साली पुलाच्या एका खांबाला तडा गेल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याचे जाहीर करून खबरदारीचा उपाय म्हणून या पुलावरील अवजड वाहतूक ताबडतोब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सदर पुलाच्या सुरक्षेबाबत अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही सरकारच्या वेळकाढू वृत्तीमुळे या पुलाचा विषय रेंगाळत पडला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जुवारी नदीवरील नव्या पुलाच्या कामाला चालना देण्याचे वचन दिले आहे. सध्याच्या जुवारी पुलाशेजारीच कोंकण रेल्वेने पूल बांधला तेव्हाच त्यांनी जुवारी पुलाला समांतर पूल बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता, मात्र तत्कालीन राज्य सरकारने तो धुडकावला होता. २८ फेब्रुवारी २००० रोजी संसदेत प्रश्नोत्तराच्या वेळी उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला असता त्यांना केंद्रीय भूपृष्ठ राज्यमंत्री डॉ. देवेंद्र प्रधान यांनी सदर पूल कमकुवत बनल्याने अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यात आल्याचे सांगितले होते. नंतर जानेवारी २००१ साली अवजड वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता.

राऊत यांची सुदिनविरोधात पोलिस तक्रार ?


हा तर कॉंग्रेसचा डाव - ढवळीकर समर्थकांची टीका


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - मगो पक्षातील केंद्रीय समिती व विधिमंडळ गटातील वाद आता अगदी शिगेला पोहचला आहे. एकीकडे केंद्रीय समितीने सर्व माजी नेत्यांना पक्षाचे दरवाजे उघड करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे पक्षाच्या दोन्ही आमदारांनी मात्र या निर्णयास प्राणपणाने विरोध केला आहे. या तथाकथित माजी नेत्यांना पक्षात फेरप्रवेश दिल्यास कोणत्याही थराला जाऊ अशी धमकी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्याचे कारण सांगून त्यांच्याविरोधात चक्क पोलिस तक्रार दाखल करण्याची तयारी पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार मगो पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांना गेल्या सोमवारी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी निवासस्थानी दूरध्वनीवरून संपर्क साधला व २८ जणांची मगोतील फुटीरांची यादी तयार करून त्यांना कोणत्याही पद्धतीत मगो पक्षात फेरप्रवेश देण्यात येणार नसल्याचा ठराव घेण्याचा सल्ला दिला. यावेळी श्री.राऊत यांनी हा सल्ला पोरकटपणाचा कळस असल्याचे सांगून पक्षाच्या माजी नेत्यांना फेरप्रवेश देण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतल्याची माहिती त्यांना दिली. याप्रकरणी खलप किंवा जल्मी मगो पक्षात येण्याबाबत पक्षाकडे कोणताही प्रस्ताव नसताना ढवळीकरबंधु एवढे अस्वस्थ का झाले आहेत,असा जाब विचारून कुणाला पक्षात घ्यावे व घेऊ नये याचा अंतिम निर्णय केंद्रीय समिती घेणार असल्याने नवा ठराव घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. यानंतर सदर तथाकथित नेत्यांना पक्षात घेतल्यास आपण कोणत्याही थराला जाणार,अशी धमकी श्री.ढवळीकर यांनी दिल्याचे श्री.राऊत म्हणाले. दुसरीकडे पक्षाचे अन्य आमदार दीपक ढवळीकर यांच्या समर्थकांनी मगो युवाशक्ती असे नामाभिधान करून पक्षाच्या मुख्यालयात धिंगाणा घातल्याचेही ते म्हणाले. पक्षाची आमसभा बोलवा, तिथे आपले ५०० कार्यकर्ते आणू असेही ते वारंवार सांगत असल्याने याबाबत सावध भूमिका घेण्यासाठीच ही तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री.राऊत म्हणाले.
फोंड्यातील कॉंग्रेस नेत्याचा डाव ?
दरम्यान, मगोच्या लोकप्रियतेमुळे बेचैन झालेल्या काही कॉंग्रेस नेत्यांकडून ढवळीकरबंधुंना शह देण्यासाठी व पर्यायाने मगो पक्षाचे खच्चीकरण करण्यासाठी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हे नाटक सुरू असल्याचा आरोप ढवळीकर समर्थक गटाने केला आहे. या प्रकरणी फोंड्यातील एका बड्या कॉंग्रेस नेत्याचा हात असून भविष्यात आपली राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याचे संकेत त्यांना मिळाल्याने त्यांच्याकडून हा डाव रचला जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

माओवाद्यांना वगळून नेपाळात नवे सरकार!

काठमांडू, दि. ६ - माओवाद्यांना वगळून नेपाळमध्ये २१ पक्षांचे नवे आघाडी सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी विविध पक्षांना राष्ट्राध्यक्ष डॉ. रामबरन यादव यांनी येत्या शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत सदर पक्षांनी सरकार स्थापण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
नवे सरकार स्थापन करण्यासंदर्भात या २१ राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक काल येथे पार पडली. माओवाद्यांना मात्र या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. "सीपीएन' व "युएमएल' या मुख्य पक्षांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. नेपाळमधील संसद सदस्यांची संख्या ६०१ असून राष्ट्रीय मतैक्याचे सरकार स्थापन करू इच्छिणाऱ्या पक्षांचे संख्याबळ सुमारे २८० च्या आसपास आहे. माओवाद्यांना लष्करात स्थान देण्याच्या मुद्यावरून तीव्र मतभेद उफाळल्यानंतर प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली नऊ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारने राजीनामा दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नेपाळचा प्रवास अराजकाच्या दिशेने सुरू झाला आहे.

दहशतवादी कसाबवर ८६ आरोप निश्चित

मुंबई, दि. ६ - भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, नागरिकांची हत्या करणे, हत्येचा कट रचणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, बेकायदा संघटनेचे सदस्य असणे, बेकायदेशीरपणे स्फोटके-शस्त्रास्त्र बाळगणे असे एकूण ८६ आरोप विशेष कोर्टाने आज दहशतवादी अजमल कसाबवर निश्चित केले आहेत. त्याशिवाय, मारले गेलेले नऊ दहशतवादी, सबाऊद्दीन, फहीम अन्सारी आणि पाकिस्तानातल्या ३५ वॉंटेड दहशतवाद्यांवरही गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र, कसाबने या आरोपांचा इन्कार केला. ये सबकुछ गलत है , हमे मंजूर नहीं, असे उत्तर त्याने गांभीर्याने दिले आणि नंतर तो छद्मी हसला.
२६ / ११ हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांवर आज आरोप निश्चित होणार होते. त्यामुळे सगळ्यांचेच सुनावणीच्या आजच्या २२ व्या दिवसाकडे लक्ष लागले होते. पोलिसांनी चौकशीनंतर कसाबवर ठेवलेले आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष कोर्टात मांडले होते. त्यापैकी ८६ आरोप न्या. ताहिलियानी यांनी निश्चित केले. त्यात देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा सगळ्यात गंभीर आरोप कसाबवर ठेवण्यात आलाय. त्याशिवाय, आर्म्स ऍक्ट, एक्सप्लोसिव्ह ऍक्टची कलमेही त्याच्यावर लावण्यात आली आहेत. सीएसटी स्टेशन आणि कामा हॉस्पिटल परिसरात ७२ नागरिकांना मारल्याचा गुन्हाही कसाबवर आहे. त्यापैकी सात जणांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या कसाबच्याच एके ४७ मधल्या असल्याचेही सिद्ध झाले. त्याशिवाय टॅक्सीमध्ये बॉम्ब ठेवल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

ब्रह्मानंद स्वामीजींचा आज सप्तम पुण्यतिथी महोत्सव

पणजी, दि. ६ - श्री क्षेत्र तपोभूमीचे संस्थापक प. पू. ब्रह्मानंद स्वामी महाराजांची सातवी पुण्यतिथी उद्या गुरुवार ७ मे रोजी तपोभूमी गुरुपीठात भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. प. पू. राष्ट्रसंत ब्रह्मानंदाचार्य स्वामींनी समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेतला होता. स्वामींनी आपल्या अविरत सत्कार्याद्वारे इतरांकरिता स्वतः चंदनाप्रमाणे झिजले व हजारो लोकांच्या संसारात परिमळ फुलवला. पू. स्वामींच्या अशा अवर्णनीय, महान सत्कार्याप्रति कृतज्ञता म्हणून सालाबादप्रमाणे यंदाही स्वामींची पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी स्वामी ब्रह्मेशानंदाचार्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ७ वा. विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी सभापती प्रतापसिंग राणे व सौ. विजयादेवी राणे, उद्योगपती अशोकराव चौगुले, तसेच कायदेपंडित मनोहर उसगावकर यांचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमास खानापुरचे आमदार प्रल्हाद रेमाणी, उज्जैन संस्कृत विद्यापीठाचे उपकुलगुरू किशोरजी मिश्र, आमदार दिलीप परुळेकर, दै. गोमंतकचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष नाईक, नाशिकचे भालचंद्र बागड, मुंबई पालघरच्या पद्मनाभ संप्रदायाचे अध्यक्ष प. ल. राऊत उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सकाळी ५ वा. काकड आरती, प्रातःस्मरण, ७ ते १२ पर्यंत नवदाम्पत्यांकडून समाधी मंदिरात महाभिषेक, त्यानंतर पाद्यपूजा होईल. यावेळी यजमान सौ. व श्री. सूजन नाईक हे यांना यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यानंतर आरती, दर्शन, व महाप्रसादाने सकाळच्या सत्राची सांगता होईल.
या कार्यक्रमास समस्त सांप्रदायिकांनी उपस्थित राहून गुरुकृपेस पात्र व्हावे असे आवाहन पद्मनाभ शिष्य संप्रदायाचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर, सचिव सच्चिदानंद नाईक, खजिनदार सुदेश नाईक यांनी केले आहे.

Wednesday 6 May, 2009

आणखी तीन बेपत्ता महिलांप्रकरणी महानंद नाईकची कसून चौकशी

रिमांडसाठी आज न्यायालयात
फोंडा, दि.५ (प्रतिनिधी): फोंडा भागातील चार युवतीचे खून आणि एका युवतीवरील बलात्कार प्रकरणातील "सीरियल किलर' संशयित आरोपी महानंद रामनाथ नाईक (तरवळे शिरोडा) याच्या पोलीस कोठडीतील चौदा दिवसांचा रिमांड बुधवार ६ मे रोजी समाप्त होत असून संशयित महानंदला बुधवारी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात उभा केला जाणार आहे. दरम्यान, संशयित महानंद याची आमलाई, पंचवाडी आणि निरंकाल येथील युवतींच्या बेपत्ता प्रकरणांमध्ये कसून चौकशी केली जात आहे.
महानंद नाईक याला सुरुवातीला शिरोडा येथील एका युवतीच्या बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चौदा दिवसांचा रिमांड येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना संशयित महानंद याने चार युवतींचे त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी खून केल्याची कबुली दिली आहे. बलात्कार प्रकरणाच्या तपासानंतर आता संशयित महानंद याला कुर्टी फोंडा येथील कु. योगिता ऊर्फ बालिका नाईक हिच्या खून प्रकरणी अटक केली जाणार असून तपासासाठी न्यायालयाकडून रिमांड घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
संशयित महानंद नाईक याने आत्तापर्यंत चार युवतींच्या खुनांची कबुली देऊन खळबळ माजवली असून त्याला "सीरियल किलर' असे संबोधण्यात येत आहे. तो "कोल्ड ब्लडेड' गुन्हेगार असून शांतपणे आणि एकाच पद्धतीने युवतींना आपल्या जाळ्यात ओढून सोन्याच्या दागिन्यासाठी युवतीचे खून करणारा संशयित महानंद आणखी काही प्रकरणात गुंतलेला असण्याची शक्यता लोकांकडून व्यक्त केली जात आहे. चारही युवतीच्या खुनाच्या प्रकरणात साम्य आहे. एकाच पद्धतीने महानंद याने त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्याचा खून केला.
संशयित महानंद नाईक याने दर्शना नाईक हिचा १९९४ साली बांबोळी येथे खून केल्याची कबुली दिली आहे. १९९५ साली सप्टेंबरमध्ये खांडेपार येथे वासंती गावडे हिचा खून, २००७ साली सावर्डे येथे मापा पंचवाडी येथील कु. केसर नाईक आणि जानेवारी २००९ मध्ये नागझर कुर्टी येथील कु. योगिता नाईक हिचा सत्तरी तालुक्यातील मोर्ले येथे काजू बागायतीमध्ये नेऊन खून केल्याची कबुली दिली आहे. १९९५ साली वासंती गावडे बेपत्ता प्रकरणी संशयित महानंद नाईक याला अटक सुध्दा करण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी संशयितांची पोलिसांनी कसून तपास केला असता तर हे मोठे प्रकरण घडले नसते, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यावेळी वासंती या युवतीचा खून करून सुध्दा प्रकरणातून सहीसलामत सुटल्याने "तो' निर्ढावला.
आत्तापर्यंत चार वर्षात चार खुनाची कबुली दिली आहे. त्यामुळे इतर काळात संशयित महानंद याने काय केले? यासंबंधी सविस्तर माहिती मिळविण्याची गरज निर्माण झाली असून पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संशयित महानंद नाईक याचा या भागातील आणखी काही प्रकरणात सहभाग असल्याचे लोकात उघड बोलले जात आहे. त्यादृष्टीने तपास होण्याची गरज आहे. वाजे शिरोडा येथील एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे. सदर महिलेच्या अंगावरील दागिने नाहीस झाले होते, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. खाजोर्डा बोरी येथे दुर्गम भागात एका युवतीचा विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. संशयिताची खून करण्याची पद्धतीला मिळताजुळता असा हा प्रकार असल्याने याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
संशयित महानंद नाईक पोलिस अधिकाऱ्यांना स्वतःहा कोणतीही माहिती देत नाही. एखाद्या प्रकरणासंबंधी पोलिसांकडून विचारणा झाल्यास आपणाला त्या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याचे सांगतो. केसर नाईक हिच्या खुनांची कबुली "केशव' हे नाव उच्चारल्याने संशयिताने दिलेली आहे. केसर नाईक हिच्या कुटुंबीयांच्या जबान्या पोलिसांनी नोंदवून घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, हेडकॉस्टेबल सोनू परब, सावळो नाईक याप्रकरणी तपास करीत आहेत.
-------------------------------------------------------
निष्पक्ष चौकशीची भाजपची मागणी
महानंद एकटाच होता की आणखी कोणी त्याचे साथीदार आहेत, त्याची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपने केली आहे. बंद करण्यात आलेल्या फाईली ही पोलिसांची निष्क्रियता असून, १९९५ साली पकडलेल्या महानंदला सोडण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्याचे दडपण आले होते, तेही पोलिसांनी उघड करावे, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी म्हटले आहे.

न्यायालय समितीकडून आरोग्यसेवेच वाभाडे

मेडिक्लेमवर डल्ला!
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे गेल्या बऱ्याच काळापासून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणलेल्या अद्ययावत यंत्रसामग्री आणि इस्पितळाच्या आधुनिकरणाचा एका बाजूने डंका पिटत असताना दुसरीकडे हे इस्पितळ म्हणजे नुसते गैरसोयींचे आगर बनले असल्याचे आता खुद्द न्यायालयाच्या एका समितीच्या पाहणीवरून सिद्ध झाले आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेत सर्वत्र अनागोंदी आणि बजबजपुरीच माजली असून अनंत अशा गैरसोयींमुळे रुग्णांची नुसती फरफट चालली असल्याचे समितीच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आरोग्य सेवेबाबत सर्वत्र आलबेल सुरू असल्याचा सरकारकडून केला जाणारा दावा या अहवालामुळे फोल ठरला आहे.
राज्यातील सरकारी इस्पितळातील वैद्यकीय सुविधा आणि उपचारांची पातळी पुरती खालावल्याने रुग्णांची नुसती हेळसांड होत असल्याची याचिका प्रकाश बी. सरदेसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काही महिन्यांपूर्वी दाखल केली होती. आरोग्यासंबंधीच्या या विषयाकडे तितक्याच गांभीर्याने पाहताना न्यायालयाने संबंधित विषयाची खातरजमा करण्यासाठी प्रथम "ऍमिकस क्युरी" व नंतर "ऍमिकस क्युरी"च्या नियंत्रणाखाली वकिलांची एक खास समिती नियुक्त केली होती. सरदेसाई यांनी केलेले आरोप आणि एकूण वस्तुस्थितीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने या समितीला दिला होता. पैकी अहवालाचा पहिला भाग समितीने यापूर्वीच न्यायालयाला सादर केलेला असून त्यात इस्पितळांतील गैरकारभाराचे समितीने वाभाडेच काढले होते, आता या अहवालात प्रत्यक्ष गैरसोयी आणि भ्रष्टाचारांची साधने यावरच बोट ठेवण्यात आले आहे. समितीच्या हवालामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधांचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. विशेष म्हणजे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या नावाखाली सरकारी इस्पितळांतील रुग्णांची सर्रास खाजगी इस्पितळात रवानगी करण्यात येते व "मेडिक्लेम' योजनेतून मोठ्याप्रमाणात मलई खाण्याचेच उद्योग सुरू असल्याचा सनसनाटी प्रकारही या अहवालाच्या निमित्ताने पुढे आला आहे. "गोमेकॉ' सहीत मडगाव येथील हॉस्पिसियो तसेच म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील गैरसोयींवरही या अहवालात बोट ठेवण्यात आलेले आहे.
वरील सर्व इस्पितळांमधील बरीच यंत्रणा ही बरीच जुनी असून त्यातील अनेक यंत्रणे मोडकळीस आलेली आहेत. अनेक विभागांमध्ये तांत्रिक तसेच अन्य मनुष्यबळाचा अभाव असल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या सेवेवर होत असल्याचेही उघड झाले आहे. यंत्रे असली तर माणसे नाहीत आणि माणसे असली तर यंत्रणांची पुरेशी देखभाल नाही अशा विचित्र कोंडीत सरकारी इस्पितळांचा कारभार अडकला आहे. मुळात सरकारी इस्पितळात सोय नसलेल्या उपचारांसाठी खाजगी इस्पितळात दाखल करण्याची सोय "मेडिक्लेम' योजनेव्दारे करण्यात आल्याने केवळ ऐनकेन निमित्त काढून खाजगी इस्पितळात चांगल्या सुविधा देण्याच्या निमित्ताने "मेडिक्लेम' सारख्या योजनेचा अक्षरशः गैरवापर होत असल्याचेही उघड झाले आहे. या योजनेचा लाभ उठवत अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेण्याचा सपाटाच चालवल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील खाजगी इस्पितळांकडून मनमानीपध्दतीने शुल्क आकारण्यात येतात. सरकारी इस्पितळांच्या संगनमताने काही खाजगी इस्पितळांकडून "मेडिक्लेम' योजनेचा लाभ उठवण्यासाठी एक नियोजित टोळीच कार्यरत असल्याचेही समितीने नमूद केले आहे.
न्यायालय समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील अहवालात अन्य काही निरीक्षणे खालील प्रमाणे आहेतः
रुग्णांकडून सादर होणारी सरकारी इस्पितळातील बिले त्वरित फेडली जातात मात्र खाजगी इस्पितळातील बिले अवाढव्य करून ठेवली जातात. अनेकवेळा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही उपचार केल्याची बिले लावली जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे सरकारी इस्पितळातून खाजगी इस्पितळात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंची सरासरी पाहण्याची गरज असल्याचे मत या समितीने व्यक्त केले आहे.
- गोमेकॉ इस्पितळात कमी दरात जेवण व चहा मिळणारे एकच कॅन्टीन सुरू आहे. परंतु, याठिकणी मिळणारे खाद्य पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने मारक असल्याचे उघड झाले आहे. कॅन्टीनमध्ये खाद्य पदार्थावर "माशांचा' वावर आढळून आला आहे. सर्व डॉक्टर आणि रुग्णांनाही बळजबरीने हे खाद्य पदार्थ खाणे भाग पडते. इस्पितळाच्या आवारात मधोमध "नेसकॅफे' सेंटर आहे. या ठिकाणी अत्यंत महागड्या दरात चहा, कॉफी व अन्य खाद्य पदार्थ पुरवले जातात. कनिष्ठ डॉक्टर आणि रुग्णांना हे दर न परवडणारे आहेत. गेल्या वर्षी याठिकाठी दोन कॅन्टीन सुरू होती. परंतु, काही महिन्यापासून त्यांना अचानक काहीही कारण न देता नोटिसा बजावून बंद पाडण्यात आली.
रक्तपेढी विभाग
या विभागात चांगल्या पाच तज्ज्ञांची गरज असून सध्या याठिकाणी केवळ तीन साहाय्यक कार्यरत आहेत. या विभागात एकमेव नियमित तज्ज्ञ महिलेची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आल्याने इथे अन्य कोणाचीच नियुक्ती केलेली नाही. दर महिन्याला १५० रक्त पॅकेट जमा केले जातात त्यामुळे त्याचे जतन करण्यासाठी उत्तम रक्तपेढीची गरज आहे. सध्या इथे असलेले दोन "फ्रीज' वीस वर्षापूर्वीचे आहेत हेही उघड झाले आहे. वीज खंडीच झाल्यानंतर या "फ्रिज' ना विजेचा पुरवठा करणारा "युपीएस'ही बंद असल्याचे नमूद केले आहे.
पॅथॉलॉजी
दर दिवसाला या विभागात ५० रुग्ण चाचणीसाठी येतात. त्यानुसार एका महिन्याला हा आकडा १५ हजार येवढा होतो. याठिकाणी असलेली यंत्र व्यवस्थित चालत नाही, त्याचप्रमाणे त्यांची खरेदी करण्यासाठी कोणतीच पावलेही उचलण्यात आलेली नाही. येथे केवळ ४ साहाय्यक असून ती संख्या एकदम अपुरी आहे.
पॅथॉलॉजी प्रयोगशाळा
यात अनेक यंत्र आहेत परंतु, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ती यंत्र वापराविना पडून आहेत. ३ कर्मचारी असून एका दिवसाचे काम हाताळण्यासाठी याठिकाणी १० तज्ज्ञाची गरज आहे. तसेच "रिर्पोट' तयार करण्यासाठी नियमित तत्त्वावर एका कारकुनाचीही गरज आहे. या प्रयोगशाळेवर कामाचा तणाव अतिरिक्त असून दोन प्रयोगशाळेचे काम एकच प्रयोगशाळा करीत असल्याचे म्हटले आहे.
जैव-रसायन विभाग
या विभागात एक "बायोकॅमिस्ट', १ तज्ज्ञ व एक साहाय्यकाची अत्यंत गरज आहे. कनिष्ठ अस्थितज्ज्ञांची जगा अद्याप भरलेली नाही. योग्य तंत्रज्ञानाचा अभाव. तसेच कामगारांसाठी शौचालय नाही.
रेडिओलॉजी विभाग
यात २ वरिष्ठ रेडिओलॉजीस्ट आणि २ कनिष्ठ रेडिओलॉजीस्ट आहे. अजून एक कनिष्ठ रेडिओलॉजीस्टची गरज आहे. तसेच वातानुकूलित चालत नसल्याचे नमूद केले आहे.
सी.टी स्कॅन
हे यंत्र वापरण्यासाठी एकही तज्ज्ञ नसून ते हाताळण्यासाठी २ नियमित तत्त्वावर सहाय्यकांची गरज असल्याचे म्हटले आहे.
एक्स रे
आठ तंत्रज्ञ या विभागा असून आलटून पालटून ते कामावर असतात. एक्स रे काढण्यासाठी वापरले जाणारे यंत्र फार जुने असून त्याचा दर्जाही योग्य नसल्याचे म्हटले आहे.
अल्ट्रा साउंड
या विभागात साहाय्यकाची अत्यंत गरज आहे. तसेच २ परिचारिकांचीही आवशक्यता आहे. वातानुलीतही बंद अवस्थेत आहे.
महिला वॉर्ड
रुग्णांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून औषधांचे पैसे आकारले जातात जी औषधे इस्पितळात मोफत दिली जातात. ८० टक्के औषधे ही इस्पितळातून पुरवली जातात. इस्पितळात हलगर्जीपणाचा उच्चांक म्हणजे, यात अतिदक्षता केंद्र नाही. तसेच शुद्ध हवा येण्याचीही व्यवस्था नाही.
...अन्य निरीक्षण
इसस्पितळातीच शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था. वीज प्रवाह खंडीत झाल्यावर तो सुरळीत ठेवण्यासाठी "जनरेटर' ची योग्य सुविधा नाही,अशा अनेक त्रृटी समितीने उघड केल्या आहेत.
------------------------------------------------------------------
खाजगी इस्पितळांची अशीही लूट !
कदंब महामंडळाचे एक कर्मचारी जयंत रेडकर यांना "डायलेसीस'च्या उपचारासाठी खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. या उपचारावर त्यांना सुमारे तीन लाख रुपये खर्च आला,अखेर पैसे संपल्याने त्यांना मडगाव येथील हॉस्पिसीयो इस्पितळात हलवण्यात आले. याठिकाणी त्यांची चाचणी झाल्यानंतर त्यांना "डायलेसिस' उपचाराची गरजच नव्हती असे आढळून आले. "मूत्रपिंड' उत्तम असतानाही त्यांच्यावर तीन लाख रुपयांचे उपचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------

चौगुले शिपयार्डचे कामुर्लीतील कार्यालय खाक; १ कोटींची हानी

मडगाव, दि.५ (प्रतिनिधी) : चौगुले कंपनीच्या शिपयार्ड कार्यालयाला काल रात्री लागलेल्या भयंकर आगीत संपूर्ण कार्यालय खाक होऊन सुमारे एक कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली.
काल मध्यरात्रीनंतर लागलेली ही आग विझविण्यासाठी वेर्णा, मडगाव, फोंडा, कुडचडे, जुने गोवे,पणजी,वास्को येथून मिळून ८ अग्निशामक दलांनी धाव घेतली व आग विझवण्यासाठी १२ खेपा घालून ४८ हजार लिटर पाण्याचा मारा केला. आग विझवण्याचे काम आज दुपारपर्यंत सुरू होते.
अग्निशामक दलाचे तसेच पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी आगीचे वृत्त मिळताच घटनास्थळी आले. जुवारी नदीच्या काठावर हे शिपयार्ड असल्याने आगीचा उसळलेला लोट दूरवरवरूनही दिसत होता. या परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली . आगीचे नेमके कारण कळले नसले तरी ती शॉटसर्किटमुळे लागली असावी असे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.
या आगीत ८ लॅपटॉप, ७५ संगणक, १८ वातानुकूलन यंत्रे, ११ खुर्च्या, ७० टेबले व ६ कपाटे खाक झाली. कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी आणलेल्या उच्च दर्जाच्या फर्निचरचा त्यात समावेश होता.
आग विझवण्याची मोहीम डी. डी. वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली व त्यांना एस. आमोणकर, पी. जी. वेळीप, बी. बी. शेख, श्री. पाळणी, श्री. धावस्कर, एन. एच. वेर्णेकर, मॅथ्यू वाझ या संबंधीत स्टेशनवरील अधिकाऱ्यांनी तथा जवानांनी मदत केली.

पर्वरी दरडीचे काम 'जैसे थे' सरकारी निष्क्रियतेचे संतापजनक दर्शन

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) : पर्वरी येथे ४ सप्टेंबर २००७ रोजी राष्ट्रीय महामार्गाजवळील कोसळलेल्या दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम गेल्या २० महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे सरकारी निष्क्रियता म्हणजे काय याचा संतापजनक अनुभव तेथून जाणारे वाहनचालक व नागरिक "याचि देही याचि डोळा' घेत आहेत.
ही दरड आता तिसऱ्या पावसाळ्याचा सामना करणार आहे. एकीकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून आपल्या सरकारच्या कामगिरीचे गोडवे गायले जात असताना दुसरीकडे या दरडीचे रेंगाळत चाललेले काम सरकारच्या अकार्यक्षमतेचे व निष्क्रियतेचे उघड प्रदर्शनच घडवत असल्याची प्रतिक्रिया लोकांतून व्यक्त होत आहे.
याप्रकरणी सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेल्या दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे गेल्या मार्च २००८ मध्ये कंत्राट देण्यात आले होते. हे काम राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने त्यासंबंधी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग रस्ता प्राधिकरणाची परवानगी ३० मार्च रोजी मिळाल्यानंतरच या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या कामासाठी दोघा कंत्राटदारांकडून प्रस्ताव सादर झाले होते. त्यात १.७० कोटींच्या मूळ रकमेच्या २० टक्के कमी रकमेने निविदा सादर करून धारगळकर नामक एका कंत्राटदाराने हे काम मिळवले. मुळात हे कंत्राट मिळवण्यासाठी कुणा एका बड्या कंत्राटदाराने धारगळकर यांच्या नावाने हे कंत्राट घेतले होते. तथापि, कंत्राट मिळवल्यानंतर काही काळातच त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने या कामाची पूर्ण जबाबदारी धारगळकर यांच्यावर पडली. हे काम करण्यासाठी जी यंत्रणा त्यांच्याकडे असायला हवी ती अजिबात नसल्याने एवढ्या मोठ्या दरडीचे काम केवळ चार ते पाच कामगार करीत असल्याचे विचित्र चित्र तेथे पाहायला मिळत होते. सुरुवातीचे आठ दिवस याठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माती हटवण्यात आली. मात्र हे काम पुढे जाईनासे झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यासमोर पेच निर्माण झाला होता. हे काम चार महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन निविदेत असले तरी सुमारे २८० मीटर संरक्षक भिंतींपैकी केवळ काही भागाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामाला गती मिळवून देण्यासाठी सा.बां.खात्याकडून आता हे काम अन्य कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नव्या कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली असली तरी हा प्रकारही "येरे माझ्या मागल्या'प्रमाणेच सुरू आहे. गोव्यात जूनमध्ये मान्सूनचे आगमन होत असल्याने सध्याच्या परिस्थितीत जोरदार पाऊस सुरू झाल्यास ही दरड पुन्हा कोसळू शकते. त्यामुळे पुन्हा महामार्गावर वाहतुकीच्या कोंडीची शक्यता नाकारता येत नाही.
ही दरड मोकळी करण्यासाठी गेल्यावेळी सरकारला सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्च आला होता. त्यातील सुमारे १.५० कोटी रुपये केंद्र सरकारने दिले व ८५ लाख रुपये राज्य सरकारने खर्च केले. आता संरक्षक भिंतीसाठी १.२४ कोटी रुपये खर्च येणार आहे. एवढे करूनही हे काम पूर्ण झाले नाही व ही दरड पुन्हा कोसळली तर त्यावर आणखी सुमारे कोटी रुपये खर्च येणार आहे. या पार्श्वभूमीवर सदर दरडीचा वापर कंत्राटदारांचे उखळ पांढरे करून आपले खिसे भरण्यासाठी तर होत नसावा ना, असा असा सवालही उपस्थित केला जात आहे.

'कसाब काश्मीरमुक्ती संग्रामातील योद्धा' फाशी वाचविण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. ५ : सातत्याने काहीतरी नवे घडणाऱ्या मुंबई हल्ल्यातील आरोपी कसाबच्या खटल्याच्या सुनावणीत आज बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्व आरोपींची फाशीची शिक्षा वाचविण्यासाठी भारतीय दंड विधानातील त्रुटींचा वापर करण्याचा मार्ग अवलंबिला. कसाब हा जम्मू-काश्मीर मुक्ती संग्रामातील योद्धा असल्याचे सांगून त्याला भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप लागू होत नाही, असा नवाच युक्तिवाद त्याच्या वकिलांनी आज केला.
मुंबई हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल आमीर कसाब याच्याविरुद्ध एकूण ३१५ आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा आरोप भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, हा आहे. या आरोपाच्या अनुषंगाने कसाबला कठोरतम शिक्षा होऊ शकते. या शिक्षेपासून कसाबचा बचाव करण्यासाठी त्याच्या वकिलांनी आज हा आरोप कसाबवर लागू होत नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला. त्यांनी म्हटले की, कसाबचा मुंबई हल्ल्यातील समावेश हा जम्मू-काश्मीर मुक्ती संग्रामाचा एक भाग आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम १८ नुसार जम्मू-काश्मीर हे भारताचा भाग मानले जाऊ शकत नाही. त्यामुळे कसाबने भारताविरुद्ध युद्ध पुकारले, हा आरोप यात अंतर्भूत केला जाऊ शकत नाही. याच पार्श्वभूमीवर कसाबविरुद्धचा उपरोक्त युद्ध पुकारल्याचा आरोपही आरोपपत्रातून गाळला जावा, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली.
ही त्यांची मागणी मंजूर झाली आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप हटविण्यात आला तर कसाब मृत्यूदंडापासून वाचू शकतो.

तालिबानींच्या धिंगाण्याने स्वातच्या रहिवाशांची पळापळ

इस्लामाबाद, दि.५ : स्वात खोऱ्यातील शांतता करार संपुष्टात आल्याचे सोमवारी जाहीर केल्यानंतर आज तालिबानी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आपला धिंगाणा सुरू केला. तालिबान आक्रमक झाल्याने स्वात खोऱ्यातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश पाकिस्तानी सरकारने जारी केले आहेत.
तालिबानने संपूर्ण स्वातभर आपले अतिरेकी रस्त्यावर उतरविले असून ते सर्वत्र शस्त्रास्त्रे घेऊन फिरत आहेत. या दरम्यान दिसणाऱ्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांवर ते बेछूट गोळीबार करीत आहेत. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलिस ठाणे, तसेच छावण्यांमध्येच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातही काही ठिकाणी सुरक्षा दल आणि तालिबान्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे.
तालिबान्यांनी मिंगोरा येथील रस्त्यांवर प्रचंड शक्तिशाली स्फोटके पेरली असून येथील पोलिस ठाण्यालाही घेरले आहे. याशिवाय, त्यांनी मिंगोरा परिसरातील सर्किट हाऊस आणि वीजनिर्मिती केंद्रांनाही वेढा घातला आहे. सध्या तालिबानने सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांना आपले लक्ष्य बनविले आहे. त्यांनी ठिकठिकाणी पोलिसांना शरण येण्याचे आवाहन केले आहे.

Tuesday 5 May, 2009

"सीरियल किलर' महानंदची चौथ्या खुनाची कबुली

आणखी एका खुनाचा संशय!
पणजी, तिस्क उसगाव, दि. ४ (प्रतिनिधी)- "सीरियल किलर' महानंद नाईक याने चौथ्या खुनाची कबुली दिली असून १८ जून २००७ मध्ये केसर रघु नाईक या ३३ वर्षीय तरुणीचा सावर्डे येथे एका फॅक्टरीच्या मागे दुपट्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. एकामागून एक खुनाचा उलगडा होत असल्याने आता या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. महानंद याने आणखी एका (म्हणजे पाचव्या) तरुणीचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून सध्या पोलिस तिच्याविषयी त्याच्याकडे चौकशी करीत आहेत.
१९ जून २००७ रोजी राजाराम रघु नाईक (रा. रायचेमळ, मापा पंचवाडी- शिरोडा) यांनी आपली बहीण केसर रघु नाईक (वय ३३ वर्षे) ही १८ जून २००७ पासून बेपत्ता असल्याची तक्रार फोंडा पोलिसांत दिली होती.आपण "केशव' नावाच्या मुलाबरोबर सावर्डे येथे जाते. तो आपल्या आईवडिलांना दाखविण्यासाठी नेणार आहे. त्याने सोबत येताना सर्व सोने घालून यायला सांगितले आहे, असे केसर हिने घरात सांगितले होते. घरातून निघताना तिने बहिणीच्या ४ सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याचा हार, एक सोन्याची साखळी घातली होती. ते एकूण सोने ६० ग्रॅम होते. केसरने त्यावेळी अंगावर चुडीदार व दुपट्टा परिधान केला होता.
फोटो पाहून ओळख पटली
हा "केशव' कुठला हे तिच्या आई व भावाला माहीत नव्हते. आज वृत्तपत्रावरील पहिल्या पानावर महानंद नाईक याचे छायाचित्र पाहिल्यावर हाच तो "केशव' म्हणून त्यांनी आरोपीला ओळखले. त्यांनी लगेच आज फोंडा पोलिस स्थानक गाठले व वर्तमानपत्रातील महानंदचे छायाचित्र दाखवून याच्यासोबत केसर सावर्ड्याला गेली होती, अशी माहिती दिली.
शरीरयष्टीने किरकोळ असलेला महानंद सोन्यासाठीच तरुणींना आपल्या खोट्या आणि फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन त्या तरुणींशी शरीरसुखाची इच्छा प्रकट करून अंगावरील कपडे व दागिने उतरावयाला सांगायचा. त्यांच्या अंगावरील सर्व सोने स्वतःच्या ताब्यात घ्यायचा आणि तरुणी बेसावध असतानाच तिच्याच दुपट्ट्याच्या साहाय्याने गळा आवळून ठार करायचा.
निरीक्षक सी.एल. पाटील
पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या हुशारीमुळेच समाजात खुलेआम फिरणारा सीरियल किलर गजाआड झाला आहे. केवळ एका बेपत्ता तरुणाला आलेल्या दूरध्वनी महानंदचा असल्याचे आढळून आल्याने त्याला चौकशीला बोलावले होते. त्यानंतर मिळत गेलेल्या माहितीच्या आधारे चार खुनांचा व एका तरुणींवर सतत बलात्कार करणाऱ्या नराधमाचा पर्दाफाश झाला.
निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, सचिन पन्हाळकर, संजय दळवी, पोलीस हवालदार सावळो नाईक (एमआरएफ), सोनु परब, महिला पोलीस शिपाई लक्षा आमोणकर यांनी महानंदाने केलेल्या अनेक खुनाची प्रकरणे उघड करण्यात मोलाची कामगिरी केली आहे.
-------------------------------------
केसर गरीब कुटुंबातील...
सावर्डे, (प्रतिनिधी) ः केसर ही गरीब कुटुंबातील असून तिच्या घरी चार बहिणी व दोन भाऊ असा परिवार आहे. एका बहिणीचा विवाह झालेला असून वडिलांचे पंधरा वर्षापूर्वी निधन झाले आहे. केसरचा एक भाऊ बेरोजगार असून दुसरा शाळेत शिपाई म्हणून काम करतो.
केसर ही आपली बहीण बेपत्ता झाल्याची तिचा भाऊ राजाराम याने स्थानिक पंच सदस्यांच्या मदतीने शिरोडा पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. परंतु, दोन वर्षात बहिणीचा शोध न लागल्याने तिचा अज्ञाताने खून केला असावा अशीही शंका त्यांना आली होती. मात्र संशय घ्यावा तर कोणावर घ्यावा याच विवंचनेत तिचा परिवार होता.आज ना उद्या आपली बहीण घरी येईल याच आशेने त्यांनी पोलिसांच्या तपासावर विश्वास ठेवला होता.
केसर ही ढवळी फोंडा येथे फार्ममध्ये काम करत असताना तिची ओळख महानंद याच्याशी झाल्याची शक्यता तिच्या भावाने व्यक्त केली आहे. तसेच केसर बेपत्ता होण्यापूर्वी एक वर्ष अगोदर पंचवाडी येथील सुरत हरिश्चंद्र गावकर ही तरुणी अशाच रितीने नाहीशी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
"केशव' या हाकेनेच खुनाची कबुली
पोलिस निरीक्षक सी.एल.पाटील यांनी तुरुंगात ठेवलेल्या महानंदला आज "केशव' या नावाने हाक मारली. त्यावेळी महानंद बिथरला. घामाने ओलाचिंब झाला. नंतर पोलिस निरीक्षक पाटील यांनी केसरचा फोटो महानंदला दाखविला आणि ही तरुणी कुठे,असे विचारले. त्यावेळी केसर नाईक हिला आपण १८ जून रोजी सकाळी सावर्डे येथे फॅक्टरीच्या मागील बाजूस नेऊन दुपट्याने गळा आवळून ठार मारल्याची कबुली त्याने दिली.त्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिल्याचेही त्याने सांगितले.

पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू करा

उच्च न्यायालयाचा दंत महाविद्यालयाला आदेश


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - दंत महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेले प्रवेश नियमबाह्य असल्याचे न्यायालयात उघड झाल्याने प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने घेण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. राज्य सरकारने अचानक ६० टक्के गुण ग्राह्य धरून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करून दंत महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरव नगर्सेकर यांनी गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती.
भारतीय दंत मंडळाच्या नियमानुसार प्रवेश देणे बंधनकारक असल्याचे यावेळी याचिकादाराच्या वकिलांनी न्यायालयात मांडले. परंतु, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता बदल करणे कठीण असल्याचे यावेळी सरकारी वकिलानी न्यायालयाने आपल्या युक्तिवादात मांडले. न्यायालयाच्या आदेश आम्ही पुढच्या वर्षापासून लागू करतो, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र, सरकारच्या दोनही सूचना फेटाळून लावून न्यायालयाने ही प्रक्रियाच नव्याने घेण्याचे आदेश दिले.
ज्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात विशेष विषयात जेवढे गुण मिळतात त्यातील ६० टक्के गुण ग्राह्य धरून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. पूर्वी एकूण गुणांतून काढण्यात येणाऱ्या टक्केवारीतून प्रवेश दिला जात होता. सध्या महाविद्यालयाने जे नियम लागू केले आहेत, त्यानुसार विशेष विषयात ६० टक्के गुण मिळाले आहेत, त्याच विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाविद्यालयाने ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे दंत महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरव नगर्सेकर याला फटका बसला होता. हा नियम महाविद्यालय लागू करू शकत नाही, असा दावा त्याने आपल्या याचिकेत केला होता. भारतीय दंत मंडळाने घालून दिलेल्याच नियमांचे पालन झाले पाहिजे असा नियम असून गुणवत्ता यादीनुसार महाविद्यालयाने प्रवेश देण्याची मागणी त्याने केली होती.

बेतूल औद्योगिक वसाहतीचा मार्ग खुला


खाणमालकाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - बेतूल औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणारी खाणमालक प्रविणकुमार घोसाळीया यांची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने आता या औद्योगिक वसाहतीचा मार्ग खुला झाला आहे.या भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी सुरुवातीस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळल्यानंतर विशेष अनुमती याचिकेमार्फत या भूसंपादनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार बेतूल येथील नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळातर्फे सुमारे साडेआठ लाख चौरसमीटर जागेची संपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रविणकुमार घोसाळीया यांची बॉक्साईट खाण होती व त्यांनी या भूसंपादन प्रक्रियेला आव्हान दिले होते. मुळातच श्री.घोसाळीया यांनी सरकारकडे केलेल्या करारानुसार ८८ लाख चौरसमीटर जागा बॉक्साइट खाणीसाठी करारावर घेतली होती. हा करार १९६८ साली करण्यात आला होता व त्याची अंतिम मुदत १९९८साली संपली.या ठिकाणी खाणीला लोकांचा वाढता विरोध तर होताच परंतु ही जागा औद्योगिक वसाहतीला संपादीत करण्यात येत असल्याने ही जागा कोणत्याही पद्धतीत पुन्हा एकदा खाणीसाठी देण्याचा प्रश्नच नव्हता,अशी प्रतिक्रिया केपेचे आमदार तथा गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली.बेतूल येथील ही जागा विशेष करून फुडपार्कसाठी निश्चित करण्यात आली होती. मुळात एवढी जागा फुडपार्कला का,असा सवाल करून काही लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने ही जागा औद्योगिक वसाहतीसाठी निश्चित केली असून या वसाहतीचा काही भाग हा फुडपार्कसाठी निश्चित केला होता.
केपेचा आमदार या नात्याने आपण आपल्या मतदारसंघात औद्योगिक वसाहत स्थापण्याचे वचन मतदारांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या वसाहतीसाठीच्या भूसंपादनाचा अडसर दूर केल्याने आता या प्रकल्पाला चालना मिळवून देण्यात येणार असून बेतूल औद्योगिक वसाहतीचा मार्ग या निकालामुळे खुला झाल्याचेही ते म्हणाले.

"सीआरझेड' प्रश्नी दिल्लीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेणार

कामत सरकारला उशिरा आली जाग

पणजी,दि.४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक निकालानंतर "सीआरझेड'प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी घेतला आहे. या शिष्टमंडळात कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व मगो पक्षाचे प्रतिनिधी असतील,असे त्यांनी म्हटले आहे. प्रामुख्याने प्रभावीत किनारी भागातील आमदारांनाही या शिष्टमंडळात समाविष्ट करून घेण्याचाही विचार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. मात्र सरकारला हे शहाणपण उशिरा सुचले असले तरी, त्यातून प्रत्यक्षात पदरी काय पडेल याबद्दल अनिश्चितताच दिसून येते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार किनारी नियमन विभाग (सीआरझेड) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातील विविध किनारी भागांत असलेली सुमारे अडीच हजार घरे पाडावी लागणार आहेत.ही कारवाई रोखण्यासाठी सरकार काहीही करीत नसल्याची भावना या लोकांची बनली असून त्याचे दर्शन यावेळी लोकसभेसाठी प्रचार करताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना पावलोपावली घडले.दक्षिण गोव्यात तर हा प्रचाराचा मुख्य मुद्दा होता."गोंयच्या रापणकारांचो एकवट'या मच्छीमार संघटनेचे नेते माथानी साल्ढाणा यांनी याच मुद्दावरून "युगोडेपा'तर्फे उमेदवारी भरली व त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या तोंडचे पाणीही पळाले.
गेल्या विधानसभा अधिवेशनात या मुद्दावरून गरमागरम चर्चा झाली.विरोधी भाजप आणि खुद्द सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच पर्यावरणमंत्री सिकेरा यांना कोंडीत पकडले होते.माथानी साल्ढाणा यांच्या नेतृत्वाखाली पणजीतील आझाद मैदानावर विराट सभेचे आयोजन करून याबाबत सरकारला निर्वाणीचा इशाराही देण्यात आल्याची घटना फारशी जुनी नाही..
दरम्यान,मध्यंतरी लोकसभा निवडणुकीनिमित्ताने आचारसंहिता लागू झाल्याने याप्रकरणी काहीही करता आले नाही, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत व अन्य मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरूनही मोठेच वादळ उठले. अखेर निवडणूक आयोगाने सर्वांना नोटीसा जारी करण्याचा प्रकार घडला. लोकसभा निवडणूक सध्या सुरू असल्याने हा विषय केंद्र सरकारकडे नेणे अशक्य आहे. त्यामुळे याविषयी निष्णात तज्ज्ञांकडून कायदेशीर सल्ला घेण्याचा विचार सरकारने चालवला आहे. या विषयी कायदेशीर तोडगा काढण्याबाबत माजी केंद्रीय कायदा राज्यमंत्री ऍड.रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखालील स्थापण्यात आलेला कायदा आयोगही अभ्यास करीत आहे.
पर्यावरणमंत्री सिकेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने याप्रकरणी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ फली नरीमन व शाम दिवाण यांची भेट घेण्याचे निश्चित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील किनारी भागांत १९९१ नंतर अर्थात "सीआरझेड'कायदा लागू झाल्यानंतर उभी राहीलेली व किनारी नियमन विभागात येणारी बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे राज्यातील पारंपरिक मच्छिमार कुटुंबीय रस्त्यावर येण्याची शक्यता असून या लोकांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी आता सरकार पुढाकार घेणार असून त्यासाठी हे शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला जाणार आहे.
ही राजकीय स्टंटबाजी...
गोव्यात लोकसभा निवडणूक निकालानंतर मोठ्या राजकीय उलथापालथी अपेक्षित असताना अचानक "सीआरझेड'विषयावरून दिल्लीला शिष्टमंडळ नेण्याची घोषणा ही राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.यासंबंधी आचारसंहितेमुळे काहीही करता आले नाही, ही सरकारची भूमिका अजिबात रास्त नाही. सरकारकडून या विषयाचे महत्त्व निवडणूक आयोगाला पटवून देत कायदा आयोगाच्या सदस्यांना दिल्लीत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी पाठवले असते तर त्यातून सरकारचा प्रामाणिकपणा व तत्परता तरी दिसली असती.आता लोकसभा निवडणुकीत केंद्रासह गोव्यातही कॉंग्रेसचा धुव्वा उडण्याची शक्यता असल्याने आपण लोकांसाठी काहीतरी करत आहोत असे भासवण्यासाठी हे शिष्टमंडळ नेण्याचे ठरले आहे,अशी टीका विरोधकांनी केली आहे.

विश्वजित प्रकरणी आज सुनावणी

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी दाखल केलेली मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील व सर्वोच्च न्यायालयातील दोन्ही प्रकरणे उद्या ५ रोजी सुनावणीस येणार आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासंबंधीचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रकरणावर अवलंबून आहे. संसदीय सचिवपदे रद्द झाल्यानंतर आता उर्वरित तीन नेत्यांना दिलेला कॅबिनेट दर्जाही रद्द करावा यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली असून या नेत्यांची भवितव्यही या प्रकरणावर अवलंबून आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ऍड.रॉड्रिगीस यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास हयगय केल्याने जुने गोवे पोलिस निरीक्षकाविरोधातील मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच आमदार आग्नेल फर्नांडिस,डॉ.विल्फ्रेड डिसोझा व एदुआर्द फालेरो यांच्या कॅबिनेट दर्जाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने या दोन्ही प्रकरणी सरकारची कसोटीच लागणार आहे.

नेपाळमध्ये अराजक

पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा

काठमांडू, दि. ४ - नेपाळच्या सैन्यप्रमुखांना बरखास्त करण्याच्या मुद्यावरून पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर देशातील राजकारणाने आता गंभीर वळण घेतले आहे. आज दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे, तर सैन्यप्रमुखांना बरखास्त करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाला माओवाद्यांनी पाठिंबा दर्शविला असून या मुद्यावर आम्ही न्यायालयात जाऊ अशी धमकी दिली आहे.
दरम्यान प्रचंडसमर्थक माओवादी व राष्ट्राध्यक्ष व सैन्यप्रमुख समर्थकांत अनेक ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाकडे बघता काठमांडूत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. नेपाळमधील या गंभीर राजकीय स्थितीकडे बघता भारत सरकारने नेपाळ-भारत सीमेवरील सुरक्षा जवानांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
राष्ट्राला उद्देशून केेलेल्या भाषणात पंतप्रधान प्रचंड यांनी राष्ट्राध्यक्षांवर आरोप केला आहे की, सेनाप्रमुखांना बरखास्त केले असताना त्यांना आपल्याच पदावर कायम राहण्याचा आदेश देणे बेकायदेशीर आहे. नेपाळमधील लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच शांततेसाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत, असे प्रचंड यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. राष्ट्राध्यक्षांचा निर्णय हा लोकशाही व शांतताप्रक्रियेवर करण्यात आलेला हल्ला होय, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. याआधी राष्ट्राध्यक्ष रामबरन यादव यांनी सेनाप्रमुख कटवाल यांना पदावर राहण्याचा आदेश दिला होता. सरकारी आदेशांची अवहेलना करण्याचा सेनाप्रमुखांवर आरोप करीत त्यांना काल पदावरून हटविण्यात आले होते. परंतु पंतप्रधानांच्या या आदेशानंतर काही तासातच राष्ट्राध्यक्ष यादव यांनी सेनाप्रमुखांना आपल्या पदावर कायम राहण्याचे आदेश दिले होते. सेनाप्रमुखांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्राध्यक्ष यादव यांनी म्हटलेेेले आहे की, राष्ट्राध्यक्ष व सरसेनापती या नात्याने आपण पदावर कायम राहावे असा आदेश मी देत आहे. या पत्राच्या प्रती पंतप्रधान कार्यालय व सैन्याच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आल्या.
माओवादी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्यास राष्ट्राध्यक्ष यादव यांनी नकार दिल्यानंतर प्रचंड यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलाविली. या बैठकीत देशातील सध्याच्या स्थितीवर विचारविमर्श करण्यात आला व पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करावे व स्थितीची माहिती द्यावी असा निर्णय घेण्यात आल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांनी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला संबोधून भाषण केले. नेपाळचे सेनाप्रमुख रुख्मांगद कटवाल यांना पदावरून हटविण्याच्या कारवाईला भारतासह अनेक देशांनी विरोध दर्शविला होता, हे येथे उल्लेखनीय. सेनाप्रमुख कटवाल यांना पदावरून बरखास्त करण्याच्या पंतप्रधान प्रचंड यांच्या निर्णयावर नाराज होत सत्तारूढ युतीतील एक प्रमुख पक्ष सीपीएन(युएमएल)ने सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याची घोषणा केली आहे. युतीतील इतर घटकपक्षही प्रचंड यांच्या निर्णयाचा विरोध करीत आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सेनाप्रमुख कटवाल यांनी सेनामुख्यालयात प्रमुख सैन्य अधिकाऱ्यांची बैठक आमंत्रित केली आहे, असे वृत्त रेडिओ नेपाळ एफएमने दिले आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये निर्माण झालेला पेचप्रसंग तातडीने सुटावा आणि तेेथे शांतता निर्माण व्हावी, अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. नेपाळमध्ये निर्माण झालेली स्थिती ही त्या देशाची अंतर्गत बाब असली तरी शेजारी देश म्हणून आम्हाला चिंता वाटत आहे, असे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

Monday 4 May, 2009

राम शेवाळकर कालवश

नागपूर, दि. ३ - आपल्या वक्तृत्वाच्या सुरेल लकेरीवर अवघ्या मराठी जगताला झुलविणारे वाणीऋषी प्राचार्य राम शेवाळकर यांना रविवार दि. ३ मे रोजी देवाज्ञा झाली. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी विजया, पुत्र आशुतोष, सून मनीषा व अपाला नात व मोठा चाहता वर्ग आहे. रविवारी सकाळी उठल्यावर नित्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम सुरू झाला. आंघोळ करून त्यांनी देवपूजा केली. पूजा झाल्यावर त्यांनी जप केला. जप झाल्यावर देवाला नमस्कार करून उठल्यावर त्यांच्या छातीत दुखायला लागले. तशी तक्रार त्यांनी पुत्र आशुतोष यांच्याजवळ केली. त्यानंतर ते वॉश बेसिनजवळ गेले आणि तेथेच कोसळले. त्यांचा मुलगा आशुतोष शेवाळकर यांनी ताबडतोब डॉ. उदय माहुरकर यांना भ्रमणध्वनी केला. घटनेची माहिती मिळताच डॉ. उदय माहुरकर, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर व डॉ. मुंडले यांनी शेवाळकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी राम शेवाळकर यांना तपासले. परंतु तत्पूवीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
शनिवार दि. २ मे रोजी कवी श्याम माधव धोंड यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाला ते जाणार होते. मात्र, मुलगा आशुतोष याचा वाढदिवस असल्याने ते घरीच थांबले.
राम शेवाळकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच साहित्य, संस्कृती, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. यात केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, आ. देवेंद्र फडणवीस, नाट्य परिषद, नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष मदन गडकरी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, उपाध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, वामन तेलंग, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, श्रीपाद अपराजित, चंद्रकांत वानखेडे, महेश एलकुंचवार, ग्रेस, प्रा. वि. स. जोग, निरंजन कोकर्डेकर, नगर सेवक प्रकाश गजभिये, माधव सरपटवार, रवींद्र गंधे, संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, विवेक रानडे, सुप्रसिद्ध प्रवचनकार विवेक घळसासी, भा. ल. भोळे, बाबा नंदनपवार, सरदार अटल बहादूर सिंग, वासुदेवराव चोरघडे, श्याम धोंड, लोकनाथ यशवंत, मधुकर रोडे, रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र सहकार्यवाह डॉ रवींद्र जोशी, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

आणखी एका खुनाची महानंदची कबुली

वासंती गावडेचा खूनी तोच

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - दोन खून आणि एक बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला "सीरियल किलर' महानंद नाईक यांनी तिसऱ्या खुनाची कबुली देऊन संपूर्ण राज्यात खळबळ माजवली आहे. दि. १० सप्टेंबर १९९५ मध्ये वासंती गावडे या १९ वर्षीय तरुणीचा ओपा खांडेपार येथे गळा आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेह खांडेपार नदीत फेकून दिल्याची कबुली आज महानंद याने पोलिसांना दिली. १९९४ पासून महानंद याचे मुलीना फुस लावून त्यांचा खून करण्याचे सत्र सुरू असून अजून काही तरुणींचा खून केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फोंडा परिसरातील बेपत्ता असलेल्या तरुणी आणि ज्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही, अशा तक्रारीची पुन्हा नव्याने तपास करण्याचा निर्णय फोंडा पोलिसांनी घेतला आहे. महानंद याची "नार्को' चाचणी करणे अत्यंत महत्त्वाचे बनलेले असून त्यासाठी न्यायालयातून परवानगी मिळवण्यासाठी उद्या सकाळी फोंडा पोलिस न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महानंदने दिलेल्या कबुली जबाबानुसार, पावसाळा सुरू होता. दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी कु. वासंती हिला सर्व दागिने व बॅंकचा पासबुक घेऊन यायला सांगितले. ""आपले वडील तुला पाहण्यासाठी येणार असून तू सर्व दागिने घालून ये'' असे तिला सांगितल्याने ती गळ्यात दहा ग्रामची सोन साखळी घालून आली होती. तसेच बोरी येथे राहणारा तिचा मावसभाऊ याच्याकडे असलेला बॅंक पासबूकही ती त्यादिवशी घेऊन आली. वसंती अचानक पासबुक का घेऊन जाते, हे पाहण्यासाठी तिचा मावसभाऊही तिच्या पाठोपाठ आला होता. परंतु, महानंद त्याला चकवा देत वासंतीला आपल्या रिक्षात घेऊन खांडेपारच्या दिशेने निघाला. ओपा येथे पाण्याच्या टाकीजवळ जाऊन त्यानी गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर आपण खायला घेऊन येत असल्याचे सांगून महानंदने तेथून काही अंतरावर असलेल्या एका दुकानावर येऊन शीतपेय व बिस्कीट खरेदी केली. त्यानंतर तिला घेऊन तो खांडेपार नदीच्या काठावर असलेल्या एका भाटात आला. येथे तो तिच्याशी तासभर बोलत बसला. मारण्यापूर्वी तिला प्यायला शीतपेय व बिस्कीट खायला दिल्यात. त्यानंतर तिच्याच दुपट्याने गळा आवळला. अंगावरचे दागिने काढले आणि मृतदेह खांडेपार नदीत फेकून दिला. त्यानंतर तिच्या अंगावर असलेली दहा ग्रामची सोनसाखळी त्याने वरचा बाजार फोंडा येथील एका सोनाराला विकल्याची माहिती महानंद याने उघड केली आहे.
सकाळी घराबाहेर पडलेली वसंती घरी परतलीच नसल्याने तिच्या मावसभावाने फोंडा पोलिस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी ज्याप्रकारे बेपत्ता तरुणीची तक्रार हाताळायला हवी तोही त्याप्रकारे न हाताळल्याने तब्बल १४ वर्षांनी या खुनाला वाचा फुटली आहे. वासंती बेपत्ता झाली होती, त्यावेळी संशयित म्हणून महानंद नाईक याचे नाव पोलिसांना देण्यात आले होते. मात्र त्याकडे सवयी प्रमाणे दुर्लक्ष करून आणि महानंद याच्या मोर्चाला पळी बुडून पोलिसांनी त्या तक्रारीची फाईल बंद केली.
याविषयीचा अधिक तपास फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सी एल. पाटील करीत आहेत.

विरोधी पक्षात बसण्याची कॉंग्रेसची तयारी!

झाली पराभवाची जाणीव

नवी दिल्ली, दि. ३ - आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी कॉंग्रेस पक्ष फारसा आशावादी नसल्याचे दर्शवित वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी, आगामी सरकार कॉंग्रेस स्थापन करू शकली नाही तर विरोधी पक्षात बसण्याचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे.
सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत दिग्विजय सिंग बोलत होते. ते म्हणाले की, कोणत्याही पक्षावर सरकार स्थापन करण्याची क्षमता उरली नाही तर विरोधी पक्षात बसण्याचा पर्याय कायम त्यांच्यापुढे खुला असतो. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येऊ शकले नाही तर आभाळ कोसळणार नाही. आमच्याकडे विरोधी पक्षात बसण्याचा पर्याय आहेच.
सध्या कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी विखुरलेल्या स्थितीत आहे. सपा, राजद आणि लोजपा यांनी वेगळी चूल केलीच आहे. मागील वेळी सोबत असणारे डावे पक्ष यावेळी नाहीत. पवारांनीही बिजद आणि डाव्यांसोबत हातमिळवणी केली आहे. अशा स्थितीत कॉंग्रेसला स्वबळावर सरकार स्थापन करणे अतिशय कठीण राहणार आहे. याची जाणीव आता खुद्द कॉंग्रेसलाही झाल्याचे या वक्तव्यावरून लक्षात येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पणजीतील अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - कांपाल ते पणजीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या होंडा सिटी वाहनाने काल मध्यरात्री १ च्या दरम्यान "धेंपो हाऊस'समोरील झाडाला जोरदार दिल्याने वाहन चालक सिल्वीन फर्नांडिस (वय ३२, राहणार परतोवाडो शिवोली) व एल्टन फर्नांडिस (वय १८, राहणार माडेल थिवी) मरण पावले; तर मागच्या सीटवर बसलेला इब्राहिम मिनेझीस (२१) याचे केवळ जखमेवर निभावले. ही धडक एवढी जबरदस्त होती की, वाहनाचा पत्रा कापून अडकलेले सिल्वीन व एल्टन यांना बाहेर काढावे लागले. इस्पितळात नेताना सिल्वीनचे वाटेत निधन झाले तर, एल्टन याचा मृत्यू "गोमेकॉ'त उपचार सुरू असताना झाल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.
काल रात्री जीए ०३ सी ७००० क्रमांकाची होंडा सिटी मोटार घेऊन तिघे मित्र दोना पावला येथे पार्टीला गेले होते. रात्री एकच्या दरम्यान पार्टी संपवून घरी जात असताना हा अपघात झाला. ताशी शंभरच्या किमीच्या वेगाने पणजीच्या दिशेने येणाऱ्या या वाहनावरील चालकाचा ताबा पणजी बाजारात सुटल्याने रस्त्याच्या कडेलाच असलेल्या झाडाला वाहनाने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच १.१५ वाजता जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. वाहन चालक सिल्वीन व बाजूच्या सीटवर बसलेला एल्टन याच्या डोक्याला आणि छातीला जबर मार बसल्याने उपचाराला कोणताही प्रतिसाद न देता मृत्यू झाला. सिल्वीनचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तिघे मित्र पार्टीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वाहनाच्या मागच्या सीटवर बीअरच्या बाटल्याही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले आहे. अपघातात सापडलेली होंडा सिटी पोलिस स्थानकाच्या बाहेर ठेवण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी आज दिवसभर तेथे मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर तपास करत आहेत.

मधलामाज-मांद्रे येथे खुनाचा संशय

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - मधलामाज मांद्रे येथे ३५ ते ४० वयोगटातील एका कामगाराचा मृतदेह आढळून आला असून खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहाच्या बाजूलाच एक फावडे आढळून आले असून त्याच्याच साहाय्याने हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवला आहे.
मृतदेहाला दुर्गंधी येथ असल्याने हा खून काल रात्री झाल्याची शक्यता व्यक्त करून काही संशयितांना पेडणे पोलिसांनी आज रात्री ताब्यात घेतले होते. आज सायंकाळी ७ च्या दरम्यान मधलामाज येथे एका व्यक्तीचा रक्ताळलेला मृतदेह पडलेला असून त्याला दुर्गंधी येत असल्याचा दूरध्वनी पेडणे पोलिस स्थानकावर आला. त्याबरोबर पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई व उपनिरीक्षक सचिन नार्वेकर घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या शरीरावर काही जखमा तसेच एक हात तोडलेला असल्याचे आढळून आले. त्याच्या अंगावर केवळ अतंर्वस्त्र असून शरीर पूर्ण रक्ताने माखलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून त्याठिकाणी आढळून आलेले फावडेही पोलिसांनी जप्त केला आहे.
याविषयीचा अधिक तपास पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम रा.देसाई करीत आहे.

निरीक्षकाविरुद्ध अवमान याचिकाः आज सुनावणी

विश्वजित धमकीप्रकरण
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडे यांच्या विरोधात दाखल केलेली अवमान याचिका उद्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीसाठी घेतली जाणार आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सांगूनही आरोपपत्र दाखल केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करून ऍड. आयरिश रॉड्रिगीज यांनी गोवा खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. गोवा खंडपीठाने यापूर्वी निरीक्षक गावडे यांना नोटीस बजावली आहे.
२३ सप्टेंबर रोजी सरकारी वकिलाने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यावेळी निरीक्षक गावडे न्यायालयात हजर होते. परंतु, त्यानंतर आरोपपत्र दाखल न करता थेट त्या प्रकरणाची फाईलच बंद करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करून ऍड. रॉड्रीगीज यांनी अवमान याचिका दाखल केली आहे.

Sunday 3 May, 2009

गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने संघटित व्हावे - संतोबा देसाई

युवक मेळाव्याचे पर्वरीत उद्घाटन
पणजी, दि.२ (प्रतिनिधी) - "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या बांधवांनी आता संघटित होऊन परस्परांना साहाय्य करण्याची वेळ आली आहे. या समाजातील बांधव आज विविध क्षेत्रांमध्ये उच्चपदी पोहोचले आहेत. त्यांच्या यशाचा उपयोग समाजातील युवा पिढीला व्हावा व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना मिळावा यासाठी युवा मार्गदर्शन मेळाव्यांची गरज आहे,असे प्रतिपादन अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई यांनी केले.
पर्वरी येथील समाजाच्या छत्रपती शिवाजी मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या युवा मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ.उल्हास परब,सचिव सुभाष फळदेसाई,राया नाईक,ऍड.अर्जुन शेटगावकर व आर.जी.देसाई आदी उपस्थित होते.
संतोबा देसाई म्हणाले, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेचे कार्य तळागाळातील समाजबांधवांपर्यंत पोहचण्याची गरज आहे व त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. समाजातील कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये,यासाठी परस्परांना सहकार्य करून पुढे जाण्यासाठी एकदिलाने प्रयत्न व्हावेत.समाज संघटनेतर्फे विविध कार्यक्रम हाती घेतले जात असले तरी हे कार्य अद्याप या समाजाच्या तळापर्यंत पोहचलेले नाही. राज्यातील समाजाच्या सर्व लोकांनी या संघटनेच्या छत्राखाली एकत्र येऊन या समाजाची ताकद सिद्ध करावी.
शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या किंवा अन्य काही कारणांमुळे मागे राहणाऱ्या बांधवांना समाजबंधूंनी मदतीचा हात द्यावा. तसेच समाजाच्या युवा पिढीने विविध क्षेत्रांत यश मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.
मेळाव्यात विविध विषयांवर मान्यवरांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. त्यात सरकारी वकील ऍड.सुभाष सावंतदेसाई,माजी शिक्षण उपसंचालक रायू नाईक,सुभाष फळदेसाई व डॉ.उल्हास परब यांचा समावेश होता. डॉ. परब यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचे प्रयोजन स्पष्ट केले आणि आभार मानले.

"मगो'च्या केंद्रीय समितीत फूट

खलपांच्या फेरप्रवेशावरून वाद
बेशिस्तीला थारा नाही - राऊत


पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- माजी केंद्रीय कायदा राज्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात फेरप्रवेश देण्यावरून आता पक्षाच्या केंद्रीय समितीत सरळ फूट पडली आहे. या प्रश्नावरून सुदिन व दीपक या ढवळीकर बंधूंच्या समर्थकांनी केंद्रीय समितीच्या आजच्या नियोजित बैठकीत धुडगूस घालण्याची जय्यत तयारी केली होती. तथापि, ही बैठकच रद्द झाल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. मगोचा त्याग करून गेलेल्या माजी नेत्यांना कोणत्याही स्थितीत पक्षात फेरप्रवेश देणार नाही, असा निर्धार आमदार दीपक ढवळीकर व त्यांच्या समर्थकांनी केला. दरम्यान, पक्षाध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी या प्रकाराचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे. ढवळीकर बंधूंनी तात्काळ ही बेशिस्त थांबवावी व पक्षांतर्गत वातावरण गढूळ बनवू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
मगो हा बहुजन समाजाचे व्यासपीठ असल्याने बहुजन समाजातील नेत्यांना पक्षात प्रवेश नाकारणे योग्य नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मगो पक्षात सध्या विधिमंडळ गट व केंद्रीय समिती यांच्यात वाद निर्माण झाला आहे. पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पक्षाचे सर्व माजी नेते, त्यांचे समर्थक तथा कुटुंबीय यांना पक्षात फेरप्रवेश करण्याचे आवाहन करण्यात आले होते. केंद्रीय समितीच्या या निर्णयाचे स्वागत करून विविध ठिकाणी माजी नेत्यांना पक्षात पुन्हा आमंत्रण देण्याचे काम जोमात सुरू झाले. उत्तर गोवा युवा अध्यक्ष राघोबा गावडे तसेच जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांद्रेकर आदी नेत्यांनी माजी केंद्रीय कायदा राज्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांना पक्षात फेरप्रवेश देण्याचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला पेडणे मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने इतरही ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. खलप यांच्यासह इतरही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आल्याने एकच खळबळ उडाली. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार दीपक ढवळीकर यांनी मात्र या प्रस्तावाला विरोध करून या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षात जागा दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
आज मगो मुख्यालयात दीपक ढवळीकर यांच्यासह केंद्रीय समितीचे पाच सदस्य हजर होते, असा दावा त्यांनी केला आहे. या सदस्यांत प्रदीप घाडी आमोणकर, नरेश गावडे, प्रताप फडते, लवू मामलेदार, कृष्णनाथ दिवकर यांचा समावेश होता. एकूण १५ सदस्यांपैकी सहा सदस्यांनी आज उपस्थिती लावली. दरम्यान, ढवळीकरबंधूंनी कोणत्याही पद्धतीने हा डाव मोडून काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू केली आहे. मगो युवाशक्ती या नावाने ढवळीकर समर्थक युवा नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून केंद्रीय समितीच्या या निर्णयाला तीव्र हरकत घेतली आहे. १९९७ ते २००९ पर्यंत ढवळीकर बंधूंनी हा पक्ष एकहाती सांभाळला व त्यास संजीवनी मिळवून दिली. आता अन्य पक्षात आपली डाळ शिजत नसल्याने पुन्हा मगोत प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द घडवण्याच्या तयारीत असलेल्या या नेत्यांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. दक्षिण गोव्यातीलही विविध कार्यकर्त्यांकडून या निर्णयाला विरोध करणारी पत्रके प्रसिद्ध होत असल्याने या विषयावरून येत्या दिवसांत बराच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा वाद निरर्थक ः राघोबा गावडे
ऍड. रमाकांत खलप यांना मगो पक्षात फेरप्रवेश देण्याचा प्रस्ताव हा केंद्रीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच सादर केला आहे. आता कुणाला प्रवेश द्यावा व कुणाला प्रवेश देऊ नये, याचा अंतिम निर्णय केंद्रीय समितीला घ्यायचा आहे. या विषयावरून विनाकारण वाद निर्माण करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उत्तर गोवा युवाध्यक्ष राघोबा गावडे व जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांद्रेकर यांनी व्यक्त केली. मगो पक्ष व्यक्तीकेंद्रीत न राहता बहुजनसमाजहिताय व्हावा ही पक्षाची सुरुवातीपासूनची नीती आहे. या पक्षाची त्या दृष्टीने विस्तार व्हावा असेही ते म्हणाले. खलप यांच्या मगो फेरप्रवेशाबाबतच्या प्रयत्नांना जोर आला असता पक्षातील एक गट याविरोधात उभा ठाकला आहे. विश्वजित राणे चालतील पण खलप नकोत, या विधानास त्यांनी तीव्र हरकत घेतली आहे. विश्वजित राणे हे गोव्याचे मंत्री आहेत की सत्तरीचे हे त्यांनी पहिल्यांदा सांगावे. उर्वरित ठिकाणच्या युवकांना घरी पाठवून सरकारी कर्मचाऱ्यांच्या रुपात केवळ आपल्या सत्तरीतील युवकांचा भरणा करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. नव्या नोकऱ्यांत ९० टक्के केवळ सत्तरीवासीयच आहे तर उर्वरित युवकांनी काय करावे, असा सवालही यावेळी करण्यात आला.
ढवळीकर बंधूंना आकाशवाणी
झाली काय ः पांडुरंग राऊत
मगो पक्षाच्या केंद्रीय समितीने पक्षाच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच माजी नेत्यांना पक्षात फेरप्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी अद्याप एकही नेत्याने पक्षाकडे संपर्क साधला नाही. परंतु, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण जन्माची आकाशवाणी झाली, त्याप्रमाणे आता ढवळीकर बंधूंनाही आकाशवाणी झाली की काय, असा टोला पांडुरंग राऊत यांनी हाणला. त्यांनी काही नेत्यांची यादीच तयार केली असून त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात खलप यांच्यासह रवी नाईक, संजय बांदेकर, डॉ. काशीनाथ जल्मी, प्रकाश वेळीप यांचा समावेश आहे. युवाशक्ती या नावाने आपल्या समर्थकांना एकत्र करून काल जो धुडगूस घालण्यात आला त्याची गंभीर दखल केंद्रीय समितीने घेतली आहे, असेही राऊत म्हणाले. पक्षातील अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. या युवाशक्तीने जो धिंगाणा घातला त्याबाबत चर्चा करण्यात आली असून त्यामुळेच केंद्रीय समितीची बैठक रद्द करण्यात आल्याचे राऊत म्हणाले.

विश्वजितविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू

सोमवारी शिक्कामोर्तब होणार
पणजी, दि. २ (प्रतिनिधी) - ऍड. आयरिश धमकी प्रकरणी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला देऊनही त्याबाबत कोणतीही कारवाई न केलेल्या जुने गोवे पोलिसांना तात्काळ आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शर्मिला पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. येत्या सोमवारी (दि. ४ रोजी) हे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीस येणार असून त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी दिली.
आधीच याप्रकरणी वेळकाढू धोरण अवलंबल्याने न्यायालयाच्या कात्रीत सापडलेल्या पोलिसांनी आता न्यायालयाचा अवमान होऊ नये यासाठी आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिगीस यांना "मोबाईल'वरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिस तक्रार जुने गोवे पोलिस स्थानकात करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंत्री राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगून अचानक या प्रकरणाच्या तपासाची फाईलच बंद केली. ही गोष्ट ऍड. रॉड्रिगीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला असता न्यायालयाला आश्वासन देऊन त्याची पूर्तता न करणे ही गंभीर बाब असून त्याची त्वरित पूर्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. गेल्या २३ सप्टेंबर ०८ रोजी सरकारी वकील विनी कुतिन्हो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात युक्तिवाद करताना धमकी प्रकरणात आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे आश्वासन गोवा खंडपीठाला दिले होते. यावेळी न्यायालयात जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडेही उपस्थित होते. तरीही, आरोपपत्र दाखल करण्यात हयगय करण्यात आल्याने व या प्रकरणाचा तपासच बंद करण्यात आल्याने ऍड. रॉड्रिगीस यांनी याला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान दिले. "डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन'च्या सल्ल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला, अशी भूमिका न्यायालयाच्या कात्रीत सापडलेल्या निरीक्षक गावडे यांनी घेतली होती. त्यांच्या या वागणुकीमुळे श्री. गावडे यांच्या विरोधात अवमान याचिकाही सादर करून ऍड. रॉड्रिगीस यांनी त्यांनाही न्यायालयात खेचले आहे.
राजकीय दबावापोटी आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या जुने गोवे पोलिसांना सुरुवातीस या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाची चाहूल लागताच तब्बल २२ दिवसांनी तक्रार नोंद करून घेतली होती व नंतर या प्रकरणाची चौकशीच बंद करून आरोग्यमंत्री राणे यांना "क्लीन चीट'देण्याची तयारी केली होती.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांची पत्नी दीव्या राणे यांच्या मोबाइलवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी ३१ जुलै २००७ रोजी जुने गोवे पोलिसांकडे केली होती. यानंतर मंत्री राणे यांच्या विरोधात भा.दं.सं ५०६(२) कलमानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात आला होता.

समुद्रात बुडून युवकाचा मृत्यू

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) ः कामगार दिनाच्या सुट्टीची संधी घेऊन काल दुपारी चारच्या सुमारास बांबोळी किनाऱ्यावर आंघोळीला आलेल्या १५ जणांच्या गटातील एकजण बुडाला. त्याचे नाव मॅन्युएल आरावज (३५) असे असून तो कांबेसा सांताक्रुझचा रहिवासी असल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.
काल सकाळी कांबेसा सांताक्रुज येथील १५ जणांना गट बांबोळी येथे सहलीसाठी गेला होता. दुपारी जेवणानंतर त्यातील काहीजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. त्यात मॅन्युएल हाही होता. काही काळाने तो खोल पाण्यात पाण्यात गेल्याने गट्यांगळ्या खाऊ लागला. त्यावेळी त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्या सहकाऱ्यांनी केला; मात्र त्यात अपयश आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. त्यानंतर मृतदेह आज नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास आगशी पोलिस करीत आहेत.

"सीरियल किलर'चे नवे प्रकरण उजेडात

वासंती गावडे हिच्या
अपहरणाचा गुन्हा नोंद
फोंड्यात प्रचंड खळबळ

फोंडा, दि.२ (प्रतिनिधी) - फोंडा भागातील दोन युवतींचे खून आणि एका युवतीवरील बलात्कार प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी महानंद रामनाथ नाईक याने वडाळवाडा मडकई येथील कु. वासंती अनंत गावडे (१९ वर्षे) हिचे सप्टेंबर १९९५ मध्ये अपहरण करून तिचा खून केल्याची तक्रार तिचा मावसभाऊ रामनाथ गावडे (शिरशिरे - बोरी) याने फोंडा पोलिस स्थानकावर केली आहे. याप्रकरणी महानंद याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर युवती बेपत्ता झाल्याची कसून चौकशी सुरू असून अद्याप संशयित महानंद याने याप्रकरणी कबुली दिलेली नाही.
संशयित महानंद याने सदर युवतीला नेल्याचे फोंड्यातील अनेकांनी पाहिलेले आहे. १९९५ साली या प्रकरणी चौकशीसुद्धा झाली होती. मात्र, बेपत्ता प्रकरणाचे गूढ उकलण्यात यश आले नव्हते. त्यावेळी संशयित महानंद हा फोंड्यात रिक्षा (जीए ०१ डव्लू ०९२९) चालवत होता. महानंद याला या प्रकरणी त्यावेळी अटक केल्यानंतर त्याने रिक्षाचालकांचा मोर्चा पोलिस स्थानकावर आणून पोलिस आपली नाहक सतावणूक करत असल्याची तक्रार केली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
वासंती गावडे ही युवती शिरशिरे बोरी येथे मावसभाऊ रामनाथ केसू गावडे याच्याकडे राहत होती. वासंतीला हिला खडपाबांध फोंडा येथील राहुल अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये घरकाम मिळाल्याने ती तेथेच राहात होती. १९९५ च्या सुमारास महानंद नाईक हा फोंड्यात रिक्षा चालवण्याचे काम करत होता. यावेळी महानंद आणि वासंती यांची मैत्री झाली. फोंड्यात आपल्या वडिलांचे हॉटेल, दोन - तीन दुकाने आहेत, असे महानंदने वासंतीला सांगून तिला आपल्या सापळ्यात अडकवले. त्यानंतर १० सप्टेंबर ९५ रोजी महानंदने वासंती हिला बॅंकेचे पासबुक घेऊन येण्याची सूचना केली. आपले वडील पन्नास हजार रुपये देणार आहेत. ते पैसे बॅंकेत तुझ्या खात्यावर जमा करू, असेही सांगितले. तसेच आपले वडील तुला पाहणार असल्याने अंगावर दागिने वगैरे घालून येण्याची सूचना त्याने केली.
त्यानंतर वासंती शिरशिरे येथे मावस भावाकडे गेली. कारण त्याच्याकडे तिचे पासबुक होते. ११ सप्टेंबर ९५ रोजी सकाळी बॅंक पासबुक आणि दागिने घालून फोंड्यात आली. यावेळी तिचा मावस भाऊ सुद्धा तिच्यासोबत आला. वासंती ही दादा वैद्य चौकात थांबली आणि मावसभावाला बॅंकेकडे थांबण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर महानंद आपल्या रिक्षातून वासंती हिला घेऊन शांतीनगरच्या दिशेने गेला. त्यावेळी शांतीनगर भागात घनदाट जंगल होते. त्यानंतर वासंती कुणाच्याही दृष्टीस पडली नाही. तिचा मावस भाऊ त्या दिवशी बॅंकेजवळ थांबून शेवटी कंटाळून घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबर ९५ रोजी फोंडा बसस्टॅण्डवर येऊन महानंदची चौकशी केली. मात्र, तो सापडू शकला नाही. त्यानंतर १३ सप्टेंबर ९५ रोजी वासंती गावडे बेपत्ता झाल्याची तक्रार फोंडा पोलिस स्थानकावर दाखल केली. पोलिसांनी वासंती बेपत्ता प्रकरणी चौकशीसाठी महानंद याला बोलावले आणि त्याला संशयित म्हणून सीआरपीच्या ४१ कलमाखाली अटक केली. मात्र, त्याच्याकडून काहीच माहिती न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आले. यानंतर श्री. गावडे यांनी बॅंकेकडे वासंती गावडे बेपत्ता असल्याची तक्रार केली, तिच्या खात्यातील रकमेचा व्यवहार कुणाशीही करू नये, अशी मागणी केली. फोंड्यातील दोन युवतींचे खून आणि एका युवतीवरील बलात्कार प्रकरणाची माहिती वृत्तपत्रांतून समजल्यानंतर आपल्या मावसबहिणीलाही याच प्रकारे पळवून नेऊन मारले असावे, असा संशय मनात निर्माण झाला. रामनाथ गावडे याने २ मे ०९ रोजी फोंडा पोलिसांशी संपर्क साधून १९९५ सालातील बेपत्ता प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी १९९५ सालातील जुनी फाईल पुन्हा उघडून तपासाला सुरूवात केली असून अद्याप संशयित महानंद याने या प्रकरणाची कबुली दिलेली नाही. मात्र, वासंतीला पळवून नेल्याचे पुरावे हाती लागल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर तपास करत आहेत.

महानंदची नार्को चाचणी
फोंड्यातील युवतींच्या खून आणि बलात्कार प्रकरणात गुंतलेला संशयित महानंद आर. नाईक याची नार्को चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. महानंद पोलिसांना देत असलेल्या माहितीची पडताळणी केली जात असून याप्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.

... आणि महानंदला सोडले
१९९५ साली वासंती गावडेही युवती बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर महानंद याला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली होती. तथापि, त्याच्याकडून बेपत्ता युवतीसंबंधी कोणतीही माहिती मिळाली नाही. उलट, संशयित महानंद नाईकने फोंडा पोलिस स्थानकावर रिक्षा चालकांचा मोर्चा आणून पोलिस आपली सतावणूक करत आहेत, अशी तक्रार केली. बेपत्ता वासंती गावडे हिचा मावसभाऊ रामनाथ गावडे याने येथील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, बेपत्ता वासंतीचा शोध लागलाच नाही.

कसाब प्रौढ असल्याचा विशेष न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई, दि. २ - मुंबईवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव संशयित मोहम्मद अजमल आमीर कसाब हल्ला झाला त्यावेळी प्रौढ होता, असा निर्वाळा न्या. एम. एल. तहिलीयानी यांनी दिला आहे. त्यामुळे कसाबविरुद्धचा खटला सोमवारपासून दररोज आर्थर रोड येथील विशेष न्यायालयात चालवण्यात येणार आहे.
विशेष कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीला कसाबने हरकत घेताना हल्ला झाला त्यावेळी आपण १८ वर्षापेक्षा लहान वयाचा होतो, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर हा खटला बाल न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी त्याच्या वकिलाने केली होती. याला हरकत घेताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबने पोलिसांना स्वतःचे वय १८ पेक्षा जास्त असल्याची माहिती दिली होती, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर विशेष न्यायालयाने कसाबची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होते.
कसाबची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचे वय १८ पेक्षा जास्त असल्याचे आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. शनिवारी हा अहवाल तपासून आणि वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायालयाने कसाब प्रौढ असल्याचा खुलासा केला.