Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 15 February, 2008

फेररचनेनुसारच लोकसभा
व विधानसभा निवडणुका

नवी दिल्ली, दि. १४ - झारखंड आणि पूर्वेकडील चार राज्ये वगळता देशभर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या नव्या परिसीमननुसार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याबाबत लवकर अधिसूचना जारी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ंपंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
देशभरात निवडणुकीसाठी परिसीमन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून याबाबत राष्ट्रपतींनी त्वरीत अधिसूचना जारी करण्यासाठी हा निर्णय त्यांना कळविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रियरंजन दासमुंशी यांनी दिली. परिसीमननुसार आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
परिसीमन आयोगाचे नवे परिसीमन आदेश लागू करण्याबाबत तारीख निश्चित करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिली. १९७६ च्या परिसीमन आदेशाच्या जागी नवा आदेश लागू करण्याबरोबर १९५० च्या लोकप्रतिनिधी कायद्यात संशोधन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. नव्या अध्यादेशाद्वारे झारखंड राज्य हे नव्या परिसीमन आदेशाच्या परिघातून वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंडमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागा पहिल्यापेक्षा कमी होत आहेत. य़ाशिवाय आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालॅंडही सध्या तरी परिसीमनच्या कक्षेत येणार नाही, असेही दासमुंशी यांनी स्पष्ट केले.
या व्यतिरिक्त भारताशी जोडणाऱ्या आशियाई देशातील रस्ते बांधण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भूतान, बांग्लादेश, नेपाळ या देशांशी भारताचे दळणवळण मजबूत करण्यासाठी आशियाई महामार्गावरील महामार्ग क्र २ आणि महामार्ग क्र ४८ यांच्या मार्गामध्ये संशोधन करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यामुळे आशियाई देशांबरोबर व्यापार आणि पर्यंटन वाढवणे शक्य होणार असल्याचे दासमुंशी यांनी सांगितले.
मुरगाव बंदरातील काम पूर्ववत
जनतेच्या पाठिंब्याने आंदोलन यशस्वी ः परेरा

वास्को, दि. १४ (प्रतिनिधी)- मुरगांव बचाव अभियानाला एमपीटीविरुद्ध लढा देण्यासाठी वास्कोवासियांनी समर्थन दिल्याने तीन दिवसांच्या आत मुरगाव पोर्ट ट्रस्टला त्याच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या. मुरगाव बचाव अभियान यापुढेही जनतेच्या हितासाठी लढणार असल्याची माहिती अभियानाचे वक्ते श्री. सायमन परेरा यांनी दिली. अभियानाने बंद मागे घेतल्याने आजपासून मुरगाव बंदरातील सर्व कामे पूर्ववत सुरू झाली आहेत.
आज दुपारी मुरगाव बचाव अभियानातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी अभियानाचे प्रवक्ते सायमन परेरा यांच्यासमवेत उपसभापती मावीन गुदिन्हो, मुरगावचे आमदार मिलींद नाईक, अखिल गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव, वाडे कृती समितीचे वक्ते विष्णू बांदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मुरगाव बचाव अभियानाने तीन दिवस सतत मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या विरुद्ध आंदोलन चालविल्यानंतर काल रात्री मुरगाव बचाव अभियान व एमपीटीच्या बरोबर समझोता झाल्यानंतर अभियानाने आंदोलन मागे घेतले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी श्री. परेरा यांनी पुढे सांगितले की, मुरगांव पोर्ट ट्रस्टकडून चाललेल्या सतावणुकीला उत्तर देण्यासाठी १४ वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन "मुरगाव बचाव अभियाना'ची स्थापना केली व तीन दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध आंदोलनाला सुरुवात केली. आमच्या आंदोलनाला वास्कोवासियांनी पाठिंबा दर्शवून एक दिवस १०० टक्के बंद पाळला तसेच दोन वेळा एमपीटीच्या विरुद्ध काढलेल्या मोर्चात येथील जनतेने भरपूर उपस्थिती लावल्याने आमच्या अभियानाला आणखीन बळ आले. तीन दिवसांच्या आंदोलनानंतर काल एमपीटीला आमच्या मागण्या अखेर पूर्ण कराव्या लागल्या. उशिरा रात्री दोघांमध्ये झालेल्या समझोता करारानंतर मुरगाव बचाव अभियानाने आंदोलन बंद करून पुन्हा एम. पी. टी ला त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वाट मोकळी करून दिल्याचे परेरा यांनी सांगितले. आमच्या आंदोलनात वास्कोवासियांबरोबरच उपसभापती मावीन गुदिन्हो, महसूल मंत्री जुझे फिलीप डिझोजा व आमदार मिलिंद नाईक यांनी भरपूर मदत केल्याने परेरा यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी उपसभापती श्री. मावीन गुदिन्हो यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की मुरगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच १४ संघटनांनी एकत्र येऊन एमपीटीच्याविरुद्ध न्याय मिळवण्याने हे यश त्यांना प्राप्त झाले. वास्कोतील कोळशाची समस्या दूर करण्याचा एक मुद्दा अभियानाने हातात घेतला होता. आता वास्कोतील कोळसा प्रदूषण दूर होणार असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. एमपीटीच्या धक्का क्रमांक १० व ११ वर होणारा कोळशाचा साठा हा ४ व ५वर हलविण्यात येणार असून तो फक्त रेल्वेच्या माध्यमाने नेण्यात येणार असल्याने समझोता करारात नमूद करण्यात आले. श्री. गुदिन्हो यांनी सांगितले की, मुरगाव बचाव अभियानाने सत्यासाठी आवाज उठवून तीन दिवस एमपीटीच्याविरुद्ध कडक मोहीम चालविल्यानेच यश प्राप्त झाले असून सत्याच्या बाजूने आपले कार्य असेच चालू ठेवतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पत्रकारांना माहिती देताना आमदार मिलिंद नाईक यांनी सांगितले की, स्वतःचे नुकसान करून जनतेने सत्यासाठी आवाज उठविला. मुरगाव बचाव अभियानाला शेवटी यश आले. या आंदोलनात आपण सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी भाग घेतला व पक्षभेद न करता मुरगावच्या हितासाठी केलेल्या सहभागाची आम्हाला चांगली फळे मिळाल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सडा हार्बर येथे असलेल्या १९२२ सालापासूनच्या क्रॉस (खुरिस) ला एमपीटी हात लावणार नाही तसेच महामार्गासाठी सडा येथील जाणाऱ्या घरांना पूर्णपणे वाचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे करारात नमूद केल्याने सडावासियांनी आनंद व्यक्त करण्यात येत असल्याचे मिलिंद नाईक यांनी शेवटी सांगितले.
यावेळी अभियानाचे सदस्य विष्णू बांदेकर, रोनी डिसोझा यांनी पत्रकारांना माहिती देऊन त्यांना मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त केले.
पेट्रोल दोन रुपयाने तर
डिझेल एक रुपयाने महाग

नवी दिल्ली, दि. १४ - गेले अनेक दिवस ज्याची चर्चा केली जात होती, ती इंधन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येत असून, त्यानुसार पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपये तर डिझेल एक रुपयाने महागले आहे.
या दरवाढीमुळे चालू आर्थिक वर्षात पेट्रोल कंपन्यांना ८४० कोटी रुपये जादा मिळू शकतील. इंधनाचे दर न वाढविण्यासाठी सरकारने आटोकाट प्रयत्न केले पण सार्वजनिक क्षेत्रातील तेल तेल कंपन्यांना होणारी ७२,००० कोटी रुपयांची हानी रोखणे आवश्यक होते, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी येथे दिली. पेट्रोलवरील दरात दोन रुपये वाढ करण्यात आल्याने कंपन्यांना महिन्याला १८० कोटी रुपये मिळतील तर डिझेलवरील एक रुपया वाढीने ३६० कोटी रुपये कंपन्यांना मिळणार आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कंपन्यांना होणारी एकंदरित हानी ७१,८०८ कोटी रुपये आहे.
विरोध डावलून वेगनियंत्रकासाठी
सरकारचा "एस्मा'आदेश जारी
वाहनचालकांच्या संपास मनाई

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)- राज्याच्या सर्व भागांतून वाहनचालकांचा होणारा तीव्र विरोध डावलून वेगनियंत्रक यंत्रणा बसवण्याच्या निर्णयावरून कोणत्याही पद्धतीत माघार घ्यायची नाही,असा निर्णय सरकारने घेतला आहे. गृह खात्याने गोवा अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (एस्मा) लागू करण्याचा आदेश आज जारी करून वाहतूकदारांनी जाहीर केलेल्या संपाला असे उत्तर देण्याचे ठरवले आहे.
गृह खात्याचे अवर सचिव सिद्धिविनायक नाईक यांनी यासंबंधी जारी केलेल्या गोवा अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा-१९८८ च्या कलम-३, उपकलम१ पोटकलम १ यानुसार राज्यातील सर्व सामान व प्रवासी वाहतूकदारांना संपावर जाण्यास मज्जाव केला आहे. सर्वसामान्य लोकांच्या सेवेवर परिणाम होणार नाही याची दक्षता वाहतूकदारांनी घ्यावी,असेही या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान,गेल्या ११ फेब्रुवारी रोजी सर्व वाहतूकदारांसाठी वेगनियंत्रकावर सादरीकरण ठेवण्यात आले असले तरी याला वाहतूकदारांनी प्रतिसाद दिला नसल्याने हा प्रयोग बारगळल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील सर्व मालवाहतूक, प्रवासी बस, टेम्पो,पिकअप संघटनांच्या संयुक्त बैठकीत १५ फेब्रुवारीपर्यंत वेगनियंत्रकाचा निर्णय मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी वाहतूक खात्याचे संचालक संदीप जॅकीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ फेब्रुवारी रोजी खात्याला सादर केलेल्या निवेदनावर १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे संपाला अजून वेळ आहे. कर्नाटक सरकारला उच्च न्यायालयाने वेगनियंत्रक कायद्याची अंमलबजावणी करण्यात हयगय केल्याप्रकरणी फटकारल्याचे सांगून कर्नाटकात आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही वेगनियंत्रक बंधनकारक करण्यात आल्याचे ते म्हणाले. केंद्रीय वाहतूक कायद्यात वेगनियंत्रकाची तरतूद असून हा कायदा भविष्यात लागू करावाच लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील वाहतूकदारांना ही यंत्रणा बसवण्यासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असतानाही त्यांनी नकाराचा पाढा चालू ठेवल्याने समस्या निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
संपाचा इशारा दिलाच नव्हता ः रजनीकांत नाईक
वेगनियंत्रक यंत्रणा बसवण्यास विरोध करण्यासाठी पणजीत मिनेझिस ब्रागांझा सभागृहात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय रद्द करण्यासाठी सरकारला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देऊन अन्यथा संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. सरकारने जारी केलेल्या "एस्मा" कायद्याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना संपाची नोटीस दिलीच नव्हती अशी माहिती अखिल गोवा प्रवासी बस संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक यांनी दिली. हा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारला केवळ मुदत देण्यात आली होती असे म्हणून पुढील कृती एकत्रितपणे बैठक घेऊन ठरवली जाणार असल्याचे ते म्हणाले. "एस्मा' कायदा लागू केल्याचे आदेश सर्व वाहतूक संघटनांना पाठवण्यात आल्याने त्याबाबत उद्या किंवा परवा संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अचानक संप पुकारल्यास प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी कर्नाटक परिवहन महामंडळाकडे चर्चा केली जात असल्याची माहितीही वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिली.
पहिला अर्ज कुंकळ्ळी पालिकेत!कुंकळ्ळी येथील आमच्या प्रतिनिधीने पाठविलेल्या माहितीनुसार मान्यताला वास्तव्य दाखला मिळवून देण्याचा प्रथम प्रयत्न कुंकळ्ळी नगरपालिकेत झाला होता पण तेथील मुख्याधिकारी आग्ऩेलो फर्नांडिस यांच्या दक्षतेमुळे तो फसला. मिळालेल्या माहितीनुसार माजी मामलेदार शिवानंद कदम यांचे पुत्र भूषण यांनी पोयराबांध कुंकळ्ळी येथील एक बांधकाम ठेकेदार शेख गनी यांची भेट घेऊन त्याच्याकडून मान्यताच्या वास्तव्य दाखल्यासाठी ना हरकत दाखला घेतला व कुंकळ्ळी पालिकेत सदर दाखल्यासाठी अर्ज केला पण मुख्याधिकारी आग्नेल यांच्या लक्षात ती बनवेगिरी आली व त्यांनी तो दाखला नाकारला. ते पाहून कदम यांनी सदर अर्ज तेथेच फाडून टाकला पण त्या अर्जाची नोंद पालिका दप्तरात झालेली आहे. पण जे कुंकळ्ळीत शक्य झाले नाही ते त्यांनी मडगावात साध्य केले पण तेही शेवटी अल्प घटकेचे ठरले.
मान्यताला निवासी दाखला
देणारा तलाठी निलंबित

मडगाव, दि.१४ (प्रतिनिधी) - गोव्यातच केवळ नव्हे तर साऱ्या देशभर गाजत असलेल्या अभिनेता संजय दत्त व मान्यता यांच्या गोव्यात झालेल्या विवाह नोंदणी प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या सासष्टी मामलेदार कचेरीतील तलाठी प्रशांत कुंकळकर याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी आज सायंकाळी हा निलंबनाचा आदेश जारी केला. पुढील आदेशापर्यंत मुख्यालय सोडून जाऊ नये असे या आदेशात पुढे म्हटले आहे.
मान्यता ऊर्फ दिलनशिल अहमद शेख हिला तिचे वास्तव्य गोव्यात नसताना बनावट पत्त्यावर विसंबून कुंकळकर याने विवाह नोंदणीसाठी वास्तव्य दाखला जारी केला व त्यांतून मोठा विवाद खडा झाल्यानंतर काल सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई यांनी सदर तलाठ्याला कारणे दाखवा नोटिस जारी केली होती पण ती नोटिस त्याने स्वीकारली नाही की स्पष्टीकरणही दिले नाही उलट आपण केले ते सारे कायदेशीर असल्याची उद्दामपणाची भाषा तो करू लागला.
या प्रकरणी जिल्हा धिकारी जी. पी. नाईक यांनी आज मामलेदारांकडे या एकंदर प्रकरणाचे स्पष्टीकरण मागितले असता मामलेदारांनी त्यांना सविस्तर अहवाल सादर केला व त्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी सदर तलाठ्याला निलंबित केले व या आदेशाच्या प्रती उपजिल्हाधिकारी, लेखा उपसंचालक, दक्षता खाते यांना पुढील कारवाईसाठी पाठविल्या .
वरिष्ठांचा आदेश न जुमानणे, नोटिस स्वीकारण्यास नकार देणे व बेशिस्तीचे वर्तन करणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
आता बाहेर येत असलेल्या माहितीनुसार मान्यता हिने आके येथील कल्याण या इमारतीत आपण राहत असल्याचे नमूद केलेले असून तो पुरावा मानून तलाठ्याने तिला वास्तव्याचा दाखला दिला . त्याबाबतचा अर्ज देण्यासा़ठी वा दाखला नेण्यासाठी सुध्दा ती व्यक्तिशः तलाठ्याकडे आली नव्हती ही यांतील नोंद घेण्यायोग्य गोष्ट मानली जात आहे.
तिने वास्तव्यासाठी ज्या इमारतीचा उल्लेख केला आहे ती काणकोणचे निवृत्त मामलेदार शिवानंद कदम यांच्या मालकीची असून त्यांचे चिरंजीव भूषण कदम यांनी सदर दिलशन ही आपली मानलेली बहीण असल्याचे आपल्या ओळखपत्र दाखल्यात म्हटले आहे.
दरम्यान तलाठ्यावर कारवाई झालेली असली तरी संजय दत्त व मान्यता यांच्या झालेल्या विवाह नोंदणीचे काय हा प्रश्र्न रहातोच. सदर वास्तव्य दाखला जरी बेकायदेशीर ठरला तरी त्याची अधिकृत माहिती जोपर्यंत त्यांच्याकडे येत नाही तोपर्यंत ते या प्रकरणी काहीच करू शकत नाही असे मानले जाते.
आणखी एका वृत्तानुसार या प्रकरणातील नवरदेव संजय दत्त काल संध्याकाळपर्यंत गोव्यात होता पण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याचे पाहून त्याने मुंबई गाठल्याचे समजते.

Thursday 14 February, 2008

BREAKING NEWS

पेट्रोल महागले

सरकारने पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी, तर डिझेलच्या दरात एका रुपयाने वाढ केली आहे. नवे दर गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू होतील.
राज ठाकरे यांना अटक, जामिनावर सुटका
तीन दिवसानंतर राजनाट्याची अखेर

मुंबई, दि. 13 - होणार, होणार, आज होणार, उद्या अटक होणार, अशी गेले तीन दिवस उठणा़ऱ्य़आ अफवांना आज अखेर दुपारी सव्वा चार वाजता मुंंबई पोलिसांनी पूर्णविराम देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक केली. राज ठाकरे यांना अटक झाली नाही तोच मुंबईसह महाराष्ट्रात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात राज ठाकरे यांना विक्रोळी येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 15 हजार रुपयांच्या जामीनावर सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
राज ठाकरे यांची सुटका होताच विक्रोळीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि गेल्या दोन आठवड्यात राज ठाकरे हिरो बनले. शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरे यांनी पद्धतशीरपणे रचलेल्या व्यूहरचनेला राज्य सरकारने मदत केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. ते रहात असलेल्या दादर येथील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी कालपासूनच पोलिसांचा गराडा पडला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दल, धडक कृती दल राज्यात पाठवून दिले होते. पोलीस बंदोबस्ताबरोबरच हे दल शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. याशिवाय विक्रोळी न्यायालय परिसरातही पोलिसांचा अत्यंत कडेकोट बंदोबस्त होता.
दुपारी एक वाजता पोलीस राज ठाकरे यांच्या घरी गेले. त्यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांना ताब्य़ात घेण्यात आले आणि त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली. अटक करण्यापूर्वी विक्रोळीकडे जाणाऱ्या महामार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्य़ात आला होता. शिवाय हा रस्ता मोकळा राहील याची खबरदारीही मुंबई पोलिसांनी घेतली होती. उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे मुंबईत आल्यानंतरच त्यांना अटक करून न्यायालयात नेण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील मंत्रालयात आले. त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिका़ऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता पोलीस उपायुक्त सुनील फडतरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले आणि राज यांना रीतसर अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला यांनी त्यांच्या हातावर दही आणि साखर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांचे सासरे मोहन वाघ य़ांनी दिली. राज्यात परीक्षांचे वातावरण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलनाचा फ़टका बसू नये, यासाठी शांततेचे आवाहन राज ठाकरे यांनी केल्याचे मोहन वाघ यांनी सांगितले.
ठाकरे यांना पोलीस बंदोबस्तात पोलीस व्हॅनमध्ये बसविण्यात आले. यावेळी प्रसिद्धीमाध्यमांनी त्यांना गराडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसिद्धीमाध्यमांशी त्यांना बोलण्यास मनाई केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मोहन वाघ यांनी राज यांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगितले. ठाकरे यांना चागंल्या कामासाठी अटक होत आहे. त्यामुळे कुटुंबिय आणि सुज्ञ जनता त्यांच्याबरोबर आहे, असेही वाघ म्हणाले.
मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांनी राज्यात राज ठाकरे यांच्या अटकेनंतर निर्माण होणाऱ्या प्रक्षोभाला मनसे जबाबदार नसल्याचा युक्तीवाद केला. राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक अटक झाल्याने आता जो प्रक्षोभ रस्त्यावर दिसतो आहे, ती उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहे, असे पारकर यांनी सांगितले. लोकांच्या मनात खदखदणारा गेल्या 15-20 वर्षाचा राग यावेळी बाहेर पडत आहे, असेही पारकर म्हणाले. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्य सरकारने उशीराने कारवाई करत निष्पाप जनतेला वेठीस धरल्याचा आरोप केला.
सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मोठया बंदोबस्तात राज ़ठाकरे यांना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यानी त्या परिसरात गर्दी केली होती. तब्बल दीड तास सुरू असलेल्या युक्तीवादादरम्यान पोलीसांनी राज ठाकरे यांना कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. त्याला राज ठाकरे यांनीही सहमती दर्शवली. तेव्हा राज ठाकरे यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज कोर्टाला सादर केला. न्यायाधीश शर्मा यांनी त्यांचा जामीन अर्ज मंजूर करून राज यांना 15 हजार रुपयांच्या जामीनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राज ठाकरे यांना न्यायालयाने जामीनावर मुक्त केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे झिंदाबादच्या घोषणा देत त्यांची विजयी मिरवणूक काढली.
दरम्यान, राज ठाकरे यांना अटक होतात मुंबईत मोठ्या प्रमाणावर बसेसची नासधूस करण्यात आली. दादर, विक्रोळी, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव चेंबुर, आदी ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. याशिवाय या भागातील लोकांनी आंदोलनाला घाबरून आपली दुकाने अगोदरच बंद केली. मात्र सर्वाधिक उद्रेक नाशिक येथे झाला. मुबंई आग्रा महामार्गावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. त्यात एकाचा मृत्यु झाला. एस. टी बसेस जाळण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला.
कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, या भागातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी अटकेचा निषेध करण्यासाठी आंदोलने केली. रत्नागिरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागातही सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
"सेझ' रद्द करण्याबाबत
मुख्यमंत्र्यांचे मौन - माथानी

पणजी, दि. 13 (प्रतिनिधी)- राज्यातील "सेझ" रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली खरी, परंतु ती रद्द करण्याबाबत काय परिस्थिती आहे, याबाबत ते मौन बाळगून असल्याने "सेझ' विरोधी गोमंतकीय चळवळ" संघटनेतर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
संघटनेचे निमंत्रक माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक बोलावण्यात आली. मुख्यमंत्री कामत 'सेझ" रद्द करण्याचे धाडस केल्याची वक्तव्ये करीत आहेत, परंतु ते रद्द न करता अन्य प्रकारे त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न झाल्यास ते हाणून पाडले जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
'सेझ' साठी देण्यात आलेल्या लाखो चौरस मीटर जागेचा प्रश्न महत्त्वाचा असताना त्या परत करण्यासंबंधी सरकार काहीच हालचाली करीत नाही. या जमिनींवर नजर ठेवून असलेल्या दिल्लीतील काही उद्योजकांनी खास विकास विभागांच्या नावाने या जमिनींचा विकास करण्याचा प्रस्ताव सरकारकडे ठेवल्याचे खात्रीलायक वृत्त असून या पडद्यामागील भानगडींचा पर्दाफाश करणार असल्याचेही श्री. साल्ढाणा म्हणाले.
राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खाण उद्योगाला उधाण आले आहे व सरकारचे या बाबतीत कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही, असेही माथानी यांनी सांगितले. विविध उद्योगांतील गोमंतकीय कामगारांबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करून रोजगार नोंदणी केंद्रातील नव्या बेरोजगारांची यादी ताबडतोब जारी करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. राज्याच्या गरजेप्रमाणे विकास व्हावा असे सांगून विनाकारण विकासाच्या नावाने राज्यात इतर राज्यातील लोकांचा भरणा वाढत चालल्याचा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.
राजीनामा देण्यास मंत्री
तयार नसल्याने श्रेष्ठी पेचात

पणजी, दि. 13 (प्रतिनिधी)- मंत्रिपदाला हात लावल्यास किंवा खाते बदलाचे प्रयत्न केल्यास सरकार खाली खेचू अशा धमक्यांपुढे कॉंग्रेस श्रेष्ठीही हतबल झाले आहेत. राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांची समजूत काढून हा वाद मिटवण्याच्या अटीवर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी निर्णय घेण्याचे ठरल्याने दिल्लीतील नेते परतीच्या वाटेवर निघाले आहेत.
वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे प्रयत्न राज्यातील अनुसूचित जमात संघटनेच्या इशाऱ्यामुळे निष्फळ ठरले आहेत. जलस्त्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांना वगळल्यास कॉंग्रेस पक्षाची वोटबॅंक असलेला ख्रिस्ती समाज दुखावेल, अशा द्विधा मनःस्थितीत श्रेष्ठी सापडले आहेत. सुदिन यांचा मंत्रिमंडळातील समावेश ही शरद पवार यांची मागणी असली तरी त्यामागचे खरे सूत्रधार आरोग्यमंत्री विश्वजित राणे हेच असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढावी, असेही यावेळी ठरवण्यात आले. गोव्यात आघाडी सरकारच्या घटकांनी माजवलेला गोंधळ ही अत्यंत शरमेची गोष्ट असून त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची कानउघाडणी श्रीमती सोनिया गांधी यांनी केल्याचीही खबर मिळाली आहे.
कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी हा निर्णय तूर्त लांबणीवर टाकल्याचे सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याने तोपर्यंत इतर उपायांचे प्रयत्न केले जातील, असेही संकेत त्यांनी दिले. दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर दोन वेळा विधानसभा अधिवेशन काळात त्यांनी सभापती व राज्यपालांच्या आश्रयाने सरकार टिकवून ठेवले खरे, परंतु येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना आपले बहुमत सिद्ध करणे अपरिहार्य आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना उद्या दिल्लीत अन्य एक बैठक असल्याने ते उद्या गोव्यात परतणार आहेत.
लेखी हमीनंतरच आंदोलन मागे घेणार
वास्को, दि. 13 (प्रतिनिधी) - मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांनी मुरगाव बचाव अभियानाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांनी काही मुद्दे वगळून अभियानाला पत्र दिले आहे. हे डावपेच मुरगाववासीय सहन करणार नाहीत. त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याची लेखी हमी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल,असे आज अभियनाने नेते रोनी डिसोझा यांनी सांगितले.
मुरगाव बचाव अभियानाने शहरात काढलेल्या भव्य मोर्चानंतर डिसोझा यांनी जाहीर सभेत हे निवेदन केले.
महसूल मंत्री जुझे फिलीप, उपसभापती माविन गुदिन्हो, आमदार मिलींद नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज एमपीटीचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांनी अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. त्यापैकी कोळशाचा चढउतार धक्का क्रमांक 10 व 11 वरुन 4 व 5 वर नेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेला या प्रदुषणाचा फटका बसणार नाही, तसेच शहरातून कोळसा वाहतूक केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचे डिसोझा यांनी उपस्थितांना सांगितले. चिखली अथवा वाडे येथे मच्छिमार जेटी बांधण्याचा एमपीटीचा बेत रद्द करण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले आहे. ज्यांची घरे महामार्गामुळे जाणार असतील, त्यांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही अगरवाल यांनी दिली आहे.
या मेळाव्यात भाषण करताना सायमन परेरा यांनी लोकप्रतिनिधींनी व जनतेने लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. जनतेला न्याय दिल्यावरच हा लढा थांबेल असे आश्वासन त्यांनी दिले.
शैक्षणिक साहित्य खरेदीत
लाखो रुपयांची अफरातफर
खांडोळा महाविद्यालय प्राचार्यांची तक्रार

माशेल, दि. 13 (प्रतिनिधी) - खांडोळा माशेल येथील सरकारी महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य खरेदी नावावर लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लूकस् मिरांडा यांनी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवून पोलिसांना चौकशी करण्याची विनंती केली आहे.
या प्रकरणी प्राचार्य डॉ. मिरांडा यांची भेट घेऊन चौकशी केली असता त्यांनी सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयातर्फे खांडोळा महाविद्यालयाला मंजूर करण्यात आलेल्या फंडाची चौकशी केली असता त्यांना मंजूर करण्यात आलेल्या फंडापेक्षा तीन पटीने जास्त रकमेचे ज्यात प्रयोगशाळांतील रसायनशास्त्र विभागासाठी तसेच स्टेशनरी साहित्याचा समावेश आहे अशा शैक्षणिक साहित्याची खरेदी केल्याचे सांगितले गेले.
प्राचार्यांनी महाविद्यालयातील खरेदी नोंदी व बिले तपासली असता त्यात त्यांना सुमारे सात-आठ लाखांच्या खरेदीची बिले मिळाली नाहीत. व्यवहारांच्या कागदपत्रांवर दाखविण्यात आलेल्या खरेदीऐवजी प्रत्यक्षात कमी रकमेचे साहित्य महाविद्यालयात पोहोचले असल्यामुळे सविस्तर चौकशीसाठी पोलिस तक्रार करावी लागल्याचे सांगितले. पोलिस तक्रारीत प्राचार्यांनी महाविद्यालयातील एका कनिष्ठ कारकुनाचे नाव नमूद केले आहे.
खांडोळा महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत बरीच प्रगती केली असून, प्रत्येक शाखेचा निकाल चांगला लागत असल्यामुळे गोव्याच्या अनेक भागातून विद्यार्थी कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथे येत असतात.
राज ठाकरेंची अटक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक होणार असल्याच्या वावड्यांनी मुंबईसहित महाराष्ट्राच्या विविध भागांत सध्या जो तणाव निर्माण झाला होता त्याची कोंडी अखेर मंगळवारी झालेल्या त्यांच्या अटकेने व नंतर मिळालेल्या जामिनाने फुटली. राज ठाकरे यांना अटक होणार या अफवेमुळे मुंबईसहित महाराष्ट्राच्या अनेक भागात तणाव होता. मंगळवारी दुपारी ही अटक होताच बऱ्याच ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. नाशिकात एकाला जीव गमवावा लागला तर काही ठिकाणी वाहने आगीच्या भक्षस्थानी पडली. बाजारपेठाही धडाधड बंद झाल्या. कदाचित राज यांना कोठडीत जावे लागले असते तर परिस्थिती अधिकच चिघळली असती. सुदैवाने ती परिस्थिती टळली. राज यांना झालेली ही अटक आणि शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना झालेली अटक यात बरेच साम्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात त्या काळी वसंतराव नाईक यांची सत्ता होती आणि बाळासाहेबांनी भूमिपुत्रांच्या विषयावरून शिवसेनेला एक सन्माननीय स्थान मिळवून दिले. बाळासाहेबांचे वलय फार मोठे होते. त्यांना अटक झाली आणि त्यानंतर बाळासाहेब आणि शिवसेनेला मागे वळून पाहावे लागले नाही. आज राज ठाकरे सुध्दा अशाच एका वेगळ्या वळणावर उभे आहेत. महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यावरून अटक होण्यापर्यंतची परिस्थिती त्यांनी आपल्या अत्यंत योजनाबद्ध डावपेचांद्वारे निर्माण केली. महाराष्ट्राच्या हिताची चिंता शिवसेनेला नव्हे तर मनसेला अधिक आहे हेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यात ते यशस्वी ठरले आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात त्यांनी अस्वस्थता निर्माण केली आहे. राज यांना अटक करून मनात नसतानाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युती सरकारला राज यांच्या या डावपेचांना हातभार लावावा लागला.
राज यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध पुकारलेले युद्ध योग्य की अयोग्य हा वादाचा विषय आहे. मुंबईतील मराठी जनतेला या संदर्भात काय वाटते यावर देखील काही चॅनलवाल्यांनी ओपिनियन पोल घेतले आणि जाहीरही केले. परंतु या वादाच्या दरम्यान काही चॅनलनी घेतलेल्या एकतर्फी भूमिकेमुळे त्यातील काहींजण आपली विश्वासार्हताच गमावून बसले. ही लढाई आपलीच आहे आणि राज ठाकरेच्या विरोधात लढणे हे आपले कर्तव्यच आहे या दृष्टिकोनातून काहींनी अतिरंजित आणि भडकावू बातम्या देऊन एकूण वातावरणच बिघडवून टाकले. राज ठाकरे यांना त्याचे नुकसान होण्याऐवजी फायदाच झाला. उत्तर भारतीयांच्या वाढत्या लोंढ्यांमुळे त्रस्त असलेल्या मुंबईतील मराठी, गुजराती व इतर नागरिकांची राजना सहानुभूतीच मिळाली. राजनीं छेडलेल्या या आंदोलनामुळे खरी गोची शिवसेनेची झाली. काही जाणकारांच्या मते राज यांना अटक करण्यामागे शिवसेनेला शह देण्याचीच कॉंग्रेस व राष्ट्रवादीची चाल आहे. काही वर्षापूर्वी वसंतराव नाईकांनी बाळासाहेब ठाकरे यांना मोठे केले तर आता विलासराव आणि आर. आर. पाटील राजला मोठे करू पाहत आहेत अशी टीका खुद्द भाजपचे नेते नितीन गडकरी यांनीच केली आहे, यात बरेच काही आले. खरे तर आपले काका तसेच सख्खे चुलतभाऊ - मावसभाऊ यांच्यापासून फारकत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राजनीं मनसेच्या झेंड्याखाली आपली वेगळी चूल मांडली होती. मुंबईसहित महाराष्ट्राच्या काही भागात ते हळूहळू आपला जमही बसवू पाहत होते. परंतु ही गती पुरेशी नव्हती. त्यासाठी त्यांना लोकांच्या जिव्हाळ्याचा काहीतरी विषय हवा होता. समाजवादी पक्षाच्या मुंबईतील मेळाव्याने आणि छटपुजेच्या निमित्ताने त्यांना ही संधी मिळाली. अमिताभ बच्चनवर टीकेची झोड उठवून त्यांनी वादाला तोंड फोडले आणि जया बच्चन, अमरसिंग आणि अबू आझमी यांना त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर देऊन आगीत तेल ओतले. हा वाद इतका भडकेल आणि गोष्टी इतक्या थरापर्यंत जातील याची कल्पना त्यातील कोणालाच नव्हती. राज यांना मात्र ते अभिप्रेत असावे. कारण पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनानुसार घडल्या असे म्हटले तर ते फारसे चुकू नये. कारण या संपूर्ण वादाचे केंद्र बिंदू राज ठाकरेच राहिले. राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी केलेल्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे राज अधिकच प्रकाश झोतात आले. कालचा दिवस तर त्यांचाच होता. देशातील सगळ्याच प्रमुख दूरदर्शन वाहिन्यांनी आपले संपूर्ण प्रक्षेपण राजच्या अटकेवरच केंद्रित केले. राजलाही हेच अभिप्रेत असावे. राजच्या अटकेच्या केवळ अफवेने तणाव आणि दंगा निर्माण होऊ शकतो ही गोष्टही त्यातून स्पष्ट झाली. त्यामुळे राज यांना लोकप्रियतेची नवी परीक्षा देण्याचीही आता गरज नाही.
यात खरी गोची झाली ती गडकरी म्हणतात त्या प्रमाणे शिवसेनेचीच. उद्धव ठाकरेंसहित शिवसेनेतील अनेक नेत्यांनी राजविरूद्ध आक्रमक विधाने केली. थोरल्या बाळासाहेब ठाकरे यांनी एक पाऊल पुढे मारताना ज्या अमिताभ बच्चनवरून हा विषय सुरू झाला होता, त्या अमिताभ बच्चनची चक्क बाजूच घेतली. मात्र आता धनुष्यातून बाण सुटलेला आहे. मराठी माणसाच्या मुद्यावरून राज यांना अटक झालेली आहे. अशावेळी मराठी माणसाच्या हितासंदर्भात आता वेगळी परीक्षा देण्याची त्यांना गरज भासणार नाही. या उलट महाराष्ट्र आणि मराठी या मुद्यांपासून आपण दूर गेलेलो नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याची पाळी आता शिवसेनेवर आली आहे. ही वस्तुस्थिती आहे. राज नावाचे अस्त्र बोथट करण्यासाठी खुद्द बाळासाहेबांनाच आता काहीतरी करावे लागणार आहे.

Wednesday 13 February, 2008

BREAKING NEWS


राज ठाकरे यांना अटक व नंतर सशर्त जामिनावर सुटका * मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात तीव्र पडसाद * अबु आजमींनाही अटक व जामिनावर सुटका

सर्वांत महाग ऍडव्होकेट जनरल!

मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी अन्य राज्यातील ऍडव्होकेट जनरलच्या वेतन व शुल्कांची माहिती मागवली असता आपले ऍडव्होकेट जनरल हे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत महाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी तिजोरीतून ऍडव्होकेट जनरलांच्या वेतनापोटी करण्यात आलेल्या खर्चाचा विषय आता अधिक गंभीर बनल्याने या वेतन व शुल्कांवर निर्बंध घालण्याबरोबर अतिरिक्त वेतन वसूल करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
यापुढे वेतन आणि शुल्कांवर निर्बंघ
ऍडव्होकेट जनरलांचे अतिरिक्त
मानधन सरकार वसूल करणार

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) ः राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांचे वेतन व शुल्क इतर राज्यांच्या तुलनेत कितीतरीच पटीने जास्त असल्याचे सरकारच्या नजरेस आले आहे. यापुढे ऍडव्होकेट जनरलना देण्यात येणारे वेतन व इतर कायदेशीर शुल्कांच्या रकमेबाबत निर्बंध घालण्याबरोबर त्यांना वितरित झालेले अतिरिक्त वेतन वसूल करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्या वेतन व इतर कायदेशीर शुल्कांपोटी खर्च करण्यात आलेल्या रकमेबाबत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सुरुवातीस आक्षेप घेतला होता. त्यानंतर "ऊठ गोंयकारा" संघटनेचे प्रवक्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनीही या प्रकरणी या वेतनाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी घेतली होती. सरकारकडून देण्यात आलेल्या वेतनाचे समर्थन कोणत्याही पद्धतीत होऊ शकत नाही, त्यामुळे अतिरिक्त वेतन वसूल करण्याची शिफारस कायदा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचीही खबर आहे. या अनुषंगाने मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी अन्य राज्यातील ऍडव्होकेट जनरलच्या वेतन व शुल्कांची माहिती मागवली असता आपले ऍडव्होकेट जनरल हे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत महाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी तिजोरीतून ऍडव्होकेट जनरलांच्या वेतनापोटी करण्यात आलेल्या खर्चाचा विषय आता अधिक गंभीर बनल्याने या वेतन व शुल्कांवर निर्बंध घालण्याबरोबर अतिरिक्त वेतन वसूल करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी कायदामंत्री दयानंद नार्वेकर यांचा ऍड. कंटक यांना वरदहस्त लाभल्याने हे प्रयत्न कितपत यशस्वी होतात, याबाबत मात्र साशंकता आहे.
अलीकडेच ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा मुख्य सचिव जे. पी. सिंग यांना नोटीस पाठवून ऍडव्होकेट जनरलांच्या वेतनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. या नोटिशीसंबंधी त्यांना मुख्य सचिवांकडून कोणताही खुलासा आला नसल्याने त्यांनी आता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
केवळ ३३ दिवसांत लेखा खात्याकडून ऍडव्होकेट जनरलांना १ कोटी ६ लाख रुपये वितरित झाल्याची माहिती पर्रीकर यांनी उघड केली होती. याप्रकरणी १ जानेवारी २००६ ते जून २००७ पर्यंत २ कोटी ३३ लाख ९४ हजार ५०० रुपये देण्यात आले होते. नव्या अधिसूचनेनंतर १ एप्रिल २००५ ते ऑगष्ट २००६ पर्यंत थकबाकीपोटी ९४ लाख ६५ हजार ५०० रुपये देण्यात आल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. गेली कित्येक वर्षे ऍडव्होकेट जनरलांच्या वेतनश्रेणीत सुधारणा केली नसल्याने पर्रीकर यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत सुधारीत वेतनासंबंधी काही सूचना मांडल्या होत्या. पर्रीकर यांचे सरकार गेल्यानंतर अर्थ खात्याकडून आर्थिक परिणामांचा कोणताही अभ्यास न करता राणे सरकारने ही सुधारीत वेतनश्रेणी जशासतशी लागू केली. यावेळी केलेल्या शिफारशीत या पदासाठी प्रत्येक महिन्याकाठी २० हजार वेतन, सर्व सोयींनी उपलब्ध घर किंवा १० हजार प्रतिमहिना घरभाडे, ५,५०० सल्ला किंवा परिषदसभा भत्ता, ३ हजार खाजगी खर्च, उच्च न्यायालयात नागरी किंवा गुन्हेगारी प्रकरणाला हजर राहण्यासाठी ८ हजार प्रतिदिन असा तक्ता तयार केला होता. एखादेवेळेस दोन संबंधित प्रकरणांसाठी न्यायालयात हजर असल्यास एकाच प्रकरणासाठीचे शुल्क देण्याचेही ठरले होते, परंतु असे असतानाही एवढी मोठी रक्कम कोणत्या आधारावर वितरित केली याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे. सालेली प्रकरणी १०८ संशयितांच्या जामीन अर्जाबाबत प्रत्येकासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात आल्याची शक्यताही पर्रीकर यांनी व्यक्त करून ही अधिकृत सरकारी लूट असल्याचा आरोप केला होता.
एमपीटीविरोधात वास्कोत भव्य मोर्चा
बंद मागे पण सागरी व्यवहार बंद

वास्को, दि. १२ (प्रतिनिधी)-एमपीटी (मुरगांव पोर्ट ट्रस्ट)तर्फे होत असलेल्या कथित सतावणुकीच्या निषेधार्थ मुरगांव बचाव अभियानातर्फे कालपासून पुकारण्यात आलेल्या वास्को बंद चे आज सकाळी एम. पी. टी च्या विरोधात भव्य मोर्च्याने रूपांतर होऊन नंतर वास्कोतील दुकानदारांना व इतर व्यवस्थापनांना आपला व्यवसाय सुरू करण्याचे घोषित करण्यात आले. मात्र जोपर्यंत एमपीटी मुरगांव बचाव अभियानाच्या मागण्या पूर्ण करीत नाहीत तोवर समुद्रातील सर्व व्यवहार ठप्प राहणार असून एमपीटीचा व्यवसाय रोखण्यात येणार आहे.
एमपीटीकडून होत असलेल्या सतावणुकीचे प्रत्युत्तर देण्यासाठी अखिल गोवा बार्ज मालक संघटना, अखिल गोवा मच्छीमारी नौका मालक संघटना, मुरगांव लॉन्च मालक संघटना, युनायटेड बार्जमन असोसिएशन, देस्तेरो मच्छीमार संघटन, बायणा रापणकार व मच्छीमार नौका मालक संघटना, वाडे सिटीझन फोरम व इतर (एकूण १४) संघटनांनी मिळून मुरगांव बचाव अभियानांची स्थापना केली व नंतर त्यांनी एमपीटीला त्याच्या मागण्या निवेदनाव्दारे सादर करून तीन दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचे नमूद केले होते. निवेदन सादर करून तीन दिवस पूर्ण होऊन सुध्दा एमपीटीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे समजताच अभियानाने एमपीटीच्या विरुद्ध लढा उचलण्याचे ठरवून काल १०० टक्के वास्को बंद पाळले. काल सकाळपासून वास्कोतील सर्व दुकाने, मासेमार्केट, भाजी मार्केट तसेच समुद्रातील सर्व व्यवसाय ठप्प करण्यात आला, तसेच सुमारे ३५० मच्छीमारी नौका, १५० बार्जेस व ३५ लॉन्चेसनी एम. पी. टी. च्या समुद्री क्षेत्रात नौका नांगरून त्यांचा व्यवसाय बंद करून टाकला, तसेच एमपीटीच्या धक्का क्र. ९ वर वाहने उभी करून तेथून होणारा कोळसा व्यवसाय बंद पाडला. या सर्व गोष्टींबरोबर हजारो संख्येने नागरिकांना सडा येथील एमपीटीच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन व्यवस्था व एमपीटीचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांच्याविरुद्ध घोषणा केल्या. प्रवीण अगरवाल यांची प्रतिमा यावेळी जाळण्यात आली. यावेळी एमपीटीच्या काही अधिकाऱ्यांनी तेथे येऊन मोर्चातील उपस्थितांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र अगरवाल यांना बोलवा (बोलणीसाठी) असे सांगून त्यांना येथून हाकलून लावले. शेवटी अगरवाल तेथे येऊन उपस्थित मोर्चातील समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तोही अयशस्वी ठरला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही व ह्या पूर्ण करण्याचे आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगून येथून निघून गेले. या घटनेनंतर काल पूर्ण वेळ वास्कोतील दुकाने व इतर व्यवस्थापने (औषधालय वगळता) ठप्प राहिली.
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तीन हजारांहून अधिक नागरिकांनी मुरगांव बचाव अभियानाच्या झेंड्याखाली एमपीटी विरोधात मोर्चा काढला. मुरगांव नगरपालिकेसमोर या मोर्चाची सांगता झाली. यानंतर ""मुरगांव बचाव अभियानाचे'' प्रवक्ते सायमन परेरा यांनी अभियानाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच गरज भासल्यास पुन्हा मुरगांवच्या हितासाठी अभियानाने बंद पुकारल्यास येथील जनतेने उभे राहण्याचे सांगून वास्कोतील सर्व दुकानदार व इतर व्यवस्थापनांना आता बंद मागे घेऊन व्यापार सुरू करण्याचे सांगितले. दुपारी १२.३० नंतर वास्कोतील सर्व दुकाने, बससेवा सुरळीत झाली मात्र पाण्यातील सर्व व्यवसाय अजूनपर्यंत ठप्प असून कोळसा हाताळण्याचे बंद करण्याचे हार्बर सडा येथील १९२२ सालापासून असलेला खुरिस न हलविण्याचे वाडे येथे मच्छीमारी जेटी न येण्यासाठी तसेच बचाव अभियानाच्या इतर मागण्या पूर्ण करण्याचे लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत हा बंद चालू राहणार असून एमपीटीला सुध्दा यामुळे करोडांचे नुकसान सोसावे लागणार आहे.
चार जणांना जिवंत जाळणारा
जन्मठेपेचा कैदी
आग्वादहून फरारी

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - चार जणांना जिवंत जाळून मारल्याच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी शरण बसप्पा ऊर्फ किरण मोपूकर(२९) याने आज आग्वाद तुरुंगातून पलायन केल्याने खळबळ माजली आहे.
आज सकाळी सुमारे ७ वाजता आग्वाद तुरुगांतील स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाजातून त्याने पलायन केल्याचे उघड झाले आहे. सकाळी या दरवाजावर ड्युटीवर असलेला तुरुंगरक्षक विजय आर. गावकर व मुख्य रक्षक गुरुदास वारंग यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याविषयीचे आदेश तुरुंग महानिरीक्षक तथा उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी काढले. ज्या दरवाजातून पलायन झाले त्या ठिकाणी तुरुंग रक्षक विजय गावकर याची ड्युटी होती. परंतु, तो त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित नसल्याने कैदी पळून जाण्यास यशस्वी झाल्याचा कयास सध्याच्या चौकशीत व्यक्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेचा चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक वसंत बोडणेकर यांनी दिली. या घटनेची पोलिस तक्रार कळंगुट पोलिस स्थानकावर तुरुंग अधिकारी महेश फडते यांनी दाखल केली आहे. शरण याच्या उजव्या हातावर जळल्याची खूण असून त्याच हातावर एक धार्मिक चिन्ह कोरलेले आहे. मध्यम बांधणीचा असून तो कृष्णवर्णीय आहे.
गेल्या चतुर्थीच्या काळात मडगाव येथील न्यायालयीन कोठडीतून १४ कैद्यांनी पलायन केल्यानंतर सर्व तुरुंगांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली होती. या घटनेनंतर आग्वाद तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेत केंद्रीय राखीव दलाचे अतिरिक्त ३० जवान तैनात करण्यात आले होते. तरीही कैद्याने पलायन केल्याने तुरुंगाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. १९९२ ते २००८ पर्यंत गंभीर गुन्ह्याखाली शिक्षा भोगणाऱ्या सुमारे आठ कैद्यांनी पलायन केल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मडगाव येथील सत्र न्यायालयाने आरोपी शरण बसप्पा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर दि. १३ जुलै ०७ रोजी त्याला आग्वाद तुरुंगात आणले होते. आज सकाळी सहा वाजता तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या १२० कैद्यांना बाहेर काढून त्यांची शिरगणती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्यांना कोठडीत पाठवण्यात आले. सकाळीचा नाश्ता बनवण्यासाठी १२ कैद्यांची निवड करण्यात आली. यात शरण बसप्पा याचा समावेश होता. सर्व कैदी स्वयंपाक घरात सकाळचा नाश्ता बनवण्याच्या गडबडीत असतानाच शरण याने मागील दारातून पलायन केले. त्याला भांडी धुण्याचे काम देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कैदी स्वयंपाक घरात काम करीत असताना नेहमीच या मागील दरवाजावर तुरुंग रक्षक तैनात करण्यात येतो. यावेळी विजय गावकर या तुरुंग रक्षकाची त्याठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. परंतु, तो त्याठिकाणी हजर नसल्याने शरण याला पळून जाण्यास आयतीच संधी उपलब्ध झाली.
या स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूला सुमारे १३ फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. या भिंतीवरून उडी मारून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भिंतीवर तो कसा चढला याचा शोध सध्या घेतला जात आहे.
शरण याच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी
दि. ९ ऑगस्ट ०५ रोजी मध्यरात्री वास्को येथील जेटी खारेवाडा चाळीत शरण बसप्पा याने रुपसींग याच्या घरावर रॉकेल ओतून चार जणांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. यावेळी शरण याने घराबरोबरच शेजारच्या अन्य सहा घरांचे दरवाजे बाहेरून बंद केल्याने या भीषण आगीत आत झोपलेल्या चौघांचा होरपळून जागीच अंत झाला होता. यात रुपसिंग नाईक(३५), रत्ना रुपसिंग नाईक(२५), त्यांची मुलगी नीला (९) अन्य एक वृद्ध महिला नातेवाईक आगीत होरपळून जळून खाक झाले होते. यावेळी आरोपी शरण बसप्पा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चोवीस तासाच्या आत अनमोड येथे अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सॅमी तावारिस, उपनिरीक्षक रवी देसाई, कारासिलिओ पो, संजय दळवी, श्री. शेटगावकर यांनी केला होता.
नार्वेकर व मडकईकरही दिल्लीत
तोडग्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सोनियाजींना साकडे

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आग्रहास्तव सुदीन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याच्या मुद्यावरून कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेले मतभेद विकोपाला गेले असून, कॉंग्रेसचे निरीक्षक हरिप्रसाद सर्वांना योग्य प्रमाणात "प्रसाद'देण्यात अयशस्वी ठरल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी आज दिल्लीत धाव घेतली. कामत यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनवणी केल्याचे वृत्त मिळाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची समजूत काढून स्थानिक राष्ट्रवादी आमदारांना "फॉर्म्युल्या'वर भर देण्यापासून परावृत्त करण्याची मागणी कामत यांनी केल्याचे समजते.
राज्याची आर्थिक स्थितीही बिकट बनल्याने विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्राकडून अतिरीक्त निधी देण्याची मागणीही त्यांनी या भेटीत केल्याचे वृत्त मिळाले.
मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यापासून दिल्लीवाऱ्या करण्यातच अधिक काळ घालवलेल्या कामत यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली. विद्यमान परिस्थितीतील गेल्यावेळी सरकार वाचवण्यासाठी जो तोडगा दिल्लीत श्रेष्ठींच्या उपस्थितीत काढण्यात आला तो प्रत्यक्षात अमलात आणणे कठीण बनल्याचे यावेळी श्रीमती गांधी यांना सांगण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत सरकारकडे २२ आमदारसंख्या असल्याने मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास अनेकांचा विरोध असल्याचेही त्यांनी श्रेष्ठींच्या नजरेस आणून दिले. या संकटावर तोडगा काढण्यासाठी केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची समजूत काढून त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याची विनंती केल्यासच यावर तोडगा निघू शकेल, असेही सांगण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री कामत यांच्याबरोबर पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी बी.के.हरीप्रसाद हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री कामत यांच्यासह वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर,वित्तमंत्री दयानंद नार्वेकर व मुख्य सचिव जे.पी.सिंग दिल्लीत गेले आहेत. सोनिया गांधी या केवळ मुख्यमंत्री कामत व हरिप्रसाद यांनाच मिळाल्या. दरम्यान, दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते काढून घेण्याचीही अट या तडजोडीत असल्याने त्यांनी आपल्या वित्त खात्याच्या काही मागण्या घेऊन दिल्लीत जाण्यासाठी हीच वेळ निवडली. राज्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्राकडून अधिक आर्थिक मदतीची गरज असल्याचा प्रस्ताव त्यांनी दिल्लीत ठेवण्याचे वृत्त आहे.
वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांना मात्र सोनियांची भेट मिळणे शक्य झाले नसल्याने त्यांच्यावरील टांगती तलवार अजूनही कायम असल्याची खबर आहे. अनुसुचित जमातीचे प्रतिनिधीत्व करणारे मडकईकर हे एकमेव मंत्री असल्याची भूमिका सोनिया गांधी यांच्याकडे मांडण्यासाठी ते दिल्लीत गेले असले तरी त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणारे कुणीच नसल्याने ते एकाकी पडल्याची खबर आहे.

Tuesday 12 February, 2008

Breaking News

उसगावात रास्ता रोकोतिस्क उसगाव येथे नागरिकांनी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. वाहतूक निरीक्षक, पोलिस निरीक्षक यांची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्र्वासन फोंड्याचे मामलेदार चंद्रकांत शेटकर यांनी दिल्याने नंतर ते मागे घेण्यात आले व वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.

ताज्या बातम्या

वास्कोत जनजीवन सामान्य, पण एमपीटीची जलवाहतूक अजून रोखलेलीच. नागरिकांचा भव्य मोर्चा * पांडुरंग मडकईकर यांचे मंत्रिपद काढून घेण्याविरुद्ध ओल्ड गोवा वासियांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा * मुख्यमंत्री श्रेष्ठींशी चर्चेसाठी दिल्लीस रवाना.

संजय दत्त मान्यताशी गोव्यात विवाहबद्ध

संजय दत्त मान्यताशी गोव्यात विवाहबद्ध
मुंबई, दि. ११ - अभिनेता संजय दत्त आणि गर्लफ्रेंड मान्यता गेल्या सात फेब्रुवारीस गोव्यात "ताज एक्झॉटिका' या बाणावली येथील आलिशान हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाल्याचे आज स्पष्ट झाले. विशेष विवाह कायदा, १९५४ खाली त्यांच्या विवाहाची नोंदणीही केली गेली आहे. त्यासाठी विवाह नोंदणी अधिकाऱ्यांना खास हॉटेलवर पाचारण केले गेले होते. सुनील शेट्टीच्या "ईएमआय' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्यात आलेल्या संजयने मान्यताला अधिक प्रतीक्षा करायला न लावता आपला तिसरा विवाह गुपचूप पार पाडला. संजयने यावेळी मान्यताच्या बोटांत चाळीस लाख रुपये किंमतीची हिऱ्याची अंगठी घातली. शनिवारी मान्यता एका कार्यक्रमास उपस्थित राहिली असता, तिच्या भांगात सिंदूर पाहून पत्रकारांना तिचा विवाह झाल्याची कुणकुण लागली व अखेर आज सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.
गुपचूप झालेल्या या सोहळ्याला मोजकेच निमंत्रित साक्षीदार या नात्याने उपस्थित होते. मात्र, मुंबईत आज त्यांनी वैदिक परंपरेनुसार पुन्हा एकदा एकमेकांना वरमाला घातल्या. मान्यताचा मित्र प्रदीप याच्या वर्सोवा येथील घरी हा विवाहसोहळा पार पडला.
संजय दत्त याचे रिया पिल्लईशी बिनसल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया गेल्याच महिन्यात पूर्ण झाली. त्याआधी संजय दत्तने अभिनेत्री रिचा शर्माशी विवाह केला होता.
गोव्यात झालेल्या विवाह सोहळ्यास संजय दत्त प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी धरम ओबेरॉय, संजयचा मित्र बंटी वालिया आदी मोजकेच मित्र उपस्थित होते. ओबेरॉय यांनीच मान्यताचे गोव्यात कन्यादान केले. त्यांची अभिनेत्री असलेली कन्या नेहा, दत्त यांचा जवळचा मित्र अजय ऊर्फ बिट्टू व प्रशांत यांचीही विवाहसोहळ्यास गोव्यात उपस्थिती होती. यावेळी वर संजय दत्त पिवळा टीशर्ट व जीन्स , तर मान्यता ही जांभळे टीशर्ट व ट्राऊजर अशा साध्या पेहरावात होती.
गोव्यात कायदेशीर विवाह आटोपल्यानंतर संजय दत्त "किडनॅप' या चित्रपटाच्या चित्रपटासाठी लगोलग मुंबईला रवाना झाला.
"संजय दत्त, घोगळ, मडगाव
मान्यता - आके आल्त'
खोट्या पत्त्यांमुळे नवा वाद
मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी)- संजय दत्त व मान्यताने विवाहाची गोव्यात कायदेशीर नोंदणी केली असली, तरी दोघांनीही आपल्या तात्पुरत्या वास्तव्याचे खोटे पत्ते दिल्याने ही नोंदणी वैध कशी ठरू शकते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संजय दत्त व मान्यता यांनी गेल्या ७ रोजी विवाहनोंदणी केली. विवाहनोंदणी कायद्यानुसार गोव्यात दोन टप्प्यांत ही नोंदणी केली जाते. अद्याप केवळ पहिल्या टप्प्यातील नोंदणी झालेली असून दुसऱ्या टप्प्यातील होणे बाकी आहे. संजय दत्तने आपण घोगळ, मडगाव येथील असल्याचा पत्ता विवाह नोंदणीसाठी केलेल्या अर्जात नोंदवला आहे. मान्यता हिचे नाव "दिलनशील अहमद शेख' असे देण्यात आले असून तिचा पत्ता आके - आल्त, मडगाव असा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोघेही तेथील रहिवाशी असल्याचा दाखला तलाठ्याने दिला आहे.
या विवाहनोंदणीसाठी अधिकाऱ्यांनाच हॉटेलवर बोलावले गेले होते असे सांगितले जात आहे. ते खरे असेल तर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणासारख्या गंभीर मामल्यातील आरोपी असलेल्या संजय दत्तच्या विवाह नोंदणीसाठी सरकारी अधिकारी हॉटेलवर कसे गेले असा प्रश्नही निर्माण होत आहे. शिवाय विवाहनोंदणीसाठी केलेल्या अर्जातील माहिती खरी असणे बंधनकारक आहे. मग अर्जातील पत्ते हे खोटे असल्याचे उघडउघड दिसून येत असताना हे खोटे पत्ते तलाठ्याने ग्राह्य कसे धरले, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या विवाहाची पहिली नोंदणी झाली असल्याने मडगाव विवाहनोंदणी कचेरीच्या फलकावर नागरिकांच्या हरकती मागवणारी सूचना लावली गेली आहे. एखाद्या जागृत नागरिकाने खोट्या पत्त्यांना हरकत घेतली, तर संजय - मान्यताची विवाह नोंदणीच नव्हे, तर नोंदणी करून घेणारे अधिकारीही पेचात येऊ शकतात.
एमपीटीविरोधात वास्कोत कडकडीत बंद
वास्को, दि.११ (प्रतिनिधी) - मुरगाव पोर्ट ट्रस्टतर्फे होत असलेल्या कथित सतावणुकीच्या निषेधार्थ मुरगाव बचाव अभियानतर्फे पुकारण्यात आलेल्या वास्को बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सदर अभियानने मागण्यांचे निवेदन एमपीटीला सादर केले होते. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वेळेत बंदर व्यवस्थापनाकडून काहीच हालचाली न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला.
आज सकाळपासून सर्वत्रच या बंदची छाया दिसत होती. वास्कोतील गोम्स मार्ग, बायणा, सडा व इतर भागातील सर्व दुकाने बंद होती. भाजी मार्केट, मासळी मार्केटही बंद होते. सडाहून वास्कोला येणाऱ्या मिनी बसेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. खारीवाडा मछिमारी जेटीजवळील सुमारे २०० मच्छीमारी नौका बंद ठेवण्यात आल्या होत्या. एमपीटीच्या जलवाहतुकीचा मार्गही पाण्यात ट्रॉलर व लॉंचेस नांगरून ठेवून बंद पाडला गेला.
यावेळी सडा येथील एमपीटीच्या कार्यालयावर सुमारे ३००० नागरिकांनी मोर्चा नेला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी प्रवीण अगरवाल यांच्याविरुध्द घोषणा दिल्या गेल्या व त्यांचा पुतळा तयार करून त्याची विटंबना करण्यात आली. या दरम्यान काही काळ वातावरण तणावाचे बनले, मात्र अनुचित प्रकार घडला नाही. शेवटी अगरवाल यांचे काहीही म्हणणे न ऐकता आंदोलन चालूच ठेवण्याचे जाहीर करून आंदोलक निघून गेले.
या आंदोलनात अनुचित प्रकार घडला नाही मात्र वास्कोहून सडा येथे जात असलेल्या कदंब बसवर दगडफेक करण्यात आली. या बंद व मोर्चामध्ये मुरगावचे आमदार मिलिंद नाईक तसेच पक्षाचे कार्यकर्ते व मुरगाव पालिकेतील नगरसेवकही या मध्ये सामील होते. या बंदमुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता.
जनतेला विश्र्वासात घेऊनच
पावले उचलू ः अगरवाल

वास्को, दि. ११ (प्रतिनिधी)- मुरगाव बंदराचा विकास होणे गरजेचे आहे, मात्र येथील जनतेला विश्र्वासात घेतल्याशिवाय एमपीटीने कोणतेही पाऊल आजवर उचललेले नाही व यापुढेही उचलणार नाही, अशी ग्वाही एमपीटीचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
एमपीटीच्या विस्तारासाठी खारीवाडा मच्छीमारी जेटीची जागा गरजेची असून तेथील मच्छिमारांना हलवण्यासाठी पूर्वी सांत जासिंतो व चिखली येथे जागा पाहिली होती. मात्र, जनतेने त्याला विरोध केल्याने सरकारने त्याला नकार दिला. नंतर वाडे येथे जेटी उभारण्याचा विचार होता, परंतु येथेही जनता विरोध करीत असून कोणाला मच्छिमारांच्या हिताची पर्वा नसल्याचे अगरवाल म्हणाले.
अजूनपर्यंत मच्छीमारी ट्रॉलर मालकांना एमपीटीनेच सुविधा पुरवल्या असून नवीन जागी जेटी उभारण्यासाठी त्यांच्याचकडून पैसे खर्च केले जाणार असल्याचे श्री. अगरवाल पुढे म्हणाले. खारीवाडा येथील जेटीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल व जोवर एमपीटी दुसरी तजवीज करीत नाही, तोपर्यंत येथील मच्छिमारांना हटवले जाणार नाही, अशी ग्वाहीही अगरवाल यांनी दिली.
हार्बर येथील खुरीस हलवण्याचा निर्णय एमपीटीने घेतला असल्याचे काही वृत्तपत्रांनी दिलेले वृत्त ही निव्वळ अफवा असल्याचे ते म्हणाले.
आंदोलकांनी कायदा हातात घेऊन एमपीटीचे दोन ट्रॉलर समुद्रात बुडवल्याचा आरोप अगरवाल यांनी केला.आंदोलन सुरूच राहील ः सायमन
आंदोलन सुरूच राहील अशी माहिती मुरगाव बचाव अभियानचे प्रवक्ते सायमन परेरा यांनी "गोवादूत'ला दिली. एमपीटीचे ट्रॉलर आंदोलकांनी बुडवले या आरोपात काही तथ्य नसल्याचे ते म्हणाले.
बेपत्ता अनिशाचा मृतदेह
तिच्याच घरात आढळला

खुनाच्या कारणाबाबत गूढ
सावर्डे, दि. ११ (प्रतिनिधी)- गेल्या आठ फेब्रुवारी रोजी राहत्या घरातून कथित अपहरण झालेल्या खाणीवाडा - कुडचडे येथील अनिशा केसापूरकर या एक वर्ष वयाच्या बालिकेचा मृतदेह तिच्या राहत्या घराच्या एका कोपऱ्यात कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे.
शुक्रवारी, ८ रोजी अनिशाची आई घरी साडीच्या झोळीत मुलीला ठेवून शेजारी घरकामाला गेली होती. वडीलही सकाळी उठून रोजच्याप्रमाणे कामाला निघून गेले होते. आई घरी परतली असता झोळीत मुलगी नसल्याचे आढळले. त्यामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या सांगण्यानुसार, तिच्या आईने कुडचडे पोलिस स्थानक गाठले व मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. निरीक्षक निलेश राणे यांनी शोधकामास सुरुवात केली होती. मात्र, अपहरणासंबंधी कोणतेच धागेदोरे हाती लागले नव्हते. मात्र, आज अनिशाचा मृतदेह तिच्याच घरी अडगळीच्या जागी कोपऱ्यात आढळून आल्याने गूढ निर्माण झाले आहे. तिचे वडील अर्जुन हे गेले तीन दिवस पोलिसांसमवेत अनिशाचा शोध घेत होते.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास आईला आपल्याच घरात मृतदेह असल्याचे आढळून आले. अनिशा बेपत्ता झाली त्याच दिवशी तिने घातलेल्या स्वेटरवरून तिला ती अनिशाच असल्याची खात्री पटली. कुडचडे पोलिसांनी श्र्वानपथक आणून शोध घेतला, पण खुनाबाबत विशेष धागेदोरे हाती लागू शकले नाहीत. श्र्वान "रामा' याने घराच्या चारी बाजूंनी फेरी मारली, पण कोणताच पुरावा आढळला नाही. वास्तविक घटनेची माहिती सकाळी साडे आठ वाजता कुडचडे पोलिसांना मिळाली होती. श्र्वानपथक येण्यास मात्र संध्याकाळचे तीन वाजले.
जेथे ही दुर्घटना घडली, तेथे दाटीवाटीने छोटी छोटी घरे आहेत. गेले तीन दिवस अनिशाचा मृतदेह तेथेच होता की तिचा अन्यत्र खून करून नंतर तो तेथे आणून ठेवला गेला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. जेथे मृतदेह सापडला तेथेच चूल आहे व अनिशाची आई तेथे काम करत असते. मग तिच्या नजरेस तिचा मृतदेह दोन दिवस कसा पडला नाही, असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे.
आज संध्याकाळी पाचच्या सुमारास पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवण्यात आला.

Monday 11 February, 2008

छुपा कॅमेरा बसविणाऱ्या
कापड दुकानदारास अटक

पणजी, दि. 10 (प्रतिनिधी) - कपड्याच्या दुकानात कपडे बदलण्याच्या खोलीत छुपा कॅमेरा बसवून नेत्रसुख घेणाऱ्या नेल्सन डायस या दुकानमालकाला आज जुने गोवे पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेच्या लक्षात आल्याने तिने दुकानाच्या मालकाविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भा.द.स 509 नुसार तक्रार दाखल करून घेतली आहे.
सांताक्रुज येथील "दुबई शॉपी' कपड्याच्या दुकानात आज सायंकाळी पर्यटनासाठी आलेले एक जोडपे कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्या महिलेने कपडे बदलणाऱ्या खोलीत दोन वेळा जाऊन कपडे बदलले होते. तिसऱ्यावेळी ती कपडे बदलण्यासाठी गेली असता, त्या खोलीच्यावर छुपा कॅमेरा बसवण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी तिने गोंधळ करून आपल्या पतीला याची माहिती दिली. त्या कॅमेरातून दिसणारे सर्व चित्र एका टीव्हीवर दिसत असल्याचे उघड झाल्यानंतर याची त्वरित पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडे यांनी स्वतः भेट देऊन त्या दुकानाची पाहणी करून मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बॉम्बस्फोटांचा कट दुधसागरला शिजला!
"सिमी'चे अदनान हेच सूत्रधार

पणजी, दि. 10 (प्रतिनिधी) - कळंगुट येथे बॉम्बस्फोट करण्याचा कट "दुधसागर' येथील जंगलात आखण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती हैद्राबाद येथे पकडण्यात आलेल्या लष्करे तोयबाच्या दहशतवाद्याकडून उघड झाली आहे. अयशस्वी ठरलेल्या या संपूर्ण कटाची आखणी हुबळी येथे शेवटच्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मोहमद आसीफ ऊर्फ रशिउद्दीन घौस याने केली होती. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी आसीफ याला गोव्यात आणले होते. कर्नाटक पोलिस आता या कटाची संपूर्ण जुळवाजुळव करण्याच्या कामाला लागले आहेत. यावेळी गोव्यात काही धागेदोरे कर्नाटक पोलिसांच्या हाती लागले असले तरी, पोलिसांनी त्या विषयीची कोणतीच माहिती उघड केलेली नाही.
या कटामागील मुख्य सूत्रधार "सिमी'संघटनेचा निमंत्रक अदनान असल्याची माहिती होनाळी येथे अटक केलेल्या दहशतवाद्याने उघड केली आहे. नासीर व आसीफ या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच अदनान हा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत आहे. अदनान याने कर्नाटक व गोव्यात साखळी बॉम्बस्फोट करण्याची योजना आखली होती आणि आम्ही फक्त त्याच्या आदेशाचे पालन करीत होतो, अशी माहिती दोघांनी उघड केली आहे. अदनान त्या दिवसापासून भूमिगत झाला आहे.
नासीर याची "लाय डिटेक्टर' मधून चाचणी गेल्यानंतर त्याने अनेक धक्कादायक माहिती उघड केली आहे. अदनान हा अनेक "एके47' रायफल बाळगतो. त्याचे काका बंगळूर येथे सरकारी अधिकारी असल्याने तो अनेकवेळा बंगळूरला ये-जा करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी हुबळी येथून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बॉम्बस्फोटांचा कट दुधसागरला शिजला!
"सिमी'चे अदनान हेच सूत्रधार

पणजी, दि. 10 (प्रतिनिधी) - कळंगुट येथे बॉम्बस्फोट करण्याचा कट "दुधसागर' येथील जंगलात आखण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती हैद्राबाद येथे पकडण्यात आलेल्या लष्करे तोयबाच्या दहशतवाद्याकडून उघड झाली आहे. अयशस्वी ठरलेल्या या संपूर्ण कटाची आखणी हुबळी येथे शेवटच्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मोहमद आसीफ ऊर्फ रशिउद्दीन घौस याने केली होती. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी आसीफ याला गोव्यात आणले होते. कर्नाटक पोलिस आता या कटाची संपूर्ण जुळवाजुळव करण्याच्या कामाला लागले आहेत. यावेळी गोव्यात काही धागेदोरे कर्नाटक पोलिसांच्या हाती लागले असले तरी, पोलिसांनी त्या विषयीची कोणतीच माहिती उघड केलेली नाही.
या कटामागील मुख्य सूत्रधार "सिमी'संघटनेचा निमंत्रक अदनान असल्याची माहिती होनाळी येथे अटक केलेल्या दहशतवाद्याने उघड केली आहे. नासीर व आसीफ या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच अदनान हा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत आहे. अदनान याने कर्नाटक व गोव्यात साखळी बॉम्बस्फोट करण्याची योजना आखली होती आणि आम्ही फक्त त्याच्या आदेशाचे पालन करीत होतो, अशी माहिती दोघांनी उघड केली आहे. अदनान त्या दिवसापासून भूमिगत झाला आहे.
नासीर याची "लाय डिटेक्टर' मधून चाचणी गेल्यानंतर त्याने अनेक धक्कादायक माहिती उघड केली आहे. अदनान हा अनेक "एके47' रायफल बाळगतो. त्याचे काका बंगळूर येथे सरकारी अधिकारी असल्याने तो अनेकवेळा बंगळूरला ये-जा करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी हुबळी येथून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
डच्चू मिळणारा मंत्री कोण?आज घोषणा
सत्ताधारी पक्षात वादळ घोंगावतेय!
पणजी, दि. 10 (प्रतिनिधी) - "कोणाला मंत्रिमंडळातून वगळावे याची आम्ही अद्याप चर्चा करत असून उद्या सकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत डच्चू देण्यात येणाऱ्या विद्यमान मंत्र्यांचे नाव जाहीर करतील, असे निवेदन कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक बी.के.हरिप्रसाद यांनी आज गोव्यातील नेत्यांच्या बैठका घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले. त्यामुळे दिगंबर कामत यांचे आठ महिन्यांचे सरकार वाचवण्यासाठी बळी जाणाऱ्याचे नाव उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. परवाच गोव्यात येऊन समन्वय समितीची बैठक घेतलेले पक्षाचे निरीक्षक बी.के. हरिप्रसाद काल संध्याकाळी पुन्हा गोव्यात दाखल झाले आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री कामत, प्रदेश अध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन व अन्य नेत्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत वीज मंत्री आलेक्स सिक्वेरा व नगर विकास मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या नावाचा विचार झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यातील एका नावावर उद्या सकाळी शिक्कामोर्तब होणार आहे. दुसऱ्या बाजूने लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या, अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या गटाने कॉंग्रेसवर दबाव घालण्यास सुरुवात केली आहे.
दोघेही आलेमाव बंधू मंत्रिमंडळात असल्याने ज्योकीम आलेमाव यांना त्याग करणे भाग पडणार आहे. त्यांनी तसे न केल्यास वीज मंत्री म्हणून आलेक्स सिक्वेरा हे असमर्थ ठरल्याचे कारण पुढे करून त्यांच्यावर मंत्रिपदाचा त्याग करण्यासाठी दबाव टाकला जाणार आहे.
उद्यापर्यंत एकाला वगळून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेण्याची सर्व तयारी झाली झाली आहे. श्री. ढवळीकर यांना सामावून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सध्याच्या घडामोडीनुसार श्री. ढवळीकर यांना घ्यायचे जवळजवळ निश्चित झाल्याने गृहमंत्री रवी नाईक यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच ढवळीकरांच्या आगमनाने राणेंचा गट शक्तिशाली होणार असल्याने अर्थ मंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांचीही चलबिचल सुरू झाली आहे. उद्या कॉंग्रेसच्या मंत्र्याला डच्चू दिल्यानंतर नेतृत्व बदलाची मागणी जोर धरेल, असे चित्र आहे. ऍड. नार्वेकर व श्री. नाईक यांनी त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिगंबर कामत यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.
एमपीटीच्याविरोधात
आज वास्को बंद
समुद्रातील उलाढालही ठप्प

वास्को, दि. 10 (प्रतिनिधी)- कोळसा प्रदूषण आणि विस्तारवादी धोरण यांच्यासंबंधात केलेल्या मागण्या मुरगाव पोर्ट ट्रस्टकडून (एमपीटी) दिलेल्या मुदतीत पुऱ्या न झाल्याने आज मध्यरात्रीपासून समुद्रातील सर्व व्यवसाय तसेच वास्को बंद ठेवण्याचा निर्णय मुरगाव बचाव अभियानाने आज तातडीच्या बैठकीत घेतला. मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या मनमानीचा निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन लढा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या "मुरगाव बचाव अभियान' ने दिलेल्या बंदच्या हाकेमुळे सोमवारी वास्कोतील सर्व दुकाने तसेच मासळी व भाजी मार्केट बंद राहणार असून एमपीटीकडून होणाऱ्या कोळसा व्यापारावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुरगाव पोर्ट ट्रस्टचे चेअरमन प्रवीण अगरवाल यांची तातडीने उचलबांगडी करावी तसेच ट्रस्टवर गोमंतकीयांची बहुसंख्या असावी, अशाही मागण्या अभिनानाने आता केल्या आहेत. 5 जानेवारी रोजी 14 संघटनांनी एकत्र येऊन एमपीटीच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी "मुरगाव बचाव अभियान' स्थापन केले होते. या 14 संघटनांमध्ये बार्ज मालक (अखिल गोवा) संघटना, अखिल गोवा मच्छिमार नौका संघटना, लॉन्च मालक संघटना, वाडे एक्शन समिती व इतरांचा समावेश आहे. मुरगाव बचाव अभियान स्थापन करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे मुरगाव बंदर प्राधिकरणाला सादर करण्यात आल्याची माहिती अभियानाचे प्रवक्ते सायमन पेरेरा यांनी दिली व तीन दिवसांच्या आत यावर लक्ष घालण्यास न आल्यास त्यांना रस्त्यावर उतरण्याची पाळी येणार असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आल्याचे पेरेरा यांनी सांगितले. निवेदन देऊन तीन दिवस पूर्ण (आज मध्यरात्री) होत असले तरी एमपीटीकडून थोडीही हालचाल न झाल्याने आज मध्यरात्रीपासून गोव्यातील समुद्रात होणारा सर्व व्यवसाय बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून अभियानात असलेल्या सर्व संघटनांनी त्यास मान्यता दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे आमच्या अभियानाला वास्कोतील मच्छिमार्केटातील विक्रेत्यांनी, भाजी विक्रेत्यांनी व येथील दुकान मालकांनी पाठिंबा दर्शविला असून 100 टक्के वास्को बंद राहण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुरगाव बचाव अभियानातर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात मुरगाव पोर्ट ट्रस्टने कोळसा हाताळणे पूर्णपणे बंद करावे, सडा हार्बर येथे असलेल्या (1922) खुर्साला हात न लावणे, वाडे येथे मच्छिमारी जेटी न होणे तसेच इतर काही मागण्या ठेवलेल्या असून सर्व मागण्या पूर्ण न होईपर्यंत मुरगाव बचाव अभियान गप्प बसणार नसल्याचे सायमन यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले. आज संध्याकाळी या विषयावर अधिक माहिती घेण्यासाठी खारीवाडा मच्छिमारी जेटीवर भेट घेतली असता सुमारे 350 हून अधिक मच्छिमारी नौका येथे काळे झेंडे लटकावून उभ्या ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तसेच मच्छिव्यवसायात असलेल्या वाहनांना काळे झेंडे लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे वास्कोतील मच्छिमार्केट, भाजी मार्केट व इतर दुकाने बंदात सहभागी होणार असल्याचे त्यांच्याशी संपर्क केला असता सांगण्यात आले.
या विषयावर अखिल गोवा मच्छिमारी बोट मालक संघटनेचे अध्यक्ष रोनी डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता आज रात्री 12 पासून बंदला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वास्कोवासीयांना सतावत असलेले कोळसा प्रदूषण व आमच्यावर केले जाणारे अत्याचार जोपर्यंत थांबत नाहीत व आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुरगाव बचाव अभियान मागे सरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. खारीवाडा (वास्कोतील) येतील 350 मच्छिमारी नौका, बेतुल येथील 150 मच्छिमारी नौका तसेच इतर भागातील सुमारे अन्य 100 मच्छिमारी नौका त्याचबरोबर 160 बार्जेस व 35 लॉन्चेसनी आपला व्यवसाय बंद केल्याचे रोनी यांनी सांगून सकाळपर्यंत बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, आज उशिरा संध्याकाळी खारीवाडा जेटीवर या अभियानाच्या काही सदस्यांकडून गुप्त बैठक घेण्यात आली असून मुरगाव बंदरातील होणारा व्यवसाय बंद टाकण्याचे त्यांच्याकडून ठरविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून कोळसा घेऊन जाणारे ट्रक व इतर (कोळसा घेऊन जाणारी) वाहने रोखण्यात येणार असल्याचे सांगितले. सोमवारी होणाऱ्या या बंदामधून तणापूर्वक वातावरण होण्याची एकंदरीत भीती वास्कोवासियांमध्ये व्यक्त केली जात असल्याने जास्तीत जास्त दुकाने तसेच शहरातील बस सेवा बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हजारोंच्या उपस्थितीत
बाबांना अखेरचा निरोप

नागपूर, दि. 10 - बाबा तुम्हारे सपनों को मंझील तक पहुंचाएंगे, बाबा आमटे अमर रहे , जातपात के बंधन तोडो, भारत जोडो भारत जोडोच्या घोषणांच्या निनादात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हजारो चाहत्यांनी साश्रुनयनांनी मानवतेचा महामेरू बाबा आमटेंना अखेरचा निरोप दिला. आनंदवनातील अनाथ कुष्ठरोग्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तयार केलेल्या शांतीधाम या स्मशानभूमीत अनाम कुष्ठरूग्णाच्या समाधीसमोरच बाबांनी आज सकाळी 11 वाजता चिरविश्रांती घेतली. मृतदेहाला जाळण्यासाठी लागणाऱ्या लाकडात हजार माणसांचा स्वयंपाक होऊ शकतो अशी व्यवहारी भूमिका घेणाऱ्या या पर्यावरणवाद्याला त्याच्या अंतिम इच्छेनुसार दहन न करता जमिनीत पुरुन समाधी देण्यात आली.
बाबा आमटे यांचे काल पहाटे निधन झाले होते. आज सकाळी त्यांचा अंत्यसंस्कार होणार हे जाहीर झाल्यामुळे पहाटेपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. आनंदवनातील त्यांच्या निवासस्थानी तयार केलेल्या आय.सी.यु.मध्येच त्यांचे निधन झाले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह त्या कक्षाबाहेर आणून निवासस्थानासमोरच्या चौथऱ्यावर आणून ठेवण्यात आला. त्यांचा अंत्यसंस्कार संपूर्ण शासकीय इतमामाने होणार असल्याने त्यांचे पार्थीव राष्ट्रध्वजात गुंडाळून ठेवण्यात आल्यावर नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी श्रीमती साधनाताई आमटे, पुत्र डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश, मानसपुत्र ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार, सुहृद प्राचार्य राम शेवाळकर प्रभृती पार्थीवाजवळ बसले होते. यावेळी अनेक बायाबापड्यांना अंत्यदर्शन होतांना शोक आवरत नव्हता. याठिकाणी व्यवस्थेत असलेले आनंदनिकेतन महाविद्यालयातील एन.सी.सी.चे विद्यार्थी या शोकमग्न चाहत्यांना समजावून बाजूला करून रांगेला वाट करून देत होते. अंत्यदर्शन झाल्यावर आलेले नागरिक इतस्तत: उभे होते. एरवी चैतन्याने फुललेल्या आनंदवनात आज गर्दी असली तरी त्यावर दु:खाची गडद छाया जाणवत होती.
सकाळी साडेनऊच्या सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आनंदवनात पोहोचले. बाबांच्या पार्थीवावर पुष्पांजली अर्पण केल्यावर त्यांनी आमटे परिवाराचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.
एका सजवलेल्या वाहनावर बाबांचा पार्थीव देह ठेवण्यात आला. मृतदेहासोबत बाबांचे पुत्र डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, नातू डॉ. दिगंत, डॉ. कौस्तुभ आणि अनिकेत, नात डॉ. शीतल सुन डॉ. पल्लवी, प्रभृती उभे होते. या वाहनामागे बाबांचे चाहते पायी चालत होते. बाबांच्या निवासस्थानासमोरून निघालेली ही अंत्ययात्रा आनंदवन ग्रामपंचायत कार्यालय चौकातून मुक्तांगण मार्गे शांतीधामकडे निघाली. बाबांचे निवासस्थान असलेले गोकुल ते शांतीधाम हे सुमारे 1 किलोमीटरचे अंतर पार करून अंत्ययात्रा शांतीधामात पोहोचली. यावेळी बाबा आमटेंचे चाहते त्यांच्या स्मरणात घोषणा देत होते. शांतीधाममध्ये अंत्ययात्रा पोहोचल्यावर बाबांचा पार्थीव देह शांतीधामात उभारलेल्या एका चौथऱ्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री हाजी अनीस अहमद सार्वजनिक बांधकाम मंत्री अनिल देशमुख, कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यसभा सदस्य खा. एकनाथ ठाकुर, भा.ज.प. प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी आ. संजय देवतळे, आ. जैनुद्दीन झवेरी, आ. ए.क्यु.झामा, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. विजय वडेट्टीवार, आ. दिवाकर रावते, निवृत्त न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ख्यातनाम विधिज्ञ ऍड. श्रीहरी अणे, खनिज विकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश वारजुकर, विभागीय आयुक्त आनंद लिमये, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत सावरकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण प्रभृतींनी पुष्पहार अर्पण करून बाबांना आदरांजली अर्पण केली. यावेळी पोलीस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून बाबांना मानवंदना दिली. त्यानंतर बॅंडवर रिट्रीटचे सूर आळवण्यात आले. नंतर बाबांचे पार्थीव राष्ट्रध्वजातून बाजूला काढून बाबांच्या इच्छेनुसार केळीच्या पानात गुंडाळून त्यांच्या कुटुंबियांनी चौथऱ्याबाजुलाच खणलेल्या खड्डयात ठेवले. नंतर हा खड्डा मिठाने आणि मातीने भरण्यात आला. अनाम कुष्ठरोग्याच्या समाधीस्थळाजवळच बाबांना चिरविश्रांती देऊन उपस्थित सर्वजण जड अंत:करणाने परतले.
बाबांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आज या परिसरात सुमारे 15 ते 20 हजार नागरिक पोहोचले होते. तयात महिलाही मोठ्या संख्येत होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी शांतीधाम परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
यावेळी माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक धवड, डॉ. रूपा कुळकर्णी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sunday 10 February, 2008

आणखी सहा क्रशरना सील
मडगाव, दि.9 (प्रतिनिधी) - मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जाहीर केलेल्या आदेशानुसार काल नेसाय भागातील बेकायदा खडी फोडणाऱ्या 32 क्रशरांचा जिल्हाधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडीत करून ते बंद पाडले होते, आज सालझोरा येथील सहा व सां जुझे आरियल येथील क्रशरचे काम बंद पाडले.
54 क्रशरांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आलेली होती. पण 15 क्रशर मालकांकडे कायदेशीर परवाने असल्याने ते बंद पाडण्यात आले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य, मामलेदार परेश फळदेसाई, मायणा कुडतरी पोलिसांच्या संरक्षणात वीज खात्याच्या अभियंत्यांना बरोबर घेऊन त्यांचा वीजपुरवठा तोडून टाकला.
वरील भागांत बेकायदा खडी फोडीत असल्यामुळे धूळ, ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या तसेच खडी फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर करून स्फोट घडवून आणत असल्याने घरांना धोका निर्माण झाला होता. कित्येक घराच्या भिंतीचे तडे गेलेले होते. जिल्हाधिकाऱ्यापासून खाण संचालनालयापर्यंत पर्यंत करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वी बेकायदेशीर क्रशरविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. त्यावर सुनावणी होऊन त्या कारवाया बंद करण्याचा आदेश दिला. त्या खाणी व क्रशर बंद करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली होती. 12 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व पोलिसांनी तो बंद केल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावा, असे गोवा खंडपिठाने एलसी कॉस्ता व इतरांनी सादर केलेल्या याचिकेतील प्राथमिक सुनावणीच्या वेळी दिला. त्यानुसार आज क्रशरवर कारवाई करण्याची मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती.
ज्येष्ठ मानवतावादी समाजसेवक
डॉ.बाबा आमटे यांचे देहावसान

नागपूर, दि. 9 - अंातरराष्ट्रीय ख्यातीचे, ख्यातनाम मानवतावादी समाजसेवक पद्मविभूषण डॉ.मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचे आज पहाटे 4.15च्या सुमारास त्यांचे कर्मभूमी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवन येथे दु:खद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 94 वर्षाचे होते. गत 6 महिन्यांपासून ते रक्ताच्या कर्करोगाने आजारी होते.
बाबांच्यामागे त्यांच्या पत्नी साधना आमटे, दोन मुले डॉ. प्रकाश व डॉ. विकास, मुलगी रेणुका, सुना, जावई, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
गेल्या ऑगस्टमध्येच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नागपुरातील अवंती नर्सिंग होममध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यावेळीच रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर आपल्या आयुष्याचे यशाचे दिवस आनंदवनातच काढायचे आहे, असा आग्रह बाबांनी धरल्यामुळे त्यांना आनंदवनात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे निकटवर्ती डॉ. पोळ त्यांच्यावर इलाज करीत होते. काल रात्रीतून त्यांच्या प्रकृतीने गंभीर वळण घेतले आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यावेळी डॉ. पोळ, बाबा आमटेंचे जावई विलास मनोहर हे त्यांच्याजवळ होते.
बाबांच्या निधनाची बातमी आनंदवन परिसरात लगेचच पसरली आणि शोकाकुल आनंदवनवासियांनी त्यांच्या कक्षाकडे धाव घेतली. वरोरा, चंद्रपूर आणि नागपुरहुनही त्यांचे अनेक सुहृद आनंदवनकडे धावले.बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आणि सुन डॉ. मंदा हे सध्या बाहेरगावी आहेत तर बाबांची नात म्हणजेच डॉ. विकास आमटेंची मुलगी शीतल ही श्रीलंकेत आहे. ही सर्व मंडळी आज रात्री उशीरापर्यंत पोहचत असून उद्या सकाळी बाबा आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवन परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती डॉ. विकास आमटे यांनी दिली.

बाबा आमटे यांच्या निधनामुळे एक कर्मठ समाजसेवक अस्तंगत झाला असून स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर पिढ्यांना जोडणारा एक दुवा निखळला आहे. डॉ. बाबा आमटे यांनी बरेच समाजप्रबोधनाचे लेखन केले असून त्यांचे "करूणेचा कलाम' हे पुस्तक तसेच "ज्वाला आणि फुले' हा काव्यसंग्रह बराच गाजला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना
जमीर यांची माहिती भाजप देणार
सह्यांची मोहीम आजपासून

पणजी, दि. 9 (प्रतिनिधी)- गोव्याचे राज्यपाल एस.सी.जमीर यांच्याकडून विद्यमान दिगंबर कामत सरकार वाचवण्यासाठी कशा पद्धतीने घटनेची व लोकशाहीची थट्टा करण्यात आली याची सप्रमाण कागदोपत्री माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपासून इतर ज्येष्ठ न्यायमूर्तींना पाठवली जाईल, अशी घोषणा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केली.
"जमीर हटाव, गोवा बचाव' आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील व्यापक सह्या मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आज पणजी येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे खासदार माधवराव शिवणकर यांची खास उपस्थिती होती. भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी सर्वांत प्रथम सही करून या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व इतर आमदारांनी या निवेदनावर सह्या केल्या. माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी भाजपने सुरू केलेल्या या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर करून या निवेदनावर आपलीही सही करून भाग घेतला. ही सह्यांची मोहीम भाजपने सुरू केली असली तरी हे निवेदन पक्षाच्या नावावर नसून नागरिकांच्या नावाने पाठवले जाणार आहे. या मोहिमेला राज्यातील सर्व स्वाभिमानी गोमंतकीयांनी पाठिंबा दर्शवून जमीर यांच्या अलोकशाही पद्धतीला पूर्णविराम देण्याचे आवाहन श्रीमती काकोडकर यांनी केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना पर्रीकर म्हणाले की या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती प्रतिभा पाटील,पंतप्रधान यांना पाठवले जाईल. जमीर यांच्या कार्यपद्धतीबाबत विधानसभा कामकाजाची सर्व कागदपत्रेच न्यायाधीशांना पाठवून कशा पद्धतीने राजकीय पाठिंब्याच्या बळावर घटनेची फजिती सुरू आहे, याची सखोल माहिती देणारे खास पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पाठवण्याची तयारीही भाजपने केल्याचे ते म्हणाले.
प्रत्यक्षात 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यान, ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाणार असून किमान पाच लाख नागरिकांच्या सह्या मिळवल्या जातील,असेही पर्रीकर म्हणाले. या मोहिमेला पाठिंबा दर्शवण्यासाठी केंद्रातून अरुण शौरी, अरुण जेटली, रवी शंकर प्रसाद व सिध्दू आदी नेते सहभागी होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या दिवसांत सुमारे 150 सभा घेण्यात येणार असून पहिल्यांदाच भाजप राज्याच्या सर्व चाळीसही मतदारसंघात या आंदोलनाच्या निमित्ताने पोहचल्याचे पर्रीकर म्हणाले.
पुरवण्या मागण्यांना मान्यता न देता केवळ अधिसुचनेव्दारे आपत्कालीन निधीत वाढ करून सरकारने जो गोंधळ घातला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सध्या सरकारचे सर्व आर्थिक व्यवहार घटनाबाह्य व बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला. विधानसभा संस्थगित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा कोणताही पुरावा सरकारकडे नसून ही उघडपणे लोकशाहीची थट्टा सुरू असल्याची टीका पर्रीकर यांनी केली. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज पूर्ण न होता ती संस्थगित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
साखळीच्या पित्रे कुटुंबीयांना
कणकवलीत अपघात, एक ठार

साखळी, दि. 9 (वार्ताहर)- कणकवली वागदेपूलावरून सुमारे 20 मीटर खाली वाहन कोसळल्याने साखळी विठ्ठलापूर येथील श्रीमती आनंदी ऊर्फ शीला पित्रे (62) यांचे जागीच निधन झाले तर अन्य पाच जण जखमी होण्याची घटना आज घडली.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या गोवा शाखेचे अध्यक्ष रमापती पित्रे हे आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूरला देवदर्शनासाठी जात होते. कालच नवे "मारुती 800' (जीए.04-सी-0627) हे वाहन खरेदी केल्याने देवदर्शनाचा हा कार्यक्रम त्यांनी आखला होता. आज सकाळी सुमारे पावणे नऊ वाजता त्यांचे वाहन गोवा-मुंबई महामार्गावरील वागदे पुलाजवळ पोहचले असता समोरून भरधाव वेगात आलेल्या सुमो जीपला बाजू देण्याच्या नादात वाहनावरील ताबा गेल्याने त्यांचे वाहन सुमारे 20 मीटर दरीत कोसळले. या अपघातात रमापती पित्रे यांच्या आई आनंदी ऊर्फ शीला केशव पित्रे यांचे जागीच निधन झाले तर रमापती पित्रे, स्नेहा र. पित्रे , पांडुरंग ऊर्फ राजेश पित्रे, साक्षी पांडुरंग पित्रे व कुमार कुशाग्रह पांडुरंग पित्रे (4) आदी जखमी झाले. रमापती यांच्या पत्नी स्नेहा पित्रे या वाहन चालवत होत्या. त्यांनाही जबर मार बसल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली.
या अपघाताचे वृत्त कळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपजिल्हारूग्णांलयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तिथून त्यांना लगेच गोव्यात गोमेकॉत उपचारासाठी पाठवण्यात आले. स्नेहा पित्रे यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून उर्वरितांना उपचाराअंती घरी पाठवण्यात आले.
श्रीमती आनंदी पित्रे यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,अशी माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे यशवंतराव विद्यापीठाचे सगळे वर्ग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
किडनी घोटाळा
डॉ. अमितला
भारतात आणले

नवी दिल्ली, दि. 9 - कोट्यवधी रुपयांच्या किडनी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी डॉ. अमितकुमार याला आज काठमांडूहून इंडियनच्या विमानाने भारतात आणण्यात आले. यावेळी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दिल्लीत आणल्यानंतर त्याला लगेच सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले.
सुमारे पाचशेवर लोकांच्या किडन्या बेकायदेशीरपणे काढणाऱ्या आणि देश-विदेशात त्यांची विक्री करणाऱ्या या "डॉ. हॉरर'ला दक्षिण नेपाळच्या चितवानमधील जंगल रिसोर्टमध्ये गुरुवारी अटक करण्यात आली होती. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्तक्षेपानंतर नेपाळ सरकारने आज सायंकाळी त्याला सीबीआयच्या स्वाधीन केले. यानंतर लगेच त्याला इंडियनच्या आयसी-814 या विमानाने दिल्लीकडे आणण्यात आले. या विमानात त्याच्यासोबत सीबीआयचे तीन अधिकारी होते. मीडियाच्या प्रतिनिधींना मात्र विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.
तत्पूर्वी आज सकाळी त्याने नेपाळ अधिकाऱ्यांच्या चौकशीत कबूल केले की, भारतात 350 किडन्यांचे बेकायदेशीरपणे प्रत्यारोपण केले. प्रत्येक किडनी प्रत्यारोपणात आपण तीन ते चार लाख रुपये कमावले असून, काठमांडूतही रुग्णालय स्थापन करण्याची आपली योजना होती.
दरम्यान, गुडगावहून काठमांडूत कायमचे वास्तव्य करण्याची आपली योजना असल्याचे त्याने सुमारे 36 तास चाललेल्या चौकशीत सांगितले. यासाठी काठमांडूत एक अतिथीगृह खरेदी करण्याचाही आपण प्रयत्न केला. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी मला अटक केली, असेही तो म्हणाला.
सीबीआय मुख्यालयात त्याला आणण्यात आले असता मुख्यालयाला कडेकोट सुरक्षा देण्यात आली होती. सीबीआयने त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून, आरोप सिद्ध झाल्यास त्याला किमान दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
नेपाळ सरकार आज त्याला न्यायालयात हजर करणार होते आणि त्याच्याविरुद्ध खटलाही भरणार होते. पण, भारत सरकारच्या विनंतीतील गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळने त्याला तातडीने सीबीआयच्या स्वाधीन केले.