Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 17 October, 2009


इस्पितळात दाखल करण्यात आलेला गंभीर अवस्थेतील तरूण (छायाः गोवादूत सेवा)

मडगाव येथे ग्रेस चर्चजवळ स्फोटाने उद्ध्वस्त झालेली दुचाकी (छायाः गोवादूत सेवा)

बॉंबस्फोटाने मडगाव हादरले

दोघे गंभीर जखमी, स्फोटक होते स्कूटरीतः ग्रेस चर्च पाठीमागील घटना
मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी): सारे मडगाव आज दिवाळीच्या स्वागतात मग्न असताना व जागोजागी नरकाससुराच्या स्पर्धा रंगत असताना येथील ग्रेस चर्चच्या पाठीमागील रस्त्यावर पार्क केलेल्या एका स्कूटरमध्ये शक्तिशाली स्फोट होऊन दोघे गंभीर जखमी झाले व साऱ्या शहरभर हलकल्लोळ माजला.
रात्री ९-२५ वाजता हा स्फोट वर्दे वालावलकर रोडवर झाला व त्याचा आवाज तेथून १०० ते १२५ मी. अंतरावर नरकासूर स्पर्धा कार्यक्रमास हजर असलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत व आमदार दामू नाईक यांच्या कानावरही पडला. लगेच गडबड माजली व पोलिस फौज दाखल होऊन त्यांनी वर्देवालावलकर रोड बंद करण्यात आला. १०८ रुगणवाहिकेतून जखमींना हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले. शीघ्र कृतीदलाच्या कमांडोंना घटनास्थळी आणण्यात आले. तसेच जादा पोलिस कुमक आणून त्या रस्त्याची नाकेबंदी करण्यात आली. हॉस्पिसियोत जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना बांबोळी येथे "गोमेकॉ'त दाखल करण्यात आले.
पोलिस अधीक्षक ऍलन डिसा व उपअधीक्षक उमेश गावकर हेही तोपर्यंत हॉस्पिसियोत आले. त्यांनी केलेल्या चौकशीत जखमीची नावे योगेश नायक व मालगुंडा पाटील अशी आढळून आली. त्यांंच्या कंबरेखालच्या भागाच्या चिंधड्या उडाल्या आहेत व ते किंचाळत होते. ते मराठी बोलत होते. त्यांच्याकडे अत्तराच्या बाटल्या सापडल्या व पोलिसांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या. ते ज्या पद्धतीने जखमी झाले आहेत त्यावरून ते सदर इटर्नो स्कूटरवर बसलेले असावेत व हा स्फोट झाला असावा असा कयास आहे. स्फोटाची माहिती मिळताच मुख्यमंत्री व आमदार दामू नाईक हे कार्यक्रम अर्धवट सोडून लगेच हॉस्पिसियोत आले.
नंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत या स्फोटासंदर्भात चर्चा केली.या स्फोटाची वार्ता लगेच सर्वत्र पसरली .मडगावातील नरकासूर स्पर्धावरही त्याचा परिणाम झाला. लोकांनी स्फोट झालेल्या ठिकाणी एकच गर्दी केली. त्यामुळे रात्री उशिरा तेथे आणखी पोलिस कुमक तैनात करण्यात आली. त्याशिवाय अग्निशामकदलाची गाडी व रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र स्फोट नेमका कशाचा झाला ते शेवटपर्यंत कळू शकले नाही. पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू आहे एवढीच त्रोटक माहिती दिली. मडगावातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र घबराटीचे व त्याचबरोबर कुतूहलाचे वातावरण दिसून आले.
वाचक, विक्रेते, जाहिरातदार व
हितचिंतकांना दिवाळीनिमित्त
"गोवादूत'च्या हार्दिक शुभेच्छा!
..............
मान्यवरांकडून शुभेच्छा

गोव्याचे राज्यपाल एस.एस.सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा व्यक्त केल्या असून, ही दिवाळी प्रत्येकाच्या जीवनात आनंद व भरभराटीचे दिवस घेऊन येवो, अशी सदिच्छा या मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

एविटाच्या खुन्यांना मुंबईत पकडले दोन्ही मारेकरी सेक्स रॅकेटचे सूत्रधार

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): वेर्णा येथे अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या एविटा रॉड्रिगीस या १६ वर्षीय युवतीच्या खुन्यांना आज गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने मुंबईत ताब्यात घेतले. या खून प्रकरणातील संशयित आरोपी चंद्रकांत तलवार (३५ रा. सांतईनेझ - पणजी) व सायरन रॉड्रिगीस (२० रा. चिंबल) तरुणांना घेऊन पोलिस पथक उद्या शनिवारी सकाळी गोव्यात दाखल होणार आहे. एका ठोस माहितीच्या आधारे वसई येथील एका झोपडपट्टीत छापा टाकून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. या दोघांकडून अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना हाती लागले असून मेरशी, खोर्जुवे आणि सुकूर या चारही खुनांचा छडा त्याद्वारे लागण्याची शक्यता आहे. गोवा पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे आज पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी सांगितले.
एविटाच्या खुनामागे तिच्याच मित्रावर पोलिसांचा संशय होता. त्याचप्रमाणे काही महिन्यापूर्वी तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात आली होती. ही सोनसाखळी परत हवी तर, आपल्याला भेटायला ये, असेही तिला धमकावण्यात येत होते. तसेच एविटा घरातून निघण्यापूर्वी तिच्या मोबाईलवर १० वाजता अनेक दूरध्वनी आले होते. तेव्हापासून ती बरीच गडबडीत होती. त्यानंतर वास्कोला जाण्याचा हट्ट तिने आपल्या आईकडे धरला होता. एविटाला तो दूरध्वनी कोणी केला होता, याचा माग काढत पोलिस या गुन्हेगारांपर्यंत पोहोचल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
एविटाचा खून का...
सायरन हा एविटाला ओळखत होता, मग त्याने एविटाचा खून का आणि कशासाठी केला हा गंभीर प्रश्न सर्वांना पडलेला आहे. यामागे कोणते रॅकेट होते का, एविटा कोणत्या रॅकेटमध्ये फसली होती का, असे अनेक प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडलेले असून खुनी गोव्यात पोहोचताच या सर्व प्रश्नांचा उलगडा होईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
कोण हा चंद्रकांत...!
अनेक प्रकरणांत चंद्रकांत हा पणजी आणि फोंडा पोलिसांना हवा होता. काही महिन्यांपूर्वी माशेल येथे कुविख्यात गुंड स्व. मानशियो याने दागिन्यांच्या एका दुकानावर टाकलेल्या दरोड्यात फोंडा पोलिसांना चंद्रकांत हवा होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचे घर सांतईनेझ येथे असले तरी, तो दक्षिण गोव्यातून गुन्हेगारी कारवायांची सूत्रे हलवत होता, अशी माहिती मिळाली आहे. तसेच मुंबईतून मुली आणून गोव्यात त्यांचा व्यवहार करण्याच्याही धंद्यातही चंद्रकांत होता. यापूर्वी तो मानशियो याला मुली पुरवत होता. दरोडा प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पणजी बस स्थानकासमोर झालेल्या एका वाहन अपघातात मानशियो याचा गेेल्या महिन्यात मृत्यू झाल्याने हा धंदा चंद्रकांत सांभाळत होता. सायरन हा ग्राहक मिळवून त्यांच्यापर्यंत मुली पोहोचवण्याचे काम करत होता. राज्यात छोट्यामोठ्या चोऱ्या करणे तसेच मुली पुरवणे हा त्यांचा मुख्य धंदा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सायरन हाही माशेल दरोडा प्रकरणात जामिनावर सुटला होता.
-----------------------------------------------------------------------
सेक्स रॅकेट..?
मेरशी आणि वेर्णा येथे होरपळलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटली असली तरी, खोर्जुवे आणि सुकूर येथे सापडलेल्या त्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे या दोन्ही महिला मुंबईतील असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोव्यात वेश्याव्यवसायासाठी या महिला आणून नंतर त्यांचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपासकामाची चक्रे फिरवली आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने काढून तिला जाळून मारण्यात आले असावे, ही शक्यतादेखील नाकारता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

'मिंट कॅसिनो'च्या उपाध्यक्षाला अटक

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने आज सकाळी केलेल्या एका कारवाईत "मिंट कॅसिनो'चा उपाध्यक्ष संजय कौशिक (४०) याला मानवी तस्करी कायद्याखाली अटक केली व त्याच्या खोलीतून एका २३ वर्षीय मुलीला ताब्यात घेतले.
या मुलीची मेरशी येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मिंट कॅसिनोचा हा अधिकारी मुली आणून गोव्यात पुरवत असल्याची माहिती मिळाल्याने सीआयडीने आज सकाळी नागाळी येथील एका हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी संशयित कौशिक याच्या खोलीत ही तरुणी सापडली अशी माहिती उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी दिली.
तथापि, या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गृहखात्याचे सचिव सिद्धिविनायक यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी पथकाने मिंट कॅसिनोवर छापा टाकला होता. तेव्हा पोलिसांना त्याठिकाणी काहीही हाती लागले नव्हते. त्यामुळे पोलिस हात हालवत माघारी फिरले होते. बंद असलेल्या कॅसिनोत बेकायदा जुगार चालत असल्याची माहिती मिळाल्याने हा छापा टाकण्यात आला असल्याचे सीआयडीने पत्रकारांना सांगितले होते. तसेच कॅसिनो चालवण्यासाठी सरकारी तिजोरीत पाच कोटी रुपये भरावयाचे शुल्क या कॅसिनोने भरले नसल्याने त्यास सरकारतर्फे नोटिसही बजावली होती.
या घटनेनंतर आज अचानक सकाळी संशयित कौशिक राहात असलेल्या हॉटेलातील खोलीवर छापा टाकून पोलिसांनी तेथून एका तरुणीला ताब्यात घेतल्याने या प्रकरणामागे भलतेच राजकारण शिजत असल्याची चर्चा आज सर्वत्र सुरू होती. त्या तरुणीचा कौशिक याच्याशी कोणताही संबंध प्रस्थापित झाला नसला तरी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कौशिक याला अटक केल्याचे सांगण्यात आले.
तो गोव्यात मुली आणून व्यवसाय करीत होता काय, या दिशेने तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------
मिंट कॅसिनोच्या उपाध्यक्षाला कथित सेक्स रॅकेट प्रकरणात अटक केल्याप्रकरणी असोसिएशन ऑफ ऑफशोअर कॅसिनो (एओसी) व कॅसिनो असोसिएशन ऑफ गोवा (सीएजी)ने तीव्र निषेध केला आहे. सरकारी नियम न पाळल्याच्या कारणास्तव मिंट कॅसिनो बंद आहे. मात्र अशावेळी जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीकडून दाखल केलेल्या तक्रारीमुळे एकूण उद्योगालाच फटका बसल्याचे संघटनेने म्हटले आहे. कॅसिनो संघटना कोणत्याही प्रकारच्या चौकशीला किंवा तपासणीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते नरिंदर पुंज यांनी पत्रकात म्हटले आहे.

कार्यकारी न्यायदंडाधिकारी रोशेल फर्नांडिस अडचणीत

पालिका कर्मचारी व वृत्तछायाचित्रकार
यांच्यावरील हल्ल्याची चौकशी होणार

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : पणजी महानगरपालिकेतर्फे सांतइनेझ येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कार्यकारी न्यायदंडाधिकारी रोशेल फर्नांडिस यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचारी व अभियंते तसेच वृत्तछायाचित्रकार यांच्यावर झालेल्या हल्ल्याची आठ दिवसांत चौकशी करू, असे ठोस आश्वासन उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी दिले आहे.
आज आपल्या सरकारी निवासस्थानी गृहमंत्री रवी नाईक यांनी एका वेगळ्या कारणासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेची संधी साधून पत्रकारांनी त्यांना व उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांना सदर घटनेवरून पेचात पकडले. न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तेथे गेलेले पालिका कर्मचारी व अभियंत्यांना तसेच या घटनेचे वार्तांकनासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांवर तेथील संतप्त जमावाने हल्लाबोल केला. तेव्हा कार्यकारी न्यायदंडाधिकारी व पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली याचा अर्थ काय, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर गृहमंत्री म्हणाले, कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना ताबडतोब हस्तक्षेप करून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश देणे गरजेचे होते. या प्रकरणी पोलिसांपेक्षाही न्यायदंडाधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणे गरजेचे आहे. न्यायदंडाधिकारी हे पद महसूल खात्याच्या अखत्यारीत येते. त्यामुळे जिल्हाधिकारीच याबाबत सांगू शकतील. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन तेथेच उपस्थित होते. त्यामुळे पत्रकारांनी त्यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. सांतइनेझ येथे घडलेल्या प्रकाराचा अहवाल श्रीमती फर्नांडिस यांनी आपणास सादर केला आहे काय, असे विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. प्रत्यक्ष पालिकेचे साहाय्यक अभियंते सचिन आंबे, निरीक्षक पांडुरंग चोडणकर, "जेसीबी' चालक श्यामसुदंर परब व वृत्तछायाचित्रकारांना मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले, कारवाईसाठी वापरण्यात आलेल्या महापालिका वाहनांची तोडफोड करण्यात आली. मुख्य म्हणजे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईतील बेपर्वाईमुळे एका वृद्ध महिलेवर भिंत कोसळली. एवढे घडूनही कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जात नाही ही प्रशासकीय बेशिस्त व बेफिकीरपणा नव्हे काय, असेही पत्रकारांनी विचारले. याप्रकरणी विभागीय न्यायदंडाधिकारी साबाजी शेट्ये यांच्याकडे चौकशी करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. या कारवाईवेळी हजर असलेल्या कार्यकारी न्यायदंडाधिकारी रोशेल फर्नांडिस यांच्याकडून सदर घटनेचा अहवाल मागवून घेऊन आठ दिवसांत संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

केंद्रीय समितीची काणकोणला भेट

आगोंद, दि. १६ (वार्ताहर) : दोन ऑक्टोबर रोजी काणकोणला झालेल्या जलप्रलयामुळे काणकोणवासीयांना बसलेल्या फटक्याने झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निरीक्षण समितीने आज सकाळी काणकोणला भेट दिली.
या केंद्रीय पथकात राजीव सिन्हा, डॉ.अनुपमा बारीक, डॉ. रंगा रेड्डी, दिनेशचंद, वाय.सी.श्रीवास्तव या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, मामलेदार विनायक वळवईकर व अन्य अधिकारी होते. त्यांनी पाहणी पथकाला हानीची माहिती दिली. देळे, मैयक, अर्धफोंड, भाटपाल, सादोळशे, पैंगीण, खोतीगाव येथे सकाळी भेट दिली, तर दुपारी अन्य भागात हे पथक गेले.
केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव आ.पी.नाथ हे या पथकाचे प्रमुख आहेत. त्यांनी काल उत्तर गोव्याच्या काही भागांचा दौरा केला होता. या पथकाच्या अहवालानंतर केंद्राकडून अधिक निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.

Wednesday 14 October, 2009

मोठा पोलिस फौजफाटा उसगाव येथे दाखल

..ग्रामस्थांत चर्चेचा विषय
..आंदोलन शांततेत सुरूच

तिस्क उसगाव, दि.१३ (प्रतिनिधी): उसगाव वड येथे टिप्पर ट्रक मालक संघटनेच्या झेंड्याखाली ट्रक मालकांचे आपल्या मागणीसाठी आंदोलन शांत वातावरण सुरू असताना आज सकाळी ११.३० वाजता अचानक मोठ्या प्रमाणात दोघा पोलिस अधिकाऱ्यांसमवेत मोठा फौजफाटा दाखल झाल्याने ग्रामस्थांत तो चर्चेचा विषय ठरला. यावेळी काही ट्रक मालक उसगाव वड येथे हजर होते. त्यावेळी सेझा खनिज आस्थापनाची खनिज माल वाहतूक काही प्रमाणात सुरू होती.
आज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यत फोंड्याच्या संयुक्त मामलेदार संगीता नाईक या भागात जीपमधून उसगाव तिस्क ते उसगाव बाराजण (वड) पर्यंत सतत फेऱ्या मारत होत्या. सकाळी ११.३० च्या सुमारास अचानक कुळ्याचे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर, फोंड्याचे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर फौजफाटा उसगावात दाखल झाला. वातावरण शांत असताना एवढा फौजफाटा उसगावात कशासाठी तैनात करण्यात आला, असा प्रश्न स्थानिकांना पडला. उसगावच्या शेजारील डिचोली तालुक्यातील पाळी भागात अज्ञातांकडून सेझा खनिज आस्थापनाची खनिज माल वाहतूक करणारे टिप्पर ट्रकांची नासधूस करण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र तिथे पोलिस बंदोबस्त नाही. उसगाव भागात मात्र कोणताच अनुचित प्रकार घडलेला नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करून सरकारी पैशांचा अपव्यय पोलिस खात्याकडून केला जात नाही ना, यावर गृहखात्याने तसेच स्थानिक आमदार तथा राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी विचार करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
सेझा खनिज आस्थापनाची माल वाहतूक सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवावी, असा आदेश न्यायालयानेच दिला आहे. या खनिज आस्थापनाच्या रात्री होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे स्थानिकांची झोपमोड होते. यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहे. यापुढे या परिस्थितीत फरक पडला नाही तर आता अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.कारण खनिजाची वाहतूक करणारे टिप्पर ट्रक चालक बेदरकारपणे वाहने हाकतात. त्याचा स्थानिकांना त्रास होतो.यामुळे वाटसरूंना चालणेही कठीण बनले आहे. या टिप्पर ट्रकांतून क्षमतेपेक्षा जादा माल भरून वाहतूक केली जाते. त्यामुळे उसगावात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होऊ लागले आहे. तथापि, वाहतूक कायदा व नियमांचे पालन न करणाऱ्या या ट्रकांच्या चालकांवर फोंडा, कुळे व डिचोलीतील पोलिस अधिकारी कारवाईच करत नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे. याची दखल गृहमंत्री नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, तसेच पाळीचे आमदार प्रताप गावस यांनी घ्यावी. या लोकप्रतिनिधींनी संबंधित सरकारी यंत्रणेला जाग आणून या भागातील स्थानिकांना न्याय द्यावा. अशी उसगाववासीयांची मागणी आहे.
उसगाव, पाळी भागातील टिपर ट्रक मालकांची सेझा खनिज आस्थापनाच्या खनिज माल वाहतुकीत ट्रक सामावून घ्यावे, या उसगाव,पाळी भागातील ट्रक मालकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सतावणूक न थांबल्यास उद्या 'बस वाहतूक बंद'

उत्तर गोवा खाजगी बस वाहतूक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांची भेट घेतली व विचारपूस केली. यावेळी पर्रीकरांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शविला. (छायाः सचिन आंबडोस्कर)

वाहतूक मंत्र्यांचा राष्ट्रीयीकरणाचा इशारा
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): राज्यातील खाजगी प्रवासी बस वाहतूकदार व वाहतूक खाते यांच्यातील वाद आता चिघळण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी झाली नाही किंवा खाजगी बस वाहतूकदारांची सतावणूक बंद झाली नाही तर गुरुवार १५ रोजी अखिल गोवा खाजगी बस वाहतूक बंद करू, असा इशारा संघटनेने दिला आहे तर खाजगी बस वाहतूकदारांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही तर त्यांचे परवाने रद्द करू त्याचबरोबर विविध मार्गांचे राष्ट्रीयीकरण करू,असे प्रतिआव्हान वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले.
...तर गुरुवार १५ रोजी गोवा बंद
वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराने गाठलेला कळस व प्रवासी बस वाहतूकदारांची खात्याकडून होत असलेली सतावणूक याविरोधात उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. उपोषणाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पणजी ते कळंगुट मार्गावरील खाजगी बसगाड्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी दिली. उद्यापर्यंत काहीही तोडगा निघत नसेल तर गुरुवार १५ रोजी गोव्यातील खाजगी प्रवासी बस वाहतूक बंद करावी लागेल,असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर हे अहंपणाने वागतात. सुमारे चार हजारांच्या आसपास खाजगी बसमालक आहेत. त्यांच्या समस्या व अडचणी ऐकून घेण्यासही ते तयार नाहीत. संघटनेत फूट घालण्यासाठी व बस वाहतूकदारांवर दबाव घालण्यासाठी ते राष्ट्रीयीकरणाचा धाक दाखवत आहेत. त्यांना हिंमत असेल तर त्यांनी हा निर्णय घेऊन दाखवावा,असे आव्हान यावेळी श्री.कळंगुटकर यांनी दिले. राष्ट्रीयीकरण करा व बस मालकांसह, चालक व वाहकांना नोकरीवर घ्या,असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. महाराष्ट्रात कर्जाचा बोजा वाढल्याने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या तोच प्रसंग आता खाजगी बस मालकांवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खाजगी बस वाहतूकदारांवर प्रवाशांची सतावणूक करण्याचा आरोप केला जातो पण प्रत्यक्षात वाहतूक खात्याकडून या बसमालकांची पिळवणूक होते त्याबाबत मात्र वाहतूकमंत्री "ब्र' काढीत नाहीत. "कोंबड्यांची झुंज लावून मजा पाहत बसावे' त्या पद्धतीने आज वाहतूक खाते खाजगी बस वाहतूकदारांचीच आपापसात झुंज लावून त्यांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.याप्रसंगी दक्षिण गोवा खाजगी बस मालकांनीही श्री.ताम्हणकर यांना आपला पाठिंबा दर्शवला व संघटितपणे हा लढा लढण्याचा निर्धारही केला.
आंदोलन थांबवा, अन्यथा मार्गांचे राष्ट्रीयीकरण करू ढवळीकर
उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे काही नेते केवळ आपल्या वैयक्तिक हेव्यादाव्यांचा वापर करून सरकारला व पर्यायाने प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रयत्न करतात. त्यांच्या या बेशिस्तीला व धमकीला सरकार अजिबात ढळणार नाही.हे आंदोलन मागे घेतले नाही तर आंदोलनात सहभागी झालेल्या बस मालकांचे परवाने रद्द करू व प्रसंगी खाजगी बस मालकांची दयेमुळे स्थगित ठेवलेला राष्ट्रीयीकरणाचा विषय निकालात काढू,असा इशारा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला.
आज "कामाक्षी'या आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी वाहतूक खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर,उपसंचालक अशोक भोसले,साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई व इतर अधिकारी हजर होते.वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराबाबत तोडगा काढण्यासाठी आपण संपूर्ण खात्याच्या संगणकीकरणावर भर दिला आहे.त्यासाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूकही करणार असल्याचे ते म्हणाले.अशोक भासले यांच्यावर होत असलेले आरोप हे वैयक्तिक असूयेपोटी होत असून त्यांना दक्षता खात्याने दोषमुक्त केले आहे.प्रल्हाद देसाई हे वाहतूकमंत्र्यांच्यावतीने पैसे मागतात हा आरोपही निव्वळ खोटारडा आहे,असे स्पष्टीकरण श्री.ढवळीकर यांनी यावेळी दिले.
खाजगी बस वाहतूकदारांच्या पोटावर लाथ मारावी लागेल म्हणूनच आपण राष्ट्रीयीकरणाचा विषय बाजूला ठेवला आहे.आता बस वाहतूकदारच जर बेशिस्तीने वागू लागले व वारंवार सरकारला वेठीस धरण्याच्या धमक्या देऊ लागले तर राष्ट्रीयीकरणावर भर देणे भाग पडेल,असा इशारा यावेळी श्री. ढवळीकर यांनी दिला. संघटनेने बंद पुकारल्यास कदंब महामंडळाची मदत घेऊन तसेच प्रसंगी शेजारील राज्यांतून बसगाड्या मागवून प्रवाशांची सोय करू,अशी माहितीही श्री.ढवळीकर यांनी दिली. प्रवाशांकडून खाजगी बस वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी येतात त्याचीही गंभीर दखल घेऊ, असेही यावेळी श्री.ढवळीकर म्हणाले.
------------------------------------------------------------------
पर्रीकरांचा बस वाहतूकदारांना पाठिंबा
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज सुदीप ताम्हणकर यांची भेट घेतली व विचारपूस केली.यावेळी संघटनेतर्फे सुदीप ताम्हणकर यांनी आमरण उपोषणाचा हा निर्णय का घ्यावा लागला याचे कारण पर्रीकरांना कथन केले. वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची यादीच त्यांनी पुराव्यासहित पर्रीकरांसमोर ठेवली. या सर्व प्रकरणांबाबत अभ्यास करू, असे आश्वासन देऊन पर्रीकर यांनी संघटनेला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

राज्यात आणखी दोन महिलांचे खून

वेर्णा, मेरशीनंतर खोर्जुवे व सुकूर येथे सापडले मृतदेह
चारपैकी तीन खून एकाच पद्धतीने!

पणजी, म्हापसा, वास्को, दि. १३ (प्रतिनिधी): क्रूरकर्मा महानंद नाईक याने केलेल्या तब्बल सोळा खुनांचे थरारक प्रकरण ताजे असतानाच, मेरशी व वेर्णानंतर खोर्जुवे आणि सुकूर येथे गेल्या अठ्ठेचाळीस तासांत चार तरुणींचे मृतदेह आढळून आल्याने राज्यात जबरदस्त खळबळ माजली आहे. यापैकी तीन तरुणींचे मृतदेह एकसारख्या पद्धतीने जाळण्यात आले असून यामागे एकाच व्यक्तीचा हात असण्याची शक्यता आहे. सुकूर येथे सापडलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. खुनी व्यक्तीने पूर्वतयारी करूनच हे खून केले असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. या मृतदेहांची अद्याप चिकित्सा करण्यात आली नसल्याने मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, या भयंकर खुनमालिकेने पोलिसांबरोबर जनतेचीही झोप उडवली आहे. त्यामुळे हे खून म्हणजे पोलिस खात्यासाठी आव्हान ठरले आहेत.
उद्या बुधवारी सकाळी "गोमेकॉती'ल डॉक्टरांचे खास पथक या या मृतदेहांची चिकित्सा करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, वेर्णा येथे काल रात्री सापडलेला "तो' मृतदेह ताळगाव येथून बेपत्ता असलेली १६ वर्षीय एविटा रॉड्रिगीस हिचा असल्याचे सिद्ध झाले आहे. आज सकाळी तिची आई सपना रॉड्रिगीस हिने मृतदेहाची ओळख पटवली.
वरील चार ठिकाणी मिळालेले महिलांचे मृतदेह एकसारख्या पद्धतीने जाळण्यात आले आहेत.
"सीरियल किलर' महानंद नाईक याच्यानंतर आता या पाच तरुणींचे मृतदेह सापडल्याने पुन्हा एकदा गोवेकरांची झोप उडाली आहे. या प्रकारामुळे राज्यात महिला किती सुरक्षित आहेत, याभोवतीच प्रश्नचिन्ह लागले आहे.
हे "सीरियल किलर'चे कृत्य असू शकते; तथापि, या खुनामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसल्याने त्याबाबत एवढ्यातच ठोस भाष्य करणे कठीण आहे, असे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काल सकाळी मेरशी येथे एका अज्ञात तरुणीचा जाळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना ताजी असताना आज सकाळी खोर्जुवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर असलेल्या एका झुडपात अर्धवट जाळलेल्या अवस्थेत २५ ते ३० वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचा पंचनामा करून म्हापसा पोलिस स्थानकावर पोहोचतात न पोहोचतात तोच रात्री सुकूर पर्वरी येथील एका झुडपात आणखी एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याचा दूरध्वनी आला. त्यामुळे ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी सदर मृतदेह चिकित्सेसाठी "गोमेकॉ'मध्ये पाठवून दिला.
खोर्जुवेतील 'ती' नवविवाहित?
खुर्साचीवाडी मरड खोर्जुवे येथे रस्त्यापासून ५ मीटर अंतरावर २५ ते ३० वयोगटातील तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर पिवळा चुडीदार असून हातावर आणि पायावर मेंदी घातली आहे. त्याचप्रमाणे "आयब्रो ट्रीम' केल्या असल्याने तो नवविवाहितेचा मृतदेह असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर तरुणीच्या एका हातात दोन बांगड्या तर दुसऱ्या हातात एक बांगडी आहे. तसेच पायात चांदीचे पैंजण असून दोन्ही पायांत जोडवी असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.
या तरुणीची उंची ५.२ इंच आहे. खून करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असून तिच्या शरीराचा काही भाग होरपळला आहे. शिवाय मृतदेहावर दोन ठिकाणी चपला सापडल्या आहेत. त्यामुळे खून करणारी व्यक्ती विकृत असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह सापडला तेथे सनफ्लॉवर ब्रॅंडची काड्यापेटी (मॅच बॉक्स) पोलिसांना सापडली आहे. यावेळी श्वान पथकाची मदत घेतली असता त्याचा फारसा फायदा झाला नाही.
सुकूर येथेही मृतदेह
दरम्यान, रात्री ७ वाजता खैरा सुकूर येथे सरकारी विद्यालयाच्या समोरील दाट झाडीत अज्ञात तरुणीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळाला. खैरे सुकूर येथे निर्जनस्थळी नेऊन सरकारी शाळेतील आवारात रक्ताचे डाग दिसत असल्याने तिचा त्याच ठिकाणी खून करून मृतदेह दाट झाडीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्र झाल्याने आणि घटनास्थळी विजेची सोय नसल्याने पोलिसांच्या तपासकामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी "गोमेकॉ'मध्ये पाठवण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उपअधीक्षक सेमी तावारीस, म्हापशाचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई, उपनिरीक्षक विजय राणे घटनास्थळी दाखल झाले होते.

वास्कोहून एविटा परतलीच नाही!

पणजी, दि. १३ (प्रीतेश देसाई): वास्को येथे परीक्षा केंद्र पाहण्यासाठी आपल्या मैत्रिणीबरोबर घरून निघालेली एविटा रोड्रिगीस पुन्हा घरी परतलीच नाही. "आम्ही तिला कुठेच जायला देत नव्हतो. परीक्षा केंद्र पाहण्यासाठी जाऊया म्हणून व्हायलट नावाची तिची मैत्रीण मागे लागली होती. त्यामुळे दि. ११ रोजी ती ११.३० वाजता तिच्याबरोबर घरून निघाली होती, अशी माहिती एविटाची आजी लीलावती शांताराम नाईक हिने दिली. सातवीला नापास झाल्याने ती घरीच राहत होती. त्यामुळे तिच्या आजोबाने गेल्यावर्षी खुल्या विद्यालयात तिला दाखल केले होते. त्याची परीक्षा उद्या दि. १४ ऑक्टोबर रोजी वास्को येथे होणार होती. त्यामुळे ती ते पाहण्यासाठी म्हणून मैत्रिणीबरोबर गेली होती.
दि. ११ रोजी रात्री उशिरापर्यंत एविटा घरी परतली नसल्याने तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. परंतु, तो बंद असल्याने तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिची आई सपना रोड्रिगीस हिने व्हायलट हिच्याशी मोबाईल संपर्क साधला. यावेळी ती घरी जायला निघाली असून थोड्या वेळात पोचेल असे तिने सांगितले. परंतु मध्यरात्रीपर्यंत परतली नसल्याने तिने पुन्हा व्हायलट हिच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तोही बंद मिळाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा व्हायलट हिला दूरध्वनी करून एविटा हिच्याविषयी चौकशी केली असता, आपल्याला काहीही माहिती नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे एविटा बेपत्ता झाल्याची पोलिस तक्रार पणजी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली.
पोलिस तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी व्हायलट हिची चौकशी केली असता त्यादिवशी व्हायलट ही वास्को येथे गेलीच नाही. ती संपूर्ण दिवस आपल्या वडिलाबरोबर होती, असे तपासात उघड झाले असल्याचे पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले. व्हायलट हिच्याबरोबर जाते म्हणून निघालेली एविटा मग कोणासोबत गेली, घरून निघण्यापूर्वी एविटाला मोबाईलवर दूरध्वनी आला होता. तो दूरध्वनी कोणाचा होता. याचा तपास घेणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. मृतदेह मिळाला त्याठिकाणी तिचा मोबाईलही मिळालेला नाही.
बादलीभाट करंझाळे ताळगाव येथे काही वर्षापूर्वी युसाफ रोड्रिगीस व सपना नाईक यांचा विवाह झाला होता. त्यानंतर एविटा ही एकुलती एक मुलगी त्यांच्या घरी जन्माला आली होती. सध्या युसाफ हा घरी राहत नसल्याने एविटा ही आजीच्या घरी राहत होती. तर, आई सपना नोकरीला जाऊन तिचे पालन पोषण करीत होती.
----------------------------------------------------------------
त्या तरुणाची चौकशी करण्याची मागणी
सहा महिन्यापूर्वी ताळगाव येथे एवीटा हिच्या गळ्यातील सोनसाखळी मेरशी येथील एका तरुणाने हिसकावून घेतली होती. त्यानंतर तो व्यक्ती एविटा हिच्या मोबाईलवर संपर्क साधून सोनसाखळी परत हवी तर, आपल्याला भेटायला ये, म्हणून धमकावत होता. त्यामुळे तिने तो मोबाईल नंबर बदलून दुसरा नंबर घेतला होता, असे तिच्या आजीने सांगितले. ही माहिती तिच्या काकाला मिळाल्याने त्याने मेरशी येथील त्या तरुणाच्या घरी जाऊन सोनसाखळीची परत करण्याची मागणी केली होती. तो तरुण गुंडगिरी करणारा असून त्याचीही चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी तिच्या काकाने केली आहे.

राजीनामा देऊ करणारे क्रीडामंत्री कुठायत?

आमदार पार्सेकर यांचा खोचक सवाल
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीच्या जागेत अडीच हजारांपेक्षा जास्त झाडे असल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे विधानसभा अधिवेशनात जाहीर आव्हान देणारे क्रीडामंत्री बाबू आजगावकर आता तोंडघशी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीपूर्वीपासून क्रीडा खात्यातर्फे सुरू करण्यात आलेले या जमिनीचे सर्वेक्षण अद्यापही सुरू असून तेथील झाडांची मोजणी करून या अधिकाऱ्यांची दमछाक झाली आहे. मात्र आतापर्यंत केवळ २५ टक्केच झाडांची मोजणी झाली असल्याने हा आकडा दहा हजारांचा पल्ला पार करणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या विषयाला पुन्हा हात घातला आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात आपण वारंवार धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीच्या जागेबाबत सत्यस्थिती क्रीडामंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. क्रीडामंत्री मात्र काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी काहीही आधार नसताना आपला दावा फेटाळून लावला होता. क्रीडानगरीसाठी नियोजित केलेल्या ठिकाणी किमान दहा हजार विविध प्रकारची झाडे आहेत, असा दावा आपण केला होता. क्रीडामंत्री आजगावकर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. एवढेच नव्हे तर या ठिकाणी अडीच हजारांहून जास्त झाडे असल्याचे स्पष्ट झाले तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी गर्जनाही त्यांनी सभागृहात केली होती. आमदार पार्सेकर यांनी त्या गर्जनेची आठवण करून देताना राजीनाम्याची भाषा करणारे क्रीडामंत्री आता कुठे गेले,असा खोचक सवाल केला आहे.
क्रीडाखात्यातर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणात झाडांचे मोजमाप करून खात्याचे अधिकारी आताच थकले आहेत. त्यामुळे तेथील झाडांच्या संख्येबाबत क्रीडामंत्र्यांनीच स्पष्टीकरण देणेच उचित ठरेल, असा टोलाही आमदार पार्सेकर यांनी हाणला.
आपल्या शेतजमिनी व बागायतींच्या रक्षणासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी टाहो फोडून सरकारला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला; पण बहिरेपणाचा आव आणून सरकारने त्यांच्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. यासंदर्भात नेमके खरे कोण व खोटे कोण हे आता क्रीडामंत्र्यांनीच सांगितलेले बरे, असे खोचक उद्गारही आमदार पार्सेकर यांनी काढले.

Tuesday 13 October, 2009

ट्कमालकांच्या मागण्या डावलून पोलिस संरक्षणात खनिज वाहतूक

विरोध करणाऱ्या १६० ट्रकमालकांना अटक

तिस्क उसगाव, दि.१२ (प्रतिनिधी)- " सेझा खनिज आस्थापनाने माल वाहतुकीत आमचे टिपर ट्रक सामावून घ्यावेत.' या मागणीसाठी गेले आठ दिवस सुरू उसगाव वड येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आज वेगळे वळण मिळाले.आज सकाळी सेझा खनिज आस्थापनाच्या वाहतूक ठेकेदारांमार्फत कोडली ते आमोणा खनिज माल वाहतूक करणारे टिपर ट्रक उसगाव वड येथे अडविण्यात आले. टिपर ट्रक मालक आंदोलनकर्त्याची मागणी पूर्ण न करताच पोलिस बंदोबस्तात खनिज माल वाहतूक सुरू करण्यात आल्याने आंदोलक टिपर ट्रक मालकांनी स्वतःला अटक करून घेतली.
आज सकाळी १०.३० वाजता पोलीस बंदोबस्तात सेझा खनिज आस्थापनाच्या वाहतूक ठेकेदारांमार्फत कोडली ते आमोणा खनिज माल वाहतूक करणारे टिपर ट्रक उसगाव वड येथे पोचताच आंदोलनकर्त्या टिपर ट्रक मालकांनी ते अडविले. मागणी पूर्ण झाल्याशिवाय सेझा खनिज आस्थापनाची खनिज माल वाहतूक उसगावमार्गे करू दिली जाणार नाही, असा हेका त्यांनी धरला. यावेळी कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू तिथे दाखल झाले. त्यांनी खनिज माल वाहतूक ठेकेदारांचा प्रस्ताव आंदोलनकर्त्या ट्रक मालकांसामोर मांडला. खनिज माल वाहतूक ठेकेदारामार्फत खनिज माल पणसुले बगलमार्ग येथे खाली करण्यात येईल. दर दिवशी गेल्या वर्षी पेक्षा दोन हजार टन जादा खनिज माल तिथे खाली करण्यात येईल. गेल्या वर्षी ८ हजार टन माल तिथे खाली करण्यात येत होता. यावर्षी १० हजार टन खनिज माल दर दिवशी तिथे खाली करण्यात येईल. गेल्या वर्षी प्रती टन ७८ रुपये दिले जायचे.त्यात यंदा २ रुपये वाढ करून ८० रुपये प्रति टन दिले जाईल. हा प्रस्ताव आंदोलनकर्त्या ट्रक मालकांना मान्य झाला नाही. या संदर्भात नंतर फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू, तसेच उसगाव ट्रक मालक संघटनेचे सचिव संतोष नाईक व इतर पदाधिकारी गेले होते. या बैठकीत काहीच निर्णय होऊ शकला नाही.
दुपारी १.१५ वाजता फोंडा उपजिल्हाधिकारी जयंत तारी, फोंडा संयुक्त मामलेदार संगीता नाईक, फोंडा पोलिस उपअधीक्षक सेराफीन डायस, फोंडा पोलिस निरीक्षक सी.एल.पाटील, कुळे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी उसगाव वड येथे येऊन आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. १३ ऑक्टोबर रोजी पुन्हा या संदर्भात फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.१६ ऑक्टोबर रोजी पणजी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात सेझा खनिज आस्थापनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. आंदोलनकर्त्या ट्रक मालकांच्या मागणीवर यावेळी तोडगा काढण्यात येईल. आज सेझा खनिज आस्थापनाचा खनिज माल घेऊन आलेल्या टिपर ट्रकांना वाहतूक करू द्या, अशी विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते टिपर ट्रक मालक खवळले. मागणी पूर्ण केल्या शिवाय कोणत्याही परिस्थितीत सेझा खनिज आस्थापनाची खनिज माल वाहतूक करू दिली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ट्रक मालकांनी यावेळी दिला. पोलिस बंदोबस्तात खनिज माल वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न यावेळी पोलिस उपअधीक्षक सेराफिन डायस यांनी केला. त्यावेळी सर्व आंदोलनकर्त्या टिपर ट्रक मालकांनी स्वतःला अटक करवून घेतली.
उसगाव टिपर ट्रक मालक संघटनेचा बॅर्नर, त्यांच्या चार प्लॅस्टिक खुर्च्या, वाळूत लपवून ठेवलेले बांबूचे २५ दांडे पोलिसांनी जप्त केले. सेझा खनिज आस्थापनाच्या खनिज मालवाहू टिपर ट्रकांनी उसगाव पूल पार केल्यानंतर पोलीस फौजफाटा तेथून हालविण्यात आला.
अटक करवून घेतलेल्या १६० टिपर ट्रक मालकांना फर्मागुडी पोलिस स्थानकावर रीतसर १५१ कलामाखाली अटक करण्यात आली. नंतर सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
आंदोलनकर्त्या ट्रक मालकांची मागणी पूर्ण होईपर्यत कोणत्याही परिस्थिती सेझा खनिज आस्थापनेची उसगाव मार्गे कोडली ते आमोणा खनिज माल वाहतूक होऊ द्यायची नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. आज फक्त फोंडा उपजिल्हाधिकारी जयंत तारी यांच्या विनंतीला मान (आदर ) देऊन खनिज माल वाहतूक ट्रक सोडण्यात आले आहेत. सदर खनिज माल वाहतूक करणारे टिपर ट्रक कोणत्याही नियमाचे पालन करीत नाहीत. रात्रीच्या वेळी ही खनिज माल वाहतूक करीत असल्याने या भागातील ग्रामस्थांची झोपमोड होते. १० टनापेक्षा जादा खनिज माल वाहतूक सदर टिपर ट्रकांमधून केली जात असल्याने उसगाव भागात धूळ प्रदूषण होते. या संदर्भात आता न्यायालयात याचिका सादर करण्यात येणार आहे,अशी माहिती संबंधित ट्रक मालकांनी आज दिली आहे. १७ ऑक्टोबरपर्यत ट्रक मालकांच्या मागणीवर तोडगा न निघाल्यास शांततेच्या मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन अधिक चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत.
कोडली दाभाळ भागातून पंच सदस्य व ग्रामस्थही संघर्षाच्या तयारीने उसगाव येथे आले होते. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष टळला.

...तर खाजगी बस वाहतूक बंद !


सुदीप ताम्हणकर यांचे आमरण उपोषण सुरू


पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे वाहतूक खात्यासमोर ठेवलेल्या मागण्यांबाबत उद्या दुपारपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही तर संध्याकाळी पणजी ते कळंगुट मार्गावरील खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात येईल. तेवढे करूनही सरकारला जाग येत नसेल तर गोवा बंदची हाक देणे अपरिहार्य ठरेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी दिला.
राज्य वाहतूक खात्यातील बोकाळलेला भ्रष्टाचार, खात्यातील अधिकाऱ्यांमार्फत खाजगी बसमालकांना मिळणारी हीन वागणूक, गैरकारभाराबाबत पुराव्यासहित दाखल केलेल्या तक्रारींकडे होणारी डोळेझाक, संघटनेच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आदी अनेक मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी जुन्ता हाऊस मधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर आजपासून आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली. उत्तर गोव्यातील बहुसंख्य खाजगी बसमालकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करून सरकारला जागे करण्याचा हा उपाय हाती घेतला आहे. महात्मा गांधींच्या जयंतीदिनी त्यांची महती सांगणारी मोठमोठी भाषणे ठोकणाऱ्या या नेत्यांना त्यांची कितपत चाड हे आता लवकरच कळेल,असा टोलाही यावेळी श्री.ताम्हणकर यांनी हाणला.
दरम्यान, संघटनेतर्फे वाहतूक खात्यासमोर ठेवलेल्या मागण्यांत खात्यासाठी पूर्णवेळ संचालकाची नेमणूक करणे, वाहतूक खात्यातील साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई यांच्यावर कारवाई करणे, "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट रद्द करणे, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासाठीचे दर कमी करणे, प्रवासी बसगाड्यांना रेडियम टेप्स बसविण्याची सक्ती मागे घेणे, उपसंचालक अशोक भोसले, श्री. कुंडईकर यांच्यावर कारवाई करणे आदींचा समावेश आहे. सरकारकडून या मागण्यांबाबत वेळोवेळी चालढकल केली जात असल्याने त्याचा निषेध म्हणूनच आपण उपोषणाला बसल्याचे श्री. ताम्हणकर म्हणाले.
वाहतूक खात्याला पूर्णवेळ संचालकांची गरज आहे. केपे, मडगाव (नोंदणी विभाग), फोंडा आणि मडगाव (अंमलबजावणी) साठी पूर्णवेळ साहाय्यक संचालकांची आवश्यकता आहे. यासंबंधी वारंवार वाहतूक खात्याला व मंत्र्यांना निवेदने सादर करुनही कुणी लक्ष देण्यास तयार नाही. सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराबाबत अनेकजण बोलतात पण इथे भ्रष्टाचार व गैरकारभाराचे पुरावे असूनही कारवाई होत नाही.न्यायालयात जाणे हे सामान्य लोकांना परवडणारे नाही. सरकारी पातळीवर या तक्रारींची दखल घेऊन कारवाई होण्याची गरज आहे.वाहतूक खात्यात कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालतो याची प्रत्यक्ष माहिती हवी असेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे माहिती हक्क कायद्याअंतर्गत मिळवलेली सर्व कागदपत्रे आहेत, असेही ते म्हणाले.यावेळी महेश नायक,ऍड.सुभाष सावंत आदींनी श्री.ताम्हणकर यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सतावणूक
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सतावणूक करण्याचा डाव वाहतूक अधिकाऱ्यांनी सुरुवात केला आहे.संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांच्या गाड्या पणजी ते कळंगुट मार्गावर धावतात.तिथे कुणालाही विश्वासत न घेता एका नव्या बस मालकाला तात्पुरता परवाना दिला आहे.तसेच इतर काही मार्गावरही असाच प्रकार घडला आहे. एकीकडे तात्पुरता परवाना देण्यास नकार देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्या मर्जीतील लोकांना लगेच हा परवाना दिला जातो हे कसे काय, उद्यापर्यंत हा परवाना रद्द करण्यात आला नाही तर या मार्गावरील बसगाड्या बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

अन्यायग्रस्त गाडेवाल्यांनी घेतला मूळ जागेचा ताबा


स्थलांतराचा निषेध


पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - पणजीतील गाडेवाल्यांचे स्थलांतर नवीन बाजार संकुलात करून महापालिकेने या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली आहे. नव्या जागेत या गाडेवाल्यांना काहीही व्यवसाय होत नाही, त्यामुळे त्यांच्यासमोर कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला असून महापालिकेच्या या जुलमी निर्णयाच्या निषेधार्थ त्यांनी आज आपल्या मूळ ठिकाणी सिने नॅशनलसमोरील फुटपाथवर उघड्यावर वस्तू विक्री करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
पणजीत पोर्तुगिजकाळापासून विविध ठिकाणी असलेल्या गाडेवाल्यांना महापालिकेने अलीकडेच गेल्या फेब्रुवारी महिन्यात नव्या बाजारसंकुलात स्थलांतर केले.या ठिकाणी थेट तिसऱ्या मजल्यावर या गाडेवाल्यांची सोय करण्यात आली परंतु याठिकाणी त्यांना काहीही व्यवसाय होत नसल्याची त्यांची तक्रार आहे.मुळात बाजारात खालच्या मजल्यावरच सगळे सामान ग्राहकांना मिळते तर ते ग्राहक तिसऱ्या मजल्यावर कशाला येतील,असा सवाल त्यांनी केला.सुरुवातीला महापालिकेने त्यांना खाली जागा देण्याचे आश्वासन दिले होते व मोठी दुकाने दाखवली होती परंतु प्रत्यक्षात तिसऱ्या मजल्यावर एका दुकानाचे दोन भाग करून या गाडेवाल्यांना फसवण्यात आले, अशी टीकाही त्यांनी केली.या गाड्यांची सोडत काढतानाही गाडेवाल्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोपही करण्यात आला. गेले नऊ महिने व्यवसायासाठी धडपडणाऱ्या या गाडेवाल्यांचा विश्वास ढळला आहे. काही गाडेवाल्यांनी रोजंदारीवर जाण्यास सुरुवात केली आहे तर काही आपल्या नशिबाला दोष देत रडत आहेत.आता या अन्यायाविरोधात रस्त्यावर येणे भाग असून त्यामुळेच या निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.जो पर्यंत सरकार दखल घेत नाही तोपर्यंत हा निषेध सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गाडेवाल्यांसाठी जाहीर केलेली आर्थिक साहाय्याची योजनाही फुसका बार ठरला आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडे कैफियत मांडली असून त्यांनीही या गाडेवाल्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यमान महापालिकेतील सत्ताधारी मंडळ हे ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे आहे, त्यामुळे आता या गाडेवाल्यांना केवळ तेच न्याय देऊ शकतात,असा विश्वास व्यक्त करून त्यांच्यासमोर मागण्या ठेवण्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित गाडेवाल्यांत राजू देवगी,धना नाईक,प्रसाद नाईक,राजेश सावंत,रामा शिरोडकर,गजानन आमोणकर,सुरेश नाईक,शेख सादीक आदी हजर होते.

काणकोण मूत्रपिंड संकटावर आयुर्वेद उपचार शक्य


डॉ. वैद्यचुडामणी रघुवीर भिडे यांचा विश्वास


पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)-काणकोण भागातील जादातर लोकांना मूत्रपिंडाचा त्रास होतो हे आता राज्य सरकारच्या सर्वेक्षणातही सिद्ध झाले आहे व त्यामुळे त्याबाबत गंभीरपणे विचार व्हायला हवा. या संकटावर आयुर्वेदाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मात करता येणे शक्य आहे, असा विश्वास डॉ.वैद्यचुडामणी रघुवीर पां.भिडे यांनी व्यक्त केला. सरकार किंवा एखाद्या स्वयंसेवी संघटनेची त्यासाठी तयारी असल्यास आपण याबाबत पुढाकार घेण्यास राजी आहोत,असेही ते म्हणाले.
गोवा विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आयुर्वेद परिषदेसाठी उपस्थित राहिलेले डॉ.वैद्यचुडामणी रघुविर भिडे यांनी अलीकडेच काणकोण भागाला भेट दिली. या परिषदेवेळी झालेल्या चर्चेत सरकारी आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ.राजेंद्र तांबा यांनी काणकोणातील मूत्रपिंडाच्या विषयावर सविस्तर माहिती दिली. या परिषदेत आयुर्वेद व एलोपथी अशा दोन्ही क्षेत्रातील डॉक्टरांनी एकमेकांशी संवाद साधल्याने याविषयावर सविस्तर चर्चा झाली.डॉ.भिडे यांनी डॉ.तांबा व डॉ.दिवाकर वेळीप यांच्या सोबत या भागात भेट दिली व अनेक रुग्णांची तपासणी केली. या तपासणीत मूत्रपिंड रुग्णांची भयानकस्थिती त्यांच्या लक्षात आली. हा विषय या लोकांसाठी केवळ आरोग्याशी संबंधित राहिला नाही तर तो एक सामाजिक विषय बनला आहे. सरकारने अलीकडेच या रुग्णांचा "डायलेसीस'चा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे ही स्तुत्य गोष्ट आहे पण त्यासाठी या रुग्णांना इस्पितळात जावे लागते. औषधांचा खर्च येतो. साधारणतः एका रुग्णाला दिवसाकाठी १४० रुपयांचा खर्च येतो,असेही पाहणीत आल्याचे ते म्हणाले. मूत्रपिंडाचा त्रास वाढल्यानंतर रुग्णाला डायलेसीसचा आधार घ्यावा लागतो हे खरे पण नव्या लोकांना या आजाराची लागण होणार नाही, यासाठी सरकारकडे काहीही उपाययोजना नाही.
आयुर्वेद हे अलीकडच्या काळात सर्वमान्य व एक परिपूर्ण आरोग्यशास्त्र आहे हे सर्वांनी मान्य केले आहे.या शास्त्राच्या आधारावर या संकटावर मात करणे शक्य आहे. या आजाराचा नव्यानेच त्रास सुरू झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यास ते या संकटापासून वाचू शकतात.या औषधांचा खर्चही कमी असेल.साधारणतः दिवसाला ३० ते ४० रुपये या प्रमाणे औषधांचा खर्च असून किमान चार ते पाच महिन्यांचा हा औषधांचा कोर्स पूर्ण केल्यास त्याचा लाभ अनेकांना मिळेल,असा विश्वास यावेळी डॉ.भिडे यांनी दिला. सरकार "डायलेसीस'वर खर्च करतेच पण त्यापेक्षा कमी प्रमाणात खर्च करून या लोकांवर आयुर्वेद उपचाराची संधी त्यांना देत असेल तर त्यासाठी पुढाकार घेता येईल,असेही ते म्हणाले.
सगळीकडे उपचार घेऊन झाल्यानंतरच लोक अखेर आयुर्वेद वैद्याकडे येतात हे खरे तर या शास्त्राचे दुर्भाग्य. "ऍलोपथी' केवळ रोगावर तात्पुरती मात करतो पण आयुर्वेदाव्दारे दोषांचे निराकरण होतेच व शरीरस्वास्थ पूर्ववत होण्यासही मदत होते.काणकोणवासियांना आयुर्वेदाचे वरदान मिळू शकेल याची आपल्याला पूर्ण खात्री आहे पण त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे शेवटी ते म्हणाले.

मेरशी येथे सापडला

महिलेचा मृतदेह खुनाची शक्यता
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - वयलोवाडो मेरशी येथे २५ ते ३० वयोगटातील एका बिगरगोमंतकीय महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून सदर प्रकार खुनाचा असल्याची शक्यता जुने गोवे पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मृतदेहाचे हात वरच्या बाजूला उचललेल्या स्थितीत घट्ट झालेले असल्याने चोवीस तासांपूर्वी खून करून मृतदेह त्याठिकाणी आणून तो जाळण्याचा प्रयत्न केल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. झरीकडे वयलोवाडे येथे मृतदेह असल्याची माहिती आज सकाळी मेरशीच्या सरपंचांना मिळाल्यानंतर पोलिस स्थानकात तक्रार दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून दिला आहे. मृतदेह मिळालेल्या घटनास्थळावरून पोलिसांनी एक टर्पटांयनची बाटली जप्त केली असून यातील द्रव्य वापरून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी पोलिसांनी खुन्याचा माघ काढण्यासाठी श्वान पथकाचा वापर केला असता त्याचा अधिक उपयोग झाला नाही. ठसे तज्ज्ञांनी त्या बाटलीवर उमटलेल्या ठश्यांचे नमुनेही गोळा केला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलिस सध्या ही महिला कोण, याचाच शोध घेत आहेत.
झरीकडे मेरशी येथे हा रस्ता संपतो. रस्त्याच्या सुमारे ५ मीटर अंतरावर हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या शरीरावर वार केल्याच्या किंवा खरचटलेल्या कोणत्याही जखमा प्रथमदर्शनी दिसत नसल्याने खून करून वाहनातून हे प्रेत याठिकाणी आणून टाकले असावे. तसेच जमिनीवर मृतदेह ओढत नेल्याच्याही खुणा दिसत असल्याने वाहनातून हा मृतदेह येथे आणल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या महिलेच्या अंगावर मोरपिशी रंगाचा साडी व ब्लाऊज आहे. तसेच त्याच रंगाच्या हातात बांगड्या आहेत. हातातील एकही बांगडी फुटलेली नाही. त्या महिलेच्या तोंडावर आणि पोटाखालील भाग अधिक प्रमाणात जळलेला आहे. त्यामुळे चेहरा एकदम विद्रूप झाला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आगशी, जुने गोवे, पणजी तसेच पर्वरी या भागातील महिला बेपत्ता आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याविषयीचा अधिक तपास जुने गोवे पोलिस स्थानकाचा तात्पुरता ताबा सांभाळणारे आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे करीत आहे.

Monday 12 October, 2009

खाणींना थारा न देता कोकणचे सौंदर्य जपा

प्रचारसभेत पर्रीकरांचे आवाहन

सावंतवाडी, दि. ११ (प्रतिनिधी) : मायनिंग म्हणजे एका सुंदर तरुणीच्या चेहऱ्यावर फोड यावा, तसे आहे. गोमंतकीयांनी जी चूक केली ती चूक इथे करू नका, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार शिवराम दळवी यांना विजयी करा, असे आवाहन गोवा राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. ते सावंतवाडी गांधीचौक येथील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवराम दळवी यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत संबोधन करत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार एकनाथ ठाकूर, आमदार परशुराम उपरकर, किरण पावसकर, जिल्हा प्रमुख रमेश गावकर, उपजिल्हाप्रमुख अरुण सावंत, माजी नगरसेवक के.पी. नाईक, दोडामार्ग तालुका संपर्क प्रमुख प्रकाश रेडकर सावंतवाडी संपर्क प्रमुख राजू नाईक, मायनिंग व औष्णिक चलेजाव फोरमचेे निमंत्रक डॉ. जयंत परूळेकर, नकुल पासकर, तालुका प्रमुख अजित सावंत, एकनाथ नाडकर्णी, महिला आघाडी प्रमुख नेहा परब, स्मिता सोनावणे आदी उपस्थित होते.
पर्रीकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजलेल्या राडा संस्कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले इथे राडा संस्कृती आली तर पर्यटक कसा काय येणार? गोव्यापेक्षाही सुंदर सिंधुदुर्ग जिल्हा असून मला त्याचा हेवा वाटतो, असे ते म्हणाले. मायनिंगचे दुष्परिणाम हे आमच्या गोव्यातील सांगे, केपे, सत्तरी व डिचोली या तालुक्यांत येऊन पहावे, असेही त्यांनी सांगितले.
आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवराम दळवी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या आरोपाचा समाचार घेतला. दीपक केसरकर यांच्या प्रत्येक प्रश्नाला येत्या २२ तारखेनंतर समोरासमोर येऊन उत्तर देण्याचा इशारा दळवी यांनी दीपक केसरकर यांचे नाव न घेता त्यांना दिला. मायनिंग कंपन्यांशी असलेल्या संबंधाबाबत केसरकर यांच्यावर चौफेर टीका करताना दळवी म्हणाले, रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत एकही मायनिंग प्रकल्प या जिल्ह्यात होऊ देणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी नारायण राणे व केसरकर यांच्यावर शरसंधान केले. यावेळी आमदार किरण पावसकर यांनी दळवी यांना विजयी करून विधानसभेवर पाठवा, असे आवाहन केले.
मायनिंग दलालांना कायमची अद्दल घडवा, असे आवाहन आमदार परशुराम उपरकर यांनी केले. को, ऑप. बॅंकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप टोपले यांनी केले. तर आभार बांदा सरपंच तथा भाजप तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण काणेकर यांनी केले.यावेळी खचाखच भरलेल्या गांधीचौकात जाहीर सभा सुरू असताना पाऊस पडला. परंतु तरीही महिला व शिवसैनिक उठून गेले नाहीत.

लेखनात गुणात्मक वाढ व्हावी - विद्या बाळ

महिला साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) - लेखकांच्या संख्येने वाढ होत आहे. मात्र, लिखाणात गुणात्मक वाढ झालेली दिसत नाही, कसदार साहित्य निर्मितीसाठी वाचन, मनन आणि चिंतनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक विद्या बाळ यांनी आज दुपारी येथे केले आहे.
खडपाबांध फोंडा येथील श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेने गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या आल्मेदा विद्यालय सभागृहात आयोजित ७ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे समई प्रज्वलित करून उद्घाटन केल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक विद्या बाळ बोलत होत्या. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री, निर्माती स्मिता तळवलकर, विशेष अतिथी म्हणून मोनिका गजेंद्रगडकर, स्वागताध्यक्ष सौ. मंदा बांदेकर, आयोजन समितीच्या अध्यक्षा श्रीमती माधवीताई देसाई, श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन देव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
विद्या बाळ पुढे बोलताना म्हणाल्या, आजच्या काळात लेखक लिखाण केल्यानंतर ताबडतोब प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी माध्यमाकडे पाठवून देतो. आजच्या काळात माध्यमाच्या संख्येत वाढ झालेली असल्याने लेखकाचे लिखाण कुठं ना कुठे छापून येते. लेखकाने आपल्या प्रसिद्ध झालेल्या लेखनाचे वाचन करून त्यांच्या गुणात्मकतेवर विचार केला पाहिजे. लेखकाने प्रसिद्धीचा मोह टाळला पाहिजे. कसदार लेखनासाठी मान्यवर लेखकांच्या साहित्याचे वाचन केले पाहिजे. लेखकाने लेखन करताना आत्मशोध घेण्याची गरज आहे. लेखकाने साहित्य निर्मिती केल्यानंतर ताबडतोब प्रसिद्धीसाठी पाठवू नये. त्या लेखनाचा पुन्हा वाचन करून साहित्य निर्मिती आणखी कसदार कशी होईल यासाठी चिंतन केले पाहिजे, असेही विद्या बाळ यांनी सांगितले. विद्या बाळ यांनी आपल्या भाषणात महिला लेखिकांसाठी कसदार लेखनासंबंधी मौल्यवान सूचनाही केल्या. महिलांनी जीवनातील अनुभव शब्दबद्ध करावेत, असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी केले. महिला साहित्य संमेलन हे महिलांची दिवाळी पूर्वीची अक्षरांची दिवाळी आहे. महिलांनी महिलांसाठी आयोजित केले जात असलेले एकमेव साहित्य संमेलन आहे. ह्या संमेलनाच्या माध्यमातून गोव्यातील महिलांच्या सुप्त लेखन व कला गुणांना वाव मिळू शकतो. महिलांना आपले लेखन सादरीकरणासाठी व्यासपीठ सुध्दा उपलब्ध झाले आहे, असे डॉ. कार्व्हालो यांनी सांगितले.
स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार झाला पाहिजे. साहित्य हा समाजाचा आसरा आहे. त्यामुळे महिलांचे जीवन सुध्दा साहित्यात शब्दबद्ध झाले पाहिजे. महिलांनी जीवनात सोसलेले त्रास, कष्ट याचे चित्रण होणे आवश्यक आहे, असेही कार्व्हालो यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष डॉ. कार्व्हालो यांनी आपल्या भाषणात साहित्यातील स्त्री साहित्याचा आढावा घेतला.
स्वत्व जपणाऱ्या महिला या समाजात आहेत. फोंड्यातील महिलांनी महिलांच्या अंगातील लेखन गुणांना चालना देण्यासाठी हाती घेतलेला साहित्य संमेलनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे अभिनेत्री, निर्माती स्मिता तळवलकर यांनी सांगितले.
छोट्या दिव्याने अनेक दिवे उजळले जातात. त्याचप्रमाणे या लहानशा महिलांच्या साहित्य संमेलनातून महिलांच्या अंगातील सुप्त लेखन गुणांना चालना मिळू शकते. महिला साहित्य संमेलन हा स्त्री शक्तीचा उत्कट सोहळा असून महिला एकत्र झाल्यास काय करू शकतात. हेच फोंड्यातील महिलांनी साहित्य संमेलनाचे आयोजन करून दाखवून दिले आहे, असे मोनिका गजेंद्रगडकर यांनी सांगितले.
या महिला साहित्य संमेलनात वाघिणीशी झुंज देऊन वाघीण पकडण्यासाठी साहाय्य करणाऱ्या काणकोण येथील श्रीमती रंगावती वेळीप या महिलेचा स्मिता तळवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिळून साऱ्याजणी दिपावली विशेषांक २००९ चे प्रकाशन स्मिता तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. डॉ. पूर्णिमा उसगावकर यांच्या "आरोग्य टिप्स' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या उत्कृष्ट बाल वाचक पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी साहित्यिक महाबळेश्र्वर सैल, हरिश्चंद्र खोलकर यांचा सन्मान करण्यात आला.
बा.भ. बोरकर यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त व्यासपीठाला कै. बा.भ. बोरकर यांचे नाव देण्यात आले होते. तसेच व्यासपीठाची सजावटीसाठी पोफळीची झाडे आणि सुपाऱ्यांचा वापर करण्यात आला होता. बा.भ. बोरकर यांची लेखन कार्याची माहिती देणारे भित्तिपत्रक सभागृहात लावण्यात आले होते. तसेच गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्याची माहिती देणारे भित्तिपत्रक सुध्दा सभागृहात लावण्यात आले होते.
संमेलनाच्या सुरुवातीला कु. नेहा करमरकर हिने शारदास्तवन सादर केले. सौ. मंदा बांदेकर यांनी स्वागत केले. डॉ. पूर्णिमा उसगांवकर, सौ. गीता सोमण, अरुणा बधोरिया, स्मिता नाईक, सरिता दळवी, भारती चौगुले, विजया दीक्षित, वंदना जोग, सौ.लक्ष्मी जोग यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माधवी देसाई यांनी प्रास्ताविक केले. महिलांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे, महिलांना लिहिते आणि बोलते करण्यासाठी ह्या संमेलनाचा आयोजन दरवर्षी केले जात आहे, असे माधवी देसाई यांनी सांगितले. सूत्रसंचालन संगीता अभ्यंकर यांनी केले. शेवटी डॉ. नूतन देव यांनी आभार मानले.
या संमेलनात "स्पंदने दोन पिढ्यांची...' या परिसंवादात विद्या बाळ, माधवी देसाई, कादंबरी कुलकर्णी, सौ. पौर्णिमा केरकर, प्रांजली देसाई यांनी भाग घेतला. कथाविष्कार सत्रात मोनिका गजेंद्रगडकर यांनी कथा लेखनाबाबत मार्गदर्शन केले.

कळंगुटमध्ये चार डॉक्टरांना तरुणींसोबत रंगेहाथ अटक

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - खोबरावाडो कळंगुट येथील एका गेस्ट हाऊसमध्ये तीन तरुणींसोबत व्यभिचार करताना चौघा डॉक्टरांना कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधित डॉक्टर बेळगाव येथील एका नामवंत वैद्यकीय संस्थेतील असल्याचे सांगण्यात आले. चौघांनाही अटक करून प्रत्येकी दहा हजारांच्या हमीवर सुटका करण्यात आली तर, तिन्ही तरुणींची मेरशी येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
विचित्र अवस्थेत या डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अटकेची संपूर्ण कारवाई होत असताना या डॉक्टरांनी आपल्या तोंडांवर रुमाल बांधले होते.
खोबरावाडो येथील येथील एकागेस्ट हाऊसमध्ये तीन तरुणींबरोबर चौघे तरुण आल्याची माहिती कळंगुटचे पोलिस निरीक्षक नॉलास्को रापोझ यांना मिळाली होती. त्यानुसार रापोझ यांनी पोलिस पथकासह रात्री अचानक त्या गेस्ट हाऊसवर छापा टाकून एका खोलीची तपासणी केली असता तीन तरुणींबरोबर चौघा डॉक्टरांना रंगेहाथ पकडले.
या तिन्ही तरुणी मुंबईच्या असून राज आणि विशाल नामक दलालांनी पुरवल्या होत्या, अशी माहिती या डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे. आता पोलिस या दोन्ही दलालांच्या शोधात आहेत.

खनिज ट्रक वाहतूक प्रकरण आज चिघळणार?

अद्याप तोडगा नाही आज २०० ट्रक उसगावात ट्रक रोखण्याची शक्यता

फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) - वड उसगाव येथे गेले आठ दिवस सुरू असलेले सेझा कंपनीचे खनिज मालाची वाहतूक करणारे टिप्पर ट्रक रोको प्रकरणी अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू न शकल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेझा कंपनीचे खनिज वाहतूक करणारे सुमारे दोनशे ट्रक सोमवार १२ ऑक्टोबर ०९ रोजी सकाळी १० वाजता उसगाव येथे आणले जाणार आहेत. आपली मागणी मान्य न झाल्याने उसगाव येथे सदर ट्रक रोखले जाणार असून त्यावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सेझा खनिज कंपनीने उसगाव, पाळी भागातील टिप्पर ट्रक खनिज माल वाहतूक करण्यासाठी सहभागी करून घ्यावेत. या मागणीसाठी गेल्या ५ ऑक्टोबर ०९ पासून उसगाव वड येथे उसगाव, पाळी भागातील टिप्पर ट्रक मालकांनी "सेझा खनिज आस्थापनेचे टिप्पर ट्रक परतवून पाठवा' आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सेझा कंपनीचे कोडली खाणीवरील खनिज माल आमोणे येथे नेणारी ट्रकांची वाहतूक बंद झाल्याने खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकात नाराजी पसरली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी कोडली, दाभाळ, धावकोण धारबांदोडा या भागातील ट्रक मालकांनी फोंडा पोलिसांना निवेदन सादर करून या प्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली होती. मात्र, ह्या प्रकरणी सात दिवसात कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे कोडली. दाभाळ, धावकोण या भागातील ट्रक मालकात संतापाची लाट पसरली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने सेझा कंपनीच्या खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांनी सोमवार १२ ऑक्टोबरला सुमारे २०० ट्रक रस्त्यावर नेण्याचा निर्धार केला आहे. सदर ट्रक उसगाव येथे आल्यानंतर ते अडविले जाणार आहेत. कारण उसगाव भागातील ट्रक मालकांची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. ह्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर फोंड्यातील सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून सोमवारी कोणता पवित्रा घेते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

"गोवादूत'च्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन



"गोवादूत'च्या दिवाळीअंकाचे प्रकाशन करताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर (मध्यभागी) सोबत कार्मिक व्यवस्थापक विलास कामत, वृत्तसंपादक सुनील डोळे, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, अभिनव पब्लिकेशन प्रा. लि.च्या संचालक ज्योती धोंड, संपादक राजेंद्र देसाई, संचालक सागर अग्नी, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे.

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आज येथे "गोवादूत'च्या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन "गोवादूत' मुख्यालयात पार पडले.
अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या दैनिकाच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढून पुढील वाटचालीसाठी श्री. पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संपादक राजेंद्र देसाई, अभिनव पब्लिकेशन प्रा. लि.च्या संचालक ज्योती धोंड, संचालक सागर अग्नी, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे, वृत्तसंपादक सुनील डोळे, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, कार्मिक व्यवस्थापक विलास कामत आणि कर्मचारी उपस्थित होते.
नारायण राणेंची "दहशत' संपली ः पर्रीकर
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या प्रचारासाठी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गेलेल्या श्री. पर्रीकर यांनी, कोकणपट्टीत नारायण राणे यांची "दहशत' संपल्याचे निरीक्षण याप्रसंगी नोंदवले. ते म्हणाले, कोकणवासीयांशी संवाद साधल्यानंतर तेथील मतदार भयमुक्त होत असल्याचे आपणास प्रकर्षाने जाणवले. तसेच महागाईचा मुद्दा यावेळी निर्णायक ठरेल. सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फायदा झाला असला तरी महागाईचा तेवढ्याच वेगाने आगडोंब उसळल्याने संसाराची सारी गणिते पुन्हा पूर्वपदावर आली आहेत. शिवाय समाजातील असंघटित कामगारांना महागाईमुळे जगणेच महाकठीण बनले आहे. हा घटक सत्तारूढ कॉंग्रेसला अत्यंत अडचणीचा ठरणार आहे.
लोकांनी डोळसपणे आपले लोकप्रतिनिधी निवडण्याच्या गरजेवर श्री. पर्रीकर यांनी प्रामुख्याने भर दिला. लोकांसाठी तळमळीने राबणारा तो लोकप्रतिनिधी, असे सांगून ते म्हणाले, लोकप्रतिनिधी हा निष्क्रिय असू नये आणि दुसऱ्या बाजून तो जनतेच्या आकांक्षा धुळीला मिळवून केवळ स्वतःच्या तुंबड्या भरणाराही नसावा. आपल्या या मुद्यापुष्ट्यर्थ त्यांनी नेहमीच्या खुमासदार शैलीत उदाहरणे देऊन जागतिक मंदी, बदलता आर्थिक ढाचा या विषयांवरही विवेचन केले.

Sunday 11 October, 2009

पाक लष्करी मुख्यालयावर दहशतवाद्यांचा हल्लाबोल

चौघे तालिबानी ठार
तालिबानने घेतली जबाबदारी
पाकिस्तानात प्रचंड खळबळ
हल्लेखोर लष्करी गणवेशात

इस्लामाबाद, दि. १० - पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयावर आज केलेल्या हल्ल्यानंतर मोठी चकमक उडून त्यात चार तालिबानी आणि पाक लष्कराचे काही जवान मारले गेले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आज दुपारी १२ च्या सुमारास लष्करी गणवेषातील काही तालिबान्यांनी या लष्करी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पहिला दरवाजा त्यांनी पारही केला होता. पण, दुसऱ्या दरवाजापाशी ते आले असता तेथील रक्षकांनी संशयावरुन त्यांना रोखले. त्यावेळी तालिबान्यांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार अतिरेक्यांना ठार मारले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे काही जवानही मारले गेले. त्यांची संख्या मात्र लगेच कळू शकली नाही. तालिबान्यांनी हल्ला केल्याचे वृत्त कळताच संपूर्ण परिसरात लष्करी हेलिकॉप्टर्समधून कमांडोज उतरविण्यात आले आणि त्यांनी अतिरेक्यांवर मारा केला. अतिरेकी एका पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमधून आले होते.
ज्या चार अतिरेक्यांनी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, ते चारही जण ठार मारण्यात आले आहेत आणि स्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचे लष्कराचे मुख्य प्रवक्ते मेजर जनरल अब्बास यांनी पत्रकारांना सांगितले.
तालिबान्यांनी कालच पेशावर येथे केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५० पेक्षा जास्त लोक ठार झाले होते. त्यानंतर आज त्यांनी लष्करी मुख्यालयाला आपले लक्ष्य केले. तालिबान्यांचा प्रमुख गड असलेल्या वजिरिस्तानमध्ये येत्या काही दिवसांत लष्कर मोठी कारवाई करेल, असे विधान अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी केल्याच्या काही क्षणानंतर हा हल्ला करण्यात आला, हे विशेष.
या हल्ल्यात आमचे काही जवानही मारले गेले आहेत, असे प्रवक्ते अब्बास यांनी सांगितले. पण, ही संख्या सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. किती जवान मारले गेले याचा आम्ही तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरेकी एका व्हॅनमधून आले, पहिल्या द्वारातून प्रवेश करण्यात ते यशस्वी झाले, पण दुसऱ्या दरवाज्याजवळ येताच त्यांना रोखण्यात आले असता त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, असे अब्बास यांनी सांगितले.
रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयावर हल्ला करण्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात आमचे चार सहकारी मारले गेले आहेत, पण त्यांनी आठ सैनिकांनाही ठार मारल्याचे संघटनेने म्हटले आहे. वायव्य सरहद्द प्रांतातील लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
जिओ टीव्हीला टेलिफोनवरून संघटनेने ही जबाबदारी स्वीकारीत असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला अमजद फारूखी गटाने केल्याचेही सांगण्यात आले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याविरूद्ध खटला चालविण्याची मागणीही या गटाने केली आहे.
एका आठवड्यापूर्वी तालिबानचा प्रवक्ता आझम तारिक याने धमकी देताना म्हटले होते की, वजिरिस्तानमध्ये लष्करी कारवाई केल्यास त्याचे अतिशर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल आणि पाकिस्तानी लष्कराला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. आमच्या सैन्याने अत्तर आणि दक्षिण वजिरिस्तानकडे कूच केले असून येत्या काही दिवसांत या भागात हल्ला करण्यात येईल.आमच्यापुढे कारवाई करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटले आहे.

तीन जलमार्गांवर सुरू होणार "लॉंच' सेवा

पणजी, दि. १०(प्रतिनिधी)- जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील विविध अशा तीन जलमार्गावर "लॉंच' सेवा सुरू करण्याची तयारी सरकारने केली आहे. कुट्ठाळी ते आगशी या जलमार्गावर "बूट' पद्धतीअंतर्गत "रो-रो' सेवाही सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे,अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
आज येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना श्री.ढवळीकर यांनी नदी परिवहन खात्याच्या कामगिरीचा आढावा घेतला. पणजी ते हळदोणा, पणजी ते पिळगाव व पणजी ते मुरगाव या तीन मार्गावर सुमारे शंभर प्रवाशांची सोय होणार अशा पद्धतीची "लॉँच' सेवा सुरू करण्याचा विचार आहे. याबाबतीत सल्लागार कंपनीच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक नामांकित कंपनी त्यासाठी इच्छुक आहेत. पुढील आठवड्यात सल्लागार कंपनीचे एक पथक या जलमार्गांची पाहणी करण्यासाठी दाखल होणार आहे,असेही श्री.ढवळीकर म्हणाले.ही योजना प्रत्यक्षात उतरल्यास त्याचा नियमित प्रवाशांना लाभ होईलच, त्याचबरोबर पर्यटकांसाठीही ते आगळे आकर्षण ठरेल, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
आगशी ते कुठ्ठाळी जलमार्गावर "बांधा,वापरा व परत करा' (बूट) तत्वावर "रो-रो'सेवा सुरू करण्यासाठी जागतिक निविदा मागवण्यात आल्याची माहितीदेखील श्री.ढवळीकर यांनी दिली. ही सेवा अवजड वाहनांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एकूण तीन कंपन्यांकडून यासंदर्भात प्रस्ताव सादर झाले आहेत. पुढील आठवड्यात त्यावर चर्चा होईल, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराचा कळस हीच गोव्याची खरी ओळख

ऍड. उदय भेंब्रे यांचे परखड प्रतिपादन
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - गोव्याची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या नेत्यांच्या हातात सत्तेची सूत्रे सोपवून गोवेकर कसल्या विकासाची अपेक्षा बाळगून आहेत,असा खडा सवाल करतानाच प्रशासनाचा बट्टाबोळ, भ्रष्टाचाराचा कळस हीच राज्याची ओळख बनत चालली आहे, असे परखड उद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक ऍड. उदय भेंब्रे यांनी काढले.
कै.पांडुरंग मुळगावकर यांच्या ९२ व्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी " भारतातील गोवा- काल, आज आणि उद्या' या विषयावर ओजस्वी भाषण केले.यावेळी व्यासपीठावर स्मृती समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश गुरूदास कामत, "मार्ग'अभियानचे निमंत्रक गुरूनाथ केळेकर, लीबिया लोबो सरदेसाई आदी मान्यवर हजर होते.
गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांनंतरही वीज,पाणी आदी आवश्यक गोष्टींची शाश्वती देता येत नाही, तिथे काय बोलावे."इंडिया टूडे, आयबीएन-७' आदींकडून गोव्याला लहान राज्यांच्या विभागांत उत्कृष्ट राज्याचा पुरस्कार जाहीर झाला.लहान राज्यांच्या गटात असलेली मिझोरम,मणिपूर,मेघालय आदी पूर्वांचल राज्ये येतात. अनुसूचित जमातीच्या लोकांचे बहुमत असलेल्या या राज्यांकडे गोव्याची तुलनाच होऊ शकत नाही, तिथे गोव्याला पुरस्कार मिळणे म्हणजे "आंधळ्यात कुड्डो राजा'असाच प्रकार आहे. सर्वांत जास्त भ्रष्टाचार व निष्क्रिय प्रशासनाचा विभाग असता तर त्यात गोव्याचा क्रमांक नक्कीच अव्वल लागला असता असा टोलाही यावेळी ऍड.भेंब्रे यांनी हाणला.
गोव्याच्या मुक्तीला अठ्ठेचाळीस वर्षे संपत आली पण या काळात गोव्याचा विकास कमी आणि दुर्दशाच जास्त झाली आहे. गोव्याच्या अस्मितेबाबत चिंतेचा आव आणून आता "विशेष दर्जाचे' ढोल बडवले जात आहेत. तथापि, "गोंयकारपण' टिकवायचे असेल तर त्यासाठी गोवेकरांनी आपल्या मूलभूत स्वभावात आमूलाग्र बदल करणे अपरिहार्य आहे.अन्यथा गोव्याचा विनाश अटळ आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
गोव्याचा इतिहास, वर्तमान व भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या आपल्या भाषणात ऍड.भेंब्रे पुढे म्हणाले की गोवा मुक्तीनंतर दिशाहीन, तत्त्वहीन, मूल्यहीन सरकारांच्या हातात सत्तेची सूत्रे जनतेने सोपवली. त्यावेळच्या सरकारने केलेल्या चुकांची पुनरावृत्ती पुढील सरकारांनी सुरू ठेवली आहे. गोवा विलीनीकरण वादाचा आढावा घेतल्यास त्याची जबर किंमत राज्याला भोगावी लागली आहे. समृद्ध, सुखी गोवा व देशाची सेवा करण्याच्या भावनेने पहिल्या निवडणुकीत उतरलेल्या तत्कालीन विचारवंतांना जनतेने झिडकारले व विचारहीन नेतृत्वाकडे सत्ता सोपवली.दगडाला शेंदूर फासून निवडणुकीत उभा केला तरीही तो निवडून येऊ शकतो,अशी भाषा करणारेच श्रेष्ठ ठरले.गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या तत्कालीन नेतृत्वाला गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची आस नव्हतीच व आता कालांतराने तोच मुद्दा ऐरणीवर आला आहे.आता गोव्यासाठी विशेष राज्याच्या दर्जाची भाषा केली जात आहे. दर्जा मिळाला तर तो केवळ आर्थिक पॅकेजच्या दृष्टीने मिळेल, राज्याचे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने नसेल,असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या एकूण दारुण परिस्थितीला गोमंतकीय समाजच जबाबदार आहे.गोमंतकीय या नात्याने आपण निष्क्रिय, भ्रष्ट, आळशी, कायद्याचे दुश्मन, हेकेखोर व नेहमीच नकाराचे तुणतुणे वाजवणारे आहोत. हा स्वभावदोष बदलावा लागेल. हे कठीण जरूर आहे व अशक्य नाही.गोव्याला वाचवायचे असेल तर हा स्वभावदोष बदलणे अपरिहार्य आहे,असेही ऍड.भेंब्रे यांनी सांगितले.सुरुवातीला समई प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.निवृत्त न्यायमूर्ती श्री.कामत यांनी स्वागत केले.श्री.केळेकर यांनी विचार मांडले. लीबिया लोबो यांनी आभार मानले.मीनाक्षी मार्टिन्स यांनी सूत्रसंचालन केले.
गोव्याचा नव्हे भारताचा सुवर्णमहोत्सव !
१५ ऑगस्ट हा जरी आपण भारत देशाचा स्वतंत्रदिन म्हणून साजरा करीत असलो तरी तो अपूर्ण आहे.गोव्याच्या मुक्तीनंतरच संपूर्ण भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यामुळे २०११ साली गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा सुवर्णमहोत्सव आहे हे केंद्राला पटवून देण्याची गरज असल्याचे मत ऍड.उदय भेंब्रे यांनी व्यक्त केले.

मांद्रेची ग्रामसभा आज वादळी ठरणार

पेडणे, दि. १० (प्रतिनिधी) - मांद्रेची उद्या ११ रोजी होणारी ग्रामसभा विविध विषयांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावातील जागृत नागरिक तथा विशेष करून मांद्रे सिटीझन फोरमचे तरुण कार्यकर्ते यांनी पंचायत मंडळ व सचिवांना विविध विषयांवरून कोंडीत पकडण्याची जबरदस्त व्यूहरचना आखली आहे, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
मागच्या दोन ग्रामसभा जुनसवाडा मांद्रे येथील तथाकथित "रिवा रिझोर्ट' चे बेकायदा बांधकाम व कुंपणावरून बरीच गाजली होती. उद्याच्या बैठकीत आम्रपाली बांधकाम प्रकल्प, महाशीर हॉटेल प्रकल्प, जुनसवाडा येथील वाळूचे तेंब सपाटीकरण व कुटीरांचे बांधकाम, पंचायत सचिवांच्या बदलीचा घोळ,आश्वे डोंगर कापणी प्रकरण व मांद्रे पंचायत क्षेत्रातील जुगार या विषयावरून पंचायत मंडळ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मांद्रे सिटीझन फोरमची तातडीची बैठक आज झाली व त्यात ग्रामसभेत मांडण्यात येणाऱ्या विषयांची तयारी करण्यात आल्याचीही खबर प्राप्त झाली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर यंदा "ग्रामसभावर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. जास्तीत जास्त ग्रामसभा घेणे, ग्रामसभेला मोठ्यासंख्यने नागरिकांना उपस्थित राहण्यास प्रोत्साहन देणे व गावच्या समस्या, प्रश्न व विकासाच्या निर्णय प्रक्रियेत ग्रामस्थांना सहभागी करून घेणे असा उद्देश ठेवण्यात आला आहे. मांद्रे गावातील युवकांनी अलीकडच्या ग्रामसभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध विषयांवरून पंचायत मंडळाला जाब विचारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून आता पेडणे तालुक्यातील इतर गावातील ग्रामसभांनाही गर्दी लोटत असल्याचे चित्र पसरले आहे.
मांद्रे फोरमचा स्तुत्य उपक्रम
मांद्रे गावातील जागृत नागरिकांनी एकत्रित येऊन मांद्रे सिटीझन फोरमची स्थापना केली आहे. वकील, अभियंते, शिक्षक व सुशिक्षित नागरिक यात सभासद म्हणून कार्यरत आहेत. गावात कुणावरही अन्याय झाला तर फोरम लगेच दखल घेतो. मागच्या दोन ग्रामसभांना ग्रामस्थांना जागृत करण्याचे काम मांद्रे फोरमने केले. जुनसवाडा येथील तथाकथित रिवा हॉटेलच्या जागेत राहणाऱ्या मुंडकारांवर मालकांनी केलेल्या अन्यायाला फोरमने वाचा फोडली. हा प्रश्न ग्रामसभेत बराच गाजला होता. फोरमच्या पुढाकाराची पंचायत मंडळाने मात्र बरीच धास्ती घेतली आहे.
आम्रपाली व आश्वे येथील महाशीर हॉटेल बांधकामावरही या सभेत गरमागरम चर्चा होणार आहे.मांद्रे पंचायतीचे सचिव यांची बदली होऊनही ते अजूनही ताबा सोडत नाहीत. या सचिवांची बदली रद्द करण्यासाठी पंचायत मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे विनंती केल्याचीही माहिती मिळाली आहे. पंचायतीच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे सोडून सचिवाची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याचे नेमके कारण काय, असा सवालही ग्रामस्थांना पडल्याने हा विषयही उद्याच्या सभेत उपस्थित होणार आहे. मांद्रेच्या तलाठ्याविरोधातही अनेक तक्रारी असल्याने त्याचाही जाब विचारला जाईल, अशी माहिती देण्यात आली.