Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 31 October, 2009

५२ शिक्षकांचे आमरण उपोषण मागे


दहा दिवसांत निर्णय: बाबूश
मुख्यमंत्र्यांचेही लेखी आश्वासन

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा विषय सरकारच्या विचाराधीन आहे व याविषयी निवड झालेल्या शिक्षकांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या लेखी आश्वासनाची प्रत शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सादर केल्यानंतर गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेल्या शिक्षकांनी आज अखेर आपले आंदोलन मागे घेतले. शिक्षक निवडीचा हा विषय दहा दिवसांत सोडवू असे स्पष्ट आश्वासन देत या "५२' पैकी एकाही शिक्षकावर अन्याय होऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी यावेळी दिले.
गोवा लोकसेवा आयोगाने विविध सरकारी उच्च माध्यमिक तथा भागशिक्षणाधिकारी पदांसाठी निवड करून सरकारला शिफारस केलेल्या यादीचा स्वीकार करण्यास सरकारकडून गेले चार महिने चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ "५२' शिक्षकांनी गेल्या २२ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. आज शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा या शिक्षकांची भेट घेतली व अखेर हे आंदोलन मागे घेण्यात यश मिळवले. यावेळी त्यांच्यासोबत कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, राष्ट्रवादीचे सचिव तथा माजी शिक्षणमंत्री प्रकाश फडते आदी हजर होते. बाबूश मोन्सेरात यांच्या हस्ते लिंबू सरबत स्वीकारून अखेर या शिक्षकांनी उपोषण सोडले. आपल्यावरील अन्यायाविरोधात पुकारलेल्या या शिक्षकांच्या आंदोलनाला सर्व थरांतून पाठिंबा प्राप्त झाला. गेल्या २७ व २८ रोजी दोन दिवस शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या शिक्षकांची समजूत काढून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती परतुं त्यात त्यांना अपयश आले होते. दरम्यान, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका व राष्ट्रवादीचे नेते प्रकाश फडते यांनी मुख्यमंत्री कामत यांना पत्र पाठवून या शिक्षकांची प्रकृती ढासळत असल्याने याविषयी तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली होती. हा विषय रेंगाळत राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे व त्यामुळे वातावरण स्फोटक होण्याचे सूतोवाचही श्री.फोन्सेका यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. खुद्द बाबूश मोन्सेरात यांनीही मुख्यमंत्र्यांना विनवणी केल्यानंतर अखेर त्यांनी लेखी आश्वासन देण्यास होकार दिला. विशेष म्हणजे नऊ दिवस आमरण उपोषणावर बसलेल्या या शिक्षकांची भेट घेण्याचे धारिष्ट मात्र कामत यांना झाले नाही व त्यामुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात व राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर या केवळ दोनच आघाडी सरकारातील नेत्यांनी या शिक्षकांची भेट घेतली. बाकी एकाही सत्ताधारी नेत्यांनी या शिक्षकांची भेट घेतली नाही. शिवसेनेतर्फे या शिक्षकांच्या पाठिब्यार्थ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, शिक्षण संचालक व शिक्षण सचिव यांना घेरावही घालण्यात आला होता. भाजपतर्फे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तथा पक्षाच्या इतर बहुतेक सर्व आमदारांनी व पक्ष पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन या शिक्षकांना पाठिंबा दर्शवला होता. विविध शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक संघटना, समाजसेवक तथा राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी या शिक्षकांना पाठिंबा दर्शवल्याने या शिक्षकांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले. राज्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी या शिक्षकांची भूमिका स्पष्टपणे सरकारसमोर मांडल्याने त्यांचे विशेष आभार या शिक्षकांनी मानले आहेत.
दरम्यान, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन या शिक्षकांना दिले असले तरी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शेवटपर्यंत या शिक्षकांच्या विरोधी भूमिका घेतली. शेवटपर्यंत त्यांनी या शिक्षकांची भेटही घेण्याचे टाळले. मुख्यमंत्र्यांची समजूत काढून आता या शिक्षकांना कोणत्या पद्धतीने न्याय मिळवून देणार असे जबरदस्त आव्हान बाबूश मोन्सेरात यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

'इफ्फी'संबंधी अनिश्चितता!

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): 'इफ्फी'च्या इंडियन पॅनोरमा विभागावर लादलेली स्थगिती उठविण्यास केरळ उच्च न्यायालयाने आज स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. न्यायालयाच्या या कडक निर्णयामुळे यंदाचे इफ्फीचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडल्यात जमा झाले असून एकूणच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाभोवती अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
इंडीयन पॅनोरमा विभागातील निवड प्रक्रियेला आक्षेप घेऊन केरळचे एक चित्रपट निर्माते रणजीत यांनी त्याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर याचिकेत त्यांनी या विभागासाठी केलेल्या चित्रपटांची निवड ही योग्य प्रक्रिया पार न पाडताच केल्याचा आरेाप केला होता. त्यांची ही याचिका सुनावणीस आल्यावेळी या विभागावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता.
हा स्थगिती आदेश उठविण्याच्या मागणीसाठी चित्रपट महोत्सव संचालनालयाने न्यायालयात दाखल केलेली याचिका खंडपीठाने आज साफ फेटाळून लावली.
संचालनालयाची याचिका फेटाळताना या विभागासाठी आलेल्या चित्रपटांचे अर्ज व कोणत्या निकषांवर त्यांची निवड झाली त्याबद्दलची सखोल माहिती खंडपीठाला देण्याचेही निर्देश न्यायालयाने संचालनालयाला दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या विविध विभागातील चित्रपटांची निवड ही महोत्सवाच्या नियोजित वेळापत्रकानुसार होण्याची गरज असते. कारण हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव असल्याने सारे काही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घडणे आवश्यक ठरते. परंतु प्रत्येक विभागाभोवती काही ना काही कारणावरून सध्या वाद उद्भवल्याने इफ्फीचे नियोजित वेळापत्रक कोलमडल्याचेच स्पष्ट होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंडियन पॅनोरमा विभागामधून परीक्षक मंडळ दोन उत्कृष्ठ चित्रपटांची निवड करते. या मंडळाने निवड केलेले हे दोन चित्रपट स्पर्धा विभागात समाविष्ट केले जातात. तथापि सध्या इंडियन पॅनोरमा विभागच वादात अडकल्याने आता स्पर्धा विभागावरही त्याचा परिणाम झाला आहे. या बाजुने इंडियन प्रिमियर विभागही वादाच्या भोवऱ्यात असून अशा परिस्थितीत यंदाच्या इफ्फीभोवती अनिश्चिततेचे ढग जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यकारिणीची आजची नियोजित बैठक ऐनवेळी संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी रद्द केली. इंडियन प्रिमियर विभागातील चित्रपटांची निवड ही कोणतेही निकष जाहीर न करता केल्याच्या आरोपावरून काल प्रभाकर क्रिएश्नसतर्फे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मनोज श्रीवास्तव यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच इफ्फीच्या विविध कामासाठीच्या निविदा प्रक्रियेबद्दलही वाद उद्भवला होता, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.
सदरची बैठक रद्द करताना मुख्यमंत्र्यांनी श्रीवास्तव यांना महोत्सवाचे विविध चित्रपट विभाग, ध्वनी, वारसा इमारतींची व विद्युत रोषणाई, सजावट तसेच महोत्सवाच्या विविध कामासाठीच्या निविदा प्रक्रियेचा तपशीलवार सद्यस्थितीचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेच्या विविध निर्णयांवर स्थानिक चित्रपट निर्माते वा व्यावसायिकांकडून सातत्याने टीकेचा झालेला भडीमार हे त्यामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच त्या टीकेत कितपत तथ्य आहे हे पडताळण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीवास्तव यांच्याकडून सद्यस्थितीचा अहवाल मागविल्याचे सांगितले जात आहे.

नरेंद्र मोदींना स्वाईन फ्लू

गांधीनगर, दि. ३० : दोन दिवसांपूर्वीच विदेश दौऱ्याहून परतलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वाईन फ्लू झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.
५९ वर्षीय मोदी हे बुधवारी रशिया दौऱ्याहून परतले. त्यांना ताप, सर्दी, खोकला, कफ आदी लक्षणे जाणवू लागली. लगेचच डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि स्वाईन फ्लूची चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. एच१एन१ची बाधा झाल्याने सध्या मोदींवर चार डॉक्टरांची एक चमू उपचार करीत आहे. त्यांना टॅमिफ्लू देण्यास सुरुवात केली असून किमान सात दिवसपर्यंत पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
त्यांच्या निवासस्थानीच त्यांना ठेवण्यात आले आहे. आगामी सात दिवसपर्यंतचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री मोदी यांची प्रकृती उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मोदींनी काल दिवसभर मंत्रालयात जाऊन सर्व कामे केली. मंत्रिमंडळाची बैठक घेतली, अधिकाऱ्यांच्या भेटीही घेतल्या आणि सायंकाळपर्यंत आलेल्या सर्वांशी बोलले. नंतर त्यांचा ताप वाढला. त्यामुळे त्यांनी सर्व भेटी आणि कामे रद्द करून स्वाईन फ्लूची चाचणी करण्याचे ठरविले.

अजूनही जळतोय् इंडियन ऑईलचा डेपो

-सहा अधिकाऱ्यांसह १३ ठार, २०० जखमी
-अब्जावधींचे नुकसान
-लष्कर कार्यरत, अन्य राज्यांतील अग्निशमन दलांना पाचारण
-पेट्रोलियम मंत्रीही हताश
-आगीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
-अतिरेक्यांनी घातपात केल्याची भीती

जयपूर, दि. ३० : राजस्थानातील जयपूर येथील इंडियन ऑईलच्या सीतापूर डेपोला लागलेली आग अजूनही विझलेली नसून, आणखी एक दिवस या ज्वाला भडकतच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी लष्कराने प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून, आजूबाजूच्या राज्यातील अग्निशमन दलाच्या सर्वच्या सर्व गाड्याही कामाला लागल्या आहेत. तरीही आगीचा फैलाव पाहता घटनास्थळी आलेले पेट्रोलियम मंत्री मुरली देवराही हताश झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही हानी अतिरेक्यांचा प्रताप तर नसावा, अशी शंका व्यक्त करीत सरकारने या आगीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
इंडियन ऑईलच्या डेपोत गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही आग लागली. जयपूरच्या बाहेर असलेल्या पाईपलाईनकडे पेट्रोल नेले जात असताना ही आग लागली. आतापर्यंत त्यात १३ जण ठार झाले असून २०० वर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये इंडियन ऑईलच्या सहा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ही आग इतकी भीषण आहे की, त्याची व्याप्ती आज दुसऱ्या दिवशीही वाढतच होती. या ज्वाळांनी अब्जावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आगीचे भयंकर स्वरूप लक्षात घेऊन तिला आटोक्यात आणण्यासाठी कालच लष्कराला पाचारण करण्यात आले होते. पण, या परिसरात इंधनाचेच साम्राज्य असल्याने आग आटोक्यात आणण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. अग्निशमन दलाच्या ३५ गाड्या ही आग आटोक्यात आणण्याच्या कामी लागल्या आहेत. सध्या २० हजार किलोलिटर्सच्या दोन डिझेलच्या टाक्या आणि १० हजार किलोेेलिटर्सच्या पेट्रोेलच्या तीन टाक्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. आजूबाजूच्या तीन किलोमीटर परिसरातील काही कंपन्यांमध्येही ही आग पसरली आहे.
या आगीत दगावलेल्यांचे मृतदेह समोर दिसत आहेत. पण, ते काढणे शक्य नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक जिल्हाधिकारी कुलदीप राणा यांनी सांगितले. प्रशासन निव्वळ हतबल होऊन आगीचे हे तांडव पाहत आहे. कारण आजूबाजूला इंधनच असल्याने आग कोणत्या दिशेने झेपावेल याचा अंदाजच येत नाहीय. नेमके किती कर्मचारी आग लागली तेव्हा कामावर होते याची पडताळणी केली जात आहे. किमान चार ते सहा अधिकारी आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंडियन ऑईलच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त नेमके किती लोक आत अडकले असावे, याचा अंदाज अजूनही आलेला नाही. आतापर्यंत किमान १३ जण यात दगावल्याची पुष्टी झाली आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढू शकते.
आग पसरू न देण्याची कसरत
ही आग पसरू न देणे याचीच कसरत मुख्यत्वेकरून सुरू आहे. त्यासाठी थंड पाण्याचे मोठमोठे फोम या परिसरातील टाक्या आणि पाईपलाईनवर टाकले जात आहेत. जेणेकरून ही आग त्यांच्यापर्यंत येता कामा नये. या आगीने आता सीतापूर, प्रतापनगर आणि आसपासच्या गावातील लोकांना अनेक दुष्परिणामांना सामोरेे जावे लागत आहे. या आगीमुळे निघणाऱ्या काळ्या, विषारी धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला आहे. प्रशासनाने परिसरातील लोकांना मास्क वापरण्यास सांगितले आहे. पण, हे मास्क प्रशासन पुरविणार आहे का, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. आगीचे वाढते प्रस्थ पाहता डेपोपासून काही किलोमीटर अंतरातील परिसर निमर्नुष्य करण्यात आला आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आला आहे. आजूबाजूच्या परिसरातील शाळा आणि सरकारी प्रतिष्ठानेही बंद ठेवण्यात आली आहेत.
वाहतुकीवर परिणाम
स्थानिक लोकांप्रमाणेच या परिसरातील वाहतुकीवरही आगीचा परिणाम झाला आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने आपल्या ११ गाड्यांचे मार्ग बदलविले आहेत. तसेच, दक्षतेचा उपाय म्हणून दोन गाड्या रद्दही केल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये जयपूर-श्वामगड पॅसेंजर आणि जयपूर-बयाना पॅसेंजर यांचा समावेश आहे. सवाईमाधोपूर-जयपूर हॉलिडे एक्सप्रेस ही परतीची गाडी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. याशिवाय, मुंबई-जयपूरचा मार्ग बदलविण्यात आला आहे. जयपूर-जबलपूर, जयपूर-बांद्रा आदी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रस्ते वाहतूकही इतरत्र वळविण्यात आली आहे. जयपूरलगतच्या महामार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे.

Friday 30 October, 2009

भरदिवसा शिरवडे येथील सराफाच्या घरावर दरोडा

दोघींना दोरखंडाने बांधून ऐवज लंपास

मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी): दहा दिवसांमागे दागिन्यांचे दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्यानंतर त्याच सतीश वेर्लेकर यांच्या शिरवडे-नावेली येथील फ्लॅटमध्ये आज भरदिवसा सकाळी ११ वाजता चार जणांनी दरोडा घातला व सुऱ्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत, घरातील माणसांचे हातपाय दोरखंडाने बांधून गळ्यांतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून १.१३ लाख रुपयांचा ऐवज पळविला. आजच्या भयंकर घटनेने त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ते चौघेही २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, कोकणी बोलत होते, असे घरच्यांनी सांगितले.
सतीश वेर्लेकर हे सराफ शिरवडे नावेली येथील सिवरेज प्लांटजवळीस बहुमजली इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहातात. सकाळी नेहमीप्रमाणे सतीश पिंपळकट्ट्याजवळील आपल्या दुकानात गेले होते. घरात त्यंाची पत्नी सौ. पुनम, विवाहित भगिनी सौ. सुचिता सुभाष शिरोडकर व तीन लहान मुले होती. सकाळी ११ वाजता कोणीतरी दारावरची घंटा वाजविली. पत्नीने दरवाजा उघडताच चौघेजण सुऱ्याचा धाक दाखवून आत घुसले व एकटा बाहेर थांबला. धारदार सुरा मानेभोवती फिरवत जीवे मारण्याची धमकी देत त्या चौघांनी पुनमचे हातपाय दोरखंडांनी बांधून त्यांना स्नानगृहात ठेवले व सुचिताचे हायपाय बंाधून खोलीत टाकले. त्यानंतर मुलांना धाक दाखवून गप्प केले व प्रत्येकाचे दागिने काढून घेतले. शिवाय घरातील ४० हजार रोख पळविली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांच्यासह उपनिरीक्षक गिरेंद्र देसाई यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. श्वानपथकही आणण्यात आले, तथापि त्याचा उपयोग झाला नाही.
दरम्यान, १८ ऑक्टोबरला पहाटे रोजी पिंपळकट्टा मडगाव येथील याच सतीश वेर्लेकर यांच्या ज्वेलरी दुकानात ६ लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी वेर्लेकर रात्री ८.३० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. रविवारी सकाळी चोरी झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांस तक्रार नोंदवली होती. त्याचे दुकान पिंपळकट्टाजवळील मुंज यांच्या जुन्या घरात आहे. या घराच्या मागील बाजूने त्यांनी प्रवेश केला व ते दुकानापर्यंत गेले. लाकडी पार्टीशनला भोक पाडून त्यांनी दुकानात प्रवेश केला व सहा लाख रुपये किमतीचे दागिने लुटले. त्या चोरीसंबंधी गुन्हेगाराना पकडण्यात मडगाव पोलिसांना अपयश आले व आज सकाळी ११ वाजता भरदिवसा शिरवडे येथील घरात दरोडा घालून घरातील महिलांना बांधून ठेवले व लाखो रुपयांचा ऐवज पळविला.

निकष न ठरविताच चित्रपटांची निवड?

प्रभाकर क्रिएशनतर्फे कायदेशीर नोटीस
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)- आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या "इंडियन प्रिमियर' विभागात निवड झालेल्या चित्रपटांची यादी उद्या ३० रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी आज येथे दिली. दरम्यान, कोणतेही निकष जाहीर न करता ही निवड करण्याच्या पद्धतीला "प्रभाकर क्रिएशन'ने आक्षेप घेत श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
या विभागासाठी एकूण पंचवीस चित्रपटांचे अर्ज आले होते. त्यातून सात चित्रपट निवडण्यात आले असून त्यात काही गोमंतकीय चित्रपटही आहेत. मात्र हे चित्रपट कोणते ते उद्याच जाहीर केले जाईल असे श्रीवास्तव यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची या निवडीला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या विभागासाठी कोणतेही नियम व अटी निश्चित केल्या नसल्याचा आरोप करून स्थानिक चित्रपट निर्मात्यांनी या विभागाची निवड प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली होती. स्थानिक चित्रपट निर्मात्यांच्या आक्षेपामुळे इफ्फीचा हा विभाग वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्या पार्श्वभूमीवर श्रीवास्तव यांना छेडले असता त्यांनी त्यासंदर्भात मला कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही असे स्पष्ट केले.
नियमबाह्य काहीही घडलेले नाही असे सांगून श्रीवास्तव म्हणाले की, या विभागासाठी संस्थेने वेगळी नियमावली तयार केली नाही. जे नियम आधीपासून अमलात आणले आहेत त्यांच्या आधारेच चित्रपटांची निवड झाली आहे. हे नियम चित्रपट महोत्सव संचालनालयही तयार करत नसल्याचे सांगून सदर नियम हे माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत तयार केले जातात असे ते म्हणाले. शिवाय ही नियमावली चित्रपट संचालनालयाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.यंदाच्या इफ्फीसंदर्भात कोणतीही कायदेशीर नोटीस तूर्तास तरी आपल्याला मिळाली नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
परंतु चित्रपट संचालनालयाच्या संकेतस्थळाला भेट दिली असता केवळ इंडियन पॅनोरमा विभागाची पूर्ण नियमावली व माहिती उपलब्ध असल्याचे यावेळी दिसून आले. इंडियन प्रिमियर विभागाविषयी कोणतीही माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याचे जाणवले. खुद्द मनोरंजन संस्थेच्या संकेतस्थळावरही याविषयी कोणताही उल्लेख नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, सिने सृष्टीशी संबंधित काही जाणकारांशी संपर्क साधला असता त्यांनी इफ्फी हा सरकारी निधीतून साजरा होत असल्याने त्याच्या आयोजनासंबंधी पारदर्शकपणे हाताळणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले. चित्रपट निवडीसाठी अटी व नियम असणे गरजेचे असल्याचेही मतही बहुतेकांनी व्यक्त केले. श्रीवास्तव यांच्या म्हणण्याविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सरकारी अधिकाऱ्याने जबाबदारपणे वक्तव्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचा टोला हाणला.
गोवा मनोरंजन संस्थेला कायदेशीर नोटीस
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन प्रीमियर विभागात चित्रपटांची निवड करण्याच्या प्रक्रियेत अजिबात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत "प्रभाकर फिल्म्स' चे मालक ज्ञानेश्वर गोवेकर यांनी आपल्या वकिलांमार्फत गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. "प्रभाकर फिल्म्स' तर्फे "हॅलो गंधे सर' या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात "इंडियन प्रिमिअर' विभागात कोणत्या नियमानुसार चित्रपटांची निवड केली जाते, याचा खुलासा मागण्यात आला आहे. या विभागासाठी अर्ज करण्यासाठी ही माहिती हवी असल्याचे सांगून हे कायदे व नियम वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात यावेत जेणेकरून या विभागासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती मिळेल,असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, ही नियमावली सादर करण्यापूर्वी या विभागाची यादी जाहीर करण्यासही या नोटिशीत विरोध करण्यात आला आहे. मुळात या विभागाबाबत गोवा मनोरंजन संस्थेतर्फे कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. केवळ काही वृत्तपत्रांवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवरूनच याबाबतची माहिती चित्रपट निर्मात्यांना कळली. हा चित्रपट महोत्सव सरकारी पैशांतून साजरा केला जात असल्याने सर्व व्यवहारांबाबत पारदर्शकता बाळगणे गरजेचे आहे,असेही सुचवण्यात आले आहे.

उपोषणकर्त्या शिक्षकांकडे मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ


सर्वदा गांवकरची प्रकृती ढासळली

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)-गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस करूनही नियुक्तीस सरकारकडून चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची प्रकृती ढासळत चालली आहे. सर्वदा गांवकर या शिक्षिकेला आज तिसऱ्यांदा गोवा वैद्यकीय महाविद्यालयांत हलविण्यात आले. तिचा रक्तदाब पूर्णपणे खालावल्याची माहिती मिळाली आहे. तिला वेळीच दाखल केली नसती तर संकट ओढवले असते,असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.आठ दिवस होऊनही सरकारकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने या शिक्षकांचे व पालकांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले आहे. हे उपोषण त्वरित थांबवले गेले नाही तर एखाद्या शिक्षकाला जीव गमवावा लागण्याची शक्यताच सध्याच्या परिस्थितीवरून व्यक्त होत आहे.
दरम्यान, हे शिक्षक २२ रोजीपासून उपोषणाला बसले होते पण याविषयी तात्काळ तोडगा काढण्याचे सोडून मुख्यमंत्री दिल्लीला गेले. काल रात्री गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री आज इथे भेट देणार अशी आशा धरून बसलेल्या शिक्षक व त्यांच्या पालकांची घोर निराशा झाली. आज दिवसभरात मुख्यमंत्री इथे फिरकलेच नाहीत." दिगंबर कामत हे हळव्या व संवेदनशील स्वभावाचे आहेत, असा आत्तापर्यंतचा समज होता पण तो पूर्णपणे फोल ठरला. कामत हे आत्तापर्यंतचे सर्वांत कठोर व निर्दयी मुख्यमंत्री ठरले"असा आरोप आपल्या मुलांची परिस्थिती पाहून व्याकूळ झालेल्या पालकांनी केला. " गोवा लोकसेवा आयोगाने केलेली शिफारस कशी चुकीची आहे हे कामत यांनी इथे प्रत्यक्ष भेट देऊन या उपोषणकर्त्या शिक्षकांसमोर व आमच्यासमोर स्पष्ट करून दिले असते तर त्यांच्या धाडसाची व प्रामाणिकपणाची कदर केली असती पण या शिक्षकांना सामोरे जाण्याचेही धारीष्ठ त्यांच्याकडे नसावे हे दुर्भाग्यपूर्ण आहे' अशी टीकाही या पालकांनी केली. कामत हे मुख्यमंत्री आहेत म्हणजे सर्व सरकारी पदांवर त्यांच्या जवळीकांची व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या मर्जीतील लोकांचीच भरती व्हायला हवी असा जर अलिखित नियम आहे तर मग लेखी परीक्षा,मुलाखती किंवा सरकारी पदांच्या जाहिराती हा फार्स तरी का करावा, असाही संताप या पालकांनी व्यक्त केला.
गोवा लोकसेवा आयोगाने आत्तापर्यंत केवळ या शिक्षकांचीच निवड केली आहे काय, आत्तापर्यंत आयोगाने केलेल्या शिफारशींचा स्वीकार करून सरकारने मुकाट्याने त्यांची नियुक्ती केली, मग या शिक्षकांच्या भरतीबाबतच हा वाद का, असा सवालही यावेळी करण्यात आला. गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांची निवडही विद्यमान सरकारनेच केली आहे मग त्याच अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत सरकारला आत्ताच संशय घेण्याचे नेमके कारण काय, असे एकापेक्षा एक प्रश्न पालकांकडून टाहो फोडून विचारले जात आहेत.
गोवा लोकसेवा आयोगाने निवड करूनही केवळ कुणाचातरी राजकीय स्वार्थ जपण्यासाठी तोंडातील घास हिरावून घेतला गेला तर हे शल्य पूर्ण आयुष्यभर सतावत राहील त्यापेक्षा जीव गेलेलाच बरा,अशी प्रतिक्रिया याठिकाणी उपोषणाला बसलेल्या एका शिक्षिकेने व्यक्त केली.आज इथे भेट दिलेल्यांत पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगांवकर, सचिव महादेव गवंडी, डॉ.उदय सावंत, श्रीधर कामत बांबोळकर, माजी आमदार प्रकाश वेळीप, ऍड.शिवाजी देसाई आदींचा समावेश होता.

ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात अजय कौशलला देणार

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - भारत आणि ब्रिटिश देशांमध्ये झालेल्या एका करारानुसार भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक अजय कौशल याला ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. भारतीय वंशाचा महाठक कौशल्य याला एका गुन्ह्यात १५ वर्षाची शिक्षा झाली होती. त्यानंतर तो ब्रिटिश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बॅंकॉक येथून भारतात पळून आला होता. बॅंकॉक येथे असलेल्या ब्रिटिश राजदूतावासातून त्याने बनावट कागदपत्रे सादर करून पासपोर्ट बनवला आणि त्याचा वापर करुन तो अनेकवेळा भारतात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यापूर्वी अनेक वेळा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अट्टल गुन्हेगार भारतात आल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले असून त्याचे गोव्यात कोणाशी संबंध होते, याचा मात्र तपास घेण्याच्या मनस्थितीत गोवा पोलिस नसल्याचे दिसून येत आहे. गोव्यात त्याच्यावर कोणतेच गुन्हे नसून आम्ही त्याची कोणत्या आधारावर चौकशी करणार, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. गोव्यात आल्यावर कौशल हा एका महिलेबरोबर कोलवा येथे राहत होता. ही महिला कोण आणि ती गोव्यात काय करते, याचा तपास घेणे गोवा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. कोणत्या अनैतिक धंद्यात या दोघांचा सहभाग आहे का किंवा त्यांच्यातर्फे कोणता अनैतिक व्यवसाय सुरू आहे , असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
कौशल्य हा मुंबईमार्गे गोव्यात आला आहे. यावेळी ब्रिटिश पोलिसांना जारी केलेला "रेड कॉर्नर' नोटीस नसल्याने त्याला कोणीच विमानतळावर चौकशीसाठी अडवले नाही. त्यामुळे दर तीन महिन्यासाठी तो गोव्यात येऊन जात होता. काही दिवसापूर्वी कोलवा येथील एका विदेशी व्यक्तीचा हॉटेलच्या खोलीत अमली पदार्थाच्या अति सेवन केल्याने मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर हवा असलेला कौशल कोलवा पोलिसांच्या हाती लागला होता.

Thursday 29 October, 2009

आत्मघाती बॉम्बस्फोटात पेशावरमध्ये ९० ठार, २०० जखमी

पेशावर, दि. २८ : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आज इस्लामाबादमध्ये असतानाच थोेेड्याच अंतरावर असलेल्या पेशावर शहराला तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा आपले लक्ष्य केले आहे. अन्नधान्याच्या ठोक व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पिपल मंडी या बाजारात आज अगदी गर्दीच्या वेळी तालिबानी दहशतवाद्यांनी हा आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार कमीतकमी ९० लोक ठार झाले आहेत, तर २००वर लोक जखमी झाले असून जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा १०० वर जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तालिबान्यांकडून पाकिस्तानात दररोजच कोठे ना कोठे बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहेत. परंंतु अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन पाकिस्तानात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीव व वित्त हानी करणारा बॉम्बस्फोट तालिबान्यांनी घडवून आणल्यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या या अतिशक्तिशाली स्फोटाने हा परिसर तर दणाणून गेलाच परंतु स्फोटाचा आवाज कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. स्फोटात अनेक इमारती कोसळल्या, अनेक इमारतींना आगी लागल्या व या आगीने इतर इमारतींना आपल्या कवेत घेतल्याने आगीची तीव्रता वाढत गेली. स्फोट एवढा जबदरस्त होता की त्यात अनेकांच्या चिंधड्या उडाल्या. मृतांच्या तसेच जखमींच्या संख्येकडे बघता पेशावर येेथील रिडिंग हॉस्पिटलमध्ये तर आणिबाणी जाहीर करावी लागली आहे.
स्फोटानंतर प्रशासन व अन्य सरकारी तसेच गैरसरकारी यंत्रणांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. स्फोटात जमीनदोस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही मोठ्या प्रमाणावर लोक दबून असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर हा परिसर धुराने भरून गेला होता. रस्त्यांवर गर्दी एवढी होती की अग्निशमन दलाच्या तसेच ऍम्ब्युलन्सच्या गाड्या घटनास्थळी जाण्यास वेळ लागत होता, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
पेशावरमध्ये आज झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतली नसली तरी गेल्या महिनाभरात झालेल्या बहुतांशी हल्ल्यांमागे तालिबानचा हात होता. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरची कारवाई पाकिस्तानी सैन्याने थांबवावी, या मागणीसाठी तालिबान्यांनी हे हल्लासत्र सुरू केले आहे. त्यात आतापर्यंत २०० नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

'सनातन साधकांचा मानसिक छळवाद' पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): गृहमंत्री रवी नाईक यांनी स्फोटानंतर दोन तासांतच सनातन संस्थेला दोषी ठरवले. त्यानंतर सभापती प्रतापसिंह राणे व बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी ठोस पुरावा नसतानाही संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करून संस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न केले तसेच या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस एकतर्फी तपासकाम करीत असून संस्थेच्या साधकांचा मानसिक छळ केले जात असल्याचा आरोप आज सनातन संस्थेचे विश्वस्त तथा व्यवस्थापक वीरेंद्र मराठे यांनी केला. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात न्यायालयात बदनामी खटला दाखल केला जाणार असून त्याविषयी कायदेशीर सल्ला घेण्याचेही काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मडगाव येथे जिलेटिन स्फोट झाल्यानंतर संशयाच्या घेऱ्यात आलेल्या सनातन संस्थेने प्रथमच पणजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सनातन प्रभात या मुखपत्राचे संपादक पृथ्वीराज हजारे व त्रयस्थ म्हणून डॉ. कृष्णीमूर्ती राव उपस्थित होते.
कोणत्याही "सर्च वॉरंट' शिवाय पोलिसांनी ३ वेळी आश्रमाची झडती घेतली. आता साधकांच्या घरची झडती सुरू करून मानसिक छळ सुरू केला आहे. पोलिसांनी व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन करून मानहानी सुरू केली आहे. त्यामुळे ही अन्याय्य चौकशी बंद करावी आणि स्फोटाची दुसरी बाजू पडताळून पाहावी असा सल्लाही श्री. मराठे यांनी दिला. मयत योगेश नाईक याच्या दुचाकीवर कोणी अज्ञातांनी हे जिलेटिन पेरून स्फोट घडवून आणला आणि दोघांचा खून केला असल्याचा दावा यावेळी श्री. मराठे यांनी केला. आम्ही कधीही आश्रमाची झडती घेण्यासाठी पुन्हा येऊ, अशी धमकी पोलिसांनी दिली आहे. आश्रम म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा नाही. याठिकाणी कुटुंबे राहतात. काही लहान मुले आणि तरुण तरुणीही राहतात. पोलिसांच्या या दहशतीमुळे त्यांच्या कोवळ्या मनावर किती परिणाम होतो याचा प्रशासनाने विचार करावा, असे ते म्हणाले. काही दिवसांपासून पोलिसांनी आश्रमाच्या इमारतीविषयी चौकशी सुरू केली आहे. मडगाव येथे झालेल्या स्फोटाचा आणि आश्रमाच्या इमारतीचा का संबंध आहे, असा प्रश्न उपस्थित करून सनातन संस्था संघटितपणे काम करून मोठी शक्ती उभी राहिल्यास आपले ईस्पित साध्य करता येणार नाही, म्हणून हे षड्यंत्र सुरू असल्याचे श्री. मराठे म्हणाले.
या जिलेटिन स्फोटाचा तपासामुळे आश्रमात आलेल्या बॉम्ब निकामी पथकाच्या हाती एका साधकाची अलार्म असलेली घड्याळ लागले असून अशाच प्रकारची घड्याळे स्फोट करण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा करून ते जप्त केले आहे. सर्व तपास सर्चवॉरंट न दाखवता झाला. संगणकाच्या हार्ड डिस्कवरील मजकूर "कॉपी' करून घेतला. तसेच काही वस्तू जप्त केल्यात. परंतु, त्याचा कोणताही पंचनामा करण्यात आलेला नाही, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
गृहखात्यातून सनातनच्या साधकाच्या शेजारील घरात दूरध्वनी करून आमच्या साधकांवर लक्ष ठेवा, म्हणून सांगितले जाते. आमच्या आश्रमात येणाऱ्या काही अधिकाऱ्यांचा सरकारी नोकरीत छळ केला जात आहे तसेच त्यांना आश्रमात न जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मुस्लिम धर्माच्या लोकांना सरकारी कार्यालयीन वेळी नमाज पडण्यासाठी मुभा दिली जाते. "नन'वर आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण होते म्हणून चर्चमध्ये जाण्यासाठी कोणाला अडवले जात नाही. हा केवळ सनातन संस्थेला संपवण्याचा कट रचण्यात आलेला असून काही लोक त्यासाठी पुढे सरसावले असल्याची टीका श्री. मराठे यांनी केली.
-----------------------------------------------------------------------
...त्यांना घरी पाठविणार
कोणत्याही तऱ्हेची समाजविघातक वृत्ती असलेल्या व्यक्तीने किंवा साधकांनी सनातनमध्ये राहू नये. तसेच अशा मनोवृत्तीचे कोणी असल्यास त्यांनी त्वरित आश्रम सोडावे तसेच कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये, असा आदेश सनातन संस्थेने काढला आहे. त्याचप्रमाणे, या वृत्तीचे कोणी आश्रमात राहत असल्यास त्यांना घरी पाठवावे, असेही आदेश वरिष्ठ साधकांना देण्यात आले आहेत.
--------------------------------------------------------------------------
'सनातन संस्थेची शिकवण चुकीची आहे' असे गोव्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे आहे. मौलवींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. इस्लामी अतिरेक्यांनी आत्तापर्यंत लाखो निरपराध लोकांना ठार केले आहे. चर्चमधील धर्मगुरूंकडून मुलांचे तसेच ननचे लैंगिक शोषण होण्याच्या अनेक घटना घडतात. म्हणून कोणी बायबल आणि कुराण यांची शिकवण चुकीची आहे, असे म्हणत नाही, असे मराठे म्हणाले.

'ठकसेना'ला जामीन नाकारला

मडगाव, दि. २८ (प्रतिनिधी): मागास जातीजमातीच्या लोकांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन बेकार तरुणांना कोट्यवधी रुपयांना गंडविल्याचा आरोप असलेल्या वास्को येथील सुरेश आजगावकर याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. कामत यांनी निकालात काढला. यापूर्वीच वास्को पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात पोलिस आपल्याला अटक करतील या भीतीने सुरेश आजगावकर याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. वास्को पोलिसांनी त्याला अटक केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताच जामीन अर्जात काही तथ्य नसल्याने तो अर्ज निकालात काढला. आरोपीच्या वतीने संतोष नाईक तर सरकारतर्फे सरकारी वकील प्रमोद हेदे यांनी काम पाहिले.

इतर मागासवर्ग सर्वेक्षणात मोठा घोळ गोमंतक भंडारी समाजाची टीका

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): राज्य इतर मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणात भंडारी समाज बांधवांच्या यादीत मोठ्या प्रमाणात चुका आढळून आल्याची माहिती गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष मधुकर पोकू नाईक यांनी दिली. या यादीत खुद्द आपला व आपल्या कुटुंबीयांचाही समावेश नाही, यावरून हे सर्वेक्षण किती बेफिकीरपणे झाले आहे याची प्रचिती येते व त्यामुळे ही यादी रद्द करून फेरसर्वेक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
आज पणजी येथील समाजाच्या कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपेंद्र गांवकर, ऍड.जयप्रकाश नाईक, रामदास नाईक आदी पदाधिकारी हजर होते. राज्यात सध्याच्या परिस्थितीत इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या किमान साडेपाच लाख असायलाच हवी पण या सर्वेक्षणानुसार ती कवळ २ लाखांच्या घरात दाखवण्यात आली आहे. भंडारी समाजाचे नेते तथा गृहमंत्री रवी नाईक, भाजपचे आमदार दामोदर नाईक,फोंडाचे नगरसेवक किशोर नाईक आदींचीही नावे या यादीत नाहीत. प्रत्येक तालुक्यात वेगळ्याच ज्ञातीच्या लोकांची नावे भंडारी समाजाच्या यादीत घुसडण्यात आली आहेत.त्यात ब्राह्मणापासून ते ख्रिस्ती व मुस्लीम लोकांचीही नावे भंडारी समाजाच्या यादीत आहेत,असेही यावेळी श्री.नाईक यांनी सांगितले.आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्वेक्षण पूर्ण झालेच नाही पण सदर संस्थेला ७५ टक्के यापूर्वीच पोच झाली आहे. प्रत्येक अर्जाला सरकारकडून २५ रुपये याप्रमाणे हे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत तयार करण्यात आलेली यादी प्रत्येक पंचायत व पालिका कार्यालयात उपलब्ध असून तिथे लोकांनी आपल्या नावांचा त्यात समावेश झाला आहे काय, याची तपासणी करण्याचे आयोगाने कळवले आहे. आयोगाने केलेल्या पत्रात ही यादी तपासण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली असली तरी या सर्वेक्षणातील घोळाबाबत माहिती देणारे पत्र आयोगाला केले जाईल व त्यात नियोजित पद्धतीने फेरसर्वेक्षण हाती घेण्याची विनंती केली जाणार आहे,असेही मधुकर नाईक म्हणाले. ही गोष्ट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नजरेस आणून दिली आहे व त्यांनी यात लक्ष घातले जाईल,असेही सांगितले आहे.
भंडारी समाजाचे सर्वेक्षण करताना संघटनेला विश्वासात घेतल्यास त्यासाठी सदर संस्थेला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी संघटनेतर्फे देण्यात आली. गोमंतक भंडारी समाजाच्या प्रत्येक तालुका समिती आहेत व त्यामुळे सर्वेक्षण करताना या समितीच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतल्यास हे काम अधिक सुटसुटीत व बिनचूक होऊ शकेल,अशी माहिती यावेळी देण्यात आली. सरकारने तात्काळ या घोळाची दखल घ्यावी व ही यादी रद्द करून फेरसर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. दरम्यान, इतर मागासवर्गीयांत एकूण १८ विविध ज्ञातींचा समावेश होतो व त्यात भंडारी समाज हा प्रमुख घटक आहे.

दहा दिवसांच्या 'इफ्फी'त २०० चित्रपट

पणजी, दि.२८ : गोव्यात आयोजित ४० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी)२३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत देशविदेशांतील २०० चित्रपट प्रदर्शित केले जातील. कला अकादमी पणजी येथे २३ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, १० दिवस हा महोत्सव चालेल.
यंदापासून उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक एस.एम.खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता या दोघांना संयुक्तरीत्या देण्यात येईल. विजेत्यांना प्रतिष्ठेचा सुवर्णमयुर पुरस्कार व ४० लाख रुपये, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि स्पेशल ज्युरी पुरस्कार विजेत्याला रौप्य मयूर आणि रोख रक्कम रू.१५ लाख देण्यात येईल.
इंडियन पॅनोरमातर्फे ४७ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून त्यात ज्युरीनी निवडलेले २६ फीचर व २१ नॉन फीचर चित्रपट दाखविण्यात येतील. यासोबतच नॅशनल फिल्म आर्काईव्हज ऑफ इंडिया, पुणेतर्फे पाच व्हिंटेज म्युझिकल हिट्स आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेते चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यात "दो आँखे बारा हाथ'(१९५७), "सागर संगम'(१९५८) आणि "अपुर संसार' (१९५९) यांचा समावेश असेल. भारतीय चित्रपट सृष्टीतील नामवंत निळु फुले, प्रकाश मेहरा, शक्ती सामंत, फिरोझ खान, लीला नायडू व इतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. फिल्म विभाग, मुंबईतर्फे भारतीय संगीत आणि संगीतकार पं. भीमसेन जोशी, उस्ताद बिस्मिल्ला खान,उस्ताद अमजद अली खान, पं. जसराज, नौशाद, के.एल.सैगल, बेगम अख्तर व महम्मद रफी यांच्यावर लघुपट दाखविण्यात येणार आहेत.
आसामी चित्रपट उद्योग हीरक महोत्सव साजरा करीत असल्याचे भारतीय विभागात आसामी चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. जानू बरुआ, भाबेंद्रनाथ सायकीया, संतवाना बार्दोलोज आणि संजीव हजारीका यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. चित्रपट उद्योगात ५० वर्षे पूर्ण केलेल्यांचे चित्रपटही यावेळी प्रदर्शित केले जाणार असून, त्यात कमल हसन, आशा पारेख आणि सौमित्रा चटर्जी यांचा समावेश आहे.
"सिनेमा ऑफ दि वर्ल्ड' मध्ये निवड समितीने ४५ देशांतील सुमारे ६५ चित्रपटांची निवड केलेली आहे. आफ्रिका आणि लॅटीन अमेरिका या खंडांवर तर इटाली, फ्रान्स, पोलंड, क्रुएशिया, आणि इस्तोनिया या देशांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. "फिल्म इंडिया वल्डवाईड' विभागात, परदेशी भारतीयांनी एनआरआय वर तयार केलेले चित्रपट प्रदर्शित केले जाईल. व विदेशी फिल्म विभागात गुरींदर छडा, यु.के., मॅन्युएल दि ओलीव्हेरा, पोर्तुगाल व नॉन्झी निमीबुत्र, थायलैंड यांचा समावेश असेल. सोबत पाच युद्ध - विरोधी चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत.
महोत्सवात "मालेगाव का सुपरमॅन' आणि "गब्बरभाई एमबीबीएस' हे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
चित्रपटांसोबतच ""हिंदी सिनेमातील बदलते प्रवाह'' या विषयावर शियामक दवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.तर किश्वर देसाई पुस्तकी संदर्भातून हिंदी सिनेमा यावर बोलणार आहेत.
प्रतिनिधी नोंदणी यापूर्वीच सुरु झालेली असून, सुमारे ३००० प्रतिनिधींची नोंदणी झालेली आहे. शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे. पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालयातर्फे नोंदणी करण्यात येत असून, शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे.नोंदणीसंबंधी अधिक माहिती www.pib.nic.in वर उपलब्ध आहे.
मडगाव येथे १२०० आणि कला अकादमी पणजी येथे महोत्सवासाठी अधिक १०० जणांची अतिरिक्त आसन व्यवस्था करण्यात आली आहे. गोवा पोलिस, केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणार असल्याचे एस.एम.खान यांनी सांगितले.

Wednesday 28 October, 2009

तळपण येथे आगडोंब दहा घरे बेचिराख : ऐंशी लाखांचे नुकसान


काणकोण, दि. २७ (प्रतिनिधी): जलप्रलयामुळे हादरलेला काणकोण तालुका नुकताच कुठे सावरत असताना, आज अचानक तळपण या गावात आज दुपारी १२.३० वाजता लागलेल्या भीषण आगीत एकूण दहा घरे भस्मसात झाल्याने पुन्हा एकदा तेथील रहिवाशांवर संकट कोसळले आहे. या आगीत सुमारे ऐंशी लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
येथे असलेल्या गणपतीच्या देवळात आज दुपारी भजनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरू असताना देवळाजवळ असलेल्या दहा घरांना व जाळी, होड्या जिथे ठेवल्या जातात त्या "मांगोरां'ना अचानक आग लागली व त्या आगीत आतील सामान भस्मसात झाले. जळालेल्या घरांपैकी नारायण केळूसकर यांचे घर पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर रवी चरवणकर, दिलखूष ठक्कर, विष्णू केळूसकर, सुनंदा केळूसकर, विठ्ठल मोरजकर, दयानंद ठक्कर यांची घरे अर्धीअधीक जळाली. रवी चरवणकर, गणपत गोवेकर, विश्वनाथ तारी, मनोहर केळूसकर, वसंत केळूसकर, दयानंद ठक्कर आणि सुधाकर आरोंदेकर यांचे होड्या, जाळी इत्यादी सामान असलेले "मांगोर'ही जळून खाक झाले. हे सर्व घडत असताना जवळच असलेले गणपतीचे देऊळ मात्र या आगीतून आश्चर्यकारकरित्या बचावले.
सदर घटनेची माहिती मिळताच मामलेदार विनायक वळवईकर, काणकोण पोलिस आणि अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्मिशामक दलाने महत्प्रयासाने आगीवर ताबा मिळवला. त्यासाठी त्यांना पाण्याच्या तीन बंबांची मदत घ्यावी लागली. मामलेदार श्री. वळवईकर यांनी घटनेची पाहणी करून वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे ऐंशी लाख रुपयांची हानी झालेली आहे. त्याचप्रमाणे "शॉर्ट सर्किट'मुळे ही आग भडकली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सावर्डे व मडगाव येथून अग्निशामक दलाचे बंब मागवण्यात आले. काणकोणचे बंब दोन वेळा पुन्हा भरून आणण्यात आले त्यामुळे एकूण पाच बंब पाणी वापरण्यात आले. एकूण १ कोटीची मालमत्ता वाचवण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी के. डी. सैल यांनी सांगितले. काणकोण पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर, उपनिरीक्षक डॅरेन डिकॉस्ता यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.

हरिहरन यांचे ८ रोजी गझलगायन

विशेष मुलांच्या मदतीसाठी 'दिशा'तर्फे आयोजन
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): विशेष मुलांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या व त्यांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी धडपडणाऱ्या " दिशा चॅरिटेबल ट्रस्ट' च्या निधिसंकलनासाठी ख्यातनाम गझलगायक पद्मश्री हरिहरन यांचा गोव्यातील पहिलावहिला गझल गायनाचा कार्यक्रम ८ नोव्हेंबर रोजी कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
'स्वस्तिक ' या कला-सांस्कृतिक क्षेत्रातील लोकप्रिय संस्थेने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून पहिल्यांदाच एका सेवाभावी संस्थेच्या निधिसंकलनासाठी ही संस्था वावरणार आहे. प्रवीण गांवकर व देवानंद मालवणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी "दिशा चॅरिटेबल ट्रस्ट' च्या व्यवस्थापिका संध्या साळोंखे व आदरातिथ्य भागीदार हॉटेल मॅरीएटच्या कुमारी रूबानी हजर होत्या. ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेला सुमारे दोन लाख रुपये निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे."दिशा चॅरिटेबल ट्रस्ट' ही संस्था विशेष मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी विविध उपक्रम राबविते व त्यासाठीच त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन व हातभार लावण्यासाठीच संस्थेने हा निधी उभारण्याचे काम हाती घेतले आहे.विशेष मुले व त्यांचे पालक यांच्यासमोर अनेक समस्या व अडचणी असतात.अशा कठीण प्रसंगी त्यांना योग्य मार्गदर्शन तथा मार्ग दाखवण्यासाठी दिशा ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात.या कार्यक्रमांना हातभार लागावा हाच हेतू या कार्यक्रमामागे असल्याचे यावेळी श्री.गांवकर यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे साहाय्यक पुरस्कर्ते भारतीय स्टेट बॅंक, गोवा पर्यटन खाते, उद्योजक नाना बांदेकर समूह आदी आहेत.आदरातिथ्य सौजन्य हॉटेल मॅरिएट यांचे लाभणार आहे. विमान व्यवस्था किंगफिशर एयर लाईन्स यांची लाभणार आहे व रेडिओ भागीदार म्हणून रेडिओ मिर्ची यांचा सहभाग असेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. हरिहरन यांनी गोव्यात यापूर्वी कार्यक्रम केले असले तरी गझलांचा हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम असणार आहे. त्यांना तबल्यावर शहादाब भारतीय,गिटारावर संजय दास, सारंगीवर लियाकत अली खान व संवादिनीवर श्री.बुरे साथसंगत करणार आहेत. देणगी कुपनाचे दर १ हजार, पाचशे व तीनशे असे ठेवण्यात आले आहेत. देणगी कुपनांसाठी योगिता कौचर - ९९२३५८२१५३ कला अकादमी तिकीट कक्ष, मडगाव- ९८८१२८६३७७ व अनंताश्रम हॉटेल, वास्को-९८२२१२८७९० यांच्याकडे उपलब्ध असतील. या कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी प्रवीण गांवकर-९४२२०५८१५४ व देवानंद मालवणकर-९८२२२८८२१७ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षणमंत्री भेटले पण ठोस आश्वासन नाहीच!

शिक्षकांचे उपोषण सुरूच

पणजी, दि.२७ (प्रतिनिधी) - गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस करूनही "५२' शिक्षकांच्या नियुक्तीस सरकार राजी नसल्याच्या निषेधार्थ गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेल्या शिक्षकांकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पाठ फिरवली असली तरी अखेर शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याने या शिक्षकांच्या जिवात जीव आला आहे. या शिक्षकांवर अजिबात अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी बाबूश यांनी दिले परंतु या "५२' शिक्षकांची नियुक्ती होणार याची हमी मात्र त्यांनी देण्यास नकार दर्शवल्याने या शिक्षकांनी आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
आज संध्याकाळी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उपोषणकर्त्या शिक्षकांची भेट घेतली असता सहा दिवसांपासून तळतळणाऱ्या या शिक्षकांच्या डोळ्यांतून एकच अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.खुद्द बाबूश यांनी सुरुवातीला ही यादी आपल्याला मंजूर असल्याचे विधान केले होते तसेच या शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही,असेही सांगितले होते पण आता त्यांनी आपली भूमिका का बदलली असा सवालच त्यांना या शिक्षकांनी केला. यावेळी बाबूश यांनी आपली बाजू स्पष्ट करताना या यादीत समावेश होऊ न शकलेल्या उमेदवारांनी लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेबाबत काही हरकती दाखल केल्या आहेत व या हरकतींबाबत आयोगाकडे स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले.या हरकतींची चौकशी केल्यानंतर दोन्ही गटांची बाजू एकून घेऊ व नंतरच अंतिम निर्णय घेऊ असे आश्वासन बाबूश यांनी केले.दरम्यान, आयोगाने निवड करून आता चार महिने उलटले व आता या यादीबाबत संशय व्यक्त करणे यात काहीतरी काळेबेरे असून केवळ आपल्या मर्जीतील उमेदवारांचा समावेश या यादीत होऊ शकला नाही म्हणूनच हा डाव आखला जात असल्याचे यावेळी संतप्त शिक्षकांनी सांगितले. निवड झालेल्या शिक्षकांची आपल्याला पूर्ण सहानुभूती असल्याचे यावेळी शिक्षणमंत्री यांनी सांगितले.लोकसेवा आयोगाने केलेली शिफारस फेटाळण्याचे यापूर्वी अनेकवेळा प्रकार घडले आहेत त्यामुळे हा पहिलाच प्रकार नाही,असेही बाबूश यांनी सांगितले.दरम्यान, बाबूश यांनी यावेळी या उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही अशी हमी दिली असली तरी या "५२' शिक्षकांना न्याय मिळेल काय,असे विचारले असता ते त्याबाबत ठामपणे काहीही सांगू शकले नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या शिक्षकांच्या शिष्टमंडळाला जे काही सुनावले आहे ते पाहता या यादीतील किमान आठ ते दहा उमेदवारांना वगळण्याचा त्यांचा बेत असल्याचे स्पष्ट होते असे यावेळी या शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींचा तगादा लावलेल्या एका शिक्षिकेची बाजू मांडून ते निवड झालेल्या उमेदवारांना डावलत असल्याचेही यावेळी या शिक्षकांनी बाबूश यांना सांगितले. हा विषय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत अवश्य घेऊ व तोडगा काढू,असे आश्वासन यावेळी बाबूश यांनी दिले. आज याठिकाणी या शिक्षकांना भेट दिलेल्यांत भाजप आमदार दिलीप परूळेकर, दयानंद सोपटे,जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर,अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई, माजी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अरविंद भाटीकर, गोविंद गावडे आदींचा समावेश होता.बाकी आजही शिवसैनिकांनी उपस्थित राहून या शिक्षकांना पाठिंबा दर्शवला.
बाबूश यांच्यासमोरच एक शिक्षिका कोसळली
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे भेटीसाठी आले आहेत या कल्पनेमुळेच उपोषणकर्त्या शिक्षकांच्या डोळ्यांतून ढळाढळा अश्रू वाहू लागले.अतिभावनाविवश झालेली एक शिक्षिका यावेळी त्यांच्यासमोरच कोसळल्याने तात्काळ "१०८' रुग्णवाहिका मागवून तिला गोमेकॉत पाठवण्यात आले. हे दृष्य पाहून बाबूश यांनी या शिक्षकांना आपले उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला. ही पद्धत चुकीची असल्याचे ते म्हणाले व या कृतीमुळे विद्यार्थ्यांसमोर शिक्षक काय संदेश ठेवणार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी या शिक्षकांनी या कृतीमुळे विद्यार्थ्यांना एकदम चांगला संदेश मिळणार असून अन्याय सहन न करता त्याविरोधात एकजुटीने लढण्याचाच या आंदोलनातून संदेश पोहचल्याचे सांगितले.
आयोगाची शिफारसच चुकीची
दरम्यान, आयोगाच्या शिफारशीत समावेश होऊ न शकलेल्या उमेदवारांनी आज पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन ही निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असल्याचा आरोप केला.आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांच्या दबावाला सरकारने अजिबात बळी पडू नये. या निवड प्रक्रियेची चौकशी करून नव्याने निवड करावी,अशी मागणी केली. यावेळी कल्पिता वसंत कामत या उमेदवाराने आपला अनुभव सांगताना तोंडी परीक्षेला सुरुवातीला केवळ विषयासंबंधात प्रश्न विचारणार असे सांगितले होते पण प्रत्यक्षात मात्र तिथे वेगळेच प्रश्न विचारण्यात आल्याची टीका केली. आपल्याला महानंद नाईक याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. महानंद नाईक व आपल्या विषयाचा संबंध काय,असा प्रश्न यावेळी तिने पत्रकारांना विचारला.आपण "पीएचडी' पूर्ण केलेली एकमेव उमेदवार असूनही आपली निवड झाली नाही,असे सांगून ही यादीच चुकीची असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रकरणी लेखी परीक्षेपेक्षा तोंडी परीक्षेला महत्व देण्यात आल्याचे सांगून या सर्व गोष्टी मुख्यमंत्री दिगंबर कामत,शिक्षणमंत्री व विरोधी पक्षनेत्यांच्या नजरेस आणून दिल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी काही उमेदवार हजर होते.

लॅंकशायरमधील फरारी आरोपी अजय कौशलला न्यायालयीन कोठडी


पोलिस रिमांड अर्जावर आज दुपारी निवाडा


मडगाव, दि.२७ (प्रतिनिधी) - कोलवा येथील आमींगो हॉटेलात मृत पावलेला ब्रिटिश नागरिक विल्यम स्कॉट याचा साथीदार असलेला अजय कौशल याला काल रात्री उशिरा कोलवा पोलिसांनी गोवा पोलिस कायद्याच्या कलम ४१ खाली स्थानबध्द केल्यानंतर आज रात्री रिमांडसाठी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश व्दीजपल पाटकर यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी पोलिसांच्या विनंतीवरील निकाल उद्या दुपारी अडीचवाजेपर्यंत राखून ठेवला असून तोपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
आज दुपारपासून कौशलप्रकरणी बरीच कायदेशीर लढाई झाली. त्याला लॅंकशायरमध्ये १५ वर्षें कारावासाची शिक्षा झालेली असून तो फरारी आरोपी असल्याचे आढळून आल्याने तेथील पोलिसांच्या विनंतीवरून त्याला रिमांडवर घ्यायचे म्हटले तरी गोवा पोलिसांकडे कोणताच पुरावा नव्हता, परंतु हे आंतरराष्ट्रीय प्रकरण असल्याने गोवा पोलिस कायदा कलम ४१ नुसार त्याला ६० दिवसापर्यंत रिमांडवर घेता येते, असा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला व त्यासाठी सल्ला देण्यासाठी खास दंडाधिकारी फारिया व शालिनी सार्दीन याही सुनावणीच्या वेळी दाखल झाल्या होत्या. रात्री ९ वाजता न्यायाधीशांच्या निवासस्थानी त्याला नेऊन तेथे ही सुनावणी झाली.
तत्पूर्वी दुपारी त्याला कोर्टात नेत असताना त्याने एकच हंगामा केला. ६ फुटांहून अधिक उंच व लांब रुंद व धष्टपुष्ट देहयष्टी असलेल्या कौशलला मडगाव पोलिस स्टेशनवरून रिमांडसाठी नेले जात असताना तो चिडून वृत्तछायाचित्रकाराच्या अंगावर धावून गेला. लगेच पोलिसांनी त्याला करकचून पकडले व जीपमध्ये कोंबले. कोलवा पोलिसही त्याला एका जीपमधून न्यायला घाबरत होते, नंतर मागे पुढे पोलिस बंदोबस्त ठेवून त्याला कोर्टात रिमांडसाठी नेण्यात आले. पण तेथे रिमांड हवा असेल तर त्यासाठीचे पुरावे सादर करा असे सांगण्यात आले व त्यानंतर त्याच्याबाबत तेथील दूतावासातून आलेल्या कागदपत्रांची शोधाशोध सुरु झाली. पोलिसांनी सुनावणीची मुदत परत परत लांबवत नेली ज्येष्ठ वकिलांशी सल्लामसलत करून अखेर रात्री ९ वा . सुनावणी ठेवली गेली .
विल्यम स्कॉट व अजय कौशल हे दोघेही शनिवारी गोव्यात आले होते व कोलवा येथील एका हॉटेलात वेगवेगळ्या खोल्या घेऊन राहीले होते. तेथे रविवारी सकाळी स्कॉट मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्युचे नेमके कारण कळूं न शकल्याने पोलिसांनी ब्रिटीश दूतावासाशी संपर्क साधला व त्यामुळे त्याच्या सोबत आलेल्या कौशल याची माहितीही तेथे गेली व गेली सहा वर्षे फरारी असलेल्या खतरनाक आरोपी गोव्यात असल्याचे सर्वांना कळून चुकले नंतर कोलवा पोलिसांना ब्रिटीश पोलिसांकडून संदेश येताच त्यांनी काल रात्रीच त्याला स्थानबध्द केले व मडगाव पोलिस मुख्यालयात आणले.
पोलिसांनी नंतर त्याच्या हॉटेलांतील खोलीची झडती घेऊन काही कागदपत्र जप्त केले पण त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते असे सूत्रांनी सांगितले.
लॅंकशायर येथील मोस्ट वॉंटेड अजय कौशल हा एक खतरनाक आरोपी मूळ भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे. २००३ पासून तो फरारी होता. मॅंचेस्टेर येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याने त्याला लुटले होते व कोर्टाने त्याबद्दल १५ वर्षाची शिक्षा त्याला ठोठावली होती. त्यानंतर तो फरारी झाला होता व त्याचा शोध पोलिस घेत होते. त्याच्या बेपत्ता असल्याचे वृृत्त यापूर्वीच देशविदेशांतील वर्तमानपत्रात झळकले होते.काल त्या नावाची व्यक्ती गोव्यात आहे हे वृत्तवाहीनीवरून कळताच ब्रिटीश पोलिसांच्या सूचनेवरून कोलवा पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी त्याला अटक केली व ब्रिटिश दूतावासाशी संपर्क साधला. ब्रिटनमधील पोलिस पथक एक दोन दिवसात त्याला ताब्यात घेण्यासाठी गोव्यात पोहोचणार आहे.
दरम्यान, विल्यम स्कॉटला मृत्यू कसा आला हे एक गूढ बनलेले असून कौशलनेच तर त्याचा खून केला नसावा ना असा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे गोवा हे पर्यटन केंद्राबरोबर गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनले असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली आहे , यापूर्वी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्लस सोबराजला गोव्यातच पर्वरी येथे मुंबई पोलिसांनी येऊन पकडले होते तर आता त्याच प्रकारचा कौशल अनायासे कोलवा पेालिसांच्या हाती लागला आहे. जर स्कॉट याला गूढ मृत्यु आला नसता तर कौशल गोव्यात आहे हेदेखील कोणाला कळले नसते.

Monday 26 October, 2009

बगदादमध्ये झालेल्या दोन कारबॉम्ब स्फोटांत ९१ ठार

बगदाद, दि. २५ - बगदाद शहरात आज झालेल्या दोन शक्तिशाली कारबॉम्ब स्फोटांत कमीतकमी ९१ लोक ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले असून, यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती इराकच्या वैद्यकीय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही कार बॉम्बचे स्फोट आज सकाळी करण्यात आले आहेत. यावेळी लोकांची रस्त्यावर चांगलीच गर्दी होती.
येत्या जानेवारीत इराकमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज हे दोन शक्तिशाली स्फोट झाले आहेत, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. देश अस्थिर आहे असेच दाखविण्याचा हा प्रयास आहे. आज झालेल्या दोन वेगवेगळ्या स्फोटांपैकी एक स्फोट कायदा मंत्रालयाजवळ तर दुसरा कु र्दिश राजकीय पक्षाच्या कार्यालयाजवळ झाला. इराकच्या पंतप्रधानांना ठार करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. कारण, पंतप्रधान नौरी अल मलिक्की यांनी पंतप्रधान पदासाठी पुन्हा आपला दावा केला असून जानेवारीत होणाऱ्या निवडणुकीत आपण निवडून यावे यासाठी त्यांचे प्रयास जारी आहेत.
आज झालेल्या स्फोटांपैकी एका जागेपासून काहीशे यार्ड अंतरावरच अतिशय कडेकोट बंदोबस्त असणारा ग्रीन झोन असून त्यात अमेरिकन दूतावास आहे, तसेच पंतप्रधानांचे कार्यालयही आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाले, त्यापैकी एका ठिकाणचा मार्ग काही महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तो अलिकडेच वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. यासाठी की आता देशात सुरक्षिततेचे वातावरण परतू लागले आहे, हे दर्शविण्याचा यामागचा उद्देश होता.

सरकारला पाझर फुटेना, शिक्षकांना न्याय मिळेना

चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

बहुजन समाज नेत्यांसमोर आव्हान


पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)- "" गेले चार दिवस आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची ही दारुण परिस्थिती पाहून एव्हाना पाषाणालाही पाझर फुटला असता पण केवळ आपले नातेवाईक व पाठीराख्यांचीच तळी उचलून धरण्यासाठी सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अजूनही जाग येत नाही. परमेश्वराचीही केवळ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावरच कृपादृष्टी असावी. मुख्यमंत्र्यांकडून आमच्या मुलांवर अन्याय होतो आहे याचे त्या परमेश्वरालाही काहीच पडून गेलेले नाही की काय.'' आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाविरोधात इथे गेले चार दिवस तळतळणाऱ्या लीला कोटकर या मातेकडून हा आक्रोश आजही सुरू होता.
लोकसेवा आयोगाने निवड करूनही गेल्या चार महिन्यांपासून सरकारच्या नाकर्तेपणाचे बळी ठरलेल्या त्या "५२' शिक्षकांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस सरला. राज्य मंत्रिमंडळातील एकाही सदस्याने इथे तोंडही दाखवले नाही. विद्यमान आघाडी सरकारातील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी मात्र याठिकाणी हजेरी लावून या शिक्षकांची विचारपूस केली. भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांवर ही वेळ ओढवणे हे आपल्याला अजिबात मान्य नाही व या घटनेमुळे आपण व्यथित झाल्याचे ते म्हणाले. सरकार पक्षातील एक आमदार या नात्याने आपल्या भावना मुख्यमंत्री कामत यांच्यापर्यंत पोचवण्यापलीकडे आपल्या हातात काहीही नाही,अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

बहुजन समाज नेत्यांसमोर आव्हान
दरम्यान, निवड झालेल्या या शिक्षकांत बहुतांश उमेदवार हे बहुजन समाजातील आहेत. पात्रता व गुणवत्तेच्या आधारावर निवडण्यात आलेल्या या शिक्षकांची अशा पद्धतीने हेळसांड सुरू असल्यामुळे बहुजन समाजातील नेत्यांसमोरही आव्हान उभे ठाकले आहे. प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा बहुजन समाजाचे नेते विष्णू वाघ यांनी काल या उमेदवारांची भेट घेतली असता उमेदवारांनी व्यक्त केलेला रोष त्यांच्या जिव्हारी लागल्याची खबर आहे. अखिल गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष मधुकर पोकू नाईक व विष्णू वाघ यांनी आज याठिकाणी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. समाजातील सर्व नेत्यांचे या गोष्टीकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे चर्चा करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी उपोषणकर्त्या शिक्षकांना सांगितले. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी उमेदवारांना दिले. "गोवा बचाव अभियाना'चे नेते डॉ.ऑस्कर रिबेलो यांची उपस्थिती या उपोषणकर्त्यांसाठी आल्हाददायक ठरली. शिक्षकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला व अखेरपर्यंत माघार न घेण्याचा सल्लाही दिला.
येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात संयुक्त कामगार संघटनांतर्फे आयोजित केलेल्या अधिवेशनाला जमलेल्या विविध कामगार नेत्यांनी याठिकाणी आंदोलक शिक्षकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यावेळी प्रा.भट, दामोदर घाणेकर, उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर, स्वातंत्र्यसैनिक सदानंद काणेकर, गोकुळदास प्रभू आदींनी भेट देऊन या शिक्षकांची विचारपूस केली व त्यांना पाठिंबा दिला. सत्ताधारी पक्षातील आमदार नीळकंठ हळर्णकर वगळता एकही आमदार किंवा मंत्री इथे फिरकला नाही. बाकी सत्ताधारी पक्षांचे काही पदाधिकारी इथे घुटमळतात खरे पण आपल्याच निर्ढावलेल्या सरकारला जागे करण्याची खरोखरच त्यांच्यात ताकद आहे काय,अशी चर्चा याठिकाणी भेट देणाऱ्या इतरांकडून सुरू होती. उपोषणकर्त्यामध्ये महिलांचा भरणा असूनही एकाही महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस न केल्याबद्दल आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.
बाबुश यांचे वक्तव्य दुर्दैवी
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सुरुवातीला लोकसेवा आयोगाची निवड मान्य केली होती व या शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही,अशी भूमिका मांडली होती. आज ते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सुरात सुर मिसळवत आहेत.लोकसेवा आयोगाने केलेली निवड योग्य नाही तर ते पटवून द्या व आयोगच गुंडाळा,अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. निवड न झालेल्या उमेदवारांची बाजू ऐकून घेण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांनी विविध सरकारी खात्यांत केवळ आपापल्या मतदारसंघातील लोकांची भरती करताना डावलण्यात आलेल्या उमेदवारांची बाजू ऐकून घेतली होती काय,असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. पात्रता व गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या या यादीत आपल्या मर्जीतील लोकांचा समावेश नाही म्हणून मुख्यमंत्री कामत हे या निवडलेल्या शिक्षकांशी खेळ करतात हा चुकीचा पायंडा आहे व त्याचे परिणाम भविष्यात सरकारलाच भोगावे लागतील,असेही या उमेदवारांनी सांगितले.

मालगोंडा पाटीलचा मृतदेह कुटुंबीयांकडे

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) ः मडगाव जिलेटिन स्फोटात मृत पावलेला मालगोंडा पाटील याचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. मालगोंडा पाटील याची शवचिकित्सा पूर्ण झाली असून मृतदेह ताब्यात घेण्यास ना हरकत दाखला दिल्यानंतर आज ११ वाजता त्याच्या चुलत्याने व भावाने मृतदेह ताब्यात घेतला. दि. १६ ऑक्टोबरच्या रात्री मडगाव येथील बंजारा हॉटेलच्या समोर झालेल्या जिलेटिन स्फोटात गंभीर जखमी झालेल्या मालगोंडा पाटील व योगेश नाईक या दोघांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता.
त्यानंतर सांगली येथून त्याचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गोव्यात दाखल झाले होते. परंतु, शवचिकित्सा झाली नसल्याने त्यांना ७२ तासानंतरही मृतदेह ताब्यात देण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयाने आपल्या वकिलामार्फत पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावली होती. तसेच मृतदेह घरपोच आणि गोव्यात शववाहिका घेऊन येण्यासाठी आलेले २० हजार रुपयांची खर्चही देण्याची मागणी केली होती. याच स्फोटात जखमी झालेला योगेश नाईक यांनी मृत्यूशी तीन दिवस झुंज दिल्यानंतर त्याचाही मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

माझ्याविरुद्ध कारवायांना जोर

लक्ष्मीकांत शेटगावकर यांची टीका
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)- टोरांटो चित्रपट महोत्सवात मला मिळालेले यश ज्यांच्या डोळ्यांत खुपते अशा काही लोकांनी मनोरंजन संस्थेतील अधिकारीवर्गाच्या संगनमताने चित्रपट क्षेत्रातील आपले स्थान कमी करण्याचा कपटी डाव आखल्याचा सनसनाटी आरोप "पलतडचो मनीस' या चित्रपटाचे निर्माते लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी केला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या चित्रपटाची निवड व्हावी यासंदर्भात कोणताही अर्ज आपण गोवा मनोरंजन संस्थेला सादर केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इफ्फी ऐन तोंडावर आला असताना संस्थेच्या विविध कामांसाठीच्या निविदा जारी करण्याच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले वादंग अद्याप शमलेले नसतानाच त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी अलीकडेच स्थानिक चित्रपट निर्मात्यांचे संस्थेकडे अर्ज आल्याचे म्हटले होते. त्यात त्यांनी शेटगांवकर यांचाही नामोल्लेख करताना या अर्जांवर संस्थेने नेमलेले परीक्षक मंडळ निर्णय घेणार असून त्यांनी निवडलेले चित्रपटच आगामी महोत्सवात दाखविण्यात येतील असे म्हटले होते.
त्याबाबत स्पष्टीकरण करताना शेटगांवकर यांनी आपण सोसायटीकडे कोणताही अर्ज सादर केला नसल्याचे सांगितले. तथापि चित्रपट महोत्सव संचालनालयाकडे आपण आपल्या चित्रपटासाठी अर्ज पाठविल्याचे त्यांनी नमूद केले. मिळालेल्या माहितीनुसार सोसायटीकडे इफ्फीसाठीच्या चित्रपट निवडीचे दोन विभाग आहेत. त्यात इंडियन प्रिमियर विभाग व लघुचित्रपट विभाग यांचा समावेश होतो. या विभागासाठी चित्रपट असल्यास त्यासाठी सोसायटीकडे अर्ज करावा लागतो.
उपरोल्लिखित दोन विभागासाठी निवड प्रक्रिया ठरविण्याचे अधिकार चित्रपट संचालनालयाने सोसायटीला दिले आहेत. त्यामुळे या विभागासाठी आवश्यक अटी व नियम तसेच प्रक्रिया ठरविण्याची व परीक्षक मंडळ नेमण्याची जबाबदारी ही सोसायटीवर आहे. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही विभागात शेटगावकर यांनी अर्ज केलेला नसून त्यांनी दिल्लीस्थित चित्रपट महोत्सव संचालनालयाला आपला अर्ज पाठविला आहे. तसेच नियमानुसार चित्रपट संचालनालयाकडील इंडियन पॅनोरमा विभागासाठी आपल्या चित्रपटाचा अर्ज पाठविल्यास तो इतर विभागात पुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही.
या एकंदर पार्श्वभूमीवर ज्याअर्थी शेटगांवकर यांनी इंडियन पॅनोरमासाठी संचालनालयाकडे अर्ज केला आहे ते पाहता इंडियन प्रिमियर व लघू चित्रपट विभागासाठी ते अर्जच करू शकत नाही. त्यांनीही आपण सोसायटीकडे तसा कोणताही अर्ज केला नसल्याचे सांगतानाच काही स्थानिक निर्माते व सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून मला अपात्र ठरविण्याचा कुटील डाव आखल्याचा आरोप शेटगांवकर यांनी केला.
दरम्यान, इंडियन प्रिमियर विभागाच्या परीक्षक मंडळावर सदस्य असलेल्या मनोरंजन संस्थेच्या कार्यकारी मंडळावरील एका सदस्याने आपल्याला दूरध्वनीवरून इंडियन प्रिमियर विभागासाठी अर्ज करण्याची गळ घातली होती, सदर सदस्याने या विभागात उद्घाटनपर चित्रपट म्हणून माझा चित्रपट प्रदर्शित करण्याचा ठेवलेला प्रस्ताव मी फेटाळल्याचेही शेटगावकर यांनी नमूद केले.

सांगाडा सापडल्याने वाळपईत खळबळ

वाळपई, दि. २५ (प्रतिनिधी) ः वाळपई येथील अवर लेडी हायस्कूलजवळ ख्रिस्ती स्मशानभूमीत आज दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा सांगाडा सापडल्याने वाळपई शहरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून या जागेची साफसफाई चालू असताना एका कोपऱ्यात ताडपत्रीत गुंडाळलेल्या स्थितीत हा सांगाडा सापडला. काहीतरी वस्तू गुंडाळलेल्या अवस्थेत दिसल्यावर कामगारांनी एकत्र येऊन ताडपत्री उघडली असता त्यात मानवी सांगाडा दिसला. लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तपास करताना तेथील पाद्रीशीही याबाबत विचारणा केली. कागदात लपेटलेला हा मृतदेह नंतर ताडपत्रीत गुंडाळण्यात आल्याचे दिसून आले. पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर व त्यांचे सहकारी याबाबत चौकशी करीत आहेत.

Sunday 25 October, 2009

उपोषणकर्त्या शिक्षकांची प्रकृती ढासळत चालली

नम्रता गावकर, सारिका पेडणेकर बेशुद्ध
शिक्षकांना सर्व थरांतून जोरकस पाठिंबा
कामत सरकारवरील दबाब वाढला


पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस करूनही गेले चार महिने सरकारकडून नियुक्तिपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची प्रकृती खालावत चालली आहे. आज सकाळी नम्रता गांवकर व सारिका पेडणेकर या बेशुद्ध पडल्याने त्यांना तात्काळ "१०८' रुग्णवाहिकेतून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.या शिक्षकांना आता सर्व थरांतून वाढता पाठिंबा मिळत आहे.न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही या निर्धाराने आंदोलनात उतरलेल्या या शिक्षकांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे वातावरण स्फोटक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढत चालला आहे.
आज या शिक्षकांच्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बहुतेकांची प्रकृती खालावत चालल्याचे स्पष्टपणे जाणवले. आपल्या मुलांवर सरकारकडून होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी काही पालकही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.आपली मुले स्वार्थी राजकारणाची विनाकारण बळी ठरत आहेत व आपण काहीही करू शकत नाही, या अपयशाच्या भावनेने पालक देखील हेलावल्याचेही दिसून आले. तीन दिवस या उपोषणकर्त्यांच्या समोरून लाल दिव्यांच्या गाडीने अनेक मंत्री जातात- येतात; पण त्यातील एकालाही या शिक्षकांना सामोरे जाण्याचे धाडस झाले नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी व भावनांचा स्फोट झालेल्या एका पालकाने तावातावाने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे "आम आदमी' बाबत बोलताना असे वाटते की तेच "आम आदमी' चे कैवारी आहेत. पण या घटनेच्या निमित्ताने त्यांचे खरे रूप उघड झाले. काल या शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची आल्तीनो येथील सरकारी निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली वागणूक अत्यंत दुर्दैवी व अपमानास्पद ठरली. लोकसेवा आयोगाने निवड केलेल्या शिक्षकांनी या पदांसाठी निवड न झालेल्या शिक्षकांच्या भूमिकेत स्वतःला पाहावे, असा फाजील सल्ला त्यांनी या शिष्टमंडळातील शिक्षकांना द्यावा ही शोकांतिकाच म्हणावी लागेल,असेही या पालकांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील एका महिला उमेदवाराची निवड झाली नाही, आरोग्यमंत्र्यांनी सत्तरीतील उमेदवारांची शिफारस करूनही त्यांची निवड झाली नाही यामुळे ही संपूर्ण यादीच रद्दबातल ठरवण्याची ही कृती सरकारला अजिबात शोभत नाही, असा थेट आरोपही यावेळी उपस्थित पालकांनी केला.
आयोगाने केलेली शिफारस चुकीची असेल तर या उपोषणकर्त्या शिक्षकांसमोर मुख्यमंत्र्यांनी येऊन ही गोष्ट पालकांसमोर पटवून द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रकरणी सरकारचा पळपुटेपणा पाहिल्यास शिक्षकांची ही पदे विक्रीला ठेवून कोट्यवधींची माया जमवण्याकडेच या सरकारचा कल आहे की काय,असाही संशय बळावत असल्याचा आरोप पालकांनी केला. गोवा लोकसेवा आयोगाने निवडलेली ही यादी केवळ पात्रता व गुणवत्तेच्या आधारावर निर्धारीत आहे. इथे कुणाही उमेदवाराला पैसा देण्याची गरज भासली नाही. ही पदे प्रथम श्रेणीची असल्याने सरकारी पदांच्या तक्त्यानुसार प्रत्येक पदाची किंमत किमान दहा लाख रुपये होईल. या रकमेनुसार या "५२' पदांचे मूल्यमापन कोट्यवधी रुपयांत होते. या कोट्यवधींचा हव्यासच मुळी या शिक्षकांचा बळी घेण्यास सरकारला प्रवृत्त करत आहे, असा आरोप याप्रसंगी करण्यात आला.कॉंग्रेसच्या आत्तापर्यंतच्या राजवटीत दिगंबर कामत यांची कारकीर्द म्हणजे जणू काळपर्व ठरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे हे एकवेळ मुख्यमंत्री असते तर त्यांनी ही वेळ आणलीच नसती,अशी प्रतिक्रियाही याप्रसंगी अनेकांनी व्यक्त केली. गोवा प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विष्णू वाघ, बाबी बागकर व विजय पै यांनी या शिक्षकांना भेट दिली त्यावेळी या उमेदवारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.कॉंग्रेस सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा टाहोच या शिक्षकांनी या त्रयींसमोर फोडला.याप्रश्नी मुकाट्याने ऐकण्यापलीकडे त्यांच्यासमोर गत्यंतरच नव्हते.
आज याठिकाणी अनेकांनी उपस्थित राहुन या शिक्षकांना पाठिंबा व धैर्य दिले. त्यात कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका,स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली,तत्कालीन विद्यार्थी चळवळीत अग्रेसर असलेल्या प्रशांती तळपणकर, शिवसेना राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, श्रीकृष्ण वेळूस्कर,कामगार नेते गजानन नाईक आदींचा समावेश होता.

पर्रीकरांकडून दिलासा
विरोधी पक्षनेतेमनोहर पर्रीकर यांनी आज (शनिवारी) दुपारी पुन्हा एकदा या शिक्षकांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. मुख्यमंत्री कामत यांची येत्या बुधवारी २८ रोजी भेट घेणार असल्याचे सांगून हा विषय त्यांच्यासमोर प्रखरपणे मांडणार असल्याचे ते म्हणाले.दिगंबर कामत यांची कार्यपद्धती पाहीली तर त्यांना निर्णयक्षमता अजिबात नसल्याचे स्पष्ट होते. सध्या अनेक प्रकरणी केवळ निर्णय न घेतल्यामुळे प्रश्न खितपत पडले आहेत,असेही पर्रीकर म्हणाले.भाजपचा त्याग करून कॉंग्रेस प्रवेश करण्याचा एकमेव निर्णय त्यांनी घेतला असा टोलाही पर्रीकर यांनी यावेळी हाणला. या शिक्षकांची बाजू पूर्णपणे न्याय्य आहे व ती पटवून देण्याचे प्रयत्न आपण करणार. तेवढे करूनही मुख्यमंत्री राजी झाले नाहीत तर केवळ सरकारच्या नाकर्तेपणावर टीका करण्यापलीकडे गत्यंतर राहणार नाही. भविष्यात या शिक्षकांनी न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले तर त्यांना साहाय्य करण्याचे आश्वासनही यावेळी पर्रीकर यांनी दिले.

शिवसेना रस्त्यावर उतरणार
आमरण उपोषणाला बसलेल्या या शिक्षकांचा विषय उद्या २५ पर्यंत निकालात काढला नाही तर सोमवारी २६ रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या पद्धतीने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेना राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी दिला.भविष्यात विद्यादानाचे पवित्र कार्य करणार असलेल्या या उच्च शिक्षित उमेदवारांना अशा पद्धतीने रस्त्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आणणे हा चीड येणाराच प्रकार आहे.उपोषणाला तीन दिवस उलटूनही सरकारकडून साधी त्यांची विचारपूस होत नाही हे असहनीय आहे व शिवसेना अजिबात स्वस्थ बसणार नाही,असेही गावकर म्हणाले.

लढा सुरूच ठेवा ः अरविंद भाटीकर
या शिक्षकांनी आपला निर्धार ढळू देता कामा नये. त्यांची मागणी पूर्णपणे रास्त आहे व ही मागणी सरकारला मान्य करावीच लागेल अशी प्रतिक्रिया गोवा लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद भाटीकर यांनी दिली.गोवा लोकसेवा आयोगाने केलेली शिफारस नाकारण्याचा सरकारला अधिकार आहे पण त्यासाठी सबळ कारणे देणे गरजेचे आहे. त्याबाबत विधानसभेला अहवाल द्यावा लागेल व हा अहवाल राज्यपालांनाही सादर करणे गरजेचे आहे.सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून ज्या पद्धतीने या शिक्षकांची हेळसांड सुरू आहे ते पाहता लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता ती काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कुठे गेले "एनजीओ' व महिला संघटना?
एरवी अन्याय, भ्रष्टाचार,स्त्रीमुक्ती, महिला सशक्तीकरण अशा विविध विषयांचा अवडंबर करून आंदोलन छेडणारे एनजीओ व तथाकथीत महिला संघटना आता कुठे गेल्या आहेत,असा संतप्त सवाल या उपोषणकर्त्या शिक्षकांनी केला. केवळ आपला राजकीय स्वार्थ व हित जपण्यासाठी लोकांना एकत्र करून त्यांच्या जोरावर बैठका गाजवणारे "समाजसुधारक' आता कुठे गेले आहेत. लोकशाही पद्धतीत दिवसाढवळ्या कायद्याच्या ठिकऱ्या उडवून सरकार ज्या पद्धतीने सामान्य जनतेवर अन्याय करीत आहे, त्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना बळ देण्याचे भानही या लोकांना राहीले नाही ही शरमेची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्कोच्या ठकसेनाकडून महत्त्वपूर्ण पुरावे हस्तगत

दोन्ही संशयितांना पोलिस कोठडी
पोलिसांचे दोघांच्या घरांवर छापे


वास्को, दि. २४ (प्रतिनिधी) - लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनुसूचित जातीजमातीच्या सुमारे ८१४ जणांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणातील संशयित आरोपी सुरेश आजगावकर व त्याची साथीदार निरूपमा वेळीप यांच्या घरांवर छापे टाकून आज वास्को पोलिसांनी महत्त्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी निरूपमा हिला काल अटक केल्यानंतर आज तिला न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसांची तर आजगावकर याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वास्कोचे उपनिरीक्षक वीरेंद्र वेळुस्कर यांनी आजगावकर याच्या वास्कोत असलेल्या भाड्याच्या फ्लॅटवर, तर उपनिरीक्षक रजाक शेख यांनी निरूपमाच्या सासमोळे बायणा येथील घरावर छापे घातले असता त्यांना ह्या फसवणुकीच्या प्रकरणाबाबत पुरावे मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यामध्ये विमा "पॉलिसीची कागदपत्रे, बॅंक खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेच्या पावत्या, आजगावकर ट्रस्टबाबतची आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान संध्याकाळी वास्को पोलिसांकडून आरोपी आजगावकर याच्या घरात तपास सुरू असताना काही पत्रकारांनी येथे उपस्थिती लावली. त्यावेळी तेथे फ्लॅटमध्ये सुमारे साठ हजार किमतीचा "एल सी डी टीव्ही' तसेच इतर काही महाग वस्तू (कॅमेरा व इत्यादी गोष्टी) असल्याचे आढळून आले. एका साध्या दर्जाच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याकडे हे महागडे सामान घेण्यासाठी एवढी मोठी रक्कम कुठून आली असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.
सुरेश आजगावकर याच्या पत्नीच्या नावे असलेली सुमारे दीड कोटी रुपयांची मालमत्ता वास्को पोलिसांनी यापूर्वीच जप्त करून गोठवली आहे. त्याची अन्य कोट्यवधी किमतीची आणखी मालमत्ता असावी, असा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे.

मडगाव स्फोट प्रकरणाचा तपास थंडावला

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - मडगाव स्फोट प्रकरणी आठवडा उलटला तरी अद्याप पोलिसांच्या हाती काहीही सापडले नसल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने होत असल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणतात, तर गेले काही दिवस गृहमंत्री रवी नाईक यांनी वक्तव्य करण्याचेच सोडून दिल्याने सरकारातील अंतर्गत मतभेद या चौकशीच्या आड तर येत नसावेत ना,असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
या स्फोटात बळी ठरलेले मालगोंडा पाटील व योगेश नाईक हेच या स्फोटाचे सूत्रधार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. या दोघांचेही सनातन संस्थेशी संबंध असल्याचे सांगून पोलिसांनी चौकशीची दिशा या संस्थेच्या दिशेने फिरवली आहे.याप्रकरणी अद्याप पोलिसांना संस्थेविरोधात कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत वा पोलिसांनी अद्याप कुणालाही ताब्यात अथवा अटक केली नाही.मडगाव स्फोटाची चौकशी सुरू असताना आता सनातन संस्थेला विदेशातून आर्थिक साहाय्य मिळत असल्याचा विषय समोर आला आहे व स्फोटाचा तपास लावण्याचे सोडून पोलिस त्याकडे वळल्याचीही खबर आहे.या एकूण प्रकरणी राजकीय नेते व पोलिस यांच्या वक्तव्यांत मतभेद आढळल्याने गोंधळ निर्माण झाला व त्यामुळे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांना जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमून प्रसारमाध्यमांना माहिती देण्याची जबाबदारी देण्यात आली.फोंडा अथवा मडगाव येथील पोलिस अधिकृत माहिती पणजी मुख्यालयात दिली जाईल,असे सांगतात व इथे मुख्यालयात मात्र कुणीच हजर राहत नाही,असेही जाणवत आहे. शनिवार व रविवारी तर मुख्यालयात एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसतो, त्यामुळे हा नक्की काय प्रकार सुरू आहे,असा सवाल उपस्थित होतो.
सनातनच्या आश्रमाची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली झडती आज बंद होती,अशी माहिती मिळाली.या झडतीत पोलिसांना नेमके काय पुरावे सापडले आहेत याबाबत पोलिस गोपनीयता बाळगून आहेत.मुख्यमंत्री दिगंबर कामत हे उद्या २५ रोजी दिल्लीला जाणार असल्याची खबर असून याप्रकरणी चौकशीचा अहवाल ते केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

हरयाणात सत्तेसाठी जबरदस्त रस्सीखेच

चंडीगढ, दि. २४ - नव्वद सदस्यांच्या हरयाणा विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चाळीस जागा मिळवत सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर आलेल्या कॉंग्रेसने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केलेल्या असून दुसरीकडे ३१ जागा मिळवलेल्या हरयाणा लोकदलानेही ही संधी आपल्याही पक्षाला मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या दोन पक्षांत आता "कॉंटेकी टक्कर' सुरू झाली आहे.
कॉंग्रेसकडून निमंत्रण मिळाल्याने हरयाणा जनहित कॉंग्रेस आपल्या सहा आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार आहे, असे त्या पक्षाचे नेते कुलदीप बिश्नोई यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आपल्याला हरयाणा लोकदलाचेही निमंत्रण असल्याचा दावा त्यांनी केला. या राज्यात भाजपला चार तर बसपला एक आणि अपक्षांना सात जागा मिळाल्या आहेत. भाजपने मात्र अजून आपले पत्ते खोललेले नाहीत.
चौतालाही मैदानात...
कॉंग्रेसला जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले नाही. त्यामुळे आपल्यालाही सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे हरयाणा लोकदलाचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला यांनी राज्यपाल जगन्नाथ पहाडिया यांना पत्र लिहून कळवले आहे. चौताला यांनी सावध पण तेवढ्याच चाणाक्षपणे पावले टाकून कॉंग्रेसला खिंडीत गाठण्याचा डाव टाकला आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतील, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र एक खरे की, या राज्यात सत्ता स्थापन करताना कॉंग्रेसला अपक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार आहेत. कारण त्यांना भूपिंदर हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला जनतेने स्पष्ट कौल दिलेला नाही.