Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 April, 2011

जगण्याशीच झुंज देणारे दत्ताराम नाईक

शैलेश तिवरेकर
जीवन म्हणजे एक संघर्ष असून या संघर्षाला खंबीरपणे तोंड देऊन जो पुढे जात राहतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो. आपल्या पुढ्यात काय आहे हे पाहत बघण्यापेक्षा पुढ्यातील काट्यांना बाजूला सारून त्याच्यातून मार्ग काढणारी माणसे आजही या दुनियेत आहेत. कामुर्ले दरबारवाडा येथील दत्ताराम शंकर नाईक हे त्यातीलच एक अवलिया. भर तारुण्यात अपघाताने दोन्ही पाय अधू झालेले. शारीरिक अडचणीमुळे व्यवसायावर परिणाम झाला किंबहुना तो बंदच झाला. तरीसुद्धा हा माणूस डोक्यावर हात घेऊन न बसता येणार्‍या संकटांना दोन हात करत स्वकर्तृत्वावर आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत स्वाभिमानाने जगत राहिला. झालेल्या गोष्टींना उगाळत न बसता प्रत्येकवेळी नव्या व्यवसायाला शून्यातून सुरू करून जीवनाशी नव्या दमाने झुंज देत राहिला. इतकेच नव्हे तर आज कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता सुमारे २ लाख रुपये खर्च करत जुन्या घराची पुनर्बांधणी केली.तसेच नव्याने चालत असलेल्या व्यवसायासाठी नवीन फायबर होडीही खरेदिली आहे. आज आपले कष्ट हेच आपले सुख आणि आराम म्हणत आपल्या कुटुंबासोबत दत्ताराम हे जीवनाचा आनंद घेत आहे.
देव देतो त्याला छप्पर फाडून देतो आणि ज्याचे घ्यायचे असेल त्याचा जीवही घेण्याचा प्रयत्न करतो. अशीच कथा या दत्ताराम नाईकची आहे. दरवेळी शून्यातून वर येण्याचा प्रयत्न करणार्‍या या अवलियाला काळाने मात्र प्रत्येकवेळी चिरडण्याचाच प्रयत्न केला. इतकेच नव्हे त्याला झालेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी मतिमंद त्यामुळे आधीच काळाशी झुंजणार्‍या दत्तारामला जीवनातही मानसिक ताण सोसावा लागत आहे. परंतु या स्थितीतही त्यांनी आपला धीर सोडला नाही. काळालाही नमते घ्यायला लावणार्‍या या माणसाने अखेर बाजी मारून काही प्रमाणात का असेना डोके वर काढण्याचा प्रयत्न केलाच आणि त्यात तो यशस्वी पण झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर प्रचंड विश्‍वास असणार्‍या या माणसाचा आज छोट्या प्रमाणात खुबे आणि कालवांचा व्यवसाय बर्‍यापैकी चालत आहे. आपल्या अपंगत्वावर पूर्णपणे मात करणारा हा माणूस भल्या पहाटे आपल्या होडीच्या साहाय्याने नदीत प्रवेश करतो आणि खुबे कालवे घेऊन येतो. गोव्यात खुबे आणि कालवांना चांगल्या प्रमाणात मागणी असल्याने त्यांना आपला माल विकण्यासाठी घरातून बाहेर जावे लागत नाही. घरीच त्यांची पत्नी ते काम करते. या त्यांच्या छोटेखानी पण स्वाभिमान शाबूत ठेवणार्‍या व्यवसायासंदर्भात विचारले असता दत्ताराम म्हणाले की, आपण शून्यातून विश्‍व निर्माण केले आहे. इतरांसाठी हे लहान असेल पण माझ्यासाठी हे माझे विश्‍व आहे. आपल्या कर्तृत्वावर प्रचंड आत्मविश्‍वास असणारे दत्ताराम हे मोठ्या अभिमानाने सांगत होते. आज आपले वय ६१ वर्षे असून बालपणापासूनच आपण जीवनाशी विविध माध्यमातून झुंज देत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी जे माझ्या हाती आले ते माझे पण जे गेले त्याचा कधीच विचार केला नाही. म्हपशाला आपण मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. काही काळ दुचाकी गाडीने भाडे मारण्याचे काम केले. नंतर बेकरीचा व्यवसाय सुरू केला परंतु या दरम्यान काळाने घाव घातला आणि मी कायमचा अपंग झालो. जीवनाशी झुंजत झुंंजत जगणे म्हणजेच खरे जीवन आहे. आजही आपण अपंग असताना १६ हात पाण्यात बुडू शकतो. आता तर दर दिवशी पाण्यात बुडून कालवां काढणे हाच माझा व्यवसाय आहे. मतिमंद असलेली मुलगी वारली. एक मुलगी आहे ती निमसरकारी कंपनीत नोकरी करते आणि व्यवसायही चांगल्याप्रमाणे चालतो त्यामुळे तसा आरामात जीवन जगत आहे. मुलीचे लग्न केले आणि पत्नीसाठी काही तजबीज करून ठेवली की माझ्याएवढा सुखी मीच असेन.
माणूस शरीराने अपंग झाला तरी मनोबलावर तो काय करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दत्ताराम नाईक. त्यांच्या पुढील जीवनात आनंदाचा प्रकाश पडो हीच शुभेच्छा!

No comments: