Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 April, 2011

खारीवाडावासीयांच्या मागण्यांचे केंद्रीय उद्योगमंत्र्यांना निवेदन

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): खारीवाड्यावरील लोकांच्या मागण्या घेऊन गेलेल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आज केंद्रीय जहाज व उद्योगमंत्री मुकूल वासनीक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आपण आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन यावेळी केंद्रीय मंत्री वासनीक यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला दिले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वाखाली पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर, विरोधी पक्षाचे उपनेते फ्रान्सिस डिसोझा, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक व दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दीन यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
खारीवाड्यावरील लोकांच्या घरांना संरक्षण देऊन ती घरे त्यांच्या नावावर करुन द्यावीत. तसेच, घरे असलेली जमीन ही ‘एमपीटी’ची नाही, असा दावा या सर्वपक्षीय दलाने करुन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी ‘एमपीटी’चे अध्यक्ष पी. मारा पंडियन हेही चर्चेच्यावेळी उपस्थित होते. खारीवाड्यावरील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष गोव्याला भेट देण्याचेही निमंत्रण यावेळी श्री. वासनीक यांना देण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशानंतर खारीवाड्यावरील काही घरे पाडण्यात आली आहे. तर, काही घरांनी प्रशासकीय न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती मिळवलेली आहे. येथील लोकांनी या कारवाईच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडलेले आहे.

No comments: