Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 September, 2010

सीबीआयकडून मिकींची चार तास चौकशी

-बॅंक खाती गोठविली
-तीन मोबाईल जप्त

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): माजी मंत्री मिकी पाशेको यांची आज बांबोळी येथील "सीबीआय'च्या कार्यालयात चार तास चौकशी करण्यात आली, तसेच त्यांची बॅंक खातीही गोठवण्यात आली असून तीन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली येथून गोव्यात आलेल्या "सीबीआय'च्या पथकाने ही चौकशी केली.
"सीबीआयला काय चौकशी करायची आहे ती त्यांना करू दे, मला त्यांच्या चौकशीच्या आड यायचे नाही. त्यांना जी काय माहिती पाहिजे होती, ती मी त्यांना दिलेली आहे. यापूर्वीही माझी बॅंक खाती गोठवण्यात आली होती व मोबाईलही जप्त केले होते", असे श्री. पाशेको "सीबीआय'च्या चौकशीला सामोरे जाऊन आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
मिकी पाशेको यांची गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा बॅंक खाती गोठवण्यात आली आहेत, तर त्यांचे सर्व मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. तसेच, त्याच्या कार्यालयाची झडतीही घेण्यात आली असून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. मिकी पाशेको बनावट कागदपत्रांद्वारे लोकांना विदेशात पाठवण्याच्या रॅकेटमध्ये गुंतल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केल्यानंतर याची सीबीआय मार्फत चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, मिकी बरोबर पेद्रू आन्तानीयो जोयस हा गोव्यात परतला आहे. सारा व मिकी चालवत असलेल्या एका एजन्सी मार्फत २००७ मध्ये तो अमेरिकेत एका जहाजावर नोकरीसाठी गेला होता. परंतु, त्याच्या कागदपत्रांत घोटाळा असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाल लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. तसेच तुरुंगात टाकण्यात आले होते.
पेद्रू याने अधिक कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. "मिकी हे आमदार असून तेे सर्वांना मदत करतो. लोकांनी विदेशात जाण्यासाठी लागणारी सर्व मदत त्यांच्याकडून मिळते. त्यामुळे अनेकांना विदेशात नोकरीला जायला सोयीस्कर झाले आहे. माझा व्हिसा हा "फ्रान्सा ट्रॅव्हल एजन्सी'कडून मिळाला होता' अशी माहिती पेद्रू यांनी दिली आहे.
या एजन्सीचे कार्यालय मिकी यांच्या घराच्या तळ मजल्यावर असून त्या एजन्सीचा परवाना हा सारा या तिच्या पहिल्या बायकोच्या नावावर आहे. २००३ सालापासून ही एजन्सी कार्यरत आहे. श्री. पाशेको यांनी यापूर्वीच आपण ही एजन्सी सोडलेली आहे, असे स्पष्ट केले आहे. तसेच, "सारा' ही अजूनही ही एजन्सी चालवते की नाही, हे आपल्याला माहीत नाही, असेही मिकी यांना म्हटले आहे.
आत्तापर्यंत या एजन्सीच्या माध्यमातून सुमारे २०० जणांना विदेशात नोकरीसाठी पाठवण्यात आले आहे. विदेशातून मागणी असल्यानेच या तरुणांना नोकरीसाठी पाठवल्याचे सीबीआयला दिलेल्या जबानीत सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

गणा धाव रे...

आज श्रीगणेशाचे आगमन
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) उत्सवप्रिय गोमंतकीय जनता श्री गणरायाच्या आगमनासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा मात्र मंगलमूर्तीच्या स्वागतावेळी "गणा धाव रे, मला पाव रे' असा धावाच करण्याची वेळ गोमंतकीय जनतेवर ओढवलेली आहे. उद्या ११ रोजी राज्यात गणेशोत्सवाला धूमधडाक्यात प्रारंभ होत आहे. राज्यात दीड, पाच, सात, नऊ, अकरा व काहीठिकाणी एकवीस दिवस श्री गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. घरोघरी श्री गणेशपुजनासह विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांचीही रेलचेल या दिवसांत राहणार आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरी भाग काही दिवस ओस पडणार आहेत. चाकरमानी लोक व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित झालेली मंडळी हा सण साजरा करण्यासाठी आपल्या गावांकडे निघाले आहेत. या सणाची खरी मजा ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, आर्थिक मंदीमुळे अनेकांवर ओढवलेली बेकारीची कुऱ्हाड, अनेक वर्षे नोकरीत कायम होणार या एका आशेने राबणारे कंत्राटी कामगार, बेदरकार खाण व्यवसायामुळे विध्वंसाच्या उंबरठ्यावरील असलेले लोक, विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी अपरिमित हानी अशा अनेक संकटांना सामोरे जाताना सर्वसामान्य जनता या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी गणरायाला विनवणीच करणार आहेत.
जीवनात कितीही संकटे असली किंवा दुःख असले तरी या सणाच्या निमित्ताने ती काही काळ का होईना, पण बाजूला सारून भक्तमंडळी आपल्या भविष्याची संपूर्ण मदार श्री गणरायावरच टाकतात.प्रत्यक्ष देव आपल्या घरी पाहुणा म्हणून राहायला येतो, या भावनेने प्रत्येकजण यथाशक्ति आपल्या कुवतीनुसार देवाची भक्ती करतात व आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थनाही करतात. या गणेशोत्सवाच्या उत्सवामुळे धार्मिक सलोख्याचेही चित्र आपल्याला पाहायला मिळते.हिंदूंच्या या सणाला ख्रिस्ती तथा मुस्लिमबांधवही भेट देतात व या आनंदात सामील होतात.अनेक हिंदू या सणाच्या निमित्ताने फराळ व इतर खाद्यपदार्थ आपल्या ख्रिस्ती व मुसलमानबांधवांना पोहचवत असतात. हा आवडता सण राज्यभरात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा होणार असल्याने या काळात बहुतांश व्यवहार व सरकारी कामकाजालाही काही काळ विश्रांती मिळणार आहे.

'त्या' टोळीतील आणखी एक फरारी गुंड गजाआड

-आता शोध सूत्रधाराचा
-आंतरराज्यीय टोळीशी संबंध
-अनेक गुन्ह्यांत सहभाग

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): कळंगुट येथे अटक करण्यात आलेल्या टोळीचा चौथा साथीदार मायकल फर्नांडिस याच्या मुसक्या आज कोलवा येथे आवळण्यात आल्या. कळंगुट येथे गेस्ट हाउसवर त्याला अटक करण्यासाठी छापा टाकला असता तेथून पळून जाण्यात तो काल यशस्वी ठरला होता. शिवोली येथून फरारी झालेला मायकल याला आज सायंकाळी कोलवा समुद्र किनाऱ्यावरील एका झोपडीत लपून बसलेल्या ठिकाणाहून अटक करण्यात आली, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. राज्यात संघटित गुन्हे वाढत असल्याने पोलिसही खडबडून जागे झाले आहेत. मायकल हा या टोळीचा प्रमुख असून तो सूत्रधार जेनिटो याचा उजवा हात म्हणून ओळखला जातो, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या टोळीची पाळेमुळे खोलवर रुजल्याची माहिती हाती लागल्याने त्या सर्वांचा प्रमुख जेनिटो याला ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
दरम्यान, काल रात्री पोलिसांनी याच टोळीचा आणखी एक साथीदार संदीप पुजारी याला अटक केली. जेनिटो याच्यासाठी आम्ही काम करीत असल्याची माहिती या टोळक्याने दिल्याचे कळंगुट पोलिसांनी सांगितले. तसेच या टोळीचे हैदराबाद व बंगळूर येथील गुंडाच्या टोळीशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे.
काल अटक करण्यात आलेला मूळ नागालॅंड येथील यान जॉन यांन हाही जेनिटो याचा खास माणूस म्हणून ओळखला जातो. त्याचा अनेक प्रकरणात त्याचा सहभाग आहे. केपे येथे धेंपो खाणीवरील कामगारांचे वेतनाचे लाखो रुपये घेऊन जाताना लुटलेल्या प्रकरणात तसेच जुने गोवे येथे विनय फडते याच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यातही याच जॉन यांन याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरोडा आणि हत्या करण्यासाठी लागणारी हत्यारे जेनिटो पुरवीत होता, असेही या टोळीने उघड केल्याने आता पोलिसांनी जेनिटो याला ताब्यात घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
तुरुंगात जॉन यांग याच्याशी मैत्री...
खाणीवर घेऊन जाणारी लाखो रुपयांची रक्कम लुटलेल्या प्रकरणात जॉन यांग हा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात त्याला अटक झाली होती. यावेळी त्याला ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते तेथे त्याची जेनिटो याच्याशी मैत्री झाली. जेनिटो या शिरदोण येथे झालेल्या टोळीयुद्धात दुहेरी खून प्रकरणात कोठडीत होता. जेनिटो या प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर त्यानेच जॉन यांग याला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
पोलिसांशी साटेलोटे...
जेनिटो याचे काही पोलिसांशी घनिष्ठ संबंध असल्याचेही बोलले जाते. जुने गोवे येथे विनय फडते याच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात जेनिटो याच्या टोळीचा हात असल्याचे उघडकीस आले होते. परंतु, त्याला ताब्यात घेण्यासाठी बरीच टाळाटाळ करण्यात आली होती. एका प्रकरणात एका पोलिस शिपायावर कारवाई होण्याची पाळी आली होती, अशी माहिती सूत्राने दिली. संघटित टोळी चालवणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात येत नसल्यानेही पोलिस या टोळ्यांना मोठी संधी देत असल्याचे बोलले जात आहे.
१६ ते ३५वर्षांचे तरुण सहभागी
ऍड. आयरिश रोड्रिगीस याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ही टोळी नावारूपाला आली होती. त्यावेळी या टोळीतील अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शिरदोण येथे झालेल्या टोळी युद्धानंतरही हे टोळी गाजली होती. यात अनेक तरुणांची भरती करण्यात आली असून त्यांना मौजमजा करण्यासाठी लागणारी सर्व सुविधा पुरवल्या जातात. तसेच त्याच्या बदल्या त्यांच्याकडून गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया करून घेतल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विजेच्या धक्क्याने स्वयंपाक्याचा मृत्यू

वाळपई, दि. १० (प्रतिनिधी): वाळपई येथील दातये हॉटेलमधील स्वयंपाकी ज्ञानेश्वर नारायण नाईक (३५) याचे आज विजेचा धक्का लागून निधन झाले. ज्ञानेश्वर हा महाराष्ट्रातील मांगेली-तळेवाडी येथील रहिवासी होता.
वाळपई पोलिस उपनिरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर नाईक या हॉटेलमध्ये स्वयंपाक करीत होता. सकाळी १०.१५ च्या सुमारास ज्ञानेश्वरने गॅस पेटवितेवळी कागदासाठी खिडकीच्यावर हात घातला, तेथील लोखंडी सळीला त्याचा स्पर्श होताच, तो तत्काळ खाली पडला. तेथील फॅनची एक वायर तुटलेली आढळली, त्याचाच स्पर्श सळीला झाल्याने ज्ञानेश्वरला जबरदस्त धक्का बसला व तो तेथेच गतप्राण झाला. ज्ञानेश्वरला लागलीच शासकीय इस्पितळात नेण्यात आले पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. उपनिरीक्षक नारायण पवार यांनी पंचनामा केला.
ज्ञानेश्वर याच्यामागे पत्नी व एक मुलगा आहे. कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर संकट कोसळले आहे.
दरम्यान, सोलये-सत्तरी येथे आज सकाळी कृष्णा रामा गावडे या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला.या घटनेचा पंचनामा उपनिरीक्षक चंद्रकांत नाईक यांनी केला.

कुराण जाळण्याचा निर्णय अखेर धर्मगुरुंकडून मागे

वॉशिंग्टन, दि. १० : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ फ्लोरिडातील एका लहान चर्चचे धर्मगुरू यांनी ११ सप्टेंबर रोजी पवित्र कुराणाच्या प्रतीचे दहन करण्याचे प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे.
न्यूयॉर्कमधील ग्राऊंड झिरो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे हे आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर हे आंदोलन अन्यत्र नेण्याचे जाहीर करण्यात आले होते. अमेरिकेचे संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी धर्मगुरु टेरी जोन्स यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. अशा कृत्यामुळे जगभरात तैनात असलेले आणि विशेषत: मुस्लिम देशांमध्ये असलेल्या अमेरिकी सैनिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो, असे गेट्स यांनी जोन्स यांना पटवून दिले होते.
आता आंदोलन मागे घेतले तरी फ्लोरिडा चर्चचे धर्मगुरु टेरी जोन्स यांची ग्राऊंड झिरो येथे बांधण्यात आलेली मशीद अन्यत्र हलविण्याची मागणी कायम आहे. ही मागणी येथील इस्लामिक सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. मात्र, या आठवड्याअखेर आपण न्यूयॉर्कला जाणार असून मशीद हलविण्याबाबत सेंटरचे अधिकारी अब्दुल रौफ यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे जोन्स यांनी सांगितले.
मशीद हलविण्याच्या जोन्स यांच्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले असले तरी त्यांनी कुराण जाळण्याचे आंदोलन मागे घेतल्याने जगभरातील विविध देशांचे नेते आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
मुस्लिम जगतात अमेरिकेची प्र्रतिमा बदलण्याचा ओबामा प्रशासनाचा प्रयत्न चालू असतानाच अशा घटनांमुळे त्याला तडा गेला असता, असे एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत घुसले दोन अतिरेकी

सावधानतेचा जनतेला इशारा
मुंबई, दि. १० : सर्व दुःखांचे हरण करणाऱ्या विघ्नहर्त्या श्रीगणेशाचा उत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच, गणेशोत्सवाच्या काळात घातपात घडवण्यासाठी दोघे परदेशी अतिरेकी मुंबईत घुसले असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, मुंबईतील नागरिकांना सतर्क राहण्याचा व सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. दोन विदेशी संशयित अतिरेकी मुंबईत घुसले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊन घातपात घडवण्याचा त्यांचा कट आहे. कलीमुद्दीन खान ऊर्फ रामेश्वर पंडित (वय २५) आणि हाफिज शरीफ (वय २८) अशी या दोन संशयित अतिरेक्यांची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी आज दिली. एवढेच नव्हे तर या दोघा संशयित अतिरेक्यांची रेखाचित्रेही पोलिसांनी जारी केली आहेत. या दोघांची माहिती मिळाल्यास मुंबई पोलिसांच्या २२६३३३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाची धामधूम सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच, अतिरेकी हल्ल्याचे सावट निर्माण झाल्याने पोलिस तसेच सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

समितीला डावलून महामार्गाच्या प्रक्रियेला वेग!

वीज मंत्र्यांनीही नोंदविला केंद्राकडे आक्षेप
पणजी, दि.१० (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग ४ (अ)च्या नियोजित भूसंपादनाला बहुसंख्य भागातून तीव्र विरोध होत आहे. राज्य सरकारतर्फे याप्रकरणी एकमत साधण्यासाठी सभागृह समितीची स्थापना केली असली तरी केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून "एनएचएआय' हा प्रकल्प आपल्या मर्जीनुसारच पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. आहे.
"एनएचएआय' कडून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) चे काम ताबडतोब हाती घ्यावयाचे असून "हॉटमिक्स प्लांट' उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. राज्य पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी मात्र याप्रकरणी कडक धोरण अवलंबिले आहे. जोपर्यंत नियोजित महामार्गाचे योग्य पद्धतीने आरेखन होत नाही व प्रत्येकाला या महामार्गाचा आराखडा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प पुढे रेटता येणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे."एनएचएआय'कडून सुरू असलेल्या या लगबगीबाबत श्री.सिकेरा यांनी अलीकडेच केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांना एक पत्र पाठवले आहे. या महामार्गामुळे जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे व या नियोजित महामार्गामुळे अनेकांवर विस्थापित होण्याची पाळी येणार असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेला पर्यावरणीय परिणाम दाखला तूर्त स्थगित ठेवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आलेक्स सिकेरा यांच्या या मागणीला केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री कमलनाथ हे बरेच खवळले आहेत,अशीही माहिती मिळाली आहे.
आलेक्स सिकेरा यांनी पाठवलेल्या पत्रांत "एनएचएआय'कडून सादर करण्यात आलेल्या आराखड्यात बराच संभ्रम असल्याचे म्हटले आहे.प्रत्यक्ष सादर करण्यात आलेला आराखडा व भूसंपादनासाठी जारी करण्यात आलेली नोटीस याच्यात बराच तफावत असल्याने जनतेत संशयाचे वातावरण पसरल्याचेही त्यांनी जयराम रमेश यांना कळवले आहे. प्रत्यक्ष महामार्ग आराखड्याच्या तिपटीने भूसंपादन करण्यात येत आहे व त्यामुळे केंद्र सरकारने जारी केलेल्या भूसंपादन अधिसूचनेची प्रतही श्री.सिकेरा यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठवून दिली आहे."एनएचएआय'कडून यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठवला आहे व त्यामुळे या प्रस्तावावर निर्णय देण्यापूर्वी इथल्या जनतेच्या भावनांचा जरूर विचार व्हावा,अशी विनंतीही श्री.सिकेरा यांनी केली दरम्यान, या एकूण प्रकरणी जनतेत पसरलेल्या असंतोषाची दखल घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी जारी केलेला पर्यावरण दाखला तूर्त स्थगित ठेवावा अशी मागणी करून जोपर्यंत या महामार्गाचा निश्चित आराखडा सादर होत नाही, तोपर्यंत हे काम पुढे रेटण्यास मज्जाव करावा,असे सिकेरा यांनी म्हटले आहे. पर्यावरण आढावा समितीकडून या प्रकल्पाचा नव्याने अभ्यास करावा व प्रत्यक्ष या महामार्गाचा पर्यावरणावर नेमका काय परिणाम होणार आहे व "एनएचएआय' ने भूसंपादनासाठी एवढी जागा का मागितली आहे, याचाही पुनर्विचार व्हावा,अशी मागणी केली आहे.

मोटरसायकल पायलटांसाठी सामाजिक सुरक्षा योजना

प्रतिमहिना एक हजार रुपये
पणजी, दि.१० (प्रतिनिधी): राज्यातील मोटरसायकल पायलट व त्यांच्या कुटुंबीयांसाठीची सामाजिक सुरक्षा योजना समाज कल्याण खात्यातर्फे जनतेच्या माहितीसाठी जाहीर करण्यात आली आहे.या सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक अधिकृत मोटरसायकल पायलटांना एक हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक साहाय्य देण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे.
राज्य समाज कल्याण खात्याचे संचालक एन.बी.नार्वेकर यांनी जनतेच्या माहितीसाठी ही योजना सरकारी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या व खात्याने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक मोटरसायकल पायलट या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेअंतर्गत मोटरसायकल पायलटाची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे. दुचाकी मोटरसायकल चालवण्याचा अधिकृत परवानाधारक व परिवहन खात्याकडून पिवळा-काळा टॅक्सी बॅंच प्राप्त झालेला व केवळ मोटरसायकल पायलटचा स्वयंरोजगार करणारी व्यक्तीच या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. ही आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बचत खात्यात जमा केली जाईल.
या योजनेसाठी पात्र मोटरसायकल पायलट हा किमान १५ वर्षे गोव्यात वास्तव्य करणारा असावा, या मोटरसायकल पायलटाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.५० लाख रुपयांवर असता कामा नये, या योजनेसाठी अर्ज करताना मोटरसायकल पायलटाचे वय ५० वर्षे पूर्ण असावे,या योजनेअंतर्गत अर्ज करणारा मोटरसायकल पायलट कोणत्याही बेकायदा व्यवहारात गुंतलेला असता कामा नये, अर्जदार किमान पाच वर्षे मोटरसायकल पायलट व्यवसायात असणे गरजेचे आहे, मोटरसायकल पायलटाच्या नावे दुचाकीची नोंदणी व अधिकृत मोटरसायकल परवाना बॅच किमान पाच वर्षांचा असावा,प्रत्येक अर्जदार मोटरसायकल पायलट हा मोटरसायकल टॅक्सी संघटनेचा अधिकृत सदस्य असणे बंधनकारक आहे व ही संघटना सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत अधिकृत नोंदणीकृत असावी, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा मोटरसायकल पायलट हा दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभार्थी असता कामा नये तसेच तो राज्य किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचाही लाभार्थी असता कामा नये,असेही या योजनेच्या अटींत नमूद करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला अधिकृत अर्ज संबंधित तालुका गट विकास अधिकाऱ्यांमार्फत समाज कल्याण खात्याच्या संचालकांकडे देण्याची गरज आहे.या अर्जासोबत तालुका मामलेदारांकडून प्राप्त वास्तव्य दाखला,उत्पन्न दाखला,जन्म दाखला,रेशनकार्ड प्रत,निवडणूक ओळखपत्र प्रत,पिवळी-काळी दुचाकीची मालकी व इतर संबंधित कागदपत्रे, वाहन चालक परवाना व मोटरसायकल पायलट बॅच, बचत खाते पासबुकची प्रत आदी दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे. हा अर्ज गट विकास अधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर त्याची छाननी केली जाईल व पात्र अर्ज समाज कल्याण खात्याकडे सुपूर्द केले जातील.

Friday 10 September, 2010

मिकींच्या कार्यालयावर आयकर खात्याचे छापे

लॅपटॉप व कागदपत्रे जप्त

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - फसवणूक आणि लुबाडणूक प्रकरणात गुंतलेल्या माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांच्या कार्यालयावर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा छापा सुरू असतानाच, आज आयकर विभागाने छापा टाकून एक लॅपटॉप आणि अन्य काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी मिकी पाशेको स्वतः त्याठिकाणी उपस्थित होते. तर, छापा सुरू असताना कार्यालयाबाहेर मिकीच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
दरम्यान, मिकी यांची पूर्वीची बायको सारा पाशेको हिने मिकी आपली बनावट सही करून लोकांना विदेशात पाठवत होता, असा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे, तरुणांना विदेशात पाठवण्याच्या कोणत्याही घटनेशी आपला संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. २००० सालापासून मिकी यांच्या एजन्सीपासून संबंध तोडले होते. ज्यावेळी माझ्या सहीची नक्कल करून बनावट कागदपत्रे बनवली जात असल्याचे लक्षात येताच आपण त्या एजन्सीपासून संबंध तोडले होते, असे सारा हिने स्पष्ट केले आहे.
"मॅनपावर मॅनेजमेंट एजन्सी' साठी १९९८ साली परवाना मिळवण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे आम्ही एकत्रित ही एजन्सी चालवली. परंतु, ज्यावेळी काही तरुणांना त्याने माझी बनावट सही करून विदेशात पाठवल्याचे लक्षात आले तेव्हाच ही या एजन्सीपासून दूर झाले'' असे सारा म्हणाली.
बनावट कागदपत्रांद्वारे विदेशात आलेल्या गोव्यातील काही तरुणांना अमेरिकेत अटक केल्यानंतर मिकी पाशेको याचे नावे पुढे आले होते. त्यानंतर मिकी हे एका रॉकेटचा भाग असल्याचा दावा करून केंद्र सरकारला याची माहिती देण्यात आली होती. "मी हा व्यवसाय सारा हिच्या मदतीने करीत होतो. मात्र २००३ पासून मी त्यातून बाहेर निघालो. ती अजुनीही ही एजन्सी चालवते काही नाही, हे आपल्याला माहिती नाही' असे मिकी पाशेको यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. आहे. २००३ मध्येच मिकी पाशेको यांनी आपल्याला घरातून हाकलून लावले होते, असे सारा हिचे म्हणणे आहे.

पर्यटकांना लुटणारी टोळी अखेर अटकेत

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - बंदुकीचा धाक दाखवून कळंगुट भागात पर्यटकांना लुटणाऱ्या स्थानिक टोळीला ताब्यात घेण्यात अखेर पोलिसांना यश आले. टोळीतील तिघा जणांना आज अटक केली असून एक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सायंकाळी शिवोली मायणा येथे लपून बसलेल्या या टोळीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल, बंदुकीच्या गोळ्या, चार चाकी व एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. यात पोलिसांनी कल्पेश शिरोडकर (कूंकळ्ळी), मूळ नागालॅंड व सध्या कालापूर येथे राहणारा यान जॉन व राजू देवरा, मडगाव या तिघांनाही अटक केली. तर, मायकल फर्नांडिस हा पळून जाण्यास यशस्वी ठरला. रात्री उशिरापर्यंत त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शिवोली येथे सापळा रचला होता. या स्थानिक टोळीकडे बंदुका असल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी या टोळीने चोऱ्या केल्या तसेच दरोडे घातल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपासून पोलिस त्याच्या माघावर होते. करोडो रुपयांची मालमत्ता या टोळीने लुटल्याचाही दावा पोलिसांनी केली. तसेच, पणजी, म्हापसा, पर्वरी, मडगाव, कोलवा याठिकाणी या टोळीने चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. बेळगाव येथेही दरोडा टाकून १० लाख रुपयांची मालमत्ता चोरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी चोरी करायला फिरण्यासाठी एक ईन्होवा वाहनही या टोळीने खरेदी केले असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार गेल्या २० दिवसांपूर्वी या टोळीने दोन विदेशी नागरिकांना व पुणे येथील एका जोडप्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटले होते. त्यानंतर या टोळीला अटक करण्यासाठी खास पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. आज सायंकाळी या टोळीतील काही व्यक्ती कळंगुट येथील एका गेस्ट हाउसमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून अटक केली. दरमहा सोळा हजार रुपये भाडे भरून हे याठिकाणी राहत होते, अशी माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे.
गोव्यातील टोळीकडे बंदुका सापडल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. या टोळीकडे सापडलेली बंदूक ही इंदूर मध्य प्रदेश येथून उपलब्ध करण्यात आली होती. तर, कालापूर येथील एका टोळीच्या प्रमुखाने व आगशी येथील मायकल फर्नांडिस यांनी ही बंदूक इंदूर येथून आणले होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नॉलास्को रापोझ, आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे, पोलिस शिपाई विनय श्रीवास्तव, दत्ता शिरोडकर व अन्य पोलिस शिपायांचा सहभाग होता.

झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट उठवली

अर्जुन मुंडा यांचा उद्या शपथविधी

नवी दिल्ली, दि. ९ - झारखंडमध्ये सरकार स्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचाली पाहून आज केंद्रीय मंत्रिमंडळाने तेथील राष्ट्रपती राजवटीबाबतचा निर्णय फिरविला आहे. त्यामुळे आता तेथे भाजप-झामुमो आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपालांनी अर्जुन मुंडा यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केले असून ११ सप्टेंबर रोजी मुंडा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. ते म्हणाले की, राज्यपालांनी केलेल्या शिफारसीच्या आधारे केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती राजवट हटविण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. आता तेथे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.
झारखंडमध्ये १ जून रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. संपुआ सरकारविरुद्धच्या कपात सूचनेवर संसदेत मतदानाचे वेळी शिबू सोरेन यांनी संपुआच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे भाजपने राज्यातील त्यांच्या सरकारचे समर्थन काढून घेतले होते. त्यानंतर कोणताही पक्ष सरकार स्थापनेसाठी समोर आला नव्हता.
आता पुन्हा तीन महिन्यांच्या कालावधीनंतर भाजपा-झामुमो हे पक्ष सरकार स्थापनेसाठी पुढे सरसावले आहेत. यावेळी अर्जुन मंुंंडा या सरकारचे नेतृत्व करणार आहेत. त्यासाठीचा दावाही त्यांनी काल झारखंडच्या राज्यपालांना सादर केला. या घटनाक्रमामुळे राज्यपालांनी पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळाकडे राष्ट्रपती राजवट हटविण्याची शिफारस केली.
राज्यपालांनी आजच्या घडामोडीनंतर अर्जुन मुंडा यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केले आहे. सोबतच त्यांना सात दिवसांच्या आत विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अर्जुन मुंडा यांचा शपथविधी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील कोणकोणत्या सहकाऱ्यांचा शपथविधी होणार हे मात्र अजूनही जाहीर झालेले नाही.

कदंबच्या अन्यायग्रस्त चालकांच्या भवितव्याचा फैसला १६ ला होणार

"गोवादूत'ला विशेष धन्यवाद

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - "कदंब'च्या ६७ अन्यायग्रस्त बदली चालकांना सेवेत कायम करण्याबाबतचा निर्णय १६ सप्टेंबर रोजी घेण्याचे आश्वासन वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज दिले.त्यामुळे सदर चालकांनी आजपासून (गुरुवार) आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय १६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. या चालकांवर झालेल्या अन्यायाचे ठळक वृत्त "गोवादूत'ने प्रसिद्ध केले होते हे येथे उल्लेखनीय.

पाच वर्षे नोकरी केलेल्या "कदंब'च्या बदली चालकांना कायम करण्याचे आश्वासन देऊनही त्याच्या कार्यवाहीबाबत कदंब महामंडळ चालढकल करत असल्याने हे चालक दि. ९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार होते. कालच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याचे वृत्त आज "गोवादूत'सह काही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल वाहतूक मंत्र्यांनी घेतली.

या बाबत सविस्तर वृत्त असे कदंब महामंडळाने सात वर्षांपूर्वी सुमारे २०० चालकांना बदली चालक म्हणून कामावर घेतले. त्यांना सुट्टी न देता त्यांच्याकडून काम करवून घेण्याचा सपाटा सुरूच आहे.
संताप आणि आश्चर्याची बाब म्हणजे कामावर हजर होऊनही अनेक वेळा त्यांना बसवर ड्युटी न केल्याचे कारण देऊन पगार वजा केला जातो. त्यामुळे कंटाळून २०० चालकातील १३३ जनानी नोकरी सोडली. उर्वरित ६७ चालकांनी पुती गावकर यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकरण श्रम व रोजगार आयुक्ताकडे नेले. तेथे सुनावणी झाली असता कदंब व्यवस्थापनाने ज्या चालकांना पाच वर्षे झाली त्यांना सेवेत कायम करण्याचे लेखी आश्वासन रोजगार आयुक्तांना दिले. मात्र त्याची कार्यवाही केली नाही. म्हणून या चालकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. काल याबाबत बैठक झाली, पण तीत काहीही निर्णय झाला नाही व आज पुन्हा बैठक बोलावण्यात आली.
आज श्रम व रोजगार आयुक्त श्रीमती एफ. रॉड्रिग्ज यांच्या कक्षात चालकांचे प्रतिनिधी, कामगार नेते पुती गावकर, कदंबचे कार्मिक व्यवस्थापक विद्याधर हरमलकर व अन्य अधिकाऱ्यांची सुमारे चार तास बैठक झाली. या बैठकीदरम्यान वाहतूक मंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची त्यांना जाणीव करून देण्यात आली. त्यांनी दि. १६ सप्टेंबर रोजी याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर बाहेर पत्रकाराशी बोलताना पुती गावकर यानी बैठकीत झालेल्या लेखी निर्णयाची माहिती दिली. यावेळी सर्व ६७ चालक उपस्थित होते. या चालकांनी १६ रोजी वाहतूक मंत्री आम्हांला नक्कीच न्याय देतील अशी आशा व्यक्त केली. आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल त्यांनी "गोवादूत'ला खास धन्यवाद दिले.

रामानायडू यांना फाळके पुरस्कार

नवी दिल्ली, दि. ९ - आंध्र प्रदेशमधील प्रख्यात चित्रपट निर्माते डॉ. डी. रामानायडू यांना सन २००९ मधील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात रामानायडू यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
भारतीय चित्रपटाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. सुवर्णकमळ, दहा लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे पुरस्कारार्थीचे नाव निश्चित करण्यात येते. तेलगुसह तमीळ, कन्नडा, गुजराती, मराठी, हिंदी, बंगाली,ओरिया,आसामी, मल्याळम आणि भोजपुरी आदी विविध भाषांमध्ये त्यांनी १३० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

पूरग्रस्त निधीचा घोटाळा तर ७५ लाखांचा !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुन्हा आरोप

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - काणकोण पूरग्रस्त मदत निधी प्रकरणात कॉंग्रेस पक्षाचाही हात असून काणकोण पूरग्रस्तांच्या नावावर युवक कॉंग्रेसने सुमारे ७५ लाख रुपयांचा घोटाळा केला असल्याचा दावा आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी केला. सदर प्रकरण बरेच गाजायला लागले असून पक्षाचे काही पदाधिकारी गोत्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
निधीची रक्कम अद्याप कोणत्याही बॅंकेत जमा करण्यात आलेली नाही. मदत निधी गोळा करण्यासाठी युवक कॉंग्रेसने कुपने छापली होती, त्या पावत्यांवर कोणताही क्रमांक नाही. त्यामुळे यात प्रचंड मोठी घोटाळा झाला आहे. या आरोपावर कॉंग्रेस पक्षाने येत्या चोवीस तासांत खुलासा न केल्यास पोलिस खात्याने याची त्वरित दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी श्री. डिमेलो यांनी केली. पक्षाने परवानगी दिल्यास आपणही स्वतः पोलिस तक्रार सादर करणार असल्याचे श्री. डिमेलो यांनी सांगितले. लोकांनी आपल्या खिशातून पूरग्रस्तांना केलेली मदत आहे, काणकोणच्या नावाने कॉंग्रेसची तिजोरी भरण्यासाठी नाही. कॉंग्रेसने पूरग्रस्ताची मस्करी केली आहे, अशी टीका श्री. डिमेलो यांनी यावेळी केली.
युवक कॉंग्रेसने हा निधी "काणकोण रिलीफ फंड' म्हणूनच जमवला होता, त्याचे पुरावेही आज श्री. डिमेलो यांनी पत्रकारांना दिले. आज त्यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संपूर्ण कॉंग्रेस पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यामुळे आता कॉंग्रेस यावर कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुढे बोलताना श्री. डिमेलो म्हणाले की, कॉंग्रेस पक्षही या घोटाळ्यात सामील असून त्यावर सारवासारव करण्यासाठी एन. शिवदास यांना पुढे करण्यात आले होते. मात्र तेही तोंडघशी पडले.
मदत निधी गोळा करण्याची शेवटी तारीख होऊनही तो निधी बॅंकेत का जमा करण्यात आला नाही. "काणकोण रिलीफ फंड' या नावाने बॅंक खाते का खोलण्यात आले नाही. कोणकोण पूरग्रस्तांच्या नावाने जमवलेले पैसे पक्षाच्या खात्यात का जमा केले. निधी जमवण्यासाठी किती कुपन छापण्यात आली होती. किती लोकांनी मदतीसाठी धनादेश दिले होते, या सर्वांची माहिती उघड करण्याचे आव्हान राष्ट्रवादीने कॉंग्रेसला दिले असून कॉंग्रेस पक्षाने त्वरित या प्रश्नांची उत्तरे जनतेला देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वडीलभाऊ आहे तर, माग त्या कॉंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत भ्रष्टाचाराचे "बाप' असल्याची टीका करून श्री. डिमेलो यांनी मुख्यमंत्र्यांवरही तोफ डागली. कॉंग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीचा वडीलभाऊ आहे, त्यामुळे या पक्षाने कॉंग्रेसला शिकवण्याची गरज नाही, असा टोला काल संकल्प आमोणकर यांनी लावला होता.
दिगंबर कामत यांचे सरकार "आयसीयू'त पोचले होते, तेव्हा ते सरकार केवळ जुझे फिलीप यांच्यामुळे तरले होते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि युतीच्या सरकारमध्ये असलेले मंत्री भ्रष्ट आहेत, त्यांच्या भानगडी आहेत असे म्हणता, मग त्या सरकारचे मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराचे "बाप' असल्याचा पलटवार डिमेलो यांनी यावेळी केला.
त्याचप्रमाणे, काणकोण पूरग्रस्त मदत निधीत घोटाळा झाला आहे हा आरोप राष्ट्रवादीने केलेला नसून काही महिन्यांपूर्वी खुद्द युवक कॉंग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याने केला होता. त्याने याची तक्रार कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडेही इमेलद्वारे केली होती. मात्र त्याला युवक कॉंग्रेसमधून काढून टाकण्यात आले आहे. युवक कॉंग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष तन्वीर खतिब यांनी ईमेल द्वारे ही तक्रार केली होती, अशी माहिती यावेळी डिमेलो यांनी दिली.
तन्वीर खतिब याच्या तक्रारीत असलेले मुद्दे...
१) युवक कॉंग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना स्थान नाही.
२) संघटनेत लोकशाही पद्धत नाही.
३) कोणताही विचार न करता संकल्प आमोणकर घेत असलेलेच निर्णय सर्वांवर लादले जातात.
४) ८० टक्के कार्यक्रम हे प्रसिद्धीसाठी केले जातात. नेते पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी मिळवतात व त्याची कात्रणे काडून राष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात.
५) ४० वर्षांच्या तरुणांनीही मागील दरवाजातून युवक कॉंग्रेसमध्ये स्थान बळकावले आहे.
अनेक पदाधिकाऱ्यांनी युवक कॉंग्रेसच्या नावाने आपली ओळखपत्रे छापली आहेत. काहींनी लेटरहेडही छापली आहेत. त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला जातो.
६) गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे.
७) काणकोण पूरग्रस्तांसाठी जमवण्यासाठी छापलेली कुपन आणि जमवलेल्या निधीचा ताळमेळ बसत नाही. ३० लाख रुपये जमवण्यासाठी ही कुपने छापली आहेत. त्याचप्रमाणे धनादेश आणि डीडी द्वारेही निधी गोळा करण्यात आला आहे.

गृहनिर्माण मंडळाला ग्राहक मंचाने घडवली अद्दल

मडगाव दि. ९ (प्रतिनिधी) : दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने आज एका महत्त्वपूर्ण निवाड्याव्दारे गोवा गृहनिर्माण मंडळासंदर्भांतील तक्रारी हाताळण्याचा अधिकार आपणाला आहे असे स्पष्ट करतानाच, मंडळाने अन्यायकारकपणे भूखंडाच्या क्षेत्रफळात केलेल्या बदलामुळे आलेल्या फरकापोटींची रु.१,१४,७५० एवढी रक्कम वार्षिक १२ टक्के व्याजासह तक्रारदाराकडे सुपूर्त करावी, असा आदेश दिला.
त्याशिवाय तक्रारदाराला नुकसानभरपाईपोटी वीस हजार रु. व खर्चापोटी पाच हजार रु. तीस दिवसांच्या आत अदा करावेत, असेही गृहनिर्माण मंडळाला ग्राहक निवारण मंचाचे ऍड. जगदीश प्रभुदेसाई व ऍड. कला दलाल यांनी बजावले आहे.
या प्रकरणाची पार्श्र्वभूमी अशी की, गृहनिर्माण मंडळाने अंबाजी येथे विकसित केलेल्या वसाहतीतील भूखंडासाठी दिलीप नाईक हे तक्रारदार सहभागी झाले होते. त्यांना कोपऱ्यातील भूखंड हवा होता. त्याच्या क्षेत्रफळानुसार तो त्यांना परवडणारा होता; पण लिलावाच्या दिवशी मंडळाने आपल्या कार्यालयात एक नोटीस लावून त्याचे क्षेत्रफळ वाढवले. त्यामुळे त्यांनी त्या विशिष्ट भूखंडाचा नाद सोडून मिळेल तो भूखंड घेतला. त्यानंतर भूखंड विकले गेले, त्यांचे हस्तांतरही झाले. तक्रारदार ज्या भूखंडासाठी इच्छुक होता त्या दोन्ही भूखंडाचे क्षेत्रफळ तब्बल सहा महिन्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तीनदा कमी करण्यात आले. त्यामुळे विक्रीची किंमत साधारण लाखभराने कमी झाली.
नायक यांनी मंडळाची ही कृती बेकायदा असल्याचा दावा करून ग्राहक मंचासमोर त्यास आव्हान दिले. क्षेत्रफळात दुरुस्ती ही लिलावापूर्वी करावयास हवी होती. काही विशिष्ट लोकांना भूखंड मिळवून देण्यासाठी ही कृती केल्याने आपणास हवा असलेला भूखंड मिळू शकला नाही, असा दावा नायक यांनी केला. तो उचलून धरताना ग्राहक मंचाने असा कोणताही बदल करताना मंडळाने सर्वांना त्याची कल्पना येण्यासाठी वृत्तपत्रांतून ते जाहीर करावयास हवे होते, असे म्हटले आहे.
सदर प्रकरण आपल्या अधिकारात येते हे स्पष्ट करताना त्यांनी उच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ दिला आहे. मंडळाने ऐनवेळी क्षेत्रफळ वाढ करताना खरेदीदारांना पैशांची व्यवस्था करायला हवी याचा देखील विचार केला नाही व त्यावरून मंडळाचा हेतू शुद्ध नव्हता. त्यामुळे अर्जदाराला न्याय नाकारला गेला हेच दिसून येते, असा निष्कर्ष काढताना भविष्यात असा दर निश्चित करताना ती धोरणात्मक निर्णयाची बाब मानावी असे बजावले आहे.
गृहनिर्माण मंडळ ही लोकांना आवश्यक त्या सोयी पुरविणारी संस्था असताना या प्रकरणावरून ती निवाऱ्याचा प्रामाणिकपणे शोध घेणाऱ्याचा छळ करणारी व त्याच्या मार्गांत अडथळे आणणारी संस्था असे चित्र निर्माण झाले आहे, ते दूर करण्याची गरज मंचाने व्यक्त केली आहे.

पहिल्या निरंकारी नारी प्रमुख शोभावती परब यांचे देहावसान

आज अंत्यसंस्कार
पणजी, दि.९ (प्रतिनिधी)ः मिर्जनवाडा-पालये (पेडणे) येथील निरंकारी संप्रदायाचे प्रचारक वसंत परब यांच्या पत्नी व गोव्यातील निरंकारी नारी सत्संग प्रमुख शोभावती(माई)वसंत परब यांचे आज दि. ९ रोजी ह्रदयविकाराने निधन झाले. माईनी गेली ३५ वर्षे निरंकारी संप्रदायाच्या कार्याचा प्रसार गोव्यात केला आणि ही चळवळ राज्यात रुजवली.
माईंच्यामागे पती वसंत परब, पुत्र सुनील(मनोहर),श्रीधर (शर्मील) व विश्राम(नाना) हे विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्या १० रोजी सकाळी १०.३० वा. पालये स्मशानभूमीत शोभावती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Thursday 9 September, 2010

सीबीआयकडून मिकींविरुद्ध गुन्हा नोंद; बंगल्यावर छापा

फसवणूक व लुबाडणुकीचे आरोप

पणजी, दि. ८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांच्यासह अन्य दोघांवर आज केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने फसवणूक व लुबाडणुकीचा गुन्हा नोंद केला. तसेच दुपारी बाणावली येथील त्याच्या बंगल्यावर छापा टाकून काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतल्याचे "सीबीआय' च्या प्रवक्त्याने सांगितले. मिकी तसेच पेद्रू आन्तानियो जुवीस व डॅनिएल रेमंड फर्नांडिस यांच्याविरुद्ध भा.दं.सं १२०(ब), ४२० ४६८ व ४७१ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीत मिकी पाशेको यांनी २००७ व २००८ साली मुंबई येथील अमेरिकेच्या दूतावासातून बनावट कागदपत्रांद्वारे काही व्यक्तींना जहाजावर नोकरीला पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे. जहाजावर पाठवलेल्या त्या व्यक्तींनी मोठी रक्कम देऊन व्हिसा व नोकरीचा परवाना मिळवल्याचेही उघड झाले असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
नादिया प्रकरणानंतर पुन्हा एका नव्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ मिकी पाशेको यांच्यावर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात कधीही त्यांनी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे विदेशात नोकऱ्या देण्याच्या आणि हवाला व्यवसायात गुंतल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने केला होता. तसेच, अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने भारत सरकारला मिकींच्या व्यवहाराविषयी एक अहवाल सादर होता. त्यानंतर केंद्र सरकारने हे प्रकरण प्राथमिक चाचणीसाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले आहे. तसेच, मिकी पाशेको यांनी विदेशी बॅंकांद्वारे केलेल्या पैशांच्या उलाढालीची कागदपत्रेही "सीबीआय'च्या ताब्यात देण्यात आली होती. त्यावरून सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा मिकी यांनी स्पष्ट केले आहे. "सारा' ही "ओव्हरसीस मॅनपॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' या नावाने ही कंपनी चालवत होती. या कंपनीची स्थापना १९९६ मध्ये झाली होती. ही कंपनी तरुणांना जहाजावर नोकरीला ठेवण्यासाठी कार्यरत होती, असे स्पष्टीकरण श्री. पाशेको यांनी दिले आहे.
अमेरिकेच्या विविध विमानतळांवर गोव्यातील नागरिकांना बनावट कागदपत्रांद्वारे प्रवेश केल्याने अटक केल्यानंतर ही बाब उजेडात आल्याचे म्हटले आहे. या लोकांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने पाशेको यांनी मदत केल्याचा दावा अमेरिकेच्या संस्थेने केला आहे.

शिरोडा अपघातात पिता व मुलगी ठार

चिकनगाळ येथे शोककळा

फोंडा, दि.८ (प्रतिनिधी) - चिकनगाळ शिरोडा येथे आज (दि.८) सकाळी पावणे आठच्या सुमारास कदंब महामंडळाची प्रवासी बस (जीए ०१ एक्स ३३८) आणि स्कूटर (क्र.जीए ०१ के ६८३५) यांच्यात झालेल्या अपघातात बाप - लेकीचे निधन झाले, तर स्कूटरवरील अन्य एक शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर मडगाव येथील हॉस्पिसीओ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पासू नाईक (४५) आणि कु. सलोनी संतोष नाईक (१०) अशी मयत झालेल्या बाप- लेकीची नावे आहेत. दोघेही चिकनगाळ शिरोडा येथील रहिवासी आहेत. या अपघातात कु. प्रियांका मंगलदास नाईक (१२) ही विद्यार्थिनी जखमी झाली आहे.
कदंब महामंडळाची प्रवासी बस दाभाळ येथून पाजमार्गे शिरोड्याला येत होती. तर स्कूटरही शिरोड्याला येत असताना वाटेत चिकनगाळ येथे स्कूटर आणि बस यांच्यात धडक झाली. मयत संतोष पा. नाईक हे स्कूटरवरून आपली मुलगी कु.सलोनी आणि शेजारची कु.प्रियांका यांना स्कूलमध्ये सोडण्यासाठी शिरोडा येथे येत होते. सलोनी ही शिरोडा येथील कामाक्षी विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल पालेकर, हवालदार श्री. तळेकर यांनी पंचनामा केला. कदंब बसचा चालक कृष्णा नाईक याची जबानी नोंदवून घेण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे. पावसामुळे रस्ता निसरडा बनल्याने स्कूटर रस्त्यावर घसरून हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अपघातामुळे चिकनगाळ शिरोडा गावावर शोककळा पसरली. बाप लेकीच्या अपघाती मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक आमदार महादेव नाईक यांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, संध्याकाळी बाप - लेकीच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बाप लेकीचे पार्थिव चिकनगाळ येथे घरी आणण्यात आले त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू आवरता आले नाहीत.

"रिव्हर प्रिन्सेस'बाबत खंडपीठाने सरकारला खडसावले

जहाज काढण्याची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण कराच

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - कांदोळी किनाऱ्यावर गेल्या दहा वर्षांपासून रुतलेले तेलवाहू जहाज "रिव्हर प्रिन्सेस' हे येत्या पावसाळ्यापूर्वी हटवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ते जहाज कसे काढले जाईल हा विषय न्यायालयाचा नाही; परंतु, या दोन महिन्यांत जहाज हटवण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे आणि पावसाळ्यापूर्वी ते तेथून हटवले पाहिजे, असे खंडपीठाने निक्षून बजावले.
त्याचप्रमाणे, जहाजामुळे किनाऱ्यावर प्रदूषण होऊ नये यासाठी यापूर्वी वेळोवेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशांचेही पालन केले जावे. दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याचे यावेळी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र त्यांची ती विनंती खंडपीठाने फेटाळून लावली. निविदा काढावी, त्यानंतर ते काम कोणाला द्यावे, हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे सरकारने त्यावर त्वरित निर्णय घेऊन येथून हे जहाज हटवले पाहिजे. हे जहाज तेथे जास्त काळ राहिले तर नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची पाळी येईल या केंद्रीय मंत्रालयाच्या एक पत्राचा दाखवा यावेळी खंडपीठाने दिला.
हे जहाज हटवण्यापेक्षा ते कसे हटवावे यावरच सरकार जास्त वेळ खर्च करत आहे. केंद्र सरकारच्या एका पथकाने हे जहाज त्वरित हटवले पाहिजे, अशी सूचना केली आहे. मूळ याचिकेतसुद्धा हे जहाज कोणत्याही पद्धतीने तेथून हटवण्याची मागणी करण्यात आली आली असल्याचा युक्तिवाद यावेळी रिव्हर प्रिन्सेस हटाव मंचाने केला.
२९ मार्च १९९८ मध्ये हे जहाज समुद्रात येऊन थांबले होते. त्यानंतर जून २००० साली ते कांदोळी किनाऱ्याला लागले. तेव्हा राज्य सरकार आणि जहाजाच्या मालकाने ते हटवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. २००८ मध्ये लोकांनी हे जहाज हटवण्यासाठी जोरदार मोहीम उघडली तेव्हा सरकारने त्यासंदर्भात निविदा काढली. मात्र ज्या कंपनीला हे जहाज काढण्याचे कंत्राट होते त्यांना ते हटवण्यास अपयश आले. कांदोळी येथील रिव्हर प्रिन्सेस हटाव मंचने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
२६ जुलै २०१० रोजी केंद्र सरकारच्या विज्ञान विभागाने कांदोळी येथे जहाजाची पाहणी करून राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, हे जहाज त्वरित न हटवल्यास सागरी संपत्तीची मोठी हानी होऊ शकते. कारण जहाजावर लाटांचा मारा सतत होत असल्याने त्याचा आतील भाग निकामी झाला आहे. परिणामी जहाज कधीही फुटू शकते. तसेच झाल्यास प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.

"दोघा लहानग्यांना खायला काय घालू'?

"कदंब'च्या अपघातग्रस्त चालकाच्या पत्नीचा करुण सवाल

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - ड्युटी संपल्यानंतर पुन्हा जबरदस्तीने ड्युटीवर पाठवल्यावर अपघातग्रस्त झालेल्या माझ्या पतीला कामगार न्यायालयाने पुन्हा नोकरीत घेण्याचा आदेश देऊनही कदंब महामंडळ त्याला कामावर परत घेत नसल्याची कैफियत संबंधित चालकाची पत्नी सौ. शिल्पा औदुंबर नार्वेकर यांनी आज येथे मांडली. काळीज पिळवटून टाकणारी त्यांची दर्दभरी कहाणी ऐकताना पत्रकारही गलबलून गेले.
गेली अडीच वर्षे मी न्यायालयाची पायरी झिजवत आहे. न्यायालयात येण्यासाठी आता माझ्याकडे पैसेच नाहीत.आमची उपासमार सुरू आहे. दोघा लहान मुलांना आता खायला काय घालू? मी संसार कसा करू? माझ्या नवऱ्याला नोकरीवर परत घेऊन मला त्वरित न्याय द्या, अशी कळकळीची विनवणी सौ. शिल्पा यांनी केली. आम्ही "कदंब' महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामगारविरोधी निर्णयाचा बळी ठरलो आहोत, असा आरोप त्यांनी कामगार न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, औदुंबर नार्वेकर हा "कदंब'मध्ये बदली पद्धतीवर ड्रायव्हर म्हणून सेवेत होता. अडीच वर्षापूर्वी तो आपली ड्युटी संपवून गाडीवरून उतरला. मात्र कदंबच्या अधिकाऱ्यांनी त्याला पुन्हा ड्युटीची सक्ती केली . पुन्हा ड्युटीवर गेल्यानंतर तो चालवत असलेल्या कदंब बसला अपघात झाला. संतापाची बाब म्हणजे त्यानंतर त्याला कामावरून चक्क काढून टाकण्यात आले.आपण त्याला डबल ड्युटीची सक्ती केली होती याचेही भान कदंबच्या अधिकाऱ्यांनी उरले नाही. या अन्यायाविरुद्ध औंदुबर नार्वेकर यांची पत्नी सौ. शिल्पा यांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केला असता, कामगार न्यायालयाने औंदुबर नार्वेकर याला नोकरीत पुन्हा घेण्याचा निवाडा दिला. मात्र कदंब महामंडळाने त्यांना नोकरीत न घेता वरच्या न्यायालयात दाद मागितली. तेव्हापासून आजपर्यंत सौ. शिल्पा औंदुबर नार्वेकर न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने वर्तमानपत्रांना बातमी दिली नव्हती; पण आता आपण नाईलाजाने पत्रकारांसमोर आपले दुःख उघड करीत आहोत. सरकारने मला त्वरित न्याय द्यावा, मला जगणेच मुश्कील झाले आहे, अशी व्यथा शिल्पा नार्वेकर यांनी डोळ्यांत आसवे आणत मांडली.
दरम्यान, पाच वर्षे सेवा केलेल्या कदंबच्या बदली ड्रायव्हरना कायम करण्याची हमी कामगार न्यायालयाला कदंब व्यवस्थापनाने दिली होती. मात्र व्यवस्थापनाने अजूनही आपला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे सात ते आठ वर्षे सेवा बजावलेले ६७ अन्यायग्रस्त ड्रायव्हर कदंबविरोधात आमरण उपोषणाला बसण्याच्या बेतात आहेत. नार्वेकर यांच्यावर कदंबच्या अधिकाऱ्यांमुळे ओढवलेली ही जीवघेणी आपत्ती म्हणजे इरसाल कारभाराचा नमुनाच ठरली आहे. मुख्यमंत्री व इतर कॉंग्रेसजन उठता - बसता आम आदमीच्या नावाचा जप करत असतात. प्रत्यक्षात आम आदमीला भिकेला लावण्याचे तंत्रच या सरकारने अवलंबल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

"ते' पैसे काणकोण पूरग्रस्तांसाठी नव्हतेच

राष्ट्रवादीच्या आरोपावर कॉंग्रेसचा गुळमुळीत खुलासा

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - कॉंग्रेस पक्ष आणि युवक कॉंग्रेसने काणकोण येथे पूर आल्यानंतर जमा केलेले पैसे हे काणकोणमधील पूरग्रस्तांसाठी नव्हे तर
तर, गोव्यात अन्यत्र नैसर्गिक आपत्ती आल्यास तेथे सदर निधी वापरायला मिळेल, या हेतूने जमा केले होते. निधी गोळा करण्यासाठी काणकोण हे केवळ निमित्त होते, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस पक्षाने दिले!
राष्ट्रवादी कॉंग्रेसने काल युवक कॉंग्रेसवर काणकोण निधीत घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कॉंग्रेसने आज या आरोपांना सामोरे जाण्यासाठी एन. शिवदास यांना प्रवक्ते म्हणून पुढे केले. ते पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष कांता गावडे, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर, सुवासिनी गोवेकर व विजय पै उपस्थित होते.
कॉंग्रेसची बाजू मांडताना एन. शिवदास यांनी अकलेचे तारे तोडले. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाताना त्यांना अक्षरशः घाम फुटला. त्यामुळे त्यांच्या बाजूला बसलेल्या कांता गावडे यांनी पूर कसा अचानक आला, त्याचे स्वरूप किती भयानक होते, आदी माहिती देण्यास सुरुवात केली. एक वर्ष झाले तरी, कॉंग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेला निधी पीडित लोकांपर्यंत पोहोचलेलाच नसल्याचे उघड झाले आहे.
त्यावेळी ते पैसे गोळा करण्यासाठी काणकोणचा कोणताही संदर्भ नव्हता. ""गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटी (जीपीसीसी) आपत्कालीन व्यवस्थापन'' या नावाने गोळा केलेले ते १८ लाख रुपये म्हापसा अर्बन बॅंकेत जमा असल्याची माहिती शिवदास यांनी दिली. मात्र हा निधी बॅंकेच्या कोणत्या शाखेत जमा असून त्याचा खाते क्रमांक काय हे सांगण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. या पैशांत कोणताही घोटाळा झालेला नसून राष्ट्रवादीने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे एन. शिवदास म्हणाले.
युवक कॉंग्रेसने जमा केलेला सुमारे १० लाख रुपयांचा निधी कॉंग्रेस पक्षाकडे दिला होता, असे यावेळी संकल्प आमोणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
काणकोणमध्ये पूर आल्यानंतर वर्तमानपत्रात आवाहन करून निधी गोळा करूनही ते पैसे काणकोणसाठी जमवले नव्हते यावर तुम्ही ठाम आहात का, असा प्रश्न त्यांना केला असता, चतुर्थी व दिवाळीच्या काळात या निधीचे वाटप काणकोण पूरग्रस्तांना केले जाणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
अनेक लोकांनी तसेच कॉंग्रेस पक्षाने काणकोण पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यांना घरे बांधून दिली आहेत. त्यामुळे आम्ही आता या पैशांतून त्यांना टेबल, कपाट यासारखे गृहोपयोगी साहित्य देणार आहोत, असेही ते म्हणाले. तुम्ही किती पूरग्रस्तांना मदत करणार आहात, असे विचारले असता आम्ही अद्याप त्याचे सर्वेक्षण केलेले नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.रंजक खुलासा अन् हास्याचे कारंजे..
ड्रग माफिया व पोलिस साटेलोटे प्रकरणावर कॉंग्रेसची भूमिका काय, असे विचारले असता, "पक्षाने मला त्यावर काहीही बोलू नको', असे बजावले असल्याचे "उद्गार'
एन. शिवदास यांना काढताच उपस्थित पत्रकारांत हास्याचे कारंजे उसळले. विशेष म्हणजे या वार्तालापाच्या आरंभीच आपण पक्ष प्रवक्ते आहोत, अशी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली!

म्हापसा इस्पितळात आजपासून "ओपीडी'

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) ः म्हापसा येथील नवीन जिल्हा इस्पितळात उद्या ९ सप्टेंबरपासून स्त्रीरोग व बालरोग विभागाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्याने जाहीर केली आहे. भाजपकडून जिल्हा इस्पितळाचा विषय आक्रमकपणे पुढे रेटण्यात आल्यानंतर व जुन्या आझिलो इस्पितळाच्या दयनीय अवस्थेची खातरजमा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केल्यानंतर अखेर नव्या जिल्हा इस्पितळ इमारतीत काही विभाग हलविण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.
दरम्यान, नव्या जिल्हा इस्पितळांत स्त्रीरोग व बालरोग बाह्य रुग्ण विभाग प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. या विभागांची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल. हे विभाग नव्या जिल्हा इस्पितळात सुरू केले असले तरी म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील बाह्य रुग्ण विभाग पूर्वीच्या वेळेनुसार कार्यरत असेल. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सुरुवातीला भाजपकडून झालेल्या मागणीला धुडकावण्याचा प्रयत्न केला होता परंतु या विषयावरून भाजपने तीव्र आंदोलनाची तयारीच सुरू केल्याने अखेर नव्या जिल्हा इस्पितळाला मुहूर्त सापडला आहे.

गाडीतील लाखाची रक्कम पळविली

वास्को, दि. ८ (प्रतिनिधी)- शहरात होत असलेल्या चोरी प्रकरणांमुळे वास्कोतील जनता पूर्णपणे हैराण झालेली असतानाच आज दिवसाढवळ्या भर वस्तीत रस्त्यावर उभी असलेल्या गाडीतून अज्ञात चोरट्याने एक लाखाची रोख रक्कम लंपास केल्याने पुन्हा येथे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चिखली येथील गणेश कुमार या नागरिकाने "आंध्र बॅंक' शाखेतून दीड लाखाची रक्कम काढून त्यापैकी एक लाख आपल्या गाडीत ठेवून तो पंधरा मिनिटांसाठी कुठेतरी गेला असता त्याच्या गाडीचा दरवाजा उघडून अज्ञाताने सदर पैसे लंपास केले.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२.४५ च्या सुमारास सदर घटना घडली. गणेशकुमार या कंत्राटदाराने दीड लाखाची रक्कम काढल्यानंतर त्यातील पन्नास हजार त्यांनी त्यांच्याशी नोकरी करणाऱ्या एका युवतीला दिले, राहिलेली एक लाखाची रक्कम त्यांनी आपल्या "मारुती ८००' गाडीत (क्रः जीए ०२ ए ८२९४) ठेवून नंतर तेे वास्कोच्या ट्युरिस्ट हॉस्टेलसमोर असलेल्या "कॅनरा बॅंक' शाखेसमोर पोचला व त्याने आपली गाडी समोरच उभी करून ठेवली. पंधरा मिनिटांनी ते परतले असता त्यांना त्यांच्या गाडीला काही प्रमाणात हानी झाल्याचे दिसून आले. त्यांनी गाडी उघडून आपली एक लाखाची रक्कम आहे काय हे पाहिले असता सदर रक्कम गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. गणेश यांनी वास्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. वास्को पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Wednesday 8 September, 2010

राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण हा महाघोटाळा

कमलनाथ-चर्चिल हेच सूत्रधार : पर्रीकर यांचा आरोप
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण हा केंद्रीय मंत्री कमलनाथ व सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव यांनी रचलेला फार मोठा घोटाळा आहे व त्यासाठीच त्याबाबतचे काम हाती घेण्याची त्यांना घाई आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना केला.
आमदार दामोदर नाईक यांच्यासमवेत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की एरव्ही भाजप महामार्गाच्या बाजूने आहे, परंतु येथे सरकारचा हेतू भलताच असल्याने त्याला विरोधी भूमिका घेणे भाग पडले आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्गांची गरजच गोव्याला नाही कारण तशी व्यापारी वाहने गोव्यातून जा-ये करीत नाहीत. गोव्यात ज्या वर्गातील वाहने येतात वा जातात त्यांच्या व्यवस्थेसाठी सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण व गरज असेल तेथे बगलमार्गांची उभारणी केली तर प्रश्र्न सुटेल. चारपदरी-सहापदरीची गरजच नाही, पण सध्या सरकारने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकांच्या घरादारांवर नांगर फिरविण्याचे जे सत्र सुरू केले आहे तो कमलनाथ यांनी केलेल्या घाईचाच परिपाक आहे.
कमलनाथ यांनी "सेझ' साठीही अशीच घाई करून गोव्यासाठी डोकेदुखी निर्माण केली होती व जमिनीच्या हस्तांतरातून प्रचंड माया केली होती. सेझ रद्द झाल्यामुळे अर्धवट राहिलेला हेतू साध्य करण्यासाठीच त्यांनी हे महामार्ग रुंदीकरणाचे पिल्लू सोडले आहे, अशी टीका त्यांनी केली.
महामार्ग प्राधिकरणाने अधिकृतरीत्या गोवा सरकारशी कोणताच पत्रव्यवहार केलेला नाही व म्हणून राष्ट्रीय महामार्ग या व्याख्येत बसणारे रस्ते खरोखरच गोव्याला हवेत की काय याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. "बूट' तत्त्वावर तसा मार्ग झाला तर स्थानिक नागरिकांना जबरदस्त टोलच्या रूपाने मोठा फटका बसेल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
परवाची बैठक ही सभागृह समितीची बैठक नव्हती, असा दावा पर्रीकर यांनी केला व सांगितले की सभागृह समितीची बैठक ही सभापतींच्या सूचनेवरून विधिमंडळ सचिव बोलावतात तर परवांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून प्रधान मुख्य अभियंत्यांनी बोलावली होती. मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांनी ती सभागृह समितीची असल्याचे सांगून सर्वांचीच दिशाभूल केल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

अटालाप्रश्नी सरकारची विश्वासार्हता संपुष्टात

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): अटाला प्रकरणावरून गोवा सरकारची विश्र्वासार्हताच संपुष्टांत आलेली आहे व म्हणून मुख्यमंत्री असो वा गृहमंत्री असो, त्यांना त्याबाबत जनतेनेच निवडणुकांतून त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. आपण त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत नाही, असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले. सरकारने प्रथम अटालाला जाऊ दिले व तो देशाबाहेर गेल्याची खात्री झाल्यावर नंतर "रेड कॉर्नर' नोटिस जारी केली, या आपल्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला व सांगितले की पोलिसांची त्यात काहीच चूक नसेल तर आता "रेड कॉर्नर' का जारी केली. न्यायालयाकडे बोट दाखवून सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही असे त्यांनी बजावले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल अटालाप्रकरणी जी गोवा पोलिसांना "क्लीन चीट' दिली आहे, त्याबाबत विचारता पर्रीकर म्हणाले की, गोवा सरकारात कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही, सगळा गोंधळ माजलेला आहे. अकार्यक्षम व भ्रष्ट लोकांच्या हातात सत्ता गेली की हे असेच व्हायचे.
सरकारने संगणक शिक्षकांना सेवेत कायम करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबाबत ते म्हणाले की यावरून आपल्या सरकारने त्यांना कामावर घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो वैध असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना गोव्यासाठी योग्य नाही, त्यासाठी सरकारला येथील परिस्थितीशी मिळतीजुळती अशी एखादी योजना आखावी लागेल, असे ते म्हणाले.

पणजी शहरच वेठीस! वाहतुकीची प्रचंड कोंडी

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): कामगार संघटनेचा सकाळी महागाईच्या विरोधातील संप आणि सायंकाळी राष्ट्रकुल स्पर्धेनिमित्त पणजी शहरात काढण्यात आलेल्या रॅलीच्यावेळी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात वाहतूक पोलिसांना पूर्णपणे अपयश आले. चर्च स्क्वेअर, सांतीनेझ, रुअ द औरेम रस्ता, मुख्य रस्ता असलेला १८ जून मार्ग, महात्मा गांधी मार्ग, डी.बी.मार्ग तसेच पणजी बसस्थानकावर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता.
पणजीत सध्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे, त्यात स्थानिक रहिवासी आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे एरव्हीच वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसतो. वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले परंतु, प्रशिक्षण न घेतलेले अनेक वाहतूक पोलिस चक्क रस्त्याच्या बाजूला उभे राहून मजा पाहत असतात. बहुतेक रस्ते आधीच वाहतुकीने भरलेले असतात, अशावेळी अन्य रस्त्यांचा वापर करण्यासाठी वाहनचालक मांडवी किनाऱ्यावरून जाणारा रस्ता पसंत करतो. आज मात्र सकाळी कामगारांचा प्रचंड मोर्चा आणि संध्याकाळी ऐन वाहतुकीच्या वर्दळीवेळी राष्ट्रकुल स्पर्धेनिमित्त आगमन झालेली क्वीन्स बॅटनची मिरवणूक यामुळे राजधानीच वेठीस धरण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले. सगळ्यांच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहने एकाच जागी अडकली होती. या सर्व गदारोळात वाहतूक पोलिस मात्र गायब झाले होते. प्रशासन नावाची चीज या राज्यात आहे, असे वाटतच नाही अशी संतापजनक प्रतिक्रिया खुद्द राजधानीत जनता व्यक्त करीत होती, तर नेते मात्र "आपण या गावचेच नाही' अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांत मश्गूल होत जिवाचा गोवा करीत असलेले दिसले!

आंबोली दरीत अज्ञाताचा मृतदेह

घातपाताचा संशय
सावंतवाडी, दि. ७ (प्रतिनिधी): आंबोली पर्यटन स्थळापासून सुमारे ३० मीटर खोल दरीत एका पुरुषाचा मृतदेह आज संध्याकाळी ४.३० च्या सुमारास सापडला. त्याच्या मानेभोवती निळ्या रंगाचा फास असून, हा घातपाताचा प्रकार असल्याचा पोलिसांनी संशय आहे. खून करून या अज्ञात तरुणाला गेल्या पंधरवड्यात खाली दरीत फेकण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आंबोली श्रीदेव पुर्वस देवस्थानापासून जवळच सुमारे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील हा तरुण कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. अनिल चव्हाण यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच, पोलिस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून, खाकी शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅंट त्याच्या अंगावर आहे.
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील, उपनिरीक्षक योगेश गुरव, प्रकाश केंद्रे, आंबोलीचे हवालदार एस.बी. साळुंखे, मंगेश सुर्वे व दीपक लोंढे आदींनी धाव घेऊन पंचनामा केला. हा अपघात अथवा आत्महत्या नसून, घातपातच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पालिका निवडणूक तरी जिंकून दाखवा

राष्ट्रवादीचे आमोणकरांना आव्हान
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीका करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे युथ कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर यांचा आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी खरपूस समाचार घेतला. संकल्प आमोणकर यांना राजकारणाची जाण नसल्यानेच त्यांनी अशा प्रकारची टीका केली असून हिंमत असेल तर त्यांनी येत्या पालिका निवडणुकीत तरी निवडून येऊन दाखवावे, असे प्रतिआवाहन राष्ट्रवादीने त्यांना दिले आहे.
संकल्प आमोणकर यांनी कॉंग्रेसच्या मदतीशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष जुझे फिलीप यांनी वास्कोत निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान दिले होते. युतीच्या सरकारात असताना चाळीसही मतदारसंघात उमेदवार उतरवणार असल्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयावर त्यांनी काल जोरदार टीका केली होती.
युतीच्या सरकारवर बोलण्याचा युथ कॉंग्रेसला कोणताही अधिकार नाही. प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उतरवण्यासाठी प्रयत्न करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. आम्ही त्या दिशेने प्रयत्नशील असून त्यावर टीका करण्याचे युथ कॉंग्रेसला कारण नाही. येत्या निवडणुकीत आम्ही आमच्या शक्तीनुसार अधिक जागा मागणार असल्याचेही श्री. डिमेलो यावेळी म्हणाले. ते आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर पक्षाचे उपाध्यक्ष उल्हास नाईक व सरचिटणीस राजन घाटे उपस्थित होते.
कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक मतदारसंघात ब्लॉक समित्या आहेत. त्यांना आम्ही कधीही विरोध केला नाही. मग राष्ट्रवादीचे काम वाढत असेल तर त्याला का विरोध करण्यात येतो, असे ते म्हणाले. मागील इतिहास पाहिल्यास संकल्प आमोणकर यांना आव्हानच स्वीकारता येत नसल्याचे स्पष्ट झाल्याची टीका त्यांनी केली. आयटी हेबिटॅट विषयात आंदोलन करण्यासाठी गेलेल्या युथ कॉंग्रेसने ताळगाव येथे मार खाल्ल्यानंतर तेथे हरवलेली त्यांची चप्पल त्यांना अद्यापही सापडलेली नाहीत. युथ कॉंग्रेसने ज्या राजकीय नेत्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती, त्याच नेत्याला कॉंग्रेस पक्षाने पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे आमोणकर यांनी मोठ्यांच्या राजकारणात न पडता, केवळ युवकांच्याच प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. वास्को मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी त्याचे हे टीका सत्र सुरू असून त्यांनी काहीही केले तरी त्यांना तिकीट मिळू शकत नाही, असा दावा यावेळी ट्रॉजन यांनी केला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीमूळे हातातून गेली या टीकेवर बोलताना ट्रॉजन म्हणाले की, त्यापूर्वीच्या निवडणूक कॉंग्रेस पक्षाने केवळ ९० हजार मते मिळवली होती. यावेळी राष्ट्रवादीने १ लाख ३५ हजार मते मिळवली आहेत. युथ कॉंग्रेसमध्ये असलेल्या काही नेत्यामुळेच विजय प्राप्त होऊ शकला नाही, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष हा पूर्ण भ्रष्ट्राचारी पक्ष आहे हे संकल्प आमोणकर यांनी आपल्या पक्षात एजंट आणि राष्ट्रवादीचे सल्लागार असल्याची टीका करून उघड केले आहे. हिंमत असेल तर हे कोण एजंट आहेत त्यांची नावे आमोणकर यांनी उघड करावी. त्यांना राष्ट्रवादीत समावेश करून घेता येईल का, यावर विचार केला जाईल, असेही ट्रॉजन यावेळी म्हणाले.
-------------------------------------------------------------
काणकोण मदतनिधीचा असाही घोटाळा...!
काणकोण येथे आलेल्या पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी यूथ कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी गोळा केलेला निधी अद्याप त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही, असा आरोप ट्रॉजन यांनी केला. कोणकोण पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी युथ कॉंग्रेसने किती निधी गोळा केला, तसेच तो कधी आणि कोणाला वाटण्यात आला हे जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादीने दिले आहे. त्याचप्रमाणे, श्री. आमोणकर यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजीविक्रेत्यांकडून पैसे गोळा करून वाढदिवस साजरा केला असल्याचा आरोपही यावेळी ट्रॉजन यांनी केला. हे सर्व आरोप खुद्द युथ कॉंग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याने केले असल्याची पुष्टी त्यांनी यावेळी जोडली. युथ कॉंग्रेसने युवकांचे कोणतेही विषय हाती घेतलेले नाही. युथ कॉंग्रेसचेच सुनील कवठणकर यांच्यावर हल्ला झाला तरी, युथ कॉंग्रेस मूग गिळून गप्प बसली. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याचे रॅगिंग झाले त्याहीवेळी युथ कॉंग्रेसने काहीही केले नाही, असेही ते म्हणाले.

झारखंड मुक्ती मोर्चाचा बिनशर्त पाठिंबा

सरकार स्थापनेचा भाजपकडून दावा
रांची, दि. ७ : झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिबू सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चाने पुन्हा हातमिळवणी केली आहे. झामुमोने बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने आज सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
राजकीय संघर्षामुळे तीन महिन्यांपूर्वी या दोन्ही पक्षांचे सरकार कोसळल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा या दोन पक्षांमध्येच सहमती झाल्याने राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आहे. दरम्यान, भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी अर्जुन मुंडा यांची निवड करण्यात आली असल्याने मुंडा यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन करण्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. राज्यात १ जूनपासून राष्ट्रपती राजवट आहे.
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते अर्जुन मुंडा यांनी आज दुपारी दीड वाजता राज्यपाल एम. ओ. एच. फारुख यांची राजभवनावर भेट घेतली व त्यांच्याकडे राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. यावेळी अर्जुन मुंडा यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष रघुवर दास, झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते हेमंत सोरेन आणि ऑल झारखंड स्टुडंटस् युनियनचे (एजेएसयू)विधिमंडळ पक्षनेते सुदेश माहतो आदी नेतेही उपस्थित होते. ८१ सदस्यांच्या राज्य विधानसभेतील ४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादीही अर्जुन मुंडा यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करताना सोपविली.
""भाजपाचे नेते अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या पाठिंब्याचे पत्र आम्ही राज्यपालांकडे सोपविले. झारखंड मुक्ती मोर्चा, एजेएसयू, संयुक्त जनता दल आणि दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वातील सरकारला राहील, असे आश्वासन देणारे पत्र आम्ही राज्यपालांना दिले. सरकार स्थापण्याचा दावा करणारे निवेदन दिल्यानंतर आमच्या या भेटीत राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय देण्याचे आश्वासन आम्हाला दिले,''अशी माहिती एजेएसयूचे अध्यक्ष सुदेश माहतो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सरकार स्थापन करण्याच्या भाजपाच्या दाव्यावर राज्यपाल कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ८१ सदस्यसंख्या असलेल्या झारखंड विधानसभेत भाजपा आणि झामुमो यांच्याकडे प्रत्येकी १८ सदस्य आहेत. एजेएसयू यांच्याकडे पाच, तर संयुक्त जनता दलाचे दोन सदस्य आहेत. चामरा लिंडा आणि विदेश सिंग या दोन अपक्ष सदस्यांनीही अर्जुन मुंडा यांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिलेली आहे.
तत्पूर्वी रघुवर दास यांच्या राजीनाम्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी अर्जुन मुंडा यांची त्यांच्या जागी निवड करण्यात आली. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या आदेशावरून रघुवर दास यांनी मुंडा यांच्यासाठी पद रिक्त करून दिले. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून अर्जुन मुंडा यांची निवड झाल्यानंतर रघुवर दास आणि अर्जुन मुंडा हे दोघेही झामुमोचे सर्वेसर्वा राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले. सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करताना अर्जुन मुंडा यांच्यासमवेत रघुवर दास देखील उपस्थित होते. झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि झामुमो हे एकत्रित येण्याची गेल्या दहा महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. राज्यात गेल्यावषींच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या व यानंतर ३० डिसेंबर रोजी शिबू सोरेन हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सोरेन यांनी ३० मे रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. संसदेत भाजपने मांडलेल्या कपात प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी शिबू सोरेन यांनी कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केल्याने राजकीय वादळ उठले होते.

Tuesday 7 September, 2010

अटाला बेपत्ता होण्याला पोलिस जबाबदार नाहीत

मुख्यमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चीट

ड्रगप्रकरण गुंडाळले जाणार!


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - पोलिस ड्रग माफिया प्रकरणात गृहमंत्री रवी नाईक यांच्या मुलावर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची हवाच काढून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार यानीव बेनाईम ऊर्फ "अटाला' बेपत्ता झाल्याबद्दल पोलिसांना जबाबदार धरता येणार नाही, अशी "क्लीन चीट' आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पोलिसांना दिली. गृहमंत्री रवी नाईक यांनी आपल्या अहवालात अटाला बेपत्ता झाल्यामागे कोणालाही जबाबदार धरलेले नाही. त्यांनी सादर केलेला अहवाल आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे अटाला बेपत्ता झाला यासाठी कोणालाही जबाबदार धरता येणार नाही, कारण तो पोलिस कोठडीत नव्हता, असेही श्री. कामत म्हणाले. ते आज मंत्रिमंडळाच्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलत होते.
"एकदा जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी नजर ठेवायला पाहिजे असे नाही. न्यायालयाने त्याला जामीन दिल्यानंतर तो बेपत्ता झाला आहे. याची माहितीही आम्ही न्यायालयाला दिली आहे,' असे श्री. कामत यांनी पुढे सांगितले. अनेक पोलिस अधिकारी आणि राजकीय व्यक्ती गुंतलेल्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या "अटाला' याचा शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही काढण्यात आली आहे. सध्या पोलिस अटाला याची प्रेयसी व मॉडेल लकी फार्महाऊस हिची जबानी घेण्यासाठी तिची वाट पाहिली जात आहे. लकी फार्महाऊस सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात येणार होती. मात्र ती आली नसल्यास गोवा पोलिस स्विडनला जाणार असल्याचे गृहमंत्री नाईक यांनी सांगितले होते. परंतु, अद्याप गोवा पोलिस स्विडनला जाण्याची कोणतीही तयारी झालेली नाही. या प्रकरणात गृहमंत्री नाईक व त्यांचा मुलगा रॉय नाईक यांनी आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.

अखेर बिहारमधील ओलिसनाट्य संपले

तिन्ही अपहृत पोलिस परतले

लखीसराय/पाटणा, दि. ६ - माओवादी आणि पोलिस यांच्यातील सलग नऊ दिवसांच्या ओलिसनाट्याचा आज सुखद शेवट झाला. एका पोलिसाला ठार केल्यानंतर तीन दिवसांनी माओवाद्यांनी उर्वरित तीन पोलिसांची आज सुखरूप सुटका केली. त्यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमारांसह सर्व अपहृतांच्या नातेवाईकांचाही जीव भांड्यात पडला.
उपनिरीक्षक अभयप्रसाद यादव, रुपेशकुमार सिन्हा आणि बिहार लष्करी पोलिस शिपाई एहसान खान या तिघांची आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माओवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली. विशेष म्हणजे, ही सुटका बिनशर्त झाली. तिघेही पोलिस आज सुखरूप घरी परतले. या ओलिस नाट्यामुळे जवळपास ९ दिवसांपासून मुख्यमंत्री नितीशकुमार आणि संपूर्ण राज्य प्रशासनच प्रचंड तणावाखाली वावरत होते. ओलिस असणाऱ्या पोलिसांचे नातेवाईक, सुरक्षा दल आणि इतर राजकीय पक्ष यांच्या दबावामुळे नितीशकुमार सरकार सकारात्मक तोडगा काढण्यासाठी धडपडत होते. अखेर या पोलिसांची बिनशर्त सुटका झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, एका पोलिसाचे मारले जाणे हा यातील एक अतिशय दु:खद भाग ठरला.
माओवाद्यांनी गेल्या रविवारी एकूण चार पोलिसांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात माओवाद्यांनी आपल्या आठ साथीदारांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती. पण, ही मागणी पूर्ण करण्याची वेळ सुदैवाने प्रशासनावर आली नाही. त्यामुळे आज अपहृत पोलिसांच्या नातेवाईकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. परत आलेल्या पोलिसांच्या घरी तर जल्लोषाचे वातावरण होते.
केवळ देवाच्या कृपेनेच वाचलो
ज्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी लुकास टेटे या पोलिसाचा मृतदेह सापडला होता, त्याच ठिकाणी आज माओवाद्यांनी या तिघांना सोडले. त्यांना सोडताना माओवाद्यांनी पोलिसांना फोन करून आम्ही अपहृतांना अमूक ठिकाणी सोडत असल्याचे कळविले, हे विशेष. पोलिसांच्या ताफ्याने या तिघांना लखीसराय पोलिस ठाण्यात आणले. तेथून त्यांना आपआपल्या घरी रवाना करण्यात आले.
हे तिघे परत येताच २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या ओलिस नाट्यावर आज अखेर पडदा पडला.

होमी सेठना यांचे निधन

मुंबई, दि. ६ - अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भारताच्या पहिल्या अणुचाचणीला दिशा देणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ होमी एन. सेठना यांचे प्रदीर्घ आजारानंतर काल रात्री त्यांच्या मलबार हिलस्थित निवासस्थानी निधन झाले.
होमी सेठना ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. काल रात्री ११.१५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सेठना यांच्या पार्थिवावर उद्या डोंगरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९५९ मध्ये ट्रॉम्बे येथे भारतातला पहिला प्ल्यूटोनियम प्रकल्प स्थापन करण्यात अणुशास्त्रज्ञ आणि रासायनिक अभियंते असलेल्या सेठना यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईत दाखल होण्यापूर्वी सेठना केरळमधील इंडियन रेअर अर्थचे संचालकही होते.
होमी सेठना १९८४ मध्ये अणुउर्जा आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर १९८९ ते २००० या काळात त्यांनी टाटा पॉवर कंपनीचे अध्यक्षपद भूषवले होते. टाटा सन्स, बॉम्बे डाईंग आणि इतर अनेक नामांकित कंपन्यांचे ते संचालक होते. १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे "स्माईलिंग बुद्ध' या नावाने घडवून आणलेल्या पहिल्या अणुस्फोटाच्यावेळी मार्गदर्शक म्हणून त्यांचे अतुलनीय योगदान होते.
सेठना यांना पद्मविभुषण हा देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पी. के. अय्यंगार यांनी सेठना यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सेठना हे अत्यंत गुणवान आणि स्फुर्तीदायक अभियंते होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेकवेळा धोका पत्करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. प्रकल्प सुरळीतपणे चालावा यासाठी त्यांनी कधीही नोकरशाहीच्या निर्णयाची वाट बघितली नाही, असे गौरवोद्गार अय्यंगार यांनी सेठना यांना श्रद्धांजली अर्पण करताना काढले.

चार विदेशींच्या जमिनीची कागदपत्रे जप्त करणार

लवकरच संगणक शिक्षकांची नियुक्ती

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - "फेमा' कायद्याचे उल्लंघन करून विदेशी नागरिकांनी गोव्यात घेतलेल्या चार विदेशी नागरिकांच्या जमिनींची कागदपत्रे जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. राज्यात विदेशी लोकांनी "फेमा' कायद्याचे उल्लंघन करून जमिनी विकत घेतलेल्या सर्व तक्रारी अंमलबजावणी संचालनालयाकडे सोपवण्यात आल्या होत्या. त्यातील ४ विदेशी नागरिकाच्या जमिनींच्या जप्तीचे आदेश संचालनालयाने काढल्याची माहिती श्री. कामत यांनी दिली. मोरजी येथील तीन तर हणजूण येथे चार विदेशी नागरिकांकडून एकूण २२ हजार चौरस मीटरचा भूखंड पुन्हा सरकार आपल्या ताब्यात घेणार असल्याचे ते म्हणाले. ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरकारी तसेच सरकारी अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात कायमस्वरूपी संगणक शिक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांना ती पूर्ण होताच ४१३ संगणक शिक्षकांना भरती करून घेतले जाणार आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाने अंतर्गत कामगारांना दिले जाणारे वेतनही ११० रुपयांवरून १५७ रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. कामत यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून संगणक शिक्षकांची सेवत कायम करण्याची मागणी केली जात होती. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या शिक्षकांना विविध शाळांत कंत्राट पद्धतीवर नेमले होते. त्यानंतर या शिक्षकांनी सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची ही मागणी प्रलंबित होती. यासाठी अनेक आंदोलनेही करण्यात आली होती. अखेर या शिक्षकांना सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय झाला असून ४१३ शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण होताच संगणक शिक्षकाच्या मुलाखतींना सुरुवात केली जाणार आहे.
ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ११० रुपये वेतन असल्याने त्यासाठी गोव्यात कामगार मिळणे कठीण होत होते. त्यामुळे यात वाढ करण्यात आली असून यापुढे १५७ रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे, पत्रकारांच्या निवृत्ती वेतनातही वाढ करण्यात आली असून ते ४ हजार एवढे करण्यात आले आहे. यापूर्वी ते २ हजार रुपये दरमहा दिले जात होते. तसेच राज्य सरकारतर्फे १२ लाख रुपये निवृत्तिवेतन योजनेसाठी जमा केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल खात्याने वाळपई पालिका मंडळाला संकुल उभारणीसाठी ६ हजार ५८० चौरस मीटर जागा दिली आहे. त्यासाठी पालिकेने महसूल खात्याला १३ लाख १६ हजार रुपये दिले आहेत. तसेच याच ठिकाणी स्टेट ऑफ आर्ट "आयटीआय' उभारण्यासाठी २० हजार ५६२ चौरस मीटर जागा हस्त कारागीर प्रशिक्षण संचालनालयाला ताब्यात दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
म्हापसा येथील आझिलो इस्पितळाच्या नव्या इमारतीत स्त्री रोग व बाल रुग्ण विभाग येत्या ९ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याचे श्री. कामत यांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मेडिसीन विभाग आणि स्कॅनिंग विभागही सुरू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने मागण्या संदर्भात अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. परंतु, येत्या दोन दिवसांत त्यावर तोडगा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

देशव्यापी "बंद'निमित्त आज कामगार मोर्चा

-बसवाहतूक सुरू राहणार
-"बंद'मोडण्यासाठी 'एस्मा'


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - केंद्रातील "युपीए' सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे उद्या देशव्यापी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने एस्मा कायदा लावला आहे. वीज खात्याचे कर्मचारी, तसेच अन्य सरकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे, नदी परिवहन कर्मचाऱ्यांनाही हा कायदा लागून होत असल्याने त्यांनी या संपात सहभागी होऊ नये, असे सरकारने बजावले आहे. या संपात खाजगी बसमालक संघटना सहभागी होणार नसल्याने बस वाहतूक सुरू राहणार असल्याचे गोवा खाजगी मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.
देशातील डाव्या कामगार संघटनेने पुकारलेल्या या बंदनुसार उद्या सकाळी ९ वाजता सर्व पणजी येथील कामगार क्रांती चौकाजवळ जमा होणार आहेत. नंतर पणजी कदंब बसस्थानकावरून विराट रॅली शहरात काढली जाईल, मग या रॅलीचे रूपांतर आझाद मैदानावर जाहीर सभेत आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १० हजार कामगार या यावेळी काढण्यात येणाऱ्या रॅलीत सहभागी होणार असल्याचा दावा कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला आहे. या संपात बॅंकांही सहभागी होणार आहेत. म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेच्या कामगारांना दहा वर्षे पगारवाढ मिळालेली नाही व त्यामुळे हे बॅंक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

सकारात्मक बातम्यांमुळेच "गोवादूत'ला आदराचे स्थान

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या हस्ते "विघ्नहर्ता' विशेषांकाचे प्रकाशन

तपोभूमी, कुंडई, दि. ६ - नकारात्मक बातम्यांनी मनुष्याची वृत्तीही तशीच बनते.अशा बातम्यांना नगण्य स्थान देऊन आणि सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देत "गोवादूत'ने अल्पावधीत जनमानसामध्ये मिळविलेले स्थान प्रशंसनीय आहे. याच उज्ज्वल वाटचालीतील "विघ्नहर्ता विशेषांका'चे प्रकाशन करताना आपणाला अत्यानंद होत आहे, असे उद्गार तपोभूमीचे पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य यांनी आज येथे संध्याकाळी काढले. स्वामींच्या हस्ते "गोवादूत'च्या "विघ्नहर्ता विशेषांका'चे प्रकाशन झाले. यावेळी संपादक राजेंद्र देसाई, डॉ. प्रमोद पाठक, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे, कार्मिक व्यवस्थापक विलास कामत, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, लेखाधिकारी बन्सिलाल शिरोडकर, तांत्रिक विभाग प्रमुख राजू पवार, संजय सालोस्कर उपस्थित होते. तपोभूमी ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र नाईक तसेच बटू यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
बहुतेक वृत्तपत्रे केवळ वार्षिक धार्मिक कार्यक्रमांनाच प्रसिद्धी देतात, गोवादूतने सुरुवातीपासून नियमितपणे वाचकांची आध्यात्मिक भूक भागविण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यामुळेच या वृत्तपत्राला जनतेमध्ये वेगळे स्थान आहे. हे स्थान टिकविण्यासाठी गोवादूत परिवाराचे प्रयत्न स्तुत्य असून, देशोन्नतीसाठी मनुष्यामधील सत्प्रवृत्ती जागविण्याचे कार्य यापुढेही "गोवादूत' करील, असा विश्वास आपल्याला वाटत आहे. आज या विशेषांकाच्या निमित्ताने विघ्नहर्ताच तपोभूमीत अवतरल्याचा भास होतो आहे. या पुण्यभूमीत अशा अंकाचे प्रकाशन व्हावे, हा सुयोग आहे, अशा शब्दांत स्वामींनी आशीर्वाद दिला.
यावेळी राजेंद्र देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना, "विघ्नहर्ता'विशेषांकाचे प्रकाशन या पुण्यभूमीत स्वामींच्या हस्ते होत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. २००५ पासून दरवर्षी "गोवादूत' गणेश विशेषांक प्रसिद्ध करीत असून, दरवेळी वेगवेगळ्या संकल्पनेवर हा अंक काढला जातो, अशी माहिती त्यानी दिली. यावेळी गोवा आणि देशातील गणेशोत्सवांबरोबरच परदेशातील गणशोत्सवाचे स्वरूप स्पष्ट करणारा विशेषांक प्रकाशित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Monday 6 September, 2010

जिवंत वीजवाहिनी पडून पेडण्यात ६ गुरे दगावली

पेडणे दि. ५ (प्रतिनिधी) - पेडणे परिसराला जुनाट वीजतारांचा दणका बसणे सुरूच आहे. तुये येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर (आयटीआय) शनिवारी रात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ११ केव्हीची जिवंत वीज तार तुटून अंगावर पडल्याने ४ म्हशी आणि दोन बैल जागीच ठार झाले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान होऊन त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीज खात्याच्या या भोंगळ कारभाराबद्दल पेडणे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या दुर्घटनेची माहिती वीज खात्याला रविवारी सकाळी माहिती मिळाल्यानंतर वीज अभियंता एम. एम. शिरुर यांनी याविषयी पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याविषयी कळविले. स्थानिक पोलिस कॉन्स्टेबल संतोष परब व जयराम म्हामल यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यामुळे सुमारे १ लाखांहून जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेविषयी पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तसेच त्यांनी या घटनेविषयी तीव्र शब्दात संताप व्यक्त करून संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश वीज अभियंते एम. एन. शिरुर यांना दिले. तसेच मुख्यमंत्री निधीतूनही संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मृत म्हशी या पेडणे येथील असून त्यांच्या मालकांची नावे अधिकृतपणे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. या दुर्घटनेत मरण पावलेल्या बैलांचे मालक हे विर्नोडा येथील कृष्णा मोरजकर व सिद्धार्थ मोरजकर आहेत. त्यांचे सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.
याविषयी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार दयानंद सोपटे यांनी सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. सुमारे २० - २५ वर्षांपूर्वीच्या वीजतारा बदलण्याविषयी सरकारकडे वारंवार मागणी करूनसुद्धा झोपी गेलेले सरकार काहीच करत नाही. तुये औद्योगिक वसाहतीसाठी पेडण्याहून वीजपुरवठा केला जातो. त्या वाहिन्या जंगलातून जातात. वास्तविक त्या भूमिगत असणे अत्यंत गरजेचे आहे. तशी "सुबत्ता' केव्हा येईल हे देवालाच ठाऊक. निदान या जीर्ण वीजतारा तातडीने बदलल्या गेल्या तरी खूप झाले, अशा प्रतिक्रिया या भागातून उमटत आहेत. सदर वीजवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव खात्याकडे पडून आहे. खात्याचे उत्पन्न वाढीव दाखविण्याच्या नादात खर्चात नियंत्रण आणल्याने तालुक्यात मानवी व जनावरांचे बळी वाढत चालले आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी वीजमंत्र्यांनी खास निधीची तरतूद पेडणे तालुक्यासाठी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान ही घटना तुये पंचायत क्षेत्रात घडल्याने तुयेच्या सरपंच सौ. विजयलक्ष्मी नाईक व पंच ज्योकिम फर्नांडिस यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत जनावरांची विल्हेवाट लावली.
ऐन चतुर्थीच्या तोंडावरच..
ऐन चतुर्थीच्या काळात नांगरणीसाठी जुंपण्यात येणारे बैलच गमवावे लागल्याने चतुर्थीनंतर सुरू करावयाची वायंगण भातशेती कशी करावी, असा बाका प्रसंग या शेतकऱ्यांवर ओढवला आहे. बैल म्हणजे शेतकऱ्याचा जिवाभावाचा मित्र. त्याच्या बळावरच शेतकरी पिके घेत असतो. आता सरकारी मदत केव्हा मिळणार, याकडे या बळिराजाचे लक्ष लागले आहे.

आजचा "बस बंद' लांबणीवर

तोडगा न निघाल्यास १ ऑक्टो.पासून बेमुदत बंद

मडगाव,दि. ५ (प्रतिनिधी) : आपल्या विविध मागण्यांसाठी गोवा बसमालक संघटनेने पुकारलेला उद्याचा संप आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. तोपर्यंत आपल्या मागण्यांवर योग्य तोडगा निघाला नाही तर १ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज बसमालक संघटनेला वाटाघाटींसाठी पाचारण केले असता एका शिष्टमंडळाने त्यांच्या मालभाट येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यात वाहतूक अधिकाऱ्यांकडून होणारी छळणूक, कदंबला मिळणाऱ्या सवलती व आणखी मार्गांच्या राष्ट्रीयीकरणाचा मुद्दा यांचा समावेश होता.
बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले व आपण यापूर्वीच वाहतूक संचालक अरुण देसाई यांना संपूर्ण माहिती सादर करण्याची सूचना केली आहे; ती येताच त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. तसेच योग्य तो न्याय दिला जाईल, असे सांगितले. २७ रोजी बसमालक, वाहतूक मंत्री, वाहतूक संचालक यांची संयुक्त बैठक बोलावून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यावर विसंबून उद्याचा बस बंद २७ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र २७ रोजी तोडगा निघाला नाही तर १ ऑक्टोबर पासून बसवाले बेमुदत संपावर जातील असे ताम्हणकर यांनी जाहीर केले.
संघटनेने बंदची नोटीस पुरेशी अगोदर दिली असतानाही शेवटच्या दिवसापर्यंत तोडग्याबाबत प्रतीक्षा करण्याच्या पद्धतीसंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही आज रात्री ८ वाजता बैठक बोलावली आहे. संघटनेचे सुमारे ६०० सदस्य आहेत. सदस्य नसलेलेही काही बसवाले आहेत. ते काही मंत्री अथवा वाहतूक अधिकारी यांचे मिंधे असल्याने ते सरकारविरुद्ध पवित्रा घेऊ शकत नाहीत; पण याचा अर्थ संघटनेत फूट पडली असा होत नाही. भीती वा दडपण या कारणास्तव त्यांना बसेस सुरू ठेवणे भाग असते. तरी पण बसमालकांवरील अन्याय व छळवाद दूर करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्रित राहणे गरजेचे आहे. शेवटचा पर्याय म्हणून बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला घेतला होता, त्यामागे कोणाचा व्यक्तिगत व्देष वा राग नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. शैलेंद्र फळदेसाई व कृष्णनाथ देसाई हेही यावेळी हजर होते.

भाजपला सत्तास्थानी बसवा व कॉंग्रेसवाल्यांना धडा शिकवा

मडगावातील जाहीर सभेत श्रीपाद नाईक यांचे आवाहन

मडगाव, दि. ५ (प्रतिनिधी) : आम आदमीच्या अपेक्षांची पूर्ती होण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सत्तेवर आणून सत्तापिपासू कॉंग्रेसवाल्यांना धडा शिकवा, असे जोरदार आवाहन खासदार श्रीपाद नाईक यांनी आज मडगाव येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना केले.
केंद्रातील असो वा गोव्यातील असो कॉंग्रेस पक्ष तोंडाने आमआदमीच्या कल्याणाचे गोडवे गातो. प्रत्यक्षात त्या पक्षाचा एकूण एक कार्यक्रम आम आदमीला संपवणारा असल्याची घणाघाती टीकाही नाईक यांनी केली.
ते म्हणाले, कॉंग्रेस सरकारचा आजवरचा इतिहास पाहिला तर जेव्हा हा पक्ष सत्तेवर आला तेव्हा दरवेळी महागाई गगनाला भिडली. देशाची घसरगुंडी सुरू झाली. पंतप्रधान चलनवाढ रोखल्याचे व अन्य दावे करतात पण महागाई का वाढली ते सांगत नाहीत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या अर्थतज्ज्ञाला देशातील महागाई रोखता येऊनये ही दुर्दैवी बाब आहे. यासंदर्भांत त्यांनी जनता पक्ष व भाजप राजवटीत स्थिर असलेले अत्यावश्यक जिनसांचे दर कॉंग्रेस सरकार सत्तेवर येताच कसे वाढले त्याचे उदाहरण दिले. त्यावरून हे नेते आणि महागाई निर्माण करणारे यांचे साटेलोटे आहे हेच दिसून येते, असे सांगितले.
त्यांनी काश्मीरप्रश्र्नाचा उल्लेख केला व सांगितले देशासमोरील आजच्या या समस्येस पं. नेहरू कारणीभूत आहेत. वल्लभभाई पटेल यांनी अन्य संस्थानांबरोबर काश्मीरही खालसा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; पण नेहरूंनी काश्मीर त्यापासून वेगळे ठेवले. त्यामुळे गेली ६१ वर्षें ती समस्या देशाला सतावत आली आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांच्या नावाने चालू असलेल्या लूटमारीचे उदाहरण देऊन सांगितले, कॉंग्रेसला सत्ता व धन संपादन याखेरीज दुसरे काहीच दिसत नाही. जे दिल्लीत तेच गोव्यात सुरू आहे. गोव्याची वाटचाल घराणेशाहीकडे वळविण्याचे काम त्या पक्षाने हाती घेतले आहे. काही नेते आपल्या घरातील इतरांना निवडणुकीत उभे करण्यासाठी करीत असलेल्या धडपडीकडे लक्ष वेधले. सत्तरीत तब्बल सदतीस वर्षें एकछत्री राजकारण करणाऱ्या नेत्याला तेथे एकदेखील नाव घेता येण्यासारखा प्रकल्प उभारता येऊ नये यावरून या मंडळींचे राजकारण लोकांसाठी नव्हे तर स्वतः पुरते मर्यादित असल्याचे स्पष्ट होते असा दावा नाईक यांनी केला.

मिकी पाशेको हवाला रॅकेटमध्ये?

पाशेकोंचा साफ इंकार

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - नादिया तोरादो आत्महत्या प्रकरणात होरपळून निघालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको हे नव्या वादात सापडले असून बनावट कागदपत्रांद्वारे विदेशात नोकऱ्या देण्याच्या आणि हवाला व्यवसायात गुंतल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाणावली मतदारसंघात खळबळ माजली आहे. दरम्यान, मिकी पाशेको यांनी आपण कोणत्याही बेकायदा प्रकारात गुंतल्याचा इन्कार करताना आपल्या राजकीय विरोधकांचा हा कट असल्याचा आरोप पत्रकात केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने भारत सरकारला मिकींच्या व्यवहाराविषयी एक अहवाल सादर केला आहे. त्यात त्यांनी पाशेको हे बनावट कागदपत्रांद्वारे विदेशात नोकऱ्या देण्याच्या आणि सावकारी व्यवसायातील जागतिक टोळीचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आला असून केंद्र सरकारने हे प्रकरण प्राथमिक चाचणीसाठी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले आहे. तसेच, मिकी पाशेको यांनी विदेशी बॅंकांद्वारे केलेल्या पैशांच्या उलाढालीची कागदपत्रेही "सीबीआय'च्या ताब्यात देण्यात आली आहेत. म्हापसा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिवेशन भरलेले असतानाच याविषयीचे एका वृत्त राष्ट्रीय वर्तमानपत्रावर झळकले आहे.
दरम्यान, मिकी पाशेको यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सुरक्षा खात्याने केलेले आरोप फेटाळून लावले असून आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. "मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. माझी बॅंक खाती पारदर्शक आहेत, ती कोणतीही तपास यंत्रणा पाहू शकतात. ज्या वर्तमानपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे ते पाहून मला धक्का बसला आहे. पहिल्या पत्नीला सोडल्यानंतर तिची "समुद्री कामगार संस्था' ही मी चार वर्षापूर्वीच सोडलेली आहे' असा दावा मिकी पाशेको यांनी केला आहे. तसेच आपण कोणालाही बनावट कागदपत्रांद्वारे नोकरीसाठी विदेशात पाठवलेले नाही, असेही मिकी पाशेको यांनी सांगितले.
श्री. पाशेको यांनी सांगितले की, "सारा' ही "ओव्हरसिस मॅनपॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या नावाने ही कंपनी चालवत होती. तिच्याकडे अजुनीही या कंपनीचा परवाना आहे की नाही, हे सिद्ध मला माहीत नाही. तसेच ती या कंपनीद्वारे अजुनीही लोकांना विदेशात पाठवते हीही आपल्याला माहीत नाही. या कंपनीची १९९६ मध्ये स्थापना झाली होती. ही कंपनी तरुणांना जहाजावर नोकरीला ठेवण्यासाठी कार्यरत होती. काही वर्षापूर्वी आम्ही दोघेही वेगळी झाल्यानंतर मी या कंपनीशी कोणताही संबंध ठेवला नाही, असे स्पष्टीकरण श्री. पाशेको यांनी पुढे दिले.
व्याजाद्वारे लोकांना पैसे पुरवण्याच्या सावकारी व्यवसायाबद्दल बोलताना ते म्हणाले की, अमेरिकेतील एका बॅंकेत आपल्या नावावर १.५० कोटी डॉलर आहेत. त्यातील २ लाख डॉलर काही महिन्यांपूर्वी भारतात बॅंकेत जमा केले आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणतीही मोठी रक्कम नाही. असल्यास मी ते सिद्ध करण्यासाठी खुले आव्हान देतो, असे ते म्हणाले. विदेशात असलेले काही कामगार आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठवण्यासाठी या बॅंक खात्याचा वापर करीत होते. ते पैसे मी गोव्यात काढून त्यांच्या कुटुंबीयांना देत होते, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
अमेरिकेच्या विविध विमानतळावर गोव्यातील नागरिकांना बनावट कागद पत्राद्वारे प्रवेश केल्याने अटक केल्यानंतर ही बाब उजेडात आल्याचे म्हटले आहे. या लोकांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने पाशेको यांनी मदत केल्याचा दावा अमेरिकेच्या संस्थेने म्हटले आहे.

जिल्हा इस्पितळात ९ पासून "ओपीडी'

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - म्हापसा येथे नव्याने बांधलेले व रेंगाळत पडलेले जिल्हा इस्पितळ अखेर ९ सप्टेंबर रोजी सुरू केले जाणार असल्याची माहिती आज आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने या इस्पितळात निदान "ओपीडी' तरी तातडीने सुरू केली जावी, अशी जोरदार मागणी केली होती. तसेच, "पीपीपी'तत्त्वावर हे इस्पितळ चालवायला द्यायलाही विरोध केला होता.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात झालेल्या एका कार्यक्रमानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. येत्या ९ सप्टेंबर पासून जिल्हा इस्पितळ सुरू होणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ९ आणि १० सप्टेंबर रोजी "मेडिसीन' विभाग आणि बालरुग्ण विभाग सुरू केले जाणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. याठिकाणी "ओपीडी' सुरू झाल्यानंतर शवागरही या नव्या इस्पितळात हालवले जाणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
सध्या जुन्या आझिलो इस्पितळावर प्रचंड ताण पडलेला असून रुग्णांनाही योग्य वागणूक तसेच उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढायला लागलेल्या आहे.
आझिलोमध्ये रुग्णाबरोबर आलेल्या एका महिलेवर भली मोठी फोटो फ्रेम डोक्यावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली होती. मात्र ती महिला यात गंभीर जखमी झाली होती. नव्या इमारतीत ओपीडी सुरू झाली तरी, जुन्या इस्पितळातील ओपीडी सुरूच राहणार आहे, असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवीन बांधण्यात आलेल्या इस्पितळाला "पीपीपी'द्वारे चालवायला कंपनी मिळत नसल्याने काही वर्षापासून ही इमारत अशीच पडून होती. तसेच, आतील अद्ययावत यंत्रणाही मोडकळीस आली असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. कोणत्या कंपनीला हे इस्पितळ चालवायला द्यावे, यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या इमारतीत सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूकही करण्यात आल्याची माहिती श्री. राणे यांनी दिली.

"सोने व पितळ यातील फरक मतदार जाणतात'

दामू नाईक यांचा फातोर्डावासीयांवर विश्वास

मडगाव, दि. ५ (प्रतिनिधी) : सोने व पितळ यातील फरक ओळखण्याइतपत फातोर्ड्यातील मतदार सुज्ञ आहेत व त्याची प्रचिती गेल्या तीन निवडणुकांतून (२००२ पासून)त्यांनी आणून दिलेली आहे, असे सांगून फातोर्ड्याचे भाजप आमदार दामोदर नाईक यांनी आगामी निवडणुकांतही आपले मतदार हाच पवित्रा घेतील,असा ठाम विश्र्वास या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
सर्वत्र दामू म्हणून परिचित असलेले फातोर्ड्याचेे आमदार विधानसभेत विरोधी पक्ष नेत्यापाठोपाठ खिंड लढविताना दिसत असून, उद्या (सोमवारी) ते आपला वाढदिवस साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, की आपले राजकीय प्रतिस्पर्धी सध्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मतदारसंघात जिवाचा आटापिटा करताना सर्वप्रकारचे साम दाम दंड यांचा अवलंब करीत असले, तरी त्याची आपणाला क्षिती नाही कारण आपला विश्र्वास शेवटी मतदारांवर आहे. राजहंस जसे दुधातून पाणी वेगळे काढतो तशी खडे वेचून बाजूला फेकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे व तीच आपणाला पुरेशी आहे.
दामोदर नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदार कसेच बधत नाहीत हे पाहून वेगवेगळ्या वस्तू फुकटात वाटून त्यांना मिंधे-लाचार बनविण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यासाठी नाताळ-चतुर्थी सारख्या सणांची वेळ साधून त्यांना फुकटात धान्य, तेल, साखर सारख्या वस्तू फुकटात वाटल्या जात आहेत, त्यामागे कोणताही हेतू नसता तर ठीक होते, पण निवडणुका जवळ येऊन ठेपताच हे औदार्य का फळफळावे, असा सवाल त्यांनी केला. लोकांनी अशा वस्तू नाकारून आपल्या सणांसाठी आपणाला कोणाचीही भीक नको हे दाखवून द्यायला हवे, ते म्हणाले.
आपण मतदारसंघात तीन कार्यकाळात केलेले काम लोकांसमोर आहे, त्यासाठी जाहिरातबाजीची वा स्टंटबाजीची गरज नाही, असे सांगून काही मंडळी त्यासाठी करीत असलेल्या आटापिट्याची त्यांनी कीव केली. आपले काम पारदर्शी आहे, आपणाला कोणत्याही बेकायदा मार्गाचा अवलंब करावा लागला नाही की आपणावर कोणतेही खटले पण दाखल झालेले नाहीत, पण काहींनी तोच राजमार्ग बनविला आहे व ते त्याचे पोटतिडकीने समर्थन पण करीत आहेत. उच्च न्यायालयापर्यंत प्रकरणे पोचलेल्यांनीच हा आव आणावा हीच खरी शोकांतिका आहे. या लोकांचे प्रत्येक व्यवहारच बेकायदा आहेत, त्यात त्यांची "मास्टरी' आहे असे त्यांनी नमूद केले.
फातोर्ड्याच्या कल्याणाचा आव आणून स्थापन झालेल्या अशाच एका संघटनेचा उल्लेख त्यांनी केला व सांगितले, की असलेली लागवडीखालील शेती बुजवून तेथे कॉंक्रीटचे जंगल उभारणारे आता फातोर्डात ग्रीनरी उभारण्याच्या गोष्टी करीत आहेत पण त्यासाठी जमीन कुठे उपलब्ध आहे ते सांगण्याचे मात्र टाळतात. फातोर्डाच्या विकासकामांबाबत कोणत्याही मंचावर त्यांच्याशी आमने -सामने चर्चा करण्याची आपली तयारी आहे व तसे आव्हान आपण त्यांना अनेकदा दिलेले आहे पण ती हिंमत नसल्यामुळेच ती मंडळी दुसऱ्याच्या नथींतून तीर मारण्याचा उपद्व्याप करीत आहेत. पण आपणाला त्याची पर्वा नाही , कारण आपले मतदार राजहंसाची भूमिका बजावणारे आहेत असे त्यांनी आत्मविश्र्वासाने सांगितले.

"गोवादूत'च्या विघ्नहर्ता विशेषांकाचे आज प्रकाशन

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - दै."गोवादूत'च्या विघ्नहर्ता विशेषांकाचे प्रकाशन उद्या (सोमवारी) हातुर्ली येथे श्रीसुसेनाचार्य मठात कुंडई तपोभूमीचे पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे. गणेश चतुर्थीनिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या "गोवादूत'च्या या विशेषांकामध्ये गोवा, कोकण, पुणे, साताऱ्यापासून थेट इंडोनेशिया ते तुर्कस्थानपर्यंतच्या गणेशभक्तीचा आढावा घेण्यात आला आहे. हा संग्राह्य अंक मंगळवारपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे.

Sunday 5 September, 2010

७ रोजीचा देशव्यापी संप "न भूतो न भविष्यति'

पणजीत दहा हजार कामगारांची रॅली

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - केंद्रातील "युपीए' सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील सामान्य लोकांना जगणे महाकठीण बनले आहे. "गरिबी हटाव' म्हणणारी कॉंग्रेस दारिद्र्यषेखालील लोकांची संख्या वाढवत निघाली आहे. वाढती महागाई व कामगारांची पिळवणूक यामुळे जनता मेटाकुटीलाच आली आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरातील तब्ब्ल ६६ हजार कामगार संघटना प्रथमच एकत्र येऊन येत्या ७ रोजी संपावर जाणार आहेत. साहजिकच आत्तापर्यंतच्या कामगार इतिहासातील हा एक क्रांतिकारी दिवस ठरणार आहे.
आज येथे गोवा कामगार सभेचे निमंत्रक ऍड. सुहास नाईक यांनी पत्रपरिषदेत बोलताना ही माहिती दिली. यावेळी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, प्रसन्न उट्टगी, सुभाष नाईक जॉर्ज, गोविंद भोसले आदी नेते हजर होते. ७ रोजी सकाळी ९ वाजता सर्व कामगार क्रांतीचौकाजवळ जमा होणार आहेत. नंतर पणजी कदंब बसस्थानकावरून विराट रॅली शहरात काढली जाईल. मग या रॅलीचे रुपांतर आझाद मैदानावर जाहीर सभेत होईल, अशी माहिती ऍड. नाईक यांनी दिली.
हा संप यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व कामगार संघटनांनी जबरदस्त कंबर कसली आहे. या संपात विविध सरकारी कर्मचारी संघटनाही सहभागी होतील. वीज कामगारांना "एस्मा' लागू करून राज्य सरकारने मूर्खपणा केला आहे. यामुळे कामगार अधिक प्रमाणात संपात सहभागी होतील, असाही टोला यावेळी हाणण्यात आला. ७ रोजीच्या संपात मुख्यत्वे सर्वसामान्य जनतेचे विषय सरकारच्या नजरेस आणून दिले जातील. हा संप केवळ कामगारांच्या हितापुरती मर्यादित नसून त्यात राष्ट्रहित व व्यापक समाजहित डोळ्यांसमोर ठेवण्यात आल्याची माहितीही ऍड. नाईक यांनी दिली.
राज्यात किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरूच आहे. मागीलदाराने आपल्या बगलबच्च्यांना नियमित नोकऱ्या देण्याची संतापजनक कृती मंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोप ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला. कामगार कपात, बेरोजगारीमुळे जगणेच कठीण होऊन बसले आहे. जुवारी ऍग्रो, गोवा शिपयार्ड,"बीएसएनएल' आदी विविध कंपन्यांत १५ ते वीस वर्षे कंत्राटी कामगार राबवले जात आहेत. जोपर्यंत कामगारांना आर्थिक स्थैर्य लाभणार नाही तोपर्यंत त्यांचे जीवनमान उचांवणार नाही,
असेही श्री.फोन्सेका म्हणाले.
कामगार कायदे फक्त कागदोपत्रीच राहिले आहेत. भांडवलदारांचे चोचले पुरवण्यासाठी या कायद्यांची अंमलबजावणी केली जात नाही,असा जळजळीत आरोप त्यांनी केली. रोजंदारी, कंत्राटी कामगारांना आता रस्त्यावर उतरूनच आपले हक्क पदरात टाकून घ्यावे लागेतील, असेही ते म्हणाले. गोव्यात काही मोजकेच भांडवलदार व मुख्यत्वे खाण मालक राजकीय सूत्रे हाताळतात. त्यामुळे इथे सामान्यांना वाली राहिलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
७ रोजीच्या संपात बॅंकांही सहभागी होणार आहेत. म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेच्या कामगारांना दहा वर्षे पगारवाढ मिळाली नाही व त्यामुळे हे बॅंक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या संपाच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. किमान वेतन ३०० रुपये प्रतिदिन मिळायलाच हवे,कंत्राटी व रोजंदारी कामगारांना सेवेत नियमित करणे,कामगार कायद्यातील भांडवलदारांसाठीच्या पळवाटा रद्द करून त्यात आवश्यक दुरुस्ती करणे,असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे,सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण रोखणे, खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तू तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर तात्काळ घटवणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

अटालाविरुद्ध आता "रेड कॉर्नर' नोटीस

पणजी,दि.४(प्रतिनिधी) - पोलिस, ड्रग माफिया आणि राजकारणी यांच्या साटेलोटे प्रकरणातील मुख्य संशयित व सध्या फरारी असलेल्या अटाला याच्या शोधासाठी गुन्हा विभागाने आज "रेडकॉर्नर' नोटीस जारी केली. या नोटिशीत सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ व इंटरपोलला सतर्क करण्यात आले असून अटाला सापडल्यास त्याला तात्काळ पोलिसांच्या हवाली करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्यात गाजत असलेल्या ड्रग प्रकरणातील मुख्य संशयित अटाला याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याऱ्या गुन्हा विभागाच्या हलगर्जीपणामुळे अटाला बेपत्ता झाला असून त्यामुळे सरकारची अत्यंत नाचक्की झाली आहे. दरम्यान, अटाला याच्या बेपत्ता होण्यामागे पोलिस फितूर असल्याचा आरोप विरोधी भाजप व इतर संघटनांनी केला आहे. गृहमंत्री रवी नाईक यांना तर हा विषयच फारसा गंभीर वाटन नसल्याचे त्यांच्या यासंदर्भातील वक्तव्यावरून दिसून आले होते.
या प्रकरणाची चौकशी करणारे गुन्हा विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर हे टीकेचे लक्ष्य बनले आहेत. दरम्यान, अटालाच्या जामिनासाठी ठेवण्यात आलेली ५० हजार रुपयांची अनामत रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार तथा अटालाची माजी प्रेयसी लकी फार्महाऊस हिने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गोव्यात येऊन जबानी देण्याची तयारी दर्शवली; होती परंतु अद्याप ती फिरकली नसल्याने आता स्वीडनला जाऊन तिची जबानी घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकारकडून यासंबंधीची मान्यता मिळाली असून केवळ स्वीडन पोलिसांची परवानगी मिळवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती चंद्रकांत साळगावकर यांनी दिली.

मडगावात बारबाला व दोघा एजंटना अटक, हॉटेलचा व्यवस्थापक फरारी

सेक्स रॅकेटचा पुन्हा सुळसुळाट

मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी) : पेडणे, कळंगुटपाठोपाठ मडगाव येथे पुन्हा सेक्स रॅकेट डोके वर काढत आहे. पाच वर्षांपूर्वी कोलवा, फातोर्डा येथे अशाच रॅकेट अड्ड्यांवर छापे घालून कित्येक बारबालांना अटक करण्यात आली होती. काल रात्री मडगाव पोलिसांनी खारेबांध येथील सिझर हॉटेलवर छापा टाकून दोन बारबालांसह दोघा एजंटना अटक केली. या बारबाला मुंबईतील असून त्यांची रवानगी "अपनाघर'मध्ये करण्यात आली आहे.
या सिझर हॉटेलात मुंबईचा नेव्हिल डिसोझा व पर्रा म्हापसा येथील चरण गंगाधर खर्वे हे गोव्यात विविध हॉटेलात तरुणीचा पुरवठा करत होते. काल या दोघांना मडगाव पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक संतोष देसाई, उपनिरीक्षक तुळशीदास नाईक, सुभाष नाईक, रोहन नाईक व चंद्रू वेळीप यांनी ही कारवाई केली. गेल्या आठ दिवसांपासून या हॉटेलात हा धंदा मोठ्या प्रमाणात चालत होता. या प्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक लॅस्टेर डिसोझा याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून तो फरारी आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
मडगाव परिसरात केवळखारेबांधच नव्हे तर गांधी मार्केट, रावणफोंड, फातोर्डा, कोलवा भागात राजरोस असे व्यवसाय सुरू आहेत. गेल्या वर्षी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमजवळ एका फ्लॅटमध्ये छापा घालून कित्येकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिर्ली येथील अड्ड्यावर छापा घालून ६ जणांना अटक करण्यात आली होती. मायणा कुडतरी पोलिसांनी रायचे तळे कुडतरी येथील एका फार्म हाऊसवर छापा घालून कित्येक बारबालांना अटक केले होती. या फार्म हाऊसवर गोव्यातील प्रतिष्ठित मंडळी जात असल्याचे दिसून आले होते. कोलवा प्रकरण तर पोलिसांच्या अंगलट आले होते. पोलिसांनी खारेबांध येथे छापा घातला असला तरी या व्यवसायाची व्याप्ती प्रचंड असून
असून मुंबई व गोव्यातील तरुणी या रॅकेटमध्ये गुंतल्या असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांसाठी बीट पद्धती असताना या व्यवसायाचा तपास लावण्यात उशीर लागल्याबद्दल लोकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मडगावी चिनी बनावटीचे पंचाहत्तर मोबाईल जप्त

मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी) : वजन व माप खात्याच्या अधिकाऱ्यांनी खारेबांध येथील मीरा सहकारी सोसायटीच्या इमारतीतील एका फ्लॅटवर आज दुपारी छापा घालून विना परवाना चिनी बनावटीचे ७५ मोबाईल त्यांनी जप्त केले. बाजारात त्यांची किंमत २ लाख रुपयांपेक्षा जास्त असून दुकान मालक मुकेशकुमार खेत्री फरारी झाला आहे.
काळ्या बाजारातून चिनी बनावटीच्या वस्तू आणून तो गोव्यातील बाजारात त्यांचा पुरवठा करीत होता. मात्र या वस्तू कुठून येतात याचा पत्ता लागत नव्हता. त्याच वेळी अशा वस्तूंची विक्री खारेबांध येथे सुरू असल्याचा सुगावा वजन व माप खात्याला लागला. खात्याचे नियंत्रक श्री. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पंचवाडकर व गुलाम गुलबर्ग यांनी दुपारी त्या फ्लॅटवर छापा घालून सर्व माल जप्त केला.
मडगाव बाजारात कित्येक ठिकाणी अशी दुकाने थाटलेली असून सदर वस्तूंवर कोणतीच किंमत लावलेली नसते. त्यामुळे सरकारला लाखो रुपयाच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. वजन व माप खात्याने त्यांची तात्काळ आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

दिल्ली विद्यापीठावर अभाविपचा झेंडा

नवी दिल्ली, दि. ४ ः अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाची निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिंकली असून त्यामुळे परिषदेच्या गोटात जबरदस्त उत्साह संचारला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चिटणीस या तिन्ही महत्त्वाच्या पदांवर अभाविपने दिमाखात झेंडा फडकावला आहे. कॉंग्रेसपुरस्कृत "एनएसयुआय'ला केवळ सहचिटणीस या पदावर समाधान मानावे लागले. दिल्ली विद्यापीठाशी ५१ महाविद्यालये संलग्न आहेत. अत्यंत कडेकोट सुरक्षेत मतदान पार पडले. निकाल जाहीर होताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. या निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तरीदेखील पैसा व मनगटशाहीचा वारेमाप वापर या निवडणुकीत झाल्याचा ठपका काही उमेदवारांनी ठेवलाच.

विष्णू वाघ यांची ५ नाटके एकाच महिन्यात रंगमंचावर

नाट्यक्षेत्रातील आगळावेगळा विक्रम

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) : सिद्धहस्त गोमंतकीय नाटककार विष्णू सूर्या वाघ यांची तब्बल पाच नाटके एकाच महिन्यात रंगमंचावर येत असून गोव्याच्या रंगभूमीच्या इतिहासात तो आगळावेगळा विक्रम ठरणार आहे.
श्री. वाघ यांच्या पाच नाटकांच्या मालिकेतील पहिले नाटक, "युद्ध नको मज बुद्ध हवा' दि. २ सप्टे. रोजी कला अकादमीच्या मा. रंगनाथ च्यारी स्मृती नाट्यमहोत्सवात सादर झाले. या नाटकाची निर्मिती रूद्रेश्वर - पणजी या संस्थेतर्फे करण्यात आली असून देविदास आमोणकर यांनी त्यांचे दिग्दर्शन केले आहे.
श्री. वाघ यांचे दुसरे नाटक "हलो हांव उलयतां' राजदीप नायक यांच्या कला चेतना या संस्थेतर्फे रंगमंचावर येत असून प्रेमानंद गुरव यांनी त्याची निर्मिती केली आहे. प्रमोद म्हाडेश्वर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा शुभारंभी प्रयोग दि. १३ सप्टेंबर रोजी खोल - काणकोण येथील सार्वजनिक गणेशोत्सवात होणार आहे. त्याचे २० सप्टेंबरपर्यंत गोव्यात विविध ठिकाणी एकूण आठ प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
डोंगरी येथील नटराज क्रिएशन्स या संस्थेतर्फे श्री. वाघ यांचे "तीन तिके-अमुरपिके' हे विनोदी कोकणी नाटक १६ सप्टेंबरपासून रसिकांच्या सेवेत दाखल होईल. या नाटकाचे दिग्दर्शन जयेंद्रनाथ हळदणकर यांनी केले आहे.
श्री. वाघ यांचे चौथे नायक मुंबईतील श्री कलाई या संस्थेतर्फे निर्मित करण्यात आले असून रंगभूमी व चित्रसृष्टीतील प्रतिभावंत दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांनी ते दिग्दर्शित केले आहे. प्रायोगिक रंगभूमीवर वेगळेपणाचा ठसा उमटवण्याची ताकद असलेले "मी तीच बाई आहे' हे नाटक १८ सप्टेंबरपासून रंगभूमीवर येणार आहे.
येत्या ३० सप्टेंबर रोजी कला अकादमीच्या "रंगमेळ रिपर्टरी' कंपनीतर्फे श्री. वाघ यांनी लिहिलेल्या व स्वत:च दिग्दर्शित केलेल्या सं. "अलख निरंजन' या नवीन संगीत संगीत नाटकाचा प्रयोग मा. दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात सादर केला जाईल. या नाटकात रंगमेळचे कलाकार चमकणार आहेत. त्यातील नाट्यगीतेही जुन्या मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाची स्मृती गाजवतील, असा विश्वास श्री. वाघ यांनी व्यक्त केला आहे.
वरील नाटकांखेरीज "प्राचीवरी ये भास्कर व ' बाई मी दगूड फोडते' ही आणखी दोन नाटके श्री. वाघ यांनी लिहिली असून ऑक्टो.-नोव्हे. दरम्यान ती रंगभमूीवर येतील. त्यांचे सध्या एका वेगळ्याच विषयावर आधारित वैराग्यमठ' या नाटकाचे लेखन सुरू असून "भारत अजिंक्य आहे' ही नाट्यकृतीसुद्धा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.