Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 30 June, 2011

अटकपूर्व जामिनासाठी अधिकार्‍यांची पळापळ

चंद्रू गावस मृत्यू प्रकरण
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): वरिष्ठांच्या सतावणुकीला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करलेल्या चंद्रू गावस या ‘सीआयडी’ पोलिस चालकाच्या मृत्यूने अनेक पोलिस अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष न्यायदंडाधिकार्‍यांनी घेतलेला चंद्रूचा मृत्युपूर्व जबाब उद्या दि. ३० रोजी न्यायालयात वाचला जाणार आहे. मात्र, आज रात्री उशिरा या प्रकरणात संशयित म्हणून चर्चेत आलेले पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर, महिला निरीक्षक सुनीता सावंत व गुन्हा नोंद झालेले निरीक्षक प्रवीणकुमार वस्त या तिघांनीही अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केल्याची माहिती आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दि. २५ रोजी अस्वस्थ वाटायला लागल्याने चंद्रूला पणजीतील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचे नाव समीर नाईक असे नोंद का करण्यात आले याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, सीआयडी विभागात रेटॉल घेतलेल्या चंद्रू याला एका तरुणीने इस्पितळात दाखल केले होते, अशीही माहिती पुढे आली आहे.
मृत्युपूर्व जबाब फुटला?
उद्या न्यायालयात चंद्रू याचा मृत्युपूर्व जबाब उघडला जाणार आहे. मात्र, त्याआधीच या प्रकरणातील संशयित पोलिस अधिकार्‍यांच्या नावाने पोलिस तक्रार दाखल झाल्याने हा अहवाल आधीच फुटला होता का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मिकी पाशेको यांनी केलेल्या तक्रारीत तीन पोलिस अधिकार्‍यांच्या नावांचा सरळसरळ उल्लेख करून तेच चंद्रूच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचीही मागणी केली आहे. सदर तीन अधिकारी चंद्रू याच्या आत्महत्येला जबाबदार असल्याची माहिती तक्रारदाराला कुठून मिळाली, याचाही तपास पोलिस घेत आहेत.

No comments: