Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 22 February, 2008

हे नार्वेकर व हॉटेल उद्योजकाचे कारस्थान
ः बाबूश पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)- पोलिसांकडून आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर, ताळगाव मतदारसंघातील एक पंचतारांकित हॉटेल उद्योजक व दोनापावला येथील नियोजित आयटी हॅबिटेट लॉबीचा थेट हात असल्याचा दावा ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
दोन दिवसांच्या अटकेत असलेल्या बाबूश यांची आज येथील सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर मोन्सेरात यांनी रात्री उशिरा ताळगाव येथील आपल्या बंगल्यावर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण षड्यंत्राचे नाट्य कथन केले. पोलिस व गुंडांचे साटेलोटे असल्याचा आरोपही बाबूश यांनी यावेळी केला. राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलिस कशा पध्दतीने वागतात याचा ताजा अनुभवच आपल्याला या प्रकरणातून मिळाला, असे सांगून एक लोकप्रतिनिधी म्हणून अशी वागणूक मिळत असेल, तर मग आम आदमीचे काय होईल, असे ते म्हणाले.मुलाला न्याय मिळवून देण्याची भिष्मप्रतिज्ञा
या संपूर्ण प्रकरणाची ठराविक काळात न्यायालयीन चौकशी व्हावी व सत्य उजेडात आणावे अशी मागणी करतानाच मोन्सेरात यांनी आपल्या मुलाला विनाकारण पोलिसी खाक्या दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण न्यायालयात खेचू असा इशाराही दिला. या संपूर्ण प्रकरणी आपण न्यायासाठी लोकशाहीच्या सर्व पायऱ्या चढून न्याय हा अस्तित्वात आहे याचा अनुभव माझ्या मुलाला आणून देईन अशी भिष्मप्रतिज्ञा त्यांनी यावेळी केली. हा संपूर्ण प्रकार देवानेच घडवल्याचे सांगून सर्वसामान्य जनतेला पोलिस कसे सतावत असतील, याची जाणीव आपल्याला झाल्याचे ते म्हणाले. या घटनेमुळे आपले डोळे उघडल्याचे ते म्हणाले. यापुढे अन्यायग्रस्त लोकांसाठी आपण वावरणार असून न्यायासाठी लढणाऱ्या सर्वांना आपला जाहीर पाठींबा त्यांनी व्यक्त केला. मानवी हक्क आयोगाकडे दाद मागू गोव्यात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी व पोलिसांकडून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात व्यापक जनआंदोलन सुरू करण्याची गरज असून गोव्यात मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्याची खरोखरच वेळ आली आहे व आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.अधीक्षक नीरज ठाकूर खरे सूत्रधार या संपूर्ण प्रकरणाचे खरे सूत्रधार हे पोलिस अधीक्षक निरज ठाकूर आहेत. त्यांनी स्वतः आपल्याला बेदम मारहाण करून इतर पोलिस शिपायांच्या पुढ्यात ढकलून दिले व त्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले, असेही ते म्हणाले. या घटनेनंतर लगेच माहिती तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर यांनी नीरज ठाकूर यांना शाबासकी देण्यासाठी फोन केला होता, असा गौप्यस्फोटही बाबूश यांनी केला. आज सकाळी प्रत्यक्ष नीरज ठाकूर यांनी आपल्याला ही कृती केवळ राजकीय दबावापोटी करावी लागल्याचे गुपित उघड केले. या दबावात नार्वेकर यांचा मुख्य सहभाग असल्याचेही त्यांच्या संभाषणातून उघड झाल्याचे ते म्हणाले.अधीक्षक नीरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक, पणजीचे निरीक्षक सुदेश नाईक व इतर अधिकारी यांनाही न्यायालयात खेचणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या मतदारसंघातील एका युवकाचे अपहरण येथील गुंडांनी केल्याचा फोन त्याच्या कुटुंबियांकडून आला. या अपहरणात पोलिसही सामील असल्याचे आपल्याला कळताच आपण निरीक्षक सुदेश नाईक यांना फोन केला, परंतु काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिस स्थानकावर धाव घेतली. एक लोकप्रतिनिधी म्हणून पोलिस स्थानकावर आपण गेलो असता असता तिथे निरीक्षक अनुपस्थित होते व कोणीही प्रतिसाद देत नसल्याने त्यांना संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुदत दिल्याचे त्यांनी सांगितले. सदर युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण गेलो नसतो, तर कदाचित सदर युवक जिवंतही राहिला नसता, असेही ते म्हणाले.
आपल्या घराकडून संपूर्ण ताळगावात फेरी काढून हा मोर्चा पणजी पोलिस स्थानकावर नेताना तो रोखण्यासाठी काहीच हालचाली पोलिसांनी केल्या नाहीत. पोलिस स्थानकासमोर काही मोजकेच शिपाई ठेवून मोर्चेकरांच्या मागण्यांबाबतही कोणी वरिष्ठ अधिकारी बोलण्यास तयार नव्हता. रात्री साडे नऊ वाजल्यानंतर आपण पोलिस स्थानकात अटक करून घेण्यासाठी जात असताना मागून दगडांचा वर्षाव सुरू झाला. आपणालाच या दगडांपासून वाचण्यासाठी धडपड करावी लागली. आपले लोक आपल्यावर दगड मारूच शकत नाहीत, असा दावा करून पोलिसांनी काही गुंडांना पेरून हा डाव साधला व मोर्चाला हिंसक वळण मिळवून दिले असा आरोप करून त्यानंतर पुढील तमाशा झाल्याचे ते म्हणाले.
आपण या घटनेनंतर मिरामार येथील बंगल्यावर आलो. त्यावेळी आपल्या मुलाला पोलिसांनी उचलून नेल्याची खबर पत्नीने दिली व या प्रकरणी पोलिस स्थानकावर जात असल्याचे सांगितले. काही वेळानंतर आपल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याचे कळताच आपण व महापौर टोनी रॉड्रिगीस हे तिथे पोहोचलो.
... आणि पोलिसांनी हल्ला चढवला
आम्हा दोघांनाही सुरूवातीस पोलिसांनी वाट करून देत आत नेले. यावेळी टोनी यांच्यावर कोणीतरी लाथ मारल्याने ते अत्यवस्थ बनले होते. अधीक्षक नीरज ठाकूर यांनी आपल्या माणसांनी हे काय केले ते पाहा, असा सवाल केला. यानंतर लगेच त्यांनी आपल्याला मारहाण सुरू केली. समोर उभे असलेल्या पोलिस शिपायांसमोर एखादे भक्ष्य टाकण्याच्या अविर्भावात आपल्याला त्यांच्या पुढ्यात ढकलून देण्यात आले व त्यानंतर सर्वांनी लाथाबुक्क्यांनी आपल्याला मारले, अशी माहिती त्यांनी दिली. टोनी यांच्या डोक्यावर प्रहार केल्याने त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. याची तक्रार नीरज ठाकूर यांच्याकडे करताच त्यांनी त्याच अवस्थेत त्यांना परत लाथ मारून बेशुध्द केले. बेशुध्दावस्थेतील टोनी यांच्या छाताडावर लाथ मारण्याचे क्रौर्य नीरज ठाकूर यांनी केल्याचे बाबूश यांनी स्पष्ट केले.
नीरज ठाकूर यांनी आपल्याला गोमेकॉत उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला, परंतु पोलिसांना घाबरून इस्पितळात झोपण्याचे सोंग घेणाऱ्या राजकारण्यांपैकी आपण नाही, असे ठणकावून सांगत आपण कोठडीत राहणेच पसंत केले असे शेवटी बाबूश म्हणाले.
अन्यायाविरोधातील लोकांबरोबर राहू
या संपूर्ण प्रकरणातून खरोखर सामान्य जनता काय सहन करीत असेल याची प्रचीती आपल्याला झाली व त्यासाठी यापुढे अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आघाडी घेणार असल्याचे बाबूश म्हणाले. या संपूर्ण प्रकरणावर सरकार नक्की काय भूमिका घेते हेच आपल्याला पाहायचे आहे, असे सांगून त्यांनी आता पुढील कारवाईचा चेंडू दिगंबर कामत यांच्या कोर्टात फेकला आहे.
राज्यात राजकीय हालचालींना वेग
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)- बाबूश यांची सुटका झाल्यानंतर राज्यात अचानक राजकीय हालचालींना वेग आला. आज सरकारमधील अनेक मंत्री व आमदारांनी बाबूश यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून मिळालेली वागणूक व केलेली मारहाण याचा तीव्र निषेध केला.
आज रात्री उशिरा आरोग्यमंत्री विश्वजित राणे त्यांची पत्नी दीव्या राणे, कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस, वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा व पंचायतमंत्री बाबू आजगांवकर यांनी भेट घेतली. बाबूश यांना फसवण्यामागे राजकारण असल्याचे आता सिद्ध झाल्याचा ठाम विश्वास यांनी व्यक्त करून अधीक्षक नीरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक व निरीक्षक सुदेश नाईक यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. हे प्रकरण खपवून घेतल्यास उद्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला खेचून मारहाण करण्याची कृती पोलिसांकडून सुरूच राहील, असेही मत या लोकांनी व्यक्त केले. बाबूश यांनी थेट नार्वेकर यांच्यावर आरोप केल्याने पुन्हा एकदा सरकार संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री उशिरा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आजच दिल्लीहून परतलेले राज्यपाल एस. सी. जमीर यांची भेट घेतली. बाबूश यांच्या प्रकरणी त्यांनी श्री. जमीर यांच्याशी चर्चा केल्याची खबर आहे. बाबूश प्रकरणाचे पडसाद दिल्लीतही पसरले असून नीरज ठाकूर यांना गोव्यातून पाठवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बाबूश यांना कायद्याच्या कचाट्यात देण्यासाठी त्यांच्यावरील विविध प्रकरणांचा संदर्भ घेत भक्कम केस तयार करण्याचा डावही आखला जात असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू असल्याने येत्या दिवसांत या सर्व गोष्टी उचल खाण्याची शक्यता आहे.
एका मातेचा आक्रोश...माझा मुलगा निरपराध होता. आजारीही होता. बाहेरच्या जगात काय चाललेय याची त्याला कल्पनाही नव्हती. परंतु सूड उगवण्याच्या तयारीने आलेल्या पोलिसांनी त्याला जेवणाच्या ताटावरून उचलले आणि पोलिस स्थानवर नेऊन गुरासारखे मारले. पोलिस आले आहेत एवढाच त्याचा कापरा आवाज मी ऐकला. मी घरी धाव घेतली, तेथे वॉचमनकडून कळले की अमितला पोलिसांनी उचलून नेले आहे. जिवाच्या आकांताने मी पोलिस स्थानकात धाव घेतली. तेथे दारातच पणजीचे निरीक्षक मला दिसले. त्यांच्याकडे अमितची चौकशी केली तर निरीक्षकांनी चक्क आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. मात्र नंतर जे काही घडले ते अत्यंत भयानक होते. कोणीतरी केसांच्या झिंज्या पकडून मला फरफटत आत नेले, जमिनीवर पाडले व लाथा बुक्क्यांनी मिळेल तसे मारले. एखाद्या सराईत गुन्हेगारालाही अशी मारहाण केली जात नाही, परंतु पोलिस आमच्या जिवावरच उठवले होते. मला माझी चिंता नाही. ती सगळी मारहाण सोसताना मला चिंता होती ती माझ्या मुलाची. मी बराच वेळ तेथे पडून होते. थोड्या वेळाने अमित मला तेथे दिसला. मी त्याला तुला मारहाण झाली का, असे विचारले तर त्या निरपराध मुलाने चक्क शर्ट काढून माराचे व्रण दाखवले. चेहऱ्यावरही व्रण होते. एका निष्पापावर असा अत्याच्यार करण्याचा अधिकार पोलिसांना कोणत्या कायद्याने दिला? मात्र आज येथे एका गोष्टीची मी जरूर शपथ घेईन की ज्या लोकांनी माझ्या मुलावर अन्वन्वित अत्याचार केले त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही. आज माझ्या मुलावर हे अत्याचार झाले, परंतु उद्या इतरांनाही हेच भोगावे लागेल, त्यामुळे पोलिसांना अत्याचाराचे हक्क देणे हे समाजाच्या दृष्टीनेच धोक्याचे आहे. मुलाला साधा ताप आला तरी आई कळवळते, माझ्या मुलावर झालेला अन्याय आई म्हणून मी कदापि सहन करणार नाही, आणि ज्यांनी तो केला त्यांना कदापि सोडणार नाही.
मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाची मला पर्वा नाही, परंतु मुलाच्या मनावर पडलेल्या व्रणाचे काय? त्या सगळ्या पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एका आईचे मन त्याशिवाय शांत होणार नाही.
पोलिसांच्या अत्याचाराच्या अनेक कथा मी ऐकल्या होत्या, परंतु स्वतः घटनेचा अनुभव आल्यामुळे ते किती अमानुष आणि हिंस्त्र बनू शकतात याचा प्रत्यय आला. त्या रात्री अमितसोबत घरी जेवणारा माल्कम हा त्याचा मित्र पोलिसांना माझा थोरला मुलगाच वाटला व त्यांनी मिळेल तशी त्याला मारहाण केली. एक दंडुका त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात बसल्याने तो बेशुध्द पडला. मात्र तो मेला असावा असे समजून पोलिसांनी त्याला गाडीतून खाली ढकलून दिले. तो मेला की जिवंत आहे याची चौकशीही त्यांनी केली नाही. किती हे क्रौर्य?... जामिनावर सुटलेल्या जेनिफर मोन्सेरात यांनी आपली कैफियत पत्रकारांसमोर मांडली. मोन्सेरात यांचा पुत्र अमित अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. पत्रकार परिषदेत हजर असलेल्या अमितने आपणावर झालेल्या अत्याचारांची कहाणी मोडक्यातोडक्या शब्दांत कथन केली.
दरम्यान, आपल्या मुलाला लवकरच मुंबईला उपचारासाठी नेणार असून मानवी हक्क आयोगाकडेही या संदर्भात आपण दाद मागणार असल्याचेही जेनिफर यांनी सांगितले. पोलिस हे रक्षक नसून भक्षक आहेत हीच गोष्ट या प्रकरणातून सिध्द होत असल्याचे त्या म्हणाल्या.

Thursday 21 February, 2008

BREAKING NEWS

बाबूशना सशर्त जामीन मंजूर, मात्र युवक काँग्रेस हल्ला प्रकरणात फेरअटक* परत जामीन मंजूर
"आयपीएल'च्या बाजारात खेळाडूंचा विक्रमी भाव
धोनीची ६ कोटी तर सायमंड्सची ५.४ कोटी किंमत
सर्वांत स्वस्त खेळाडू कामरान

सचिन, सौरव, द्रविड, सेहवाग अन् युवराज "आयकॉन्स', त्यांची बोलीच नाही. एकूण ४०० कोटींची बोली. शाहरूखकडून शोएब अख्तर, रिकी पॉंटिंगची खरेदी, मुकेश अंबानीच्या मुंबई संघात सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग तर प्रीती झिंटाच्या मोहाली संघात युवराज, ब्रेट लीचा समावेश
मुंबई, दि. २० ः क्रिकेटपटूंसाठी कुबेराचा खजिनाच ठरावा अशा व्यावसायिक इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) बाजारात ७७ क्रिकेटपटूंची बुधवारी खरेदी झाली. "स्टार' खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रेंचायझींनी अक्षरश: पैशाच्या राशी ओतल्या. त्यामुळेच "आयपीएलच्या' रुपात भारतीय क्रिकेटमध्ये नव्या इतिहासाची नोंद झाली.
याद्वारे जागतिक क्रिकेटमध्येही एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली असे म्हणता येईल. देशातील क्रिकेटच्या "यंग ब्रिगेड'साठी हे सर्वाधिक कमाईचे माध्यम तर आहेच. शिवाय याद्वारे त्यांना आपले कसब व सामर्थ्यही दाखविता येईल. या बोलीत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सर्वाधिक ६ कोटी तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू सायमंड्सला ५.४ कोटी किंमत मिळाली. धोनीला चेन्नई संघाने तर सायमंड्ला हैदराबादने खरेदी केले. शाहरूख खानच्या कोलकाता संघासहच चेन्नई व हैदराबाद संघही चांगलेच मजबूत वाटत आहेत. मात्र खेळाडूंची खरेदी बघता जयपूर संघ सर्वात कमकुवत वाटतोय. सर्वात स्वस्त खेळाडू पाकिस्तानचा कामरान अकमल ठरला. त्याला केवळ ६० लाख किंमत मिळाली. तो जयपूर संघाकडून खेळेल. सर्व खेळाडूंना "अ' ते "ह' श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. आयपीएलच्या प्रत्येक फ्रेंचायझीला त्याच्या संघात कमीत कमी १६ खेळाडू ठेवावे लागतील. त्यात चार खेळाडूंचे वय २२ वर्षांपेक्षा कमी आणि ४ खेळाडू स्थानिक असतील.
आयपीएलच्या मैदानात फ्रेंचायझीच्या रुपात मैदानात उतरलेले अनेक उद्योगपती आणि बॉलिवुड कलावंतांनी आपापल्या संघात स्टार खेळाडूंना घेण्यासाठी एकापेक्षा एक अधिक रकमेच्या बोली लावल्या. भारतीय व ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची खरेदी करण्यासाठी सर्वाधिक चढाओढ दिसली. आयपीएल ट्वेंटी-२० स्पर्धेत भाग घेणाऱ्या आठ संघांचे हे फ्रेंचायझी सात अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक रक्कम खर्च करणार आहेत. यावर्षी १८ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणाऱ्या आयपीएल ट्वेंटी-२० स्पर्धेत मुंबई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर, मोहाली आणि जयपूर हे संघ भाग घेणार आहेत.
आयपीएलकडे भारतीय क्रिकेटमधील एक नवा अवतार म्हणून बघितले जात असून यामुळे देशातील तरुण क्रिकेटपर्टूना त्यांची प्रतिभा व सामर्थ्य दाखविण्याची संधी मिळाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बीसीसीआयच्या समर्थित या लीगच्या उद्घाटनिय स्पर्धेत ४४ दिवसांत ५९ लढती खेळल्या जातील. विजेत्या संघाला ३० लाख अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार प्रदान केला जाईल. ही रक्कम गतवर्षी दक्षिण आफिकेट झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाला मिळालेल्या पुरस्कारापेक्षा ११ लाख डॉलर्सने अधिक आहे.
खेळाडूंचे संघ व किंमत
जयपूर संघ :- शेन वॉर्न (१.८ कोटी), युनुस खान (९० लाख), ग्रेमी स्मिथ (१.९ कोटी), कामरान अकमल (६० लाख), युसुफ पठाण (१.९ कोटी), मोहंम्मद कैफ (६.७५ लाख डॉलर्स), मुनफ पटेल.
मुंबई संघ :- सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग (३.४ कोटी), सनथ जयसूर्या (३.९ कोटी), शॉन पोलॉक (२.२ कोटी), रॉबिन उथप्पा (८ लाख डॉलर्स).
कोलकाता संघ :- सौरव गांगुली, शोएब अख्तर (१.७ कोटी), रिकी पॉंटिंग (१.६ कोटी), ब्रॅंडन मॅककुलम (२.८ कोटी), ख्रिस गेल (३.२ कोटी), अजीत आगरकर (१.४ कोटी).
बंगलोर संघ :- राहुल द्रविड, अनिल कुंबळे (२ कोटी), झहीर खान (१.८ कोटी), जॅक्स कॅलिस (३.६ कोटी), मार्ग बाउचर (१.८ कोटी), कॅमरून व्हाईट (२ कोटी), वसीम जाफर ().
चेन्नई संघ :- महेंद्रसिंग धोनी (६ कोटी), मॅथ्यू हेडन (१.५ कोटी), जेकब ओरम (२.७ कोटी), मुथैया मुरलीधरन (२.५ कोटी), स्टीफन फ्लेमिंग (१.४ कोटी), पार्थिव पटेल (१.३ कोटी), जोगिंदर शर्मा (१ कोटी), अँड्र्यू मोर्केल (२.७ कोटी), सुरेश रैना (६.५ लाख डॉलर्स), मखाया नतिनी.
दिल्ली संघ :- वीरेंद्र सेहवाग, डॅनियल व्हेट्टोरी (२.५ कोटी), शोएब मलिक (२ कोटी), मोहम्मद आसिफ (२.६ कोटी), डिव्हीलियर्स (१.२ कोटी), दिनेश कार्तिक (२.१ कोटी), फरवेझ महारूफ (९० लाख), तिलकरत्ने दिलशान (१ कोटी), गौतम गंभीर (७.२५ लाख डॉलर्स), मनोज तिवारी (६.७५ लाख डॉलर्स).
मोहाली संघ :- युवराज सिंग, ब्रेट ली (३.६ कोटी), महेला जयवर्धने (१.९ कोटी), कुमार संगकारा (२.८ कोटी), एस.श्रीसंत (२.५ कोटी), इरफान पठाण (३.९ कोटी), रोमेश पोवार, पीयुष चावला.
हैदराबाद संघ :- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (३.७५ लाख डॉलर्स), ऍण्ड्र्यू सायमंड्स (५.४ कोटी), ऍडम गिलख्रिस्ट (२.८ कोटी), हर्शेल गिब्स (२.३ कोटी), शाहिद आफिदी (२.७ कोटी), स्कॉट स्टायरिस (७० लाख), रोहित शर्मा (७.५ लाख डॉलर्स), चमारा सिल्व्हा (१ लाख डॉलर्स).
राखीव खेळाडू :- मायकेल हसी, तातेंदा तैबू, ग्लेन मॅकग्रा, मोहम्मद युसुफ, चंदरपॉल, रामनरेश सरवन, जस्टीन लॅंगर.
"आयकॉन्स'ची बोलीच लागली नाही
आयपीएलने मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, बंगाल "टायगर' सौरव गांगुली, धडाकेबाज फलंदाज युवराजसिंग, धावांचा पाऊस पाडणारा युवराजसिंग आणि नजफगडचा नवाब वीरेंद्र सेहवाग यांची "आयकॉन' खेळाडूंच्या रुपात निवड केली आहे. याच कारणास्तव या खेळाडूंची बोलीच लावण्यात आली नाही. मात्र संघातील ज्या खेळाडूची सर्वाधिक बोली लागेल त्याच्यापेक्षा १५ टक्के अधिक रक्कम यांना दिली जाईल. त्यामुळेच या पाचही क्रिकेटपटूंची सर्वाधिक चांदी राहणार आहे. तेंडुलकर मुंबई, गांगुली कोलकाता, राहुल द्रविड बंगलोर, युवराज सिंग मोहाली आणि सेहवाग दिल्ली संघाचे नेतृत्त्व करणार आहे.
"किंग खान'कडून "रावळपिंडी एक्स्प्रेस'ची खरेदी
कोलकाता संघाचा मालकी हक्क मिळविणारा बॉलिवुड स्टार "किंग खान' शाहरूखने "रावळपिंडी एक्स्प्रेस' नावाने प्रसिद्ध क्रिकेट विश्वातील सर्वात वेगवान गोलंदाज पाकिस्तानच्या शोएब अख्तरची १.७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. तसाही शोएब हा शाहरूख खानचा आवडता खेळाडू आहे. तो आपल्या संघात असावा म्हणून बॉलिवुड कलावंताने त्याच्यावर मोठया रकमेची बोली लावली व त्याला खरेदीही केले. मुकेश अंबानीच्या मुबंई संघात सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग तर प्रिती झिंटाच्या मोहाली संघात युवराज, ब्रेट लीचा समावेश झाला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना जोरदार मागणी
मैदानावरील वाईट वर्तणूक खेळ भावनेचा अभाव असल्यामुळे वादग्रस्त ठरले असले तरी आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणावर मागणी राहिली. सिडनी कसोटीत वादाचे केंद्रस्थान असलेला ऍण्ड्र्यू सायमंड्स किंमतीच्या बाबतीत भारताचा कर्णधार धोनीनंतर आयपीएलमध्ये दुसरा ठरला. हैदराबाद संघाने त्याला ५.४ कोटी रुपयांत खरेदी केले. शेन वॉर्न, पॉंटिंग, ब्रेट ली आणि ऍडम गिलख्रिस्ट यांनाही चांगली मागणी राहिली.
पोलिसांकडून विनाकारण मारहाण ः जेनिफर
मुलालाही नाहक अटक

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- पणजी पोलिस स्थानकावर काढलेल्या मोर्चाशी कोणताही संबंध नसताना आपल्याला पकडून पोलिसांनी जबर मारहाण केली, तसेच पोलिसांनी आपल्या मुलाला जेवत असताना उचलून नेले. त्याला पाहण्यासाठी मी पोलिस स्थानकावर गेले होते. येथे मुलाची चौकशी करताना अचानक महिला पोलिसांनी आपल्या केसांना धरून फरफटत आत नेले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रात्रीही आपल्याला पोलिसांनी मारल्याची तक्रार आज जेनिफर मोन्सेरात यांनी न्यायालयात केली.
न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत जेनिफर हिला कोणत्या प्रकारे आणि कशा पद्धतीने मारहाण झाली, याची चाचणी करून न्यायवैद्यक विभागाला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. प्रथम न्यायालयाने आमदार बाबूश मोन्सेरात यांना "तुम्हांला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का?' असा पुन्हा पुन्हा प्रश्न केला. यावेळी ते मौन बाळगून उभे राहिले. यामुळे न्यायालयाने त्याला मारहाण न झाल्याचे गृहित धरून त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर जेनिफर यांना हाच प्रश्न करण्यात आला. यावेळी त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सदर तक्रार मांडली. "माझ्या मुलाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, तसेच तो मोर्चातही सामील झाला नव्हता, असे असतानाही पोलिसांनी त्याला पकडून नेले', अशी व्यथा तिने न्यायालयासमोर मांडली. यावेळी या प्रकरणातील अन्य चार संशयितांना न्यायालयाने तोच प्रश्न विचारला असता, मायकल फर्नांडिस यानेही आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगितले. बाबूश आमदार असल्याने पुरावे नष्ट करुन साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता व्यक्त करून सरकारी वकील सोरोजीनी सार्दिन यांनी बाबूशचा जामीन रद्द करुन पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. बाबूश व जेनिफर मोन्सेरात यांच्या वतीने ऍड. अरुण ब्राझ डिसा व दत्तप्रसाद लवंदे यांनी बाजू मांडली तर अन्य चार संशयातांच्या वतीने ऍड. हनूमंत नाईक, सर्वेश कामत व शिल्पा नाईक यांनी बाजू मांडली.
बाबूशना सात दिवसांची पोलिस कोठडी
जेनिफरचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी
५०० जणांविरुद्ध गंभीर गुन्हे
सांतिनेज, ताळगावात पूर्ण बंद

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- पणजी पोलिस स्थानकावर काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कल्पना गावस यांनी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना आज सात दिवसांची पोलिस कोठडी, तर त्यांची पत्नी जेनिफर यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी बाबुश व समर्थकांविरुद्ध पोलिसांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
हनुमंत फकिरप्पा, मायकल आग्नेलो फर्नांडिस, प्रकाश खोडकुडोली व बालाजी कृष्णाजी गडकरी या बाबूश समर्थकांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान, रायन गुदिन्हो या युवकाला आपल्या वाहनातून पोलिस स्थानकात आणलेल्या इम्तियाज शेख व पावलो डिक्रुझ यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. बाबूश यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज ताळगावात बंद पाळण्यात आला.
पणजी पोलिस स्थानकावर बाबूश मोन्सेरात यांनी नेलेल्या मोर्चाला लागलेले हिंसक वळण व त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांकडूनच कायदा हाती घेण्याचा प्रकार याचे गंभीर पडसाद आज राज्यात उमटले. संपूर्ण ताळगावात आज सकाळपासून तणावाचे वातावरण होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज संपूर्ण दिवसात एकही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पणजी पोलिस स्थानकावर काल झालेल्या दगडफेकीत २४ पोलिस गंभीर जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर गुन्हा हल्लेखोरांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. भा.दं.सं. कलम १४३, १४७, ३२३, ४३५, ३३२, ३३३, ३२४, ३२५, ४२७, ३०७, १४९, १२०(ब) व फौजदारी कलम ३४ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात पणजीचे महापौर टॉनी रॉड्रिगिस, नगरसेवक दया कारापुरकर, उदय मडकईकर, नागेश कारशेट्टी, टॉनी बार्रेटो, ताळगावचे सरपंच जानू रुझारीयो, जे. बी. अँथनी परेरा (खांमो), मिलिंद शिरोडकर, कच्चा नेपाळी, सलिम शेख, सतिश नाईक, संदीप उर्फ बाबू, नारायण, बाच्यो, रायन गुदिन्हो, आग्नेल गुदिन्हो, रोड्नी गुदिन्हो, जॉन, श्रीमती गुदिन्हो यांच्यासह अन्य ५०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आज सायंकाळी ४.३० वाजता बाबूश, जेनिफर व अटकेत असलेल्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी सादर केलेले जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. बाबूश मोन्सेरात व त्यांची पत्नी जेनिफर यांना न्यायालयात आणले जात असल्याची खबर वाऱ्यासारखी पणजीत पसरल्याने त्यांना पाहण्यासाठी लोकांनी न्यायालयासमोर तुफान गर्दी केली होती. मोन्सेरात यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या अनेक खुणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या, तर जेनिफर यांना झालेल्या मारहाणीत त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत होते.
दरम्यान, पणजी पोलिस स्थानकावर प्राणघातक हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्यांना जखमी करण्याच्या या कृतीची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथील स्थानिक गृहखाते केंद्रीय मंत्रालयाशी संपर्क साधून असल्याचेही कळते.
काल रात्री बाबुश समर्थकांची चार वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यात जीए ०१ एच १, जीए ०१ एस ३३३६, जीए ०३ एल ५८५२ व जीए ०८ ए ७८८८ ही वाहने ताब्यात घेऊन पर्वरी पोलिस स्थानकावर ठेवण्यात आली आहेत.
कालच्या हल्ल्यात जखमी झालेल्या २४ पोलिसांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार करुन घरी पाठवण्यात आले. पोलिस शिपाई गौरीश व केंद्रीय राखीव दलातील महिला पोलिस तेजा बडगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांना बोलता येत नसल्याने त्यांची अद्याप जबानी नोंदविण्यात आली नसल्याचे पोलिस उपअधीक्षक मोहन नाईक यांनी सांगितले.
पोलिसांच्या कृतीचीही चौकशी व्हावी ः पर्रीकर
पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- पणजी पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली केलेली मारहाण, तोडफोड या दोन्ही घटनांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. मोर्चेकरांकडून पणजी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याची घटना जेवढी गंभीर आहे, तेवढीच पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली केलेली कृतीही गंभीर आहे, असे ते म्हणाले.
पणजी येथील पक्ष मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा व उपाध्यक्ष सुभाष साळकर उपस्थित होते. ताळगावातील जमावाने कायदा हातात घेऊन पोलिसांवर केलेल्या हल्ल्याची चौकशी झालीच पाहिजे. पण, पोलिसांनीही बाबूशच्या बंगल्याची व वाहनांची केलेली तोडफोड तसेच बाबूश, जेनिफर व महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्याशी गैरवर्तन करून केलेली मारहाण हा गंभीर प्रकार असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले. जेथे मुख्यमंत्री, सभापती व राज्यपाल जमीर यांच्याकडून उघडपणे घटनेची पायमल्ली होते तेथे शासकीय यंत्रणेकडून कायद्याची बूज राखण्याची अपेक्षाच व्यर्थ, असेही ते म्हणाले.
ताळगावातील संतप्त नागरिकांचा मोर्चा पोलिस स्थानकावर येणार याची माहिती मिळूनही पोलिसांनी उपाययोजनेसाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर टॉनी रोड्रीगीस व जिल्हा पंच सदस्य जेनिफर मोन्सेरात या तीनही लोकप्रतिनिधींना पोलिसांनी दिलेली वागणूक व लाथाबुक्क्यांनी केलेली मारहाण असमर्थनीय असल्याचे ते म्हणाले. बाबूशचा मुलाचा प्रत्यक्ष मोर्चात सहभाग नसतानाही त्याला घरातून उचलून पोलिस स्थानकात आणणे व नंतर मारहाण करणे हा प्रकार म्हणजे सरकारच्या प्रशासकीय दीशाहीनतेचा कहर असल्याचे पर्रीकर म्हणाले.
या संपूर्ण प्रकाराला पोलिस जबाबदार आहेत. ताळगावात युवा कॉंग्रेसवर झालेला हल्ला, बाबनी शेखवरील हल्ला व टोळीयुद्धाचे होणारे प्रकार याची चौकशी करून गुन्हेगारांना वेळीच ताब्यात घेतले असते, तर हा प्रकार घडला नसता, असे पर्रीकर म्हणाले. गुंडगिरी मोडून काढण्यासाठी भाजप पोलिसांना अवश्य साथ देईल. पण, कायद्याचे रक्षण करणारेच कायदा हातात घेऊन बेशिस्त व हिंसक पद्धतीने वागू लागले तर त्याचे अजिबात समर्थन केले जाणार नसल्याचे पर्रीकरांनी बजावले.
सरकारचा प्रशासनावर कोणताच वचक राहिला नाही, हेच या प्रकरणावरून स्पष्ट होते, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Wednesday 20 February, 2008

BREAKING NEWS

बाबुश मोन्सेरात यांना सात दिवस पोलिस कोठडी, जेनिफर यांना सात दिवस न्यायालयीन कोठडी. बाबुश यांच्या घराची व गाडीची नासधूस करणा़ऱ्या पोलिसांची न्यायालयीन चौकशी करण्याची पर्रीकर यांची मागणी.
पणजी पोलिस स्थानकावर काल काय घडले. त्याचा आँखो देखा हाल, सीएनन आयबीएन वाहिनीच्या सौजन्याने.

BREAKING NEWS

बाबुश मोन्सेरातविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद. रीतसर अटक * ताळगावात बाबुश समर्थकांकडून बंद * पोलिस स्थानकावरील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक

पणजी पोलिस स्थानकावर बाबुश समर्थकांचा हल्ला

वाहनांची नासधूस, जाळपोळ;
अनेक पोलिस जखमी;
जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर
सर्वत्र दगड, काचांचा खच

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी ताळगावात बाबनी शेख यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात हात असल्याचे उघड झालेल्या ताळगाव येथील रायन गुदिन्हो या युवकाला बाबनी टोळीने आज घरातून बाहेर बोलावून मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्यामुळे खवळलेले ताळगावचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी आज रात्री साडेनऊच्या सुमारास पणजी पोलिस स्थानकावर हल्ला चढवून तुफान दगडफेक केली. त्यात अनेक पोलिस जखमी झाले. या जमावाने पोलिस स्थानकाबाहेरील तीन वाहनांची जाळपोळ केली, तर अनेक वाहने उलथवून टाकली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व नंतर अश्रुधुराचा वापर केला. पोलिस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी सर्वत्र दगड व काचांचा खच पडला होता, तर जागोजागी रक्ताचा सडा शिंपला गेलेला दिसत होता. पणजी पोलिस स्थानक परिसराला युद्धभूमीची अवकळा आली होती.
बाबनी शेख व बाबूश समर्थक यांच्यातील वैर आता पुन्हा धुमसू लागल्याने ताळगावात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज तेथील रायन गुदिन्हो या युवकाला बाबनी शेख टोळीने घरातून बाहेर काढून मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ बाबुश समर्थकांनी ताळगाव बंद पाडले. ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे समर्थकांनी यावेळी रायनला मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तिची पूर्तता न झाल्याने पोलिसांवर पक्षपाताचा आरोप करून मोन्सेरात यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. जोपर्यंत पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्यासह इतर दोन पोलिस शिपायांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी पोलिस स्थानकासमोर ठिय्या दिला.
पोलिस उपअधीक्षक व उपविभागीय अधिकारी मोहन नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबनी शेख याच्यावर ताळगाव येथे झालेल्या जिवघेण्या हल्ल्याप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. या संशयिताकडून बाबनीवर हल्ला करताना वापरलेल्या स्प्रेसंबंधीची माहिती उघड झाली व त्यात रायन याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी रायन याला ताब्यात घेण्यासाठी त्याचा शोध चालवला. रायन आपल्या घरी असूनही पोलिसांना सापडत नसल्याचे इम्तियाज व पावलो याला कळताच त्यांनी बाबनी शेख हल्ला प्रकरणी रायन याचा सहभाग असल्याचा अंदाज लावत रायन याला पोलिसांच्या हवाली करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी रायन याला फोन करून घराबाहेर बोलावले व तो बाहेर येताच त्याला गाडीत कोंबले. रायन आपल्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी पणजी पोलिसांना दिली व त्याला ताब्यात घेण्याची विनंती केली. यावेळी वाटेत त्याला पोलिसांच्या वाहनात घेतल्यास येथे वातावरण तापेल, असे म्हणून त्याच गाडीने रायन याला पोलिस स्थानकात पोहोचवण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी रायन याला ताब्यात घेतले व त्याला उपचारासाठी गोमेकॉत पाठवले. रायन हा तंदुरूस्त असून त्याला घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिल्याने त्याला परत पोलिस स्थानकात बोलावण्यात आले. मात्र पोलिसांनी रायन याला पकडून देणाऱ्या इम्तियाज शेख व पावलो डिक्रुझ यांना पोलिस स्थानकात ठेवून नंतर बेकायदेशीर जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. याप्रकरणी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी आपल्या स्वाधीन करून घेतले.
दरम्यान, रायन याने मात्र आपल्या जबानीत दिलेली माहिती एका हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणेच होती. आपल्याला घरी झोपलो असताना "मोबाईल' वरून घराबाहेर येण्यास सांगितले व घराबाहेर न आल्यास घरात घुसून बाहेर खेचण्याची धमकी दिली. यावेळी बाहेर येताच त्यांनी आपल्याला गाडीत कोंबले व दंडुके व सळ्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे पोलिसांचे वाहन येताच आपण पोलिसांना त्यांच्या वाहनात घेण्याचा आग्रह केला तर पोलिसांनी या लोकांना "तुम्हाला हवे ते करा व पोलिस स्थानकात आणून द्या', असे त्यांना सांगितल्याचे रायन म्हणाला.
बाबनी शेख व पोलिस यांचे साटेलोटे बनल्याने ताळगावात गुंडगिरी वाढत चालली आहे. निरीक्षक सुदेश नाईक हे बाबनी शेख यांचे हस्तक बनल्याने ते इथे राहिल्यास वातावरण अधिक बिघडेल. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी बाबुश यांनी केली. बाबूश यांनी सरकारवरही टीका करून प्रत्यक्षात सरकार अस्तित्वातच नसल्याचा आरोप केला. गृहखाते रवी नाईक यांच्याकडून मुख्यमंत्री कामत यांनी आपल्या ताब्यात न घेतल्यास हा प्रकार सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले. ताळगावातील परिस्थिती हाताळणे पोलिसांना जमत नसल्यास ते काम करण्यास ताळगाववासिय समर्थ असल्याचेही बाबूश म्हणाले.
मोन्सेरात समर्थकांनी ताळगाव बाजार बंद पाडला व पणजी पोलिस स्थानकावर मोर्चा आणला. मोर्चेकऱ्यांनी पणजी पोलिस स्थानकावर दगडांचा वर्षाव केला. स्थानकासमोरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. अनेक मोटारसायकली उलथून टाकण्यात आल्या. पोलिस स्थानकात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी किमान सात ते आठ पोलिस जखमी झाले. पणजी पोलिस स्थानकासमोर सर्वत्र काचांचा व दगडांचा खच पडला होता. जमाव हिंसक बनल्याने पोलिसांनी लाठीमार केला व तरीही जमाव आटोक्यात येत नसल्याचे पाहून अश्रुधुराची नळकांडी फोडली. या रणकंदनाच्या खुणा रात्री पणजी पोलिस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दिसत होत्या. रात्री सशस्त्र पोलिस दलाचे जवान दोन बसगाड्यांतून ताळगावला रवाना करण्यात आले. ताळगावात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Editorial

मुशर्रफ संकटात!पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दहशतवाद्यांशी लढा देताना जेवढ्या पाकिस्तानी नागरिकांचे बळी घेतले तेवढे भारताने युद्धातही पाक सैनिकांचे घेतले नसतील, असे जे चित्र पाकिस्तानमध्ये निर्माण करण्यात आले, त्याचा जोरदार फटका मुशर्रफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बसल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. मुशर्रफ यांच्या पक्षाला तिसऱ्या स्थानावर फेकणाऱ्या मतदारांनी आत्तापर्यंतचे त्यांचे वर्तन आणि धोरण यांचा विचार करून त्यांना अक्षरशः नाकारले आहे, असाच याचा अर्थ आहे. पाकिस्तान संसदेतील एकूण जागांची संख्या ३४२ असली तरी प्रत्यक्षात २७२ जागांसाठी मतदान झाले होते. मतदान न झालेल्या ७० जागा या राखीव व अन्य प्रकारच्या असल्याने निकालानंतर मिळणाऱ्या जागांच्या प्रमाणात त्या संबंधित पक्षांमध्ये वाटल्या जाणार आहेत. अर्थात बहुमतासाठी एका पक्षाला दीडशेच्या आसपास जागा जिंकणे आवश्यक होते. सुरवातीचा निकाल पाहाता, दिवंगत नेत्या बेनझीर यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ८० च्या वर, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीगला ७० च्या आसपास जागा मिळाल्या असल्या तरी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा ओलांडता आलेला नाही. मुशर्रफ यांच्या मुस्लिम लीगने तर चाळीसपर्यंतच धाव घेतली. हे बलाबल पाहाता, कोणत्या तरी दोन पक्षांना एकत्र येऊन सरकार बनवावे लागेल. मुशर्रफ यांचे विरोधक असलेले नवाझ शरीफ आणि हत्या झालेल्या बेनझीर यांचा पक्ष एकत्र येतात की राष्ट्राध्यक्षपद भूषविणारे मुशर्रफ हे बेनझीर यांच्या पक्षाशी हातमिळवणी करतात, हे चित्र आज-उद्या स्पष्ट होईलच. अर्थात नवाझ व बेनझीर यांचे पक्ष एकत्र येतील, असा कयास व्यक्त केला जात आहे. असे असले तरी बेनझीर यांची हत्या होण्यापूर्वी मुशर्रफ यांनी त्यांच्याशी संपर्क साधून, त्यांना देशात येण्यास संमती देऊन त्यांच्या पक्षाशी सहकार्य करण्यासाठी पावले उचलली होती. त्यामुळे मुशर्रफ हे आपल्या भवितव्यासाठी त्या पक्षाशी यापुढेही संबंध ठेवतील, असे वाटते. आणखी एक शक्यता नाकारता येणार नाही आणि ती म्हणजे निकालाद्वारे व्यक्त झालेली जनतेची मानसिकता लक्षात घेता दोन्ही विरोधी पक्ष अध्यक्ष मुशर्रफ यांना पदच्यूत करण्यासाठी एकत्रित येतील. तसे झाले तर मुशर्रफ यांना पळता भूई थोडी होईल. त्यांच्यावर संसदेत महाभियोग आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुशर्रफ यांच्या पक्षाला बसलेला दणका हा दूरगामी परिणाम करणारा आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी लष्करशहाचे पद खाली केले होते. त्यानंतर देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. संसद विरोधकांच्या हातात गेल्यावर त्या पदावर ते कितपत टिकाव धरु शकतील ही शंकाच आहे. मुशर्रफ यांनी न्यायव्यवस्थेवर जो घाला घातला तो जनतेच्या पचनी पडू शकला नाही. त्याचबरोबर आणीबाणी लादून एकाधिकारशाहीची आपली वृत्ती त्यांनी कायम ठेवली, तीही जनतेला आवडली नाही. देशात झालेली चलनवाढ, अन्नाची टंचाई आणि गरीबाने गाठलेले शिखर यामुळे जनतेमध्ये असंतोष धुमसत होताच. त्यातच देशात अनेक वर्षानंतर परतलेल्या नेत्या बेनझीर भूत्तो यांची २७ डिसेंबरला हत्या झाली. त्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा लाभ पीपल्स पार्टीला निश्चितच झाला. हा पक्ष त्यामुळेच क्रमांक एकवर येऊ शकला. नवाझ शरीफ यांच्या पक्षाला मिळालेले यश थोडेसे अनपेक्षित आहे खरे पण त्यांनी पाकिस्तानात प्रवेश करताच, मुशर्रफ यांच्या अरेरावीला विरोध केला आणि न्यायव्यवस्थेवरील आक्रमणाचाही निषेध केला होता, त्याचा लाभ त्यांना झाला असणे शक्य आहे. लष्करशहाच्या विरोधात दोन पक्षांना मिळालेले यश जनतेच्या भावना स्पष्ट करणारे आहे. या भावनांची दखल हे पक्ष घेतात की अध्यक्षांच्या तालाने वागतात, हे लवकरच दिसून येईल. एक मात्र खरे की मुशर्रफ यांना नमते घेण्याची वेळ पाकिस्तानी जनतेने आणली आहे. त्यांचा दहशतवादविरोधी लढा जनतेला मानवला नाही की त्यांची समन्वयवादी भूमिका जनतेला आवडली नाही, हे हळुहळू उघड होणार आहेच. मुशर्रफ यांचे घडे भरल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यातून ते कसा मार्ग काढतात, त्यांचा मित्रदेश असलेला अमेरिका त्यांना कसा सावरतो, हेही दिसेल. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना आता नव्या सत्ताधीशांना आपल्यामागे नेण्याचा डाव अमेरिका खेळू शकेल.
परवेज मुशर्रफ यांनी जर तात्काळ राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही तर पाकिस्तानमध्ये इराणसारखी क्रांती होण्याची शक्यता कुणीही नाकारू शकणार नाही, असा इशाराच आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल यांनी दिला आहे.लष्करी जवान आणि लोकांमध्ये रस्त्यावर रक्तरंजित संघर्ष व्हावा असे वाटत असेल तर मुशर्रफ यांनी पद सोडावे, नपेक्षा देशात यादवी माजेल. १९७९ मध्ये शाह यांच्या राजवटीविरुद्ध इराणमध्ये ज्याप्रमाणे क्रांती घडविण्यात आली होती तशी क्रांती पाकमध्ये घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे गुल यांनी म्हटले आहे, त्यामुळे
पाकिस्तान सध्या इराणसारख्याच क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. मुशर्रफ यांच्याबाबत प्रचंड रोष असलेले वकील, विद्यार्थी हेच हातात शस्त्र घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
सासष्टी मामलेदारांकडून
मुदत वाढीला "मान्यता'
मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी) - केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष खिळून असलेल्या सिने अभिनेता संजय दत्त व मान्यता यांच्या गोव्यात झालेल्या वादग्रस्त विवाह नोंदणी प्रकरणी दिलेल्या रहिवासी दाखल्यासंबंधी सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई यांनी मान्यता हिला आपणासमोर हजर होण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली असून त्यानुसार या प्रकरणी ७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
मामलेदारांनी काल तिला जारी केलेल्या नोटिशीनुसार तिला आज सकाळी ११-३० वा. पर्यंत मामलेदार कार्यालयात उपस्थित व्हावयाचे होते , पण त्या उपस्थित राहिल्या नाहीत, त्याऐवजी त्यांच्यावतीने त्यांचे वकील मनोज देसाई हे मामलेदार कार्यालयात उपस्थित राहिले व त्यांनी नोटीस कालच मिळाली असल्याने उत्तर देण्यासाठी किमान दोन आठवड्यांची मुदत हवी असल्याची विनंती केली . त्यावर थोडावेळ युक्तिवाद झाल्यानंतर मामलेदार फळदेसाई यांनी ७ मार्चपर्यंत मुदत दिली. आता ७ मार्च रोजीच त्यावर सुनावणी होणार आहे.
मान्यताने खोटा पत्ता दाखवून रहिवासी दाखला मागितल्याचे हे प्रकरण उघडकीस आल्यावर मामलेदार कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या चौकशीत आढळून आले हेाते. तो दाखला मिळवून मडगाव येथील विवाह नोंदणी कार्यालयात संजय दत्त व मान्यताने विवाहासाठी प्रथम नोंदणी केली होती . ती देखील वादात सापडलेली असून ती एकंदर प्रक्रियाच आता रहित ठेवण्यात आलेली आहे.
आज मान्यता कोर्टात उपस्थित राहणार की नाही हे पाहण्यासाठी पत्रकार तसेच नागरिकांनी गर्दी केलेली होती. परंतु ती न आल्याने बराच वेळ थांबून नागरिक परतले. उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मान्यताचे वकील मनोज देसाई यांची भेट घेऊन मान्यता संबंधी विचारले असता त्यांनी कालच नोटीस मिळालेली आहे व उत्तर द्यायला वेळ पुरेसा नसल्यानेच मुदतवाढ मागितली आहे , मान्यता सध्या कामानिमित्त गोव्याबाहेर असल्याने ती आज हजर होऊ शकली नसल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात निलंबन कारवाई झालेला तलाठी प्रशांत कुंकळयेकर याच्यावर आरोपपत्र ठेवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचल्याचे सूत्रांनी सांगितले.
कुंकळ्ळी पालिकेची तक्रार
कुंकळ्ळी, (प्रतिनिधी)ः संजयदत्त-मान्यता विवाहासंबंधी आवश्यक असलेला मान्यताचा वास्तव्य दाखला मिळवण्यासाठी दाखल केलेला व आवकवहीत ३८२४ क्रमांकाखाली दि. ६फेब्रुवारी रोजी नमूद झालेला अर्ज निवासी दाखला मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे कारकुनाच्या टेबलावरून हिसकावून घेत आलेल्या दोघांनी तिथून काढता पाय घेतला. याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची भेट घेतली असता श्री. फर्नांडिस म्हणाले की, कुठलाही सरकारी दस्तावेज कारकुनाच्या नकळत किंवा परवानगीशिवाय त्यांच्या टेबलावरून उचलणे, पळवणे किंवा हिसकावून घेणे हा कायद्याने गंभीर गुन्हा ठरत असून आवक वहीत ३८२४ क्रमांकाखाली नमूद झालेला हा अर्ज कायदेशीररीत्या नगरपालिकेची अधिकृत मालमत्ता ठरते. सबब वरील अर्ज घेऊन गेलेला दोघांवरही कायदेशीर कारवाई करणे हे आपले कर्तव्य ठरत असून आज आपण त्या दोघांवरही कुंकळ्ळ्ी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
"काणकोण बंद' यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग अडविला आठ तास वाहतूक ठप्प लेखी आश्वासनानंतरच "बंद' मागे

गावडोंगरी, दि. १९ (वार्ताहर)- काणकोण नागरिक समितीने दिलेल्या मुदतीत गुळे ते पोळे रस्त्याच्या नूतनीकरणाला प्रारंभ न केल्यामुळे आज (दि.१९) काणकोणवासीयांनी पुकारलेले "काणकोण बंद' आंदोलन १०० टक्के यशस्वी झाले. बेमुदत पुकारलेले हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतरच मागे घेण्यात आले. सकाळपासून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखल्याने सुमारे आठ तास वाहतूक ठप्प होती. आंदोलनादरम्यान, काही ठिकाणी रस्त्यावर झाडे टाकून जाळण्याचेही प्रकार घडले.
सकाळी ६ पासून गुळे येथील पेट्रोलपंपाजवळ सहा व चार चाकी वाहने अडवून ती पंक्चर करण्यात आली. त्याचप्रमाणे करमलघाट - गुळे येथेही वाहने अडविण्यात आली. यामुळे मडगावहून कारवारकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. सकाळी ७ च्या दरम्यान, काणकोण - चावडी येथील जुन्या बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर लाकडांना आग लावण्यात आली. यावेळी "चर्चिल मुर्दाबाद', "एक दो एक दो, दिगंबर कामत को फेक दो' अशा घोषणाही देण्यात आल्या. वीज कार्यालयासमोर पाच - सहा टिप्पर ट्रक रेती ओतून वाहतुकीत अडथळा निर्माण केला.
या आंदोलनात शांताजी गावकर, अनंत सावंत, श्याम केंकरे, श्याम देसाई, विशांत गावकर, वल्लभ पै, वल्लभ टेंगसे, नगराध्यक्ष रंगनाथ गावकर, उपनगराध्यक्ष दिवाकर पागी, गोवा कॉंग्रेस युवा उपाध्यक्ष जर्नादन भंडारी, काणकोण युवा कॉंग्रेस अध्यक्ष संजू नाईक, संदेश तेलेकर, संतोष तुबकी, बाबू प्रभुदेसाई, देवेंद्र देसाई तसेच विविध पंचायतीचे सरपंच, पंच यांच्यासमवेत सुमारे ७०० नागरिक सहभागी होते.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी गोकूळदास नाईक यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण, नागरिक त्यांचे काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते आपल्या भूमिकेशी ठाम होते. परिणामी, त्यांनी सुमारे आठ तास राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतूक रोखून धरली. नंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्री. नाईक व कार्यकारी अभियंता यांनी सदर महामार्गाच्या डांबरीकरणाबाबत दि. २२ फेब्रुवारीपर्यंत आदेश देऊन दि. २६ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे लेखी निवेदन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. त्याचप्रमाणे बाळ्ळी ते माशेपर्यंतच्या महामार्ग नूतनीकरणाची जबाबदारी मामलेदार श्री. नाईक यांनी घेतली.
नागरिकांचा पाठिंबा
काणकोण तालुक्यातील आगोंद, खोतीगाव, गावडोंगरी, पैंगीण, पोळे आदी भागांतील सर्वच नागरिकांनी या "काणकोण बंद'ला पूर्ण पाठिंबा दर्शविला. तसेच चावडी येथील दुकानदारांनीही आपापली दुकाने बंद ठेवून आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. महिलाही मोठ्याप्रमाणात आंदोलनात सहभागी होत्या.
आंदोलन योग्यच ः तवडकर
काणकोण तालुक्यातील विकासकामांबाबत अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली. पण, त्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्याचप्रमाणे यापूर्वी दोन वेळा आंदोलन करूनही काणकोणवासीयांच्या पदरी निराशाच आली. यामुळे निद्रिस्त शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे आमदार श्री. तवडकर यांनी सांगितले.
सहनशीलतेचा अंत ः खोत
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर येथील जनतेचा विश्वास होता. पण, कॉंग्रेसमधील अंतर्गत बंडखोरी सांभाळण्यात मग्न असलेल्या मुख्यमंत्र्यांना जणू त्यांनी दिलेल्या आश्वासनांची विसरच पडली. यामुळे येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत होऊनच हे आंदोलन छेडले, असे आमदार श्री. विजय पै. खोत म्हणाले.
महिला पोलिस गंभीर जखमी
ताळगावमधील बाबुश समर्थक पणजी पोलिस स्थानकासमोर ठाण मांडून बसल्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी समोर महिला पोलिसांना तैनात केले. ज्यावेळी जमावाने दगडफेक केली, त्यावेळी जमाव पोलिस ठाण्यात घुसू नये यासाठी पोलिसांनी फाटक बंद केल्याने महिला पोलिसांना जबर हल्ल्यास सामोरे जावे लागले. या सर्व गदारोळात दहा महिला पोलिस जखमी झाल्या असून, पोलिस निरीक्षक गुरुदास गावडे, उपनिरीक्षक दिपक पेडणेकर यांच्यासह अनेक पोलिस जखमी झाले आहेत. या सर्वांना गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये मिलिंदा फडते, सुवर्णा शेळके, तेजा घोडगे, गौरीश सावंत, सुरेखा पाटील, स्वाती आरोलकर, एन.एन.रेडकर, आर.आर.शेटकर व एन.व्ही.म्हापसेकर यांना जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले आहे. मोर्चा येणार असल्याची माहिती संध्याकाळी चार वाजता मिळूनही पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजले नसल्याची माहिती मिळाली.

Tuesday 19 February, 2008

... तर आंदोलकांना आत टाकू!पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)-काणकोण तालुक्यातील गुळे ते पर्तगाळ व पर्तगाळ ते माशे या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे २० किलोमीटरच्या रस्त्याचे काम येत्या चार दिवसांत सुरू करू, असे आश्वासन सा. बां. खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिले.
केवळ काही तांत्रिक कारणांमुळे दीड महिन्याअगोदर निविदा काढूनही हे काम रेंगाळल्याचा खुलासा त्यांनी यावेळी दिला. या प्रकरणी विनाकारण राजकारण करून काणकोण बंद करू पाहणाऱ्यांना तात्काळ आत टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पोलिसांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
गेल्या सरकारकडे राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यासाठी निधी नव्हता. आपण दिल्लीत प्रयत्न करून सुमारे १४ कोटी रुपये निधी मिळवला असून त्याअंतर्गत ही महत्त्वाची कामे मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. काणकोणच्या या रस्त्याचे काम अडकून पडण्यास बांधकाम सल्लागार समिती जबाबदार असल्याची माहिती त्यांनी दिली. या रस्त्याच्या कामांच्या निविदा वाढीव रकमेत सादर झाल्याने त्याबाबतचा निर्णय बांधकाम सल्लागार समितीने घ्यायचा असतो. मुख्य सचिव जे. पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील या समितीवर वित्त सचिव, सा. बां. खा. सचिव व प्रमुख अभियंते सदस्य आहेत. हे अधिकारी सेवेनिमित्त बाहेर गावी असल्याने त्यांची बैठक होऊ शकली नाही. आज याबाबतचा निर्णय घेऊन येत्या चार दिवसांत कामाचे आदेश दिले जातील, असेही श्री.आलेमाव म्हणाले.

Monday 18 February, 2008

नेरुल ग्रामसभेत
पंचसदस्यांचा गोंधळ
"नेरूल बचाव अभियाना"ची
ग्रामस्थांकडून स्थापना

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- नेरूल नागरिक कृती समितीकडून पाणी टंचाईच्या प्रश्नाबाबत पंचायत मंडळाला जाब विचारण्यात आल्याने आज खुद्द पंचायत सदस्यांकडूनच ग्रामसभेत गोंधळ घालण्याचा अजब प्रकार घडला. पाण्याच्या विषयावरून चर्चा करण्याचे सोडून नागरिक कृती समितीच्या सदस्यांवर सत्ताधारी पंच सदस्यांकडून आगपाखड करण्याचा प्रकार घडल्याने यावेळी झालेल्या गोंधळाला आवर घालण्यासाठी मामलेदारांना ग्रामसभा बरखास्त करावी लागली.
ग्रामसभेनंतर या ठिकाणी जमलेल्या लोकांनी ग्रामस्थांचे हित जपण्यात असमर्थ ठरलेले पंचायत मंडळ बरखास्त करून पंचायतीवर प्रशासक नेमावा अशी मागणी केली. यापुढे "नेरूल बचाव अभियान' या नावाखाली ग्रामस्थ आपल्या अडचणी व समस्यांवरून आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला.
नेरूल गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर आज ही पहिली ग्रामसभा बोलावण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सोडवला जात नसल्याने याबाबत जाब विचारण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थिती लावली होती. या ठिकाणी गोंधळ होणार असल्याची चाहूल लागल्याने पोलिस फौजफाटाही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
ग्रामसभेच्या सुरुवातीस जेव्हा सचिव प्रशांत नाईक यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले त्यावेळी गेल्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांची नोंद झाली नसल्याचे नेरूल कृती समितीचे निमंत्रक शिवानंद नाईक यांनी त्यांच्या नजरेस आणून दिले. नेरूल भागातील लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा व गरजेचा पाण्याचा प्रश्न गेल्यावेळी चर्चेस आला असताना त्याचा उल्लेखही इतिवृत्तात नसल्याने ते संतप्त बनले होते. यावेळी पंचसदस्य संजय कळंगुटकर यांनी "हा प्रश्न नागरिक कृती समितीचे निमंत्रक की ग्रामस्थ म्हणून तू विचारतोस' असा प्रश्न उपस्थित करून श्री.नाईक यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नागरिक समिती व ग्रामस्थ हे वेगळे नाहीत,असे सांगून पंच सदस्यांकडून जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केला जात असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी गांेंधळ घालण्याचा प्रकार ग्रामसभेत घडतो परंतु यावेळी मात्र खुद्द सत्ताधारी पंच मंडळाकडून ग्रामसभेत गोंधळ घालण्यात आल्याचा प्रकार घडला अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
हा गोंधळ होताच बार्देश तालुक्याचे मामलेदार गणेश नारूलकर, पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी सभागृहात प्रवेश करून ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण अधिक तापदायक होणार असल्याची चाहूल लागल्याने मामलेदार श्री.नारूलकर यांनी ग्रामसभा बरखास्त करण्याचे आदेश जारी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच शशिकला गोवेकर,उदय देसाई,शिरू शिरोडकर यांनी सत्ताधारी गटाच्या सदस्यांना चांगलेच धारेवर धरले. गावातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेल्या पंच सदस्यांकडून लोकांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न होतात तेव्हा अशा प्रतिनिधींना सत्तेवर राहण्याचा कोणताच अधिकार नाही,असे सांगून श्रीमती विनंती कळंगुटकर यांनी पंचायत मंडळच बरखास्त करण्याची जोरदार मागणी केली व उपस्थित ग्रामस्थांनी ही मागणी उचलून धरली.
वास्तव्याचा दाखला
आता मान्यताला

नोटीस पाठविणार
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- संजय दत्तच्या पत्नी मान्यता हिने विवाह नोंदणीवेळी सादर केलेल्या वास्तव्याच्या दाखल्यासंबंधी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
संजय दत्त व मान्यता यांनी विवाहासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सासष्टी तालुक्याचे उपनिबंधक चंद्रकांत पिसुर्लेकर यांच्यासमोर सादर केले होते. सदर रहिवासी दाखल्यावरूनच ही विवाह नोंदणी झाली होती त्यामुळे ती खोटी ठरल्यास हा विवाहच बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई हे सध्या या वादग्रस्त रहिवासी दाखल्यासंबंधी चौकशी करीत आहेत. सदर रहिवासी दाखल्यासंबंधी प्रथमदर्शनी संशय बळावल्याने हा दाखला दिलेले तलाठी प्रशांत कुंकळ्ळीकर यांना निलंबित करण्याचा आदेशही जारी करण्यात आला होता. सदर रहिवासी दाखल्यासाठी मान्यताचे गोव्यातील सहा महिने वास्तव्य असणे गरजेचे आहे त्यामुळे ती खरोखरच गोव्यात सहा महिने होती काय, यासंबंधीची चौकशी सध्या सुरू आहे. यासंबंधी सदर तलाठ्याने हा रहिवासी दाखला देताना मामलेदार कार्यालयालाही विश्वासात घेतले नाही, असाही प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी जबाबदार अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे संकेत मिळाले असून जर खरोखरच मान्यता सहा महिने गोव्यात वास्तव्यास होती हे सिद्ध झाले तर मात्र हा दाखला ग्राह्य धरता येईल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
बजरंग दलाला शोभायात्रा काढण्यापासून रोखले
दवर्ली येथे तणावाची स्थिती

मडगाव, दि.१७ (प्रतिनिधी) - बजरंग दलातर्फे वास्को येथे आयोजित मेळाव्याला जाण्यासाठी येथील मारुती मंदिरासमोर जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दवर्ली वसाहतीत शोभायात्रा काढण्यापासून जिल्हा प्रशासनाने अडवून नंतर पोलिस संरक्षणात वास्कोकडे रवाना करण्याचा प्रकार आज दुपारी घडला व त्यांतून त्या परिसरात आज काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे वास्कोला जाण्यासाठी भगव्या वेशांतील हे कार्यकर्ते दवर्ली येथील मारुती मंदिरासमोरील पटांगणात एकत्र येऊ लागताच ते दवर्ली गृहनिर्माण वसाहतीत शोभायात्रा काढणार असल्याच्या संशयाने कोणीतरी ते पोलिसांना कळविले. लगेच सशस्त्र पोलिसांना घेऊन एक बस तेथे दाखल झाली व त्यांनी मारुती मंदिरासमोरून रहिवासी वसाहतीकडे जाणारा मार्ग दोरखंड बांधून अडविला. उपजिल्हाधिकारी दीपक देसाई हेही तेथे दाखल झाले व त्यांनी दलाच्या नेत्यांशी बोलणी करून त्यांनी मिरवणुकीसाठी कायदेशीर परवानगी घेतलेली नसल्याने त्यांना येथे मिरवणूक वा शोभायात्राही काढता येणार नाही, असे बजावले व नंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना वास्कोकडे पाठविले.
मात्र या एकंदर घडामोडीत दवर्ली भागात तणावाची स्थिती निर्माण झाली ,ती उशिरापर्यंत तशीच होती. बजरंगदल कार्यकर्ते जरी वास्कोकडे गेले तरी दवर्ली येथे रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुडचिरे- वायंगिणे येथे बिबटा जेरबंद
बोंडला येथे रवानगी

डिचोेली, दि. १७ (प्रतिनिधी) - डिचोली तालुक्यात गेले काही महिने बिबट्यांचा वावर वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे ४.३० च्या सुमारास कुडचिरे वायंगिणी येथे एक बिबटा अडकला. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासांत त्याला सुरक्षितपणे बोंडला येथे गाडीतून नेला.
गेले काही महिने डिचोली तालुक्यातील कुडचिरे, मये, शिरगांव, पिळगांव, धबधबा येथे बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून प्राणिमित्र अमृतसिंग व वनखात्यातर्फे बिबट्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. बोर्डे येथे मुख्य रस्त्याच्या बाजूलाच प्रथम बिबट्या विहिरीत पडला होता त्याला अमृतसिंग आणि साथीदारांनी सुरक्षितपणे बाहेर काढून बोंडला येथे रवानगी केली होती .त्यानंतर कुडचिरे भागात बिबट्यांचे राजरोसपणे दर्शन होऊ लागले होते. कुत्रे व इतर पाळीव जनावरांवर बिबटे हल्ले करू लागल्यामुळे दहशत निर्माण झाली होती. १९ डिसेंबर या गोवा मुक्ती दिनी कुडचिरे येथेच बिबटा पिंजऱ्यात अडकला होता, तासाभरातच त्याने पिंजऱ्यातून सुटका करून घेतली होती. जाताजाता अमृतसिंग व साथीदारांना जखमीही केले होते. त्यानंतर बिबट्यांना पकडण्यासाठी व्यापक मोहीम वनखात्यातर्फे राबविण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत आज पहाटे वायंगिणी येथेच बिबटा पिंजऱ्यात अडकला. बनखात्यातर्फे लगेच त्याला ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू झाली. बिबटा अडकला आहे ही गोष्ट गुप्त राखण्यात आली होती. नपेक्षा बघ्यांची संख्या पोलिसांच्यासुद्धा नियंत्रणाबाहेर जाऊन बिबटा अधिकच चवताळतो हा अनुभव लक्षात घेऊन वनखात्यातर्फे अत्यंत सावधपणे आज बिबट्याला ताब्यात घेतले. गोवादूत डिचोली प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली, त्यावेळी पिंजऱ्यात बिबटा शांतपणे बसला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्याची तयारी सुरू झाली त्यावेळी मात्र तो गुरगुरू लागला. बघ्यांची विशेष उपस्थिती नसल्यामुळे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेण्यात सुलभ गेले.
गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याला पकडण्यासाठी इथे खास प्रकारे बनविलेला पिंजरा लावण्यात आला होता. एका बाजूला कुत्र्याला ठेवण्यात आले होते. बिबटा आत शिरला की पिंजऱ्याचे दार बंद होत असे. पण समोर असलेला कुत्रा मात्र दुसऱ्या भागात सुरक्षित असे. वनखात्याचे कर्मचारी विष्णू गावस व महादेव माईणकर यांचा मुक्काम गेले दोन महिने इथेच होता. शेजारील च्यारी कुंटुबियांचेही मोलाचे सहकार्य या मोहिमेला लाभले होते. पूर्ण वाढ झालेला नर जातीचा हा बिबटा आज पहाटे अडकल्यानंतर रेंज फोरेस्ट ऑफिसर तुळशीदास वाडकर, राऊंड फॉरेस्ट ऑफिसर विलास गावस, प्रदीप वेरेकर, धाराजीत नाईक, साईनाथ शिरोडकर व इतरांनी बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन बोंडलाला प्रयाण केले.

Sunday 17 February, 2008

वाहतूकदारांच्या ठाम भूमिकेपुढे सरकारचे नमते
वेगनियंत्रक सक्ती अखेर रद्द

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व अवजड वाहनांसाठी १ फेब्रुवारीपासून वेगनियंत्रक सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात वाहतूक संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेसमोर नमते घेत आज अखेर या निर्णयासंबंधीची अधिसूचना स्थगित ठेवण्याची घोषणा सरकारने केली. वाहतूकदारांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्याला कडक उत्तर देण्याच्या आविर्भावात लागू केलेला "अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा' "एस्मा' ही मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्व अवजड वाहनांसाठी वेगनियंत्रक यंत्रणा लागू करण्याची अधिसूचना सरकारने काढली होती. या निर्णयाविरोधात राज्यभरातील सर्व वाहतूकदारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता. वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्याची घोषणा करून संपाला सामोरे जाण्याची तयारीही सरकारने ठेवली होती.
दरम्यान, याप्रकरणी वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारातील अनेक मंत्र्यांना निवेदने सादर करून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याने मुख्यमंत्र्यांना अखेर या निर्णयापासून मागे हटणे भाग पडले आहे. आपल्या या माघारीचे समर्थन करताना मुख्यमंत्री कामत यांनी वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील सामान्य जनता वेठीस धरली जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा केला. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्याने काही पालकांनी आपल्याशी संपर्क साधल्याचे ते म्हणाले. अशा वेळी संपाचा घोळ झाल्यास वाहतूक ठप्प होण्याची भीती त्यांनी वर्तविल्याने हा निर्णय तूर्त स्थगित ठेवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. मार्च महिन्यानंतर ही स्थगिती उठवणार काय,असा सवाल केला असता "ते नंतर पाहू' असे मुख्यमंत्री म्हणाले. वेगनियंत्रक यंत्रणेच्या सक्तीचा निर्णय अनेक राज्यांत सुरू असून गोव्यातही भविष्यात तो लागू करणे अपरिहार्य असल्याचे संकेत मात्र त्यांनी यावेळी दिले.
वेगनियंत्रकामुळे आपल्याला आर्थिक लाभ मिळणार असल्याची भावना वाहतूकदारांनी करून या प्रकरणी आपल्याला लक्ष्य बनवल्याचे वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर म्हणाले. या प्रकरणी वाहतूकदारांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊनही त्यांनी कोणताही प्रतिसाद देण्यास नकार दिल्याने व या निर्णयाबाबत सरकारातीलच काही नेत्यांनी नाराजी दर्शवल्याने हा निर्णय मागे घेणे भाग पडल्याचे श्री. मडकईकर म्हणाले. आता डिझेलचे दर वाढल्याने तिकीट दरवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे का, असा सवाल त्यांना केला असता त्याबाबत अद्याप आपल्याकडे काहीही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार फ्रान्सिस सार्दिन, गृहमंत्री रवी नाईक, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर व वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर हजर होते.
दरम्यान, आमच्या उसगाव - तिस्क वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, वेगनियंत्रक बसविण्याची सक्ती गोवा सरकार मागे घेईपर्यंत १९ फेब्रुवारीपासून टिपर ट्रक, बसेस, पिकअप वाहने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय आज सकाळी उसगाव - बाराजण (वड) येथे नंदकिशोर का. शे. उसगावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात साउथ गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रक ओनर असोसिएशनतर्फे झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. १८ रोजी सायंकाळपासून सर्व खनिज मालवाहू टिपर ट्रक बंद ठेवण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला होता.
टिपर ट्रक, बसेस, पिकअप यांना वेग नियंत्रक बसविण्याची सक्ती राज्य सरकारने त्वरित रद्द करावी. तिस्क उसगाव बगल मार्ग ते उसगाव नवीन चौपदरी पूल पर्यंत खनिज माल वाहतुकीसाठी वेगळा बगलमार्ग त्वरित बांधावा, अशा दोन प्रमुख मागण्या या वाहनमालकांनी या बैठकीत केल्या.
या बैठकीला साउथ गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रक ओनर असोसिएशनचे अध्यक्ष साल्वादोर परेरा, पदाधिकारी श्याम सरमळकर, शिवाजी तिळवे, सत्यवान नाईक, सेंट्रल गोवा टिपर ट्रक ओनर असोसिएशनचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष सुभाष प्रभू, सीताराम गावकर उपस्थित होते.
१९ रोजी सकाळी ८ वाजता सर्व टिपर ट्रक, बसेस, पिकअप मालक यांनी पणसुले धारबांदोडा येथील बगल मार्गावर जमण्याचेही बैठकीत ठरवण्यात आले होते. या मार्गावरील सर्व वाहतूक रोखून धरण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. उसगाव बाराजण (वड) येथेही वाहतूक रोखून धरण्यात येणार होती.
राज्यात घडणाऱ्या भीषण अपघातांना अवजड वाहनांची जलद गती कारणीभूत ठरत नाही. अपघात घडण्यास अनेक कारणे असतात. त्यात उखडलेले व अरुंद रस्ते हे प्रमुख कारण आहे. या शिवाय दुचाकीस्वारांचा निष्काळजीपणा हेही एक कारण आहे. गती नियंत्रक (स्पीड गर्व्हनस्) टिपर ट्रक, बसेस, पिकअप वाहनांना लागू केले असले तरी अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता नाही. या पेक्षा सरकारने आधी रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्यावर वाहन अपघात होतात त्याला केवळ अवजड वाहनेच जबाबदार नाहीत. सरकारी यंत्रणाही तेवढीच जबाबदार आहे. गोव्यातील रस्ते व वाहतूक खात्याची यंत्रणा दुबळी असल्याने वाहन अपघात होतात. १६ हजार रुपये किंमतीचे वेग नियंत्रक बसविल्याने अपघातांवर नियंत्रण येणार नाही. वेग नियंत्रण लावल्यामुळे इंधन जास्त लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. शिवाय वाहनांच्या इंजिनालाही ते अपायकारक ठरेल असे मत वाहनमालकांनी या बैठकीत व्यक्त केले.
इंधनाच्या दरवाढीमुळे वाहन मालक हैराण झाले आहेत. महागडे वेग नियंत्रक यंत्र (उपकरण) बसविण्याची सक्ती म्हणजे वाहन मालक असलेल्या आम आदमीचे कंबरडेच मोडण्याचा प्रकार आहे अशा प्रतिक्रिया यावेळी टिपर ट्रक, बस, पिकअप वाहनांच्या मालकांनी व्यक्त केल्या.
वेगवेगळ्या करांच्या भडिमारामुळे खनिज मालवाहू टिपर ट्रक व्यवसाय मोडकळीस आला आहे. अशा अवस्थेत गतिनियंत्रक बसविण्याची सक्ती म्हणजे या व्यवसायाचे कंबरडे मोडण्याचा सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे हा व्यवसाय कोलमडून पडेल. रस्ता कराच्या रकमेत ४० टक्के वाढ झाली आहे. इतर करांतही भरमसाट वाढ झाल्याने हा अतिरिक्त भार सोसणे टिपर ट्रक मालकांच्या कुवतीबाहेरचे ठरले आहे. त्या शिवाय इतर राज्यांतील ट्रकांना ही सक्ती नसल्याने त्यांच्यावर कोण अंकुश ठेवणार? गतिनियंत्रकामुळे टिपर ट्रकांची गती कमी झाल्याने डिझेल इंधनाचा वापर वाढेल. त्यामुळे टिपर ट्रक मालकांना अतिरिक्त भार सोसण्याबरोबर इंधनाच्या बाबतीत फार मोठे नुकसान होणार आहे. सध्या राज्यात होणारे अपघात हे गतीमुळे नव्हे, तर रस्त्याच्या दुर्दशेमुळे होत आहेत. या उपकरणामुळे चढणीवर वाहने चढणार नाहीत, असे या बैठकीत बोलताना साउथ गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रक ओनर असोसिएशनचे अध्यक्ष साल्वादोर परेरा म्हणाले.
या बैठकीला सावर्डे, दाभाळ, धारबांदोडा, कुळे, मोले, साकोर्डा, तिस्क उसगाव, उसगाव, पाळी, भामई, कोंठबी, सुर्ल, वेळगे येथील टिपर ट्रक, बसेस, पिकअप वाहनांचे मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी १२.२० वाजता संपली.
संजय दत्त - मान्यता विवाह कागदपत्रे कायदा खात्याकडे
मडगाव,दि. १६ (प्रतिनिधी)- दैनिक गोवादूतने सर्वांत प्रथम उघडकीस आणलेल्या संजय दत्त विवाह नोंदणी गैरप्रकारातील सर्व कागदपत्रे मुख्य जन्म मृत्यू व विवाह नोंदणी निबंधक पंढरीनाथ बोडके यांनी ताब्यात घेऊन ती व त्यावरील आपला अहवाल कायदा खात्याकडे पाठविली आहेत. विवाह नोंदणी कार्यालय कायदा खात्याच्या अखत्यारीत येत असते. त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा अंकुश नसतो. त्यामुळे पुढील सर्व चौकशी कायदा खात्याने करावी यासाठी सर्व कागदपत्र कायदा सचिवांकडे पाठवण्यात आली आहेत.
या बनावट रहिवासी दाखल्यासंबंधी दोन ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे. "गोवादूत'ने हे प्रकरण सर्वप्रथम अस्सल कागदपत्रांच्या छायाप्रतींसह उजेडात आणताच, जिल्हाधिकाऱ्यांनी मामलेदारांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. मामलेदार परेश फळदेसाई यांनी तलाठी प्रशांत कुंकळ्येकर याला मेमो दिला असता त्यांनी तो स्वीकारला नाही. उलट उद्दामपणाची उत्तरे दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा उपमर्द केला व शिस्तीचे पालन केले नाही. त्यामुळे अहवाल तयार करून मामलेदारांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करून हे प्रकरण गंभीर असून शिस्तभंगाच्या नियमाखाली तलाठ्याची कृती निलंबन करण्यासारखी आहे असा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. व तात्काळ तलाठ्याला निलंबित करून पुढील कारवाई सुरू केलेली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हे सर्व कागदपत्र घेऊन विवाह नोंदणी करण्यासाठी मडगाव येथील उपनिबंधकाच्या कार्यालयात कदम नामक व्यक्ती गेली होती. येथील एका संबंधित कर्मचाऱ्याला हाताशी धरून ते कागदपत्र बाणावली येथील तारांकित हॉटेलात नेण्यात आले. तेथे संजय दत्त व मान्यता ऊर्फ दिलनशील शेख यांनी त्या कागदपत्रांवर सही केली व ते कागदपत्र पुन्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात आणून दिले असे आढळून आले आहे. विवाहाची नोंदणी करणाऱ्या वधूवरांनी उपनिबंधक कार्यालयात येऊन सही करण्याचा नियम असताना हे कागदपत्र हॉटेलात कसे गेले, कदम याच्याबरोबर कोण कर्मचारी गेले होते, तसेच नोंदणीविषयक कागदपत्र असे बाहेर नेता येतात काय, याची चौकशी व्हावी अशी मागणी उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी पंढरीनाथ बोडके यांच्याकडे केली गेली आहे. संजय दत्त, दिलनशील शेख यांचा संबंध गोव्यातील शिवानंद कदम व त्यांच्या कुटुंबियांशी कसा आला याची चौकशी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी करावी अशी मागणी होत आहे. शिवानंद कदम हे काणकोण तालुक्यात महत्त्वाच्या पदावर होते. तेथे मान्यता हिच्या नावावर भूखंड असल्याची माहिती "गोवादूत'ला मिळाली असून त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे.
बनावट रहिवासी दाखल्यासंबंधी तलाठ्याची कृती ही बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यास त्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवण्यात येईल. त्याशिवाय संजय दत्त याचे घोगळ येथील फेलिसियान अर्पाटमेंटमध्ये वास्तव्य असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे सिद्ध झाल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करता येते असे मडगाव येथील वकिलांनी सांगितले. त्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनीही खोट्या प्रतिज्ञापत्राबद्दल चौकशी करता येते असे सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष या गैरव्यवहार प्रकरणाकडे लागले असून
मुंबई ते दिल्लीपासून अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांनी गोव्यात येऊन त्याची माहिती मिळवण्यासाठी ठाण मांडलेले आहे. काल व आज अनेक पत्रकारांनी जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांची भेट घेऊन बनावट दाखल्यासंबंधी माहिती मिळविली.
मोगुबाई संगीत संमेलन
राष्ट्रीय स्तराचे बनवा ः मुख्यमंत्री
मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी)ः गोवा मुक्तीनंतर "स्वरमंच' संस्था संगीत क्षेत्राच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य करीत असून गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलन हे कायमस्वरूपी राष्ट्रीय संमेलन बनवावे. त्यासाठी गोवा सरकार सर्वतोपरी सहाय्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज दिली.
"स्वरमंच' आयोजित सातव्या गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर स्मृती संगीत संमेलनाचे उद्घाटन विद्याभुवन सभागृहात झाले. आमदार दामोदर नाईक यांनी समई प्रज्वलित करून व मोगुबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री कामत, आमदार दामोदर नाईक, आयोजन समितीचे अध्यक्ष किरण नायक, संस्थेचे अध्यक्ष संजीव प्रभुदेसाई, विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विष्णू पै रायतुरकर, उपनगराध्यक्ष नारायण पै फोंडेकर, सचिव सुनील नाईक उपस्थित होते.
मडगाव येथे कित्येक वर्षांपासून संगीत नाटकाची जोपासना होते. त्यासाठी मडगावला सांस्कृतिक केंद्राचा दर्जा मिळणे साहजिकच आहे, असे श्री. कामत म्हणाले.
समारंभाचे सन्माननीय अतिथी आमदार दामू नाईक यांनी गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या संगीताचे महत्त्व विशद केले. मोगुबाईंनी केवळ संगीताचे देणेच दिले नाही, तर किशोरी आमोणकर या जागतिक कीर्तीच्या गायिका दिल्या, असे ते पुढे म्हणाले. फातोर्ड्याचे भूषण ठरेल असे रवीन्द्र भवन पूर्णत्वास येत असून त्याचे उद्घाटन गुडीपाडव्यास करावे, असे दामू नाईक म्हणाले.
आयोजन समितीचे अध्यक्ष किरण नाईक यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष संजीव प्रभुदेसाई यांरनी अहवाल सादर केला. सुनील नाईक यांनी आभार मानले. संजना देसाई, सर्वदा आचार्य, सायली वेर्णेकर, वेष्णवी धारवाडकर, सुजाता देसाई, प्रतीक भट व देवेंद्र देसाई यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले.
शिल्पा डुबळे यांच्या शास्त्रीय संगीताने संमेलनाची सुरुवात झाली. त्यांना दयानंद बांदोडकर व राया कोरगावकर यांनी तबला व हार्मोनिअमची साथ दिली. अनुराधा कुबेर यांचे शास्त्रीय गायन झाले. उद्या दिवसभर आणखी तीन सत्रे होतील.