Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 November, 2010

मरणासन्न शिरगावावर अखेरचा घाव

कोमुनिदादकडून लाखो चौरसमीटर जागा खाण उद्योजकांच्या घशात
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): डिचोली तालुक्यातील शिरगाव कोमुनिदाद समितीने खाण उद्योजकांच्या आमिषाला बळी पडून आता गावाच्या अस्तित्वाचा शेवटचा तुकडा म्हणून शिल्लक राहिलेली लाखो चौरसमीटर जागा दोन बड्या खाण उद्योजकांना २० वर्षांच्या करारावर आंदण दिल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. या वादग्रस्त निर्णयामुळे हा गाव आता पूर्णतः खाण उद्योगाच्या कवेत नामशेष होण्याचीच भीती निर्माण झाली आहे. गावच्या अस्तित्वाची चिंता वाहणारे काही शिरगाववासीय या बेकायदा कराराला प्रशासकीय व न्यायालयीन पातळीवर आव्हान देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. खाण उद्योजकांच्या तालावर नाचणारे राज्य व केंद्र प्रशासन आणि त्यात खर्चीक न्यायव्यवस्था यातून हा गाव कसा वाचवायचा, असाच यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे.
यासंदर्भात प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, शिरगाव कोमुनिदाद समितीने दोन बड्या खाण कंपन्यांकडे करार करून लाखो चौरसमीटर जागा पुढील २० वर्षांसाठी करारावर दिली आहे. एकूण ५० लाख रुपयांच्या बोलीवर केलेल्या या करारानुसार पाच लाख रुपये कोमुनिदादच्या नावे तर उर्वरित ४५ लाख रुपये सर्व गावकऱ्यांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कोमुनिदादच्या गावकऱ्यांची संख्या आता साडेतीनशे ते चारशेवर पोचली असून प्रत्येक गावकऱ्याला साडेअकरा हजार रुपयांचा हिस्सा मिळणार असल्याची माहिती एका ग्रामस्थाकडून मिळाली आहे.
सर्वे क्रमांक ६/०, ८४/० व ९३/० ही जागा एका खाण कंपनीला तर ८२/०, ८३/० व ८५/० ही दुसऱ्या कंपनीला देण्यात आली आहे. मुळात ही जागा कोमुनिदादची असूनही या सर्व सर्वे क्रमांकावर संबंधित खाण कंपनीचीच नावे लागली आहेत, अशी माहिती सुरेश गावकर यांनी दिली. सुरेश गावकर व अन्य गावकऱ्यांनी कोमुनिदादच्या या निर्णयाला जिल्हाधिकारी कार्यालय व उच्च न्यायालयातही आव्हान दिले असून त्याबाबत सुनावणी सुरू झाली आहे. कोमुनिदादला ही जागा करारावर व त्यात खाण उद्योगासाठी देता येत नाही पण केवळ ती जागा सदर खाण कंपन्यांच्या नावे लागल्याची संधी साधून हा करार करण्यात आला आहे, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. प्रत्येक गावकऱ्याच्या घरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सदस्याला या रकमेचा "जण' अर्थात लाभांश देण्याचा निर्णय कोमुनिदाद समितीने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे आपल्याच गावच्या अस्तित्वाच्या लिलावात प्रत्येकाला सामील करून घेण्याचाच कट आहे, असा ठपकाही तक्रारदारांनी ठेवला आहे.
खाण खात्याकडूनही परवानगी
दरम्यान, शिरगाव कोमुनिदाद समितीने केलेल्या कराराच्या वैधतेबाबत संशय निर्माण झाला असतानाच खाण खात्याकडून मात्र या जागेत खनिज उत्खनन करण्यास परवानगी देणारी अधिसूचना काल ११ रोजी जारी करण्याचा प्रकार घडला आहे. या कराराबाबतचा विषय न्यायप्रविष्ट असताना खाण खात्याने कोणत्या आधारावर या जमिनीत खनिज उत्खनन करण्यास मान्यता दिली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. खाण खात्याच्या या परवानगीमुळे राज्य प्रशासन पूर्णपणे खाण उद्योजकांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे सिद्ध झाले आहे. आता केवळ न्यायदेवतेवरच विश्वास ठेवण्यापलीकडे अन्य कोणताच मार्ग राहिलेला नाही, असेही सुरेश गावकर म्हणाले.
श्री देवी लईराईच गावाला तारू शकेल?
राज्यात व राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित असलेल्या श्री देवी लईराईचा गाव म्हणून शिरगाव प्रसिद्ध आहे. मुळात श्री देवी लईराईच्या वास्तव्यामुळे या गावाला कीर्ती प्राप्त झाली आहे. श्री देवी लईराई मंदिराच्या कळसामागे रक्तबंबाळ अवस्थेतील शिरगावचे डोंगर पाहिले की येथील भयाण परिस्थितीचा अनुभव येतो. श्री लईराईच्या या प्रशस्त व टुमदार मंदिराच्या बांधकामासाठी येथील ग्रामस्थांनी खाण उद्योजकांची मदत घेतली खरी; परंतु हेच खाण उद्योजक हा गाव नामशेष करतील, याचा विचारही त्यांनी कदाचित त्यावेळी केला नसेल. शेती, बागायती, मासेमारी आदी व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शिरगावातील बेरोजगारांना नोकरीचे गाजर दाखवण्यात आले. आपल्याच गावचे लचके तोडून त्यातूनच त्यांच्या पगाराची सोय करण्यात आली. "डिव्हाईड अँड रूल' या इंग्रजांच्या नीतीप्रमाणे खाण उद्योजकांनी आम्हा गावकऱ्यांत फूट घालून इथे आपला व्यवसाय वाढवला. आता आम्ही गावकरीच या गावच्या नायनाटाला कारणीभूत ठरणार आहोत, हे कुणीही विसरू नये, असे सांगत श्री देवी लईराईशिवाय या गावाला कुणीच तारू शकणार नाही, असे ते म्हणाले.
--------------------------------------------------------
धडाविना तडफडणारे शीर..
शिरगाव म्हणजे धडावेगळे झालेले तडफडणारे शीर अशीच सध्याची परिस्थिती आहे. खाण उद्योजकांनी चोहोबाजूंनी आक्रमण करून या गावाला जणू चक्रव्यूहात अडकवून सपासप वार करून या गावचे शीरच धडावेगळे केले आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली. हा गाव वाचवता येणे शक्य नाही का? असा सवाल करताच, "अहो! गाव वाचवायची गोष्ट काय करता? हा गाव कधीच मेला आहे. या मेलेल्या गावची परिस्थिती शवागारात ठेवलेल्या मृतदेहासारखीच बनली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की त्याची वासलात कशी लावावी?', असा प्रश्न उपस्थित करून एका ग्रामस्थाने सत्य परिस्थितीच सर्वांसमोर उभी केली.

सांग्रेसला दाखवले काळे झेंडे

देशप्रेमी नागरिक समितीची निदर्शने
वास्को, दि. १२ (प्रतिनिधी): पोर्तुगीज राजवटीने गोव्यातील जनतेवर केलेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल लेखी माफी मागावी. तसेच, गोव्यात असलेली "फुंदासाव ओरीएंत' ही संस्था दहशतवादी कारवायांत गुंतल्याची शक्यता व्यक्त करून या संस्थेला पैशांचा पुरवठा कुठून होतो, याची दक्षता खात्याने त्वरित चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आज "देशप्रेमी नागरिक समिती'तर्फे राजू वेलिंगकर यांनी केली.
आज सकाळी मुरगाव बंदराच्या धक्क्यावर लागलेल्या "एनआरपी सांग्रेस' या पोर्तुगीज जहाजाच्या आगमनाच्या विरोधात समितीने काळे झेंडे दाखवून निदर्शने करताना "सांग्रेस चले जाव'च्या घोषणा दिल्या. पोर्तुगिजांनी गोव्यावर आपल्या राजवटीचे काळे ढग पसरविल्यास पाचशे वर्षे पूर्ण होत आहे. हा काळ साजरा करण्यासाठी हे जहाज गोव्यात दाखल झाल्याचे समितीने नजरेस आणून देत त्याला मान्यता दिल्याबद्दल गोवा सरकारचा निषेध करण्यात आला. मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या मार्गावर समितीच्या सदस्यांनी एकत्र येऊन या जहाज तसेच गोवा सरकारच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच गोवा युवा मंचाच्या सदस्यांनी येथे उपस्थिती लावून समितीला पाठिंबा दर्शविला.
पोर्तुगिजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले, त्या आठवणी साजऱ्या करण्यासाठी हे जहाज गोव्यात आले आहे. ही गोमंतकीयांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. पोर्तुगिजांनी केलेला अत्याचार आजची पिढीही विसरू शकत नसल्याचे यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
गोवा सरकारने या जहाजाला गोव्यात येण्यास मान्यता देऊन निर्लज्जपणाचे दर्शन घडवले आहे. आपल्या शौर्याचा क्षण येथे साजरा करण्यासाठी आलेल्या या जहाजाला लवकरात लवकर येथून परत पाठवण्याची गरज व्यक्त करताना, जखमेवर मीठ चोळणाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशप्रेमींची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी श्री. आर्लेकर यांनी केली.
"सांगे्रस' जहाजावरील कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, गोमंतकीयांचा विरोध पाहून त्यांनी हजेरी लावण्यास नकार दिला. यातच आमचा अर्धा विजय झाल्याचे "देशप्रेमी नागरिक समिती'चे निमंत्रक आनंद शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, पोर्तुगीज नौदलाचे "सांग्रेस' जहाज आज सकाळी १०.४५ च्या सुमारास बंदरात दाखल झाल्यानंतर गोव्यात असलेले पोर्तुगीज काऊंसल जनरल डॉ. आंतोनियो साबिदो कॉस्ता यांनी जहाजाचे प्रमुख प्रोयेंसा मेंडीस यांना शुभेच्छा देऊन जहाजाचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याबरोबर भारतीय नौदलाचे अधिकारी कमांडर प्रमोद माथूर उपस्थित होते.
मुरगाव बंदरात दाखल झालेल्या पोर्तुगीज नौदलाच्या सदर जहाजाचे १९३७ सालात अनावरण करण्यात आले होते. ८९.५ मीटर लांबीच्या या जहाजाचे वजन १८०० टन आहे. गोवा काबीज करण्यासाठी ज्या प्रकारे शिडांचे जहाज गोव्यात आले होते तसाच याचा आकार असून ८ फेब्रुवारी १९६२ साली हे जहाज पोर्तुगिजांच्या ताफ्यात दाखल करण्यात आले होते. १५ जानेवारी पासून सदर जहाज विविध देशांच्या सफरीवर निघालेले असल्याची माहिती जहाजाचे प्रमुख मेंडीस यांनी दिली.

तर ठोस कृतीच करून दाखवणार

महामार्ग आराखडाप्रश्नी सरकारला इशारा
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्गाच्या नव्या आराखड्यासंदर्भात दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सध्याचा प्रस्तावित आराखडा रद्द न केल्यास त्याचे गंभीर पडसाद येणाऱ्या काळात उमटणार असल्याचा इशारा आज राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण फेरबदल कृती समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी दिला.
या संदर्भात येत्या २२ नोव्हेंबर रोजी ४ वाजता मडगाव येथील लोहिया मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे; आराखडा रद्द करण्यासाठी राज्य सरकारला २२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर म्हणजे २३ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी येणारे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष या विषयाकडे वेधून घेतले जाणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर अशोक प्रभू, डॅलन डिकॉस्ता, राजाराम पारकर, ए. गोम्स व संजय नाईक उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी सचिवालयात झालेल्या बैठकीत महामार्ग ४ (अ) आणि महामार्ग १७ च्या रुंदीकरणाच्या आराखड्याला लोकांना प्रचंड विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांनी नवीन आराखड्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत धाव घेतली आहे. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्तावित आराखडाच बदलून घ्यावा अन्यथा त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. शिवाय, यापुढे केवळ सभा घेतल्या जाणार नसून ठोस कृती केली जाणार असल्याचेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्गाविषयी राज्य सरकारचे सल्लागार विल्बर स्मिथ यांनी "गुगल' या संकेतस्थळावरील माहितीच्या साह्याने महामार्गाचा आराखडा तयार केला आहे आणि तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे राज्य सरकारला कळून चुकले आहे. यामुळे आता सरकारने अहंकार न बाळगता हा आराखडा त्वरित रद्द करावा. सरकार हा आराखडा बदलून नवीन आराखडा बनवण्याची तयारी दाखवत असल्यास त्याला समिती नक्कीच मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सरकारच्या या चुकीच्या आराखड्याविरोधात गावागावांत कोपरा बैठका घेऊन जागृती केली जाणार आहे. लोहिया मैदानावर होणाऱ्या सभेत मोले ते पणजी व पेडणे ते काणकोण भागातील नागरिक सहभागी होणार आहेत. सरकारने सध्याचा आराखडा लागू करण्यासाठी एक जरी पाऊल पुढे टाकले तर दोन पावले पुढे टाकण्यास समिती सज्ज असल्याचा इशारा त्यांनी दिला.
रुंदीकरणात जमिनी जाणाऱ्या लोकांना बाजारातील सध्याच्या दरानुसार रक्कम देण्याचा सरकारचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे अशोक परब यांनी सांगितले. मोपा विमानतळासाठी सरकारने लोकांच्या शेतजमिनी रु. ५ या कवडीमोल दराने गिळंकृत केल्या. फयान वादळाची झळ बसलेल्या लोकांना एक वर्ष उलटले तरी नुकसानभरपाई दिलेली नाही. यामुळे सध्याच्या बाजार दराने जमिनी हस्तांतरण करण्याचा सरकारचा दावा लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार आहे. आमचा विकासाला विरोध नाही तर, सरकारच्या या चुकीच्या आराखड्याला विरोध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

'माहिती हक्क कायदा हे ब्रह्मास्त्र'

निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा यांचा सत्कार
पणजी, दि.१२ (प्रतिनिधी): माहिती हक्क कायदा हा भारतीय लोकशाहीने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले "ब्रह्मास्त्र' आहे. प्रशासकीय तसेच राजकीय भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी या अस्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर करून भारतीय लोकशाही बळकट करण्याचे आवाहन माहिती हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रथम आदेश काढणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा यांनी आज येथे बोलताना केले. गोवा माहिती हक्क संघटने (आरटीआय फोरम गोवा) तर्फे गोवा पीपल फोरम, रुद्रेश्वर पणजी, गोवा इंटरनॅशनल सेंटर, गोवा श्रमिक पत्रकार संघ (गुज), गोवा हितराखण मंच, गोवा महिला वकील संघटना व युथ हॉस्टेल यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात अजित शहा यांचा गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी. डी. कामत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गोवा पीपल फोरमचे ऍड. सतीश सोनक, इंटरनॅशनल सेंटरच्या संचालक नंदिनी सहाय, गोवा महिला वकील संघटनेच्या निमंत्रक किशोरी फुग्रो, गोवा हितराखण मंचाचे प्रशांत नाईक, रुद्रेश्र्वर पणजीचे देवीदास आमोणकर, गोवा युथ हॉस्टेलचे आश्विन तोंबट, माहिती हक्क फोरमचे अध्यक्ष शशी कामत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ऍड. सोनक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंदिनी सहाय यांनी अजित शहा यांच्या कार्याचा आढावा घेतला.
या प्रसंगी बोलताना जी. डी. कामत यांनी शहा यांच्या कार्यापासून गोव्यातील वकिलांनी स्फूर्ती घेऊन आपल्या कारकिर्दीत यश प्राप्त करण्याचे आवाहन केले. रामशास्री बाण्याचे न्यायमूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेले व माहिती हक्क कायद्याच्या अंमलबजावणी आदेशामुळे देशभरातील लोकांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या शहा यांचे सोलापूर हे जन्मगाव प्रसिद्धीच्या झोतात आले. माहिती हक्काअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास होणाऱ्या विलंबाबाबत खंत व्यक्त करताना "जनसुनवाई'द्वारे गावागावांत माहिती हक्काबाबत जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा माहिती हक्काबाबत चर्चा करून भारतीय लोकशाहीची तारीफ केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहा यांनी माहिती हक्क कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन प्रवीण सबनीस यांनी केले. प्रशांत नाईक यांनी आभार मानले.
----------------------------------------------------------
आज शहा यांच्याशी खुली चर्चा
माहिती हक्क कायद्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी दि.१३ व दि.१४ रोजी इंटरनॅशनल सेंटर दोनपावला येथे न्यायमूर्ती अजित शहा यांच्याशी खुली चर्चा करण्याचा कार्यक्रम गोवा माहिती हक्क संघटनेने आयोजित केला आहे. सर्वांना या चर्चासत्रात भाग घेता येईल. दि.१३ रोजी सकाळी ९.३० वा. हा कार्यक्रम सुरू होईल.

केबीसी ५ मध्येही अमिताभ बच्चनच

मुंबई, दि. १२ : सिनेजगताप्रमाणेच छोट्या पडद्यावरही अधिराज्य गाजविणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याकडे "कौन बनेगा करोडपती' अर्थात केबीसीच्या पाचव्या सत्राच्या संचलनाचाही प्रस्ताव आला आहे. अर्थात, त्यांनी हा प्रस्ताव अद्याप स्वीकारलेला नसला तरी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी लोकांकडे याविषयीचे मत मागितले आहे. लोकांनी अर्थातच यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यावर अमिताभ बच्चन यांनी "तुमचे म्हणणे मी ऐकले' असा संकेतही देऊन टाकला आहे. त्यामुळे केबीसीच्या पुढील सत्रातही तेच हॉटसीटच्या समोर दिसणार हे जवळपास नक्कीच मानले जात आहे.
हेडलीने मुलांनाही लष्करी प्रशिक्षण दिले होते
बोस्टन, दि. १२ : २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या योजनेचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या डेव्हिड कोलमन हेडली याने आपल्या मुलांनाही गेल्या उन्हाळ्यात शिकागो पार्क येथे लष्करी प्रशिक्षण दिले होते आणि यामुळेच हेडली आमच्या रडारवर आला होता, असा दावा एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केला आहे.
गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात इतर पालकांप्रमाणे हेडलीनेही आपल्या मुलांना शिकागो पार्क येथे नेले होते. त्यानंतर त्याच्या मुलांना या ठिकाणी सर्वप्रकारचे लष्करी प्रशिक्षण देण्यात आले, असे वृत्त "शिकागो ट्रिब्यून' या वृत्तपत्राने या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. हेडलीच्या या कारवायांमुळेच त्याच्यावर पोलिस अधिकाऱ्यांचा संशय बळावला आणि या अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना याबाबत सावध केले. त्यानंतर या अधिकाऱ्याने हेडलीच्या कारवायांवर करडी नजर ठेवली. यावेळी हेडली उर्दू भाषेत बोलत असल्याचेही आपल्या निदर्शनास आले होते, अशी माहिती शिकागो पोलिस कमांडर स्टीव्ह कालूरीस यांनी दिली असल्याचे वृत्तात पुढे म्हटले आहे.
हेडली या ठिकाणी सार्वजनिकरीत्या काही योजना तयार करत असल्याचे लक्षात आले नसले तरी त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या, असेही कालूरीस यांनी सांगितले आहे. कालूरीस यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. अमेरिकेत हेडलीविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात एफबीआयने हेडलीला अटक केली होती. शिकागो पार्कमध्ये हेडली नेमका कुठे दिसला होता हे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले नसल्याचे या वृत्तात पुढे म्हटले आहे.
माहिती अधिकार कक्षेत सहकार क्षेत्रालाही आणा
उच्च न्यायालयाची केंद्राला सूचना
मुंबई, दि. १२ : सहकार क्षेत्रात उघडकीस येत असलेल्या असंख्य घोटाळ्यांच्या घटना लक्षात घेता सहकारी बॅंका आणि संस्थांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्यासंबंधी केंद्र सरकारने विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचविले आहे.
सध्या असलेल्या व्यवस्थेनुसार सहकारी बॅंका आणि संस्था या माहितीच्या अधिकार कायद्याच्या कक्षेत नसल्याने त्या कुठलीही माहिती उघड करत नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समिती माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येते किंवा नाही यावर न्या. जे. पी. देवधर आणि न्या. ए. बी. चौधरी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. मागितली गेलेली माहिती उघड करावी, असे निर्देश एकसदस्यीय खंडपीठाने वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते. एकसदस्यीय खंडपीठाच्या या निर्णयाला समितीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पंजाबराव देशमुख सहकारी बॅंक २००५ च्या माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे, असे समितीच्या वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते.
पर्यावरण मंत्रालयाची 'आदर्श'ला नोटीस
नवी दिल्ली, दि. १२ : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू असलेल्या कुलाबा येथील वादग्रस्त "आदर्श' गृहनिर्माण सोसायटीला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज कारणे दाखवा नोटीस बजावली असून, पर्यावरण विषयक निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही ३१ मजली इमारत जमीनदोस्त का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे.
"पर्यावरण मंत्रालयाने आज आदर्श गृहनिर्माण सोसायटीला सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आले असून, यासाठी सोसायटीला दोन आठवड्यांची आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्थिती स्पष्ट करण्यासाठी आणखी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे', असे केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. इमारत उभी करण्यासाठी आदर्श सोसायटीने पर्यावरण मंत्रालय किंवा राज्य सरकारशी संबंधित इतर खात्यांकडून कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळेच ही ३१ मजली इमारत पाडून का टाकण्यात येऊ नये अशी विचारणा आम्ही केली आहे, असेही रमेश यांनी सांगितले.
या इमारतीच्या जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील वादाशी पर्यावरण मंत्रालयाला काहीही घेणेदेणे नसून, इमारत उभी करताना सीआरझेड कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन झाले किंवा नाही हा आमच्यादृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही जयराम रमेश यांनी यावेळी सांगितले. या इमारतीत झालेला घोटाळा उघडकीस आल्यानंतर याची गंभीर दखल घेत संरक्षण मंत्रालयाने या घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस केली आहे. लष्कराच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर ३१ मजली टोलेजंग इमारत उभी करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र कसे काय देण्यात आले याचा आणि कारगिल युद्धातील शहिदांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या इमारतीत शहिदांच्या विधवांना सदनिका का मिळाल्या नाहीत, याचा तपास करावा, असे सीबीआयला सांगण्यात आले आहे.

'कोकेन कोस्ट'वरील पोलिसांना 'डोस'

गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): गोवा राज्य हे अंमलीपदार्थ आणि वेश्या व्यवसायाचा अड्डा झाल्याचे नमूद करणाऱ्या इंडिया टुडेच्या "कव्हर स्टोरी'ची पोलिस खात्याने बरीच धास्ती घेतली असून अंमलीपदार्थ आणि वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश सर्व पोलिस स्थानकांना देण्यात आले आहेत. "इंडिया टुडे' या राष्ट्रीय मासिकावर "गोवा, सेक्स ऍण्ड माफिया ऑन कोकेन कोस्ट' या मथळ्याखाली प्रसिद्ध झाली होती. या लेखाचे कात्रण काढून सर्व पोलिस स्थानकांना पाठवण्यात आले आहे. तसेच, या लेखाचे वाचन करण्याची सूचना प्रत्येक पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांना देण्यात आली आहे. गोव्याचे नाम बदनाम करणाऱ्यांविरुद्ध जास्ती जास्त गुन्हे नोंदवून कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
इंडिया टुडेच्या या "कव्हर स्टोरी'मुळे केंद्राकडूनही राज्य गृहखात्याला बरीच फटकार मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात कशा प्रकारे अंमलीपदार्थांचा व्यापार आणि वेश्या व्यवसाय सुरू आहे याची तपशीलवार माहिती या लेखाद्वारे उघड करण्यात आली आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने गोव्याची प्रतिमा जपण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे तेवढीच पोलिस खात्याचीही आहे. यामुळे पोलिस खात्याने कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली न येता अशा प्रकारावर आळा घालण्याची अपेक्षा गोमंतकीयांनी बाळगली आहे.
राज्यात कुठे अंमलीपदार्थांचा व्यवहार चालतो आणि तो कोण चालवतो याची पूर्ण कल्पना पोलिसांना आहे. तसेच, वेश्या व्यवसायात गुंतलेल्या प्रस्थांची आणि त्यांच्या ठिकाणांचीही पुरेपूर माहिती पोलिस खात्याला आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून पोलिस त्यांना अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचे आरोप होऊ लागेल आहेत. यामुळे हे "धंदे' राजरोसपणे पोलिसांदेखत सुरू असल्याचे सत्य आता लपून राहिलेले नाही. याचीच जाण पोलिस खात्याला झाल्याने आत पोलिस खात्याच्या वरिष्ठांनी या लेखाच्या कात्रणांसह कडक पावले उचलण्याचे आदेश असलेले पत्र पोलिस अधिकाऱ्यांना पाठवले आहे. परंतु, पोलिस अधिकारी या आदेशाचे किती पालन करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
राज्यात पर्यटन मोसम सुरू झाला असून अंमलीपदार्थांच्या विक्रीला आणि वेश्या व्यवसायालाही ऊत आला आहे. तसेच, किनारी भागात रात्रीच्या पार्ट्याही कर्णकर्कश आवाजात "रंगत' आहेत. या पार्ट्यांच्या आयोजनात पोलिसांचे किती साहाय्य असते हे गोवेकरांना सर्वज्ञात आहे. येत्या महिन्यात राज्यात वादग्रस्त ठरलेल्या "सनबर्न' पार्टीचे पुन्हा आयोजन होत असून या पार्टीवर पोलिस खाते निर्बंध घालणार का? याबाबत गृहखात्याने "चुप्पी' साधली आहे.

Friday 12 November, 2010

महामार्ग रुंदीकरण अधिसूचना रद्द होणार !

जनतेच्या रोषापुढे मुख्यमंत्र्यांचे नमते; आज शिष्टमंडळ दिल्लीला रवाना
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री कमलनाथ यांनी गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी दिलेल्या ३० नोव्हेंबर २०१० पर्यंतच्या मुदतीवर सावध भूमिका घेण्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ठरवले आहे. मुळात राज्य सरकारने एनएच -४ (अ) बाबत तयार केलेला सुधारीत आराखडा अद्याप कागदोपत्री उतरलाच नाही. या स्थितीत केंद्र सरकारच्या तगाद्याला बळी पडून घाईगडबडीत राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार कलम ३ "डी' लागू केल्यास ते राज्य सरकारच्या चांगलेच अंगलट येऊ शकते. साहजिकच एकीकडे येत्या ३० नोव्हेंबर २०१० पर्यंत हे कलम लागू झाले नाही तर संपूर्ण भूसंपादन प्रक्रियाच रद्दबातल ठरून नव्याने भूसंपादन करण्याची वेळ सरकारवर ओढवण्याचीच दाट शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणावरून सध्या वातावरण तापले आहे. त्यात परवा मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना राष्ट्रीय महामार्ग फेरबदल समितीने चांगलेच धारेवर धरून पुढील गंभीर परिणामांची जाणीव करून दिल्याने सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.आज मुख्यमंत्री कामत यांनी यासंबंधी चर्चेसाठी तातडीची बैठक आत्लिनो येथील सरकारी निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीला मंत्री चर्चिल आलेमाव, आमदार पांडुरंग मडकईकर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, "एनएचएआय' चे प्रकल्प संचालक श्री. दोड्डामणी, सा.बां.खात्याचे अधीक्षक अभियंते श्री. पार्सेकर तसेच भूसंपादन उपजिल्हाधिकारी अँथनी डिसोझा हजर होते.
या बैठकीत या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला."विल्बर स्मिथ' या सल्लागार कंपनीतर्फे तयार केलेला आराखडा हा पूर्णपणे अस्पष्ट होता. त्यामुळे राज्य सरकारतर्फे नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. नवा आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार झाला असला तरी तो अद्याप कागदोपत्री उतरलेला नाही. त्यामुळे अनिश्चित आराखड्याच्या आधारावर भूसंपादनाचा अंतिम अहवाल तयार करणे जिकिरीचे ठरणार असल्याचे स्पष्टीकरण भूसंपादन अधिकारी अँथनी डिसोझा यांनी या बैठकीत केले.
मुळात भूसंपादनासाठी सुरुवातीला ३ (ए) कलम लागू करताना भूसंपादनाचा विस्तृत आराखडा जनतेसाठी खुला करण्याचे बंधन आहे."एनएच'४ (अ)साठी भूसंपादन अधिसूचना जारी करताना जो आराखडा दिला होता त्यात आता संपूर्ण बदल करण्यात आला आहे. त्याची अद्याप लोकांना काहीच माहिती मिळाली नाही.जनतेला अंधारात ठेवून आता भूसंपादनाचा अंतिम आराखडा तयार केला तर जनतेला नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवल्याचा ठपका सरकारवर येऊ शकतो.
या स्थितीत नवा आराखडा तयार करण्यासाठी घेतलेल्या सर्व मेहनतीवर पाणी फेरण्याचीच शक्यता आहे.या आराखड्यावरून जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे. जनतेला अंधारात ठेवून भूसंपादन झाल्यास जनता पेटून उठेल. सरकारसाठी ते अडचणीचेच ठरेल,असाही सूर बैठकीत व्यक्त झाला.दरम्यान,या संपूर्ण परिस्थितीची जाणीव केंद्राला करून देणेच उचित ठरेल व नंतरच याप्रकरणी पुढे जाण्यावर आजच्या बैठकीत एकमत झाले.याप्रकरणी उद्या १२ रोजी सकाळी मुख्यमंत्री कामत, मंत्री चर्चिल व इतर अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचीही खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
.. तर भूसंपादन प्रक्रियाच रद्दबातल ठरेल
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर २००९ रोजी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेला ३० नोव्हेंबर २०१० रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ प्रमाणे भूसंपादन कलम ३ (ए) लागू करून एका वर्षांच्या आत अंतिम कलम ३ (डी) लागू झाले नाही तर संपूर्ण भूसंपादन प्रक्रियाच रद्दबातल ठरते.आता ३० नोव्हेंबरला अवघे काही दिवस बाकी असताना व नव्या आराखड्याचे नकाशे किंवा इतर तपशील कागदोपत्री तयार नसल्याने ही संपूर्ण प्रक्रियाच रद्दबातल ठरण्याचीच जास्त शक्यता आहे,असे मत एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केले.
एकदा कलम ३ "डी'अंतर्गत अहवाल राज्य सरकारकडून केंद्राला पाठवण्यात आला व तो मंजूर झाला की ही जमीन आपोआपच केंद्र सरकारच्या ताब्यात जाईल.मुळात ३ (ए) लागू केल्यानंतर कलम ३ "सी' अंतर्गत जनतेच्या हरकती व तक्रारी सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली जाते.मुळात सध्याच्या ३ (ए) अधिसूचनेवर जनतेला हरकती सादर करण्यासाठी नेमका भूसंपादन आराखडाच देण्यात आला नाही व त्यामुळे केंद्राच्या दबावाला बळी पडून ३ (डी) कलम लागू झाले तर भविष्यात न्यायालयात राज्य सरकार अडचणीत येऊ शकेल. याचा आढावा घेऊनच मुख्यमंत्री कामत यांनी सावध भूमिका घेण्याचे ठरवले आहे. आता उद्या १२ रोजी दिल्लीत "एनएचएआय'शी चर्चा करूनच पुढील दिशा ठरवण्यावर या बैठकीत एकमत झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे,अशी माहिती मिळाली आहे.

भाजपच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब

म्हापसा नगराध्यक्षपदी सुधीर कांदोळकर
उपनगराध्यक्षपदी विजेता नाईक

पेडणे- डॉ.वासुदेव देशप्रभू(नगराध्यक्ष), सौ.स्मिता कवठणकर (उपनगराध्यक्ष)
कुडचडे-अलिफा फर्नांडिस (नगराध्यक्ष), बाबूराव फट्टू देसाई(उपनगराध्यक्ष)

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): म्हापसा पालिकेवर अखेर भाजप समर्थक गटाने बाजी मारून आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे.नगराध्यक्षपदाचे भाजप समर्थक उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी आपले प्रतिस्पर्धी सुभाष कळंगुटकर यांच्यावर एका मताची आघाडी घेत हे पद खिशात टाकले. श्री.कांदोळकर यांनी आठ तर श्री. कळंगुटकर यांना सात मते मिळाली. उपनगराध्यक्षपदी विजेता नाईक यांनी नऊ विरुद्ध सहा मतांनी दीपक म्हाडेश्री यांच्यावर मात केली.
राज्यातील अकरा पालिकांपैकी आठ पालिकांवरील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज उर्वरित तीन पालिकांवरील या पदांसाठीची निवडणूक आज झाली.पेडणे पालिकेवरील डॉ.वासुदेव देशप्रभू यांनी आपले बलस्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांनी नगराध्यक्षपदासाठीचे आपले प्रतिस्पर्धी उपेंद्र देशप्रभू यांच्यावर ६ विरुद्ध ३ मतांनी मात केली.उपनगराध्यक्षपदासाठी स्मिता कवठणकर यांची ६ विरुद्ध ३ मतांनी निवड झाली. कुडचडे पालिकेवर अलिफा फर्नांडिस यांनी आपल्या प्रतिस्पर्धी जास्मीन ब्रागांझा यांच्यावर ७ विरुद्ध ५ मतांनी विजय मिळवला तर बाबूराव फट्टू देसाई यांनीही ७ विरुद्ध ५ मतांनी विठोबा प्रभूदेसाई यांच्यावर मात करून उपनगराध्यक्षपद प्राप्त केले.

पोर्तुगालचा उदोउदो हा निर्लज्जपणाचा कळसच

भाजपची सरकारवर कडाडून टीका
पणजी, दि. ११(प्रतिनिधी): गोमंतभूमीवर साडेचारशी वर्षे राबवलोल्या हुकूमशाहीची राजवटीची पंचशताब्दी गोव्यात साजरी करण्याची पोर्तुगालची योजना आहे. त्यानिमित्त पोर्तुगालहून उद्या १२ रोजी गोव्यात दाखल होणाऱ्या "एन.आर.पी सां ग्रेस ' नामक जहाजाच्या स्वागत सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत व राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू हजर राहिले तर खबरदार, असा खणखणीत इशारा आज गोवा प्रदेश भाजपतर्फे देण्यात आला. पोर्तुगिजांच्या हुकूमशाही राजवटीचा उदोउदो करणे ही अत्यंत शरमेची व निर्लज्जपणाची हद्द गाठणारीच घटना ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
आज भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी याविषयावरून सरकारला कडक शब्दांत खडसावले. याप्रसंगी भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर हजर होते. स्वाभिमानी व राष्ट्रवादी गोमंतकीयांच्या नाकावर टिच्चून आणि स्वातंत्रसैनिकांची मानहानी करून राज्यपाल व मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहिले तर पुढील परिणामांना तोंड देण्याची तयारी त्यांनी ठेवावी, असेही यावेळी प्रा.पार्सेकर यांनी बजावले.
पोर्तुगीज राजवटीचे उदात्तीकरण करीत असाल तर गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचा या सरकारला अधिकार तो कोणता,असा खडा सवाल प्रा. पार्सेकर यांनी केला.व्यक्तिगत पातळीवर या कार्यक्रमाला हजर राहण्यास कुणाचाही आक्षेप नाही; परंतु लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री व भारतीय घटनेचे रक्षक तथा केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून वावरणारे राज्यपाल यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही गोवा मुक्तिसंग्रामातील तमाम हुतात्मांची व स्वातंत्रसैनिकांची अवहेलनाच ठरेल, असेही यावेळी ते म्हणाले.
हा विषय गोव्याच्या स्वाभिमान व प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व राज्यपालांनी या कार्यक्रमापासून स्वतःला अलिप्त ठेवणेच योग्य ठरेल, असा सल्लाही प्रा. पार्सेकर यांनी दिला. एवढा विरोध डावलूनही मुख्यमंत्री व राज्यपाल सहभागी झाले तर मात्र त्याला गोमंतकीय जनताच उत्तर देईल,असा टोलाही त्यांनी हाणला.
गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या तयारीसाठी अद्याप काहीच केलेले नाही. केंद्र सरकारकडून दोनशे कोटी रुपयांचे पॅकेज मागितले आहे. मुळात हा पैसा खरोखरच किती जणांच्या खिशात जाईल हे काही सांगता येणार नाही,असा आरोपही प्रा.पार्सेकर यांनी केला. पोर्तुगिजांनी आपल्या राजवटीत इथल्या नागरिकांवर केलेला अत्याचार, धर्मांतराचे पेरलेले विष हा काळा इतिहास अजूनही लोकांच्या मनात ठसठसत आहे. अशावेळी मुळात आपल्या राजवटीची पाचशे वर्षे साजरा करण्याचा प्रकार व त्यात राज्य सरकारने सहभाग घेण्याची कृतीच निषेधार्ह असल्याची टीका प्रा. पार्सेकर यांनी केली.

हा पोर्तुगीज गुलामगिरीचा विकृत महोत्सव

देशप्रेमी नागरिक समितीकडून कडाडून निषेध

पणजी, दि. ११ (प्रा. सुभाष वेलिंगकर): गोव्यात क्रूर पोर्तुगीज गुलामगिरीची पंचशताब्दी साजरी करण्याच्या पोर्तुगीजधार्जिण्यांच्या कुटिल कारस्थानाच्या पहिल्या अंकाची सुरुवात पोर्तुगिजांच्या "सांग्रेस' या जहाजाच्या गोव्यातील आगमनाने होत आहे, या गोष्टीचा कडाडून निषेध देशप्रेमी नागरिक समितीच्या जन-जागरण विभागाचा राज्य निमंत्रक या नात्याने मी करत आहे.
गोव्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांना या "पोर्तुगाली-सोहळ्या'विरूद्ध जोरकसपणे निषेध व विरोध संघटित करता येऊ नये म्हणून नौका-आगमनापूर्वी केवळ तीन दिवस अगोदर ही भेट जाहीर करून कौन्सुलादू जेराल द पोर्तुगाल डॉ. आंतोनियु कॉश्त यांनी आपला कावेबाजपणा सिद्ध केला आहे.
पोर्तुगीज साम्राज्याने ठिकठिकाणी गाजवलेल्या "शौर्य गाथेची' ५०० वर्षीय स्मृती जागृत करण्याचा उद्देश घेऊनच ही पोर्तुगालहून निघालेली शिडाची नौका स्वतंत्र भारतातील मुक्त गोव्यात येत आहे. ही पर्वणी साजरी करण्यात सहभागी होणे हा स्वातंत्र्यमूल्याचा धडधडीत अपमान असून आपल्यावर पोर्तुगिजांनी लादलेल्या (शौर्याचा नव्हे) क्रौर्याच्या गुलामगिरीचा उदोउदो आणि जयजयकार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभक्तांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी सांडलेल्या रक्तांचा अपमान आहे.
गोव्याच्या ५०० वर्षांच्या पोर्तुगीज गुलामगिरीचा "विकृत' महोत्सव साजरा करण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत व राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्ध यांनी सहभागी होऊन गोव्याच्या "स्वातंत्र्यमूल्यां'चा आणि स्वातंत्र्याकांक्षेचा अपमान करू नये अशी मागणी देशप्रेमी नागरिक समिती व समस्त देशप्रेमी, गोमंतकीयांच्या वतीने करण्यात येत आहे.
२५ नोव्हेंबर २०१० या दिवसापासून पोर्तुगीज - साम्राज्यवादी-गुलामगिरीची पंचशताब्दी साजरी करण्याचा पोर्तुगीज पिलाबळीचा निंद्य प्रयत्न राहणार आहे. सरकारने कोणत्याही प्रकारे गोव्याच्या स्वातंत्र्याचा अपमान करणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होऊ नये.
स्वातंत्र्यप्रेमी गोमंतकीय नागरिकांना एका मंचावर आणून अशा प्रकारच्या कलंकित पंचशताब्दी प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम देशप्रेमी नागरिक समिती निश्चितच करील. शांतताप्रेमी गोवेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, नाहीतर होणाऱ्या परिणामांना पूर्णपणे तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा फुंदासाव ओरिएंत, पोर्तुगीज कॉन्सुलेट व पोर्तुगाळलेली देशद्रोही पिलावळ यांना देशप्रेमी नागरिक समितीने दिला आहे.

चार्टर्ड विमानाला पक्ष्याची धडक; सर्व प्रवासी सुखरुप

वास्को, दि. ११ (प्रतिनिधी): पक्ष्याची धडक बसून तो पक्षी इंजिनमध्येच अडकल्यामुळे, दाबोळी विमानतळावरून २०८ पर्यटक प्रवाशांना घेऊन मॉस्कोला (रशिया) आज सकाळी ७.२५ च्या दरम्यान रवाना होणाऱ्या "एरोफ्लोट' या चार्टर्ड विमानाला रॅमानोव्ह व्लादिमीर नामक वैमानिकाने वेळीच ब्रेक लावले आणि सर्व प्रवासी सुखरुप बचावले. त्यांना ताबडतोब दुसऱ्या विमानाने मॉस्कोला पाठवण्यात आले.
वैमानिकाला वेळेवरच धोक्याची जाणीव झाल्याने त्याने धाव घेत असलेल्या विमानास ब्रेक लावल्याने पुढील धोका टाळला. उड्डाण घेण्यासाठी धावपट्टीवरून २०० किलोमीटर प्रतितास गतीने निघालेल्या सदर विमानाच्या डाव्या इंजिनावर पक्षी आदळला आणि तो त्यातच अडकला. त्यामुळे चाके "पंक्चर' होऊन विमानातून थोड्या प्रमाणात आग व धूरसुद्धा येण्यास सुरुवात झाली. सुदैवाने हा प्रकार तेवढ्यावरच निभावला.
सदर ठिकाणी चार अग्निशामक बंब त्वरित दाखल झाले. हे विमान लगेच धावपट्टीच्या बाहेर काढून ठेवण्यात आले. विमानाची बरीच हानी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाबोळी विमानतळ क्षेत्रात गेल्या काही काळापासून पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विमानांना धोका निर्माण होऊ लागला आहे. यापूर्वीही असे प्रसंग उद्भवले होते.
"एरोफ्लोट' व्यवस्थापनाकडून शनिवारी हे विमान दुरुस्त करण्यासाठी खास पथक पाठवण्यात येणार आहे. तोपर्यंत सदर विमान दाबोळी विमानतळावर ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत खास बैठक बोलवून विमानतळाच्या क्षेत्रात कचरा घालण्याबाबत बंदी आणण्याचे कडक आदेश संबंधित पंचायतींना जारी केले. याबाबत कलमही लावण्याचे ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान आज घडलेल्या सदर प्रकाराबाबत गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले यांच्याशी संपर्क केला असता पक्षी विमानावर आदळणे ही गंभीर गोष्ट असल्याचे सांगून गोव्यात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने त्यांनी खेद व्यक्त केला.
गोवा सरकारबरोबर याबाबत आम्ही चर्चा करून ताबडतोब पावले उचलणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोमेकॉचा एक्सरे विभाग पंधरा दिवसांपासून ठप्प

रुग्णांकडून संतप्त प्रतिक्रिया
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील ("गोमेकॉ') "एक्स-रे' विभाग गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाला असून "एक्स रे' फिल्म उपलब्ध नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
इस्पितळात रोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना, "एक्स रे'साठी फिल्म नसल्याने सांगून घरी पाठवले जात आहे. त्यामुळे बडा घर पोकळ वासा अशी "गोमेकॉ'ची दारुण अवस्था बनली आहे.
रुग्णांना माघारी पाठवताना त्यांना दूरध्वनी क्रमांकही दिला जात आहे. त्यावर संपर्क साधूनच एक्सरे काढण्यासाठी इस्पितळात येण्याची सूचना केली जात आहे. ऑर्थोपेडीक विभागात येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी "एक्स रे' काढणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या रुग्णांना खाजगी इस्पितळात जाऊन एक्स रे काढावा लागत आहेत.
खाजगी इस्पितळात जाऊन एक्सरे काढणे ज्या रुग्णांना शक्य नाही त्यांना आठ दिवसांनी येण्यास सांगून परत पाठवले जात आहे. एक्सरे फिल्म कधी उपलब्ध होणार याची कसलीच माहिती तेथील अधिकाऱ्यांना नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. टीबी इस्पितळ, मनोरुग्ण इस्पितळातील रुग्णांनाही "गोमेकॉ'तच "एक्सरे' काढण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे त्या रुग्णांनाही "एक्सरे' न काढताच माघारी फिरावे लागत आहे.
इस्पितळाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता फिल्म कधी येणार याबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नाही, असे उत्तर यावेळी देण्यात आले. याठिकाणी केवळ आपत्कालीन "एक्स रे'च काढले जात आहेत. अन्य रुग्ण कोठून एक्सरे काढून आणतात याबद्दलही आम्हाला माहीत नाही, असे त्या व्यक्तीने सांगितले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून या विभागातील एक्सरे फिल्म चोरीला जात होत्या. सदर फिल्म तेथून कोण लंपास करत होते याचा उलगडा अद्याप झालेला नसल्याने नवीन फिल्म खरेदी करण्यात आल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वेर्णा येथील एका कंपनीकडून या फिल्म विकत घेतल्या जातात.

'सांग्रेस' जहाजाला गोव्यात थाराच नको

गोमंतकीय युवा मंचही खवळला
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): पोर्तुगालच्या शौर्याची पाचशे वर्षे साजरी करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या "सांग्रेस' या पोर्तुगालच्या जहाजाला गोव्याच्या बंदरात नांगर टाकण्याची अनुमती अजिबात देऊ नये, अशी आग्रही मागणी गोवा युवा मंचाने केली असून याविषयीचे एक निवेदन आज कॅप्टन ऑफ पोर्टस् यांना देण्यात आले.
गोवा मुक्तिलढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करून असा
कार्यक्रम राज्य सरकारने गोव्यात आयोजिल्यास गोमंतकातील तरुण रस्त्यावर उतरून रक्तही सांडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा झणझणीत इशारा मंचचे निमंत्रक ऍड. प्रवीण फळदेसाई यांनी दिला.
यावेळी कॅप्टन ऑफ पोर्टचे कॅप्टन श्री. ब्रागांझा दुपारी १२.३० पर्यंत आपल्या कार्यालयात आले नसल्याने अखेर तेथील अधिकाऱ्यांना मंचतर्फे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाची एक प्रत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, गोव्यातील नौदल प्रमुखांनाही पाठवण्यात आली आहे. यावेळी अनेक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोमंतकीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी पोर्तुगालच्या सरकारने गोव्यात आयोजिलेल्या या कार्यक्रमामुळे गोमंतकीय युवक खवळले आहेत. तसेच
स्वातंत्र्यसैनिकांनीही निषेधाचा धडाका लावला आहे. त्यामुळे राज्य सरकारला प्रचंड जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच पोर्तुगाली राजवटीने गोव्याच्या जनतेवर पाशवी अत्याचार केले होते. धर्मांतराचे निच काम त्यांनी गोव्यात सुरू केले आणि महिलांवरही अत्याचार केले. त्याच पोर्तुगिजांच्या सरकारला आपल्या राजवटीची पाचशे वर्षे गोव्यात येऊन साजरी करायला गोवा सरकारने परवानगी देणे हा कमालीचा संतापजनक प्रकार असल्याचे श्री. फळदेसाई म्हणाले.
राज्य सरकारने अत्यंत गुप्तता पाळून या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे, अशी आमची माहिती आहे. तसेच, गोव्यात दाखल होणाऱ्या या पोर्तुगालच्या अधिकाऱ्यांना मेजवानी देण्याचाही घाट सरकारने घातला आहे. त्याबद्दल कॉंग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला. हे असले प्रकार मंचातर्फे अजिबात सहन केले जाणार नाहीत, असा इशारा मंचचे सचिव ह्रदयनाथ शिरोडकर यांनी दिला आहे.

Thursday 11 November, 2010

हिंदूंची अवहेलना करणाऱ्या कॉंग्रेसचे दिवस भरले!

रा. स्व. संघातर्फे पणजीत विराट धरणे; महिलांचा लक्षणीय सहभाग

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - हिंदूंची अवहेलना करणाऱ्या कॉंग्रेसचे दिवस आता भरले आहेत, असा खरमरीत इशारा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला. जेव्हा जेव्हा हिंदूंवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॉंग्रेसची कशी परिस्थिती झाली याची उजळणी कॉंग्रेसवाल्यांनी करावी. कॉंग्रेसकडून संघावर होणारे आरोप पेलण्याची ताकद संघाकडे आहे, मात्र याचा धडा कॉंग्रेसला नक्कीच मिळणार असल्याचे गोवा राज्य संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी संघटनेवर टीका करणाऱ्यांना ठणकावून सांगितले.
कॉंग्रेसने आरंभलेल्या हिंदूविरोधी अपप्रचाराच्या निषेधार्थ पणजी येथे आज दुपारी सुरू झालेल्या विशाल धरणे कार्यक्रमात श्री. वेलिंगकर बोलत होते. यात संपूर्ण गोव्यातून तीन हजार पेक्षा जास्त संघ कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सुरेश लोटलीकर, विरोधी पक्षाचे उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. दत्ता भी. नाईक, "भारत स्वाभिमान'चे डॉ. सूरज काणेकर, दक्षिण गोवा कार्यवाह रामदास सराफ, उत्तर गोवा कार्यवाह संजय वालावलकर, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहसेवा प्रमुख मधुकर दीक्षित, भारतीय स्त्री शक्तीच्या ऍड. स्वाती केरकर, अवधूत कामत, कांता पाटणेकर, शिरीष आमशेकर, प्रा. सुभाष साळकर व आनंदराव भावे असे मान्यवर उपस्थित होते.
"हम देश के अखंडता के लिये काम करेंगे,' असे बोलणाऱ्या श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करत सत्तेवर येण्यासाठी देश चीनला विकणाऱ्या कॉंग्रेसचे सत्य स्वरूप संपूर्ण देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मांडणार असल्याचे श्री.वेलिंगकर म्हणाले. काश्मिरीमध्ये देशप्रेम जागवणारे आणि देशभक्त असलेले मुस्लिमाचे संघटन करणाऱ्या इंद्रेशजी कुमार यांना खोट्या बॉंबस्फोट प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. देशात फुटीरतेची भाषा करणाऱ्या अरुंधती रॉय व गिलानी या देशद्रोह्यांवर गुन्हाही नोंद होत नाही आणि प्रखर राष्ट्रप्रेम रुजविणाऱ्या संघटनेच्या पदाअधिकाऱ्यांना दहशतवादी ठरवण्याचे काम कॉंग्रेस करीत आहे. संघ कार्यकर्त्यांच्या कत्तली करणारा आणि इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीत सहा हजार शिखांची हत्याकांड करणारा कॉंग्रेस पक्ष हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी "भगवा दहशतवाद' असे नाव देऊन भारतात विष कालवत असल्याचा आरोप श्री. वेलिंगकर यांनी केला.
मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना कोणतेही पुरावे नसताना तुरुंगात डांबण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून मुंबई "एटीएस'ला पुरावे मिळत नाहीत. मात्र, कॉंग्रेसच्या आदेशावरून साध्वी प्रज्ञासिंह हिला तुरुंगात अश्लील चित्रपट दाखवले जातात. तिला मारहाण केली जात आहे. "एटीएस'ने तिचे हाल करून तिला कर्करोगाची रुग्ण करून सोडली असल्याचे ते पुढे म्हणाले.
राष्ट्रावर जेव्हा गंभीर प्रसंग येतो त्यावेळी कॉंग्रेसवाल्यांचे लक्ष केवळ रा. स्व. संघाकडेच जाते. हिंदू समाज प्रतिकार करीत नाही. त्यामुळे कॉंग्रेसकडून ही हिंदूंची बदनामी होत असल्याचे भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा म्हणाले. संघाला बदनाम करण्याच्या कारस्थानात अनेक संघटना गुंतल्या असून त्याच्या विरोधात संघर्ष करण्याची वेळ आली आहे. भारताचे भूभाग चीन गिळंकृत करीत आहे. देशात महागाई वाढली आहे. दहशतवाद, नक्षलवादाने थैमान घातले याकडे कॉंग्रेसचे लक्ष नसून संघाला बदनाम करण्यासाठीच ते धडपडत असल्याचेही श्री. डिसोझा यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्ष हा "फॅसिस्ट' आहे. धर्म आणि जातींत फूट पाडणारा हा पक्ष आहे.
या पक्षाला रामाच्या देशातून रोमला हाकलून लावले पाहिजे, असे दत्ता नाईक म्हणाले.
"राष्ट्रीय स्वयं सेवक संघ' असा स्वच्छ उच्चारही ज्याला धड करता येत नाही ते कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी संघावर टीका करतात हे हास्यास्पद आहे. संघासारख्या देशभक्त संघटनेला ही मंडळी दहशतवादी म्हणतात यासारखा विनोद नाही. १९७७साली याच देशात कॉंग्रेसने संपूर्ण भारताचे रूपांतर तुरुंग करून सरकारी दहशतवाद माजवला होता. या देशात बंदी घालण्यासाठी जर कोणती संघटना सर्वार्थाने योग्य असेल तर ती कॉंग्रेस असल्याचे उद्गार ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी काढले होते, याची आठवण श्री. नाईक यांनी करून दिली.
भारतीय स्त्री शक्तीच्या ऍड. स्वाती केरकर म्हणाल्या, येथे आलेल्या महिलांना बसमध्ये बसण्यासाठी कोणीही दीडशे रुपये दिलेले नाहीत. त्यांना पंढरपूर किंवा शिर्डी येथे घेऊन जाणाऱ्याचे आश्वासन दिलेले नाही. कॉंग्रेस पक्ष हिंदूविरोधी कारवाया करतो याची महिलांना झाल्याने या धरणे कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या
आहेत. कॉंग्रेसच्या राज्यात सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी आमदार, मंत्र्यांसमोर फुगड्या घालाव्या लागतात,
संघावर टीका करणारे राहुल गांधी यांनी आधी या देशाचा इतिहास अभ्यासावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
तुमच्या मर्यादेत राहून सरकार चालवा असा सल्ला देत संघाची काठी तापली आणि सहनशक्ती संपली तर सर्वांनाच वठणीवर आणू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मधुकर दीक्षित यांनी दिला. या देशात वाईट प्रथा पसरवण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे, असेही ते म्हणाले.
या देशात भ्रष्टाचार कॉंग्रेसने आणला. दहशतवादाला खतपाणी घातले व अल्पसंख्याक, बहुसंख्याक अशी दुफळी माजवण्याचे काम कॉंग्रेसने केले. कॉंग्रेसने देशाला सोडाच आपल्या पक्षातील नव्या नेत्यांनाही पुढे येऊ दिले नाही. कॉंग्रेसने देशात केवळ अस्थिरताच आणली, असे सनसनाटी आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजायचा असेल तर संघात राहून काम केले पाहिजे. राष्ट्राला पूरक अशी ही संघटना आहे. संघाचा तर कोणी या देशात अपमान करीत असेल तर ते सहन केले जाणार असल्याचा इशारा भारत स्वाभिमन ट्रस्टचे डॉ. काणेकर यांनी दिला. संघाच्या आंदोलनाला भारत स्वाभिमानचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या धरणे कार्यक्रमात हजारो नागरिकांबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, अनंत शेट, महादेव नाईक तसेच, माजी आमदार विश्वास सतरकर, विनय तेंडुलकर, राजेंद्र आर्लेकर, ऍड. नरेंद्र सावईकर, डॉ.शाम भंडारे, कोकण प्रांत प्रचारक शरदराव खाडिलकर, कृष्णा पै आंगले असे अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
सूत्रसंचालन शिरीष आमशेकर व संजय वालावलकर यांनी केले. आभार अवधूत कामत यांनी मानले.

नेटके आयोजन
धरणे कार्यक्रमात राजधानीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसत होती. दुपारी ३ वाजल्यापासून नागरिक येण्यास सुरुवात झाली. धरणे धरलेल्या एका ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. रणरणत्या उन्हाचीही त्यांनी पर्वा केली नाही.

"इफ्फी'चा प्रमुख पाहुणाच ठरत नाही!

सलमान खान, अक्षय खन्ना यांची नावे चर्चेत

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - सलमान खान व अक्षय खन्ना या अभिनेत्यांची नावे यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी निवडण्यात आली आहेत; परंतु ते चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्यांच्याकडून ठोस शब्द मिळालेला नाही. साहजिकच महोत्सवाचा प्रमुख पाहुणा काही ठरत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यंदाच्या "इफ्फी'बाबत राज्य सरकारची कोणतीच तयारी झाल्याचे दिसत नसल्याने आता सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मोठ्या विश्वासाने "इफ्फी' आयोजनाची जबाबदारी सोपवलेले पदाधिकारी आपल्या वैयक्तिक कामांसाठी विदेश दौऱ्यांत मश्गूल आहेत. "इफ्फी' ला आता अवघेच काही दिवस बाकी राहिलेले आहेत व त्यात तयारीच्याबाबतीत काहीही प्रगती झाली नसल्याने कामत यांची झोपच उडाली आहे. गेले तीन दिवस "इफ्फी' आयोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्याचा सपाटाच मुख्यमंत्र्यांनी लावला असून त्यांना स्वतःच लक्ष देणे आता भाग पडले आहे.
"इफ्फी' महोत्सव हॉटेलसाठी "बीच रिसोर्ट' ची अट राज्य सरकारला चांगलीच भोवली आहे. एकीकडे "इफ्फी' हॉटेलची शोधाशोध सुरू आहे तर दुसरीकडे निविदेत भाग घेतलेल्या एकमेव "हॉटेल ताज विवांता' कडून उद्या ११ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याची अट सरकारला सादर केली आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळते. "इफ्फी' निमित्त रस्त्यांची डागडुजी,रंगरंगोटी आदी कामेही रेंगाळली आहे व त्यामुळे ही कामे तातडीने हातात घ्यावी लागणार आहेत.एकाही निविदेवर अद्याप अंतिम निर्णय होत नसल्याने आयोजनाचा घोळ निर्माण झाला आहे. प्रत्येक निविदेत "इफ्फी' समितीवरील कुणा ना कुणाचे हित लपले आहे व त्यामुळे या निविदांवर निर्णय होत नाही,अशी चर्चा गोवा मनोरंजन संस्थेच सुरू आहे. हॉटेलचे नाव निश्चित होत नसल्याने छपाईचे काम हाती घेता येत नाही. "इफ्फी' च्या प्रत्येक छपाई साहित्यावर हॉटेलचे नाव बंधनकारक आहे. त्यामुळे छपाईचे कामही रखडले आहे. निविदाप्रकरणी आज काही पत्रकारांनी मुख्यमंत्री कामत यांना छेडले असता येत्या दोन दिवसांत निर्णय होईल असे सांगताना या दिरंगाईचे खापर पावसावर फोडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
लघु चित्रपट केंद्राचा घोळ
गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी सुरू केलेल्या लघु चित्रपट केंद्रावरून बराच वाद निर्माण झाला आहे. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो व त्याला पुरस्कर्ता मात्र मिळत नाही,अशी तक्रार टीकाकारांकडून सुरू असल्याने यावेळी मात्र या केंद्राला पाठिंबा देणाऱ्यांकडून बरीच शक्कल लढवण्यात आली आहे. यंदा या केंद्रासाठी "किंगफिशर' कंपनीकडून २५ लाख पुरस्कृत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुळात प्रत्येक "इफ्फी'त किंगफिशर कंपनी २५ ते ३० रुपये पुरस्कृत करीत असते परंतु यावेळी मात्र कार्यकारी समितीच्या काही सदस्यांनी ही रक्कम लघु चित्रपट केंद्रासाठी पुरस्कृत केल्याचे सांगून या केंद्राचा प्रचार करीत आहेत,अशी माहिती मिळाली आहे.

नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी आज निवड

वाळपई-उमेश गुळेलकर(नगराध्यक्ष)
फमिदा बी(उपनगराध्यक्ष)

काणकोण-रत्नाकर धुरी(नगराध्यक्ष)
संदेश गावकर(उपनगराध्यक्ष)

कुंकळ्ळी-देवेंद्र देसाई(नगराध्यक्ष)
लॅण्ड्री मास्कारेन्हास(उपनगराध्यक्ष)

मडगाव- सुशीला नायक (नगराध्यक्ष)
गोजांक रिबेलो(उपनगराध्यक्ष)

केपे-मान्युएल कुलासो(नगराध्यक्ष)
दयेश नाईक(उपनगराध्यक्ष)

डिचोली-अनीषा वेर्णेकर(नगराध्यक्ष)
शशिकांत नाईक हळर्णकर(उपनगराध्यक्ष)

सांगे- संजय रायकर(नगराध्यक्ष)
आनालिना फर्नांडिस(उपनगराध्यक्ष)

मुरगाव-सुचिता शिरोडकर(नगराध्यक्ष)
मनीष आरोलकर(उपनगराध्यक्ष)

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - राज्यातील अकराही नगरपालिकांसाठीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड करण्यासाठी उद्या ११ रोजी निवडणूक होणार आहे. एकूण आठ नगरपालिकांतील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे तर उर्वरित तीन पालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे. पेडणे, म्हापसा, कुडचडे पालिकांतील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोण असतील हे उद्याच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
एकूण अकरापैकी आठ पालिकांत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली. मुळात यापैकी बहुतांश पालिकांत ही दोन्ही पदे वाटून घेण्याचे प्रत्यक्ष करार झाले आहेत. पेडणेत नगराध्यक्षपदासाठी डॉ.वासुदेव देशप्रभू व उपेंद्र देशप्रभू यांच्यात चुरस आहे तर उपनगराध्यक्षपदासाठी स्मिता कवठणकर व विष्णू साळगावकर हे रिंगणात आहेत. म्हापशात नगराध्यक्षपदासाठी सुधीर कांदोळकर व सुभाष कळंगुटकर यांच्यात चुरस आहे तर उपनगराध्यक्षपदासाठी विजेता नाईक व दीपक म्हाडेश्री यांची नावे सादर झाली आहेत.कुडचडे-काकोडा पालिकेत नगराध्यक्षपदासाठी अलिफा फर्नांडिस व जास्मिन ब्रागांझा यांच्यात लढत आहे तर उपनगराध्यक्षपदासाठी बाबूराव फट्टू देसाई व विठोबा प्रभुदेसाई यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली, दि. १०- महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर आज (बुधवार) सकाळी शिक्कामोर्तब झाले; तर उपमुख्यमंत्रिपदाची माळ राष्ट्रवादीचे . अजित पवार यांच्या गळ्यात पडली आहे. उद्या ११ तारखेला सकाळी ११ वाजता दोन्ही नेत्यांनी शपथविधीचा मुहूर्त साधण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी रात्री कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवडीचे अधिकार सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आज सकाळी केंद्रीय निरीक्षक प्रणव मुखर्जी, ए. के. अँटोनी, पृथ्वीराज चव्हाण यांनी '१० जनपथ'वर जाऊन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनी मुखर्जी, अँटोनींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला. त्यानंतर, मुखर्जी यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली.
तत्पूर्वी, आदर्श गृहरचना गैरव्यवहार प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली होती. संसदेचे कामकाज संपताच कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, मुखर्जी आणि ए. के. अँटनी यांची चर्चा झाली. त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत होती. मात्र, चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. आज सकाळी सोनिया गांधी यांनी मुखर्जी, अँटोनींशी चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक प्रफुल्ल पटेल यांनी मुंबई येथे आज (बुधवार) महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. विधिमंडळाच्या तसेच आमदारांच्या बैठकीत मावळते उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड व्हावी, असा प्रस्ताव मांडला. त्याला आर. आर. पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर बैठकीला उपस्थित सर्व आमदारांनी कोणत्याही चर्चेविना एकमताने पवार यांची निवड केली, असे पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पश्चिम महाराष्ट्राचे असलो, तरीदेखील संपूर्ण राज्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करू. राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी चव्हाण यांच्या देशातील राजकारणाच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग करून घेऊ, अशी प्रतिक्रिया पवार यांनी या वेळी व्यक्त केली. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे केंद्रीय निरीक्षक तारिक अन्वर, डी. पी. त्रिपाठी, मावळते उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
राज्याचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून पवारही राज्यपालांना भेटणार असून, सरकार स्थापनेच्या निर्णयामध्ये सहभागी होतील.
पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करताना भुजबळ यांना विश्वासात घ्यावे लागले का, असे विचारले असता भुजबळ यांनीच स्वत: पवार यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा संबंधच येत नाही, असे पटेल म्हणाले. पवार यांनी २२ वर्षांहून अधिक पक्षाची सेवा केली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे योगदान दिले आहे, असे मत भुजबळ यांनीच प्रस्तावात व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. छगन भुजबळ यांच्यावर कोणती नवी जबाबदारी सोपविणार, या प्रश्नावर पटेल यांनी भुजबळ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती, आहे आणि राहील, असे स्पष्ट केले.
पवार यांच्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ म्हणाले, पवार यांचे काम चांगले आहे. विधिमंडळाचे नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यात आहे. राज्यात काम करताना ते योग्य प्रादेशिक समतोल साधतील.

Wednesday 10 November, 2010

राष्ट्रीय महामार्ग प्रकरणी त्यागाचे सल्ले नकोत

फेरबदल कृती समिती आक्रमक मुख्यमंत्री हतबल
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी आधी आपल्या घरावरून राष्ट्रीय महामार्ग न्यावा व मगच विकासासाठी त्याग करण्याचा सल्ला जनतेला द्यावा, असे खडसावत राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीने आज राज्य सरकारला चांगलाच घाम काढला. राष्ट्रीय महामार्ग १७ व ४ (अ) साठी तयार केलेल्या सध्याच्या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना विस्थापित व्हावे लागेल. यामुळे, हा आराखडा बदलला नाही तर सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावेच लागेल, असेही समितीने आज सरकारला सुनावले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र यासंबंधी कोणतेही ठोस आश्वासन न देता या बैठकीतून काढता पाय घेणेच पसंत केल्याने राष्ट्रीय महामार्गाचा विषय येत्या काळात पेट घेण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीला चर्चेसाठी पाचारण केले होते. पर्वरी मंत्रालयातील परिषदगृहात पार पडलेल्या या वादळी बैठकीत समितीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांवरही प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, समितीचे निमंत्रक सुनील देसाई, भाजपचे उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा, सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर, गोवा बचाव अभियानाच्या नेत्या पॅट्रिशिया पिंटो, रितू प्रसाद तसेच समितीचे इतर पदाधिकारी व काही प्रकल्पग्रस्त नागरिक यावेळी हजर होते. या महामार्गामुळे कमीत कमी लोकांचे नुकसान होईल, याची काळजी सरकार घेईल. अनेक ठिकाणी लोकांची घरे वाचवण्यासाठी रस्त्याची रुंदी कमी केली जाईल, असे नेहमीचे पालुपद मुख्यमंत्र्यांनी सुरू करताच त्याला जोरदार आक्षेप घेण्यात आला. मुख्यमंत्री कामत यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. एकदा हा प्रकल्प "एनएचएआय'च्या हवाली गेला की त्यांना हवे तेच होईल. केवळ रुंदी कमी करून भागणार नाही. या महामार्गालगत वास्तव्य करणाऱ्या लोकांना कंपन, ध्वनी व इतर प्रदूषणाला सामोरे जावे लागणार आहे. विविध गावांतून व शहरांतून हा महामार्ग जाणार असल्याने या भागांचे थेट विभाजन होईल व त्याचे संबंधित भागांवर काय परिणाम होतील, याचे भानही या सरकारला राहिलेले नाही, असा टोला लगावून समितीने मुख्यमंत्र्यांना गप्प केले. दरम्यान, गोवा बचाव अभियानाच्या नेत्या पॅट्रिशिया पिंटो व रितू प्रसाद यांनी प्रादेशिक आराखडा २०२१ प्रमाणेच महामार्गाचे काम पुढे न्यावे, अशी जोरदार मागणी केली. प्रादेशिक आराखडा हा राज्याच्या विकासाचा मार्गदर्शक आराखडा असल्याची जाहिरात सरकारकडूनच केली जाते मग महामार्ग प्रकल्प आराखड्याला अपवादात्मक कसा काय असू शकतो, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. प्रादेशिक आराखड्याला अद्याप अंतिम स्वरूप प्राप्त झाले नाही व तो अद्याप केवळ आराखडाच असल्याने त्याचा या महामार्गाशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेत कामत यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच दिला. कामत यांच्या या विधानामुळे प्रादेशिक आराखडा हा केवळ जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठीच तयार केला जाणारा दस्तऐवज असून सरकार आपल्या मर्जीप्रमाणेच विकासाची दिशा ठरवणार असल्याचेही उघड होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी समितीच्या सदस्यांकडून उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांना सडेतोड उत्तरे देण्याचे केलेले प्रयत्नही यावेळी फोल ठरले. विकासासाठी काही प्रमाणात त्याग करावाच लागेल, असे सांगताच "चर्चिल यांनी आपल्या घरावरून राष्ट्रीय महामार्ग न्यावा व या त्यागाची सुरुवात स्वतःपासून करावी,' असे खडे बोल सुनावत त्यांनाही गप्प करण्यात आले. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांना उघडपणे पाठिंबा देत समिती व मुख्यमंत्री यांच्यातील वादाला काही प्रमाणात योग्य पद्धतीने हाताळण्याचे प्रयत्न केले. शेवटी या बैठकीतून कोणताही निष्कर्ष निघाला तर नाहीच पण समितीच्या भूमिकेशी सरकारही राजी नसल्याचे उघड झाले.

अशोकरावांचा राजीनामा मंजूर

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची आज निवड
मुंबई, दि. ९ : 'आदर्श' सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खुर्ची सोडावी लागली आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर केला असून मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यपाल शंकरनारायणन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठक झाली. या बैठकीत नवा मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला. यामुळे नवीन मुख्यमंत्र्याची निवड बुधवारी दिल्लीतून होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांची राज्यपालांनी महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिवाळीआधी आपला राजीनामा सोनिया गांधी यांना सादर केला होता मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या मुंबई-दिल्लीच्या दौऱ्यामुळे त्यावरील निर्णय घेण्यात आला नव्हता. आज ओबामांचा दौरा संपताच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर करत सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रासाठी नव्या नेतृत्वाचा शोध सुरू केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक यांच्या नावांची चर्चा सुरू होती.
बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र असलेले राधाकृष्ण हे शिवसेनेत असताना युती सरकारच्या काळातही मंत्री होते. त्यावेळच्या कारकिर्दीतही त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांच्यासाठी स्वतः अशोक चव्हाण बरेच प्रयत्न करत आहेत. तडफदार नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. विद्यमान सरकारमधली त्यांची कामगिरी आणि दिल्लीतून विलासराव देशमुख यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांकडून त्यांना मिळणारे पाठबळ यामुळे ते मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील एक तगडे दावेदार झाले आहेत. प्रदीर्घ काळ दिल्लीत राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा महाराष्ट्राचा राजकारणाशी थेटपणे कमी संबंध आहे. पण सध्या राज्यातील बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना स्वच्छ चारित्र्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील मुख्यमंत्रिपदासाठीचा एक सक्षम पर्याय म्हणून विचार होत असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्रीही बदलणार?
कॉंग्रेसने "आदर्श'प्रकरणी अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेऊन नवा मुख्यमंत्री राज्याला देण्याचा निर्णय घेतला असताना सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही उपमुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांची वर्णी या पदासाठी लागू शकते अशी शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त करण्यात येत आहे.

चव्हाण, कलमाडींवरील कारवाई ही घोटाळ्याची कबुलीच :गडकरी

नवी दिल्ली, दि. ९ : 'आदर्श' आणि "राष्ट्रकुल' घोटाळाप्रकरणी अनुक्रमे अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांच्यावर कारवाई करून कॉंग्रेसने त्याबाबत भ्रष्टाचाराची कबुलीच दिली असल्याचे सांगून भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी निव्वळ या कारवाईवर न थांबता सर्व दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे.
आज एका पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले की, चव्हाणांचा राजीनामा स्वीकारणे आणि कलमाडींना पदावरून हाकलणे यावरून कॉंग्रेसने एकप्रकारे हे घोटाळे झाले असल्याची कबुलीच दिली आहे. राष्ट्रकुलप्रकरणी केवळ कलमाडींवर कारवाई करून भागणार नाही. याबाबतच्या सर्व शिफारशी, मागण्या मान्य करणाऱ्या आणि आयोजन समितीला अंकुश न घालू शकणाऱ्या या विषयीच्या मंत्रिगटाचीही भूमिका फारशी स्वच्छ, पारदर्शक नाही. राष्ट्रकुलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे राहुल गांधी हे स्वत: सदस्य होते. या सर्व घटकांकडेही गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे.
कोणतीही चौकशी न करता पंतप्रधान कार्यालयाने आणि मंत्रिगटाने राष्ट्रकुलसाठीच्या अवाढव्य खर्चाला मंजुरीच कशी दिली, असा सवाल उपस्थित करून गडकरी म्हणाले की, हा मुद्दा विरोधी पक्ष संसदेत या अधिवेशनात नक्कीच उपस्थित करणार आहेत. जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील टाइल्सदेखील "इम्पोर्टेड' होत्या. त्या ऑस्ट्रेलियाहून मागविण्यात आल्या आणि त्या लावण्याचे कामही विदेशी फर्मलाच देण्यात आले. बाथरूममधील टाइल्स लावण्याइतकेही भारतात कुशल कारागीर नाहीत का, असा प्रश्नही भाजपाध्यक्षांनी केला.
राष्ट्रकुलसाठीच्या बांधकामाच्या निविदा जारी करताना त्यातील अटी फारच चमत्कारिक होत्या. त्यात ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलचे काम आधी केलेले असले पाहिजे किंवा त्या कामाचा अनुभव पाहिजे, असे नमूद करण्यात आले होते. याच ठिकाणी भारतातील सर्व फर्म अपात्र ठरल्या. किंबहुना, त्यांना अपात्र ठरविण्याचा हा घाट असल्याचा आरोपही गडकरींनी केला.
आदर्शचा "अ' देखील माहिती नाही
आदर्श घोटाळा प्रकरणी आपलेही नाव गोवले जात आहे, याविषयी विचारले असता गडकरी म्हणाले की, याविषयीचे सर्व वृत्त निराधार आहेत. आदर्शचा "अ' देखील मला माहिती नाही.

कॉंग्रेसने कलमाडींचे पक्ष सचिवपद काढले

नवी दिल्ली, दि. ९: राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनात अनेकानेक भ्रष्टाचाराची प्रकरणे झाल्याचे आरोप झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने आज सुरेश कलमाडी यांना संसदीय पक्ष सचिवपदावरून काढून टाकले आहे. कॉंग्रेस संसदीय पक्ष सचिवपदाचा सुरेश कलमाडी यांनी दिलेला राजीनामा ताबडतोब स्वीकारण्यात आलेला आहे, असे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी आज येथे सांगितले.
कॉंग्रेस संसदीय पक्ष सचिवपदाची कागदपत्रे लवकरात लवकर सादर करा, असे कलमाडींना सांगण्यात आले होते. सोनिया गांधी या कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख आहेत. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे व विरोधक राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनात झालेल्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांवर सरकारला धारेवर धरण्याची शक्यता लक्षात घेऊन सोनिया गांधी यांनी कलमाडी यांना राजीनामा देण्यास सांगितले असावे, असा अंदाज आहे.
सुरेश कलमाडी कॉंग्रेस पक्षाचे पुणे मतदारसंघातील खासदार असून मागील महिन्यातच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचेही अध्यक्ष होते. या स्पर्धा संपताच कॉंग्रेस पक्षाने कलमाडींपासून स्वत:ला दूर ठेवणेच पसंत केले. याचाच अर्थ असा की कलमाडी वा भ्रष्टाचाराच्या या घोटाळ्यांत अडकलेल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांना क्लिनचिट देण्यास कॉंग्रेस पक्षही अनुत्सुक आहे.

संशयास्पद बांगलादेशीला नौदल परिसरातून अटक

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): वास्को येथील नौदलाच्या हद्दीत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या २५ वर्षीय बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव रेहमान नावशीर असे असून त्याला केवळ बांगलादेशी भाषा येत असल्याचे तो सांगत असल्याने त्याची चौकशी करण्यास पोलिसांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच, आपण वेडा असल्याचेही तो भासवत असल्याने सध्या त्याची रवानगी सडा तुरुंगात रवानगी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नौदल, पोलिस आणि तटरक्षक दलाने "सागर कवच' अंतर्गत घेतलेल्या सुरक्षेच्या आढाव्यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या काही दिवसांपूर्वीच या बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आले होते, पोलिसांनी त्याबाबत गुप्तता पाळली होती. दि. ३१ ऑक्टोबर रोजी नौदल पोलिसांनी त्याला आपल्या हद्दीत फिरताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दि. १ नोव्हेंबर रोजी त्याला हार्बर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याकडे भारतातील वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे. नौदलाचे अधिकारी सौरभ मुखर्जी यांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने आणि गुन्हा अन्वेषण विभागाने संशयित रेहमान नावशीर याची कसून चौकशी केली आहे. परंतु, त्याच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळाली आहे, हे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी त्याच्या अटकेच्या माहितीबद्दल गुप्तता पाळल्याने त्याला नेमके कधी अटक करण्यात आली होती, याबद्दलही शंका निर्माण झाली आहे.
याविषयीचा अधिक तपास हार्बर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशल देसाई करीत आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांत 'खुर्ची'साठी जुंपली!

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): राजकीय नेत्यांमध्ये "खुर्ची'साठी रस्सीखेच असते, हे सर्वश्रुत आहेच. पण, गोमेकॉ इस्पितळातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून "तू तू मै मै' सुरू होऊन प्रकरण पोलिस स्थानकापर्यंत पोचल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
रक्तपेढी विभागात असलेल्या या दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांची गेल्या काही दिवसापूर्वी बरीच जुंपली. कारण होते, या विभागात असलेल्या खुर्चीवर कोण बसणार? एक वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ असल्याने त्याने आपल्यासाठी एक टेबल आणि एक खुर्ची ठेवली होती. तर, दुसऱ्या अधिकाऱ्याने आपणही खुर्चीवर बसणार असा हट्ट धरला. यामुळे दि. १ नोव्हेंबर रोजी या दोघांमध्ये बरीच बाचाबाची सुरू झाली. यावेळी या विभागप्रमुखांची त्या ठिकाणी उपस्थिती होती. परंतु, इस्पितळाचे डीन डॉ.जिंदाल हे रजेवर असल्याने या भांडणावर कोणी आणि कसा तोडगा काढावा, या विवंचनेत सध्या हा ताबा सांभाळणारे डीन गुंतलेल्या आहेत.
दरम्यान, हे भांडण "शिव्या शापांवर' पोचल्याने दोन्ही अधिकाऱ्यांनी थेट आगशी पोलिस स्थानक गाठून परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी सरळ भूमिका घेत दोघांवरही गुन्हे दाखल केले असल्याची माहिती आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी दिली. सध्या या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण नसल्यानेच हे भांडणाचे प्रकार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी एक रुग्णाला वेगळ्याच गटाचे रक्त चढवल्याने आता त्या विभागात पॅथॉलॉजी तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर कामाचा अधिक बोजा नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

संघाचा आज धरणे कार्यक्रम

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): केंद्रातील कॉंग्रेस सरकारने हिंदूंच्या विरोधात भूमिका घेऊन सुरू केलेल्या कारवायांच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उद्या दुपारी ३ वाजता पणजी बसस्थानकासमोर दुर्गा पूजन होत असलेल्या ठिकाणी धरणे व निदर्शने केली जाणार आहेत.
या धरणे कार्यक्रमात शेकडो नागरिक सहभागी होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पहिल्यांदाच अशा प्रकारे विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. यामुळे उद्याच्या धरणे कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगातील सर्वांत मोठी सामाजिक आणि राष्ट्रप्रेम जागवणारी संस्था म्हणून संघाला मान्यता असल्याने उद्याच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. दुपारी ३ ते ६ या दरम्यान हा धरणे कार्यक्रम होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी गावागावांतून जोरदार तयारी सुरू आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची गवाणे खाणीला नोटीस

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या गवाणे येथील वादग्रस्त खाणीला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच "कारणे दाखवा' नोटीस बजावल्याने प्रत्यक्षात यापुढे कोणती कारवाई केली जाते याकडे सत्तरीवासीयांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गवाणे येथील "आयर्न ओर माईन्स' या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच कारणे दाखवा नोटीस पाठविली असून, सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे. "वॉटर ऍक्ट' ३३ (ए) कलमानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.
आंबेली-सत्तरी येथील मनोहर वझे व गावातील अन्य रहिवाशांनी वाळपईच्या कृषी कार्यालयात याबाबत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार गवाणे येथील खाणीच्या मातीमुळे त्या परिसरातील शेती व नाल्याची मोठी हानी झाली आहे. ही तक्रार शेती खात्याने प्रदूषण मंडळाकडे पाठविल्यानंतर त्यासंदर्भात चौकशी सुरू केली. २७ सप्टेंबर रोजी मंडळाने गवाणे, आंबेली भागाची तपासणी केली असता शेती व नाल्यांत मोठ्या प्रमाणात खनिजमिश्रित माती आढळली. प्रदूषणाचा हा प्रकार उघड झाल्यामुळे मंडळाने ३ नोव्हेंबर रोजी खाण कंपनीला नोटीस जारी केली आहे. या कारवाईमुळे या परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील कारवाई काय केली जाते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

Tuesday 9 November, 2010

युनोच्या सुरक्षा समितीत भारत हवाच

अमेरिकेच्या पाठिंब्याची ओबामांकडून निःसंदिग्ध ग्वाही

नवी दिल्ली, दि. ८ - भारत हा विकसनशील देश नसून, तो प्रगत देशांच्या रांगेत येऊन बसला आहे. येथील लोकशाही अत्यंत परिपक्व असून, विविधतेतही एकता राखताना, आपला सर्वांगिण विकास करण्याची भारताची धडपड प्रसंशनीय आहे, अशी स्तुतिसुमने उधळताना, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताचा कायम सदस्य म्हणून समावेश व्हावा, यासाठी अमेरिका सहकार्य देण्यास उत्सुक आहे, असे निःसंदिग्ध प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतीय संसद सदस्यांना संबोधित करताना केले. महात्मा गांधी, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भारतातील दिग्गज नेत्यांचे स्मरण करून ओबामा यांनी केलेल्या ओघवत्या भाषणाने सारे संसदगृह जणू थरारून गेले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना शिक्षा व्हायलाच हवी, असे ठामपणे नमूद करून ओबामा म्हणाले की, दहशतवादविरोधी लढाईत भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा साथीदार आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर कारवाई व्हायलाच हवी. त्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न अमेरिका करेल. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला महात्मा गांधींचा उल्लेख करून ओबामा म्हणाले की, मी आज तुमच्यासमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून उभा आहे. मला इथपर्यंत पोचण्यासाठी गांधीजींच्या विचारांनी कायमच प्रेरणा दिली आहे.
तत्पूर्वी एकत्रित चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना,"चर्चा व दहशतवादाला समर्थन या दोन गोष्टी एकाच वेळी सुरू राहू शकत नाहीत,' असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले. पाकिस्तानबरोबरच्या संबंधांवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मनमोहनसिंग म्हणाले,""स्थिर व समृध्द पाकिस्तान केवळ भारताच्याच दृष्टीने लाभदायक नाही तर दक्षिण आशिया व संपूर्ण जगाच्याही फायद्याचा आहे. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधल्या तरच सर्व मुद्यांवर चर्चा होऊ शकते.''
हैदराबाद हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यात जवळपास ७५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. काश्मीर मुद्यावर बोलताना ओबामा म्हणाले, हा मुद्दा दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, असे अमेरिकेला वाटते. या दोन्ही देशांनी इच्छा व्यक्त केल्यास याप्रकरणी अमेरिका मदत करण्यास तयार आहे, असे ओबामा म्हणाले. काश्मीर समस्येवर अमेरिका आपला तोडगा थोपवू इच्छित नाही, यावर जोर देत ओबामा म्हणाले की, मला असे वाटते की, आपसातील तणाव कमी व्हावा, असे भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना वाटत आहे. मला आशा आहे की येत्या काळात दोन्ही देश या दृष्टीने पावले उचलतील.
भारत व पाकिस्तान संबंधांवरील चर्चेसह ओबामा व मनमोहनसिंग यांनी द्विपक्षीय व जागतिक मुद्यांसह अनेक मुद्यांवर चर्चा केली. तसेच आंतरिक सुरक्षा, भारतीय कंपन्यांवर टाकण्यात आलेले निर्बंध मागे घेणे, नागरी अणुक्षेत्रात संशोधन केंद्र स्थापन करणे यासह अनेक क्षेत्रात सहकार्य करण्यावर या दोन्ही नेत्यांनी संमती व्यक्त केली. भारताला देण्यात यावयाच्या तंत्रज्ञानावरील निर्यात निर्बंध मागे घेणे व अणुइंधन व इतर सामग्री पुरवठा करणाऱ्या गटातील भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा देण्याच्या गोष्टीचे भारताने स्वागत केले आहे. हवामानाचा अंदाज या क्षेत्रातील संशोधनासाठी या दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
या दोन नेत्यांमधील चर्चेदरम्यान पाकिस्तानचा मुद्दाच प्रामुख्याने चर्चिला गेला. भारताने पाकिस्तानसंदर्भात आपल्या ज्या शंका होत्या त्या अमेरिकेसमोर व्यक्त केल्या. पाकिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधात जी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालविली जात आहे त्यासंदर्भात अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे भारताने म्हटले.
कुणाचा रोजगार हिसकावयाचा नाही
आऊटसोर्सिंगच्या मुद्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताला कुणाचा रोजगार हिसकावयाचा नाही. आऊटसोर्सिंगमुळेच अमेरिकेची उत्पादन क्षमता वाढली आहे. यासंदर्भात अमेरिकेला जी भीती वाटत आहे ती निराधार आहे, असे भारताने म्हटले आहे. उलट, आर्थिक क्षेत्रात जर या दोन्ही देशांतील सहकार्य वाढले तर त्यामुळे दोन्ही देशांना त्याचा लाभच होईल, याकडे अमेरिकन नेत्यांचे लक्ष वेधण्यात आले.
आपल्या भारत दौऱ्यामागील उद्देशावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बराक ओबामा म्हणाले की, भारतातून आपण आपल्या देशात ५० हजार रोजगार घेऊन जात आहो. या प्रचारामागचा उद्देश हा आहे की, आपण भारतात इतके दिवस का थांबलो, हे अमेरिकन लोकांना कळले पाहिजे.
अमेरिकन कॉँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहात ओबामा यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाला जोरदार धक्का बसलेला आहे. या पक्षाने आपले बहुमत गमावलेले आहे. अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवरून व ओबामांच्या आर्थिक नीतीवर लोक नाराज आहेत व टीकाही करत आहेत. अमेरिकेतील वाढती बेरोजगारी व खराब आर्थिक स्थितीमुळे लोक त्रस्त आहेत, हे येथे उल्लेखनीय. ही सर्व स्थिती बदलण्यासाठी ओबामांनी भारत दौरा आखला व आपल्या दौऱ्यादरम्यान भारतीय कंपन्यांबरोबर जवळपास १० अब्ज डॉलर्सचे (४४ हजार कोटी रुपये) २० करार केले. अमेरिकेकडून सी-१७ जातीची १० मालवाहू विमाने विकत घेण्याचा जो निर्णय भारताने घेतला आहे त्याचेही ओबामा यांनी यावेळी स्वागत केले. यामुळे अमेरिकेत २२ हजार रोजगार निर्माण होतील. नागरी अणु कराराच्या अंमलबजावणीसंदर्भात तसेच स्वच्छ तंत्रज्ञानातील सहकार्यावरही या दोन नेत्यांची चर्चा केली. व्यापार बंधने दूर करण्यावरही या दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. या क्षेत्रातील संरक्षण नीती दोन्ही देशांना लाभदायक राहणार नाही, याकडे मनमोहनसिंग यांनी ओबामांचे लक्ष वेधले.
भारत एक जागतिक आर्थिक महासत्ता झालेला आहे, असे सांगून ओबामा पुढे म्हणाले, भारताला आता पूर्व आशिया व तसेच उर्वरित जगासंदर्भातही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावयाची आहे. सध्याच्या वास्तवतेचे प्रतिबिम्ब पडण्यासाठी युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटनांचे सहकार्य घेण्याच्या गरजेवरही या दोन नेत्यांनी चर्चा केली.
राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण भारत दौरा करण्याचा निर्णय घेतला होता. आपला हा तीन दिवसांचा दौरा इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत सर्वात जास्त दिवसांचा होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताबरोबरची मैत्री अमेरिकेसाठी महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून राष्ट्राध्यक्ष ओबामा म्हणाले, माझ्या शब्दांकडे बघू नका; माझ्या कृतीकडे बघा.

कॉंग्रेस सरकारविरोधात उद्या संघातर्फे निदर्शने

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - केंद्रातील "युपीए' सरकारने देशातील हिंदूच्या विरोधात कारवाया करण्यास आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या प्रखर राष्ट्रप्रेमी संघटनेला दहशतवादी संघटना ठरवण्याचा घाट घातल्याने केंद्रातील कॉंग्रेस सरकारविरोधात देशभर धरणे निदर्शने केली जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून गोव्यात १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३. ३० ते ६ दरम्यान दुर्गापूजा होत असलेल्या ठिकाणी पणजी बसस्थानक परिसरात धरणे धरले जाणार आहे.
संघाने पहिल्यांदाच थेट रस्त्यावर उतरून केंद्राच्या या कुटील कारस्थानाविरोधात दंड थोपटले आहेत. या धरणे कार्यक्रमात स्वयंसेवकांनी तसेच, देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोवा राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.पणजीत आज ते पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर दक्षिण गोवा संघचालक रामदास सराफ, सहकार्यवाह अवधूत कामत, दक्षिण गोवा कार्यवाह शिरीष आमशेकर व उत्तर गोवा कार्यवाह संजय वालावलकर उपस्थित होते.
युपीएच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी संघाला दहशतवादी संघटना ठरवावे ही शरमेची बाब आहे. संघ याचा सनदशीर मार्गाने विरोध करणार आहे.
हे संघावर पुन्हा बंदी आण्याचेही कारस्थान असू शकते, असे त्यांनी सांगितले.
जम्मू आणि काश्मीर राज्य भारतापासून वेगळे करण्याचा डाव केंद्रातील कॉंग्रेस सरकारने आखला असल्यास संघाकडून त्यास तीव्र विरोध होईल म्हणूनच संघाला दहशतवादी संघटना ठरवण्याचा डाव "युपीए' सरकारने आखला असल्याचा दावा श्री. वेलिंगकर यांनी केला.
काश्मीर खोऱ्यात प्रखर राष्ट्रप्रेम जागवणारे संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी इंद्रेशजी कुमार यांचा अजमेर बॉंबस्फोटांशी संबंध असल्याचे भासवून त्यांना त्यात गोवण्याचा प्रकार राजस्थान "एटीएस'द्वारे केंद्र सरकारने सुरू केला आहे. "एटीएस'ने आपल्या आरोपपत्रात म्हटल्या प्रमाणे अजमेर स्फोटात पकडलेले संशयित इंद्रेशजी कुमार यांच्या एका जाहीर सभेला उपस्थित होते. त्यामुळे उद्या सोनिया गांधी याच्या जाहीर सभेत सहभागी झालेल्या कोणा एका व्यक्तीने दुसऱ्या दिवशी दरोडा घातल्यास सोनिया गांधी यांच्यावर आरोपपत्र सादर करणारा का, असा खोचक सवाल श्री. वेलिंगकर यांनी केला.
गेल्या ८५ वर्षापासून संघ राष्ट्रवादी संघटना म्हणून वावरत आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या संचलनात संघ सहभागी झाला होता. त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील कार्यक्रमांच्या सुरक्षेची जबाबदारी संघावर सोपवली होती. जेव्हा सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचे निधन झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील थोर पुरुष गेल्याचे संबोधून लोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र त्याच कॉंग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे संघाला दहशतवादी संघटना ठरवण्याची कुटील कारस्थाने रचत असल्याचा आरोप श्री. वेलिंगकर यांनी केला.
"युपीए' सरकारने सत्तेवर येताच हिंदूंविरोधात कारवाया करण्यास सुरुवात केली होती. दिवाळीच्या एन तोंडावर कांची पिठाचे शंकराचार्य पूज्य जितेंद्र सरस्वती यांना एका खोट्या खुनाच्या आरोपाखाली रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर योगगुरू स्वामी रामदेव, श्री श्री श्री रविशंकर, आसाराम बापू यांच्या विरोधातही अपप्रचार करण्यास सुरुवात केली. हिंदू मंदिरांच्या समितीवर जबरदस्तीने मुस्लिमांना नेमण्याचे प्रकार सुरू केले. त्यानंतर, मंदिरातील प्रसाद बनवण्याचे काम ख्रिश्चनांना दिले जाऊ लागले. तसेच, तिरूपती मंदिराच्या आवारात अन्य धर्मीयांना त्यांच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
२००७ मध्ये देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यात झालेल्या एका गुप्त करारानुसार हे काम केंद्रातील "युपीए' सरकार करत असल्याचाही संशय येतो. कारण
या करारानंतर, पेपर व्हिसा देणे सुरू झाले. काश्मीरमधील सैन्य मागे हटवण्याचे प्रकार केंद्र सरकारने केले. सैन्यदलाचे अधिकार कमी करण्यात आले. भारतातील सैनिकांच्या हातून मरण पावलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयाचे पुनर्वसन करण्याचेही केंद्र सरकारने सुरू केले आहे, असा दावा श्री. वेलिंगकर यांनी केला.
आता त्या कराराचाच शेवटचा भाग म्हणून काश्मीर भारतापासून तोडून ती आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून घोषित करण्याचा डाव आखण्यात आला आहे. त्याच्या पूर्ततेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे श्री. वेलिंगकर म्हणाले. कारण, व्यापारविषयक चर्चा करण्यासाठी कोणत्या देशाचा प्रमुख येत नाही तर त्या देशाच्या संबंधित विभागाचा मंत्री येतो, असे श्री. वेलिंगकर यांनी निदर्शनास आणून दिले.

"इफ्फी'आयोजन घोळामुळे मुख्यमंत्री झाले चिंताग्रस्त

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - "इफ्फी' महोत्सवाला आता मोजकेच दिवस बाकी असताना राज्य सरकारची तयारी मात्र काहीच झालेली नसल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत चिंताक्रांत बनले आहेत.आज त्यांनी समन्वय समितीची तातडीची बैठक बोलावून "इफ्फी'आयोजनाच्या कामाचा आढावा घेतला.
एकीकडे अद्याप एकाही निविदेवर निर्णय झाला नसताना आयोजनाची जबाबदारी दिलेले सदस्य विदेशी दौऱ्यांत मश्गूल आहेत तर काही सदस्य विदेश दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहेत,अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यंदाच्या "इफ्फी'आयोजनाचा घोळच सुरू असून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अत्यंत विश्वासाने नेमलेले काही सदस्य या महोत्सवातून आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच प्रयत्नरत असल्याने हा त्यांच्यासाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे.गोवा मनोरंजन संस्थेच्या एका सदस्यावर मेहरनजर करण्यासाठी महोत्सव हॉटेलच्याबाबतीत "बीच रिसॉर्ट' ची लादलेली अट राज्य सरकारच्या चांगलीच अंगलट आली आहे. ही अट रद्द करण्यास केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने स्पष्ट नकार दिला आहे. आता सदर हॉटेल उद्योजक सदस्याने आपली कात वाचवण्यासाठी हॉटेल निविदेत भाग घेतला नाही व बीच हॉटेल मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ सरकारवर ओढवली आहे. "इफ्फी' महोत्सव रंगमंच तथा इतर आयोजन निविदेवरून दोन मंत्र्यांत चांगलीच जुंपल्याने या निविदेवरही अंतिम निर्णय होत नाही. विविध कंत्राटदार गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यालयात हेलपाटे मारीत असून त्यांना काहीबाही कारणे सांगून पाठवले जात असल्याचीही खबर आहे.
मडगाव रवींद्र भवन अपात्र
यंदाच्या इफ्फीचा उद्घाटन किंवा समारोप सोहळा मडगाव येथील रवींद्र भवनात आयोजित करण्याचा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा बेत सपशेल फोल ठरला.ए.के.बीर यांच्या अध्यक्षतेखालील "डीएफएफ' ने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने रवींद्र भवनाला हे कार्यक्रम आयोजित करण्यास अपात्र ठरवले आहे,अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मडगावातील रवींद्र भवनाला पडलेले तडे व येथील प्रसाधनव्यवस्था गचाळ असल्याचेही या समितीने आपल्या अहवालात नमूद केल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीला दणका देण्याची कॉंग्रेस पक्षाची व्यूहरचना!

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मिकी पाशेको व जुझे फिलिप डिसोझा यांच्यातील या सुंदोपसुंदीची संधी साधून राष्ट्रवादी पक्षाला सुरुंग लावण्याची व्यूहरचना कॉंग्रेसकडून आखली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
नगरपालिका निवडणूक प्रचारात माजी पर्यटनमंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको हे आपल्याविरोधात मतदारांना फूस लावत असल्याच्या कारणावरून महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी त्यांच्याशी घेतलेला पंगा सध्या कॉंग्रेसच्या पथ्यावर पडला आहे. जुझे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्षाची जबाबदारी झटकली असली तरी त्यांच्या या कृतीमागे दक्षिण गोव्यातील काही बड्या कॉंग्रेस नेत्यांचा हात असल्याचे जाहीरपणे बोलले जाऊ लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर आपला दावा करण्यासाठी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांत जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे. डॉ.कार्मो पेगादो, प्रा.सुरेंद्र सिरसाट, पांडुरंग राऊत, संगीता परब व जितेंद्र देशप्रभू यांची नावे या पदासाठी विचारात असली तरी डॉ.प्रफुल्ल हेदे यांच्याकडेच हे पद देण्यात यावे, यासाठीही एक गट कार्यरत आहे.
दरम्यान, संगीता परब यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद बहाल करून महिलांना पक्षाकडे आकर्षित करणे शक्य आहे. त्याचा उपयोग येत्या विधानसभा निवडणुकीत होईल,असा होरा काहीजणांनी काढून त्या दृष्टीने प्रयत्न चालवले आहेत,अशीही चर्चा आहे.कॉंग्रेस पक्षातील शेकडो युवा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्याचा कार्यक्रम आयोजित करून जितेंद्र देशप्रभू यांनीही श्रेष्ठींसमोर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे येत्या काळात या नेत्यांत या पदासाठी एकमेकांवर कुरघोडीचेही प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
मुदतपूर्व निवडणुकीची तयारी?
राज्यात मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा विचारप्रवाह कॉंग्रेस अंतर्गत एका गटाकडून सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. पुढील वर्षी मे महिन्याच्या काळात निवडणुका घेता येतील, या दिशेने विचारविनिमय सुरू झाल्याचे कळते. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मुदतपूर्व निवडणुकीसाठी अजिबात राजी नाहीत; परंतु कॉंग्रेस पक्षांतर्गत काही नेत्यांनी आपली वैयक्तिक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने चालवलेली धडपड पाहता ती रोखण्यासाठी मुदतपूर्व निवडणुकीचाच पर्याय राहतो, असे ठाम मत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, उत्तरेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे दबावतंत्र व दक्षिणेत आलेमाव बंधूंंकडून आपली ताकद वाढवण्याचे चालवलेले प्रयत्न यामुळे कॉंग्रेस संघटनेतही अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. हे सगळे प्रयत्न कॉंग्रेसची ताकद वाढवण्यासाठीच सुरू असल्याचे जरी वरवर दाखवले जात असले तरी तो पक्षासाठी घातक ठरण्याचीच जास्त शक्यता आहे, असाही अनेकांचा सूर आहे.

भतग्राम नगरीचे लाडके व्यक्तिमत्त्व!

डॉ. शेखर साळकर यांचे आज पन्नासाव्या वर्षात पदार्पण

ज्योती धोंड
राजकीय, साहित्य, नाट्य, सामाजिक चळवळी अशा विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारे व्यक्तिमत्त्व कोण, असा प्रश्न विचारला तर आपल्याला झटकन आचार्य अत्रे किंवा पु. ल. देशपांडे ही नावे आठवतात. आजार म्हटले की डॉक्टरची आठवण येते. त्या अनुषंगाने "आजार सरो वैद्य मरो' अशी म्हणही ऐकिवात आहे. अर्थात, अशा म्हणींना थेट फाटा देणारे एक नामवंत शल्यविशारद म्हणजे भतग्राम नगरीचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. शेखर शिवराम साळकर. आज ते वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत आहेत. या डॉक्टरांचा रुग्णांना इतका लळा की, आजार दूर झाला तरी डॉक्टरांशी निर्माण झालेले अकृत्रिम जिव्हाळ्याचे नाते काही संपत नाही ! त्यांच्याशी स्नेहसंबंध जुळले की, ते कायमचे म्हणून समजायचे. मग आजार असो किंवा नसो. गगनभरारी घेऊन एखादे पाखरू जसे पुन्हा आपल्या इवल्याशा घरट्यात मायेची ऊब लेवून विसावते, अगदी तसाच उच्चशिक्षित कर्करोग शल्यविशारद डॉ. साळकर यांचा सारा जीवनपट. डिचोलीसारख्या खेडेगावात ५० वर्षांपूर्वी जन्मलेले, खेड्यात राहूनही उच्च शिक्षण, संस्कार आणि कीर्ती प्राप्त झालेले डॉ. साळकर यांना आपल्या भतग्रामनगरीविषयी कमालीचा अभिमान.
या ना त्या निमित्ताने जगभर प्रवास करणारे हे डॉक्टरमहाशय डिचोलीला उद्देशून अगदी थाटात सांगतात, "भतग्राम हेच माझे पंढरपूर'.
निष्णात शल्यविशारद अशी दिगंत कीर्ती देशविदेशात प्राप्त केलेले डॉ. साळकर म्हणजे जणू इंद्रधनुषी व्यक्तिमत्त्वच. सामाजिक बांधीलकी जपणारी संवेदनशील व्यक्ती म्हणून ते विलक्षण लोकप्रिय आहेत. त्यांनी जोर लावून धरलेल्या "तंबाखू सेवनविरोधी' मोहिमेला तर सिनेतारकही वचकून असतात. डॉ. शरद वैद्यांकडून त्यांनी कर्करोग जागृती आणि निर्मूलनाचा वारसा स्वीकारला. हा वारसा ते आजतागायत धडाक्याने राबवत आहेत. कर्करोगाशी त्यांचा कळतनकळत पहिला संबंध आला तो ते बारावीत शिक्षण घेत असताना. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांच्या मातोश्री नीरा या कर्करोगाला बळी पडल्या. त्याचवेळी साळकरांनी कर्करोग शल्यविशारद होण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. त्या अगोदर ते "क्रिकेटर' होण्याची स्वप्ने पाहात होते. एवढेच नव्हे तर त्यांनी २२ वर्षांखालील सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत महंमद अझरुद्दीनच्या हैदराबाद संघाविरुद्ध शतकही ठोकले होते. वैद्यक क्षेत्रात पाऊल ठेवल्यावरही त्यांनी "गोमॅकॉ'चे प्रतिनिधित्व करताना खणखणीत द्विशतक ठोकले होते. दक्षिण विभागासाठी यांची निवडही झाली होती, पण त्यावेळी वैद्यकीय शिक्षण सुरू असल्याने त्यांनी क्रिकेटला जड मनाने आपली बॅट "म्यॅन' केली. आपण क्रिकेटर बनू शकलो नाही ही बोचरी जाणीव आजही त्यांना सतावते.

"गोमॅकॉ'तून "एमबीबीएस'ची पदवी प्राप्त केल्यानंतरचा वैद्यकीय प्रवास साळकरांनी मुंबईतील टाटा मेमोरियल इस्पितळातून प्रख्यात डॉक्टर प्रफुल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली केला. त्यांनाच ते आपले गुरुवर्य मानतात. ऑन्कोलॉजीमध्ये "एमएस' पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. साळकरांना वेध लागले ते गोव्याचे. अगदी डिचोलीतून त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. "अनेक डॉक्टर गोव्यात शिकून बाहेरगावी जम बसवितात; पण मी मात्र बाहेर शिकून डिचोलीत परत आलो. आज गोव्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण मला डिचोलीत शोधत येतात याचा मला रास्त अभिमान वाटतो', असे डॉ. साळकर सांगतात. पणजीत पाऊल टाकल्यानंतर, ते कर्करोगातील शल्यविशारद म्हणून त्यांच्यावर नितांत विश्वास ठेवणारे त्यांचे डॉक्टर स्नेही डॉ. प्रमोद तळावलीकर, डॉ. श्याम भांडारे आणि डॉ. प्रमोद धुंगट यांच्याविषयी डॉ. साळकरांना अत्यंत आदर आहे. "मी आज जो काही आहे तो या माझ्या मित्रांमुळेच' असे ते अभिमानाने सांगतात.
डॉक्टर साळकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव स्वप्निल, कन्या सोनाल आणि धर्मपत्नी मेधा यांना चित्रपटांचे भारी वेड. दिवसाला लागोपाठ तीन तीन चित्रपट पाहण्याचा विक्रम या सर्वांनी केला आहे! त्यांचा डॉक्टर सुपुत्र स्वप्निल तर " बाप से बेटा सवाई'.
लागोपाठ एकाच थिएटरात चार वेगवेगळे सिनेमा पाहायचा विक्रम या सुपुत्राने केला आहे. आपल्या रुग्णांची खूप काळजी घेणारे, त्यांच्या जखमाच नव्हे तर मनेही सांभाळणारे "हॅपी गो लकी' डॉक्टर म्हणून ते परिचित आहेत. गोव्याच्या राजकारणात त्यांना मर्यादित रस आहे तो माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकरांसारख्या तळमळीच्या राजकीय नेत्यांमुळे, असे ते सांगतात. ज्या समाजाने आपल्याला घडविले त्या समाजाचे आपण ऋण लागतो या भावनेने ते आपल्या पेशाशी समरस झाले आहेत. शेकडो लोकांवर विनाशुल्क उपचार करणे, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक जखमांवर फुंकर घालणे हे डॉ. साळकर आपले परमकर्तव्य समजतात.
आपले वडीलबंधू वल्लभ साळकर यांचे मार्गदर्शन त्यांच्या जीवनात मोलाचे आहे, याचा ते आवर्जून उल्लेख करतात. आज आपले हे वैभव आणि कीर्ती पाहायला आपली आई जवळ नाही याचे दुःख डॉक्टरांच्या डोळ्यात आजही स्पष्ट दिसते. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांना ज्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागते त्यांच्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिण्याचा मनोदयही डॉ. साळकरांनी यावेळी व्यक्त केला. ते सांगतात की, नेहमीच कॅन्सरग्रस्तांना आपण जीवदान देऊ शकत नाही. तथापि, त्यांच्या यातना कमी करू शकतो याचेच समाधान वाटते, असे त्यांनी बोलून दाखवले.
एक उमदे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, ज्यांच्यासमवेत काही क्षण हास्यविनोद केले तरी आपणाला प्रचंड उत्साह मिळतो अशा डॉ. साळकरांना पन्नासाव्या वाढदिनी आमच्या लाख लाखशुभेच्छा...

Monday 8 November, 2010

इस्लामच्या नावाने होणारी हिंसा खेदजनक : ओबामा

मुंबई, दि. ७ - "इस्लाम' हा अतिशय महान असा धर्म असून, काही कट्टरतावादी तत्त्वांकडून इस्लामच्या नावाने होणारा हिंसाचार ही खेदजनक बाब आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सध्या भारत भेटीवर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले असून, अशा तत्त्वांना वाळीत टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
आपसातील मतभेद फक्त हिंसाचाराच्या माध्यमातूनच मिटवले जाऊ शकतात ही संकल्पनाच लोकांनी धुडकावून लावण्याची आज नितांत गरज आहे, असे ओबामा यांनी आज येथील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना सांगितले. या संवादादरम्यान ए. अन्सारी या मुस्लिम विद्यार्थ्याने "जिहाद'बाबत आपली काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना ओबामा यांनी हे प्रतिपादन केले. इस्लामच्या नावाचा वापर करून निष्पाप नागरिकांना आपले लक्ष्य करण्याची कट्टरवाद्यांची भूमिका पूर्णपणे अयोग्य आहे, असेही ओबामा यावेळी म्हणाले.
पाकिस्तानला आपण दहशतवादी राष्ट्र म्हणून का घोषित करत नाही, अशा एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओबामा म्हणाले की, पाकिस्तानातील सगळ्याच जनतेचा अतिरेकी कारवायांना पाठिंबा नाही. काही कट्टरवादी तत्त्व पाकिस्तानच्या भूमीतून अतिरेकी कारवाया करत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. पाकिस्तान सरकार अतिरेकी कारवाया करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहे. मात्र, हे प्रयत्न समाधानकारक नसल्याचे ओबामा यावेळी म्हणाले. भारताच्या हितासाठी स्थिर आणि प्रगत पाकिस्तानची गरज आहे. पाकिस्तान शांत राहिल्यास संपूर्ण आशिया खंडात त्याचा प्रभाव पडू शकतो. पाकिस्तानला स्थिर करण्यात भारतच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असे माझे ठाम मत आहे, असेही ओबामा यावेळी म्हणाले. एकमेकांच्या धर्माचा आदर करत प्रगती साधण्यात आजच्या युवापिढीची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असेही ओबामा यांनी यावेळी सांगितले.

मिशेलनंतर बोलायला आवडत नाही
"मिशेल ओबामा अतिशय चांगल्या वक्त्या असल्याने त्यांचे बोलणे झाल्यानंतर आपल्याला बोलायला मुळीच आवडत नाही', असे बराक ओबामा यांनी या कार्यक्रमाला सुरुवात करताना सांगितले. "स्वत:वर विश्वास ठेवा आणि आपापल्या समुदायांसाठी मोठमोठी स्वप्न बघा' असे मिशेल ओबामा यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगताना म्हटले. त्यानंतर त्यांनी आपले पती बराक ओबामा यांची ओळख करून दिली आणि त्यांना काही अडचणीत टाकणारे प्रश्न विचारा जेणेकरून त्यांचा आजचा दिवस चांगला जाईल, असे आवाहन मिशेल ओबामा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

दिल्लीत भव्य स्वागत
नवी दिल्ली, दि. ७ ः आपला दोन दिवसांचा मुंबई दौरा आटोपून नवी दिल्लीत दाखल झालेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.
शिष्टाचार बाजूला ठेवून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग स्वत: ओबामा यांच्या स्वागतासाठी जातीने उपस्थित होते. बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना घेऊन आलेले "एअर फोर्स वन' हे विशेष विमान दुपारी ३.१९ वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. ओबामा विमानातून खाली येताच पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ओबामा यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना मिठी मारली. त्यानंतर आपल्या आलिशान मोटारीकडे रवाना होण्यापूर्वी बराक ओबामा यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी काही काळ चर्चाही केली.
केंद्रीय कंपनी व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद, परराष्ट्र सचिव निरुपमा राव आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत मीरा शंकर हेदेखील ओबामा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.

चीनकडून १९६२ ची पुनरावृत्ती अशक्य : लष्करप्रमुख

नवी दिल्ली, दि. ७ - सीमावर्ती भागात पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या चीनच्या हेतूबद्दल खात्रीलायकरित्या काहीही सांगणे शक्य नसले तरी, १९६२ ची पुनरावृत्ती अशक्य आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी व्यक्त केले आहे.
या भागातली सुरक्षेची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, असे सांगतानाच पाक लष्कराची भारत केंद्रित भूमिका आणि अमेरिकेतर्फे दहशतवादच्या विरोधात लढण्यासाठी देण्यात येणाऱ्या मदतीचा पाकिस्तानकडून भारताविरूद्ध वापर होण्याची शक्यता या बाबी काळजी करण्यासारख्या आहेत. "चीन सीमावर्ती भागात पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या अनेक योजना राबवत आहे. स्थानिक जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना राबविण्यात येत असल्याचे चीनकडून सांगण्यात येत आहे. चीनकडून काहीही सांगण्यात येत असले तरी त्यांच्या हेतूबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत आणि एवढी क्षमता प्राप्त झाल्यानंतर चीनचा हेतू बदलला तर काहीही होऊ शकते आणि हीच अतिशय गंभीर बाब आहे, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले आहे.
मात्र, काहीही झाले तरी १९६२ ची पुनरावृत्ती कदापि शक्य नाही, असे चीनने १९६२ मध्ये भारतीय भूमीवर केलेल्या आक्रमणाचा थेट उल्लेख न करता सिंग यांनी सांगितले. त्यावेळी सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य जमा झाले होते आणि चीनने भारताच्या काही प्रदेशावर आपला दावा केला होता. तशी परिस्थिती आज नाही. त्यामुळेच हे मी खात्रीलायकरित्या सांगू शकतो. १९६२ च्या तुलनेत परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. सीमेवरील स्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे, असी व्ही. के. सिंग यांनी सीएनएन-आयबीएन या वाहिनीवरील "डेव्हील्स ऍडव्होकेट' या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
या विभागातील सुरक्षेच्या परिस्थितीबाबत विचारले असता, ज्या देशाच्या सीमावर्ती भागात अस्थिरतेचे वातावरण आहे आणि ज्या देशांमधील सीमांची निश्चित आखणी झालेली नाही त्याठिकाणची सुरक्षेची स्थिती ही नाजूकच असणार आहे, असे सिंग यांनी पुढे सांगितले.

अखेर जुझे यांनी सोडले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - वास्को पालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच पक्षातील नेत्यावर शेकडो समर्थकांसमवेत केलेला हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना महागात पडला असून अखेर जुझे फिलिप डिसोझा यांना आज आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
जुझे हे विद्यमान सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आज दुपारी फॅक्सद्वारे पक्षाचे सर्वेसर्वा केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नावे राजीनामा पाठवून दिला. "मी आज फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला असून त्यात आपण राजीनाम्यामागचे कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही,' असे श्री. डिसोझा यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीला दोन दिवस असताना जुझे यांच्या समर्थकांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मिकी पाशेको याच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मिकी हे आपल्या समर्थक उमेदवाऱ्यांविरोधात मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करून त्याविरोधात जुझे यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रारही नोंद केली होती. तथापि, मिकी यांनी हे आरोप फेटाळून आपण तेथील एका हॉटेलमध्ये जेवायला आले होतो. त्यावेळी जुझेच्या समर्थकांनी आपणावर हल्ला चढवून वाहनाची नासधूस केल्याचे म्हटले होते. तसेच दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी पोलिस तक्रारही नोंद केल्या होत्या.
पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेऊन गोव्याचे प्रभारी प्रकाश बिनसाळे यांना या प्रकरणाचा मागोसा घेऊन अहवाल सादर करण्यासाठी गेल्या आठवड्यात गोव्यात पाठवले होते. या चौकशीचा अहवाल सादर करण्याच्या एका दिवसापूर्वीच जुझे डिसोझा यांनी आज राजीनामा सादर केला. त्यामुळे यासंदर्भात राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मिकी पाशेको यांनी यापूर्वीच बिनसाळे यांच्यासमोर आपण प्रदेशाध्यक्ष बनवण्यास तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार याच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगून आपली बाजू भक्कम केली आहे. त्यामुळे आता गोव्यात प्रदेशाध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रदेशाध्यक्षपद आपल्याच गळ्यात पडावे यासाठी पक्षातील काही नेत्यांनी जोरदार "लॉबिंग' करण्यांसही सुरुवात केली आहे. नुकतीच या विषयीची एका बैठकीही प्रफुल्ल हेदे यांच्या अध्यक्षते खाली झाली असून त्यात अनेकांची नावे पुढे आली आहेत. यात निर्मला सावंत, सुरेश परुळेकर तसेच, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जितेंद्र देशप्रभू यांनीही अध्यक्षपदासाठी रुची दाखवली आहे.

आगीचे कारण अजूनही अस्पष्ट

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)- खोर्ली जुने गोवे येथील औद्योगिक वसाहतीतील "फेबर कॅसल प्युमा स्टेशनरी' फॅक्टरीला लागलेली आग आजही विझवण्याचे प्रयत्न आजही सुरू होते. आग विझवण्यासाठी पाण्याचे १२ बंब कार्यरत आहेत. या आगीत सुमारे ९ कोटी ९० लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती जुने गोवे अग्निशमन दलाचे उपअधिकारी मायकल ब्रागांझा यांनी दिली.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जुने गोवे येथे असलेल्या या कारखान्याला आग लागली होती. मात्र, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही सांगण्यात आले.

गोव्यात यंदाही पुन्हा एकदा सनबर्न पार्टी

"फेसबुक'वर जाहिरातबाजी सुरू

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - दरवर्षी वादग्रस्त ठरणाऱ्या "सनबर्न' पार्टीचे येत्या महिन्यात गोव्यात आयोजन करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या बहाण्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या पार्टीत अमली पदार्थाचा आणि मद्याचे पाट वाहतात. त्यामुळे नेहमीच ही पार्टी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरते. तरीही राज्यातील सरकार मात्र या पार्टीच्या आयोजनाला "उदार अंतःकरणाने' परवानगी देते. गेल्या वेळी याच पार्टीत "ड्रगचा ओव्हर डोस' झाल्याने दिल्लीच्या मेहा बहुगुणा या तरुणीचा मृत्यू झाला होता.
यंदा मावळत्या वर्षाला निरोप देण्याच्या बहाण्याने २७ ते २९ डिसेंबरदरम्यान या पार्टीचे कांदोळी येथे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी आयोजकांनी संकेतस्थळावरून मोठ्या प्रमाणात तरुण तरुणींशी संपर्क साधता येईल अशा "फेसबुक'वर जाहिरातबाजी सुरू केली आहे. या पार्टीत देशभरातील तरुण तरुणी सहभागी होतात. अनेक तरुण तरुणी कुटुंबातील सदस्यांना कोणतीही चाहूल न लागू देता या पार्टीत "रम'तात. पार्टीच्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी प्रतिव्यक्ती ८०० रुपये प्रवेश शुक्लही ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे पोलिस पहाऱ्यात ही पार्टी आयोजिली जाते. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या "पॅडलर"वर कोणतीच कारवाई होत नाही. गेल्या वर्षी अमली पदार्थविरोधी पथकाने या पार्टीच्या ठिकाणी कडक पहारा ठेवला होता. मात्र ड्रगच्या अतिसेवनाने तरुणीचा मृत्यू झालाच. त्यामुळे अमली पदार्थ विरोधा पथकाच्या व्यूहरचनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ज्याठिकाणी या पार्टीचे आयोजन केले जाते त्याच्या बाहेर छोटे स्टॉल उभारून तेथे शीतपेये आणि खाण्याचे पदार्थ ठेवले जातात. मात्र, त्याठिकाणी सांकेतिक भाषेत अमलीपदार्थांचीच प्रामुख्याने विक्री केली जाते.
एलएसडी, हाशिश, हेरॉईन, कोकेन, एक्सटसी, चरस आदी अमलीपदार्थ तेथे सहजगत्या उपलब्ध केले जातात. या ड्रगच्या नशेत कर्णकर्कश आवाजात "ट्रान्स संगीतावर' तरुण तरुणी धागडधिंगा घालतात. ७२ तास ही पार्टी रंगते! "इंडिया टुडे' या नियतकालिकाने गोव्यात सुरू असलेल्या ड्रग आणि वेश्याव्यवसायावर नुकताच प्रकाश टाकला आहे. त्यामुळे राज्य सरकार या पार्टीच्या आयोजनाबद्दल कोणती भूमिका घेणार याकडे दक्ष गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी याच पार्टीत ड्रगच्या अतिसेवनाने दिल्लीच्या एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची भूमिकाही यावेळी महत्त्वाची ठरणार आहे.

दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करू : भाजप

नवी दिल्ली, दि. ७ - अमेेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर चर्चा करण्याची वेळ येईल त्यावेळी कोणकोणते मुद्दे उपस्थित करावयाचे यासंदर्भात आज भाजपाच्या संसदीय गटाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता अरुण जेटली, वरिष्ठ नेते जसवंतसिंग, यशवंत सिन्हा, मुरलीमनोहर जोशी सहभागी झाले होते.
जवळपास दोन तास चाललेल्या या चर्चेत ओबामा व सुषमा स्वराज यांच्यात सोमवारी होणाऱ्या बैठकीत भाजपाची भूमिका काय राहील, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानसमर्थित दहशतवाद, भारत व तिसऱ्या जगातील इतर देशांप्रति अमेरिकेची भूमिका, आऊटसोर्सिंग व अमेरिकेत जाऊन तेथे काम करणाऱ्या तेथील भारतीय तंत्रज्ञांना देण्यात यावयाच्या व्हिसा मुद्याला ओबामांच्या भेटीत प्राधान्य दिले जाणार, असे दिसत आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, "अतिथी देवो भव' ही आमच्या देशाची परंपरा असल्याने जोपर्यंत ओबामा आमच्या देशात आहेत तोपर्यंत आम्ही कोणतेही वक्तव्य जारी करणार नाही.
ओबामा यांनी काल शनिवारी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केलेल्या भाषणात पाकिस्तानचा साधा उल्लेखही न केल्याबद्दल पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ओबामा यांनी केलेले वक्तव्य व भारताच्या परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांनी दिलेले वक्तव्य यात फारच अंतर दिसून येते, याकडे रुडी यांनी लक्ष वेधले होते. ओबामा यांच्या भारत दौऱ्याचा उद्देश दोन देशांमधील संबंध सुधारणे हा आहे, असे वक्तव्य निरुपमा राव यांनी केले होते परंतु दुसरीकडे ओबामा यांनी तर आपल्यासोबत व्यापारी धोरणाचा मुसदा आणला आहे, असे रुडी म्हणाले.

Sunday 7 November, 2010

"ताज'मधील मुक्काम दहशतवाद्यांना कठोर इशारा : ओबामा

मुंबई, दि. ६ - २६/११ ला ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी रक्ताचे पाट वाहिले, त्याच हॉटेलमध्ये माझा मुक्काम म्हणजे दहशतवाद्यांना दिलेला कठोर इशारा आहे, असे प्रतिपादन सध्या भारत भेटीवर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले असून, मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बराक ओबामांचे आपल्या पहिल्या भारत भेटीवर आज दुपारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर काही वेळातच ओबामा यांनी ताज हॉटेलमध्ये जाऊन २६/११ च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट दिली आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पुस्तिकेत आपला अभिप्राय नोंदवला. दहशतवादविरोधातल्या लढाईत दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहे, असेही ओबामा यांनी ताज हॉटेलमध्ये उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
मुंबईसारख्या ऐतिहासिक आणि गतिमान शहरापासून आपला भारत दौरा सुरू करण्याबाबत वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली. ताज हॉटेलमध्ये मुक्काम करून आपण दहशतवादी संघटनांना इशारा देऊ इच्छिता का, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता आणि मी "हो' असे उत्तर दिले होते. ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी ६० तास केलेल्या धिंगाण्यात आपले कुटुंब गमावल्यानंतरही अजूनपर्यंत याच ठिकाणी कार्यरत असलेले हॉटेलचे सरव्यवस्थापक कर्मवीर कांग यांच्या धैर्याचा ओबामा यांनी विशेष उल्लेख केला. "ताज हे सर्व भारतीयांच्या शक्तीचे प्रतीक आहे', असेही ओबामा पुढे म्हणाले.
"आम्ही २६/११ च्या अतिशय निर्घृण अशा हत्याकांडाच्या स्मृती कधीही विसरू शकणार नाही. गेट वे ऑफ इंडिया पाठीशी असतानाच या दिवशी ताज हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून आगीचे लोट बाहेर पडत होते. हिंदू, शीख, ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लीम धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने राहतात. हे ज्यांच्या डोळ्यात खुपते त्यांनीच वेगवेगळ्या समुदायांमध्ये फूट पाडण्यासाठी हे कृत्य केले. आजच्या परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यात दहशतवादविरोधी लढाईत सहकार्य आणखी वाढले आहे. आमच्या जनतेचे जीवन सुरक्षित करण्यासाठी अतिरेकी हल्ले होऊ नये म्हणून दोन्ही देशांमध्ये गुप्त सूचनांचे मोठ्याप्रमाणात आदानप्रदान होत आहे. या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने मी डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी चर्चेस उत्सुक आहे, असेही ते म्हणाले.




महात्मा गांधी संपूर्ण जगाचे हीरो
ताज हॉटेलमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर बराक ओबामा यांच्या ताफ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निवास्थान असलेल्या मणिभवनकडे कूच केले. "महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे हीरो होते', असा अभिप्राय ओबामा यांनी मणिभवनच्या पुस्तिकेत नोंदवला.
"महात्मा गांधींच्या जीवनात अमूल्य स्थान असलेल्या या वास्तूला भेट दिल्याने मला आत्यंतिक आनंद झाला. महात्मा गांधींच्या जीवनातून मलाही प्रेरणा मिळाली आहे. एवढेच नव्हे तर महात्मा गांधींनी मार्टिन ल्युथर किंगसह अमेरिकन आणि आफ्रिकन अमेरिकन जनतेलाही प्रेरणा दिली, असेही ओबामा यांनी पुस्तिकेल लिहिले आहे.

शाळकरी मुलांसोबत आज दिवाळी
भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या उद्या दुसऱ्या दिवशी बराक ओबामा शाळकरी मुलांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ताजमहाल हॉटेलला लागूनच असलेल्या होली नेम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा दिवाळी साजरी करणार आहेत. ओबामा यांच्या भेटीनिमित्त या शाळेत विशेष रांगोळी काढण्यात येणार आहे. त्याठिकाणी काढण्यात आलेल्या मोराच्या छायाचित्रात रंग भरण्याची विनंती या जगातील सगळ्यात प्रभावी जोडप्याला यावेळी करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी साजरी केल्यानंतर बराक ओबामा प्रदूषण आणि पर्यावरणावर आयोजित करण्यात आलेल्या विज्ञात प्रदर्शनालाही भेट देणार आहेत. विज्ञात प्रदर्शनात सहभागी झालेले १६ निवडक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी ओबामा आणि त्यांच्या पत्नी संवाद साधणार आहेत. यावेळी शाळेतील विद्यार्थी कोळी नृत्यासह इतर पारंपरिक नृत्य करणार आहेत, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

जुनेगोवे येथे फॅक्टरीला भीषण आग

"फेबर कॅसल'ची सुमारे वीस कोटींची हानी झाल्याचा अंदाज

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)- जुनेगोवे येथील खोर्ली औद्योगिक वसाहतीमधील "फेबर कॅसल, प्युमा स्टेशनरी ' या कारखान्याला आज भल्या पहाटे अचानकपणे लागलेल्या भीषण आगीत हा संपूर्ण कारखाना खाक झाला. अग्निशमन दलाच्या सुमारे ४० जवानांनी १० बंबांच्या साहाय्याने १२ तास अथक प्रयत्न करूनही ही आग आटोक्यात आली नाही. सुदैवाने या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नाही. तसेच या कारखान्याजवळच असलेली सदर कंपनीची जादा शेड वाचवण्यात अग्निशमन दल यशस्वी ठरले. या घटनेतील हानीचा अहवाल तयार करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार हा आकडा २० कोटी रुपयांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी अग्निशमन दलाचे अधिकारी डी.डी.रेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती सकाळी ६ वाजता जुनेगोवे अग्निशमन दल कार्यालयाला मिळाली. त्यानंतर तातडीने दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचताच आगीची तीव्रता पाहून त्यांनी लगेच उर्वरित केंद्रांना याची माहिती दिली. त्यामुळे राज्यभरातून एकूण दहा बंब व अतिरिक्त जवानांना पाचारण करण्यात आले.यावेळी सिजेंटा कंपनीकडूनही बंबांची सोय करण्यात आली. त्यांनीच याकामी पाण्याची सोय केली, अशी माहिती रेडकर यांनी दिली. या कारखान्यात प्रामुख्याने स्टेशनरी उत्पादन तयार केले जाते. तेथे फायबर व रबराचा साठा मोठा प्रमाणावर असल्याने आग मोठ्या प्रमाणात फैलावली. आगीचे लोट एवढे तीव्र होते की, त्यात सदर शेडचे वरील सिमेंटचे पत्रे व लोखंडी सळ्याही उंच ज्वाळांमुळे कोलमडून पडल्या. अग्निशमन दलासाठी ही घटना म्हणजे मोठे आव्हानच होते. सुमारे ४० अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सुमारे २४०० चौरसमीटर जागेत ही शेड उभारण्यात आली होती, असेही यावेळी ते म्हणाले.
या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अनुप राणे यांच्या म्हणण्यानुसार ही आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वीज खात्याकडे यासंबंधी चौकशी करण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे,असे ते म्हणाले. या दुर्घटनेतील हानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी तो सुमारे २० कोटी रुपयांच्या घरांत पोहचण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीचे तीव्र लोट
आगीचे लोट एवढे तीव्र होते की, त्यात सदर शेडचे वरील सिमेंटचे पत्रे व लोखंडी सळ्याही उंच ज्वाळांमुळे कोलमडून पडल्या. अग्निशमन दलासाठी ही घटना म्हणजे मोठे आव्हानच होते. सुमारे ४० अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.

भंडारी समाजाचा भव्य मेळावा

ज्ञातीबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन

पेडणे, दि. ६ (प्रतिनिधी) - प्रत्येक समाजाचा विकास झाला तरच राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास होऊ शकतो याची जाणीव भंडारी समाज ज्ञाती बांधवांनी ठेवावी. आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित यावे व समाजाचा विकास करावा, असे आवाहन भंडारी समाजाच्या मेळाव्यात करण्यात आले. मांद्रे मधलामाज येथे पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाचा भव्य तालुका मेळावा आज पार पडला.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे या नात्याने राज्याचे गृहमंत्री रवी नाईक उपस्थित होते. आपण सरकार दरबारी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. व्यासपीठावर खासदार श्रीपाद नाईक, वेंगुर्ल्याचे माजी आमदार शंकर कांबळी, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष तथा पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, सरचिटणीस शिवकुमार आरोलकर व नीळकंठ पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत सुशांत मांद्रेकर यांनी केले श्रीधर मांजरेकर, महेश कोनाडकर, वैकुठ नाईक, जयवंत गोवेकर, काकुलो किनळेकर व नीळकंठ पेडणेकर आदींनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले.
सूत्रसंचालन शिवकुमार आरोलकर यांनी केले. मेळाव्याला समाजाचे बांधव मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी १० वी व १२ वीतील यशवंत विद्यार्थी सर्वश्री दत्तप्रसाद नाईक, मधू कांबळी, प्रसाद आरोलकर, बापू बांदेकर, राजबा नर्से, साईदास आपटे, साईनंद सोपटे, प्रियांका तांडेल, शुभांगी आरोस्कर, गंधाली मावळणकर, तृप्ती नार्वेकर, नरहरी चंद्रोजी, अनिकेत नावेलकर, दिनेश फडते, श्वेता घोरे, अंकिता कळंगुटकर, सभिक्षा वस्त, शांती कानोळकर, अक्षय नारोजी, संकेत हरमलकर, सिद्धी रामचंद्र सांगळे, आश्विनी कशाळकर, प्रियांका राऊळ, किशोर राऊळ, आलिक्षा किनळेकर, आरती राऊळ, सिंदीया सोपटे, स्नेहा धारगळकर, रुपेश आंंबेकर या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. तसेच विविध कला क्षेत्रातील मान्यवर सखाराम नारोजी, नारायण केरकर, तारा हडफडकर, दिवाकर नाईक, मनोहर म्हान्जी, डॉ. अनंत नाईक, ज्योती जयराम पाळणी, भालचंद्र कळंगुटकर, सुर्या वस्त, श्रीपाद म्हामल, धोंडू वायंगणकर, सुरेश बांदेकर, नामदेव आसोलकर यांचा आणि विविध सरपंच व उपसरपंच रक्षा रंगनाथ कलशावकर (मांद्रे) प्रदीप नाईक (हरमल), अर्चना पालयेकर (पालये) रिमा रामा हरजी (केरी), तुळशीदास म्हालकर (पार्से), अनुपा कांबळी (विर्नोडा), प्रदीप ऊर्फ भूषण नाईक (धारगळ) संजीवनी बर्डे, सूचना गडेकर, तुळशीदास गवंडी, शोभा हरमलकर आणि जिल्हापंचायत सदस्य श्रीमती श्रीधर मांजरेकर, दीपक कळंगुटकर, सुरंगी हरमलकर यांचा व आमदार दयानंद सोपटे यांचा शाल व श्रीफळ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
दोन ठराव मंजूर
अन्य समाजातील जाती जमाती व इतरांना जसे आरक्षण मिळते त्याचप्रमाणे भंडारी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळावे असा ठराव याप्रसंगी मंजूर करण्यात आला. पंचायती, पालिका व जिल्हा पंचायत निवडणुकीत भंडारींसाठी आरक्षण आहे; त्याचप्रमाणे गोवा विधानसभेच्या निवडणुकीतही आरक्षण देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. ठरावाला शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी अनुमोदन दिले.
खासदार श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात समाजातील बांंधवांनी आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या विकास करावा, असे आवाहन केले. ज्ञातीच्या विकासासाठी अशा मेळाव्याची गरज आहे. समाज हे मंदिर आहे. त्या मंदिरात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे श्री. नाईक यांनी आवाहन केले.
शंकर कांबळी यांनी, १० वर्षांपूर्वी वेंगुर्ले येथे भंडारी समाजाचा मेळावा झाल्यानंतर आपण भंडारी समाजाचा आमदार म्हणून निवडून आल्याचे स्पष्ट केले.
आमदार दयानंद सोपटे यांनी समाजाचा लवकरच सभागृह बांधण्याची घोषणा केली.
यावेळी आमदार दयानंद मांद्रेकर, मिलिंद नाईक, महादेव नाईक यांची समयोचित भाषणे झाली. मेळाव्याप्रसंगी सभागृह खचाखच भरले होते. मान्यवरांना आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. संतोष कोटखणकर यांनी आभार मानले.