Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 18 April, 2011

व्यवस्थित आरक्षण नसल्याने खेळाडूंचे रेल्वेप्रवासात हाल

• मुंबई-छत्तीसगड प्रवास उभ्याने
• अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा
• आजपासून आंतरराज्य स्पर्धा

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): छत्तीसगड येथे होणार्‍या आंतरराज्य क्रीडा स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे संबंधित अधिकार्‍यांनी व्यवस्थित आरक्षण न केल्याने त्यांना मुंबई ते छत्तीसगड हा रेल्वेप्रवास उभ्याने करावा लागला.
व्यायामाचे खेळ, बास्केटबॉल, हॉकी आणि बॅडमिंटन खेळण्यास सुमारे ७२ विद्यार्थी गोव्यातून छत्तीसगड येथे उद्यापासून सुरू होणार्‍या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांना कालची रात्र मुंबई रेल्वे स्थानकावर बसून काढावी लागली. त्यानंतर, मुंबई ते छत्तीसगड हा रेल्वेप्रवास उभ्याने करावा लागला.
हे विद्यार्थी काल दि. १६ एप्रिल रोजी मडगाव येथून मांडवी एक्सप्रेसने मुंबईला निघाले होते. त्या रेल्वेत त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित आसने मिळाली होती. आज दि. १७ रोजी त्यांना मुंबई येथून गीतांजली एक्सप्रेसने छत्तीसगड येथे जायचे होते.
‘आम्ही अनेकजण असून केवळ काही जणांचीच तिकिटे आरक्षित झाली आहेत. त्यामुळे आम्हांला उभ्याने प्रवास करावा लागत आहे. काही जण सामानावर बसलेले आहेत’ अशी माहिती या रेल्वेने प्रवास करणार्‍या जोशूवा जॉर्ज या खेळाडूने दिली. एक रात्र रेल्वेस्थानकावर काढून आणि मुंबई ते छत्तीसगड असा प्रवास उभ्याने करून थकलेल्या या खेळाडूंना उद्यापासून सुरू होणार्‍या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. हे विद्यार्थी आज रात्री १० वाजता छत्तीसगड येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ७२ पैकी केवळ ६ विद्यार्थ्यांची गीतांजली एक्सप्रेसची तिकिटे आरक्षित झाली आहेत. ही तिकिटे तत्काळ कोट्यातून आरक्षित करण्यात आली होती. त्यामुळे ती आरक्षित होतील असा विश्‍वास आम्हांला होता, असे या खेळाडूंबरोबर गेलेल्या राज्य क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षकांनी सांगितले. आरक्षण नसल्याने हे विद्यार्थी तीन बोगीत विखुरलेले आहेत. सुट्टीचे दिवस असल्याने बोगी प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे, असेही एका विद्यार्थ्याने सांगितले.
या विषयी राज्य क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांना विचारले असता त्यांनी, ही तिकिटे केंद्र सरकारी संघटना नेहरू युवा केंद्राने आरक्षित केली होती, असे सांगितले. ७२ विद्यार्थ्यांसाठी ४२ (बर्थ) आरक्षित केले होते. हे आरक्षण मुख्यमंत्री आणि खासदार कोट्यातून केले जाते, अशीही माहिती त्यांनी दिली. मात्र, या खेळाडूंवर हा प्रसंग कशामुळे ओढवला याची आम्ही चौकशी करणार असल्याचे श्री. प्रभुदेसाई यांनी शेवटी सांगितले.

No comments: