Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 12 June, 2009

ते दोघे रुग्ण 'स्वाईन फ्लू'चे?

आज चाचणी अहवाल
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : गोव्यात वराह ज्वर (स्वाईन फ्ल्यू)चे दोन रुग्ण आढळून आल्याच्या वृत्ताने संपूर्ण गोव्यात खळबळ माजली आहे. मात्र, या दोघांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे अद्याप सिद्ध झालेले नसून ते संशयित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या संचालिका राजनंदा देसाई यांनी दिली. यात उत्तर गोव्यातील ३५ वर्षीय महिलेचा तर, दक्षिण गोव्यातील ४१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पहिल्या चाचणीत त्यांना वराह ज्वराची लागण झाल्याचे आढळल्याने ताबडतोब त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय विरोलॉजी संस्थेमधे पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल उद्यापर्यंत मिळणार आहे. या चाचणीत त्यांना या ज्वराची लागण झाल्याचे सिद्ध झाल्यास योग्य उपचार सुरू केले जाणार असल्याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली.
आज दुपारी गोव्यात वराह ज्वराचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती उघड होता एकच खळबळ माजली. राष्ट्रीय तसेच स्थानिक पत्रकारांनी आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता या माहितीला दुजोरा देण्यास नकार देण्यात आला. शेवटी थेट आरोग्य संचालकांच्या कार्यालयात धडक दिल्यानंतर दोन संशयित रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. दि. ४ जून रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. ही व्यक्ती मूळ गोमंतकीय असून लंडन येथून मुंबईत आणि त्यानंतर गोव्यात दाखल झाली होती. यावेळी दाबोळी विमानतळावर त्याची तपासणी करण्यात आली असता, त्याच्यात स्वाईन फ्ल्युची लक्षणे आढळून आल्याने चिखली वास्को येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शारजा येथून गोव्यात परतलेल्या एका महिलेलाही या रोगाची लक्षणे आढळल्याने तिलाही निरीक्षणाखाली इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या रोगाची अजून फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असून या दोघाही रुग्णांना स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली. दि. ४ रोजी आढळून आलेल्या या रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. यावेळी ""इन्फ्ल्युएनझा (अ)'' चे घटक सापडल्याने त्याची खात्री करण्यासाठी पुढच्या चाचणीसाठी रक्ताचे नमुने ताबडतोब दिल्ली येथे पाठवण्यात आले आहे.
"स्वाईन फ्ल्यु'ला सामोरे जाण्यास आरोग्य खाते समर्थ असल्याचा दावा करून या रोगावर रामबाण ठरणारी दोन हजार ""ऑसेलताम्वीर'' कॅप्स्यूल उपलब्ध असल्याची माहिती यावेळी डॉ. देसाई यांनी दिली. त्याप्रमाणे अशा रुग्णांना उपचार करण्यासाठी चिखली येथील कॉटेज इस्पितळात खास व्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी स्वतंत्रपणे रुग्णांना ठेवण्यासाठी पाच खोल्या असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
या रोगाच्या संदर्भात आज दोबोळी विमानतळावर २१९ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ६ हजार ६७५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संस्थेने हा विषाणू अत्यंत धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यत ७३ देशांत स्वाईन फ्ल्युने धडक दिली असून २६ हजार ५६३ लोकांनी त्याची लागण झाली आहे. तर, १४० जणं या रोगाचे बळी पडले आहेत.

'साबां'खाते कंत्राटी कामगारांना सरकारकडून पुन्हा हुलकावणी

कामगार आयुक्तांकडून सचिव श्री.त्रिपाठी यांना समन्स
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): विद्यमान सरकारकडून सार्वजनिक बांधकाम खात्यातील कंत्राटी कामगारांची थट्टा सुरू आहे. गेली दहा ते बारा वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या या कामगारांना सेवेत नियमित करण्याच्या करारावर आज सही करण्याचे मान्य करूनही सरकारकडून पुन्हा हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्याची कृती घडली. या प्रकारामुळे कामगार संघटनेतर्फे तीव्र संपात व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी मध्यस्थी करणारे कामगार आयुक्त व्ही. बी. एन. रायकर यांनी सरकारच्या या बेपर्वाईची दखल घेऊन सा. बां. खात्याचे सचिव पी.त्रिपाठी यांना पुढील बैठकीस हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्यात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांना सेवेत नियमित करण्याच्या प्रस्तावावर कामगार आयुक्त श्री.रायकर यांच्यासमोर चर्चा सुरू आहे. सा.बां.खाते कंत्राटी कामगार सोसायटीअंतर्गत हे कामगार सेवेत आहेत. दरम्यान, या कामगारांना सोडून खात्याकडून नव्या कामगारांची थेट भरती केली जात असल्याने त्याला संघटनेतर्फे हरकत घेण्यात आली आहे. नोकर भरतीत या कामगारांना प्राधान्य मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगून या सर्व कामगारांना तात्काळ सेवेत नियमित करा,अशी मागणी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केली आहे. "समान काम समान वेतन', बोनस, सुट्टी आदी सर्व सुविधा या कामगारांना मिळाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. या कामगारांच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव गेल्या मार्च २००८ साली कामगार आयुक्तांना देण्यात आला आहे. या प्रस्तावावर आता सुमारे ३२ बैठका झाला पण सरकारकडून एनकेन प्रकारेण वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. या कामगारांपैकी बहुतेक कामगार हे सा.बां.खात्याच्या पाणी विभागात कामाला आहेत, त्यामुळे त्यांनी एकदा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशाराही दिला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री व सा.बां.खातेमंत्री चर्चिल आलेमाव यांनी त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे मान्यही केले होते. मुख्य सचिव जे.पी.सिंग यांनी ११ जून रोजी अंतिम करारावर सह्या करण्याचेही मान्य केले होते परंतु आज मात्र त्यासंदर्भातच काहीही करण्यात आले नसल्याचे उघड झाले. या सर्व कामगारांनी आज कामगार आयुक्त श्री.रायकर यांच्या कार्यालयात धडक दिल्याने त्यांनी तात्काळ सा.बां.खात्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्री.रेवणकर,सदस्य सचिव श्री.परब, प्रशासकीय संचालक श्रीपाद नाईक व प्रधान अभियंते श्री.वाचासुंदर हजर राहिले. या कामगारांबाबतचा प्रस्ताव सा.बां.खात्याकडून पाठवण्यात आला आहे परंतु तो सध्या सचिव पातळीवर अडकून असल्याची माहिती देण्यात आली. खुद्द मुख्य सचिवांनी आश्वासन देऊनही हा प्रस्ताव नेमका का अडला हे जाणून घेण्यासाठी कामगार आयुक्त श्री.रायकर यांनी खात्याचे सचिव श्री.त्रिपाठी यांना पुढील बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत. या कामगारांना सेवेत नियमित करण्याबाबत सचिवांनी नोट तयार करायला हवा व हा नोट मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करून त्याला मान्यता मिळाल्यानंतरच या कामगारांच्या विषयावर तोडगा निघाला,असे म्हणता येईल. दरम्यान,कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सरकारच्या या बेपर्वाईवृत्तीचा निषेध केला व कामगारांप्रति हे सरकार अजिबात गंभीर नसल्याचा आरोप केला. येत्या १५ जून रोजी मंत्रिमंडळ बैठक आहे. या बैठकीत या कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही किंवा सरकारने या कामगारांना सेवेत नियमित करण्याच्या कराराला मान्यता दिली नाही तर मात्र रस्त्यावर उतरण्यावाचून पर्याय नाही,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पणजीत सर्वत्र कचऱ्याचे ढीग राजधानीवर रोगराईचे संकट

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : पणजी महापालिकेने कचरा विल्हेवाट लावण्यास जागा नसल्याचे कारण पुढे करून गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कचरा उचलायचे बंद केल्याने पुन्हा एकदा राजधानीतील लोकांना कचऱ्यावरून वेठीस धरले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याने ढिगारे साचले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मासळी तसेच भाजी बाजारात जाण्यासाठी येणाऱ्या लोकांना अक्षरशः नाक दाबून जावे लागते. आज सकाळ पासून बाजारात गेलेल्या अनेकांना या असह्य दुर्गंधीमुळे अनेकांना उलट्या (ओकारी) झाल्याच्या घटना घडल्या.
कांपाल परेड मैदानावर कचरा टाकण्यास या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी विरोध केल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. परेड मैदानावर टाकण्यात आलेला कचरा येत्या सात दिवसांत उचलला नसल्यास महापालिकेच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा आज पणजी नागरिक कृती समितीने दिला आहे तर, कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी आमच्याकडे जागा नसल्याने आम्ही कचरा उचलायचे बंद केल्याचे पणजी महापालिकेच्या महापौर कॅरोलिना पो यांनी सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी पणजी नागरिक कृती समिती व महापौर तसेच अन्य सदस्यांनी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने उद्या सकाळी पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे.
अतीश आन्तानियो फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली या कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे परेड मैदानावर बेकायदेशीर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना राहणे असह्य झाले असून मैदानावर टाकण्यात आलेला कचरा त्वरित हटवण्याची मागणी या समितीने केली आहे. त्याचप्रमाणे या मैदानावर उभारण्यात आलेला कचरा प्रक्रिया केंद्रही हटवण्यात यावे अशी मागणी केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साजलेले असून त्यात आळ्याही तयार झालेल्या आहेत. १८ जून रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या समोरही कचरा भरून मोठ्या पिशव्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणाहून येणाऱ्या लोकांना आणि पर्यटकांनाही या दुर्गंधीच्या सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी कांपाल येथील परेड मैदानावर महापालिकेतर्फे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले होते, तर आता पालिकेनेच कचरा उचलण्याचे बंद करून सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरवले आहे. परेड मैदानावर टाकण्यात आलेल्या कचऱ्याबरोबर मृत झालेले कुत्रेही टाकण्यात येत असल्याने अत्यंत दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे पालिकेला कचरा टाकण्यासाठी देण्यात आलेली परवानगी संपुष्टात येऊनही याठिकाणी अजूनही कचरा टाकण्यात येत असल्याचे दावा कृती समितीने केली आहे.
गेल्या वर्षी महापालिकेने परेड मैदानावर कचरा टाकणार नसल्याचे लेखी आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिले होते. त्याचप्रमाणे याठिकाणी टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर कीटक नाशकाची फवारणी करून तो कचरा पूर्णपणे झाकण्यात येणार असल्याचीही हमी दिली होती. परंतु, या लेखी आश्वासनाची पायमल्ली करून पणजी महापालिका याठिकाणी कचरा टाकायचे सुरूच ठेवले होते. पालिकेला याठिकाणी केवळ ओला कचरा टाकण्याची परवानगी यापूर्वी देण्यात आली होती.

पूजा नाईकला अटक करा : फोंड्यातील जाहीर सभांमध्ये एकमुखी मागणी

फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) : सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने केलेल्या युवतींच्या खून प्रकरणाची त्याची पत्नी पूजा नाईक हिला सुध्दा कल्पना असण्याची शक्यता असून पूजाची समाजातील वावरण्याची पद्धत संशयास्पद असून पूजाची सखोल चौकशी करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे पोलिसांनी पूजा नाईक हिला अटक करून तिची चौकशी करावी, अशी मागणी फोंडा येथे सीरियल किलर प्रकरणावरून आज (दि.११) संध्याकाळी घेण्यात आलेल्या दोन सभांतून करण्यात आली आहे. पोलीस पूजा नाईक हिची चौकशी का करीत नाहीत, पूजा नाईकचा गॉडफादर कोण, असे प्रश्न अनेक वक्त्यांनी केले.
पूजा नाईक हिची पोलिसांनी चौकशी न केल्यास सर्व महिलांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेऊन पोलिसांवर दबाव आणला पाहिजे तसेच गोवा महिला आयोगाने तिची चौकशी पाहिजे, असे मोनिका डायस यांनी राजीव गांधी कला मंदिरात महिला आयोगाने आयोजित सभेत बोलताना सांगितले.
सीरियल किलर महानंद नाईक याची पत्नी पूजा नाईक अनेक नावाने समाजात वावरत होती. समाजातील तिचे वागणे संशयास्पद आहे. दवर्ली मडगाव येथील जोतकर यांच्या घरी पूजा नाईक हिचे येणे जाणे सुरू होते. जोतकर घराण्यातील दोन युवती बेपत्ता झाल्यानंतर ती त्यांच्या घरी गेली नाही. अशा ह्या पूजा नाईक हिला कुणी आसरा देऊ नये, असेही श्रीमती डायस यांनी सांगितले.
पूजा नाईक हिला अटक करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जात आहे. श्रीमती जोतकर हिने सुध्दा पूजाबाबत संशय व्यक्त केलेला आहे. मात्र, पोलीस यंत्रणा तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात टाळाटाळ करीत आहे. पूजा नाईक हिची चौकशी केली तर अनेकांची बिंगे फुटण्याची शक्यता असल्याने याकडे कानाडोळा केला जात आहे, असेही वक्त्यांनी सांगितले. महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगांवकर यांनी सुध्दा पूजा नाईक हिच्या चौकशीची मागणी केली आहे. महानंद नाईक यांच्या खून प्रकरणाची पूजा नाईक माहिती असण्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे. लोकांकडून पूजाला अटक करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, पोलीस याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, पोलिसांवर राजकीय नेत्यांकडून दबाव येत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पूजा नाईक ही एक संस्था सुध्दा चालवत होती. या संस्थेला कुणाकडून पैसा मिळत होता याची करण्याची गरज आहे, अशी मागणी श्रीमती माधवीताई देसाई यांनी खडपाबांध येथे झालेल्या एका चर्चासत्रात केली. खून करण्यात आलेल्या युवतीची कुटुंबे त्रासात आहेत. तर खुन्याची पत्नी पणजीतील हॉटेलात आरामात राहत आहे. पूजाचा गॉडफादर कोण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पूजाला अटक केल्यास महानंदासंबंधी तिच्याकडून जास्त माहिती मिळू शकते, असे व्ही.डी. नाईक यांनी सांगितले.

Wednesday 10 June, 2009

डॉ. विलींचा समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम

पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)- गोवा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणाने आज अचानक उचल खाल्ली. प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी आज बोलावलेल्या तातडीच्या कार्यकारिणी बैठकीत आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला व सर्वांनाच चकीत करून टाकले. आपल्या या निर्णयाबाबत ते उद्या १० रोजी जाहीर खुलासा करणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षसंघटनेत गेले काही दिवस मोठ्याप्रमाणात फेरफार होण्याची शक्यता वर्तविली जात होती. आज गोवा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत या शक्यतेचा थेट परिणाम दिसून आला. प्रदेशाध्यक्ष डॉ.विली डिसोझा यांनी आज बोलावलेल्या कार्यकारिणी बैठकीत आपल्या समर्थक सदस्यांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाबरोबर पदांचाही त्याग करण्याचा निर्णय घोषित केला. या बैठकीला विधिमंडळ गटाचा एकही सदस्य हजर नव्हता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अधिकाधिक कॉंग्रेसच्या जवळ जात असून येत्या काळात हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याची प्रतिक्रिया आज डॉ.विली यांनी उपस्थित कार्यकारिणी सदस्यांसमोर मांडली. लोकसभेतील पक्षाची कामगिरी व त्यात पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी स्वीकारलेली भूमिका ही या पक्षाचे भवितव्य धूसर असल्याचे स्पष्ट संकेत देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान,येत्या काळात हा पक्ष पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षात विलीन होण्याचीच दाट शक्यता असल्याने राज्यात त्याचा प्रसार करून काय उपयोग होईल,असा सवालही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. दरम्यान, डॉ. विली यांची प्रदेश कार्यकारिणीवर पकड आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांसह सामूहिक राजीनामा दिला आहे. यावेळी डॉ.विली यांची पाठराखण करणाऱ्या अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना येथील पदाधिकाऱ्यांची चाड नाही तर पक्षाच्या आमदारांचा पक्ष संघटनेत कोणताही वाटा नसल्याने कार्यकर्ता म्हणून काय उपयोग,असा सवाल उपस्थित करण्यात आला.
डॉ.विली यांनी राजीव कॉंग्रेस पक्षाची सगळी ताकद राष्ट्रवादीत ओतली होती. दोन आमदारांची संख्या तीन आमदारांवर गेली. लोकसभेतील ९० हजार मतदानावरून या लोकसभेत ही मतदारसंख्या १ लाख ३१ हजारांवर आली. ही पक्षाची वृद्धी नव्हे काय,असा सवालही यावेळी उपस्थित झाला. दिल्लीतील नेत्यांनाच जर पक्षाची चिंता नसेल तर या पक्षात राहून काहीही उपयोग नाही,त्यामुळे या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणेच योग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केला. दरम्यान,डॉ.विली यांच्या खास मर्जीतील एका पदाधिकाऱ्याकडून खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीकेची झोड उडवल्याचीही खात्रीलायक खबर आहे. डॉ.विली यांना लोकसभेची उमेदवारी नाकारून कॉंग्रेस पक्षातून उमेदवार आणून त्याला उमेदवारी दिल्याने सदर पदाधिकाऱ्याचा संताप अनावर झाला होता. शरद पवार हे धर्मांध असल्याचा आरोप करून या पदाधिकाऱ्याने आपला रोष उघडपणे व्यक्त केला.
सरचिटणीस सुरेंद्र फुर्तादो, उपाध्यक्ष फातीमा डिसा, तुलियो डिसोझा आदी पदाधिकाऱ्यांनी डॉ.विली यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, पक्षात नव्याने सामील झालेल्या संगीता परब, प्रा. सुरेंद्र सिरसाट, ऍड. अविनाश भोसले, राजन घाटे आदींनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. पक्षाच्या विधिमंडळ गटालाही अद्याप या निर्णयाबाबत काहीही माहिती नाही,अशावेळी डॉ.विली यांचाहा निर्णय नेमका कोणत्या पद्धतीने पक्षाला मारक ठरेल,हे येत्या दिवसांत स्पष्ट होणार आहे. डॉ.विली यांनी आपल्या समर्थक कार्यकारिणी सदस्यांसह सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला खरा पण हा राजीनामा शरद पवार यांना सादर केल्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. डॉ.विली यांचा पत्ता काटण्यासाठी पक्षांतर्गत सुरू असलेल्या कारवायांची चाहूल लागल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याने येत्या काळात ते पक्षाच्या विधिमंडळ गटालाही घाम काढणार आहेत,असे संकेत त्यांच्या निकटवर्तीयांनी दिले आहेत.

पूजाला ताब्यात घेण्यास टाळाटाळ का?


भांडाफोड होणार असल्याने अभय!


पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक यांनी खून करून सोळा तरुणींकडून लुटलेले सोने दहा लाखांचे होते का,.एवढ्या किमतीचे सोने त्यांच्याजवळ नसेलच मग ते सोने नेमके कुठून महानंदकडे आले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत, हे सोने विक्री करण्यासाठी महानंद याच्याबरोबर त्याची पत्नी पूजा नाईकही येत होती, मग पोलिस तिला का संरक्षण देत आहेत, असा खडा सवाल समाजकार्यकर्त्या तारा केरकर यांनी केला आहे. पूजाला ताब्यात घेतल्यास काही राजकीय नेते तसेच सरकारी अधिकाऱ्यांचा भांडाफोड होणार असल्याने पोलिस तिला चौकशीला बोलावत नसल्याची माहिती दै."गोवादूत'ला मिळाली आहे.
गेली पंधरा वर्षे महानंद याच्याकडून लुटलेले सोने विकत घेणारे सोनार महानंदएवढेच जबाबदार असून महानंदने फोंड्यातील अन्य सोनारांनाही सोने विकले आहे. याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असूनही पोलिस त्या सोनारांची चौकशी का करीत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. चोरीचे सोने विकत घेणे हा गंभीर गुन्हा असून या सोनारांवर कारवाई न झाल्यास उद्या समाजातील अशा क्रूर महानंदकडून हे सोनार चोरीचे सोने घेत राहतील आणि लुटारू सामान्यांना लुटत राहतील, असे मत श्रीमती. केरकर यांनी व्यक्त केले.
ज्या तरुणी महानंदाच्या बळी ठरल्या आहेत, त्यांच्या अंगांवर एक सोनसाखळी, हातात दोन बांगड्या, अंगठी असाच ऐवज होता. याची किंमत दहा लाख होणे मुश्कील आहे. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेले दहा लाखांचे सोने महानंदने कोणाचे चोरले होते, याचाही उलगडा होणे गरजेचे आहे. मोर्ले सत्तरी येथे योगीताचा खून केल्यानंतर तिच्या अंगावरील सोने डिचोली येथील एका सोनाराला विकले होते. त्याप्रमाणे महानंदने गोव्यातील अन्य सोनारांकडेही सोने विक्री केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी "शॉटकर्ट' पद्धत न अवलंबता अशा सर्व सोनारांचा तपास लावावा, अशी मागणी केरकर यांनी केली आहे.
महानंदची साथीदार ,त्याची पत्नी पूजाही तेवढीच जबाबदार आहे. लुटलेले सोने विकायला पूजाही त्याच्याबरोबर येत होती. त्यामुळे महानंद हे सोने कुठून आणत होता याची पूर्ण कल्पना पूजाला होती. गरीब सामान्य तरुणींना लक्ष करून त्यानंतर त्यांचा खून करून सोने लुटणे हा या पतीपत्नीचा धंदाच झाला होता, अशी टीका यावेळी केरकर यांनी गोवादूतशी बोलताना केली.
पूजा हिला या प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न चालले आहेत. पूजा नाईक हिचे राजकीय बळ बरेच असल्याची माहिती मिळाली असून तिला संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातूनही प्रयत्न होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजकीय लोकांचे पाठबळ पूजाला का लाभले, याचा शोध लावून या राजकीय व्यक्तींचा भांडाफोड करून अशा राजकारण्यांना जनतेसमोर उभे करावे, अशी मागणी पणजीतील कलाकार व जागृत महिला उज्ज्वला तारकर यांनी केली आहे. महानंदला वाचवण्यासाठी ज्या ज्या राजकीय व्यक्तींनी प्रयत्न केले आहेत, अशा सर्वांना ठेचायलाच पाहिजे, असेही मत सौ. तारकर यांनी व्यक्त केले आहे.

सहापदरी महामार्गाविरोधात चर्चिल यांची केंद्राकडे धाव

उच्चस्तरीय शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री कमलनाथकडे गाऱ्हाणे

मडगाव, दि.९ (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांनी आज नवी दिल्लीत आपल्या खात्याच्या सर्व प्रमुख अभियंत्यांसह केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री कमलनाथ यांची भेट घेऊन गोव्यातून जाणाऱ्या पत्रादेवी ते पोळे या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ च्या सहापदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या प्रस्तावाला ठाम विरोध केला व ती आखणी अमलात आणली तर येथील जीवनच उध्वस्त होणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष ब्रिजेश्र्वर सिंग व प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान अभियंता वाचासुंदर, मुख्य अभियंता चिमुलकर व नेवरेकर हेही हजर होते.
यावेळी चर्चिल यांनी प्राधिकरणाने या महामार्गाच्या सहापदरीकरणाची आखणी करताना स्थानिक सरकारला वा त्याच्या खात्यालाही विश्र्वासात घेतले नाही ही बाब मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. या आखणीनुसार हजारो निवासी तसेच व्यापारी घरे जमीनदोस्त होणार असून त्यामुळे लोकांमध्ये असंतोष व अस्वस्थता पसरली असल्याचे व त्यातून या आखणीला वाढता विरोध आहे हेही लक्षात आणून दिले.
राज्य सरकारने कमी नुकसान होणारा पर्यायी आराखडा तयार केलेला आहे, तो विचारात घ्यावा तसेच तळपण, गालजीबाग व जुवारी नदीवरील पूल प्राधान्यक्रमाने हातात घ्यावे, अशी मागणीही त्यांनी या बैठकीत केली. केंद्र सरकार या आखणीबाबत कोणतेही आश्र्वासन देऊ शकत नसेल व त्याला विलंब होत असेल तर "बांधा वापरा व हस्तांतरीत करा' या तत्वावर हे काम हाती घेण्यास राज्य सरकार तयार आहे हेही चर्चिल यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे स्पष्ट केले, तेव्हा राज्य सरकारचा हा प्रस्ताव विचारात घेऊन अभ्यास करण्याची सूचना कमलनाथ यांनी प्राधिकरणाला केली.
चर्चिल यांनी केंद्रीय मंत्र्यांना गोवा भेटीचे आश्र्वासन दिेले व या भेटीत या महामार्गाची प्रत्यक्ष पहाणी करता येईल असे सांगितले. ते निमंत्रण स्वीकारून कमलनाथ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या आखणीबाबत संपूर्ण अभ्यास करून अहवाल तयार करण्यासही सांगितले.
चर्चिल यांनी मुरगाव बंदरांतील धक्का क्र. ९ च्या विस्तारामुळे ज्या शेंकडो कुटुंबाचे स्थलांतर करावे लागणार आहे तो प्रश्र्नही केंद्रीय मंत्र्यांकडे उपस्थित केला व या लोकांचे व्यवस्थितपणे पुनर्वसन होण्याची गरज प्रतिपादिली.
माविनची भूमिका बदलली
दरम्यान, उपसभापती माविन गुदिन्हो यांनी सहापदरी महामार्गाबाबत गेल्या आठवड्यात घेतलेल्या भूमिकेला छेद देताना अशा रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात घरे पाडावी लागत असतील तेथे उड्डाण पूल बांधावा, अशी सूचना आज केली. गेल्या आठवड्यात त्यांनी सहापदरी महामार्ग व मोपा विमानतळाचा पुरस्कार करताना तसा एक प्रस्ताव कमलनाथ यांच्याकडे पाठविला होता. पण आज त्यांच्या मतदारसंघातील तसेच नुवे येथील नागरिकांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवून त्यांच्या निवासावर मोर्चा नेला व त्यांना निवेदन सादर केले, त्यानंतर उपसभापतींनी आपली भूमिका बदलली आहे. तेही उद्या नवी दिल्लीकडे प्रयाण करीत असून कमलनाथ यांची भेट घेऊन सहापदरी महामार्गाबाबत त्यांना आपला प्रस्ताव सादर करतील, असे त्यांच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, वीज मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनीही चर्चिल यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असून, हा महामार्ग आपल्या लोटली मतदारसंघातून जात असल्याने त्याला तीव्र विरोध करू, असे सांगितले.

सीआरझेड प्रकरणी उद्या सर्वपक्षीय मंडळ दिल्लीला

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - किनारी नियमन विभाग (सीआरझेड) प्रकरणी उद्भवलेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली येत्या ११ तारखेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे वकील तथा ज्येष्ठ विधीतज्ज्ञ फली नरीमन व ऍड. श्याम दिवाण यांची भेट आजच निश्चित झाली. त्यामुळे परवाच्या भेटीची माहिती सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना ताबडतोब देण्यात येईल. त्यांनी याप्रकरणी सहकार्य करावे, असे आवाहन सिक्वेरा यांनी केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने किनारी भागात भरती रेषेपासून २०० मीटर अंतरात असलेल्या सर्व बांधकामांवर "सीआरझेड' कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. "सीआरझेड' कायदा १९९१ साली अमलात आणला गेला. त्यापूर्वीच्या बांधकामांना अभय मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व किनारी भागांतील पंचायतींना सर्वेक्षण करून १९९१ पूर्वीच्या बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यातील सुमारे दोन हजार कुटुंबीयांवर गंडांतर येण्याची भीती निर्माण झाली आहे. हा आकडा सुमारे आठ ते साडे आठ हजारांवर असल्याचा दावा काही संघटना करीत आहेत. प्रत्यक्षात तो वाढवून सांगण्यात येत असल्याचेही सिक्वेरा म्हणाले.
याप्रकरणी येत्या १६ जून रोजी न्यायालयात सुनावणी आहे व या सुनावणीवेळी न्यायालयाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने करणे याला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. यानिमित्ताने ज्येष्ठ विधीतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात सरकारने या लोकांच्या संरक्षणार्थ भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याबाबत या भेटीच्या निमित्ताने चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. या भेटीत केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश ,पंतप्रधान मनमोहनसिंग व श्रीमती सोनिया गांधी यांना निवेदन सादर करण्यात येईल,अशी माहितीही त्यांनी दिली.
किनारी भागात होऊ घातलेल्या या संभाव्य कारवाईबाबत लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या लोकांना दिलासा देणे ही सरकारचे कर्तव्य ठरते. तथापि, याचा अर्थ बेकायदा बांधकामांना अभय देणे असा नाही. स्थानिक पंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरणार असून त्यांना आता १९९१ पूर्वी व नवी बांधकामे यांची यादी तयार करून न्यायालयात सादर करणे भाग आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे, असे सिक्वेरा म्हणाले.

परदेशी यात्रेवर गेलेल्यांची झाली फसवणूक!

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - राज्यात विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या अनेक रोजगार भरती संस्था आहेत, परंतु गोव्यातील लोकांना विदेशात यात्रेसाठी नेणाऱ्या "टूर ऑपरेटरां' कडूनही लोकांना फसवले जाते, याचा अनुभव अलीकडेच गोमंतकीयांना आला. याप्रकरणी नुकत्याच घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल अनिवासी भारतीय आयुक्त एदूआर्द फालेरो यांनी घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
आज पर्वरी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत "असोसिएशन ऑफ क्रृसेडर्स फॉर जिझस विथ मेरी' या संस्थेचे समन्वयक ऍड. एडमंड आंताव यांनी ही माहिती दिली. यावेळी अनिवासी भारतीय आयुक्त एदूआर्द फालेरो व माजी उपसभापती सायमन डिसोझा हजर होते. याप्रकरणी ऍड.आतांव यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याहून अलीकडेच ९७ लोक इजिप्त, इस्राईल व जॉर्डन अशा यात्रेला निघाले होते व ही यात्रा गोव्यातीलच एका नामांकित टूर ऑपरेटर्सनी आयोजित केली होती. १७ दिवसांच्या या यात्रेत या समूहातील १४ यात्रेकरूंना थरारक अनुभव आला. मुळात थेट इस्राईल सरकारकडून व्हिसा मिळवून नेलेल्या या लोकांतील १४ यात्रेकरूंना इस्राईल सरकारने व्हिसा नाकारला असतानाही त्यांना या यात्रेसाठी नेल्याने त्यांनी इजिप्त-इस्त्राइल सीमेवर अडवण्यात आले. या १४ लोकांना अडवल्याने यात्रेकरूंची बरीच पंचाईत झाली. एकाच कुटुंबातील काही सदस्यांना मार्ग मोकळा तर काही सदस्य फसले. या १४ पैकी सुमारे ८ यात्रेकरू पुन्हा गोव्यात परतले तर उर्वरित ६ यात्रेकरूंना इस्राइलात प्रवेश करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.
हा प्रकार घडल्यानंतर या यात्रेत सामील असलेल्या ऍड.आतांव व माजी उपसभापती सायमन डिसोझा यांनी एदूआर्द फालेरो यांच्याशी संपर्क साधला व त्यांना हा प्रकार कथन केला. श्री.फालेरो यांनी तात्काळ इस्राईलमधील भारतीय दूतावास नवतेजसिंग सर्ना यांच्याकडे संपर्क साधला. यावेळी भारतातील इस्त्राइली दूतावास मार्क सोफर यांनीही सहकार्य केले व अखेर यावर तोडगा काढण्यात आला. त्यांनी यानिमित्ताने घेतलेली भूमिका अपूर्व अशीच होती असे सांगून अखेर या लोकांना कायरो येथील इस्राईल दूतावासाकडून व्हिसा मिळवण्यात आला.
याप्रकरणी इस्राईल सरकारकडून या १४ लोकांना व्हिसा नाकारण्याची कृती निषेधार्ह आहे हे जरी खरे असले तरी टूर ऑपरेटरला ही परिस्थिती ठाऊक असूनही त्यांच्याकडून या यात्रेकरूंना अंधारात ठेवण्यात आल्याची तक्रारही या लोकांनी केली. याप्रकरणी सदर टूर ऑपरेटरकडून थेट इस्राईल सरकारकडून व्हिसा मिळवण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. मुळात हे व्हिसा भारतातील इस्राईल दूतावासाकडून मिळवायची पद्धत आहे,अशी माहिती श्री.फालेरो यांनी दिली. या प्रकरणांमुळे टू ऑपरेटर व इस्राईलमधील काही लोकांचे धागेदोरे असून त्यांच्याकडून अशा पद्धतीने व्हिसा मिळवून लोकांना पाठवले जात असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती इस्राईल सरकारकडे करणार असेही श्री.फालेरो म्हणाले.

Tuesday 9 June, 2009

महिलेने बिबट्याला घरात कोंडले!

एकाकी झुंज देत दाखविले प्रसंगावधान

आगोंद , दि. ८ (प्रतिनिधी) - पारयेकट्टा- खोला येथील श्रीमती रंगावती पुतू वेळीप (४५) यांच्या घरात आज सकाळी ६.३० च्या दरम्यान एका बिबट्याने प्रवेश करून,तिच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान दाखवून रंगावतीने बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि त्याला घरात बंद करून ही माहिती शेजाऱ्यांना दिली. जखमी रंगावतीवर मडगावच्या हॅास्पिसिओ इस्पितळात उपचार चालू आहेत, अशी माहिती काणकोण वन्यप्राणी विभागाचे वनाधिकारी परेश परब यांनी दिली .
वनाधिकारी श्री. परब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसहाच्या सुमारास रंगावती आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवून पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेली होती . त्या परिसरात असलेल्या एका बिबट्याने रंगावतीच्या घरात प्रवेश केला, त्याची कल्पना त्या महिलेला नव्हती. पाणी घेऊन ती महिला परत घरात प्रवेश करताच, त्या बिबट्या वाघाने त्या महिलेवर हल्ला केला व तिला जखमी केले. त्या महिलेच्या डोक्याला,तोंडाला तसेच हाताला वाघाची नखे लागल्याने ती जखमी झाली. ती कशीबशी घराबाहेर येऊन त्यांनी बाहेरून दरवाजा बंद करून कडी घातली व आपला बचाव केला. बिबटा घरात असल्याची माहिती त्या भागातील नागरिकांनी वन्यप्राणी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. लगेच पिंजरा तसेच अन्य प्रकारचे साहित्य घेऊन वनाधिकारी परेश परब आपल्या कर्मचाऱ्यांसह तेथे दाखल झाले. काणकोणचे साहाय्यक वनपाल रमेश देसाई तेथे पोहचले. घरात असलेल्या त्या बिबट्या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करून हत्तीपावल येथील निसर्ग पर्यटन केंद्रात आज दुपारी आणण्यात आले .
बिबट्या वाघाला पिंजऱ्यांत जेरबंद केल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्याला पाहाण्यासाठी हत्तीपावल येथे एकच गर्दी उडाली.आज संध्याकाळी वरिष्ठाच्या आदेशानुसार त्या बिबट्याला बोंडला अभयारण्यात किंवा दाट जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे वनाधिकारी परेश परब यांनी सांगितले.
पारयेकट्टा या वाड्यावर ३० च्या आसपास घरे आहेत. शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने गाई, म्हशींचे गोठे या भागात आहेत. जंगली जनावरांनी आपला मोर्चा आता गावांकडे वळविल्याचे दिसून येते. रंगावती ही एकटीच या छोट्या घरात राहते, तिचे पती व अन्य कुटुंबीय मुख्य घरात राहतात. रंगावती हिने धाडसाने झुंज देत आपली सुटका करून घेतलीच शिवाय बिबट्यालाही पकडून दिले याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

प्रख्यात नाट्यकर्मी हबीब तन्वर निवर्तले

भोपाळ दि. ८ (प्रतिनिधी) - हिंदी रंगमंचावरील प्रख्यात रंगकर्मी हबीब तन्वर यांचे आज सकाळी येथील एका इस्पितळामध्ये निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षांचे होते व दीर्घकाळापासून आजारी होते. सर्जनशीलता, व्यासंग, नव्याचा ध्यास आणि रंगमंचावर नवनवे प्रयोग करणारे तन्वर यांनी जीवनात नेहमी साधेपणाचीच कास धरली, त्यामुळे आपले शिष्यगण, मित्र, आप्तेष्ट यांच्यात ते कमालीचे लोकप्रिय होते.
चरणदास चोर व आगरा बाजार या सारख्या नाटकातून लाखो नाट्य रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले. शतरंज के मोहरे, लाला शोहर राय, मिट्टी की गाडी, गाव का नाम ससुराल, हमारा नाम दामाद, पोंगा पंडित, जिसने लाहोर नही देखा या सारख्या असंख्य नाटकांद्वारे त्यांनी रंगमंचावर अक्षरशः राज्य केले. "जहरीली हवा' हे भोपाळ विषारी वायू पीडितांवरील त्यांचे नाटकही कमालीचे गाजले. पद्मश्री, पद्मभूषण या सारख्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले व राज्यसभा सदस्य होण्याचा मान मिळालेले तन्वर यांची नाट्य क्षेत्रातील अभिरुची उच्च कोटीची होती. प्रयोगशीलता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायिभाव होता, परंतु आपल्या स्वभावातला उपजत साधेपणा त्यांनी शेवटपर्यंत टिकवला.

पद्मसिंह पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती

दोषी सिद्ध झाल्यास राष्ट्रवादीतून हकालपट्टी

मुंबई, दि. ८ - पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी खासदार पद्मसिंह पाटील यांना कालची रात्र सीबीआयच्या लॉकअपमध्ये काढावी लागली. पण, घरचे जेवण मिळावे, ही पाटील यांची मागणी न्यायालयाने मान्य केल्यामुळे निदान दोन घास घशाखाली उतरण्याची त्यांची सोय झाली आहे. ते दोषी आढळल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर केले आहे.
आज सकाळी १० वाजता पाटील यांना लॉकअपमधून चौकशीसाठी बाहेर काढण्यात आले. दिवसभर विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांना सहन करावी लागणार आहे. काल सीबीआयने त्यांची कोठडी मागण्यासाठी अर्ज केल्यानंतर पाटील यांच्या वकिलांनीही एक अर्ज सादर करून पाटील यांना घरचे भोजन मिळण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. न्यायायलाने ती मान्य केली. मात्र, जो माणूस पद्मसिंह पाटलांचा डबा घेऊन येईल, त्याला आधी डब्यातील प्रत्येक पदार्थ स्वत: खावा लागेल आणि हे सर्व सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर करावे लागेल, असे निर्देशही न्यायालयाने दिले. १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पद्मसिंग पाटील यांचा हाच क्रम चालणार आहे. कारण न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत कोठडी दिली आहे. पद्मसिंह हे सीबीआयच्या तपास कार्यात सहकार्य करीत आहेत की नाही, हे १४ तारखेला त्यांना पुन्हा न्यायालयात उपस्थित करण्यात येईल, त्यावेळी कळणार आहे. प्रकरण गंभीर असल्यामुळे पाटील यांच्या कोठडीची मुदत आणखी वाढवून मिळण्याची मागणी सीबीआयकडून केली जाण्याची शक्यता आहेे.
तर राष्ट्रवादीतून हकालपट्टी
पक्षाचे खासदार आणि दुहेरी खून खटल्यात अडकलेले पद्मसिंह पाटील यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास पक्षातून त्यांना ताबडतोब काढून टाकले जाईल, असे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर केले आहे.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि नागरी उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पाटील यांच्यावरील आरोपांविषयी सध्याच काही बोलणे घाईचे ठरेल. हे प्रकरण चौकशी संघटनांच्या स्तरावर आहे. त्यामुळे पक्षाला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. पक्ष त्यात काही करू शकत नाही. पण, ज्या क्षणी पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्यावरील आरोप सिद्ध होतील तत्क्षणी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला जाईल.
कॉंग्रेसने हात झटकले
महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांना अटक होणे हा स्वतंत्र खटल्याचा एक भाग असून, त्यात दोन राजकीय पक्षांमधील संबंधांचा कोणताही प्रकार नाही, असा निर्वाळा देत कॉंग्रेसने या प्रकरणी आपले हात झटकले आहेत.
कॉंग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एका व्यक्तीच्या खूनप्रकरणी दुसऱ्या व्यक्तीला अटक असा हा सरळ-सरळ खटला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील परस्पर संबंधांचे याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पाटील यांचा आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा या खून खटल्याशी संबंध नाही, हे स्पष्टच आहे. एका व्यक्तीमुळे संपूर्ण पक्षालाच दोषी मानण्यात अर्थ नाी.
आतापर्यंत माहिती असूनही या प्रकरणी कारवाई न करण्यामागे महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील कारणीभूत आहेत का, यावर बोलताना अहमद म्हणाले की, असे शेकडो खटले असतात जिथे राज्य शासन आणि सीबीआय यांचे दुमत असू शकते. याचा अर्थ या प्रकरणी कारवाई न होण्यास महाराष्ट्राचे गृहमंत्री जबाबदार आहेत, असे म्हणता येणार नाही.

मनुष्यबळाची कमतरता ही आरोग्य खात्याची समस्या

संचालकांची कबुली

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - आरोग्य पातळीवर राज्यात साधनसुविधा निर्माण होत असल्या तरी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतो आहे. खात्यासमोर डॉक्टर व इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची उणीव भासत असल्याने व विशेष करून ग्रामीण भागांतील इस्पितळांत काम करण्यास कुणीही राजी होत नसल्याने आरोग्य खात्यासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे आज खुद्द आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ.राजनंदा देसाई यांनी मान्य केले.
आरोग्य खात्याच्या अस्थायी समितीसमोर उपस्थित झालेल्या विविध समस्या व अडचणींबाबत खुलासा करताना त्यांनी ही माहिती दिली. आमदार दीपक ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या या बैठकीत आमदार प्रताप गांवस,दामोदर नाईक व फ्रान्सिस डिसोझा आदी हजर होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नेमलेल्या विशेष समितीने राज्यातील आरोग्य खात्याच्या कारभाराबाबत तयार केलेल्या अहवालात अनेक त्रृटी समोर आणल्या आहेत. हा अहवाल अद्याप खात्याला व गोवा वैद्यकीय महाविद्यालयालाही पोहचला नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या अहवालाबाबत सरकारने कोणती उपाययोजना केली याचा खुलासा सरकारला देणे भाग असल्याने त्याची तयारी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गोमेकॉचे अधीक्षक डॉ.राजन कुंकळ्ळीकर, डीन डॉ.जिंदाल, सचिव दिवानचंद, संजीव श्रीवास्तव व श्री.वासनीक हजर होते. सध्याच्या परिस्थितीत फोंडा, मडगाव,साखळी आदी ठिकाणी इस्पितळांची कामे सुरू आहेत, तर म्हापसा येथे जिल्हा इस्पितळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.या इस्पितळांसाठी मनुष्यबळ कसे काय पुरवणार, याबाबत सरकारकडे काही योजना आहे काय,असा सवाल केला असता अधिकाऱ्यांनी मौन धारण केले. या इस्पितळांत स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक अभ्यासक्रम अथवा इतर साहाय्यक पदांसाठी मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची सूचना याठिकाणी उपस्थित काही नागरिकांनी केली. येत्या काळात बिकट परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून या इस्पितळांत काम करण्यासाठी इतर राज्यांतून मनुष्यबळ आणावे लागेल,अशी भितीही यावेळी अनेकांनी वर्तविली.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची परवड सुरू असल्याच्या अनेक तक्रारी यावेळी उपस्थित करण्यात आल्या. मोफत औषधांची सरकारकडून घोषणा झाली पण त्याचा लाभ गरीब रुग्णांना मिळत नसल्याचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. अनेक वेळा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात येते व दिवसभर त्यांना बसवून परत पाठवले जाते,अशा तक्रारीही पुढे येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गोमेकॉत पाण्याची टंचाई जाणवत असल्याने त्याचा परिणाम साफसफाईवर होतो व येथील शौचालयांची परिस्थिती एकदम बिकट असल्याची माहितीही उघड करण्यात आली. गोमेकॉत परप्रांतीयांची गर्दी उसळत असल्यानेही अनेकांनी लक्षात आणून दिले. शेजारील राज्यांतील लोक वैद्यकीय उपचारांसाठी गोमेकॉत येत असल्याने स्थानिक लोकांची परवड होते त्यामुळे गोमंतकीयंसाठी विशेष ओळखपत्र वितरित करण्याचीही गरज आहे,असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला. मूळ गोमंतकीयांसाठी बहुउद्देशीय ओळखपत्र तयार करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा सरकारच्या विविध योजनांचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली आहे, त्याबाबत खात्याने तात्काळ कारवाई करावी,अशी मागणीही येथील काही नागरिकांनी केली. ग्रामीण भागांत केवळ आठवड्यातून दोन दिवस डॉक्टर जातात व तेही अर्धवेळ अशावेळी येथील लोकांनी काय करावे,अशी तक्रार या भागांतून आलेल्या काही नागरिकांनी केली. दरम्यान,यावेळी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याचे डॉ.राजनंदा देसाई यांनी सांगितले.

शीतल मफतलाल यांना १२ जूनपर्यंत कोठडी

मुंबई, दि. ८ - सुप्रसिद्ध उद्योगपती अतुल्य मफतलाल यांच्या पत्नी शीतल यांना मुंबईतील स्थानिक न्यायालयाने १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून उद्या त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
शीतल मफतलाल यांनी विदेशातून आणलेल्या दागिन्यांवरील जकात कर बुडविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शीतल मफतलाल या रविवारी रात्री ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनहून मुंबईला आल्या. पण, मुंबई विमानतळावर जकात अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले. शीतल मफतलाल यांच्याकडे जवळपास ५१ लाख रुपये किंमतीचे हिऱ्याचे दागिने होते. त्यापैकी केवळ ३० लाखांच्या दागिन्यांचा जकात कर त्यांनी भरला होता. त्यांच्याकडे उर्वरित दागिन्यांचा जकात कर भरल्याचे पुरावे नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

आर्थिक तरतूद असूनही अनुसूचित जमाती दुर्लक्षित

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- राज्यातील अनुसूचित जमातीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींचा योग्य पद्धतीने विनियोग होत नाही. या घटकांसाठी १२ टक्के आरक्षण असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे हा घटक आपल्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहत असल्याचा सुर आज समाज कल्याण खात्याच्या अस्थायी समितीसमोर अनेक नागरिकांनी व्यक्त केला.
आमदार दीपक ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला आमदार प्रताप गांवस,दामोदर नाईक व फ्रान्सिस डिसोझा हजर होते. विविध खात्यांत अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या पदांची भरती करण्यात आली नाही. काही ठिकाणी पदांसाठी या घटकातील कुणीही उमेदवार नसल्याचे दाखवून या पदांवर सर्वसामान्य गटातील उमेदवारांची भरती केली जाते,याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करून शहानिशा करण्यावाचून ही प्रक्रिया केली जाते,असेही त्यांनी समितीच्या नजरेस आणून दिले.अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असलेल्या भागांत पायाभूत सुविधा तथा इतर अत्यावश्यक साधनसुविधा निर्माण करण्यासाठी या विशेष निधीचा वापर करावा,अशी सूचनाही अनेकांनी मांडली.
२५ वर्षे वास्तव्य सक्ती करा
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो आहे. हा आकडा आता १ लाख ५ हजारांवर पोहचला आहे. यापुढे या योजनेसाठी मूळ गोमंतकीय किंवा २५ वर्षे वास्तव्याचा दाखला सक्तीचा करावा, अशी सूचना काही आमदारांनी मांडली. अनेक लाभार्थींचे पैसे वेळात मिळत नाही. काही लोकांना टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात,अशा तक्रारीही यावेळी पुढे करण्यात आल्या. लाभार्थींची संख्या अशीच वाढत गेली तर ही योजना आर्थिक संकट म्हणून उभी होईल,असा धोकाही यावेळी वर्तवण्यात आला.

कॉंग्रेस पक्षाला कुबड्यांचे वावडे!

स्वबळावर सरकार स्थापनेचे वेध

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- घटक पक्षांच्या कुबड्यांचा आधार घेऊन कायम सरकार चालवण्याचा विचार आता सोडायला हवा. कॉंग्रेस पक्षाने आता स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने विचार करायला हवा व त्यासाठी कोणतेही कठोर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अजिबात डगमगून जाऊ नये,असा सूर आज गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत बहुतेक वक्त्यांनी आळवला.
दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, उपसभापती मावीन गुदीन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, गृहमंत्री रवी नाईक, नगर विकासमंत्री ज्योकीम आलेमाव, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो, आमदार श्याम सातार्डेकर,आमदार प्रताप गांवस,फ्रान्सिस सिल्वेरा व अन्य पदाधिकारी हजर होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज केली. निवडणूक काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास आपले सरकार कटिबद्ध आहे,असे सांगून पुढील तीन वर्षांच्या कालखंडात सर्व सामान्य जनतेसाठी विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की जाहीरनाम्याची पूर्तता करणे ही सरकारची जबाबदारी आहे.आपल्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येणाऱ्या या समितीवर प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, तसेच जाहीरनामा समितीचे अध्यक्ष ऍड.उदय भेंब्रे व ऍड.रमाकांत खलप यांचा समावेश असेल,असेही ते म्हणाले.माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ राज्यातील प्रत्येक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालांत व बारावी परीक्षेत अव्वल आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा प्रदेश कॉंग्रेस समितीने पुढे केलेला प्रस्ताव नक्कीच विचारात घेतला जाईल,असे आश्वासनही त्यांनी दिले.सरकारवर झालेली टीका आपण नेहमीच सकारात्मक दृष्टीने घेतली व स्वाभिमान आडवा येऊ न देता जनतेच्या इच्छेनुसार निर्णय बदलले,असेही मुख्यमंत्री म्हणाले.आघाडी सरकारचा कारभार चालवताना सर्वांना बरोबर घेऊन जाणे ही किती कठीण गोष्ट आहे हे आपल्यालाच ठाऊक आहे,याची आठवणही त्यांनी यावेळी केली.
गृहमंत्री रवी नाईक यांनी गेल्या दोन वर्षांत सरकारने राबवलेल्या अनेक योजनांची माहिती करून दिली. विशेष करून त्यांच्याकडे असलेल्या महिला व बालकल्याण खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची जंत्रीच त्यांनी सादर केली.महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी योजना आहेत व त्यांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे यावे,असे आवाहनही त्यांनी केले.उपसभापती मावीन गुदीन्हो यांनी यावेळी आक्रमक भाषणे केले. आघाडीच्या इतर घटकांच्या धमक्यांना मुख्यमंत्र्यांनी बळी पडू नये,असे सांगितले. सरकार चालवताना कॉंग्रेस पक्ष बळकट कसा होणार याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कॉंग्रेसचा हा वृक्ष जर अधिक जोमाने वाढवायचा असेल तर त्याला अडथळा ठरणाऱ्या फांद्या कापून टाकण्यास अजिबात चिंता करू नये, असेही ते म्हणाले.मंत्रिमंडळातील सदस्यांकडून उघडपणे केल्या जाणाऱ्या वक्तव्यांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली व मुख्यमंत्र्यांनी बेशिस्त खपवून घेऊ नये,असे आवाहन केले.चर्चिल आलेमाव यांनी या सरकारला पाच वर्षे अजिबात भिती नसल्याचे सांगितले.सहापदरी महामार्गाबाबत आपण केलेले वक्तव्य हे लोकांच्या भल्यासाठी असल्याचे ते म्हणाले.सुमारे आठशे कुटुंबीयांना हाकलून सरकारला हा प्रकल्प राबवायचा असेल तर अवश्य राबवा असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी "जय हो' चा नारा लक्षात ठेवा,असे सांगितले. कॉंग्रेसची संघटना बळकट करण्याचे आपले उद्दिष्ट असून येत्या पंधरा दिवसांत दक्षिण गोव्याचा दौरा काणकोण व सांगे भागातून सुरू करणार असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मंत्री व आमदारांचा प्रदेश समितीतर्फे गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलनाने झाले.यावेळी प्रदेशाध्यक्ष शिरोडकर यांनी पुष्पहार घालून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. युवा कॉंग्रेस व महिला कॉंग्रेसच्या वतीनेही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष एम.के.शेख यांनी केले.

-आमदार दयानंद नार्वेकर,चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर,पांडुरंग मडकईकर,पंचायतमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर,आग्नेल फर्नांडिस,फिलीप नेरी रॉड्रिगीस,व्हिक्टोरिया फर्नांडिस,वीजमंत्री आलेक्स सिकेरा आदी गैरहजर होते.

-गोमंतक मराठा समाज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला खरा परंतु त्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था कमी पडल्याने अनेकांना उभे राहावे लागले.

-गृहमंत्री रवी नाईक यांनी आपले भाषण बरेच लांबवले. गृह खात्यापेक्षा त्यांनी महिला व बाल कल्याण खात्यावर आज जास्त भर दिला व महिलांसाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची यादीच त्यांनी जाहीर केली. लिज्जत पापडांप्रमाणे महिलांनी गोवा पापड तयार करावेत,खतखतें,सर्पतेल आदी खास गोमंतकीय खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची योजना आहे,त्याचाही लाभ महिलांनी घ्यावा,असेही ते म्हणाले. महिलांसाठीच्या योजना जाहीर करण्यात ते इतके रमबाण झाले की त्यांना आवरावे लागले.भाषण कमी करण्याची विनंती केल्याने ते भडकले व त्यांनी अखेर आपले भाषण आवरते घेतले.

Monday 8 June, 2009

सांतेमळ -राय भागाला चक्रीवादळाचा तडाखा

८० वृक्ष उन्मळले
किमान ५० लाखांची हानी
वीज व रस्तावाहतूक बंद


मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : काल उत्तररात्री येथील राय परिसरातील सांतेमळ भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसून सुमारे ८० झाडे उन्मळून पडली व अंदाजे ५० लाखांची हानी झाली. घरांवर, रस्त्यांवर व वीजतारांवर पडलेली झाडे कापून बाजूला काढण्याचे काम आज सायंकाळपर्यंत चालू होते व अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत जरी जीवितहानी झालेली नसली तरी मालमत्तेचा विध्वंस फार मोठा झालेला आहे.
काल मध्यरात्रीपासून मडगावपासून १० कि. मी.च्या अंतरावर निसर्गाचे हे तांडव चालू असताना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षाला या वादळाची गंधवार्ताही नव्हती. परवा शुक्रवारीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा कक्ष चोवीस तास कार्यरत करण्याची सूचना केलेली होती.
राय येथे चक्रीवादळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता वादळाचा प्रताप पाहावयास मिळतो. या वावटळीत उन्मळून पडलेल्या झाडांमुळे सांतेमळ ते राय हा रस्ता वाहतुकीस बंद झालेला आहे. मध्यरात्रीच्या वादळाचा जोर पहाटे कमी झाला पण नंतर पुन्हा एक तडाखा बसला. काही भागात उन्मळलेली झाडे घरांवर पडली व त्यात सुमारे २० घरांची जबर हानी झाली. एका ठिकाणी एका गोठ्यावर झाड पडल्यामुळे आतील ३ गायी जखमी झाल्या.
विविध भागांत पडलेली झाडे बाजूला काढण्याचे काम अग्निशामक दलाकडून चालू असून ते पूर्ण व्हायला आज रात्रीचे १० वाजून जातील असे सांगण्यात आले. आज दुपारची देखील विश्रांती न घेता त्यांचे काम चालू आहे. काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने काळोखात बुडालेल्या राय परिसरातील काही भागात पूर्ववत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज खात्याने आज सायंकाळपर्यंत केले पण तरीही अर्धेअधिक भाग काळोखातच होता.
स्थानिक आमदार रेजिनाल्ड आज दिवसभर या भागात तळ ठोकून मदतकार्यावर लक्ष ठेवून होते. नुकसानीचा आकडाही त्यांनीच दिला. अग्निशामक दलाचे जवान मदतकार्यात गुंतून असल्याने त्यांच्याकडून विशेष अशी कोणतीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. उपजिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी आज दुपारी वादळग्रस्त भागाचा दौरा केला.

अडवलपालमध्ये घरांत घुसले खाणीचे पाणी

डिचोली, दि. ७ (प्रतिनिधी)- काल झालेल्या जोरदार पावसामुळे अडवलपाल येथील खनिज खाणींवरील पाण्याचे लोट गावात घुसल्यामुळे नागरिकांचे बरेच हाल झाले. आज अडवलपाल येथे उपजिल्हाधिकारी केनावडेकर, संयुक्त मामलेदार ब्रिजेश मणेरकर, तलाठी श्री. नाईक आदींनी भेट देऊन खनिज प्रकल्पातून आलेल्या व घरात घुसलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.
मधलावाडा, अडवलपल येथील आत्माराम नाईक, लवू नाईक, विजय पाडलोस्कर, पांडुरंग परब आदी नागरिकांनी घरात खनिज मिश्रित पाणी घुसल्यामुळे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार केली आहे.
मानसवाडा मुळगाव येथील नागरिकांनीही कालच्या पावसामुळे घरात पाणी घुसून नुकसान झाल्याची तक्रार केली आहे. येथील वामन मांद्रेकर, तुकाराम मांद्रेकर आदींनी सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार केली आहे.
मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे इथल्या पूरनियंत्रण व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. डोंगरमाथ्यावर कोसळणारे मुसळधार पावसाचे पाणी नाल्यांतून येऊन डिचोली नदीला मिळते. पण डिचोलीतही मुसळधार पाऊस व तुंबलेली गटारे यांमुळे पहिल्याच पावसाच्या दणक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. आज सकाळपासून पावसाला जोर नसला तरी रात्री उशिरा जोरदार वर्षाव झाला. या भागात असाच पाऊस पडत राहिल्यास सखल भागात पूर येऊ शकतो. यासाठी येथील नागरिक, दुकानदार यांनी सतर्कता बाळगून आपल्या सामानाची आवराआवर केली आहे. दरम्यान गावकरवाडा, डिचोली येथील जयश्री परब यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.

नौका व ७ मच्छीमारांना वाचवले

गोवा तटरक्षक दलाची कामगिरी

वास्को, दि. ७ (प्रतिनिधी)- गोव्यामध्ये चालू झालेल्या मुसळधार पावसाची शिकार बनलेल्या मच्छीमार नौकेला व त्याच्यावरील ७ कामगारांना गोवा तटरक्षक दलाच्या जवानांनी आज (दि.७) सुखरूपपणे बचावून समुद्रकिनाऱ्यावर आणले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तटरक्षक दलाने धाडसी कारवाईत वास्कोच्या समुद्र हद्दीपासून २० नॉटीक्लस माईल आत जाऊन ही कारवाई करून जीव धोक्यात असलेल्या मच्छीमारांना वाचवले. तटरक्षक दलाला समुद्रात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने एक मच्छीमार नौका धोक्यात असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित कारवाई करत दलाच्या एका पथकाला आय. सी. जी. एस. कमलादेवी ह्या जहाजाबरोबर मच्छीमारांचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात पाठवले. सुरुवातीला मच्छीमार नौकेला शोधण्यासाठी दलाच्या पथकाला मोठ्या प्रमाणात शोध करावा लागला. नंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्या जहाजाचा पत्ता लागला. तटरक्षक दलाचे पथक धोक्यात असलेल्या नौकेच्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी येत असल्याचे त्यांच्या नजरेस येताच त्यांनी ह्या पथकाला हातवारे करून मदत मागण्यास सुरुवात केली. यानंतर सदर नौकेसमोर पोहोचले असता त्यांना ह्या नौकेचे नाव "सौम्या चेतन' असल्याचे लक्षात आले. काल संध्याकाळपासून तांत्रिक बिघाडामुळे ही नौका समुद्रामध्ये अडकून असल्याचे समजले.
यानंतर तटरक्षक दलाने ७ मच्छीमार आणि नौकेला बुडण्यापासून वाचवून समुद्रकिनारी आणले. यानंतर आज संध्याकाळी ३ वाजण्याच्या सुमारास तटरक्षक दलाच्या जहाजाने सातही मच्छीमार व नौकेसह मुरगाव बंदरावर पोहोचले. सदर मच्छीमार नौका माल्पे, कर्नाटक येथील मोनप्पा कोटीयांन यांच्या मालकीची असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या सूत्रांनी दिली. सदर मच्छीमारांना व नौकेला पुढच्या कारवाईसाठी मच्छीमार खात्याच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वेळोवेळी समुद्रात धोक्यात असलेल्यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या तटरक्षक दलाने सदर मोहिमेतून आज पुन्हा एकदा आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.
दरम्यान, कालपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे वास्को शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून वास्को अग्निशामक दलाने सदर ठिकाणी जाऊन त्वरित कारवाई करत जनतेला निर्माण झालेला अडथळा दूर केल्याचे दिसून आले आहे.

"जनतेचे प्रश्न घेऊन सरकारवर वचक ठेवू'

भाजप नव्या जोमाने कार्यरत होणार

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - राज्यातील एकूण चाळीस मतदारसंघांपैकी १८ मतदारसंघांत भाजपने आघाडी घेतली आहे. आठ मतदारसंघात केवळ काही फरकाने पक्ष दुसऱ्या स्थानावर राहिला. या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यास येत्या काळात राज्यात भाजपला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचण्याची चांगलीच संधी असल्याचे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा गोव्याचे प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी येथे आज केले. राज्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांचा बरा प्रतिसाद भाजपला लाभला. भाजप हा अल्पसंख्याक विरोधी असल्याचा विरोधकांकडून केला जाणारा कांगावा त्यामुळे फोल ठरला आहे. राज्यात सध्या एक विधायक विरोधकाची भूमिकाच भाजप वठवेल व वेळोवेळी जनतेचे प्रश्न घेऊन सरकारवर वचक ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्ष गोवा राज्य कार्यकारिणीची बैठक आज गोमंतक मराठा समाज सभागृहात संपन्न झाली. यावेळी श्री. रूडी यांच्यासह पक्षाचे सहसंघटनमंत्री सतीश वेलणकर, प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजप विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा, विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक, संघटन सचिव अविनाश कोळी आदी हजर होते. केवळ विधायक विरोधकाची भूमिका वठवण्याचे पक्षाचे धोरण आहे. विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीचा आढावा आता जनतेनेच घ्यावा, असे रुडी यांनी सांगितले."निराशा व निरुत्साह झटका व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा' असा संदेश गोवा प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. लोकसभा निवडणूक निकालाचा आढावा,संघटनात्मक कामांची रचना व नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आली. गोवा प्रदेश भाजपची कार्यपद्धती देशातील भाजपच्या इतर राज्यांसाठी प्रेरणादायक ठरावी, अशी अपेक्षा रुडी यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. रूडी म्हणाले की , गोव्यातील लोकसभा निकाल भाजपसाठी आशादायी ठरला आहे. उत्तर गोव्यातील श्रीपाद नाईक यांचा विजय आश्वासक होता. मतदार फेररचनेमुळे काही प्रमाणात आघाडी घटली हे त्यांनी मान्य केले.दक्षिणेची जागा केवळ काही फरकाने गेली पण या मतदारसंघात भाजपची कामगिरी प्रेरणादायी आहे व भाजपचा हा तत्त्वतः विजय आहे, असे ते म्हणाले. दक्षिणेत ऍड. नरेंद्र सावईकर यांची उमेदवारी निश्चितच पक्षासाठी फायदेशीर ठरली. भविष्यात दक्षिण गोव्यातही भाजपचा झपाट्याने प्रसार होईल, त्याचे हे संकेत आहेत, असे श्री. रूडी म्हणाले.
भाजपचे आमदार सरकार पक्षात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत किंवा कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आदी गोष्टी हा केवळ अपप्रचार आहे व त्यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
लज्जास्पद कालखंड ः श्रीपाद नाईक
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कारकिर्दीत गोव्याला शरमेने मान खाली घालायला लावणारे विविध प्रकार घडल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केली. या कालखंडात प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. अनेक वेळा सरकारने आपले निर्णय जनतेच्या माथी मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण जनतेने तो हाणून पाडला. काही ठिकाणी जनतेच्या दबावाला बळी पडून सरकारने आपले निर्णय फिरवले पण या फिरवलेल्या निर्णयांना अद्याप कायदेशीर स्वरूप देण्यात आले नाही,असा आरोप खासदार श्रीपाद नाईक यांनी केला. विद्यमान सरकारला उद्या ८ रोजी दोन वर्षे पूर्ण होतात,याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की कुंभकर्णाप्रमाणे दोन वर्षे हे सरकार केवळ झोपून आहे व झोपेचे मोजमाप काय करणार,असा प्रतिसवाल त्यांनी केला.

Sunday 7 June, 2009

मान्सूनचे दणदणीत आगमन

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित

रस्ते पाण्याखाली, झाडे कोसळली
फोंडा - कुडचडे मार्ग पाच तास बंद
दिवसभरात दीड इंच पाऊस कोसळला


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून त्यामुळे सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. काल रात्रीपासून आरंभ झालेल्या पावसाने आज अचानक जोर धरला, त्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पडझड होऊन वित्तहानीची नोंद झाली आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली. पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात दीडइंच पावसाची नोंद झाली; यंदा आतापर्यंत ४ इंच पाऊस झाला. जनजीवन विस्कळित होऊन काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. तसेच झाडे पडल्याने फोंडा-कुडचडे मार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास ठप्प झाली. दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे करंझाळे येथे दोन बार्जेस भरकटून त्या किनाऱ्याला लागल्या.
दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे राजधानी पणजीत सर्वत्र पाणी तुडुंब भरले. महापालिकेकडून केला जाणारा मान्सूनपूर्व कामांचा बेबनाव आज खुद्द पावसानेच उघडा पाडला. विविध ठिकाणी गटारातील दगड व कचरा रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहन चालकांची बरीच पंचाईत झाली. कला अकादमी ते मिरामारपर्यंतचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली आल्याने या रस्त्यावरून दुचाकी चालकांना वाहन हाकणेच कठीण बनले होते. पणजी येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयाचे फोन आज दिवसभरात खणाणत होते. संपूर्ण राज्यभरात या मान्सूनपूर्व पावसामुळे बारीक सारीक घटना घडल्याची माहिती देण्यात आली. चिंबल गवळीवाडा येथे व्ही. के. बार या आस्थापनावर झाड कोसळल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. राज्यात सर्व ठिकाणी हा पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप कार्यकारिणीची बैठक आज पणजीत

पणजी, दि. ६(प्रतिनिधी) - गोवा प्रदेश भाजपच्या राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक उद्या रविवार ७ रोजी सकाळी १० वाजता गोमंतक मराठा समाज सभागृहात बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय सहसंघटनमंत्री सतीश वेलणकर व गोवा राज्याचे प्रभारी राजीव प्रताप रूडी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व पक्षाचे सर्व आमदार हजर राहणार आहेत.
या बैठकीला सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष, जिल्हा समिती पदाधिकारी,विभाग प्रमुख तसेच इतर महत्वाच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभा निकालाबाबत सखोल चर्चा करून त्याचा उहापोह या बैठकीत होणार आहे. भाजपकडून यंदा नव्याने सदस्य मोहीम राबवण्यात येणार असून या बैठकीत त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणूकाही येत्या काळात होणार असल्याने त्याचाही आढावा यावेळी घेण्यात येईल.

नेताजीला अटकपूर्व जामीन; प्रकरण दडपण्याचेच संकेत

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - पेडणे येथील कथित वेश्याव्यवसाय प्रकरणातील अन्य एक संशयित नेताजी परब ऊर्फ प्रभुदेसाई याचा अटकजामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. दहा हजार रूपये व वैयक्तिक हमीदाराच्या बदल्यात हा जामीन मंजूर झाला. रोज सकाळी ९ ते १२ या वेळात पेडणे पोलिस स्थानकावर हजर राहण्याची अटही घालण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित राजेश सावंत याने नेताजी परब याचे नाव आपल्या जबानीत सांगितले होते. नेताजी गेल्या कित्येक दिवसांपासून फरारी होता, असा दावा पेडणे पोलिसांनी केला होता. तथापि, नेताजी याच्या वडिलांनी मात्र आपला मुलगा कामानिमित्त जयपूरला गेल्याचे सांगून तो दोन दिवसांत परत गावात परतणार असे म्हटले होते. यापूर्वी पेडणे पोलिसांकडून नेताजी याला अटक होण्याची दाट शक्यता असल्याने त्याने यापूर्वीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पेडणे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यानुसार नेताजी याच्याकडून या प्रकरणातील अनेकांच्या नावांचा पर्दाफाश होणार असल्याचा दावा केला होता. आता नेताजी याला जामीन मंजूर झाल्याने पोलिस त्याच्याकडून या टोळीची नावे कशी काय वदवून घेणार हा खरा प्रश्न आहे.
प्रकरण दाबले जाण्याचे स्पष्ट संकेत
दरम्यान,या प्रकरणाचा आढावा घेतल्यास हे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता या भागातील नागरिकांनी यापूर्वीच वर्तवली होती व सध्या चौकशीची दिशा पाहिल्यास तसेच स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुळात पेडणे पोलिसच या प्रकरणांत गुंतल्याचा संशय असताना या प्रकरणाचा तपास पेडणे पोलिसांकडे देणे कितपत योग्य होते,हा सवाल महत्त्वाचा आहे. या प्रकरणी सनसनाटी तशीच कायम राहावी व जनतेला हे प्रकरण दाबून टाकले जात आहे याचा संशय येऊ नये यासाठीच काही दिवस राजेश सावंत याला कोठडीत ठेवण्यात आले,असा सवालही नागरिक करीत आहेत. मुळात या प्रकरणी पोलिसांचीच चौकशी होण्याची गरज आहे,अशीही मागणी करण्यात आली आहे.

राजेंद्र केरकर यांना "गेरा बिग गोंयकार'

पणजी, दि. ६(प्रतिनिधी) - यंदाचा "गेरा बिग गोंयकार' पुरस्कार प्रसिद्ध पर्यावरणवादी प्रा. राजेंद्र केरकर यांना घोषित करण्यात आला आहे. कालच जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने एका पर्यावरणप्रेमीची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्व थरांतून अभिनंदन केले जात आहे.
पणजी येथील एका बड्या तारांकित हॉटेलात आज हा निकाल जाहीर करण्यात आला. "बिग एफएम ९२.७' व "गेरा' यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी एकूण पाच जणांना नामांकन मिळाले होते. त्यात छायाचित्र पत्रकार राजतीलक नाईक,सिध्दापा तलवार,रिद्धी झाटये व दीप कारापुरकर आदींचा समावेश होता. या गटातून अखेर प्रा. केरकर यांची अंतिम निवड करण्यात आली. व्यावसायिक विभागात- ब्लेझ कॉस्ताबीर,ग्रीन चॅम्प्यीन-निर्मल कुलकर्णी,सजग नागरिक-प्रजल साखरदांडे व बिग इनोव्हेशन-नताली डिसिल्वा यांची निवडही घोषित करण्यात आली.

विकासयोजनांचे परिणाम दिसू लागले

मुख्यमंत्र्यांच्या "प्रगतीपुस्तका'चे प्रकाशन

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात राज्यातील सामान्यांच्या काळजाला भिडण्याचा प्रयत्न केला. आपल्या सरकारने "आम आदमी'च्या कल्याणार्थ विविध योजना राबवल्या व त्याचे परिणाम नुकतेच दिसू लागले आहेत.सरकारने राबवलेल्या लोकोपयोगी योजनांमुळे सामान्यांचे जगणे सुसह्य व समाधानी व्हावे हा त्यामागचा उद्देश होता आणि तो सफल होत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काढले.
कामत यांनी विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारची धुरा सांभाळली त्या घटनेला ८ जून रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या दोन वर्षांच्या काळात विद्यमान सरकारने राबवलेल्या विविध योजना तथा विकासकामांची माहिती करून देणाऱ्या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व समाज कल्याणमंत्री सुदिन ढवळीकर हजर होते. माहिती संचालक मिनीन पीरीस, मुख्यमंत्र्यांचे प्रसारमाध्यम सल्लागार सुरेश वाळवे व गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित श्रीवास्तव हजर होते.
गेल्या दोन वर्षांत प्रसारमाध्यमे,विविध क्षेत्रातील मान्यवर तथा अनेक तज्ज्ञ यांच्याकडून विधायक सूचना आपल्याकडे आल्या. विविध प्रसंगी आपण जास्तीत जास्त लोकांकडे संवाद साधला. सरकारच्या कार्यपद्धतीतील त्रृटींवर टीका झाली,या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊनच सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून आपण योजना आखल्या,अशीही माहिती त्यांनी यावेळी उघड केली. केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या सहकार्याची आठवणही त्यांनी केली. त्यात विशेष करून पंतप्रधान मनमोहनसिंग,श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार, प्रफुल्ल पटेल,सुशीलकुमार शिंदे,कमलनाथ, बग्रोडीया आदी नेत्यांचे विशेष आभार त्यांनी मानले.
"सेझ'प्रकरणी संशय नको
गोव्यात विशेष आर्थिक विभाग नको हा सरकारचा निर्णय यापूर्वीच घोषित झाला आहे. या ना त्या निमित्ताने वारंवार तो उकरून टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. माजी केंद्रीय वाणिज्यमंत्री कमलनाथ यांच्याशी याबाबत चर्चा झाली व आता नवनियुक्त मंत्री आनंद शर्मा यांनाही आपण पत्र पाठवले आहे. अधिसूचित "सेझ'कंपन्यांशी चर्चा करून याप्रश्नी तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. सेझ मान्यता मंडळाने के. रहेजा यांना मुदतवाढ दिली हे खरे असले तरी गोव्यात "सेझ'नको. त्यामुळे या कंपनीकडून काम केले जाणे शक्य नाही. सरकार आपल्या निर्णयाशी ठाम असून कुणीही शंका घेण्याची गरज नाही,अशी ग्वाही त्यांनी दिली.