Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 16 May, 2011

चोरी झालेल्या मंदिरांना भरपाई द्या

धर्मजागृती सभेत मडगावी एकमुखी ठराव
मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी): गोव्यात ज्या मंदिरात चोर्‍या झालेल्या आहेत. त्यांना सरकारने भरपाई द्यावी तसेच चोरट्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. मंदिरांच्या तसेच मूर्तींच्या संरक्षणासाठी सरकारने तालुका स्तरावर मंदिर रक्षक पथके स्थापन करावीत तसेच मंदिरांना लागू केलेले पोर्तुगीजकालीन कायदे रद्द करावेत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे आज येथील सरकारी मल्टिपर्पज हायस्कूल मैदानावर आयोजित विशाल हिंदु जनजागृती सभेने विविध ठरावांद्वारे केली.
भरवान श्रीकृष्णाच्या विजयरथाच्या चित्राची पार्श्वभूमी असलेल्या व्यासपीठावर गोमंत मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे राज्यसमन्वयक जयेश थळी, सनातन संस्थेचे अभय वर्तक, हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे व ह. भ. प. रामकृष्णबुवा गर्दे यांची उपस्थिती होती.
सभेने मंदिरांच्या रक्षणासंदर्भात संमत केलेल्या अन्य ठरावात कोणतेही मंदिर सरकारने संबंधित देवस्थान समिती आणि मंदिर महासंघ यांना विश्वासात घेतल्याशिवाय अनधिकृत म्हणून पाडू नये. तसेच ज्या मंदिरांच्या समिती गोशाळा व वेदपाठशाळा सुरु करण्यास इच्छुक असतील त्यांना सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय स्वरुपाच्या अन्य ठरावात भ्रष्टाचार व लाचलुचपत याद्वारे राष्ट्रीय संपत्ती लुबाडणार्‍यांना कडक शिक्षा करून ते नुकसान भरून घ्यावे, विविध माध्यमांद्वारे चालू असलेले हिंदू देवतांचे विडंबन थांबवावे व संबंधितांना कठोर शिक्षा ठोठावावी. हिंदूद्वेषी चित्रकार मकबूल फिदा हुसेन व इतरांना गुन्हेगार घोषित करून शिक्षा करावी, महंमद अफझल व अजमल कसाब यांना त्वरित शिक्षा द्यावी, काश्मिरातून विस्थापित झालेल्या हिंदूंचे तेथे पुनर्वसन करावे, भगव्या आतंकवादाच्या नावाखाली हिंदू संघटनांचा होणारा छळ त्वरित बंद करावा, लव्ह जिहादविरुद्ध कारवाई करावी, गोव्यात पोर्तुगीजांनी दिलेली गावांची नावे, रस्ते हटवून त्यांना राष्ट्रपुरुषांची नावे द्यावीत व शाळांतून ‘वंदे मातरम’ राष्ट्रीय गीत सक्तीचे करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या सभेत बोलताना श्री. थळी यांनी गोव्यात २७० मंदिरांत झालेल्या चोर्‍या व त्यातील एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना आलेले अपयश ही गृहमंत्र्यांसाठी नामुष्की आहे असे सांगितले. सर्वांत दुःखाची बाब म्हणजे गृहमंत्र्यांना या प्रकारांकडे लक्ष द्यायला नसलेली फुरसत हे होय. त्यामागील कारण स्पष्ट आहे कारण अमली द्रव्ये, बेकायदा खाणी यांची बडदास्त ठेवण्यातच सरकार व त्याची यंत्रणा राबत असते.जेव्हा दिल्लीतील हजरत बालमधील केस हरवतो तेव्हा त्याचे पडसाद जगभर उमटतात पण येथे शेकडो मंदिरे चोरली जातात व त्याची जेव्हा तक्रार नोंदवली जाते तेव्हा ही यंत्रणा मंदिरांच्या विश्वस्तांचा जो छळवाद करते त्यामुळे त्यांनादेखील नको हे विश्वस्तपद असे वाटू लागते, असे श्री. थळी म्हणाले.
यावेळी श्री. थळी यांनी सागर कवच तसेच उच्च न्यायाकवच सारख्या सुरक्षा व्यवस्थेची खिल्ली उडवताना म्हटले की सर्वांना संरक्षण आहे, नाही ते मंदिरांना. उद्या सरकार हीच व्यवस्था प्रत्येक व्यक्तीसाठी लागू करेल. प्रत्येकाला आपले संरक्षण आपणच करावे लागेल यासाठी आताच विचार करा असा सल्ला त्यांनी दिला व सर्व हिंदू एकत्र आले तर अनेक प्रश्न सुटतील असे सांगितले.
अभय वर्तक यांनी आपल्या भाषणात पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळेच आपण आपला धर्म विसरत चाललो असून अशा हिंदूंना पुन्हा हिंदू संस्कृतीची ओळख करून देण्याच्या कामात वाहून घेतलेल्या सनातन संस्थेला सरकार दहशतवादी ठरवीत असल्याचे सांगितले. त्यांनी मडगाव स्फोट प्रकरणात सनातन संस्थेला नाहक गोवण्यात गृहमंत्री असल्याचा उघड आरोप केला व त्यांचे हे षड्यंत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करतेवेळी उघड झाल्याचे सांगितले. गेले दोेन अडीच वर्षे या संस्थेचा पोलिसांनी जो अनन्वीत नाहक छळ केला त्याचा संपूर्ण तपशील दिला व सांगितले की, संस्थेने व तिच्या साधकांनी न डगमगता त्याला तोंड दिले. कारण संस्था सत्यामागे होती व या प्रकरणात तिचा अजिबात संबंध नव्हता हेच सत्य होते. तसेच सत्याबरोबर भगवान श्रीकृष्ण ठामपणे उभे रहात असतात, असेही सांगितले. या सभेला प्रचंड संख्येने हिंदूप्रेमी उपस्थित होते.

No comments: