Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 19 May, 2011

सोनसाखळी चोरणारी टोळी बेळगाव येथून ताब्यात

पर्वरी पोलिसांची कामगिरी
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): दुचाकीवरून येऊन गळ्यातील सोनसाखळी घेऊन पसार होणार्‍या तिघांच्या टोळीला आज पर्वरी पोलिसांनी बेळगाव येथून ताब्यात घेतले. कमलेश दिनकर कांबळी (२२, खोर्ली म्हापसा), समीर शेखर वेलजी (२५, पर्वरी) व अल्ताफ मोहमद अली (२८, बिठ्ठोण) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. म्हापसा येथे दोघा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली या चोरांनी दिल्याची माहिती पर्वरी पोलिसांनी दिली.
कमलेश आणि समीर हे दोघे अट्टल चोर असून त्यांच्यावर म्हापसा व पर्वरी पोलिस स्थानकात अनेक गुन्हे नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हापसा, पर्वरी, कळंगुट, या भागात गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या घटना वाढल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. पर्वरी पोलिसांनी आज गडहिंग्लज बेळगाव येथे जाऊन कमलेश आणि समीर या दोघांना ताब्यात घेतले. तर, अल्ताफ याला पणजी येथील ताब्यात घेतले.
भाड्याच्या दुचाक्या घेऊन रस्त्यावरून चालणार्‍या तरुणींच्या आणि महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून या टोळीने सुरू ठेवले होते. सदर टोळी ताब्यात आल्याने अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याचा दावा पर्वरी पोलिसांनी केला आहे.
या कारवाईत उपनिरीक्षक दिनेश गडेकर यांच्यासह पोलिस हवालदार श्री. वेंर्गुलेकर, पोलिस शिपाई श्याम महाले, विनय श्रीवास्तव व गोविंद गावस यांनी सहभाग घेतला.

No comments: