Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 31 December, 2008

संशयास्पद स्थितीतील सात ट्रॉलर्स ताब्यात कळंगुट समुद्रात किनारारक्षक दलाची कारवाई

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): सारा गोवा नव्यवर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतानाच आज रात्री शिवोली आणि कळंगुट समुद्रात किनारारक्षक दलाने संशयास्पद स्थितीत फिरणारे सात ट्रॉलर ताब्यात घेतले आहेत. या ट्रॉलरमधील व्यक्तींकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याचे उघड होताच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन ट्रॉलरही जप्त करण्यात आले आहेत. रात्री उशिरा हे सर्व ट्रॉलर व त्यातील व्यक्तींना वास्को येथील हार्बर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हे ट्रॉलर गोव्यातील नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच त्या ट्रॉलरमधे असलेल्या व्यक्तींकडे कोणतेही ओळखपत्र तसेच ट्रॉलरविषयक कागदपत्रे नसल्याचीही माहिती मिळाली. याविषयी अधिक माहितीसाठी एटीएस प्रमुख आत्माराम देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संशयास्पद ट्रॉलर ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. तसेच हे ट्रॉलर कोणाच्या मालकीचे आणि ते गोव्यात कोठून आले याविषयीची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tuesday 30 December, 2008

'गोलमाल' पाहिला व गोवा गाठला संशयित आसामी तरुणाची कहाणी

- गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही
- नोकरीच्या शोधापायी गोव्यात दाखल झाला

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): 'गोलमाल' चित्रपट पाहिला आणि गोवा गाठला. नोकरी मिळेल या इराद्याने हातपाय बांधल्याचे नाट्य रचले आणि जेथे आलो ते नौदलाचे मुख्यालय आहे, याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. माझी ही कहाणी ऐकून तरी मला कोणी नोकरी देईल, अशी अपेक्षा होती, असे संशयित रफिक ऊल इस्लाम याने पोलिसांना सांगितले आहे. त्याने दिलेल्या माहितीची दिल्लीत पडताळणी केल्यावर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्यामुळे अखेर त्याच्या या कहाणीवर पोलिसांनी विश्वास ठेवला आहे.
रफिक ने पोलिसांना पुरवलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी दिल्ली येथे गेलेले स्पेशल सेलचे पोलिस निरीक्षक राम आसरे व मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोसकर परवा सकाळी गोव्यात पोचणार आहेत. "एटीएस'प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार "दहावी नापास होण्याची शक्यता असल्याने रफिक याने आसाममधील धुब्री जिल्हा सोडला आणि गुवाहाटीला जाण्यासाठी तो घरातून बाहेर पडला. मात्र गुवाहाटीला न जाता त्याने थेट दिल्ली गाठली. दिल्लीत एका चहाच्या टपरीवर काही काळ नोकरी केली. त्यानंतर बुफेपार्टीला मदतीसाठी तो जाऊ लागला. या नोकरीत त्याला पोटापुरते पैसे मिळत होते. गोव्यात भरपूर संधी आहे आणि गोव्याला जाण्यास दिल्लीतून थेट रेल्वेही आहे'' याची माहिती होताच त्याने गोव्यात येण्याचा बेत आखला.
गोव्यात येऊन नोकरी करण्याची प्रेरणा त्याला अजय देवगणचा कॉमेडी चित्रपट "गोलमाल'द्वारे मिळाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोवा म्हणजे वास्को द गामा, येवढेच त्याला माहिती होते. त्यामुळे "संपतक्रांती' या रेल्वेतून मडगाव येथे उतरलेला रफिक नोकरी न शोधता वास्कोत दाखल झाला. दिवसभर शहरात फिरला. नोकरी मिळाली नाही. बोगदा वास्को येथे नौदलाच्या भव्य इमारतीला हॉटेल समजून आणि त्याची उंच संरक्षण भिंत पाहून येथे नोकरी मिळवण्यासाठी हे नाट्य त्याने रचले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांची अवस्था मात्र या एकूण प्रकरणात "डोंगर पोखरून हाती आला उंदीर' अशी झाली आहे. अर्थात, रफिकच्या या नाट्यामुळे काही काळ वास्कोवासीयांचे आणि पोलिसांच्या काळजाचे काही ठोके चुकले होते यात शंका नाही.

हटवलेल्या गाडेवाल्यांचे भवितव्य आज ठरणार, महापालिका बैठकीत नगरसेवक हमरीतुमरीवर

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): शहरातील हटवलेल्या बेकायदा गाडेवाल्यांचे पुर्नवसन आणि नव्या बाजार संकुलात मधोमध बसलेले भाजी विक्रेत्यांचा प्रश्न आज महापालिकेच्या बैठकीत बराच रंगला. सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्नावरुन "अरेतुरे'वर उतरल्यानेअखेर गाडेवाल्यांच्या प्रश्नावर उद्या मंगळवारी सकाळी ११.३० वाजता खास बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या या गाडेवाल्यांच्या भवितव्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजी विक्रेत्यांना "लॉटरी'द्वारे (सोडत) जागेचे वाटप करण्यात महापालिकेला यश आले. या भाजी विक्रेत्यांनी आपली जागा अद्याप ताब्यात घेतली नसली तरी, आज सायंकाळी पालिकेच्या बैठकीत त्यांनी या सोडती काढल्या.
रायबंदर पणजी येथील श्री. शेटये यांचा बेकायदा गाडा पालिकेने हटवल्याने पणजी शहरातील बेकायदा गाड्यांवर कारवाई केली जावी, अशी याचना करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल झाली होती. त्यावेळी शहरातील ११ बेकायदा गाडे हटवण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यातील आठ गाडे पालिकेने हटवले होते. त्यांचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेऊन नव्या बाजार संकुलाच्या पहिल्या मजल्यावर त्यांना जागा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र तेथे जाण्यास हे गाडेधारक तयार नसल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात १८० गाडे बेकायदा असल्याचा दावा याचिकादाराने केला आहे. उद्या खास होणाऱ्या या बैठकीत या गाडेवाल्यांच्या पुर्नवसानावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
बाजार संकुलातील ६० पैकी ४९ भीजी विक्रेत्यांना आज जागेसाठी लॉटरी काढली. यावेळी २१ भाजीविक्रेते उपस्थित नव्हते. या भाजीविक्रेत्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून बाजार संकुलाची तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांचे त्याठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याचे महापौर टोनी रॉड्रिगीस यांनी सांगितले.

'सनबर्न'वर मेहेरनजर, राजकीय दबावाचा कहर; पोलिस अधिकारी चवताळले

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): एकीकडे सुरक्षेच्या कारणावरून किनाऱ्यांवरील खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी झाला असताना कांदोळी येथे होणाऱ्या "सनबर्न' संगीत महोत्सवाला दिलेल्या परवानगीमुळे आता पोलिस विरुद्ध सरकार असे व्दंद्व सुरू झाले आहे. पोलिसांनी काल मध्यरात्री ही पार्टी बंद करण्याची घटना घडल्यानंतर आज अखेरचा दिवस असल्याने आयोजकांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाख रुपये अनामत ठेव ठेवून सरकारकडून पुन्हा एकदा परवानगी मिळवल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काल मध्यरात्री सरकारने या पार्टी आयोजनासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने व या महोत्सवात कर्णकर्कश संगीताचा आवाज होत असल्याने कळंगुट पोलिसांनी ही पार्टी बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. आज आयोजकांनी पुन्हा एकदा आपला राजकीय दबाव वापरून पुन्हा एकदा परवानगी मिळवली व पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही पार्टी आयोजित केली. सरकार एकीकडे सुरक्षेचा अवडंबर करून सामान्य व्यावसायिकांना पिडते तर दुसरीकडे बड्या उद्योजकांना मात्र आपणच तयार केलेल्या कायद्यात रीतसर पळवाट शोधून देते, त्यामुळे या परिसरात कलामीची नाराजी पसरली आहे. पोलिसांनी सुरुवातीपासूनच या महोत्सवाला आक्षेप घेतला होता परंतु सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर दबाव आणून पोलिसांना आपला अहवाल बदलण्यास भाग पाडले व महोत्सवाला परवानगी मिळवली.
दरम्यान, या पार्टीच्या आयोजकांवर कळंगूट पोलिस स्थानकात रीतसर पोलिस गुन्हा दाखल करून आज पोलिसांनी सरकारलाच कोंडीत पकडले. या पार्टीचे आयोजक लेंडोन आल्वीस (रा. दोना पावला) याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली. फौजदारी गुन्हा १७६ व ध्वनिप्रदूषण कायदा १९९८ कलम ३ आणि ४ नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुरक्षेच्या अभावी या "सनबर्न' ला पार्टी आयोजन करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असा अहवाल कळंगुट पोलिस स्थानकाने देऊनही या पार्टीच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली होती. तसेच या पार्टीच्या आयोजनाला परवानगी मिळवण्यासाठी कळंगुटच्या आमदारांनी आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती, अशी माहिती मिळाली आहे.
गोव्यात नाताळ व नव्या वर्षाच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने कोणत्याही खुल्या जागेवर पार्टीचे आयोजन केले जाऊ नये, अशा फतवाच सरकारी यंत्रणेने काढला आहे. त्यामुळे या वर्षी अनेक वार्षिक पार्ट्यांचे आयोजन झाली नाही. मात्र सर्व नियम धाब्यावर बसून आणि गृहखात्याने आपल्याच नियमांना फाटा देऊन २५ डिसेंबर ते २९ दरम्यान या पार्टीच्या आयोजनाला परवानगी दिली होती. परवा रात्री ही पार्टी सुरू असताना मध्यरात्री १.१५ च्या दरम्यान संगीताच्या आवाजाची पातळी ६७.२ ते ८९.३ डेसिबल्स असल्याचे आढळल्याने ती बंद पाडण्यात आली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने याविषयीचा अहवाल सादर केला होता. रात्रीच्या पार्ट्यांत आवाजाची क्षमता केवळ "५५ डेसिबल्स'पर्यंत ठेवता येतो व तीसुद्धा रात्री १० पर्यंत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. या विषयाचा अधिक तपास म्हापसा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक गुंडू नाईक करीत आहेत. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी ही पार्टी बंद केल्याचे आपल्याला ठाऊक आहे; परंतु पुढे काय झाले याची माहिती नसल्याचे सांगितले. कळंगुटचे निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी तर चक्क या पार्टीबाबत पोलिसांनी नकार देण्याचा अहवाल सादर केल्याचे सांगून परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल उचलला जात नव्हता.

सासूच्या खूनप्रकरणी जावयाला जन्मठेप

मडगाव, दि. २९(प्रतिनिधी): दारुच्या नशेत स्वतःच्या सासूचा चिरा घालून खून करणाऱ्या मुळ नागपूर येथील इंद्रजीत गोडबोले याला येथील अतिरिक्त सत्रन्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी जन्मठेपेचे शिक्षा सुनावली आहे.
त्याखेरीज दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरी भोगावी, असेही आदेशात म्हटले आहे. आरोपीने दंड भरल्यास त्यातील पाच हजार रुपये मयताची मुलगी तसेच आरोपीची पत्नी सुमित्रा हिला द्यावेत असेही निकालपत्रात म्हटले आहे. ही घटना २२ ऑगस्ट २००६ रोजी कुंकळ्ळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. पत्नी सुप्रिया ही दारुसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरुन तिच्याशी भांडण होऊन मध्यस्थीसाठी आलेल्या सासूच्या अंगावर त्याने चिरा घालून तो ओटीपोटीवर पडून ती तत्काळ गतप्राण झाली नंतर कुंकळ्ळी पोलिस स्टेशनवरील निरीक्षक सिध्दांत शिवरेकर यांनी तपास करुन आरोपीस मंगळूर येथून अटक करुन ९१ पानी आरोपपत्र कोर्टात दाखल केले होते. या खटल्यात आरोपीच्या दोन अल्पवयीन नुलींची साक्ष महत्त्वाची ठरली व ती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला दोषी मानले. आरोपी गोडबोले हा मूळ नागपूरचा असून मयत चौलव्वा राठोड ही गदग कर्नाटक येथील होती. आरोपी कोलवा येथील हॉटेलात सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होतो. सरकारच्या वतीने या खटल्यात भानुदास गावकर यांनी काम पाहिले.

भोसलेंच्या वैयक्तिक मालमत्तेची चौकशी करा : सुदेश कळंगुटकर

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): वाहतूक खात्याच्या विविध ठिकाणी साहाय्यक संचालकपदी असताना अशोक भोसले यांनी केलेल्या कथित भानगडींविरोधात आपण गेली तीन वर्षे लढत आहोत. तीन वर्षांच्या या अथक लढ्यानंतर पहिल्यांदाच प्रशासनाने त्याची दखल घेतल्याचे समाधान व्यक्त करून भोसले यांनी केलेल्या भानगडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेचीही कसून चौकशी करण्याची मागणी अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे उत्तर गोवा अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी केली आहे.
वाहतूक खात्याचे उपसंचालक अशोक भोसले यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीच्या आधारे गुन्हा विभागाने त्याची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी या विभागाच्या निरीक्षक सुनिता सावंत चौकशी करीत आहेत. फोंडा पोलिस स्थानकावरही "जय दामोदर संघटने' चे अध्यक्ष महेश नायक यांनी केलेल्या तक्रारीनुसार प्रथम चौकशी अहवाल नोंद करून घेण्यात आला आहे. सामान्य नागरिकांच्या हाती मिळालेल्या माहिती हक्क कायद्यामुळे भोसले यांच्या भानगडींचा पर्दाफाश होण्यास मदत झाली. आपण वाहतूक संचालक तथा दक्षता खात्याकडे सर्व पुराव्यांसह कागदपत्रे सादर केली असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,अशी मागणी कळंगुटकर यांनी केली.
गेल्या २१ सप्टेंबर २००७ रोजी केलेल्या लेखी तक्रारीबाबतही काहीही कारवाई केली नसल्याने आपण पुन्हा एकदा ३ ऑक्टोबर २००८ रोजी तक्रार दाखल केली व त्यानंतर काही प्रमाणात कृती सुरू झाल्याचेही ते म्हणाले.
कायदा हा सर्वांसाठी समान असतो, परंतु त्यांनी मात्र स्वतःच्यास्वार्थासाठी कायद्यालाच फाटा देऊन सरकारचे नुकसान केल्याचा ठपकाही कळंगुटकर यांनी ठेवला आहे. दरम्यान, याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार वाहतूक उपसंचालक भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेले अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे उत्तर गोवा अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांच्याविरोधात त्यांनी पणजी न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे; तर फोंडा पोलिस स्थानकात तक्रार केलेले "जय दामोदर' संघटनेचे अध्यक्ष महेश नायक यांनी आपल्या केबिनमध्ये घुसून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधातही भोसले यांनी मडगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंद आहे व महेश नायक यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान,यासंबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार श्री.कळंगुटकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन वाहतूक खात्याचे तत्कालीन संचालक पी. श्रीनिवास रेड्डी यांनी त्यांना २८ ऑक्टोबर २००८ रोजी शिस्तभंग कारवाईसंबंधी "कारणे दाखवा' नोटीस जारी केली होती. साहाय्यक संचालकपदी असताना जीए-०१-झेड-७२२२ व जीए-०१-झेड-७२२६ या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता नोंदणी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.याबरोबर पणजी येथे साहाय्यक संचालकपदी असताना शिवाजीराव देसाई यांच्यानावे जीए-०१-टी-७५०० ही गाडी अर्धवट पत्ता व नोटरीकडे नोंदणी न केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे नोंदणी केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला असताना त्याच व्यक्तीच्या नावे जीडीव्हाय-४४४४ हे वाहनही त्याच पद्धतीने नोंदणी केल्याचेही या नोटीशीत म्हटले आहे.
राज्य वाहतूक प्राधिकरणावर ठपका
याप्रकरणी अशोक भोसले यांनी कारणे दाखवा नोटिशीला ३ ऑक्टोबर २००८ रोजी दिलेल्या खुलाशात अनधिकृत वाहन नोंदणीचा आरोप फेटाळून लावला. जीए-०१-झेड-७२२२ व जीए-०१-झेड-७२२६ ही वाहनांना "ऑल इंडिया टूरीस्ट परमीट' राज्य वाहतूक प्राधिकरणातर्फे संमत करण्यात आले होते. सदर वाहने केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ च्या अंतर्गत नियम १२८ ची पूर्तता न करताच नोंदणीसाठी पाठवण्यात आली होती व या नोंदणी कागदावर आपण तसे नमूद केल्याचेही त्यांनी या खुलाशात म्हटले आहे. राज्य वाहतूक प्राधिकरणाला ही वाहने नोंदणी करण्यास नकार देता आला असता त्यामुळे मुळातच राज्य वाहतूक प्राधिकरणाकडून योग्यपद्धतीने या नियमाचे पालन होत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला.शिवाजीराव पाटील हे आपले नातेवाईक आहेत व ते आल्तीनो येथे आपल्याच घरी राहत होते त्यामुळे त्यांचा पत्ता आपल्या घरचा होता,असेही भोसले म्हणाले. त्यांनी पत्त्यासंबंधी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे स्टॅंप पेपर हे कोल्हापूर येथून आणले होते व तिथे ते नोटरीकडे नोंद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.जीडीव्हाय-४४४४ या वाहन नोंदणीसाठी शिवाजीराव पाटील यांनी मगनलाल सदनचा दिलेला पत्ताही आपलाच पूर्वीचा पत्ता असल्याचे त्यांनी उघड केले आहे. सुदेश कळंगुटकर यांच्याविरोधात आपण बदनामीचा खटला दाखल केला आहे, त्यामुळे आपण हा खटला मागे घ्यावा यासाठी आपल्यावर दबाव घालण्यासाठीच असल्या खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आरोपही भोसले यांनी आपल्या खुलाशात केला आहे.
निलंबित करा अन्यथा पुरावे नष्ट होतील: महेश नायक
अशोक भोसले यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,अन्यथा ते सर्व पुरावे नष्ट करण्याचा धोका असल्याचे महेश नायक यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यांना निलंबित करण्यास अजूनही दिरंगाई होत असल्याचा निषेध करून सरकार चौकशीचे केवळ नाटक तर करीत नाही ना,असा सवलाही त्यांनी उपस्थित केला.

Monday 29 December, 2008

काश्मीर दोलायमान

नॅशनल कॉन्फरन्स सर्वांत मोठा पक्ष, कॉंग्रेसला तडाखा
श्रीनगर, दि. २८ - जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून तेथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ८७ जागा असलेल्या सभागृहात ओमार अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक म्हणजे २८ जागा मिळवून मुसंडी मारली आहे. त्यापाठोपाठ मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने २१, कॉंग्रेसने १७, तर भारतीय जनता पक्षाने आश्चर्यकारकरीत्या तब्बल अकरा जागांवर आपला हक्क सांगितला आहे. सात टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत ६१ टक्के मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत कॉंग्रेसला जोरदार तडाखा बसला आहे. २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या पक्षाला २० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच मेहबूबा मुफ्ती यांच्या "पीडीपी'ला २००२ मधील निवडणुकीच्या तुलनेत पाच जागांचा फायदा झाला आहे. त्यामुळे आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या आधारे आमच्याशी चर्चेसाठी येणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ किंवा त्यांच्याशी न जमल्यास विरोधात बसू, असे मेहबूबा यांनी स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत नऊ जागा अपक्ष उमेदवारांनी पटकावल्या असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला केवळ एकमेव जागेवर समाधान मानावे लागले आहे. याआधीच्या विधानसभेत त्यांच्या नावापुढे दोन जागा लागल्या होत्या. जम्मूत तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जणू दिवाळीच साजरी केली. त्यांनी ठिकठिकाणी लाडू वाटून मतदारांचे तोंड गोड करण्याचा सपाटा लावला होता. दरम्यान, कॉंग्रेससारख्या समविचारी पक्षांशी सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा होऊ शकते, असे संकेत ओमार अब्दुल्ला यांनी दिले आहेत. गेल्या वेळी कॉंग्रेसने पीडीपीशी सत्तेबाबत समझोता करून सरकार स्थापन केले होते. त्यानुसार पहिली तीन वर्षे पीडीपीने मुख्यमंत्रिपद उपभोगले. मात्र गुलाम नबी आझाद यांच्याकडे हे पद येताच अंतिम टप्प्यात अमरनाथ प्रकरणाचे भांडवल करून पीडीपीने कॉंग्रेसचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर तेथे निवडणुका घेण्यात आल्या. विशेष म्हणजे गेल्या विधानसभेतही नॅशनल कॉन्फरन्सला नेमक्या २८ जागा मिळाल्या होत्या.
जम्मूत फुलले "कमळ'
जम्मूत फुललेले "कमळ' हाच या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. जम्मूमध्ये अमरनाथच्या मुद्यावरून झालेल्या जोरदार आंदोलनामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले व त्याचा मोठाच फायदा भाजपला झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या विधानसभेत या राष्ट्रीय पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. या अनपेक्षित मुसंडीमुळे आज नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयातही उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

आईने दोन मुलींसह पेटवून घेतले

माता व धाकटी मुलगी मृत्युमुखी

- थोरली मुलगी होरपळली
- मोप येथील दुर्दैवी घटना
- पेडणे परिसरावर शोककळा


मोरजी, दि. २८ (प्रतिनिधी) - गावठणवाडा मोप पेडणे येथील सौ. विद्या वासुदेव नाईक (वय ४०) व त्यांच्या दोन मुली मेघा नाईक (९), मयुरी नाईक (१५) या तिघींनी काल रात्री साडेबाराच्या सुमारास अंगावर केरोसीन ओतून घेऊन पेटवून घेतले. यात विद्या नाईक व त्यांची धाकटी मुलगी मेघा यांचा मृत्यू झाला; तर थोरली मुलगी मयुरी २५ टक्के भाजल्याने ती वाचली. तिच्यावर गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमागील कारण अद्याप समजलेले नाही.
पेडणे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे प्रकरण आत्महत्त्येचे असल्याचे सांगण्यात आले. तथापि, ज्या मातेने दोन्ही मुलीच्या अंगावर केरोसीन ओतून व स्वतःलाही पेटवून दिले व ती मरण पावली यामुळे खुनाचा गुन्हा कुणावर नोंदवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मेघाचा मृत्यू झाला तर विद्या नाईक ९० टक्के भाजल्याने त्यांना तशाच अवस्थेत बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नाईक कुटुंबीय हे एकत्रित आहे. विद्याचे पती वासुदेव कामानिमित्त मुंबई येथे तयार कपड्यांच्या कारखान्यात कामाला असतात.
गॅलन व आगपेटी जप्त
घटनास्थळी पोलिसांना केरोसीनचा डबा व काड्यापेटी सापडली. पंचनामा करून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात विद्या नाईक यांची मोठी भावजय (जाऊ) अरूणा नाईक यांनी सांगितले की, घरात आजपर्यंत कधीच कुठल्याच प्रकारचा कलह तंटा निर्माण झाला नाही.
विद्या मनमिळावू स्वभावाची होती. तिने असा दुर्देवी निर्णय का घ्यावा, याचे आश्चर्य वाटते.
मुंबईला नवऱ्याबरोबर काही वाद झाला असेल याची आपल्याला कल्पना नाही. तथापि, विद्या मुंबईहून आल्यानंतर तिने तशाप्रकारचे कधीही भाष्य केले नव्हते.
दरम्यान घरातील मंडळींनी हा प्रकार रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडला असल्याचे सांगितले आहे. विद्या आपल्या दोन मुलींसोबत स्वतंत्र खोलीत झोपली होती. इतर मंडळी व सासू मधल्या हॉलमध्ये झोपली होती. त्यावेळी मोठी मुलगी मयुरी अर्धवट जळालेल्या अवस्थेत धावत हॉलमध्ये आली व किंचाळत होती. घरच्या मंडळींनी तिच्या अंगावर पाणी मारण्याचा प्रयत्न केला व आग विझवली. मात्र विद्याने जळताना तोंडातून ब्रसुद्धा काढला नाही, तर मेघाचे जागीच निधन झाले.
रात्री घटना घडल्यानंतर तिघींनाही बांबोळी येथे पाठवण्यात आले. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाचे वाहन कुणीतरी त्यांना घराला आग लावल्याची माहिती दिल्याने तेथे दाखल झाले. लगेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपनिरीक्षक सचिन नार्वेकर तपास करत आहेत.
मोप या भागातील काही नागरिकांशी संपर्क साधला असता हा प्रकार निदान नाईक कुटुंबीयांच्या घरात तरी निदान घडायला नको होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. नाईक कुटुंबातील ३० सदस्य गुण्यागोविंदाने नांदत असताना त्यांच्यावर असा बाका प्रसंग यावा यामुळे गावाला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. दोघींच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भांडण नाही - सासू
विद्या नाईक यांची सासू शीतल रामा नाईक यांनी आपल्या सुनेविषयी सांगितले की, विद्याचा नवरा मुंबईला कामानिमित्त त्याच ठिकाणी वास्तव्य करून राहतो. विद्या नाईक व त्यांच्या मुली ह्या चांगल्या स्वभावाच्या. घरात कधीच करकर किंवा दगदग नव्हती. हल्ली सासू सुनांचे पटत नाही. मात्र आपल्या सुना गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
नवऱ्याची नोकरी सुटली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विद्याचे पती वासुदेव नाईक हे मुंबई येथे कामाला होते त्यांची नोकरी गेली. कदाचित या कारणाने तिने टोकाचा निर्णय कदाचित घेतला असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गावचे माजी उपसरपंच प्रमोद परब व जयप्रकाश परब यांनी या कुटुंबाविषयी माहिती देताना सांगितले की, नाईक कुटुंब हे "हॅपी फॅमिली' म्हणून परिचित आहे. अशा कुटुंबावर बाका प्रसंग यावा यासारखे दुसरे दुर्देव नाही. विद्या वासुदेव नाईक यांनी हा प्रकार केला त्या रात्री पुरुष मंडळी जत्रेला गेली होती. ही संधी साधून विद्याने टोकाचा निर्णय घेतला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आईविना मयुरी पोरकी
विद्या नाईक ही दोन महिने मुंबईला राहून आठ दिवसांपूर्वी मोप येथे आली होती. मेघा इयत्ता चौथीच्या वर्गात मोप येथील शाळेत शिक्षण घेत होती, तर त्यांची मोठी मुलगी मयुरी ही तोरसे हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्यामुळे ती आपल्या काकीसोबत मोप येथे घरात होती. आता मयुरीला आईविनाच उर्वरित आयुष्यभर वाटचाल करावी लागणार आहे.

"सनबर्न'वर अखेर कारवाईचा बडगा

कर्णकर्कश आवाजामुळे "नाईट पार्टी' प्रशासनाने रोखली
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - प्रचंड राजकीय दबाव वापरून तसेच सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू करण्यात आलेली "सनबर्न'ची नाईट पार्टी अखेर आज रात्री अखेर प्रशासनाकडून बंद पाडण्यात आली.
काल मध्यरात्री १.१५ वाजता कर्णकर्कश आवाजाची पातळी ओलांडल्याने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यामुळे आज रात्री पार्टी सुरू होताच ८.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या मुहूर्तावर पार्टी सुरू करण्यात आली होती. "सनबर्न' ही आशियाखंडात पार्टीचे आयोजन करणारे सर्वांत मोठे आस्थापन असून दि. २६ डिसेंबर पासून त्यांनी कांदोळी येथे या पार्टीचे आयोजन केले होते. उद्या २९ डिसेंबर रोजी त्यांचा शेवटचा दिवस होता. तथापि, "या पार्टीच्या आयोजनावर बंदी घातल्याने उद्याची पार्टी होणार नाही' असे उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी सांगितले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळातील काही अधिकारी वर्ग राहत असून काल मध्यरात्री त्यांना या कर्णकर्कश संगीताचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी या आवाजाची पातळी यंत्राद्वारे मोजून त्याबाबतचा अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त केला होता.
या आस्थापनाला परवानगी देण्यासाठी गेल्या काही दिवसांत बरेच राजकारण झाले होते. पार्टीचे आयोजन करण्यात परवानगी मिळणार न मिळणार अशी स्थिती असताना अखेर त्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे काही राजकारणी बरेच नाराजही झाले होते. कळंगुटच्या आमदारांनी मात्र या पार्टीला परवानगी मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते.

पैसे घेऊन मत न विकण्याचा संकल्प

डिचोलीत विराट हिंदू धर्मजागृती सभा


टाळ्यांच्या गजरात या धर्मसभेत संमत झालेले संकल्प असे ः
मी ढोंगी हिंदुत्ववाद्यांना माझे मत देणार नाही.
मी हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्यालाच माझे मत देणार.
मी नववर्ष फक्त गुढीपाडव्यालाच साजरे करेन.
मी देवतांचे चित्र असलेले कपडे वापरणार नाही.


डिचोली, दि. २८ (प्रतिनिधी) -मी पैसे घेऊन माझे बहुमूल्य मत विकणार नाही यासह अनेक महत्त्वपूर्ण संकल्प करून, हिंदू जनजागृती समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज मैदान डिचोली येथे आयोजित हिंदू धर्मजागृती सभा आज हजारो हिंदूभिमान्यांच्या उपस्थितीत पार पडली. या धर्मसभेला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य महाराज, प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोव्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक संगम बोरकर, धर्मशक्ती सेना, मदन सावंत, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीचे संघटक जयेश थळी आदी मान्यवर उपस्थित होते.
गिरजय प्रभूदेसाई, शुभांगी गावडे यांनी स्वागत केले. वेदमंत्रपठणाने दीपप्रज्वलन करून हिंदू धर्मसभेचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. वक्त्यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे व विदेशातील साधकांचे स्वागत तसेच "सनातन प्रभात'चे अभिजात नाडकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. नाडकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सदाशिव धोंड्यांनी हिंदू जनजागृती समितीची ओळख करून दिली व धर्मकार्याचा आढावा घेतला.
ब्रह्मेशानंद स्वामी यांनी आशीर्वचनात सांगितले, की आज आपल्या हिंदू समाजाचे संतुलन बिघडविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. धर्माबद्दल तिरस्कार अधर्मी, शिक्षणाद्वारे विकृतीकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन महत्त्वपूर्ण असून, आपल्या संस्कृतीचे, धर्माचे रक्षण करण्यासाठी साऱ्यांनी कटिबद्ध झाले पाहिजे. आपली मठ, मंदिरे ही शक्तिकेंद्र बनून भावी पिढीच्या रक्षणासाठी सज्ज व्हावीत यासाठी तरूणांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. आपल्या मुलांना धर्माचे शिक्षण द्या. भगवंत हा सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही त्याची लेकरे आहोत. एकमेकांवर प्रेम करा, चांगल्या गुणांची कदर करा व धर्माचे रक्षण केले तरच धर्म आपले रक्षण करील हे लक्षात ठेवून धर्माचरण करून भावी पिढी, भावी गोमंतक शांत व सुंदर बनवा.
सुभाष वेलिंगकर याप्रसंगी म्हणाले, आपला विशाल आणि विस्तृत असा हिंदू समाज आज डायनासोरप्रमाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डायनासोर हा प्राणी अजस्त्र असला तरी संवेदनाशून्य असल्यामुळे नष्ट झाला. हिंदूंवर ज्या तीन शक्ती केंद्रातून संस्कार झाले पाहिजेत ती घर, शाळा, मंदिर आज संस्कार संवेदनक्षमता हरवून बसली आहेत. वैफल्यग्रस्त, संस्कारहिन विकृत प्रवाह घराघरांत पोहचल्यामुळे पाश्चिमात्यांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. भ्रष्टाचारी व स्वार्थांध कॉंग्रेस सरकार हिंदू दहशतवाद नावाचे नवे षडयंत्र पुढे आणत मुसलमानांचे लागूंलचालन करत आहे. निद्रिस्त संवेदनाहीन हिंदू आताच जागा झाला नाही तर नामशेष होईल.अन्याय सहन करू नका व हिंदू समाजाच्या राष्ट्राच्या उत्थानासाठी कार्यरत राहा.
साध्वी प्रज्ञासिंगाची अमानवीय चौकशी अफजल गुरूला मात्र फाशीची शिक्षा होऊनही फाशी देण्यात येत नाही हे या देशाचे दुर्दैव आहे.

संगम बोरकर, मदन सावंत, जयेश थळी यांचीही या धर्मसभेत भाषणे झाली.

मेगा प्रकल्प समर्थक विरोधकांत चकमक

मडगाव, दि. २८(प्रतिनिधी)ः दवंडे येथे मेगा प्रकल्प समर्थक व विरोधकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान परस्परांना धमकी देण्यात झाल्यानंतर मडगाव पोलिसांनी आज रात्री दोन्ही गटातील मिळून ५ जणांना ताब्यात घेतले. त्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले जाणार आहे.
दोन गटांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी उभय गटात बाचाबाची झाली असता एका गटातील म्होरक्याने दुसऱ्या गटाला धमकी दिली. यावेळी दुसऱ्या गटातील लोकांनी पोलिस स्थानकावर दाखल होऊन धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. परंतु, पोलिस आपली मागणी गांभीर्याने घेत नसल्याचे पाहून त्यांनी तेथे जाऊन धडा शिकविण्याच्या इशारा दिला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व प्रतिस्पर्धी गटातील नेत्यांना पाचारण करून त्यांनाही प्रतिबंधात्मक अटक केली. याविषयीचा अधिक तपास सुरू आहे.

Sunday 28 December, 2008

सुरक्षेचे अवडंबर नको पर्रीकर

अन्यथा राज्याच्या अर्थव्यवस्थेला फटका
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- गोव्यावर दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडून सुरू असलेली असमंजस वक्तव्ये व सुरक्षेच्या निमित्ताने ठिकठिकाणी सुरू असलेली अनियंत्रित तपासणी यामुळे गोव्यातील नागरिक तथा पर्यटकांमध्ये विनाकारण भीती निर्माण झाली आहे. गोव्यातील पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा काळ असलेल्या नाताळ व नववर्षांच्या मौसमात सरकारकडून अविचारी पद्धतीने परिस्थिती हाताळली जात असल्याने त्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या अर्थकारणांवर होणार असल्याचा धोका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.
आज येथे पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक हजर होते.गोव्यात दहशतवादी हल्ला होणार असल्याचे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट कोणतीही माहिती उपलब्ध नाही, केवळ मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.काही महिन्यांपूर्वी गोव्याला "सिमी' किंवा इंडियन मुजाहीद्दीन पासून धोका असल्याचे आपण सांगितले होते तेव्हा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी त्यास नकार देण्यास अजिबात वेळ लावला नाही . त्याउलट आता मुंबईवरील हल्ल्यांनंतर खडबडून जागे झालेले सरकार मुंडी उडवलेल्या कोंबड्याप्रमाणे फडफडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
मनुष्यहानी हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य नाही. देशाचे किंवा राज्याचे आर्थिक कंबरडे मोडणे हादेखील त्यांचा प्रमुख उद्देश आहे. मुंबईत हॉटेल ताज व नरीमन हाऊसवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्ती करून २१ डिसेंबर रोजी पुन्हा ही हॉटेल्स सुरू केली व दहशतवादी हल्ल्याचा अर्थकारणावर काहीही परिणाम होऊ शकला नाही असा संदेश पोहचवला.मात्र गोव्यात नेमकी परिस्थिती वेगळी आहे. येथे केवळ भीतीपोटी राज्याचे अर्थकारणच बिघडवले जात असून सर्व व्यवहार बंद करून दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्याची ही पद्धत आपल्याला परवडणारी आहे काय, असा सवालही पर्रीकरांनी केला.
गृह खात्याने योजलेल्या सुरक्षा उपायांबाबत कोणतीही तक्रार नाही. तथापि, ही सुरक्षा लोक किंवा पर्यटकांसाठी जाचक ठरू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. गोव्यावर "फियादीन' किंवा आत्मघाती हल्ला करण्याचे प्रयोजन असल्यास तो रोखणे खूपच कठीण आहे, त्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम व सतर्क असण्याची गरज आहे,असेही पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी वक्तव्ये करताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे विदेशी व देशी पर्यटकांनी गोव्यात येण्याचे आपले मनसुबे रद्द केले,असेही त्यांनी सांगितले.राज्यात खुल्या किनारी पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला परंतु विविध बड्या हॉटेल्सना परवानगी दिली यात तफावत कशी काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पणजीतील मांडवी नदीत उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांना कोणती सुरक्षा पुरवण्यात आली आहे,असा सवाल करून सुरक्षेबाबत व्यावहारिक विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल हे गोव्यात केवळ नाताळाची सुट्टी साजरा करण्यासाठी आले होते. या भेटीत त्यांनी गोव्यातील सुरक्षेचा घेतलेल्या आढाव्याला अर्थच नव्हता, अशी टीका पर्रीकर यांनी केली.

सागरी अणुहल्ल्याची पाकिस्तानला चिंता

दिल्ली, दि. २७ - चीन व दक्षिण कोरियाकडून मिळविलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या बळावर पाक कितीही तोरा मिरवित असला तरी समुद्रातून अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम धनुष्य आणि सुपरसोनिक वेगाने मार्गातील अडथळ्यांना हुलकावणी देत लक्ष्यावर अचूक मारा करणारे भारताचे क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसचे पाककडे कोणतेही उत्तर नाही.
पाक उत्तर व मध्य भारतावर हल्ला करण्यास सक्षम आहे. मात्र दक्षिणेपर्यंत मजल मारण्याची त्याची क्षमता नाही. तेथेच फारच कमी क्षेत्रफळ असलेल्या पाकिस्तानच्या कोणत्याही ठिकाणांवर भारत अगदी सहज क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो.
सध्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांऐवजी अत्यंत वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अधिक प्रभावी ठरतील, असे मत रणनितीकारांनी व्यक्त केले आहे. भारताकडे असलेले ब्राह्मोस सुपरसोनिक वेगाने हल्ला करते. तेथेच पाककडे बाबर हे सुपरसोनिक वेगवाने मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. असे असले तरी ब्राह्मोसला रोखण्याचे सामर्थ्य पाककडे नाही. ब्राह्मोस क्षेपणास्त्रे जून महिन्यातच लष्कराच्या स्वाधीन करण्यात आलीत. आता नौदलाच्या आयएनएस राजपूतवरही ते तैनात आहे. याशिवाय सुखोई ३० व आयएल-३८ या लढाऊ विमानांवर तैनात करण्यासाठी चाचण्या सुरू आहेत.
भारत समुद्रातून पाकवर अण्वस्त्र हल्ला करू शकतो. हीच पाकपुढे सर्वात मोठी चिंता आहे. मागच्या वर्षी आयएनएस सुभद्रा व आयएनएस सुवर्णा लढाऊ जहाजांवर धनुष क्षेपणास्त्र प्रणाली बसविण्यात आली. ५०० कि.मी.मारक क्षमता असलेले धनुष अगदी सहज ५०० कि.ग्रॅ.वजनाचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. आम्ही समुद्रातून सर्वप्रकारचे हल्ले करण्यास सक्षम आहोत अशी दर्पोक्ती पाकने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र तज्ज्ञांना यात फारसा दम वाटत नाही. प्रत्यक्षात पाककडे अशी प्रणालीच नाही. वायुसेनेबद्दल विचार केल्यास पाक येथेही भारताच्या बराच मागे आहे.
भारत-पाक क्षेपणास्त्र क्षमता तुलना
भारत पाक
पृथ्वी -१ , क्षमता १५० कि.मी. एम-११, क्षमता २८० कि.मी.
पृथ्वी -२ , क्षमता २५० कि.मी. हत्फ-१, क्षमता १०० कि.मी.
अग्नी -१ , क्षमता ७०० कि.मी. शाहीन-१, क्षमता ७५० कि.मी.
अग्नी -२ , क्षमता २००० कि.मी. शाहीन -२, क्षमता २००० कि.मी.
अग्नी -३ , क्षमता ३००० कि.मी. घोरी-१, क्षमता १३०० कि.मी.
ब्रह्मोस(सुपरसोनिक)क्षमता २९० कि.मी. बाबर (सुपरसोनिक) ७०० कि.मी.
धनुष , मारक क्षमता ५०० कि.मी.
(समुद्रावरून जमिनीवर)
.............
भारत-पाकने तणाव कमी करावा : चीन
वृत्तसंस्था
इस्लामाबाद, २७ डिसेंबर
दक्षिण आशियात शांती व स्थैर्य कायम करण्यासाठी भारत व पाकने तणाव कमी करावा असे आवाहन चीनचे विदेशमंत्री यांग जिएची यांनी केले आहे.
भारत व पाकने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाला कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी तसेच दहशतवादाविरुद्ध संयुक्तपणे कारवाई करायला हवी असे मत जिएची यांनी पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महेमूद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केल्याचे वृत्त दैनिक "द न्यूज'ने दिले आहे.
पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव १२६७ नुसार कारवाई करीत असून मुंबईवरील हल्लाप्रकरणी संयुक्त चौकशीकरिताही तयार असल्याचे आश्वासन कुरेशी यांनी चीनला दिले आहे.
............
भारत व पाकने संयम राखावा : अमेरिका
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २७ डिसेंबर
मुंबईवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्यावर हल्ला चढविणार या चिंतेने पाकिस्तान त्रस्त असून त्यांनी पूर्वेकडील सीमेवर हजारो सैनिक तैनात केले आहेत. पाकची स्थिती बघता दक्षिण आशियातील शेजारी देशांनी संयम राखावा असे आवाहन अमेरिकेने केले आहे.
भारत व पाकदरम्यान सध्या तणाव तसेच युद्धसदृश स्थितीही निर्माण झाली आहे. म्हणूनच अमेरिकन अधिकारी दोन्ही देशांसोबत संपर्क ठेवून असल्याची माहिती व्हाईट हाऊसचे प्रवक्ते गोर्डन जानड्रो यांनी दिली आहे.
दोन्ही शेजारी देशांनी मुंबईवरील हल्ल्याच्या चौकशीत एकमेकांना मदत करावी व दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी एकत्र यावे असे आम्ही वारंवार सांगत आहोत. उभय देशांमध्ये आणखी तणाव वाढेल असे काहीच घडू नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही ते म्हणाले.
पाकने पूर्वेकडील सीमेवर हजारो सैनिक तैनात केले असतानाच भारताने त्यांच्या नागरिकांना पाकमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. सद्यस्थितीतीत भारतीयांनी पाकमध्ये जाणे सुरक्षित नाही. २००१ नंतर सध्या उभय देशांदरम्यान सर्वाधिक तणावपूर्ण वातावरण आहे. २००१ मध्ये काश्मिरी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. त्यावेळी भारताने पाकमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबावर या हल्ल्याचा आरोप केला होता. मुंबईवरील हल्ल्यासाठीही लष्करलाच भारताने जबाबदार धरताना पाक कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचा आरोप केला आहे. तेथेच पाकने हा आरोप नेहमीप्रमाणेच यावेळीही फेटाळून लावला आहे. अशा आरोप प्रत्यारोपांमुळेच तणाव वाढत असल्याची प्रतिक्रिया गोर्डन यांनी दिली आहे.

"ऊठ गोंयकारा'चे प्रवक्तेपद ऍड. आयरिश यांनी सोडले

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - सामाजिक कार्यकर्तेआयरिश रॉड्रिगीस यांनी आज "ऊठ गोंयकारा' या संघटनेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. या संघटनेतर्फे हाती घेण्यात आलेले माहिती तंत्रज्ञान सचिव आर. पी. पाल भ्रष्टाचार प्रकरण, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात बनावट शैक्षणिक पात्रता प्रतिज्ञापत्र प्रकरण, तसेच विविध विषयांचे भवितव्य आता संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ठरवावे, असे सांगून आपण याबाबत आता न्यायालयात संघटनेचे प्रतिनिधित्व करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या १३ ऑक्टोबर रोजी पणजीत प्राणघातक हल्ला झाल्यानंतर घडलेल्या उलथापालथी व त्यानंतर जर्मन अल्पवयीन मुलीवराल अत्याचाराचे गाजलेले प्रकरण, त्यातून तिच्या तक्रारदार आईनेच तक्रार मागे घेण्याचा प्रकार यानंतर काही काळ अज्ञातवासात गेलेले ऍड.आयरिश आज पत्रकारांसमोर आले. त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थकही यावेळी हजर होते. "ऊठ गोंयकारा' या संघटनेच्या प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मोकळे करण्याची मागणी आपण यापूर्वीच केली होती. नव्या तरुण नेतृत्वाला ही संधी मिळावी, यासाठी आपण या पदाचा त्याग करीत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी संघटनेकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतही नाराजी व्यक्त करून आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या नावाचा वापर करून निनावी फोन करणे तसेच आपल्या नावावर बदनामीकारक पत्रके छापून त्याचे वितरण करणे असे प्रकारही सुरू असल्याचे ते म्हणाले. आपल्या या मुद्याला आणखी बळकटी देण्यासाठी त्यांनी मंत्री चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका हिची बदनामी करणारे ऍड. रॉड्रिगीस यांच्या नावाचे एक पत्रक सादर केले. संघटनेचे निमंत्रक अमोल नावेलकर व प्रजल साखरदांडे यांनी गेल्या दोन महिन्यांत आपल्याविरोधात बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपण हाती घेतलेल्या अनेक विषयांच्या प्रामाणिकपणावरच शंका उपस्थित केल्यानेही ते दुखावले आहेत.आपल्यासह प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार मुख्यमंत्री असल्याचा आरोप आपण कधीच केला नाही, केवळ मुख्यमंत्र्यांनी या कटाला हिरवा कंदील दाखवला, असे आपण म्हणालो होतो, असाही खुलासा त्यांनी केला. बाबूश यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतचा मुद्दा क्षुल्लक असल्याचे साखरदांडे यांचे म्हणणे आहे. हा मुद्दा क्षुल्लक होता तर त्यांनी आपल्याला तसे सांगावयास हवे होते. या मुद्यावरून घेतलेल्या पत्रकार परिषदा व पोलिस तक्रार यावेळी साखरदांडे खुद्द आपल्यासोबत होते, याचा त्यांना विसर पडला की काय, असा सवालही आयरिश यांनी केला.
आपण गेल्या ३० वर्षांपासून समाजिक कार्यात आहोत. हे विषय हाती घेताना आपण वैयक्तिक स्वार्थ किंवा लाचारी पत्करली नाही. आपल्यावरील हल्ल्यानंतर उपचाराचे बिल ५४ हजार रुपये झाले व ते पैसे आपण स्वतः अदा केले, असेही आयरिश यांनी स्पष्ट केले. या हल्ल्याच्या निषेधार्थ पणजी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या सभेवेळी जमा केलेल्या आर्थिक मदतीतून हे बिल फेडण्यात आलेले नाही, असाही खुलासा करून त्या पैशांबाबत आयोजकांनाच विचारा, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.
राज्याचे ऍडव्होकेट जनरल यांच्याविरोधात अतिरिक्त शुल्क आकारल्याप्रकरणी त्यांनी वैयक्तिकरीत्या आपल्याविरोधात दाखल केलेली दोन प्रकरणे व आरोग्यमंत्री विश्वजित राणे धमकी प्रकरण यांचा सामना करण्यास आपण समर्थ आहोत. आता उर्वरित प्रकरणांचा पाठपुरावा संघटनेने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वरून ५८ करणे, ऍड.जनरल यांनी सरकारी तिजोरीतून मिळवलेले अतिरिक्त शुल्क, स्कार्लेट कीलिंग मृत्युप्रकरणी तिची आई फियोना हिच्याकडून झालेल्या दुर्लक्ष प्रकरण, माजी सचिव आर.पी.पाल व त्यांची पत्नी यांचे कथित भ्रष्टाचार प्रकरण व शिक्षणमंत्री बाबूश यांचे बनावट शैक्षणिक प्रतिज्ञापत्र आदी विषयांचे भवितव्य संघटनेने ठरवावे व आपण ही प्रकरणे पुढे नेणार नाही, असा खुलासा त्यांनी केला.

कर्नाटक पोटनिवडणुकीत ७० टक्के मतदान

कारवार मतदारसंघामध्ये ६० टक्के
बंगळुरू, दि. २७ (प्रतिनिधी) - कर्नाटकात एकूण आठ मतदारसंघांसाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत जवळपास ७० टक्के मतदान झाले. येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्री तसेच त्यांच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या तिघांचे भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून आहे. हुक्केरी, देवदुर्ग, कारवार, तुरूवेकेरे, आराभावी, मुधुगिरी, दोड्डाबल्लापूर तसेच माड्डूर या मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडली. दरम्यान गोव्याच्या शेजारी असलेल्या कारवार मतदारसंघात जवळपास ६० टक्के मतदान झाल्याचे आमच्या कारवार प्रतिनिधीने कळविले आहे.
एकूण ७३ उमेदवार यावेळी निवडणूक रिंगणात होते. यात काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणून आलेले व नंतर भाजपात जाण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले तीन तर देवेगौडांच्या जनता दल (निधर्मी) च्या तिकीटावर निवडून येऊनही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारकी सोडलेल्या चार जणांचा समावेश आहे. त्यांच्या राजीनाम्यांमुळे मतदारसंघातील जागा रिकामी झाल्या होत्या. तर माड्डूर मतदारसंघाचे आमदार एम. एस. सिध्दराजू यांच्या निधनामुळे ती जागा रिकामी झाली होती. माड्डूरमध्ये सिध्दराजू यांची पत्नी निवडणूक लढवत आहे. आमदारकीचे राजीनामे दिलेले आनंद असनोटीकर (कारवार), उमेश कट्टी (हुक्केरी), भालचंद्र झारकीहोळी (आराभावी) व के. शिवण्णागौडा नाईक (देवदुर्ग) हे देवेगौडा मंत्रीमंडळात मंत्री बनले होते. कॉंग्रेस खासदार आर. एल. जलाप्पा यांचे पुत्र जे. नरसिंहस्वामी यांनी आमदारकी व कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. ते दोड्डाबल्लापूरमधून निवडणूक लढवत होते तर भाजपसाठी कॉंग्रेसची आमदारकी सोडलेले डी. सी. थामण्णा माड्डूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात होते. मधुगिरी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी अनिता जनता दल (निधर्मी) तर्फे निवडणूक रिंगणात होत्या. भाजपमध्ये प्रवेश केलेले जनता दल (निधर्मी) चे माजी आमदार सी. सी. चेन्नीगप्पा यांचे त्यांच्यापुढे कडवे आव्हान होते. दरम्यान, हे निवडणूक निकाल जर अपेक्षेसारखे लागले तर सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचा बहुमताचा प्रश्न निकालात निघू शकतो.

"गोमेकॉ' डॉक्टरांना वेतन आयोगाचा लाभ

नियोजित संप मागे
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - गोवा मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याचे लेखी आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिल्याने येत्या सोमवारी २९ पासून सुरू होणारा संप मागे घेण्याचा निर्णय या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे घेण्यात आला आहे.
गोमेकॉतील या डॉक्टरांना सहाव्या वेतन आयोगाला लाभ देण्यात आला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती व हा लाभ लागू करण्याची मागणी केली होती. यासंबंधी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांना तोंडी आश्वासन दिले होते परंतु या महिन्याच्या पगारात हा लाभ देण्यात आला नसल्याने त्यांनी २९ पासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. यावेळी आरोग्यमंत्री राणे यांनी त्यांना लेखी आश्वासन दिले असून नोव्हेंबर व डिसेंबरचा लाभ पुढील पगारात देण्याचेही आश्वासन दिल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

वाहतूक उपसंचालक भोसलेंची गुन्हा विभागामार्फतचौकशी

बनावट कागदपत्रांआधारे वाहने नोंदणीचा ठपका
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - रस्ता वाहतूक खात्याचे उपसंचालक अशोक भोसले यांनी साहाय्यक संचालकपदी कामावर असताना अनेक वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याप्रकरणी आज अखेर गुन्हा विभागाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे उत्तर गोवा अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून याप्रकरणाचा पाठपुरावा चालवला होता. मडगाव येथील "जय दामोदर संघटने' चे अध्यक्ष महेश नायक यांनीही भोसले यांच्याविरोधात गैरकारभाराची तक्रार फोंडा पोलिसांत दाखल केली आहे. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या ४७१ व ४२० कलमांतर्गत प्रथम चौकशी अहवालात गुन्हा नोंदवण्यात आल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
सुदेश कळंगुटकर यांनी याप्रकरणी रस्ता वाहतूक संचालक व दक्षता खात्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत अशोक भोसले यांनी म्हापसा, फोंडा आदी ठिकाणी रस्ता वाहतूक कार्यालयात साहाय्यक संचालकपदी असताना अनेक वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. याच काळात त्यांनी विविध वाहनांना कर थकबाकीतही मोठ्या प्रमाणात संशयास्पद सूट दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात गेल्या ३ ऑक्टोबर २००८ रोजी वाहतूक खात्याचे तत्कालीन संचालक श्री. रेड्डी यांनी त्यांना "कारणे दाखवा' नोटीस जारी केली होती. या नोटिशीला भोसले यांनी २८ ऑक्टोबर रोजी उत्तर दिले. तथापि तेे समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. दरम्यान, भोसले यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी होण्याच्या पार्श्वभूमीवर खुद्द वाहतूक संचालक श्री.रेड्डी यांचीच बदली झाल्याने सरकारकडूनच भोसले यांची पाठराखण सुरू असल्याचा संशयही बळवला आहे.
दरम्यान, जय दामोदर संघटनेचे महेश नायक यांनी यापूर्वी या खात्यातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे दक्षता खात्याकडे सुपूर्द केली आहेत व खास करून श्री.भोसले यांनी केलेले गैरप्रकार त्यांनी संसदीय समितीसमोरही सादर केले होते. त्यावेळी त्यांना यासंबंधी दक्षता खात्याकडे ही प्रकरणे सुपूर्द करण्याची सूचना करण्यात आली होती. ही प्रकरणे दक्षता खात्याकडे सध्या धूळ खात पडली असताना आता नायक यांनी थेट पोलिस तक्रार करून पुन्हा खळबळ माजवली आहे.
उपसंचालक भोसले यांनी फोंडा कार्यालयात असताना अनेक बनावट पत्त्यांवर लोकांची वाहने नोंद केल्याचा आरोप त्यांच्याविरोधातील तक्रारीत करण्यात आला आहे. नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले हे ०९-०५-१९९३ ते ३१-०१-१९९५, ०३-०८-१९९८ ते १८-०९-१९९८ व २७-०६-२००५ ते ०८-०३-२००७ या काळात फोंडा रस्ता वाहतूक कार्यालयात सेवेत होते.या काळात त्यांनी मोटर वाहतूक कायद्याचे उल्लंघन करून तसेच विक्री फॉर्म २१ वर वाहन खरेदीदाराचा पूर्ण पत्ता न घेताच वाहने नोंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राज्यात गुन्हेगारी प्रकरणांसाठी अशा प्रकारच्या वाहनांचा वापर केला जात असल्याने वाहन मालकाची संपूर्ण माहिती खात्याकडे उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे नायक म्हणाले. या तक्रारीसोबत नायक यांनी विविध वाहनांचे क्रमांक दिले पोलिसांना सुपूर्द केले असून या वाहनांची नोंदणी करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपकाही या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. या तक्रारीची चौकशी तात्काळ करण्यात यावी ,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Saturday 27 December, 2008

रफिक याची सध्या तरी ब्रेनमॅपिंग चाचणी नाही गोवा पोलिस आसामला रवाना

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): नौदलाच्या मुख्यालयात संशयास्पद पकडलेला रफिक ऊल नूर इस्लाम (१८) हा पोलिस तपासाला सहकार्य करू लागल्याने त्याची ब्रेंन मॅपिंग किंवा अन्य कोणताही चाचणी होण्याची शक्यता नसल्याची माहिती "एटीएस'चे प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी दिली. मात्र भविष्यात गरज भासल्यास तो पर्याय राखून ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान इस्लाम याने पुरवलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक आज आसामला रवाना झाले आहे.
संशयित इस्लाम याने गेल्या तीन दिवसांपासून तपास यंत्रणेला चक्रावणारी माहिती देत असल्याने यामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याने सुरुवातीला आपले नाव बनावट नाव पोलिसांना सांगितले. त्याचे मूळ नाव रफिकूल नूर इस्लाम असे असून तो आसामातील धुब्री जिल्ह्यातील रुपसीगावचा रहिवासी आहे.
२००७ मध्ये तो घरातून पळालेला असून तेथील स्थानिक पोलिस स्थानकावर "बेपत्ता' अशी तक्रारही त्याच्याबद्दल नोंद करण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
या एका वर्षात इस्लाम हा कोठे होता, याचा सुगावा त्याने अद्याप पोलिसांना लागू दिलेला नाही. तसेच कडक पहारा असतानाही नौदलाच्या मुख्यालयापर्यंत तो कसा पोचला याचीही माहिती पोलिसांनी उघड केलेली नाही. या घटनेची पोलिस तक्रार नौदलाचे पोलिस अधिकारी आर एस. राठोड यांनी केली आहे. पोलिसांनी इस्लामविरोधात भा.द.सं.च्या ४४७ व ४५२ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
-----------------------------------------------------
इस्लामबाबत गूढ कायम
संशयित इस्लामचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. दहावीत तो नापास झाल्यानंतर घरातून बेपत्ता झाला. ज्यावेळी वास्को येथे हात पाय बांधलेल्या अवस्थेत तो सापडला तेव्हा त्याच्या अगंवार एक टी शर्ट, त्यावर जीन जॅकेट व कार्गो पॅंट परिधान केली होती. तसेच त्याच्याकडे कोणतेही हत्यार सापडलेले नाही, अशी माहिती यावेळी श्री. देशपांडे यांनी दिली. त्याच्याकडे केवळ एक बॅग होती आणि त्यात काही कागदपत्रे होती. त्यावर हिंदी भाषेतून लिहिण्यात आलेले असून त्याची तपासणी केली जात असल्याचे ते म्हणाले.
इस्लामला कोणी बांधले, तो एक वर्ष कुठे होता आणि त्याने हे नाट्य यामागील गूढ अजून कायम आहे. त्याचा छडा लावणे हेच सध्या पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे.

धारगळला साकारणार 'हस्तकला ग्राम'

पणजी, दि.२६ (प्रतिनिधी) : गोवा हस्तकला व ग्रामिण लघु उद्योग विकास महामंडळातर्फे पेडणे तालुक्यातील धारगळ येथे "हस्तकला ग्राम' उभारण्याचा निर्णय घेतला आहे.महामंडळाच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली असता "साऊथ एशियन फाऊंडेशन'कडून सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात येईल,अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष समीर साळगावकर यांनी दिली.
आज पणजी मळा येथील महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष समीर साळगावकर यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. नाईक हजर होते. "हस्तकला ग्राम' ही एक अनोखी योजना आहे. राज्यातील स्थानिक हस्तकारागिर व कलाकारांना एका ठिकाणी जागा उपलब्ध केली जाईल. तिथे आपल्या वस्तू तयार करण्यासंबंधी सर्व सोयीसुविधा, राहण्याची सोय व बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे.
या ग्रामाची रचनाच ग्रामीण पातळीवर होणार असल्याने ते पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी देशातील इतरत्र कारागिरांना आमंत्रित करून कलेची देवाणघेवाण करण्याबरोबर लघू उद्योगामार्फत स्वयंरोजगारालाही प्रोत्साहन देण्याची योजना असल्याचेही साळगावकर म्हणाले.
या प्रकल्पासंबंधी अलिकडेच नवी दिल्ली येथे उत्तमनगर व उत्तरप्रदेशातील वाराणासी आदी ठिकाणच्या हस्तकला ग्रामांची पाहणी केल्याचे यावेळी श्री. नाईक म्हणाले. यावेळी केंद्रीयमंत्री तथा फाऊंडेशनचे विश्वस्त कपिल सिब्बल व राहुल बारुआ यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. हा प्रकल्प गोव्यात उभारण्यास ही संस्था इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पेडणे तालुक्यातील धारगळ या गावात त्यासाठी सुमारे १५ ते २० एकर जागेची पाहणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णपणे प्रदुषणमुक्त तर असणार आहेच; परंतु तो या परिसराचे खास आकर्षण ठरणार आहे.या ठिकाणी स्थानिक २०० ते २५० कारागिरांना निवासाची सुविधा उपलब्ध करून कामासाठी शेड्स देण्यात येणार आहेत. पेडणे भागात मुबलक हस्तकारागिर असल्याने या जागेची निवड करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. विविध स्वयंसेवा गट व प्रशिक्षित हस्तकारागिरांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होईल,असेही यावेळी सांगण्यात आले.
------------------------------------------------------------
गणेश मूर्तिकारांना जानेवारीअखेरी पैसे
गोवा हस्तकला महामंडळातर्फे राज्यातील चिकण मातीच्या गणेश मूर्तिकारांना प्रत्येक विक्रीस गेलेल्या मूर्तीवर शंभर रुपये अनुदान देण्याची योजना आर्थिक अडचणीमुळे अडकली होती. आता सरकारने त्यासाठी ३२ लाख रूपयांचे सहाय्य मंजूर केले असून येत्या जानेवारी अखेरीस ही रक्कम मूर्तिकारांना वितरीत केली जाईल.महामंडळाकडे सुमारे ३६७ मूर्तिकारांची नोंदणी असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.

'सनबर्न' नृत्यरजनीस अखेर हिरवा कंदील, राजकीय दबावापुढे गृहखात्याची शरणागती!

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) : राज्य सरकारने परवानगी नाकारली तरी "सनबर्न' संगीत महोत्सव होणारच हा दावा आयोजकांनी अखेर खरा करून दाखवलाच. सुरक्षेच्या कारणावरून राज्यातील किनाऱ्यांवरील खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केलेल्या राज्य सरकारकडूनच आज नाताळ व नववर्षांच्या निमित्ताने आशियातील सर्वांत मोठा "नाईट म्युझिक' महोत्सव समजल्या जाणाऱ्या "सनबर्न' उत्सवाला परवानगी देण्याचा प्रकार घडला. कांदोळी येथे आयोजित होणाऱ्या या महोत्सवाच्या आयोजकांनी आपली राजकीय ताकद वापरून खुद्द गृह खात्यालाच आपला आदेश बासनात गुंडाळण्यास भाग पाडले.
या आयोजनास नकार दिलेला आदेश बदलून परवानगी देण्याचा नवा आदेश जारी करण्यात आल्याने हा सध्या बराच चर्चेचा विषय बनला आहेच परंतु पोलिसांवर दबाव आणून त्यांना तीन वेळा अहवाल सादर करण्यास भाग पाडल्याने पोलिस खाते व वरिष्ठ अधिकारीही बरेच नाराज बनले आहेत. प्राप्त माहितीनुसार म्हापशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गुंडू नाईक यांनी २० डिसेंबर रोजी म्हापशाचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी महेश खोर्जुवेकर यांच्याकडे या पार्टीस परवानगी नाकारण्याची शिफारस केली होती. ही पार्टी खुल्या ठिकाणी होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ती धोकादायक ठरण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली होती. पोलिसांनी सादर केलेल्या या अहवालानुसार श्री.खोर्जुवेकर यांनी सदर आयोजकांकडून केलेला अर्ज फेटाळला व या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे २४ रोजी आयोजकांना सांगण्यात आले. त्यानंतर २५ रोजी पुन्हा एकदा नव्याने पोलिस अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आयोजकांकडून सुरक्षेची हमी देण्यात येत असल्याने त्यांना परवानगी देण्यास हरकत नसावी,असे कळवण्यात आले होते. यावेळी सदर कार्यक्रमाची जागा कुंपणाने वेढून, प्रवेशव्दारावर "मेटल डिटेक्टर', खाजगी सुरक्षा रक्षक तशा सुरक्षेचे सर्व उपाय घेण्याचे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, यावेळी श्री.खोर्जुवेकर हे मात्र आपल्या निर्णयाशी ठाम राहीले.
एवढे करूनही पोलिसांकडून आज नव्याने अहवाल सादर केला. हा कार्यक्रम किनाऱ्यावर होणार नाही व यावेळी सुरक्षेचे सर्व उपाय घेण्यात आले असून त्यांना परवानगी देण्यात यावी,अशी शिफारस करण्यात आली. यावेळी आयोजकांकडून अग्निशमन दल, वीज खाते व जमीन मालकाकडून ना हरकत दाखला आणण्याची सक्ती करण्यात आली. बार्देश तालुक्यातील कांदोळी येथे "सनबर्न' या कंपनीतर्फे महा संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव २७ ते २९ डिसेंबर या काळात होणार आहे. या संगीत रजनीसाठी देशविदेशातील बड्या कलाकारांना आमंत्रित केले जाते. या महोत्सवाची जाहिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर करून खास या पार्टीत सहभागी होण्यासाठी गोव्यात पर्यटक येत असतात. गेल्या काही वर्षांत उत्तर गोव्यातील नाताळ व नववर्षाच्या काळातील सर्वांत मोठे आकर्षण बनलेल्या या पार्ट्या यंदा सुरक्षेच्या कारणांमुळे बंद होणार असल्याने आयोजकांचे धाबे दणाणले आहेत.
आयोजकांनी आपले नियोजित कार्यक्रम होण्यासाठी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न चालवले होते. कळंगुटचे आमदार आग्नेल फार्नंडिस यांनी यासंबंधी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांशीही वारंवार चर्चा केल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुळातच या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थाचे व्यवहार होत असल्याचीही चर्चा सुरू होती. यावेळी मात्र आयोजकांनी "अमलीपदार्थ मुक्त' पार्टी होणार असल्याचे घोषित करून यंदाच्या या महोत्सवात शांतता व विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करण्याचे जाहीर केले होते. या महोत्सवात "फुड स्टॉल्स', मनोरंजनात्मक कार्यक्रम,फ्ली मार्केट अशा अनेक गोष्टींचा सहभाग असतो. यासंबंधी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पार्ट्यांना म्हापशाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळंगुट पोलिसांच्या शिफारशीवरून परवानगी नाकारल्याची माहिती आपल्याकडे आहे. या कार्यक्रमांना परवानगी दिल्याचे आपल्याला काहीही माहिती नाही,असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
गृहमंत्री काय करताहेतः उपेंद्र गावकर
खुल्या पार्ट्यांवर बंदी घालूनही "सनबर्न' कार्यक्रमाला परवानगी देण्याची कृती धोकादायक आहेच; परंतु गृहखात्याची विश्वासाहर्ता घालवणारी ठरली आहे. कधीकाळी गृहमंत्री म्हणून गाजलेले रवी नाईक आता एवढे नरम व शांत कसे काय,असा सवाल शिवसेना राज्य प्रमुख उपेंद्र गावकर यांनी केला. आपल्या निर्णयाशी ठाम राहणे या सरकारला जमतच नसून वारंवार निर्णयात फेरफार करून हसे करून घेण्याची सवयच या सरकारला जडली आहे,अशी टीकाही त्यांनी केली. गृहमंत्र्यांनी राज्याच्या सुरक्षेशी तडजोड करू नये व राजकीय दडपणाला अजिबात बळी पडता कामा नये. या पार्ट्या बंद झाल्याच पाहीजेत,अशी मागणी गावकर यांनी केली.

आयटी क्षेत्रात ५० हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता

बंगलोर, दि. २६ : आगामी सहा महिन्यात आयटी क्षेत्रातील ५० हजार जणांना घरी बसावे लागणार आहे. आर्थिक मंदीमुळे जगभरातच आयटी आणि बीपीओ क्षेत्रावर परिणाम झाला असून आयटीसंदर्भातील निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे सहा महिन्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपात होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांनी दहा हजार जणांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला होता. आता आर्थिक मंदीची झळ मोठ्या व लहान आयटी कंपन्यांनाही बसू लागेल व किमान ५० हजार जणांना नोकरी गमवावी लागेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मंदीची झळ पोहोचली असल्यामुळे आगामी काळात आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांपुढे वेतन, भत्ते कपातीचा प्रस्ताव ठेवतील. मात्र, तेजीचे वातावरण निर्माण होईपर्यंत म्हणजेच किमान १२ ते १६ महिन्यांपर्यंत घरी बसण्याचा पर्याय आयटी प्रोफेशनल्स स्वीकारतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानी लष्कर सीमेवर तैनात जवानांच्या सुट्या रद्द

इस्लामाबाद, दि. २६ : भारतासोबतच्या संबंधांमधील तणाव लक्षात घेऊन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेसह आपल्या अखत्यारीतील पाकव्याप्त परिसरातही लष्कर तैनात केले आहे.
"टाईम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकमधील संरक्षण मंत्रालय सध्या सीमेवरील सैनिकांच्या हालचालींविषयी काहीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. पण, प्राप्त माहितीनुसार लाहोर सेक्टरमध्ये सीमेवर नव्याने सैैनिकांची तैनाती केली जात आहे. महत्त्वपूर्ण ठिकाणांच्या सुरक्षेसाठी जागोजागी सुरक्षा कडे उभारले जात आहेत. आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषा आणि सीमेवर अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आले आहे. दरम्यान पाकी लष्करातील जवानांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
पाकी लष्कराच्या १० व्या ब्रिगेडला लाहोरला पाठविण्यात आले असून तिसऱ्या आर्म ब्रिगेडला झेलम येथे पाठविण्यात आले आहे. लष्कराच्या दहाव्या आणि अकराव्या डिव्हिजनला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानी वायूसेनेलाही हाय अलर्टचा आदेश देण्यात आल्याचे काही पाकी वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. दोन्ही देशांचे नेते युद्धाची शक्यता नाकारीत असले तरी पाकने संरक्षण मंत्रालयाला पूर्ण तयारीत ठेवले आहे.

अभियंता हत्या प्रकरण: आमदार शेखरी तिवारीवर रासुका

औरय्याच्या पोलिस अधीक्षकांना हटविले
सीबीआय चौकशी व्हावी : सपा

लखनौ, दि. २६ : उत्तरप्रदेशातील अभियंता मनोज गुप्ता हत्या प्रकरणी औरय्या येथील पोलिस अधीक्षक अकरामुल हक यांना तात्काळ हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी गोरखपूर जीआरपीमधील एसपी नचिकेत झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी आमदार शेखर तिवारी याच्यासह तीन जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचेही वृत्त आहे.
औरय्या येथील आयजी भानुप्रताप सिंग यांनी सांगितले की, पीडब्ल्यूडीतील अभियंता मनोज कुमार गुप्ता यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अटकेत असणाऱ्या आमदार शेखर तिवारी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. या आमदाराला साथ देणाऱ्या दिबियापूर येथील कोतवाल होशियार सिंग यांच्यावरही वरिष्ठ अधिकारी नाराज आहेत. मरणासन्न स्थितीतील गुप्ता यांना जेव्हा तिवारी आणि त्यांचे साथीदार दिबियापूर येथील ठाण्यात घेऊन गेले तेव्हा ताबडतोब त्यांना दवाखान्यात न नेता होशियार सिंग यांनीही गुप्ता यांना मारहाण केली. घटनास्थळी गुप्ता यांच्या केसाचा पुंजका सापडला असून तो पुरावा म्हणून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, अभियंता गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आज समाजवादी पार्टीने केली आहे. गुप्ता यांच्या हत्येने बसपाची अराजकता समोर आली असून त्यांनी केवळ आपल्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या आमदारांचा बचाव करण्यासाठी सीबीआय चौकशीविषयी टाळाटाळ केल्याचे सपाचे म्हणणे आहे.

तेल कंपन्यांना पेट्रोल मिळतय् पाण्यापेक्षाही स्वस्त!

मुंबई, दि. २६ : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. जागतिक मंदीचा परिणाम म्हणून की काय १५० डॉलर्स प्रतिपिंप एवढी विक्रमी वाढ, आता अचानक कमी होऊन आज ती ३६ डॉलर्स प्रतिपिंपपर्यंत कमी झालेली आहे. या कमी झालेल्या किमतीमुळेच भारतातील तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल बिसलरीपेक्षाही म्हणजेच पाण्यापेक्षाही स्वस्त मिळत आहे.
सरकारी तेल कंपन्यांना सध्या पेट्रोल फक्त ११ रुपये लीटर व डिझेल १३ रुपये लीटर इतक्या कमी किमतीत मिळत आहे. यात वाहतूक आणि इतर खर्चांचा समावेश करण्यात आलेला नाही. या किमतींची बिसलरी बॉटल्समध्ये मिळणाऱ्या मिनरल वॉटरसोबत तुलना केली तर भारतीय कंपन्यांना पेट्रोल व डिझेल या वॉटर बॉटलपेक्षाही कमी दरात मिळत आहे. आज भारतीय बाजारपेठांमध्ये एक लीटरच्या मिनरल वॉटर बॉटलची किमत १२ ते १५ रुपये दराने उपलब्ध आहे.
एका पिंपात (बॅरलमध्ये) १९० लीटर कच्चे तेल असते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका पिंपाचा भाव ३८ डॉलर आहे. म्हणजेच कच्च्या तेलाची किमत प्रती लीटर अवघी दहा रुपये होते. (ही किमत प्रती डॉलर ५० रुपये या विनिमय दरावर आधारित आहे.) प्रत्येक बॅरलमधील कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणानंतर सरासरी २८-२९ लीटर पेट्रोल व ८५ लीटर डिझेल तयार होते. अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्पातले तंत्रज्ञान आणि कच्च्या तेलाच्या दर्जावर आधारित उत्पादनाची सरासरी अवलंबून असते. जर इतर कोणतेही कर आणि शुल्क नसतील तर इंधनाची किमत प्रती लीटर किती पडेल, ही आकडेवारी काढणे तसे गुंतागुंतीचे आहे. त्याचे कारण केंद्र व राज्य सरकारचे कर आणि लेव्ही तसेच विक्रेत्यांचे कमिशन, वाहतूक खर्चाची लेव्ही या सर्वांची बेरीज करून किमत निर्धारित करण्यात येते. हे सर्व कर आणि लेव्ही पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री किमतीच्या जवळपास ४५-५५ टक्के व्यापतात. म्हणूनच दिल्लीत पेट्रोल ४५ रुपये लीटर भावात उपलब्ध होते. त्यात कर आणि लेव्ही २२ रुपये आणि सरकारी तेल कंपन्यांचा १२ रुपये नफा समाविष्ट असतो. हीच बाब डिझेलचीही आहे. दिल्लीत डिझेल ३२ रुपये लीटरप्रमाणे विकत मिळते. यात कच्च्या तेलाची किमत असते फक्त १३ रुपये लीटर. एक लीटर डिझेलमागे तेल कंपन्यांना तीन रुपयांचा फायदा होतो.
कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच केरोसिन, विमानाचे इंधन, गॅस आणि नाफ्थ्याचेही उत्पादन करण्यात येते आणि त्याचा परिणाम अंतिम किमत निश्चितीवर होतो.
ही सारी पार्श्वभूमीवर बघता पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मधल्या काळात कच्च्या तेलाचे भाव वाढले असताना आणि गॅसवर दिली जाणारी सबसिडी लक्षात घेता तेल कंपन्यांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. हे नुकसान भरून काढण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली असल्यामुळेच सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्यात आलेले नाहीत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते निश्चितच कमी होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. तोपर्यंत तेल कंपन्यांनाही आपले नुकसान भरून काढण्याची संधी आणि अवधी उपलब्ध आहे, हे येथे उल्लेखनीय.

Friday 26 December, 2008

पाकिस्तानने अणुबॉम्ब फेकल्यास बंकरचा आधार

भारत- पाक संबंधातील सध्याच्या तणावाचे पर्यवसान युद्धात झाले तर आणि आण्विक युद्ध छेडले गेले तर परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय संरक्षण यंत्रणा सज्ज आहे. "नो फर्स्ट यूज'चे आश्वासन दिले असतानाही पाकिस्तानने आण्विक हल्ला केलाच तर महासंहारक किरणांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी डीआरडीओने खास बंकर तयार केले आहे , अशी माहिती "डीआरडीओ'चे (संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे) मुख्य नियंत्रक डब्ल्यू सेल्वमुर्ती यांनी दिली.
आण्विक , जैविक किंवा रासायनिक , कोणत्याही प्रकारचा हल्ला परतावून लावण्यास भारताची संरक्षण यंत्रणा सज्ज असल्याचं सेल्वमुर्ती यांनी सांगितलं. आण्विक हल्ल्याच्या काळात जनतेसाठी छोटे छोटे निवारे , रेडिएशनपासून बचाव करण्याचे यंत्र आणि हवेतून पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
आपल्या दिशेनं येणारे मिसाइल ५० किलोमिटर लांब अंतरावर हवेतच नष्ट करण्याची क्षमता असलेले इंटरसेप्टिव मिसाईल सिस्टीम विकसित करण्यात आली आहेत. या यंत्रणेची पूर्वीच चाचणीसुद्धा झाली असल्याचं ते म्हणाले.
अत्याधुनिक अशा लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टची दोन दिवसांपूर्वी लेहमध्ये शून्य तापमानात यशस्वी चाचणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. २०१० पर्यंत एअर फोर्समध्ये २० लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट दाखल होतील अशी माहिती सेल्वमूर्ती यांनी दिली.

पाकिस्तानी फौजा सीमेवर

नवी दिल्ली व इस्लामाबाद, दि. २५: मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर बिघडत चाललेल्या भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधांची गाडी धोक्याच्या वळणावर पोहोचली आहे. आतापर्यंत भारताला केवळ शाब्दिक धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने राजस्थानलगतच्या सीमेनजीक सैनिकांच्या अनेक तुकड्या दाखल केल्या असून आघाडीच्या हवाई तळांवर लढाऊ विमानेही सज्ज ठेवली आहेत. त्यापाठोपाठ केंद्रातील डॉ. मनमोहनसिंग सरकारने राजस्थानच्या सीमाभागातील गावांना कधीही स्थलांतरास सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उभय देशांच्या फौजा आमने-सामने डोळ्याला डोळा भिडवण्याच्या स्थितीत येतील, अशी चिन्हे आहेत.
मुंबईवरील हल्ल्यामागे आपल्याच देशातील दहशतवादी असल्याचे सत्य कबूल करण्यास पाक अद्याप तयार नाही. त्यातूनच उभय देशांतील संघर्ष चिघळत चालला आहे. मंगळवारी दोन्ही देशांच्या नेत्यांची वक्तव्ये 'युद्ध होणार नाही' असा सूर लावणारी होती. मात्र बुधवार उजाडला आणि तो सूर बदलत गेला. लाहोर, कराची व इस्लामाबाद या प्रमुख शहरांवर पाकच्या लढाऊ विमानांनी मंगळवारीही टेहळणी घिरट्या घातल्याचे स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ महत्त्वाची खबर आली ती पाक सैनिकांच्या तुकड्या बाडमेरजवळच्या सीमेवर दाखल होत असल्याची. आतापर्यंत या प्रदेशात पाकचे केवळ रेंजर्सच तैनात होते. मात्र, बुधवारी त्यात सैनिक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भर पडली. सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बंसल यांनी स्वत: त्यास दुजोरा दिल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले.
या प्रकाराची तातडीची दखल केंद सरकारने घेतली आणि राजस्थान सरकारला पत्र धाडले. 'पाक सैन्याचा हालचाली पाहता सीमेलगतची गावे इतरत्र स्थलांतरीत करण्याची वेळ कधीही येऊ शकते. त्यासाठी तयार रहा' असे त्या पत्रात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने केलेल्या हालचालींची माहिती रात्री उशिरापर्यंत हाती आली नव्हती.

... तर पाक बेचिराख

नवी दिल्ली, दि. २५: वेळोवेळी दम देऊनही पाकिस्तान अतिरेक्यांचे तळ संपवणार नसेल, तर भारताला कठोर पावले उचलावीच लागतील. भारताशी युद्धाला सज्ज असण्याची भाषा पाकने करू नये. पाकने युद्ध पेटवलेच तर त्यात तो देशच बेचिराख होईल , असा सज्जड दम पश्चिम विभागाचे एअर कमांडिग ऑफिसर इन चीफ, एअर मार्शल पी. के. बोरबोरा यांनी भरला आहे.
कोणताही हल्ला परतवून लावण्याची क्षमता भारतापाशी आहे. दहशतवादी तळ नष्ट करायचे सोडून पाक युद्धासाठी चिथावणी देत आहे. तथापि, त्यांच्या युद्ध सरावाला पाहून आम्ही डरणार नाही , असेही बोरबोरा यांनी स्पष्ट केले.
उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे संदेश हवाई दलाला पोहचले आहेत. अत्याधुनिक रॉकेट आणि आधीच निश्चित केलेल्या लक्ष्यावर थेट मारा करणारे बॉम्ब सज्ज आहेत. तसेच वेळ पडली तर कारवाई आम्हाला सहज शक्य आहे. फक्त कारवाईच नाही तर पाकिस्तानी हवाई हल्ल्यापासून देशाला संरक्षण पुरवण्याचीही आमची क्षमता आहे , असा विश्वास बोरबोरा यांनी व्यक्त केला.
जगातील सर्वात मोठ्या चार हवाई दलांमध्ये भारतीय हवाई दलाचा समावेश होतो. दोन तासात देशातील सगळ्या प्रमुख शहरांना आणि संवेदनशील ठिकाणांना संरक्षण देण्याची ताकद आमच्यात आहे. भारताची पश्चिम एअर कमांड ही जगातल्या सर्वात मोठ्या आठ एअर कमांडपैकी एक आहे , असेही त्यांनी सांगितले.
सरकारने आदेश दिला तर पाकिस्तानात असलेले अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्यासाठीही तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पाच हजार जागा आधीच निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

बनावट कागदपत्रांद्वारे प्रचंड जमिनीची विक्री

- पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल
- टोळी सक्रिय असण्याची शक्यता
- बोगस सही-शिक्क्यांचा वापर

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): बनावट कागदपत्रांद्वारे पर्वरी साल्वादोर द मुंद येथील सुमारे १४१०० चौरसमीटर जागा दिल्लीतील "समिहा इंटरनॅशनल बिल्डर्स'ला विकल्याप्रकरणी दिएगो फर्नांडिस यांच्याविरोधात पर्वरी पोलिस स्थानकात बनवेगिरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी सरकारी शिक्के तसेच मामलेदार व उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सह्यांचाही वापर करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणात एखादी टोळी सक्रिय असावी, अशी शक्यताही या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी या खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार पर्वरी साल्वादोर द मुंद येथील सर्व्हे क्रमांक १६२/१ या "गोळाचे वेरीक' जागेचे सहहक्कदार डॉ.मीनाक्षी मार्टिन्स व बिस्मार्क फाचो यांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. याच जागेची एक सहहक्कदार ऍना सेवरीना परेरा यांच्याकडून आपल्या नावे खोटी "पॉवर ऑफ ऍटर्नी' तयार करून दिल्लीस्थित "समिहा इंटरनॅशनल बिल्डर्स' या कंपनीबरोबर बनावट विक्री करार करण्यात आल्याचा ठपका या तक्रारीत ठेवला आहे. दरम्यान,बिस्मार्क फाचो यांनी दिलेली माहिती त्याहूनही धक्कादायक असून एकूण सहा सर्व्हे क्रमांकांची बनावट विक्रीखते तयार करून विविध ठिकाणी या जागा बॅंकेत गहाण ठेवून लाखो रुपये उकळल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. ही खोटी कागदपत्रे तयार करताना सरकारी शिक्के व अधिकाऱ्यांच्या सह्यांचा ज्या पद्धतीत वापर करण्यात आला आहे,त्यानुसार यामागे एखादे टोळकेच असावे हे स्पष्ट होत चालले असून पोलिसांनी तात्काळ या टोळीचा पर्दाफाश करावा,अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
दरम्यान,या कागदपत्रांसंबंधी तिसवाडी उपनिबंधकांकडे चौकशी केली असता सदर विक्रीखते या कार्यालयात नोेंद झाली नसल्याचे सांगून ती बनावट असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. जागेच्या मालकांना काहीही सुगावा लागणार नाही याची दक्षता घेऊनच परस्पर जागा हडप करण्याचे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यासाठी सरकारी शिक्के व कागदपत्रांचाही वापर होत असल्याने हा प्रकार उघडकीस आल्यास या टोळीचा पर्दाफाश होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्या संशयिताला ७ दिवस कोठडी

- कसून चौकशी सुरू
- पोलिसांची दिशाभूल
- अद्याप धागेदोरे नाहीत

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): वास्को येथे नौदल मुख्यालयात संशयास्पद सापडलेल्या शराफ नूर इस्लामिक (रा. आसाम) नावाच्यासंशयिताकडून अद्याप कोणतेही महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणेला मिळालेले नसून आज सकाळी त्याला वास्को प्रथमवर्ग न्यायदंडाधिऱ्यांसमोर उभे करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली. काल सकाळपासून राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा त्याची कसून चौकशी करीत आहेत. तथापि, तो परस्परविरोधी माहिती देत असल्याने तपास अधिकारीही चक्रावले आहेत.
या तरुणाने आपण आसाममधे राहत असल्याची माहिती दिली आहे. तो आसामातील धुब्री जिल्ह्यात राहणारा असून त्याचे वडील व्यवसायाने शिंपी असल्याची माहिती मिळाली आहे. दोन वर्षांपासून तो घरून पळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.या कालवधीत शराफ कुठे होता, याचा तपास सध्या सुरू आहे.
कालपासून शराफने तपास यंत्रणेला दिशाभूल करणारी माहिती देण्याची सत्र आरंभले आहे. अटक केल्यानंतर त्याने सर्वांत आधी पोलिसांना सांगितले की, आपल्याबरोबर अन्य दोघे साथीदार होते. त्यांनी आपल्याला नौदल मुख्यालयात हातापाय बांधून सोडले अशी माहिती दिली. त्यानंतर आपण पाकिस्तानातून आलो असून माझ्यावर दहशतवादी होण्यासाठी दबाव टाकला जात होता, असे त्याचे म्हणणे आहे. ही माहिती पोलिसांच्या गळी उतरत नसल्याने त्याने नवीन कहाणी पोलिसांना सांगितली. "मी दोन दिवसापूर्वीच नोकरीच्या शोधात गोव्यात आलो. तथापि, कोठेही नोकरी न मिळाल्याने शेवटी ही शक्कल लढवली. नौदलाच्या कुंपणावरून उडी घेऊन मीच स्वतःला बांधून घेतले. तसेच माझ्या बॅगेत आहेत ती कागदपत्रे मिळाली ती मीच माझ्या हाताने लिहलेली आहेत'. अर्थात, पोलिस त्या लिखाणाची आता चाचणी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

'सनबर्न' संगीत रजनीच्या आयोजनावरून गोंधळ, परवानगी नाकारली तरीही आयोजक कार्यक्रम करणारच

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): गोव्यातील नाताळ व नववर्षांच्या निमित्ताने आशियातील सर्वांत मोठा नाइट "म्युझिक' महोत्सव असलेल्या "सनबर्न' उत्सवाला सुरक्षेच्या कारणांत्सव परवानगी नाकारण्याचा निर्णय म्हापशाचे उपविभागीय अधिकारी महेश खोर्जुवेकर यांनी घेतला खरा; परंतु आयोजकांनी मात्र सरकारकडून या कार्यक्रमाला परवानगी दिल्याचा दावा केल्याने कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी पाठवलेल्या अहवालानुसार या पार्ट्यां सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तविल्याने ही परवानगी नाकारण्यात आली आहे. तथापि, या महोत्सवाचे संचालक व्ही.जे.निखिल चिन्नपा यांनी हा महोत्सव शंभर टक्के होणार असल्याचे एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.
बार्देश तालुक्यातील कांदोळी येथे "सनबर्न' या कंपनीतर्फे महा संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव २७ ते २९ डिसेंबर या काळात होणार होता. या संगीत रजनीसाठी देशविदेशातील बड्या कलाकारांना आमंत्रित केले जाते. या महोत्सवाची जाहिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर करून खास या पार्टीत सहभागी होण्यासाठी गोव्यात पर्यटक येत असतात. गेल्या काही वर्षांत उत्तर गोव्यातील नाताळ व नववर्षाच्या काळातील सर्वांत मोठे आकर्षण बनलेल्या या पार्ट्या यंदा सुरक्षेच्या कारणांमुळे बंद होणार असल्याने आयोजकांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य सरकारने खुल्या किनारी पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश काढण्यापूर्वी या आयोजकांनी आपले नियोजित कार्यक्रम होण्यासाठी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न चालवले होते. कळंगुटचे आमदार आग्नेल फार्नंडिस यांनी यासंबंधी आयोजकांना घेऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांशीही वारंवार चर्चा केल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुळातच या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थाचे व्यवहार होत असल्याचीही चर्चा सुरू होती. यावेळी मात्र आयोजकांनी "अमलीपदार्थ मुक्त' पार्टी होणार असल्याचे घोषित करून यंदाच्या या महोत्सवात शांतता व विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करण्याचे जाहीर केले होते. या महोत्सवात "फुड स्टॉल्स', मनोरंजनात्मक कार्यक्रम,फ्ली मार्केट अशा अनेक गोष्टींचा सहभाग असतो. दरम्यान,या कंपनीचे मुख्य अधिकारी मनुज आगरवाल यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा महोत्सव खुल्या किनाऱ्यांवर न करता खाजगी जागेत होतो; तसेच या ठिकाणी प्रवेशव्दारावर कडक बंदोबस्त तसेच सभोवताली कठडा उभारण्याची तयारी परवानगी पत्रात दर्शवली होती. यासंबंधी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पार्ट्यांना म्हापशाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळंगुट पोलिसांच्या शिफारशीवरून परवानगी नाकारल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर गृहखात्याकडून त्यांना वेगळी परवानगी मिळवल्याची आपल्याला कोणतीही माहिती नाही,असा खुलासा त्यांनी केला.

कारवारामध्ये प्रचार संपला

कारवार, दि. २५ (प्रतिनिधी): येथील विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गेल्या काहीदिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धडाका अखेर आज सायंकाळी संपला. भारतीय जनता पक्षातर्फे आनंद असनोटीकर तर कॉंग्रेसतर्फे सतीश सैल या निवडणुकीत परस्परांसमोर उभे ठाकले असून मतदान शनिवार दि. २७ रोजी होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी आनंद असनोटीकर हे कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते; तथापि, नंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये दाखल झाले. असनोटीकर हे माजी आमदार वसंत असनोटीकर यांचे सुपुत्र होत.

हिंदूंचा दबावगट हवाच नरेंद्राचार्य स्वामीजींहस्ते दक्षिण उपपीठाची स्थापना


ओल्ड गोवा येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या दक्षिण पीठ मठात श्री शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करताना रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज. (छाया: प्रमोद ठाकूर)

ओल्ड गोवा, दि.२५ (प्रतिनिधी): हिंदू धर्मावरील अत्याचार, अन्याय निवारण्यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट होऊन दबावगट निर्माण करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आज येथे केले. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या दक्षिण उपपीठाची स्थापना ओल्ड गोवा येथे करण्यात आली असून या पीठाच्या पीठारोहण सोहळ्यासाठी नरेंद्राचार्य महाराज येथे आले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, हिंदू समाज एकसंध नसल्याने धर्मांतरे, मूर्ती तोडफोड, गोहत्या आदी प्रकारांत वाढ होत असून हिंदू समाज गलितगात्र बनला आहे. हिंदू समाजाला राजाश्रय नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. मुस्लिम, ख्रिस्ती समाजाने आपला दबावगट निर्माण केला आहे. तसाच दबावगट हिंदूंनी एकत्र येऊन करण्याची नितांत गरज आहे.
मालेगाव येथील बॉम्ब स्फोट प्रकरणाशी स्वाध्वी प्रज्ञा याचा संबंध आल्यानंतर देशभरात हिंदू दहशतवाद म्हणून काही राजकारणी आणि मीडियाकडून ओरड केली जाऊ लागली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातील मुस्लीम समाजातील युवक गुंतल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या हल्ल्याला इस्लामिक दहशतवाद म्हणायला राजकारणी किंवा मीडियासुध्दा पुढे आला नाही, अशी खंत नरेंद्राचार्य स्वामींनी व्यक्त केली.
हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. मुस्लिम व ख्रिस्ती समाजाच्या एक गठ्ठा मतावर डोळा ठेवून त्यांच्या विरोधात चुकूनही "ब्र' काढला जात नाही. हिंदूंनी दबाव गट निर्माण केल्याशिवाय राजाश्रय मिळणे कठीण आहे. मुस्लिम व ख्रिस्ती लोक आपल्या धर्मगुरूंच्या आज्ञेनुसार वागतात. मुस्लिमांच्या देवाचे हास्यचित्र काढण्यात आले तेव्हा सर्व मुस्लिम रस्त्यावर आले होते.संबंधितांना नंतर ते हास्यचित्र (कार्टून) मागे घेऊन माफी मागावी लागली. हिंदूंच्या बाबतीत अशा प्रकारे कुठल्याही अन्यायाविरोधात लोक एकत्र झालेले दिसत नाहीत. हिंदूंनीही आपल्या धर्मगुरूंच्या आज्ञेनुसार वागण्यास सुरुवात केली तरच त्यांना भविष्यात न्याय मिळू शकतो. हिंदूंवर अनेक बंधने घालण्यात आली आहे. हिंदूंनी कुटुंब नियोजन करायचे. मुस्लिमांना कुंटुब नियोजन नाही. त्यामुळे भविष्यकाळात हिंदू अल्पसंख्याक होणार आहे. हिंदू विचारसरणीचे उमेदवार जेव्हा सत्तेवर येतील तेव्हाच हिंदूंना न्याय मिळू शकतो, असेही स्वामींनी सांगितले.
जुने गोवा येथे पूर्वी शंकराचे मंदिर होते. त्यामुळे या पीठात शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ह्या पीठावर नियमित कार्यक्रम होणार आहेत. ह्या पीठावरून हिंदू समाज संघटित करण्याचे काम केले जाणार आहे. धर्मांतर झालेल्या देशातील विविध भागांतील सुमारे ६७ हजार हिंदूंना पुन्हा धर्मात प्रवेश देण्यात आला आहे.
स्वाभिमानी हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करण्यासाठी तसेच गोव्यात समस्त हिंदू बांधवांना एकत्र येण्यासाठी या उपपीठाच्या रूपाने सुवर्णसंधी मिळाली आहे. हिंदू धर्मावरील अत्याचार आणि होणारी धर्मांतरे रोखण्यासाठी या धर्मपीठाच्या माध्यमातून अधिक कार्य साकार होऊ शकते. शैव, वैष्णव असा भेदाभेद विसरून हिंदू धर्मीयांनी संघटित राहण्याची आजच्या काळाची सर्वांत मोठी गरज आहे. यासाठी प्रत्येकाने जाती पातीमधील भेदाभेद विसरून आपण हिंदू आहोत याचा अभिमान बाळगावा, असे स्वामींनी सांगितले.
जुना गोवा येथील नियोजित कचरा प्रकल्पाच्या प्रश्नावर बोलताना स्वामी म्हणाले की, यासंबंधी कायदेशीर लढाई सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्ही प्रत्यक्ष कृतीच करून दाखविणार आहोत. हिंदू समाजाला राजाश्रय नसल्याने धर्माची चेष्टा केली जात आहे. भारतातील हिंदू धर्म संकटात सापडलेला आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे, असेही स्वामी म्हणाले.
पीठारोहण सोहळा
वेदमंत्रांच्या घोषात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ओल्ड गोवा येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दक्षिण उपपीठाचा पीठारोहण सोहळा आज (दि.२५) भक्तिमय वातावरणात थाटात पार पडला. या पीठात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना आणि जगद्गुरूंच्या पादुकांची स्थापना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. या पीठारोगण सोहळ्याअंतर्गत दिवसभर प्रासाद उत्सर्ग संस्कार, महाआरती, मंत्रपुष्पांजली, क्षमापण आदी धामिक विधी वेदमंत्रघोषात ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या धर्मपीठामध्ये भगवान शंकराच्या पाच फूट उंच व अत्यंत रेखीव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यापूर्वी श्री शिवमूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ओल्डगोवा येथील ग्रामदेवतांना भेटी देण्यात आल्या.

Thursday 25 December, 2008

वाहतूक उपसंचालक भोसलेंविरोधात तक्रार वाहन नोंदणीत निष्काळजीपणाचा आरोप

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): रस्ता वाहतूक खात्याचे उपसंचालक अशोक भोसले यांच्याविरोधात "जय दामोदर संघटने' चे अध्यक्ष महेश नायक यांनी दाखल केलेली गैरकारभाराची तक्रार फोंडा पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. याप्रकरणी प्रथम चौकशी अहवालाअंतर्गत भोसले यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ४७१ व ४२० कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
रस्ता वाहतूक खात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लढा उभा करणाऱ्या महेश नायक यांनी यापूर्वी या खात्यातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे दक्षता खात्याकडे सुपूर्द केली आहेत. सचिवालयात गेल्यावेळी आयोजित केलेल्या संसदीय समितीसमोर महेश नायक यांनी सादर केलेली गैरप्रकाराची प्रकरणे गाजली होती व त्यावेळी त्यांना यासंबंधी दक्षता खात्याकडे ती सुपूर्द करण्याची सूचना करण्यात आली होती. ही प्रकरणे दक्षता खात्याकडे सध्या धूळ खात पडली असताना आता नायक यांनी थेट पोलिस तक्रार करून पुन्हा खळबळ माजवली आहे.
उपसंचालक भोसले यांनी फोंडा कार्यालयात असताना अनेक बनावट पत्यांवर लोकांची वाहने नोंद केल्याचा आरोप त्यांच्याविरोधातील तक्रारीत करण्यात आला आहे. नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले हे ०९-०५-१९९३ ते ३१-०१-१९९५, ०३-०८-१९९८ ते १८-०९-१९९८ व २७-०६-२००५ ते ०८-०३-२००७ या काळात फोंडा रस्ता वाहतूक कार्यालयात सेवेत होते.या काळात त्यांनी मोटर वाहतूक कायद्याचे उल्लंघन करून तसेच विक्री फॉर्म २१ वर वाहन खरेदीदाराचा पूर्ण पत्ता न घेताच वाहने नोंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राज्यात गुन्हेगारी प्रकरणांसाठी अशा प्रकारच्या वाहनांचा वापर केला जात असल्याने वाहन मालकाची संपूर्ण माहिती खात्याकडे उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे नायक म्हणाले. या तक्रारीसोबत नायक यांनी विविध वाहनांचे क्रमांक दिले पोलिसांना सुपूर्द केले असून या वाहनांची नोंदणी करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपकाही या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. या तक्रारीची चौकशी तात्काळ करण्यात यावी ,अशी मागणीही त्यांनी केली.

गोवा भयमुक्त: नाताळ, नववर्ष दणक्यात साजरे करा: जैस्वाल

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी): येत्या नाताळ व नववर्षांच्या पार्श्वभूमीवर गोव्याला दहशतवादी हल्ल्याचा कोणताही धोका नसून केवळ सावधानगिरीचा भाग म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैसवाल यांनी आज पत्रकारांसमोर केले.
आज त्यांनी येथील पोलिस मुख्यालयात भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोलिस मुख्यालयात मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक,पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार, पोलिस महानिरीक्षक किशनकुमार व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत मुख्यालयातील परिषदगृहात सुरक्षेबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला. गोव्यावर दहशतवादी हल्ला किंवा घातपाताच्या शक्यतेबाबत कोणतेही संकेत किंवा गुप्तचर अहवाल केंद्राला किंवा राज्य सरकारला मिळाला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाताळ व नववर्षांचा उत्साह साजरा करण्यास गोवा पूर्णपणे भयमुक्त असून तशी परिस्थिती ओढवलीच तर सुरक्षेचे सर्व ते उपाय आखण्यात आले आहेत. मुंबई हल्ला व देशात इतरत्र ठिकाणी घडलेल्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सावधगिरी बाळगण्यासाठीच सध्याची सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांनी अजिबात अस्वस्थ होण्याची गरज नाही. ही तयारी केवळ गोव्यापुरतीच नसून सर्व राज्यांत केल्याचे ते म्हणाले.
गोवा हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे काही प्रमाणात जास्त सावधगिरी बाळगण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. गोवा हे देशी व कायदेशीररीत्या विदेशातून आलेल्या पर्यटकांसाठी पूर्णपणे भयमुक्त ठिकाण असून या लोकांनी निर्धास्तपणे नाताळ व नववर्ष साजरा करावा,असे लोकांना आश्वस्त करणारे आवाहन त्यांनी केले.

नौदल मुख्यालयात संशयित आढळल्याने प्रचंड खळबळ

पणजी व वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): चिरेबंदी सुरक्षाव्यवस्था असलेल्या वास्को येथील नौदल मुख्यालयात आज पहाटे ४.३० वाजता एक संशयास्पद व्यक्ती हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने संपूर्ण राज्यात जबरदस्त खळबळ माजली आहे. नौदल पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन मुरगाव पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर त्याला फौजदारी गुन्हा कलम ४१ नुसार अटक करण्यात आली आहे. राज्यातील खास तपास अधिकाऱ्यांनी त्याला अज्ञातस्थळी नेऊन आज दिवसभर त्याची कसून चौकशी सुरू केली. मात्र अद्याप त्याच्याकडून ठोस माहिती मिळाली नसल्याने त्याला "संशयित दहशतवादी' ही म्हणता येणार नसल्याचे गोवा पोलिसांचे "एटीएस'प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास ते करीत असल्याचे गोवा नौदल विभागाचे ध्वजाधिकारी संजय वडगावकर यांनी सांगितले.
हा संशयित २० ते २५ वयोगटातील असून शराफ नूर इस्लामिक असे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच त्याला ताब्यात घेताच वास्को येथील इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, अमोनिया टॅंक याठिकाणी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. हातपाय बांधलेला अवस्थेत तो ज्याठिकाणी सापडला तेथून जवळच अमोनिया टॅंक, श्री गणेश मंदिर असून त्या परिसरात लोकवस्ती आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.
त्या व्यक्तीकडे काही कागदपत्रे सापडल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्याच्याबरोबर अन्य दोन साथीदार असल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. कडक सुरक्षा असलेल्या नौदलाच्या मुख्यालयात हा संशयित पोचलाच कसा, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. तसेच त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाचा वापर केला नसल्याने नौदल अधिकारी नाराज झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार बोगदा सडा येथे असलेल्या नौदलाच्या मुख्यालयात ज्या ठिकाणी कोणत्याही सामान्य व्यक्तीला जाता येते नाही अशा ठिकाणी एक व्यक्ती हाता पायाला लोखंडी साखळी बांधून टाकलेल्या अवस्थेत आढळून आली. रात्री १२.३० वाजता एक नौदल अधिकारी आपले काम आटोपून आराम करण्यासाठी बरॅकमधे परतत असताना हा प्रकार उघडकीस आला. त्याने याची त्वरित आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्याबरोबर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटेपर्यंत पोलिस त्याठिकाणी व्यक्तीची चौकशी करीत होती. त्यानंतर त्याला पणजीत एका अज्ञातस्थळी हलवण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती आसामातील असली तरी ती बांगलादेशची रहिवासी असू शकते. अन्य दोघा साथीदारांनीच त्याला बांधून नौदलाच्या मुख्यालयात आणून टाकल्याची माहिती या संशयिताने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ही सहसा विश्वास न ठेवता येण्याजोगी माहिती तो देत असल्याने हे दहशतवादी संघटनेचे षड्यंत्र तर नाही ना, याचीही खातरजमा केली जात आहे. जेथे या संशयिताला ताब्यात घेण्यात आले तेथे एक बॅगही सापडली असून त्यात काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्या कागदपत्रांवरून या संशयिताबद्दल आणखी तपशील मिळू शकतो, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-------------------------------------------------------------------
काल सकाळपासून काही वृत्त वाहिन्यांनी गोव्यात दहशतवादी शिरल्याचे भडक वृत्त प्रसारित केल्याने वास्को येथील अनेक हॉटेलनी आपल्या हॉटेलमधील केबल कनेक्शन तोडल्याची माहिती मिळाली आहे. या वृत्तामुळे ग्राहकांत भीती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे काही हॉटेलमालकांनी सांगितले. दरम्यान, काल दिवसभरात वास्को पोलिसांनी शहरातील हॉटेलमधे छापे टाकून संशयास्पद रीतीने राहणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेतले.

मुख्यमंत्री येडियुराप्पा व पर्रीकरांचा कारवारात संयुक्त निवडणूक प्रचार

कारवार दि. २४ (प्रतिनिधी): येथील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारताना भाजपने आज खुद्द मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा तसेच गोव्याचे ज्येष्ठ भाजप नेते तथा तेथील विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना आनंद असनोटीकर यांच्या प्रचारासाठी उतरवले आहे. मुख्यमंत्री येडीयुराप्पा व पर्रीकर यांच्या संयुक्त प्रचार मोहीमेमुळे कारवार तसेच अंकोल भागात भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पसरला आहे.
श्री. येडीयुराप्पा व पर्रीकर यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी असाच बेळगावात संयुक्त प्रचार केला होता व त्यात पक्षाला बेळगाव परिसरात कमालीचे यश लाभले होते. कारवार मतदारसंघ हा गोव्याच्या अगदी जवळ व येथल्या नात्यांगोत्यांशी व माणसांशी संबंधित असल्याने या परिसरात पर्रीकर चांगलेच लोकप्रिय आहेत. कारवार मतदारसंाची ही पोटनिवडणुक मुख्यमंत्री येडियुराप्पा व पक्षासाठी खूपच महत्त्वाची असल्याने येडियुराप्पा यांनी पुन्हा एकदा पर्रीकर व येथील आघाडीच्या कार्यकर्त्यांना मदतीची हाक घातली. प्रतिसाद म्हणून स्वतः पर्रीकर, काणकोणचे आमदार विजय पै खोत, फातोर्डेचे आमदार तथा कर्नाटक भाजयुमोचे प्रभारी दामू नाईक, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव प्रभू, काणकोणचे प्रमुख भाजप कार्यकर्ते पंढरी प्रभुदेसाई आदींनी संपूर्ण दिवसभर कारवार व अंकोला परिसरात ठिकठिकाणी प्रचाराचा धडाका लावला. येडियुराप्पा व पर्रीकर यांच्या कोडीबाग कारवार येथे झालेल्या रोड शो ला किमान ८ ते १० हजारांची गर्दी होती तर अंकोला येथील रोड शो लाही १० ते १२ हजार लोकांनी उपस्थिती लावून प्रचंड प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री येडियुराप्पा व पर्रीकर यांच्या प्रत्येकी कारवारात दोन व अंकोल्यात झालेल्या एका जाहीरसभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. तर पै खोत, दामू नाईक, प्रभुदेसाई आदींनी या मतदारसंघातील विविध गावांमध्ये कोपरा सभा तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या. काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत माजी आमदार वसंत असनोटीकर यांचे सुपूत्र असलेले आनंद असनोटीकर हे कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते परंतु निवडणुकीनंतर आमदारकीचा राजिनामा देऊन ते भाजपात दाखल झाले होते. आपल्या रिकामी झालेल्या जागेवर असनोटीकर यावेळी भाजपतर्फे ही पोट निवडणूक लढवत आहेत व त्यांना निवडणुकीत भरघोस पाठिंबाही मिळत आहे. कॉंग्रेसचे सतीश सैल या निवडणुकीत असनोटीकर यांच्या विरोधात उभे आहेत.

Wednesday 24 December, 2008

'कडक' सुरक्षेचा असाही फटका

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्यावर दहशतवादी हल्ला होण्याची गुप्त माहिती असल्याने कडक सुरक्षा करण्याच्या प्रकरणामुळे, नुकतेच लग्न होऊन मालदीव येथे मधुचंद्रासाठी निघालेल्या गोमंतकीय जोडप्याला वास्को विमानतळावर लाखो रुपयांचा फटका बसल्याची घटना घडली आहे. याची लेखी तक्रार पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांच्याकडे करण्यात आली असून विमानतळावरील तपासणी करणाऱ्या सुरक्षा रक्षकावरच तक्रारदाराने संशय व्यक्त केला आहे.
सदर तक्रार नवविवाहितेची आई सौ. आशा पै यांनी केली आहे. हिऱ्याचे दोन रिंग, एक मंगळसूत्र, आजोबा व आजीचे नाव असलेले खानदानी दागिन्यातील एक सोन्याचे नाणे, एक डिजिटल कॅमेरा व ३ हजार रुपये चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार सौ. पै यांच्या मुलीचा विवाह गेल्या आठवड्यात मंगेशी येथे झाला. त्यानंतर काल सकाळी नवदांपत्य श्रीलंकन एअरलाईन्सद्वारे मालदीवला जाण्यासाठी वास्को विमानतळावर दाखल झाले. तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली तिच्या हातात असलेली पर्स तपासणीसाठी सुरक्षा रक्षकाने मागितली. यावेळी त्या पर्सला श्री. लोबो नामक एका अधिकाऱ्याने त्यांच्यासमोरच त्याला कुलूप लावले आणि ती तपासणीसाठी ताब्यात घेतली. तपासणी झाल्यानंतर पर्स ज्यावेळी हातात आली, त्यावेळी त्यातील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी ही घटना त्वरित श्रीलंकन एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. याबाबत पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेची त्वरित चौकशी करून विमानतळावर चोरीला गेलेले दागिन्याचा शोध लावण्याची मागणी सौ. पै यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे. विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी 'सीआयएफएस'कडे असून याची चौकशी करण्यासाठी त्या सुरक्षा यंत्रणेकडे संपर्क साधला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात कडेकोट बंदोबस्त खास बैठकीत सुरक्षेचा सर्वंकष आढावा

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): नाताळ व नववर्षाच्या काळात गोव्यात "फिदायीन'(आत्मघाती) हल्ल्याची भीती असल्याने कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण राज्य पोलिसांनी अवलंबले आहे. त्यामुळे सावधगिरीसाठी गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्कर, नौदल, हवाई दल, किनारा रक्षक दल व मुरगाव पोर्ट ट्रस्टची मदत घेण्यात आली आहे. आज सकाळी सुमारे दोन तास या संघटनांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेतला. नंतर या चर्चेचा अहवाल राज्यपाल एस.एस. सिद्धू यांना सुपूर्त करण्यात आला.
या बैठकीत गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव जे.पी. सिंग, दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली तसेच कोणते निर्णय झाले याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
"फिदायीन हल्ला होण्याची ठोस माहिती नसली तरी तशी शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही "रिस्क' घेणार नाही. कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सुरक्षा दल सज्ज आहे' असे आज सायंकाळी गोव्याचे स्पेशल सेल प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. राज्यातील सहा सीमा "सील' केल्या असून त्यावर कडक नजर ठेवण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच गरजेच्या ठिकाणी पुरेशी "बंकर'ही उभारण्यात आले असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.
ख्रिसमस व नव्या वर्षाच्या संगीत रजनीबाबत ते म्हणाले, अद्याप समुद्र किनाऱ्यांवर पार्टी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. कोणाचाही परवानगी मिळवण्यासाठी अर्ज आल्यास पोलिस त्याठिकाणीच पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतील व नंतरच त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. त्यानंतर कोणाला परवानगी द्यायची वा नाकारायची याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत, असे ते म्हणाले. रात्री दहानंतर कर्णकर्कश आवाजात संगीत लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गोव्यात दाखल झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या सहा कंपन्यातील तीन कंपन्या उत्तर गोव्यात, तर तीन दक्षिण गोव्यात तैनात करण्यात आल्याचेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.

'सीबीआय उपनिरीक्षक' पोलिसांच्या ताब्यात

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): बांदा पोलिसांना तिहेरी खून प्रकरणात हव्या असलेल्या संशयिताला जुने गोवे पोलिसांनी आज सकाळी अटक केली. गेल्या तीन महिन्यांपासून रोहित ऊर्फ सिद्धेश शिवाजी रेडकर (३२) हा "सीबीआय'चा तोतया उपनिरीक्षक म्हणून गोव्यात वास्तव्य करून होता. त्याच्याकडून पोलिस उपनिरीक्षक असल्याचे एक बनावट ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय उपअधीक्षक सॅमी तावारीस यांनी दिली.
सिद्धेश रेडकर हा कुंडई येथे एका कारखान्यात नोकरीला लागला होता. येथे त्याने चोडण येथील सचिन मांद्रेकरशी मैत्री केली. त्यानंतर गेल्या आठ दिवसापासून तो त्याच्याच घरी थांबत होता. मात्र, या आठ दिवसांत त्याच्या कुटुंबीयांना सिद्धेशबद्दल संशय निर्माण झाल्याने त्यांनी त्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला चौकशीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे बांदा इन्सुली येथे पोलिस उपनिरीक्षक असल्याचे एक ओळखपत्र सापडल्याने पोलिस त्वरित बांधा पोलिसांना संपर्क साधला. यावेळी त्याच्याकडून हा तरुण खून प्रकरणात हवा असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करून आज बांदा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
गेल्या सहा वर्षापासून सिद्धेश हा बांधा पोलिसांना "चकवा' देत होता. २००२ साली बांदा इन्सुली येथील तिहेरी खून प्रकरणात तो खबऱ्या म्हणून पोलिसांना मदत करीत होता. यावेळी त्याने खुनाच्या तक्रारदाराकडे जवळीक साधून या प्रकरणात मदत करण्यासाठी एक लाख रुपये घेतले. त्यानंतर तो फरार झाला होता. सिद्धेश सुरवातीला पेडणे येथील चेक नाक्याच्या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीत राहत होता. तेथून तो चोडण येथे राहण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

सार्वजनिक बॅंकांचा गोव्यावर अन्याय, देना बॅंकेच्या पदांसाठी 'बंगळुरू' परीक्षाकेंद्र

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): सार्वजनिक क्षेत्रातील विविध बॅंकांतून सध्या मोठ्याप्रमाणात नोकरभरती सुरू आहे. या पदांसाठी अर्ज केलेल्या गोव्यातील उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी इतर राज्यांत जावे लागत असल्याने त्यामुळे या परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या वाढत्या तक्रार समोर आल्या आहेत.
देना बॅंकेने देशभर १२८९ जागांसाठी अर्ज मागवले असून गोव्यासाठी १४ जागा निश्चित केल्या आहेत.याबाबत संतापजनक बाब जर कुठली असेल तर या पदांसाठी अर्ज केलेल्या येथील स्थानिक उमदेवारांना परीक्षा देण्यासाठी "बंगळुरू' केंद्रावर जावे लागणार आहे. हा प्रकार केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचाच नव्हे तर उर्वरित केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध संस्थांच्या भरतीसाठी गोव्यातील उमेदवारांना इतरत्र ठिकाणी जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. केवळ स्थानिक सरकारी नोकर भरतीत व्यस्त असलेल्या राज्य सरकारला त्याचे सोयरसुतक नाहीच परंतु राज्यातील खासदारांनीही याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारही आहेत. परीक्षेसाठी इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवास व राहण्याचा खर्च करणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अशी पदे जाहीर होऊनही त्याकडे केवळ खर्चाखातर दुर्लक्ष होत असल्याने या पदांपासून स्थानिक बेरोजगार वंचित राहतात,अशी माहिती एक अर्जदार वीराज बाक्रे यांनी दिली आहे.
गोवा हे स्वतंत्र राज्य आहे, त्यामुळे इथल्या नोकऱ्यांसाठी परीक्षा केंद्र गोव्यात असणे गरजेचे आहे. वरवर सोपी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात गोव्यासाठी असलेल्या या जागा परप्रांतीयांना मिळवून देण्यासाठीचाच कट असून त्यासाठी सर्व थरावर एकजुटीने राजकीय भेदभाव बाजूला ठेवून हाणून पाडायला हवा,असा आरोपवजा मागणीही बाक्रे यांनी केली.
देना बॅंकेची अर्ज करण्याची अंतिम तारीख २ जानेवारी २००९ व परीक्षा ८ मार्च २००९ रोजी ठेवण्यात आली आहे. सरकारला जर खरोखरच स्थानिकांची चिंता असेल व गोव्यावर होत असलेल्या या अन्यायाची चाड असेल तर त्यांनी तात्काळ देना बॅंकेच्या प्रमुखांच्या निदर्शनास आणून परीक्षा केंद्रात बदल करून घ्यावा व गोव्यातील उमेदवारांना न्याय मिळवून दिलासा द्यावा,अशी मागणीही बाक्रे यांनी केली आहे.

कारवाईबाबत कायदाच संदिग्ध, 'होली फॅमिली' कॉन्व्हेंट प्रकरण

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी विविध शैक्षणिक संस्थांत राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश शिक्षण खात्याने जारी केला असला तरी या कार्यक्रमाला फाटा देणाऱ्या संस्थांवर कोणती कारवाई करावी, याबाबत कायद्यात कोणतीच तरतूद नसल्याने पर्वरी येथील होली फॅमिली कॉन्व्हेंटवर कारवाईची शक्यता धूसर बनली आहे.
पर्वरी येथील होली फॅमिली कॉन्व्हेंटकडून गेल्या १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्तिदिन साजरा न करता त्यादिवशी सुट्टी जाहीर करण्याचा प्रकार घडल्याने राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या विद्यालयावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्वतंत्र सैनिकांसह विविध संघटनांनी केल्याने त्याबाबत शिक्षण खात्याकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती खात्याचे उपसंचालक अनिल पवार यांनी दिली. दरम्यान, खात्याकडून येथील भागशिक्षणाधिकाऱ्यांना या विद्यालयात पाठवण्यात आले असून या घटनेबाबतचा खुलासा मागवण्यात येणार आहे. मुक्तिदिनाच्या कार्यक्रमाला फाटा दिल्याप्रकरणी काय कारवाई होऊ शकते,असे श्री. पवार यांना विचारले असता शिक्षण कायद्यात कारवाईबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस साजरे करण्याच्या सूचना खात्याकडून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रध्वज कसा उभारावा किंवा राष्ट्रध्वज उभारताना कोणती काळजी घेण्यात यावी याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. मात्र हा कार्यक्रमच आयोजित केला नाही तर कोणती कारवाई करावी याबाबत मात्र कायद्यात कोणतेच स्पष्टीकरण नसल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान,हा प्रकार गंभीर असल्याने त्याबाबत स्वस्थ बसणे शक्य नाही. या प्रकाराबाबत अद्याप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून खात्याकडे कोणताही संपर्क साधण्यात आला नाही,असेही यावेळी श्री. पवार यांनी स्पष्ट केले. या घटनेबाबत केवळ संस्थेकडून माफीपत्र किंवा क्षमायाचना केल्यास खाते गप्प बसणार काय,असे विचारताच यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता खात्याकडून घेतली जाईल,असेही श्री.पवार या ंनी स्पष्ट केले.
केंद्रीय विद्यालयांकडूनही फाटा
राज्यात कार्यरत असलेल्या केंद्रीय विद्यालयांकडूनही गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमांना फाटा देण्यात येतो. किंबहुना हा दिवस ते साजरा करीत नसल्याची माहिती उघड झाली आहे. राज्यात एकूण पाच ते सात केंद्रीय विद्यालये आहेत. या सर्व विद्यालयात केंद्रीय अभ्यासक्रम शिकवला जातो खरा; परंतु या विद्यालयांना राज्य सरकारची मान्यता लागते. अशा विद्यालयांमध्ये अनेक स्थानिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने गोवा मुक्तिदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित करणे त्यांना क्रमप्राप्त ठरते,परंतु त्यांच्याकडून ते केले जात नाही,असेही यावेळी काही पालकांनी सांगितले. याबाबत खात्याकडे विचारपूस केली असता पालकांनी त्याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केल्यास किंवा हा प्रकार खात्याच्या निदर्शनास आणून दिल्यास तसे आदेश देता येणे शक्य असल्याचे श्री.पवार म्हणाले.

पार्ट्यांवरील बंदी आदेश पोलिसांसाठी डोकेदुखी

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): सुरक्षेच्या कारणांवरून नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या खुल्या पार्ट्यांवरील बंदीचा आदेश आज गृह खात्याने अखेर जारी केला. तथापि, या आदेशामुळे घोळ निर्माण होण्याचीच जास्त शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी व पोलिसांसाठी तो डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने किनारी भागांत गोंधळ निर्माण होण्याचा संभव व्यक्त केला जात आहे.
२३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत समुद्र किनाऱ्यांवरील खुल्या जागेत पार्ट्यां आयोजित करण्यास या आदेशाव्दारे पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान,किनाऱ्यांवरील शॅक्समध्ये पर्यटकांना रात्रीचे जेवण (डिनर) करण्याची मुभा देण्यात आली असून त्यामुळे काहीप्रमाणात शॅक्समालकांना दिलासा मिळाला आहे. नाताळ किंवा नववर्षाच्या या वातावरणात संगीत व नृत्याशिवाय किनाऱ्यांवरील शॅक्सवर "डिनर' घेण्यास किती पर्यटक पुढे येतील याबाबत मात्र शॅक्समालक संभ्रमावस्थेतच आहेत.
दरम्यान, या आदेशात चर्च आवारात पारंपरिक पार्टी आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशा पार्ट्या आयोजित करणाऱ्या आयोजकांना खास नियम घालून देण्यात आली असून त्यांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. हॉटेलांतील पार्टीची जागा सर्व बाजूनी बंद असावी आणि बाहेरून त्याबाबतचे कसलेही दर्शन होता कामा नये, असे आदेशात म्हटले म्हटले आहे. प्रवेशव्दारावर "मेटल डिटेक्टर' तथा दक्ष पहारेकरी हवा व पर्यटकांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांना स्वतः ओळख पटवण्याची सक्ती करावी, असेही आदेशात म्हटले आहे.शहरात किंवा गावात रेव्ह पार्टीला परवानगी नाकारण्यात आली आहे. रस्त्यावर आयोजित केल्या जाणाऱ्या पारंपरिक नृत्यांना परवानगी असेल असे सांगून या दिवसांत अशा पार्ट्यांत सहभागी होणाऱ्या लोकांनी दक्ष राहावे,असे आवाहनही सरकारने आदेशाव्दारे केले आहे.
-------------------------------------------------------
आग्नेल फर्नांडिस यांचे प्रयत्न सुरूच
कळंगुट येथे खुल्या किनाऱ्यावर "सन बर्न' यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्या सरकारच्या या आदेशामुळे अडचणीत आल्या आहेत. नववर्षाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या या पार्ट्यांचे खास आकर्षण असल्याने आयोजकांनी त्याकामी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी त्यात पुढाकार घेतला असून आजही त्यांनी या आयोजकांसह मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांचे याप्रकरणी काय बोलणे झाले हे जरी समजले नसले तरी सरकारने अशा खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाबर शिक्कामोर्तब केल्याने त्यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.

कोलवा भागात ६ लाखांची चोरी

मडगाव, दि. २३ (प्रतिनिधी) : दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या अनुषंगाने सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाच दक्षिण गोव्यात व त्यातही किनारपट्टीत पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. काल कोलवा येथे असाच एक जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी तेथील कंवलजीत लांबा यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी हिऱ्याच्या तीेन अंगठ्या, अन्य सोन्याचे दागिने व रोख दीड लाख असा अंदाजे सहा लाखांचा ऐवज पळविला.
काल हा प्रकार उघडकीस आला, पण पोलिसांनी तो दडवून ठेवला. तथापि, आज तपासासाठी पोलिस श्र्वानपथक नेले गेले व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले गेल्याने चोरीचे बिंग फुटले. लांबा हे तारांकित हॉटेलात कामाला असतात. त्यांचे घरी मध्यंतरी केाणी नव्हते. काल चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या मते २१-२२ तारखेदरम्यान चोरी झालेली असावी.
निवासस्थानाचा मागील दरवाजा फोडून चोरटे आत घुसले असे दिसून आले . पोलिसांनी श्र्वान पथकांची मदत घेतलेली असली तरी त्यांचा विशेष असा काहीच उपयोग झाला नाही. अधिक तपास चालू आहे.
गेल्याच आठवड्यात बेताळभाटी येथे एका घरातून अशाच प्रकारे तीन लाखांचा ऐवज चोरीस गेला होता तर त्या अगोदर कोलवा भागातच अशी चोरी झाली होती. पण आश्र्चर्याची बाब म्हणजे यापैकी एकाही प्रकरणाचा धागा दोरा हाती लागू शकलेला नाही. त्यातही आणखी गंमतीची बाब म्हणजे नाताळ-नववर्षाचा मोका साधून संपूर्ण गोव्यात हाय ऍलर्ट लागू असताना या चोऱ्या होत आहेत.

Tuesday 23 December, 2008

भारत कठोर पाऊल उचलणार : मुखर्जी




.. पाकिस्तानातील अतिरेकी
घातक
..पाकने जबाबदारी ओळखावी

नवी दिल्ली, दि. २२ - पाकिस्तानातील अतिरेकी केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी घातक आहेत. दहशतवादाच्या निपटाऱ्यासाठी जागतिक समुदायाने केलेले प्रयत्न पुरेसे नसून यापुढे आता भारतच याबाबत ठोस पाऊल उचलणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.
भारतीय राजदूत आणि उच्चायुक्तांच्या संमेलनात मुखर्जी बोलत होते. ते म्हणाले की, काबूलमधील दूतावास आणि मुंबईवरील हल्ल्यानंतर हे पुरते सिद्ध झाले आहे की, पाकमधील दहशतवादाने आपले हात-पाय पसरले आहेत. त्यांचा हा विस्तार केवळ आशिया क्षेत्रासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी घातक आहे. आज सुदैवाने भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चांगली साथ मिळते आहे. दहशतवादाबाबत पाकने कठोर कारवाई करावी याविषयीचा दबाव सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदाय आणत आहे. एका तऱ्हेने ते भारताला मदतच करीत आहेत.
आता स्थिती बदलली आहे
पाकिस्तानने आपल्या भूमीत फोफावणाऱ्या दहशतवादाचा धोका ओळखला पाहिजे. आज आम्ही त्या दहशतवादाचे बळी ठरलोय म्हणून हे सांगत नाही, तर हा दहशतवाद उद्या संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेईल. त्यातून पाकिस्तान आणि तेथील लोकही सुटणार नाहीत.
भारताने आजवर पाकच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि प्रत्येकवेळी दहशतवादाचा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडविण्याचाच पर्याय समोर आणला. पण, हे सर्व २००१ पर्यंत ठीक होते. आता ती स्थिती राहिलेली नाही. पाणी डोक्याच्या वर गेले आहे. आता भारत खूप विचार करणार नाही. पाकिस्तानी प्रशासनाने आपल्या भूमीतील दहशतवाद निपटण्यासाठी दिलेला शब्द पाळला पाहिजे.
वारंवार पुरावे मागणारे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. जेव्हा एखाद्या खंडाचा एक भाग म्हणून आपण तेथे शांततेसाठी आश्वासन देतो तेव्हा त्याची अंमलबजावणी करणे, हीदेखील आपली नैतिक जबाबदारी ठरते. झरदारी या जबाबदारीला नाकारू शकत नाहीत, असेही मुखर्जी म्हणाले.

पश्चिम सीमा भागात
भारतीय लष्कर सतर्क
जैसलमेर, दि. २२ ः पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली जाणार नाही, हे भारताने स्पष्ट केले असले तरी पाकव्याप्त काश्मीरपाठोपाठ भारताच्या पश्चिम सीमेवरही भारतीय लष्कर आणि हवाईदल सतर्क झाले आहे.
पाकिस्तानने सीमा भागात लष्कराची जमवाजमव केली असल्याचे वृत्त मिळाल्यानंतर भारतानेही सावध पवित्रा घेत लष्कराची हालचाल सुरू केली आहे. याविषयी भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढविण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रामुख्याने जैसलमेर, भुज आणि उत्तरलाई भागात अधिक कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. येथील हवाई हद्दीची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

पाकची लढाऊ विमाने सज्ज

इस्लामाबाद, दि. २२ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणाकडे बघता इस्लामाबाद, रावळपिंडीसह अनेक प्रमुख शहरांवर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी आज युध्दाभ्यास केला.
यासंदर्भात पाकिस्तानी हवाई दलाचे प्रवक्ते एअर कमांडर हुमायून वकार झेपर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इस्लामाबाद, रावळपिंडीप्रमाणेच पाकिस्तानमधील इतर प्रमुख शहरांवर आज दुपारी हवाई दलाच्या अनेक लढाऊ विमानांनी युध्दाभ्यास केला. हा युध्दाभ्यास जवळपास २० मिनिटे सुरू होता. जारी करण्यात आलेल्या या निवेदनात अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
मुंबईवरील हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबासह अनेक दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले असून या दहशतवादी संघटनांसह पाकमधील त्यांची प्रशिक्षण केंद्रे पाकिस्तानने नष्ट करावीत, अशी मागणी भारताने वारंवार केलेली आहे. मुंबईवरील हल्ल्याला जी तत्त्वे जबाबदार आहेत त्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, असे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कालच काश्मीर दौऱ्यावर असताना म्हटले आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आमच्या हवाईहद्दीचा भंग केला आहे, असा कांगावा पाकिस्तानने सुरू केला असून तसा औपचारिक निषेध भारताकडे नोंदविला आहे. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त सत्यब्रत पाल सध्या नवी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आलेल्या भारतीय राजदूतांच्या बैठकीला हजर राहण्यासाठी नवी दिल्ली येथे गेलेले आहेत तर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त शाहीद मलिक हे विचारविनिमयासाठी इस्लामाबाद येथे आलेले आहेत.
... आणि लोकांत घबराट
इस्लामाबाद, रावळपिंडीसह पाकमधील अनेक शहरांवर लढाऊ विमाने रोराऊ लागली त्यावेळी लोकांमध्ये एकच घबराट पसरली. लोकांनी वृत्तपत्र कार्यालये तसेच वृत्तवाहिनी कार्यालयांना फोन करून यासंदर्भात विचारणा केली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थिती हाताळण्यासाठी भारतासमोरील सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कालच केले आहे, हे येथे उल्लेखनीय.

मी पाकिस्तानीच - कसाब

मुंबई, दि. २२ - २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर करण्यात आलेल्या हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल अमीर इमान कसाबने आपण पाकिस्तानी असून, ठार झालेले अन्य सर्वजण पाकिस्तानी असल्याचे म्हटले आहे. कसाव याने पाकिस्तानी दुतावासाला यासंबंधात पत्र लिहिले आहे.हे पत्र भारतीय परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली येथे पाक उच्च्यायुक्तांना पाचारण करून त्यांना दिले.कसाबने कायद्याच्या मदतीसाठी आपण उच्चायुक्तांना भेटू इच्छितो असे पत्रात म्हटले असून, आपल्या सोबतच्या नऊ पाक साथीदारांना मरण आल्याचे पत्रात नमूद केले आहे.

गुन्हेगारी ठेचा

केंद्रीय गृह खात्याचा राज्याला आदेश

- बेकायदा सावकार, रिअल इस्टेट माफिया,
गुन्हेगारांच्या टोळ्या नष्ट करून त्यांना
तडीपार करण्याचा आदेश
- आदेशाचे पत्र धूळ खात पडून
- ६ जानेवारीपर्यंत केंद्राला कारवाईचा
अहवाल पाठवण्याची सूचना
- सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव


पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - बेकायदा सावकार, रिअल इस्टेट माफिया आणि गुन्हेगारांच्या छोट्या-मोठ्या टोळ्या यांचा नायनाट करून त्यांना तडीपार करण्याचा आदेश केंद्रीय गृह खात्याने राज्य सरकारला दिला आहे. तसेच या आदेशावर राज्य गृह खात्याने कोणती कारवाई केली, याचा अहवाल सहा जानेवारी ०९ पर्यंत केंद्राला पाठवावा, असेही आदेशात म्हटले आहे. या विषयाचे पत्र केंद्रीय गृह खात्याने राज्याच्या गृह खात्याला पाठवले असून राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हे पत्र फायलीतच धूळ खात पडून आहे.
या आदेशाची कार्यवाही केल्यास काही राजकीय व्यक्ती आणि खुद्द मंत्रीच अडचणीत येणार असल्याने या पत्राकडे डोळेझाक करण्याचा गृहखात्याचा कारभार गोव्याला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. राज्याचे गृह खाते हाती घेताच गुंडांची टोळकी व ड्रग माफियांवर कडक कारवाई करण्याची वल्गना करणारे गृहमंत्री या आदेशाचे पालन करण्याचे आदेश पोलिसांना का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माफियांचे पैसे दहशतवादी कारवायांसाठी?
गेल्या काही वर्षात आणि नुकत्याच मुंबईत ताज हॉटेल आणि हॉटेल ओबेरॉयमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी अशा छोट्या मोठ्या टोळ्यांची तसेच भूमाफिया व बेकायदा सावकारी करणाऱ्यांची मदत मिळाल्याचे धागेदोरे हाती लागल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर सरकारने हा हल्ला संपूर्ण देशावर हल्ला झाल्याचे जाहीर करून तो गांर्भींयाने घेतला आहे. तथापि, त्याचे गांर्भीय अद्याप राज्य सरकारला जाणवल्याचे दिसत नाही. गुन्हेगारांच्या काही टोळ्या कळतनकळत दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवत असल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे हे पत्र सर्व राज्यांना पाठवण्यात आले आहे.
दहशतवाद्यांना मदत
गुंडाच्या टोळ्या आणि माफिया पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा मिळवून देणे, हवालाद्वारे पैसा पुरवणे तसेच स्थानिक माहिती आणि पोलिसांच्या गुप्त योजनांची माहिती देण्याचे काम करतात. या टोळ्यांचे जाळे नष्टे केल्यास बऱ्याच प्रमाणात दहशतवाद आटोक्यात येण्याची शक्यता केंद्रीय गुप्तहेर संघटनेने व्यक्त केली आहे. तसेच नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या सर्व गोष्टींवर चर्चा करून केंद्रीय गृह खात्याने हे पत्र सर्व राज्यांना पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, गोव्यात माफियाच नाहीत, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने सहा जानेवारीला राज्य सरकार केंद्राला सादर करणाऱ्या अहवालात कोणती माहिती पुरवणार हा कळीचा मुद्दा बनला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री जैस्वाल उद्या गोव्यात

सुरक्षेच्या आढाव्यासह नाताळही साजरा करणार
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीकुमार जैसवाल हे बुधवारी २४ रोजी गोव्यात येत असून गोव्याचे खास आकर्षण असलेला नाताळ सण साजरा करण्याबरोबर येथील सुरक्षेचा आढावाही ते घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व केंद्रीय गृहखात्यातील दोन वरिष्ठ अधिकारी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
बुधवारी सकाळी त्यांचे आगमन होईल. त्यादिवशी मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांच्याशी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ते चर्चा करणार आहेत. नंतर ते राजभवनवर जाणार असून तेथे एक दिवस त्यांचे वास्तव्य असेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
मुंबई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य गोवा असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय गुप्तहेर यंत्रणेकडून राज्य सरकारला मिळाले आहेत. नाताळ व नववर्षानिमित्त राज्याला मोठ्या प्रमाणावर देशीविदेशी पर्यटकांची भेट अपेक्षित असल्याने याच काळात गोव्यात घातपात घडवण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचा सुगावाही गुप्तहेर यंत्रणेला लागला आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत तडजोड न करण्याचा ठाम निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे.
पार्ट्यांवर बंदीची आज अधिसूचना
दरम्यान, राज्यात २३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत किनारी भागात खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्यासंबंधीची अधिसूचना उद्या २३ रोजी जारी करणार असल्याची माहिती मुख्य सचिव जे.पी.सिंग यांनी दिली.
विविध ठिकाणी आयोजित केलेले पारंपरिक कार्यक्रम तथा हॉटेलांतील बंदिस्त पार्ट्यांवर बंदी ही बंदी लागू नाही. तेथे त्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या असून त्याबाबत पाहणीही करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. केवळ किनारी भागांतील खुल्या पार्ट्यांवरच बंदी घालण्यात आली आहे. सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच दोन अतिरिक्त तुकड्यांची मागणी मुख्यमंत्री कामत यांनी केंद्र सरकारला केल्याचेही सांगण्यात आले.