Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 28 June, 2011

कोकण किनारपट्टी ड्रग्जचे प्रवेशद्वार

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गोव्याला लागून असलेल्या दक्षिण किनारपट्टीमार्गे गोव्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा आज केंद्रीय अमली पदार्थ विरोधी अन्वेषण विभागाचे अधीक्षक अशोक ठक्कर यांनी केला. हिमाचल प्रदेश तसेच उत्तर भारताच्या अन्य भागांतून अमली पदार्थ गोव्याच्या हद्दीत पोचतो, असे त्यांनी सांगितले. ते आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आल्तिनो येथे राखीव पोलिस दलात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.
ही तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. या किनार्‍यावर अमली पदार्थ उतरवले जातात व तेथून स्थानिक लोकांच्या वाहनातून ते गोव्यात आणले जातात. सहसा त्यांच्यावर संशय घेतला जात नसल्याने ड्रग्ज खुलेआम गोव्याच्या बाजारपेठेत पोहोचतात, असे ते म्हणाले. नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असलेल्या स्थळांवर विशेष नजर ठेवण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
गोव्याची किनारपट्टी पर्यटकांनी खचाखच भरायला लागल्याने गोव्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या तारकर्ली आणि मालवण किनारपट्टीवर विदेशी पर्यटकांची गर्दी वाढायला लागली आहे. श्री. ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार ही किनारपट्टी म्हणजे अमली पदार्थाची तस्करी करणार्‍यांचे प्रवेशद्वार आहे. गेल्या काही महिन्यात केंद्रीय अमली पदार्थ अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात हे उघडकीस आले आहे.
गोव्यात हिमाचल प्रदेशमधील नोंदणीकृत वाहन चटकन लक्षात येते. त्यामुळे तेथील वाहनातून आणलेले अमली पदार्थ महाराष्ट्र नोंदणीकृत वाहनात घातले जाते. त्यानंतर ते गोव्यात आणले जातात. गेल्या काही महिन्यांत सावंतवाडी येथे टाकलेल्या छाप्यात ३.५ किलो ‘कलाना क्रीम’ जप्त करण्यात आली होती. याची लागवड केवळ हिमाचल प्रदेशमध्येच केली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

No comments: