Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 26 June, 2011

..तर कामत सरकार भस्मसात होईल!

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मातृभाषाप्रेमींचा विराट मोर्चा
मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन चर्चच्या दबावाखाली असलेल्या मंत्र्यांनी व पर्यायाने दिगंबर कामत सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी गोमंतकीयांना व शिक्षणतज्ज्ञांना विश्‍वासात न घेता इंग्रजीकरणाचा निर्णय घिसाडघाईने घेतला आहे. हा निर्णय भावी पिढीचे कधीही न भरून येणारे नुकसान करणार आहे. दिगंबर कामत यांनी गोव्याच्या भवितव्याचा विचार करून या निर्णयात बदल करावा, अन्यथा जनतेच्या उद्रेकात हे सरकार भस्मसात होऊन जाईल, अशा इशारा मडगाव येथील लोहिया मैदानावर झालेल्या प्रचंड जाहीर सभेत एकमुखाने देण्यात आला.
भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे आज पिंपळकट्ट्यावरून छत्री मोर्चा काढण्यात आला. मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली श्री दामबाबाला साकडे घालून मोर्चास प्रारंभ झाला. त्यात युवक - युवती, साहित्यिक, व्यापारी, राजकारणी, शिक्षक, भाषातज्ज्ञ आदींनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. हजारोंच्या संख्येने निघालेला मोर्चा बाजारातून पालिका उद्यानाला वळसा घालून लोहिया मैदानावर आला. यावेळी दिगंबर कामत सरकारविरोधातील घोषणांनी मडगाव दणाणून गेले.
लोहिया मैदानावरील सभेत शशिकला काकोडकर यांच्याबरोबरच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, युगोडेपाचे सरचिटणीस आनाक्लात व्हिएगस. डॉ. राजेंद्र हेगडे, भिकू पै आंगले, कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक, फा. माऊजिन आताईद, अरविंद भाटीकर, पुंडलीक नाईक, समीर केेळेकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, उदय भेंब्रे यांची कामत सरकारचा निषेध करणारी भाषणे झाली.
या देशात सर्वांना स्वातंत्र्य असले तरी संस्कृतीसाठी आणि मातृभाषेसाठी झटणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री कामत हे एकतर देवदर्शनाला जातात नाहीतर दिल्लीत असतात; त्यामुळे गोमंतकीयांची मते ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो, असा टोला यावेळी श्रीमती काकोडकर यांनी हाणला. ‘फोर्स’ने ५२ हजार पालकांच्या सादर केलेल्या सह्या बनावट असल्याचा आरोप करून प्रशांत नाईक म्हणाले की, ४० आमदारांच्या विधानसभेत केवळ १० आमदारांच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्री कामत यांनी गोव्याची संस्कृतीच नष्ट करण्याचा अत्यंत घातकी निर्णय घेतला आहे.
ऍड. आनाक्लेत व्हिएगस यांनी तर कामत सरकारवर तोफच डागली. चर्चिल आलेमावसारखे मंत्री गोव्याची संस्कृती नष्ट करण्यासाठी निघाले आहेत. इंग्रजीकरणाच्या नावाखाली ते गोमंतकीयांत फूट पाडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी अरविंद भाटीकर, पुंडलीक नाईक यांनी चर्चसंस्थेने मंत्र्यांना हाताशी धरून रचलेला हा कुटील डाव असल्याचे प्रतिपादन केले. सरकारच्या देखरेख समितीने या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून त्याला चपराक दिली असल्याचे पुंडलीक नायक म्हणाले. जनतेचा विश्‍वासघात करणार्‍या या सरकार विरोधात जनता सर्वशक्तीनिशी एकत्र येईल व त्या झंझावातात हे सरकार पाल्यापाचोळ्यासारखे उडून जाईल, असा इशारा प्रा. वेलिंगकर यांनी दिला. पोर्तुगिजांनी येथील संस्कृती मारून टाकण्याचा प्रयत्न केला. आता उरलीसुरली कसर हे चर्चप्रणित मंत्री भरून काढत आहेत, असा टोला उदय भेंब्रे यांनी हाणला व सरकारने या निर्णयात तात्काळ बदल करावा, अशी मागणी केली.

No comments: