पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): तेरेखोल मांद्रे येथील बेकायदा खाण उत्खनन प्रकरणी आज राष्ट्रीय कॉंग्रेसचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांना गुन्हा अन्वेषण विभागाने जबानी नोंद करण्यासाठी हजर राहण्यासाठी काढलेले समन्स धुडकावून लावले. आज दिवसभरात श्री. देशप्रभू गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात फिरकलेही नसल्याने त्यांना पुन्हा समन्स बजावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र श्री. देशप्रभू यांनी आपल्याला गुन्हा अन्वेषण विभागाकडून कोणतेही समन्स आले नसल्याचे सांगितले.
काल खाण खात्याच्या संचालकांना जबानी नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले होते. परंतु, त्यांना त्याचवेळी महत्त्वाचा दूरध्वनी आल्याने ते जबानी न देताच निघून गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या या प्रकरणात बड्या राजकीय व्यक्ती गुंतल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. पोलिस स्थानकात जबानी नोंदवण्यासाठी संशयित येत नसल्याने आता पोलिसांनीच त्यांच्याकडे जावे का, याचा निर्णय पोलिस घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तेरेखोल येथे झालेल्या खाण उत्खनन प्रकरणात अनेक सरकारी अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे. तर, पोलिसांचीही भूमिका या प्रकरणी संशयास्पद आहे. याठिकाणी खनिज मालाची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती पेडणे पोलिसांना देण्यात आली होती. परंतु, त्याविरुद्ध कोणतीही कारवाई पेडणे पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांनी केली नाही, असा दावा त्या भागातील ग्रामस्थांनी केला आहे.
Wednesday 18 May, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment