Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 29 November, 2008

'मिशन ओबेराय' पूर्ण, मृतांची संख्या १५५, चारशे जखमी ९३ देशीविदेशी पर्यटकांची सुटका

मुंबई, दि. २८ : दहशतवाद्यांनी मुंबईतील ओबेराय, ताज व नरिमन या इमारतींवर कब्जा मिळवून सुरू केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी ताजमध्ये दोघा दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले. यात चार पर्यटकांनाही आपला जीव गमवावा लागला. आजच्या कारवाईत एका लष्करी अधिकाऱ्यासह एक कमांडो शहीद झाला. दिवसभरात ताजमध्ये ७ ते ८ तर नरीमन हाऊसमध्ये ११ हातबॉम्ब दहशतवाद्यांकडून फोडण्यात आले.ताज व नरीमनमधील दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई "करो या मरो'अशीच ठरली. ही मोहिमही फत्ते झाली आहे. हॉटेल ओबेरायमध्ये दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या ९३ देशी-विदेशी पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. नरिमन हाऊसमधील कारवाई अजूनही सुरूच आहे. तीन दिवसांपासून कमांडो व दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या या नागरी "युद्धात' मृतांची संख्या १५५ च्या आसपास पोहोचली असून ४०० जण जखमी झाले आहेत.
ओबेरायवर एनजीएसने पूर्णपणे ताबा मिळविण्यात यश मिळविले आहे. गुरूवारी मध्यरात्रीनंतर शांत झालेल्या धुमश्चक्रीला आज शुक्रवारी दुपारनंतर वेग आला. ताजवर ताबा मिळविणाऱ्या दहशतवाद्यांनी खोल्यांमध्ये हातबॉम्ब फोडण्याचे सोडून बाहेर जमलेल्या गर्दीँवर फेकण्यास सुरूवात केली. बेछूट गोळीबारही केला. उत्तरादाखल आतमध्ये अतिशय योजनाबद्ध पद्धतीने शिरलेल्या कमांडोंनेही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. यामुळे संतापलेल्या दहशतवाद्यांनी हॉटेल बाहेर हातबॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. ताजमध्ये एकच दहशतवादी असून तो जखमी असल्याचे गुरूवारपासून सांगण्यात येत होते. त्याच्या पायात गोळी शिरल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. गुरूवारी रात्री ८ ते १२ या चार तासाच्या काळात दहशतवाद्यांनी कोणत्याही स्वरुपाचा आतंक माजविला नाही. त्यामुळे त्यांच्या जवळील शस्त्रसाठा संपला असून कमांडो ताजवर कब्जा मिळविण्यात यशस्वी होत असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, मध्यरात्री १२ च्या ठोक्याला दहशतवाद्यांकडून तुफानी गोळीबार झाल्याने पोलिसांसह वृत्तवाहिन्यांकडून करण्यात येत असलेले दावे फोल ठरले. नंतर रात्री १.३० च्या सुमारासही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या प्रकारामुळे ताजमध्ये खरोखरच जखमी झालेला एकच दहशतवादी आहे किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. पोलिसांमधील हा संभ्रम कायम होता. तीन दिवसांपासून एका सेकंदाचीही विश्रांती न घेता दहशतवादी हल्ला करीत असल्याने तीन दिवस पोलिसांनी चालविलेल्या "ऑपेरशन'नंतरही त्यांची संख्या एकाहून अधिक असल्याचे आता चर्चिले जाऊ लागले आहे.
हॉटेल ओबेरायमधील १७ कर्मचारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेल्याचे वृत्त आहे. यात हॉटेलचे जनरल मॅनेजर व त्याच्या परिवाराचाही समावेश आहे. बुधवारपासून दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या ओबेरायमध्ये आज तिसऱ्या दिवशीही ९३ देशी-विदेशी नागरीक ओलिस होते. पहाटेनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या गोपनीय शोध मोहिमेनंतर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नंतर कमांडोने अत्यंत शांततपणे समयसुचकता पाळून दहशतवाद्यांविरुद्ध लढा उभारला. यात दोन दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले. एका मागोमाग एक मजला आपल्या ताब्यात घेत कमांडोने दहशतवाद्यांचा खातमा करत ओबेरायवर ताबा मिळविला.
ओबेराय ताब्यात येताच हॉटेल ताज व नरिमन हाऊस येथील दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईला वेग देण्यात आला. ताजमध्ये अजून नेमके किती दहशतवादी आहेत, हे स्पष्ट झाले नसताना एकच दहशतवादी असून तो बॉलरूममध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते आहे. एकच दहशतवादी असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी त्याला ठार मारण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. दहशतवाद्याचा लवकरच खातमा करून पोलिस हॉटेल ताजवरही ताबा मिळवितील, असा विश्वास पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहे. गुरुवारी सायंकाळीसुद्धा अवघ्या एका तासात हॉटेल ताज दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त केले जाईल, असे जाहीरपणे सांगण्यात आले होते. मात्र, गुरुवारची संपूर्ण रात्र व शुक्रवारचा दिवस संपल्यानंतरही पोलिस ताजमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घालू शकले नव्हते.
नरीमन हाऊस येथे दहशतवाद्यांचा दोन दिवसांपासून सुरू असलेला आतंक आज तिसऱ्या दिवशीही त्याच पद्धतीने सुरू होता. उलट त्याला आज वेग मिळाला होता. हॉटेलच्या चारही बाजूंनी बेछूट गोळीबार केला जात होता. पोलिसांनीही हॉटेलला चारही बाजूंनी घेरून गोळीबार करीत आहेत. जमिनीवरून चौथ्या-पाचव्या मजल्यावर गोळीबार करणे श?य नसल्याने हेलिकॉप्टरच्या माध्यमाने नरीमन हाऊसवर कमांडो उतरविण्यात आले. खालून व वरून दोन्ही बाजूंनी दहशतवाद्यांवर पोलिसांचा गोळीबार करण्यात येत आहे. मात्र, दहशतवाद्यांकडूनही तेवढ्याच वेगाने हल्ले चढवण्यात येत असल्याने नरीमन हाऊस परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हॉटेलमधून पोलिसांवर हातबॉम्ब फेकण्यात येत असले तरी काही बॉम्ब हॉटेलमध्ये पेरून ठेवण्यात आले आहे. ज्या माजल्यावर दहशतवादी नाहीत, असे सांगितले जात आहे तेथेही हातबॉम्बचा स्फोट होऊ लागल्याने दहशतवादी नेमके कोणत्या मजल्यावर व खोलीमध्ये आहेत, याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. या प्रकारामुळे पोलिसांचे लक्ष वारंवार विचलित होत असल्याचे दिसून येते. हॉटेल ओबेरायवरील मोहीम फत्ते झाल्यानंतर नरिमन हाऊसमधील दहशतवाद्यांविरुद्धची कारवाईदेखील फत्ते झाल्याचे सांगण्यात आले. त्यात पाच ओलिसांना दहशतवाद्यांनी ठार केले तर एक कमांडो शहीद झाला. तसेच ताजमधील दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईने विलक्षण वेग घेतला आहे.
अफवांमुळे आणखी दहशत
हॉटेल ताज, हॉटेल ओबेराय व नरीमन हाऊस येथे एकाचवेळी पोलिस व दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक सुरू असताना शहरात काही ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले चढविल्याच्या घटनेने प्रचंड दहशत पसरली.
दुपारी चर्च गेट व मेट्रो जवळ कारमध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी, तसेच सीएसटी स्थानकावरही लोकांवर बेछूट गोळीबार केल्याची अफवा पसरली. यामुळे लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले. गोळीबार होत असल्याचे शब्द कानी पडताच लोकांमध्ये पळापळ झाली. ताज, ओबेराय व नरिमन समोर असलेली पोलिसांचे काही पथक चर्च गेट व मेट्रोच्या आणि सीएसटीच्या दिशेने रवाना करण्यात आली. परंतु, ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
-----------------------------------------------------------
...आणि वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबवले
या कथित गोळीबाराचे वृत्त वाहिन्यांवर झळकताच काही मिनिटांतच सरकारने सर्व वृत्त वाहिन्यांचे प्रक्षेपण थांबविले. त्यामुळे अर्धा तासपर्यंत कोणालाही बातम्या पाहता आल्या नाहीत. नंतर या वाहिन्या पुन्हा सुरू झाल्या, त्या उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे, अफवांवर विश्वास ठेवू नका, हे आवाहन करीतच. दरम्यानच्या काळात श्री. पाटील यांनी पत्रपरिषद घेऊन या दहशतीमागे पाकिस्तानचाच हात असून त्यासंदर्भात ठोस पुरावे हाती लागल्याची माहिती दिली. तथापि, त्याचा तपशील आणखी दोन दिवसांनी उघड केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या या छोटेखानी पत्रपरिषदेची सांगता केली ती "भारतमाता की जय' या घोषणेने.

पाळीचा कौल आज, सकाळी अकरापर्यंत निकाल अपेक्षित

पणजी,दि. २८ (प्रतिनिधी): पाळी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या २९ रोजी सकाळी ८ वाजता कांपालच्या गोवा गृहविज्ञान महाविद्यालयात सुरू होणार असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत विजयी उमेदवाराची घोषणा होईल,अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाला पाळी मतदारसंघातील मतदारांनी विक्रमी प्रतिसाद दिला. ८०.९२ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांनी आपले माप नक्की कुणाच्या पारड्यात टाकले याचा उलगडा उद्या मतमोजणीनंतर होणार आहे. या निकालाबाबत केवळ पाळी मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत, सत्ताधारी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस, अपक्ष डॉ.सुरेश आमोणकर यांच्यातच प्रामुख्याने ही लढत झाली.
या मतदारसंघातील एकूण २२७३० मतदारांपैकी १८३९२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ९७३० पुरुष तर ८६६२ महिला मतदारांचा सहभाग आहे. सत्तरीचे युवा नेते तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस यांच्यासाठी अहोरात्र काम केल्याने ही जागा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. साखळी व हरवळे मिळून एकूण ७ हजार मते आहेत. हरवळे हा भाग भाजप समर्थकांचा आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी कॉंग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मतदारांना फसवण्याचे प्रयत्न केल्याची तक्रार हरवळेवासीयांनी केली होती. हरवळेचे पंच यशवंत माडकर यांचे बंधू शिवदास माडकर याने या गावातील युवकांना हाताशी धरून एकूण ८२ मतदारांची ओळखपत्रे तपासून देतो,असे सांगून पळवली,अशी माहितीही देण्यात आली आहे.
तीनही प्रमुख उमेदवारांसह सेव्ह गोवा फ्रंटचे जुझेे लोबो व एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.भाजपच्या नेत्यांनी पाळी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला होता. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही या मतदारसंघाचा दौरा करून विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या गलथान कारभाराचा समाचार घेतला होता. राज्यात विविध ठिकाणी घडणारे प्रकार व प्रशासनातील फरफट याचा खरोखरच पाळी मतदारांवर काही परिणाम झाला आहे का, हेही उद्याच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असल्याने त्यांना ही जागा पुन्हा मिळवण्याची जास्त संधी असली तरी भाजपच्या प्रचाराचा धडाका व एकूण कॉंग्रेस आघाडी सरकारच्या अपयशाचा परिणाम येथील मतदारांवर झाल्यास तेथे कॉंग्रेसच्या दृष्टीने वेगळाच निकाल लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ओळख पटवल्याखेरीज कोणाला खोल्या देऊ नये हॉटेल्सना जिल्हाधिकाऱ्यांचा सक्त आदेश

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): मुंबई येथील दोन पंचतारांकित हॉटेलांत दहशतवाद्यांनी थैमान घातले आहे. तथापि, असे असले तरी गोव्याला नेहमीप्रमाणे नववर्ष साजरे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देणार असून खबरदारीचा उपाय म्हणून "ओळख पटल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला किंवा पाहुण्याला खोली उपलब्ध करून देऊ नका', अशा सक्तीचा आदेश आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. तो ३० नोव्हेंबर ते २८ जानेवारी ०९ पर्यत लागू असेल.
मुंबईत सुरू असलेल्या रक्तरंजित नाट्यातील दहशतवादी हे हॉटेल ताजमध्ये काही दिवसापूर्वी येऊन राहिल्याचे उघड झाल्याने आणि यापूर्वी दोन दहशतवाद्यांनी गोव्यातील एका लॉजमधे थांबून काही जागेची टेहळणी केल्याचे यापूर्वी उघड झाल्याने यावेळी प्रशासनाने हा मुद्दा गांर्भींयाने घेतला आहे. "उत्तर गोव्यातील सर्व हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाउस, धार्मिक संस्थांची पेइंग गेस्ट हाऊसचे मालक व व्यवस्थापनांनी कोणत्याही व्यक्तीची पाहुण्याची ओळख पटल्याशिवाय आत प्रवेश देऊ नये, असे आदेशात म्हटले आहे.
तसेच पर्यटक किंवा पाहुणे म्हणून राहण्यास येणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिस यंत्रणेला तपासणीसाठी उपलब्ध करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, मुंबईत दहशतवाद्यांनी विदेशी पर्यटकांना लक्ष केल्याने गोव्यातही पर्यटनस्थळी आणि सागरी पट्ट्यात सुरक्षेचे कडक उपाय योजण्यात आले आहेत.

सुरक्षेची ऐशीतैशी, 'कडक बंदोबस्त' ही निव्वळ धूळफेक, फक्त दहा रुपयांसाठी राज्याची सुरक्षा पणाला!

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई हे महानगर दहशतवाद्यांनी वेठीला धरल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सुरक्षा कडक करण्यात आल्याची फुशारकी व दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार करण्यास येथील सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याचा टेंभा येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी तथा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कितीही मिरवत असले तरी हा केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी सुरक्षा व्यवस्थेबाबत करण्यात आलेल्या खास पाहणीत तसेच हाती घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार पोलिस खात्यात बोकाळलेला भ्रष्टाचार गोव्याच्या मुळावर येण्याची दाट शक्यता आहे. हा प्रदेश केवळ दहा रुपयांसाठी दहशतवाद्यांच्या विळख्यात सापडू शकतो व बेचिराखही होऊ शकतो एवढी दारुण परिस्थिती येथे सुरू आहे. सुरक्षेचे सर्व ते उपाय योजण्यात आल्याचे छातीठोकपणे सांगणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी व पुढारी यांना खरोखरच या प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आहे की ते मुद्दामहून गेंड्याची कातडी पांघरून जनतेच्या जिवाशी खेळ करीत आहेत, हे कळायला कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राज्यातील सुरक्षेच्या उपायांची जंत्री दासर केली आहे. मात्र त्यावर जनतेने कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न वेगळा. प्रत्यक्षात स्थितीची पाहणी केल्यास काहीही ठीक नाही, हे उघड झाले आहे. केवळ पोकळ वक्तव्ये न करता कागदोपत्री आखण्यात आलेल्या योजना प्रत्यक्षात उतरत आहेत का, याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने सरकारचा गाफीलपणा कायम राहिल्यास मुंबईसारखी गोव्यातही परिस्थिती ओढवण्यास अजिबात वेळ लागणार नाही.
गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाईल, असे ठामपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता प्रत्यक्षात गोव्यातील काही तपासनाक्यांची पाहणी केल्याअंती उघड झालेली माहिती केवळ धक्कादायकच नव्हे तर आपली सुरक्षा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांकडूनच केवळ दहा रुपयाच्या नोटीसाठी सुरू असलेली शर्यत आपल्या जिवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलिसांच्या तोंडावर फक्त दहा रुपयांची नोट फेकून कुणीही बिनधास्तपणे राज्यात प्रवेश करू शकतो व त्याची कोणताही तपास किंवा वाहनाजवळ जाण्याची तसदीही कुणी घेत नाही, अशी माहिती उघड झाली आहे. त्यात पत्रादेवी, न्हयबाग तसेच अस्नोडा येथेच पोलिस, अबकारी, रस्ता वाहतूक आदींचे तपासनाक्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तेरेखोल व किरणपाणी मार्गेही गोव्यात फेरीबोटच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात इतर राज्यातील वाहने येत असल्याने त्यासाठी कोणतीही तपासयंत्रणा नसल्याचे उघड झाले आहे. दोडामार्गहून थेट नागझरमार्गे गोव्यात आल्यास शिवोलीमार्गे शहरात कोणत्याही अडथळ्याविना पोहचता येते. तपासनाक्यावर पोलिसांकडून होत असलेल्या हयगयीचा हा प्रकार मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी लक्षात आणून दिला असता त्यांनी दोन्ही जिल्हा अधीक्षकांवर त्याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले होते.
पैशांपुढे सुरक्षेला ठेंगा!
पत्रादेवी व न्हयबाग येथील तपासनाक्यावर सुरू असलेल्या प्रकारांची सखोल माहिती मिळवली असता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. पैशांच्या लालसेपोटी राज्याच्या सुरक्षेला काडीमात्र किंमत नसल्याचे प्रकार तेथे सर्रास सुरू असल्याचे उघड झाले आहे. पत्रादेवी व न्हयबाग येथील तपासनाक्यावर एकूण चार पोलिस हजर असतात. त्यात एक हवालदार व तीन शिपायांचा समावेश असतो. या कर्मचाऱ्यांना सतत आठ दिवस येथे ड्यूटी करावी लागते. पेडणे पोलिस स्थानकाअंतर्गत हे तपासनाके येत असल्याने प्रत्येक पोलिस शिपायाला तीन महिन्यात इथे ड्यूटी करण्याची संधी मिळते. या तपासनाक्यावरून गोव्यात प्रवेश करणाऱ्या ट्रक,टेंपो,रिक्षा किंवा इतर मालवाहतुकीसाठी दहा रुपये दर निश्चित झाला आहे. ही दहा रुपयांची नोट अमूक एका ठिकाणी ठेवल्यास त्यांची कोणतीही तपासणी केली जात नाही. इतर राज्यांतील खाजगी वाहने व भाड्याची वाहने यांच्याकडून ५० रुपये आकारले जातात, त्यात काही वाहनांत अतिरिक्त प्रवासी असल्यास २०० ते २५० रुपये घेतले जात असल्याचीही माहिती मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकदा तेथे प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रकार पाहिला होता व त्यानंतर काही प्रमाणात त्यांचा वचकही निर्माण झाला होता. मात्र हे तपासनाके तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वरकमाईची साधने असल्याने त्यांच्या आशीर्वादानेच हे प्रकार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. हीच परिस्थिती न्हयबाग येथील सातार्डा पुलाकडील तपासनाक्यावर आहे. पत्रादेवी तपासनाक्यावर या आठ दिवसात सुमारे २० हजार तर न्हयबाग येथे सुमारे १२०० रुपयांची कमाई होते. यापैकी ३ ते ४ हजार रुपये पोलिस स्थानकाच्या प्रमुखांना जातात, १० टक्के उपअधीक्षक, १० टक्के गुन्हा विभाग व उर्वरित पैसे ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांत आपापसात वाटले जातात. हे पैसे लपवून ठेवण्यासाठीही खास जागा निश्चित केलेली असतेअन्यथा याठिकाणी ड्यूटीवर असलेल्या गृहरक्षकाचा खिसा हीच या कमाईची तिजोरी बनवली जाते. या तपासनाक्यावरील पोलिसांकडे सामानाची किंवा शस्त्रांची तपासणी करण्याच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. गोवा-मुंबई बसवाहतूक करणाऱ्या गाड्यांकडून प्रत्येकी शंभर रुपये आकारले जातात व त्यांना बिनदिक्कत येता-जाता येते असेही उघड झाले आहे. सुरक्षा व राज्याचा महसूल या दृष्टीने उभारण्यात आलेले हे तपासनाके पोलिस,अबकारी व रस्ता वाहतूक खात्यांसाठी चरण्याची कुरणेच बनल्याचे सर्वज्ञात असूनही सरकार त्याबाबत काहीही करू शकत नाही, यावरूनच जनतेच्या सुरक्षेची किती काळजी विद्यमान सरकारला आहे, हे उघड झाले आहे.

दहशतवादाशी 'लढू शकणाऱ्या' पक्षाला निवडा : वाजपेयी

नवी दिल्ली, दि. २८ : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामान्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले असल्यामुळे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी आज आपली नाराजी प्रकट केली आहे. दहशतवादाला समूळ उखडून फेकण्याची ताकद असलेल्या सरकारला सत्तेवर बसविण्याचे आवाहन आज दिल्लीकरांना त्यांनी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या निमित्ताने दिल्लीतील लोकांना दिलेल्या संदेशात, दहशतवादी घटना आणि गुन्हेगारीमुळे सर्वसाधारण लोकांमधे असुरक्षेची भावना असल्याचे वाजपेयींनी म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या व सामान्य लोकांच्या प्रति त्यांनी आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या आहेत. ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाबद्दल माझ्या तीव्र भावना आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीकरांना सध्या महागाई, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, वीज आणि पाण्याची टंचाई, रहदारीची कोंडी, प्रदूषण आदी समस्यांचा सामना करावा लागतो आहे. हे कमी म्हणून की काय, गुन्हेगारी आणि दहशतवादाची यात भर पडली आहे.
कॉंग्रेस सरकारवर टीका करताना कॉंग्रेसने अराजकाची स्थिती निर्माण केली आहे असे ते म्हणाले. नवीन सुरुवात करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे व चांगले आयुष्य जगता येण्यासाठी लोकांनी भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

Friday 28 November, 2008

मुंबईत दहशतकायम, अतिरेकी पाकिस्तानचे, १२५ ठार २८७ जखमी धुमश्चक्री सुरूच

मुंबई, दि. २७ : मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेऊन दहशतवाद्यांनी बुधवारी रात्रीपासून सुरू केलेले बॉम्बहल्ले व अंदाधुंद गोळीबार आज दुसऱ्या दिवशीही कायम होता. आतापर्यंत दहशतवाद्यांनी १२५ जणांचा बळी घेतला आहे. त्यातील सहा विदेशी नागरिक व चौदा पोलिस आहेत. २८७ लोक जखमी झाले आहेत. सात दहशतवाद्यांचा मुडदा पाडण्यात, तर १० जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील ९ जण संशयित आहेत. संपूर्ण दक्षिण मुंबईच दहशतवाद्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. परदेशातील नव्हे तर भारतातीलच दहशतवादी संघटनांनी दहशतवाद पसरविण्यासाठी मुंबईला प्रमुख केंद्र बनविले असल्याचे चित्र निर्माण करण्याचे या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत फोल ठरला आहे. मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेली चकमक पाकिस्तानी दहशतवाद्यांकडूनच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत दहशत माजविण्यासाठी दहशतवाद्यांनी २० ते २५ वयोगटातील मुस्लिम युवकांची निवड केली आहे. मुंबईसह देशभरात दहशत माजविण्यासाठी दहशतवाद्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाच्या गुप्तचर यंत्रणेला आव्हान देत अतिशय योजनाबद्ध रितीने मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रवेश केला. एकाचवेळी दहा ते पंधरा वेगवेगळी पथके तयार करून दहशतवाद्यांनी हे कारस्थान घडवून आणले आहेत. प्रारंभी हैदराबाद येथील डेक्कन मुजाहीद्दिन संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगण्यात आले. परंतु,
दहशतवादी पाकिस्तानातील असल्याचे स्पष्ट झाले असताना अजूनर्यंत पाकिस्तानातील कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
देशी-विदेशी लोकांचे मुख्य केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईला दहशतवाद्यांनी आपले लक्ष बनविले. या भागातील हॉटेल ओबेराय, हॉटेल ताज, लिओपार्ड रेस्टो-बारसह छत्रपती शिवाजी टर्मिनस, विलेपार्ले, डॉकयार्ड रोड, कामा हॉस्पिटल, जी. टी. हॉस्पिटल, हॉटेल सेंटॉर, नरीमन हाऊस, छाबरा हाऊस येथे रात्री ९ ते १० या वेळात दहशतवाद्यांनी हल्ले करण्यास सुरूवात केली.
तुफानी गोळीबार करीत हॉटेल ताज, हॉटेल ओबेराय आपल्या ताब्यात घेणाऱ्या दहशतवाद्यांनी बुधवारी रात्रीपासून चालविलेला आतंक आज दुसऱ्यादिवशीही कायम होता. पंधरा मिनिट ते अर्ध्या तासाच्या फरकाने दहशतवादी हातबॉम्ब व गोळीबार करून पोलिस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, "वेट ऍन्ड वॉच' ही भूमिका पोलिस यंत्रणेने स्वीकारल्याने दहशतवाद्यांकडून ह?े सुरूच होते.
ताजच्या प्रत्येक माळ्यावर मृतदेह!
दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री ९.१५ च्या सुमारास हॉटेल ताजमध्ये बेछूट गोळीबार करीत हॉटेलवर ताबा मिळविला. देशी-विदेशी नागरिकांनी ओलीस बनवून दहशतवाद्यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविला होता. यासाठी दहशतवाद्यांनी थोड्याथोड्यावेळाने एका-एकास शहीद करण्यास सुरूवात केली होती. २० मजली उंच असलेल्या ताज इंटरनॅशनलमध्ये ८०० खोल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर एक ते दोन मृतदेह असे दृश्य असून सर्वत्र रक्तांचा सडा पडलेला आहे. हॉटेल्समधून जखमींना बाहेर काढताना एका मागे एक रुग्णवाहिका तयार ठेवण्यात येत होती. गोळीबार किंवा हातबॉम्बचा स्फोट होताच एक किंवा दोघांना रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात हलविण्यात येत होते. हॉटेल ताजपासून अंदाजे २५० ते ३०० फुटापर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली होती. हीच स्थिती हॉटेल्स ओबेराय, नरीमन हाऊस आणि छाबरा हाऊसमध्ये होती. चारही बाजुंनीे चेहरा दिसावा एवढी चकाकणारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स दोन दिवसांपासून रक्ताने माखलेली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
चार खासदारही ओलीस
ॉटेल ताजमध्ये दहशतवादी घुसले त्यावेळी चार खासदार हॉटेलमध्ये होते. यात बीडचे खा. जयसिंगराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्राबाहेरील नेत्यांचा समावेश आहे. त्यांना दीड तासपर्यंत ओलिस धरून ठेवण्यात आले होते. पण पोलिसांनी त्यांना मागच्या दाराने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. एका महत्वाच्या बैठकीसाठी हे खासदार एकत्रित आले होते. बैठकीनंतर काही खासदार निघून गेलेत. हे चार खासदारही थोड्या वेळाने बाहेर पडणार होते. परंतु, त्याचवेळी दहशतवाद्यांनी आतमध्ये प्रवेश केला.
गोळीबार, हातबॉम्ब व आगडोंब
हॉटेल ताज व हॉटेल ओबेराय ताब्यात घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी वारंवार गोळीबार करीत आहेत. हात बॉम्ब फोडून आतंक माजविण्यात येत आहे. तर आतमध्ये आग लावून अत्याधुनिक शस्त्रांनी स?ा झालेल्या पोलिस यंत्रणेचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सकाळी ११ च्या सुमारास ताजच्या वरच्या मजल्यावरील खोलीत आग लावण्यात आली. नंतर दिवसभरात सात ते आठवेळा आग लावली गेली. सायंकाळी ५ च्या सुमारास चौथ्या माळ्यावर आग लावून दहशतवाद्यांनी दहशत माजविली. परंतु, ओलीसांना सुरक्षित बाहेर काढून अतिरेक्यांना अटक करणे किंवा त्यांना ठार करण्याची तयारी पोलिसांनी केल्याने दहशतवाद्यांकडून वारंवार पसरविण्यात येणारी दहशत अपयशी ठरल्यागत दिसत होती.

त्यांनी अनुभवला साक्षात मृत्यू! मुंबईतील रेल्वे प्रवासी गोव्यात दाखल

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): मुंबईतील काल रात्रींचे महाभयानक स्फोट व अतिरेकी हल्ल्यांमुळे विलंब झालेली कोकण रेल्वेची गाडी आज तब्बल दोन तास उशिरा म्हणजे दुपारी १२-३० ऐवजी अडीच वाजता येथे दाखल झाली व आतील प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
ही गाडी सुटतानाच साधारणतः सीटीएसवर बॉंबस्फोटांचा धमाका उडाला व त्यानंतर एकच धावपळ उडाली होती. त्या गडबडीत बरेच प्रवासी अडकून पडले. काही जण मिळेल त्या डब्यात घुसून नंतर आपापल्या डव्यात परतले. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याही परिस्थितीत गाडीला संपूर्ण सुरक्षा पुरवून गाडी मुंबईबाहेर काढली व नंतरच प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. काहींनी आज येथे उतरल्यावर हा आपला पुनर्जन्म असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. एकाने तर आपण साक्षात मृत्युचे दर्शन घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, महानगरातील स्थिती सुधारली नसल्याने त्याचा परिणाम येथून तिकडे निघणाऱ्या बसेसवर झालेला दिसून आला. येथील रेल्वे स्टेशनवर खबरदारीखातर जरी मेटल डिटेक्टर जरी बसविलेले असले तरी सीसीटीव्ही बसवण्याची योजना धूळ खात पडलेली असल्याने सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी दिसून येत आहेत.
पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी आज दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलांचे चालक व व्यवस्थापक यांची तातडीची बैठक घेतली व हॉटेलांकडून सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याबद्दल त्यांना समज दिली. मडगाव पोलिसांनी कालच्या मुंबईतील घटनांची गंभीर दखल घेताना बाजारातील आपली गस्त तसेच महामार्गांंवर अनोळखी वाहनांची कसून झडती घेण्याचे काम पूर्ववत सुरू केले.

दवर्ली पंचायत सचिवास लांच प्रकरणी सक्तमजुरी

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी लांचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दोषी ठरवलेला दवर्ली दिकरपाल पंचायतीचा तत्कालीन पंचायत सचिव अतुल नायक याला आज १ वर्ष सक्त मजुरी व वीस हजार रु. दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास त्याला आणखी एक महिना सक्तमजुरीची शिक्षा फर्मावण्यात आली आहे. त्याला गेल्या १३ रोजी त्यांनी दोषी ठरवण्यात आले होते. २००१-२००२ मध्ये हा लांच घेण्याचा प्रकार घडला होता.
न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यानुसार नावेली येथील एका बांधकाम कंपनीचे व्यवस्थापक सूरज डिसोझा यांच्याकडे आरोपीने सदर पंचायत क्षेत्रात उभ्या राहाणार असलेल्या "रोजा मिस्किता अपार्टमेंट' नामक प्रकल्पाला वास्तव्य दाखला देण्यासाठी १५ हजार रु.ची लांच मागितली होती. शेवटी तो १० हजारांपर्यंत तडजोड करण्यास तयार झाला होता.
तथापि, आपल्या प्रकल्पाचे सर्व दस्तेवज व्यवस्थित असताना आपण लांच कशाला द्यावयाची असा प्रश्र्न पडलेल्या सूरज यांनी गुन्हा अन्वेषणाकडे तक्रार केली होती. त्यांनुसार आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचून पोलिसांनी अतुल याला मुद्देमालासह पकडले होते. या प्रकरणी १३ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक लवू मामलेकर व नंतर चंद्रकांत साळगावकर यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.

गोव्यातही कडेकोट बंदोबस्त

- गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी
- शिपयार्ड व नौसेनेच्या जहाजांची किनारी भागांत नजर
- 'इफ्फी' परिसर व महोत्सव हॉटेलांसाठी खास सुरक्षा
- दाबोळी विमानतळावर 'सीआरपीएफ'ची करडी नजर

पणजी, दि.२७ (प्रतिनिधी) : मुंबईत दहशतवाद्यांनी घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विदेशी लोकांना लक्ष्य बनवण्याचा दहशतवाद्यांचा मुख्य हेतू असल्याने व गोवा हे पर्यटनस्थळ असून येथे विदेशी पर्यटकांची प्रचंड वर्दळ असल्याने मुख्य पर्यटनस्थळे तसेच सप्त व पंच तारांकित हॉटेलांनाही सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
आज आल्तिनो येथील आपल्या सरकारी निवासस्थानी पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव जे.पी.सिंग,पोलिस महासंचालक ए. एस. ब्रार व पोलिस महानिरीक्षक किशनकुमार हजर होते. मुख्यमंत्री कामत यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर सुरक्षे आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलावली. यावेळी गृहमंत्री रवी नाईक व मुख्य सचिव जे.पी.सिंग हजर होते. संध्याकाळी विमानतळ प्राधिकरण व किनारारक्षक दलाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.
गोव्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे आदेश तपासनाक्यावरील पोलिसांना देण्यात आले आहेत. उत्तर व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना त्यासंबंधी स्वतः लक्ष देण्याचेही सुचवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली. गोव्यात येणाऱ्या रेलगाड्यांचीही तपासणी होणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाशीही संपर्क साधण्यात आला असून विमानतळावरील सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा अवलंब केल्याने व गोव्यात किनारी भाग येत असल्याने किनारा रक्षक दल, नौसेना यांना सतर्क करण्यात आले आहे. किनारा रक्षक व गोवा शिपयार्ड यांच्याकडून दोन जहाजांची सोय करण्यात आली आहे. ही जहाजे मांडवी व जुवारी नदीतील वाहतुकीवर नजर ठेवणार आहेत. तसेच कांदोळी ते बागा या किनारी पट्ट्यावरही त्यांचे लक्ष असेल.
दक्षिण गोवा व खास करून वास्को, हार्बर आदी भागांची जबाबदारी नौसेना सांभाळेल.
गोवा पोलिस दल व सध्या "इफ्फी'निमित्त बोलावण्यात आलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या येथील परिस्थिती हाताळण्यास समर्थ असल्याचे पोलिस महासंचालक ब्रार यांनी सांगितले.राज्यात सध्या फक्त एकमेव बॉम्ब निकामी करणारे पथक आहे व दुसऱ्या पथकाचे प्रशिक्षण सुरू आहे,असे मुख्य सचिव श्री.सिंग म्हणाले. सागरी पोलिस विभागात सध्या एकूण ६५ ते ७० पोलिस कर्मचारी काम करतात. गोवा शिपयार्डकडे सध्या १२ टेहळणी नौका तयार करण्याचे काम सुरू असून येत्या मे महिन्यात या नौका या दलाच्या स्वाधीन केल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गोव्याला दहशतवादी हल्ल्याचा धोका वगैरे आहे का किंवा त्यासंबंधी गुप्तचर विभागाकडून काही संकेत मिळाले आहेत का,असा सवाल केला असता मुख्यमंत्री कामत यांनी तशी निश्चित काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.गृहमंत्री रवी नाईक यांनी मात्र गुप्तचर यंत्रणेकडून यासंबंधात माहिती देण्यात आल्याचे सांगितले परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ती माहिती उघड करणे शक्य नसल्याचे सांगितले.दरम्यान, सुरक्षेसाठी लोकांना काहीप्रमाणात गैरसोय सहन करावी लागणार असल्याने त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
मुख्यमंत्री कामत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संवाद साधून त्यांना संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेधही त्यांनी यावेळी केला. या संवादावेळी मुख्यमंत्री देशमुख यांनी मुंबईत दहशतवाद्यांनी सागरी मार्गाचा अवलंब केल्याच्या प्रकाराची जाणीव करून दिली. गोवा सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असून सागरी मार्गावर कडक टेहळणी करण्याची सूचना त्यांनी केल्याची माहितीही मुख्यमंत्री कामत यांनी दिली.
'इफ्फी'ला खास सुरक्षा
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर "इफ्फी' खास सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. कला अकादमी, आयनॉक्स, मॅकनिज पॅलेस तसेच सिदाद दी गोवा व हॉटेल मेरियाट यांनाही खास सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली. "इफ्फी' निमित्त विविध प्रतिनिधी गोव्यात आले असून त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, "इफ्फी' कार्यक्रमांत मात्र कोणताही बदल होणार नसल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचे निधन

नवी दिल्ली, दि. २७ : माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे गुरूवारी दुपारी अपोलो रूग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेली काही वर्षे ते किडनी तसेच हृदयविकारामुळे आजारी होते.
कॉंग्रेसच्या मदतीशिवाय स्थापन झालेल्या केंद्र सरकारमध्ये व्ही.पी.सिंग यांच्या सरकारचे नाव घ्यावे लागेल. दोन डिसेंबर १९८९ रोजी त्यांनी देशाचे दहावे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली होती. ओबीसी आरक्षण अंमलात आणत असल्याच्या घोषणेनंतर देशाचा राजकारणाचा चेहरा पालटला. मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने १० नोव्हेंबर १९९० रोजी अवघ्या एका वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना पंतप्रधानापदावरून पायउतार व्हावे लागले हेाते.
दरम्यान, व्ही.पी.सिंग यांना गेली अनेक वर्षे जडलेल्या किडनीच्या विकारामुळे वारंवार डायलिसीस करून घ्यावे लागत होते. तथापि, जीवघेणा आजार असूनही ते सतत कार्यरत होते. या वयातही देशभर प्रवास करीत असत.

पे पार्किंगचे दर निश्चित

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेत घडलेल्या पार्किंग घोटाळ्यानंतर आता महापालिकेतर्फे रीतसर पार्किंग शुल्क आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त मेल्विन वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार पणजी शहर तसेच मांडवी पूल, या ठिकाणी पार्किंगसाठी निश्चित केलेली मोकळी जागा,सेंट मोनीका जेटीसमोरील जागा आदी ठिकाणचे दर अधिसूचित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे व्हिक्टर ग्रासियस व प्रसाद नाईक यांची अधिकृत पार्किंग शुल्क आकारणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. पार्किंगसाठी निश्चित केलेल्या दरांवर उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहेत. वरील ठिकाणी पार्क करण्यात येणारे दर असे:सहाचाकी वाहन - प्रति दिवस १०० रुपये, अर्धा दिवस ५० रुपये, मिनी बस,टेंपो- ७० रुपये प्रति दिवस, ३५ रुपये अर्धा दिवस, चारचाकी व रिक्षा-१० रुपये प्रति दिवस व ५ रुपये अर्धा दिवस, दुचाकीसाठी ५ रुपये प्रति दिवस.

Thursday 27 November, 2008

पाळीत ८१ टक्के मतदान

पणजी, डिचोली,दि.२६(प्रतिनिधी): पाळी मतदारसंघ पोटनिवडणूकीत आज मतदारांनी दाखवलेल्या उत्फुर्त प्रतिसादामुळे विक्रमी ८०.५० टक्के मतदानाची नोंद झाल्याने मतदारांनी आपला कल नक्की कुणाच्या पदरात टाकला आहे, याबाबत जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. कॉंग्रेस, भाजप तथा अपक्ष उमेदवार डॉ.आमोणकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे खरा परंतु येथील मतदारांनी नक्की कुणाला पसंती दिली आहे, याबाबत कमालीची गुप्तता राखली असून मतदारांच्या या मौनाबाबत या पोटनिवडणूकीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.
पाळी मतदारसंघ पोटनिवडणूक मतदानाला आज सकाळी ८.३० वाजता सुरूवात झाली. अत्यंत शांत व कोणत्याही अनुचित प्रकाराविना मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारांनी विविध मतदान केंद्रांवर गर्दी केल्याने संध्याकाळपर्यंत मतदारांचा हा रेटा सुरूच होता. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या २२७३० असून त्यातील बहुतांश १८२१७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आज झालेल्या मतदानात ९५७१ पुरूष तर ८६४६ महिला मतदारांनी भाग घेतला. घाडीवाडा- सुर्ला येथील मतदान केंद्र क्रमांक १८ वर सर्वांत जास्त ८८.६५ टक्के तर साखळी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्र क्रमांक १ वर सर्वांत कमी ६९.३६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अरविंद बुगडे यांनी दिली.
काही ठिकाणी दोन मतदानकेंद्रांचे एका मतदान केंद्रात रूपांतर करण्यात आल्याने मतदारांची गर्दी झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. साखळी प्रोग्रेस हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजता बरीच गर्दी झाली दिसत होती.साखळीतील भांडारवाडा व सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रांवर मोठ्याप्रमाणात अल्पसंख्यांक मतदारांची गर्दी स्पष्टपणे दिसत होती. काही मतदारांशी संपर्क साधला असता त्यांनी "बाबांचा'उच्चार करून आपला पाठींबा त्यांना असल्याची माहिती दिली. कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गांवस हे केवळ निमित्तमात्र असून साखळीतील जनतेची सर्व जबाबदारी घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे (बाबा) यांनी घेतल्याचेही यावेळी एका नगरसेवकाने सांगितले. साखळी व हरवळे मिळून एकूण ७ हजार मते आहेत. हरवळे हा भाग भाजप समर्थकांचा असल्याने तिथे काही प्रमाणात कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना फसवण्याचे प्रयत्न केल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. हरवळेचे पंच यशवंत माडकर यांचे बंधु शिवदास माडकर यांनी या गावातील युवकांना हाताशी धरून एकूण ८२ मतदारांची ओळखपत्रे तपासून देतो,असे म्हणून गोळा केली व तो आज संपूर्ण दिवस गायब झाला,अशी तक्रार घेऊन काही स्थानिक लोक भाजप कार्यलयापाशी आले होते. त्यांनी शिवदास माडकर याच्याशी शेवटपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करून अन्यथा पोलिस तक्रार करण्याची तयारीही केली होती.
काही ठिकाणी मतदारयादीत नाव व ओळखपत्र असलेल्या काही मतदारांना मतदान करण्यास मज्जाव करण्यात आल्याने वाद निर्माण झाला. विविध राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना व निवडणूक एजंटांना मतदारयादीची जुनी प्रत दिल्याने नव्या यादीत रद्द करण्यात आलेली नावे या यादीत समाविष्ठ असल्याने काही प्रमाणात घोळ झाला. विविध गावात मतदारयादीच्या सर्वेक्षणावेळी गावातून लग्न करून दिलेल्या मुलींची नावे या यादीतून रद्द करण्यात आली होती. ही नावे व लग्नापूर्वीचे ओळखपत्र घेऊन या महिलांना काही उमेदवारांनी खास भाड्याच्या वाहनांची सोय करून माहेरहून इथे आणले होते परंतु बहुतांश या मतदारांची नावे रद्द करण्यात आल्याने त्यांना हात हलवत परतावे लागले. मतदानाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक अधिकारी तथा निरीक्षकांची वाहने कायम फिरतीवर होती व कुणीही नेता किंवा आमदार किंवा अन्य पदाधिकारी मतदारांच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घेत होते. विविध मतदानकेंद्रावर मतदारांना उन्हात उभे राहावे लागणार यासाठी खास पडदे बांधुन सावलीची सोय करण्यात आली होती. दुपारी एक वाजेपर्यंत ३० ते ४० टक्क्यांच्या सरासरीने सुरू असलेल्या मतदानाने संध्याकाळी अचानक गती प्राप्त केली. विविध पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते, हे स्पष्टपणे दिसत होते.
दरम्यान, आज मतदारसंघाचा दौरा करतेवेळी काही मतदारांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या पाठींब्याबाबत उघडपणे बोलण्याचे टाळले. काहींनी राजकीय भाष्य केले परंतु नक्की कोण विजयी होईल,याबाबत मात्र त्यांनी ठाम भूमिका घेण्याचे टाळले. या संपूर्ण दौऱ्यात संपर्क साधलेल्या मतदारांचा अंदाज पाहता मतदारांचे मोैन हाच खरा कौतुकाचा विषय ठरला आहे. स्व.गुरूदास गावस यांच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व सहानुभूती, भाजपचे युवा उमेदवार डॉ.प्रमोद सावंत यांच्या समाज कार्याचे कौतुक तसेच डॉ.आमोणकर यांना भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने काही प्रमाणात पसरलेली नाराजी अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्याने एवढे करूनही त्यांनी नक्की कुणाला आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे हे आता २९ रोजी निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

म्हापशातील तिघांचा संगमनेरला गूढ मृत्यू

- हिवरगाव पायथ्याशी गाडीत मृतदेह सापडले
- अशोक नागेशकर कुटुंबीय
- स्कॉर्पियोची नोंदणी मुंबईची
- म्हापसावासीयांना मोठा धक्का
म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): येथील आझिलो इस्पितळाजवळील एका इमारतीत राहाणाऱ्या नागेशकर कुटुंबातील तिघांचे मृतदेह महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे हिवरगाव पायथ्याशी एका गाडीत सापडल्याने म्हापसा परिसरात खळबळ माजली आहे. या वृत्ताने म्हापसावासीयांना धक्काच बसला. अशोक नागेशकर, त्यांची पत्नी विजया नागेशकर व त्यांचा मुलगा सिद्धार्थ उर्फ सिद्धू हे तिघेजण संगमनेर येथे एमएच ०६-टी ३७०१ या क्रमांकाच्या स्कॉर्पियो गाडीत मृतावस्थेत आढळले. ही माहिती संगमनेर पोलिसांनी म्हापसा पोलिसांना आज सकाळी सुमारे १० वाजता दूरध्वनीवरून दिली.
नागेशकर हे मुंबईला लीलावती इस्पितळात औषधोपचारासाठी जात असत. यावेळी त्यांनी वेर्ला येथील आर्लेकर नावाच्या व्यक्तीची गाडी भाड्याने घेतली होती. ही गाडी आर्लेकर यांच्या भावोजीची असून ती गोव्यात भाडेपट्टीवर दिली जाते.
मुंबईहून नागेशकर कुटुंब नाशिकला आयुर्वेदिक उपचारासाठी पुढे गेले. त्यावेळी महामार्गावर हा प्रकार घडला. वाहनाला अपघात न होता तिघे मृतावस्थेत सापडल्याने त्यांच्या मृत्युबद्दल गूढ निर्माण झाले आहे. ही गाडी कोण चालवित होते, याची माहिती मिळत नसली तरी सिद्धेश नागेशकर यांच्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना होता. त्यामुळे तेच गाडी चालवत असावेत, असा अंदाज आहे. सिद्धेश यांच्या खिशात सापडलेला परवाना (लायसन्स) पाहून संगमनेर पोलिसांनी गोवा पोलिसांशी सकाळी संपर्क साधल्याचे समजले. स्कॉर्पियो ही गाडी मुंबई येथे नोंद झालेली आहे. एकंदरित या मृत्युचे गूढ उकलणे हे पोलिसांसमोरील मोठेच आव्हान ठरले आहे.

दत्तू देसाई खून प्रकरणी दोन्ही पोलिसांना जन्मठेप

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी): कुंकळ्ळीत पोलिस कोठडीत गाजलेल्या दत्तू देसाई खून प्रकरणी काल दोषी ठरवण्यात आलेले तत्कालीन साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपती देसाई व हवालदार मधू देसाई यांना आज येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप गायकवाड यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अन्य दोघे संशयित आरोपी जितेंद्र व नरेंद्र फळदेसाई यांना कालच पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले होते.
आज सकाळी भरगच्च न्यायालयात न्यायाधीशांनी शिक्षा फर्मावली तेव्हा उभय आरोपी तेथे उपस्थित नव्हते. काल त्यांना न्यायालयाच्या आदेशावरून तुरुंगात हलवले जात असताना छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना रात्री हॉस्पिसियू इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
न्यायाधीशांनी आपल्या आदेशांत श्रीपती व दत्तू या आरोपी क्र.१ व क्र. २ यांना भा. दं. सं. च्या कलम २२०, १२०(ब) खाली प्रत्येकी ३ वर्षें स. म., कलम ३४२ व १२० (ब) खाली सहा महिने स. म. व खुनाच्या आरोपाच्या कलम ३०२ व १२०(ब) खाली सश्रम जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रु. दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड भरला नाही तर आणखी २ महिने सश्रम कारावास त्यांना भोगावा लागेल.
आरोपींना सर्व शिक्षा एकाच वेळी व सलग भोगावयाच्या असल्याचेही निकालात नमूद केले आहे. आरोपींनी दंड भरला तर शिक्षेविरुद्ध करावयाची मुदत संपून गेल्यावर ती रक्कम मयताच्या आईला द्यावी असेही न्यायाधीशांनी आदेशात म्हटले आहे. मात्र दोन्ही आरोपींची पुरावा नष्ट करण्याबाबत ठेवल्या गेलेल्या (कलम २२०, १२०(ब) कलमांतून न्यायालयाने मुक्तता केली आहे.
आरोपी क्र. ३ व ४ जितेंद्र व नरेंद्र फळ देसाई यांची त्यांच्यावर असलेल्या कलम २२०,१२०(ब),३४२,३०२ व २०१ या कलमांतून पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र श्रीपती व मधू यांना लगेच तुरुंगात पाठवावे, असे आदेशात बजावले आहे.
या खटल्यात एकूण ४६ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या होत्या व त्यांतील तपासअधिकाऱ्यासह ५ पोलिसांचा समावेश होता. सरकारच्या वतीने हा खटला आशा आर्सेकर यांनी हाताळला.
मडगावात २० वर्षांपूर्वी घडलेल्या गाजलेल्या अब्दुल्लाच्या पोलिस कोठडीतील मृत्युप्रकरणी झालेल्या शिक्षेनंतर तशाच प्रकरणी पोलिसांना शिक्षा झालेले हे दुसरे प्रकरण आहे.

मडगावात महिलेचे अपहरण करून ८३ हजारांना लुटले

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी): मडगावात वाटमारी, दरोड्यांचे प्रकार अजूनही सर्रास सुरू असून काल रात्री एका मासळी विक्रेतीला याची प्रचीती आली. तिला तब्बल ८३ हजारांचा फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत पोलिसांना याप्रकरणी कोणताच धागादोरा हाती लागलेला नाही.
विमल चोडणकर नामक ही फातोर्डा येथील महिला नेहमीप्रमाणे घाऊक मासळी मार्केटातील मासेविक्री आटोपल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास चालत कदंब बसस्टॅंडवरून ओशिया कॉम्प्लेक्सकडून फातोर्डा येथे जात होती. त्यावेळी ओशियाकडे एक पांढरी मारुती व्हॅन येऊन तिच्याजवळ थांबली. त्यातून चौघे इसम खाली उतरले व त्यांनी तिला पकडून व्हॅनमध्ये कोंबले आणि गाडी भरधाव सोडली. वाटेत त्यांनी तिच्या अंगावरील दागिने तसेच मोबाईल व सात हजारांची रोकड मिळून सुमारे ८३ हजारांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर तिला नंतर राय येथे सोडून देण्यात आले. तेथून ती कशीबशी घरी परतली आणि तिने पोलिसांत तक्रार नोंदविली.
"हा प्रकार इतका अचानक घडला की आपण भयभीत झाले व त्यामुळे गाडीचा क्रमांक पाहण्याचेही आपणाला सुचले नाही. त्यातील कोणीच आपल्या परिचयाचे नव्हते', असे तिने म्हटले आहे. पोलिसांनी आज गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी बरीच धावपळ केली; मात्र त्यातून विशेष काही साध्य झाले नाही. यापूर्वी आपण पोलिस असल्याचे सांगून महिलांना लुबाडण्याचे प्रकार मडगावात घडले आहेत. तथापि, महिलेचे अपहरण करून तिला लुबाडले जाण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भोमच्या तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून आमयावाडा-खांडोळा येथील घटना

माशेल, दि. २६ (प्रतिनिधी): बेतकी - खांडोळा पंचायत क्षेत्रातील आमयावाडा - खांडोळा येथे काल रात्री ९ ते १० या दरम्यान भोम येथील जल्मीवाड्यावर राहणाऱ्या होनू सोसो गावडे (३२) याचा लोखंडी नळीसदृश वस्तू डोक्यात हाणून खून करण्यात आला. या प्रकरणी आमयावाडा येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या शमिन बानू (४५) दादापीर शेख (२१), मेहबूबअली शेख (२०) यांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल मजदिस फरारी असून त्याचा शोध सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार होनू गावडे यांचे अब्दुल मजदिस व शमिन बानू यांच्या मुलीशी गेले सहा वर्षे प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांची त्यांच्या लग्नाला समंती होती; पण होनू गावडे यांच्या घरून व वाड्यावर लग्नाला तीव्र विरोध होता. लग्न आज उद्या करू यात सहा वर्षे गेली. मुलीचे कुटुंब या प्रेमसंबंधामुळे अस्वस्थ झाल्याने त्यांनी मुलीचे इतरत्र एका मुलाशी लग्न लावून दिले.
मुलीचे लग्न झाल्याचे समजताच होनू आपला मित्र, शैलेश सीताराम नाईक (तिवरे) याच्यासह मोटारसायकलने रात्री ८ च्या सुमारास आमयावाडा (वडाकडे) येथे मुलीच्या घरी आला. शैलेशला त्याने कुंपणाच्या फाटकापाशीे राहण्यास सांगून तो खोलीत गेला. त्यावेळी खोलीत मुलीचे वडील अब्दुल, आई शमिन, भाऊ दादापीर व मेहबूब उपस्थित होते. मुलीच्या मुद्यावरून होन व त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान भांडणात झाले. दरम्यान, कोणीतरी होनूच्या डोक्यावर लोखंडी नळी मारल्याने होनू धडपडत खोलीबाहेर येऊन जमिनीवर पडला व तेथेच गतप्राण झाला. त्याचवेळी त्याने जीवाच्या आकांताने मारलेली किंकाळी कुंपणाच्या फाटाकापाशी उभ्या असलेल्या शैलशने ऐकली व तो धावत आत आला तेव्हा त्याला होनू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
शैलेशने तात्काळ माशेल पोलिस चौकीवर धाव घेऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली. तसेच १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. रात्री १० वाजता फोंड्याचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई व त्यांचे सहकारी १०८ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले असता रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी होनूचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी खोलीत असलेल्या तिघांनाही अटक करू होनूचा मृतदेह पोलिसांनी चिकित्सेलाठी "गोमेकॉ' इस्पितळात पाठवून दिला.
मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी बेतकी खांडोळा व अडकोण भोमचे सरपंच, अनुक्रमे संजय नाईक व सुनील जल्मी यांच्यासमोर पंचानामा करण्यात आला. होनूच्या डोक्यात हाणलेले हत्यार मिळाले नाही. यावेळी बेतकी खांडोळाचे पंच नोनू नाईक व दिलीप नाईक उपस्थित होते. मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त गोव्यात दाखल झालेले प्रसिद्ध विनोदी अभिनेता परेश रावल (छाया: पंकज शेट्ये)

Wednesday 26 November, 2008

आज मतदान मगोची मते निर्णायक ठरणार

पणजी, दि. २५ (किशोर नाईक गावकर): तमाम गोवेकरांचे लक्ष लागलेल्या पाळी पोटनिवडणुकीसाठी उद्या २६ रोजी मतदान होणार आहे. आमदार स्व.गुरूदास गावस यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत असली तरी त्यानिमित्ताने विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारची विश्वासाहर्ता पणाला लागली आहे. कॉंग्रेस, भाजप व अपक्ष अशी तिरंगी लढत या ठिकाणी होईल. मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा "सिंह' प्रथमच मतपत्रिकेवरून गायब झाल्याने स्वाभिमानी मगोप्रेमी मतदार कोणाच्या बाजूने उभा राहतो यावरच पाळीतील भावी लोकप्रतिनिधीचे भवितव्य ठरणार आहे.
विकासाच्या बाबतीत विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आत्तापर्यंत मगोनंतर सर्वांत जास्त काळ सत्तेवर राहिलेल्या कॉंग्रेसकडून या मतदारसंघावर नेहमीच अन्याय झाला, त्यामुळे विकासाचा पोकळ "फॉर्म्युला' त्यांच्या कामी येणार नाही. याची जाणीव झालेल्या कॉंग्रेसने स्व.गावस यांचे बंधू प्रताप गावस यांना उमेदवारी दिली. स्व.गावस यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रताप गावस यांना निवडून देण्याचे भावनात्मक आवाहन करण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, भाजपने डॉ.आमोणकर यांना उमेदवारी नाकारून धाडसी निर्णय घेतला आहे. भाजप सरकारात मंत्री राहूनही गेल्या विधानसभा निवडणूकीत घसरण झालेल्या डॉ.आमोणकर यांची लोकप्रियता घटल्याचे सिद्ध झाल्याने व पक्षांतर्गत डॉ.आमोणकर यांच्याबाबत नकारार्थी वातावरण पसरल्याने पक्षाचे युवा कार्यकर्ते डॉ.प्रमोद सावंत यांना भाजपची उमेदवारी मिळाली. समाजकार्याची ओढ असलेला हा उमदा युवक विविध उपक्रमांच्या निमित्ताने या मतदारसंघात परिचित आहेच. त्यातच आता भाजपची उमेदवारी मिळाल्याने ते सर्वांना आणखी परिचयाचे झाले आहेत. डॉ.आमोणकर यांनी बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने डॉ.सावंत यांना काहीप्रमाणात फटका बसेलही परंतु व्यक्तीनिष्ठेपक्षा पक्षनिष्ठेला महत्व देणारा भाजप मतदार पक्षापासून फारकत घेणे कठीण असल्याने डॉ.आमोणकर यांचा कितपत निभाव लागेल, हे सांगणे कठीणच. गेल्या विधानसभेत मगोपक्षाशी प्रामाणिक राहीलेला सुमारे ४०३२ मतदारांचा प्रभावी आकडा कोणाच्या मतपेटीत जमा होतो यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.१९९९ व २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदार भाजपकडे वळला होता. तथापि, २००७ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत हा मतदार पुन्हा मगोकडे वळला. गेल्यावेळी मगोचे उमेदवार महेश गावस यांनी ४०३२ मते मिळवली होती. स्व. गावस यांना ७७६८ व भाजपचे डॉ.आमोणकर यांना ६१७७ मते मिळाली होती. स्व.गावस हे केवळ १५९१ मताधिक्यांनी निवडून आले होते.
यावेळी पाळीतील मतदारांची संख्या २२७३० आहे. राज्य सरकारने केवळ पाळी मतदारसंघापूर्ती सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने या मतदारसंघाबाहेर काम करणारे बहुसंख्य मतदार आपला मतदानाचा हक्क किती उत्साहाने बजावतात हाही मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. एकूण ३० मतदानकेंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यातील ११ मतदानकेंद्रे संवेदनशील आहेत. १९६३ पासून आत्तापर्यंत सात वेळा या मतदारसंघात मगो पक्षाचा आमदार निवडून आला आहे.१९८४ साली पहिल्यांदा कॉंग्रेसतर्फे विनयकुमार उसगावकर निवडून आले होते.१९९९ साली या मतदारसंघात भाजपने आपला झेंडा रोवला व २००२ सालीही डॉ.आमोणकर यांनी बाजी मारली.२००७ सालच्या निवडणूकीत मात्र डॉ.आमोणकर यांना जनतेने नाकारले व हा मतदारसंघ पुन्हा कॉंग्रेसच्या पदरात पडला. डॉ.आमोणकर यांच्या पराजयाला मगोचे उमेदवार महेश गावस कारणीभूत ठरले. मगो पक्षाचे सध्याचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी यावेळी पाळी मतदारसंघात प्रत्यक्ष कॉंग्रेससाठी काम करणे टाळले आहे याचीही येथे दखल घ्यावी लागेल. दोन दिवसांपूर्वी महेश गावस व त्यांच्या पत्नी तथा पाळीच्या सरपंच शुभेच्छा गांवस यांनी कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गांवस यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. मगोचे पारंपारिक मतदार हे कॉंग्रेसविरोधकच आहेत, त्यामुळे "हात' या चिन्हावर ते मतदान करण्याची शक्यता अल्पच. त्यामुळे महेश गावस यांच्या नावावर मगोची किती मते कॉंग्रेसच्या झोळीत पडतात, हा उत्सुकतेचा मुद्दा ठरावा.
स्व. गुरूदास गावस यांची आमदारकीच्या कारकिर्दीत कॉंग्रेसकडून झालेली फरफट तसेच त्यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वाबाबत जाहीरपणे व्यक्त केलेली टीका पाहता पाळी मतदारसंघाच्या विकासाच्या बाता जनता कितपत मान्य करून घेते हेही लवकरच स्पष्ट होणार आहे. पाळीसाठी सुमारे १५० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करून विकासाच्या कल्पनांचे मायाजाल कॉंग्रेसने जाहीर प्रचारात पसरवण्याचा जो प्रयत्न केला त्याला किती मतदार भुलले हे निकालानंतर स्पष्ट होईल. कॉंग्रेस आघाडी सरकारातील अंतर्गत कलहामुळे राज्याची मोठ्या प्रमाणात फरफट सुरू असून लोक वारंवार रस्त्यावर उतरत आहेत. मुळातच आपल्या अवतीभोवती सुरू असलेल्या या घटनांचा पाळी मतदारांवर किती परिणाम झाला किंवा केवळ मतदारसंघापुरता विचार न करता संपूर्ण राज्याच्या भवितव्याचे चिंता कोणाला लागली आहे हे निकालाअंतीच सिद्ध होईल. भाजप,कॉंग्रेस,अपक्ष वगळता सेव्ह गोवा फ्रंट पक्षाचे उमेदवार जुझे लोबो रिंगणात आहेत. ते किती मते मिळवणार हा भाग वेगळा; तथापि, त्यांनी डॉ.आमोणकर यांच्याविरोधात अतिरीक्त संपत्तीबाबत तक्रार दाखल करून आपला दबदबा निर्माण केला आहे.

दत्तू देसाई खून : दोघे पोलिस दोषी मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निवाडा

मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी): कुंकळ्ळी पोलिस स्थानकात २००१ मधील गाजलेल्या
दत्तू देसाई खूनप्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप गायकवाड यांनी आज कुंकळ्ळी पोलिस स्थानकातील तत्कालीन साहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीपती देसाई व हवालदार मधू देसाई यांना दोषी ठरवले. अन्य दोघे संशयित आरोपी जितेंद्र फळदेसाई व नरेंद्र फळदेसाई यांना पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले.
न्यायाधीशांनी आज शिक्षा जाहीर केली नाही. बचावपक्षाचे वकील हजर नसल्याने न्यायालयाचे कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले. उद्या सकाळी शिक्षेच्या प्रमाणाबाबत युक्तिवाद होईल. भरगच्च न्यायालयात निकालपत्र वाचताना न्या. गायकवाड यांनी भा. दं. सं.च्या कलम २२०, ३४२ (कोठडीत बेकायदा डांबून मारहाण करणे), ३०२ (खून करणे) व १२०(ब)(कटकारस्थान रचणे ) या कलमांखाली आरोपींना न्यायालय दोषी ठरवत असल्याचे सांगितले. त्यांच्या शिक्षेची घोषणा होईपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवण्यास फर्मावण्यात आले. या खटल्याचा निकाल काल जाहीर होईल, असे न्यायालयाच्या सूचना फलकावर लिहिले होते. मात्र तो सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होऊ शकला नव्हता.
आरोपपत्रानुसार किटला फातर्पा येथील कु. प्रशीला राऊत देसाई हिने कुंकळ्ळी पोलिसात दत्तू देसाई याच्याविरुध्द तो आपल्या आईला मारहाण करीत असून पोलिसांनी तेथे त्वरीत यावे अशी तक्रार केली होती. वरिष्ठांच्या आदेशावरून पोलिस शिपाई निळू शेट व श्याम देसाई यांनी दत्तूला २७ जून २००१ रोजी सकाळी पोलिस स्टेशनवर आणले व त्याच्या विरुध्द गुन्हा नोंदविला. तथापि, शोभावती देसाई यांच्याविरुध्द आपली तक्रार नोंदवून घेतली जात नाही यास्तव त्याने तेथील पोलिसांशी वाद घातला. तसेच तेथे असलेल्या एका महिला पोलिसाला शिवीगाळ केली.
त्यामुळे भडकलेले सदर महिला पोलिसाचे पती हवालदार मधू देसाई व साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपती देसाई यांनी जितेंद्र फळदेसाई व नरेंद्र फळदेसाई यांच्या मदतीने त्याला जबर मारहाण केली. नंतर त्याला महिला कैद्यांच्या कोठडीत डांबले व आणखी मारहाण केली. त्याची एकूण अवस्था पाहता तो मेला असे वाटल्याने आपल्या दुष्कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी त्यांनी त्याला पोलिस स्टेशनमागे असलेल्या झाडाला लटकावले व त्याने आत्महत्या केल्याचा आभास निर्माण केला. २९ रोजी त्याचा मृतदेह सापडला असे आरोपपत्रात म्हटले हेाते. शवचिकित्सा अहवालात कमरेखालील भागात झालेल्या जबर मारहाणीमुळे त्याला मृत्यू आल्याचे आरोपपत्रात म्हटले होते.
मडगावात २० वर्षांपूर्वी घडलेल्या गाजलेल्या अब्दुल्लाच्या पोलिस कोठडीतील मृत्युप्रकरणी झालेल्या शिक्षेनंतर तशाच प्रकरणी पोलिसांना शिक्षा झालेले अशा स्वरूपाचे हे दुसरे प्रकरण आहे.

गोवा 'अनुसूचित जमाती'तर्फे ३० पासून जागृती रथ यात्रा ६० हजार समाज कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) ः गोव्यातील गावडा,कुणबी व वेळीप समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळून आता पाच वर्षे पूर्ण झाली तरी अजूनही या समाजाला त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सरकार दरबारी प्रयत्न करूनही काहीही होत नसल्याने आता या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या समाजातील नेत्यांनी घेतला आहे. त्यानिमित्त येत्या ३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत राज्यव्यापी जनजागृती रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पणजी येथील अनुसूचित जमात विकास महामंडळ कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत "युनायटेड ट्रायबल असोसियेशन अलायन्स'(उट्टा) चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी ही माहिती दिली. यावेळी जनजागृती रथ यात्रेचे निमंत्रक तथा पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, अन्य निमंत्रक आंतोनियो फर्नांडिस,सहनिमंत्रक आमदार वासुदेव मेंग गावकर व गोविंद गावडे आदी उपस्थित होते. या जनजागृती रथ यात्रेची सुरुवात काणकोण तालुक्यातून होणार आहे.३० रोजी सकाळी ९ वाजता गावडोंगरी काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानापासून या यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर केपे,सांगे,मुरगाव,तिसवाडी,डिचोली,सत्तरी आणि फोंडा तालुका व्यापला जाईल. या यात्रेचा समारोप म्हार्दोळ फोंडा येथील क्रांती मैदानावर येत्या ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. या यात्रेत समाजाचे सुमारे ६० हजार कार्यकर्ते सहभागी होतील. त्यनिमित्त सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असून यात्रेनंतर या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाठवण्यात येणार आहे. ही यात्रा पूर्णपणे लोकशाही पद्धतीने शांततामय वातावरण पार पडेल,असा विश्वास यात्रेचे निमंत्रक तवडकर यांनी व्यक्त केला.
८ जानेवारी २००३ साली अथक प्रयत्नानंतर गावडा,कुणबी व वेळीप समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला. प्रत्यक्ष विकासापासून वंचित राहिलेल्या या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेव्दारे विविध सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.अर्थसंकल्पातील महत्त्वाचा भाग हा या घटकासाठी वेगळा ठेवण्यात येतो. एवढे करूनही गोव्यातील या समाजाला त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले जात असल्याचा दावा आमदार तवडकर यांनी केला. गोव्यात या समाजाला दर्जा मिळाल्यानंतर अनुसूचित जमात विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. मात्र या महामंडळाला आवश्यक निधी पुरवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा ठपकाही त्यांनी यावेळी ठेवला.
केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले असून प्रसंगी राष्ट्रपती व पंतप्रधानांचाही दरवाजा ठोठावला जाईल,असेही सांगण्यात आले. जानेवारी २००७ महिन्यात पणजी आझाद मैदानावर समाजबांधवांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्यात घेण्यात आलेले ठराव सरकारला सादर करण्यात आले होते. या ठरावांवर सरकारकडून काहीही कृती झाली नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. हा समाज सरकारकडे भीक मागत नसून घटनेप्रमाणे त्यांना दिलेल्या हक्कांसाठी लढत आहे,असा सडेतोड इशाराही तवडकर यांनी दिला. मुळातच "उट्टा' ही संघटना स्थापन करून या समाजातील हिंदू व ख्रिस्ती बांधवांना एकत्रित करण्याचा संकल्प सोडण्यात आला असून या जागृती यात्रेला समाजातील सर्व नेते सहभागी होणार आहेत,अशी माहितीही देण्यात आली.
------------------------------------------------------------------
संघटनेच्या प्रमुख मागण्या
- दिवाणी न्यायालयाच्या दर्जाचा अनुसूचित जमात आयोग स्थापन करणे
- स्वतंत्र अनुसूचित जमात खाते व अनुसूचित जमात मंत्रालयाची स्थापना
- अनुसूचित जमातीच्या विकासासाठी बहाल केलेला १२ टक्के राखीव निधी याच समाजासाठी वापरावा
- अनुसूचित जमात आर्थिक विकास महामंडळ सक्षम करणे
- सरकारी पदांच्या मागील जागा,नवीन भरती व बढत्या ताबडतोब करण्यात याव्यात
- विधानसभेत जमातीसाठी पाच जागा राखीव ठेवण्यात याव्यात
- अनुसूचित जमातीसाठी विकास प्राधिकरण स्थापन करणे
- पदांप्रमाणे भरती नोंदणी रजिस्टर ठेवण्याचे सरकारी,बिगर सरकारी,महामंडळे,स्वयत्तसंस्था तथा खाजगी आस्थापनांना धनकारक बनवावे.
- अनुसूचित जमातीची जमीन बिगर अनुसूचित जमातींना विकत घेण्यास किंवा हस्तांतरास बंदी घालणे
- अनुसूचित जमाती वाडा किंवा गावचा भाग निर्देशित करणे
- अनुसूचित जमातींना जमात दाखला मिळण्याचे सोपस्कार सरळ व सोपे बनवणे

२४ डिसेंबरनंतर पेट्रोलच्या किमती कमी होतील : देवरा

नवी दिल्ली, दि. २५ : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आलेल्या आहेत हे लक्षात घेऊन सध्या सहा राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर म्हणजे येत्या २४ डिसेंबरनंतर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्यावर विचार केला जाईल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरलीदेवरा यांनी आज म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत. त्याकडे बघता आता आम्हीही देशांतर्गत कच्च्या तेलाच्या किमती कमी केल्या पाहिजेत परंतु २४ डिसेंबरपूर्वी आम्ही त्या कमी करू शकत नाही. कारण सध्या काही राज्यांत निवडणुका सुरू आहेत व तेथे निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने व तेथील निवडणूक प्रक्रिया २४ डिसंेंबरपूर्वी पूर्ण होत नसल्याने अशाप्रकारची घोषणा आम्ही करू शकत नाही, असेही देवरा यांनी येथे पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, पेट्रोलियम सचिव आर. एस. पांडे यांनी म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव डिसेंबरच्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळासमोर पाठविण्याचा आमच्या मंत्रालयाचा विचार आहे.
हा आचारसंहितेचा भंग
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कपात करण्याचे पेट्रोलियममंत्री मुरली देवरा यांनी घोषित करणे म्हणजे हा सरळसरळ निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे, असे भाजपने म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असेही भाजपने म्हटले आहे.
मुरली देवरा यांची घोषणा म्हणजे सध्या सहा राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू असल्याने तेथील मतदाराला खूष करण्यासाठी व आपल्या बाजूने त्याचे मत प्राप्त करण्यासाठी करण्यात आलेला प्रयत्न आहे, असे दिल्ली विधानसभेसाठीचे भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार विजयकुमार मल्होत्रा यांनी म्हटले आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करू असेही ते पुढे म्हणाले.

एटीएसकडून तोगडिया यांना 'क्लीन चिट'

नवी दिल्ली, दि.२५ : मालेगाव बॉम्बस्फोटाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस प्रवीण तोगडिया यांना "क्लीन चिट' दिली आहे. यासंदर्भात खुलासा करताना एटीएसने म्हटले आहे की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विहिंपच्या कोेणत्याही नेत्याचे नाव आलेले नाही.
एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी एका टीव्ही चॅनेलने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, आम्हाला जे काही टेलिफोन नंबर प्राप्त झाले आहेत त्यात प्रवीण तोगडिया यांचेही नाव आहे. केवळ फोन कॉल्सच्या आधारावर आम्ही पुढील चौकशी करू शकत नाही.
कालच प्रवीण तोगडिया यांनी अहमदाबाद येथे स्पष्ट केले होते की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाशी माझा तिळमात्र संबंध नाही. याबाबतच जे काय वृत्त प्रसिध्द झाले आहे ते निखालस खोटे आहे. अशाप्रकारच्या बातम्या देणाऱ्या वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्या यांच्या विरोधात आपण कायदेशीर कारवाई करू , असा इशाराही त्यांनी आपल्या वकिलाच्यामार्फत दिलेला आहे. काल सोमवारी एका इंग्रजी वृत्तपत्रात अशी बातमी आली होती की, मालेगाव बॉम्बस्फोटात समोर आलेल्या अभिनव भारत या संस्थेला प्रवीण तोगडिया यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
एटीएसविरोधात म.प्र.त याचिका दाखल
दरम्यान, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) विरोधात मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे. इंदूरच्या एका व्यक्तीला जबरदस्तीने आपल्याबरोबर घेऊन जाणे व त्याला बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचा एटीएसवर आरोप करण्यात आलेला आहे. याचिकेनुसार एटीएसच्या पथकाने १० नोव्हेंबर रोजी इंदूर येथून दिलीप पाटीदार नावाच्या व्यक्तीला जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेत त्याला बेकायदशीरपणे आपल्यासोबत घेेऊन गेले होते.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच पोलिस मृत्युमुखी

रायपूर, दि. २५ : छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरूंगाच्या साह्याने एक पूल उडवून दिला. यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत, असे बस्तर क्षेत्राचेे पोलिस महानिरीक्षक ए. एन. उपाध्याय यांनी सांगितले.
बस्तर जिल्ह्यातील मरदापाल व कोंडागाव पोलिस ठाण्यांतर्गत येणारा एक पूल नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या साह्याने उडवून लावला. यावेळी सुरक्षा दलाचे जवानांचे वाहन पुलावरून जात होते. बस्तरमधील ३३ स्थानांवर सोमवारी फेरमतदान घेण्यात आले होते. यापैकी नाहकानार, तुमडीबाला व कुधुर या मतदानकेंद्रावरील फेरमतदानावर हे जवान तैनात होते. आज मंगळवारी मरदापाल येथून कोंडागावकडे ते रवाना झाले असताना नक्षलवाद्यांनी उपरोक्त स्फोट घडवून आणला.
या घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळाकडे अतिरिक्त पोलिस दल रवाना करण्यात आले असून जखमींना दवाखान्यात दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Tuesday 25 November, 2008

पाळी मतदारसंघ भाजपला अनुकूल

पाळी, दि.२४ (विशेष प्रतिनिधी): पाळी पोटनिवडणुकीत कोण विजयी होणार हे सांगणे जरी कठीण असले तरी भाजपच बाजी मारेल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. यामागे तसे सबळ कारण सांगितले जाते. सध्या भाजप, कॉंग्रेस व डॉ.सुरेश आमोणकर यांच्यामध्ये लढत असल्याचे दिसत असले तरी तो एक भास आहे, असे तेथील प्रत्यक्ष स्थिती दर्शविते. खरी लढत कॉंग्रेसचे प्रताप गावस व भाजपचे डॉ. प्रमोद सावंत यांच्यामध्येच आहे. मतदार कोणाच्या बाजूने आहेत ते २६ रोजी मतदानात व २९ रोजी निकालाने स्पष्ट होणार आहे. कोणीही आपल्या विजयाचा दावा ठामपणे करीत नाही, कारण घडीघडीला राजकारण बदलत आहे. कॉंग्रेसमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत एकमत होत नव्हते तर विश्वजित राणे यांच्या मनात वेगळ्याच उमेदवाराचे नाव होते. अखेर प्रताप गावस यांच्या नावावर कॉंग्रेसने शिक्कामोर्तब केले. डॉ. सुरेश आमोणकरांना बाजूला ठेवत भाजपने नव्या दमाचे लोकप्रिय उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांना उमेदवारी दिल्यामुळे डॉ. आमोणकर यांना काही जणांनी अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आणले. यामागे विश्वजित राणे यांचा हात असल्याचे सुरवातील मानण्यात येत होते. राणे हे दोन दगडांवर पाय ठेवून आहेत, कारण त्यांना आपल्यासोबत आणखी एक अपक्ष निवडून आणायचा आहे, अशी चर्चा होत होती, तथापि अलीकडे हा कयास चुकीचा असल्याचेच सिद्ध झाले आहे, त्यामुळे डॉ. आमोणकर यांचे कार्यकर्ते निराश झाले आहेत. दुसऱ्या बाजूला प्रताप गावस निवडून आले तर सध्याच्या कॉंग्रेसच्या बजबजपुरीत भर पडेल, असे मतदारांना वाटत आहे. सध्याच्या सरकारबद्दलची जनतेमधील नाराजी लक्षात घेऊन तसेच भविष्याचा विचार करून राणे योग्य वेळी योग्य ती भूमिका वठवतील, असे मानले जाते. भाजपचे डॉ. सावंत निवडून आले तर एक सक्षम व कार्यतत्पर सरकार गोमंतकीयांना लाभू शकेल, अशी चर्चा चालू आहे. अशा सरकारला अपक्षांचे समर्थन लाभू शकेल, असे मानले जाते.
कॉंग्रेस नेते प्रतापसिंग राणे व विश्वजित कॉंग्रेसच्या रोडशो मध्ये सहभागी झाले असले तरी, त्यांच्यावर विसंबून राहाण्याची कॉंग्रेसची तयारी नाही. याचसाठी रवी नाईक आपल्या सहकाऱ्यांसह मतदारांवर प्रभाव टाकू पाहात आहेत. सभापतीपदी राणे असल्याने आगामी राजकारणावर त्यांचा सर्वात अधिक प्रभाव राहाणार आहे. रेजिनाल्ड व चर्चिल यांची आमदारकी सध्या तरी अधांतरीच आहे, याची कल्पना विश्वजित यांना पुरेपूर आहे. नव्या समीकरणात त्यांना अधिक चांगले स्थान मिळू शकेल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. सध्या सर्वांचे डोळे मतदानावरच नव्हे तर शनिवारच्या मतमोजणीकडे लागून राहिले आहेत. राजकीय उलथापालथ होते की कालचा तमाशा बरा होता..असे म्हणण्याची पाळी जनतेवर पाळी मतदारसंघ आणतो, एवढेच पाहणे गोमंतकीयांच्या हाती आहे.

मूर्तिभंजनाचे बावीसावे प्रकरण


कुडचडे येथे मोडतोड करण्यात आलेली सांडिलेश्वर बाबाची मूर्ती आणि त्रिशूळ.(छाया: अमर नाईक)
कुडचडे, दि. २४ (प्रतिनिधी): राज्यात मूर्तिभंजनाचे सुरूच असून रविवारी रात्री २.३० च्या सुमारास कुडचडे रेल्वे स्थानकाजवळ भरवस्तीत असलेल्या सांडिलेश्वर बाबाच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रकार घडल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घुमटी आणि त्रिशूल मोडण्यात आवा असून व पिंपळाच्या पेडावर असलेले शिवलिंग मोडून टाकण्यात आले आहे. त्यामुळे लोकांतून आणि हिंदू संघटनांतून याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
रेल्वेमंडळाच्या हद्दीत असलेल्या क्वॉर्टसपासून १ मीटर आत असलेल्या तसेच बाजाराच्या मुख्य वस्तीसमोरच असलेल्या पिंपळाचा पेड भागात दाट वस्ती आहे.काल रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडल्याचे रेल्वे सुरक्षा रक्षक प्रसाद पाब्वसिनकर यांनी पाहिल्याचे सांगण्यात आले. यावेळी सदर सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार रात्री ड्युटीवर असताना रेल्वे स्टेशन भागात सात ते आठ अज्ञात इसम सदर देवस्थानाच्या ठिकाणी फिरत असल्याचे दृष्टीस पडले होते. काही वेळाने तेथे आवाज आला; पण सुमारे दोनशे मीटर आपण दूर असल्याचे त्यांची ओळख पटविणे कठीण झाले. त्यानंतर आपण आपल्या एका साथीदारासह घटनास्थळी दाखल झालो असता अज्ञातांनी पळ काढल्याचे त्यांनी सांगितले.
सदर रक्षकाने याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना आज सकाळी ८ वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना दिली.
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, मडगावचे पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर केपे उपअधीक्षक रोहिदास पत्रे, कुडचडे पोलिस निरीक्षक नीलेश राणे, केपे पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची गती वाढवली. यावेळी "मीना' हे श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली. तथापि, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
स्थानिक आमदार श्याम सातार्डेकर यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेची पाहणी केली. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ही कृती भ्याडपणाची असून गोव्यातील जातीय सलोखा नष्ट करण्याचा हेतू त्यामागे दिसतो. पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना ताबडतोब शोधून त्यांच्या मुसक्या बांधाव्यात, असे त्यांनी सांगितले.
सावर्डे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप सावंत देसाई, कुडचडे नगरसेवक - देऊ सोनू नाईक, मारुती नाईक, गोवा शिवसेनेचे उपराज्य प्रमुख नामदेव नाईक, पद्मनाथ शिष्य सांप्रदायाचे सुदेश खुशाली नाईक व इतर लोक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------------------
मूर्तिभंजनाचे बावीसावे प्रकरण
राज्यातील मूर्तितोडफोडीचे हे बावीसावे, तर कुडचडे भागातील चौथे प्रकरण आहे. पोलिसांना यातील एकाचाही तपास लावण्यात यश न आल्याने हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज्यात मूर्तितोडफोडीचे प्रकार सर्रास सुरू असूनही सरकारला त्यात लक्ष घालायला वेळ नाही. मंदिरांच्या सुरक्षेचे काम बेरोजगार युवकांकडे सोपवावे, अशी मागणी शिवसेनेचे नामदेव नाईक यांनी केली आहे.

'आम्ही मृत्यू डोळ्यांसमोर पाहिला' सोमालियातून इजिदोर व ऍलिस्टर परतले जन्मभूमीत


वास्को, दि. २४ (पंकज शेट्ये): जीवन की मृत्यू याचा विदारक अनुभव सुमारे दोन महिने घेतल्यानंतर आपल्या अन्य २० साथीदारांबरोबर घेतल्यावर इजिदोर फर्नांडिस व ऍलिस्टर फर्नांडिस आज दुपारी सुखरुपपणे गोव्यात परतले आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले... १६ सप्टेंबर रोजी आफ्रिका खंडातील सोमालिया देशात सागरी चाच्यांनी "स्टॉल्ट व्हेलोर' या जहाजावरून त्यांचे अपहरण केले होते.
त्यामुळे या दोघांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलांच्या परत येण्याची आशाच सोडली होती.
मात्र, आज त्यांना दोबोळी विमान तळावर सुखरुप पाहून दोघांच्या कुटुंबीयांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. मानवी नातेसंबंध दृढतर करणारे हे अनोखे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्यांनाही आपल्या भावनांना बांध घालणे कठीण बनले होते.
जपानमधील एका व्यापारी कंपनीच्या मालकीचे हे जहाज रसायनांचा साठा घेऊन निघाले असता चाच्यांनी त्याचे अपहरण केले होते. या जहाजावर १८ भारतीयांसह एकूण २२ सेवक होते. तब्बल दोन महिने त्यांना ओलिस म्हणून ठेवण्यात आले होते. जेव्हा चाच्यांच्या अटी पूर्ण झाल्या तेव्हाच या सर्वांना १६ नोव्हेंबर रोजी मुक्त करण्यात आले. आज सकाळी मस्कत विमानतळावरुन ५ भारतीय (नाविद बुरोन्दकर, उमप्रकाश शुल्का, संतोष पाटील, ऍलिस्टर फर्नांडिस व इजिदोर फर्नांडिस) मुंबई विमनतळावर पोहोचले. त्यातील ऍलिस्टर व इजिदोर हे दोघे गोमंतकीय नंतर दुपारी १.४५ च्या सुमारास गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दाखल झाले. दोघेही सुखरुप असून गोव्यात परतल्याचे त्यांचे कुटुंबीय, नातेवाइक व गावबंधूंना समजताच त्यांनी दाबोळी विमानतळावर येऊन मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले. राय येथील इजिदोर व कुंकळ्ळी येथील ऍलिस्टर यांनी विमानतळावर उतरताच प्रथम आपल्या मातापित्यांची गळाभेट घेतली.
सोमालियात चाच्यांनी आमचे जहाज ताब्यात घेतल्यावर "एक्स. वाय. एल' बंदरावर ठेवल्याचे ऍलिस्टर याने "गोवादूत'च्या प्रतिनीधी शी बोलताना सांगितले. गोव्यात परतल्याने त्या भयंकर आठवणींना तिलांजली देण्याचे मी ठरवले आहे. पुन्हा जहाजावर नोकरीसाठी जायचे की नाही याबाबतचा निर्णय आपण कुटुंबीयांशी चर्चा करूनच घेणार आहोत. तूर्त दीर्घ सुट्टी घेऊन विश्रांती घ्यायचे आपण ठरवल्याचे त्याने सांगितले.
यापूर्वी आपण अन्य ५ जहाजांवर काम केले आहे. मात्र हा आपला सर्वात भयंकर प्रवास असल्याची प्रतिक्रीया इजिदोर याने व्यक्त केली. जेव्हा चाच्यांनी जहाजाचे अपहरण केले तेव्हापासून परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत होती. जिवंत राहण्यासाठी चाच्यांच्या आज्ञेचे पालन करणे हा एकमेव मार्ग आमच्यापुढे उरला होता. सर्वांनी तो मान्य केला. इजिदोर हा स्टॉल्ट जहाजावर प्रमुख स्वयंपाकी म्हणून काम करत होता. अपहरणप्रसंगी आपल्याला परिवाराशी चार वेळा बोलण्याची संधी मिळाल्याचे तो म्हणाला. चाच्यांनी जहाजाचे अपहरण केल्यानंतर आम्हाला जहाजावर पूर्ण दिवस बंदुकीच्या धाकावर ठेवण्यात आले. पहीले ९ दिवस चाच्यांना आपणच जेवण बनवून द्यायचो. त्यांच्या परवानगीशिवाय इंचभरही हलणे म्हणजे साक्षात मृत्यूच. शांत समुद्रात आमचे जहाज जात असताना स्पीड बोटीद्वारे चाच्यांनी आमच्या जहाजावर कसा कब्जा केला तो प्रसंग आठवला की, आजही अंगावरून सरसरून काटा येतो, असे तो म्हणाला.
गोव्यात आप्तेष्टांचे चेहरे पाहून अत्यानंद झाला. यापुढेही आपण जहाजावरच काम करणार असल्याचा मनोदय त्याने व्यक्त केला.
गोव्याच्या या दोन्ही सुपुत्रांना त्यांच्या कुटुंबीयांनी पुष्पहार घालून त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी इजिदोरची आई जास्निता फर्नांडिस, वडील सेबी तसेच ऍलिस्टरची माता सोफिया व वडील अँथनी यांनी देवाच्या दयेनेच आज आमेचे सुपुत्र गोव्यात सुखरुप परतल्याचे सांगितले. हे कथन करताना त्यांचे डोळे पाणावले होते.
जहाजाचे कप्तान प्रभात गोयल व इतर भारतीय (त्या जहाजावरी कर्मचारी) लवकरच मायभूमीत परतणार असल्याची माहीती ऍलिस्टर याने दिली.
----------------------------------------------------
त्या आठवणीही नकोशा...
ऍलिस्टर म्हणाला, त्या आठवणी आजही अंगावर काटा आणतात. सोमाली चाच्यांना केवळ पैशाशी मतलब होता. माणुसकी कशाशी खातात हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यांची देहबोलीच हे सांगत होती. आमच्या जहाज कंपनीने व भारत सरकारने आमच्यासाठी खूप कष्ट घेतल्याने आज आम्ही सुखरुप आमच्या "मायगावी' पोहोचल्याचे सांगताना ऍलिस्टर याला हुंदका आवरला नाही.

कुडका येथे कचरा टाकण्यास महापालिकेला अनुमती नाही कचऱ्याचा प्रश्न पुन्हा बनला गंभीर

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): कुडका येथे तात्पुरत्या स्वरूपात कचरा टाकण्यासाठी पणजी महापालिकेने केलेला अनुमती अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावला. त्यामुळे कचरा कुठे टाकवा, असा गंभीर प्रश्न महापालिकेपुढे उभा ठाकला आहे.
कचऱ्याविषयी गंभीर स्थिती निर्माण झाल्याने महापालिकेने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत कुडका येथे कचरा टाकण्यासाठी न्यायालयाकडे परवानगीचा अर्ज दाखल केला होता. त्याला कुडकावासीयांनी जोरदार विरोध करून कोणत्याही स्थिती तेथे पालिकेला कचरा टाकण्याची परवानगी देऊ नये, अशी याचना याचिकादारांनी केली होती. यापूर्वी खंडपीठाने महापालिकेला कुडका येथे कचऱ्याची एक टोपलीसुद्धा न टाकण्याचा आदेश दिला होता. तसेच, तेथील कचऱ्याचा झालेला डोंगर हटवून त्याची त्वरित विल्हेवाट लावण्याचा आदेश दिला होता. तथापि, त्याकडे पालिकेने लक्ष पुरवले नसल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. १९ नोव्हेंबर रोजी खंडपीठाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून निवाडा राखीव ठेवला होता.
इफ्फी सुरू होण्यापूर्वी पालिकेत कचऱ्याचा विषय पुन्हा उफाळून आला होता. त्यावेळी सरकार कचरा प्रकल्प उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत "इफ्फी'च्या ठिकाणचा आणि शहरातील ४२ मोठ्या हॉटेलचा कचरा न उचलण्याचा इशारा पालिकेने दिला होता. त्यामुळे या हॉटेलमालकांनी त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही भाटकारांना हाताशी धरून तात्पुरती तरतूद केली आहे.
खंडपीठाने यासंदर्भात नियुक्त केलेल्या "ऍमॅक्युस क्युरी' ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी यापूर्वी कुडका प्रकरणात खंडपीठाने दिलेला अंतिम निवाडाच वाचून सत्य परिस्थिती खंडपीठासमोर ठेवली होती. पालिकेने यापुढे कोणत्याही प्रकारचा कचरा तेथे टाकू नये. तसेच तेथे कचऱ्याचा डोंगर उभा झाला आहे तो ऑक्टोबर ०८ ते एप्रिल ०९ पर्यंत तेथून कचरा हटवण्याचे काम पूर्ण करावे. तसेच त्यानंतर याचा अहवाल न्यायालयात सादर करावा. परंतु, पालिकेने अद्याप हे काम सुरू केलेले नाही. कचऱ्याचा डोंगर आहे, तसाच उभा असल्याने खंडपीठाने याची दखल घेतली आहे. कुडका येथील कचऱ्याचा ढिगाऱ्यामुळे येथील तेथील अनेक विहिऱ्यांचे पाणी दूषित झाले आहे.

बीड नाट्य संमेलनाचे रामदास कामत अध्यक्ष

मुंबई, दि. २४ : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते व गायक रामदास कामत यांची नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. यावर नाट्य वर्तुळात रंगलेल्या वादावर पडदा पडला आहे.
काल रविवारी येथे झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बीड येथे होणाऱ्या ८९ व्या नाट्य संमेलनात रामदास कामत यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात येतील. अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे ८९ वे नाट्य संमेलन बीड येथे ३१ जानेवारी ते एक फेब्रुवारी २००९ या कालावधीत होत आहे.
अध्यक्षपदासाठी वामन केंद्रे यांचा अर्ज अवैध ठरविल्यानंतर मराठवाड्यातील रंगकर्मींनी त्याविरुध्द प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या; परंतु अ. भा. मराठी नाट्य परिषद घटनेबाबत ठाम राहिली. नियमांच्या चौक टीत राहून त्यांनी रामदास कामत व विश्वास मेहंदळे या दोन उमेदवारांत गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक घेतली होती.
निवडीवर आनंद व्यक्त करताना रामदास कामत म्हणाले, गेली ४५ वर्षे संगीत रंगभूमीची जी सेवा केली त्या माझ्या कारकीर्दीचा हा गौरव आहे. संगीत रंगभूमीला पुन्हा वैभवाचे दिवस कसे येतील याकडे मी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत लक्ष देईन, असे कामत म्हणाले.
पं. गोविंदराव अग्नी, पं. जितेंद्र अभिषेकी, भालचंद्र पेंढारकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेऊन अनेक दिग्गज दिग्दर्शकांच्या संगीत नाटकांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. संशयकल्लोळ, मृच्छकटिक, शारदा, मानापमान, मस्यगंधा, ययाती-देवयानी, हे बंध रेशमाचे, मीरा मधुरा, होनाजी बाळा, मंदारमाला आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत.

स्पर्धात्मक विपणनतंत्रामुळे दर्जेदार चित्रपटांवर अन्याय


पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेता आशुषोत राणा, अभिनेत्री गुल पनाग, दिग्दर्शक सोहेल ततारी. (छाया: प्रसाद सोनू)

अभिनेता आशुतोष राणा यांचे सडेतोड मत
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): व्यावसायिक व कलात्मक चित्रपटांची तुलनात्मकता योग्य निकषांवर आधारली जात नाही. चित्रपटांचे विपणन करताना कुणीतरी आपल्या कुवतीनुसार चित्रपटांचा दर्जा ठरवून वैयक्तिक फायद्यासाठी वातावरण निर्मिती करतो व त्या पोकळ व निराधार वातावरणावर आधारीत प्रसिद्धी माध्यमांकडून त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे दर्जेदार चित्रपटांवर अन्याय होतो, असे सडेतोड मत अभिनेता आशुतोष राणा यांनी व्यक्त केले.
"समर -२००७' या चित्रपटाचे प्रदर्शन आज भारतीय पॅनोरमा विभागात झाले. यानिमित्ताने पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री गुल पनाग, युवा अभिनेता आलेख सिकंदर, चित्रपटाचे दिग्दर्शक सोहेल ततारी, पटकथाकार ब्रिजेश जयराजन, निर्माते अतुल पांडे आदी हजर होते. चित्रपट क्षेत्रात आपले काही वैयक्तिक नियम किंवा आदर्श बाळगणाऱ्या कलाकारांना आपली मर्जी राखणे बरेच कठीण होते, हे सहन करण्याची तयारी हवी, असेही राणा म्हणाले. एक अभिनेता या नात्याने आपण आपल्या भूमिकेबाबत कोणतीही पूर्वकल्पना आखत नाही. एक साधा कलाकार या नात्याने दिग्दर्शकापुढे उभे राहून त्यांनी आपल्या इच्छेनुसार व चित्रपटाच्या कथानकानुसार ठरवलेले पात्र साकार करण्याचे पूर्ण स्वतंत्र त्यांना देतो,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. विविध जबरदस्त चित्रपटांत काम करूनही अद्याप प्रकाशझोतापासून कसे काय मागे राहिलात, असे विचारताच 'आपण स्वतःला विकण्याचे तंत्र अद्याप अवगत केले नाही" असा टोला त्यांनी हाणला. आपल्या वेगळ्या भूमिकेबाबत किंवा वेगळ्या चित्रपटांबाबत रसिक आपली आठवण करतात हेच समाधान असल्याचेही ते म्हणाले. आपले भारतीय प्रेक्षक हे पूर्वीपासूनच कलेचे उपासक आहेत. "मदर इंडिया',"मुगल ए आझम' आदी चित्रपट कलात्मकच होते तसेच प्रेक्षकांनी हे चित्रपट उचलून धरल्याने व्यावसायिक पातळीवरही ते यशस्वी ठरले, असेही राणा यांनी यावेळी सांगितले.
चित्रपट सृष्टीत केवळ काही काळ आपला दबदबा तयार करून नंतर नामानिराळे होण्याचा आपला अजिबात मनसुबा नसून या क्षेत्रात दीर्घकाळ आपल्याला काम करायचे आहे, असे मत अभिनेत्री गुल पनाग हिने व्यक्त केली. "ग्लॅमर'च्या मागे धावून अल्प काळात प्रकाशझोतात येण्याची कोणतीही घाई आपल्याला नसून आपले अंतर्मन ज्या भूमिकेला व चित्रपटाला संमती देते तेच आपण स्वीकारीत असल्याचेही तिने मान्य केले. एखादी जरी निवड चुकीची ठरली तरी ती भूमिका कायम राहत असल्याने संपूर्ण कारकिर्दीत ती अपयशाची आठवण करीत राहते, असेही ती म्हणाली. खास करून युवकांच्या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. उच्च शिक्षणासाठी कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या युवकांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्याचा त्यांच्यावर कसा काय परिणाम होतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चांगल्या कलाकृती व चांगल्या अभिनयाचा पुरस्कार प्रसारमाध्यमांनी केल्यास त्यांच्यावर अन्याय होणार नाही, असे आवाहन निर्माते अतुल पांडे यांनी केले.

काळाच्या ओघात अनेक जन्ममृत्यू : स्वामी केदारनाथ


खडपाबांध फोंडा येथील विश्व हिंदू परिषद सभागृहात "विश्व हिंदू परिषद, गोमंतक - २००९' दिग्दर्शिकेचे प्रकाशन करताना फोंडा चिन्मय मिशनचे स्वामी केदारनाथ. सोबत विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री एकनाथ नाईक, समाज कार्यकर्ते जयंत मिरींगकर. (छायाः पांडुरंग सामंत)

'विश्व हिंदू परिषद, गोमंतक-२००९' दिग्दर्शिकेचे प्रकाशन
तिस्क उसगाव, दि.२४ (प्रतिनिधी): तारुण्यात आपण बेफिकीर असतो मात्र वृद्धावस्थेत चिंताग्रस्त असतो. सृष्टीच्या कालक्रीडेत कितीतरी जीवजंतू जन्म घेतात, कर्म करतात आणि काळाच्या ओघात निघून जातात, असे प्रतिपादन फोंडा चिन्मय मिशनचे स्वामी केदारनाथ यांनी केले. आज सायंकाळी खडपाबांध फोंडा येथे विश्व हिंदू परिषद सभागृहात "विश्व हिंदू परिषद, गोमंतक - २००९' या दिग्दर्शिकेच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांच्या हस्ते दिग्दर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हिंदू धर्मात पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो. मृत्यू सोबत आपण फक्त आपले कर्म घेऊन जाऊ शकतो. आपण आपल्या पुढील जीवन यात्रेसाठी सत्कर्म करायला हवे. बाल वयात लहान मुलांच्या मनावर चांगले संस्कार करायला हवेत. युवा अवस्थेत त्यांना योग्य दिशा व जीवनाचे ध्येय द्यायला हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जीवनात सर्वांत उच्च ध्येय भगवंताची प्राप्ती करून घेणे आहे. मध्यम वयस्क होतो तेव्हा समाजकार्यात वाहून घेतले पाहिजे. वानप्रस्थ अवस्थेत भगवंताचे सतत नामस्मरण करायला हवे. वृद्धावस्थेत चिंता करता कामा नये. या वयात फक्त भगवंताचे स्मरण (चिंतन) करायला हवे. अशा प्रकारचे जीवन हेच आदर्श जीवन आहे, असे ते पुढे म्हणाले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री एकनाथ नाईक, समाज कार्यकर्ते जयंत मिरींगकर व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यंकटेश कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यंदा दिग्दर्शिकेच्या दहा हजार प्रती काढण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक हिंदूच्या घरात भिंतीला ही दिग्दर्शिका असावी असा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न आहे. गावात आमच्या कार्यकर्त्यांचे बळ कमी आहे. हिंदू बांधवांनी कार्यालयात येऊन दिग्दर्शिका घेऊन जाव्यात, असे आवाहन विभाग मंत्री एकनाथ नाईक यांनी यावेळी केले.
सूत्रसंचालन, स्वागत विश्व हिंदू परिषद कार्यालय पदाधिकारी सुहास हुडेकर यांनी केले. प्रास्ताविक दिलीप देसाई यांनी केले. या कार्यक्रमाला विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

Monday 24 November, 2008

संवेदनाशून्य सरकार सत्ताभ्रष्ट करा

मधू चव्हाण यांचे पाळीवासीयांना आवाहन

पाळी, दि. २३ (प्रतिनिधी) - ग्रामपंचायत स्तरापासून ते लोकसभेपर्यंत कॉंग्रेसला खड्याप्रमाणे वेचून काढून बाहेर फेकण्याची वेळ आज आली आहे, कारण माणसाच्या ह्रदयात देवत्व जागविण्याच्या कर्तव्याकडे पाठ फिरवून त्यांनी माणसाच्या ह्रदयात सैतान जागविण्याचे आजपर्यंत कर्म केले आहे. खून, बलात्कार, तोडफोड, चोऱ्या, दरोडे यासारखी दुष्कृत्ये होऊनही काहीच न झाल्यासारखे वावरणाऱ्या कॉंग्रेसी नराधमांना ठेचून काढण्याची गरज आहे. जनतेच्या भावनांची कल्पना नसलेल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही, असे उद्गार महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस मधू चव्हाण यांनी साखळी येथे जाहीर सभेत काढले.
उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित साखळी येथील सभेत चव्हाण प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, मनोहर पर्रीकर, अल्पसंख्याक मोर्चाचे इब्राहिम मुसा, शिवसेनेचे सुभाष सावंत, उपेंद्र गावकर, नामदेव नाईक, कुंदा चोडणकर, शुभदा सावईकर, सुभाष मळीक व अन्य उपस्थित होते.
गोव्याच्या भूमीला कॉंग्रेसचे काळे पाय लागल्यापासून गोव्याची अधोगती सुरू आहे, या पक्षाने तरुणाईला लाचार बनविले आहे तर महिलांचे अस्तित्वच नाहीसे केले आहे, अशा राज्यकर्त्यांना तडीपार करण्याची वेळ आली आहे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. ज्या सरकारमधील मंत्री व आमदार एकमेकांविरुद्ध आरोप करीत आहेत, असे स्वार्थी सत्ताधारी गोव्याचा विकास कसा करतील, असा प्रश्न मनोहर पर्रीकर यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री कसा असावा याचे उत्तम उदाहरण मनोहर पर्रीकर यांच्या रुपाने आपल्यासमोर आहे, त्यांनी गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रासमोरही चांगल्या कामगिरीने उदाहरण ठेवले आहे, असे सुभाष सावंत यांनी सांगितले.
गोव्यात चाललेली बजबजपुरी संपविण्याची संधी पाळीवासीयांना २६ रोजी मिळाली आहे, त्याचा उपयोग करून सरकार खाली खेचा, असे आवाहन उपेंद्र गावकर यांनी यावेळी केले. विजय पै खोत, लक्ष्मीकांत पार्सेकर, इब्राहिम मुसा, दामोदर नाईक, फ्रांसिस डिसोझा यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना आपण समाजसेवेत कधीही मागे पडणार नसल्याची ग्वाही दिली. दामू घाडी, प्रदीप अवखळे, प्रवीण सावळ, सुभाष सावळ, उपेंद्र कर्पे, शाबल परब, सिद्धेश काणेकर आदी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. संतोष भगत यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष भणगे यांनी आभार मानले.

आज प्रचाराची समाप्ती

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणूक प्रचाराची रणधुमाळी उद्या (सोमवारी) ५ वाजता संपणार असून मतदान संपेपर्यंत पुढील अठ्ठेचाळीस तास पाळी मतदारसंघात स्वरूपाचा छुपा प्रचार करता येणार नाही, अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतदार कार्डे वितरण किंवा घरोघरी फिरणे आदी प्रकारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. पाळी मतदारसंघाबाहेरील कोणत्याही राजकीय नेत्यांना किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांना या मतदारसंघात प्रवेश करता येणार नाही व त्यासाठी मतदारसंघात प्रवेश करण्यासाठी असलेल्या चार प्रमुख मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अरविंद बुगडे यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग खपवून घेतला जाणार नसल्याचे सक्त आदेश जारी केले आहेत. मोबाईलवरील प्रचारालाही या काळात बंदी असून आयोगाकडे किंवा निवडणूक निरीक्षकांकडे तशा तक्रारी आल्यास गुन्हा नोंद करून घेणे भाग पडणार असल्याची तंबीही श्री. बुगडे यांनी दिली. मतदानासाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात आल्याने ओळखपत्र नसलेल्या मतदारांसाठी उद्या शेवटची संधी असेल.उद्या २४ रोजी डिचोली नगरपालिका सभागृह व बाये-सुर्ला येथे ओळखपत्र वितरणाची खास सोय करण्यात आली आहे. मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये,यासाठी ही खास सोय करण्यात आली आहे. डिचोली येथे ओळखपत्र वितरण केंद्र फक्त दुपारपर्यंत सुरू असेल; तर बाये-सुर्ला येथे पूर्ण दिवस मतदार ओळखपत्र वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारयादीत नावे असताना ओळखपत्र नसलेल्या मतदारांनी तात्काळ या केंद्रात जाऊन ओळखपत्र बनवून घ्यावे, असे आवाहन बुगडे यांनी केले आहे.
डॉ. आमोणकरांच्या अतिरिक्त मालमत्तेचे पुरावे आज सादर करणार
दरम्यान, "सेव्ह गोवा फ्रंट'चे पाळी पोटनिवडणूक उमेदवार जुझे लोबो यांनी अपक्ष उमेदवार डॉ.सुरेश आमोणकर यांच्या विरोधात मालमत्ता प्रतिज्ञापत्रावरून दाखल केलेल्या तक्रारीसंबंधीचे पुरावे उद्या २४ रोजी सादर केले जातील,अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष आंतोन गावकर यांनी दिली. डॉ.आमोणकर यांनी स्वतःच्या संपत्तीबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खरी माहिती दिली नसल्याची तक्रार श्री.लोबो यांनी केली आहे. या प्रतिज्ञापत्रात सुमारे ५० लाख रुपयांच्या मालमत्तेबाबत कोणतीच माहिती नसल्याने त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात यावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.

केवळ पैशाने दर्जेदार चित्रपट बनत नाहीत

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांची खंत
प्रीतेश देसाई
पणजी, दि. २३- "करोडो रुपये खर्च केले म्हणून दर्जेदार चित्रपट बनत नाही. शरीर चांगले, पण त्यात आत्माच नाही,' अशी अवस्था सध्याच्या चित्रपटांची झाल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते व निर्माते रणधीर कपूर यांनी "बिग बजेट' चित्रपटांबद्दल बोलताना व्यक्त केली.
ते आज सकाळी मॅकानिज प्लाझामधे "शॉर्ट फिल्म सेंटर'चे उद्घाटनप्रसंगी आले असता बोलत होते. चित्रपटांचा दर्जा पैशांवरून ठरत नाही. पूर्वी चित्रपटाच्या कथेला अधिक महत्त्व दिले जायचे. बजेट कमी असायचे तरीही दर्जेदार चित्रपट रसिकांना पाहायला मिळत होते. आगामी काळात माझ्या स्वप्नातील चित्रपट साकार करण्याची इच्छा आहे' असे श्री. कपूर पुढे म्हणाले.
"गोव्याची "शीतकडी' आपल्याला अत्यंत प्रिय आहे. कधीकधी केवळ या जेवणाचा आनंद लुटण्यासाठीच गोव्याची वारी करतो आपण गोव्याची वारी करतो, असे त्यांनी हसत हसत सांगितले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपयुक्त अशा वातावरणाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास गोव्याशिवाय ते अन्य कोठेच उपलब्ध होणार नाही, असे निरीक्षण दिग्गज चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी नोंदवले. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी काही राज्यांची चढाओढ सुरू होती, त्यावेळी आपण गोव्यातच हा महोत्सव व्हावा यासाठी प्रयत्न केले होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न - रिक्षाचालकाला अटक

मडगाव, दि. २३ (प्रतिनिधी) - सांजुझे आरियाल येथे काल संध्याकाळी एका १२ वर्षीय शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ माजली व नंतर पोलिसांत तक्रार झाल्यानंतर मडगाव पोलिसांनी खारेबांध येथील मुन्ना आरेकट्टी या मालरिक्षाचालकाला अटक केली. त्याच्यावर अपहरणाचा प्रयत्न केल्याचा (भा. दं. सं. कलम३६६) आरोप ठेवणायात आला आहे.
नेसाय येथील एकाने नोंदविलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराचा मुलगा सा जुजे आरियाल येथील शाळेत निघाला असता आरोपी रिक्षा घेऊन जात होता. एकट्याच चालत जाणाऱ्या त्या मुलाला पाहून त्याने रिक्षा थांबविली व त्याला कुठे जातोस, असे विचारले त्याने सां जुझे आरियाल असे सांगताच आपण तिथेच जात आहे, तुला तेथे सोडतो असे सांगितले व त्याचा हात पकडून ओढले. रिक्षा संथ चालू असतानाच हा प्रकार घडला. त्या मुलाने हे काही धड नव्हे असा विचार केला व धावत्या रिक्षातून खाली उडी मारून त्याने पळ काढला.
त्यामुळे एकच गडबड उडाली. ही संधी साधून रिक्षावाल्याने पळ काढला. मुलाने घरी जाऊन ही हकीकत सांगितल्यावर पोलिस तक्रार झाली व आज आरोपीस अटक करण्यात आली.

सत्यव्रत शास्त्री यांना संस्कृतसाठी ज्ञानपीठ

नवी दिल्ली, दि. २३ - संस्कृतचे गाढे अभ्यासक सत्यव्रत शास्त्री यांना साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्री यांनी तीन महाकाव्ये लिहिली असून त्यामध्ये एक हजारांहून अधिक श्लोक आहेत. श्रीबोधिसत्वचरितम, बहुत्तमभारतम व वैदिक व्याकरण या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती होत. साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. संस्कृतसारख्या विस्मृतीत जात असलेल्या भाषेतील साहित्यिकाला हा बहुमान प्राप्त झाल्याची ही घटना दुर्मीळच म्हणावी लागेल.

राज ठाकरेंनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

मुंबई, दि. २३ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज येथे दुपारी दीडच्या सुमारास "मातोश्री'वर जाऊन शिवसेनाप्रमुख तथा आपले काका बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला होता. सुमारे दीड तास राज हे मातोश्रीवर होते. आरंभी त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सुमारे तासभर भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ते मातोश्रीवर आल्याचे समजताच वरच्या मजल्यावर असलेल्या बाळासाहेबांनी राज व उद्धव यांना आपल्याजवळ बसवून घेऊन आगामी राजकीय वाटचालीबद्दल वडिलकीचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जरी आता स्वतंत्र पक्ष असले तरी उद्धव आणि राज यांनी परस्परांवर टीका करू नये, असेही बाळासाहेबांनी उभयतांना समजावल्याचे सांगण्यात आले. डेव्हिड लो या प्रसिद्ध हास्यचित्रकाराचे पुस्तक याप्रसंगी राज यांनी शिवसेनाप्रमुखांना भेटीदाखल दिले. डेव्हिड लो हे शिवसेनाप्रमुखांचे अत्यंत आवडते हास्यचित्रकार आहेत.

Sunday 23 November, 2008

रवींद्र केळेकर यांना "ज्ञानपीठ'
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) ः ज्येष्ठ गोमंतकीय कोकणी साहित्यिक रवींद्र केळेकर यांना आज राष्ट्रीय पातळीवर साहित्यात सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने गोव्यात आनंदाचे वातावरण पसरले. गेल्या जानेवारीत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गोव्याची राजभाषा असलेल्या कोकणीसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याने हा गोमंतकीयांचा सन्मान असल्याचे श्री. केळेकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केळेकर यांनी गोवा मुक्तीसाठी दिलेले योगदानही महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी हा दर्जेदार आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या साहित्याचा सन्मान असल्याचे सांगून केळेकर यांचे अभिनंदन केले आहे.
कोकणी साहित्य व भाषेचा सन्मान ः केळेकर
फोंडा, (प्रतिनिधी) ः आपणाला मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा कोकणी भाषा आणि साहित्याचा सन्मान आहे, असे उद्गार ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांनी "गोवादूत'शी बोलताना आज काढले.
कोकणी भाषेला व्याकरण नाही, लिपी नाही. दुसऱ्या भाषेची बोली म्हणून हिणवले जात होते. या ज्ञानपीठ पुरस्काराने कोकणी भाषेची जागा कुठे आहे हे दाखवून दिले आहे, असे श्री. केळेकर यांनी सांगितले.
श्री. केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार झाल्याची माहिती जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला. यापूर्वी भारत सरकारने याचवर्षी जानेवारीत पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. तसेच त्यांना फेलो २००८ प्राप्त झालेली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक श्री. केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने हितचिंतक, चाहते यांनी साहित्यिक श्री. केळेकर यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. गोव्यातील साहित्यिक आणि हितचिंतकांनी त्यांच्या प्रियोळ येथील घरी जाऊन साहित्यिक श्री. केळेकर यांचे अभिनंदन केले. आर्किटेक्ट गिरीष केळेकर यांनी आपले वडील ज्येष्ठ साहित्यिक श्री. केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
दर्जेदार साहित्यावर मोहर ः पर्रीकर
ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांना साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या दर्जेदार व वैचारिक प्रतिष्ठान असलेल्या साहित्यावर राष्ट्रीय स्तरावर मोहर उठली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. केळेकर हे शारदेच्या दरबारातील उपासक आहेत, त्यांचे लेखन कसदार व विवेकपूर्ण आहे. साहित्यिक क्षेत्रातही गोमंतकीय मागे नाहीत, हेच आजच्या पुरस्काराने सिद्ध झाले आहे, असे पर्रीकर यांनी केळेकर यांचे अभिनंदन करताना सांगितले. केळेकर यांच्या महान कार्याची ही पोचपावती असल्याचे भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांनी म्हटले आहे.
कोकणीचा तिसऱ्यांदा सन्मान ः पुंडलिक नायक
रवींद्र केळेकर यांचा "ज्ञानपीठ' ने झालेला गौरव हा कोकणी भाषेच्या आजवरच्या संघर्षाचा आणि सर्जनाचा विजय आहे, कोकणीला साहित्य अकादमीकडून मिळालेली मान्यता, कोकणीचा घटनेच्या आठव्या परिशिष्टात झालेला समावेश आणि आता केळेकर यांना मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे कोकणीचा तिसऱ्यांदा झालेला सन्मान आहे, अशा शब्दांत गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पुंडलिक नायक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोकणीत अनेक प्रतिभावंत लेखक आहेत, तरीही ज्येष्ठता आणि त्यांची साहित्यातील श्रेष्ठता यामुळे केळेकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. नायक यांनी आनंद व्यक्त केला. "इफ्फी'च्या उद्घाटनादिनी हा पुरस्कार मिळाल्याने आपला आनंद द्विगुणित झाल्याचे त्यांनी सांगितले. केळेकर यांचा अनुयायी म्हणून जसा आपल्याला या वृत्ताने आनंद झाला, त्याचप्रमाणे कोकणी अकादमीचा अध्यक्ष म्हणूनही आपण त्यांचे विशेष अभिनंदन करीत असल्याचे नायक म्हणाले. केळेकर हे अकादमीच्या पहिल्या कार्यकारिणीचे सदस्य होते, हेही त्यांनी साभिमान नमूद केले. केळेकर यांच्या "महाभारत'ग्रंथाचे प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते करण्याचा मान अकादमीला मिळाला होता, असे ते म्हणाले.
आपल्या प्रागतिक विचारांनी गोव्याची नवी पिढी घडविण्याचे सातत्यपूर्ण कार्य हे केळेकरांचे मोठे योगदान असून, त्यांना मिळालेला पुरस्कार हा सर्व गोमंतकीयांचा सन्मान असल्याचे पैंगीण कोकणी अस्मिताय मंचचे निमंत्रक अनंत अग्नी यांनी पत्रकात म्हटले आहे.
थाटात शुभारंभ
गोव्याचा इफ्फी जागतिक आकर्षण ठरावा ः रेखा
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) ः गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील अन्य कोणत्याही चित्रपट महोत्सवाच्या तोडीसतोड आहे. त्यामुळे आगामी काळात हा महोत्सव साऱ्या जगाचे प्रमुख आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन ३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटक तथा सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी केले.
कला अकादमीच्या खचाखच भरलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात ३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज थाटात उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्या अभिनेत्री रेखा यांनी पारंपरिक दीपप्रज्वलनाने या सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माहिती व प्रसारण तथा विदेश राज्यमंत्री आनंद शर्मा, माहिती व प्रसारण सचिव श्रीमती सुषमा सिंग, गोव्याचे मुख्य सचिव श्री. जे. पी. सिंग, महोत्सवाचे संचालक एस.एम. खान, महापौर टोनी रॉड्रिगीस आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे आकर्षण ठरलेली मूळ गोमंतकीय तेलगू अभिनेत्री इलियान डिक्रूझ हिने यावेळी रेखा यांची सोबत केली. अभिनेत्री अमृता राव यांनी आपल्या खास शैलीत उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
"गोवा हे आपले नेहमीच आवडीचे स्थळ ठरले आहे व भविष्यात याच भूमीत आपले घरही असेल" असे कौतुगोद्गार रेखा यांनी गोमंतभूमीबद्दल काढूनगोव्यावर स्तुतिसुमनांची बरसात केली. मंत्री आनंद शर्मा यांनी आपल्या भाषणात चित्रपट उद्योगाने देशाच्या सांस्कृतिक इतिहासात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. केवळ मनोरंजनच नव्हे तर समाजाला योग्य दिशा देणे व संवेदनशील विषय हाताळताना सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचे कामही चित्रपट उद्योगाने केले आहे. धार्मिक कलह किंवा दहशतवाद आदी विषय हाताळतानाही सामाजिक भान ठेवूनच या उद्योगाने कार्य केल्याचे ते म्हणाले. चित्रपट उद्योगाचा मूळ हेतू जरी मनोरंजन करणे असले तरी एक उद्योग या नात्याने व्यवसाय व रोजगारनिर्मिती ही या उद्योगाची प्रमुख प्राप्ती आहे. चित्रपट उद्योगाचे प्रमुख केंद्र भारत बनावा यासाठी प्रयत्न चालू असून या उद्योगातील लोकांनी केंद्र सरकारसमोर ठेवलेल्या मागण्या व अडचणी यांच्यावर लवकरच तोडगा काढू,असे अभिवचनही त्यांनी यानिमित्ताने दिले.
राज्यपाल एस. एस. सिद्धू यांनी चित्रपटांबद्दल आपले ज्ञान मर्यादित जरी असले तरी चांगल्या निर्मितीचा आनंद आपण लुटतो. आपल्याकडे संग्रह असलेल्या काही मोजक्या हिंदी चित्रपटांत रेखा यांनी अभिनय केलेल्या दोन चित्रपटांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले, चित्रपट उद्योगात अनेक गोमंतकीयांनी मोलाचे योगदान दिले आहे. गोव्यात चित्रपट संस्कृती रुजावी व त्यानिमित्ताने येथील निर्मात्यांना या उद्योगात प्रवेश करण्याची संधी मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. "इफ्फी'च्या आयोजनाबाबत मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी दिलेल्या सहकार्याची आठवण काढून त्यांची प्रकृती स्थिर होवो,अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.
महोत्सवाचे संचालक श्री.खान यांनी स्वागत केले. श्रीमती सुषमा सिंग यांनीही आपले विचार प्रकट केले. महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागाच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष पीटर हो सन चान तसेच इतर सदस्य मार्को म्युलर, निकी कारीमी, तब्बू, लाव दियाज यांची खास उपस्थिती होती. त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांची उपस्थितांना ओळख करून देण्यात आली.
या महोत्सवानिमित्त पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. आज दाखल झालेल्या पाहुण्यांत सचिन पिळगावकर, रणधीर कपूर,तब्बू, अमृता राव, इलिना डिक्रुझ यांच्यासह अनेक विदेशी अभिनेत्यांचाही समावेश होता. हॉंगकॉंगचे विख्यात दिग्दर्शक पीटर चॅन्स यांच्या " दी वॉरलॉर्डस" या चिनी चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. या चित्रपटाने महोत्सवाचे रंग गहिरे करत नेले...
कडेकोट सुरक्षा
दरम्यान, "इफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त कला अकादमी तसेच महोत्सवाच्या ठिकाणी कडेकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. "मेटल डिटेक्टर'द्वारे तपासणीशिवाय कोणालाच आत प्रवेश न देण्यात येत नव्हता. गोव्याबाहेरून आलेल्या काही प्रतिनिधींनी सुरूवातीस पोलिसांकडून तपासणी होत असल्याने उशीर होत असल्याचा आवाज सुरू करण्यात आला असता उर्वरीत लोकांनी पोलिसांच्या तपासणीचे समर्थन करून सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असल्याने विनाकारण कोणत्याही विषयावरून गोंधळ न माजवण्याची तंबी देताच हे लोक आपोआप गप्प बसले.
साहित्यिक रवींद्र भट
यांचे पुण्यात निधन

पुणे, दि. २२ - संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी रवींद्र भट यांचे आज पहाटे पुण्यातील घरी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कादंबरीकार-कवी म्हणून भट यांनी मराठी साहित्य विश्वात मोलाची भर घातली. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. इंद्रायणी काठी, जय जय रघुवीर समर्थ, भेदिले सूर्यमंडळा या त्यांच्या कांदबऱ्या गाजल्या. संत ज्ञानेश्वर हा जणू त्यांच्या अभ्यासाचा श्वास व ध्यास होता. ते कधीच संत ज्ञानेश्वर असे म्हणायचे नाहीत. त्याऐवजी ते ज्ञानोबांचा उल्लेख आत्यंतिक आदराने "माऊली' असा करायचे. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात दुःख व्यक्त करण्यात आले.

वेर्णा महामार्गावर टॅंकर-ट्रेलर अपघात


वेर्णा येथे अपघातग्रस्त ट्रेलर, टॅंकर व रस्त्यावर सांडलेले पेट्रोल. (छाया: पंकज शेट्ये)
वास्को, दि. २२ (प्रतिनिधी)ः येथील वेर्णा महामार्गावर १४ चाकी ट्रेलरची धडक १२ हजार लीटर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. टॅंकरमधील ३ हजार लीटर रस्त्यावर सांडून वाया गेले. तसेच १५ टन वजनाच्या लोखंडी प्लेट्स रस्त्यावर पडल्याने तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला.
आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पेट्रोलचा साठा घेऊन काणकोण येथे जात असलेला टॅंकर (जीए ०२ टी ९१२५) मेटास्ट्रीप कंपनीजवळ पोहोचला असता मागून येणाऱ्या ट्रेलरने (जीए ०२ व्ही ६४८७) ओव्हरटेक करण्याच्या नादात टॅंकरला जोरदार धडक दिली. ट्रेलरवर लादलेल्या १५ टन वजनाच्या प्लेट्स टॅंकरला आपटल्याने पेट्रोलच्या टाकीचा मागील भाग फुटून ३ हजार लीटर पेट्रोल रस्त्यावर सांडले. यावेळी ट्रेलरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. ट्रेलरमधील क्लीनर जखमी झाल्याने त्याला तातडीने इस्पितळात नेण्यात आले. यावेळी रस्त्यावर आणखी वाहने नसल्याने अनर्थ टळला.
महामार्गावर मोठ्या प्रमाणात पेट्रोल सांडल्याने येथे स्फोट होण्याची किंवा आग लागण्याची शक्यता टाळण्यासाठी अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी बोलावण्यात आल्या.
ट्रेलरचा क्लीनर गंभीर जखमी झाला असला तरी टॅंकर चालक प्रेमदास वेळीप (३१) सुखरूप बचावल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले.