Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 22 November, 2008

"इफ्फी'आजपासून

"वॉरलॉर्डस'ने
पडदा उघडणार
राजधानी नटली
प्रतिनिधींची झुंबड
कडेकोट बंदोबस्त

रेखाची प्रमुख उपस्थिती


पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - "३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' "इफ्फी-०८' चे उद्घाटन उद्या २२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पणजी येथील कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात थाटात होणार आहे. या सोहळ्याला सदाबहार अभिनेत्री रेखा प्रमुख पाहुण्या या नात्याने उपस्थित राहणार असून चिनी फिल्म " वॉरलॉर्डस'ने महोत्सवाचा पदडा उघडणार आहे.
या महोत्सवासाठी पणजी शहर नववधूसारखे नटले असून गोव्यातील हा पाचवा महोत्सव होय. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत, राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा, केंद्रीय चित्रपट संचालनालयाचे संचालक एस. एम.खान उपस्थित असतील. मूळ गोमंतकीय तेलगू अभिनेत्री इलियान डिक्रुझ ही या उद्घाटन सोहळ्याला खास आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहे. इफ्फीसाठी कला अकादमी,आयनॉक्स व मॅकनिज पॅलेसचा परिसर झगमगून गेला आहे. विविध प्रादेशिक तथा विदेशी प्रतिनिधींचे आगमन राजधानीत झाल्याने खऱ्या अर्थाने महोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्या शनिवारी दुपारी १२.३० वाजता "फिल्म पोस्टर' प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री आनंद प्रकाश यांच्या हस्ते होईल. राष्ट्रीय भारतीय फिल्म पुरातत्त्व विभागातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून तेथे चित्रपट निर्मितीपासून आत्तापर्यंतच्या पोस्टरांचा आनंद चित्रपट जाणकार तथा समीक्षकांना लुटायला मिळेल.
कडेकोट सुरक्षा
महोत्सवानिमित्ताने सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहे. महोत्सव परिसरात ठिकठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवण्यात आले असून केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या खास "इफ्फी' साठी तैनात करण्यात आल्या आहेत. प्रतिनिधींच्या चित्रपट प्रदर्शन ठिकाणी जाण्याच्या सोयीसाठी रिक्षांची सोय करण्यात आली आहे. प्रतिनिधी कार्डांचे वितरण जोरात सुरू असून त्यासाठी बाहेरून आलेल्या प्रतिनिधींची झुंबड उडाली आहे.
दरम्यान, महोत्सवासाठी येणाऱ्या कलाकारांत कबीर बेदी,मनीषा कोईराला,अकबर खान,नासिरूद्दीन शहा व त्यांचा मुलगा,पद्मिनी कोल्हापूरे,सचिन,सुप्रिया,पल्लवी जोशी आदींचा समावेश आहे. याशिवाय अन्य मातब्बर कलाकारांची उपस्थितीही असेल असे सरकारी सूत्रांनी सांगितले. यंदा स्थानिक तथा पर्यटकांसाठी खास खुल्या तिकिटांची सोय करण्यात आली आहे. फक्त भारतीय चित्रपट पाहण्याची सोय या योजनेअंतर्गत राहणार असून दुसऱ्या दिवशीची तिकिटे आदल्या दिवशी निश्चित करून ठेवावी लागणार आहेत. फिचर फिल्म विभागाची सुरुवात "यारविंग'या चित्रपटाने होणार असून नॉन फिचर फिल्मची सुरुवात" मेमरिज,मुव्हमेंट ऍण्ड अ मशीन ' या चित्रपटाने होणार आहे. भारतीय पॅनोरमाची सुरुवात "थॅक्स मॉं' या इरफान कमल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने होणार आहे.

त्या "११' लाखांची चौकशी कराच

डॉ. आमोणकरांबाबत भाजपची निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार

पणजी,दि.२१ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार डॉ.सुरेश आमोणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला त्यादिवशी डिचोलीतील एका पतसंस्थेतून कायम ठेवीतील ११ लाख रुपये काढल्याचे "सेव्ह गोवा फ्रंट'चे उमेदवार जुझे लोबो यांनी उघडकीस आणले आहे. हे पैसे त्यांनी कोठे गुंतवले किंवा खर्च केले याचा कोणताही हिशेब त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सादर केलेला नाही. त्यामुळे विरोधी भाजपनेही त्यास तीव्र हरकत घेतली आहे. या पैशांचा पाळी पोटनिवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी गैरवापर होण्याची शक्यता वर्तवून निवडणूक निरीक्षकांनी ताबडतोब याची दखल घ्यावी,अशी मागणी भाजपने तक्रारीद्वारे केली आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती दिली. यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर उपस्थित होते. अपक्ष उमेदवार डॉ.आमोणकर यांच्याविरोधात सेव्ह गोवा फ्रंटचे उमेदवार जुझे लोबो यांनी दाखल केलेल्या तक्रारीची योग्य दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे,असे पर्रीकर म्हणाले. सुमारे ५० लाख रुपयांचा हिशेब प्रतिज्ञापत्रात सापडत नसल्याने त्याबाबत दुर्लक्ष करून चालणार नाही,असेही पर्रीकर म्हणाले.
पाळी पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू असल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. गेल्या १५ नोव्हेंबर २००८ रोजी वृत्तपत्रांवर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची जाहिरात प्रसिद्ध करून त्यात श्रीमती सोनिया गांधी व पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला. ही गोष्ट निवडणूक निरीक्षकांच्या नजरेस आणून दिली असतानाही आज पुन्हा एकदा माध्यान्ह आहार योजनेची जाहिरात झळकली आहे.
दरम्यान,याबाबत पर्रीकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी,निवडणूक अधिकारी तथा निरीक्षकांची भेट घेऊन या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. यापूर्वी कामत सरकारला ५०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने तसेच मुख्यमंत्र्यांनी हाज यात्रेकरूंसाठी खास विमानसेवा पुरवण्याबाबत केलेल्या विधानासंदर्भातील तक्रारीवर त्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात आल्याचेही पर्रीकर म्हणाले. केवळ नोटिसा काढून काहीही होणार नाही तर प्रत्यक्षात कारवाई होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
पाळी मतदारसंघात मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशांची आमिषे दाखवली जात आहेत. काही स्वयंघोषित उमेदवारांनी तर एका मताला मताला २०० रुपये असा दर निश्चित केल्याचा आरोपही पर्रीकर यांनी केला. पाळी मतदार विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाखूष असून गोव्याचा कसा बट्ट्याबोळ सुरू आहे, याबाबत त्यांच्यात तीव्र नाराजी पसरल्याने ते वचपा काढण्यासाठी सज्ज झाल्याचे पर्रीकर म्हणाले. पाळी पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला.

गोव्याला खास दर्जा हवाच - माथानी

अन्यथा पुढील पिढ्यांच्या नशिबी अंधार!

पणजी, दि.२१ (प्रतिनिधी) - भविष्यात गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहायचे असेल तर या प्रदेशाला घटनेच्या ३७१ कलमाखाली विशेष दर्जा मिळणे अत्यावश्यक आहे. एकूण ३७०२ चौरसकिलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या राज्यात वनक्षेत्र,नद्या,किनारी भाग,कृषी जमीन व यापूर्वीच उपयोगात आणलेली जमीन वगळता पुढील पिढीसाठी केवळ ३६२ चौरस किलोमीटर जागा शिल्लक आहे. स्थानिकांनी केवळ पैशांसाठी आपल्या जागा बिगरगोमंतकीयांना विकणे बंद केले नाही तर पुढे आपल्याच पिढीला येथे जागा नसेल,असा धोक्याचाइशारा माजीमंत्री माथानी साल्ढाणा यांनी दिला.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत माथानी बोलत होते. गोव्याला विशेष दर्जा मिळवून देण्याच्या मागणीला चालना देण्याकरता "विशेष दर्जासाठी गोमंतकीयांची चळवळ' संघटना स्थापन करण्यात आल्याची घोषणा माथानी यांनी केली. या संघटनेतर्फे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन त्यांना गोव्याला हा दर्जा का हवा, याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाही यासंदर्भात निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती श्री.साल्ढाणा यांनी दिली. गेल्या विधानसभा अधिवेशनात राज्याला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी सत्ताधारी तथा विरोधकांनी संयुक्त ठराव संमत केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले; परंतु केवळ ठराव संमत करून काहीही होणार नसून या विषयाला खऱ्या अर्थाने चालना मिळणे गरजेचे आहे,असे साल्ढाणा म्हणाले. यावेळी संघटनेचे सचिव किसन गांवकर,उपाध्यक्ष महेंद्र प्रभुदेसाई, शिवसेना राज्य प्रमुख तथा संघटनेचे उपाध्यक्ष उपेंद्र गावकर,खजिनदार शशी कामत,गोवा सुराज पार्टीचे अध्यक्ष डॉ.एन.एस.धुमे,अजय परेरा,अमोल नावेलकर,शैलेश पै आदी अनेकजण उपस्थित होते. गोव्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केल्यास सध्याची १५ लाखांची लोकसंख्या ही परिसीमा असून राज्यातील मोठ्या प्रमाणातील स्थलांतराला आळा घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका त्यांनी वर्तवला. या संघटनेचा स्थलांतरीतांना अजिबात विरोध नाही. तथापि, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे स्थलांतरीतांची संख्या वाढत असल्याने त्याबाबत फेरविचार होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेश,अरुणाचल प्रदेश व पूर्वांचल राज्यांप्रमाणेच घटनेच्या ३७१ कलमाच्या चौकटीत या राज्याचा वेगळा विचार व्हायला हवा असे ते म्हणाले.
दरम्यान,विशेष दर्जा नेमका कोणत्या कारणांसाठी व कशा पद्धतीचा हवा यासंदर्भात काही सूचनाही संघटनेतर्फे पुढे करण्यात आल्या आहेत. खास स्थानिकांच्या हक्कांना बाधा पोहचवणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी "गोवा समस्यामुक्त कायदा' तयार करण्याची गरज आहे. येथील जमीन बिगर गोमंतकीयांना विकत घेण्यावर निर्बंध घालून कोमुनिदादसारख्या संस्थांकडे असलेल्या जमिनींचे रक्षण करणे, केवळ गोव्यात असलेल्या समान नागरी कायद्याचे इतरांनी उल्लंघन करू नये,याची योग्य काळजी घेणे,१९ फेब्रुवारी १९६८ यापूर्वी गोव्यात स्थायिक झालेल्या अनुसूचित जाती,जमाती,इतर मागासवर्गीय व धनगर समाजातील लोकांचाच केवळ स्थानिकांत समावेश करून त्यांना त्यांच्यासाठी असलेले हक्क मिळणे गरजेचे आहे, मूळ गोमंतकीय नसलेल्या किंवा गोमंतकीयाला भागीदारी करून न घेतलेल्या लोकांना इथे व्यवसाय करण्यास मज्जाव करावा, गोव्यातील स्थानिक परिस्थितीनुसार केंद्रीय योजनेचा स्वीकार किंवा त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असावा, विशेष दर्जा देण्यामागे सर्व हक्क हे घटनेच्या चौकटीत राहूनच बहाल करण्यात यावे,असा सल्लाही यावेळी देण्यात आला..
दरम्यान,संघटनेतर्फे तयार करण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेता,सर्व आमदार,मंत्री,खासदार व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पाठवण्यात येणार असून या विषयावर खरोखरच चर्चा होण्याची गरज असल्याचे यावेळी श्री.साल्ढाणा म्हणाले.

सोमालियात अपहृत जहाजावर आगोंदमधील युवक सुरक्षित

आगोंद, दि. २१ (वार्ताहर) - सोमालियातील चाच्यांनी मंगळवारी अपहरण केलेल्या "एम. टी. डिल्याट' या विदेशी जहाजावरील सहा भारतीय कर्मचाऱ्यांत काणकोण तालुक्यातील आगोंदचा क्लाईव्ह फर्नांडिस याचा समावेश असून आपण सुरक्षित असल्याचे त्याने कुटुंबीयांना कळवले आहे.
परदेशातील एका जहाज कंपनीत काम करणारे त्याचे वडील गेले महिनाभर घरी आहेत. अपहृत सहा भारतीय खलाशांपैकी क्लाईव्ह फर्नांडिस (२३) हा येत्या काही दिवसांत आपल्या आगोंद येथील घरी परतणार होता. तथापि, एडनच्या खाडीत त्याचे अन्य खलाशांसोबत अपहरण करण्यात आले आहे. काल तो आपल्या इराण येथील मुख्यालयात कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून घरी परतणार होता. तथापि, त्याच्या जहाजाच्या अपहरणाची बातमी वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध होऊन ती ताबडतोब आगोंद परिसरात पसरली व तो चर्चेचा विषय बनला. क्लाईव्ह काम करीत असलेले जहाज एम.व्ही. डिल्याटच्या अपहरणानंतर संबंधित कंपनीचे अधिकारी सोमालियातील चाच्यांशी संपर्क ठेवून आहेत. काल गुरुवारी रात्री क्लाईव्हने आपल्या घरी फोन करून आपण व अन्य भारतीय साथीदार सुखरूप असल्याचे कळवले आहे. फोनवर इंग्रजीतच बोलण्याचा हट्ट अपहरणकर्ते धरत आहेत. अपहरणकर्त्या चाच्यांशी कंपनीचे अधिकारी वाटाघाटी करत असून यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा क्लाईव्हने त्याचे वडील व्हिन्सेंट यांच्याशी बोलताना व्यक्त केली. खुद्द व्हिन्सेंट यांनीच प्रस्तुत प्रतिनिधीला ही माहिती दिली.
एडनच्या आखातात वारंवार व्यापारी जहाजे सोमालियन अपहरणकर्ते पळवून मोठ्या खंडणीच्या आपल्या मागण्या मान्य करून घेत आहेत. पूर्वी ते भुरट्या चोऱ्या करत होते. तथापि, आता त्यांची भूक वाढत चालल्याने जास्त धनाच्या लोभापायी जहाजेच पळवण्याचा सपाटा त्यांनी लावल्याची माहिती एका निवृत्त खलाशाने दिली. याच गावातील दोन घटनांत ग्रामस्थांना वाईट अनुभव आल्यामुळे क्लाईव्ह सुखरूप परतावा अशी प्रार्थना आता आगोंदवासीय करीत आहेत.

कोर्टाकडून पोलिसांचे वाभाडे

सीबीआयकडे तपासकाम देण्याविषयी विचारणा

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - जर्मन अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाची चौकशी पोलिसांनी योग्य दिशेने व योग्य पद्धतीने केली नसल्याचा ठपका ठेवत या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे का देऊ नये, तसेच या गुन्ह्यातील संशयित आरोपी रोहित मोन्सेरात याचा जामीन का रद्द करू नये, याबद्दल "कारणे दाखवा' नोटीस बजावून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलिसांच्या कार्यपद्धतीचे आज अक्षरशः वाभाडे काढले.
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणातील अन्य दोन सहआरोपी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात व वॉरन आलेमाव यांच्या केलेल्या चौकशीचा अहवाल दोन आठवड्यांत न्यायालयात सादर करावा, असा आदेशही न्यायालयाने दिला. या प्रकरणातील पीडित मुलगी व तिच्या आईला पोलिस संरक्षण देण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार व गोवा खंडपीठाचे न्या. एन.ए ब्रिटो यांनी दिला. गोव्याच्या इतिहासातील हे पहिलेच असे प्रकरण आहे की ज्यात पोलिसांनी संशयिताला सोयीस्कर तपास केला आहे. पोलिसांनी असे तपासकाम केल्याचे आपण आपल्या कार्यकाळात प्रथमच पाहात आहोत, असे मतप्रदर्शनही मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांनी केले.
आरोपीच्या वतीने यावेळी कोणीही न्यायालयात हजर नव्हते. पुढील आदेश देण्यापूर्वी संशयिताचाही बाजू आपणास ऐकायची आहे, असे न्यायमूर्ती म्हणाले. याविषयाची पुढील सुनावणी दि. १० डिसेंबर ०८ रोजी ठेवण्यात आली आहे. त्यापूर्वी "अश्लील एसएमएस आलेल्या मोबाईलचे व सिम कार्ड'चा चाचणीचा अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला.
न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीची खरडपट्टीच काढली. या प्रकरणाच्या तपासकामी मार्गदर्शन करणारे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज व निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी यापुढील तपासकाम योग्य पद्धतीने न केल्यास त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा न्यायालयाने दिला. यावेळी न्यायालयाने दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दि. १४ ऑक्टोबर रोजी बलात्काराची तक्रार नोंद होऊनही दि. ४ नोव्हेंबरपर्यंत संशयिताला अटक का करण्यात आली नाही, तसेच संशयिताला अटक न करता, पीडित मुलीची जबानी फौजदारी १६० कलमानुसार न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंद करण्यात आली. त्यामुळे संशयिताला झुकते माप देण्यात आल्याचा संशय येत असून वरील दोन्ही प्रश्नांवर पोलिसांना न्यायालयाने कात्रीत पकडले. या प्रश्नावर सरकारी वकील न्यायालयाला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
आज सकाळी १०. ५५ वाजता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने "सुमोटो' याचिका दाखल करून घेतलेले प्रकरण सुनावणीसाठी आले. यावेळी न्यायालयात सरकारी वकिलासह पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, निरीक्षक तुषार वेर्णेकर व तक्रारदार जर्मन महिला उपस्थित होती. न्यायमूर्तींनी या खटल्याची फाईल हातात घेताच तपास अधिकारी कोठे आहेत, असा प्रश्न करीत त्यांना समोर उभे केले. यावेळी पीडित मुलीला बोलवा, असे न्यायालयाने फर्मावले. त्याबरोबर तिच्या आईला पुढे आणण्यात आले. "तुझी मुलगी कुठे आहे' असा थेट प्रश्न न्यायमूर्तीनी तिला केला. ती घरी असल्याचे सांगताच "तिला का आणले नाही', असा दुसरा प्रश्न केला. "ती आजारी आहे' असे सांगण्यात आले. त्याबरोबर न्यायमूर्तीने एका तासाच्या आत "त्या' मुलीला आणि तिची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना न्यायालयात हजर करा, असा आदेश दिला. तोपर्यंत या खटल्याची सुनावणी स्थगित ठेवण्यात आली. न्यायालयातून बाहेर जाता जाता "त्या' जर्मन महिलेसही न्यायालयाने खडसावले. "तुमची तक्रार सत्य असल्यास तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल, मात्र त्यात तथ्य न आढळल्यास तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,' अशी तंबी तिला देण्यात आली.
दुपारी १ वाजता डॉक्टर सिल्वानो सापेको व डॉ. मधू घोडकीरेकर उपस्थित झाले. परंतु, त्यावेळी ती मुलगी येण्यास नकार देत असल्याची वार्ता न्यायालयात पोचली. तथापि, दुपारी २.३० वाजता तिची आई पीडित मुलीला घेऊन न्यायालयात पोचली. न्यायमूर्तींनी यावेळी त्या मुलीला आणि तिच्या आईला आपल्या चेंबरमधे बोलावून चौकशी केली. तसेच दोन्ही डॉक्टरनाही चेंबरमधे बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्या मुलीने काय सांगितले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुपारी २.४५ वाजता पुन्हा या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली.
तक्रारीचा तपास कसा केला जातो?
दि. १४ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंद झाल्यानंतर तुम्ही काय केले, असा प्रश्न न्यायमूर्तींनी केला. बलात्काराची तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिस सर्वप्रथम काय करतात. अशा प्रकारची तक्रार दाखल होताच सर्वांत आधी संशयिताला तुरुंगात टाकले जाते. मग या प्रकरणात संशयिताला का पकडण्यात आले नाही. तो पोलिसांना शरण येईपर्यंत पोलिस गप्प का बसले, अन्य गुन्हेगारांना अटक केली जाते, तशीच रोहित याला का अटक करण्यात आली नाही, त्याला वेगळी वागणूक का देण्यात आली, असे प्रश्न करून न्यायालयाने पोलिसांचे वाभाडे काढले. या प्रश्नांवर न्यायालयाचे समाधान करण्यास सरकारी वकिलांकडे कोणतेही उत्तर नव्हते. बलात्काराची, खुनाची तसेच दरोड्याची तक्रार दाखल होताच त्यावेळी त्या तक्रारीची सत्यता पडताळून पाहण्याचा कोणताही अधिकार पोलिस अधिकाऱ्याला नाही. त्याने सर्वांत आधी संशयिताला अटक करायचे असते. मग या प्रकरणात संशयिताला अटक करण्यास वेळकाढू धोरण का अवलंबण्यास आले, यापूर्वी अशाप्रकारे तुम्ही कोणत्याही तक्रारीचा तपास केल्याचे तुम्हाला आठवत आहे का, असल्यास ते प्रकरण कोणते होते, असा प्रश्न करून पोलिस अधिकाऱ्यांना कात्रीत पकडले. "पोलिसांनी "ओव्हरस्मार्ट' होण्याचा प्रयत्न करू नये, तसेच संशयिताला मदत न करता, कायद्याच्या प्रक्रियेनुसारच तपासकाम करावे' अशा झणझणीत शब्दांत न्यायालयाने पोलिसांना सुनावले.
रोहितच्या जामिनाचा आदेश दाखवाः
संशयित रोहित याला जामीन मिळाल्यावर सरकार पक्षाने त्या जामिनाच्या आदेशाला आव्हान का दिले नाही, असा प्रश्न करताच, पोलिसांना संशयिताची कोठडीत गरज आहे, असे सरकारी वकिलांनी बाल न्यायालयात सांगितले नाही, असे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने आपल्या आदेशात काय म्हटलेः
रोहित मोन्सेरात चा जामीन रद्द करून त्याला पुन्हा का अटक करू नये
सहआरोपी बाबूश मोन्सेरात व वॉरन आलेमाव यांच्या पोलिस चौकशीचा अहवाल सादर करा
पीडित मुलगी व तक्रारदार महिलेला पूर्ण संरक्षण द्या
या गुन्ह्याचे तपासकाम "सीबीआय'कडे का देऊ नये
या गुन्ह्याचे तपासकाम योग्य पद्धतीने झालेले नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे.
पोलिसांनी तपासाची नेहमीची पद्धत वापरलेली नाही.
संशयिताला पकडण्यासाठी ठोस पावले उचललेली नाही.
पीडित मुलगी तपास कामाला सहकार्य करीत नाही, हा मुद्दा चर्चेचा आहे, असे मत यावेळी न्यायालयाने व्यक्त केले.
संशयिताला झुकते माप दिले.

Friday 21 November, 2008

डॉ. सुरेश आमोणकर यांच्याविरुद्ध तक्रार

सेव्ह गोवाचे जुझे लोबोंची निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

उत्पन्नाबाबत खोटी माहिती
पुरवल्याचा ठपका
५० लाख रु. आले कोठून?

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीसाठीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना भाजपतून बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले डॉ. सुरेश आमोणकर यांच्या गोटात मात्र कमालीची निराशा पसरली आहे. डॉ.आमोणकर यांनी आपल्या संपत्तीबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या उत्पन्नाबाबत खोटी माहिती पुरवल्याचा ठपका ठेवून "सेव्ह गोवा फ्रंट' पक्षाचे उमेदवार जुझे लोबो यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा सखोल अभ्यास केला असता सुमारे ५० लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळत असून हे पैसे कुठून आले,असा सवाल जुझे लोबो यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या तक्रारीत उपस्थित केलेल्या मुद्यांना आवश्यक कागदोपत्री दस्तऐवजाचीही बळकटी देण्यात आली आहे.

यासंबंधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार श्री.लोबो यांनी दाखल केलेल्या तक्रारीत डॉ.आमोणकर यांनी लोकप्रतिनिधी व भारतीय दंड संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. आपल्या उमेदवाराबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा पूर्ण हक्क मतदारांना असतो.अशावेळी उत्पन्न किंवा इतर आवश्यक गोष्टींबाबत खोटी माहिती पुरवून मतदारांची दिशाभूल करणे गुन्हा ठरत असल्याने त्यानुसार कारवाई करण्यात यावी,असेही या तक्रारीत म्हटले आहे.
"सेव्ह गोवा फ्रंट'पक्षाचे उमेदवार जुझे लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.आमोणकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पाळी उमेदवारीसाठी मे २००७ मध्ये सादर केलेले उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र व आता ७ नोव्हेंबर २००८ रोजी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र यात उत्पन्नाबाबत मोठी तफावत जाणवत असल्याचे म्हटले आहे. गेल्या ११ मे २००७ रोजी डॉ.आमोणकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या साखळी येथील रहिवासी घराचे मूल्यांकन ५,९३,८८२ रुपये केले होते. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदर घराचे मुल्यांकन २५,९३,८८२ रुपये केले आहे. गेल्या एका वर्षात सुमारे २० लाख रुपये वाढीव खर्च त्यांनी दाखवला असला तरी या काळात त्यांनी आयकर भरलेला नाही तसेच या काळात त्यांनी कुठे कर्जही घेतल्याचे नमूद केले नसल्याने हे २० लाख रुपये आले कुठून असा प्रश्न उपस्थित होतो,असे या तक्रारीत म्हटले आहे. व्यावसायिक मालमत्तेबाबत त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार साखळी येथे ४५.१६ व २४.१२ चौरसमीटर जागांची माहिती दिली आहे. या दोन्ही जागा ११-५-०७ ते ०७-११-०८ या काळात घेण्यात आल्याने त्यांचा समावेश मे २००७ ला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नाही. याबाबतीत अधिक माहिती मिळवली असता ०७-०८ या काळात डॉ.आमोणकर यांनी आयकर भरलेला नसल्याची माहितीही या तक्रारीत दिली आहे. या काळात त्यांनी आयकर भरलेला नाही तसेच त्यांच्या कर्जाची रक्कमही वाढली नाही,अशावेळी त्यांनी विकत घेतलेल्या सदर दोन्ही जागांचे मूल्यांकन ५,५०,००० रुपये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे डॉ.आमोणकर यांनी आपल्या उत्पन्नाबाबत माहिती लपवतानाच आयकर विभागाचीही दिशाभूल केल्याचा ठपका या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. साखळी परिसरातील सध्याचे व्यावसायिक भूखंड बाजारमूल्य २५ हजार रुपये प्रति चौरसमीटर आहे, त्यामुळे डॉ.आमोणकर यांच्या या दोन्ही जागांची किंमत किमान १७,५०,००० हजार रुपये होते. डॉ.आमोणकर यांनी मुळातच आपल्या जमिनींचे मूल्यांकन कमी दाखवण्याची चूक केली आहेच ;परंतु या जागा खरेदी करण्यासाठी त्यांनी पैसा कुठून आणला त्याचे स्त्रोतही दिले नसल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही प्रतिज्ञापत्रांचा सखोल अभ्यास केला असता एकूण ५० लाख ५९२ रुपयांचा हिशेब मिळत नसून या उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत प्रतिज्ञापत्रात प्रतिबिंबित होत नसल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. या एकूण प्रकरणाची गंभीर दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी व डॉ.आमोणकर यांच्याविरोधात रीतसर तक्रार नोंद करून त्यांच्याविरोधात मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाई व्हावी,अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे.

सार्वजनिक उद्योगांतील अधिकाऱ्यांना वेतनवाढ

दिल्ली, दि.२० - केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (सीपीएसई) कार्यरत अधिकाऱ्यांच्या वेतनात ५० ते ३०० टक्क्यांपर्यंतच्या भरघोस वाढीला गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
ही वेतनवाढ १ जानेवारी २००७ पासून लागू होणार असून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या वेतन दुरुस्ती समितीने वेतन वाढीची शिफारस केली होती. मंत्रिमंडळाने २१६ केंद्रीय पीएसयूमध्ये कार्यरत २,५८,००० मंडळस्तरीय अधिकारी तसेच युनियनमध्ये समावेश नसलेल्या १,२०,००० सुपरवायझर श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठीही वेतनवाढ मंजूर केली. मंत्रिमंडळाने सध्या फायद्यात असलेल्या पीएसयूसाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या ३० टक्के समान वाढीला मंजुरी दिली असून फारशा लाभात नसलेल्या पीएसयूमधील वेतनवाढ त्यांच्या व्यवहारांवर अवलंबून राहील. आणि साधारणत: १० ते २० टक्क्यांदरम्यान येथे वेतनवाढ अपेक्षित राहील असे म्हटले आहे.
प्रस्तावित पॅकेजमध्ये घरभाडे भत्ता, महागाई भत्ता व अन्य भत्त्यांमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीचा समावेश असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिली. याशिवाय काही प्रोत्साहन भत्तेही मिळणार आहेत. नव्या वेतन श्रेणीमुळे जो अतिरिक्त खर्च होणार आहे त्याची जबारदारी सीपीएसईवर राहील. याकरिता अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

मालेगाव स्फोटातील १० आरोपींना मोक्का

मुंबई, दि.२० - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपात अटक केलेल्या आरोपींवर मोक्कानुसार खटला चालवला जाणार आहे. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी सांगितले की आरोपींच्या विरोधात मोक्काचे कलम तीन (अपराधिक षड्यंत्र)नुसार खटला दाखल करण्यात आला आहे.
यानुसार सर्व दहा आरोपींच्या विरोधात एटीएसला १८० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करावी लागणार आहे. या दिवसांमध्ये सर्व आरोपींना जमानत मिळू शकणार नाही. मालेगाव स्फोटांच्या आरोपात एटीएसने साध्वी प्रज्ञा ठाकूर सह दहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी एटीएस प्रमुखांनी सांगितले की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही. तसेच एटीएसने शारीरिक छळ केल्याचा आरोप काही आरोपींना केला असला तरी त्यात काही तथ्य नाही आणि न्यायालयानेही ते मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
एटीएसच्या विरोधात याचिका
शिवसेनेच्या एका कार्यकर्ताने आज एटीएसच्या विरोधात मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेमध्ये मालेगाव स्फोट प्रकरणी तपास राज्य सीआयडीकडून करण्यात यावे आणि आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दिली जाणारी वाईट वागणूक याबाबत एटीएसच्या विरोधात कारवाई केली जावी असे यात म्हटले आहे.

आली लहर; केला कहर!

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - मोटार चालवता येत नसतानाही रागाच्या भरात ती सुरू करून तीन दुचाकी, एक चार चाकी यांना धक्का देत "सोल ऑफ आशिया' या मोठ्या शोरुममध्ये घुसवल्याने दोघे गंभीर जखमी झाले; तर शोरूमचे सुमारे अडीच लाख रुपये नुकसान झाले. ही घटना आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी पप्पू कलाड या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.
या विषयीची पोलिस तक्रार शोरूमचे मालक जगूर अहमद वाणी यांनी पणजी पोलिसांत नोंदवली आहे. जखमींमध्ये शोरूमचा सुरक्षा रक्षक प्रेम भंडारी (३५) व कामगार नसीम पंजाबी (२२) यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार "ऍमवे' या कंपनीचे वाहन तेथे उभे करण्यात आले होते. यावेळी या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने वाहन चालकाकडे वाहन शिकवण्याचा हट्ट धरला. चालकाने त्यास नकार दर्शवला. त्यामुळे रागाच्या भरात कार्यालयातून वाहनाची चावी आणून कलाड याने वाहन सुरू केले. ते वाहन गिअरमध्ये असल्याने जोरात पुढे गेले. त्यामुळे बिथरलेल्या पप्पूने मिळेल त्या दिशेने वाहन पुढे नेत समोर असलेल्या "सेल ऑफ आशिया' या शोरुममधे घुसवले. त्यापूर्वी त्याने शोरूमसमोर उभी करून ठेवलेली ऍक्टिवा, बुलेट, टीव्हीएस आणि "व्हॅगनर' या वाहनांना जोरदार धडक दिली. यावेळी या शोरुमच्या बाहेर असलेला सुरक्षा रक्षक प्रेम भंडारी व कामगार नसीम पंजाबी यांनाही जखमी केले. शोरूमच्या बाहेर असलेल्या वाहनांचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचनामा हवालदार श्री. ठाकूर यांनी केला. या विषयीचा तपास पोलिस निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

जर्मन मुलीवरील अत्याचार प्रकरणाची आज सुनावणी

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - संपूर्ण गोव्याचे आणि जर्मन दुतावासाचे लक्ष लागून राहिलेला अल्पवयीन जर्मन मुलीवरील बलात्कार प्रकरणाची सुनावणी उद्या (शुक्रवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुरू होणार आहे. या खटल्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार आज (गुरुवारी) गोव्यात दाखल झाले. या प्रकरणात राजकीय नेत्यांचे पुत्र तसेच नातेवाइक गुंतल्याचे आरोप झाल्याने २४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी यासंदर्भात "सुमोटो' याचिका दाखल करून घेतली होती.
शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकरणातून आपल्या मुलाला सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले असून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची या खटल्यासाठी मदत घेतल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांची बाजू भक्कम करण्यासाठी संशयित आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारनेही या प्रकरणात ऍड. जेठमलानी यांची मदत घेतल्याची वदंता आहे. दरम्यान, या अत्याचार प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी आज खंडपीठात सादर केला.

घटनाक्रम
०२ ऑक्टोः अश्लील एसएमएस पाठवल्याप्रकरणी
रोहित मोन्सेरातविरोधात कळंगुट पोलिसांत जर्मन महिलेची तक्रार.
१२ ऑक्टोः रोहितचे वडील शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गुन्ह्याचे खंडण केले.
१३ ऑक्टोः रात्री १०.३० वा. जर्मन महिलेच्यो वकिलांवर प्राणघातक हल्ला.
१४ ऑक्टोः कंपाल क्लिनिकमधे पोलिस अधीक्षकांकडे रोहितविरोधात बलात्काराची तक्रार नोंद.
१५ ऑक्टोः पोलिसांच्या तपासाला विरोध करीत वैद्यकीय चाचणीसाठी मुलीचा नकार.
१६ ऑक्टो ः रोहित विरोधात "लूक आऊट' नोटीस जाहीर.
२२ ऑक्टोः वैद्यकीय चाचणीसाठी पीडित मुलीच्या आईची अनुमती.
२३ ऑक्टोः मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पुतण्या वॉरन आलेमाव याच्यावरही बलात्काराचा आरोप.
२४ ऑक्टोः जर्मन महिलेची वॉरन विरोधात तक्रार दाखल. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याकडून "सुमोटो' जनहित याचिका दाखल.
२८ ऑक्टोः वॉरन आलेमावची कळंगुट पोलिस स्थानकात जबानी नोंद.
०१ नोव्हें ः कॅमेऱ्यासमोर पीडित जर्मन मुलीची न्यायालयात जबानी नोंद.
०२ नोव्हें ः जर्मन मुलीची "गोमेकॉ'त वैद्यकीय चाचणी.
०३ नोव्हें ः रोहितविरोधात नव्याने समन्स.
०४ नोव्हें ः दु. १२.३० वा. रोहित कळंगुट पोलिसांना शरण व त्यानंतर अटक
०५ नोव्हें ः रोहितला ३ दिवस पोलिस कोठडी.
०९ नोव्हें ः बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी जर्मन महिलेचे कळंगुट पोलिसांना पत्र.
१० नोव्हें ः रोहितला बाल न्यायालयात सशर्त जामीन मंजूर.
----------------------------------------------

उत्तेजक विक्री प्रकरणी हणजुणेत दोघांना अटक

१.७२ लाखांचे अमली पदार्थ छाप्यात जप्त
पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत गोव्यात मादक पदार्थांच्या तस्करीत आणि विक्रीत स्थानिक लोक गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. आज टाकलेल्या छाप्यात हणजूण येथील गणेश नारायण नाईक (३३) व प्रसाद रामू हरमलकर(३९) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून १ लाख ७२ हजार ३०० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अटक केलेल्यांपैकी प्रसाद हा सरकारी कर्मचारी असून विद्यमान कॉंग्रेस सरकारमधील एका मंत्र्याच्या विशेष कार्याधिकाऱ्याच्या (ओएसडी) वाहनाचा चालक म्हणून नोकरी करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन मारुती व्हॅन जप्त केल्या आहेत.
दोघे संशयित हणजूण येथील पाराडिसो क्लबच्या शेजारी एका वाहनात बसून अमली पदार्थांची विक्री करताना पोलिसांनी छापा टाकला. यात ५३ ग्रॅम चरस(५ हजार ३००रु.), १५ ग्रॅम कोकेन (७५ हजार रुपये), १० ग्रॅम एमडीएमए (३० हजार रुपये), २० ग्रॅम चरस (२ हजार रु), २ ग्रॅम कोकेन (१० हजार रु.), ११ ग्रॅम एमडीएमए (३३ हजार रुपये) व ४ ग्रॅमच्या १८ एक्सटसी टॅबलेट पोलिसांनी जप्त केल्यात. काल रात्री ११.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान हा छापा टाकण्यात आला. अटक झालेले संशयित मादक पदार्थाचे घाऊक विक्रेते असून त्यामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिस तपास करीत आहेत.
जेथे "खास' पार्टीचे आयोजन केले तेथे ही जोडगोळी पर्यटक परवाना असलेली टॅक्सी घेऊन जायची. त्यानंतर टॅक्सी पाकिर्ंगच्या ठिकाणी उभी करून ग्राहकांना अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी प्रथम गणेश नारायण नाईक याच्यावर छापा टाकला. नंतर प्रसादला अटक करण्यात आली. प्रसाद हा हस्तकला खात्यात चालक म्हणून नोकरीला असून सध्या एका मंत्र्याच्या विशेष कार्याधिकाऱ्याचे वाहन चालवतो.
अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टी. एन. पाटील, पोलिस शिपाई दिना मांद्रेकर, हरी नाईक व साईश पोकळे यांनी या कारवाईत भाग घेतला.

Thursday 20 November, 2008

कचऱ्याचा विळखा


पालक खवळले
महापालिका ढिम्मच


पणजीत सर्वत्र असह्य दुर्गंधी, शिक्षक व विद्यार्थ्यांना उलट्या
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - पाटो येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद झाल्याने येथील ओल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मळा येथील विविध विद्यालयांतील त्रस्त विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी महापौरांच्या दालनात कचरा टाकण्याची टोकाची भूमिका का घेतली याचे नेमके कारण अखेर आज उघड झाले. आज सकाळी मळा येथील पीपल्स हायस्कूलची एक शिक्षिका व अकरा विद्यार्थी मिळून एकूण बारा जणांना या असह्य दुर्गंधीमुळे अचानक उलट्या सुरू झाल्याने या परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, भारतीय वैद्यक संघटनेच्या पथकाने संध्याकाळी पाटो कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली असता आरोग्याच्या दृष्टीने तेथे भयावह परिस्थिती उद्भवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पणजी व आसपासच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाटो येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पामुळे मळा व आजूबाजूच्या परिसरातील लोक भयंकर दुर्गंधीने हैराण झाले आहेत. एका मळा भागातच एकूण पाच विद्यालये आहेत. त्यात मेरी इम्यॅक्युलेट, पीपल्स, मुष्टीफंड, हेडगेवार,सेवंथ डे ऍडव्हांटीस आदींबरोबर जयराम कॉम्प्लेक्स ही निवासी वसाहत आहे. या दुर्गंधीमुळे तेथील रहिवासी, विद्यार्थी व शिक्षकांचे जीणे कठीण बनले आहे. गेली दिड वर्षे या समस्येला तोंड देत असलेल्या या लोकांना महापालिकेकडून अजूनही न्याय मिळत नसल्याने या लोकांचा पारा सध्या बराच चढलेला आहे. कचरा समस्येबाबत तोडगा काढण्यात महापालिका अपयशी ठरल्याने विद्यार्थ्यांनी पणजीत मोर्चा काढून महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्या दालनात कचरा टाकून अभिनव निषेध नोंदविला होता. या प्रकारामुळे शिक्षण खात्याकडून संबंधित विद्यालयांना कारवाईच्या नोटीसा पाठवण्यात आल्यानेही हे प्रकरण सध्या गाजत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या निषेधामागचे कारण खरोखरच प्रामाणिक होते हे आज घडलेल्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे.
विद्यार्थ्यांना उलट्या
पीपल्स हायस्कूल परिसरात पसरलेल्या असह्य दुर्गंधीमुळे पीपल्स हायस्कूलमधील दलिला डिकॉस्ता या शिक्षिकेलाच उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर हळूहळू एकेक विद्यार्थी करता करता अचानक अकरा विद्यार्थ्यांनाही उलट्या होऊलागल्याने विद्यालयात एकच खळबळ उडाली. व्यवस्थापनाने तात्काळ या विद्यार्थ्यांना वाचनालयात बसवून घेतले व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. या दरम्यान, "१०८' तात्काळ रूग्णसेवेशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना आरोग्य चाचणीसाठी पाठवण्यात आले. सदर मुलांच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आल्याने हे वृत्त पणजी परिसरात पसरले. या घटनेमुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरल्याने आज पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना लवकर घरी सोडण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.विनय सुर्लकर यांनी दिली. या विद्यार्थ्यांना पणजी येथील आरोग्य केंद्रात तपासणी करून घरी पाठवण्यात आले. उलट्या केलेल्या विद्यार्थ्यांत कु.सोहेल खान,कु.हरीश गावस, कु.प्रणव मडकईकर,कु.वामन सरदेसाई,कु.पुजा नाईक,कु.जॉएल नुनिस, कु.रोहीत नाईक आदींचा समावेश होता.
दरम्यान, महापालिकेचे नगरसेवक असलेले ऍड. अविनाश भोसले या विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष असून विद्यार्थ्यांना उलट्या होत असल्याचे वृत्त कळताच विद्यालयातून आपल्या पाल्याला घेऊन निमूटपणे घरी जाण्याच्या त्यांच्या कृतीवर तेथे उपस्थित काही पालकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या या बेजबाबदार कारभारविरूद्ध त्यांनी आवाज उठविण्याचे सोडून मूग गिळून गप्प बसण्याच्या त्यांच्या कृतीबद्दल या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
पर्रीकरांची तात्काळ धाव
पीपल्स हायस्कूलमधील या घटनेचे वृत्त कळताच पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांनीही विद्यालयात भेट दिली. पर्रीकर यांनी कचऱ्याच्या समस्येबाबत सरकार गंभीर नसल्याची टीका करून महापालिकेकडूनही ही समस्या सोडवण्यात विशेष रस घेतला जात नसल्याचे सांगितले. आमदार या नात्याने हा प्रश्न सोडवण्यास संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देऊनही महापालिकेच्या सत्ताधारी गटाकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पाटो परिसरात महापालिकेकडून कचरा टाकला जात नाही,अशी माहिती महापौर देतात. तथापि, मुळातच महापालिकेचे नाव नसलेले व त्यांच्याच मालकिचे वाहन रात्री उशीरा येथे कचरा टाकत असल्याचा गौप्यस्फोटही पर्रीकर यांनी केला. दरम्यान,पर्रीकर यांनी यावेळी पोलिसांशी संपर्क साधून तेथे रात्री बेकायदा कचरा टाकणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी,अशी मागणीही केली. स्वप्नील नाईक यांनी यासंबंधी पोलिसांना पत्र पाठवण्यात आल्याचे सांगून मुळात या प्रकल्पाकडे जाणारा मार्गच बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शिक्षण संचालकांनी अनुभव घ्यावा
कचऱ्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीवर तोडगा काढण्यात महापालिकेला आलेल्या अपयशाविरोधात मोर्चा काढून महापौरांच्या दालनात कचरा टाकलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारून नोटीसा पाठवलेल्या शिक्षण संचालकांनी एकदा प्रत्यक्ष येथे येऊन परिस्थितीचा अनुभव घ्यावा,असा सल्ला उपस्थित पालकांनी दिला. विद्यालयांतील वातावरण शिक्षणासाठी व आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याची जबाबदारी शिक्षण संचालकांनी घेण्याची गरज आहे.
भारतीय वैद्यकीय संघटनेच्या पथकाची भेट
पीपल्स हायस्कूलमध्ये घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल भारतीय वैद्यकीय संघटनेने घेतली आहे. संघटनेच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्यावतीने आज डॉक्टरांच्या खास पथकाने पीपल्स हायस्कूल व पाटो येथील वादग्रस्त कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार या परिस्थीतीवर तात्काळ तोडगा काढला गेला नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक अवस्था निर्माण होण्याची शक्यता समितीचे पदाधिकारी डॉ.शेखर साळकर यांनी व्यक्त केली. मुळातच कचऱ्याचा विषय हा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याने त्याबाबत व्यापक चर्चा व योग्य उपाययोजनांची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
यासंदर्भात मुख्य सचिव जे. पी. सिंग,आरोग्य सचिव व आरोग्य संचालकांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सांगून जर सरकार हा विषय सोडवण्यास अपयशी ठरले तर नागरीकांना रस्त्यावर येणे भागच पडेल,असेही डॉ.साळकर म्हणाले. नागरीकांच्या या लढ्याला संघटनेचा पूर्ण पाठींबा राहील,असे वचनही त्यांनी दिले. संघटनेच्या या पथकात गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ.जयंत भांडारे,सचिव डॉ.सुशीला फोन्सेका,डॉ.रूफिन मोंतेरो,डॉ.अमोल, डॉ.गोविंद कामत आदींचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी "गोवा पीपल्स फोरम'चे निमंत्रक ऍड.सतीश सोनक, "ऊठ गोंयकारा'चे निमंत्रक अमोल नावेलकर, अखिल गोवा नगरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू, नगरसेवक ऍड. अविनाश भोसले,पर्यावरणप्रेमी सुदीप डोंगरे, बाल आयोगाच्या सदस्य एजिल्डा सापेको, रोटरी क्बलचे श्री. सिरसाट, हेडगेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर, "मदरअर्थ'संस्थेचे अनिल केरकर हजर होते.

इफ्फीनिमित्त २२ रोजी "इंडिया द बिग पिक्चर'

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- "भारतीय उद्योग महासंघ' (सीआयआय) यांच्यातर्फे "इफ्फी-०८'निमित्त दरवर्षीप्रमाणे "इंडिया- द बिग पिक्चर' परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 'नवी स्वप्ने, नव्या दिशा' या संकल्पनेवर आधारीत या परिषदेचे २२ नोव्हेंबर रोजी "सिदाद दी गोवा' येथे उद्घाटन होणार आहे. चित्रपट उद्योगाशी संबंधित विविध देशातील महनीय व्यक्ती या परिषदेत भाग घेणार आहेत.
"सीआयआय'तर्फे भारतीय मनोरंजन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. गोव्यात आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ताने या उद्योगाशी संबंधित सर्व संबंधितांना एका व्यासपीठावर आणून या उद्योगाला चालना देणे व त्याचबरोबर या उद्योगाच्या विकासासाठीची दिशा ठरवणे आदी गोष्टी या परिषदेमार्फत साध्य केल्या जातात. यावेळी होणाऱ्या परिषदेत मनोरंजन उद्योगातील नवीन शोध, डिजिटल क्रांती, नवे तंत्रज्ञान व मनोरंजन उद्योगातील महसूल प्राप्तीच्या नव्या संधी आदी विषय हाताळले जाणार आहे. भारतीय मनोरंजन उद्योगाला केंद्रबिंदू बनवून या उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठीत स्थान मिळवून देण्यासाठी काय करता येईल, याबाबतही चर्चा या परिषदेत होणार आहे.
या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात "सीआयआय' चे गोवा राज्य मंडळाचे माजी अध्यक्ष पी. एफ. एक्स. डिलीमा स्वागतपर भाषण करतील. मुख्यमंत्री दिगंबर कामत, माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा, मुख्य सचिव जे. पी. सिंग,"युटीव्ही'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉनी स्क्रूवाला,माहिती व प्रसारण सचिव सुषमा सिंग आदी हजर असतील.
पहिल्या सत्रात "मनोरंजन उद्योगातील नव्या उत्पन्नाच्या दिशा' या विषयावर होणाऱ्या चर्चेत रजत बडजात्या, नवीन शहा, प्रीतम डॅनियल, एल.सुरेश, संदीप तर्कस, विशाल कपूर, शशांक जरे, गौतम दत्त सहभागी होतील.
दुसऱ्या सत्रात"नवीन प्रसारमाध्यमे' या विषयावरील सत्रात पीटर मुखर्जी, के.बी.रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता सिंग, परमिंदरवीर, हिरेन गडा, तोयीन सुबेर,मोहन कृष्णन, रोहीत शर्मा व विशाल गोंडल हे भाग घेतील. शेवटच्या सत्रात "नव्या बाजारपेठा' या विषयावर चर्चा होईल. त्यात माहिती व प्रसारण खात्याचे संयुक्त सचिव व्ही.बी.प्यारेलाल,बिरेन घोष यांच्या मार्गदर्शनाखाली अफलोबी अदेसन्या, राजेश जैन, मनोज श्रीवास्तव, सुप्रान सेन, आशिष भटनागर,उदय शंकर व कृष्णा शहा भाग घेणार आहेत.

मुख्य प्रश्न सोडवण्यावरच भाजप वचननाम्यात भर

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रकाशन
डिचोली, दि. १९ (प्रतिनिधी) - पाळी मतदारसंघातील समस्यांची भाजपला पूर्णपणे जाणीव असून, धूळ प्रदूषण रोखणे, सुरक्षित रस्ते, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पाण्याची समस्या सोडविणे अशा दैनंदिन अडचणी दूर करण्यावर भाजपचा भर राहील, असे निवेदन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी आज साखळी येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी श्री. नाईक यांनी भाजपचा वचननामा जाहीर केला.
भाजपला बहुजन समाजाबद्दल अजिबात स्वारस्य नाही, या खासदार शांताराम नाईक यांच्या आरोपाला उत्तर देताना, श्रीपाद नाईक यांनी हा आरोप फेटाळला. पांडुरंग मडकईकर, दयानंद नार्वेकर यांच्यासारख्या बहुजन समाजातील नेत्यांवर कॉंग्रेसने केलेले अन्याय प्रथम निस्तरावा, असा सल्ला त्यांनी दिला. वाढती महागाई, मूर्तिभंजनाचे प्रकार आणि सरकारची निष्क्रियता याला जनता कंटाळली आहे, याचा प्रत्यय २० ऑक्टोबरच्या "गोवा बंद' ने आणून दिला आहे, असे सांगून पाळीतील जागरूक आणि सुज्ञ मतदार डॉ.प्रमोद सावंत यांना निश्चितपणे निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच डॉ. सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सावंत यांना समाजसेवेची पार्श्वभूमी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्व. गुरुदास गावस हेही कॉंग्रेसला कंटाळले होते, त्यांनी तसे बोलून दाखविले होते असे नाईक यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या गैरप्रकारांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली असून, मतदानापूर्वी रात्रीच्यावेळी कॉंग्रेसतर्फे थैल्या रिकाम्या केल्या जात असल्याने निरीक्षकांनी देखरेख ठेवावी, अशी जाहीर मागणी सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी केली. प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून, सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास डॉ.सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

कचऱ्याच्या मुद्यावरून महापालिकेची कोंडी

खंडपीठाचा आदेश आज अपेक्षित
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत ("इफ्फी') कुडका येथे कचरा टाकण्यासाठी पणजी महापालिकेने न्यायालयाकडे परवानगी मागितल्याने यावर आज जोरदार युक्तिवाद झाला. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने महापालिकेला कुडका येथे कचऱ्याची एक टोपलीसुद्धा न टाकण्याचा आदेश दिल्याने पुन्हा पालिकेला तेथे कचरा टाकण्याची परवानगी कशी द्यावी, असा गंभीर प्रश्न न्यायालयासमोर उभा ठाकला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून निवाडा उद्या २० नोव्हेंबरपर्यंत राखीव ठेवला आहे.
"इफ्फी' झाल्यानंतर कचऱ्याचा प्रश्न मिटणार आहे का, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची पालिकेची नैतिक जबाबदारी आहे; त्यासाठी त्यांनी न्यायालयावर अवलंबून राहण्याची गरज नाही, असे सांगून पालिकेला न्यायालयाने खडसावले.
पाटो पणजी येथे पालिकेने सुमारे ६० लाख रुपये खर्च करून उभा केलेला कचरा विल्हेवाट प्रकल्प निकामी ठरल्याने कचरा कुठे टाकावा, असा यक्षप्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे. रोज शहरात ५० टन कचरा गोळा होतो. येत्या शनिवारपासून इफ्फी सुरू होणार असून त्यासाठी पणजीत सुमारे पाच हजारांहून अधिक पर्यटक अपेक्षित आहेत. त्यामुळे सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत. परिणामी कचऱ्याचे प्रमाण वाढणार आहे. सध्या पालिकेकडे कचरा टाकण्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्याने किमान तीन महिने कुडका येथे कचरा टाकण्याची परवानगी दिली जावी, अशी याचना यावेळी पालिकेचे वकील सुरेंद्र देसाई यांनी केली.
याला जोरदार विरोध करीत याचिकादार नॉर्मा आल्वारीस यांनी यापूर्वी कुडका प्रकरणात खंडपीठाने दिलेला अंतिम निवाडाच वाचून दाखवला. यात असे म्हटले आहे की, पालिकेने यापुढे कोणत्याही प्रकारचा कचरा तेथे टाकू नये. कारण तेथे कचऱ्याचा डोंगर उभा झाला आहे. ऑक्टोबर ०८ ते एप्रिल ०९ पर्यंत तेथून कचरा हटवण्याचे काम पूर्ण करावे. तसेच त्यानंतर याचा अहवाल न्यायालयात सादर करावा. परंतु, पालिकेने अद्याप हे काम सुरू केलेले नाही. कचऱ्याचा डोंगर आहे, तसाच उभा असल्याचे ऍड. आल्वारीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, "इफ्फीसाठी गोव्यात अनेक बडे अभिनेते व
अतिमहनीय मंडळी येणार आहेत. त्यामुळे किमान एका महिन्यासाठी पालिकेला कुडका येथे कचरा टाकण्यास परवानगी द्यावी. तथापि, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कुडका येथील कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांमुळे तेथील अनेक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यासाठी पालिकेकडे नुकसान भरपाईही मागितली होती, याची आठवण यावेळी ऍड. आल्वारीस यांनी करून दिली.

श्रीकृष्णाचे विचार अंगी बाणवा - ब्रह्मेशानंद


"संभवामि...' महानाट्याचा थाटात समारोप
फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी) - श्रीकृष्णाचे चरित्र आदर्श आणि अनुकरणीय आहे. मनुष्याने वैयक्तिक जीवनात त्याला स्थान देऊन त्यातील आदर्श विचार अंगी बाणावे, असे आवाहन कुंडई येथील तपोभूमी पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांनी आज संध्याकाळी फर्मागुडी येथे केले.
श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाने फर्मागुडी येथे आयोजित "संभावामि युगे युगे....' या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याच्या शुभारंभी प्रयोग मालिकेच्या समारोप सोहळ्यात प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई, दिग्दर्शक दिलीप देसाई, लेखक डॉ. नारायण देसाई, नेपथ्यकार दयानंद भगत, प्रकाश योजनाकार सतीश गवस, वेषभूषाकार दिगंबर सिंगबाळ, रंगभूषाकार दास कवळेकर, राजू देसाई व मान्यवर उपस्थित होते.
श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्य हे आपल्या संस्कृतीचे मोठे वैभव आहे. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचे ऐश्वर्य महान असून विजयादुर्गा मंडळाने महानाट्याच्या स्वरूपात सांस्कृतिक वैभव आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून स्वामी ब्रह्मेशानंद म्हणाले की, आजचे राजकारणी, समाजकारणी व इतरांच्या समोर आदर्श विचार ठेवण्याचे काम आयोजकांनी नाट्यांच्या स्वरूपात केले आहे. ह्या महानाट्यातून बोध घेण्याची गरज आहे. ह्या महानाट्याचे प्रयोग देश आणि विदेशात सुध्दा व्हावेत, असा आशीर्वाद स्वामी ब्रह्मेशानंद यांनी दिला.
वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. महानाट्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. आणखी प्रयोग आयोजित करण्याची मागणी केली जात आहे. तरीही शुभारंभी प्रयोगाची मालिका अकरा प्रयोगानंतर बंद केली जात आहे, असे मंत्री श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भूषण भावे आणि संगीता अभ्यंकर यांनी केले. यावेळी मंडळाने काढलेल्या "श्रेय नामावली' या स्मरणिकेचे प्रकाशन प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

Wednesday 19 November, 2008

'एटीएस' विरोधात अडवाणी कडाडले

- साध्वी प्रज्ञांवरील आरोपांची न्यायालयीन चौकशी करा
- विद्यमान तपासचमू बदला

रायपूर, दि. १८ (केतन पाठक): मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी अटक केलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाविरुद्ध ("एटीएस') जे आरोप केले, त्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे.
छत्तीसगडमधील आजच्या प्रचारसभा प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी हे निवेदन जारी केले. त्यात ते म्हणतात की, दिल्ली ते रायपूर अशा विमान प्रवासात, साध्वी प्रज्ञा यांनी नाशिक न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र सादर केले, ते मी पूर्ण वाचले. या देशातील एका आध्यत्मिक व्यक्तीला आणि विशेषत: महिलेला अशा प्रकारची हीन वागणूक दिली जात आहे यावर आपला विश्वासच बसत नाही. आजवर महाराष्ट्र "एटीएस'ने साध्वी प्रज्ञा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जे आरोप केले, त्यावर कोणतेही वक्तव्य देणे मी टाळले. तथापि, हे प्रतिज्ञापत्र वाचल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर किती त्रास देण्यात आला, हे स्पष्ट होते. चौकशी करणाऱ्यांनी अतिशय अश्लील भाषेचा वापर केला. याबाबत आपण तीव्र खेद व्यक्त करतो. हीच भावना देशवासीयांची असावी, याची मला खात्री आहे.
साध्वी प्रज्ञा यांना दोन आठवड्यांपर्यंत बेकायदा स्थानबद्ध करून ठेवणे, त्यांचा अतोनात छळ करणे आणि त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात भरती होण्याची पाळी येणे, त्यांच्या सहमतीशिवाय "नार्को' आणि "पॉलिग्राफ चाचण्या' करणे, या स्थानबद्धतेच्या काळात त्यांच्यासोत महिला शिपाई नसणे, हा प्रकार गंभीर आहे. एटीएसची या प्रकरणातील वागणूक राजकीय कारणाने प्रेरित असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात एका लष्करी अधिकाऱ्यावर लष्करी डेपोतून "आरडीएक्स' चोरल्याचा आरोप करणे आणि समझोता एक्सप्रेसमध्ये "आरडीएक्स' वापरलेच गेले नाही, असे नंतर सांगणे, यावरून संभ्रम निर्माण होतो आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
साध्वी प्रज्ञा यांनी "एटीएस'विरुद्ध केलेले आरोप पाहता विद्यमान तपास यंत्रणेने नैतिक अधिकार गमावला आहे. म्हणूनच एटीएसचा विद्यमान चमू बदलण्यात यावा. साध्वी प्रज्ञा यांचे आरोप तसेच लष्करी अधिकाऱ्यांवर झालेले आरोप याच्या चौकशीसाठी न्यायालयीन प्राधिकरण नेमण्यात यावे, अशी मागणीही अडवाणी यांनी केली आहे.

...तर साध्वी जबलपूरहून सुरतला गेलीच नसती

नवी दिल्ली, दि. १८ (रवींद्र दाणी): मालेगाव स्फोटांमध्ये साध्वी प्रज्ञाचा सहभाग असता तर ही साध्वी स्फोटानंतर पोलिसांना भेटण्यासाठी जबलपूरहून सुरतला गेली असती काय, ती गेली याचाच अर्थ ती निर्दोष आहे अशा प्रतिक्रिया साध्वीच्या वकिलांनी काल नाशिक न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नोंदविल्या जात आहेत.
साध्वीच्या ८ पृष्ठांच्या २७ परिच्छेदांच्या प्रतिज्ञापत्रातील हा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. साध्वीच्या वकिलांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
७ ऑक्टोबरचा दूरध्वनी
साध्वी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हणते, ७ ऑक्टोबरला मी जबलपूरच्या माझ्या आश्रमात होते. महाराष्ट्र एटीएसमधील एक अधिकारी इन्स्पेक्टर सावंत यांचा मला दूरध्वनी आला. त्यांना माझ्या एलएमएल फ्रीडम मोटार सायकलबाबत माहिती हवी होती. मी ही मोटारसायकल चार वर्षांपूर्वीच विकली असे मी त्यांना सांगितले. माझ्या उत्तरांनी सावंत यांचे समाधान झाले नाही. त्यांनी मला शक्य तितक्या लवकर सुरतला येण्यास सांगितले. कारण सुरतला आम्ही काही वर्षापूर्वी स्थायिक झालो होतो. आश्रम सोडून सुरतला जाणे मला अवघड होते. इन्स्पेक्टर सावंत यांनीच जबलपूरला यावे असे मी सूचविले. पण सावंत यांनी मला सुरतला येण्यास सांगितले.
१० ऑक्टोबरला सुरतमध्ये
इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी मी १० तारखेला सकाळी सुरतमध्ये दाखल झाले. रेल्वेस्थानकावर माझे एक शिष्य भीमभाई परसिचा मला घेण्यासाठी आले होते. मी त्यांच्या घरी गेले. सकाळी १०च्या सुमारास मी इन्स्पेक्टर सावंत यांना भेटले. त्यांनी मला माझ्या मोटारसायकलबाबत विचारले. माझी मोटारसायकल मालेगावमध्ये कशी पोहोचली असा त्यांचा मुख्य प्रश्न होता. माझी मोटारसायकल मी २००४ मध्येच विकली आहे. त्यामुळे ती मालेगावात कशी पोहोचली हे मी कसे सांगणार हे माझे उत्तर होते. माझ्या या उत्तराने सावंत यांचे समाधान होत नव्हते. त्यांनी मला महाराष्ट्र एटीएसच्या मुंबई कार्यालयात चलण्यास सांगितले. त्यानुसार मी एटीसच्या मुंबई कार्यालयात गेली.
साध्वीने प्रतिज्ञापत्रावर सांगितलेली ही वस्तुस्थिती पाहता साध्वी मालेगाव प्रकरणात असावी असे अधिकाऱ्यांना वाटत नाही. साध्वीचा सहभाग असता तर ती भाजपशासित मध्यप्रदेशातील जबलपूरहून सुरतला गेलीच नसती. सुरतहून मुंबईला गेली नसती असे सर्वसाधारण मत व्यक्त केले जात आहे. कोणताही गुन्हेगार असे करणार नाही, पोलिसांचा निरोप येताच तो फरार झाला असता, पण साध्वी फरार तर झालीच नाही उलट ती पोलिसांच्या बोलावण्यावरुन सुरतला गेली. ही एकच बाब मालेगाव प्रकरणात साध्वीचा सहभाग नाही असे मानण्यास पुरेशी आहे असे काही पोलिस अधिकाऱ्यांना वाटते. महाराष्ट्र एटीएस येथेच थांबले असते तर योग्य झाले असते असे या अधिकाऱ्यांना साध्वीच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर वाटत आहे.

पणजीमध्ये पुन्हा तीव्र पाणीटंचाई

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): पणजीत पुन्हा एकदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सांत इनेज परिसरातील अनेक इमारतींमध्ये पाणी उपलब्ध होत नसल्याने लोकांचे अतोनात हाल सुरू आहे. गेल्या आठवड्यांपासून पाण्याविना वणवण झालेली असतानाच पुन्हा हा मूलभूत प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरास पाणीपुरवठा करणारी वाहिनी जुनी झाली असल्याने ही समस्या उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाणीपुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता श्रीकांत यांनी सांगितले की, आल्तिनो ते झरिना टॉवर येथे पाणीपुरवठा करणारी वाहिनी काही समस्या निर्माण झाल्याने खंडित करण्यात आली आहे. तथापि, उद्या बुधवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा त्यांनी केला.
लोकांना कोणताही पूर्व कल्पना न देता अचानक पाणीपुरवठा खंडित केला जात असल्याने लोकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या या धक्कादायक सवयीमुळे लोकांना विविधसमस्यांना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी शहरातील जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव खात्यापुढे मांडला आहे.

'द वॉरलॉर्डस'ने इफ्फीचा शुभारंभ

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): एकोणचाळिसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी-०८) ची तयारी झपाट्याने सुरू असून येत्या २२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात या शानदार सोहळ्याचे उद्घाटन होईल. या महोत्सवाची सुरुवात "द वॉरलॉर्डस' ने या चिनी चित्रकृतीद्वारे होणार आहे.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली.यावेळी चित्रपट संचालनालयाचे संचालक एस.एम. खान, मुख्य सचिव जे. पी. सिंग, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष तोमाझिन कार्दोझ आदी हजर होते.
उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री रेखा प्रमुख पाहुण्या असतील. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा,राज्यपाल एस. एस. सिद्धू, माहिती व प्रसारण सचिव,चित्रपट संचालनालयाचे संचालक एस. एम.खान व मूळ गोमंतकीय तेलगू अभिनेत्री इलियान डिक्रुझ यांची खास उपस्थिती असेल.
महोत्सवाच्या समारोप सोहळ्यासाठी अभिनेता कमल हसन हे प्रमुख पाहुणे असतील व इराणी फिल्म " द सॉंग ऑफ दी स्पॅरोज" हा चित्रपट दाखवला जाईल. प्रतिनिधी नोंदणीचे काम २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून अंदाजे साडेसहा प्रतिनिधी नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. "इफ्फी'च्या कार्डांचे वितरण सुरू करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. महोत्सवानिमित्त सुरक्षेचे कडक उपाय योजण्यात आले आहेत. महोत्सवाच्या परिसरात ठिकठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या मागवण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या महोत्सवासाठी येणाऱ्या कलाकारांत कबीर बेदी,मनीषा कोईराला,अकबर खान,नसरूद्दीन शहा व त्यांचा मुलगा,पद्मिनी कोल्हापूरे,सचिन,सुप्रिया,पल्लवी जोशी आदींचा समावेश आहे. याशिवाय अन्य मातब्बर कलाकारांची उपस्थितीही यावेळी असेल.
यंदा स्थानिक तथा पर्यटकांसाठी खास खुल्या तिकिटांची सोय करण्यात आली आहे. फक्त भारतीय चित्रपट पाहण्याची सोय या योजनेअंतर्गत राहणार असून दुसऱ्या दिवशीची तिकीटे आदल्या दिवशी निश्चित करून ठेवावी लागणार आहेत. फिचर फिल्म विभागाची सुरुवात "यारविंग'या चित्रपटाने होणार असून नॉन फिचर फिल्मची सुरुवात" मेमरिज,मुव्हमेंट ऍण्ड अ मशीन ' या चित्रपटाने होणार आहे.
भारतीय पॅनोरमाची सुरुवात "थॅक्स मॉ' या इरफान कमल यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने होणार आहे. संजय सुरकर यांचे "तंडाळा', दिबाकर बॅनर्जी यांचे "ओये लकी,लकी ओये", डॉ.मृणालिनी ए दयाल यांचा "दुहान',मनीश गुप्ता यांचा "स्टोन मॅन'," वन डे इन कोचीन" यासह राजेंद्र तालक यांचा "सावरीया डॉट कॉम' हा चित्रपटही या विभागासाठी निवडण्यात आला आहे.
-------------------------------------------------------------------
चौघा नामवंतांचा गौरव
चित्रपट क्षेत्रात अमौलिक योगदान दिलेल्या चौघा नामवंत कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली.शाल, श्रीफळ व ५१ हजार रुपयांचा धनादेश असे या सत्काराचे स्वरूप असेल. त्यात मृणाल सेन,देव आनंद, के. बालचंद्रन व वामन भोसले यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात गोव्याचे दालन ठरले आकर्षण

नवी दिल्ली, दि. १९ : येथील विशाल प्रगती मैदानावर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनास देशविदेशातील अनेक जण भेट देऊन, गोव्यासंबंधीचा माहिती कमालीच्या उत्सुकतेने जाणून घेत आहेत. अशा स्वरूपाचे हे आशियातील भव्य प्रदर्शन आहे. गोव्याच्या दालनामध्ये माहिती व प्रसिद्धी खाते, गोवा हस्तकला विकास महामंडळ, गोवा औद्योगिक विकास महामंडळ, गोवा लघुउद्योग संस्था आदी संस्थांनी गोव्याच्या विकासाचे आणि सुविधांचे चित्र या प्रदर्शनात उभे केले आहे.
भारतीय व्यापार विकास संस्थेने ते आयोजित केले आहे. देशातील सर्व राज्यांमधील उद्योजकांना उत्तेजन व संधी मिळवून देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशविदेशातील उद्योजक व व्यापाऱ्यांना एकमेकांशी संवाद साधता यावा आणि संबंध प्रस्थापित करता यावेत, यासाठी हे प्रदर्शन भरविले जाते.
गोव्याच्या दालनास नुकतीच मुख्यमंत्री दिगंबर कामत, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नीतिन कुंकळकर, उद्योग सचिव व्ही.के.झा, लघुउद्योग संस्थेचे अतुल नाईक यांनी भेट दिली.
या प्रदर्शनातील गोवा दालनाची रचना व उभारणी मिडिया प्रोमोशन्सचे केदार धुमे व क्लाईव्ह सिकेरा यांनी केली आहे. गोवा हे कोणत्याही महिन्यात पर्यटकांसाठी योग्य असल्याचा प्रत्यय गोव्याचे दालन प्रेक्षकांना आणून देत आहे.

Tuesday 18 November, 2008

चिंचोळे भागात खळबळ: पिंपळेश्वर दत्त मंदिरातील पिंडीका अज्ञातांनी तोडली

- भाविक संतापले - चौकशीसाठी सातजण ताब्यात
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गेल्या वर्षभरापासून दक्षिण गोव्यात हिंदूच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणारी टोळी उत्तर गोव्यातही सक्रिय झाली असून आज पहाटे चिंचोळे भाटले येथे श्री क्षेत्र पिंपळेश्र्वर दत्त मंदिराच्या बाजूला असलेली पिंडीका समाजकंटकानी तोडून टाकल्यामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. रात्री उशिरा चौकशीसाठी सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच सकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण केले असता, सुमारे एक किलोमीटर माग काढत श्वान ताळगाव बगल रस्त्याच्या बाजूला असलेल्या एस.एम. शुब्रती शेख याच्या मालकीच्या घरात गेला. तथापि, तेथे कोणीच राहात नसून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कलाकृती केल्या जात असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्या ठिकाणी काम करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या २९५ व १५३ (अ) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याविषयीची पोलिस तक्रार देवस्थान समितीचे कारकून निवृत्ती पालेकर यांनी सादर केली आहे. सकाळी स्थानिक आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर, शिवसेना पक्षाचे गोवा राज्य प्रमुख उपेन्द्र गावकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी गवंडी राहात आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास हरी आंर्दुलेकर हा शौचालयात जाण्यासाठी बाहेर आला असता, ही घटना उघडकीस आली. मूर्तिभंजकाने मोठ्या घणाच्या साहाय्याने मंदिराच्या बाजूला असलेल्या पिंडीची तोडफोड करण्यासाठी प्रहार केलेल्या आवाजानेच त्याला जाग आली. यावेळी मोडतोड करून जाताना एक व्यक्तीला पाहिल्याचा दावा हरी आंर्दुलेकर यांनी केला आहे. "त्या व्यक्तीने पांढरा व काळी हाफ पॅंट घातल्याचे आंर्दुलेकर यांनी सांगितले.
पोलिसांनी यावेळी श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञाची मदत घेतली. मात्र त्याचा अधिक उपयोग झाला नाही. याठिकाणी कोणतेही ठसे मिळाले नसल्याचे, ठसे तज्ज्ञांनी सांगितले.
घटनास्थळी पाहणी करण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, गुन्हा अन्वेषण विभागाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणारे पोलिस अधीक्षक वामन तारी, उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर, उपअधीक्षक सेमी तावारीस, पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त तसेच अन्य पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे मंदिरांतील मुर्तींची मोडतोड करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास स्थापन करण्यात आलेल्या पथकानेही याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
शिवसेना ः या प्रकरणातील समाजकंटकांना त्वरित अटक करावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली आहे. राज्यात मूर्ती तोडफोड सत्र सुरूच असून आरोपींना अटक करण्यास राज्य प्रशासनाला अपयश आल्याची टीका यावेळी उप राज्यप्रमुख नामदेव नाईक यांनी केली. यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख दामू नाईक, पणजी शहर प्रमुख श्रीकृष्ण वेळुस्कर, मंदिर सुरक्षा समितीचे केपे तालुका अध्यक्ष आनंद प्रभुदेसाई, ऍड. नरेश च्यारी व समीर च्यारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

एटीएसकडून शारीरिक छळ : प्रज्ञा

मालेगावच्या बॉम्बस्फोटात महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) अटक केल्यानंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या जय वंदे मातरमच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज नाशिकच्या न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
मालेगाच्या बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा यांना केवळ त्यांच्या नावावर रजिस्टर असलेल्या मोटारसायकलच्या आधारे पकडण्यात आले आहे. स्फोटांच्या ठिकाणी जी मोटारसायकल आढळून आली, ती साध्वींच्या नावावर होती. परंतु, ही मोटारसायकल त्यांनी २००४ सालीच मनोज शर्मा नावाच्या इसमास २४ हजार रुपयांना विकली होती, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले असून, कोठडीत आपल्याला एटीएसकडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोपही साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे.
आपल्याला मारहाण केल्यानंतर रुग्णालयातही भरती करण्यात आल्याचे साध्वींनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, ज्यावेळी मालेगाव येथे स्फोट झाला, त्यावेळी आपण इंदूर येथे होतो आणि आपल्याला वकिलाशी सल्लामसलत करण्याचीही संधी देण्यात आली नाही, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
साध्वी प्रज्ञा यांचे वडील डॉ. चंद्रपालसिंग यांनी नुकतीच रेडिफ डॉट कॉम या वेबसाईटला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी आपली मुलगी प्रज्ञा निर्दोष असल्याचे म्हटले होते. साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिज्ञापत्रात मोटारसायकलबाबत जी बाब नोंदविली आहे, त्याची माहिती डॉ. सिंग यांनी या मुलाखतीत दिली होती.
साध्वी प्रज्ञा यांचा अपघात झाल्यानंतर तिला ती मोटारसायकल नको होती. त्यावेळी तिने ती विकण्याची इच्छा व्यक्त केली होती. अपघाताच्यावेळी गाडीची कागदपत्रे हरविली होती. त्यावेळी गाडीची किंमत ४४ हजार रुपये होती. परंतु, विकताना ती गाडी मनोज शर्मा याला केवळ २४ हजार रुपयांत विकली होती. त्यानंतर मनोज शर्मा याच्या ताब्यात असतानाच ती गाडी चोरीला गेली होती. त्याने चोरीची तक्रारही केली नाही आणि साध्वी प्रज्ञा यांना त्याबाबत माहितीही दिली नाही. तक्रार का दिली नाही, असे मनोज शर्मा याला विचारले असता, मोटारसायकल माझ्या नावाने नसल्यामुळे मी तक्रार दिली नाही, असे उत्तर त्याने दिल्याचे डॉ. चंद्रपालसिंग यांनी मुलाखतीत स्पष्ट केले होते.
माझ्या मुलीने साध्वी व्हावे यासाठी मीच तिला प्रोत्साहन दिले होते आणि साध्वी झाल्यापासून ती घरीही आली नाही. ती निर्दोष आहे. ती बॉम्बस्फोट करून माणसे मारण्याचे पाप करूच शकत नाही, असेही डॉ. सिंग यांनी म्हटले होते.

समझौता एक्स्प्रेसमध्ये आरडीएक्स नव्हतेच, महाराष्ट्र एटीएसचे घूमजाव

मुंबई, दि.१७ : समझौता एक्स्प्रेसमध्ये गेल्यावर्षी जो स्फोट झाला होता, त्यात ले.कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी पुरविलेल्या आरडीएक्सचा वापर करण्यात आला नव्हता, असे सांगत महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) घूमजाव केले आहे.
समझौता एक्स्प्रेसमध्ये आरडीएक्सचा वापरच झाला नव्हता असा अहवाल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दिल्यानंतर आता एटीएसला आपले आधीचे बयाण बदलणे भाग पडले असून, या प्रकारामुळे एटीएसच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
मालेगावच्या बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेले ल. कर्नल श्रीकांत पुरोहित यांनीच समझौता एक्स्प्रेसमधील स्फोटासाठी आरडीएक्स पुरविले होते, असा आरोप एटीएसने यापूर्वी केला होता. आता आरडीएक्सचा वापरच झाला नसल्याचे स्वत: एटीएसनेच म्हटले आहे. यावरून याप्रकरणात काही काळेबेरे तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.
मीडियालाच दोष
आपले पितळ उघडे पडल्यावर आता एटीएसने मीडियालाचे दोष देणे सुरू केले आहे. समझौता एक्स्पेसमधील स्फोटात पुरोहित यांनी चोरलेल्या आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता असा दावा एटीएसचे वकील अजय मिश्रा यांनी शनिवारी नाशिकच्या न्यायालयात केला होता. आता एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे म्हणतात की, एटीएसच्या बयाणाचे वृत्त योग्यरित्या देण्यात आले नाही. त्याचा विपर्यास करण्यात आला होता.
एटीएसच्या या घूमजावमुळे आता संपूर्ण तपास कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नार्को चाचणी झाली असता त्यांनी ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांचे नाव घेतल्याचा दावा करीत एटीएसने पुरोहित यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांच्यावर आरडीएक्स पुरविल्याचा आरोपही केला होता. सुरुवातीला पुरोहित यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. १५ ला त्यांना पुन्हा नाशिकच्या न्यायालयात हजर करून आरडीएक्स पुरविल्याचा आरोप ठेवत एटीएसने पोलिस कोठडीची मुदत वाढवून मागितली होती. त्याप्रमाणे पुरोहित यांना १८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेशही झाले होते.
परंतु, ज्या आधारावर एटीएसने पोलिस कोठडी मागितली होती, तो आधार स्वत:चा एटीएसने गमावला आहे. आरडीएक्सचा वापरच झाला नसल्याचे एटीएसनेच स्पष्ट केल्याने संपूर्ण तपासकार्यच अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.
समझौता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटात आरडीएक्सचा वापर करण्यात आला नव्हता असा खुलासा केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा आणि न्यायसहायक प्रयोगशाळांसोबतच हरयाणा पोलिसांनीही दिल्याने एटीएसचे संपूर्ण तपासकार्य संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

कचराप्रश्नी शाळांना नोटिसा पाठविणे निषेधार्ह : पर्रीकर

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेवर मोर्चा नेऊन महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्या टेबलावर कचरा टाकण्याल्याप्रकरणी महापालिका व विद्यालय व्यवस्थापन यांच्यात तोडगा निघाला असताना आता अचानक शिक्षण खात्याकडून व्यवस्थापनांना नोटिसा पाठवण्याची कृती निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या कृती समर्थनीय नसली तरी हे पाऊल त्यांना का उचलावे लागले यामागचा हेतू स्पष्ट असून हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे,असे ते म्हणाले. आज येथे भाजप मुख्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
गेली दीड वर्षे कचऱ्याच्या असह्य दुर्गंधीमुळे या विद्यार्थांना शाळेत बसणे महाकठीण बनले होते. महापालिकेकडे वारंवार याबाबत पत्रव्यवहार व चर्चा करूनही काहीही होत नाही, यामुळेच त्यांची सहनशीलता संपली व त्यांना हा निषेध मार्ग स्वीकारावा लागला. कचऱ्याच्या समस्येबाबत महापालिकेला पूर्ण दोष देता येणार नाही. राज्य सरकारकडून महापालिकेला सहकार्यच मिळत नसल्याने त्यांची ही अवस्था झाली आहे. गेल्या विधानसभेत कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी खास कृती समिती स्थापन करण्यात आली होती व भाजपने या समितीला पूर्ण पाठिंबा दिला होता. या समितीच्या बैठका झाल्या नाहीच; परंतु कचरा प्रकल्पासाठी जागा शोधण्यासाठीही सरकारकडे वेळ नसल्याने हा विषय लटकत राहिल्याचे ते म्हणाले.
दरम्यान,याप्रकरणी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. लोकांना सतावणाऱ्या गोष्टींवर तात्काळ तोडगा न काढता जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने टोकाची भूमिका घेणे लोकांना भाग पडत आहे,असे पर्रीकर म्हणाले.
पाणीटंचाईला खातेच जबाबदार
पणजी व आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईच्या समस्येला सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केली. पाणीपुरवण्याबाबत बांधकाम खाते,जलसंसाधन खाते व वीज खाते यांच्यात समन्वय हवा. तो अजिबात दिसत नाही. कदंब पठारावर जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू करताना त्याची पूर्वकल्पना खुद्द स्थानिक आमदार किंवा जनतेला देण्यात आली नाही. सामान्य लोकांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विषयांबाबत सरकार अजिबात गंभीर नसल्यानेच ही स्थिती ओढवल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग कारवाईची मागणी करणार, विद्यापीठप्रकरणी सभागृहाची दिशाभूल: पर्रीकर

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी): गोवा विद्यापीठाचे केंद्रीय विद्यापीठात रूपांतर करण्यासंबंधी गेल्या विधानसभेत भाजपाने उपस्थित केलेल्या मुद्यावर शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षाबरोबर सर्व संबंधितांना विश्वासात घेण्याचे ठोस आश्वासन दिले होते. या प्रकरणी मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार मुख्यमंत्री कामत यांनी केंद्राच्या या प्रस्तावासंदर्भात हे आश्वासन देण्यापूर्वीच मान्यता दिल्याचे उघड झाले असून त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली असल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग कारवाईची मागणी सभापती प्रतापसिंग राणे यांच्याकडे करण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे दिली. आज येथे भाजप मुख्यालयात ते पत्रपरिषदेते बोलत होते.
गोवा विद्यापीठाचे केंद्रीय विद्यापीठात रूपांतर करणे राज्यासाठी हिताचे नसल्याने यासंदर्भात तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून केंद्राने निश्चित केलेल्या यादीतून गोव्याचे नाव वगळावे,असा ठराव संमत करून तो केंद्राला पाठवावा,अशी मागणीही पर्रीकर यांनी केली. कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनीही हा विषय हाती घेतला होता व त्यांनी यासंबंधी सरकारला पाठवलेला निर्णयही योग्य होता परंतु त्यांच्याच सरकारने केंद्राच्या या प्रस्तावाला मान्यता देऊन त्यांनाच तोंडघशी पाडले,असा टोलाही पर्रीकरांनी हाणला.
मुख्यमंत्री कामत यांनी गेल्या विधानसभेत केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचा खुलासा करून ही मान्यता मागे घेण्यात येईल,असे आश्वासन त्यांना देता आले असते; परंतु त्यांनी याबाबत सर्वांना अंधारात ठेवून विरोधी पक्ष तथा संबंधितांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याचे आश्वासन सभागृहात देऊन टाकले. मुळात याविषयी विरोधी पक्षाबरोबर सरकारने कसलीच चर्चा केली नाही.गोवा विद्यापीठाची निर्मिती ही सभागृहाने तयार केलेल्या कायद्याप्रमाणे झाली आहे. त्यामुळे विधानसभेत मान्यता दिल्याशिवाय गोवा विद्यापीठाचे रूपांतर केंद्रीय विद्यापीठात करणे शक्य नाही,असे पर्रीकर यांनी निदर्शनाला आणून दिले.
नागरिक मंचाची स्थापना
गोवा विद्यापीठाबरोबर राज्याच्या एकूण शैक्षणिक सुधारणांबाबत कार्य करण्यासाठी "सिटिझन्स काऊन्सिल
फॉर एज्युकेशन रिफॉर्मस' या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्या निमंत्रक सौ. निर्मला सावंत यांनी ही माहिती दिली. गोव्याचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी विद्यापीठाची स्थापना झाली आहे. या विद्यापीठाचे रूपांतर केंद्रीय विद्यापीठात झाल्यास त्यामागील मूळ उद्देशच बाजूला नष्ट होर्ईल,असे त्या म्हणाल्या.
या विषयावर महत्त्वाची माहिती देताना गोवा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.जयंत बुडकुले यांनी गोवा विद्यापीठाचे रूपांतर केंद्रीय विद्यापीठात होणे गोव्याला का परवडणार नाही,याबाबत विस्तृत उहापोह केला.
सध्या राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण विद्यापीठात घेता येते. एकदा हा या विद्यापीठाचे केंद्रीय विद्यापीठात रूपांतर झाले की प्रवेशासाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागेल. तेथे पात्र ठरल्यानंतरच विद्यापीठात प्रवेश मिळेल,अशी माहिती त्यांनी दिली.सध्या विद्यापीठातील ९० टक्के जागा स्थानिकांसाठी उपलब्ध आहेत व केवळ १० टक्के जागा इतरांसाठी आहेत. केंद्रीय विद्यापीठ झाल्यास हे आरक्षण लागू होणार नसून गोव्यातील विद्यार्थीच येथे पोरके होतील, अशी भीती डॉ.बुडकुलेंनी व्यक्त केली. सरकारने कोणताही विचार न करता केंद्राच्या या प्रस्तावाला संमती दिली असली तरी आता मंत्रिमंडळाची खास बैठक तथा विशेष अधिवेशन बोलावून या यादीतून गोव्याचे नाव वगळण्याचा ठराव संमत करून तो केंद्राकडे पाठवावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. गोवा विद्यापीठाचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवून वेगळे केंद्रीय विद्यापीठ दक्षिण गोव्यात उभे राहिल्यास त्यास कुणाचीही हरकत घेण्याचे कारण नाही,असे स्पष्टीकरणही यावेळी करण्यात आले.

पाळीत भाजपला जबर पाठिंबा

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी): गोव्याचे वाटोळे करण्यास पुढे सरसावलेल्या कॉंग्रेस सरकारच्या नेत्यांनी पाळी मतदारसंघातील लोकांवर कितीही आश्वासनांची खैरात केली किंवा विकासाचे खोटे गाजर पुढे केले तरी तेथील मतदार त्यांना अजिबात थारा देणार नाहीत,असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे उतरवण्यात आलेले युवा नेते डॉ.प्रमोद सावंत यांना या मतदारसंघात भरघोस प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करून पाळीवासीय विद्यमान सरकाराविरोधातील आपला रोष जाहीररीत्या प्रकट करतील, असा ठाम विश्वास पर्रीकर यांनी व्यक्त केला. आज येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपने शिस्तीत व नियोजनबद्ध प्रचार सुरू केला आहे. ठिकठिकाणी डॉ.प्रमोद सावंत यांना लोकांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. भाजपच्या पूर्वीच्या आमदारांबाबत या मतदारसंघात जो कार्यकर्त्यांत असंतोष पसरला होता त्यामुळे अनेकांनी पक्षापासून फारकत घेतली होती. डॉ.प्रमोद सावंत यांच्या रूपाने युवा व तडफदार उमेदवार यावेळी पक्षातर्फे रिंगणात उतरवण्यात आल्याने कार्यकर्त्यांत नवा उत्साह व जोष पसरला असून सगळेजण मोठ्या निर्धाराने कामाला लागले आहेत,असे पर्रीकर म्हणाले.
विद्यमान सरकारचे सर्व पातळीवर अपयश व प्रशासकीय गलथानपणामुळे सामान्य लोकांची होणारी फरफट यामुळे लोक कॉंग्रेस राजवटीला विटले असून या लोकांचे मोठे पाठबळ यावेळी भाजपला मिळत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री विविध ठिकाणी भाषणांतून पाळी मतदारसंघासाठी करीत असलेल्या घोषणा आणि आश्वासने ही पोकळ भाषणबाजी असल्याचा ठाम विश्वास लोकांना असल्याने कुणीही याकडे गांभीर्याने पाहत नाही,अशी खिल्लीही पर्रीकर यांनी उडवली.
अनुसूचित जमातींवर
कॉंग्रेसचा नेहमीच अन्याय

राज्यात बहुसंख्य असलेल्या अनुसूचित जमातीला आरक्षणाचा अधिकारच मुळी भाजप सरकारने दिला,असे पर्रीकर म्हणाले. केवळ अंतर्गत तडजोडीसाठी मडकईकर यांचे मंत्रिपद काढून आता त्यांना आश्वासनांवर झुलवत ठेवून कॉंग्रेसकडून या घटकाची चेष्टा सुरू असल्याचे पर्रीकर म्हणाले. आता पाळी पोटनिवडणुकीनंतर मडकईकर यांना मंत्रिपद देणार अशी आवई उठवली जात असली तरी त्यासाठी मंत्रिमंडळातून कोणाला काढणार,याचा खुलासा कॉंग्रेस नेत्यांनी पाळीतील जनतेसमोर करावा,असे ते म्हणाले. कॉंग्रेस सरकारने या घटकासाठी आरक्षित असलेल्या सुमारे १७०० सरकारी जागा भरण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. काही जागा सर्वसामान्य विभागात घुसडवून या लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मडकईकरांनी कॉंग्रेस सरकारात क्रीडामंत्री असताना गोवा क्रीडा प्राधिकरणात पदांची भरती करताना अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागा का नाही भरल्या याचे उत्तर त्यांनी आपल्या समाज बांधवांना द्यावे,असे आवाहनही पर्रीकरांनी केले. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास ही सर्व पदे खास मोहीम राबवून या समाजातील लोकांतून भरली जातील,असे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्यात पावसाच्या सरी

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): राज्याच्या बऱ्याच भागात आज दुपारपासून अचानकपणे पावसाने हजेरी लावल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात पावसाच्या सरी कोसळल्याचे पणजी वेधशाळेचे प्रमुख के.व्ही. सिंग यांनी सांगितले. बंगालच्या खाडीत चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्याच्या प्रभावाने हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.
गोवा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. येत्या चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस व गडगडाट होण्याची शक्यता श्री.सिंग यांनी व्यक्त केली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना या पावसाच्या शिडकाव्याने चांगलाच दिलासा मिळाला. हवेत सुखद गारवा जाणवत होता.

Monday 17 November, 2008

दोन विमानांच्या धडकेने हवाई वाहतूक कोलमडली


वास्को, दि. १६ (प्रतिनिधी) - पर्यटन मोसमाच्या निमित्ताने विदेशी पर्यटकांना घेऊन आलेल्या "ट्रान्झिओर' या विमानाला आज दाबोळी विमानतळावर दोनदा अपघातास सामोरे जावे लागले. सकाळी ८ वा. ३०६ पर्यटकांना घेऊन गोव्यात आलेल्या या विमानावर पक्षी आपटल्याने प्रथम या विमानात तांत्रिक बिघाड झाला, तर त्यानंतर उड्डाणासाठी तयार झालेल्या या विमानाला थॉमस कूकच्या चार्टर विमानाची धडक बसल्याने दोन्ही विमानांची हानी झाली. शिवाय त्यामुळे विमान वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला.
ट्रान्झिओर ७४७ हे विमान आज सकाळी उतरत असताना त्यावर पक्षी आपटला. त्यामुळे विमानात बिघाड होऊनही ते धाडसाने विमानतळावर सुखरुप उतरवले. या विमानाची दुरुस्ती होईपर्यंत दुपारचे १.१० वाजले. मग ३०६ पर्यटकांना घेऊन जाण्याच्या तयारीत असताना त्याला थॉमस कूकच्या ३२० या चार्टर विमानाने पार्किंग वे मध्ये विमान लावत असताना धडक दिली. ट्रान्झिओरचे इंजिन बंद असल्याने यावेळी मोठी दुर्घटना टळली. ही माहिती ट्रान्झिओरचे स्टेशन मास्टर हरपालसिंह यांनी "गोवादूत'शी बोलताना दिली. धडक दिलेले विमान जमशेदपूरहून आले होते. या अपघातात दोन्ही विमानांचे मोठे नुकसान झाले.
या अपघातामुळे वेळ वाया जाणार हे लक्षात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ट्रान्झिओरमध्ये असणारे काही प्रवासी हे मॉस्कोला जाणारे होते. त्या सर्वांची सोय रॅडिसन कंट्री इन या हॉटेलात करण्यात आली आहे.

आरडीएक्सचा वापर झाला नसल्याचे सिद्ध

कर्नल पुरोहितांवरील आरोप खोटे

मुंबई एटीएस संशयाच्या घेऱ्यात

नवी दिल्ली/मुुंबई, दि. १६ - भारत आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये आरडीएक्सचा कोणताही वापर करण्यात आला नव्हता, असा खुलासा केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा आणि न्यायसहायक प्रयोगशाळांसोबतच हरयाणा पोलिसांनीही केल्यामुळे, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावर मुंबई एटीएसने आरडीएक्स संदर्भात लावलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाची बाब अशी की, मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना ही वस्तुस्थिती माहीत असतानाही, पुरोहित यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये आरडीएक्सचा वापर केल्याची चक्क खोटी माहिती नाशिक न्यायालयाला देऊन त्यांची आणखी चार दिवसांची कोठडी मिळविल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हरयाणाचे पोलिस उपमहानिरीक्षक (गुन्हे) आर. सी. मिश्रा यांनी काल याप्रकरणी खुलासा करताना सांगितले की, समझौेता एक्सप्रेसमध्ये ज्या घातक स्फोटकांचा वापर करण्यात आला, त्यात आरडीएक्सचा वापर झाल्याचे कोठेही आढळून आले नाही. या स्फोटात पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर यांचे मिश्रण असलेले बॉम्ब तयार करण्यात आले होते आणि ते सहा सूटकेसमध्ये दडवण्यात आले होते. या बॉम्बसोबतच केरोसीनने भरलेल्या बाटल्याही ठेवण्यात आल्या होत्या. या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर गाडीला आग लागावी, हाच त्यांचा उद्देश होता आणि तो सफलही झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ६७ जण आगीत होरपळून मरण पावले होते. त्यात काही पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश होता.''
एनएसजीचा खुलासा
समझौता एक्सप्रेसमधील स्फोटात कोणती स्फोटके वापरण्यात आली, याचे सूक्ष्म परीक्षण राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (नॅशनल सिक्युरिटी गार्डस्) न्यायसहायक प्रयोगशाळेत करण्यात आले होते. तसेच केंद्रीय न्यायसहायक प्रयोगशाळेतही परीक्षण करण्यात आले होते. पण, या दोन्ही महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांनी स्फोटात आरडीएक्सचा वापर करण्यात आला नाही, असा स्पष्ट अहवाल दिला होता.
एनएसजीची प्रयोगशाळा ही अतिशय अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे आणि त्यांचा अहवाल हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. असे असताना सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचे अहवाल डावलून मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी पुरोहित यांच्यावर खोटे आरोप तर लावलेच, सोबतच न्यायालयालाही खोटी माहिती देऊन न्यायालयाचा अवमान केल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.
काल पुरोहित यांना न्यायालयात उपस्थित करून एटीएसने पुरोहित यांची पोलिस कोठडी मागितली. एटीएसचे वकील अजय मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, समझौता एक्सप्रेसमधील स्फोटाच्या कटात पुरोहित यांचा सहभाग असून, त्यात ६० किलो आरडीएक्स वापरले गेल्याची माहिती आमच्याकडे आहे आणि त्याचा तपास करण्यासाठी पुरोहित यांची आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी आम्हाला हवी आहे.
मिश्रा यांच्या या आरोपाला पुरोहित यांचे वकील अविनाश भिडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, एटीएसने जे काही म्हटले आहे त्यात पुरोहित यांचा कोणताही सहभाग असल्याचे म्हटलेले नाही. आम्ही ही बाब आरोपपत्र जेव्हा दाखल होईल, त्यावेळी कोर्टाच्या लक्षात आणून देणार आहोत.
नागौरीची नार्को टेस्ट
समझौता एक्सप्रेसमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी सिमीचा प्रमुख सफदर नागौरी याने आपल्या नार्को चाचणीत स्पष्टपणे म्हटले होते की, समझौता एक्सप्रेसमधील स्फोटात वापरले गेलेले बॉम्ब आम्हीच तयार केले होते आणि त्यासाठी पाकिस्तानातील आमच्या काही सहकाऱ्यांची मदतही घेतली होती. नागौरी याने या कटात सहभागी असलेल्या अब्दुल रज्जाक आणि मिसबुल यांचीही नावे घेतली होती आणि त्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असेही चाचणीच्या वेळी सांगितले होते. यापैकी एकाचे नातेवाईक पाकिस्तानात राहत असून तो अनेकदा पाकिस्तानात गेला होता, असेही नागौरीने म्हटले होते. हेमंत करकरे यांना या सर्व घटनाक्रमाची पूर्ण माहिती होती. तरीसुद्धा त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये आरडीएक्सचा वापर झाल्याचा दावा केल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांसह राज्यातील अन्य तपास यंत्रणाही बुचकळ्यात पडल्या आहेत. कारण, करकरे यांनी एनएसजी, केंद्रीय न्यायसहायक प्रयोगशाळा, हरयाणा पोलिस, सीबीआय या साऱ्याच तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह लावले आहे, अशी चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

आधी कचरा हटवा; मग नोटिसा पाठवा

शिक्षक, पालकांतून संतप्त प्रतिक्रिया
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - शिक्षण खात्याने विद्यालयाच्या व्यवस्थापनांना नोटिसा पाठवण्याचा पराक्रम न करता, विद्यार्थ्यांना कचऱ्यामुळे वर्गांत सोसाव्या लागणाऱ्या असह्य दुर्गंधीपासून मुक्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी आणि पालकांनी व्यक्त केली आहे.
"विद्यार्थ्यांनी त्या दिवशी माझ्या टेबलवर कचरा ओतल्याबद्दल शिक्षकांनी दिलगीरी व्यक्त केली होती. तथापि, शिक्षण खात्याने त्यांना ज्या नोटिसा बजावल्याप्रकरणी आपणास काहीही म्हणायचे नाही' असे प्रतिक्रिया महापौर टोनी रॉड्रिगीस म्हणाले.
दीड वर्षापासून कचऱ्याची असह्य दुर्गंधी सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही दिवसापूर्वी पणजी महापौरांच्या खुर्चीवर आणि टेबलावर कचरा ओतून निषेध व संताप व्यक्त केला होता. त्यावेळी महापालिकेने तडकाफडकी दुपारी शिक्षकांची आणि पालिकेची बैठक बोलावून त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा घडवून आणली होती. त्याप्रमाणे महापौरांच्या खुर्चीवर आणि टेबलावर कचरा ओतल्यानंतर शिक्षकांनी खेद व्यक्त केल्याने महापालिकेने व शिक्षकांनी हा विषय तेथेच संपवला होता. मात्र आता सरकारने शिक्षण खात्यामार्फत विद्यालय व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावून शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर दबाव आणल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कचऱ्याची दुर्गंधी होत असलेल्या प्रश्नाला बगल देण्यासाठी महापौरांच्या खुर्चीवर आणि टेबलावर कचरा टाकलेल्या विषयाचे भांडवल करून सरकार राजकारण करू पाहात आहे, अशी प्रतिक्रिया आज काहींनी "गोवादूत'शी संर्पक साधून व्यक्त केली.
मळा परिसरात मेरी इमॅक्युलेट, के.बी. हेडगेवार, पीपल्स हायस्कूल, मुष्टिफंड प्राथमिक विद्यालय व सेव्हंथ डे ऍडव्हांटेजीस या पाच विद्यालयांत सुमारे ६ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षापासून त्यांना कचऱ्याच्या दुर्गंधीने हैराण करून सोडले आहे. पणजी पालिकेने प्रायोगिक तत्वावर मळा येथे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारला होता. मात्र तो प्रकल्प अपयशी ठरल्याल्याने तेथे असह्य दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. यासंदर्भात महापालिका, शिक्षण खाते तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. विद्यार्थ्यांना दुर्गंधीपासून मुक्त करण्यासाठी कोणतीही पावले उचलेलण्यात आली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग अवलंबून महापौरांच्या टेबलावर आणि खुर्चीवर कचरा ओतून प्रशासनाला जाग आणली होती.

"हे तर जखमेवर मीठ'
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शिक्षण खाते करत असून विद्यार्थ्यांना कचराप्रश्नावर पाठिंबा देण्याचे सोडून ंव्यवस्थापनांना नोटिसा काढून त्यांची छळणूक केली जात असल्याचा आरोप गोवा पीपल्स फोरम व मदर अर्थ या संघटनांनी केला आहे. शिक्षण खात्याने कचरा प्रश्न सोडवण्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे या प्रश्नांवर विद्यालयाने नोटिसा बजावण्याचा कोणताही नैतिक अधिकार या खात्याला नसल्याची टीका या संघटनांचे निमंत्रक ऍड. सतीश सोनक व अनिल केरकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलेले असून महापौरांच्या खुर्चीवर आणि टेबलावर कचरा टाकल्याने सरकारने त्यासाठी विद्यार्थ्यांना "शौर्य पुरस्कार' द्यायला हवा, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. शिक्षण खात्याने दीड वर्षे विद्यार्थ्यांच्या आरोग्य बाबतीत कोणतीही काळजी घेतली नसल्याने खात्याच्या विरोधात बाल आयुक्तालयात तक्रार दाखल केली जाणार असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

अपहृत जहाजाची सुटका

१८ भारतीय सुखरूप
मुंबई, दि. १६ - सोमालियातील समुद्री चाच्यांनी अदनच्या खाडीत १५ सप्टेंबर रोजी अपहरण केलेले भारतीय मालवाहू जहाज एम.टी.स्टॉल्ट वेलरची रविवारी सकाळी सुटका करण्यात आली असून जहाजावर असलेल्या १८ भारतीयांसह २२ सदस्य सुखरूप असल्याची माहिती राष्ट्रीय समुद्रगमन संघटनेने (एनयूएसआय) दिली.
सुटका झालेले भारतीय नाविक मुंबई येथे परतणार असून त्यांची प्रकृतीही चांगली असल्याचे एनयूएसआयचे अध्यक्ष अब्दुल गनी यांनी सांगितले. त्यांनी सुटकेसंदर्भात विस्तृत माहिती मिळाली नसली तरी भारतीय वेळेनुसार सकाळी ८ वाजता जहाजाची सुटका झाली. सुटकेसाठी खंडणीची रक्कमही दिली असण्याची शक्यता आहे. परंतु नेमकी किती रक्कम दिली याबाबत काहीच माहिती नसल्याचे ते म्हणाले. गनी यांनी भारतीय नौदलाचे आभार मानले. व नौदलाच्या कार्याची स्तुती करतानाच ते जहाजाला धोकादायक क्षेत्रातून सुखरूप परत घेऊन येथील असा विश्वास व्यक्त केला.
अपहरणकर्त्यांनी रविवारी सकाळी जहाजाला मुक्त केल्याची आपल्याला सरकारतर्फे माहिती देण्यात आली असे जहाजाचे कॅप्टन प्रभात गोयल यांच्या पत्नी सीमा गोयल यांनी सांगितले. येत्या चार-पाच दिवसांत १८ भारतीय मायदेशात पोहोचतील. सुटकेसाठी खंडणी देण्यात आली काय असे विचारले असता यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सीमा म्हणाल्या.
जपानी कंपनीच्या मालकीचे आणि मुंबईच्या फ्लीट मेरिन लिमिटेडच्या व्यवस्थापनात मालवाहू जहाज स्टॉल्ट वेलरचे संचालन केले जातेे. गेल्या १५ सप्टेंबर रोजी सोमालियातील सशस्त्र समुद्री चाच्यांनी जहाजाचे अपहरण केले होते. त्याचप्रमाणे चालक दलातील सदस्यांच्या सुटकेसाठी ६० लाख अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली होती. नंतर खंडणीत घट करून ती २५ लाख डॉलर्स करण्यात आली होती.

भाजपतर्फे आता अडवाणी टीव्ही

नवी दिल्ली, दि. १६ - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाले असून मतदारांशी सरळ संपर्क साधण्यासाठी, अमेरिकाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती बराक ओबामा यांच्याप्रमाणे, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी अडवाणी टीव्ही सुरु केला जाणार आहे.
अमेरिकेतील राष्ट्रपतींच्या निवडणुकीदरम्यान ओबामा यांच्याप्रमाणे भाजप अडवाणींच्या प्रत्येक कार्यक्रमाचे सरळ प्रसारण करण्याची व्यवस्था करणार आहे. भाजपचे आय.टी.प्रकोष्ठचे मुख्य प्रद्युत बोरा यांनी सांगितले की हे आयपीटीव्हीचे युग असून अडवाणींच्या प्रचार कार्यक्रमाचे सरळ प्रसारण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांचा उपयोग करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यामुळे लोक घरी आरामात बसून अडवाणी यांचे सर्व कार्यक्रम पाहू शकतील.

झेरॉक्स दुकान खाक दोन लाखांचे नुकसान

मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी) : काल उत्तररात्री येथील पोलिस स्टेशन समोरील एका गाड्याला लागलेल्या आगीत झेरॉक्स मशीन व अन्य सामान मिळून साधारण दोन लाखांचे नुकसान झाले. आगीच्या कारणाचा तपास जारी आहे.
पोलिसस्टेशनमधील कॅंटीन समोरील सदर गाड्यातून येत असलेला धूर कुणीतरी उत्तररात्री १-२० वा. च्या सुमारास पाहिला, पोलिसांना व अग्निशामक दलाला सतर्क केले त्यांनी येऊन ती आग विझविली. गाड्याचे मालक प्रवीण सुतार यांनाही तोपर्यंत पाचारण करण्यात आले होते. दुकानातील संपूर्ण सामग्री व सामान आगीत खाक झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

Sunday 16 November, 2008

विहिंपचे देशव्यापी आंदोलन सुरू

हिंदूंना द्वेषपूर्ण वर्तणुकीचा केंद्रावर आरोप
मुंबई, दि. १५ ः केंद्र सरकार व काही राज्य सरकारे हिंदूंच्या संदर्भात द्वेषपूर्ण वर्तणूक करीत असल्याचा आरोप करीत विश्व हिंदू परिषदेने याविरुद्ध देशभर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे.
विहिंपचे केंद्रीय सहमंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी आज पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, हे आंदोलन सुमारे महिनाभर चालेल. यात निदर्शने, धरणे, वाहनांची रॅली, ईमेल मोहीम, एसएमएस मोहीम, यज्ञ-याग, महिलांद्वारे हवन आदींचा समावेश आहे.
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला फाशीची शिक्षा ठोठावून सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नाही. याउलट, मालेगावच्या प्रकरणात मात्र एका साध्वीला हेतुपूर्वक गुंतविले जात आहे आणि लष्कराच्या अधिका-यांना जेलमध्ये टाकले जात आहे आणि हे सारे हिंदुद्वेषातूनच केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
साध्वी आणि इतर काही आरोपींच्या अटकेच्या संदर्भात कायदे धाब्यावर बसविले गेले, असा आरोप करताना आबदेव म्हणाले की, कुठल्याही आरोपीला चोवीस तासांत न्यायाधीशापुढे उभे करण्याचा नियम डावलून या लोकांना अनेक दिवस बेकायदेशीरपणे पोलिसांनी ताब्यात ठेवले. हा गुन्हा आहे आणि याविरुद्ध आम्ही न्यायालयात, तसेच मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार आहोत.
साध्वी प्रज्ञाशी विहिंपचा संबंध काय, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, तसा प्रत्यक्ष संबंध नाही. परंतु, संबंध असण्यापेक्षा हिंदूंवर अन्याय केला जात आहे, हे महत्त्वाचे. आणि, त्याविरुद्ध विहिंप लढा देणार आहे.
केंद्रातील संपुआ सरकार आता स्वत:च दहशतवादाचे समर्थक बनत चालले आहे, असा आरोप करून आबदेव म्हणाले की, दहशतवादापायी बदनाम झालेल्या मुस्लिमांचे समर्थन, त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करणे यातून सरकार स्वत:च बदनामीच्या घेऱ्यात फसत चालले आहे.

पणजीतील पाणीपुरवठा काही प्रमाणात सुरळीत

आज आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा
पणजी, दि.१५ (प्रतिनिधी) - पणजी व परिसरातील पाणी टंचाईमुळे येथील लोकांचा चढलेला पारा व सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना हा प्रश्न युद्धपातळीवर सोडवण्याचे आदेश दिल्यानंतर उतरला. परिणामी आज बहुतेक भागांत काही अंशी पाणीपुरवठा सुरू झाला,अशी माहिती जनमानसाचा कानोसा घेतला असता मिळाली. जुने गोवे येथील कदंब पठारावर जलवाहिनी बदलण्यात आल्याने सुरुवातीस काही भागात गढूळ पाणीपुरवठा झाला; परंतु नंतर सर्व टाक्या साफ केल्याने संध्याकाळपर्यंत स्वच्छ पाणी पुरवण्यात आल्याची माहिती पणजी विभागाचे कार्यकारी अभियंता के.आर.श्रीकांत यांनी "गोवादूत'कडे बोलताना दिली.
पणजी व परिसरातील काही भागांत गेल्या कित्येक दिवसांपासून पाणीटंचाईचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे. मुळात ही टंचाई कशामुळे निर्माण होते याचा खुलासा देण्यातच अधिकारी अपयशी ठरत असल्याने नक्की ही समस्या निर्माण होण्यामागचे खरे कारण अद्याप स्पष्ट होत नाही. जुने गोवे येथील कदंब पठारावर ८५० मीटर लांब ७ एमएमची जलवाहिनी बदलण्याचे काम काही कारणांस्तव लांबल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले. जुने गोवे बगल मार्गाला जोडूनच ओपा खांडेपार येथून पणजीसाठी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकली आहे. या या महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने ही जलवाहिनी बाजूला हटविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
दरम्यान,सांतइनेज चर्चसमोरील भागांत काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने या भागातील लोकांना टॅंकरव्दारे पाणी पुरवण्यात येत आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.आल्तिनो,बोक द व्हॉक,मेरशी,ताळगाव,सांताक्रुझ आदी भागात उद्यापर्यंत नियमित पाणीपुरवठा होणार अशी माहितीही त्यांनी दिली.

राज ठाकरे यांना अटक व सुटका

मुंबई, दि. १५ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात जमशेदपूर न्यायालयानेे अजामीनपात्र वॉरंट काढल्यावर राज यांनी न्यायालयात
शरणागती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याकरता ते माझगावला निघाले असतानाच त्यांना पोलिसांनी तांत्रिक अटक केली. दरम्यान, न्यायालयाने राज यांना ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला.
उत्तर भारतीय नेते छटपूजेचा उपयोग करुन महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. हे प्रकार थांबले पाहिजे, असे राज यांनी विक्रोळीच्या जाहीर सभेत सांगितले होते. त्या वक्तव्याच्या हवाल्याने जमशेदपूरमधील एका वकिलाने भावना दुखावल्याचे सांगत राजविरोधात खटला भरला होता. याबाबत नोटीस पाठवूनही राज सुनावणीसाठी जमशेदपूरच्या न्यायालयात हजर राहिले नाहीत. अखेर न्यायालयाने राजविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले. या वॉरंटवर बरेच दिवस कारवाई झाली नसल्याचे पाहून स्मरणपत्र पाठवण्यात आले. त्यानंतर राज यांना मुंबई पोलिसांनी आज अटक केली.
राज ठाकरे यांच्यावतीने याप्रकरणी माझगाव कोर्टात ट्रांझिट वॉरंटसाठी अर्ज करण्यात आला. मात्र कोर्टाने अर्ज फेटाळला. त्यानंतर जामिनासाठी अर्ज करण्यात आला. कोर्टाने जामीन मात्र मंजूर केला. जमशेदपूरमध्ये आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती राज ठाकरेंतर्फे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात व्यक्त केली. त्या आधारेच जामीन मंजूर झाला. त्यामुळे आता राज ठाकरे यांची रवानगी जमशेदपूरच्या न्यायालयाकडे होणार नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान , राज यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजताच माझगाव न्यायालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. राज यांना जामीन मिळाल्यावर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आनंदाने घोषणाबाजी करुन त्यांनी न्यायालयार्चा परिसरही दणाणून सोडला.

मडकईकर पुन्हा मंत्री होण्याचे स्पष्ट संकेत

मात्र बळी कोणाचा हे गुलदस्त्यातच
पणजी, दि.१५ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणूक पार पडताच अनुसूचित जमातीचे कॉंग्रेसचे एकमेव आमदार पांडुरंग मडकईकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल,असा ठोस आश्वासन दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाला देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मात्र, त्यांच्यासाठी मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. ती जबाबदारी श्रेष्ठींनी स्वतःकडे घेऊन या शिष्टमंडळाला निश्ंिचत मनाने गोव्यात परतण्याचा सल्ला दिला. शिष्टमंडळाचे एक सदस्य डॉ.काशिनाथ जल्मी यांनी दिल्लीतील या चर्चेला दुजोरा दिला.
सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकत असताना मडकईकर समर्थकांनी पुन्हा आपले घोडे पुढे दामटण्यास सुरुवात केली आहे. पाळी पोटनिवडणुकीत सेव्ह गोवा फ्रंट पक्षाला मान्यता मिळाल्याने चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड यांनी केलेले विलीनीकरण फोल ठरले आहे. त्यामुळे या दोघांची अपात्रता जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. पाळी पोटनिवडणुकीच्या काळात याबाबत सभापती निर्णय जाहीर करणार नाहीत हे उघडच आहे. त्यामुळे पाळी निवडणुकीनंतरच पुढील कार्यवाही केली जाईल,असे श्रेष्ठींनी सांगितल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. येत्या १५ दिवसांच्या आत मडकईकरांना मंत्रिपद दिले नाही तर कुंभारजुवे मतदारसंघातील अनुसूचित जमात पाळी पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरोधात काम करेल,असा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ही मुदत संपल्याने या नेत्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री कामत यांनी याबाबत लगेच या शिष्टमंडळाबरोबर दिल्ली येथे श्रेष्ठींची भेट घेण्याचे निश्चित केल्यानंतर काल दिल्लीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या शिष्टमंडळात पांडुरंग मडकईकर यांच्यासमवेत डॉ.काशिनाथ जल्मी,कांता गावडे व पाळी मतदारसंघातील अनुसूचित जमातीचे काही नेते हजर होते.
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रभारी बी.के.हरिप्रसाद यांची भेट झाली नसली तरी या शिष्टमंडळाने अहमद पटेल यांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे.सध्या पाळी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू असल्याने या काळात मंत्रिपदावर नेमणूक करणे शक्य होणार नसल्याने ही निवडणूक संपताच मडकईकर यांची वर्णी निश्चित झाल्याचा शब्द त्यांना श्रेष्ठींनी दिल्याचेही या शिष्टमंडळातील नेत्यांनी सांगितले.याप्रकरणी श्री.मडकईकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोंडा येथे "संभवामी युगे युगे' हे नाटक पाहण्यासाठी गेल्याने मोबाईलवर बोलणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

केसरबाई संगीत समारोहाचे थाटात उद्घाटन

पणजी, दि. १५ (सांस्कृतिक प्रतिनिधी)- कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात २८ व्या सुरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोहाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती तथा कला अकादमीचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे, उपाध्यक्ष जितेंद्र देशप्रभू, माजी उपाध्यक्ष परेश प्रभू, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, कार्य विभाग अधिकारी डॉ. गोविंद काळे, गायक डॉ. राजा काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व केसरबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारोहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात गोव्याचे सुपुत्र रवींद्र च्यारी यांचे सतारवादन झाले. पुरीया, धनश्री, आलाप तोड, गत आणि झाला राग यावेळी सादर करण्यात आले. त्यांना तबल्यावर उस्ताद फजल कुरेशी यांनी साथ दिली. यानंतर राजा काळे यांनी गायन सादर केले. त्यांनी शुद्ध कल्याण राग सादर केला. तबल्यावर तुळशीदास नावेलकर तर हार्मोनियमवर राया कोरगावकर, तानपुऱ्यावर त्यांची कन्या अमृता काळे व सुभाष परमार यांनी साथ दिली.
दुसऱ्या सत्रात, उद्या रविवार दि. १६ रोजी सकाळी १० वाजता रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन, पं. जगदीश प्रसाद यांचे गायन तर तिसऱ्या सत्रात संध्याकाळी ५ वाजता सराबोनी चौधरी यांचे गायन, मंगला भट यांचे नृत्य व निलाही कुमार यांचे सतारवादन होणार आहे.

केसरबाई संगीत समारोहाचे थाटात उद्घाटन

पणजी, दि. १५ (सांस्कृतिक प्रतिनिधी)- कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात २८ व्या सुरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोहाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती तथा कला अकादमीचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे, उपाध्यक्ष जितेंद्र देशप्रभू, माजी उपाध्यक्ष परेश प्रभू, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, कार्य विभाग अधिकारी डॉ. गोविंद काळे, गायक डॉ. राजा काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व केसरबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारोहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात गोव्याचे सुपुत्र रवींद्र च्यारी यांचे सतारवादन झाले. पुरीया, धनश्री, आलाप तोड, गत आणि झाला राग यावेळी सादर करण्यात आले. त्यांना तबल्यावर उस्ताद फजल कुरेशी यांनी साथ दिली. यानंतर राजा काळे यांनी गायन सादर केले. त्यांनी शुद्ध कल्याण राग सादर केला. तबल्यावर तुळशीदास नावेलकर तर हार्मोनियमवर राया कोरगावकर, तानपुऱ्यावर त्यांची कन्या अमृता काळे व सुभाष परमार यांनी साथ दिली.
दुसऱ्या सत्रात, उद्या रविवार दि. १६ रोजी सकाळी १० वाजता रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन, पं. जगदीश प्रसाद यांचे गायन तर तिसऱ्या सत्रात संध्याकाळी ५ वाजता सराबोनी चौधरी यांचे गायन, मंगला भट यांचे नृत्य व निलाही कुमार यांचे सतारवादन होणार आहे.