Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 October, 2009

कामत सरकारची संवेदना बोथट


पर्रीकर कडाडले

त्या ५२ शिक्षकांचे उपोषण सुरूच

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- विद्यमान सरकारची सर्वसामान्य जनतेबद्दलची संवेदना पूर्णपणे बोथट झाल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. गोवा लोकसेवा आयोगाने गुणवत्ता व पात्रतेच्या आधारावर "५२' शिक्षकांची शिफारस सरकारकडे करून आता चार महिने उलटले तरी अद्याप त्यांची नियुक्ती होत नाही. केवळ मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्र्यांनी केलेल्या शिफारशींचा या यादीत समावेश झाला नाही म्हणून या भावी शिक्षकांच्या नियुक्तीला खो घालणे हा अत्यंत निंदनीय व घृणास्पद प्रकार असून भाजपचा या उमेदवारांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन पर्रीकर यांनी दिले.
एकीकडे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात हे ही यादी आपल्याला मान्य असल्याचे सांगतात तर दुसरीकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत ही यादी नाकारतात. लोकसेवा आयोगावरच विश्वास नाही तर हा आयोगच गुंडाळा, असेही पर्रीकर यावेळी म्हणाले. आयोगाची शिफारस मान्य करणे किंवा फेटाळणे याचा अधिकार सरकारला असतो हे खरे पण नाकारताना त्यासाठी सबळ कारणे देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना ही यादी मान्य नसेल तर त्यांनी त्याची सबळ कारणे द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले. या शिक्षकांच्या बाबतीत आणखी वेळ न दवडता सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा व त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या शिक्षकांना आता सर्व थरांतून पाठिंबा मिळत आहे. आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यासह भाजप आमदार फ्रान्सिस डिसोझा, दामोदर नाईक, दयानंद मांद्रेकर आदींनी या शिक्षकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजन घाटे व राजेंद्र साटेलकर यांनी त्यांची भेट घेतली. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक तथा स्वातंत्र्यसैनिक रवींद्र केळेकर यांनी याठिकाणी भेट देऊन या उमेदवारांना चकितच करून टाकले. श्री. केळेकर यांच्या उपस्थितीने उपोषणाला बसलेल्या उमेदवारांच्या डोळ्यांतून आपोआपच अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. भावी पिढीला सत्याचा मार्ग शिकवण्याची जबाबदारी असलेल्या या पिढीला असत्याचा सामना करावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे,अशी प्रतिक्रिया श्री.केळेकर यांनी यावेळी दिली. गोवा कोकणी अकादमीचे माजी अध्यक्ष पुंडलिक नायक, हेमा नायक, माधवी सरदेसाई यांनीही या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला.
कालपासून आपल्या पालकांसह बेमुदत उपोषणाला बसलेले शिक्षक रात्रभर याठिकाणी उघड्यावरच झोपले. उपोषणकर्त्यांत महिलांचा समावेश आहे पण इथे संरक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या पोलिसांत महिला पोलिस शिपाई उपस्थित नसल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवस उपाशी असलेल्या या शिक्षकांसाठी उद्याचा दिवस हा अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वदा गावकर बेशुद्ध पडल्याने तिला लगेच "१०८' रुग्णवाहिकेने गोमेकॉत हालवण्यात आले. याठिकाणी उपचार घेतल्यानंतर ती लगेच संध्याकाळी परत आली व तिने पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली.
मुख्यमंत्री नकाराशी ठाम
राष्ट्रवादी युवाध्यक्ष राजन घाटे यांनी पुढाकार घेऊन या शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाची मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी ही निवड योग्य पद्धतीने झाली नसल्याचे त्यांना सुनावले. यापूर्वी आयोगाने केलेल्या शिफारशी अनेकवेळा सरकारने फेटाळल्या आहेत, त्यामुळे ही यादी फेटाळण्यात काहीही गैर नाही, असेही त्यांनी सुनावल्याची माहिती मिळाली आहे. ही निवड कशी योग्य नाही, असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी या शिक्षकांशी अधिक बोलणे टाळले व त्यांना परत पाठवून दिले, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रवींद्र केळेकर याठिकाणी उपस्थित राहिल्याने मुख्यमंत्री कामत यांची बरीच गोची झाल्याची चर्चा आहे.श्री. केळेकर यांनी त्यांच्याशी फोनवरून बोलण्याचे प्रयत्न केला पण त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगून तो फोन बंद केला, अशीही माहिती मिळाली. याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी ऍडव्होकेट जनरलांशी चर्चा केल्याचीही खबर असून या बैठकीला आणखी एक ज्येष्ठ नेते उपस्थित होते,अशीही खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

मडगाव बॉंबस्फोटप्रकरण 'सीबीआय'कडे सोपवा

भाजपतर्फे राज्यपालांना निवेदन सादर
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): मडगावात स्फोट होऊन एक आठवडा उलटला पण तरीही या घटनेमागील गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे याचा तपास लागलाच पाहिजे. गोव्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने व अशी प्रकरणे हाताळण्याची व्यापक कार्यक्षमता गोवा पोलिसांकडे नसल्याने हे प्रकरण "सीबीआय'कडे देणेच योग्य ठरेल, अशी मागणी भाजपने राज्यपाल एस. एस. सिद्धू यांच्याकडे केली आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप आमदार तथा पक्षाच्या नेत्यांनी आज राज्यपाल डॉ. सिद्धू यांची भेट घेतली. भाजप विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा, आमदार दामोदर नाईक, दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, अनंत शेट, मिलिंद नाईक, महादेव नाईक, वासुदेव मेंग गावकर, भाजप उपाध्यक्ष दत्ता खोलकर व सचिव सदानंद शेट तानावडे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. मडगाव प्रकरणाची चौकशी "सीबीआय'कडे का सोपवण्यात यावी याची विस्तृत माहिती देणारे निवेदन यावेळी भाजपतर्फे विरोधी पक्षनेते पर्रीकर यांनी राज्यपालांना सादर केले.
पर्वरी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी यासंबंधी अधिक माहिती दिली. गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आंतरराज्य संबंध असण्याची शक्यता असलेली प्रकरणे केंद्रीय चौकशी सूत्रांकडे देण्यात यावी, असे सुचवले आहे. मडगाव प्रकरणातही आंतरराज्य संबंध असण्याची शक्यता आहे; त्यामुळे याचा तपास "सीबीआय'मार्फत होणेच योग्य आहे, असे पर्रीकर म्हणाले. गोवा पोलिसांकडे रासायनिक तज्ज्ञ तथा इतर तांत्रिक ज्ञान असलेल्या लोकांची कमतरता व या तपासासाठी उपयुक्त मनुष्यबळाचा अभाव आहे. सनातनच्या आश्रमाची झडती घेतली खरी पण संगणकांची तपासणी करण्यासाठी पोलिसांकडे माहिती तंत्रज्ञानाची जाण असलेले अधिकारी आहेत का? या स्फोटात जखमी झालेल्या दोघाही व्यक्तींचा मृत्यू झाला. आता त्यांच्याकडून काहीही माहिती मिळणे दुरापास्त आहे. या प्रकरणात खरोखरच या दोघांना कोणी साहाय्य केले होते काय? याची चौकशी होण्याची गरज आहे. मृतांनी पोलिसांना आणखीनही काही लोकांची नावे सांगितल्याचे ऐकू येते पण त्यादृष्टीनेही तपास सुरू नाही.
या घटनेवरून सध्या विविध लोक व संस्था विनाकारण कांगावा करीत असल्याबद्दलही पर्रीकर यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा तळाशी जाऊन तपास व्हावा, अशी भाजपची मागणी आहे. या घटनेत सामील असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावीच पण खरोखरच जर अशा प्रकरणात एखाद्या संस्थेचा हात आहे व अशा संस्थेकडून घटनाविरोधी कृत्य केले असेल तर त्या संस्थेवरही तात्काळ बंदी आणावी, असे ठाम मत यावेळी पर्रीकर यांनी व्यक्त केले.
गोवा हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे व अशा घटनांमुळे राज्याच्या पर्यटनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. गेल्या दोन वर्षांत राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ४८ तासात दहा खून, तत्पूर्वी मंदिर तोडफोड प्रकरणांच्या चौकशीचा बट्ट्याबोळ, दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, दरोडे त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तींवर नजर ठेवण्यास आलेले अपयश, विशेषकरून चिंबल व मोतीडोंगर परिसरावरील दुर्लक्ष, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या माहितीकडे कानाडोळा, तलवारप्रकरणी चालढकल, विदेशी युवतींच्या मृत्यू प्रकरणांची अत्यंत बेजबाबदारपणे हाताळणी आदी गोष्टींमुळे गोवा बदनाम झाल्याचे भाजपने आपल्या निवेदनात म्हटले आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन त्यांनाही "सीबीआय' चौकशीचे महत्त्व पटवून दिले जाईल, असेही यावेळी पर्रीकर म्हणाले.

तिकीट कलेक्टरांच्या पदनिर्मितीचा डाव

फेरीमार्गावर प्रवाशांना शुल्क
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राज्यातील विविध फेरीमार्गावरील प्रवाशांना तिकीट लागू करण्याचा नदी परिवहन खात्याचा निर्णय हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. हा निर्णय पूर्णपणे अव्यवहार्य आहे. तिकीट लागू केल्यानंतर प्रत्यक्ष उत्पन्न व खर्च याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. हा निर्णय केवळ खात्याअंतर्गत अतिरिक्त ५२ तिकीट कलेक्टर पदे भरण्यासाठीच घेतला जात आहे. सरकारी तिजोरीला वार्षिक ९२.८७ लाख रुपयांचा फटका यामुळे बसणार आहे, असा सनसनाटी खुलासा पर्रीकर यांनी केला.
आज इथे पत्रकारांशी बोलताना पर्रीकर यांनी या घोटाळ्याबाबत सविस्तर माहिती दिली. गेल्या विधानसभा अधिवेशनात आपण विचारलेल्या एका अतारांकित प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे ही भानगड उघडकीस आल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली. या घोटाळ्याबाबतची सविस्तर माहिती देणारे पत्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह मुख्य सचिव, वित्त सचिव, नदी परिवहन सचिव, मंत्रिमंडळ सदस्य व सभापती राणे यांना पाठवल्याचेही पर्रीकर म्हणाले. राज्यातील काही बेटांचा अपवाद वगळता सर्व मार्गावर प्रवाशांना तिकीट आकारण्याचा निर्णय नदी परिवहन खात्याने घेतला आहे. सध्या खात्याकडे २३ तिकीट कलेक्टर आहेत व अतिरिक्त ५२ जणांची भरती करण्याचा खात्याचा विचार आहे. या तिकीट कलेक्टरांच्या पगाराचा खर्च महिन्याकाठी ९.१५ लाख रुपये होईल. आता तिकीट आकारणीनंतर खात्याला महिन्याला ५ लाख ६४ हजार रुपये उत्पन्न मिळेल पण यातील रायबंदर ते चोडण, सां पेद्र ते दिवार व जुने गोवे ते पिएदाद हे बेटांचे तीन मार्ग सोडले तर महिन्याकाठी केवळ १ लाख ४१ हजार रुपये उत्पन्न मिळेल. हे गणित पाहिल्यास सरकारला या निर्णयामुळे थेट महिन्याकाठी साडेसात लाख रुपये फटका बसणार आहे, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली.
प्रवाशांना तिकीट आकारण्यासाठी तिकीट कलेक्टरच हवेत पण केवळ वाहनांसाठी तिकीट आकारल्यास त्यासाठी वेगळ्या तिकीट कलेक्टरांची गरज भासणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. फेरीबोटीवर प्रवाशांना मोफत प्रवासाची सोय करण्यामागचे प्रयोजन हेच होते, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली. केवळ आपल्या मर्जीतील लोकांची तिकीट कलेक्टरपदी भरती करण्यासाठीच हा निर्णय पुढे रेटला जात असल्याची टीकाही पर्रीकर यांनी केली.

उदयोन्मुख फुटबॉलपटूचे वेर्णा येथे अपघातात निधन

वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): कळंगुट स्पोर्टिंग क्लबच्या जेरी डायस (वय २३) या खेळाडूच्या दुचाकीला सुमोची जोरदार धडक बसल्याने तो रस्त्यावर कोसळला, यावेळी अन्य एका वाहनाची धडक बसल्याने त्याचे जागीच निधन झाले. दुचाकीवर स्वार असलेला जेरी याचा साथीदार सेबेस्त्यॉंव ओलिवेरो (वय २७) यावेळी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. कळंगुट येथील मैदानावर सराव करून दोघेही आपल्या घरी परतत होते.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ११.३० च्या सुमारास सदर घटना घडली. मडगाव, कालकोंडा येथे राहणारा जेरी व राय येथील सेबेस्त्यॉंव "आपाची' या दुचाकीवरून (जीए ०८ एच ९७२६) घरी जात होते. वेर्णा येथील बायपास समोर त्यांची धडक येथून येणाऱ्या सुमो वाहनाला (जीए ०१ टी ९४८७) बसली. यावेळी दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यावेळी जेरी याच बाजूने येणाऱ्या इनोव्हा गाडीखाली (जीए ०१ झेड ८७६५) सापडला. अपघात घडल्यानंतर दोघाही फुटबॉलपटूंना जखमी अवस्थेत बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र गंभीर रित्या जखमी झालेल्या जेरी याचे इस्पितळात आणण्यापूर्वीच निधन झाल्याचे यावेळी येथील डॉक्टरांनी घोषित केले.
वेर्णा पोलिसांच्या माहितीनुसार जेरी बरोबर त्याच्या दुचाकीवर असलेला फुटबॉल खेळाडू सेबेस्त्यॉंव यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वेर्णा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Friday 23 October, 2009

मुख्यमंत्र्यांचे दैव हे आमचे दुर्दैव?

"५२' उमेदवारांचे पालकांसह
आमरण उपोषण सुरू


पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)- "मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे सरकार केवळ दैवामुळे तरून आहे पण कामत यांचे हे दैव आमचे दुर्दैव का ठरावे'' असा खडा सवाल अन्यायग्रस्त लोकसेवा आयोगाने निवडलेल्या उमेदवारांची पालकांनी केला आहे. गोवा लोकसेवा आयोगाने गुणवत्ता व पात्रतेच्या आधारावर शिफारस करूनही गेल्या चार महिन्यांपासून नियुक्तिपत्रांची वाट पाहणाऱ्या "५२' पीडित उमेदवारांनी आज आपल्या पालकांसह कॅप्टन ऑफ पोटर्ससमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी या शिक्षकांसह हजर असलेल्या पालकांनी कठोर शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून सरकारविरोधातील आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली.
""सरकारी नोकरीसाठी गुणवत्तेपेक्षा पैसा व राजकीय वशिलेबाजी हीच पात्रता ठरत असेल तर मग आमच्या मुलांना कष्ट करून शिकवले हीच आमची चूक झाली काय? या समाजात प्रामाणिकता व न्याय ही गोष्ट अजूनही शिल्लक आहे याचा धडा आम्ही मुलांना दिला. सरकारकडून आमच्या मुलांची ज्या पद्धतीने फजिती सुरू आहे ते पाहता आम्ही दिलेली शिकवण फोल ठरण्याचीच भीती निर्माण झाली आहे'' असे मत डिचोली येथील लीला कोटकर यांनी व्यक्त केले. ""मुख्यमंत्री दिगंबर कामत हे स्वतः देवभक्त आहेत त्यामुळे ते आपल्या आचरणात सत्य व न्याय्य भूमिका स्वीकारतील अशी आशा होती; पण या "५२' उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात त्यांच्याकडून ज्या पद्धतीने वक्तव्ये सुरू आहेत त्यावरून या नियुक्तीला खो घालणारी अशी कोणती दानवी शक्ती त्यांच्या मानगुटीवर बसली आहे हे कळायला मार्ग नाही'' अशी प्रतिक्रिया हरमल येथील शशिकांत नाईक यांनी व्यक्त केली. ""लोकसेवा आयोगासारख्या स्वायत्त संस्थेने गुणवत्ता व पात्रतेच्या आधारावर आमच्या मुलांची शिफारस केली पण सरकार दरबारी मात्र या शिफारशीला काडीचीही किंमत नाही. यापुढे पालकांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी कष्ट न घेता अवैध मार्गाने पैसा कमवून एखाद्या राजकीय नेत्याची हुजरेगिरी करावयाला पाठवावे, तेव्हाच त्यांचे भले होऊ शकेल, असा संदेश सरकार देऊ पाहत आहे काय'' असा प्रश्न राघोबा प्रभुदेसाई यांनी उपस्थित केला.
राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रथम श्रेणी शिक्षक तथा भागशिक्षणाधिकारीपदांसाठी गोवा लोकसेवा आयोगाने एकूण "५२' उमेदवारांची निवड जून २००९ मध्ये केली. या शिक्षकांना नियुक्त करण्याची शिफारस करून चार महिने उलटले तरी अद्याप त्यांना नियुक्तिपत्रे देण्यात येत नाहीत. या "५२' उमेदवारांपैकी बहुतेक उमेदवार हे बहुजन समाजाचे आहेत. "" केवळ मतांवर डोळा ठेवून बहुजन समाजाचे गोडवे गाणारे नेते आता कुठे झोपले आहेत'', अशी टीका शशिकांत नाईक यांनी यावेळी केली. या "५२' शिक्षकांपैकी २६ राखीव व २६ सर्वसाधारण गटातील आहेत. त्यात इतर मागासवर्ग - १५, अनुसूचित जाती - १, जमाती - ८, शारीरिक अपंग - १, स्वातंत्र्यसैनिकांची मुले - १ आदींचा समावेश आहे. सर्व अकराही तालुक्यांना या निवडीत संधी प्राप्त झाली आहे. त्यात पेडणे-५, बार्देश-४, डिचोली-६, सत्तरी-२, काणकोण-४, सासष्टी-७, तिसवाडी-४, फोंडा-६, केपे-६, सांगे-४ व मुरगाव-४ अशी आकडेवारी आहे.
यावेळी भाजपचे आमदार रमेश तवडकर व सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी याठिकाणी भेट देऊन या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला.
पालकाला अपघात
या आमरण उपोषणाला बसलेल्या एका उमेदवाराचे पालक विठोबा कोटकर हे रस्ता ओलांडत असताना त्यांना एका दुचाकीस्वाराने ठोकरले. यावेळी तात्काळ "१०८' रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना गोमेकॉत हालविण्यात आले. गोमेकॉत त्यांची तपासणी केली असता ते ठीक असल्याचे सांगितले गेले पण छातीत त्रास जाणवू लागल्याने अखेर त्यांना दाखल करून घेण्यात आले.

महाराष्ट्र, हरयाणात कॉंग्रेसची सरशी

अरुणाचलमध्येही पूर्ण बहुमत

मुंबई, दि. २२- महाराष्ट्रासह हरयाणा व अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसची सरशी झाली आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेन युतीला पुन्हा एकदा विरोधक म्हणूनच भूमिका बजावावी लागेल.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमत संपादन करण्याएवढ्या जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेच्या हातून विरोधी पक्षनेतेपद निसटले असून ही संधी आता भाजपला लाभली आहे.
२८८ पैकी २८७ जागांचे निकाल पाहता, कॉंग्रेसला ८१, राष्ट्रवादीला ६२, शिवसेनेला ४४, भाजपला ४६, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १३ आणि तिस-या आघाडीला ११ जागा मिळाल्या आहेत, तर तब्बल ३० जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांनी बाजी मारली आहे.
मुंबई-ठाण्यात मनसेच्या कामगिरीमुळे भाजप-शिवसेना युतीला मोठाच फटका बसला. हेच चित्र यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही दिसले होते. त्याचा "रिप्ले' नव्याने आज दिसून आला. दोन मराठी माणसांच्या भांडणात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा लाभ झाला होता. तेच समीकरण विधानसभा निवडणुकीच्या निकालातही पाहायला मिळाले. सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या महोत्सवात कोण बाजी मारणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. आघाडी सरकारच्या १० वर्षांच्या अपयशी कारभारावर जोरदार हल्लाबोल करत युतीच्या नेत्यांनी सत्तांतराची साद घातली होती. पण त्याला जनतेने तितकासा प्रतिसाद दिला नाही आणि जिथे दिला तिथे मनसेने त्यांचा घात केला. म्हणूनच, १६९ जागा लढवणा-या शिवसेनेला ४४ जागांवर समाधान मानावे लागले.
गेल्या विधानसभेत त्यांच्या खात्यावर ५६ जागा होत्या. मनसेला १३ जागा मिळाल्या असल्या तरी जवळपास २५ जागांवर युतीचे उमेदवार मतविभाजनामुळे पडले आहेत. भाजपच्या जागाही ५४ वरून ४६ वर आल्या आहेत, पण हा आकडा सेनेपेक्षा जास्त असल्यानं ते आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकतील.
आघाडी आरामसे !
एकीकडे मनसेमुळे युतीला शंभरी सुद्धा गाठता आली नसताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमत मिळवल्यात जमा आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या आघाडीनं तिस-यांदा विजय मिळवत हॅटट्रिक केली आहे. कॉंग्रेसला मिळालेल्या ८१ जागा आणि राष्ट्रवादीच्या ६२ जागा ही बेरीज १४३ इतकी होते. अजून एक जागा जाहीर होणं बाकी आहेच, पण ती मिळाली नाही तरी अनेक अपक्ष त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करणे त्यांच्यासाठी सोपे काम झाले आहे. फक्त मुख्यमंत्री कोण, यावरून आता धुमशान रंगणार आहे.
दरम्यान, गेल्या विधानसभेच्या तुलनेत कॉंग्रेसने ७० जागांवरून ८१ जागांवर झेप घेतली आहे, तर राष्ट्रवादी ७३ वरून ६२ वर गडगडली आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर आला, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाबच म्हणावी लागेल.
तिसरी आघाडी पिछाडीवर
मनसेच्या तुलनेत तिस-या आघाडीचा पर्याय दाखवणा-या रिपब्लिकन डावी लोकशाही समितीला या निवडणुकीत फारशी चमक दाखवता आलेली नाही. रिडालोसला जेमतेम ११ जागा मिळाल्या आहेत. तर जवळपास ३० जागांवर अपक्ष व बंडखोर उमेदवार निवडून आले आहेत.

हरयाणा आणि अरुणाचल
सहा महिन्यांपूर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारची जादू अद्याप ओसरलेली नाही. महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणा व अरूणाचल प्रदेशामध्येही कॉंग्रेसच पुन्हा सत्तेवर आल्याने आम आदमी का हाथ , कॉंग्रेस के साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र , हरयाणा व अरूणाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये गेल्या १३ मे रोजी विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. तिन्ही ठिकाणी पुन्हा एकदा कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर आले आहे. हरयाणातील ९० पैकी ३६ जागांवर कॉंग्रेस विजयी झाली आहे तर चार जागांवर आघाडीवर आहे. या उल्लेखनीय यशामुळे मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा भूपिंदरसिंग हूडा विराजमान होण्याची शक्यता आहे.
भारतीय राष्ट्रीय लोकदल राज्यात दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. लोकदल ३१ जागांवर विजयी झाले असून दोन जागांवर आघाडीवर आहे. सहा अपक्ष उमेदवार विजयी झाले असून एक आघाडीवर आहे. हरयाणा जनहित कॉंग्रेसचे सहा उमेदवार विजयी झाले. भाजपने चार जागांवर विजय मिळवला. बसपचा एक उमेदवार विजयी झाला आहे तर अन्य उमेदवारांपैकी एक विजयी झाला.
अरुणाचलमध्येही सत्तेचा मार्ग सुकर
ईशान्येतील प्रमुख राज्य असल्यामुळे अरुणाचल प्रदेशच्या निवडणुकीला बरेच महत्त्व होते. तिथे ६० पैकी ४० जागांवर विजय मिळवल्याने कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस , तृणमूल कॉंग्रेसने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला आहे तर भाजपने दोन जागांवर विजय मिळवला. एक अपक्ष आणि तीन अन्य उमेदवार विजयी झाले आहेत.

महाराष्ट्रातील पक्षनिहाय निकाल
एकूण जागाः २८८
जाहीर जागाः २८७
कॉंग्रेस - ८१
राष्ट्रवादी कॉंग्रेस - ६२
शिवसेना - ४४
भाजप - ४६
मनसे - १३
तिसरी आघाडी - ११
इतर - ३०

हरयाणातील पक्षनिहाय निकाल
पक्ष जागा
कॉंग्रेस ४०
इंडियन नॅशनल लोकदल ३१
हरियाणा जनहित कॉंग्रेस ०६
भारतीय जनता पक्ष ०४
बहुजन समाज पक्ष ०१
शिरोमणी अकाली दल ०१
इतर ०७
एकूण ९०


अरुणाचलातील पक्षनिहाय निकाल
एकूण जागा : ६० यातील ३ अविरोध
निकाल घोषित : ५७
कॉंग्रेस ४०
भाजप ०२
राष्ट्रवादी कॉंग्रेस ०५
ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस ०५
इतर ०५
एकूण ५७

वास्कोतील ठकसेनाकडे कोट्यवधींची मालमत्ता


४१ लाखां ठेवी
बॅंक खाती गोठवली
ट्रेलर, वॅगन आर जप्त


वास्को, दि. २२ (प्रतिनिधी)- भरघोस पगाराची नोकरी आणि पैसे कमवण्याची मोठमोठी आमिषे दाखवून सुमारे ८१४ लोकांना गंडविलेल्या सुरेश आजगावकर या ठकसेनाच्या पत्नीच्या खात्यात तब्बल ४१ लाख ६५ हजार रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय तिच्या नावावर असलेला एक ट्रेलर (क्र जीए ०६ टी ०९४९) तसेच एक वॅगन आर गाडी (क्र जीए ०६ डी २११४) पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची बॅंक खाती गोठवण्यात आल्याची माहिती वास्कोचे पोलिस उपनिरीक्षक रझाक शेख यांनी दिली. आजगावकर दाम्पत्याच्या नावावर असलेले फ्लॅट व त्यांच्या नावे उतरवण्यात आलेला विमा एकत्र केल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बेलाबाय वास्को येथे राहणाऱ्या सुरेश आजगावकर ऊर्फ मोरजकर या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याने सुमारे ८१४ अनुसूचित जातीजमातीच्या लोकांना काम देण्याची तसेच इतर प्रकारे पैसे कमावण्याची आमिषे दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडविल्याचे उघडकीस आले होते. वास्को पोलिसांनी सदर संशयिताला १३ ऑक्टोबर रोजी ४२० कलमाखाली अटक करून दुसऱ्या दिवशी प्रथम श्रेणी न्यायालयात उभे करून प्रथम चार दिवसांची व नंतर पाच दिवसांची कोठडी मिळवली होती. उद्या २३ रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वास्को पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली असता त्याच्याजवळ एक कोटीच्या आसपास मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. वास्को पोलिस उपनिरीक्षक शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार आजगावकर याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल १८ विमा पॉलिसी केल्या असून विम्याची आगाऊ रक्कमही भरण्यात आली आहे. यांपैकी १६ पॉलिसी प्रत्येकी पन्नास हजाराच्या असून एक दीड लाख तर एक अडीच लाखाची (एकूण १२ लाख) आहे. त्याचप्रमाणे आजगावकर याच्या पत्नीच्या नावावर बॅंकेमध्ये तीन कायम ठेवी खाती असून यात २९ लाख ६५ हजार रुपये गुंतवण्यात आले आहेत. पोलिसांनी विमा व कायम ठेवी खाती गोठवली असून अन्य काही बॅंकेतही आजगावकर यांनी पैसे गुंतवल्याचा अंदाज आहे. "मुरगाव एव्हेन्यू' इमारतीमध्ये आजगावकर याचे तीन फ्लॅट, एक दुकान तसेच चिखली येथील अन्य एका इमारतीमध्ये दोन फ्लॅट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे आजगावकर याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुरेश आजगावकर हा कस्टममध्ये "गार्ड' म्हणून कामाला असून त्याचा पगार ११,६९९ एवढा आहे. लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडवल्यानंतर ही रक्कम आपल्या पत्नीच्या नावावर केल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्यापाशी एवढी मोठी रक्कम कशी काय आली, अन्य कोणालाही याचा थांगपत्ता कसा लागला नाही? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रझाक शेख पुढील तपास करीत आहेत.

मळा खूनप्रकरणातील पाचवा संशयित अटकेत

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)- राजधानीत महिला व २ बालकांसह चौघांचा खून करून मृतदेह मळा येथील रुआ द ओरेम खाडीत फेकून देणाऱ्या टोळीतील पाचव्या संशयिताला आज पहाटे बेळगावनजीक टुंकूर या गावातून अटक करण्यात आली. अटक केलेल्याचे नाव मोहन केशवकर (२०) असे असून तोही चिंबल येथे राहणारा आहे, त्याला गोव्यात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहन याला आज न्यायालयात हजर करून चौदा दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. याच खून प्रकरणात अटक केलेला सुरेश केशवकर याचा मोहन हा धाकटा भाऊ आहे.
त्या चौघांचा खून केल्यानंतर मोहन टुंकूर येथील आपल्या भावोजीच्या घरी निघून गेला होता. याच खुनात सहभागी असलेला आणखी एक संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. येत्या काही दिवसांत त्यालाही ताब्यात घेतले जाणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
यापूर्वी पोलिसांनी बाबू ऊर्फ वड्डा रेड्डी (२८), प्रीतेश ऊर्फ बिच्चू करमलकर (१९) विदेश करमलकर (दोघेही भाऊ) व सुरेश विठ्ठलदास केशवकर (२१) या चौघांना चोवीस तासांत जेरबंद केले होते. यातील एकाने त्या महिलेवर बलात्कार केला होता, अशी माहितीही तपासात उघडकीस आली आहे. सुनिता दिलीप शेट्ये, मुलगा नागेश, मुलगी दीपाली, वयोवृद्ध भालचंद्र साळुंखे या चौघांच्या डोक्यावर अवजड हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे मृतदेह रुआ द ओरेम खाडीत फेकून देण्यात आले होते.

सरकारवर अब्रूनुकसानीचा दावा करणार - सनातन संस्था

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - "कुत्रा पिसाळलेला असल्याचे भासवून त्याला मारण्या'ची कॉंग्रेसची जुनी कार्यपद्धती आहे. राज्य सरकारने सनातन संस्थेच्या विरोधात कोणतेही पुरावे हाती नसताना घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सनातन संस्थेतर्फे हिंदूचे संघटन केले जात असल्यानेच कॉंग्रेस सरकार सनातन संस्थेला विरोध करून बंदी आणण्याची भाषा करीत आहे. गेल्या काही दिवसात संस्थेच्या नावाची बदनामी केली जात आहे, त्याची भरपाई कोण देणार? असा सवालही श्री. वर्तक यांनी उपस्थित केला आहे.
संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेल्या संस्थेच्या साधकांची चौकशी करणे हे अन्यायकारक आहे. त्याचप्रमाणे या जिलेटिन स्फोटाच्या नावाने पोलिस तपास यंत्रणेने जो धुमाकूळ घातला आहे, त्याच्या विरोधातही रीतसर तक्रार सादर केली जाणार आहे. "आम्ही या प्रकरणात नाहीत. उलट आम्ही तक्रारदार आहोत. आम्हाला न्याय हवा' असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे. तसेच मडगाव स्फोटाचा तपास प्राथमिक स्तरावर असताना या स्फोटाची आणि मालेगाव बॉंबस्फोटाचा संबंध असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. गेल्या काही दिवसात तपास यंत्रणेने आश्रमात टाकलेल्या छाप्यात त्यांच्या हाती आक्षेपार्ह अशी कोणतीच गोष्ट हाती लागलेली नाही. तसेच ज्या वस्तू पोलिसांनी आश्रमातून पंचनामा करून नेलेल्या आहेत, त्या पंचनाम्यावर प्रत्यक्ष साक्षीदाराची सही घेण्यात आलेली नाही, अशी माहितीही श्री. वर्तक यांनी दिली आहे.

Thursday 22 October, 2009

'बिट्स पिलानी'त काविळीचे थैमान

१३१ विद्यार्थ्यांना बाधा
वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): झुआरीनगर, वेर्णा येथे असलेल्या बिट्स पिलानी तांत्रिक महाविद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याची घटना ताजी असतानाच आज तब्बल १३१ विद्यार्थ्यांना या साथीने ग्रासल्याचे उघडकीस आले आहे. महिन्याभरापूर्वीच महाविद्यालय १६ दिवसांसाठी बंद ठेवून साथ फैलावण्याचे कारण शोधण्याची वेळ प्रशासनावर आली होती; महाविद्यालय पुन्हा खुले झाल्यानंतर केवळ नऊ दिवसांतच घरी परतण्याची पाळी १३१ विद्यार्थ्यांवर आली आहे. या प्रकारामुळे येथे भीतीचे वातावरण पसरले आहे.
भारतातील वेगवेगळ्या राज्यातून मिळून २४०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. एका महिन्यापूर्वी (२५ सप्टेंबर) महाविद्यालयातील ४८ विद्यार्थ्यांना अचानक कावीळ झाल्याने त्यामागचे कारण शोधून काढण्यासाठी तसेच अन्य विद्यार्थ्यांना याची बाधा होऊ नये या उद्देशाने महाविद्यालय १६ दिवसांसाठी बंद ठेवून सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले होते. भारतातील नामांकित संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या संस्थेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला होता. सुटी संपवून १२ ऑक्टोबर रोजी सर्व विद्यार्थी महाविद्यालयात परतले होते. यानंतर आज २१ रोजी काही विद्यार्थ्यांमध्ये या साथीची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी १३१ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, यासंदर्भात बिट्स पिलानीचे अधिकारी आर. पी. प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या एका महिन्याच्या कालावधीत १७९ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याची माहिती दिली. एका महिन्यापूर्वी ४८ विद्यार्थ्यांना कावीळ झाली होती. आता अन्य १३१ जणांना कावीळ झाल्याचे त्यांनी सांगितले. या साथीचा फैलाव होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगून डॉ. प्रधान यांनी, काविळीच्या जंतूंनी गेल्या महिन्यातच या विद्यार्थ्यांच्या शरीरात प्रवेश केला असावा आणि आता त्याची तीव्रता वाढली असावी, असा कयास व्यक्त केला.
सुरुवातीला ४८ विद्यार्थ्यांना कावीळ झाल्यानंतर येथील सर्व गोष्टींची तपासणी करण्यात आली होती. यावेळी सर्व काही ठीक होते. केवळ येथील एक "बोअर वेल' खराब असल्याच्या संशयामुळे बंद करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. नव्याने आढळलेल्या १३१ विद्यार्थी रुग्णांना उपचारासाठी घरी पाठवण्यात आल्याचे सांगून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात काविळीचा प्रसार झाल्याने आरोग्य संचालकांच्या आदेशानुसार येथील ८० टक्के विद्यार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती डॉ. प्रधान यांनी दिली. येथील खाद्यपदार्थ व इतर गोष्टींची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
बिट्स मध्ये शिकणाऱ्या २४०० विद्यार्थ्यांपैकी १७९ जणांना थोड्याच दिवसांमध्ये कावीळ झाल्याने यामागचे नेमके कारण शोधून काढण्याची मागणी होत आहे. शिवाय या रोगाचा फैलाव झुवारीनगर परिसरात होण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

'सर्च' वॉरंटला कोर्टाचा नकार

सनातनप्रकरणी तपास यंत्रणेला चपराक
मडगाव, दि. २१(प्रतिनिधी): दिवाळीच्या पूवसंध्येला मडगावात झालेल्या स्फोटाशी सनातन संस्थेचा काही संबंध आहे काय याबाबत संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमाची झडती घेण्यासाठी परवानगीला येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने विशेष तपास पथकाला नकार दिला. त्यामुळे या स्फोटाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या पथकाला झटका बसला आहे.
सदर आश्रम आपल्या कार्यकक्षेत येत नाही व म्हणून आपणास तशी परवानगी देता येणार नाही असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. सदर पथकाने काल या प्रकरणाच्या तपासाला आरंभ केला. स्फोटासंबंधी आणखी काही धागेदोरे मिळतील काय यासाठी सदर आश्रमाची झडती घेण्याचे ठरवले. त्यासाठी सनातन आश्रमाच्या झडतीची अनुमती मागितली होती. पण, ती नाकारली गेल्याने या पथकाची अडचण झाली आहे.
दरम्यान, मुंबईहून आलेल्या दहशतवादविरोधी पथकाने कोणतेही वॉरंट वगैरे न घेताच काल आश्रमाची झडती घेतली. त्यामुळे त्यांच्या काारवाईबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत.
पोलिस अधीक्षक ओमप्रकाश कुडतरकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने आपले काम सुरू केले असले तरी तपासकामाबाबत कोणतीही माहिती देण्याचे ते टाळत आहेत. तीन वेगवेगळ्या गटांत त्यांचे काम सुरू आहे. तपास करताना सर्व शक्यता ते आजमावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या स्फोट प्रकरणात सनातन संस्थेबाबत पोलिसांच्या हाती अजूनही ठोस पुरावे लागलेले नाहीत.
सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाचे व्यवस्थापक रवींद्र मराठे व "सनातन प्रभात'चे संपादक पृथ्वीराज हजारे यांना आजही येथे पाचारण करून तपास केला जात आहे. आज विशेष तपास पथकाने हजारे यांची चौकशी केली. गेल्या शनिवारपासून रोज दिवसभर त्यांना येथे पाचारण केले जात आहे. आजही त्यांनी आपल्या संस्थेचा या प्रकरणात कोणताच हात नसल्याचे व संस्था केवळ आध्यात्मिकविचारांना वाहून घेतलेली असल्याचा पुनरुच्चार केला. या प्रकरणाचा संस्थेच्या विस्तारावर परिणाम होणार का, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.
संस्था केवळ आध्यात्मिक विचारसरणीची आहे. संस्था खरोखरच दोषी आहे काय हा प्रश्र्न प्रत्येकाने आपल्या आत्म्यालाच विचारावे म्हणजे त्याचे अचूक उत्तर मिळेल, असे मराठे यांनी सांगितले.
संपूर्ण मोकळीक विशेष पथकाला हवी
दरम्यान हे प्रकरण सुरुवातीपासून चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे आता या तपासात अनेक अडचणी येत आहेत असे विशेष पथकाचे मत बनले आहे. त्यासाठी आपणाला एक तर संपूणर्र् मोकळीक द्यावी किवा या जबाबदारीतून मोकळे करावे असे या पथकाकडून सरकारला कळवण्यात आल्याचे खास सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार राजकारण्यांकडून विशिष्ट व्यक्तींना अगोदर अटक करा, असे दडपण पोलिस यंत्रणेवर येऊ लागल्यानंतर या पथकाने कामाचा ताबा घेतल्यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या गेल्या सोमवारी मडगावात झालेल्या बैठकीत ही बाब स्पष्ट केली. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे सारी सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यामुळेच त्यांनी सदर बैठक आटोपून बाहेर पडताना पत्रकारांशी काहीही बोलण्याचे टाळले व गृहमंत्र्यांनाही बोलू दिले नाही.
पोलिस अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी आत्माराम देशपांडे हेच पणजीत यासंदर्भात सांगतील असे जे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले त्याचा उलगडा आज झाला तो विशेष पथकाच्या भूमिकेची माहिती मिळाल्यानंतर.
उपलब्ध माहितीनुसार सदर बैठकीसाठी मडगावला येण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी राजधानीत पत्रकारांपुढे जी मुक्ताफळे उधळली त्यांचे संतप्त पडसाद केवळ लोकांतच नव्हे तर सर्वसामान्यातच केवळ नव्हे तर खुद्द पोलिस दलातही उमटले. कोणत्याही ठोस पुराव्याविना कोणालाच अटक केली जाणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली व त्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली.
यापूर्वी बाबूश मोन्सेरात तसेच मिकी पाशेको प्रकरणात अशा राजकीय स्वरूपाच्या सूचनांवरून पोलिसांनी जी कारवाई केली होती त्यामुळे पोलिस यंत्रणा न्यायालयात उघडी पडली होती. त्याचे संदर्भ यावेळी देण्यात आले. तसे राजकीय आदेश पाळण्याऐवजी आपणाला बाजूला काढा, अशी तंबीच या पथकाने दिल्याने गृहमंत्री विरुद्ध यंत्रणा असे चित्र सध्या निर्माण झाल्याचे दिसून येते.

मालगोंडाच्या नातेवाइकांची पोलिसांना नोटिस

मडगाव बॉंबस्फोटात निधन झालेल्या मालगोंडा पाटील याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी सांगली येथून आलेल्या त्याच्या नातेवाइकांना शवचिकित्सा न झाल्याची सबब पुढे करून मृतदेह देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना कायदेशीर नोटिस बजावण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर ७२ तास उलटूनही मृतदेह देण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे मालगोंडा याच्या वडिलांनी आपल्या वकिलामार्फत मडगाव पोलिसांना बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे. मालगोंडा याचा मृतदेह सांगली येथील त्याच्या निवासस्थानी पोचता करावा तसेच सांगली येथून मृतदेह नेण्यासाठी आणलेल्या शववाहिकेचे भाडे मिळून एकूण २० हजार खर्च चुकता करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गोवा एक्सप्रेसला अपघात

मथुरेजवळ घटना, २२ ठार अनेक जखमी
मथुरा, दि. २१ : दिल्लीकडे जाणाऱ्या गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसने मथुरेनजीक मेवाड एक्सप्रेसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान २२ जण ठार, तर अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना मथुरा आणि वृंदावनच्या स्थानकांच्या दरम्यान आज पहाटेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, मेवाड एक्सप्रेसमधील प्रवाशाने साखळी ओढल्याने ती मथुरेनजीक उभी होती. या गाडीला वेगाने येत असलेल्या गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसने जोरदार धडक दिली. पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी हा अपघात घडला.
दोन गाड्यांची टक्कर झाली तेव्हा सर्वच डब्यांमधील प्रवासी गाढ झोपेत होते. वरच्या बर्थवरील लोक, तसेच सामान खाली पडले आणि एकमेकांच्या अंगावर पडल्याने सारेच खडबडून जागे झाले. अपघात झाल्याचे समजताच डब्यातील लोकांनी पळापळ सुरू केली. त्यातच चेंगराचेंगरीही झाली. लहान मुले आणि महिलांचा टाहो आजूबाजूच्या परिसरातही ऐकू येत होता. मेवाड एक्सप्रेसच्या ज्या डब्याचे सर्वाधिक नुकसान झाले तेथे अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी अक्षरश: गॅस आणि फोम कटर याचा वापर करावा लागला. त्यातून अनेक महिला आणि बालकांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताची भीषणता पाहून मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते.
या अपघातामुळे मथुरेच्या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. एका बाजूची वाहतूक काही तासातच सुरळीत झाली. पण, अजूनही बऱ्याच गाड्यांचे मार्ग या अपघातामुळे प्रभावित आहेत.
प्राथमिक तपास अहवालानुसार, गोवा एक्सप्रेसच्या चालकाने सिग्नलकडे लक्ष दिले नाही, असे लक्षात आले आहे. त्याचे गाडीच्या वेगावरही नियंत्रण नव्हते. त्यामुळे मेवाड एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला जबर हादरा बसला. त्यात किमान २२ जण ठार झाले तर जखमींचा आकडा २० असल्याचे सांगितले जात आहे. पण, प्रत्यक्षात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जखमींना हालविल्याने त्यांचा निश्चित आकडा कळू शकलेला नाही.
रेल्वेतर्फे नुकसान भरपाईची घोषणा
केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. सोबतच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. प्रत्येक गंभीर जखमीला १ लाख रुपये तर किरकोळ जखमा झालेल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये रेल्वेतर्फे दिले जाणार आहेत. याशिवाय उत्तरप्रदेशचे कृषिमंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचेही जाहीर केले आहे.

सनातनवर बंदी कठीण: मुख्यमंत्री

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित झालाच नाही. एखाद्या संस्थेवर बंदी घालावयाची असल्यास त्यासाठी योग्य प्रक्रिया अवलंबावी लागते. या घटनेत सनातनचा सहभाग असल्याचे सबळ पुरावे अद्याप सापडले नाहीत. केवळ तोंडी मागणी करणे व प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे यात फरक असतो, अशा शब्दात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी संस्थेवरील बंदीबाबतच्या विषयाला पूर्णविराम दिला.
आज पर्वरी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री कामत यांनी आपल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांना मडगाव येथील स्फोटाप्रकरणी माहिती दिली. आपण प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्याने व इतर अनेक गोष्टी आपल्याला माहिती असल्याने आपणच या प्रकरणाची सखोल माहिती देणे पसंत केले, असेही त्यांनी सांगितले.
मडगाव येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोटाची चौकशी "सीबीआय'कडे सोपवण्याची विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची मागणी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज फेटाळून लावली. उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा विभागाचे अधीक्षक ओमप्रकाश कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाला पूर्ण स्वतंत्र देण्यात आले आहे. हे प्रकरण गोवा पोलिस अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हाताळणार असल्याचेही कामत यावेळी म्हणाले. गोवा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांची मदत घेतली जात आहे. पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जाणार असून या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जाईल, असेही ते म्हणाले.
आज मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री कामत यांच्याबरोबर गृहमंत्री रवी नाईक येतील, अशी अपेक्षा पत्रकार बाळगून होते. पण प्रत्यक्षात गृहमंत्री आलेच नाहीत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे मुख्यमंत्री कामत यांच्याबरोबर यावेळी आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
आपल्याला लक्ष्य बनवण्याचा इरादा असू शकेल
गोवा प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. रमाकांत खलप यांनी मडगाव येथील झालेला स्फोट हा मुख्यमंत्री कामत यांना लक्ष्य बनवण्यासाठीच होता काय, याचा तपास लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. मुख्यमंत्री कामत यांनीही ऍड. खलप यांच्या या वक्तव्याला पुष्टी देत ती शक्यता नाकारता येणार नाही, असे सांगितले. पोलिस त्या दृष्टीनेही तपास करणार, असे ते म्हणाले. नरकासूर स्पर्धेला हजारोंच्या संख्येने लोक जमतात व त्यावेळी जर हा स्फोट झाला असता तर अनर्थ घडला असता, असेही ते म्हणाले.

गोव्यातील टोळीची दुष्कृत्ये मुंबईतही

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): राज्यात गाजलेल्या खूनसत्रप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टोळक्याने गोव्यात अजून काही खून केल्याची शक्यता असून त्यांनी विरार ठाणे मुंबई येथे एका महिलेचा अशाच पद्धतीने खून केल्याची कबुली आज गुन्हा अन्वेषण विभागाला दिली. दि. १८ रोजी विरार येथे एकदम कुजलेल्या स्थितीत त्या मृतदेह आढळून आला असून ठाणे पोलिस या दोन दिवसात अधिक चौकशीसाठी गोव्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी आज दिली. सदर ही महिला मुंबई येथे चंद्रकांतची पत्नी ग्रेश्मा हिच्या शेजारीच राहत होती, अशी माहिती मिळाली आहे.
सायरन याच्या अल्पवयीन प्रेयसीचा या खून सत्रात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून या टोळीत आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले. राज्यात चार महिलांचे खून करण्यामागे कोणता हेतू होता, या खुनामागे केवळ चोरी हा एकच उद्देश होता का, आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा अद्याप झालेला नाही. घरून काही अंतरावर असलेल्या दुकानावर कामाला जाणाऱ्या शर्मीला मांद्रेकर या तरुणीच्या अंगावर किती किमतीचे दागिने होते ज्यामुळे तिचा खून करण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या टोळीला आधीपासून ओळखणारी एविटा हिच्या गळ्यातील सोनसाखळी यापूर्वी सायरन याच्या मित्राने चोरली होती. मग, तिचा खून का करण्यात आला, याचेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एविटा ही सायरन हिच्या प्रेयसीला बऱ्यापैकी ओळखत होती, अशी माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे.

जुवारी पुलावर बॉंबची अफवा

वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या जुवारी पुलाखाली बॉंब ठेवण्यात आल्याची माहिती आज दुपारी वेर्णा पोलिसांची धावपळ उडाली. बॉंब असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉंब निकामी पथकाच्या साह्याने जुवारी पुल तसेच आजूबाजूच्या सर्व परिसरात तपासणी केली; मात्र ही केवळ अफवा असल्याचे शेवटी स्पष्ट झाले. वेर्णा पोलिस सध्या यासंदर्भात खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत.
आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका वृत्तपत्र पत्रकाराला जुवारी पुल परिसरात बोंब ठेवण्यात आल्याची माहिती एका अज्ञाताने दिल्याने त्याने वेर्णा पोलिस स्थानकावरील पोलिस उपनिरीक्षक जिवबा दळवी यांना याची माहिती दिली. दक्षिण व उत्तर गोव्याला जोडणाऱ्या पुलाच्या परिसरात बॉंब असल्याचे कळताच वेर्णा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. बॉंब निकामी पथकाच्या साह्याने पुलाच्या खाली, कुठ्ठाळी परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्यात आला. शेवटी हा अफवेचा प्रकार असल्याचे पोलिसांना जाणवले.
गेल्या काही दिवसांपूर्वी मडगाव येथे झालेला स्फोट व सांकवाळ येथे स्फोटक पदार्थ सापडल्यामुळे गोमंतकीय जनता आधीच भीतीच्या छायेखाली वावरत असताना या अफवेने पुलावर धावपळीचे वातावरण निर्माण झाले. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात, बॉंब निकामी पथकाच्या उपस्थितीमुळे वाहनचालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. शेवटी अज्ञाताने अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्पुरता का होईना सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, सदर प्रकाराबाबत वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक जिवबा दळवी यांच्याशी संपर्क साधला असता महेश नावाच्या एका पत्रकाराला जुवारी पुलाच्या परिसरात बॉंब ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तपासणी केल्यानंतर हा अफवा उठवण्याचाच प्रकार असल्याचे उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकाराला कोणी व कुठून संपर्क केला याबाबत तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Wednesday 21 October, 2009

तपास सीबीआयकडे सोपवा


पर्रीकर यांची आग्रही मागणी


दोन मंत्र्यांच्या भांडणात
आम आदमी असुरक्षित



पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- मडगावात बॉंबस्फोट होऊन १०० तास उलटले तरी अजून तपासाला गती येत नाही ; या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा, सामग्री उपकरणे गोवा पोलिसांकडे नाहीत, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्याचे गृहमंत्री आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी पोलिस यंत्रणेला चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सूत्रे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे (सीबीआय) सोपविण्यात यावीत अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांच्या पक्षपाती धोरणामुळे गोवा पोलिस या प्रकरणाचा तपास निःपक्ष आणि समर्थपणे करू शकणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
गृहमंत्री एका मागोमाग एक बेजबाबदार वक्तव्ये करून बॉंबस्फोटासारख्या गंभीर प्रकरणाला चुकीचे वळण देत असल्याने गोमंतकीयांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यामुळे पोलिस तपास निःपक्षपातीपणाने केला जाईल, पोलिसांना चौकशीत मुक्त हस्त देण्यात येईल, हा गृहमंत्री रवी नाईक यांचा दावा फोल ठरला आहे. आपल्याच मंत्रिमंडळातील एक प्रतिस्पर्धी सुदिन ढवळीकर यांच्याविरुद्ध त्यांना तपासाचा सारा रोख न्यावयाचा आहे, हे त्यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्यांवरून सिद्ध होत असल्याची शंका श्री. पर्रीकर यांनी व्यक्त केली.
बॉंबस्फोटात वापरलेली स्कूटर ही ढवळीकरांच्या नातलगाची आहे असल्याचे वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलेले असतानाच सदर स्कूटर २००७ मध्येच हस्तांतरित करण्यात आली होती, असे पोलिस सांगत आहेत. शिवाय ती स्कूटर हस्तांतरित करण्यात आल्याचा पुरावाही वाहतूक विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. याचाच अर्थ रवी नाईक हे चुकीची माहिती पसरवीत असून त्यांचा सारा रोख हा सुदिन ढवळीकर यांना या प्रकरणात गुंतवण्याकडेच आहे. अशाने या प्रकरणाचा तपासच चुकीच्या पद्धतीने जात असल्याचे श्री. पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
महानंद प्रकरण उघडकीस आल्यानंतर "महिलांनी ओढणी वापरणे सोडून द्यावे' यासारखे हास्यास्पद विधान करून गृहमंत्र्यांनी स्वतःचेच हसे करून घेतले होते. आता बॉंबस्फोटासारख्या गंभीर विषयाला वळण देऊन आपला राजकीय डाव साधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अशा वेळी गृहमंत्री पदावर राहण्याचा त्यांना कोणताच अधिकार पोचत नाही, अशी टीकाही श्री. पर्रीकर यांनी केली. मडगाव बॉंबस्फोट हे आंतरराज्य प्रकरण आहे. या प्रकरणाचे धागेदोरे गोव्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतही आहेत. शिवाय या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान व सामग्री गोवा पोलिसांकडे नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेकडेच सोपवणेच योग्य आहे. गोवा पोलिसांनी सनातनच्या आश्रमावर जेव्हा छापा टाकला तेव्हा त्यांच्याकडे तपासाची आवश्यक उपकरणे होती का? असा सवाल करून श्री. पर्रीकर पुढे म्हणाले की, उचित सामग्रीशिवाय छापा टाकल्यामुळे जर तिथे काही पुरावा असेल तर तोही नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. आणि दोन्ही संशयितांचे मृत्यू झाल्यामुळे तसे झाल्यास या प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांना खूपच कठीण जाणार आहे.
भाजपला रवी आणि सुदिन यांच्या भांडणात अजिबात स्वारस्य नाही. परंतु, रवी नाईक या प्रकरणातून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्यामुळेच गोवा पोलिसांमार्फत सदर तपास पुढे नेण्यास भाजपचा आक्षेप आहे. या मागणीचे निवेदन राज्यपाल आणि केंद्रीय गृहखात्याकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बॉंबस्फोटाच्या कारस्थानात ज्या व्यक्ती अथवा संस्था सहभागी असतील त्यांना अतिशय कठोर शिक्षा झाली पाहिजे. परंतु, तसे करण्यासाठी आधी त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. गृहमंत्र्यांची संदिग्ध भूमिका अशीच कायम राहिली तर खरे आरोपी निसटून जातील आणि ही केसच बंद करावी लागेल अशी भीतीही त्यांनी शेवटी व्यक्त केली. या परिषदेला पर्रीकर यांच्यासोबत आमदार दिलीप परुळेकर आणि दयानंद सोपटे हेही उपस्थित होते.

स्वाईन फ्लू रुग्णाचे निधन

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आज एका स्वाईन फ्लू रुग्णाचे निधन झाले. यामुळे गोव्यात स्वाईन फ्लूने निधन झालेल्यांची संख्या २ झाली आहे. निधन पावलेली २५ वर्षीय महिला मूळ सासष्टीतील असून ती उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यात राहत होती. ७ ऑक्टोबरपासून तिला ताप येत होता आणि खासगी डॉक्टरकडे उपचार सुरू होते. १२ रोजी तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते आणि गेले आठ दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना आवश्यक उपचार देण्यात आले आहेत.
दरम्यान, स्वाईन फ्लूचे तीन संशयित रुग्ण आढळले असून दोघांवर खासगी इस्पितळात तर एकावर नौदल इस्पितळात उपचार सुरू आहेत. मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्फोटाचे पडसाद उमटणार

पणजी, दि.२०(प्रतिनिधी)-राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक उद्या २१ रोजी होणार असून यावेळी विविध विषय चर्चेला येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. काणकोण येथील पूरग्रस्त भागातील पुनर्वसनाच्या कामाचा आढावा व मडगाव येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्फोट हे विषय प्रामुख्याने चर्चेला येणार आहेत. मडगाव स्फोटाची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना राजकीय पटलावर मात्र सत्ताधारी पक्षातील दोन मंत्र्यांत याविषयावरून कलगीतुरा सुरू असल्याचे बोलले जाते. या वादाचे पडसादही उद्याच्या बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या व्यतिरिक्त गोवा लोकसेवा आयोगाने निवडलेल्या ५२ शिक्षकांचा विषय, शॅक्समालकांनी सुरू केलेले आंदोलन, हाय सिक्युरिटी नंबरप्लेट आदी विषयही प्रामुख्याने चर्चिल जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

स्फोटामागे "सनातन'च असल्याचे म्हटले नाही

पोलिसांची सावध भूमिका

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- मडगाव येथील स्फोट प्रकरणानंतर राजकीय डाव साधण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे लक्षात येताच, ""या स्फोटामागे सनातन संस्था असल्याचे पोलिसांनी कधीच म्हटलेले नाही'', अशी सावधगिरीची भूमिका आज पोलिसांनी घेतली. पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा विशेष विभागाचे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा अहवाल पोलिस खात्याकडून अद्याप सरकारला गेलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. या स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना मृत पावलेले मालगोंडा पाटील हा सनातन संस्थेशी निगडीत असल्याने आणि तो या आश्रमात राहत असल्यानेच सनातन संस्थेवर संशय बळावला आणि त्या दिशेने तपास सुरू झाल्याचे श्री. देशपांडे म्हणाले. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे स्फोटामागे सनातन संस्था असल्याचा गृहमंत्र्यांचा दावा फोल ठरला असून ते या घटनेला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.
आजही विशेष तपास पथकाने (एसआयटी) काही साधकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच संस्थेचे विश्वस्त विरेंद्र मराठे व सनातन संस्थेचे संपादक पृथ्वीराज हजारे यांना मडगाव पोलिस स्थानकात बोलावून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. आजही कोणाला अटक झाली नसल्याची माहिती यावेळी श्री. देशापांडे यांनी दिली. आश्रम आणि सनातन संस्थेच्या छापखान्यावर टाकलेल्या छाप्यात काही कागदपत्रे हाती लागली असून त्यांचा अभ्यास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच आश्रमात विदेशी व्यक्तींचे वास्तव्य आढळून आले असून अद्याप त्याविषयीची कोणतीही तक्रार नोंद करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.
हा स्फोट कसा घडला, कोणी घडवला आणि त्यासाठी कोणी आर्थिक मदत केली याचा संपूर्ण तपास पोलिस करत आहेत. अशा स्फोटाचा तपास लगेच लागत नाही. त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी उघड होणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. हा स्फोट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा घातपात घडवून आणण्यासाठी होता असा दावा कॉंग्रेस पक्षातील नेत्याने केल्याचा मुद्दा उपस्थित केला असता, हा जिलेटिन स्फोट लोकांना मारण्यासाठी होता. पण, कोणाला विशेष लक्ष बनवून स्फोट घडवून आणला यावर सध्या भाष्य करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या स्फोटाला गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणता येणार नाही कारण मालगोंडा पाटील अशा प्रकारचा स्फोट घडवून आणणार, याची माहिती कोणालाही असणे अशक्य होते. कारण अशा प्रकारच्या योजनात कट्टर कार्यकर्ते मोजक्याच व्यक्तींना बरोबर घेऊन ती यशस्वी करतात आणि त्याची कुठे वाच्यता होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात, असे ते म्हणाले. मालगोंडा पाटील याला पोलिसांनी आश्रमात दूरध्वनी करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो वेगळ्या कारणासाठी होता. आश्रमात विदेशी व्यक्ती राहते का? आश्रमासाठी विदेशातून आर्थिक मदत होते का, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी दि. ११ ऑक्टोबर रोजी मालगोंडा पाटील याला संपर्क साधण्यात आला होता. पण, त्याच्याशी संपर्क साधला नाही, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

बोरी साईबाबा मंदिरातून २ लाखांचा ऐवज लंपास

शिवनाथी, ढवळी येथील मंदिरातही चोरी

फोंडा, दि.२० (प्रतिनिधी) - फोंडा तालुक्यातील विविध भागातील देवालयात चोऱ्यांचे सत्र सुरू झाले असून केरी फोंडा येथील दोन देवालयातील चोऱ्यांनंतर बोरी येथील श्री साईबाबा, शिवनाथी शिरोडा येथील श्री शिवनाथ आणि ढवळी येथील श्री कमळेश्र्वर या तीन देवालयात चोऱ्या झाला आहेत. दरम्यान, बोरी येथील श्री साईबाबा देवालयातील दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोव्यातील पोलिस यंत्रणा मडगाव येथील बॉंबस्फोटानंतर संशयाच्या घेऱ्यात असलेल्या सनातन संस्थेच्या मागे हात धुऊन लागल्याने चोरट्यांचे फावले असून त्यांनी फोंडा तालुक्यात चोऱ्यांचे सत्र आरंभले आहे.
आवेडे बोरी येथील श्री साईबाबा देवस्थानाने सुरक्षा रक्षक ठेवला आहे. मात्र, दिवसभर एकच सुरक्षा रक्षक कामाला असल्याने रात्रीच्या वेळी त्याला डुलकी लागली आणि त्याच वेळेत चोरट्याने चोरी करण्यात यश मिळविले. देवालयाचा मागील बाजूला दरवाजा तोडून चोरट्याने देवालयात प्रवेश केला. देवालयातील श्री साईबाबा यांच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट, चांदीच्या दोन पादुका, चांदीची पंचारत, एकारती, आसनाचे चांदीचे गोल व इतर चांदीच्या वस्तू चोरट्याने पळविल्या आहेत. चोरीस गेलेल्या वस्तूची किंमत अंदाजे दोन लाखांच्या आसपास आहे. यासंबंधी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष बाबया नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे. देवालयातील चोरीच्या प्रकारामुळे भाविकात संतापाची लाट पसरली आहे. स्थानिक आमदार महादेव नाईक यांनी मंदिरातील चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित मंदिरात येऊन पाहणी केली. या चोरी प्रकरणाचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, अशी मागणी आमदार महादेव नाईक यांनी केली आहे.
शिवनाथी शिरोडा येथील श्री शिवनाथ देवालयात चोरट्याने चोरी करून दहा हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे. चोरट्याने देवस्थानच्या छप्पराची कौले काढून आतमध्ये प्रवेश केला. मंदिरातील अभिषेक पात्र आणि चांदीची सर्प मूर्ती पळविली मात्र देवालयातील फंडपेटीला हात लावला नाही. यासंबंधी देवस्थान समितीतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ढवळी येथील श्री कमळेश्र्वर देवालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने देवालयात प्रवेश केला. मात्र, कोणत्याही वस्तूची चोरी केली नाही. फक्त काही देवालयातील वस्तूंची दिशा बदलली, असे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी सांगितले.
पोलिसांनी या चोरीच्या प्रकरणानंतर तपास कामाला सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप ठोस माहिती हाती लागू शकली नाही. फोंडा भागात एखादी टोळी कार्यरत असल्याचा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. देवालयातील चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर देवालयाच्या परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक परेश नाईक तपास करीत आहे. दरम्यान, केरी फोंडा येथील श्री वेताळ देवस्थान, विजयदुर्गा देवस्थान कार्यालयातील चोरी प्रकरणी पोलिस तपासात अद्याप यश प्राप्त झाले नाही.

राज्यात ८५,३११ अधिकृत बेरोजगार

रोजगार विनिमय केंद्राकडे सरकारची पाठ

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची समस्या सोडवण्यासाठी विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. विशेष आर्थिक विभाग व "आयटी हॅबिटॅट' चे समर्थन करताना लाखो युवकांना रोजगार मिळण्याची वक्तव्ये हे केवळ हवेतील बारच ठरले आहेत. राज्य रोजगार विनिमय केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या जून २००९ पर्यंत राज्यात एकूण ८५ ,३११ सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी झाल्याचे उघड झाले आहे.
यासंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार रोजगार विनिमय केंद्राकडे जून २००९ पर्यंत एकूण ८५ हजार ३११ बेरोजगारांची नोंदणी झालेली आहे. यात ३४ हजार ३४७ महिला आहेत. ३, ३५२ अनुसूचित जाती ५,००९ अनुसूचित जमाती व १०,५४३ इतर मागासवर्गीयांचा यात समावेश आहे. या आकडेवारीनुसार बारावीपर्यंत शिक्षण झालेल्यांची २५,८९३ अशी सर्वांत जास्त संख्या आहे. दहावी उत्तीर्ण - ३२,२२८, विविध शाखांमधील पदवीधर - १९,८९१, पदव्युत्तर - २,२५९, अभियांत्रिकी डिप्लोमा - ३,७७९ व इतर - १,२०१ अशी विभागणी केली आहे.
रोजगार विनिमय केंद्र अधिक सक्रिय बनवून ही आकडेवारी अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे. त्यात तांत्रिक विभाग, माहिती तंत्रज्ञान, इतर विशेष अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आदींची विभागणी करण्याची गरज आहे. या आकडेवारीनुसारच राज्यात कोणत्या पद्धतीचा उद्योग आणावा किंवा कोणत्या क्षेत्रात गोव्यात रोजगार उपलब्ध होऊ शकतो याचे स्पष्ट चित्र समोर येऊ शकेल. रोजगार विनिमय केंद्राकडून सरकारला काहीही महसूल मिळत नाही. मुळात हे सेवाकेंद्र आहे त्यामुळे या केंद्राच्या कारभारावर कुणाचेही लक्ष नसल्याचेच येथील परिस्थितीवरून जाणवत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत सरकारी नोकऱ्यांचे समान वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला व यामुळे सरकारी नोकर भरती ही पात्रता किंवा गुणवत्तेवर होत नसून केवळ राजकीय वशिलेबाजीवर होते हे देखील उघड झाले होते. निवडणुकीपूर्वी बेरोजगारी हटवण्याबाबत बड्या घोषणा करणाऱ्या सरकारकडून त्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचेच उघड झाले आहे. राज्य रोजगार विनिमय केंद्राकडे आजही अनेक सुशिक्षितांच्या रांगा लागलेल्या असतात. सरकारी नोकरीसाठी रोजगार नोंदणी महत्त्वाची असते, त्यामुळे इथे नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. रोजगार विनिमय केंद्र केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार जरी स्थापन करण्यात आले असले तरी त्याची सर्व प्रशासकीय जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. या कार्यालयाला अजूनही संचालक किंवा उपसंचालकांची भरती करण्यात आलेली नाही. ए. जी. शिरोडकर यांची रोजगार अधिकारी म्हणून स्थायी तत्त्वावर नेमणूक करण्यात आली आहे. ते या कार्यालयाची पूर्ण जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळीत आहेत. मुख्यतः हे कार्यालय कामगार खात्याच्या अंतर्गत येते व या खात्याची जबाबदारी ही कामगार आयुक्तांकडेच आहे परंतु आत्तापर्यंत हे कार्यालय अजूनही दुर्लक्षितच आहे. बेरोजगारीचा विषय नियोजित पद्धतीने हाताळायचा असेल तर या कार्यालयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची गटवार नोंदणी केल्यास व त्यांची शिक्षणाप्रमाणे विभागणी केल्यास नेमके चित्र सरकारसमोर उभे राहण्यास मदत होईल; पण तसे होत नसल्याचेच एकूण परिस्थितीवरून स्पष्ट झाले आहे. या कार्यालयाच्या संगणकीकरणाचे कामही रखडले आहे.

Tuesday 20 October, 2009

राजकीय कुरघोडीसाठी "सनातन'चा बळी नको

गृहमंत्र्यांच्या सूडचक्राचा सनातनकडून निषेध

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - गृहमंत्री रवी नाईक हे आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यावर कुरघोडी करण्यासाठी मडगाव स्फोटाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा स्फोट सनातनच्या विरोधातील एक मोठा बनाव आहे. सनातनच्या साधकाचा खून करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न यानिमित्ताने यशस्वी झाला. सरकारी तपासयंत्रणा मात्र या प्रकरणाच्या मुळाशी न जाता सनातनला बळीचा बकरा करून गोवण्याचाच अधिक प्रयत्न करीत आहेत. या एकूण प्रकरणी सनातन दोषी नसून उलट या प्रकरणात ही संस्था तक्रारदार आहे. या संस्थेला सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी सूडभावनेने तपास करू नये, असे आवाहन सनातन संस्थेतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
मडगाव येथील दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. या स्फोटांत मृत्युमुखी ठरलेला मलगोंडा पाटील हा सनातनचा साधक होता हे खरे आहे. त्यासंदर्भात तपासकामी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेने दिले आहे.पोलिसांकडून मात्र सनातनचे आश्रम म्हणजे दहशतवादाचे अड्डे असल्याप्रमाणे तपास सुरू आहे.या सर्व प्रकरणांत पोलिस पूर्वग्रहदूषित वृत्तीने कारवाई करीत असल्याचे स्पष्ट जाणवत असून या प्रकरणांत संस्थेला गोवण्याचे नियोजित कारस्थान सुरू असल्याचा ठपकाही संस्थेने ठेवला आहे.
निषाद बखलेंचा "सनात'नशी संबंध नाही
मडगाव स्फोटात स्फोटके ठेवण्यात आलेल्या स्कूटरचे मालक निषाद बखले हे संस्थेचे साधक नाहीत. त्यांचा या संस्थेशी काहीही संबंध नाही. या स्फोटातील अन्य जखमी योगेश नाईक हे केवळ संस्थेच्या आश्रमात दूध पुरवण्यासाठी येतात तेवढाच काय तो त्याचा संस्थेशी संबंध आहे. निषाद बखले हा संस्थेचा साधक आहे. तसेच योगेश नाईक याचाही मृत्यू झाल्याचे प्रसारमाध्यमांव्दारे सांगितले जात असून हा खोटारडेपणाच सुरू असल्याचे संस्थेने पत्रकात म्हटले आहे.
हा तर वडाची साल पिंपळाला लावण्याचाच प्रकार
मडगाव स्फोटाच्या प्रकरणांत पोलिस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नव्हते. त्यात संस्थेच्या चार साधकांची केवळ चौकशी सुरू होती; तरीही प्रसारमाध्यमांव्दारे या घटनेचा मालेगाव प्रकरणाशी संबंध लावला गेला. साधकांना अटक झाल्याचीही वार्ता पसरवण्यात आली. गृहमंत्री रवी नाईक यांनी या घटनेत सनातन संस्थेचा हात असल्याचे अत्यंत घिसाडघाईने केलेले विधान म्हणजे बेजबाबदारीचा कळस आहे, असा आरोपही संस्थेने केला आहे.सनातन संस्थेला नेहमीच पाण्यात पाहणाऱ्यांकडून या घटनेचा संदर्भ देऊन संस्थेविरोधात जो कंठशोष सुरू आहे, त्याला बळी पडून सरकार जर तपासात हयगय करीत असेल तर तो संस्थेवर अन्याय ठरणार असून सरकारने निपक्षःपातीपणे हे प्रकरण हाताळावे.
धाकदपटशाहीविरोधात तक्रार करणार
रामनाथी येथील संस्थेच्या आश्रमात चौकशी करताना १८ ऑक्टोबर रोजी कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलिसांनी आश्रमातील काही वस्तू ताब्यात घेतल्या.या वस्तूंची नोंदणीही करण्यात आलेली नाही. संस्थेकडून तपासाला पूर्ण सहकार्याचे आश्वासन देऊनही पोलिसांकडून ही धाकदपटशाही सुरू आहे, त्यामुळे नाराजी पसरली आहे.याबाबत योग्य तो कायदेशीर मार्ग स्वीकारून दाद मागितली जाईल,असेही संस्थेने कळवले आहे.
साधकांना कामगार कायदा लावू नका
मडगाव येथील सनातनच्या मुद्रणालयाची पोलिसांनी चौकशी केली व यावेळी येथील कामगार कायद्याप्रमाणे कामगारांची नोंदवही नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.सनातनच्या आश्रमांतील साधक हे पगारी कामगार नाहीत. हे सर्व साधक सेवाभावी वृत्तीने संस्थेत कार्यरत आहेत व त्यामुळेच त्यांना कामगार कायदा लावून कारवाईचा बडगा उगारणे योग्य ठरणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

मालगोंडा, योगेश मुख्य आरोपी


पोलिसांचा दावा

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)- मडगाव स्फोट प्रकरणाचे मुख्य संशयित आरोपी मयत मालगोंडा पाटील व इस्पितळात मृत्यूशी झुंज देणारा योगेश नाईक हेच असल्याची माहिती आज पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली. त्यांना गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणायचा होता, हे आत्तापर्यंतच्या तपासात उघड झाले असून गेल्यावर्षी ठाणे, वाशी (नवी मुंबई) व पनवेल येथे झालेल्या स्फोटाचे मडगाव शहरात झालेला बॉंबस्फोटाशी बरेच साम्य असल्याचा दावा त्यांनी केला. सनातन संस्थेचे विश्वस्त विरेंद्र मराठे व सनातन प्रभात या मुखपत्राचे संपादक पृथ्वीराज हजारे यांची चौकशी करण्यात आली आहे. या कटात किती जणांचा समावेश आहे याचा तपास सुरू असून अन्य काही संघटनांवरही लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, हा स्फोट होऊन चार दिवस उलटले तरी, एकाही व्यक्तीला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे गेल्या चार दिवसांत पाच से सहावेळा रामनाथी येथील संशयाच्या घेऱ्यात आलेल्या सनातन संस्थेच्या आश्रमात पोलिसांच्या हाती नक्की काय आणि किती महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मडगाव येथे झालेला स्फोट आणि सांखवाळ येथे सापडलेला बॉंब याविषयीचा तपास पोलिस अधीक्षक ओमप्रकाश कुडतडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास स्थापन करण्यास आलेले विशेष पथक करीत असून त्यांना मुंबई पोलिसांचे "एटीएस' पथक सहकार्य करीत आहे.
मडगाव येथील स्फोटात वापरण्यात आलेले जिलेटिन हे नागपूर येथील सूरज एक्स्प्लोझीव लिमिटेड या कंपनीत तयार करण्यात आले असून सदर जिलेटिनची कांडी कोण घेऊन गेला होता, याची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक नागपूर येथे दाखल झाले आहे. त्याचप्रमाणे मयत मालगोंडा याच्या गावी सांगली येथे एक पोलिस पथक पाठवण्यात आले असून मालगोंडा हा या संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता होता, अशी माहिती उपलब्ध झाली असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. स्फोटाच्या आठ दिवस पूर्वी तो सांगली येथे होता तर, मीरज - सांगली दंगलीच्यावेळीही मालगोंडा पाटील सुमारे २० दिवस त्याठिकाणी तळ ठोकून होता, अशी माहिती हाती आल्याचे ते म्हणाले.
हा स्फोट घडवून आणण्यात किती जणांचा सहभाग होता, हे पुढे होणाऱ्या चौकशीअंती उघड होणार असल्याचे सांगत या प्रश्नावर कोणाचे नावे घेणे श्री. यादव यांनी टाळले. सांकवाळ येथे ट्रकात कोणी स्फोटके आणून ठेवली, याचा तपास सुरू आहे. सदर ट्रक फोंडा येथून काही तरुणांना घेऊन वास्को येथे नरकासूर पाहण्यासाठी गेला होता. त्यात चाळीस तरुण फोंड्याहून गेले होते. त्या सर्वांची चौकशी करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गृहमंत्री रवी नाईक यांनी मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या पत्नीचा या आश्रमात सक्रिय वावर असल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री. यादव यांना विचारले असता, पोलिस चौकशी कायद्याला धरून आणि समोर येणाऱ्या पुराव्यावरून केली जाणार आहे. त्यावेळी कोण किती शक्तिशाली आणि कमजोर आहे हे पाहिले जाणार नाही. कोणीही व्यक्ती या जिलेटिन स्फोटात दोषी असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले.



डॉ. आठवले यांची चौकशी होणार
सनातन संस्थेचे संस्थापक प. पू. डॉ. जयंत आठवले हे आजारी असल्याचे आश्रमातून सांगण्यात येत असल्याने अद्याप त्यांच्याशी भेट झालेली नाही. त्यामुळे संस्थेचे प्रमुख या नात्याने त्यांचीही या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. तसेच, दि. २४ ऑक्टोबर रोजी ते विदेशात होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार असल्याने गरज भासल्यास त्यांना स्थानबद्ध केले जाणार असेही श्री. यादव यांनी सांगितले.

स्फोटापूर्वीच मालगोंडाची "सीआयडी'कडून चौकशी?
स्फोट होण्याच्या पाच दिवसांपूर्वी म्हणजे दि. ११ ऑक्टोबर रोजी फोंडा पोलिस स्थानकातील गुप्तचर विभागाचे उपनिरीक्षक प्रकाश गिरी यांनी आश्रमात दूरध्वनी करून मालगोंडा पाटील याची चौकशी केली होती. केवळ आश्रमात विदेशी व्यक्ती आहे का, हे विचारण्यासाठी तो दूरध्वनी केला होता. मालगोंडा असे काही करणार याची कोणताही माहिती पोलिसांकडे नव्हती, असे स्पष्टीकरण आज उपमहानिरीक्षक यादव यांनी दिले.
आश्रमावर बंदी घालणार का, असे विचारले असता तो विषय आमचा नसून सरकार त्यावर निर्णय घेणार आहे. आम्ही काय तो अहवाल सरकारला सादर केला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फ्रेंच कुटुंब
आश्रमात फ्रान्स येथील एक कुटुंब साधक म्हणून राहत असल्याचे उघडकीस आले असून त्यांची माहिती देणारे "सी फॉर्म' भरून दिले नसल्याने आश्रमाच्या जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी श्री. यादव यांनी सांगितले. कोणत्याही संस्थेत किंवा आश्रमात विदेशी व्यक्ती राहत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. या आश्रमात एक पुरुष, महिला व त्यांचे मूल राहत आहे. गेल्या ३० जून ०९ रोजी हे कुटुंब मुंबईमार्गे गोव्यात दाखल झाले होते.

साधकांना संरक्षण देण्याची मागणी
फोंडा, दि. १९ (प्रतिनिधी)ः बॉंबस्फोटानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रम प्रमुखांनी फोंडा पोलिसांकडे आज (दि.१९) एक निवेदन सादर करून आश्रमातील साधकांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
मडगाव येथील बॉंबस्फोट प्रकरणी सरकारी पोलिस यंत्रणेकडून सनातन संस्थेवर संशय घेतला जात आहे. तसेच सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाची पोलिसांनी छापे घालून तपासणी करून काही ऐवज ताब्यात घेतला आहे. बॉंबस्फोटासारख्या प्रकरणात सनातन संस्थेवर संशय घेण्यात येत असल्याने काही लोकांनी रविवारी रात्री आश्रमाच्या बाहेर एकत्र होऊन सनातन संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून संस्थेवर बंदी आणावी, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली
मडगाव येथील स्फोटानंतर सनातनवर संशय घेण्यात येत असल्याने काही जणांकडून धमक्या येत असल्याने साधकांच्या संरक्षणासाठी पोलिस संरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
योगेश नाईक जिवंत
स्फोटात जखमी झालेला योगेश नाईक अद्याप जिवंत असून प्रसारमाध्यमांनी तो मृत झाल्याचे दिलेले वृत्त निराधार आहे. योगेश हा आश्रमात दूध घालण्याचे तसेच सनातन प्रभात हे मुखपत्र वितरित करण्याचेही काम करीत होता. त्याचप्रमाणे आश्रमात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय भाग घेत होता. ज्या स्कूटरमध्ये स्फोट झाला ती इटर्नो स्कूटर योगेशचा भाऊ सुरेश नाईक याच्या नावावर आहे. त्यामुळे सुरुवातीला स्कूटरचा मालक म्हणून ज्याचे नाव जाहीर झाले ते चुकीचे असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी, वाहतूक खात्यातील कागदपत्रांनुसार ती स्कूटर २२ हजार रुपयांत सुरेश याला विकण्यात आल्याचे उघडकीस आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

खूनसत्रप्रकरणी दोन महिलांना अटक


खुनात प्रत्यक्ष सहभाग

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)- मेरशी, वेर्णा, सुकूर व खोर्जुवे खूनप्रकरणात आज पोलिसांनी मुख्य आरोपी चंद्रकांत तलवार याची पत्नी ग्रेश्मा तलवार हिला मुंबई येथून अटक केली तर, सायरन याच्या अल्पवयीन प्रेयसीलाही पणजी येथून ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही महिलांचा या खूनसत्रात सहभाग असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चारही महिलांच्या अपहरणानंतर त्यांचे वाहनातच खून करण्यात आले. त्यावेळी या दोन्ही संशयित महिला प्रत्यक्ष वाहनात हजर होत्या हे सिद्ध झाले असल्याने त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली. या दोन्ही महिलांनी आपल्या गुन्ह्याचा कबुली जबाब दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चारही जणींचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने गोव्यातील एका सराफाला विकण्यात आले होते. ते सोने चंद्रकांत याची पत्नी ग्रेश्मा हिने विकले होते, त्यानंतर त्यांनी मुंबईत पळ काढला होता. पोलिसांनी ग्रेश्मा हिच्याकडून काही रोख रक्कम जप्त केली आहे, असे श्री. यादव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महिलांचे अपहरण करून त्यांचा मृतदेह अज्ञात स्थळी हालवण्यासाठी वापरण्यात आलेली "झेन' व "आल्टो' ही दोन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या खुनातील चार पैकी तीन महिलांची ओळख पटली असून खोर्जुवे येथे सापडलेल्या महिलेचे नाव मालती यादव असे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु, अद्याप तिच्या कुटुंबाबद्दल कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती आलेली नाही. या टोळीने सदर महिलेचे अपहरण वेर्णा बसस्थानकावरून केले होते. त्यावेळी त्या वाहनात सायरन याची अल्पवयीन प्रेयसी वाहनात उपस्थित होती. वाहनात मुली असल्याचे पाहून लिफ्ट मागणाऱ्या महिला सहजपणे जाळ्यात ओढल्या जात होत्या, आणि नेमका त्याचाच फायदा ही टोळी उठवत होती.
सायरन हा वाहन चालवत होता तर त्याची प्रेयसी पुढच्या सीटवर बसून महिलांना पत्ता विचारण्याचे काम करीत होती. ती महिला पत्ता दाखवण्याच्या निमित्ताने किंवा लिफ्ट मागून आपल्या नियोजित स्थळी जाण्यासाठी त्या वाहनाच्या मागच्या सीटवर बसल्यावर तिचा गळा आवळून खून करण्याचे काम चंद्रकांत करीत होता. महिलेचा प्राण जाईपर्यंत तिघेही त्याच वाहनात बसून राहत असत, रात्र झाल्यानंतर काळोखाचा फायदा घेऊन मृतदेह अज्ञातस्थळी नेऊन जाळण्यात येत असे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
एविटाच्या खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात
एविटा या टोळीला बऱ्यापैकी ओळखत होती. मग एविटाचा खून का आणि कशासाठी करण्यात आला हे स्पष्ट होते नाही. अन्य तिघा महिलांचे खून केवळ पैशांसाठी करण्यात आल्याचे कारण पोलिसांनी पुढे केले असले तरी एविटाच्या अंगावर कोणतेही दागिने नव्हते. तिच्या अंगावर असलेली सोनसाखळी यापूर्वीच सायरन याच्या मित्राने सहा महिन्यांपूर्वी चोरली होती. मग एविटाचा खून का आणि कशासाठी करण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर अद्याप तिच्या कुटुंबीयांना मिळालेले नाही.

ग्रेश्माचा मुली पुरवण्याचा धंदा?
मुंबईहून गोव्यात मुली पुरवण्याचे काम ग्रेश्मा करत होती तर, तिचा नवरा चंद्रकांत त्या मुलींना येथे आणून त्यांच्याकडून "धंदा' करून घेता होता. या मुली गोव्यात आणण्यासाठी दलालांना आगाऊ पैसे द्यावे लागतात, ते देण्यासाठी या टोळीकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी महिलांचे मुडदे पाडून त्यांचे दागिने विकून पैसे जमवण्याची योजना आखली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे या सर्व प्रकरणामागे "सेक्स रॅकेट' असल्याचे स्पष्ट होत आहे.

पोलिस पथकाची कामगिरी
संशयितांनी गोव्यात खून करून मुंबईत पळ काढल्याची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी गुन्हा अन्वेषण विभागातील उपनिरीक्षक निनाद देऊलकर, फोंडा पोलिस स्थानकात असलेले उपनिरीक्षक दीपक पेडणेकर व पोलिस शिपाई ब्रिजेश नाईक यांना त्वरित आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिगीस यांना अटक करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या पथकावर सोपवण्यात आली. यापूर्वी दीपक पेडणेकर यांनी मुंबईतून कुविख्यात गुंड मानशियो याच्या मुसक्या आवळून त्याला गोव्यात आणले होते. या पोलिस अधिकाऱ्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून कौतुक केले जात आहे.

साकोर्डे भागाला वादळाचा दणका

झाडांची पडझड, वाहतूक ठप्प, सुदैवाने जीवितहानी नाही

फोंडा, दि. १९ (प्रतिनिधी)- बोळकर्णे साकोर्डा भागात आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळाचा जोरदार तडाखा बसला. सोसाट्याचा वारा, जोडीला गडगडाटा, उन्मळणाऱ्या झाडांचे आवाज यामुळे वातावरणात भीती दाटून आली होती. ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. वा
कोणत्याही घरावर झाड पडल्याची अद्याप नोंद झालेली नाही, अशी माहिती सरपंच योगिता नाईक यांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान एक दोन वाहनांवर झाडे पडल्याची माहिती मिळाली आहे.
वादळ आणि पाऊस यांनी असा काही रूद्रावतार धारण केला की झाडे अनेक ठिकाणी उन्मळून पडत होती. घरे पायापासून उखडून जाणार की काय अशी शोचनिय स्थिती काही क्षण निर्माण झाली होती, परंतु हे संकट झाडे मोडण्यावर आणि बागायतींची नासधूस होण्यावरच निभावले. पानस - साकोर्डा ते सातपात यादरम्यान अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्याने नंतर वाहतुकीच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. सातपाल ते बोळकर्णे या दरम्यानही बरीच झाडे मोडून पडल्याने नुकसानी झाली. मधलावाडा, ते सुर्ल या दरम्यान काही ठिकाणी झाडांची वाताहत झाली. बोळकर्णे येथे एक मोठे झाड एका घराच्या शेजारीच पडले परंतु सुदैवाने जिवित किंवा मालमत्तेचे त्यात नुकसान झाले नाही. मागे बोळकर्णे येथे अशाच चक्रीवादळाच्या पट्ट्यात सुमारे दहा ते बारा वीजखांब कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. वादळात काही ठिकाणी बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, साकोर्ड्याच्या सरपंच योगिता नाईक यांनी वादळासंदर्भात माहिती देताना थोडाच वेळ चाललेले परंतु अत्यंत तीव्र स्वरूपाचे हे वादळ होते असे सांगितले. या वादळात झाडांची मोठ्याप्रमाणात हानी झाली असून अनेक ठिकाणी झाडे मोडून किंवा उन्मळून पडल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानीचा नेमका तपशीला उद्यापर्यंत स्पष्ट होईल असेही त्या म्हणाल्या. सुदैवाने या वादळात कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Monday 19 October, 2009

स्फोटाची निःपक्षपाती चौकशी हवी - पर्रीकर

"कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा'

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगाव शहरात घडवून आणलेला स्फोट हे "भ्याडपणाचे कृत्य' आहे, अशी टीका करीत, गृहमंत्र्यांनी या घटनेचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न न करता पोलिसांना निःपक्षपाती चौकशी करण्याची संधी द्यावी आणि पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपण सत्ताधारी अथवा विरोधकांबद्दल बोलत नसून सत्ताधारी पक्षातीलच नेते आपल्याच मंत्रिमंडळाच्या सहकार्याविरोधात या घटनेचा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका श्री. पर्रीकर यांनी ठेवला. ते पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर उपस्थित होते.
पोलिसांकडून कोणतीच ठोस माहिती न घेता गृहमंत्री माध्यमांसमोर मुक्ताफळे उधळत आहेत. नेमकी माहिती न घेता कोणाचेही नाव जाहीर करून त्याला राजकीय रंग देण्याचा खटाटोप करीत आहेत, तर काही वृत्तवाहिन्या न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून संशयितांना दोषी ठरवून त्यांची नावेही मुक्तपणे प्रसिद्ध करीत असल्याची टीका श्री. पर्रीकर यांनी केली.
ज्यांनी कोणी हा स्फोट घडवून आणला त्यांच्यापर्यंत तपासाची सूत्रे जाण्याची गरज आहे. यात जखमी झालेला योगेश नाईक याचा भाऊ सुरेश नाईक व मृत पावलेल्या मुलगोंडा पाटील याच्याबरोबर राहणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्याव्यतिरिक्त पोलिसांना तिसरा संशयित मिळालेला नाही. तसेच अद्याप कोणाला अटकही झालेली नाही, अशी माहिती श्री. पर्रीकर यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था कोलमडली..
गेल्या आठ दिवसांत कायदा व सुव्यवस्था पूर्ण कोलमडली असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना त्याची शरम वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्यात ७२ तासांत १० मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले. पर्यटन व्यवसायाला याचा जबर फटका बसला आहे. अनेक हॉटेलांतील खोल्या रिकाम्या आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
स्फोटानंतरही स्पर्धा सुरूच
मडगावात स्फोट झाल्यानंतरही शहरात सुरू असलेल्या नरकासुर स्पर्धा पोलिस थांबवू शकले नाहीत. स्फोट झाल्यानंतर सर्वांत आधी गर्दी पांगण्याची जबाबदारी पोलिसांची असते. अनेकदा जेथे स्फोट होतो, तेथे नव्याने लगेचच स्फोटांची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अतिमहनीय व्यक्तीने त्वरित घटनास्थळी जाऊ नये असा नियम आहे. तरीही मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. पोलिस सुरक्षा विभागाला याबाबत काय करायचे ते काहीच माहीत नव्हते, असा आरोप श्री. पर्रीकर यांनी केला.
राजकीय दबावामुळे तपास होत नाही...
गेल्या वर्षभरात मडगाव शहरात घडलेल्या काही घटना पाहता राजकीय दबावापोटी त्या दाबून टाकण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात होणाऱ्या मूर्तिफोड प्रकरणाचे काय झाले? यात पोलिसांनी कवेश गोसावी याला अटक केली होती. त्याच्या नार्को चाचणीचे काय झाले? मडगाव येथील मोती डोंगरावर तलवारींचा मोठा साठा पोलिसांना सापडला होता. राजकीय दबावामुळे १८ महिन्यानंतरही आरोपींवर आरोपपत्र दाखल होत नाही. दोषींवर आरोपपत्र दाखल होत नाही कारण त्या फाईलीवर गृहमंत्र्यांनी "वजन' ठेवले आहे. यात जे वाहन वापरण्यात आले होते, त्याला बनावट नंबरप्लेट बसवली होती. शेवटपर्यंत त्या वाहनाचा मालक पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बनावट मतदार ओळखपत्र बनवून या वाहनाची नोंदणी करण्यात आली होती. तसेच यात "सिमी' या दहशतवादी संघटनेही हात असल्याने पोलिस या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ शकले नाहीत, असे आरोप श्री. पर्रीकर यांनी केला.

पोलिस अधिकाऱ्याचा वरदहस्त त्यामुळेच तलवारकडून आणखी खुनाचे धाडस!

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - चार खून प्रकरणातील आरोपी चंद्रकांत तलवार याला एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा वरदहस्त होता. हाच चंद्रकांत पोलिसांनी माशेल दरोडा प्रकरणात हवा होता. परंतु, त्या पोलिस अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे तो मुक्त राहिला. त्यामुळेच चार खून करण्याचे धाडस केले असल्याची टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केली. काही महिन्यांपूर्वी माशेल येथे टाकलेल्या दरोडा प्रकरणात तलवार पोलिसांना हवा होता. त्यावेळी केवळ चंद्रकांत तलवार हा एकाच संशयित पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
दरोडा प्रकरणात "मानशीयो' याला मुंबईत अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्याकडे एक वादग्रस्त डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यात कोणत्या उपअधिक्षकाला आणि निरीक्षकाला किती पैसे देण्यात आले, याची नोंद ठेवण्यात आली होती. ही डायरी विधानसभेतही बरीच गाजली होती.
चिंबल गुन्हेगारांचे आश्रयस्थान...
चिंबल हा परिसर अनेक गुन्हेगारांचे आश्रय स्थान बनले असल्याची टाका यावेळी श्री. पर्रीकर यांनी केली. पोलिस याठिकाणी कॉंबिंग ऑपरेशन किंवा छापा टाकण्यासाठी गेल्यास लगेच त्यांना मागे फिरण्याचे आदेश दिले जातात. त्यामुळे या गुन्हेगारांचे फावले. या खून प्रकरणात आता चंद्रकांत गुन्हा अन्वेषण विभागाच्या हाती लागल्याने काही पोलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचेही ते म्हणाले.

सुकूरची "ती 'तरुणी गावकरवाडा डिचोलीची

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - सुकूर येथे डोक्यावर दगड घालून खून करण्यात आलेल्या त्या तरुणीची ओळख पटली असून ती डिचोली येथे राहणारी शर्मिला मांद्रेकर (२५) असे असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाच्या निरीक्षक सुनीता सावंत यांनी दिली. तर, खोर्जुवे येथे अर्धवट जळलेल्या अवस्थेत मिळालेल्या त्या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसून तिचे वेर्णा औद्योगिक वसाहतीकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती या खूनसत्रातील संशयित आरोपी चंद्रकांत तलवार आणि सायरन रोड्रिगीस यांनी तपास अधिकाऱ्याला दिली आहे.
दि. १० रोजी शर्मिला हिचे गावकरवाडा धबधबा येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या अंगावर असलेली सोनसाखळी, पर्स व मोबाईल काढून सुकूर येथे तिचा खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दि. १० ऑक्टोबरपासून शर्मिला बेपत्ता झाल्याने सर्वत्र तिची शोधाशोध सुरू केली, तर १२ ऑक्टोबर रोजी तिचा भाऊ बुधाजी मांद्रेकर यांनी डिचोली पोलिस स्थानकात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. ती एका लहानशा लाडू, चकली बनवण्याच्या फॅक्टरीत कामाला जात होती.
चंद्रकांत आणि सायरन हे दोघे पर्यटक असल्याचे भासवून रस्त्यावर जाणाऱ्या तरुणीकडे तेथून जवळ असलेल्या कोणत्याही ठिकाणाचा पत्ता विचारत असत. त्यानंतर तो रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना गाडीत बसवून गाडीतच त्यांचा खून केला जात असे, अशी माहिती उघडकीस आली आहे. हे सर्व खून केवळ पैशांसाठी केले गेलेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून यामागे अजून काही कारण आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत.
खोर्जुवे येथे अपहरण केलेली महिला ही हिंदीत बोलत होती तर तिचा नवरा कळंगुट येथे नोकरीला असल्याने ती कळंगुटला जाण्यासाठी वेर्णा बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी हे दोघे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याठिकाणी पोचले आणि पणजीच्या दिशेने जात असल्याचे सांगून तिलाही बरोबर घेतले. यावेळी वाटेतच तिचा खून करून खोर्जुवे येथे तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कळंगुट येथे नोकरीला असलेल्या त्या महिलेच्या नवऱ्याचा शोध घेण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
याविषयीचा अधिक तपास निरीक्षक सुनीता सावंत करीत आहे.

मडगाव स्फोट तपासासाठी खास पथकाची स्थापना

.. विविध दृष्टिकोनांतून चौकशी
..ठोस पुरावे हाती लागल्याचा दावा
..सनातन छापखान्याची झडती


मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात झालेल्या बॉंबस्फोट व सांकवाळ येथे स्फोट घडविण्याच्या दृष्टीने झालेल्या प्रयत्नाप्रकरणी पोलिसांना तपासासाठी पोलिस उपअधीक्षक ओमप्रकाश कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली एक खास पथक नियुक्त करण्यात आले आहे, तशी माहिती पोलिस महानिरीक्षक आर.एस.यादव यांनी आज येथे दिली.
शुक्रवारची मडगावातील घटना ही संपूर्ण पोलिस खात्यासाठी आव्हान स्वरूप ठरल्याने सरकारने ती विशेष गांभीर्याने घेतली आहे व स्वतः पोलिस महानिरीक्षक गेले दोन दिवस मडगावात तळ ठोकून बसलेले असल्याने पोलिस अधिकाऱ्यांची धावपळ चालू आहे.
यादव यांनी आजही येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात बसून तपासाबाबत मार्गदर्शन केले, पण तपासात झालेल्या प्रगतीबद्दल काहीही सांगण्याचे त्यांनी टाळले. पोलिस उपअधीक्षक ओमप्रकाश मडकईकर यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आयइडी स्फोटकाचा वापर
मात्र एका वृत्तानुसार या स्फोटासाठी वापरलेले स्फोटक हे आयइडी स्वरूपाचे होते व अपघातानेच त्याचा स्फोट झाला व त्यामुळेच सनातन कार्यकर्ते त्याचे बळी ठरले.
सदर स्कूटरजवळच एका पिशवीत सापडलेली आणखी दोन स्फोटके आपण निकामी केल्याचा दावाही काल पोलिसांनी केला आहे. मयत पाटील व जखमी योगेश नाईक हे उभयता सदर स्कूटरवर बसले होते व ते ती स्कूटर पार्क करीत असतानाच स्फोटाचा धमाका उडाला,अशी माहिती आता पोलिसांना मिळाली आहे.
सदर स्कूटर योगेशचा भाऊ सुरेश नाईक याची आहे व योगेश ती घेऊन आला होता. योगेश हा वाडी-तळावली(फोंडा) येथील असून त्याचा भाऊ सुरेश हा सरकारी कर्मचारी आहे. पोलिसांनी त्यालाही पाचारण करून चौकशी केली . पण त्याच्याकडून विशेष काहीच माहिती मिळू शकलेली नाही.
सनातन छापखान्याची झडती
पोलिसांनी परवाच्या स्फोटासंदर्भात दैनिक सनातन प्रभातच्या नेसाय येथील छापखान्यावर छापा टाकून झडती शोध घेतला पण तेथे विशेष काहीच सापडले नाही असे सांगण्यात आले. उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने साधारण अर्धा तास या छापखान्याचा कोपरान्कोपरा धुंडाळला पण परवाच्या स्फोटासंदर्भात वा राज्याच्या अन्य कोणत्याही भागात घातपाती कृत्ये करण्याबाबतचा कोणताही पुरावा वा माहिती तेथे मिळाली नाही असे सांगण्यात आले.
दुसरीकडे रामनाथी येथील सनातन मठाचे प्रमुख वीरेंद्र मराठे यांना आजही पोलिसांनी पाचारण करून परवाच्या प्रकाराबाबत तसेच सांकवाळ येथे सापडलेल्या स्फोटकांबाबत विचारणा केली पण त्याच्याकडून विशेष अशी कोणतीच माहिती मिळू शकली नाही,असे सांगण्यात आले.
परवाच्या स्फोटप्रकरणी अजून कोणालाही अटक केलेली नाही पण परवाच्या स्फोटात जखमी झालेला योगेश नाईक हा या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असल्याने गोमेकॉतील त्याच्या वॉर्डाबाहेर पोलिस संरक्षण तैनात केलेले आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी दिली. ते म्हणाले की आता हे प्रकरण खास पोलिस पथकाकडे जाईल व नंतर आपला त्याच्याशी संबंध राहणार नाही. त्याबाबतचा आदेश आज रात्रीपर्यंत येईल. पण या प्रकरणात भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान सनातन प्रभातचे संपादक पृथ्वीराज हजारे व अन्य मंडळींना आज सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी पाचारण करून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ती मंडळी येथे होती. मात्र या चौकशीतून काही निष्पन्न झाले की काय कळू शकले नाही.