Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 April, 2011

सरकारच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित

वास्कोत कडकडीत बंद
वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): ‘खारीवाडा ऍफेक्टेड पीपल्स’ने केलेल्या आवाहनाला अनुसरून खारीवाडावासीयांच्या समर्थनार्थ वास्कोतील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरातील व्यवहार आज पूर्णपणे ठप्प होते. तसेच, मुरगाव बंदराजवळ जलमार्ग अडवण्यात आल्याने एमपीटीला आजही कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. दरम्यान, संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या समितीच्या पाचही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. तथापि, सरकारने दिलेले आश्‍वासन पाळले नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा संध्याकाळी येथे घेण्यात आलेल्या सभेत देण्यात आला.
न्यायालयीन आदेशानुसार खारीवाडा येथील ६६ घरे पाडण्यात आल्यानंतर या ठिकाणी संतापाची लाट उसळली होती. यामुळे १४ रोजी मध्यरात्रीपासून समुद्री वाहतूक रोखून धरण्यात आली होती. यानंतर आज १६ रोजी वास्को बंदचे आवाहन करण्यात आले होते. जलमार्गावर नांगरून ठेवलेल्या शेकडो नौकांमुळे एमपीटीमध्ये होणारी वाहतूक आजही ठप्प होती. यामुळे एमपीटीला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. जिल्हाधिकार्‍यांनी जलमार्गावरील नौका हटवण्याचे आदेश जारी करूनही किनारा रक्षक दल तसेच नौदलातर्फे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे, कालपासून अडकून पडलेल्या खनिजवाहू बार्जेस त्याचठिकाणी नांगरून ठेवण्यात आल्या होत्या.
खारीवाडावासीयांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वास्कोमधील सर्व दुकाने बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यात मासळी मार्केट, भाजी मार्केटचा समावेश होता. तसेच, खारीवाडा येथील आपद्ग्रस्तांनी आजही येथील पालिका इमारतीसमोरील धरणे आंदोलन करून सरकारी कृतीचा निषेध केला. यात महिलांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले. आजच्या आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, संध्याकाळी ‘खारीवाडा ऍफेक्टेड पीपल्स’चे शिष्टमंडळ, एमपीटीचे अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन समितीच्या पाचही मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले. खारीवाडा येथील घरांना पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्याचे आश्‍वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
पर्वरी येथे झालेल्या बैठकीनंतर खारीवाडा येथे घेण्यात आलेल्या सभेत फादर बिस्मार्क डायस यांनी हा जनतेचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. या आंदोलनाला कोणत्याच मंत्र्याचा पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळे जनशक्तीचे खरे दर्शन घडल्याचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांना संबोधित करताना ते म्हणाले. खारीवाडा येथील घरांवर कारवाई होणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली असून येथील ६६ घरे जमीनदोस्त केल्यानंतर ठेवण्यात आलेले राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना उद्यापासून हटवण्यात येईल तसेच एमपीटीच्या कार्यक्षेत्राबाबत केंद्र सरकारशी बोलणी करणार असल्याचे राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परंतु, सरकारने आश्‍वासन पाळले नाही तर पुन्हा आंदोलन उभारण्याची तयारी असल्याचे जाहीर करण्यात आले. सर्व धर्मीयांच्या प्रार्थना सादर करून बैठकीची सांगता करण्यात आली.

No comments: