Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 19 April, 2011

खारीवाडावसीयांचा अपेक्षाभंग

• इतिवृत्तात फेरबदल झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा
वास्को, दि. १८ (प्रतिनिधी): ‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स समिती’ने सरकारसमोर ठेवलेल्या मागण्यांपैकी दोन मागण्या वगळता इतर मागण्यांत मोठ्या प्रमाणात फेरबदल केल्याचे इतिवृत्तावरून स्पष्ट दिसत आहे. दि. २१ रोजी आम्ही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासोबत बैठकीची मागणी केली आहे. मात्र आमच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन छेडणार असून नंतर आम्हाला गुन्हेगार ठरवू नये असा इशारा फादर बिस्मार्क डायस यांनी दिला आहे.
सुमारे २० दिवसांपूर्वी खारीवाडा येथील ६६ घरे पाडण्यात आल्यानंतर उर्वरित २९४ घरांवर कारवाई होऊ नये यासाठी खारीवाडावासीयांनी सतत दोन दिवस ‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स समिती’च्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडले. ह्या आंदोलनामुळे दोन दिवस ‘एम.पी.टी’चा जलवाहतुकीद्वारे होणारा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला होता. तर दुसर्‍या दिवशी वास्को बंद पुकारल्याने वास्को शहर ठप्प झाले होते. यानंतर यांनी ‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स समिती’ बैठक बोलवून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे ठरवल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. बैठकीच्या दरम्यान झालेल्या चर्चेचे इतिवृत्त आज समितीला देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा खारीवाडा भागात संतापाचे वातावरण पसरलेले असून सरकारने सादर केलेल्या इतिवृत्तात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज उशिरा संध्याकाळी खारीवाडा येथे समितीतर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत येथे उपस्थित असलेल्या शेकडो खारीवाडावासीयांना फादर बिस्मार्क यांनी सदर माहिती देऊन येथील लोकांवर अन्याय करण्यात आल्याचे सांगितले. समितीने ठेवलेल्या मागण्यांपैकी राष्ट्रीय सुरक्षा औद्योगिक दलाचे जवान हटवण्याची व आंदोलनाच्या दरम्यान ज्यांच्यावर तक्रार नोंद झालेली आहे ती मागे घेण्याची आश्‍वासने वगळता इतर मागण्यांत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कामत यांच्याशी आपण संपर्क करून याबाबत चर्चा केली असल्याची माहिती फादर डायस यांनी दिली. २१ रोजी होणार्‍या बैठकीत जर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एक दा आंदोलन छेडण्यास तयार रहा असे आवाहन त्यांनी खारीवाडावासीयांना केले. सदर इतिवृत्त महसूल खात्याने तयार केले असून मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्यावरही आरोप करण्यात आले.
दरम्यान, समितीतर्फे निवडण्यात आलेले वकील ऍड. अतिश नाईक यांनी सरकार फक्त ड्रग माफियांचे, कॅसीनो व अशाच प्रकारचे असून ते गरिबांचे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सदर बैठकीला उपस्थित असलेले ‘पिलेरना सिटीझन फोरम’चे प्रकाश बांदोडकर यांनी खारीवाडा येथील लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आमचा पाठिंबा असल्याचे सांगून पुन्हा आंदोलन छेडल्यास आपण काणकोण ते पेडणेपर्यंत लोक आणून संपूर्ण गोमंतकीय एक असल्याचे दाखविणार असल्याचे सांगितले.

No comments: