Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 May, 2011

..खरे तर ह्या सुवर्णपर्‍याच

अनाथ मुलांचीमांडवीत अनाम प्रेमतर्फे जलसफर
• ऍड. सतीश सोनक
पणजी, दि. १
‘गळ्यात साखळी सोन्याची, ही पोरी कोणाची?’ २९ चिमुरड्या मुली शांतादुर्गा जलनौकेवर रिंगणात उत्साहाने नाचत हे गाणे म्हणत होत्या. ‘आवय बी बेवडा आणि बापूस बी बेवडा’ या ओळी पण त्यांच्या ओठावर होत्या पण कुणाच्याच गळ्यात सोन्याची साखळी नव्हती आणि कुणालाच त्यांच्या आईबापांचा पत्ता नव्हता. तरीही हे आपल्या आयुष्याचे थीम सॉंग आहे असे वाटून त्या तल्लीन झाल्या होत्या. ४ वर्षांची नलिता, ५ वर्षांची मंजू, ६ वर्षाची उत्कर्षापासून १६, १७ वषार्ंच्या आरती, अश्‍विना आणि इंदूपर्यंत किती म्हणून नावे सांगायची आणि कशासाठी? यातील कुठलेही नाव त्यांच्या आई-बाबांनी प्रेमाने दिले नव्हते. कारण त्या सार्‍या अनाथ होत्या. प्रसंग होता, मांडवीच्या पात्रात ‘अनाम प्रेम’ने आयोजित केलेल्या जलसफरीचा.
नालासापोरा या मुंबईच्या उपनगरात ‘सारडा शिशू निकेतन’ ही बिगर सरकारी संस्था अनाथ चिमुकल्या मुलींना सांभाळते. या संस्थेची प्रेरणा आहे स्वामी विवेकानंद. ही संस्था व उपेक्षितांच्या पाठीवर आईच्या ममतेने हात फिरवू इच्छिणारी. या आणि अनाम प्रेम या लोकचळवळीच्या संयुक्त विद्यमाने या मुली गोवा भेटीवर आल्या.
ज्या आई बापांमध्ये आपल्या सोन्यासारख्या मुलींना पोसण्याचा दम नाही त्यांच्यापासून ताटातूट झालेली ही देवाघरची फूले शिशू निकेतनच्या परडीत उमलतात. गोव्याची ओंजळ सुगंधित करण्याच्या सद्हेतूने गोवा विकास पर्यटन महामंडळाने शांतादुर्गा ही जलनौका सवलतीच्या दरात अनाम प्रेमच्या दिमतीस दिली आणि चिमुकल्यांच्या आयुष्यात हसरे क्षण फुलण्याची जादू घडली.
दरवर्षी १ मे रोजी असा उपक्रम करण्याची परंपरा अनाम प्रेम सातत्याने पाळत आहे. ज्यांच्या काळजात कळवळा आणि दुसर्‍यांना हात देण्याची प्रेरणा आहे तेच या जलसफरीत सहभागी होतात. यांचे बालहट्ट पुरे करण्यासाठी फार मोठ्या संपत्तीची गरज नाही. त्या काही चंद्र तारे मागत नाहीत तर केवळ तुमची माझी आपुलकी मागतात. तुम्ही त्यांच्याकडे साधे हसून पाहिलात तर तेवढ्याने त्यांच्या जीवनात आनंदाची भरती येते. मांडवीच्या तीरावरील अविस्मरणीय जलसफर म्हणजे या अनुभूतीचे प्रात्यक्षिक होते. आतल्याआत कुढत जगणार्‍या या चिमुकल्यांना खेळत बागडत बोलते करण्याचे पुण्यकर्म अनाम प्रेमच्या खात्यावर निश्‍चितच जमा होईल.
या जलसफरीत जे मिळाले त्याची मोजदाद हजारो कोटीच्या काळ्याधनात होणार नाही. चिमुरड्यांच्या डोळ्यातील हरवलेले स्वप्नांचे पक्षी शोधण्याच्या कामाचे पैशांत मूल्यमापन शक्य नाही. या उपक्रमामुळे आयुष्याला एक वेगळाच स्पेक्ट्रम मिळाला आणि हरवलेली माणुसकी शोधण्याची विवेकबुद्धी मिळाली. या पोरक्या पोरींच्या आयुष्यात त्यांना जे सोसावे लागले असेल त्यापुढे आपली मोठ्यातील मोठी दुःखे काहीच नाहीत. याचा साक्षात्कार झाला. ही जलसफर म्हणजे डोळे उघडणारा प्रवास होता. त्यात एकमेकांचे कौतुक करणार्‍या छोट्या मुलींचा टाळ्यांचा कडकडाट हे विश्‍वातील सर्वात मधुर संगीत होते.
या कार्यक्रमात स्वच्छंद मस्ती आणि उत्साहाची धूम होती आणि तरीही सारा कारभार शिस्तबद्ध. आपल्या घरच्या बिघडलेल्या कार्ट्यांनी या चिमुरड्यांचा आदर्श ठेवावा असे कुणालाही वाटेल.
गोव्यात त्यांना कार्यक्रम आयोजित करणार्‍या चिंतामणी सामंत सारखी देव माणसे भेटली. त्यांच्या पर्वरीतील सिद्धिविनायक या छोटेखानी घरात या मुलींनी हृदयाचे मोठेपण अनुभवले. मुंबईतील प्रभादेवीत खरोखर सिद्धिविनायक आहे की नाही हे मला माहीत नाही पण पर्वरीतील सिद्धिविनायक घर मला कुठल्याही मंदिरापेक्षा पवित्र वाटते कारण हे घर अनाथांना घरपण देते.
बोलता बोलता श्री. सामंत सहजच बोलून गेले ‘या मुलींनी आपल्या आपुलकीस प्रतिसाद देऊन भारताचे चांगले नागरिक व्हावे’. एक सामान्य नागरिक असे स्वतः पलीकडे जाऊन असामान्य स्वप्न पाहू शकतो म्हणून तर भविष्याचे व्हिजन गोमंतकीयंाच्या डोळ्यांत तेवत राहिले आहे. सामंतांनी आपले स्वप्न सांगितले आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यांत खळाळून पाणी आले.
अनाथ भारतीय मुलींतील ९५ टक्के मुली अशिक्षित असून हालअपेष्टा हा त्यांचा गुरू आहे. मांडवीत जलसफर करताना या आकडेवारीची लाट माझ्या मनावर धडक देत होती.
या जलसफरीचे निमंत्रण मी एका मित्राच्या छोट्या मुलाला दिले. त्याने विचारले, ‘तुम्ही माझ्या बाबांना माझ्यासोबत येऊ द्याल ना?’ जड जिभेने हो म्हणताना माझ्या डोळ्यांसमोर आई बाप माहीत नसलेल्या त्या छोट्या २९ पाहुण्या तरळत होत्या.
माझी आई एक कविता गायची. त्यात बाण लागून जखमी झालेल्या घायाळ पक्षिणीचे वर्णन होते. आपल्या शेवटच्या क्षणी मृत्यू जवळ आल्यावर ती पक्षीण आपल्या पिल्लांना म्हणते
‘तुम्हा अजी अंतीचा कवळ एक मी आणिला
करू जतन या पुढे प्रभू पिता अनाथा सदा...!’
मी प्रभू पित्यांना कधी पाहीले नाही. पण मी या जलसफरीत चिंतामणी व सौ. मीरा सामंत, श्रीमती सुमन सामंत, श्री. लाड, अरुण स्वार, प्रशांत भाट, सुरेश देसाई, अनिल देसाई, सौ. सुनंदा देसाई, किशोर मयेकर, मीरा मयेकर, अरुण राणे, अविनाश भोसले, संजय व श्रीकांत बर्वे आणि श्री व सौ. खेडेकर, यांना अनाथ बालिकांना घास भरविताना पाहिले.
डॉल्फिन पाहून विस्मयाने थक्क झालेल्या पोरक्या पोरींचे आनंदाचे चित्कार ऐकताना नौकेजवळ खनिज माती म्हणजे पर्यायाने देश विकण्यास नेणार्‍या बार्जचा घरघराट सुरू झाला. बालपिढीच्या भवितव्याशी जुगार खेळणारे कॅसिनो अंगावर चाल करून आले. वाईट याचे वाटते की ही सर्व आपल्याच देशातील आपल्या माणसांची करणी आहे.
एकीकडे देव माणसे आणि समोरच देश विकणारे.
टागोरांसारखी पांढरी शुभ्र लांबलचक दाढी आणि बाबा आमटेसारखे करूणेने भरलेले मन असलेले एक देवदूत या प्रवासात होते. त्यांनी प्रत्येक बालिकेला आर्जवे करून कपड्यांच्या दुकानातच नेले व हवे ते कपडे घेऊन दिले. हेच खरे पितृत्व, हेच खरे भारतीयत्व. जलसफरीतील प्रत्येक बालिका ही भारतमातेचे रूप होती हे जाणवले अन् लक्षात आले की ही पोर कुणाची? हा प्रश्‍न विचारायची गरज आता शिल्लक राहिली नाही. कुठल्याही पेज थ्रीवर या जलसफरीचा उल्लेख राहिलेला नसेल पण मनाच्या प्रत्येक पानावर तो फडफडत राहील.
भारत मातेच्या हातातील प्राणप्रिय तिरंग्यासारख्या या चिमुकल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करायलाच हवे. मला आलेला एक एसएमएस मी जपून ठेवला आहे. त्यात लिहिले आहे ‘आय ऍम फायटिंग बॅक माय टीअर्स अँड हेल्पलेसनेस’.

No comments: