Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 5 December, 2009

बेकायदा खाणींचा उच्छाद

गोव्याचा 'मधू कोडा' उजेडात आणणार : पर्रीकर
विधानसभा अधिवेशनात भाजप होणार अत्यंत आक्रमक

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यात मोठ्या प्रमाणावर राजाश्रयाने बेकायदा खाणींचे पेव फुटले असून त्याबाबतची लक्तरे येत्या विधानसभा अधिवेशनात वेशीवर टांगली जातील,असा खणखणीत इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला. बेकायदा खाण प्रकरणांचा पर्दाफाश करून गोव्याचा "मधू कोडा' कोण हे अधिक स्पष्टपणाने जनतेसमोर आणणारच; तसेच चार मुख्य खात्यांतील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची यादीच सभागृहासमोर सादर केली जाईल, असे स्पष्ट संकेतही पर्रीकरांनी दिले.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या १५ ते १८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला कशा पद्धतीने कोंडीत पकडावे याचा खल आज भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत झाला. यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रपरिषदेत पर्रीकर बोलत होते. भाजप विधिमंडळ उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा व प्रवक्ते आमदार दामोदर नाईक हेही याप्रसंगी उपस्थित होते.
कॉंग्रेस आघाडी सरकारची प्रशासनावरील पकड पूर्णपणे सुटली आहे. राज्यातील जनतेला सध्या कुणीही वाली राहिलेला नाही. सरकारी मंत्री केवळ देश- विदेशवाऱ्या व भ्रष्टाचारात गुंतले आहेत.अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करून सरकार जनतेला सामोरे जाण्यास कचरत असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. हे अधिवेशन जरी चार दिवसांचे असले तरी जनतेला सामोरे जावे लागणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवर भाजप आक्रमकतेने सरकारवर तुटून पडणार असल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकूण आठ खात्यांवर चर्चा आहे. या दिवशी खाण खात्यावरून सरकारची पूर्ण दमछाक करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यात बेकायदा खाण व्यवहाराचा उच्छाद सुरू असून राजकीय वरदहस्ताने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचाच गैरवापर होत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. केपे येथे २६१ व ३११ हेक्टर जागेत नवीन खाण परवाना देण्यासंबंधी दक्षिण गोवा प्रशासकीय यंत्रणेचा ज्या पद्धतीने गैरवापर करण्यात आला त्याचा भांडाफोड या अधिवेशनात केला जाईल. जनतेला हरकती नोंदवण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतरच हरकती नोंदवण्याची नोटीस जारी केल्याचा अश्लाघ्य प्रकार करण्यात आला. दक्षिण गोव्याचे विद्यमान जिल्हाधिकारी कुणाच्या आश्रयाने तग धरून आहेत हे सर्वपरिचित आहे, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला.
गोव्यातही "मधू कोडा' आहेत व ते कोण याचे दर्शन यावेळी अधिवेशनाच्या निमित्ताने जनतेला घडवले जाईल, असेही पर्रीकरांनी सूचित केले. कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत व गृहमंत्री रवी नाईक यांचे स्वतःच्या खात्यावर नियंत्रणच उरलेले नाही. या खात्यावर दुसऱ्या दिवशी अधिवेशन दणाणून सोडले जाईल. कुप्रसिद्ध गुंड अश्पाक बेंग्रे हा न्यायालयीन कोठडीत राहून जर आपल्या गुन्हेगारी जगतावर नियंत्रण ठेवू शकतो तर काम करण्याची पूर्ण मोकळीक असूनही गृहमंत्र्यांना आपल्या पोलिस खात्यावर नियंत्रण मिळवता का येत नाही,असा मूलभूत प्रश्न पर्रीकरांनी उपस्थित केला.
वित्त खात्याच्या हातून कारभार घसरत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य या खात्यांत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचाराची मुळे वरून खालपर्यंत असून विविध प्रकरणे उजेडात आणून ती उखडण्याचा प्रयत्न या अधिवेशनात भाजप करेल. महसुलातील गळती रोखल्यास आपोआपच तिजोरी भरेल. एकीकडे लूट करून दुसरीकडे तिजोरी भरण्यासाठी व्यावसायिक करासारखे जाचक निर्णय जनतेवर लादणे कदापि सहन करणार नाही. हा कर रद्द करणेच शहाणपणाचे ठरेल,असा इशारा देत वित्त खात्याचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आणू, असे पर्रीकर म्हणाले.
आरोग्य व कृषी खात्यात ज्या भानगडी सुरू आहेत त्याही सभागृहासमोर आणल्या जातील. या खात्याचे मंत्री नवीन असल्याने भाजपने दोन वर्षे कळ काढली. मात्र या खात्यांचा कारभार पाहिल्यास हे मंत्री शिरजोर झाल्याचे दिसून येते. या दोन्ही खात्यांतील गैरव्यवहारांचा लेखाजोगाच सभागृहासमोर मांडला जाईल, असेही पर्रीकरांनी सांगितले.

बिबट्याचा डिचोलीत हल्ला: दोन जखमी

डिचोली, दि. ४ (प्रतिनिधी): डिचोली परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ माजवला असून, आज सकाळी वन गावकरवाडा येथील लक्ष्मी तुळशीदास गावकर व राजु कुंंदनवार यांच्यावर हल्ला करून हा बिबटा जंगलात पसार झाल्यामुळे एकच खळबळ माजली.
लक्ष्मी गावकर ही महिला आज सकाळी आपल्या घरात काम करीत असताना बिबट्याने तिच्यावर मागून मानेवर हल्ला चढवला, यावेळी गडबड होताच बिबटा बाजूच्या झुडपात लपला. याबद्दलची माहिती प्राणीमित्र अमृतसिंग यांनी पशू बचाव पथकाला कळविली, हे पथक लगेच दाखल झाले, त्यावेळी त्यातील राजू कुंदनवार याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याने जंगलात धूम ठोकली.
लक्ष्मी व राजू यांना "१०८'वाहनाने डिचोली आरोग्य केंद्रात आणण्यात आले. लक्ष्मी हिच्या जखमांची तीव्रता लक्षात घेऊन म्हापसा येथे आझिलो इस्पितळात हलविण्यात आले, तर प्राथमिक उपचारानंतर राजू यांना घरी जाऊ देण्यात आले.
डिचोली परिसरात सध्या खाण विस्ताराचे प्रमाण वाढत चालले असून वनक्षेत्राचे सपाणीकरण सुरू झाल्याने प्राण्यांच्या निवासी जागांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळेच बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी आता थेट लोकवस्तीत येत आहेत. गेल्या चार वर्षांत डिचोलीत तीन बिबट्यांना सापळा लावून पकडण्यात आले तर एकाने पिंजरा तोडून पलायन केले होते. बिबट्यांचा वाढता संचार ही डिचोलीवासीयांसाठी एक मोठी समस्या ठरली आहे.

यापुढे टपाल खात्याच्या परीक्षा गोव्यातच होणार

संतप्त भाजयुमो व शिवसेना कार्यकर्त्यांना संचालकांकडून आश्वासन
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): टपाल खात्याच्या गोवा विभागात जाहीर करण्यात आलेल्या टपाल / सॉर्टींग साहाय्यक पदांच्या सात जागा भरतीसाठी संगणक नैपुण्य व "एप्टीट्यूट' परीक्षेचे केंद्र सांगली येथे हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज गोवा टपाल विभागाच्या संचालक वीणा श्रीनिवास यांना घेराव घालण्यात आला.
या परीक्षा येत्या रविवार ६ रोजी होणार आहेत, त्यामुळे शेवटच्या क्षणी त्या रद्द करून परीक्षा केंद्र इथे हलवणे शक्य नाही. भविष्यात गोवा विभागाच्या परीक्षा या गोव्यातच होणार यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गोवा टपाल विभागात अलीकडेच टपाल / सॉर्टींग साहाय्यकपदांसाठी सात जागा घोषित झाल्या आहेत. या जागा भरण्यासाठीचे परीक्षा केंद्र सांगली येथे हालविण्यात आल्याने भाजयुमोचे अध्यक्ष रूपेश महात्मे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी श्रीमती वीणा श्रीनिवास यांना घेराव घातला. श्रीमती श्रीनिवास यांची याच महिन्यात नेमणूक झाली आहे, त्यामुळे त्यांना या एकूण प्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. आता ऐन वेळी परीक्षा रद्द करून ठिकाण बदलणे शक्य होणार नाही परंतु भविष्यात गोव्यासाठीची परीक्षा गोव्यातच होणार याची आपण खात्री देते असेही त्यांनीे सांगितले. गोवा विभागाअंतर्गत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगली विभाग येतो व गोवा हे या विभागाचे मुख्यालय आहे. यापूर्वी टपाल खात्यात जाहीर होणाऱ्या पदांसाठी परीक्षा गोव्यातच व्हायच्या परंतु यावेळी मात्र हे परीक्षा केंद्र सांगली येथे हलवण्यात आले आहे. गोवा विभागासाठी जाहीर झालेली सात पदे ही फक्त गोमंतकीयांना मिळावी,अशी मागणी यावेळी भाजयुमोनी केली. हे परीक्षा केंद्र इतरत्र हालवून या जागांवर गोव्याबाहेरील अन्य विभागाच्या उमेदवारांना भरती करण्याचाही डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, गोव्यातून या पदांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना आता सांगली येथे परीक्षेसाठी जाणे भाग पडणार आहे. गोवा टपाल खात्यात बहुतेक अधिकारी हे बाहेरील आहेत, त्यामुळे अशी पदे जाहीर झाल्यानंतर आपल्या सग्यासोयऱ्यांना व नातेवाइकांना भरती करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. गोवा हे स्वतंत्र राज्य असल्याने गोवा टपाल खात्याचा व्यवहारही स्वतंत्र करावा,अशी मागणीही यापूर्वी वारंवार झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात विविध परीक्षांसाठी हजर राहणाऱ्या इतर राज्यांतील उमेदवारांना यापूर्वी मनसेकडून मारहाण होण्याचे प्रकार घडले आहेत,अशावेळी गोमंतकीय उमेदवारांच्या सुरक्षेची हमी कोण देणार,असा सवालही यावेळी भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी केली. याप्रसंगी भाजयुमोचे उपाध्यक्ष रूपेश हळर्णकर, भगवान हरमलकर, दीपक नाईक, उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कळंगुटकर, खजिनदार दीपक म्हापसेकर, म्हापसा अध्यक्ष नरेश उसगांवकर, मडकई अध्यक्ष दिनेश वळवईकर, फोडा अध्यक्ष अपूर दळवी, सांस्कृतिक विभागाचे निमंत्रक सिद्धनाथ बुयांव, विद्यार्थी मंडळाचे सिद्धेश नाईक, सिद्धार्थ कुंकळ्ळेकर व इतर उपस्थित होते.
शिवसेनेचाही पाठिंबा
भाजयुमोने घातलेल्या घेरावानंतर तिथे गोवा राज्य शिवसेनेचे प्रमुख उपेंद्र गांवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचेही पदाधिकारी व कार्यकर्ते हजर झाले.त्यांनीही हीच मागणी लावून धरत गोव्यातील उमेदवारांसाठी गोव्यातच परीक्षा व्हायला हव्यात अशी मागणी केली.भाजयुमो व शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र झाल्याने याठिकाणी टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांवर मात्र बराच दबाव वाढला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस संरक्षणही मागवण्यात आले.उपनिरीक्षक तुषार लोटलीकर व राहूल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कुमक तैनात होती.

खाण लीज परवाने हे मोठे षडयंत्र

'उटा'चे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांचा आरोप
मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी): केपे तालुक्यांतील बाळ्ळी,मोरपिर्ला,बेतूल,बार्से या भागातील मिळून दोन हजारांवर हेक्टर टापूत खाणींच्या लीजना परवाने देण्यासाठी सुरू झालेली हालचाल म्हणजे तेथील संख्येने १०० टक्के असलेल्या अनुसूचित जमातीतील लोकांना देशोधडीला लावण्याचा कट आहे,असा आरोप माजी मंत्री तथा "उटा' चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी आज केला व बळजबरीने हे लीज दिले तर सेझविरोधी आंदोलनाची पुनरावृत्ती घडेल असे बजावले. यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की , या लीजसाठी हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ज्या अधिसूचना जारी झाल्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आहेत मग सरकारने या नोटिसांबाबत कानावर हात ठेवण्यात अर्थ तो काय राहतो. हे लीज दिले तर केपे तालुक्यांतील ९० टक्के भाग खाणी खाली जाईल व तेथील अनुसूचित जमातींतील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेतले जाईल व तालुक्याचा संपूर्णतः पर्यावरणीय ऱ्हास होईल.
आपण मागे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या खाण लीजचे प्रकरण उघड केल्यावर मुख्यमंत्र्यांनी नवीन खाणीचे लीज सरकार देणार नाही असा जो खुलासा केला आहे ती शुध्द फसवाफसवी आहे कारण राज्य सरकारने असे प्रस्ताव मंजूर केल्याशिवाय केंद्रीय खाण मंत्रालय ते पुढील सोपस्कारांसाठी पाठवीत नाही आणि या हरकती बाबतच्या अधिसूचना मुदत संपेपर्यंत आपल्या बॅगेत ठेवून नंतर ज्याअर्थी तलाठी संबंधित पंचायतींच्या सूचनाफलकावर लावतो त्याअर्थी या प्रकरणात कोणी तरी बडी असामी आहे हे उघड आहे. सरकारला अंधारात ठेवून कोणी या नोटिसा जारी केलेल्या असतील तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली. अन्यथा गोव्याबाहेरील कोणीतरी व्यक्ती इतक्या प्रचंड जमिनीत खाणींच्या लीजसाठी अर्जच मुळी कशी करू शकते असा सवाल केला.
या प्रश्र्नावर आता मोठी जनजागृती झालेली आहे व लोक संघटित झाले आहेत व त्यामुळे सेझविरोधी आंदोलनाप्रमाणे आंदोलन उभे राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. दरम्यान पोरपिर्ला, बाळ्ळी व बार्से पंचायतीच्या विशेष ग्रामसभा या मुद्द्यावर येत्या रविवारी होत आहेत व त्यांत आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असा कयास आहे.

पोलंडचा 'तोतया' राजदूत अटकेत

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यात सध्या तोतया अधिकाऱ्यांनी थैमान घातले असून पंजाबच्या बनावट पोलिस आयुक्तानंतर आज पणजी पोलिसांनी पोलंड देशाचा तोतया राजदूताला अटक केली आहे. हा बनावट राजदूत ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, त्याच हॉटेलमध्ये अनायासे खरे राजदूत पोचल्याने या तोतया राजदूताला गोवा पोलिसांच्या तुरुंगाची हवा खावी लागली. या तोतया राजदूताचे नाव संतोष के. महेशीका असे असून आज सकाळी त्यांना अटक केली. याविषयीची पोलिस तक्रार मुंबई येथील पोलंड देशाचे राजदूत जानुझ बायलिंस्की यांनी सादर केली होती. दरम्यान, काल अटक करण्यात आलेला तोतया पोलिस आयुक्ताला सात दिवसाची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार संतोष हा काही दिवसापूर्वी गोव्यात आला होता. त्यानंतर त्याने वायगिणी हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. यात त्याने आपण पोलंड देशाचा हैद्राबाद येथे असणारा राजदूत अशी नोंद केली. तसेच हॉटेलचे सर्व बिल आपल्या दूतावासात पाठवून देण्याचीही सूचना त्यांना केली होती. परंतु, २९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील खरा राजदूत जानुझ बायलिंस्की आला असता त्यांना आपलाच देशाचा अजून एका राजदूत या हॉटेलमध्ये उतरल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याने त्याची चौकशी केली असता त्याचा या दूतावासाशी कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले. याची आज सकाळी पोलिस तक्रार देण्यात आली. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक योगेश पेडणेकर करीत आहे.

Friday 4 December, 2009

'आय कांट लिव्ह'ला सुवर्णमयूर

भारतीय सिनेमा विश्वचित्रपट उद्योगावर अधिराज्य गाजवेल
दाक्षिणात्य सुपरस्टार मम्मुटी यांचा दृढ विश्वास

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): यंदाच्या इफ्फीतस्पर्धात्मक विभागामध्ये "आय कांट लिव्ह विदाऊट यू' या तैवानच्या चित्रपटाला प्रतिष्ठेचा सुवर्णमयूर प्राप्त झाला. सुवर्णमयूर स्मृतिचिन्ह व रोख चाळीस लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लियोन दाय यांनी व त्यांचे सहकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी असलेला रौप्यमयूर पुरस्कार "ए बॅ्रड न्यू लाइफ'या दक्षिण कोरिया तथा फ्रान्सची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक ऑनी लेकॉंत यांना प्राप्त झाला. स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड (विशेष परीक्षक मंडळ पुरस्कार) जॉर्ज ओव्हाशिवली यांना "द अदर बॅंक" या चित्रपटासाठी मिळाला. रौप्यमयूर व १५ लाख रुपये रोख असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. याप्रसंगी परीक्षक मंडळाचे अध्यक्ष जुवांव बातीस्ता दे आंद्रादे यांच्यासह केनिची ओकोबू,जीन मायकल फ्रोडन, सारिका व वीक सरीन उपस्थित होते. यंदा स्पर्धात्मक विभागात एकूण १५ चित्रपटांचा समावेश होता व त्यात "अग्शुमनेर चौबी'(बंगाली) व गाभ्रीचा पाऊस (मराठी) हे दोन भारतीय चित्रपटही होते. केंद्रीय मंत्री एस.जगतरक्षक, अभिनेते मम्मुटी व राज्यपाल डॉ.सिद्धू यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
भारतीय सिनेमाची डौलदार वाटचाल पाहता आगामी काळात भारतीय सिनेमा जागतिक सिनेमा उद्योगावर अधिराज्य गाजवेल यात शंकाच नाही, असा दृढ विश्वास सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते मम्मुटी यांनी व्यक्त केला.सिनेमा हा मानवी भावनांचा आविष्कार आहे. "इफ्फी'च्या निमित्ताने जगभरातील मानवी स्वभावांच्या विविध पैलूंचे विविध चित्रपटांतून दर्शन घडते,असेही ते म्हणाले.
चाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.याप्रसंगी राज्यपाल डॉ.एस. एस. सिद्धू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एस.जगदरक्षक , मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंग राणे, केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालक एस. एम. खान,अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री रती अग्निहोत्री व अनेक महनीय व्यक्ती हजर होत्या.
मम्मुटी म्हणाले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या महोत्सवाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून आयोजकांनी आपल्या गेल्या २८ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीचा यथोचित बहुमान केला आहे.भारतीय चित्रपटाचा दर्जा सुधारत असून त्यामुळे "ऑस्कर' पुरस्कारापेक्षा अशा चित्रपट महोत्सवातून होणारा सन्मान महत्त्वाचा ठरतो, असे आपले वैयक्तिक मत आहे. मात्र "ऑस्कर'ला आपण अजिबात कमी लेखत नाही..
एस.जगतरक्षक यांनी "इफ्फी' च्या आयोजनाचे कौतुक केले. हा महोत्सव वर्षानुवर्षे बहरत जाईल,असेही ते म्हणाले.
गोव्यात आता आंतरराष्ट्रीय दर्जाची "फिल्म सिटी' उभारणे गरजेचे बनले आहे.या "फिल्म सिटी'मुळे खऱ्या अर्थाने इथे आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या चित्रीकरणांना वाव मिळेल. शिवाय त्यामुळे स्थानिक चित्रपट उद्योगालाही नवी भरारी मिळेल, असे राज्यपाल डॉ.सिद्धु म्हणाले.
इफ्फीच्या यशस्वितेबद्दल केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालय व गोवा मनोरंजन संस्थेच्या सर्व सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.यंदा पहिल्यांदाच या महोत्सवासाठी "इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी' ची निवड केली नाही व ही जबाबदारी सर्वांनी यथोचितपणे उचलली, अशी माहिती त्यांनी दिली."इफ्फी'अंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला."टी-ट्वेंटी ऑफ इंडियन सिनेमा' ही अनोखी स्पर्धाही या महोत्सवाचे खास आकर्षण ठरली,असेही कामत म्हणाले.
गोवा मनोरंजन संस्थेच्या क्रिएटिव्ह कमिटीच्या अध्यक्ष अंजू तिंबले व रेड कार्पेट कमिटीचे अध्यक्ष आमदार बाबू कवळेकर यांच्या कामाचाही त्यांनी गौरव केला.गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, पणजी महानगरपालिका तसेच इतर सर्व संबंधित संस्थांनी हा इफ्फी यशस्वी होण्यासाठी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
यंदाच्या महोत्सवात मोठ्या प्रमाणात गोमंतकीय चित्रपट प्रदर्शित झाले यावरून राज्यात चित्रपट संस्कृती रुजत असल्याचे द्योतक आहे, असे ते म्हणाले. समारोपाचे सूत्रसंचालन सायली भगत व रोहित रॉय यांनी केले. एस. एम. खान यांनी आभार प्रकट केले.
------------------------------------------------------------------
मंत्री व आमदार गैरहजर
या समारोप सोहळ्यालाही सरकारातील मंत्री व आमदारांची गैरहजेरी जाणवली. साहजिकच तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) मात्र चांगली भरजरी साडी परिधान करून उपस्थित होत्या; तर "रेड कार्पेट'चे अध्यक्ष आमदार बाबू कवळेकर हजर होते. विरोक्षी आमदारांनीही या सोहळ्याकडे पाठच फिरवली होती. काही अपवाद वगळता बहुतेक मंत्री व आमदार फिरकलेही नाहीत.

६७ मछीमारांच्या कुटुंबीयांना सरकारने सोडले वाऱ्यावर...

पंधरवडा उलटला तरीही एक पैसा नाही!
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) : गोवा व महाराष्ट्रातील किनारी भागाला झोडपून काढलेल्या "फयान' वादळात राज्यातील मच्छीमार बोटींवरील ६७ बेपत्ता खलाशांचा पत्ता तर लागला नाहीच परंतु या बेपत्ता खलाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह आर्थिक मदतीचा एकही पैसा अद्याप मिळाला नसल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची जाहीर केलेली मदत ही केवळ या गरीब मच्छीमार बांधवांच्या कुटुंबीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार होता की काय, असा सनसनाटी आरोप विरोधी भाजपने केला आहे.
गेल्या ११ नोव्हेंबर रोजी गोवा व महाराष्ट्रातील किनारी भागाला "फयान' वादळाने झोडपून काढले होते. महाराष्ट्रातील कोकण भागाप्रमाणे गोव्याच्या किनारी भागालाही या वादळाचा फटका बसला. या वादळात सर्वांत मोठे नुकसान मच्छीमारांना झाले. राज्यातील अशा नैसर्गिक आपत्तीत एकाच वेळी ६७ मच्छीमार बेपत्ता होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना होती. मच्छीमार खाते व वेधशाळा यांच्यातील सुसंवादाच्या अभावामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडल्याचा आरोप यापूर्वी भाजपने केला होता. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी मच्छीमारमंत्री ज्योकीम आलेमाव, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा व आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या समवेत खास पत्रकार परिषद घेतली व बेपत्ता मच्छीमारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये सानुग्रह आर्थिक मदतही जाहीर केली. तात्काळ मदत म्हणून त्यांना सुरुवातीला ५० हजार रुपये देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बेती येथील मांडवी मच्छीमार सोसायटीकडून ३८ व कुठबंण मच्छीमार सोसायटीकडून २९ अशा पद्धतीने मच्छीमार खात्याकडे एकूण ६७ बेपत्ता मच्छीमारांची यादी पाठवण्यात आली. ही यादी सरकारला सुपूर्द करून आता पंधरवडा उलटला तरी या बिचाऱ्या बेपत्ता खलाशांच्या कुटुंबीयांच्या हातात अद्याप एकही पैसा मिळालेला नाही. सोसायटीकडून या मदतीचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे पण मुख्यमंत्री साहाय्य निधीत अपुरा पैसा असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे उत्तर मच्छीमार खात्याकडून देण्यात येत असल्याची माहिती मांडवी सोसायटीचे अध्यक्ष मेनिनो अफोन्सो व कुठबंण सोसायटीचे अध्यक्ष पेट्रीक डिसिल्वा यांनी दिली. या बेपत्ता खलाशांचे कुटुंबीय बिचारे मदतीसाठी हेलपाटे घालीत आहेत पण त्यांना नेमके काय सांगावे अशी चिंता निर्माण झाल्याची माहिती यावेळी श्री.आफोन्सो यांनी दिली.
नुकसानीचाही अहवाल अद्याप तयार नाही
दरम्यान,या वादळात मच्छीमार व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम मच्छीमार खाते व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते पण याबाबतीत काहीच हालचाली झाल्या नसल्याची माहिती सोसासटींकडून देण्यात आली.जिथे बेपत्ता खलाश्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत तिथे मच्छीमार व्यावसायिकांना सरकार कशी मदत करणार,असा सवालही यावेळी पुसण्यात आला.
मानवतेला काळिमा फासणाराच प्रकार
गोव्यातील मच्छीमार व्यावसायिकांकडे कामाला असलेल्या सुमारे ६७ खलाश्यांचा वादळात सापडून मृत्यू होतो व आता पंधरवडा उलटला तरी त्यांच्या कुटुंबीयांना साधा एक पैसाही मिळत नाही ही अत्यंत शरमेची गोष्ट आहेच पण त्याहूनही मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार असल्याची टीका भाजपने केली आहे. हे खलाशी गोमंतकीय नाहीत हे जरी खरे असले तरी ते भारतीय आहेत व विशेष म्हणजे गोव्यातील मच्छीमार व्यावसायिकांचा व्यवसाय या मच्छीमारांवरच अवलंबून आहे,असेही यावेळी सांगण्यात आले. मुळातच ही जीवितहानी घडण्यास वेधशाळा व मच्छीमार खात्याची बेपर्वाई कारणीभूत आहेच. मुख्यमंत्री कामत यांनी मोठ्या दिमाखात सानुग्रह मदत घोषित केली पण तो केवळ एक फुसका बार ठरला. नैसर्गिक आपत्तीत बळी गेलेल्या खलाश्यांबाबत सरकारची ही कृती म्हणजे या मच्छीमार बांधवांच्या कुटुंबीयांची केलेली थट्टाच असल्याचा आरोपही यावेळी भाजपने केला आहे.

मजुराच्या खूनप्रकरणी पोलिस तपास जारी

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) : ताळगाव येथे महादेव या मजुराची निर्घृण हत्या करणारा खुनी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नसून कालपासून पोलिसांनी या परिसरातील अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्रत्येक संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तीला पोलिस स्थानकावर बोलावून त्याची चौकशी सुरू केल्याने त्यांचे कुटुंबीयही पोलिस स्थानकात हजेरी लावत असल्याने दुपारपासून पोलिस स्थानकात बरीच गर्दी जमत होती. मात्र येत्या काही तासांत खरा खुनी हाती लागणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
परवा रात्री ताळगाव येथील प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूस झोपलेल्या महादेव या मजुराच्या डोक्यावर अवजड हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. तसेच त्याने पांघरण्यासाठी घेतलेल्या चादरीला आग लावून मृतदेह जाळण्यांचाही प्रयत्न केला होता. महादेव याचा झोपण्याचा कुठचे एकच ठिकाण नव्हेत. तर, मिळेल त्या ठिकाणी तो झोपत होता. त्यामुळे त्याचा माग काढून खून कोणी आणि कशासाठी केला असावा, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. महादेव याने भयंकर काही पाहिले नव्हते ना, त्यासाठी त्याचा काटा काढला नाही ना, असे अनेक प्रश्न तपास यंत्रणेच्या समोर उभे आहेत. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस करीत आहे. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

तोतया 'एसीपी' झाला गोव्यात 'चतुर्भुज'

प्रेयसीच्या वडिलांनाच लाखो रुपयांना गंडा
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) : पंजाब पोलिसांत साहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी)असल्याचा बहाणा करून आपल्याच प्रेयसीच्या पित्याला लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या हिमाचल प्रदेश येथील मुकेश शर्मा या २१ वर्षीय तरुणाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. पणजीतील एका गेस्ट हाऊसमध्ये हा तोतया पोलिस अधिकारी आपल्या प्रेयसीबरोबर राहात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
सदर तरुणी गोव्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असून तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याविषयी मुलीच्या वडिलांनी पणजी पोलिसांत तक्रार सादर केली होती. तसेच संशयित मुकेशने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची सहीची नक्कल करून बनवलेली बनावट प्रमाणपत्रेही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. मुकेशला चौकशीसाठी काल रात्री ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याने आपण गोव्यात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी खास मोहिमेवर आल्याचे सांगितले. तथापि, त्याचे बोलणे संशयास्पद वाटल्याने पोलिस स्थानकावर आणून त्याची "खास' चौकशी करण्यात आली आणि सत्य उघडकीस आले. गेल्या ऑगस्टपासून मुकेशने आपल्या प्रेयसीबरोबर सदर गेस्टा हाऊसमधे तळ ठोकला होता. तसेच आपण पोलिस आयुक्त असल्याचे सांगून गेस्ट हाऊसमध्ये आपला वचकही निर्माण केला होता.
'ओर्कुट' ते गोवा...
उपलब्ध माहितीनुसार मुकेश व ती मुलगी यांची ओळख "ओर्कुट'वर झाली व प्रेमही जुळले. सुरुवातीला मुकेशने आपण पोलिस निरीक्षक असल्याची बतावणी केली. त्यामुळे तिने त्याच्यावर जरा जास्तचविश्वास ठेवला. काही महिन्यांनी तिने त्याला भेटीसाठी गोव्यात बोलावले. गोव्यात येताना मुकेश पंजाब पोलिस खात्याचा साहाय्यक पोलिस आयुक्त बनून आला. मग त्याने आपल्या प्रेयसीच्या पित्यालाच फोन करून लाखो रुपये उकळले. तसेच आपण दहशतवादविरोधी मोहिमेत व्यस्त असून तुम्हालाही यात गुंतवू शकतो, अशी धमकी दिली.
'कोब्रा'ने तोडले अकलेचे तारे...
सुरुवातीला काही पैसे दिल्यानंतर हा खराच पोलिस अधिकारी आहे का, हे जाणून घेण्यासाठी सदर मुलीच्या पित्याने "कोब्रा' या खाजगी सुरक्षा आणि गुप्तचर संस्थेकडे त्याच्यासंदर्भात माहिती मिळवण्याचे काम सोपवले. त्यासाठी या संस्थेला दहा हजार रुपयेही देण्यात आले. काही दिवसांनी "कोब्रा'च्या गुप्तचरांनी तो खरोखरच पंजाब पोलिसांत "एसीपी' असल्याचे सांगितले. ही माहिती पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. त्यामुळे "कोब्रा'च्या अधिकाऱ्यांना पोलिस चौकशीसाठी उद्या बोलावण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहाणपणा नडला...
पोलिस अधिकारी असूनही आपल्याकडे पैसे मागत असल्याने त्या मुलीच्या पित्याचा संशय बळावला. त्यांनी काल पणजी पोलिसांत तक्रार सादर केली. त्यानुसार रात्री त्या गेस्ट हाऊसवर छापा टाकून प्रेयसीसह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक प्रज्योत फडते करीत आहेत.

भय इथले संपत नाही...

जगातील अनेक शहरे "भोपाळ' च्या मार्गावर!
नवी दिल्ली, दि. ३ : 'त्या' घटनेला तब्बल २५ वर्षे लोटली.. तरीही आठवणी सरत नाहीत. किंबहुना, अधिक तीव्रतेने दिवसागणिक त्या ताज्या होत जातात आणि तितक्याच तीव्रतेने मन पिळवटून टाकतात. अशी स्थिती भोपाळ वायू गळती कांडातील प्रत्येक पीडिताच्या आप्तांची आहे. जे स्वत: यातून सुदैवाने बचावले त्यांच्या गर्भातील नव्या पिढीने मात्र पोटाबाहेर येताच या घटनेच्या आठवणींच्या रूपात कायमस्वरूपी अंपगत्व सोबत आणले आणि बचावलेल्यांना पुढे आयुष्यभर या घटनेचे न मिटणारे चिन्ह दिले. भोपाळ म्हटले की वायू गळती आठवावे इतका या घटनेचा घनिष्ट संबंध जोडला गेला आहे. आजही जगातील अनेक शहरांवर भोपाळसारखा गॅस गळतीचा धोका संभवतो आणि संबंधित देशांनी यासाठी प्रतिबंधात्मक उपायही केलेत पण, इतक्या या भीषण घटनेतून आजही भारत सरकारने कोेणताही बोध घेतलेला नाही. भारतातील अनेक शहरांवर असणाऱ्या या संभाव्य धोक्यातून बचावासाठी कोणत्याही उपाययोजनांचा पुढाकार घेतलेला दिसत नाही. एवढेच नव्हे तर त्या घटनेतील पीडितांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?
वायू गळती घटनेतील पीडितांच्या अधिकारांसाठी भोपाळ ग्रूप फॉर इन्फॉर्मेशन ऍण्ड ऍक्शन ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या सदस्य रचना धिंग्रा यांनी सांगितले की, जगातील अनेक शहरे भोपाळ बनण्याच्या मार्गावर आहेत. पण, फरक इतकाच आहे की, त्या-त्या देशातील प्रशासनांनी प्रतिबंधात्मक उपायांसाठी आवश्यक तो पुढाकार घेतला आहे. ते पुरेसे जागरूक आहेत. भोपाळ कांडापासून त्यांनी धडा घेतला आहे. भारत सरकारने या घटनेपासून केवळ आपली जबाबदारी कशी झटकता येईल, एवढीच शिकवण घेतली. आजही गॅस गळती पीडितांच्या रहिवासी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही.
गॅस गळतीतून बचावलेले लोक प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजारांना बळी पडत आहेत. जगात अशी अनेक शहरे आहेत जिथे भोपाळसारख्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही. पण, तिथे उपायांकडे पूर्ण लक्ष दिले जात आहे. असेच एक स्थान आहे "ब्लॅक ट्रॅंगल'. जर्मनीतील मॅक्स प्लांक इन्स्टिट्युट फॉर केमेस्ट्रीने आपल्या संशोधनात सांगितले आहे की, पोलंड, जर्मनी आणि चेक सीमेनजीकचा हा परिसर लिग्नाईटच्या खाणींनी भरलेला आहे. येथे भूरकट रंगाच्या कोळशाचे खनन केले जाते. याशिवाय या क्षेत्रात सात ऊर्जा प्रकल्प आहेत. त्यातून हजारो वॅट वीजेेची निर्मिती होते.
या दोन्ही उपक्रमांमधून रासायनिक वायूंच्या गळतीचा धोका असल्याचे सिद्ध झाले आहे. पण, हा धोका ओळखून तिन्ही देशांनी संयुक्तपणे यावर काम सुरू केले आहे. याअंतर्गत ऊर्जा प्रकल्प आणि हिटींग तंत्राच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यात आली. त्याचे चांगले परिणामही त्यांना मिळू लागले आहेत. त्यामुळेच या परिसरात हानिकारक घटकांच्या उत्सर्जनाचा दर झपाट्याने कमी होतो आहे.
भोपाळसारखाच धोका बेेल्जियममधील मोसा घाटी, मेक्सिकोतील पोज्झा रिका आणि युक्रेनमधील चरनोबिल येथेही दिसतो आहे.
पीडितांचे आंदोलन
भोपाळ वायू गळती कांडाला २५वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यातील पीडितांचे आप्त आणि बचावलेले नागरिक यांनी आज भोपाळमध्ये मोठा मोर्चा काढून निदर्शने केली. अजूनही नुकसानभरपाई न मिळालेले हजारो लोक यात सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात त्या घटनेच्या वेदना स्पष्टपणे दिसत होत्या.
३ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळमधील युनियन कार्बाईडच्या प्रकल्पातून भीषण मिथेन गॅसची गळती झाली. यात सुमारे १५ हजार लोक दगावले तर पाच लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले. कित्येक वर्षांनंतरही या घटनेचे प्रतिकूल परिणाम जन्माला येणाऱ्या नव्या पिढीतील विविध व्यंगांच्या रूपात दिसतच आहेत.
ही घटना हृदय हेेेलावणारी होतीच. पण, पीडितांना २५ वर्षांनंतरही नुकसानभरपाई मिळू नये, ही बाब लज्जास्पद आहे. त्या प्रत्येक पीडिताचे दु:ख आपल्याला कायम छळणार असल्याचे उद्गार लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी काढले. सोबतच आज लोकसभेत पीडितांविषयीच्या आपल्या प्रतिबद्धतेला दर्शविणारे विधेयकही पारित झाले.
पुन्हा आश्वासनच...
भोपाळ वायू गळतीच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत पीडितांविषयी शोक संवेदना व्यक्त करण्यात आली. राज्यसभेत अध्यक्ष हामीद अन्सारी यांनी, या घटनेचे व्रण आजही प्रभावित लोक आणि अपंगत्व घेऊन जन्मलेल्या मुलांच्या रूपाने ताजे आहेत, असे सांगितले. ही एक अशी घटना होती त्यामुळे संपूर्ण जगच स्तब्ध झाले होते. या घटनेतील पीडितांना मदत देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यांना ठराविक मुदतीत आवश्यक ती मदत दिलीच पाहिजे, असेही ते म्हणाले. माकपाचे सीताराम येचुरी यांनी तर या घटनेतील पीडितांकडे दुर्लक्ष करणे हा गुन्हाच असल्याचे म्हटले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मात्र सालाबादाप्रमाणे यंदाही पीडितांना दिले मदतीचे फक्त आणि फक्त आश्वासनच....!

ग्रॅमी पुरस्कारासाठी रहमानचे नामांकन

लॉस एंजिल्स, दि.३ : ऑस्कर विजेते भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांचे "स्लमडॉग मिलेनियर'मधील दोन गाण्यांसाठी ग्रॅमी पुरस्कारात नामांकन झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत जगतात ग्रॅमी हे सर्वोच्च मानाचे पुरस्कार मानले जातात. २०१० च्या ग्रॅमी पुरस्कारासाठी रहमानच्या दोन गीतांचे नामांकन झाले आहे. त्यांच्या "जय हो' या गाण्याला "बेस्ट कम्पाईलेशन साऊंड ट्रॅक अल्बम फॉर मोशन पिक्चर' या श्रेेेणीत नामांकन मिळाले आहे.
गुलजार यांनी लिहिलेल्या "जय हो' या गीताला नामांकनाच्या शर्यतीत ब्रूस स्प्रिंगस्टीनचे शीर्षक गीत, कॅडिलेक रेकॉर्डस्चे "वन्स इन ए लाईफटाईम', ट्विलाईटचे गीत "डीकोड' आणि "द मुव्ही' चित्रपटाचे गीत "द क्लाईंट' यांच्याशी सामना करावा लागणार आहे. ग्रॅमी पुरस्कारांचे वितरण लॉस एंजिल्स येथील स्टेपल सेंटर येथे ३१ जानेवारी रोजी केले जाणार आहे.

Thursday 3 December, 2009

माशेलात चार मंदिरे फोडली तीन लाखांचा ऐवज लंपास


माशेल, दि. २ (प्रतिनिधी): माशेल येथील प्रसिद्ध चार मंदिरे चोरट्यांनी फोडून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविला. मंगळवारी रात्री पोलिस चौकीच्या २५ मीटर अंतराच्या परिसरातील श्रीशांतादुर्गा वेर्लेकरीण, श्री लक्ष्मी रवळनाथ, श्री गजांतलक्ष्मी व अत्री गोत्री पुरुष मंदिर अशी चार मंदिरांच्या दरवाजांची कुलुपे तोडण्यात आली. चारही मंदिरांच्या दरवाजांची कुलुपे एकाच पद्धतीने तोडण्यात आली. यात श्री गजांत लक्ष्मी मंदिरातील देवीचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची उत्सवमूर्ती व छत्री असा सुमारे अडीच लाख रुपयांचा तर पुरुष मंदिरातील रुप्याची प्रभावळ, चांदीचे दोन मुखवटे व छत्री असा सुमारे ६० हजारांचा ऐवज चोरण्यात आला.
एकाच वेळी एकाच परिसरातील मंदिरे फोडण्याची माशेलमधील ही पहिलीच घटना आहे. श्री वेर्लेकरीण मंदिरांची काही कुलुपे तोडून आत जाण्यापलीकडे चोरटे काही करू शकले नाहीत. गर्भकुडीच्या दरवाजाची कुलूप व्यवस्था आतून चांगली असल्यामुळे बाहेर असलेल्या टेबलाच्या खणातील चोरट्यांनी अंदाजे ५०० ते ६०० रुपये लांबविले तर श्री लक्ष्मी रवळनाथ मंदिराची कुलूप व्यवस्था चोख असल्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
यापूर्वी याच देवस्थानच्या मागे असलेल्या नीलेश शिरोडकर यांच्या कालिका ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकानावर भरदिवसा दरोडा घालण्यात आला होता. श्री. शिरोडकर यांच्या प्रसंगावधानामुळे त्यावेळी तो दरोडा फसला होता. तद्नंतर माशेल - खांडोळा परिसरात लहान - सहान चोरीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घटनांत परप्रांतीय कामगार लोकांचा संशय ग्रामस्थांना येत असून माशेल परिसरातील परप्रांतीय कामगार लोकांची पोलिसांनी कडक तपासणी करावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच लवकरात लवकर पोलिस स्थानक व्हावे, अशी अपेक्षा करीत आहेत.
चारही मंदिरांचे पुरोहित आज (बुधवार) सकाळी नित्य पूजेसाठी मंदिराकडे आल्यानंतर त्यांना दरवाजांची कुलुपे तोडण्यात आल्याची दिसली. तात्काळ त्यांनी आपआपल्या देवस्थान समितीला याबद्दल कळविल्यानंतर समितीतर्फे रीतसर फोंडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पोलिस पथकासह घटना स्थळांना भेट देऊन पंचनामा केला. यावेळी त्यांनी आणलेल्या गुन्हा शोधक कुत्र्यांचा उपयोग झाला नाही. पुढील तपास फोंडा पोलिस करीत आहेत.

पाचशे बांधकामे पाडणार

'सीआरझेढ'उल्लंघनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): किनारा नियमन विभाग (सीआरझेड) अंतर्गत येणाऱ्या बांधकामावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावल्याने आता गोव्यात किनाऱ्यांवरील "सीआरझेड' चे उल्लंघन करून बांधलेली सुमारे ५०० बांधकामे पाडण्याची जय्यत तयारी उत्तर व दक्षिण गोव्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. "सीआरझेड' १९९१ च्या अधिसूचनेचे निर्देश न पाळलेल्या सर्व बांधकामांवर कारवाई होणार आहे. किनाऱ्यांवरील ही बहुतेक बांधकामे राजकीय आश्रयाने उभी राहिलेली आहेत तसेच येथील मोठमोठे हॉटेल तथा इतर व्यापारी प्रकल्पांत थेट राजकीय नेत्यांचे हित जपलेले असताना सरकार नेमके कशा पद्धतीने या बांधकामांवर कारवाई करते हेच पाहावे लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर काल १ रोजी उत्तर व दक्षिण गोव्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी बैठकी घेतल्या. उत्तर गोव्याचे उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये व दक्षिण गोव्यातील उपजिल्हाधिकारी संजीव देसाई यांनी आपापल्या जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून याविषयावर चर्चा केली. या बैठकीत किनारी भागांत "सीआरझेड' अधिसूचनेची पायमल्ली केलेल्या बांधकामांची यादी संबंधित पंचायतींकडून मागवण्यात आली. उत्तर गोव्याच्या यादीत सुमारे ३५० बांधकामांचा समावेश होतो, अशी माहिती साबाजी शेट्ये यांनी दिली. दक्षिणेत सुमारे १५० बांधकामांचा यादीत समावेश करण्यात आल्याचीही खबर आहे. उत्तर गोव्यातील बैठकीला पेडणे, बार्देशचे मामलेदार, बार्देशचे गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते व वीज खात्याचे कार्यकारी अभियंते, हणजूण, कळंगुट व मोरजीचे सरपंच हजर होते. उत्तरेत विशेष करून हरमल, मोरजी, हणजूण व कळंगुट या चार किनारी पंचायतीतील बांधकामांचा या यादीत समावेश होतो. दक्षिणेत एकूण नऊ किनारी पंचायतींना या आदेशाचा फटका बसणार आहे. त्यात पैंगिण, लोलये, वेळसांव, केळशी, वार्का, बाणावली, बेताळभाटी, उतोर्डा, माजोर्डा, आरोशी, कासावली, सेर्नाभाटी व इतर किनारी भागांचा समावेश आहे. दरम्यान, या बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाईबाबतचे वेळापत्रकच सादर करण्याचे आदेश खंडपीठाने जारी करून आठ आठवड्यांची मुदतच दोन्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने त्यांच्याकडून कारवाईच्या वेळापत्रकाचा अहवालाच न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे.
हणजूण व कळंगुट पंचायत न्यायालयात दाद मागणार
उत्तर गोव्यात हणजूण व कळंगुट पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात "सीआरझेड' चे उल्लंघन झाले आहे. हणजूणात सुमारे २२० तर कळंगुट पंचायतीत शंभराहून जादा बेकायदेशीर बांधकामे किनारी भागांत उभी राहिली आहेत.या पंचायतींकडून अद्याप बांधकामांची यादी देण्यात आली नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी साबाजी शेटये यांनी दिली.या पंचायतींनी उच्च न्यायालायाकडे या आदेशाविरोधात दाद मागण्याची तयारी केल्याचेही ते म्हणाले.
पंचायत संचालकांचीही तारांबळ
विविध पंचायतींकडून "सीआरझेड' चे उल्लंघन केल्याप्रकरणी जारी करण्यात आलेल्या नोटिशींना संबंधितांनी पंचायत संचालकांकडे आव्हान दिले आहे. ही प्रकरणे सध्या पंचायत संचालकांकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांवर तात्काळ सुनावणी घेऊन ती हातावेगळी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जारी केले आहेत.या बांधकामांवर कारवाई सुरू होण्यापूर्वी एकही प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित राहता कामा नये,असे बजावून त्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

न्यायालयीन कोठडीतच बेंग्रे मोबईल वापरत होता

पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती उघड
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे न्यायालयीन कोठडीत मोबाईल वापरत होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली असून त्यामुळे तुरुंग यंत्रणा कशी ढिसाळ व कुचकामी बनली आहे यावर झगझगीत प्रकाश पडला आहे.
अश्पाक याला पोलिस कोठडीत घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली असता ही माहिती अधिकृतरीत्या उघड झाली आहे. पोलिस महानिरीक्षक रवींद्र यादव यांनी काल सायंकाळी सुमारे दोन तास त्याची कसून चौकशी केली .
बेंग्रेने कोठडीतूनच मोबाईलद्वारे एका व्यक्तीशी संपर्क साधून बिच्चू न्यायालयात कधी येणार याची माहिती मिळवली होती. तसेच, बिच्चूचा काटा काढण्यासाठी सहा महिन्यापूर्वी "नूर' या गुंडाला सुपारी दिली होती, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी दिली. गुन्हेगारी विश्वात आपला दरारा कायम ठेवणे हाही या हल्ल्यामागील त्याचा उद्देश होता, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
'नूर'ने दगा दिला...
खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली आश्पाक तुरुंगात पोचल्याने खंडणीचा धंदा "नूर' आणि "बिच्चू' सांभाळू लागले. दिवसभरात या दोघांकडे हातात खंडणीची रक्कम "जमा' होत होती. त्यावर आश्पाकचा कोणताही अधिकार उरलेला नव्हता व त्या जाणिवेने कोठडीत असलेला आश्पाक अस्वस्थ झाला होता. म्हणून सहा महिन्यांपूर्वी "नूर'ला आश्पाकने वास्को येथील न्यायालयीन कोठडीत बोलावून घेतले आणि तेव्हाच बिच्चूचा "गेम' करण्याची सुपारी त्याने त्याला दिली होती. काम फत्ते होईल, अशी हमी देऊन परतलेल्या "नूर' ने मग बिच्चूशी हातमिळवणी केली. तसेच, ठरलेला कट त्याच्यासमोर उघड करून त्याच्याकडूनही पैसे घेऊन शेजारील राज्यात तो पसार झालासुद्धा. गेल्या काही महिन्यापासून "नूर'आपला मोबाईलही घेत नाही, असे आश्पाकने पोलिसांना सांगितले आहे.
रमेशला आश्पाकचा गुरुमंत्र..
"नूर' पळाल्याची माहिती मिळाल्यावर त्याच कोठडी असलेल्या रमेश दलवाई याच्याशी आश्पाकने मैत्री केली. "गुन्हेगारी जगतात तुझे "नाव' व्हायचे असेल तर, मी सांगतो तसे कर आणि तसे केले तर खंडणीची रक्कमही जास्त मिळेल..' असा "गुरुमंत्र' देऊन बिच्चूचा भर न्यायालयाच्या बाहेर काटा काढण्याची सुपारी आश्पाकने त्याला दिली. त्यासाठी पन्नास हजार रुपयांची बोली ठरली. रमेशने त्याला होकार दिल्याने आश्पाकने बिच्चू न्यायालयात कधी येणार आहे, याची माहिती रमेशला पुरवली.
पर्यटकांची लुबाडणूक..
गुजरातहून येणाऱ्या तरुण पर्यटकांना ही टोळी लक्ष्य करीत होती. तसेच बिगर गोमंतकीय लोकांचे अपहरण करून खंडणी उकळणे, असे धंदेही सदर टोळी करीत होती. तसेच गोमेकॉ व त्या परिसरातील मुली पुरवण्याचे आमिष दाखवून पर्यटकांना हजारो रुपयांना आश्पाक आणि बिच्चूची यांची टोळी लुबाडत होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ताळगाव येथे मजुराचा खून

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): ताळगाव येथे शिक्षणमंत्र्याच्या बंगल्याशेजारी असलेल्या प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस एका कामगाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
आज सकाळी शाळेत मुले गेली असता रक्तबंबाळ अवस्थेत महादेव (४५) या मजुराचा मृतदेह आढळून आला. याविषयीची माहिती पोलिसांना देताच पंचनामा करून मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून देण्यात आला. तर, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. याच शाळेत आधी ताळगाव पोलिस ठाणे होते. घटनास्थळी रक्ताचे डाग पडलेले असून मयताच्या चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार करून त्याच्या अंगावर असलेल्या चादरीसह आग लावण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात त्याचे शरीर भाजले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधिक माहितीनुसार, महादेव हा ताळगाव बाजारात मोलमजुरी करून जगत होता. रात्रीच्यावेळी तो दारूच्या नशेत असायचा. तसेच मिळेल त्याठिकाणी झोपायचा. काल रात्री तो ताळगाव प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूला झोपला होता. यावेळी कोणी अज्ञाताने त्याच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार प्रहार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. कोणताही संपत नसलेल्या या मजुराचा कोणी आणि कशासाठी एवढा निर्घृणपणे खून केला असावा, याचा शोध पोलिस घेत आहेत.
घटनास्थळी महादेवचे चप्पल आढळून आले आहे. तसेच अंगावर असलेल्या चादरीमुळे शरीराचा खालील भाग काही प्रमाणात भाजला असल्याचे पोलिसांनी सांगितले. महादेवाच्या कुटुंबीयाची कोणतीच माहिती या परिसरातील व्यक्तींना नाही. त्याचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून अद्याप शवचिकित्सा करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या खून प्रकरणाचा अधिक तपास पणजी पोलिस करीत आहे.

आज 'इफ्फी'चा समारोप मम्मुटीची खास उपस्थिती


पणजी, दि.२ (प्रतिनिधी): ४० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता उद्या ३ रोजी होणार आहे. संध्याकाळी ४ वाजता येथील कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारोप समारंभाला दाक्षिणात्य सुपरस्टार मम्मुटी हे खास अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यावेळी उत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर व रौप्य मयूर पुरस्कारांचीही घोषणा केली जाईल.
गेल्या २३ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या सोहळ्याचा उद्या ३ रोजी शेवटचा दिवस असेल.कला अकादमीत आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत, चित्रपट संचालनालयाचे संचालक एस.एम.खान,मुख्य सचिव संजय श्रीवास्तव तसेच विविध देशांतून आलेले प्रतिनिधीही हजर राहणार आहेत.या सोहळ्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

रेणुका चौधरी यांचे कार्यालय जाळले

हैदराबाद,दि. २ : वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी आंध्र प्रदेशात आंदोलन करणाऱ्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांच्या कार्यालयावर हल्ला करून आग लावली. हैदराबादपासून २०० किमी अंतरावर खम्माम येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. कार्यालयाचे दार आणि खिडक्या फुटल्या असून टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल टाकून कार्यालय जाळल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. तेलंगणा राष्ट्र समिती वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. कार्यालयाला आग लावल्यानंतर कार्यकर्ते पळून गेले असून सुरक्षा अधिकाऱ्यांनी आगवर नियंत्रण मिळवले आहे.
तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या अटकेचा निषेधात हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. आमरण उपोषणासाठी बसलेले राव यांना पोलिसांनी रविवारी अटक करून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. मात्र राव यांनी खम्माम येथील जेलमध्येही उपोषण सुरु ठेवले होते. नंतर राव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेही त्यांनी उपोषण सुरुच ठेवले आहेत. कॉंग्रेसच्या माजी खासदार रेणुका चौधरी या वेगळ्या तेलंगणाच्या मागणीच्या विरोधात आहेत.

Wednesday 2 December, 2009

देशात महागाई शिगेला संसदेत केंद्राची प्रथमच कबुली

नवी दिल्ली, दि. १ : जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव हा चिंतेचा विषय असून, या महागाईने सर्वसामान्यांना सर्वाधिक झळ पोहोचते आहे, अशी कबुली देतानाच केंद्र सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हे आश्वासन दिले. ते म्हणाले की, महागाईचा मुद्दा चिंताजनकच आहे आणि त्यामुळे सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही स्थिती डाळी, साखर आणि खाद्यतेल यांच्या टंचाईमुळे निर्माण झाली आहे. महागाई नियंत्रणात आणायची असेल तर खाद्यान्नांच्या सार्वजनिक वितरणाकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. डाळींचे उत्पादन फारच थोड्या देशांमध्ये होते. त्यात पाकिस्तान, बांगलादेशसारख्या देशांचा समावेश आहे. त्यांच्याकडे उत्पादित डाळींपैकी बहुतांश खप तेथेच होतो. त्यामुळे अन्य देशांना ती निर्यात करण्यासाठी वाव राहात नाही. साखरेची उपलब्धता १६ दशलक्ष टनांची आहे. पण, मागणी २३ दशलक्ष टनांची आहे. अशीच काहीशी स्थिती खाद्यतेलाबाबतही आहे. महागाई कमी करायची असेल तर या सर्व वस्तूंच्या सार्वजनिक वितरणाकडे लक्ष पुरविले पाहिजे, असेही मुखर्जी म्हणाले.
प्रणवदा चिडतात तेव्हा...
राज्यसभेत प्रणव मुखर्जी महागाईच्या मुद्यावर बोलत असतानाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वृंदा करात यांनी त्यांच्या बोलण्यात अडथळे आणले. या प्रकाराने मुखर्जी यांचा पारा चढला आणि त्यांची वृंदा करात यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. राज्यसभेत प्रणवदा पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. मुद्दा महागाईचा असल्याने ते विश्लेषण करून सांगत होते. साखरेची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याचे त्यांनी म्हणताच वृंदा करात यांनी प्रणवदांच्या बोलण्यात हस्तक्षेप केला. सरकार साखरेचा पुरवठा करण्यासाठी काय करीत आहे, अशी विचारणा केली.
मी उत्तर देत असलेला प्रश्न तुम्ही विचारलेला नाही. अशा स्थितीत तुम्ही हस्तक्षेप करू नका, असे मुखर्जी यांनी करात यांना ठणकाविले. तरीही डाव्या पक्षाचे सदस्य उभे राहून बोलू लागले. या प्रकाराने मुखर्जी चिडले आणि जागेवर बसले. माकप सदस्य करीत असलेला प्रकार बेशिस्तीचा असून अशा वातावरणात मी उत्तर देणार नाही, असेही त्यांनी ठणकाविले. त्यांनी वृंदा करात आणि सीताराम येचुरी यांना शिस्तीचे धडेही दिले. या प्रकाराने सभागृहातील वातावरण काही वेळासाठी तापले होते.

नकली पिस्तूल व बॉम्बच्या धाकाने बॅंक लुटण्याचा प्रयत्न

डिचोलीत भर दुपारी थरारनाट्य
डिचोली, दि. १ (प्रतिनिधी): डिचोली येथील स्टेट बॅंकेच्या शाखेत बॉम्बसारखी दिसणारी वस्तू ठेवून आणि कॅशियरवर नकली पिस्तूल रोखून पाच कोटींची मागणी करणाऱ्या एका माथेफिरूने आज गोंधळ माजविला. बॉम्बस्फोट घडवून इमारत उडवून देण्याच्या त्याच्या धमकीने बॅंक परिसरात भर दुपारी एकच खळबळ उडाली.
आज दुपारी एकच्या दरम्यान येथील एका बेकरीत काम करणारा कर्मचारी नारायण शंकर यादव (मूळ बेळगावचा) स्टेट बॅंकेत कॅशियरच्या केबिनमध्ये गेला व त्याने पिण्यासाठी पाणी मागितले.त्याचवेळी कॅशियरच्या डोक्याला पिस्तूल लावत पाच कोटी रुपयांची मागणी केली. तीन मिनिटांच्या आत पैसे न दिल्यास आपण याच ठिकाणी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून कार्यालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली. कॅशियर विजय गजांकुष यांना त्याने पैसे की जीव प्यारा आहे,असे विचारत कोणतीही हालचाल न करण्याची तंबी दिली. त्याचवेळी विजय यांनी गंगाराम घोगळे याला हाक मारली, त्यामुळे तो व अन्य अधिकारी केबिनमध्ये आले. सुरक्षा रक्षक मनोहर नारायण राणेही तेवढ्यात आला आणि त्या सर्वांनी यादववर हल्ला करीत त्याचे पिस्तूल हिसकावून घेतले व त्याला खाली पाडले व बराच चोप दिला. यावेळी झालेल्या झटापटीत सुरक्षा रक्षकाच्या मानेला यादवची नखे लागली. बॅंक व्यवस्थापक सत्यवान राणे यांनी धोक्याची सूचना देणारा भोंगा वाजवल्याने अनेक जण सतर्क झाले.
डिचोली पोलिसांनी बॅंकेत धाव घेऊन बॉम्ब सदृश वाटणाऱ्या त्या वस्तूंच्या तपासणीसाठी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण केले. गाठोड्यातून टीक टीक आवाज येत राहिल्याने पोलिसांनी ही खबरदारी घेतली. ज्यावेळी खास पथकाने हे गाठोडे उघडून तपासणी केली, त्यावेळी बॉम्ब नकली असल्याचे दिसून आले. चिनी बनावटीच्या मोबाईलचा रिमोटसारखा वापर करून बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू व स्कूटरचा फूट पंप बॉम्ब म्हणून ठेवल्याचे दिसून आले. या नकली वस्तू असल्याचे उघड झाल्याने डिचोलीवासीयांनी सुस्कारा सोडला. तोपर्यंत दोनतीन तास तेथे तणावपूर्ण वातावरण होते. बॅंक कर्मचारी गंगाराम घोगळे, सत्यवान हळर्णकर, विजय गजांकुष, मनोहर राणे यांनी धैर्याने संबंधिताला पोलिसाच्या स्वाधीन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. आज महिन्याचा पहिलाच दिवस असल्याने बॅंकेत गर्दी होती. अशावेळी लुटण्याचा हा धाडसी प्रयत्न केला गेला.
दरम्यान, स्थानिक आमदार राजेश पाटणेकर यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ट्रकच्या धक्क्याने पादचाऱ्याचा मृत्यू

खनिजवाहतुकीचा बळी
कुडचडे, दि.१(प्रतिनिधी): कुडचडे येथील आंबेडकर चौकात रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या अब्बास अली साहब डिदगुर (४०) या इसमाला तेथून बेफामपणे धावणाऱ्या एका अज्ञात ट्रकने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला.
कुडचडे पोलिसांनी यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार मयत इसमाच्या खिशात सापडलेल्या सर्टिफिकेटवरुन त्याची ओळख पटलेली आहे.सकाळी सुमारे ९.१५च्या सुमारास हा अपघात घडला. केपेहून मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकने त्याला ठोकर देऊन पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह मडगाव शवागृहात ठेवलेला असून पुढील तपास सुरु आहे.

शिरसई कोमुनिदादचे बॅंक खाते गोठवले!

...संशयितांवर कारवाई नाही
...पोलिस अहवाल न्यायालयात

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याचा तपास सुरू असून कोमुनिदादचे खाते गोठवले असल्याची माहिती आज पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली. परंतु, पोलिसांनी अजूनही ज्या लोकांनी हा घोटाळा केला आहे, त्यांची खाती जप्त केलेली नसल्याची माहिती यावेळी याचिकादाराने दिली. गेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली, याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
आज सदर प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले असता, पोलिसांनी आपल्या तपासाचा अहवाल सादर केला. कोमुनिदादची जुनी समिती आता नसून त्याचा ताबा प्रशासकाकडे आहे. त्यामुळे पोलिसांनी कोमुनिदादचेच खाते जप्त करण्याऐवजी ज्यांनी आर्थिक घोटाळा केला आहे, त्याचे खाते जप्त करायला हवे, अशी मुद्दा यावेळी मांडण्यात आला. तसेच त्यांनी कोणताच हिशेबही दिलेला नाही. त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडून वसून करून घेतले जावे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.
शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या गैरप्रकारावरून आग्नेल डिसोझा, निशीकेत परब आणि पांडुरंग परब या तिघांकडून पैसे वसूल करून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

गोमंतकीय अपेक्षांना जागणारा 'जागोर'

राजेंद्र देसाई
२००४ सालापासून गोव्यात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी अनेक प्रादेशिक चित्रपट दाखवले गेले. यातील अनेक चित्रपट कायम स्मरणात राहण्यासारखे होते. खास करून दक्षिणेतील तामीळ, तेलगू, मल्याळी, कानडी, मराठी तसेच उत्तरेतील बंगाली, आसामी चित्रपटांनी आपल्या सक्षम निर्मितीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव इफ्फीतील प्रेक्षकांना दिला. मात्र या इतक्या वर्षात एकाही कोकणी चित्रपटाचा त्या तोडीने इफ्फीत प्रभाव पडू शकला नाही. आमदार दामू नाईक यांच्या "जागोर' या चित्रपटाने यंदा ही उणीव भरून काढली. केवळ उणीवच भरून काढली नाही तर अनेक चांगल्या प्रादेशिक चित्रपटांच्या तोडीस तोड हा चित्रपट तयार झाला. उत्कृष्ट पटकथा, कल्पक आणि दमदार दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय, दर्जेदार फोटोग्राफी (सिनेमॅटोग्राफी), आणि अगदी योग्य अशा लोकेशन्सचा शुटिंगसाठी वापर यामुळे मराठी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील चित्रपटांइतका दर्जेदार असा हा चित्रपट निर्माण झाला. आयनॉक्स १ मध्ये प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत झालेल्या या चित्रपटाच्या प्रिमियर शो ला प्रेक्षकांकडून दामू व इतरांना मिळालेली उत्स्फूर्त दाद चित्रपटाचे यश अधोरेखित करून गेली. खास करून या चित्रपटाचा नायक वर्धन कामत या तरुणाच्या अभिनयाने चित्रपटाला वेगळी ओळख आणि उंची मिळवून दिली. अर्थात इतर कलाकारांनाही त्याचे श्रेय द्यावे लागेल.
"दामबाबाचे घोडे' या प्रॉडक्शन हाउसद्वारे दामू नाईक यांनी निर्माण केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संग्रामसिंग गायकवाड. गायकवाड यांनी चित्रपटाच्या विषयाला पूर्ण न्याय देताना चित्रपटाच्या इतर बाजूही इतक्या सुरेखपणे सांभाळल्या आहेत की, चित्रपट जसजसा पुढे जातो तसा तसा तो अधिक परिपक्व वाटत जातो. पैशांच्या मागे धावणारे लोक बहुराष्ट्रीय कंपन्यांना, बिगरगोमंतकीय धनिकांना जमिनी लाटतात आणि स्वतः आपल्या गावातून आणि घरातून कसे हद्दपार होतात, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची होणारी नासधूस लोकांच्या मुळावर कशी उठली आहे आणि सेझ व इतर गोष्टींसाठी लाखो चौरस मीटर जमिनी धनिकांना लाटण्याचे कसे षड्यंत्र रचले जात आहे, याचे सचित्र चित्रण कथानकाच्या माध्यमातून पुढे जात राहते. शेती, बागायती टिकल्या तरच लोक टिकतील आणि तरच गोवा टिकेल हा सशक्त संदेश देताना सामूहिक शेतीची संकल्पना जागोरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या डोक्यातील ही कल्पना दामू यांनी चित्रपटासाठी यशस्वीपणे वापरून दाखवली, हा त्यातला सकारात्मक भाग आहे. एका लग्नसमारंभाच्या निमित्ताने पर्रीकर, श्याम सातार्डेकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नीळकंठ हळर्णकर यांचे दर्शन चित्रपटात घडते. हा प्रसंग मोठा सुरेखपणे चित्रित करण्यात आला आहे.
चित्रपटाची आणखी जमेची बाजू ठरली आहे ती शर्मद रायतूरकर यांची फोटोग्राफी. बॉलिवूडमध्ये सिनेमॅटोग्रापर म्हणून करियर करणारे शर्मद "कोई मिल गया' या चित्रपटाचा सहफोटोग्राफर म्हणून जबाबदारी पेलल्यानंतर अचानकपणे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी गोव्यात परतले आणि येथेच अडकून पडले. परंतु त्यांच्यातील आर्टिस्ट त्यांना स्वस्थ बसू देईना. दरम्यानच्या काळात आपला छंद पूर्ण करण्यासाठी ते अनेक उपक्रम करत होतेच परंतु "जागोर' ने त्यांना एक नवी दिशा आणि नवा मार्ग निश्चितपणे दाखवला असेल. गोव्यात आज त्या तोडीचा सिनेमॅटोग्राफर सापडणे कठीण त्यामुळे आगामी काळात गोव्याला त्यांच्या या टेलंटचा चांगलाच उपयोग होणार हे निश्चित. चित्रपटाची गाणी स्वतःच दामू यांनी लिहिली आहेत. ती इतकी सुरेख आहेत की दामू हे गीतकार कधीपासून झाले असा प्रश्न पडावा. खास करून चित्रपटातील भक्तिगीते आणि टायटल गीत अप्रतिम म्हणण्याइतके चांगले आहे. अर्थात सिद्धनाथ बुयांव यांचे संगीत हा चित्रपटाची खरी ताकद बनली आहे. हे संगीत मराठीतील कोणत्याही दर्जेदार संगीताच्या तोडीचेच नव्हे तर अधिक परिपक्व आणि प्रसंगांशी अनुरूप आहे. या तरुण संगीतकारालाही या क्षेत्रात चांगले भवितव्य आहे हे निश्चित. त्यामुळे सगळ्याच आघाड्यांवर समतोल राखलेला हा चित्रपट आजवरच्या गोमंतकीय चित्रपटात चांगलाच सरस ठरला आहे. गोव्याच्या भवितव्याची चिंता असलेल्या सर्वांनीच पाहावा असा हा चित्रपट आहे. स्वतः दामू नाईक यांची कथा व एन. शिवदास यांचे संवाद चित्रपटाला लाभले आहेत. कथा तर सुंदर आहेच परंतु शिवदास यांचे संवादही तोडीस तोड आहेत.

Tuesday 1 December, 2009

अखेर मधु कोडा यांना अटक

रांची, दि. ३० : कोट्यवधींच्या हवाला घोटाळा प्रकरणातील आरोपी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना आज दक्षता विभागाने अटक केली.
दक्षता विभागाचे पोलिस महानिरीक्षक एम. व्ही. राव यांनी ही माहिती दिली. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील डुमरी येथून कोडा यांना अटक करण्यात आली आहे. दक्षता विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. आज सकाळी कोडा यांना अटक झाली. तेथून त्यांना रांची येथे आणण्यात आले आहे. येत्या ४ डिसेंबर रोजी त्यांना कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.
३८ वर्षीय कोडा हे आज निवडणूक प्रचार सभेसाठी सरेईकेला येथे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. हवाला प्रकरणी अटकेपासून वाचण्यासाठी कोडा हे सतत प्रयत्नरत होते. २७ नोव्हेंबरला त्यांना दक्षता आयोगासमोर हजर राहायचे होते. पण, त्यांनी आयोगाच्या समन्सचा अवमान केला आणि अनुपस्थित राहिले. त्यासाठी त्यांनी झारखंडमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराचे कारण समोर केले. एवढेच नव्हे तर त्यांनी चक्क दक्षता विभागाला पत्र लिहिले की, झारखंडमधील निवडणुका १८ डिसेंबरला संपत आहेत. त्यापूर्वी ते आयोगासमोर हजर राहू शकत नाहीत. त्यानंतरच ते चौकशीला सामोरे जातील. आता या प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांची अटक अपरिहार्य होती, असे राव यांनी सांगितले.
चार हजार कोटी रुपयांच्या हवाला घोटाळ्यात मधु कोडा यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पण, कोडा यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे.

दहा लाखांचा चरस हणजुण येथे जप्त

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): अमली पदार्थविरोधी पथकाने आज एका मोठ्या छाप्यात सुमारे १० लाख रुपयांचा चरस जप्त केला असून या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. नेपाळ येथून रेल्वेमार्गे गोव्यात आल्यानंतर हणजुण येथे जाताना त्याना काल रात्री अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे ९ किलो ८६५ ग्राम चरस आढळून आला. यात भीम बहादूर रोका, मनीत रोका, बागराज थापा, देवीलाल बुद्धा, माया पुंज व निलकुमारी थापा यांना अटक करण्यात आली आहे. येवढ्या चरस कोणाला देण्यासाठी आणला होता, याचा तपास पोलिस घेत आहेत. एका घटनेत सहा जणांना ताब्यात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती पोलिसांनीच दिली.
अधिक माहितीनुसार थीवी मार्गे हणजूण येथे काही नेपाळी लोक अमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार एक पथक रात्री त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. यावेळी शिवोली येथील सेंट एन्थोनी चर्चच्या समोर एका भाड्याच्या टॅक्सीतून नेपाळी लोक जात असल्याचे दिसताच ते वाहन अडवण्यात आले. वाहनात असलेल्या सर्वांची झडती घेतली असता त्यांच्या कंबरेत व छातीवर चरस गुंडाळल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून १ हजार ६२५ रुपये व एक मोबाईलही जप्त केला आहे.
गाडी चालवणाऱ्या चालकाला याविषयीची कोणताही माहिती नव्हती. त्याने थीवी रेल्वे स्थानक ते हणजूण येथे जाण्यासाठी ४०० रुपयांचे भाडे ठरवले होते. तसेच वाहनाचा चालक तपासकामाला पूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सदर वाहन क्रमांक जीए ०१ झेड ६६१५ हे जप्त केले आहे. सदर छापा या पथकाचे पोलिस अधीक्षक वेणू बंसल व उपअधीक्षक रमेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक मिरा डि'सिल्वा, अर्जुन कोंडूसकर पोलिस शिपाई दयानंद परब, हिरमय्या गुरय्या, तुकाराम मांद्रेकर व सुरज गोवेकर यांनी सहभाग घेतला. याविषयीचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक डिसिल्वा करीत आहे.

सुलोचनादीदींना 'महाराष्ट्र भूषण'

मुंबई, दि.३० : आपल्या सहज सुंदर अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आदराचे स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री सुलोचनादीदी यांना यंदाचा "महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २६ जानेवारी रोजी त्यांना समारंभपूर्वक त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी या पुरस्काराने गौरविले जाते. यंदा शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा निर्णय घेतला. ५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी हा पुरस्कार पु.ल.देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावस्कर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, रतन टाटा, मंगेश पाडगावकर, नानासाहेब धर्माधिकारी, अभय व राणी बंग, विजय भटकर, रा. कृ. पाटील आदी मान्यवरांना मिळाला आहे.
यंदा महाराष्ट्र भूषण ठरलेल्या सुलोचनादीदींचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव रूबी मेयर्स असे आहे. ख्यातनाम दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. त्यांच्याच तालमीत सुलोचनादीदी तयार झाल्या. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. मराठी चित्रपटात जशी त्यांनी "आई' जिवंत केली तशीच प्रतिमा हिंदीतही निर्माण झाली होती. ७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत निरूपा रॉय यांच्यानंतर सुलोचना यांची "मॉं' अतिशय गाजली. २००३ मध्ये त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. उशीरा का होईना पण, शासनाला सुलोचनाबाईंची आठवण झाली, याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीत समाधान व्यक्त केले जात आहे.
'हा माझ्यासाठी घरचाच आहेर'
ज्या महाराष्ट्रात मी जन्मले, ज्या महाराष्ट्रात माझं करिअर घडलं आणि ज्या महाराष्ट्राने मला आई, वहिनी म्हणून स्वीकारलं त्याच माझ्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पुरस्कारावर माझं नाव कोरलं जाणार आहे, याचा आनंद शब्दात सांगता येणारा नाही, अशी काहीशी भावूक प्रतिक्रिया अभिनेत्री सुलोचना यांनी व्यक्त केली.
हा पुरस्कार आपल्या घरचा आहेर असल्यासारखे वाटत आहे. पुरस्काराची बातमी कळल्यावर मन आनंदाने भरून आले. मी जे काम केले त्याचं सार्थक झाले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आज या आनंदाच्या प्रसंगी पहिली आठवण होते ती माझे गुरू भालजी पेंढारकर यांची... त्यांनी मला घडविलं, माझ्यावर जे संस्कार केले, जे कष्ट घेतले त्या कष्टांचा हा सन्मान आहे. माझी आई आणि इतर सगळे कुटुंबीय ज्यांनी मला या क्षेत्रात काम करायला पाठिंबा दिला आणि माझे सहकलाकार सगळ्यांची या क्षणी प्रकर्षाने आठवण होतेय. महाराष्ट्रातील रसिकांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाला तोड नाही. ते प्रेम मी आयुष्यभर विसरू शकत नाही, असेही सुलोचनाबाई कृतज्ञतेने आणि नम्रपणे नमूद करतात.

बोरकर सगळ्यांत होते तरीही कशातच नव्हते...

'आठवणीतले बोरकर' कार्यक्रमातील सूर
पणजी, दि. ३० (सांस्कृतिक प्रतिनिधी): कविवर्य बा. भ. बोरकर जितके भावनाप्रधान होते तितकेच ते व्यावहारिक होते. कुटुंबात दहा सदस्य असलेल्या संसाराचा गाडा यशस्वीपणे सांभाळत त्यांनी आपल्या आवडी जोपासल्या. ते जेवढे कवितेवर प्रेम करायचे तितकेच प्रेम ते आपल्या कुटुंबावरही करायचे. "बोरकर सगळ्यांतच होते पण ते कशातही नव्हते', असे प्रातिनिधिक भावनोद्गार "आठवणीतले बोरकर' (स्मरणांजली) या कार्यक्रमात निघाले.
कला आणि संस्कृती संचालनालय व कै. बा. भ. बोरकर जन्मशताब्दी कार्यक्रम समिती आयोजित कै. बा. भ. बोरकर जन्मशताब्दी उद्घाटन सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाकीबाबांच्या सहवासातील आठवणी कथन करण्यासाठी व्यासपीठावर नागेश करमली, श्रीराम कामत, हिरालाल कामत व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधव बोरकर उपस्थित होते.
सुरुवातीला बोरकरांच्या ९९ व्या जयंतीदिनानिमित्त एक मिनिट स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली व त्यांच्या प्रतिमेला कार्यक्रम समितीचे उपाध्यक्ष दत्ता नायक यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
विद्यार्थी दशेत असताना बोरकरांचा सहवास आपल्याला लाभला. ते शिक्षकापेक्षा कवीच अधिक वाटायचे; दर दिवशी वर्गात ते आम्हांला आपली कविता वाचून दाखवायचे आणि कित्येकवेळा शाळेचे वेळापत्रक बदलून जायचे, असा सुरम्य आठवणी यावेळी नागेश करमली यांनी जागवल्या. दुःखातही सुख मानणारे बाकीबाब सगळ्यांच गोष्टींत समरस होऊन जात असेही ते पुढे म्हणाले.
मनापासून स्वीकारलेल्या तत्त्वप्रणाली बोरकरांनी कधीही सोडल्या नाहीत, आर्थिक अडचणीत असतानाही त्यांनी आपला स्वाभिमान जोपासला, सरकारकडून चालून आलेल्या सवलती त्यांनी परतवून लावल्या, गरज असतानाही मोहाला आळा घातला, असे यावेळी बोलताना श्रीराम कामत यांनी सांगितले.
हिरालाल कामत यांनी बोरकरांकडून त्यांना मिळालेल्या प्रेमाचे सोदाहरण कथन केले. बाकीबाबांच्या आठवणी पुस्तक स्वरूपात आल्यास आजच्या पिढीसाठी ते अतिशय उद्बोधक ठरेल असे अध्यक्षस्थानावरून बोलताना माधव बोरकर म्हणाले.
याच कार्यक्रमाला जोडून "बा. भ. बोरकरांची कविता' या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी "बोरकरांच्या कवितांतील निसर्गानुभूती' तर नरेंद्र बोडके यांनी "बोरकरांच्या कवितेवरील पाश्चात्त्य कवींचा प्रभाव' या विषयावर निबंधवाचन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुंडलीक नाईक यांनी भूषविले.

Monday 30 November, 2009

उसगाव सरपंच, पंच यांना ग्रामस्थांकडून धक्काबुक्की

शौचालयांच्या बांधकामाबद्दल उडवाउडवीची उत्तरे
ग्रामसभांमध्ये प्रचंड गदारोळ

तिस्क उसगाव, दि.२९ (प्रतिनिधी) - घाटवाडा तिस्क उसगाव येथील एका आस्थापनाच्या आवारात सुरू असलेल्या शौचालयांच्या बांधकामावर उसगाव पंचायत मंडळाने काहीच कार्यवाही न केल्याने आज सकाळी उसगावच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. सरपंचांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने ग्रामस्थ अधिकच खवळले. यावेळी सरपंच सौ. उत्कर्षा चोडणकर, पंच सदस्य रामनाथ डांगी यांना धक्काबुक्की करण्यात आली. गोंधळाच्या वातावरणात ग्रामसभा संपली आणि नंतर फोंडा पोलिस पंचायत सभागृहात दाखल झाले.
या सभेला पोलिस संरक्षण न दिल्याने सत्तारूढ गटातील पंचांनी नाराजी व्यक्त केली. धक्काबुक्कीसंदर्भात उसगाव सरपंचांनी फोंडा पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. मात्र त्यात कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही.
सकाळी १०.३० वाजता ग्रामसभा पंचायत सभागृहात सुरू झाली. सरपंच सौ. उत्कर्षा चोडणकर यांनी स्वागत केले. त्यानंतर काही ग्रामस्थ उभे राहिले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मागील ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे ग्रामसभा का घेतली नाही, ग्रामसभा घेण्यासाठी फोंड्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना आदेश का द्यावा लागला, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळी सरपंचांनी नव्यानेच पद स्वीकारल्याने ग्रामसभा घेण्यात आली नाही, असे उत्तर पंच रामनाथ डांगी यांनी देताच ग्रामस्थ संतापले. ग्रामसभा घेण्यासाठी सरपंचांची गरज नाही, पंचायत राज कायद्यानुसार येथे ग्रामसभा घेतल्या जात नाहीत, असे ग्रामस्थ म्हणाले.
घाटवाडा उसगाव येथील देवयानी फूडस् प्रॉडक्ट प्रा.ली. या आस्थापनात स्थानिक युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत मंडळाने आजपर्यत काय केले? तेथे काम करणाऱ्या सात स्थानिकांना देवयानी
आस्थापनाने त्वरित सामावून घेतले पाहिजे. त्यासाठी पंचांना लोकांसोबत यावे लागेल, असे ग्रामस्थांनी बजावले. देवयानी या आस्थापनाच्या व्यवस्थापकांना सात दिवसांत पंचायत कार्यालयात बोलावून घेण्यात येईल. तसेच या आस्थापनात काम केलेल्या व सध्या बेरोजगार असलेल्या सात जणांनाही पाचारण करून याप्रश्नी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पंच रत्नाकर परब फात्रेकर यांनी दिले. खनिज माल वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उसगाव पंचायतीने पुढाकार घ्यावा, असा ठराव आधीच्या ग्रामसभेत संमत झाला होता. अद्याप त्यासंदर्भात उसगाव पंचायतीने काहीच कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यासंदर्भात २५ नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांशी बोलणी झाली होती. वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिस याबाबत दर आठवड्याचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत, असा खुलासा रामनाथ डांगी यांनी केला. ट्रक मालक संघटनेचा यावेळी उल्लेख झाला. त्यामुळे ट्रक मालक ग्रामस्थ संतापले. ट्रक मालक संघटनेला फलक लावण्यास सरपंच सौ.चोडणकर व पंच डांगी यांनी विरोध केला. मात्र आरोग्यमंत्र्यांचे फलक कोणाचीही परवानगी घेतल्याशिवाय लावले जातात. त्यांना कायदाचे बंधन नाही काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
गावातील सामाजिक समस्या सोडविण्यास पंचायत मंडळ पुढाकार घेत नाही. गावातील बेरोजगार युवकांना रोजगार संघी उपलब्ध करून देत नाही. केवळ आपला आर्थिक स्वार्थ पाहिला जातो, असे आरोप ग्रामस्थांनी केले. सर्व टिपर ट्रकांना खनिज माल वाहतूक करता येते. मार्गावरील खनिज वाहतूक पंचायत बंद करू शकत नाही. खनिज मालवाहू टिपर ट्रकांची संख्या वाढल्याने रस्त्यावरील धूळ झाडता येत नाही, असे पंच सदस्य रत्नाकर परब फात्रेकर म्हणाले. सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवण्याची मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.
म्हारवासडा उसगाव येथील एका लोह प्रकल्पावर पंचायत मंडळ काहीच कारवाई करीत नाही. या प्रकल्पाच्या बॉयलरचे गरम उकळते पाणी रस्त्यावर सांडून अनेक दुचाकीस्वारांना अपघात घडले आहेत. या पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचा अपघात घडण्यापूर्वी सदर आस्थापनावर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
घाटवाडा उसगाव येथील एका आस्थापनातर्फे सुरू असलेल्या शौचालयाच्या बांधकामावर पंचायत मंडळ काहीच कारवाई करीत नाही. तसेच पंचायतीकडून खोटी माहिती पुरवली जाते, असे समजताच त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.पंचायत राज कायद्याची कलमे यावेळी वाचून दाखवण्यात आली. सदर आस्थापानाचे बांधकाम कायदेशीर असल्याचा निर्वाळा सरपंचांनी देताच गोंधळ निर्माण झाला. सरपंच सौ. चोडणकर व पंच सदस्य रामनाथ डांगी यांच्यावर लोक धावून गेले. त्यावेळी पंचायत सचिव गजानन नाईक यांनी कडे करून त्यांना वाचविले. संबंधित आस्थापनाने शौचालयांचे बांधकाम सुरू केले आहे.
तेथील सांडपाणी ओपा नदीत सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पाचे पाणी गोव्यातील जनतेला पुरविले जाते. या शौचालयातील सांडपाण्यामुळे
नदीचे पाणी प्रदूषित होणार असून ते लोकांच्या आरोग्यंास अपाय संभवतो, अशी कैफियत ग्रामस्थांनी मांडली.
एका पंचाने तर तिस्क उसगाव येथे स्थायिक झालेल्या बिगर गोमंतकीय लोकांची आडनावे बदलून ती "नाईक' अशी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.स्थानिक युवकांना डावलून बिगर गोमंतकीयांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जातात, असा दावाही ग्रामस्थांनी केला. यावेळी राजीव आवास योजनेसंदर्भात पालवाडा भागातील २० ग्रामस्थांची नावे पंचायत सचिवांनी वाचून दाखविली.
पंच सदस्य ज्ञानेश्वर नाईक हे सामाजिक हित पाहतात. ग्रामस्थांना ते नेहमी सहकार्य करीत असतात. पंचायतीत काय चालले आहे.याची माहिती ग्रामस्थांना देतात. म्हणून अन्य एका पंचाने त्यांना धमकी दिल्याची माहिती सभेत देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांचा पारा चढला. त्यांनी सरपंच व अन्य एका पंचाला धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळ माजला व पंच सदस्यांना तेथून पळावे लागले.धक्काबुक्कीची घटना संपून शांतता निर्माण झाल्यावर फोंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या सभेसाठी पोलिस बंदोबस्त मागितला होता. तो देण्यात आला नाही, अशी माहिती पंच रत्नाकर परब फात्रेकर यांनी दिली. सरपंचांनी धक्काबुक्कीप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. मात्र त्यात कोणाचाही नामोल्लेख केलेला नाही.
या सभेला सरपंच सौ. उत्कर्षा चोडणकर, उपसरपंच कांती गावडे. पंच सदस्य सौ. प्रगती गावडे, मनोहर गावडे, रत्नाकर परब फात्रेकर, रामनाथ डांगी, ज्ञानेश्वर नाईक उपस्थित होते. फोंडा गटविकास कार्यालयातील नमीता वेरेकर या सभेच्या पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होत्या. अहवाल वाचन पंचायत सचिव गजानन नाईक यांनी केले. सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

खोर्जुवेचे "ते' बांधकाम न पाडल्यास गंभीर परिणाम

हळदोणे ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक

म्हापसा, दि. २९ (प्रतिनिधी) - हळदोणे ग्रामसभेत आज खोर्जुवे येथील ग्रामस्थांनी एका बेकायदा बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेत, हे बांधकाम एका महिन्यात पाडण्यात येईल,असे आश्वासन पंचायतीकडून मिळवले आणि या मुदतीत कारवाई न झाल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा पंचायतीला दिला. आज सकाळी ग्रामसभा सुरू होताच, सखाराम नागवेकर व इतरांनी कोळम खोर्जुवे येथे लोन रेडर्स रिसॉर्ट ऍन्ड ट्ूर्स कंपनीच्या बांधकामाबाबत दिलेल्या निवेदनावर स्पष्टीकरण मागितले असता, हा मुद्दा मागच्या ग्रामसभेत उपस्थित झाला, त्यावेळी उत्तर दिलेले असल्याने पुन्हा त्याच प्रश्नावर चर्चा नको,असे सरपंच दिलीप हळदणकर यांनी सांगितल्यावर उपस्थित ग्रामस्थ खवळले. हे बांधकाम एका अभिनेत्याचे असून एका आमदाराच्या दडपणाने पंंचायत पक्षपातीपणाने वागत आहे,अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.
स्व. बाबुराव भोसले यांच्या जागेत फार्महाऊस बांधण्यास कोणी परवानगी दिली, नगरनियोजन खात्याने सीआरझेड कक्षेत येणाऱ्या या जागेत कोणतेही बांधकाम उभे राहू शकत नसल्याचे पंचायतीला कळवूनही हे बेकायदा बांधकाम पंचायत कसे काय "कायदेशीर' करु शकते. यापूर्वी पंचायतीने हे बांधकाम पाडण्याची नोटीस दिली होती, त्याचे काय झाले,असा प्रश्नांंचा भडिमार उपस्थितांनी केला. सरपंच यावर काहीच उत्तर देऊ न शकल्याने सचिवांनी याबाबत स्पष्टीकरण करावे, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. सचिवांनाही याबाबत काहीच सांगता आले नाही.
सुमारे ५० शेतकऱ्यांची पायवाट अडवून आणि गणेश विसर्जनाचा मार्ग रोखून होणारे बेकायदा बांधकाम पाडण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले. जुन्या घराचा क्रमांक कायम ठेवून दुरुस्ती करण्यात येत असल्याची बतावणी करीत नव्या बांधकामाला पंचायतीने कशी काय परवानगी दिली आणि आता कोणत्या फार्महाऊसला कायदेशीर ठरविले जात आहे,असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले. खुर्साचा मांड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत धार्मिक विधी होत असत, ती जागा आता बांधकामासाठी अडविली गेली आहे, शेतात ट्रॅक्टर, नांगर नेण्यासाठी याच पायवाटेचा उपयोग गेली अनेक वर्षे केला जात आहे. आता पंचायतीने धार्मिक विधीसाठी पुरेशी जागा सोडावी आणि पायवाट मोकळी करावी,अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. पंचायतीने या मागणीची दखल घ्यावी आणि तशी नोंद करावी,असेही ग्रामस्थांनी पंचायतीला बजावले.
ग्रामसभेला सरपंचाव्यतिरिक्त उपसरपंच रोझी लोबो, अन्य पंच , सचिव फातर्पेकर, गट विकास कार्यालयाचे अधिकारी श्री. पागी उपस्थित होते.

कला व संस्कृतीतूनच मनाचा विकास मधू मंगेश कर्णिक

बा. भ. बोरकर जन्मशताब्दी सोहळा सुरू
पणजी, दि. २९ (सांस्कृतिक प्रतिनिधी)- साहित्यिक, कलावंत, प्रतिभावंत यांना मान देणारा समाज खऱ्या अर्थाने मोठा आहे. कला आणि संस्कृतीतूनच मनुष्याच्या मनाचा विकास होतो. प्रत्येक नागरिकाच्या मनाचा विकास झाल्याशिवाय समाजाचा योग्य विकास होत नाही, असे विचार ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले. गोमंतकातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी कै. बा. भ. बोरकर जन्मशताब्दी उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ मराठी कवी मंगेश पाडगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री दिगंबर कामत, कार्यक्रम समितीचे उपाध्यक्ष दत्ता दामोदर नायक, भाई मावजो, कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
बोरकरांचा आणि आमचा स्नेह पन्नास वर्षांपूर्वी जुळून आला होते. बोरकर म्हणजे जणू संवेदनाचा उत्सव आणि कवितेचा महोत्सव होते. त्यांच्या त्या महोत्सवात भिजण्याचा योग माझ्या नशिबी आला हे माझे भाग्यच समजतो, असेही त्यांनी पुढे सांगितले. कवितेसंदर्भात असलेल्या जिद्दी ध्यासाच्या जोरावरच बोरकरांनी आपल्या कवितेतून निसर्ग आणि मानवतेचे नाते केवळ गोव्यालाच नव्हे तर देशाला दाखवले, असेही ते म्हणाले. बोरकरांच्या कविता त्यांच्या मुखातून ऐकण्याची संधी आम्हाला पुष्कळदा मिळाली. कुठल्या संमेलनात किंवा समारंभात ते कविता सादर करायला लागले की एखादा राजपुत्र दरबारात येऊन दरबार काबीज करतो त्याचप्रमाणे ते श्रोत्यांवर ताबा मिळवायचे. कारण त्यांच्या कविताच तेवढ्या दर्जेदार असायच्या. त्यांच्याच जन्मभूमीत त्यांची जन्म शताब्दी साजरी होते ही आनंदाची गोष्ट आहे आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा ऋणी आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
बोरकर यांच्यासोबत व्यतीत केलेल्या आठवणी ताज्या करताना मंगेश पाडगावकर म्हणाले की बोरकरांनी माझ्या आई वडिलांइतकेच प्रेम मला दिले. माझ्यातील कवी त्यांनी माझ्या बालपणातच हेरला आणि मला प्रोत्साहन दिले. त्यांची कविता वाचूनच मी माझी पहिली कविता लिहिली. त्यांच्या कवितेतील शब्द म्हणजे उच्च संगीताची गंगोत्रीच. इंद्रियनिष्ठ संवेदना व्यक्त करण्याची ताकद त्यांच्या कवितेत आहे. बोरकरांसारखे महान कवी या मातीत जन्मले आणि त्यांनी आपली रसिकता कायम टिकवली. गोव्याच्या रसिकांनी रसिकता टिकवून ठेवावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. या व्यतिरिक्त मधू मंगेश कर्णिक व मंगेश पाडगावकर यांनीही आपल्या शैलीत बोरकरांच्या कविता सादर केल्या.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच बोरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बा. भ. बोरकर जन्मशताब्दी उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम सुरू झाला. कला आणि संस्कृती संचालनालय व कै. बा. भ. बोरकर जन्मशताब्दी कार्यक्रम समिती आयोजित या सोहळ्यात बोरकरांच्या आठवणींचा गंध अनेक मान्यवरांनी पसरवला. अशा या सुगंधित वातावरणात धुंद झालेल्या रवींद्र भवनात संपन्न झालेल्या साहित्य उत्सवात या सोहळ्याने रंगत आणली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्ता नायक यांनी बा. भ. बोरकर म्हणजे सांस्कृतिक मखरातील दैवत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील गोव्याचा मानदंड असल्याचे सांगितले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात वर्षभर विविध कार्यक्रम सादर केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. भाई मावजो यांनी स्वागत केले. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आज सकाळी डॉ. अजय वैद्य, सुमेधा देसाई, चंद्रकांत वेर्णेकर, राया कोरगावकर, दयेश कोसंबे यांनी बोरकर यांची चलचित्रे, कविता वाचन आणि गीतगायन सादर करून रसिकांना बोरकरांच्या अनोख्या काव्यमय विश्वाचा प्रवास घडवून आणला.

कैगा अणुप्रकल्पातील घटना हा घातपाताचा प्रकार शक्य

दोषींवर कडक कारवाईः काकोडकर

किरणोत्सर्ग पाण्यातून
संसर्गाने ५५ जण आजारी


बंगलोर, दि. २९ - कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात असलेल्या कैगा येथील अणुप्रकल्पात किरणोत्सर्ग झाला असून अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणारे जड पाणी एका कूलरमधील पिण्याच्या पाण्यात मिसळल्यामुळे ५५ लोक आजारी पडले आहेत. अणुप्रकल्पात किरणोत्सर्गाची ही घटना घातपात असल्याची शक्यता अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर दोषींना कठोर शासन केले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
या किरणोत्सर्गामुळे आजारी पडलेल्यांना मल्लापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून किरणोत्सर्ग रोखण्यात आल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये जड पाणी कसे मिसळले याची चौकशी सुरू आहे. किरणोत्सर्ग थांबविण्यात यश आले असल्याचीही पुष्टी झाली आहे. ज्या ठिकाणी किरणोत्सर्ग झाला तो संपूर्ण परिसर, किरणोत्सर्ग झालेले पाणी आणि कूलर विशिष्ट प्रकारे सील करण्यात आले असून तज्ज्ञांमाफत त्याची तपासणी केली जात आहे.
अणुऊर्जेची निर्मिती जिथे करण्यात येते त्या मुख्य यंत्रणेपासून दूर असलेल्या कूलरमध्ये जड पाणी मिसळण्यामागे काही घातपात आहे का, या प्रश्नावर प्रशासनाने कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. पण, या प्रकाराचा देशाच्या अणुऊर्जा निर्मिती योजनांवर काहीही परिणाम होणार नाही, असे आश्वस्त केले आहे.
कैगा हा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प मार्च २००० पासून कार्यरत आहे. हा प्रकल्प न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने चालविला जातो. या ठिकाणी प्रथमच किरणोत्सर्गाचा प्रकार घडला आहे.

घातपाताची शक्यता : काकोडकर
कैगा अणुऊर्जा प्रकल्पात झालेला किरणोत्सर्ग हा घातपाताचा प्रक़ार असल्याचा संशय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला आहे.
कोणीतरी जाणीवपूर्वक किरणोत्सर्ग पसरविणारे ट्रिटीयममिश्रीत जड पाणी कूलरच्या पाण्यात मिसळले असल्याचे काकोडकर यांचे म्हणणे आहे. जड पाणी, ट्रिटीयम हे सगळे घटक विशिष्ट पाईपलाईनच्या माध्यमातून अणुऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या मुख्य प्रकल्पापर्यंत पोहोचतात. ते सुट्या स्वरूपात अणुभट्टीच्या आवारात कुठेच ठेवता येत नाहीत. त्यामुळे किरणोत्सर्ग करण्याची क्षमता असलेले घटक पिण्याच्या पाण्यात मिसळण्याचे काम प्रकल्पाच्या बदनामीसाठी मुद्दाम करण्यात आल्याचा संशय काकोडकर यांनी व्यक्त केला आहे.
ज्या कूलरमध्ये किरणोत्सर्ग झाला आहे तो कूलर कैगा प्रकल्पाच्या बाहेरच्या आवारात मोकळ्या मैदानात आहे. तिथे काम करणारे ऊर्जानिर्मितीचे मुख्य काम चालते त्या परिसरात जातच नाीत, अशी माहितीही त्यांनी दिली. हा प्रकार घडला असला तरी तेथील स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असा आश्वासक दिलासाही अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांनी दिला आहे.

हल्ला प्रकरणी आश्पाकच्या चुलतभावाला अटक

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - आश्पाक बेंग्रे याने बिच्चू याच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिल्यानंतर पैशांची बोलणी सुलेमान याने मुख्य हल्लेखोर रमेश दलवाई याच्याशी केली होती. सुलेमान हा आश्पाकचा चुलत भाऊ असून बिच्चू याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या कटात सामील असल्याचा आरोप ठेवून सुलेमान बेंग्रे (५१) याला काल रात्री पणजी पोलिसांनी अटक केली. बेती वेरे येथे राहणारा सुलेमान बेंग्रे हा व्यवसायाने दुचाकीने भाडी मारणारा "पायलट' असून आश्पाकतर्फे खंडणीचे सर्व पैसे हाच गोळा करीत होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
न्यायालयीन कोठडी असलेल्या बेंग्रे याने बिच्चू याच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिल्यानंतर सुलेमान याने रमेश दलवाई याच्याशी सतत संपर्क ठेवला होता. तर, हल्ल्याच्या आदल्या दिवशी आश्पाक बेंग्रे जुन्ता हाऊसमधे असलेल्या जलद न्यायालयात एका सुनावणीसाठी हजर राहण्यास आला असता त्याठिकाणी रमेश दलवाई आणि सुलेमान याने त्याची भेट घेतली होती. असे तपासात उघड झाल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी संदेश चोडणकर यांनी सांगितले. सुलेमान याला आज न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून १३ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
आश्पाक तुरुंगात पोचल्याने त्याची जागा बिच्चू याने घेतली. सर्व अनैतिक धंद्याची रक्कम बिच्चू आपल्याजवळ ठेवत असल्याची माहिती बेंग्रे पर्यंत पोचल्याने बिच्चूचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. त्यासाठी सुलेमान आणि शाम याने तुरुंगात असलेले आश्पाकची अनेक वेळा भेट घेतल्याचे उघड झाले आहे. त्याप्रमाणे वैद्यकीय चाचणीसाठी इस्पितळात आणते वेळी, सुनावणीसाठी न्यायालयात आला असता त्या त्या ठिकाणी त्याची भेट घेऊन हल्ल्याचा कट रचण्यात आला, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिच्चू याच्यावर दि. २६ रोजी प्रथम वर्ग न्यायालयाच्या बाहेर हल्ला झाला, तर, दि. २५ रोजी जलद गती न्यायालयात रमेश आणि सुलेमान याने आश्पाकची भेट घेतली होती. त्याचठिकाणी "सुपारी'चा पहिला हप्ताही रमेशला देण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही रक्कम केवढी होती, त्यातील किती रक्कम आगाऊ दिली, हे अद्याप स्पष्ट होत नसल्याचे निरीक्षक चोडणकर यांनी सांगितले.

Sunday 29 November, 2009

गुंड बेंग्रेला पोलिस कोठडीत घेण्याच्या हालचालींना वेग

बिच्चूवरील हल्लेखोरांना सहा दिवसांची पोलिस कोठडी
बिच्चू याच्या खुनाचीच 'सुपारी' दिल्याचे उघड

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) : गुंड 'बिच्चू' याच्यावर खुनी हल्ला करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आश्पाक बेंग्रे पोलिसांच्या ताब्यात येताच त्यावर अधिक प्रकाश पडणार असल्याचा दावा पणजी पोलिसांनी केला आहे. दरम्यान, तुरुंगातून "सुपारी' देऊन हा हल्ला घडवून आणणारा कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे याला पोलिस कोठडीत घेण्यासाठी येत्या सोमवारी न्यायालयात अर्ज सादर केला जाणार असल्याचे पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले. या खुनी हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व म्हणजे सहा संशयितांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली.
या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता असल्याचे श्री. चोडणकर यांनी सांगितले. हल्ला झाल्यानंतर त्यातील हल्लेखोरांना तातडीने गजाआड केल्याबद्दल पणजी पोलिसांचे
कौतुक होत आहे. कारण, अजून काही तासांचा उशीर झाला असता तर हल्लेखोर गोव्यातून पसार झाले असते, असे सूत्रांनी सांगितले.
खुनाचीच "सुपारी' होती...
बिच्चू याला कायमचा संपवण्याची ही सुपारी होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. हे केवळ सहा जणांचे काम नसून या हल्ल्याचा कट रचण्यात अजून काहीं जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. हा हल्ला करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याची प्राथमिक माहिती उघड झाली असली तरी, ते पैसे देण्यात आले होते की द्यायचे होते, हे पैसे कोण देणार होता, तसेच हल्ल्यात वापरण्यात आलेले चॉपर कोणी उपलब्ध करून दिले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांचे यश...
बिच्चू या गुंडावर प्रत्यक्ष हल्ला करणारा रमेश दलवाई हा बेळगावचा, तर मोहंमद रेहमान हा दिल्लीचा
असल्याने त्यांना कोणीही ओळखत नव्हते. तसेच त्यांची कोणतीही विशेष माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. म्हणून त्यांना अटक करणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
या हल्ल्यामागे अश्पाकचाच हात असल्याची प्राथमिक खात्री पोलिसांची झाली होती, त्यादिशेने पोलिसांनी तपासकाम सुरू केले असता, हल्लेखोर कुठे लपले आहेत, याची माहिती पोलिसांच्या हाती आली. त्या दिवशी रमेश, मोहंमद आणि दुचाकी चालवणारा संजय लिंगुडकर हे तिघे थेट मडगावला गेले होते. मडगाव कदंब बसस्थानकावर त्यांनी ती दुचाकी सोडली आणि तेथून ते पुन्हा पणजीला आले. त्यानंतर ते वास्कोला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु मडगाव येथून ते पणजीला कसे आले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
हल्लेखोर वास्को येथे भाड्याच्या खोलीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्यासह अन्य पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना अटक केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक तुषार लोटलीकर, राहुल परब, रत्नाकर कळंगुटकर, तर पोलिस हवालदार उल्हास खोत, ज्युलियो दिनिज, अभय देसाई व श्रीराम साळगावकर तसेच, पोलिस शिपाई शेखर आमोणकर, नीलेश नाईक, शिवाजी शेटकर व राया मांद्रेकर यांचा सहभाग होता.

हळदोणे ग्रामसभेत आज पायवाटेचा मुद्दा गाजणार

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): हळदोणे पंचायत क्षेत्रातील खोर्जुवे-कोळम येथे बांधण्यात आलेल्या एका बांधकामामुळे अनेक वर्षांची वाट बंद होऊन शेतात तसेच गणेशविसर्जनाला नदीकाठी जाण्याचा मार्गच बंद झाला आहे, अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी पंचायतीकडे केली आहे. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करीत हा मुद्दा "क्षुल्लक'असल्याचे सांगून तो उद्याच्या ग्रामसभेत उपस्थित करण्यासही पंचायतीने संमती नाकारली आहे. रविवारी होणारी हळदोणेची ग्रामसभा याच मुद्यावरून गाजण्याची शक्यता असून, पंचायतीने याबाबत घेतलेल्या पक्षपाती भूमिकेवरून गदारोळ माजण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. हे बांधकाम एका नामवंत चित्रपट अभिनेत्याचे असल्याने त्यावर कारवाई करण्यात कुचराई केली जात असल्याची चर्चा या भागात सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोळम येथील सदर "बांधकाम' नगरनियोजन खाते, म्हापसा यांनी बेकायदा ठरवून, ही जागा किनारी नियामक विभाग (सीआरझेड) खाली येत असल्याने तेथे केलेले कोणतेही बांधकाम कायदेशीर ठरु शकत नाही,असे २४ सप्टेंबर २००८ रोजी लेखी पत्रात पंचायतीला कळविले आहे. या पत्रावर वर्टीका डागूर या नगरनियोजकाची सही आहे. सर्व्हे क्रमांक ४२\२ मध्ये एक जुने पडके घर होते, त्या जागेसह बाजूची ४२\१ ही जागा खरेदी करून या ठिकाणी एक एकमजली छोटी इमारत उभी राहिली आहे. या दोन्ही जागा एकत्रित करण्यात आल्याने त्यामधून जाणारी पायवाट आता कायमची बंद झाली आहे. ग्रामस्थांनी आपल्याला कुठल्याही एका बाजूला वाट देण्याची केलेली विनंती फेटाळून हे बांधकाम उभे राहिले आहे.या बांधकामाला ग्रामस्थांनी हरकत घेतल्यावर पंचायतीने नव्या घराला दिलेला जुन्या घराचा क्रमांक मागे घेण्यात आला व ते बांधकाम पाडण्याचा आदेश १८ एप्रिल २००९ रोजी दिला होता. त्यानंतर आता पंचायतीने तेच बांधकाम "फार्महाऊस' म्हणून कायदेशीर करण्याचा ठराव घेतला आहे,अशी माहिती मिळाली आहे. यासंबंधी ३० ऑक्टोबर २००९ रोजी पंचायतीने अशा आशयाचा ठराव संमत केल्याचे सांगण्यात येते. खरेदीपत्र करून ही जागा कायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आलेली असली तरी त्यानंतरचे बांधकाम मात्र बेकायदा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, पंचायतीने ते मोडण्याचा आपलाच आदेश बदलून आता "सीआरझेड' कक्षेतील हे घर कायदेशीर करण्याचा घाट घातला असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

'आमचे आबा' ; भारती हेबळे

यंदा बोरकरांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ होत आहे. त्यासाठी खाजगी व सरकारी पातळीवर आत्यंतिक प्रेमाने व आत्मियतेने ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत. बोरकरांना जाऊन आज २५ वर्षे लोटली तरीही लोक त्यांना विसरलेले नाहीत ते कालही प्रिय होते, आजही आहेत व असेच अमर राहतील. त्यांच्याबद्दल वाटणारा अमाप स्नेह, त्यांच्या कवितेद्दलची ओढ व प्रेम पाहून माझं मन भरून आल आहे. मला खात्री आहे हे सर्व त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांतीच देईल.
माझ्या वडिलांना आम्ही "आबा' म्हणायचो. त्यांचा मित्र परिवार फार मोठा. प्रांताप्रातातून त्यांचे मित्र आहेत. ते नेहमी म्हणायचे मित्र म्हणजे माझी बॅंक. त्यांनी या सगळ्यांवर जीवापाड प्रेम केले. ते म्हणायचे हेच माझे बलस्थान आहे. त्यांच्याकडून अमाप प्रेम, भरपूर आशीर्वाद मिळविणे हेच मी अधिक महत्त्वाचे मानतो.
आबांचा संसारही मोठा होता. आम्ही सहा बहिणी व दोन भाऊ. आमचे बालपण पुण्यात गेले. आमच्याकडे मोठमोठे लेखक, कवी यायचे त्यांना जवळून पाहायचे भाग्य आम्हाला लाभले. तेव्हा मैफली व्हायच्या. आबा अगदी उत्साहात, तन्मयतेने सुरेल आवाजात कविता गाऊन दाखवायचे. त्यामुळे वेळेचे भान नसायचे. भूक तहान हरपायची.
आबांची प्रेमळ सावली आम्हा सर्व भावंडाना गतजन्मीच्या पुण्याईमुळे लाभली.
त्यांचे संस्कार, परंपरा कायम राखून आम्ही भावंडे एकीचे वैभव जगापुढे मिरवित आहोत. आबांनी आम्हा सर्वांना एक गोष्ट मनावर बिंबवण्यास सांगितली आणि ती त्यांच्याच शब्दात सांगते. "न्यायाला ईश्वर नेहमीच सहाय्य करतो, अन्यायाचे कौतुक समाजाने कितीही केले तरी त्या कौतुकाचे वैभव अकाली येणाऱ्या मेघाप्रमाणे थोड्याच काळात विफल होते. सत्याचा जय होतो'.
आबांनी आम्हाला विचार करण्यास शिकविले. जीवनावर उत्कट पे्रम करण्यास शिकविले. वेळोवेळी आमच्यात जीवनमुल्ये रूजवली व आम्हाला संस्कारीत बनवले. प्रसंगी तत्वज्ञान सांगून धीट बनवले. त्यांच्या कृतीतून प्रसन्न राहून जीवनप्रवासकसा करावा हे आम्ही शिकलो.
आपल्या जीवनकार्याचा निर्णय आम्ही तर्क व स्वतःच्या बुद्धीद्वारे घेतला पाहिजे हे अमृतवचन त्यांनी आमच्या मनावर जणू कोरून ठेवले आहे.
मनाची उदारता, त्यागवृत्ती जेवढी व्यापक करणे शक्य आहे तितकी करावी व तोच खरा मानवधर्म असा उपदेश ते आम्हाला करीत असत. गृहनीतीचे रूप उदात्त आहे. तुम्ही हे आपल्या आचरणात आणाल तर तुमच्या संसारात स्वर्ग अवतरण्यास मुळीच वेळ लागणार नाही असे ते वारंवार सांगत असत.
गोव्यात भाषावाद जेव्हा बोकाळला तेव्हा समाजाने त्यांच्यावर टीकेचे आसून ओढले. तरीही ते शांत राहिले. त्यांचा एक विशेष गुण म्हणजे त्यांनी विरोधकांची कधीच निंदा केली नाही. कोणाविरुद्ध अपशब्द उच्चारला नाही. ते आम्हाला नेहमी सांगत चांगले ते घ्यावे. त्यांना कुणाचीच असुया नव्हती. जे काही मिळेल त्यात ते तृप्त होते.
"घेण्यातील सुख कळले बाई देण्याला त्या मितीच नाही या वृत्तीमुळे पै पाहुण्यांची सरबराई करण्याचे व्रत त्यांनी हौसेने स्वीकारलेले, त्यात पुन्हा गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. या स्थितीतही त्यांचा गृहस्थाश्रम नेटकेपणाने पार पडला. आपल्या यशाचे श्रेय ते आमच्या आईला देतात. तिने त्यांना दिलेली साथ वाखाणण्यासारखीच.
आबा मला सदैव आमच्या सोबत वाटतात. त्यांची रेडिओवरील गाणी, त्यांच्या ऍडिओ कॅसेटस त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. पाठीवर वात्सल्याने फिरलेला त्यांचा स्पर्श सुखावून जातो. आबा एक श्रेष्ठ कवी, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, पत्रकार, कादंबरीकार, कथाकार, अनुवादक, संपादक असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. म्हणूनच असा पिता लाभल्याबद्दल मला धन्य धन्य वाटते.

ढवळी अपघातात तरुण जागीच ठार

फोंडा, दि.२८ (प्रतिनिधी): ढवळी फोंडा येथे आज सकाळी ६.४० च्या सुमारास मालवाहू ट्रकची (जीए ०२ यू ६४८९) धडक बसून हिरोहोंडा मोटरसायकलवरील (जीए ०८ एल २२८७) संदीप गोपाळकृष्ण शेट (रा. तिस्क फोंडा) हा तेवीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला.
यासंबंधी मिळालेले माहितीनुसार, तिस्क फोंडा येथे राहणारा संदीप शेट (२३ वर्षे) हा युवक वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात कामाला होता. पहिल्या पाळीला कामावर जाण्यासाठी आपल्या मोटर सायकलवरून जात असताना ढवळी येथे विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात संदीप जागीच मरण पावला. हा ट्रक मडगावहून फोंड्याला येत होता. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
फोंडा पोलिसांनी ट्रक चालक शुभम पंढरी केरकर याच्यावर बेदरकार वाहन हाकून युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून केरकर याला अटक केली आहे. या प्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, हवालदार श्यामराव देसाई तपास करीत आहेत.

लतादीदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान जाहीर

मुंबई, दि. २८ : गानकोकिळा लता मंगेशकर यांना फ्रान्स सरकारने "ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' हा सन्मान बहाल करण्याचे जाहीर केले असून २ डिसेंबर रोजी हा समारंभपूर्वक दिला जाणार आहे.
भारतातील फ्रान्सचे राजदूत जेरोम बोनाफॉनते यांनी ही माहिती दिली. संगीत जगतातील लतादीदींचे योगदान लक्षात घेऊन त्यांना हा सन्मान दिला जात आहे. फ्रान्सने नेहमीच कला आणि कलावंतांचा सन्मान केला आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजाचे केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगात चाहते आहेत. गेल्या ६० वर्षांपासून त्यांनी आपले स्थान अढळ ठेवले आहे.
२ डिसेंबरपासून भारतात सुरू होणाऱ्या फ्रेंच चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात दीदींना हा सन्मान दिला जाणार आहे. लता मंगेशकर यांच्यापूर्वी सत्यजीत रे आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांना फ्रान्स सरकारने या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे. हा फ्रान्स सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याची सुरुवात नेपोलियन बोनापार्टने १८०२ मध्ये केली होती. हा सन्मान फ्रेंच नागरिक किंवा विदेशी कलावंतांना दिला जातो.

इफ्फीच्या वाटचालीबद्दल समाधानी: खान

पत्रकारांनी त्रुटींकडे लक्ष वेधले
पणजी, दि. २८ (विशेष प्रतिनिधी): भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्या गतीने पुढे सरसावत आहे त्यासंबंधी आज महोत्सवाचे संचालक एस. एम. खान यांनी समाधान व्यक्त केले. आत्तापर्यंत ६५०० प्रतिनिधींची नोंदणी झाली असून, महोत्सवातील पुन्हा प्रदर्शित करण्यात येणाऱ्या चित्रपटांसहित सर्व चित्रपट "हाउसफुल' होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना खान यांनी, उत्कृष्ट चित्रपट निवड तसेच प्रख्यात दिग्दर्शकांच्या उपस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय व इंडियन पॅनोरमातील चित्रपटांच्या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या दिवसांत इफ्फीतील सहभाग व प्रतिसाद वाढतच राहणार असल्याचे ते पुढे म्हणाले. ३० रोजी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर आयोजित करण्यात आलेला "टी-२०' चित्रपटांचा निकाल आणि "फिल्म फॅशन शो' हे आकर्षण ठरणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अजय शुक्ला या फॅशन शोचे सूत्रधार असून चित्रपट सृष्टीतील नामवंत व्यक्ती त्यावेळी हजर राहणार आहेत. यात भाग घेणारे मॉडेल्स देविका राणी ते राणी मुखर्जी पर्यंतच्या कालावधीतील फिल्ममधील फॅशन यावेळी प्रदर्शित करणार आहेत.
३ डिसेंबर रोजी समारोप सोहळ्यास इतर मान्यवरांसोबतच प्रसिद्ध अभिनेते मामुट्टी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेत, पत्रकारांनी आयोजनातील त्रुटीवर त्यांचे लक्ष वेधले व आयोजकांनी त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आयनॉक्स संकुलातील अन्न पदार्थांच्या दरातील भरमसाठ वाढीसंबंधी काहीजणांनी तक्रार केली. तर काही जणांनी १८ जून रस्त्यावर, इफ्फी प्रतिनिधींसाठी सूट देण्याचे जाहीर करूनही रेस्टॉरंटमधून कॉफी ५२ रुपये प्रमाणे विकण्यात येत असल्याचे सांगताना, त्यापेक्षा बियर स्वस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मनोरंजन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव आणि मनीष देसाई उपस्थित होते.