Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 21 February, 2009

बेकायदा कॅसिनो हटवाच, सरकारला १५ मार्चपर्यंत मुदत; अन्यथा भाजपचे तीव्र आंदोलन, पर्रीकर यांचा खणखणीत इशारा

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): भ्रष्ट कॉंग्रेस सरकारने येत्या चार आठवड्यांत मांडवी नदीत बेकायदा नांगर टाकून असलेले कॅसिनो हटवावेत; अन्यथा या कॅसिनोंविरोधात भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन छेडणार असून त्यानंतर उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना सरकारच पूर्णपणे जबाबदार असेल, असा खणखणीत इशारा आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला. या कॅसिनोंविरोधात चार आठवड्यांत सरकारने ठोस कारवाई न केल्यास येत्या १५ मार्चनंतर थेट कृती केली जाईल, असेही पर्रीकर यांनी बजावले.
ते आज येथे पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर लोकसभेचे दक्षिण गोवा उमेदवार ऍड. नरेंद्र सावईकर, फार्तोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक, मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी मंत्री विनय तेंडुलकर उपस्थित होते.
कोट्यवधींचा घोटाळा करून या कॅसिनोंना परवानगी देण्यात आली असून सरकारविरोधात न्यायालयात दाद मागण्यास भाजप अजिबात डरणार नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत प्रशासनातील बडे अधिकारी आणि मंत्री अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात रांगा लावून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळेल, असे श्री. पर्रीकर म्हणाले.
मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातूनच कॅसिनोंना परवाने देण्याची सूत्रे हलतात आणि आता कसले कॅसिनो धोरण आखण्याच्या बाता मारता, असा रोखठोक सवाल श्री. पर्रीकर यांनी केला. प्रत्येक कॅसिनोला परवानगी देण्यासाठी ३ ते ४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा करून याविषयीचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
या घोटाळ्यात केवळ गृहमंत्री आणि पर्यटन मंत्री नसून यांच्याबरोबर मुख्यमंत्री व त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी, माजी मुख्य सचिव जे पी. सिंग तसेच दिल्लीतील जकात अधिकारी गुंतले असल्याच दावा यावेळी करण्यात आला. हा दावा केवळ शाब्दिक नसून त्याला ठोस पुराव्यांचा आधार आहे, असे पर्रीकर म्हणाले. या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून जकात न आकारता या जहाजांचा मार्ग मोकळा केला, असा आरोपही त्यांनी केला.
सध्या मांडवीत असलेल्या कॅसिनो जहाजांना नौकानयन महासंचालकांची परवानगी मिळालेली नाही. यातील रॉयल कॅसिनो, महाराजा कॅसिनो, किंग्ज कॅसिनो व गोवा प्राईड हे कॅसिनो मांडवीत बेकायदा नांगरून ठेवले आहेत. तसेच त्यांना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना मिळाला नसल्याचाही दावा यावेळी पर्रीकर यांनी केला. हे कॅसिनो सांडपाणी कुठे सोडतात, असा प्रश्न करून या कॅसिनोंमुळे पाणी व वायुप्रदूषण होत असल्याने त्यांनी
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना घेणे बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.
पॅन इंडिया नेटवर्क इन्फ्रावेस्ट प्रा. लि.' या कंपनीच्या "महाराजा कॅसिनो' सह सध्या मांडवीत "काराव्हेला', "रियो', "प्राईड ऑफ गोवा', "किंग कॅसिनो' व "कॅसिनो रॉयल' हे पाच तरंगते कॅसिनो नांगर टाकून आहेत.
त्याचप्रमाणे पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेल्या कॅसिनोंनी कायदे मोडले असून त्यांच्यावरही कसलीच कारवाई केली जात नाही. याठिकाणी बंदी असलेले डिलिंग गेम, ब्लॅक जोकर, कार्ड गेम्स, असे खेळले जात असून शहरात त्यांचे दलालही फिरत असल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. पणजीत दोन पंचतारांकित हॉटेलना परवानगी नसताना तेथेही कॅसिनो सुरू असल्याचे दावा त्यांनी केला.

मोदी आज गोव्यात

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्या शनिवारी गोव्यात आगमन होत असून यावेळी उत्तर व दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांसाठी खास संमेलनाचे आयोजिण्यात आल्याची माहिती आज विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी दिली.
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मडगाव येथील कॉस्ता मैदानावर तर, दुपारी ४ वाजता म्हापसा येथे बोडगेश्वर मंदिरासमोरील मैदानावर कार्यकर्त्यांचे संमेलन होणार आहे. या संमेलनात ५ ते ६ हजार कार्यकर्ते उपस्थिती लावणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर श्री. मोदी यांची ही पहिलीच गोवा भेट आहे असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
एप्रिलच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणूक घोषित होण्याची शक्यता असून दोन्ही जिल्ह्यांत भाजपने आपले उमेदवार जनतेसमोर ठेवले आहेत. विद्यार्थ्यांना अर्ध्या तिकिटचा हक्क मिळवून देण्यासाठी छेडलेल्या आंदोलनाचे सचिवपद भूषवून या लढ्यात सक्रिय भाग घेतलेले तडफदार उमेदवार ऍड. सावईकर यांच्या रुपाने दक्षिण गोव्यासाठी देण्यात आला आहे; तर उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांची सहा महिन्यांपूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. ऍड. सावईकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थिदशेपासून सक्रिय कार्यकर्ते असून परिषदेचे महामंत्री आणि अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता त्यांना माहिती आहे. तसेच त्यांनी सहकार क्षेत्रात व वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात बहुमोल कामगिरी करून आपला ठसा उमटवल्याचे पर्रीकर म्हणाले.
उत्तर गोवा लोकसभा निवडणूक व कार्यकर्ता संमेलनासाठी मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांना प्रमुख केले आहे, तर दक्षिण गोव्यासाठी आमदार दामोदर नाईक यांची प्रमुख म्हणून निवड केली आहे. या दोघांना आमदार फ्रान्सिस डिसोझा, आमदार विजय पै खोत व माजी आमदार विनय तेंडुलकर साहाय्य करणार आहेत.

पाकमध्ये हल्ल्यात २८ जण ठार

इस्लामाबाद, दि.२० : सध्या हिंसाचाराच्या वणव्यात अडकलेल्या पाकिस्तानात आज एका अंत्ययात्रेदरम्यान आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. यात कमीत-कमी २८ जण ठार झाले असून अन्य १६० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ही घटना वायव्य पाकिस्तानातील डेरा इस्माईल खान या शहरात घडली. आज येथे धर्मगुरू शेर जमां यांची अंत्ययात्रा निघाली. शेर जमा यांची काल अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. आज त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी सामूहिक नमाज अदा केली जात असताना आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून टाकले. या स्फोटात उपस्थितांपैकी २८ जण जागीच ठार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पण, या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा बराच मोठा असावा, असे बोलले जात आहे.
हल्ल्यानंतर लगेचच शहरातील रुग्णालयांसह सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आणि इतरत्र सुरक्षा वाढविण्यात आली. पण, त्याचा फारसा फायदा झाली नाही. कारण लोकांनी स्फोटानंतर ठिकठिकाणी दगडफेक सुरू केली. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनाही नुकसान पोहोचविले. अंत्ययात्रेत आलेल्या लोकांनीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. सरकारी कार्यालये आणि सुरक्षा दलांनाही लक्ष्य बनविण्यात आले. या सर्व प्रकाराने शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आणि लगेचच सर्व बाजारपेठा सामसूम झाल्या. अनेक ठिकाणी लोकांनी गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून डेरा इस्माईल खान शहरात प्रचंड जातीय हिंसाचार बोकाळला आहे. कुख्यात डेरा इस्माईल खान मशीदीत एक स्फोट काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यात एक व्यक्ती ठार तर २० जण जखमी झाले होते. तेव्हापासून शहरात सातत्याने स्फोट होत आहेत. दक्षिण वजीरिस्तानजवळचे हे शहर असून या ठिकाणीही तालिबान्यांचा प्रभाव आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

माजी केंद्रीय मंत्री सुखराम दोषी २४ ला शिक्षा ठोठावणार

नवी दिल्ली, दि. २० : माजी केंद्रीय दळणवळण मंत्री सुखराम यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरविले आहे. त्यांच्यावर ४.२५ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप आहे. त्यापैकी २.४५ कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्या दिल्लीतील घरातून जप्त करण्यात आली होती.
विशेष सीबीआय न्यायाधीश व्ही. के. माहेश्वरी यांनी ८२ वर्षीय सुखराम यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले होते. २४ फेब्रुवारी रोजी सुखराम यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये त्यांना जास्तीत-जास्त सात वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. आजच्या सुनावणीच्या वेळी सुखराम न्यायालयात उपस्थित नव्हते. रोहिणी येथील जिल्हा न्यायालयात सुखराम यांच्यावर आणखी एक गुन्हेगारी खटला सुरू आहे. तेथे उपस्थित राहण्यासाठी आज त्यांच्या वकिलांनी सीबीआय न्यायालयात सुनावणीदरम्यान अनुपस्थित राहण्याची सूट मागितली होती.
लोकसेवक असूनही गुन्हेगारी आचरण असल्याप्रकरणी सीबीआय न्यायाधीशांनी सुखराम यांना दोषी ठरविले. सीबीआय न्यायालयाने म्हटले आहे की, सुखराम यांनी जाहीर केलेल्या स्त्रोतांपेक्षा सुमारे पाच कोटींहून अधिकची संपत्ती मिळविली. सुखराम हे समाजसेवक असूनही त्यांच्याजवळ ५.३६ कोटी रुपयांची चल आणि अचल स्वरूपातील संपत्ती आहे. ते नरसिंहराव मंत्रिमंडळात दळणवळण मंत्री होते. त्यांच्या दिल्ली आणि हिमाचलमधील निवासस्थानांवर सीबीआयने धाड टाकून ३.६१ कोटी रुपये रोख आणि १.२ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले होते. याशिवाय बॅंकांमध्ये ४.२ लाख रुपये आणि घरगुती वस्तूंच्या स्वरूपात १.३ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.
सुखराम यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला होता. आपल्याकडे असणारी रक्कम कॉंग्रेस पार्टीचा निधी असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर लगेचच सीबीआयने याप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव आणि कॉंग्रेसाध्यक्ष सीताराम केसरी यांची चौकशी केली होती. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी सुखराम यांचा दावा फेटाळून लावीत त्यांच्याकडील संपत्ती ही पार्टी फंड नसल्याचे म्हटले होते.

श्रीसाईपादुका आज गोव्यात स्वागताची जय्यत तयारी

--------------------------------
श्रीसाईबाबा पादुका दर्शन
सोहळा विशेष रंगीत पुरवणी
उद्याच्या "गोवादूत'सोबत

--------------------------------
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): श्रीसाईबाबांच्या चावडी पूजनाच्या शताब्दीनिमित्त येथील कांपाल मैदानावर आयोजित श्रीसाईबाबा पादुका दर्शन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, उद्या सायंकाळी ४ वाजता पत्रादेवी येथे मुख्यमंत्री दिगंबर कामत श्रींच्या पादुकांचे स्वागत करतील, अशी माहिती दर्शन सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल खवंटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत समितीचे सचिव दिलीप पालयेकर, खजिनदार विवेक पार्सेकर, श्रीसाईबाबा शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, डॉ. गोंडकर व स्थानिक कार्यकर्ते रवी नायडू उपस्थित होते.
१८५८ ते १५ ऑक्टोबर १९१८ या ६० वर्षाच्या आपल्या कालखंडात साईबाबांनी एकूण ३ पादुकांचा वापर केला. या तिन्ही पादुका सध्या शिर्डी येथील संग्रहालयात दर्शनासाठी ठेवण्यात येतात. दर गुरुवारी त्यांची विधिवत पूजा केली जाते. या पादुका आजपर्यंत फक्त मुंबई येथे १९९१ साली साईभक्तांच्या मनातील गैरसमज दूर व्हावा या हेतूने दर्शनासाठी साई संस्थानाने उपलब्ध करून दिल्या होत्या. आता साईंचे भक्त देशविदेशांत पोहोचत आहे. परंतु अनेक भक्तांना शिर्डीला प्रत्यक्ष येणे शक्य नसते हे लक्षात घेऊन भारताच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. याचा शुभारंभ गोव्यातून होत आहे. हे गोमंतकीयांचे एक अहोभाग्य आहे. अशा या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे विश्वस्त श्री. वाबळे यांनी या परिषदेतून केले.
पादुका रथाचे आगमन व वाटचाल
या पादुकांचे आज २० रोजी शिर्डी येथून पुण्याला प्रयाण झाले असून सायं. ५ वाजेपर्यंत त्या कराड येथे पोहोचतील. त्यानंतर उद्या दि. २१ रोजी दुपारी २ वाजता हा पादुकारथ पत्रादेवी येथे पोहोचेल. त्या ठिकाणी ३ ते ४.३० पर्यंत भजन होईल. ४.३० वाजता मुख्यमंत्री श्री. कामत त्यांचे गोव्याच्या सीमेवर स्वागत करतील. यावेळी हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन धर्मातील प्रत्येकी एक प्रतिनिधी ज्योत पेटवतील. त्यानंतर या पादुकारथाचे ६ वाजता मालपे जंक्शनवर आमदार दयानंद सोपटे व लक्ष्मीकांत पार्सेकर पादुकांचे स्वागत करतील. ६.३० वाजता धारगळ महाद्वारावर पंचायतमंत्री बाबू आजगावकर, ७ वाजता कोलवाळ पुलावर आमदार नीळकंठ हळर्णकर, ७.४५ वाजता करसवाडा जंक्शनवर आमदार फ्रान्सिस डिसोझा व नगराध्यक्ष रुपा भक्ता, ८.१५ वाजता ग्रीन पार्क जंक्शनवर माजी आमदार दिलीप परुळेकर, ८.४५ वाजता पर्वरी आझाद भवनाजवळ आमदार दयानंद नार्वेकर व रात्री ९.३० वाजता पणजीत जुन्या पाटो पुलावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व महापौर टोनी रॉड्रिगिस या पादुकांचे स्वागत करतील.
कार्यक्रमाची रुपरेषा
एकंदरीत कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करताना आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. खवंटे म्हणाले की, या सोहळ्याअंतर्गत प्रसिद्धी, जाहिरात, सजावट, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रथमोपचार, सुरक्षा आदींवर सुमारे ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून सुमारे एक लाख भाविक, दर्शनार्थींचा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन संपूर्ण तयारी केली आहे. यासाठी एकाचवेळी मैदानावर २५ हजार लोक वावरू शकतील व मंडपात १० हजार लोक सहज मावतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्या दिवशी दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाची व्यवस्था असून सुमारे ३५ ते ४० हजार लोकांना पुरेल इतक्या प्रमाणात महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अल्पोपाहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी खास शिर्डी येथील उदी व एक लाडू प्रसादरुपाने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिर्डी येथील ६ ग्रंथप्रदर्शनाची दुकाने लावण्यात येतील. यामध्ये सवलतीच्या दरात साईंची ग्रंथसंपदा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. सकाळी ६ वाजल्यापासून हा दर्शनसोहळा सुरू होईल. मध्यान्ह आरती, महाप्रसाद, धूपारती, भजन व आरती या व्यतिरिक्त मध्ये मध्ये गोमंतकीय कलाकार सांस्कृतिक कला सादर करणार आहेत. तसेच रात्री प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आपली कला सादर करतील.
वाहतुकीत बदल
दि. २२ रोजी कला अकादमी ते मिरामारपर्यंतची वाहतूक बंद करण्यात आली असून मडगाव मार्गे येणाऱ्या गाड्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयापासून वळवण्यात आल्या आहेत. गोमेकॉपासून गोवा विद्यापीठ मार्गे दोना पावला व मिरामार अशा गाड्या धावतील. तसेच सोहळ्यास येऊ इच्छिणाऱ्यासाठी काणकोण, मडगाव, वास्को, सावर्डे, फोंडा, म्हापसा, पेडणे, वाळपई, साखळी व डिचोली येथील कदंब बसस्थानकावरून सकाळी ६.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कांपाल मैदानावरून शेवटची गाडी रात्रौ ८ वाजता सुटेल.
भक्तांना सूचना
दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी नारळ, हार, उदबत्ती अथवा कोणतेही पूजेचे साहित्य अथवा प्रसाद घेऊन येऊ नये. फुलांची व्यवस्था मैदानावर करण्यात आली आहे, असे श्री. खवंटे यांनी या परिषदेत सांगितले. गोमंतकीयांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्या प्रस्थान करतील.
संमेलनाची रूपरेषा
दि. २२ रोजी सायंकाळी ४ ते ६.३० पर्यंत एका संमेलनाचे आयोजन केले असून यामध्ये संस्थानाचे विश्वस्त जयंत ससाणे, मुख्यमंत्री श्री. कामत, विरोधी पक्षनेते श्री. पर्रीकर, पिंगुळी येथील संत प. पू. अण्णा राऊळ महाराज उपस्थित राहणार आहेत.

Friday 20 February, 2009

दोन कॅसिनो तातडीने हटवा ढवळीकरांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

जलवाहतूक मंत्री म्हणतात--
..मांडवीत कॅसिनोंना पूर्ण विरोध
..कॅसिनोंमुळे जलवाहतुकीस अडथळा
..तक्रारीनंतरही कारवाई नाही
..रस्त्यावर बेशिस्त पार्किंग
..जहाजावर रेस्टॉरंट सुरू

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): मांडवी नदीत दोन कॅसिनो बेकायदा ठाण मांडून असून त्या त्वरित हटवण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचे आज जलवाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. ते आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मांडवीत येणाऱ्या कॅसिनोंना आपला पूर्वीपासून विरोध असल्याचेही यावेळी श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
मांडवी नदीत नांगर टाकून असलेल्या काही कॅसिनो जहाजांना कोणतीही परवानगी नाही. या जहाजामुळे मांडवी नदीत अन्य जहाजांना वाहतूक करण्यास अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत. या जहाजांवर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून त्यांनी अद्याप जलवाहतूक खात्याने त्यांना केलेल्या तक्रारीवर कोणतीच कारवाई केलेली नाही.
त्यामुळे यापुढे कॅसिनो जहाज परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचेही यावेळी श्री. ढवळीकर यांनी स्पष्ट केले. मांडवी जेटीच्या बाजूला एक जहाज उभे करून ठेवण्यात आले असून त्याला कोणतीच परवानगी नाही. या जहाजामध्ये रेस्टॉरंट सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तेही हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
कॅसिनोंवर जाण्यासाठी रात्रीच्यावेळी रस्त्यावरच वाहने उभी करून ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे अन्य वाहतुकीला त्याचा त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून हा प्रश्न पूर्णपणे कायदा व सुव्यवस्थेचा आहे. त्यामुळे पोलिसांनी या वाहनांवर कारवाई न केल्यास येथील वाहने ताब्यात घेण्यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांना आदेश दिला जाणार असल्याचे यावेळी श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी आशिया खंडातील सर्वांत मोठा तरंगता महाराजा कॅसिनो गोव्यात दाखल झाला आहे. त्यालाही जलवाहतूक खात्याने परवानगी दिली नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रात्रीच्यावेळी या कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या आणि पर्यटकांना घेऊन येणारी वाहने मुख्य रस्त्याच्याच बाजूला उभ्या केल्या जातात. याठिकाणी कोणतेही वाहन उभे करता येत नाही. या संपूर्ण "नो पाकिर्ंग झोन' असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. परंतु, पोलिस याठिकाणी उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर पोलिस कोणतीच कारवाई करीत नसल्याने श्री. ढवळीकर यांनी आश्चर्य व्यक्त केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उत्तर गोव्यातही शुभारंभ न्यायालयांसाठी लाभदायी सुविधा

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): तुरुंगातील कैद्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी न्यायालयांना व्हिडीओ कॉफरन्सिंगची सुविधा देणारे आणि तुरुंग व्यवस्थापन करणारे गोवा हे देशातील पहिलेच राज्य ठरल्याची घोषणा करून या सुविधेचा आज उत्तर गोवा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात शुभारंभ करण्यात आला. यावेळी गृहमंत्री रवी नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, तुरुंग महानिरीक्षक मिहीर वर्धन, पोलिस महानिरीक्षक किशन कुमार, साहाय्यक तुरुंग महानिरीक्षक श्री. बोडणेकर, गोवा इलॅक्ट्रॉनिकलिमिटेडचे अध्यक्ष महेंद्र खांडेपारकर उपस्थित होते. ही सुविधा अत्यंत महत्त्वाची असून याचा राज्याला आणि पोलिसांना प्रभावीरीत्या वापर करता येईल, असे मत पर्रीकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण गोव्यानंतर आज उत्तर गोव्यात या सुविधेची सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे आग्वाद तुरुंगांत शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांपर्यंत तुरुंगात थेट मोबाईल पोचत असल्याने या तुरुंगात "मोबाईल जॅमर'ही बसवण्यात आला आहे. याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या संपूर्ण सुविधेची माहिती देताना, ४२० कलमाखाली अटक केलेल्या आणि सडा वास्को तुरुंगात असलेल्या ८५ वर्षीय कैद्याची त्वरित सुनावणी संपवून त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची सूचना यावेळी करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायालयाला याची सूचना केली जाणार असल्याचे यावेळी दक्षिण सत्र न्यायाधीशांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे सांगितले. ही माहिती देत असतानाच विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी या ८५ वर्षीय कैद्याकडे लक्ष वेधले.
यावेळी आग्वाद तुरुंगात कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणे सुरू असताना तेथील कैद्यांना तुरुंगात मोबाईल व अन्य चैनीच्या वस्तू येथील तुरुंग रक्षकच पोहोचवत असल्याचे मान्य केले. तुरुंगात "मोबाईल जॅमर' बसवण्यामागचा उद्देश काय, तुमचा तुरुंग कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्न पर्रीकर यांनी केला असता, तेथील काही रक्षकच या वस्तू आत पोहोचवत असल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हापसा येथे कॉन्फरन्सिंगद्वारे बोलण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे व बाल न्यायालयाचे न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्टा उपस्थित होते. यावेळी न्यायालयांची काय स्थिती आहे, असा प्रश्न गृहमंत्री नाईक यांनी केला असता, न्या. बाक्रे म्हणाले की, तुरुंगातील कैद्यांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तर तेथील तुरुंग रक्षक उपेक्षितच आहेत.
गोवा इलेक्ट्रॉनिकने खास सॉफ्टवेअर बनवले असून यात तुरुंगातील सर्व कैद्यांची सविस्तर माहिती नोंद करण्यात आली आहे. वय, शिक्षण, व्यवसाय यानुसार त्यांची नोंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या कैद्यांना तुरुंगात भेटण्यासाठी येणाऱ्या त्याच्या नातेवाइकांचेही छायाचित्र काढून ठेवले जात आहे. यदाकदाचित तुरुंगात असलेले कैदी फरार झाल्यास त्याचा उपयोग पोलिसांनी होईल या हेतूनेच हे छायाचित्र काढले जात असल्याचे तुरुंग महानिरीक्षक वर्धन यांनी सांगितले.

प्रचारासाठी उद्या नरेंद्र मोदी गोव्यात

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): भाजपचे गोवा निवडणूक प्रमुख व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी २१ रोजी गोव्यात प्रचार दौऱ्यावर येणार आहेत. ते २२ रोजीही गोव्यात असतील.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपतर्फे खास बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, २२ रोजी श्री. मोदी दक्षिण गोवा व उत्तर गोवा मतदारसंघांतील बू्थ कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार व निवडणूक समिती सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

नारायण राणे कॅबिनेट मंत्री

मुंबई, दि. १९ : निलंबन रद्द झालेले माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्यासह माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी राज्यमंत्री नसीम खान यांनी आज सायंकाळी राज भवनात झालेल्या सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेतली. राणे व विखे-पाटील यांना कॅबिनेट, तर नसीम खान यांना राज्यमंत्रीपद बनवण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आज कॉंग्रेसच्या आणखी तिघा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला.

Thursday 19 February, 2009

अडवाणी, वाजपेयींना मुलायमसिंग भेटले

राजकीय वर्तुळात खळबळ
नवी दिल्ली, दि. १८ - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना विलक्षण वेग येत चालला असून समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन संभाव्य राजकीय सोयरीकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे राजधानीतील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
खुद्द मुलायमसिंग यांनीच आज येथे ही माहिती पत्रकारांना दिली. जर भाजपने आमच्या अटी मान्य केल्या तरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी आमचे सहकार्य शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, या अटी कोणत्या याबद्दल त्यांनी गुप्तता पाळली आहे. सध्या समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यातील दरी झपाट्याने रुंदावत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस पक्ष एकाकी पडत चालल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः उत्तर प्रदेशातील जागावाटपावरून कॉंग्रेस व समाजवादी पक्ष यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. समाजवादी पक्षाने कॉंग्रेसला केवळ बारा जागा देऊ केल्या असून तेवढ्या जागांवर समाधान मानण्यास कॉंग्रेसने नकार दिला आहे. कॉंग्रेसच्या या आडमुठ्या धोरणामुळे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय राजकारणातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत चालल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
कॉंग्रेसशी राष्ट्रवादीची फारकत?
घटकपक्षांशी राष्ट्रीय पातळीवर आघाडी न करण्याच्या कॉंग्रेसच्या भूमिकेवर काहीसे नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आक्रमक पवित्रा घेत कॉंग्रेसशी काडीमोड घेण्याचा इशारा दिला. कॉंग्रेसला आघाडी करायची नसेल तर आम्हालाही आमचे रस्ते मोकळे आहेत, असे सांगत भाजप वगळता अन्य कुणाही पक्षाशी निवडणूक वाटाघाटी करण्याचा आमचाही अधिकार आहे, असे पवार यांनी आज सांगलीत बजावले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत गुप्त बैठक झाल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरेंशी भेट झाल्याच्या वृत्ताचा पवार यांनी इन्कार केला नाही. मात्र ठाकरे कुटुंबियांशी माझे कौटुंबिक, वैयक्तिक संबंध आहेत. त्यातून राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही, अशी पुस्ती जोडायला ते विसरले नाहीत.
केंद्रातील सत्ताधारी संपुआचा घटकपक्ष म्हणून भाजपप्रणित रालोआप्रमाणे कॉंग्रेसप्रणित आघाडीच्या घटकपक्षांची राष्ट्रीय पातळीवर आघाडी व्हावी, असा आमचा आग्रह होता. परंतु अलीकडेच कॉंग्रेस कार्यकारिणीने घटकपक्षांशी राष्ट्रीय आघाडी न करता, राज्य पातळीवर निवडणूक समझोता करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसला त्यांची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे, त्याबाबत आम्ही नाराज होण्याचे कारण नाही. परंतु आता आम्हालाही नवे रस्ते किंवा पर्याय शोधावे लागतील. कॉंग्रेसशी आघाडी व्हावी, अशी आमची अजून तरी इच्छा आहे. परंतु कॉंग्रेसला ते शक्य नसेल तर इतर पक्षांशी वाटाघाटी करण्याचा आमचा अधिकार आहे.
आतापर्यंत जागावाटपात राष्ट्रवादीने नेहमीच नमती भूमिका घेतली. आताही रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पार्टी यांना सोबत घेऊनच जागावाटप करावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. कॉंग्रेसला तो मान्य नसेल तर आम्हालाही नवा रस्ता शोधावा लागेल, अशा शब्दांत शरद पवार यांनी कॉंग्रेसशी फारकत घेण्याचे सूचित केले.

"दिलखुलास' प्रभावळकर!




-विद्या नाईक
सारस्वत बॅंकेचे प्रचारदूत तथा चतुरस्त्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी जीवभौतिकशास्त्रात (बायोफिजिक्स) पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरीही केली. हे करतानाच त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरुवात केली. तथापि, खऱ्या अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित "लोभ नसावा ही विनंती' या नाटकातून झाला. बुधवारी पणजीतील सारस्वत बॅंकेमध्ये त्यांनी "गोवादूत'शी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यासंबंधी...

"मी असा कसा?... असा कसा? वेगळा... वेगळा...' म्हणत "चौकट राजा'तील आपल्या भूमिकेच्या वेगळेपणास पडद्यावर उतरवणारे दिलीप प्रभावळकर प्रत्यक्षातही किती "वेगळे' आहेत, याची झलक बुधवारी स्वारस्वत बॅंकेच्या प्रत्येक ग्राहकास पाहावयास मिळाली. या बॅंकेचे प्रचारदूत म्हणजेच ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून आपली "भूमिका' अगदी चोख बजावताना प्रत्येकाचे हसतमुख स्वागत करणारे दिलीप प्रभावळकर यांना पाहण्याचा योग ध्यानीमनी नसताना आला. दिलीप प्रभावळकर मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व! अभिनयाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या या "नटसम्राटा'ला कुठेच "ग'ची बाधा झाली असावी असे निदान त्याक्षणी तरी वाटले नाही. खरेतर त्यांची निवड सारस्वत बॅंकेच्या ब्रॅंड ऍम्बेसिडरपदी व्हावी हीच त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची पोचपावती आहे. कारण बॅंक म्हणजे लोकांच्या विश्वासाचे मूर्तिमंत प्रतीक. आपल्या जीवनाची संपूर्ण पुंजी लोक या ठिकाणी मोठ्या विश्वासाने गुंतवतात. त्यामुळे अशा ठिकाणाचा दाखला जर एका तितक्याच जबाबदार व्यक्तिमत्त्वाने दिला तर त्यावरील जनतेचा विश्वास दृढ होण्यास ते साहाय्यभूत होऊ शकते. दिलीप प्रभावळकर यांच्याबाबतीतही नेमके तेच घडत होते. येणारा प्रत्येक ग्राहक जिथे त्यांच्या "ग्लॅमर'च्या दडपणाखाली दिसत होता, तितकाच त्यांच्याबद्दलचा विश्वास आणि आदरही त्यातून स्पष्ट होत होता. त्यांच्या भूमिकांची प्रशंसा करण्यासाठी शब्दभंडारांची उणीव त्यांना जाणवत होती, पण अगदी वाकून नमस्कार करण्यापासून ते पदस्पर्श करण्यापर्यंत आपल्या भावना आपल्या कृतीतून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्या सगळ्याने अवघडल्यासारखे झालेले दिलीप प्रभावळकर... हे सारे दृश्यच भारावून टाकणारे होते. आज "आदर्श' ही संकल्पना बदलली आहे. पूर्वी देवता, वीरयोद्धे, पुढारी, नेते हे लोकांचे आदर्श असायचे. मात्र आता कलाकारांना आपला आदर्श मानणाऱ्यांचा जमाना आहे. या काळात जर अभिनयाचा आदर्श म्हणून कोणी दिलीप प्रभावळकर हे नाव सांगितले, तर नवल वाटू नये. दिलीप प्रभावळकर हे सारस्वत बॅंकेचे "सेलिब्रिटी ग्राहक'. तथापि, "मुन्नाभाई एमबीबीएस'सारख्या चित्रपटाने अगदी घरोघरी पोहोचलेल्या या "गांधीजीं'ना बॅंकेने आपला प्रचारदूत म्हणून नियुक्त केले आणि ही निवड किती सार्थ होती याची प्रचितीही बॅंकेला आली.
मोजके बोलणे, पण ते बोलताना शब्दफेक किती संयमी असावी याची काळजी घेणे, आपण कोठेही वादग्रस्त ठरणार नाही, याकडे अगदी काटेकोर लक्ष पुरवणे हे बहुतेक त्यांनी आपल्या आजवरच्या अनुभवातून अर्जित केलेले ज्ञान असावे. कारण गोव्यातील चित्रपटसंस्कृती, येथील चित्रपट महोत्सव याबाबत त्यांची उत्तरे अगदी मोजून - मापून दिल्यासारखी भासली. गोव्याचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजेंद्र तालक यांच्या "सॉंवरिया डॉट कॉम' या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली आहे. अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलेल्या प्रभावळकर यांनी प्रांजळ कबुली दिली की कलाकार हा केवळ आपल्या दृश्यांशी निगडीत असतो, या दृश्यांचे पुढे नक्की काय व कसे स्वरूप होईल यापासून अनभिज्ञ! तर दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपट असतो, त्यामुळे त्याला योग्य दिशेने घेऊन जाण्याचे कार्य एक दिग्दर्शक करतो आणि ती कलात्मकता तालक यांच्यात नक्कीच आढळली असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगताना गोव्यात दरवर्षी आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपण अद्याप सहभागी होऊ शकलो नसल्याने त्याविषयी आपण नक्की सांगू शकत नसल्याचे सांगत त्यांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. बराच गाजावाजा झालेल्या झी मराठीच्या "लिटल् चॅम्पस्' पैकी एक शाल्मली सुखठणकरचा उल्लेख होणे ही तशी स्वाभाविक गोष्ट होती, तर तिनेही आपल्या "टिपरे' या पात्राला पुन्हा एकदा (आता ही मालिका संपली आहे, पण सुरू होती त्यावेळी सर्वांत यशस्वी मालिका म्हणून त्याकडे पाहिले जात असे. प्रभावळकरांच्या "अनुदिनी'वर आधारित ही मालिका आहे.) घरोघरी पोचवल्याचेही स्मितहास्य करत त्यांनी सांगितले. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत एक कसदार अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हा कलाकार आजही आपण "दिलीप प्रभावळकर' म्हणून पूर्ण समाधानी असलो तरी एक अभिनेता म्हणून असमाधानी असल्याचे सांगतो.

हळर्णकर व सिल्वेरांनी संसदीय सचिवपद सोडले

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर व सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी अखेर आज संसदीय सचिवपदाचा राजीनामा दिला. आज हा राजीनामा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ही नियुक्ती ही केवळ राजकीय सोय करण्यासाठीच असल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दि. २२ जानेवारी ०९ रोजी ही दोन्ही पदे रद्दबातल ठरवण्याचा ऐतिहासिक निवाडा दिला होता. हा आदेश देतानाच याला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सरकारने चार दिवसाची मुदत मागितली होती.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांनी १०८ पानाचा निवाडा देताना पदांचा प्रशासकीय कामकाज किंवा जनहितासाठी कोणताही उपयोग नाही. मुळात या नियुक्तीमागे सरकारचा नेमका उद्देश काय याबाबतही काही ठोस विचार नाही. या पदांची नियुक्ती करण्यात झालेली घिसाडघाई पाहता ही नियुक्ती केवळ राजकीय सोय करण्यासाठीच असण्याची जास्त शक्यता असल्याचे आपल्या आदेशात नमूद केले होते. हा आदेश देताच ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक निवाड्याच्या अंमलबजावणीस स्थगिती मागितली. या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मोकळीक राज्य सरकारला देण्यात आली होती. आव्हान देण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस सरकार असताना आज अचानक दोघांनी आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांना पाठवले. समाज कार्यकर्ते ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी १७ जुलै २००७ रोजी संसदीय सचिव ही पदे म्हणजे सरकारी तिजोरीची लूट करण्यासाठी केलेली नियुक्ती असल्याचा दावा करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.

वेर्णा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

वास्को, दि. १८ (प्रतिनिधी)- वेर्णा औद्योगिक वसाहतीनजीक असलेल्या महालसा मंदिराजवळ जलवाहू टॅंकरने धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रसाद नाईक देसाई (वय ३६, रा. बाळ्ळी केपे) ठार झाला तर मागे बसलेला रुपेश देसाई (३३, कुंकळ्ळी) याची प्रकृती गंभीर असून मडगाव येथील हॉस्पिसियू इस्पितळात तो उपचार घेत आहे. या अपघातात अन्य एक दुचाकी सापडली असून त्यावर स्वार झालेल्या प्रवाशांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती.
आज संध्याकाळी ७.१५ आसपास जीए ०१ टी ७८३७ हा जलवाहू टॅंकर भरधाव वेगाने वेर्णा चर्च ते आयडीसी वेर्णा (व्हाया जुने म्हार्दोळ) येथून जात असता महालसा मंदिर वेर्णा येथे त्याची जोरदार धडक हिरो होंडा पॅशन (जीए ०२ एन ७२४६) तसेच टीव्हीएस व्हिक्टर (जीए ०२ क्यू ९९९६) या गाड्यांना बसली.
टीव्हीएसचालक प्रसाद नाईक देसाई याला हॉस्पिसियूत नेण्यात येत असता मरण आले तर मागे बसलेला रुपेश देसाई याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता अपघातात सापडलेले पॅशन वाहन रस्त्यावर पडल्याचे आढळून आले. या वाहनावर स्वार झालेल्या प्रवाशांसंबंधी कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्यांना खासजी इस्पितळात दाखल करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डायगो ग्रासियस पुढील तपास करत आहेत.

वेर्णा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

वास्को, दि. १८ (प्रतिनिधी)- वेर्णा औद्योगिक वसाहतीनजीक असलेल्या महालसा मंदिराजवळ जलवाहू टॅंकरने धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रसाद नाईक देसाई (वय ३६, रा. बाळ्ळी केपे) ठार झाला तर मागे बसलेला रुपेश देसाई (३३, कुंकळ्ळी) याची प्रकृती गंभीर असून मडगाव येथील हॉस्पिसियू इस्पितळात तो उपचार घेत आहे. या अपघातात अन्य एक दुचाकी सापडली असून त्यावर स्वार झालेल्या प्रवाशांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती.
आज संध्याकाळी ७.१५ आसपास जीए ०१ टी ७८३७ हा जलवाहू टॅंकर भरधाव वेगाने वेर्णा चर्च ते आयडीसी वेर्णा (व्हाया जुने म्हार्दोळ) येथून जात असता महालसा मंदिर वेर्णा येथे त्याची जोरदार धडक हिरो होंडा पॅशन (जीए ०२ एन ७२४६) तसेच टीव्हीएस व्हिक्टर (जीए ०२ क्यू ९९९६) या गाड्यांना बसली.
टीव्हीएसचालक प्रसाद नाईक देसाई याला हॉस्पिसियूत नेण्यात येत असता मरण आले तर मागे बसलेला रुपेश देसाई याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता अपघातात सापडलेले पॅशन वाहन रस्त्यावर पडल्याचे आढळून आले. या वाहनावर स्वार झालेल्या प्रवाशांसंबंधी कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्यांना खासजी इस्पितळात दाखल करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डायगो ग्रासियस पुढील तपास करत आहेत.

Wednesday 18 February, 2009

डिचोलीत तिघे कामगार जागीच ठार, 'सुपर सोप इंडस्ट्रीज'ची भिंत कोसळली, एकजण गंभीर


डिचोली, दि. १७ (प्रतिनिधी): येथील औद्योगिक वसाहतीमधील "सुपर सोप इंडस्ट्रीज'चे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून आज सकाळी ११.३०च्या सुमारास ३ कामगार जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
डिचोली अग्निशामक दलाल माहिती मिळताच दलाचे अधिकारी लक्ष्मण एस. नाईक यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या भिंतीचे ढिगारे दूर केले. ठार झालेले सर्वजण पश्चिम बंगालमधील असून परस्परांचे नातेवाइक आहेत. विशीतील या युवकांवर मृत्यूने घाला घातल्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुपर सोप इंडस्ट्रीजच्या आठ मीटर उंचीच्या भिंतीचे बांधकाम सुरू असताना चार मजूर वरती प्लास्टरींग करत होते. चौघेजण त्यांना साहित्य पुरवित होते. तेव्हा तेथे सुपरवायझर किंवा ठेकेदार वगैरे उपस्थित नव्हते. खालून वर सामान देणाऱ्या कामगारांवर त्याचवेळी भिंत कोसळली व त्याखाली ते गाडले गेले. जयदुल शेख (२०) राजकुल शेख (२०) सलीम शेख (२१) यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. करिमल शेख हा गंभीर जखमी झाला असून त्याला अग्निशामक दलाच्या गाडीतूनच प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अशिद्दीन शेख (१९) मनिरल शेख (२०) मायकल शेख (१९) जेलीम शेख (२०) अशी अन्य जखमींची नावे असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली तेव्हा बचावकार्य सुरू होते. नरेश सावळ, नरेश कडकडे, प्रशांत धारगळकर तसेच अन्य कार्यकर्ते मदतकार्यात सहभागी झाले होते.
निकृष्ठ बांधकामामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाचे अधिकारी लक्ष्मण नाईक यांनी "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केला. उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांनीही असेच मत व्यक्त केले.
दुर्घटनेनंतर उपजिल्हाधिकारी बुगडे नगराध्यक्ष सतीश गावकर, पोलिस उपअधीक्षक बॉसेट सिल्वा, पोलिस निरिक्षक वाझ मिनेझिस, मामलेदार प्रमोद भट, तसेच अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नगरसेवक भगवान हरमलकर, बाळू बिरजे तसेच इतर अनेकांनी मदतकार्यात भाग घेतला. नरेश सावळ यांनी घटनास्थळावरुन १०८ गाडीला तसेच शववाहिका पाचारण करुन मृतदेह बांबोळी येथे नेण्यासाठी मदत केली. डिचोली औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक दीपक काकोडे, क्षेत्रीय व्यवस्थापक परमानंद गावकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नऊ मीटर उंचीच्या या बांधकामाला कसलाच आधार नसल्याचे दिसून आले. या संपूर्ण घटनेची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. सदर सुपर सोप्स या आस्थापनाचे संचालक सुहास साखळकर हे आहेत. यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही, तथापि, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. बांधकामासाठी कायदेशीर परवाना घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दुर्घटना स्थळी पडलेले मृतदेह पाहून अंगावर काटा उभा रहात होता. एकाचा तर कंबरेखालचा भागच तुटल्याचे दृश्य भयाण दिसत होते. अग्निशामक दलाचे आर. गावस, डी. गावस, बी. नाईक, एस. केसरकर, एस. गावस, पी. कांबळी, रतन परब, एस. पाटील, फोंडा विभागाचे अधिकारी डी. रेडकर यांनी बचावकामात मोलाचे योगदान दिले. त्यांना अमन पठाण व इतरांनी सहकार्य केले. बऱ्याच प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिघांचेही देह छिन्नविछीन्न झाले होते.

२१ अतिरेक्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल

..सर्व इंडियन मुजाहिदीनचे सदस्य
..विविध शहरांमधील स्फोटांचे कारस्थान

मुंबई, दि. १७ : देशभरातील विविध शहरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या २१ अतिरेक्यांविरुद्ध मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद,जयपूरसह देशभरातील विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचे कारस्थान रचल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने २१ अतिरेक्यांविरुद्ध आरोपपत्र तयार केले. हे आरोपपत्र १८०० पानांचे आहे. यातील २१ आरोपींपैकी एक आरोपी सॉफ्टवेअर इंजिनीयर असून त्याने माफीचा साक्षीदार बनण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मात्र त्याला माफीचा साक्षीदार बनविण्यास नकार दिला आहे.
ज्या २१ आरोपींचा आरोपपत्रात नामोल्लेख आहे त्यात असगर अली, अजल उस्मानी, मो. सादिक, मो. आरिफ, मो. जाकीर, अन्सार अहमद, आसिफ बशीर, पीरभोय, मुबिन कादर, मो. आतिक इकबाल, दस्तगीर फिरोज, मो. अकबर चौधरी, अनीक शफीक सईद, माजीद अख्तर शेख, यासीर अनीस सईद, फारूख शरीफुद्दीन तरकश, फजल ए. रहमान दुराणी, अहमद बाव, मो. अली अहमद, जावेद बली, सईद नौशाद यांचा समावेश आहे.

'महाराजा' कॅसिनो मांडवीत दाखल

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): मांडवी तीरावरील जल कॅसिनोंना राज्यात जोरदार विरोध होत असतानाच आशियाातील सर्वांत मोठे "महाराजा कॅसिनो'हे जहाज आज दुपारी मांडवीत अवतरले. गेल्या दोन महिन्यापासून ते मांडवी तीरावर येण्याच्या प्रतीक्षेत होते. आज त्यांना हवे असलेले सर्व परवाने राज्य सरकारने दिल्याने दुपारी जहाजाने मांडवीत प्रवेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आलिशान जहाजाचे आगमन झाल्यामुळे राज्यात पुन्हा कॅसिनोविरोधी आंदोलनाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'महाराजा कॅसिनो' हा मांडवी नदीतील सहावा कॅसिनो असून राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या सातपैकी अजून एक कॅसिनो मांडवीत दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यामपासून मुंबई समुद्रात नांगर टाकून असलेल्या या कॅसिनोने गोव्याकडे आपला मोर्चा वळवला असून त्याविरोधात राज्यात सध्या तीव्र संताप खदखदत आहे. कॅप्टन ऑफ पोर्टपासून सुमारे २० मीटरवर हे जहाज नांगरून ठेवण्यात आले आहे. यात प्रवेशासाठी दोन छोट्या होड्याही त्याठिकाणी उपलब्ध आहेत.
२२ हजार चौरस मीटर रुंद असलेल्या या कॅसिनोत जुगार खेळण्याची ३५ टेबल्स आहेत. या कॅसिनोत खेळण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. हे जहाज पाच वर्षांसाठी या ठिकाणी नांगरून ठेवण्यास १० लाख रुपये भरल्याचीही माहिती मिळाली आहे. या जहाजाच्या पाठोपाठ काडमांडू येथील काही तरंगते कॅसिनो गोव्यात येण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
"पान इंडिया नेटवर्क इंफ्राव्हेस्ट प्रा. लि' या कंपनीचे हे "महाराजा कॅसिनो' जहाज असून सुभाषचंद्र त्याचे मालक आहेत. सध्या मांडवीत "काराव्हेला', "रियो', "प्राईड ऑफ गोवा', "किंग कॅसिनो' व "कॅसिनो रॉयल' हे पाच तरंगते कॅसिनो नांगर टाकून आहेत.

१५ लाखांचे अमलीपदार्थ मांद्रे व हणजूण येथे जप्त

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): हणजूण व मांद्रे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने आज छापा टाकून सुमारे पंधरा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. यात मांद्रे येथे ११लाख २५ हजार रुपयांचे कोकेन तर, हणजूण येथे ४ लाख ४९ हजार रुपयांचा चरस जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात रशियन नागरिक व्हिक्टर कॅप्लेन्को (४७) याच्याकडून २२५ ग्रॅम कोकेन तर भावना विकास रोका (२९) व रमय्या बुधबहादूर जहांकूरी (५५) या महिलांकडून २ किलो ४७० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५नुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिन्ही संशयितांना उद्या सकाळी पोलिस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलिसांच्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून मांद्रे व हणजूण येथे ही कारवाई करण्यात आली. रशियन नागरिक व्हिक्टर याला मांद्रे येथील वन खात्याच्या उद्यानाकडे फिरताना पोलिसांनी हटकले. असता त्याच्याकडे कोकेन सापडल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक लव्हलीन डायस, पोलिस शिपाई आनंद भंजी, दिना मांद्रेकर, साई पोकळे, विवेकानंद दिवकर, श्रीनिवासलू पिदीगो व अविनाश गावकर यांनी या कारवाईत भाग घेतला.

३१ ऑगस्टपर्यंत मानवाधिकार आयोग उच्च न्यायालयाची सरकारला अंतिम मुदत

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गोव्यात मानवाधिकार आयोगाची स्वतंत्र स्थापना करण्यासाठी राज्य सरकारला शेवटी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून ३१ ऑगस्टपर्यंत या आयोगावर अध्यक्षांची नेमणूक करा, अशा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. स्वतंत्र मानवाधिकार आयोग गोव्यात स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून उत्तर येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने मुदतवाढ दिली जावी, अशी याचना आज सरकारने न्यायालयाकडे केली असता, ही मुदतवाढ देण्यात आली.
सहा महिन्यांनंतर राज्य सरकारने या आयोगासाठी बसण्याची जागा नाही म्हणून त्याची व्यवस्था करण्यासाठी पुन्हा सहा महिन्यांची मागणार नाही ना, असा मुद्दा याचिकादाराचे वकील महेश सोनक यांनी केला असता, "या आयोगाच्या अध्यक्षांना कुठल्या तरी उद्यानात बसवले जाणार नाही ना, ऍडव्होकेट जनरल' असा प्रश्न करून या सहा महिन्यांच्याच मुदतीत त्यांच्या जागेचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे सरकारकडून गोवा खंडपीठाने वदवून घेतले. "अशा आयोगांवर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली जाते, आणि निवृत्त न्यायाधीश येण्यास तयार होत नसल्याने असा प्रसंग येतो' असे मत यावेळी न्यायमूर्तींनी व्यक्त केली.
यापूर्वी राज्य सरकारने या आयोगाची स्थापना करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागून घेतली होती. परंतु, त्या कालावधीत सरकारला आयोग स्थापन करण्यास यश आले नसल्याने आता पुन्हा सहा महिन्यांची मुदत मागून घेण्यात आली आहे.
गोव्यात मानवाधिकार आयोगाची अत्यंत गरज असून ती स्थापन करण्यासाठी सरकारला आदेश द्यावा,अशी याचना करणारी याचिका चार्ल्स डिसोझा या कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली होती. गेल्या वर्षी गोव्यात घडलेल्या घटना पाहिल्यास मानवाधिकाराची गरज असून ती स्थापण्यासाठी सरकारला आदेश द्यावा, असे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

हरमल ग्रामसभा ग्रामस्थांनी रोखली

हरमल, दि. १७ (वार्ताहर) : हरमल येथील नियोजित "मेरिडियन रिसॉर्ट'संबंधी पंचायतीने स्पष्टीकरण दिल्याशिवाय ग्रामसभेचे कामकाज चालवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी आज कामकाज रोखून धरले.प्रादेशिक आराखडा व वनरक्षण समितीची निवड अशा दोन प्रमुख विषयांवर आजच्या विशेष ग्रामसभेत चर्चा होणार होती, तथापि मेरियडिय रिसॉर्टचा मुद्दा उपस्थितांनी लावून धरत, पंचायतीची टाळाटाळ सहन केली जाणार नाही, असे सरपंच व सचिवांना सुनावले.
सरपंच सौ.प्रगती मयेकर यांनी महत्त्वाचे विषय असल्याने त्यावर चर्चा करण्यास ग्रामस्थांनी चर्चा करावी, असे आवाहन केले. तथापि कामकाज पुढे सुरू होऊ शकले नाही. आराखडाविषयक समितीचे अध्यक्ष आत्माजी नाईक यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही बोलू देण्यात आले नाही. आराखड्यासंबंधी माहिती केवळ तज्ज्ञच देऊ शकतात, असे यावेळी पंच इनासियो डिसोझा यांनी सांगितले, त्यांना इतरांनी समर्थन दिले. सरपंचांनी अशा व्यक्तीला बोलाविले जाईल, असे आश्वासन दिले.
सीआरझेड कायद्याची पायमल्ली होत असल्याची टीका उपस्थितांनी केली. ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच सौ. सूचना गडेकर, द्वारकानाथ नाईक, अमीत फर्नांडिस, मधुकर ठाकूर, सुधीर नाईक व नियुक्त सदस्य भदगो हरमलकर, आत्माजी नाईक उपस्थित होते. इनासियो डिसोझा व सौ. मिलन पार्सेकर हे पंचसदस्य ग्रामस्थांमध्ये हजर होते.

Tuesday 17 February, 2009

"संपुआ'चे गोडवे गाणारे अंतरिम अंदाजपत्रक सादर

सामान्य माणसाला कोणताही दिलासा नाही

नवी दिल्ली, दि.१६ - सामान्यांना कोणताही दिलासा नसणारे, करप्रणालीत कोणताही बदल नसणारे आणि आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी कोणत्याही तरतुदी नसणारे, पण गेल्या ३-४ वर्षात संपुआने काय केले, याचे गोडवे गाणारे अंतरिम अंदाजपत्रक केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केले.
आर्थिक मंदीचा तडाखा बसत असतानाही उद्योगांसाठी कोणत्याही सवलती अथवा योजनांचा लवलेशही या अंतरिम अंदाजपत्रकात नसल्याने शेअर बाजारही कोसळला. केवळ संरक्षण दलासाठी १४१,७०३ कोटी रुपयांची वाढीव तरतूद अंतरिम अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
प्रणव मुखर्जी म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षांत आर्थिक दरात सातत्याने वाढ होत ती ९ टक्के झाली. दरडोई उत्पन्न गेल्या चार वर्षांत सतत ७.४ टक्के राहिले आणि २००७-०८ या वर्षात सकल राष्ट्र्रीय बचतीचा दर ३७.७ टक्के राहिला. याच काळात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत गुंतवणुकीचा दर ३९ टक्क्यांपर्यंत वाढला. त्यापूर्वी तो २७.६ टक्के होता. याच उत्पन्नाच्या तुलनेत करवसुलीचा दर गेल्या वर्षी १२.५ टक्के राहिला आणि महसुली तुटीचा दर राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या तुलनेत १.१ टक्क्याने कमी झाला.
२००४ साली वित्तीय तुटीचा दर साडेचार टक्के होता. तो २००७-०८ या वर्षात २.७ टक्क्यापर्यंत खाली आला तर कृषी उत्पादनाचा दर गेल्या चार वर्षात ३.७ एवढा कायम राहिला. याच वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत विदेशी व्यापाराचा दर ३५.५ टक्के होता तर गेल्या वर्षी भांडवली गुंतवणुकीचा दर ९ टक्के राहिला.
सार्वजनिक उद्योगांचा लेखाजोखा सादर कराताना अर्थमंत्री म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची उलाढाल २००३-०४ या वर्षी ५८७,००० कोटी एवढी होती. ती २००७-०८ या वर्षात वाढून १० लाख ८७ हजार कोटींवर पोचली. २००९ या वर्षात पाऊस जर सामान्य राहिला तर कृषी उत्पादनात वाढ होण्याची चिन्हे आहेत. पण, जागतिक स्तरावरील आर्थिक दृश्य प्रोत्साहनात्मक नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.भारत हा चीननंतर वेगाने अर्थव्यवस्थेत वाढ होणारा देश असून २००८-०९ या वर्षात ७.१ टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. अशा प्रसंगी जग आर्थिक मंदीचा तडाखा सोसत असताना भारत सुद्धा त्यापासून वेगळा राहू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.
भारताने २००८ या वर्षात ३२.४ अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक मिळविली असून हा एक विक्रम असल्याचे मुखर्जी म्हणाले. आम्हाला धोरणात्मक सुधारणांकडे अधिक लक्ष द्यावे लागणार असून रोजगारक्षम योजनांना अधिक व्यापक आणि गतिमान केले जाईल. या योजनांच्या अंमलबजावणीत किती यश मिळते याचा आढावा घेतल्यानंतर तूट कमी करण्याचे लक्ष्य आम्हाला ठरवावे लागेल. जागतिक मंदीचा हा काळ बघता आम्ही "आर्थिक जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन' लक्ष्यात काही प्रमाणात शिथीलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑगस्ट २००८ ते जानेवारी २००९ या कालावधीत सरकारने ३७ संसाधन निर्माण योजनांना मंजुरी दिली असून डिसेंबर २००८ ते जानेवारी २००९ या कालावधीत बॅंकांना ठोेस पॅकेजेस दिले आहेत. ६७ हजार कोटी रुपयांच्या ५० संसाधन निर्माण प्रकल्पांना आम्ही तत्वत: मंजुरी दिली आहे तर काहींना मंजुरीही प्रदान केली आहे.
मुखर्जी यांनी सांगितले की, भारतीय संसाधन वित्तीय कंपनीला आगामी आर्थिक वर्षात बाजारातून ३० हजार कोटी रुपये उभे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मार्च २००९ पर्यंत १० हजार कोटी रुपये ही कंपनी उभे करेल. तोट्यात किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत खाजगी-सार्वजनिक प्रकल्पाना ही कंपनी ६० टक्के व्यावसायिक तत्वावर कर्ज देणार आहे. कृषी क्षेत्राचा उल्लेख करताना अर्थमंत्री म्हणाले की कृषी कर्जाची रक्कम तीन टप्प्यात अडीच लक्ष कोटी रुपये एवढी झाली आहे. २००८-०९ या वर्षात शेतकऱ्यांना ६५,३०० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून त्याचा लाभ तीन कोटी ६० लाख लोकांना झाला आहे. गव्हाची आधारभूत किंमत आम्ही ६३० रुपयांवरून १०८० रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण संसाधन विकास योजनेला व्यापक स्वरूप आम्ही दिले असून इंदिरा आवास योजनेंतर्गत आतापर्यंत ६०.४ लाख घरे बांधण्यात आली आहेत. उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहा नव्या आयटीआय स्थापन करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त मध्यप्रदेश आणि राजस्थानात प्रत्येकी एक आयटीआय २०१० पर्यंत सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्याच्या प्रमाणात भरघोस वाढ करण्यात आली असून मार्च २००४ साली ४५०० कोटी असलेली ही रक्कम आता २४२८० कोटी रुपये झाली आहे, असे मुखर्जी यांनी सांगितले.

सरपंच व सचिव यांना अटक करा

अजामीनपात्र वॉरंट जारी, वेळसाव पाळे पंचायत

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - अवमान याचिकेला दाद न दिल्यामुळे वेळसाव पाळेचे सरपंच व पंचायत सचिव यांना अटक करून २४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश वेर्णा पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सरपंच व्होल्गा डिसिल्वा व सचिव विदुर फडते यांच्या नावे अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आल्याने त्यांना कोणत्याही वेळी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध पंचायतींचे सरपंच व सचिव यांचे धाबे दणाणले आहे.
सदर सचिव विदुर फडते हा सरकारी नोकर असून तो ४८ तास तुरुंगात राहिल्यास नोकरी गमवण्याची पाळी त्याच्यावर येऊ शकते. त्याचप्रमाणे चिखली व बेतूल पंचायतींनी न्यायालयाच्या आदेशाचा पालन केले नसल्याने संबंधित सरपंच व सचिवांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून येत्या चोवीस तासांत दंडाची रक्कम न्यायालयात जमा करण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. दंडाची रक्कम त्यांनी स्वतःच्या खिशातून भरावी, असे आदेशात म्हटले आहे. वेळसाव, चिखली व बेतूल पंचायत क्षेत्रात "सीआरझेड' नियमांचे उल्लंघन करून उभारलेल्या बांधकामांवर कोणती कारवाई केली याबाबतची माहिती देण्याचा आदेश १२ फेब्रुवारी रोजी खंडपीठाने दिला होता. त्या आदेशाचे पालन न झाल्याने सदर पंचायतींविरोधात अवमान याचिका दाखल करून सरपंच व सचिव यांना नोटिसा बजावून आज प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तथापि, वेळसाव पंचायतीने या आदेशाला कोणतीही दाद दिली नाही. तसेच सरपंच व पंचायत सचिव न्यायालयात फिरकलेही नाहीत. पंचायतीचा प्रतिनिधी म्हणून कोणत्या वकिलाची नेमणूकही केली नाही. त्यामुळे न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला.
दरम्यान, खंडपीठाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला बेतूल व चिखली पंचायतींनी उत्तर दिल्याने केवळ पाच हजार रुपयांच्या दंडावर त्यांचे निभावले. या दोन्ही पंचायतींनीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करून सरपंच व सचिव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यास अनुसरून सरपंच व सचिव न्यायालयात हजर झाले होते. किनारपट्टी क्षेत्रात येणाऱ्या पंचायतींना भरतीरेषेपासून दोनशे मीटरच्या आत किती बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, त्यात १९९१ पूर्वीच्या आणि नंतरची किती, दोनशे मीटरवर आणि पाचशे मीटरवर किती, याचे सर्वेक्षण करून त्याची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिला होता.
२००६ साली गोवा खंडपीठाने, किनाऱ्यांवर बेकायदा बांधकामे उभारल्याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यात सर्वच किनारपट्टी भागांतील पंचायतींना प्रतिवादी करून घेतले होते. किनाऱ्यांवरील बेकायदा बांधकामांवर सरकार कोणतीही कारवाई करीत नसल्याचे यापूर्वी न्यायालयात स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे भरती रेषेपासून दोनशे मीटरवर किती बांधकामे उभी राहिले आहेत, याची कोणतीही माहिती सरकारकडे नसल्याचे दिसून आले आहे.

बायणा येथे बालक बुडाला

वास्को, दि. १६ (प्रतिनिधी) - शाळेला न जाता दांडी मारून बायणा समुद्रात आंघोळीसाठी गेलेला १३ वर्षीय आसिफ जमिल अहमद दाफेदार या बालकाचे बुडून निधन झाले.पायात "बूट'न घातल्याने शाळेत घेतले नसल्याचे निमित्त सांगून अर्ध्या वाटेवरूनच घरी परतलेला आसिफ आपल्या छोट्या भाऊ व मित्राबरोबर बायणा समुद्रात आंघोळीसाठी गेला असता तेथे त्याचा काळ आला.
आज सकाळी १०.३० च्या सुमारास बायणा समुद्रात दोन बालक बुडत असल्याचे महम्मद इस्माईल या तरुणाच्या नजरेस येताच त्यांनी समुद्रात उडी मारून दोघांना समुद्राच्या तटावर आणले. मात्र त्यांपैकी आसिफ दाफेदार हा बालक यापूर्वीच मरण पोचला होता. वास्को पोलिसांच्या माहितीनुसार आज सकाळी आसिफ दाफेदार त्याचा छोटा भाऊ शेबाज व मित्र नबी हे तिघेही जण आंघोळीसाठी बायणा समुद्रात उतरले असता त्यांपैकी दोघेजण बुडायला लागले. सदर घटना येथे असलेल्या महम्मद (व्यवसायाने मिस्त्री) या इसमाच्या नजरेस येताच त्यांनी पाण्यात उडी मारून दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी होत १३ वर्षीय आसिफ गतप्राण झाला. वास्को पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला व तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आसिफची आई त्याला "अवर लेडी ऑफ कंडेलारीया' शाळेत (बायणा) पोचवण्यासाठी जात असताना अर्ध्या वाटेवर आसिफला त्याचे मित्र भेटले व आपण त्यांच्या बरोबर जात असल्याचे सांगून त्याने आईला वाटेवरूनच परत पाठविले. यानंतर काही वेळाने तो घरी परतला व शाळेमध्ये पायातील "बूट' बरोबर न घातल्याने घरी पाठविल्याचे सांगून आपला छोटा भाऊ व अन्य एका मित्रांबरोबर आंघोळीसाठी गेला व नंतर सदर घटना घडली. आंघोळीच्यावेळी आसिफ, त्यांचा छोटा भाऊ व मित्रांमध्ये जास्त पाण्यात कोण जाऊ शकतो याबाबत शर्यत लागल्याचे सूत्रांनी सांगितले. बुडत असलेल्या आसिफला सुमारे ५० मीटर आतून (पाण्याच्या) महम्मद या इसमाने बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या मयत आसिफ याची शवचिकित्सा करण्यात आल्यानंतर संध्याकाळी त्याचे पार्थिव शरीर त्याच्या नातेवाइकांकडे देण्यात आले आहे. दरम्यान मयत आसिफ हा खरोखर शाळेत गेला होता की अर्ध्या वाटेवरूनच परतला, याबाबत पोलीस चौकशी करत आहे. मयत आसिफ हा मधला भाऊ असून त्याला एक मोठा भाऊ आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

पेंडसे अहवाल फेटाळल्यासंबंधी न्यायालयाची संबंधितांना नोटिस

क्रिकेट तिकीट घोटाळाप्रकरण

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - क्रिकेट तिकीट घोटाळा प्रकरणी नेमण्यात आलेल्या पेंडसे समितीने दिलेला अहवाल सरकारने प्रथम स्वीकारला व नंतर त्यामधील एक संशयित ऍड. दयानंद नार्वेकर यांचा समावेश असलेले मंत्रिमंडळ सत्तेवर येताच तो फेटाळण्यात आला, याबद्दल ऍड. नार्वेकर, गोवा क्रीडा प्राधिकरण व राज्य सरकारने स्पष्टीकरण देण्याची नोटीस आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बजावली. एकदा स्वीकारलेला अहवाल नंतर फेटाळण्यात आल्याबद्दल ऍड. प्रणय कामत यांनी खंडपीठासमोर जोरदार युक्तिवाद केला. संबंधितांना नोटिसा बजावत त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. त्या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
हत्याकांड, रेल्वे अपघात, मोठमोठे घोटाळे झाले की, सरकार निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करतात आणि जनतेला या प्रकरणांत चौकशी करीत असल्याचा दिलास देतात. या समित्या निरर्थक असतात. अशा समित्यांमुळे त्या अध्यक्षांची मात्र सोय होते. एकतरी घटना अशी दाखवा की, राज्य सरकारने अशा समित्यांच्या अहवालावरून कारवाई केली आहे, असे मतप्रदर्शन करतानाच न्यायालयाने गोध्राप्रकरणी अहवालावर काय कारवाई झाली,असा प्रश्न उपस्थित केला.
या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समितीची स्थापना त्यावेळी करण्यात आली होती. २००३साली राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला होता. त्याचप्रमाणे या अहवालातील सूचनांचेही पालन केले जाणार असल्याचे त्यावेळी सरकारने मान्य केले होते, असा मुद्दा यावेळी ऍड. कामत यांनी आपल्या युक्तिवादात मांडला. गोवा क्रीडा प्राधिकरणाची समिती स्वतंत्र निवडणूक घेऊन निवडली जाते. त्यामुळे त्यावर राज्य सरकारचा थेट अधिकार येत नाही, असे यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणात क्रिकेट सामन्याचे आयोजन करताना लोकांना त्रास होणार नाही, अशी सूचना यावेळी न्यायालयाने केली.
६ एप्रिल २००१ साली फातोर्डा येथे भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय सामन्यावेळी बनावट तिकिटे छापल्याने ऍड. नार्वेकर यांच्यासह अन्य संशयितांवर आरोपपत्र दाखल झालेले आहेत.

शिरसई भूखंड विक्रीप्रकरणाचा तपास जिल्हाधिकाऱ्यांकडे

३० एप्रिल रोजी पुढील सुनावणी
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - बेकायदा विक्री केलेल्या शिरसई कोमुनिदादीच्या मालकीच्या भूखंडाची सखोल चौकशी येत्या दोन महिन्यांत करून ३० एप्रिलपर्यंत अहवाल न्यायालयात तसेच त्याची एकप्रत याचिकादारांना देण्याचे आदेश आज उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या चौकशीला कोमुनिदादच्या माजी समितीने पूर्णपणे सहकार्य करावे, असाही आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. २०० पेक्षा जास्त भूखंड बेकायदेशीररीत्या लाटलेले असून सुमारे १३ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा युक्तिवाद याचिकादाराच्या वकिलाने यावेळी केला. पुढील सुनावणी ४ मे ०९ रोजी ठेवण्यात आली आहे.
बेकायदा कोमुनिदाद भूखंडाची विक्री करून कोमुनिदादच्या सदस्यांनी मोठमोठे बंगले बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा मुद्दा यावेळी याचिकादाराच्या वकिलाने मांडला. त्यावेळी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा यापूर्वीच राज्य सरकारने दाखल केला असल्याची माहिती सरकारी वकिलाने खंडपीठाला दिली. कोमुनिदादची जबाबदारी आमच्याकडे होती, त्यावेळी बेकायदा काही कृत्ये झाल्याचे आज प्रतिवाद्यांनी न्यायालयात मान्य केले. त्यामुळे खंडपाठीने जिल्हाधिकारी सादर करणाऱ्या अहवालावरून नव्या कोमुनिदाद समितीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे सुचवले.
१९९८ ते २००८ या दरम्यान कोमुनिदाद समितीने बेकायदा भूखंड विकल्याने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. २००७ ते २००८ या वर्षाच्या कोणत्याही हिशेबाची नोंद ठेवण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे न्यायालयाने आदेश देऊनही म्हापसा अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक, द थिवी शिरसई सर्व्हिसेस को ऑपरेटीव्ह बॅंक व कॅनरा बॅंकेचे "चेकबुक' देण्यात आलेले नाहीत. शेकडो बेकायदा विक्री केलेल्या भूखंडाची फाईल आणि २७५ भूखंड विकलेल्या फाईल्स उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. २८ लाख ८९ हजार ७३५ रुपयांचा हिशेब नोंद नाही. त्याचप्रमाणे सेझा गोवा या खाण कंपनीला खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी १९ लाख ५० हजार रुपये आकारून कोमुनिदादची जमीन रस्ता करण्यास दिली आहे. मात्र हे लाखो रुपये बॅंकेत जमा करण्यात आलेले नाहीत, असे अनेक आरोप याचिकेत करण्यात आले आहे.

Monday 16 February, 2009

कसाबला प्रशिक्षण दिलेले पाकमधील केंद्र सापडले

नवी दिल्ली, दि.१५: मुंबईवरील हल्ल्यात अन्य दहशतवादी ठार झाले असले तरी अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानलेला आरोपी मोहम्मद अजमल कसाब हा भारताच्या ताब्यात असून आता तर त्याच्या पाकिस्तामधील प्रशिक्षण केंद्राची माहितीही उपलब्ध झाल्याने त्याने केलेल्या गुन्ह्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते. कसाबचे हे प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानातल्या डोरी या ठिकाणी आहे. कसाबचं प्रशिक्षण शिबीर शोधल्याचा दावा पाकिस्तानमधल्या "जीओ टीव्ही'ने केला आहे.
भारतापासून शंभर किलोमीटरवर पाकिस्तानातल्या डोरी या ठिकाणी कसाबचे प्रशिक्षण शिबीर सापडले आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याची तयारी डोरीतल्या घरात झाली आहे , तसे सांगणारे अनेक पुरावे तिथे सापडले आहेत. सद्यस्थितीत डोरीतले कसाबचे प्रशिक्षण शिबीर पाक पोलिसांनी सील केले असल्याची माहिती या दूरचित्रवाणी वाहिनीने दिली आहे. या सील केलेल्या घरात ब्लॅंकेट्स, चटई, इस्लामिक पूजासाहित्य, वृत्तपत्रे, भारताचा आणि मुंबईचा नकाशा, लाइव्ह जॅकेट्स, निरनिराळी पुस्तके ,अरेबिक तसेच फारसी भाषेतली काही हस्तलिखिते,फळा,खाद्यपदार्थ अशा बऱ्याच गोष्टी जिओ टीव्हीला सापडल्या आहेत. या सापडलेल्या वस्तूंवरून काही लोक त्या ठिकाणी राहत होते,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईवरच्या हल्ल्यानंतर किमान पंधरा दिवस तरी लोक रहात होते,असे डोरी गावात राहणाऱ्या लोकांनी सांगितल्याचे या वाहिनीने जाहीर केले आहे.
मात्र मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात सहाजणांना अटक केल्याची माहिती तिथल्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी दिली होती. पण आता तिथल्या काही प्रसिद्धीमाध्यमांनी सरकारच्या सूत्रांचा हवाला देऊन अशी कोणतीच अटक झालेली नाही, तर त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा सरकारने केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे यामागची पाकिस्तानची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे. तसेच पाकिस्तानात तालिबानी अतिरेकी मोठ्याप्रमाणावर असून , आमचे सरकार तसेच संपूर्ण देशच आज अस्तित्वाची लढाई लढत असल्याची धक्कादायक कबुली पाकिस्तानचे अघ्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीच दिली आहे. अमेरिकेतल्या ' सीबीएस टीव्ही नेटवर्क ' ला दिलेल्या मुलाखतीत झरदारी यांनी ही कबुली दिली आहे तर मुंबईवरील हल्ल्यात भारताच्या हाती लागलेला एकमेव अतिरेकी कसाबला तपासासाठी आपल्या ताब्यात द्या,अशी मागणी कदाचित आम्ही करू,अशी शक्यता पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. कसाब हा पाकिस्तानी नागरिक असून त्याला आम्ही शिक्षा करू, त्याला आमच्या ताब्यात द्या असेही पाकिस्तानने म्हटले आहे. यावरून पाकिस्तान किती सारवासारव करीत आहे हे समोर आले आहे.

ईएसआय प्रकल्पाची आज पायाभरणी

मडगाव, दि. १५: आरोग्य सेवेच्या नवे दालन सुरू करण्याच्या हेतूने उद्या सोमवारी दुपारी चार वाजता येथे कर्मचारी राज्य विमा ("ईएसआय') इस्पितळाचे आधुनिकीकरण व दर्जा सुधार प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते व केंद्रीय मजूरमंत्री ऑस्कर फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
याप्रसंगी राज्याचे रोजगार मंत्री ज्योकिम आलेमाव, आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर खासदार श्रीपाद नाईक, फ्रान्सिस सार्दिन, शांताराम नाईक, स्थानिक नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्राचीन संस्कृती जपणारे देश एकवटले नागपूर परिषदेत दहशतवादाविरोधात लढा देण्याचा निर्धार

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): "प्राचीन संस्कृती व सभ्यतेचे जतनः आव्हाने आणि उपाय' या संकल्पनेवर नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या परिषदेत दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी प्राचीन संस्कृती जपणाऱ्या देशांनी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. प्राचीन संस्कृती आणि सभ्यतेचे जतन ही काळाची गरज असून, आपण सर्वांनी याची पूर्तता करण्यासाठी एका व्यासपीठावर येणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन तिबेटचे पंतप्रधान सॅम डॉंग रिमपोचे यांनी यावेळी केले.
विविध धर्म व संस्कृतीच्या प्रतिनिधींच्या या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनसमयी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगातील ५२ विविध राष्ट्रांतून सुमारे ३०० प्रतिनिधींनी या परिषदेत भाग घेतला होता. तीन वर्षांतून एकदाच भरणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी गोव्यातील शिक्षणतज्ज्ञ दत्ता भी. नाईक खास उपस्थित राहिले होते. परिषदेचे आयोजन "इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडिज आणि वर्ल्ड काऊन्सिल ऑफ एल्डर्स ऑफ एन्शंट ट्रेडिशन ऍण्ड कल्चर'च्या नागपूर शाखेने केले होते.
रिमपोचे म्हणाले, "संस्कृती आणि परंपरेशिवाय जग म्हणजे आपले मूळस्थान गमावलेल्या जमावाप्रमाणे भासेल, जिथे पुनःर्स्थापनेला वाव नसेल. संस्कृती आणि परंपरा मानवाला या भूतलावरील अन्य जीवजंतूपासून वेगळी ओळख देण्यास साहाय्यभूत होते. एखादी रूढी वा सवय केवळ वर्षानुवर्षे अवलंबिली जाते म्हणून तिला परंपरा म्हणता येणार नाही. क्रियाशीलता, विचार वा युक्ती अथवा त्यामागे एखादे तत्त्वज्ञान असावे जे धार्मिक स्रोतांकडून आलेले असावे. एका योग्य संदेशवाहकाद्वारे वा माध्यमातून वा ज्याने प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहे अशा व्यक्तीकडून आलेल्या गोष्टीलाच परंपरा म्हणता येते. शिवाय ती गोष्ट बुद्धीला पटणारी व समाजाला पूरक असली पाहिजे.'
संस्कृतीच्या मुळावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, हा क्रियाशीलतेचा एक भाग आहे. सुरुवातीला केवळ "प्रकृती' वा निसर्ग होता. त्याचे रूपांतर मग "संस्कृती'त झाले. या संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास त्यास "विकृती'च्या दिशेने नेतो, असे दिसून येते. एखाद्या व्यक्तीचे मन व मतपरिवर्तनास संस्कृती म्हणता येईल. पाश्चिमात्य या शब्दाचा वापर करून केवळ सांस्कृतिक दहशतवाद वा सांस्कृतिक युद्धास खतपाणी घातले जात आहे. या उलट पूर्वेकडील राष्ट्रांत अद्याप संस्कृतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. मेधे यांनी संस्कृती आणि सभ्यतेसह विज्ञानाचे महत्त्व विषद केले. परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्र सेविका समितीच्या प्रमिलाताई मेधे यांनी भूषवले.

सरपंचांसह सत्तारुढ गट अनुपस्थित पंचायत बरखास्तीची कोलवाळ ग्रामसभेत मागणी

कोलवाळ, दि. १५ (वार्ताहर): अपूर्ण अवस्थेत राहिलेली कोलवाळची ग्रामसभा आज सचिव, विरोधी गट व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली तरी अखेरपर्यंत सरपंच व सत्तारुढ गटाचे सदस्य तसेच निरीक्षक अनुपस्थित राहिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. देविदास वारखंडकर, देवानंद नाईक, झेवियर डिसोझा व ज्योती पेडणेकर हे चारच पंच व्यासपीठावर होते. सरपंचांना जनतेला सामोरे जात येत नसेल तर पंचायतच बरखास्त करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
भंगार अड्डे, मोबाईल मनोरा, मार्केट, गटारे, रस्ते, स्मशान, पाणीपुरवठा आदी समस्या गावाला भेडसावत असताना, यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरे देता येणे शक्य नसल्याने सरपंच विठु वेंगुर्लेकर व त्यांचे समर्थक सदस्य अनुपस्थित राहिल्याचा सूर या ग्रामसभेत व्यक्त झाला. ज्येष्ठ नागरिक सुभाष हर्ळणकर यांना अध्यक्षस्थानी बसवून, सचिव बिपीन कोरगावकर यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. यापूर्वी विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले, कारण त्यांच्याविरुद्ध सुडभावनेने राजकीय पातळीवरून तक्रारी करण्यात आल्या, असे मत हळर्णकर यांनी व्यक्त केले. गेली काही वर्षे विद्यमान आमदार निळकंठ हळर्णकर हे सरपंच होते, तथापि त्यांनी काहीही विकास केला नाही, मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी युती झाल्याने ते निवडून आले. गावच्या समस्या उपस्थित करणाऱ्यांनाच त्यांच्या रोषास पात्र व्हावे लागते, याबद्दल रुद्राक्ष नाईक यांनी संताप व्यक्त केला. सरपंच जर लोकांना सामोरे जाऊ शकत नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रामदास नाईक यांनी केली.
आठवड्यातून एकवेळ पंचायतीत आमदारांनी येण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून, ते यासंबंधी सरपंचांना पूर्वकल्पना देतात का,असे साजू गावकर यांनी विचारले. मिनेझीस यांनी आमदारांनी ग्रामसभेला यावे,अशी सूचना केली. सोमवारी पंचसदस्यांची बैठक होते, त्यावेळी ग्रामस्थांनी जमावे, अशी सूचना राजू गावकर व रामदास नाईक यांनी केली असता, सर्वांनी सहमती दर्शविली. पंचायत विसर्जित करा आणि संबंधित गैरप्रकार तपासासाठी "व्हिजिलन्स'कडे पाठवा अशी जोरदार मागणी उपस्थितांनी केली.
वेर्ला काणका, दि. १५ (वार्ताहर): सरकार आमच्या सहनशीलतेचा अंत आणखी किती काळ पाहणार? पर्यावरण व आरोग्याशी सुरू असलेला खेळ आता पुरे झाला. सरकारने "रिव्हर प्रिन्सेस' हे जहाज त्वरित हटवावे अन्यथा जनतेलाच ते हटवावे लागेल, असा इशारा आज सुमारे पाचशे कळंगुटवासीयांनी मोर्चाद्वारे देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
गेल्या नऊ वर्षांपासून हे तेलवाहू जहाज कांदोळी किनाऱ्यावर रुतले आहे. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच स्थानिकांच्या आरोग्यालाही धोका उत्पन्न झाला आहे. मात्र, सरकारची चालढकल सुरू असल्याने लोकांचा संताप अनावर होत चालला आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास स्थानिकांनी सरकारला कडक इशारा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला. यात महिला व मुलांचा मोठा सहभाग होता. एक-दो एक-दो रिव्हर प्रिन्सेस फेक दो अशा घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी सारा परिसर दणाणून सोडला. महिला व मुलांनी सरकारचा निषेध करणारे फलक हाती घेतले होते. विशेष म्हणजे या मोर्चात काही जागरुक परदेशी पर्यटकही सामील झाले होते. नंतर या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.
याप्रसंगी डॉ. ऑस्कर रिबेल्लो यांनी दिगंबर कामत सरकारला हे जहाज त्वरित हटवण्याचा इशारा दिला. सरकार फक्त टोलवाटोलवी करत आहे. लोकांचे आरोग्य व पर्यावरणाचा मुद्दा या जहाजामुळे गंभीर बनला आहे. राजकीय नेते फक्त पैसा करण्यात मग्न आहेत. सरकारला जर हे जहाज हटवता येत नसेल तर आता स्थानिकच एकत्र येऊन ते हटवतील, असे ते म्हणाले.
स्थानिक महिला श्रीमती मामा सिसिलिया यांनीही सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार कोरडे ओढले. त्याखेरीज अन्य वक्त्यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. सभा संपल्यानंतर स्थानिक आमदार आग्नेल फर्नांडिस तेथे प्रगटले. नंतर त्यांची याप्रश्नी आंदोलकांशी चर्चा झाली.

Sunday 15 February, 2009

हुबळीनजीक अपघातात वास्कोतील तीनजण ठार

आठजण गंभीर; नवे वाडे परिसरावर शोककळा
बेळगाव व वास्को, दि. १४ (प्रतिनिधी) - कर्नाटकातील हुबळीनजीक राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ४) मन्सूर ब्रिजपाशी आज पहाटे ४.१५ च्या सुमारास क्वालिस जीप (जीए ०६ ए ४१०१) व ट्रक (केए १८ ए २७४) यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन घडलेल्या भीषण अपघातात वास्कोतील तिघे ठार, तर आठजण गंभीर जखमी झाले. त्यामुळे वास्कोतील नवे वाडे परिसरावर शोककळा पसरली आहे. सर्व जखमींवर हुबळीतील कर्नाटक मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत.
धारवाड ग्रामीण पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक के. एस. रायमणी यांनी दिलेल्या माहितीनुसार जेथे हा अपघात घडला तेथे रस्ता दुभाजक नव्हते. मृतांची नावे लक्ष्मण गंगाधर, अनिल गंगाधर व शिकंदर देसाई अशी आहेत. त्यापैकी लक्ष्मण हा काका असून अनिल हा त्याचा पुतण्या होता. हे दोघे जागीच ठार झाले, तर सिकंदर देसाई हा उपचारासाठी इस्पितळात नेले जात असताना मरण पावला.
हे सर्व जण एका विवाहासाठी कौशिक नाईक यांची भाड्याची गाडी करून हुबळीला निघाले होते. मन्सूर ब्रिज येथे ते पोहोचले असता त्यांची गाडी व ट्रक यांची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, क्वालीसमधील दोघे जागीच ठार झाले. जखमींच्या किंकाळ्यांनी सारा परिसर दणाणून गेला. अनिल केशव, विठ्ठल कोल्हापुरे, सुनिता गंगाधर, प्रभाकर मणिक, महेश कोल्हापुरे व अरविंद गंगाधर (पाच वर्षांचा मुलगा) अशी जखमींची नावे आहेत. अरविंद याचा अपवाद वगळता जखमी झालेले सर्वजणांचे वय सुमारे तीसच्या आसपास आहे. अपघातग्रस्त ट्रकच्या चालकाला धारवाड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या अपघातात ठार झालेल्या सिकंदर देसाई याचे वास्कोत "साफा' हे अत्याधुनिक केशकर्तनालय आहे. अनिल गंगाधर व लक्ष्मण गंगाधर हे नवे वाडे येथील अन्य केशकर्तनालयात कामाला होते. या तिघांच्या मृत्यूचे वृत्त नवे वाडे येथे येऊन थडकताच नवे वाडे भागावर शोककळा पसरली. तेथील नाभिकांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना आदरांजली अर्पण केली. अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यातील काही जण या तिघांचे मृतदेह आणण्यासाठी तातडीने हुबळीला रवानाझाले.

तालिबानचा पाकिस्तानवर ताबा मिळविण्याचा इरादा

आमची आता अस्तित्वाची लढाई : झरदारी

न्यूयॉर्क, दि. १४ ः अमेरिकेचे नवे प्रशासन आणि भारताच्या वाढत्या दबावामुळे आता पाकिस्तान दहशतवादासंदर्भात आपली भूमिका स्वीकारण्यास बाध्य झाला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या षडयंत्राचा काही भाग पाकमध्ये रचण्यात आल्याची कबुली दिल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी तालिबानने पाकिस्तानचा बराच मोठा भूभाग व्यापला असून आता तर ते आमच्या देशावरच ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे मान्य केले आहे.
नाका तोंडात पाणी शिरल्यामुळे तसेच पाकला स्वत:च्या अस्तित्वाचा धोका वाटत असल्यामुळेच अखेर बऱ्याच मोठ्या भूभागावर तालिबानचा ताबा असूून ते संपूर्ण पाकिस्तानलाच गिळंकृत करण्याच्या इराद्याने पुढे सरकत असल्याची माहिती झरदारी यांनी दिली आहे. आजवर तालिबानच्या वाढत्या कारवाया आणि प्रभाव नाकारणाऱ्या पाकच्या भूमिकेत अचानक चकित करणारे परिवर्तन झाले आहे. आमच्या लष्कराची शक्ती वाढली नाही. तसेच त्यात अनेक त्रुटी आहेत. नेते केवळ तोंडाने फुशारक्या मारत राहिले. परिणामी तालिबानी त्यांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे आमच्या सैन्यालाच डोळे दाखवायला लागले आहेत. पाकिस्तानी लष्करातील उणिवांचा तालिबानने लाभ घेतला असे स्पष्टीकरण सीबीएस न्यूजशी बोलताना झरदारी यांनी दिले.
पाकिस्तानच्या आदिवासी (कबायली) भागात तालिबान व अल-कायदाने आपली स्थिती मजबूत केल्याची प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ओबामा यांनी व्यक्त केली होती हे येथे उल्लेखनीय! पाकिस्तान दहशतवादाविरोधातील लढ्यात किती मजबूत सहकारी म्हणून पुढे येतो, तेच आता बघावे लागेल असेही ते म्हणाले होते.
पाकने सध्या तालिबानचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात १ लाख २० हजार सैनिक तैनात केले आहेत. हा लढाही अमेरिकाच देत असल्याची पाकच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र झरदारी यांनी हा दावा फेटाळून लावताना आम्ही कोणावरही उपकार करीत नाही. पाकवर ताबा मिळविण्याचे तालिबानने षडयंत्र रचले असून त्याची आम्हाला जाण आहे आणि त्यामुळे स्वत:च्या अस्तित्वासाठी लढणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो असे स्पष्ट केले.
लष्कर आणि गुप्तचर एजन्सीमधील अस्थिरतेच्या अफवा खारीज करताना, लष्कर सरकारसोबत नसते पाकिस्तानवर तालिबानने केव्हाच ताबा मिळविला असता. अतिरेक्यांचे इरादे घातक असून त्यांच्याविरुद्ध सैन्य संपूर्ण शक्तीचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

संगीत नाटकांच्या संजीवनीसाठी खास नाट्यशाळा स्थापणे गरजेचे

मराठी नाट्यसंमेलनाध्यक्ष रामदास कामत यांचे प्रतिपादन

बीड,(केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरी) दि. १४ - संगीत नाटकांना नवसंजीववनी देण्यासाठी शासकीय पातळीवर एनएसडीच्या धर्तीवर "स्कूल ऑफ म्युझिकल ड्रामा' स्थापन करण्याची गरज आहे. त्यामुळे संगीत नाटकांचे प्रयोग राज्यात आणि राज्याबाहेरदेखील होतील. तसेच कलावंतांना रोजगारही मिळेल असे प्रतिपादन बीड येथे ८९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांनी केले.
संमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांनी संगीत नाटक व मराठी रंगभूमीबद्दलचे आपले विचार प्रभावीपणे मांडले. विशेषतः संगीत नाटकाला पुन्हा एकदा भरभराटीचे दिवस यावेत यासाठी त्यांनी काही योजनाही सुचविल्या. संहितांचा अभाव असल्याने संगीतप्रधान नाटके थंडावली असल्याचे ते म्हणाले. अशा नवीन नाटकांसाठी स्वतंत्र कार्यशाळा भरवावी, मात्र केवळ नाटकात गाणी घातली म्हणजे ते संगीत नाटक होत नाही तर ज्या नाटकांतून गाणी वगळली तर ते नाटकच पुढे जाऊ शकत नाही, असे नाटक म्हणजे संगीत नाटक ! संगीत नाटक आनंदाचे, सुगंधाचे सुखनिधान असायला हवे. पारंपारिक प्रकृतीची संगीत नाटके जरी लिहिली नाही तरी सहज प्रकृतीची नाटके रंगभूमीवर आवश्यक यावी असे त्यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप रामदास कामत यांनी, "सर्वात्मका सर्वेश्वरा' या नाट्यपदाने करताच श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला...
त्यापूर्वी कै.केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरीत अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या ८९व्या मराठी नाट्यसम्मेलनाचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.या कार्यक्र माला मान्यवरांसह ५० हजारांपेक्षा अधिक नाटयरसिक उपस्थित होते. मावळते अध्यक्ष रमेश देव यांनी अध्यक्षपदाची सूत्रे ज्येष्ठ गोमंतकीय गायक तथा रंगकर्मी रामदास कामत यांच्याकडे सुपूर्द केली.
नाट्रयसंम्मेलनाच्या शानदार उद्घाटनापूर्वी बीड शहरातून नाटयदिंडी निघाली. या दिंडीमध्ये रामदास कामत,मोहन जोशी,दिलीप प्रभावळकर,विक्रम गोखले,स्मिता तळवळकर,नीलम शिर्के,भार्गवी चिरमुले आदी कलावंत सहभागी होते.हत्ती,घोडे,उंट यामुळे दिंडीला आगळीवेगळी शोभा आली.
दिंडीनंतर आद्यकवी मुकुंदराज रंगमंचावर उद्घाटन सोहळा झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी,"मराठी कलावंतांमुळे महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्टया गौरवशाली इतिहास लाभला. मराठी कलावंतानी आपली कला सातासमुद्रापार न्यावी मात्र इथल्या मातीशी असलेली नाळ तोडू नये', त्यांची कला पुण्यामुंबई पुरतीच मर्यादित न ठेवता ती जिल्ह्या जिल्ह्यापर्यंत नेली पाहिजे.
तालुक्याच्या ठिकाणी छोटी छोटी नाट्यगृहे उभारण्याच्या योजनेला अधिक गती दिली जाईल. यामुळेच कलावंतांना आपली कला अधिक वृद्धिंगत करता येईल. ग्रामीण भागातूनच मकरंद अनासपूरे सारखा कलावंत पुढे आला याचा आम्हाला अभिमान असून अशा कलावंतांमुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या मागणी संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी मकरंद अनासपूरे यांच्या स्वप्नांचा उल्लेख करीत या मार्गासाठी राज्य सरकार आपला दोनशे कोटी रूपयांचा हिस्सा देईल याचा पुनरूच्चार केला. बीडकरांच्या अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन सर्वातोपरी प्रयत्न करील. मराठवाडयात विमानतळे झाली पण रेल्वे लाईन आली नाही अशी खंतही मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सम्मेलनाध्यक्ष रामदास कामत,रमेश देव,मकरंद अनासपुरे,मंत्री बबनराव पाचपुते, सार्वजनिक बांधकाममंत्री विमलताइर्‌र मुंदडा,मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कसाबवर दोन दिवसांत आरोपपत्र - ऍड. निकम

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - मुंबईवरील हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेला पाकिस्तानचा एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब याच्या विरोधात येत्या दोन दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाणार असून या हल्ल्याची सुनावणी पाकिस्तानात घेण्यात अर्थ नाही, असे मत आज महाराष्ट्राचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानातून "हॉटेल ताज'मध्ये नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना मिळणारे आदेश आणि हल्ल्याचा पाकिस्तानात शिजलेला कट याचे सर्व पुरावे आमच्याकडे असून आता केवळ त्याची सांगड घातली जाणार आहे. शिक्षणाचा अभाव, गरिबी आणि धर्माविषयीचे चुकीचे शिक्षण देऊन त्यांना दहशतवादी बनवले जाते. त्यामुळे दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात युद्ध हा पर्याय नसून दहशतवाद्यांना घडवणाऱ्या त्या मानसिकतेवर हल्ला केला पाहिजे, असे ऍड. निकम म्हणाले.
पणजीतील मेकॅनिझ पॅलेसमध्ये ते आज गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील रोट्रॅकने आयोजिलेल्या दोन दिवसांच्या परिषदेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आशिष वेर्लेकर, परेश पालेकर, परेश रिवणकर, गुरुदत्त भक्ता व सचिन मेंडुस उपस्थित होते. इलॅक्ट्रॉनिक मीडियाने काय दाखवावे आणि काय दाखवू नये, यासाठी कायदा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, मुंबई हल्ल्याच्या वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या माहितीच्या आधारे हॉटेलात तळ ठोकलेल्या दहशतवाद्यांना आदेश मिळत होते, असे ऍड. निकम यांनी सांगितले.
बिनतोड युक्तिवादांद्वारे दहशतवाद्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणाऱ्या ऍड. निकम यांनी आपल्या मुख्य भाषणाच्या वेळी स्वतः रचलेल्या कविता सादर करून उपस्थितांकडून टाळ्या मिळवल्या.
स्वतःविषयी बोलताना ते म्हणाले, "वडिलांच्या इच्छेने मी कायद्याचे शिक्षण घ्यायला महाविद्यालयात प्रवेश घेतला; परंतु मन काही रमत नव्हते. त्यामुळे संतापाने वर्गात बसल्या बसल्या कविता सुचत होत्या. सर्वांत आधी केलेली कविता ही की " बायको कोणाला म्हणावं'
दोनच धर्म
दहशतवाद्यांना कोणतीच जात किंवा धर्म नसतो. परंतु, त्याचा एकच उद्देश असतो आणि त्यासाठी ते लढतात. मला वाटणारे दोनच धर्म आहे. एक राष्ट्रप्रेमी आणि दुसरा राष्ट्रद्रोही. यातील काही स्वयंघोषित स्वतःला स्वातंत्र्यसेनानी म्हणवून घेतात. मात्र ते कधीच तसे होऊ शकत नाहीत. कारण स्वातंत्र्यसैनिकत्र निष्पाप लोकांना ओलिस ठेवत नाहीत. आजच्या तरुणांची आणि तरुणींची चाल ही कुलवंताची चाल असली पाहिजे. त्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
फिदायीन हल्ला हा नवीन प्रकार सुरू झाला असून दोन समाजामधे दरी वाढत असल्यानेच हे विचार रुजवले जात आहे. भारतात सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांद असल्यानेच भारतात जास्त दहशतवादी हल्ले करून येथील शांतता आणि सलोखा बिघडवण्याचे काम सुरू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
काही कायदे बदलणे गरजेचे आहे. भारतात नरसंहार करण्यासाठी दहशतवादी आयात केले जातात. भारतातील सुरक्षा व गुप्तहेर यंत्रणा काय काम करतात, याचाही आढावा घेतला पाहिजे, ही जाणीव मुंबई हल्ल्यानंतर झाली. या हल्ल्यामुळे देशाला बरेच काही शिकण्यासही मिळाले, असे ते शेवटी म्हणाले.

अमेरिकन हल्ल्यात २६ तालिबानी ठार

वाना (पाकिस्तान), दि. १४ - पाकिस्तानच्या दक्षिण वजिरीस्तान क्षेत्रात अफगाणिस्तान सीमेजवळ अमेरिकने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात २६ तालिबानी मारले गेले, तर अन्य ७ अतिरेकी जखमी झाले.
अमेरिकी विमानांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आमचे २६ सदस्य मारले गेले असे एका तालिबानी कमांडरने सांगितले. ठार झालेल्यांमध्ये बहुतेक उझबेकिस्तानी अतिरेकी आहेत. अल-कायदाचा या क्षेत्रातील प्रमुख बैतुल्लाह मसूदला लक्ष्य बनवून अमेरिकी विमानांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात आणखी किती नुकसान झाले त्याचा तालिबान आढावा घेत असल्याची माहितीही त्याने दिली.