Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 14 April, 2011

असंवेदनशीेल सरकारला मांडवीत बुडवाः फोन्सेका

• मलेरिया कर्मचार्‍यांकडे सरकारचे दुर्लक्षच
• मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्याच्या बंगल्यावर धडक देणार

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
गेले वर्षभर सर्व सामान्य कष्टकरी लोकांची राज्यातील आंदोलने पाहता गोव्यात सरकार अस्तित्वात आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा या असंवेदनशील सरकारला मांडवीत बुडवण्याची गरज आहे, अशी टीका आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी आज (दि.१३) केली.
गेले सात दिवस आपल्या न्याय्य हक्कासाठी आरोग्य संचालनालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया कर्मचार्‍यांची आज श्री. फोन्सेका यांनी भेट घेतली व त्यांना आयटकचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. या वेळी त्यांनी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांसह कॉंग्रेसच्या लोकविरोधी धोरणावर कडाडून टीका केली.
कर्मचार्‍यांना कायम करा ः मामी
सत्ताधारी पक्षातील एकमेव महिला आमदार असलेल्या विक्टोरिया फर्नांडिस यांनी या कर्मचार्‍यांची आज भेट घेतली. १५ वर्षे सेवा करणार्‍यांना सेवेत कायम करणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगून आपण मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांशी याबाबत बोलू असे आश्‍वासन दिले.
गेली पंधरा वर्षे मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणार्‍या ५९ कर्मचार्‍यांनी दि.७ पासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाची सरकारने जरासुद्धा दखल न घेतल्यामुळे समाजातील विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेले सात दिवस उपोषण करणार्‍या या कर्मचार्‍यांतील अनेकांची प्रकृती खालावली असून त्यांच्या जिवाचे बरेवाईट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर तसे घडले तर त्याची जबाबदारी सरकारवर राहील असा इशारा प्रेमदास गावकर यांनी दिला असून दोनापावला येथे आरोग्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषण सुरू करण्यात येईल व मागण्या मान्य होईपर्यंत किंवा मरेपर्यंत हे उपोषण तेथेच सुरू राहील असे त्यांनी सांगितले.

No comments: