Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 7 May, 2011

फलोत्पादन महामंडळात ८.४० लाखांचा घोटाळा

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
फलोत्पादन महामंडळात ८.४० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. महामंडळाच्या भाजी विक्री केंद्रांवर जाऊन पैसे गोळा करण्याचे काम पाहणारा कंत्राटदार अंबरीश एन. गावकर यांच्या विरोधात ही तक्रार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश तेंडुलकर यांनीचदाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी १४२, ४०३ व ४०९ कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे.
अधिक माहितीनुसार, राज्यात विविध ठिकाणी असलेल्या भाजी विक्री केंद्रांतून गोळा केलेले हे लाखो रुपये महामंडळाकडे पोचलेच नसल्याचा दावा श्री. तेंडुलकर यांनी तक्रारीत केला आहे. हे पैसे आणण्याचे काम अंबरीश गावकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र, ६ ते १८ एप्रिल या दरम्यानचे सुमारे ८ लाख ४० हजार रुपये महामंडळाकडे पोचलेलेच नाहीत. केंद्रांवर भाजी विक्री केल्यानंतर जमलेले पैसे हे महामंडळात जमा करणे बंधनकारक होते. त्यातून संबंधित केंद्रांवर किती भाजीविक्री झाली हे ठरवून त्यानुसार त्यांना पैसे दिले जातात. मात्र, या भाजी विक्रेत्यांचे पैसेच महामंडळाकडे पोचले नसल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.
संशयित श्री. गावकर हे बाराजण, सत्तरी येथे राहणारे असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments: