Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 24 April, 2011

कावरेवासीयांवर पोलिसांचा लाठीमार

९५ जणांना अटक, महिलांवर अत्याचाराचा आरोप
कुडचडे, दि. २३ (प्रतिनिधी): सततच्या बेफाम खनिज वाहतुकीमुळे खवळलेल्या कावरेवासीयांना आज रुद्रावतार धारण करून सकाळी आठच्या सुमारास खनिज वाहतूक करणारे ट्रक रोखून धरले. यास्तव केपे पोलिसांनी ९५ आंदोलकांना अटक केली. यावेळी पोलिसांनी आपणावर अमानुष लाठीमार केला आणि महिलांवर अत्याचार केले, असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र कावरेवासीयांनी कायदा हाती घेतल्यामुळे आम्हाला कारवाई करणे भाग पडले, असे स्पष्टीकरण केपे पोलिसांनी दिले आहे. उग्र आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांनी याप्रसंगी पोलिसांच्या दंडेलशाहीच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला.
कावरे येथून करण्यात येणारी खनिज मालवाहतूक आज (दि.२३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी अडवल्याने केपे पोलिसांनी सुमारे ९५ ग्रामस्थांना अटक केली. मात्र यावेळी पोलिसांनी लाठीमार करत महिलांवरही अत्याचार केल्याचा आरोप अटक केलेल्या ग्रामस्थांनी केला. यावेळी जबरदस्तीने आम्हांला पोलिस वाहनांत पोलिसांनी कोंडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. कावरे भागातून फोमेंतो, दिनार तारकर, मेग्ना मिनरल्स, साळगावकर, आदी कंपन्यांचे खाणवाहू ट्रक सुमारे ३०० ग्रामस्थांनी अडवून ठेवले. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा खाणवाहतूक करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळून लावत सर्व खाणवाहू ट्रक पुन्हा खाणींवर पाठवण्यात आले होते. काल गुडफ्रायडेची सुट्टी असल्याने हे प्रकरण थंडावले होते. मात्र आज पुन्हा खाणवाहतूक सुरू झाल्याने ती ग्रामस्थांनी अडवली.
यावेळी मात्र पोलिसांनी ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करत त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यातून महिलाही सुटल्या नाही. यावेळी अनेक महिलांची मंगळसूत्रेही पळवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या आरोपाचा इन्कार करत केपे पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी उपजिल्हाधिकारी तसेच पोलिसांवर या आंदोलकांनी हल्ला चढवल्याने पोलिसांना ही कारवाई करणे भाग पडल्याचे सांगितले.
यापूर्वी अनेकवेळा ग्रामस्थांना समज देऊनही आज रस्ता अडवत आपल्यासह पोलिस तसेच पत्रकारांना शिविगाळ करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना ही कारवाई करणे भाग पडले असे केप्याचे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले.
सुमारे ९५ ग्रामस्थांना पोलिस स्थानकात आणताच उर्वरित नागरिकांनी पोलिस स्थानकाबाहेर जमत या घटनेचा निषेध केला. यावेळी पोलिस यंत्रणा कंत्राटदाराच्या हातच्या बाहुल्या बनल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आदिवासी बचाव समितीतर्फे ट्रबल कायद्यानुसार सुभाष फळदेसाई, अशोक नाईक, जे. एन. नेवगी, अजित काडणेकर, अग्रवाल या कंत्राटदारांवर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंदोलनकर्ते अनुसूचित जमाती व इतर मागास जमातीचे असल्याने सरकार त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रदूषणामुळे शेती, कुळागरे उत्पादन पूर्णपणे नष्ट झाल्याने गावावर उपासमारीची वेळ उद्भवली आहे. खाणवाहतूक पूर्णपणे बंद होईपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे येथील आंदोलनकर्ते सत्यवान वेळीप यांनी सांगितले. दरम्यान अनेक बिगर सरकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनाही अटक करण्यात आलेले आहे.
अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर, भाजपचे दक्षिण गोवा सचिव ऍड. नरेंद्र सावईकर, केपेचे माजी आमदार प्रकाश वेळीप यांनी भेट घेतली. रात्री उशिरा आंदोलनकर्त्यांना सोडण्यात आले.
यादरम्यान, केपे बाजारातून सुरेंद्र वेळीप, रमाकांत वेळीप, शांताराम वेळीप, रत्नाकर वेळीप, रामचंद्र गावकर, संदीप वेळीप, प्रशांत वेळीप, श्याम वेळीप, अनंत वेळीप, निशिता वेळीप, चंद्रकला वेळीप, प्राची वेळीप, राजेश वेळीप, प्रकाश वेळीप, दिलीप वेळीप यांच्यासह अनेक नागरिकांनी मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला.
-----------------------------------------------------------
पीपल्स फोरमचा आंदोलकांना पाठिंबा
खनिज वाहतुकीचे दुष्परिणाम भोगणार्‍यांच्या हालअपेष्टा दूर करण्याऐवजी त्यांनाच तुरुंगात डांबणारे सरकार किती उलट्या काळजाचे आहे याचा पुरावा आहे, अशी प्रतिक्रिया गोवा पीपल्स फोरमच्या वतीने ऍड. सतीश सोनक यांनी व्यक्त केली आहे. कावरे आदिवासी व ग्रामस्थ हे हौस म्हणून रास्ता रोको करत नसून स्थानिकांचे आरोग्य व पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न आहे. या लोकलढ्यास फोरमने पाठिंबा जाहीर करत शासन आम आदमीकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत व चीड व्यक्त केली आहे. जनता जेव्हा शांततापूर्ण व कायदेशीर मार्गांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत असूनही अयशस्वी ठरते तेव्हा नाइलाजाने रस्त्यावर उतरते. गोवा सरकारने सामान्यांना कायदा हाती घेण्याशिवाय पर्याय ठेवला नसल्याने सारा दोष सरकारचाच असल्याची टीका फोरमने केली आहे.

1 comment:

Unknown said...

We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


modeling agencies in Delhi
modeling agencies
modeling jobs
modeling auditions
model coordinators
modeling jobs in Delhi