Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 2 July, 2011

विष्णू वाघांच्या कविता स्वरबद्ध करणार : श्रीधर फडके

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): ''स्वर, लय, ताल, शब्दोच्चार आणि भाव या सर्वांचा सुयोग्य मिलाफ म्हणजेच सुगमसंगीत. गोमंतकीय कवी बाकीबाब बोरकर यांच्या कविता मी संगीतबद्ध केल्या आहेत. कवी विष्णू वाघ यांच्या कविताही उत्कृष्ट असून येत्या काही दिवसांत त्यांनाही मी स्वरबद्ध करणार आहे'', असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी आज केले.
उद्या दि. २ रोजी पणजीत आयोजित सुगमसंगीत कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीधर फडके गोव्यात आले असून त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. यावेळी 'स्वरधारा' संस्था गोवाच्या अध्यक्ष ज्योती बांदेकर, रजनी ठाकूर, नीलम फातर्फेकर व तारानाथ होळगद्दे उपस्थित होते.
वडील सुधीर फडके व आई ललिता देऊळकर यांच्यामुळे आपणावर संगीताचे संस्कार झाले. पूर्वी शब्दाला महत्त्व होते, आता तालाला जास्त महत्त्व आले आहे. मात्र काही दिवसांनी काळ बदलेल व 'मेलडी'ला पुन्हा मागणी येईल, असे मतही पुढे बोलताना श्रीधर फडके यांनी व्यक्त केले. संगीतकारांच्या संगीत रचनेवर गाण्याचे यश अवलंबून असते. भावगीत व गझल हे दोन भिन्न प्रकार आहेत. गझल एक वृत्त असून त्याची मांडणी व सादरीकरण वेगळे आहे तर भावगीत हा वेगळा प्रकार आहे, असे सांगून काही कोकणी गीतेही आपण संगीतबद्ध केल्याचे ते म्हणाले. सध्या दूरदर्शनवर लहान मुलांच्या भरपूर स्पर्धा होतात. त्यांचे भवितव्य काय, असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, कमी वयात भरपूर गायन केल्याने मोठेपणी आवाज साथ देत नाही. त्यामुळे कमी वयात चमकणारी मुले पुढील काळात अभावानेच यशस्वी होतात. या बाबत पालकांनी मुलांना शास्त्रीय संगीत शिकवणे गरजेचे असून प्रथम शिक्षण व तद्नंतर गायन हीच पद्धत असावी.
दि. २ व ३ जुलै रोजी कला अकादमीच्या सभागृहात 'स्वरधारा' संस्थेतर्फे आयोजित सुगमसंगीत कार्यशाळेत सहभागी गायकांना सुगम संगीतातील बारकावे व श्रीधर फडके यांनी गायिलेली तथा संगीतबद्ध केलेली गाणी शिकवण्यात येणार आहेत.

No comments: