Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 May, 2011

तिलारी धरणग्रस्तांनी गोव्याचे पाणी अडवले

आमदार केसरकरांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित
सावंतवाडी, दि. १ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र - गोवा राज्याच्या संयुक्त करारातून होणार्‍या तिलारी जलसिंचन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्‍नावर गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची १५ ते २० मे दरम्यान भेट घेण्याचे आश्‍वासन मिळाल्याने आजचे गोव्याचे पाणी बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. तिलारी बेरोजगार संघर्ष समितीने हे आंदोलन छेडले होते. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी हे आश्‍वासन आंदोलकांना आज (दि.१) दुपारी दिले. त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र आंदोलकांनी तत्पूर्वी आज गोव्याकडे जाणारे सुमारे ९५ टक्के पाणी अडविले.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी या धरण प्रकल्पातील ७३ टक्के पाणीवाटा हा गोवा राज्याचा असून महाराष्ट्राचा उर्वरित २७ टक्के वाटा आहे. या धरणग्रस्त तरुणांना शासकीय सेवेत सामावून घेण्यास गोवा राज्यशासन चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ आज जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र स्थापना दिनी तिलारी धरणग्रस्त संघर्ष समितीने तिलारीचे गोव्यात जाणारे पाणी अडविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळपासून धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गावस, सचिव संजय नाईक, यांच्यासह सुमारे ३०० धरणग्रस्त युवक युवतींनी कोनाळकट्टा या मुख्य कालव्यापाशी जमा झाले होते. त्यांनी यावेळी गोव्याकडे येणार सुमारे ९५ टक्के पाणी अडवले.
दुपारी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करत १५ ते २० मे पर्यंत हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

No comments: