Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 2 June, 2011

दहावीचा निकाल केव्हा?

• पालकांत संभ्रम • सरकारी पातळीवर गोंधळ

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
विद्यमान सरकारने शिक्षणखात्याचा संपूर्ण बट्ट्याबोळ करण्याचा विडा उचललेला आहे की काय? असा प्रश्‍न प्रत्येक गोवेकर आज विचारत आहे. अशा घटनाच शिक्षण खात्यात सध्याच्या घडीला घडत आहेत. बारावीच्या निकालाचा घोळ अजून संपलेला नसतानाच आता दहावीच्या निकालाचा घोळ सुरू झाला आहे. ११ वीचे वर्ग दि.६ जूनपासून सुरू होत आहेत आणि तरीसुद्धा गोवा सरकार दहावीचा निकाल जाहीर करत नाही. त्यामुळे दहावीचा निकाल केव्हा? उच्च माध्यमिक विद्यालयात आपल्या मुलांनी प्रवेश केव्हा घ्यावा? असे प्रश्‍न पालक विचारत असून सरकार दहावीच्या निकालाची तारीख पुन्हा पुन्हा पुढे ढकलत असल्याने दहावीच्या विद्याथ्यार्ंत व त्यांच्या पालकांत तीव्र असंंतोेष पसरला आहे.
दरम्यान इंग्रजी माध्यम विरोधात भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे करण्यात येत असलेल्या आंदोलनाला तळागाळातून भव्य पाठिंबा मिळत असल्याने सरकार हादरले आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून बारावीच्या निकालाचा गोंधळ व आता दहावीच्या निकालास होणारा विलंब हा या गोंधळाचाच परिणाम असल्याची माहिती मिळाली आहे. माध्यम प्रश्‍नी निर्णय घेताना घाई झाल्याचे सत्ताधारी आमदार व काही मंत्री आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असल्याने सदर निर्णयाचे काय करावे? या विवंचनेत मुख्यमंत्री असल्याचे कळते. त्यामुळेच शिक्षण अधिकार्‍यांना प्रसिद्धिमाध्यमांना काही सांगू नका, फक्त विचार चालू आहे! एवढेच सांगा असा अलिखित आदेश शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याचे कळते.

No comments: