Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 July, 2009

'सोसायटी'चे १८०० कामगार अखेर तीन वर्षांसाठी सेवेत आंदोलनापुढे सरकाचे नमते

पणजी, दि.१० (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या कार्यकाळात २००३ साली स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सा. बां. खा कामगार पुरवठा सोसायटीच्या सुमारे १८०० कंत्राटी कामगारांनी गेल्या एका वर्षापासून सुरू ठेवलेल्या आंदोलनासमोर शरणागती पत्करून अखेर सरकारने या कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार आयुक्त व्ही. बी. एन. रायकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सुमारे साडेपाच तासांच्या मॅराथन बैठकीत सा.बां.खाते व कामगार संघटना यांच्यात तीन वर्षांसाठीच्या करारावर सह्या करण्यात आल्या.
कामगार संघटनेचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ऍड,राजू मंगेशकर, सुहास नाईक यांच्यासह कामगार व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सातारीनो मिस्कीता,सरचिटणीस रमेश साखळकर,उपाध्यक्ष शेखर धोंड,उपाध्यक्ष सुदीप पै नाईक,खजिनदार सायमन फालेरो,कार्यकारिणी सदस्य मंगेश परब,महादेव गांवकर व प्रेमानंद कळंगुटकर यावेळी हजर होते.सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे मुख्य प्रधान अभियंते ए.एम.वाचासुंदर, मुख्य अभियंते जे.एन.चिमुलकर व संयुक्त लेखा संचालक श्रीपाद नाईक हजर होते.कालपासून सुरू झालेली ही बैठक आज सकाळी १० वाजता पुन्हा सुरू झाली. या बैठकीत या करारावर सखोल चर्चा झाली व अखेर दुपारी साडेतीन वाजता प्रत्यक्ष करारावर सह्या करण्यात आल्या. यावेळी कामगार आयुक्त कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सा.बां.खात्याच्या कामगारांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर,सुहास नाईक आदींनी या कामगारांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने तसेच या कामगारांनी एकसंध राहून हा लढा दिल्याने हा विजय झाला,असे उद्गार यावेळी या कामगारांनी व्यक्त केले.
भाजप सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत हंगामी,रोजंदारी व कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सर्वांना एकत्रित करून सार्वजनिक बांधकाम खाते कामगार पुरवठा सोसायटी स्थापन करण्यात आली. ही सोसायटी खात्याअंतर्गतच सुरू करण्यात आली होती. सुमारे दहा ते बारा वर्षे हे कामगार या खात्यात सेवा बजावीत आहेत. या कामगारांची ३१ डिसेंबर २००७ रोजी कराराची मुदत संपली होती. त्यानंतर करार करण्यास खात्याकडून चालढकल सुरू करून गेले दीड वर्ष हे कामगार संघटितपणे हा लढा लढत आहेत. गेल्या जानेवारी २००९ महिन्यात या कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मान्य केले व त्यानंतर कामगार आयुक्तांसमोर गेली दीड वर्षे सुनावणी सुरू होती. कामगार आयुक्तांसमोर एकूण ४८ बैठका झाल्या व आज प्रत्यक्ष करारावर सह्या करण्यात आल्या. हा करार १ जानेवारी २००८ ते ३१ डिसेंबर २०१० पर्यंत कार्यरत राहील. या कराराप्रमाणे अप्रशिक्षित कामगार-१६७ रूपये प्रतिदिन, उपप्रशिक्षित-१८०, प्रशिक्षित२१० व उच्च प्रशिक्षित२२५ रुपये प्रतिदिन असा पगार देण्याचे मान्य केले आहे. हा पगार महिन्याच्या ३० दिवसांसाठी असेल. त्यात या कामगारांना १५ दिवस पगारी रजा,६ दिवस सामान्य रजा,सार्वजनिक सुट्ट्या,आजारी रजा व आठवडी सुट्टीचाही लाभ मिळणार आहे. बोनस,ओवरटाइम,हेजार्डियस भत्ता,सुरक्षा सुविधा, गणवेश, वरिष्ठ श्रेणी,थकबाकी व नव्या नोकरभरतीत प्राधान्य अशा अटीही मान्य करण्यात आल्या आहेत.या कामगारांना वार्षिक पगारवाढही मिळणार आहे. येत्या ३१ डिसेंबर २००९ पर्यंत या कराराच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल कामगार आयुक्तांना सादर करण्याचेही यावेळी ठरवण्यात आले.

अंजुणे धरणात मुबलक पाणी अभियंत्याचा दावा

पाळी, दि. १० (वार्ताहर ): अंजुणे धरणातील पाण्याची पातळी कमी असल्यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाले असून नागरिकांनी त्यामुळे घाबरण्याचे मुळीच कारण नाही, उर्वरित काळात आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने पाण्याची समस्या उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत अंजुणे धरण प्रकल्पाचे साहाय्यक अभियंते एम. पी. हूड्डेगुड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. या विषयी सविस्तर माहिती देताना एम.पी हूड्डेगुड्डी यांनी सांगितले की ४४८३ हेक्टर मीटर क्षमतेच्या अंजुणे धरणात १३०० हेक्टर पाणी भरले आहे. सुरुवातीच्या काळातील पावसानंतर सध्या जमीन चार्ज झाल्याने पाणी तीव्र गतीने भरत आहे. यंदा या भागात एकूण १६६२.८मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आणखी २९००मि.मी. पाऊस झाल्यास धरणात मुबलक प्रमाणास पाणी जमा होणार आहे. पावसाचा कालावधी अजून बाकी आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नसल्याचे हुड्डेगड्डी यांनी सांगितले. गेल्या दहा दिवसांत या भागात चांगला पाऊस पडल्याने पाण्याची पातळी वाढत आहे ऐरवी अंजुणे धरणातील पाणी आम्ही जास्त पाऊस असल्याने सोडत नाही. ओहोटीच्या वेळीच पाणी सोडले जाते. प्रतिवर्षी १ जूनपर्यंत आम्ही पाणीपुरवठा बंद करायचो, यंदा मात्र २६ जून पर्यंत पुरवठा चालू ठेवला होता. धरणातील पाणी आवक पातळी गाठल्यानंतर धरणाचा पहिला दरवाजा ९१ उंची पर्यंत ओलांडल्यानंतर १५ ऑगस्टनंतर उघडला जातो. हुड्डेगुड्डी यांनी पुढे सांगितले की अंजुणे धरण अद्ययावत सुविधांनी युक्त बनविण्यात येत आहे. मॅकाट्रॉनिक्स या पुढे येथील कंपनीने खास संगणकीय अत्याधुनिक यंत्रे केरी सत्तरी येथे बसविली आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन दर दिवशी पडणारा पाऊस, धरणातील पाण्याची पातळी आदी गोष्टीची नोंद ठेवण्यास सहकार्य मिळत आहे. बसल्या ठिकाणावरून सर्व गोष्टींवर निमंत्रण ठेवणे शक्य आहे. सुरुवातीच्या काळात धिम्या गतीने पडणारा पाऊस गेल्या दहा दिवसांपासून चांगला पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे.अंजुणे धरणात मुबलक प्रमाण पाणी साठले जाईल त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी दरवर्षी प्रमाणे यंदाही उपलब्ध होणार आहे,असे मत ए.पी. हुड्डेगुड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

'स्वाईन फ्लू'चे आणखी काही संशयास्पद रुग्ण

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) : राज्यात "स्वाईन फ्ल्यू'चा विषय गंभीर बनत चालला असून या रोगाची लागण झालेल्या त्या ३१ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीलाही याची लागण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तिला चिखली येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य चौघांना लक्षणे दिसायला लागल्याने त्यांच्याही थुंकीचे नमुने दिल्ली येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, आज जर्मन येथून गोव्यात परतलेल्या स्वाईन फ्ल्यूची लक्षणे दिसून आल्याने त्याच्याही थुंकीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
दि. ५ जुलै रोजी जहाजावरून मुंबईमार्गे गोव्यात आलेल्या ३१ वर्षीय व्यक्तीच्या घरातील अन्य सदस्यांनाही या रोगाची लागण झाल्याची लक्षणे दिसून आल्याचे आज डॉ. राजेंद्र तांबा यांनी सांगितले. त्याच्या पत्नीला चिखली येथे दाखल केले आहे, तर अन्य सदस्यांना घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जोपर्यंत त्यांच्या थुंकीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यांना तोंडावर "मास्क' वापरण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. तांबा यांनी दिली.

मूर्तिविध्वंस प्रकरणी अजून धागादोरा नाही

मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): गेल्या बुधवारी गिर्दोळी येथील श्रीमहालक्ष्मी मंदिरांतील मूर्तीच्या झालेल्या विध्वंस करण्याच्या घटनेची पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत असूनही गुन्हेगारांचा अजूनही कोणताच मागमूस त्यांना लागलेला नाही. मायणा कुडतरी पोलिसांनी काल व आज मिळून सुमारे १० संशयितांना आणून चौकशी केली पण अजून काहीच संशयास्पद बाबी आढळलेल्या नाहीत असें सांगण्यात आले.
दोन फूट ऊंचीची ही मातीची मूर्ती लांब काठीने भोसकून फोडली व तिचे तुकडे केले गेल्याने ते कोणा माथेफिरूचे तर काम नाहीना असा सवाल केला जात आहे. नगरविकास मंत्री जोकीम आलेमांव यांच्या मतदारसंघातील हा गेल्या वर्षभरातील चौथा प्रकार. हे प्रकार त्यांच्यासाठी डोकेदुखीचे ठरलेले आहेत

Friday 10 July, 2009

मडगाव रेल्वे स्टेशनला मिळणार जागतिक दर्जा

श्रीपाद नाईक यांची मागणी मान्य

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी) - उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी रेल्वे अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग घेताना मडगाव रेल्वे स्टेशनचा समावेश जागतिक दर्जाच्या (वर्ल्ड क्लास) सोयीसुविधा निर्माण करण्यात येणाऱ्या देशातील ५० रेल्वे स्टेशनांत करावा, अशी जोरदार मागणी लोकसभेत केली होती, ती रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मान्य केल्याने गोवा प्रदेश भाजपने स्वागत केले आहे. मडगाव रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढविण्याच्या या घोषणेचे गोव्यात व्यापक स्वरुपात स्वागत झालेले आहे.
यादीत ४६ शहरांची भर
आज लोकसभेत रेल्वे बजेटवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. त्या म्हणाल्या की, यापूर्वी रेल्वे अंदाजपत्रकात ज्या स्थानकांना जागतिक स्तराचा दर्जा मिळवून देण्याची योजना सुचविण्यात आली होती त्या यादीत गोवा आणि कालिकत यांचाही समावेश करण्यात आला आहे. आदर्श स्थानकांच्या यादीतही अतिरिक्त ४६ शहरांची नावे आता समाविष्ट केली जाणार आहेत. याशिवाय महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, दिल्ली ते सिकंदराबाद आणि दिल्ली ते नागपूर दरम्यान दोन नॉन स्टॉप दूरांत गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या एक महिन्याच्या आत सुरू होणार असल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितले.
यापूर्वी त्यांनी आपल्या बजेटच्या भाषणात ५० स्थानकांना वर्ल्ड क्लास दर्जा देण्याचे जाहीर केले होते. आदर्श स्थानकांच्या यादीत सासाराम आणि नौगछियासह एकूण ४६ स्थानके समाविष्ट होणार आहेत. सोबतच बहुउद्देशीय परिसरांच्या रुपात विकसित केल्या जाणाऱ्या स्थानकांच्या यादीत दुर्गापूर, वर्धमान आणि अयोध्येसह १५ स्थानकांना समाविष्ट करण्यात आले आहे. रेल्वे अंदाजपत्रकात १२ दूरांत गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. आता त्यात आणखी दोन गाड्यांची भर पडली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या घोषणेमुळे कोकण रेल्वेमार्गावरील महत्वाचे जंक्शन ठरलेल्या मडगाव स्टेशनाला आता आणखीन महत्व येणार असल्याचे सांगितले जात आहे. गोव्यातून पर्यटन व्यवसायातून केंद्राला जी हजारो कोटींचे विदेशी चलन मिळते ते पहाता असा दर्जा मिळणे हा मडगावचा अधिकार होता, असे श्रीपाद नाईक यांनी म्हटले होते. आपली मागणी मान्य केल्याबद्दल नाईक यांनी सरकारचे आभार मानले आहेत. करमळीला "मॉडेल' स्टेशनचा दर्जा देण्याची आपली मागणी मान्य करण्याचे आवाहन त्यांनी ममता बॅनर्जी यांना केले आहे.
रेल्वे मंत्र्यांनी आज एक प्रकारे श्रीपादभाऊंची मागणी मान्य करताना रेल्वे अर्थसंकल्प सादर करतेवेळी झालेली आपली चूकच सुधारली आहे. या दर्जामुळे केवळ तिकिट आरक्षणातच केवळ नव्हे तर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ या स्टेशनला मिळणार आहे. रेल्वेने यापूर्वीच सर्वसामान्य प्रवासी व आपले कर्मचारी यांच्यासाठी यात्री निवास तसेच विश्रामधाम बॉंधण्याचे काम सुरु केले आहे. रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेलाही प्राधान्य देताना येथे सीसीटीव्ही बसविण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आह्े.
जागतिक दर्जामुळे स्टेशनवरील सर्व सुविधा त्या दर्जाच्या होण्याबरोबरच आणखी सुविधांची त्यात भर पडेल तसेच स्टेशनला जोडणारे नवे मार्ग तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी रेल्वेमंत्र्यांच्या यासंबंधीच्या घोषणेचे स्वागत केले आहे.

गुजरातेत विषारी दारूचे ८० बळी

अहमदाबाद, दि. ९ ः गुजरातमध्ये विषारी दारूबळींची संख्या ८० वर पोहोचल्याचे वृत्त आहे.
काल रात्रीपर्यंत ही संख्या ४८ होती. आज दिवसभरात अहमदाबादमधील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांपैकी आणखी काहीजण दगावले. अधिकृतरीत्या हा आकडा ७३ सांगण्यात येत असला तरी, मुळात हा आकडा ८० च्या वर गेल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. अजूनही शेकडो लोक उपचार घेत आहेत. शहरातील अमराईवाडी, रायपूर, रखीयाल आणि अन्य ठिकाणी रुग्णालयात हे उपचार सुरू आहेत.
आज काही ठिकाणी नागरिक आणि दुकानदार यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. सरकारविरोधी नारेबाजी करीत दोषींविरुद्ध कारवाईचीही मागणी केली. काही ठिकाणी संतप्त निदर्शनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. अद्याप या प्रकरणी १०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यात अन्यत्रही अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

"स्वाईन फ्लू'च्या आणखी एका रुग्णावर उपचार

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - अमेरिकेतून परतलेल्या ३१ वर्षीय तरुणाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे चाचणीत निश्चित झाले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र तांबा यांनी दिली. त्या रुग्णाची तब्येत पूर्णपणे सुधारली असून येत्या काही दिवसांत त्याला घरी पाठवले जाणार आहे. गोव्यात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या दोन रुग्णाची नोंद झाली आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णावर पाच दिवस उपचार करावा लागतो. अशा रुग्णाला "टेमीफ्ल्यू" ही गोळी दिली जाते,अशी माहिती डॉ. तांबा यांनी दिली.
एका रुग्णामुळे शंभरच्या आसपास लोकांना "टेमीफ्ल्यू'ची गोळी द्यावी लागत आहे. त्यामुळे अमेरिका आणि इंग्लंड मधून परतलेल्या व्यक्तीच्या किंवा नातेवाइकांच्या दोन दिवस जवळ न जाण्याचा आणि किमान एक मीटर लांब राहण्याचा सल्ला डॉ. तांबा यांनी दिला आहे. विदेशातून परतलेल्या व्यक्तीला ताप किंवा खोकला येत नसल्यास त्याला या 'फ्ल्यू'ची लागण झालेली नाही, असे ग्राह्य धरता येते, असे त्यांनी सांगितले.
सदर ३१ वर्षीय रुग्ण मुंबईमार्गे गोव्यात पोचला होता. दि. ५ जुलै रोजी गोव्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या अंगात ताप भरला. त्यामुळे तो गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी गेला. हा रुग्ण विदेशातून परतल्याची माहिती मिळताच येथील डॉक्टरांनी त्याला थेट चिखली येथील कुटीर रुग्णालयात जाण्यास सांगितले. हा "फ्ल्यू' अधिक फैलावू नये यासाठी दि. ५ आणि ६ जुलैच्या या दोन दिवसात सदर रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना "टेमीफ्ल्यू'गोळी देण्याची सत्र आरोग्य खात्याने सुरू केले आहे. सदर रुग्ण गोमेकॉत गेला होता, त्यावेळी "कॅज्युल्टी'मध्ये कोण कोण उपस्थित होते, त्याचप्रमाणे त्याच्यासह मुंबईतून गोव्यात आलेल्या त्या विमानातील सहप्रवाशांची यादी आरोग्य खात्याने मिळवली असून त्या सर्वांना ही गोळी दिली जाणार असल्याची माहिती डॉ. तांबा यांनी दिली.
दि. ६ जुलै रोजी गोमेकॉच्या केज्युल्टीत डिचोली, सत्तरी व काणकोण या भागातील रुग्ण आले होते. त्यामुळे या लोकांना संपर्क साधणे कठीण होत असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे या रुग्णाच्या घरातील आणि त्याला भेटण्यासाठी आलेल्या सर्व नातेवाइकांना ही गोळी देण्यात आली असल्याचेही डॉ. तांबा यांनी सांगितले.

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना आता पाचशे रुपये दंड

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)- दुचाकी घेऊन महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी वाहतूक नियम मोडल्यानंतर सहज शंभर रुपयाची नोट काढून दंड भरत असल्याने दंडाची रक्कम वाढवून किमान दंड पाचशे रुपये करण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी वरिष्ठांकडे केली आहे. दंडाची रक्कम शंभर वरून पाचशे करण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून सरकार दरबारी पडलेला असून पाचशे रुपयाची किंमत घसरण्यापूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास काही प्रमाणात बेदरकारपणे वाहन हाकणाऱ्या तरुणांवर वचक बसणार असल्याचे मत पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी व्यक्त केले. या विषयावर पत्रकारांनी छेडल्यावर ते बोलत होते.
सध्याच्या काळात शंभर रुपयांना कोणतेही महत्त्व राहिलेले नाही. महाविद्यालयात जाणारा विद्यार्थी सहजपणे शंभर रुपयाची नोट काढून दंडाची रक्कम भरतो. त्यामुळे त्यांना कायद्याची किंवा वाहतूक नियमांची कसलीही भिती वाटत नाही. ही रक्कम वाढवून किमान दंड पाचशे रुपये केल्यास काही प्रमाणात वाहतूक नियम पाळले जाणार असल्याचे मत यावेळी श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले. यापूर्वी किमान दंड ४० रुपये होता. ही रक्कम एकदमच नगण्य असल्याने ती वाढवून किमान शंभर रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारकडे करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर होईतोवर शंभर रुपयांची किंमत घसरली. त्यामुळे लवकरात लवकर दंडाची रक्कम वाढवली जावी, अशी मागणी पोलिस खात्याची आहे.
दंडाची रक्कम वाढवली आणि हेल्मेट परिधान केले म्हणून अपघात टळणार नाही. त्यासाठी वाहतूक नियमांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. जोपर्यंत वाहतूक नियमांचे पालन होत नाही, तोवर अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होणे कठीण आहे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे मद्यप्राशन करून वाहन हाकणाऱ्यांना थेट अटक करून न्यायालयात उभे करण्याची कार्यपद्धत वाहतूक पोलिसांनी अवलंबली पाहिजे, असेही मत श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा व ग्रामपंचायतींच्या चार पोटनिवडणुका ९ रोजी

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - जिल्हा पंचायत व ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी दोन रिक्त जागांसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक घेण्याची घोेषणा राज्य निवडणूक आयुक्त पी.एम.बोरकर यांनी केली आहे. ताळगाव व सांताक्रुझ हे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ व करमळी व पिळगाव ग्रामपंचायतीच्या दोन प्रभागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
ताळगावची जागा माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा जेनिफर मोन्सेरात यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती. ही जागा महिलांसाठी राखीव आहे तर सांताक्रुझ जिल्हा पंचायतीचे सदस्य लोरेन्स आझावेदो यांचे निधन झाल्याने ही जागा रिकामी झाली आहे. करमळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग ५ (अनुसूचित जमातीसाठी राखीव) व डिचोली तालुक्यातील पिळगांव पंचायतीच्या प्रभाग ३ चे पंच अजय गांवकर यांनी राजीनामा दिल्याने या प्रभागासाठीही पोटनिवडणूक होईल.
या पोटनिवडणुकीसाठी १३ ते २० जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल. २१ रोजी अर्जांची छाननी, २२ रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख तर त्याच दिवशी अंतिम यादी जाहीर होईल. ९ ऑगस्ट रोजी या दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ व दोन पंचायत प्रभागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल व १० रोजी मतमोजणी होईल.
करमळी व पिळगाव पंचायत पोटनिवडणुकीसाठी तिसवाडी व डिचोली तालुक्याचे मामलेदार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील तर जिल्हा पंचायतीचे दोन्ही मतदारसंघ तिसवाडी तालुक्यात येत असल्याने तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवडणूक अधिकारी असतील,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

"सोसायटी'च्या कामगारांना कंत्राटावर घेण्याचा प्रस्ताव

गोमेकॉ सफाई कामगारांचे आंदोलन स्थगित

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारांना केवळ राजकीय वैमनस्यातून सतावले जात होते हे आता स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या सर्व कामगारांना सेवेत घेण्याचे सशर्त मान्य करून भाजप सरकारच्या कारकिर्दीत स्थापन झालेल्या गोवा रोजगार व कंत्राटी कामगार सोसायटीशी फारकत घेऊन थेट गोमेकॉ अंतर्गत कंत्राटावर भरती होण्याची अट घातली आहे. आपल्या भवितव्याबाबत चिंतीत बनलेल्या या सुमारे २०८ कामगारांनी ही अट मान्य करून गेल्या १० जूनपासून सुरू केलेले आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गोवा रोजगार व कंत्राटी कामगार सोसायटीअंतर्गत गेली नऊ वर्षे गोवा वैद्यकीय महाविद्यालय, मानसोपचार केंद्र व टी. बी. इस्पितळात सफाई कामगार म्हणून सेवेत असलेल्या सुमारे २०८ कामगारांना सेवामुक्त करण्याचे षड्यंत्र विद्यमान सरकारने आखले होते.आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या सत्तरी तालुक्यातील लोकांची थेट भरती सुरू करून या कामगारांना घरी पाठवण्याची तयारी केल्याने या कामगारांनी गेल्या १० जूनपासून बेमुदत धरणे धरले होते. यापूर्वी या कामगारांना सेवेत नियमित करण्याचे आश्वासन दिलेल्या आरोग्यमंत्र्यांनी अचानक आपला शब्द फिरवल्याने या कामगारांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक गेल्या ६ जुलै रोजी पर्वरी मंत्रालयात पार पडली. या बैठकीला कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, सुहास नाईक, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ.राजनंदा देसाई, आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव, कार्मिक खात्याचे संयुक्त सचिव, प्रशासकीय खात्याचे संयुक्त सचिव, गोमेकॉचे प्रशासकीय संचालक व उपसंचालक, मानसोपचार केंद्राचे प्रशासकीय उपसंचालक आदी हजर होते.
या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी भाजप सरकारने तयार केलेल्या सोसायटीबाबत आपल्या मनातील गरळ ओकली. सोसायटीशी सरकारने संबंध तोडल्याचेही ते यावेळी म्हणाले. केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून या कामगारांना सेवेत ठेवल्याचे ते म्हणाले,अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या बैठकीत या कामगारांना पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीवर कामाला घेण्याचे चर्चेनंतर ठरले परंतु या कामगारांना थेट गोमेकॉ अंतर्गत कंत्राटावर भरती केले जाणार आहे व त्यासाठी त्यांना नव्याने मुलाखती द्याव्या लागतील,असेही ठरले.सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांना पगार देण्यात येणार आहे. चतुर्थश्रेणी कामगारांना मिळणाऱ्या सर्व रजाही त्यांना लागू करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. गोमेकॉत सफाई कामगारांच्या १८७ जागा रोजंदारीवर भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यताही मिळवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही भरतीप्रक्रीया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करून ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी त्यांना रुजू केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान,भविष्यात या २०८ कामगारांना वय, शिक्षण आदी अटी शिथिल करून सेवेत कायम करण्याबाबत निश्चित धोरण तयार केले जाणार असल्याची माहिती कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली. विकास आयुक्त तथा आरोग्य खात्याचे सचिव यांनी गेल्या २४ जून २००९ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे ही बैठक बोलावण्यात आली होती.या २०८ कामगारांना "एमआरआय'संस्थेकडे त्यांच्या सोयीप्रमाणे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. यावेळी ४ साहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्याचे ठरले.

आता शेतकरी ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

धारगळ क्रीडानगरी प्रकरण

पणजी, दि.९ (प्रतिनिधी) - नियोजित क्रीडानगरीतून आपली शेत जमीन वगळण्यात यावी, अशी मागणी करणारे विर्नोडा येथील शेतकरी केवळ या जमिनीचे राखणदार श्री देव बांदेश्वराला साकडे घालून गप्प बसले नाहीत तर त्यांनी याविषयी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचीही जय्यत तयारी सुरू केली आहे. सरकारकडून कशा पद्धतीने ही शेतजमीन बळकावली जात आहे, याबाबत कागदपत्रे जमवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती शेतकरीवर्गाचे नेते श्रीपाद परब यांनी दिली.
धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीचा विषय सध्या बराच तापत आहे. येथील पिडीत शेतकऱ्यांनी राज्य सरकारला आपली शेतजमीन या प्रकल्पातून वगळण्यासाठी १८ जुलैपर्यंत मुदत दिली आहे, अन्यथा २३ जुलै रोजी पेडण्यात मूक मोर्चा आयोजित करून जमीन बचाव आंदोलनाला सुरुवात केली जाईल,अशी घोषणाही केली आहे.धारगळ येथील सदर नियोजित जमिनीत येथील शेतकऱ्यांनी बायागती तयार केल्या असून उत्पन्न देणारी हजारो झाडेही लावली आहेत.यासाठी खुद्द कृषी खात्याच्या योजनांचा लाभ या शेतकऱ्यांनी मिळवला आहे. या भागात तिळारी धरणाचा कालवाही जात असल्याने शेतीसाठी या जमिनीचे महत्त्व वाढण्याची शक्यता असताना ही जमीन क्रीडानगरी उभारण्याचा घाट घातल्याने येथील शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध चालवला आहे. धारगळचे आमदार तथा क्रीडामंत्री बाबु आजगांवकर यांच्याकडून शेतकरीवर्गाला डावलून आपल्या समर्थकाकरवी क्रीडानगरीच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार सुरू आहे. मुळात शेती करणे हा मूर्खपणा आहे व एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीत शेतीसाठी हट्ट करणे अनाठायी असल्याची भाषाही त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. दरम्यान,आत्तापर्यंतच्या सरकारच्या भूमिकेचा विचार केला असता जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर अनेक निर्णय लादण्याचेच प्रकार या सरकारकडून घडले आहेत. सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार या भ्रमात न राहता प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारीही या शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. दरम्यान, लवकरच याप्रकरणी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, केंद्रीय क्रीडा व्यवहारमंत्री तसेच राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना निवेदन सादर केले जाणार आहे. या जागेसंबंधीची सर्व कागदपत्रे जमवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून कोणत्याच पद्धतीत सरकारसमोर नमणार नाही,असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे,अशी माहितीही श्रीपाद परब यांनी दिली.

Thursday 9 July, 2009

शेतजमीन न वगळल्यास २३ पासून तीव्र आंदोलन

धारगळ क्रीडानगरी प्रकरण
पणजी,पेडणे, दि. ८ (प्रतिनिधी) ः नियोजित क्रीडानगरी प्रकल्पातून आपली शेतजमीन वाचवण्याच्या निर्धाराने संघटितपणे उभे राहिलेल्या विर्नोड्यातील शेतकरी बांधवांनी या जमिनीचा राखणदार श्री बांदेश्वराला साकडे घालून आपला लढा आता तीव्र केला आहे. आपल्या भावी पिढीसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून घामाचा पाट करून उभ्या केलेल्या या जमिनीचा एक इंचही देणार नाही,असा संकल्पच त्यांनी केला आहे. राज्य सरकारने येत्या १८ जुलैपूर्वी ही शेतजमीन या नियोजित प्रकल्पातून वगळली नाही तर २३ रोजी पेडण्यात मूक मोर्चा काढून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या आंदोलनाची सुरुवात केली जाईल,अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
पेडणे तालुका मंच व क्रीडा नगरी जमीन बळकाव विरोधी कृती समितीतर्फे संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पेडणे येथील शेतकरी सहकारी सोसायटीच्या मिनी सभागृहात ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. मंचाचे प्रमुख सतीश शेटगावकर, सरचिटणीस सदानंद वायंगणकर, उपाध्यक्ष निलेश पटेकर, रमेश सावळ , सचिव महादेव गवंडी, विष्णूदास परब, श्याम धारगळकर, प्रशांत गडेकर, व शेतकरी श्रीपाद परब आदी हजर होते. १ ते ५ जुलैपर्यंत तालुका पातळीवर गावागावात जाऊन याविषयाबाबत लोकांना माहिती करून दिली असता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरचिटणीस सदानंद वायंगणकर यांनी केला.
दरम्यान,क्रीडामंत्री बाबु आजगावकर यांनी विनाकारण या विषयाचे राजकारण करून येथील जनतेत फूट घालण्याचे प्रयत्न करू नयेत.त्यांना पेडण्याचा विकास करायचा आहे व येथील जनतेलाही या तालुक्याचा विकास झालेला हवा.क्रीडानगरीसारख्या बड्या प्रकल्पासाठी शेतजमिनीचा हट्ट करण्याची त्यांची कृती मात्र निषेधार्ह असून पेडण्यात खडकाळ व शेतीसाठी निरुपयोगी अशी कित्येक ठिकाणी जागा आहे, त्याचा वापर ते का करीत नाहीत,असा सवाल श्रीपाद परब यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूल
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची मागच्या आठवड्यात शेतकरी व विकास मंचाच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली होती. यावेळी संभावित शेतजमीन व बागायतीवर क्रीडानगरीमुळे नांगर फिरणार आहे त्याची माहिती त्यांना देण्यात आली. मुख्यमंत्री कामत यांनी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांच्याकडून क्रीडानगरीतून ही शेतजमीन व बागायती वगळल्याचे आपल्याला सांगितल्याचे यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. मुळात क्रीडामंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची याप्रकरणी दिशाभूल केल्याचा आरोप श्री.वायंगणकर यांनी केला.
क्रीडामंत्र्यांचा निषेध
नियोजित क्रीडानगरीच्या लढ्यात येथील स्थानिक पत्रकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे असल्याने मागच्या महिन्यात या पत्रकारांना वगळून राजधानीतील पत्रकारांना आमंत्रित करून क्रीडानगरीला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्याची वेळ बाबू आजगांवकर यांच्यावर आली. यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांवर आरोप करून त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यही केले होते त्याचा निषेध यावेळी करण्यात आला. स्थानिक पत्रकार केवळ त्यांना निवडणुकीपुरतेच हवेत असा टोलाही लावण्यात आला.
राजकारण नको केवळ पेडण्याचे हित जपा
पेडणे तालुका विकास मंच हा कोणत्याही राजकीय प्रेरणेतून निर्माण झालेला मंच नसून पेडणे तालुक्याचे हित जपणे व येथील जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात उभे राहणे हे या मंचाचे कर्तव्य आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली. क्रीडा खात्याच्या संचालिका डॉ.सुझान डिसोझा यांनी शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल नागरिक कृती समितीचे अध्यक्ष निलेश पटेकर यांनी मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती दिली. धारगळच्या माजी तलाठ्याने शेतीबाबतचा चुकीचा अहवाल सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.क्रीडानगरीच्या नावाने पंचतारांकित हॉटेल,इमारती,मॉल बांधून क्रॉकीटचे जंगल उभे करण्याचे सोडून येथील युवा पिढीला भविष्यात उपयुक्त ठरणार अशी क्रीडामैदाने उभारा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.याठिकाणी गोल्फ कोर्स उभारण्याचाही डाव असून एकार्थाने क्रीडानगरीच्या माध्यमाने "सेझ' उभारण्याचाच हा डाव असल्याचा आरोप यावेळी श्री.वायंगणकर यांनी केला.

हा अधिकारी कोण ?
दरम्यान,आपल्या जमिनीच्या संरक्षणार्थ कोणत्याही प्रकारचा लढा उभारण्यास सज्ज झालेल्या शेतकऱ्यांनी आता या नियोजित प्रकल्पामागच्या भानगडी उघड करण्यास सुरुवात केली आहे. धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीसाठी संपादीत जमिनीत क्रीडा खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे हित जपल्याचा गौप्यस्फोट या शेतकऱ्यांनी केला आहे.क्रीडा खात्याशी संबंधित या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयाची सुमारे साडेतीन लाख चौरसमीटर जागा इथे आहे. ही संपूर्ण जागा कुळांच्या नावाने असल्याने ती कुळांना देऊ केल्यास त्याचे फक्त ४० रुपये प्रतिचौरसमीटर असा दर मिळणार. सरकारने या जमिनीसाठी २५० रुपये प्रतीचौरसमीटर जागेचे दर नि श्चित केले आहेत, त्यामुळे ही जमीन सरकारने संपादन केल्यास या जमीन मालकाला कोट्यवधी रुपयांचा लाभ होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, सदर अधिकारीच या क्रीडानगरीसाठी आग्रही असून क्रीडामंत्री बाबु आजगांवकर यांच्याकडून या जमिनीसाठी हट्ट करण्याचे हे मुख्य कारण असल्याची माहितीही यावेळी शेतकऱ्यांनी दिली. मुळात राष्ट्रीय खेळांसाठी राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या क्रीडा सुविधांचा विकास करून त्यांचा वापर करण्याचा सुरुवातीस सरकारचा विचार होता परंतु या अधिकाऱ्याने क्रीडानगरीचा हा प्रस्ताव सादर करून त्यातून आपले उखळ पांढरे करण्याचा डाव मांडला आहे,अशी टीकाही यावेळी करण्यात आली.

"" हे देवा बांदेश्वरा ऽ ऽ ऽ...

"" हे देवा तूं विर्नोड्याचे सातेरी,रवळनाथ,पेडण्याचो मुळवीर,भगवती आणी रवळनाथ,धारगळचो धारेश्वर, माऊली आणी रवळनाथ,दाडाचेवाडचो तू दाडदेव आणी तूमी सगळ्यांचो सीमधडो बानावयलो देव.
तर देवा या विर्नोडकरांची आनी धारगळकरांची जी कुमारखंड, लाडाचो व्हाळ, सुक्या कुळण, जामळभोम, ताकाचो सर्वो आणी म्हसकोण ही जी शेताची आणी बायागतीची जमीन आसा ती देवा "स्पोट्र्ससिटी' कामाखातीर ह्यांच्या हातीतल्यान काडून घेतली जाताहा, देवा या जमिनीत ह्यांच्या जाणट्यांनी, या सगळ्यांनी, आणी ह्यांच्या भूरग्यांनी आपलो घाम गाळून आणी जीवाचां पाणी करून ही सगळी बागायत उभी केल्ली आसा, आणी ही शेतां राखली आसत, तर देवा या सगळ्या जमिनीचो तू मालक आसय आणी आमी भोगी आसूं आणी आता देवा कोणीतरी येवन बळजबरेन ही जमीन आमच्या पोटार पाय दवरून आमच्या कडल्यान काडून व्हरांक सोदतत. हे जे कोण जमिन आमच्या कडल्यान बळकांवक सोदतत त्यांका आमी खूप समजावपाचो प्रयत्न केल्लो आसा, पूण ते मदांध जाल्ले आसत आणी त्यांच्या मदांधपणापुढे आमीय आता थकत इलूं. तर देवा तू तुझां या भूमिचो मालक म्हणान जां काय सत्व आसा ता सत्व जाग्यां कर, आणी जे जे कोणी ही आमची भूमि आमच्या कडल्यान बळकावक सोदतत आणी त्यांच्या कामांत जे जे कोण त्यांका मदत करतत त्यांका तू तुझां पाणी दाखय, आणी तुझ्या या भूमितच त्यांची माती करून दाखय रे देवा. या कामाखातीर देवा ह्या भर मध्यानदिसा तुका हो बोकडो सोडलेलो आसा. ज्या दिसा तू आमका दाखोवन दितलय की तुज्या छातीयेचेर मदांधपणान पाय दवरलेल्या मनशाची तू राख केलय त्यादिसा देवाचो कौल घेवन या बोकड्याचां काय करूंचा ता विचारतलूं आणी त्याप्रमाणे पुढला कार्य करतलूं. तोपर्यंत या तुझ्या भूमित हो बोकडो तुझा नाव घेवन संचार करतलो, असो हो दाणेकार, तुका उलो मारता रे देवा''

पर्यटकांसाठी पेडणे ते दुधसागर रेलगाडी हवी

श्रीपाद नाईक यांची लोकसभेत मागणी

पणजी, दि. ८ - गोवा राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्यापैकी दुधसागर धबधबा हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे असंख्य देशीविदेशी पर्यटक जात असतात. त्यांच्यासाठी पेडणे ते दुधसागर अशी खास रेलगाडी सुरू करावी, अशी जोरदार मागणी उत्तर गोव्याचे भाजप खासदार श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत रेल्वे अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग घेताना केली.
यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी अनेक आश्वासने दिली होती, त्यापैकी मोजकीच पूर्ण झाली. खरे तर महत्वाची कामे प्राधान्यक्रमाने घ्यायला हवीत. विद्यमान रेल्वेमंत्र्यांनी ५० ठिकाणी जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देण्याची घोषणा केली आहे, त्यात गोव्याचाही समावेश करावा अशी मागणी नाईक यांनी केली.
साऊथ वेस्टर्न रेल्वेतर्फे यापूर्वी गोव्यात हरिप्रिया एक्सप्रेस वास्को ते तिरुपती सुरू होती, वास्को मिरज ही रेलगाडीही चालू होती. हा मार्ग मीटर गेजचा ब्रॉडगेज झाल्यावर आता यापैकी एकही गाडी सुरू नसल्याचे श्रीपाद नाईक यांनी निदर्शनास आणून दिले. गोवा हे छोटे राज्य असले तरी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे, यासाठी रेल्वेने अधिक गाड्या गोव्यापर्यंत सुरू कराव्यात, असेही नाईक म्हणाले. शिर्डी हे अनेकांचे श्रद्धास्थान असल्याने तेथे रेल्वेस्टेशन असायला हवे, असे सांगून गोव्यातून हजारो भाविक तेथे जात असतात, असे ते म्हणाले. मडगाव ते शिर्डी अशी रेलसेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. मडगाव ते मुंबई, मडगाव ते बंगळूर, मडगाव ते तिरुपती, मडगाव ते जयपूर, मडगाव ते चेन्नई, विलकीणी ते कन्याकुमारी अशा येजा करणाऱ्या रेलगाड्यांची आवश्यकता गोव्याला असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रेल्वेने मार्ग करावा, अशीही मागणी नाईक यांनी केली. गेल्या महिन्याभरात घडलेल्या लुटमारीच्या घटनांकडे लक्ष वेधून श्रीपाद नाईक यांनी अधिक सुरक्षा पुरविण्याची मागणी आपल्या भाषणात केली.

अत्याधुनिक दंतचिकित्सालय खाक

मडगावातील घटनाः ८० लाखांची हानी
मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी) - येथील पाजीफोंड भागातील डॉ. ह्यूबर्ट गोम्स यांच्या अत्याधुनिक अशा दंतचिकित्सालयाला आज पहाटे आग लागून ते संपूर्ण खाक झाले व त्यामुळे साधारण ७० ते ८० लाखांचे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. आगीचे निश्चित कारण जरी उघड झालेले नसले तरी शॉटसर्किटमुळेच ती लागली असावी, असा अंदाज आहे.
सदर दवाखाना पाजीफोंड येथील ज्योती प्लाझा समोरील रिलायन्स इमारतीच्या तळमजल्यावर आहे. तेथून धूर बाहेर येत असल्याचे पहाटे ४-३० वाजता कोणी तरी पाहिले व अग्निशामक दलाला खबर दिली. त्यांनी लगेच दाखल होऊन ती विझविण्याचे काम सुरू केले, ते तब्बल आठ वाजेपर्यंत चालले. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एकूण चार बंब ही आग विझविण्यासाठी लागले. त्यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागल्याचा संशय व्यक्त करताना तेथील ए. सी. संपूर्णतः जळाल्याचे सांगितले.
या आगीत दवाखान्यातील सर्व अत्याधुनिक उपकरणे, खुर्च्या , इतर फर्निचर खाक झाले. डॉ.ह्युबर्ट गोम्स हे नामवंत दंतचिकित्सक आहेत व त्यांच्याकडे देशविदेशांतून रुग्ण येत असत व त्यामुळे त्यांनी आपला दवाखानाही त्याच तोडीचा बनविला होता. दांतांची चिकित्सा करताना हवे तशा आकाराचे व नमुन्याचे दांत तयार करून ते बसविण्यात त्यांचा हातखंडा होता.
या आगीत त्यांचा दवाखाना व तयार करून ठेवलेले दांतांच्या कवळ्या भक्ष्यस्थानी पडल्या. या दवाखान्याखेरीज तळमजल्यावर आणखी अनेक दुकाने होती ती आगीपासून वाचविण्याचे काम अग्निशामक दलाने केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

गिर्दोळी येथे श्रीमहालक्ष्मीच्या मूर्तीचा अज्ञातांकडून विध्वंस

मडगाव,दि.८(प्रतिनिधी)- येथून दहा किलोमीटर अंतरावरील गिर्दोळी येथील रस्त्यालगत असलेल्या श्रीमहालक्ष्मी मंदिरांतील दोन फूट उंचीच्या मूर्तीचा कोणा अज्ञाताने विध्वंस करण्याचा संतापजनक प्रकार आज आढळून आला व त्यामुळे संपूर्ण सासष्टी भागात संतापाची लाट उसळली आहे. कुंकळी-वेरोडा येथील रामनाथ मंदिरांतील मूर्ती व लिंगांच्या विध्वंसानंतर बरोबर अडीच महिन्यांनी आजचा हा प्रकार घडला आहे.
मडगावहून मुगाळी, रायचे तळे च्या मार्गाने जाणाऱ्या व मार्मागेावा स्टील प्लांटपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर मडगाव-चांदर रस्त्यालगत साधारण ५० मीटर अंतरावर हे महालक्ष्मीचे प्राचीन मंदिर आहे. तेथील दोन फूट ऊंच अशी मातीची मूर्ती लांब काठीने भोसकून फोडली व तिचे तुकडे केले गेल्याचे आज सकाळी दिसून आले.
वेरेकर कुटुंबीयांनी साधारण ४० वर्षांपूर्वी इतर गावकऱ्यांच्या सहकार्याने हे मंदिर बांधले होते असे देवालयाचे अध्यक्ष सुदिन वेरेकर यांनी सांगितले. मंदिराला जाळीचा मुख्य दरवाजा आहे व तो बंद केला गेला होता पण त्याला कुलूप लावले नव्हते. या मंदिरालगतच नवे भव्य मंदिर बांधले जात असून ते काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
गुन्हेगारांनी या नव्या बांधकाम चालू असलेल्या मंदिराजवळील फटीतून मागील बाजूने जुन्या मंदिरात प्रवेश केला असावा. त्यांनी मंदिरावर ध्वज लावलेली उंच काठी जी मागच्या बाजूने होती,ती घेऊन ते गर्भागाराबाहेर आले व गर्भागाराच्या जाळीचा दरवाजा न उघडता वा त्याला हातही न लावता एक मीटर उंचीच्या चौथऱ्यावर असलेली मूर्ती त्यांनी बाहेरून काठीने ढोसून भग्न केली असावी, असा कयास केला जात आहे. नंतर त्यांनी काठी तेथेच टाकली व ते मागच्या बाजूनेच पळाले असावेत, असे मानले जाते.
सदर मूर्ती दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तयार करून पुजली जाते व जुनी मूर्ती विसर्जित केली जाते, गेली ४० वर्षे हा प्रघात चालू आहे. दररोज मूर्तीला गंधफूल वाहिले जाते. आजही त्या नित्यपूजेसाठी एक महाजन अरविंद भिसे आले असता त्यांना मूर्ती विध्वंसाचा प्रकार लक्षात आला व लगेच त्यांनी इतरांना कळविले. मायणा कुडतरी पोलिसांना कळविताच निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क, उपनिरीक्षक नवलेश देसाई फौजफाट्यासह तेथे धावून गेले व त्यांनी पंचनामा केला. दुपारी १२ वाजता पणजीहून श्र्वानपथक आणून शोध घेण्यात आला पण ते जुन्या देवळांतून नव्या देवळापर्यंत गेले व परत फिरले. दक्षिण गोव्यातील मूर्तिभंजनाची ही २९ वी घटना आहे व अजूनपर्यंत एकाही प्रकरणाचा तपास लागलेला नाही,
मूर्ती विध्वंसाच्या या प्रकारांचा एक योगायोग म्हणजे नगरविकास मंत्री जोकीम आलेमांव यांचा मतदारसंघातील गेल्या वर्षभरातील हा चौथा प्रकार आहे. पहिला प्रकार वर्षभरामागे पारोडा येथे दुसरा, देव आजोबा कुंकळ्ळी त्यानंतर अडीच महिन्यामागे वेरोडा येथील वेताळ मूर्ती व अन्य लिंगांचा नासधूस व आता हे महालक्ष्मी मूर्ती नासधूस आहे. सायंकाळपर्यंत या प्रकरणी तपासकामाला विशिष्ट अशी दिशा मिळू शकली नव्हती.

"ती' जमीन आम्हाला परत द्या

देसाई कुटुंबीयांची खाण कंपनीकडे मागणी

लीज करार संपुष्टात येऊन साडेचार वर्षे उलटली
जमीन परत करण्यास "सेझा गोवा'ची टाळाटाळ
आंदोलन छेडण्याचा देसाई कुटुंबीयांचा निर्धार

डिचोली, दि. ८ (प्रतिनिधी) - डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे, साखळी येथील देसाई कुटुंबीयांच्या सुमारे २ लाख १६ हजार चौरस मीटर जमिनीतील उत्खननाबाबतचा करार संपुष्टात येऊनही तेथे बेकायदा खनिज उद्योग जोमाने सुरू आहे. विविध खात्यांत याविषयी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने सरकारवर जोरदार टीका करीत आंदोलन छेडण्याचा इशारा देसाई कुटुंबीयांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
"सातीनेचे मळ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जमिनीवर देसाई कुटुंबीय व सेझा गोवा कंपनी यांच्या दरम्यान खनिज उद्योगासाठी "लीज' करार झाला होता. सदर कराराची मुदत साडेचार वर्षांपूर्वीच संपली असून देसाई कुटुंबीयांना सदर जमीन पुन्हा आपल्या ताब्यात हवी आहे. खनिज उत्खनन करणारी कंपनी कराराचे नूतनीकरण न करता बेकायदा उद्योग विस्तार करत आहे. यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका उत्पन्न झाला आहे, असे देसाईंनी सांगितले. या खनिज उद्योगाचा विस्तार आता थेट नागरी वस्तीपर्यंत येऊन पोहोचल्याने इथल्या पारंपरिक विहिरींचे जलस्रोत आटू लागले आहेत. पावसाच्या प्रारंभीच खनिजमिश्रित पाण्याने विहिरी भरल्या आहेत. या दूषित पाण्यामुळे या भागातील रहिवाशांना भर पावसात पिण्यायोग्य पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत खनिजमिश्रित गाळ पोचला आहे. याविषयी डिचोली उपजिल्हाधिकारी, खनिज उद्योग खाते, वनखाते आदींकडे तक्रारी नोंद करूनही या सर्वांनी या सर्व प्रकाराकडे डोळेझाक केली आहे, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. खनिज कंपनीने तेथील नगरसेवकांना हाताशी धरल्याने तेही गप्प आहेत असा आरोप देसाई कुटुंबीयांनी केला. सदर खनिज कंपनीतर्फे बेकायदा वृक्षतोडीचे प्रकार सुरू असून या कृत्यांना विरोध केल्यानेच आमच्यावर खोटे खटले गुदरण्यात आल्याचेही देसाई कुटुंबीयांनी पुढे सांगितले. कंपनीने आमच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कराराप्रमाणे सदर जमीन आमच्या ताब्यात द्यावी, अन्यथा आमच्या हक्कासाठी आम्हाला आक्रमक भूमिका घेणे भाग पडेल असे देसाई कुटुंबीयांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला विनायक गणपतराव देसाई, चंद्रकांत जयवंतराव देसाई, विक्रांत भालचंद्र देसाई, चंद्रजित जयवंतराव देसाई, रामचंद्र जयवंतराव देसाई, आनंदराव व्यंकटराव देसाई आदी उपस्थित होते.

कळण्याला हात लावाल तर याद राखा

आर. आर. पाटील यांचा सज्जड इशारा
सावंतवाडी, दि. ८ (प्रतिनिधी) - येथील लाल मातीला हात लावाल तर याद राखा, धुळ्याच्या कोणा पाटलांनी येथे येऊन जमीन उसकवू नये, जे काय करायचे असेल ते आपल्या काळ्या मातीत करावे, असा सज्जड इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज कुडाळ येथे दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनिंग व औष्णिक प्रकल्पांबाबत बोलताना आर. आर. पाटील यांनी खाण समर्थकांना चांगलेच फैलावर घेतले. सिंधुदुर्गातील लाल मातीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खाणी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी धुळ्याचे विनय पाटील या कळणे येथील मे. मिनरल अँड मेटल कंपनीला नाव घेऊन दिला. या उन्मत्त पैसेवाल्यांशी लढायला मी स्वतः तयार आहे. काहीही झाले तरी आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही, असे त्यांनी सुनावले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था कोल्हापुराच्या रंकाळ्यातील नंदीसारखी होत चालली आहे. म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरोगामी विचार घेऊन पुढे जाईल, असे त्यांनी ठासून सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार गुरुनाथ कुलकर्णी, पक्ष निरीक्षक भास्कर जाधव, मत्स्योद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष कुलदीप पेडणेकर, संदेश पारकर, माजी नगराध्यक्ष दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सुभाष मयेकर, प्रज्ञा परब, नगराध्यक्ष सौ. पल्लवी केसरकर, अमित सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कुडाळ ओंकार डिलक्स सभागृहात आज राष्ट्रवादीच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ आर. आर. पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. त्यानंतर हा मेळावा पार पडला. त्यात सिंधुदुर्गातील खाण व औष्णिक प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधात पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. राष्ट्रीय कॉंग्रेसबरोबर असलेल्या आघाडीबाबत या मेळाव्यात नाराजीचा सूर व्यक्त झाला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने कॉंग्रेसला मदत केली. आता जिल्ह्यातील तिन्ही जागा आम्हाला देऊन कॉंग्रेसने सहकार्याचा हात पुढे करावा, असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी सांगितले. महिलांना विधानसभेत पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे, अशी मागणी सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पल्लवी केसरकर यांनी केली. कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेतही ५० टक्के वाटा द्यावा, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
खाणप्रश्नी समिती नेमा
खाणप्रश्नी जारी झालेल्या अधिसूचनेबाबत एका अभ्यास समितीची स्थापना करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना करणार असल्याचे आर. आर. पाटील यांनी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला जर आमच्याबरोबर यायचे नसेल तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, असा इशाराही त्यांनी जाता जाता दिला.

Wednesday 8 July, 2009

'बांदेश्वरा, आता तूच ह्यांका बघून घे'

शेतकऱ्यांकडून देवाला बकरा अर्पण
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): 'देवा श्री बांदेश्वरा, आता तूच ह्यांका बघून घे रे बाबा' क्रीडानगरी प्रकल्पातून आपली जमीन वगळावी यासाठी धडपडणाऱ्या विर्नोडा व धारगळ गावातील शेतकऱ्यांनी आता या क्षेत्राचे राखणदार श्री बांदेश्वर देवालाच परवा सामूहिक साकडे घातले आहे. देवाच्या नावाने त्यांनी एक बकराही अर्पण करून या लढ्यात मदतीसाठी चक्क देवालाच आवाहन केले आहे. क्रीडानगरी प्रकल्पाला कुणाचाही विरोध नाही परंतु त्यासाठी रक्ताचे पाणी करून पीक घेतलेल्या जमिनीवर बुलडोझर फिरवण्यासाठी क्रीडामंत्री बाबू आजगांवकर एवढे उतावीळ का झाले आहेत, असा सवालच या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
क्रीडानगरीवरून सध्या संपूर्ण पेडणे तालुकाच ढवळून निघाला आहे. एकीकडे आपल्या भावीपिढीसाठी जपून ठेवलेली व घाम गाळून उत्पन्नाचे साधन निर्माण केलेली शेतजमीन वाचवण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी जिवाची बाजी लावली आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष करून सरकारने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवणारी सभा झाल्यानंतर लगेच तालुक्यातील काही पंचायती व जिल्हा पंचायत सदस्यांना एकत्र करून या क्रीडानगरीला पाठिंबा दर्शवण्यासाठीची बैठक घेण्यात आली आहे. क्रीडानगरीच्या या लढ्याला काही लोक राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न करीत असल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे स्वरक्षणार्थ उभे ठाकलेल्या शेतकऱ्यांनी सरकारऐवजी आता चक्क देवावर भरोसा ठेवून आपला लढा आता तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
क्रीडानगरीमुळे शेती, भाती आणि निसर्गाची होणारी हानी, आटणाऱ्या विहीरी आणि झरे, नष्ठ होणारी शेती असे अनेक प्रश्न असताना त्याकडे बेदरकारपणे दुर्लक्ष करण्याचे धोरण राजकर्त्यांनी चालू ठेवल्याने यापुढे पेडण्याच्या गावागावात सभा घेऊन जनजागृती आणि विरोध तयार करण्याचे काम इथल्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. मुळात शेतकऱ्यांचा क्रीडानगरीला विरोध नाही. विरोध आहे तो सुपीक जागेत क्रीडा नगरी येण्याला, असे स्पष्टीकरण विर्नोडा गावचे प्रतिष्ठित नागरिक श्रीपाद परब यांनी केले आहे. पेडणे तालुक्यात इतरत्र अनेक ठिकाणी नापीक आणि खडकाळ जमीन आहे. तिथे पीक घेणे किंवा शेती करणे शक्य नाही, अशा जमिनीचा वापर या प्रकल्पासाठी केल्यास त्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही. धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीसाठी सरकारकडून बळजबरीने संपादन करण्यात येणारी जमीन ही शेतीप्रधान आहेच परंतु त्याही पलीकडे या जमिनीचे अनेक कारणांसाठी महत्त्व आहे. ही जमीन येथील शेतकरी कुटुंबीयांच्या भावी पिढीचा आधारस्तंभ आहे तशीच ती संपूर्ण विर्नोडा गावच्या रचनेचा मुख्य भाग आहे. पेडणे तालुक्यातील सर्वांत मोठी वायंगण शेती ही विर्नोडा गावात आहे. धारगळ येथील या जमिनीत या शेतीला पूरक ठरणाऱ्या पाण्याचे स्त्रोत्र असून या जमिनीवर बुलडोझर फिरले तर हे स्त्रोत्र पूर्णपणे नष्ट होईल व त्याचा फटका संपूर्ण विर्नोडा गावाला बसेल असेही श्री. परब यांनी नमूद केले. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, विर्नोडा गावात एक छोटी नदी वाहते व या नदीचे मूळ हे धारगळ येथील नियोजित जागेत आहे. या नदीमुळेच येथील वायंगण शेतीला पाणीपुरवठा होतो व या शेतीवर या गावातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. सरकारने या गोष्टीचा तज्ज्ञांच्या साहाय्याने अभ्यास करण्यास हरकत नाही. मुळात याठिकाणीही खाऱ्या पाण्याची नदी आहे, पण या नदीतून वाहणाऱ्या गोड्या पाण्यामुळे ही शेती टिकून आहे. या नदीचा स्त्रोत्र बंद झाल्यास शेतीत खारे पाणी शिरण्याचा धोका असून त्यामुळे या गावची संपूर्ण जनजीवनच विस्कळीत होऊन लोकांना जगणेच कठीण होणार असल्याचे श्री. परब म्हणाले.
ज्ञातीबांधवांचा पाठिंबा
क्रीडानगरीच्या नियोजित जागेमुळे प्रभावित होणारे विर्नोड्यातील बहुतेक शेतकरी हे अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे बांधव आहेत. गेल्याच आठवड्यात या समाजबांधवांची बैठक पेडण्याचे अध्यक्ष संतोष मळीक यांच्या अध्यक्षतेखाली वारखंड येथे झाली. या बैठकीला समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई प्रमुख पाहुणे होते. या बैठकीत विर्नोड्यातील या समाजबांधव शेतकऱ्यांचा विषय उपस्थित करण्यात आला. धारगळ येथील क्रीडानगरीचा विषय हा विर्नोड्यातील समाजबांधवांचा जिव्हाळाचा विषय बनला आहे, त्यामुळे या लढ्याला पाठिंबा देऊन समाजबांधवांचे हित जपणे हे संघटनेचे कर्तव्य आहे, असे मत संतोबा देसाई यांनी व्यक्त केले. विर्नोड्यातील शेतकऱ्यांचा विषय अभ्यासला जाणार व या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे जाणवल्यास संघटनेची संपूर्ण शक्ती या शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभी करू,अशी ग्वाही यावेळी श्री.देसाई यांनी दिली आहे.

फोंड्याच्या नगराध्यक्षपदी शैलेश शिंक्रे यांची निवड

फोंडा, दि.७ (प्रतिनिधी) : येथील फोंड्याच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेनुसार गृहमंत्री रवी नाईक यांचे समर्थक असलेले शैलेंद्र जनार्दन शिंक्रे यांची आज (दि.७) सकाळी निवड करण्यात आली.
व्यंकटेश नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. येथील नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका मंडळाची मंगळवार ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात खास बैठक घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शैलेंद्र शिंक्रे आणि शिवानंद सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शैलेंद्र शिंक्रे यांना आठ तर शिवानंद सावंत यांना चार मते मिळाली. यावेळी नगरसेविका सौ. राधिका नाईक अनुपस्थित होत्या.
शैलेंद्र शिंक्रे यांच्याबाजूने सौ.दीक्षा नाईक, प्रदीप नाईक, सुभाष मुंडये, व्हिसेन्ट पॉल फर्नांडिस, दामोदर नाईक, संजय नाईक, किशोर नाईक यांनी मतदान केले. तर शिवानंद सावंत यांच्या बाजूने सौ. रूक्मी डांगी, ऍड. वंदना जोग, व्यंकटेश नाईक यांनी मतदान केले. सध्या सत्ताधारी गटातील नगरसेवकांची संख्या आठ झाली आहे. सुभाष मुंडये आणि व्हिसेन्ट फर्नांडिस यांनी शैलेंद्र शिंक्रे यांच्या बाजूने मतदान करून सत्ताधारी गटात प्रवेश केला आहे. पूर्वी हे दोघेही व्यंकटेश नाईक यांच्या बाजूने होते. निर्वाचन अधिकारी म्हणून म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी श्री. खोजुर्वेकर यांनी काम पाहिले. यावेळी फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जयंत तारी उपस्थित होते.
गृहमंत्री रवी नाईक यांच्या सहकार्याने पालिका क्षेत्रात विकास कामे राबवून पालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे नूतन नगराध्यक्ष शिंक्रे यांनी सांगितले. कचरा, मार्केट प्रकल्प यांना प्राधान्य दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिंक्रे यांनी नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजीव गांधी कला मंदिरात गृहमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली. यावेळी मंत्री श्री. नाईक यांनी श्री. शिंक्रे यांचे अभिनंदन केले.

उपनगराध्यक्षांचा राजीनामा
येथील पालिकेच्या उपनगराध्यक्ष ऍड. वंदना जोग यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा आज दुपारी दिला. फोंडा पालिकेत भाजप समर्थक नगरसेवकांचा गट सत्तेवर आल्यानंतर गेल्या १६ एप्रिल ०९ रोजी ऍड. वंदना नारायण जोग यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. ह्या गटात गेल्या जून महिन्यात मतभेद झाल्याने व्यंकटेश नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पालिकेची सत्ता पुन्हा कॉंग्रेस समर्थकांच्या हातात आल्याने तसेच नवीन नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष ऍड. जोग यांनी सन्मानपूर्वक आपल्या पदाचा राजीनामा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

शिवसेनाप्रमुखांवर एंजिओप्लॅस्टी

मुंबई, दि. ७ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आज येथील लीलावती रूग्णालयात पाच डॉक्टरांच्या चमूने यशस्वी शस्त्रक्रिया केली. प्रकृतीतील सुधारणा पाहून येत्या तीन ते चार दिवसांत श्री. ठाकरे "मातोश्री'वर परतू शकतील, असा विश्वास डॉ. सॅम्युअल मॅथ्यू (लंडन) यांनी व्यक्त केला आहे.
श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर काल सकाळी शिवसेनाप्रमुखांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर एंजिओप्लॅस्टी करण्याचे निश्चित केले होते. तथापि, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे अमेरिकेत असल्याने ते आल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार उद्धव काल रात्री परतल्यानंतर आज सकाळीच एंजिओप्लॅस्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी खास लंडनहून आलेले डॉ. सॅम्युअल मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ८३ वर्षीय बाळासाहेबांवर यापूर्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती. मात्र सर्जरी झालेल्या ठीकाणी रक्तनलिकेत पुन्हा "ब्लॉक' तयार झाल्याने त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. आज त्यांच्यावर एंजिओप्लॅस्टी करून रक्तनलिकेतील हे ब्लॉक काढून टाकण्यात आले.
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि लीलावती रूग्णालयाचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. सॅम्युअल मॅथ्यू यांनीदेखील एंजिओप्लॅस्टी यशस्वी झाल्याचे सांगून शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीतील सुधारणा लक्षात घेऊन त्यांना पुढील तीन चार दिवसात घरी पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
या शस्त्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार मनोहर जोशी यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. यावेळी रूग्णालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली होती.
दरम्यान गुरूपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी "मातोश्री'वर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी उसळत असते. प्रत्येक शिवसैनिकांना भेटने शक्य नसले तरी शिवसेनाप्रमुखांचे नुसते दर्शनदेखील शिवसैनिकांना प्रेरणादायी असते. गुरूपौर्णिमेदिवशीच शिवसेनाप्रमुखांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने शिवसैनिकांनी "मातोश्री'वर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे शिवसैनिकांत थोडे निराशेचे वातावरण होते. मात्र, आज गुरूपौर्णिमेदिवशीच त्यांच्यावर एंजिओप्लॅस्टी असल्याने शिवसैनिकांनी गुरूवर्य शिवसेनाप्रमुखांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.

दोन खात्यांच्या वादात पर्वरीत पाणीटंचाई भर पावसात नळ कोरडे

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): राज्यात सर्वत्र धोधो पाऊस पडत असताना पर्वरीवासियांच्या घरातील नळ मात्र साफ कोरडे पडले आहेत. पर्वरी येथील बहुतेक भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे पाणी विभाग व वीज खाते यांच्यात याप्रकरणावरून सध्या बराच वाद सुरू आहे. दोन्ही खात्यांकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत असल्याने पर्वरीवासीय मात्र पावसात पाण्यासाठी वणवण भटकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार पर्वरी व बार्देश तालुक्यातील इतर काही भागांत मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मुख्य पाण्याची टाकी असलेल्या पर्वरी भागांत वारंवार वीज खंडीत होण्याचा प्रकार होत असल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याची भूमिका सा.बां.खात्याच्या पाणी विभागाने घेतली आहे. पावसामुळे विजेची ही अशी परिस्थिती निर्माण होणारच,असे सांगून वीज खातेही आपली जबाबदारी झटकत असल्याने त्यात सामान्य नागरिक मात्र भरडले जात आहेत. गेले तीन दिवस येथील नागरिकांनी सा.बां.खात्याच्या पाणी विभागाला तक्रारी व फोन करून सतावल्याने त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी जाहिरातच प्रसिद्ध केल्याचीही खबर आहे. वीज खंडीत होत असल्यामुळेच बार्देश तालुक्यातील अनेक भागांत मर्यादित पाणी पुरवठा होईल,असे सांगून जोपर्यंत वीज खाते यावर तोडगा काढणार नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील,असेही या जाहिरातीत प्रसिद्ध केले आहे. मुळात याबाबत दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्याने तोडगा काढून हा विषय निकालात काढण्याची गरज होती परंतु तसे न करता या दोन्ही खात्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने त्याचे परिणाम मात्र नागरिकांना भोगावे लागत असल्याची तक्रार आहे.

बनावट चकमकप्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा उत्तराखंड सरकारची कारवाई

डेहराडून, दि. ७ : 'एमबीए'ची पदवी घेतलेल्या एका सुशिक्षित तरुणाला बनावट चकमकीत ठार मारणाऱ्या पोलिसांविरुद्ध कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रणबीर सिंग या तरुणाबाबत ही दुर्दैवी घटना घडली. या बनावट चकमकीशी संबंधित सर्व पोलिसांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक अजय कुमार आणि जी. सी. तमटा यांचाही समावेश आहे. मृत तरुणाचे वडील रवींद्र पाल सिंग यांच्या तक्रारीनंतर कथित दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात आली.
गेल्या शुक्रवारी या २२ वर्षीय तरुणाला चकमकीत ठार करण्यात आले होते. या प्रकरणानंतर राज्यात पोलिसांविरुद्ध प्रचंड असंतोष उफाळला आहे. दोषींविरुद्ध कारवाई व्हावी, या मागणीसाठी लोकांनी आंदोलनही केले. अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एवढेच नव्हे, तर त्यापूर्वी त्याला बेदम मारहाणही करण्यात आली होती, अशी माहिती शवविच्छेदन अहवालात पुढे आली. या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची सरकारची तयारी आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारतर्फे तशी शिफारस केंद्र सरकारकडे केली जाणार असल्याचेही पोखरीयाल यांनी सांगितले.

लोहरसाशी पाण्याचा संपर्क आल्यानेच स्फोट?

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): गेल्या शनिवारी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील ग्लोबल इस्पात या लोहप्रकल्पातील भट्टीत झालेला स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याच्या नेमक्या निष्कर्षाप्रत एकही सरकारी यंत्रणा आलेली नसली तरी भट्टीतील वितळलेल्या धातूशी पाण्याचा संपर्क आल्यानेच हा महाभयानक स्फोट झाला याच तर्काला बळकटी मिळत आहे.
कंपनी व्यवस्थापनानेही असाच संशय व्क्त केलेला असला तरी आपल्या तर्काच्या पुष्ट्यर्थ कोणतेच पुरावे अद्याप कारखाने व बाष्पक निरीक्षणालयाला सादर केलेले नाहीत. पण वितळला जाणाऱ्या धातूमुळे निर्माण होणारा हैड्रोजनाचा पाण्यामुळे प्राणवायुशी संपर्क आला तर असा अनर्थ उदभवू शकतो असा जाणकारांचा कयास आहे. मात्र तेथे पाणी कसे आले याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पाण्याबाबतचा धोका संबंधित स्वयंचलित यंत्रणे वरून मिळून भट्टी बंद करीपर्यंत विलंब झाला अन त्याची परिणती स्फोटंात झाली असे सांगण्यात येते.आता अग्निशामक दल, पोलिस व कारखाना व बाष्पक निरीक्षक अशा तीन यंत्रणा या स्फोटाची चौकशी करीत आहेत. सुरवातीला तेथील भंगारात असलेले रिकामे गॅस सिलिंडर पाहून त्यामुळे स्फोट झाला असा तर्क काहींनी लढविला होता, पण अशा प्रकल्पात भंगारातील असे सिलिंडर सर्रास वापरतात असे सांगण्यात आले व त्यामुळे ती शक्यता दुरावली.
पोलिस आता अग्निशामक दलाच्या अहवालाची तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निष्कर्षाची प्रतीक्षा करीत आहेत. तर अग्निशामक दल कंपनी व्यवस्थापनाकडून तसेच कारखाना व बाष्पक निरीक्षणालय ठाम निष्कर्ष काढू शकेल या मताचे आहेत. व्यवस्थापनाने अजूनही समाधानकारक खुलासा केलेला नाही असे दलातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, या कारखान्यातील व्यवहार क ाल कुंकळ्ळी पोलिसांनी त्याच्या मुख्य फाटकाला टाळे ठोकून तो सील केल्यामुळे पूर्णतः थंडावले आहेत. तपासकामासाठी एक लहान गेट ठेवलेली असून तेथे सुरक्षा ठेवलेली आहे. सील करण्यापूर्वी पोलिसांनी स्फोट जागेचा तसेच तेथील ढिगाऱ्याचा पंचनामा केला गेला. नंतर तेथील वीज जोडणीही तोडण्यात आली. व्यवस्थापनाला आतील यंत्रसामुग्री व अन्य माल हलविता येऊ नये म्हणून हे सील ठोकण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Tuesday 7 July, 2009

अर्थसंकल्पात"आम आदमी'ची निराशा

आयकर मर्यादेत १० ते १५ हजारांनी वाढ
नवी दिल्ली, दि. ६ - सर्वसामान्य आयकरदाते आणि महिलांच्या आयकरमुक्त उत्पन्न मर्यादेत १० हजार रुपये, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या आयकर मर्यादेत १५ हजार रुपयांच्या वाढीसोबतच आयकरावरील अधिभार रद्द करण्याची सवलत एवढाच काय तो दिलासा असणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत सादर केला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच १० लाख कोटींपेक्षा अधिक तरतूद असलेला पण एक लाख ८६ हजार कोटींची मोठी वित्तीय तूट असलेला अर्थसंकल्प हे २००९-१० या वर्षाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
या तुटीच्या वृत्तामुळेच शेअर बाजार कोसळला. उद्योग आणि व्यापारी वर्गासाठी आतापर्यंत लागू असलेला फ्रिन्झ बेनिफिट टॅक्स आणि कमोडिटी ट्रान्झॅक्शन कर रद्द करून सरकारने या क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ६ टक्के दराने आणि कर्जमाफी योजनेची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गृह कर्जावरील व्याजदरात सूट मिळण्याची आस लावून बसलेल्या कोट्यवधी जनतेला कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांची घोर निराशा करणारा हा अर्थसंकल्प ठरला. वर्षभरात देशात १ कोटी २० लाख अधिक लोकांना रोजगार उपल्ब्ध करून देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली जरूर, पण या रोजगाराच्या संधी कोणत्या क्षेत्रात आणि कशा निर्माण होतील, याबाबत चकार शब्द देखील त्यांनी काढला नाही.
गरिबी रेषेच्या खाली राहणाऱ्या लोकांना तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि गहू देण्याची घोषणा मुखर्जी यांनी केली खरी, पण ही योजना केव्हापासून लागू होईल, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. आम्ही याबाबत एक विधेयक तयार करीत असून ते पारित झाल्यावर या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, असे मुखर्जी यांनी सांगितले.
ज्या राज्यांमध्ये केंद्रीय विद्यापीठ नाही, अशा सर्वच राज्यांमध्ये विद्यापीठे स्थापण्याचा निर्णयही मुखर्जी यांनी घोषित केला.
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली माजी सैनिकांची "वन रॅंक, वन पेन्शन' ही मागणी या अर्थसंकल्पात मान्य करण्यात आली असून, त्याचा लाभ सुमारे १२ लाख माजी सैनिकांना होणार आहे.
गृह मंत्रालयासाठी यंदा ३३,८०९ कोटी रुपये मिळणार असून, राज्यांच्या पोलिस दलांच्या आधुनिकीकरणासाठी, सुरक्षा यंत्रणा उभारणीसाठी वेगळ्या १९२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण सिद्धतेसाठी यंदाच्या वर्षी ३४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, यंदा १,४१,७०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा मुखर्जी यांनी केली, पण ही कपात किती असेल हे मात्र त्यांनी सांगितले नाही. प्रत्यक्ष करांच्या रचनेत बदल करण्यात येणार असून येत्या दीड महिन्यात त्याचा मसुदा तयार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. करदात्यांना कोणतीही अडचण जाऊ नये यासाठी सरल-२ फॉर्मचा प्रस्तावही असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.
ग्रामीण भागात रस्ते बांधणीसाठी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आर्थिक वाढीचे ९ टक्क्यांचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार सरकारने केला आहे. भारतीय संसाधन वित्त महामंडळ बॅंकांच्या मदतीने विविध प्रकल्पांसाठी एक लाख कोटी रुपयांपर्यंत वित्तपुरवठा करू शकेल, अशी आमची मजबूत स्थिती असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. पण, यात महामंडळाचा किती वाटा असेल, हे मात्र त्यांनी नमूद केले नाही.
या अंदाजपत्रकात अल्पसंख्य सममुदायासाठी ७४ टक्के वाढीची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी ही तरतूद एक हजार कोटी रु. होती. ती यंदा १७४० कोटी एवढी करण्यात आली आहे.
या अंदाजपत्रकात विविध योजनांवरील खर्च ३४ टक्क्यांनी वाढला असून तो ३,२५,१४९ कोटी एवढा करण्यात आला आहे तर योजनेतर खर्चात त्यापेक्षाही अधिक म्हणजे ३७ टक्क्यांची वाढ नमूद करण्यात आली असून हा खर्च ६,९५,६८९ एवढा होणार आहे. ही रक्कम एकूण खर्चापेक्षा ६८.२ टक्क्यांनी अधिक आहे. सहावा वेतन आयोग आणि विविध वस्तूंवरील सबसिडीमुळे हा आकडा फुगला आहे. सबसिडीची रक्कम ५५.८ टक्के तर कर्जाच्या हप्त्याच्या परतफेडीवर १८.२ टक्के रक्कम खर्च होणार आहे.

या वस्तू स्वस्त होणार
चहा, कॉफी
जीवनरक्षक औषधी
ब्रन्डेड दागिने
सॉफ्टवेअर
रबराची लागवड
मोबाईल, मोबाईलचे सुटे भाग
क्रीडा साहित्य, चामडी वस्तू
गिरणी कापड, पादत्राणे
एलसीडी टीव्ही
००००००००
या वस्तू महाग होणार
कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी
सेट टॉप बॉक्स
सोने, चांदी
सोन्याच्या लगडी, बिस्कीटे

सरकारी जाहिरातींच्या दरात
वृत्तपत्रांना दहा टक्के वाढ
नवी दिल्ली, दि. ६ ः देशातील वृत्तपत्रांना सरकारी जाहिराती दहा टक्के वाढीव दराने देण्याची घोषणा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अंदाजपत्रक मांडताना केली. ते म्हणाले, ही दरवाढ सरकारने गेल्या फेब्रुवारी महिन्यातच लागू केली होती. ती आता आणखी सहा महिने म्हणजे ३० जून ते ३१ डिसेंबर या सहा महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे. गैरसरकारी जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे वृत्तपत्र सृष्टी अडचणीत आल्याची बाब आमच्या लक्षात येताच आम्ही हा निर्णय घेतला होता. हे पॅकेज वर्षअखेरपर्यंत लागू राहील, असे त्यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांच्या भाषणाने लोकसभेला "झोपविले'!

रवींद्र दाणी
नवी दिल्ली, दि. ६ - अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पाने आज शेअर बाजाराला तर झोपविलेच, शिवाय लोकसभेलाही झोपविले. आजचा अर्थसंकल्प मुखर्जींसाठी रौप्य महोत्सवासारखा होता. २५ वषार्र्ंपूर्वी त्यांनी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता, तर आज त्यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी सरकारचे अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला.
मुखर्जीचे भाषण सुरू झाले आणि या भाषणाचा परिणाम मुंबई-दिल्ली दोन्ही टिकाणी होऊ लागला. मुंबईतील शेअर बाजार कोसळू लागला, तर अर्थमंत्री ज्या सभागृहात उभे राहून भाषण देत होते ते सभागृह डुलक्या देऊ लागले.
सत्ताधारी पक्षाला आज जोरदार अर्थसंकल्पाची अपेक्षा होती. लोकसभेतील विजयाला साजेसा अर्थसंकल्प प्रणवबाबू सादर करतील अशी अपेक्षा ठेवून सत्ताधारी सदस्य आले होते. पण, त्यांची निराशा होत होती. राज्यमंत्री सचिन पायलट असोत की त्यांचे सहकारी दीपिंदरसिंग हुडा असोत त्यांना डुलक्या येत होत्या. कॅबिनेट मंत्री कु. शैलजा यांचेही डोळे अधून मधून मिटत होते. तर मागील बाकावर बसलेले आंध्रप्रदेशातील एक खासदार प्रणवबाबू आपले भाषण संपवून खाली बसल्यावरच उठले. अर्थात झोपेतून.
सपाच्या खासदार जयाप्रदा यांनाही डुलक्या येत होत्या. अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी आणि समजण्यासाठी त्यांना बरेच परिश्रम करावे लागत आहेत, असे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
कम्युनिस्ट सदस्य अर्थकारणातील तज्ञ समजले जातात. पण, माकप नेते वासुदेव आचार्य यांच्या डोळ्यांवर अर्थसंकल्पाचा तणाव दिसत होता. भाजप बाकावर शेवटच्या रांगेत बसलेले दोन सदस्यही मस्त डुलक्या देत होते.
दीर्घा रिकामी
राज्यसभेची लोकसभेतील दीर्घा आज बरीचशी रिकामी होती. नंतर कळले की भाजपचे बहुतेक सदस्य राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांच्या कक्षात बसून अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकत होते.

भाजपची सदस्यता मोहीम सुरू

२ लाख प्राथमिक सदस्य नोंदणीचा संकल्प

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी- गोवा प्रदेश भारतीय जनता पक्षातर्फे आजपासून सदस्यता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पणजीचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक लाला राव यांनी पहिला प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरून या मोहिमेला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरापासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत राज्यात घरोघरी भेट देऊन तसेच पक्षाच्या विचारधारेच्या आधारावर प्राथमिक सदस्य नोंदणी केली जाईल. उत्तर व दक्षिण जिल्हा मिळून राज्यभरात सुमारे दोन लाख सदस्य नोंद करण्याचा संकल्प पक्षाने जाहीर केला आहे.
आज पणजी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर,संघटनमंत्री अविनाश कोळी आदी हजर होते. भाजपचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा ६ जुलै हा जन्मदिवस असल्याने सदस्यता मोहिमेसाठी या दिवसाची निवड राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आली होती, असेही श्री.आर्लेकर यांनी सांगितले. भाजपच्या संघटनात्मक रचनेत ३३ टक्के महिलांचा समावेश असेल,असेही यावेळी घोषित करण्यात आले. यापूर्वी भाजपचे सदस्य म्हणून झालेली नोंद अवैध बनली असून आता पुन्हा एकदा सहा वर्षांसाठी ही नोंदणी केली जाणार आहे. गेल्यावेळी १ लाख १५ हजार सदस्यांची नोंद झाली होती. यावेळी हा आकडा दोन लाखांवर नेण्याचा संकल्प पक्षाने सोडला आहे.घरोघरी पक्षाचे प्रमुख नेते भेटी देणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ही मोहीम हाती घेण्याचे धाडस एरवी कुणीही करण्यास धजला नसता परंतु भाजपने हीच वेळ साधली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा लोकांशी संपर्क साधण्याचा योग या मोहिमेमुळे प्राप्त होणार आहे,असेही श्री.आर्लेकर म्हणाले.
सध्याची प्राथमिक सदस्यता मोहीम ही ३१ जुलै २००९ पर्यंत सुरू राहील. त्यानंतर सक्रिय सदस्यता मोहीम सुरू होईल. सुरुवातीस बूथ समित्या,मंडळ समिती,जिल्हा समिती,प्रदेश समिती व शेवटी राष्ट्रीय समिती अशी या मोहिमेच्या दिशा असणार आहे. दर तीन वर्षांनी भाजपच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुका होतात व त्यात लोकशाही पद्धतीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होते, हेच या पक्षाचे वेगळेपण असल्याचेही श्री.आर्लेकर यांनी ठासून सांगितले. राज्यात सुमारे १३०० बूथ आहेत. प्रत्येक बूथवर किमान दीडशे ते दोनशे सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.
भाजपबाबत इतर राजकीय पक्षांकडून केला जाणारा अपप्रचार आता हळूहळू लोकांच्या लक्षात यायला सुरुवात झाल्याने अल्पसंख्यांकाचाही मोठा ओढा पक्षाकडे येत आहे,अशी माहितीही श्री.आर्लेकर यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून सदस्यता मोहिमेचा आढावा घेतला असता ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते,असेही श्री.आर्लेकर म्हणाले.जात, धर्म, भाषा, पंथ आदींच्या आधारावर सदस्यता नोंदणी करण्याच्या विरोधात हा पक्ष आहे,असेही स्पष्टीकरण श्री.आर्लेकर यांनी केले. भाजपच्या विचारधारेशी सहमती असलेले व या पक्षाबाबत आपुलकी व सहानुभूती असलेले लोक या पक्षाचे सदस्य बनण्यास इच्छुक असतात,असेही त्यांनी सांगितले.

कुंकळ्ळी भट्टी स्फोटातील दुसऱ्या कामगाराचाही मृत्यू

मडगाव,दि. ६ (प्रतिनिधी) - शनिवारी सकाळी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतींतील ग्लोबल इस्पात कारखान्याच्या भट्टीच्या झालेल्या स्फोटात गंभीर झालेल्या दुसऱ्या कामगारालाही आज गोमेकॉत मृत्यू आला व त्यामुळे बळींची संख्या दोन झाली आहे.
मरण पावलेल्या कामगाराचे नाव राजेशकुमार असे आहे. स्फोट झाला तेव्हा तो बॉयलरवर असलेल्या क्रेनवर होता व स्फोटामुळे उसळलेला लोहरस अंगावर पडून अक्षरशः कोळसा झालेला होता असे कळते. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो शवागारात ठेवलेला आहे. काल मरण पावलेल्या सुरेश रामप्रसाद शर्मा व त्याचा मृतदेह उद्या त्यांच्या मूळगावी उत्तर प्रदेशकडे रवाना केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. गोमेकॉत असलेल्या ज्योती गावकर यांची प्रकृती आता सुधारत आहे.
पोलिसांनी सदर कारखाना सील करून तपास सुरु केला आहे. कारखाना चालकांविरुध्द सुरक्षा उपायात गलथानपणा व हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून अटक केलेले चालक अभयकुमार अग्रवाल व कुशल अग्रवाल तसेच व्यवस्थापक अजयकुमार गोयल यांना नंतर जामिनावर मुक्त केले आहे. या कारखान्याबद्दल कुंकळ्ळीत मात्र जनमत खदखदत असून यापूर्वी तेथे असे अनेक प्रकार घडल्याचा व व्यवस्थापनाने ते दडपून टाकल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरु केला आहे.

सेझाकडून आणखी खाणींची खरेदी?

अमर नाईक
कुडचडे, दि. ६ - सेझा गोवा कंपनीने धेंपो उद्योगसमूहाकडून खाणी विकत घेतल्यानंतर आता आणखी एका नामवंत खाण कंपनीकडून खाणी खरेदी करण्यासाठी बोलणी चालवली आहेत. यासंबंधी जोरदार हालचाली सुरू असल्याचे खात्रिलायक सूत्रांकडून समजते.
वास्को येथे मुख्यालय असलेल्या या उद्योगसमूहाकडे सेझा कंपनीने राज्यातील सर्व खाणी खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बोलणीही सुरू झाली आहेत. राज्यातील खनिज साठा १५ ते १७ वर्षे चालेल एवढाच शिल्लक असल्याचे खाण कंपन्यांकडून सांगण्यात येते.तथापि प्रत्यक्षात हा साठा संपुष्टात आल्याचे मानले जाते. सध्या राजकीय नेते विशेषतः मंत्री या उद्योगांमध्ये गुंतले असून, ठिकठिकाणी नव्या खाणी सुरू झाल्याचे दिसते. मध्यंतरी चीनकडून आलेली मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक खाणींवरून मातीसह माल पाठवण्यात आला, काही दिवसांनी ही गोष्ट तेथील आयातदारांच्या लक्षात आल्यावर मालाचा दर खाली आणण्यात आला आहे. याचा फटका गोव्यासह अन्य राज्यांनाही बसला. या स्थितीतही सेझा कंपनीने स्थानिकांच्या खाणी खरेदी करण्याचे ठरविले असून अनेक लहान खाणमालक करोडो रुपयांच्या बदल्यात हा व्यवहार पूर्ण करण्याच्या बेतात आहेत. वास्कोतील मोठा उद्योगसमूहही त्याच मार्गाने चालला आहे.

Monday 6 July, 2009

संशयास्पद ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान नको - भाजपची मागणी

नवी दिल्ली, दि. ५ - ईव्हीएममध्ये (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन) मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याने महाराष्ट्र व हरयाणात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रांचा वापर करू नये. त्याऐवजी मतपत्रिकांवर शिक्के मारून त्या मतपेट्यांमध्ये टाकण्याची जुनीच पद्धत लागू करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
जोपर्यंत ईव्हीएम "फुलप्रूफ' असल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने मतदान यंत्राचा निवडणुकीत उपयोग करू नये, अशी मागणी भाजपने केली आहे.
ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेऊ नये, अशी मागणी केली आहे. मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर दोष असून, त्यामध्ये फेरफार करून विशिष्ट पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यात आल्याचे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व हरयाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतपत्रिकांवर शिक्का मारण्याची पद्धत पुन्हा लागू करावी, असे अडवाणी यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदानात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. अन् सैगल यांनी ईव्हीएम मशीन दोषपूर्ण असल्याचे सिद्ध केल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी याप्रकरणी उप-निवडणूक आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती भाजपा प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.
जर्मनीत ईव्हीएमच्या वापरावर बंदी असून अमेरिकेत ईव्हीएमसोबतच बॅलेट पेपरवरही मतदान करावे लागते, याचाच अर्थ अत्याधुनिक तंत्रज्ञान बाळगणाऱ्या दोन्ही देशांचा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास नाही. म्हणूनच जगभरातील लोकशाही राष्ट्रे अजूनही जुन्याच पद्धतीचा अवलंब करतात, अशी माहितीही प्रसाद यांनी दिली.
भाजपा नेते एकनाथ खडसे यांनीही अडवाणी यांच्या मागणीचाच पुनरुच्चार केला असून शिवसेनेने मात्र अद्याप यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ईव्हीएम मशीनमधील गैरप्रकाराबाबत शिवसेना नेतृत्वाकडेही काही तक्रारी आल्या आहेत. मात्र योग्यवेळी यासंदर्भातील भूमिका शिवसेना स्पष्ट करेल, अशी प्रतिक्रिया सेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
कॉंग्रेसने मात्र ईव्हीएम मशीन्सच्या माध्यमातून मतदान घ्यावे असा आग्रह धरला आहे. पुन्हा जुनीच पद्धत स्वीकारणे म्हणजे जुन्या काळात जाण्यासारखे आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला आणि निकाल लागण्यास विलंब होईल. शिवाय निवडणुका घेण्याचा खर्चही वाढेल, असे मत कॉंग्रेस प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.

आयोगासमोर गैरप्रकार सिद्ध
दिल्लीतील वरिष्ठ सनदी अधिकारी ओमेश सैगल यांनीच ईव्हीएम मशीनमधील गैरप्रकाराची बाब उघडकीस आणली. त्यांनी गैरप्रकार कसे घडवून आणले जातात हे एका उदाहरणासह सिद्ध करून दाखविले. सैगल यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने त्यांना त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यास सांगितले. त्यानुसार सैगल यांनी सविस्तर "प्रेझेंटेशन' करून मतदान यंत्रातील दोष दाखवून दिले. यामुळे मतदान यंत्र फुलप्रूफ नसल्याचे निवडणूक आयोगाच्याही लक्षात आले आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतपत्रिका वापरण्याची मागणी केली आहे.

आजच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळणार का?

त्रस्त"आम आदमी'साशंक

नवी दिल्ली, दि. ५ - आज सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळविणे किंवा अन्य कोणत्या वस्तू घेणे यासाठी बॅंकांच्या कर्जावर अवलंबून राहावे लागते. पर्यायाने, हप्त्या-हप्त्याने जगणे त्यांच्या नशीबी येते. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार सर्वसामान्यांचा विचार करून या हप्त्यांचा भार काही अंशी कमी करेल, गृहकर्जावर करसवलत वाढवेल, अशी आशा केली जात आहे. तब्बल २५ वर्षांच्या कालावधीनंतर उद्या पुन्हा एकदा प्रणव मुखर्जी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
नोकरदार मंडळी खाणे आणि कपडे याची सोय केल्यानंतर हक्काच्या घराचे स्वप्न पाहतात. सध्यातरी हे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. अर्थमंत्र्यांनी थोडी मदत केली तर हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळेल. आगामी अर्थसंकल्पापासून असंख्य सर्वसामान्यांना हीच आशा आहे. हप्त्यांवर धावणारी ही सर्वसामान्यांच्या आयुष्याची गाडी ओढताना थोडा दिलासा मिळावा अर्थात कर्जावरील व्याजदर कमी व्हावे, अशी आशा आहे.
निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार आज शहरी सर्वसामान्यांना धन्यवाद देण्याच्या भावनेपोटी गृहकर्जावर करसवलत देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गृहकर्जाच्या व्याजदरावर मिळणारी करसवलत वाढवावी, ३० लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याजदरात विशेष सूट, घराचा ताबा मिळाल्यानंतरच हप्ता सुरू व्हावा, अशा सर्वसामान्यांच्या मागण्या आहेत. आज आर्थिक मंदी आणि महागाईची सर्वाधिक झळ सर्वसामान्यांनाच सोसावी लागत आहे.
गृहमंत्रालयाचेही बजेटकडे लक्ष
सध्या देशात दहशतवाद, नक्षलवाद आणि घुसखोरी यासारख्या समस्या पेटल्या असताना संरक्षण खर्चासाठी किती अतिरिक्त तरतूद केली जाईल, याकडे गृहमंत्रालयाचे लक्ष लागले आहे. देशाचे लष्कर, पोलिस दल यांचे आधुनिकीकरण ही आज फार मोठी गरज आहे. त्या दिशेने अधिक प्रयत्न होण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात नेमकी काय सोय करण्यात आली आहे, याच्या प्रतीक्षेत गृहमंत्रालय आहे. प्रणव मुखर्जी यांनी १९८२ ते ८४ दरम्यान तीन वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अखेरच्या दिवसांमध्ये पी.चिदम्बरम यांच्या जागी प्रणव मुखर्जी यांना अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी १६ फेब्रुवारी २००९ रोजी लेखानुदान सादर केले होते. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानांनी मुखर्जी यांना अर्थमंत्रालयाचा पूर्ण प्रभार सोपविला आणि आता ते २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा देशाचे वार्षिक आर्थिक अंदाजपत्रक सादर करणार आहेत.
आणिबाणीनंतर जेव्हा जनतेने पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांना सत्तेत परत आणले तेव्हा देशातील आर्थिक स्थिती अतिशय खिळखिळी झाली होती. त्याक्षणी इंदिराजींनी प्रणवदांवर विश्वासाने अर्थमंत्रालय सोपविले. १९८२ मध्ये त्यांनी जेव्हा पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा महागाई दर २१ टक्के इतक्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचला होता. भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज हवे होते. पण, भारताच्या या प्रयत्नांना अमेरिकेचा विरोध होता. ते दिवस आठवून आजही मुखर्जी भूतकाळात हरखून जातात. त्याक्षणी त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी नाबार्डच्या स्थापनेचे पाऊल उचलले होते. दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी जागतिक आर्थिक मंदीचा उल्लेख केला होता. योगायोगाने उद्याचा अर्थसंकल्प ते सादर करीत असताना संपूर्ण जग मंदीच्या तडाख्यात सापडलेले आहे, हे येथे उल्लेखनीय.

मद्यालयांना देवांची नावे देण्यास बंदी

पणजी, .दि. ५ (प्रतिनिधी) ः उशिरा का होईना पण अखेर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी २००८ साली विधानसभेत सादर केलेल्या खाजगी विधेयकाला काही अंशी न्याय मिळालाच. राज्यातील मद्यालयांना यापुढे देवदेवतांची नावे देण्यास मज्जाव करणारा कायदा राज्य सरकारच्या अबकारी खात्याने अधिसूचित केला आहे. या अधिसूचनेअंतर्गत नव्या मद्यालयांना परवाना देताना त्यांनी देवदेवतांची नावे मद्यालयांना देऊ नयेत याची कटाक्षाने तपासणी केली जाणार आहे.अबकारी खात्याला अंधारात ठेवून तसे नाव देण्याचा कुणी प्रयत्न केला तर प्रसंगी मद्यालयाचा परवाना रद्द करण्याची तयारीही सरकारने ठेवली आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी २००८ साली राज्यातील मद्यालयांना देवदेवतांची नावे देण्यावर निर्बंध घालण्याची मागणी एका खाजगी विधेयकाव्दारे केली होती. राज्यातील बहुतेक मद्यालयांना हिंदू देवता किंवा ख्रिस्ती संतांची नावे देण्याची प्रथाच सुरू झाली आहे. किमान राज्य सरकारने यापुढे तरी मद्यालयांना देवतांची नावे देण्यावर बंदी घालावी,अशी मागणी या विधेयकात केली होती. राज्य सरकारने त्यावेळी याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले होते.अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार २६ जून २००९ रोजी वित्त खात्यातर्फे जारी केलेल्या अधिसूचनेत मद्यालय सुरू करताना कोणत्याही धर्माशी संबंधित देवदेवतांच्या नावांचा वापर होऊ नये,असे आदेश देण्यात आले आहेत. हा कायदा अमलातही आला आहे. आता सध्याच्या देवतांची नावे धारण केलेल्या मद्यालयांबाबत राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल,असेही वित्त खात्याच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी अशा मद्यालय मालकांना जर खरोखरच स्वतःहून ही नावे हटवण्याची इच्छा झाली व त्यांनी ती बदलली तर त्याचे स्वागतच होईल,अशी पुस्तीही यावेळी जोडण्यात आली.
राज्यात सुमारे साडेसहा हजार मद्यालयांची नोंद अबकारी खात्याकडे झाली आहे. दरम्यान, सध्याच्या मद्यालयांना परवाना नुतनीकरणाच्यावेळी अशी नावे बदलण्याची विनंती करण्यात येणार आहे,अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या कायद्यात "धार्मिक नावांचा वापर होऊ नये' असा जो उल्लेख केला आहे तो अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे व त्यामुळे याप्रकरणी कायदा खात्याकडे सल्ला मागितल्याची माहितीही सरकारी सूत्रांनी दिली.

हा तर विश्वजित राणे यांना वाचविण्याचा खटाटोप

आयरिश यांचा ऍडव्होकेट जनरलांवर आरोप
मुद्दा ५०६ कलमाचा
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - राज्य सरकारने भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ अंतर्गत सर्व खटले मागे घेण्याबाबत सरकारी वकील व साहाय्यक सरकारी वकिलांना दिलेला आदेश हा ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना आरोपमुक्त करण्यासाठी चालवलेला खटाटोप आहे,असा सनसनाटी आरोप ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी केला आहे.
या आदेशासंबंधी ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी माहिती हक्क कायद्याअंतर्गत कागदपत्रे मिळवली आहेत. या कागदपत्रांवरून उघड झालेल्या माहितीनुसार ऍड. जनरल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ३० जून २००९ रोजी संध्याकाळी ही प्रक्रिया पूर्ण केली. याप्रकरणी त्यांनी तयार केलेला प्रस्ताव सुरुवातीस गृह खात्याचे अवर सचिव,विशेष सचिव, कायदा सचिव यांच्याकडून फिरून मुख्यमंत्री दिगंबर कामत व गृहमंत्री रवी नाईक यांच्यापर्यंत पोहचले. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रतिज्ञापत्र तयार केले व १ जुलै २००९ रोजी उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. ऍड. जनरल यांनी दाखवलेली ही तत्परता केवळ आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावरील या कलमाअंतर्गत दाखल झालेले आरोपपत्र रद्दबातल ठरवण्यासाठी आहे,अशी टीका ऍड.आयरिश यांनी केली आहे. ऍड. जनरल यांची घिसाडघाई या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाली आहे व हा प्रस्ताव राजकीय प्रेरित असल्याने त्यात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. सरकारचे हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात कितपत ग्राह्य ठरते याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिल्याने त्याचा निकाल १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत लागणार आहे.
सर्वसामान्य जनतेच्या हिताचा एखादा विषय हाताळण्याची वेळ येते तेव्हा यासंबंधीच्या फाईल्स हातावेगळ्या होण्यास विलंब होतो पण इथे एका मंत्र्यावर कृपादृष्टी करण्यासाठी काही तासांत सर्व सरकारी अडथळे पार करून प्रस्ताव मंजूर केला जातो, यावरून या सरकारचा "आम आदमी'चा पुळका किती बेबनाव आहे,हे लक्षात येते,अशी टीकाही ऍड. आयरिश यांनी केली आहे. सर्वसाधारणपणे सरकार एखादा प्रस्ताव तयार करते व त्याबाबत कायदेशीर सल्ला मागवण्यासाठी ऍड.जनरलांशी सल्लामसलत केले जाते.इथे मात्र ऍड.जनरलांनी स्वतः प्रस्ताव तयार केला आहे व त्यावर सरकारी मान्यता मिळवून घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रस्तावाबाबत कायदा खात्याने मात्र आपली मान्यता दिलेली नसल्याचेही उघड झाले आहे. कायदेशीर सल्ल्याबाबत ऍड. जनरलांचा शब्द अंतिम मानला जातो, त्यामुळे आपल्या सल्ल्याची आवश्यकता नाही,असे म्हणून कायदा खात्याच्या सचिवांनी या वादातून आपली सहीसलामत सुटका करून घेतली आहे.मुख्य सचिवांनीही कायदा सचिवांच्या या भूमिकेबाबत संदिग्धता व्यक्त करून या प्रस्तावाच्या वैध्यतेबाबत शंका घेण्यास वाव ठेवला आहे, असेही ऍड.आयरिश यांनी म्हटले आहे.
ऍड.जनरल यांनी याप्रकरणी तयार केलेल्या प्रस्तावात म्हटल्याप्रमाणे ५ जुलै १९७३ साली राज्य सरकारने एक अधिसूचना जारी करून त्यात भारतीय दंड संहितेतील काही कलमे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यांत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. मूळ अधिसूचनेत ५०६ कलमाचा उल्लेख होण्याचे राहून गेल्याने पुन्हा एकदा त्यासंबंधी दुरुस्ती सुचवून ५०६ कलमाचा त्यात समावेश करण्यात आला. ऍड. जनरल यांनी या दुरुस्तीसंबंधी आपण अनभिज्ञ होतो,असे सांगून केवळ पोलिस महासंचालकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर आपल्याला हे कळले,अशी भूमिका घेतली आहे.खुद्द ऍड.जनरलांना १९७३ सालच्या या अधिसूचनेची माहिती नसणे ही आश्चर्याची गोष्ट असल्याचे ऍड.आयरिश यांनी म्हटले आहे. पुढे या ५०६ कलमाबाबत अनेकवेळा संभ्रमावस्था निर्माण झाल्याने ११ मे २००४ रोजी सरकारने नवीन अधिसूचना काढली व त्यात ५०६ कलमाचा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला. ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली नाही, त्यामुळे हा कायदा अस्तित्वात येत नाही,अशी भूमिका घेऊन त्यांनी सरकारच्यावतीने ५०६ अंतर्गत सर्व खटले मागे घेण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. एवढी वर्षे याबाबत मौन धारण केलेल्या सरकारला आत्ताच हे खटले मागे घेण्याचे कसे काय सुचले,असा सवालही ऍड.आयरिश यांनी उपस्थित केला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना आरोपमुक्त करण्यासाठी चाललेले हे षड्यंत्र आहे,असा आरोप करून न्यायालयासमोर सरकारची ही नाटके उघड होतील,अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

गांधी मार्केटातील दोन दुकाने आगीत खाक;५लाखांची हानी

मडगाव, दि.५ (प्रतिनिधी) - काल रात्री साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास गांधी मार्केटमधील दोन रेडीमेड कापड दुकानांना आग लागून ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली व साधारण एक लाखाची हानी झाली पण दुकानदारांच्या म्हणण्याप्रमाणे ५ लाखांची नुकसानी झाली आहे.
आग कशी लागली ते कळू शकले नाही पण शॉटसर्किट हेच त्यामागील कारण असावे असा कयास आहे. सदर दुकाने सिराज शेख व जाफर शेख यांच्या मालकीची आहेत . कोणाच्या तरी आग लागल्याचे लक्षात आले व त्यांनी अग्निशामक दलाला खबर दिल्यावर त्यांनी धाव घेऊन आग विझविली, त्यामुळे एकमेकांना भिडून असलेली अन्य दुकाने बचावली. सदर दुकानांतील सर्व माल खाक झाला.
दरम्यान, आज सकाळी साडे अकरा वाजता अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रावर पुन्हा गांधी मार्केटात आग लागल्याचा फोन आला व दलाचा बंब सायरन वाजवत तिकडे दाखल झाला. पण प्रत्यक्षात गांधी मार्केटात सर्व काही नेहमीप्रमाणे चालू होते व सर्वत्र तपास करूनही कुठेच आग लागली नसल्याचे आढळून आले त्यामुळे कोणीतरी विनाकारण दलाला धावपळ करायला लावल्याचे दिसून आले. नंतर मिळालेल्या माहितीनुसार मार्केट परिसरात कुणीतरी जुने कपडे व कचऱ्याला आग लावली होती पण ते भिजल्यामुळे आगीने पेट घेण्याऐवजी धूर बाहेर पडला व तो पाहून व काल रात्रीच्या आगीतून कोणीतरी वेळ न गमावता अग्निशामक दलाला ही वर्दी दिली.
गेल्या आठवड्यातील कुडचडे येथे दुकानाला लागलेली आग व कालचा कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील स्फोट यांच्या पार्श्र्वभूमीवर आज भर बाजाराकडे निघालेल्या अग्निशमन दलामुळे मडगावकरांच्या मनांत मात्र अभद्र शंकेची पाल चुकचुकली होती.
अग्निशामक दलाला गांधी मार्केटात पोचेपर्यंत मात्र नानाविध समस्यांचा सामना करावा लागला. रस्त्यावर वाटेल तशी उभी केलेली वाहने, त्यातच फेरीवाल्यांनी टाकलेल्या पथाऱ्या व त्यातून झालेला वाहतुकीचा खोळंबा यामुळे दलाच्या गाडीला तेथे पोचेपर्यंत नाकी नऊ आले.

पावसाने राज्यात अर्धशतक ओलांडले

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)- गेले तीन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसाने अखेर इंचांचे अर्धशतक ओलांडले आहे. आज दिवसभरात हवामान खात्याने केलेल्या नोंदीप्रमाणे साडेतीन इंच पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आजची सरासरी कमी असली तरी एकूण पाऊस ५१ इंचावर पोहचल्याने जुलै महिन्याच्या प्रारंभीच पावसाने अर्धशतकी ओलांडली आहे.
आज दिवसभरात पावसाचा जोर कमी होता परंतु दिवसभर पावसाचे झिरपणे सुरूच होते, त्यामुळे अनेकांनी बाहेर पडणे टाळले. गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र भरलेले पाणी हळूहळू ओसरत चालल्याची माहिती विविध भागांतून मिळाली आहे. पणजी येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे आज केवळ १४ संदेशांची राज्यभरात नोंद झाली आहे. कालच्या ५२ संदेशांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी असल्याने खरोखरच पावसाचा जोर उतरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिचोलीत पावसामुळे निर्माण झालेला पुराचा धोका तूर्त टळला असून या भागात विविध ठिकाणी साचलेले पाणी कमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, विविध ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेल्याची खबर मिळाली आहे. वास्को येथील महामार्गाचा रस्ता पहिल्या पावसातच वाहून गेल्याने येथील लोक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित यासंबंधी दुरुस्ती काम युद्धपातळीवर हातात घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत असून अन्यथा पावसामुळे पडलेले रस्त्यावरील खड्डे अपघातांसाठी कारणीभूत ठरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Sunday 5 July, 2009

६ इंच पावसाची नोंद

पणजी, डिचोली व वाळपई, दि. ४ (प्रतिनिधी)- गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसाचा तडाखा आजही कायम राहिला. मागच्या दोन दिवसांचा विक्रम मोडत आज २४ तासांत एकूण ६ इंच पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचा जोर पाहता येत्या चोवीस तासांत पाऊस अर्धशतक ओलांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे डिचोलीत पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सरकारच्या पूरनियंत्रण कामांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने विद्यमान सरकारने डिचोलीवासीयांची थट्टाच चालवल्याचा सूर आज अनेकांनी व्यक्त केला.
काल रात्रीपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम राहिला. विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने अनेकांची धांदल उडाली. राजधानीत रस्त्यावर पाणी भरल्याने दुकानदारांवर आपले व्यवसाय बंद करण्याची नामुष्की ओढवली. रस्त्यावरील पाणी वाहनांच्या येरझाऱ्यामुळे सरळ दुकानात आत शिरू लागल्याने त्यांना आपले व्यवसाय बंद करणे भाग पडले. गेले तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे आजही अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले. पणजी भाटले येथे एका जुन्या घराची मातीची भिंत कोसळल्याने बरेच नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. कला अकादमी ते मिरामार पर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांची खास करून दुचाकी चालकांची बरीच धांदल उडाली. काही वाहन चालक रस्त्यावर पाणी भरल्याने वाहन सावकाश हाकायचे सोडून जाणीवपूर्वक वाहने वेगात हाकत असल्याने फुटपाथवर चालणाऱ्या लोकांची बरीच पंचाईत होत असल्याच्या तक्रारी आल्या.
डिचोलीत नागरिकांत पुराची घबराट
डिचोलीत सरकारने राबवलेल्या पूर नियंत्रण उपाय योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. डिचोलीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची झोप उडविली असून पुराचे संकट टळो असे म्हणून येथील लोक प्रार्थना करीत आहेत. डिचोलीतील पुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची योजना मंजूर केली असली तरी भर पावसात कामाला सुरुवात केल्याने जनतेचा पैसा पाण्यात गेला आहे. या प्रकाराबाबत डिचोलीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आज सकाळपासूनच डिचोलीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायला सुरुवात झाली. दुपारी येथील पाण्याची पातळी वाढू लागली आणि शांतादुर्गा हायस्कूलजवळील डिचोली अस्नोडा रस्त्यावर वाहने चालविणे धोकादायक बनले. बगल रस्त्यावरून येणारी वाहने भायली पेठ मार्गे वळविण्यात आली. येथील मुख्य नाल्यावरूनही पाणी वाहू लागले. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हे पाणी ओसरले असले तरी पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर येथे केव्हाही पूर येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, पुराची परिस्थिती ओढवल्यास सर्व सरकारी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. खनिज मालाचे साठे पाण्याच्या लोटाबरोबर नागरिकांच्या घरात घुसत असल्याने लोकांचे बरेच नुकसान झाले आहे. सुर्ला गावातील रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.
वाळपई बाजारपेठ जलमय
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसाने वाळपई तालुक्यालाही झोडपून काढले. वाळपई बाजारपेठेतील रस्ते पाण्याखाली गेले होते तर वेळूस येथील म्हादई नदी पाण्याने तुडुंब भरून वाहत होती. वाळपई - होंडा रस्ताही ठिकठिकाणी पाण्याखाली गेल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने संध्याकाळी थोडीफार विश्रांती घेतली. वाळपईत अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना जोर आला असून शेतकरी आपल्या कामात मग्न असल्याचे दिसून आले.

"ग्लोबल इस्पात'च्या भट्टीत प्रचंड स्फोट

५१ जखमी - ३ अत्यवस्थ
कुंकळ्ळी व मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी)- कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील "ग्लोबल इस्पात' या लोखंडी पट्ट्या व सळया तयार करणाऱ्या कारखान्याच्या "स्टील मेल्टिंग' भट्टीत प्रचंड स्फोट झाल्याने येथे काम करत असलेले सुमारे ५१ कामगार जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये कंपनीचे सरव्यवस्थापक यशवंत सिंग यांचा समावेश असून गंभीर जखमी झालेल्यांची नावे ज्योती संतोष काळ (४५), सुरेश रवीदास (१८) व राजेश (४५) अशी आहे. त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी कारखान्यातील भंगार भट्टीत टाकून त्याच्या पट्ट्या व सळया बनवण्याचे काम सुरू होते. यावेळी सदर भट्टीच्या जवळच सिलिंडर असल्याने स्फोटाची तीव्रता वाढली. घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटाची भीषणता एवढी जबरदस्त होती की, स्फोट झाल्यानंतर भट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तर कारखान्याचे पत्र्यांचे छप्पर निम्म्याहून अधिक प्रमाणात फाटले. या पत्र्याचे तुकडे सुमारे ५०० मीटर परिसरात विखुरले गेले. अनपेक्षित झालेल्या स्फोटाने व पत्र्याचे तुकडे अंगावर पडल्याने येथील कामगार रक्तबंबाळ व हादरलेल्या अवस्थेत होते. कारखान्यात सर्वत्र लोहरस पसरला होता व फर्निचर व इतर सामानाचे तुकडे सर्वत्र विखुरलेले होते. यात कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जखमींना त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून बाळ्ळी प्राथमिक उपचार केंद्र व नुसी इस्पितळात व नंतर हॉस्पिसियूत दाखल करण्यात आले. यानंतर तिघांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक गजेंद्र प्रभुदेसाई, केपे पोलिस स्थानकाचे निरीक्षक संतोष देसाई, अधीक्षक मंगलदास देसाई, अधीक्षक ऍलन डिसा यांनी घटनास्थळाला भेट दिली.
स्फोटाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापनाची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता एकही जबाबदार व्यक्ती उपलब्ध होऊ शकली नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश परब यांच्या मते भट्टीत स्क्रॅप टाकताना आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे हा स्फोट होण्याची शक्यता आहे. पूर्ण तपासणी झाल्यावर अंतिम निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू असेही त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याच्या आवारामध्ये भरलेल्या स्क्रॅपमधील काही गॅस सिलिंडरकडे लक्ष वेधून एखाद्या गॅस सिलिंडरमुळे अशी दुर्घटना होऊ शकते का अशी पृच्छा केली असता तशी शक्यता नाकारता येत नसल्याचे श्री. परब यांनी सांगितले.
या स्फोटात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे ः- मंदा माधव नाईक (४०, बाळ्ळी), सोनिया महेश वर्मा (२६), कीर्ती धुरू (४०), सिया संतोष साहू (३०), शोभा गावकर (३०), राय बिंड (४०), राजेंद्र पाल (१८), राजेश तिवारी (२२), राजेश शाह (२५), अंजू ठाकूर (२३), महमद धालिया (२१), अमृतलाल रामा (२३), काळू पाल (३०), हिरालाल यादव (२८), योगेंद्र सिंग, चोडिलाल बिंड, सोनू बिरादर, राजेशकुमार, दर्शनपाल गोम (४०), राजीव चंद्रभान (२५), लाल पाल (२८), राजीव एच. इनाह प्रधान, मुन्ना, संतोष साहू, सुनील, ज्योती काळे, कमल राम पाल, गजेंद्र पाल, शोभा गावकर, रोशन सिंग, खेजुराम, राहू महेश, नवीन रामचंद्रन, रोहिस बिश्वा, भिरू खनू, मुन्ना जयराम, श्रायली इरवारा, रवी ओमप्रकाश, विनोद मंगाळी, मुन्नी रवी, कृष्णकुमार, शामलाल कृष्णकुमार, राजेश कल्लू, के. एच. बाबू, मनोज कार्लू, अमित मिश्रा, बंटी शर्मा, सीताहर, लालजी.

त्या युवतीच्या खुनाचे गूढ अद्यापही कायम

पेडणे, दि. ४ (प्रतिनिधी)- हरमल गिरकरवाडा दांडे येथे एका झोपडीत काल ३ जुलै रोजी रात्री उशिरा ज्या वीस वर्षीय युवतीचा खून झाला त्याविषयीचे धागेदोरे मिळालेले नाहीत. संबंधित युवतीच्या उजव्या मनगटावर इंग्रजी अक्षर "एस' व देवनागरीत "विता' ही दोन अक्षरे कोरण्यात आली आहेत.
धारदार शस्त्राने गळा कापला गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले आहे. तिच्यावर बलात्कार झाला की नाही याचा अहवाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे. या खून प्रकरणातील संशयित आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नार्वेकर, हवालदार लाडजी नाईक, तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार सदर युवती व दोघे युवक हरमल येथील एका रेस्टॉरंटमध्ये काल रात्री जेवणासाठी आले होते. त्यांना मराठी व हिंदी अशा दोन भाषा अवगत होत्या. ती युवती व युवक महाराष्ट्रीय असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
दांडे हरमल समुद्रकिनारी पर्यटक हंगामात पर्यटकांसाठी "हट्स' उभारले जातात. ते पावसाळ्यात हटवणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित शॅक्स व्यावसायिकांनी ते हट्स तसेच ठेवले होते. त्या हट्सचा वापर त्या दोन युवक व युवती यांनी आसऱ्यासाठी केला. त्या परिसरात कोणी नसल्याची संधी साधून या युवतीला आतमध्ये नेऊन दोघा युवकांनी तिच्यावर बळजबरी केली असावी, अशी शक्यता असून त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतून तिचा खून झाला असावा, असा कयास व्यक्त होत आहे.
त्या मुलीने तांबडा टॉप व निळी जीन्स परिधान केली होती. तिच्या अंगावर तेव्हा दागिने नव्हते किंवा पर्सही सापडली नाही.
घटना घडली त्या रात्री पेडणे पोलिसांनी सर्व चेकनाक्यांवर बिनतारी संदेश पाठवून नाकाबंदी केली होती. पेडणे पत्रादेवी चेकनाका, चोपडे जंक्शन व केरी तेरेखोल या भागातून संशयित पळून जाऊ नयेत म्हणून नाकाबंदी व वाहनांची कडक तपासणी केली जात होती. त्याचप्रमाणे अन्य हॉटेलांत संशयित आरोपी राहिले काय, याचीही तपासणी पोलिसांनी केली. लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी व्यक्त केला आहे.

महिला कामगारांच्या साह्याने कळणेत रस्ता करण्याचा प्रयत्न

सावंतवाडी, दि.४ (प्रतिनिधी)- कळणे येथील प्रस्तावित मेसर्स मिनरल ऍण्ड मेटल कंपनीने कळणे ग्रामस्थांचा विरोध डावलून सर्व्हे क्र. ५७ मध्ये जाण्यासाठी आज पायवाट तयार केली. महिला आंदोलकांना शह देण्याच्या उद्देशाने रस्ता करण्यासाठी सुमारे ७० हून अधिक महिला कामगार खाण कंपनी प्रशासनाने रोजंदारीसाठी आणले होते. ग्रामस्थांनी यात हस्तक्षेप केल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी कंपनीने यापूर्वीच दिली होती.
अतिवृष्टीत आणि पूरजन्य परिस्थितीत कळणेवासीय शेतीच्या कामांत गुंतलेले असताना कंपनीने ही पायवाट केली. दरम्यान, कंपनीच्या मालकीच्या सर्व्हे नं.५७ मध्ये जाण्यासाठी वेगळी सार्वजनिक पायवाट अस्तित्वात नाही, तर कंपनीने पुन्हा एकदा कळणे ग्रामस्थांच्या जमिनीत अतिक्रमण केल्याचा दावा सर्व्हे नं.५७ व सर्व्हे नं. ६० चे हिस्सेदार आनंद देसाई यांनी केला आहे.
१६ मार्च रोजी खाण कंपनीने सर्व्हे क्र. ६० मध्ये अनधिकृतरीत्या आपले ७० हून अधिक सुरक्षारक्षक घुसवून २.कि.मी चा रस्ता करून घेतला होता. यावेळी जमिनीतील झाडांची तोड करून तब्बल १ लाख ५५ हजार रुपयांची नुकसानी केली होती, त्यासाठी प्रांतअधिकारी नंदकुमार जाधव यांनी कंपनीला दंड ठोठावला आहे.
मात्र, कंपनीने न्यायालयाचे सीमांकन आदेश मिळवण्यापूर्वी सर्व्हे नं. ५७ मधील महसूल प्रशासनाने जप्त केलेली यंत्रसामग्री (डोझर) बाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. या प्रकरणी महसूल प्रशासनाकडे कंपनीने सर्व्हे नं.५७ मध्ये अनधिकृत प्रवेश करून नुकसानी केल्याची तक्रार दाखल करण्याचा निर्णय सर्व्हे नं.५७ चे भागधारकांनी तसेच कळणेवासीयांनी घेतला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कंपनी विरुद्ध कारवाईची एकमुखी मागणी कळणेवासीयांनी केली आहे.
८ जुलै पूर्वी दोषारोपपत्र दाखल होणार
कळणे खाण आंदोलनात १९ मार्च ०९ रोजी खाण कंपनी सुरक्षा रक्षकाच्या अपघाती मृत्युप्रकरणी १६ आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेल्या ३०२ खुनाच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र ८ जुलै ०९ पूर्वी दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १६ पुरुष आंदोलकांवर ३०२ खुनाचा गुन्हा दाखल केला तरी खाण विरोधी आंदोलन महिलांनी समर्थपणे सुरू ठेवलेले आहे. कळणे आंदोलनातील स्त्रीशक्तीला शह देण्यासाठी कंपनीने महिला कामगारांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. . महिलांच्या शक्तीला आव्हान देण्यासाठी या महिला कामगारांना तैनात केल्याने कळणेतील पुरुष आंदोलक पुढे येण्यास धजावणार नाही, अशी शक्कल यावेळी कंपनीने लढवल्याचे दिसून येत आहे.

आता ग्रामीण इस्पितळे "गोमेकॉ' शी जोडणार

- खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव रद्द
- रक्तदानपूर्व "एएनटी'चाचणीही सक्तीची होणार
- ५ ग्रामीण आरोग्य केंद्रात आपत्कालीन विभागांची स्थापना


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)- गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ आता म्हापसा, फोंडा, मडगाव, काणकोण व साखळी इस्पितळांनाही मिळणार आहे. ही सगळे इस्पितळे गोमेकॉशी जोडली जाणार आहेत. राज्यात खाजगी आरोग्य महाविद्यालयांचा विषयही निकालात काढून गोमेकॉत सध्याच्या शंभर विद्यार्थिसंख्येत वाढ करून आणखी शंभर विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी भारतीय आरोग्य मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य आरोग्य सल्लागार मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आरोग्य सल्लागार मंडळाची महत्त्वाची बैठक दोना पावला येथील हॉटेल सिदाद दी गोवा येथे झाली. या बैठकीला गोमेकॉचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल, आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई, आरोग्य सचिव संजीव श्रीवास्तव व समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. राज्यातील आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आरोग्य खात्याने नियोजित कार्यक्रम आखला आहे. येत्या ३१ ऑगस्ट २००९ पर्यंत विविध महत्त्वाचे उपक्रम मार्गी लावण्याचा निर्धार खात्याने केला आहे, असे ते म्हणाले. १४ जून २००८ पासून नवजात अर्भक चाचणी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. एका वर्षांत सुमारे ८ हजार नवजात अर्भकांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत ५३ नवजात अर्भकांत जन्मजात दोष आढळून आले. बहुतेक दोष हे पचनक्रियेशी संबंधित हातळ, त्यांच्यावर वेळीच उपचारही करण्यात आला. या चाचणीमुळे ५३ नवजात अर्भकांचे प्राण वाचवता आले, अशी माहितीही यावेळी श्री. राणे यांनी दिली. अर्भक चाचणीचा हा उपक्रम आता सरकारी व खाजगी इस्पितळांसाठीही सक्तीचा करण्यात येईल.
रक्तदानासाठी आवश्यक "एएनटी' ही रक्तदोष तपासणीची चाचणीही सक्तीची करण्यात येईल. याप्रकरणी जुलै महिन्यात होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात सार्वजनिक आरोग्य कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक सादर केले जाणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले. "ईएमआरआय' ची १०८ रुग्णवाहिका सेवा ही चांगलीच यशस्वी ठरली आहे. आता या सेवेच्या साहाय्यानेच काणकोण, साखळी, चिखली, कुडचडे व कांदोळी येथील आरोग्य केंद्रांवर आपत्कालीन विभाग स्थापन करण्यात येणार आहे. या विभागांमुळे अपघात किंवा हृदयाशी संबंधित आपत्कालीन प्रसंगी प्राथमिक उपचारांची सोय करून रुग्णांना सावध करून नंतर मुख्य इस्पितळात हालवता येणे शक्य होणार आहे. "ईएमआरआय' संस्थेतर्फे विशेष वैद्यकीय प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या ३० विशेष आरोग्य साहाय्यकांना या विभागांवर नेमण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.
म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ सुरू करण्यासाठी सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची गरज आहे व ही नोकरभरती लवकरच केली जाईल, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले. या इस्पितळाच्या व्यवस्थापनासाठी "पीपीपी' अर्थात सार्वजनिक - खाजगी भागीदारीची कोणती पद्धत अवलंबली जावी, याचा निर्णयही लवकरच घेणार असल्याचे ते म्हणाले. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी "नोव्हाडिस्क' या संस्थेशी केलेल्या करारानुसार इन्सुलीनची सोय ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येईल. कासावली येथे रुग्णांची संख्या जास्त असल्याने तेथील घरांत फिरून ही विशेष इन्सुलीन इंजेक्शन दिली जाणार आहे. या कामी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. स्तन कर्करोगाबाबत येथील ग्रामीण भागातही चाचणीची सोय केली जाईल. "बेस्ट फ्रेंड' या दुबईस्थित विश्वस्त संस्थेकडून स्तन कर्करोगाबाबत जागृती करण्यासाठी एक विशेष सीडी काढण्यात आली आहे. ही सीडी स्थानिक भाषेत रूपांतरित करून त्या माध्यमाने या जटिल प्रश्नाबाबत महिलांत जागृती निर्माण करण्यात येणार आहे. सर्व्हायकल कर्करोगाबाबत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी "पाथ' या संस्थेकडे लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. या व्यतिरिक्त बायोमेट्रीक स्मार्ट कार्ड योजना, वैद्यकीय पार्क योजना आदींबाबतही चर्चा करण्यात आली. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध इस्पितळांच्या बांधकामाबाबतची माहिती यावेळी सल्लागार मंडळापुढे ठेवण्यात आली. हे सर्व उपक्रम येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास नेण्यात येईल, असा निश्चयही यावेळी करण्यात आला.

आनंद मंगेश नाईक अपघातात गंभीर जखमी

सावर्डे, दि. ४ (प्रतिनिधी ) : सावर्डे धडे येथे खनिज ट्रक व मारुती व्हॅन यांच्यात झालेल्या भीषण अपघात सुनापरान्तचे सावर्डे प्रतिनिधी आनंद मंगेश नाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. आनंद मंगेश नाईक आपल्या जीए-०९-ए-५५५९ क्रमांकाच्या मारुती व्हॅनने दाबाळहून सावर्डेच्या दिशेने चालले होत तर जीए-०९-यू-५९४४ क्रमांकाचा ट्रक सावर्ड्याहून दाबाळच्या दिशेने जात होता. धडे येथील वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकची जोरदार धडक समोरून येणाऱ्या व्हॅनला बसली. धडक इतकी जोरदार होती की व्हॅनच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला व गाडी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. यावेळी जवळपास असलेल्या नागरिकांनी त्वरित धाव घेतली. आनंद मंगेश नाईक यांना रक्तबंबाळ अवस्थेत गेट्सच्या साह्याने प्रथम कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना ताबडतोब गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.

बांबोळी येथील डॉक्टरांनी त्यांच्या हातापायाला जबर दुखापत झाल्याचे सांगून पायाच्या हाडाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली असून गाडीच्या काचांमुळे चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत. संध्याकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सावर्डे भागातील नागरिक तसेच पत्रकारांनी बांबोळी येथील इस्पितळाकडे धाव घेतली. सदर अपघाताची माहिती मिळताच कुडचडे पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक नीलेश राणे करीत आहेत.
आनंद नाईक यांच्या पत्नी अंगणवाडी शिक्षिका असून त्यांना आंबेऊदक (सावर्डे) येथे कामावर सोडून परतत असता त्यांच्या वाहनाला अपघात झाला.