Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 20 April, 2011

जैतापूर पेटले..

• शिवसैनिकांचा ‘राडा’
• अनेक बसेस फोडल्या
• न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी
• रत्नागिरीमध्ये जमावबंदी
• शहरातील बाजारपेठा बंद
• सर्वत्र कडेकोट बंदोबस्त


जैतापूर, दि. १९ : शिवसेनेने पुकारलेल्या रत्नागिरी ‘बंद’च्या निमित्ताने सुरू असलेली दगडङ्गेक, वाहतूकबंदी, व्यवहार ठप्प अशा पार्श्‍वभूमीवर कलम १४४ अनुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. फ्रान्समधील ‘डाऊ’ कंपनीच्या सहकार्याने जैतापूर येथे होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील तबरेज सेजकर नामक आंदोलकाचा सोमवारी मत्यू झाल्यावर आज शिवसेनेने रत्नागिरी शहरात ‘राडा’ सुरू केला आहे. दरम्यान, न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली.
रत्नागिरी ‘बंद’च्या समर्थनासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. शहरात अनेक बसेसच्या काचा ङ्गोडण्यात आल्या. रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर टायर पेटवण्यात आले. शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केली आहे.
संतापलेल्या आंदोलकांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही ‘राडा’ करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पोलिसांच्या गोळीबारात तबरेज या आंदोलकाचा मृत्यू झाला होता. मात्र आंदोलकांनी आज रुग्णालयात गोंधळ घालून त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ दिले नाही. तरबेज याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आंदोलकांनी काही मागण्या केल्या आहेत त्यात शवविच्छेदनाचे व्हिडीओ शूटिंग व्हावे, याप्रसंगी मानवाधिकार संघटनेचा प्रतिनिधी हजर रहावा, तबरेज याच्यावर एकच गोळी झाडली गेली तर आता त्या दोन कशा सांगितल्या जात आहेत, याचे स्पष्टीकरण केले जावे, गोळीबाराचे आदेश देणारे प्रांताधिकारी अजित पवार यांना निलंबित करा यांचा समावेश आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा परिसर बंद करण्यात आला आहे.
दंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी होणार
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या मच्छिमारांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची दंडाधिकार्‍यांमार्ङ्गत चौकशी करण्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते का, याचीही चौकशी केली जाईल असे गृहमंत्री म्हणाले.
जैतापूरमध्ये संतप्त मच्छिमारांनी साखरीनाटे गावातील पोलिस ठाण्यावर काल हल्ला केला. गावकर्‍यांनी पोलिस चौकी पेटवून दिली, तसेच कागदपत्रांची नासधूस केली. तेव्हा आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात तबरेज सेजकर या मच्छिमाराचा मृत्यू झाला. त्यामुळे जैतापूरमधील संघर्ष आणखीच चिघळला आहे.
अपेक्षेप्रमाणे जैतापूर गोळीबार प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळातही उमटले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.
जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलनात शिवसेनेने जोरदार भाग घेतला आहे. तबरेजच्या बलिदानाची किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशारा देतानाच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, असे जळजळीत वक्तव्य शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

No comments: