Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 2 April, 2011

भारत की श्रीलंका?

आज वानखेडेवर ठरणार विश्‍वविजेता
मुंबई, दि. १
कोट्यवधी क्रिकेट शौकिनांच्या अपेक्षा, शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असलेली टीम इंडिया विश्‍वचषकात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभी असून उद्या २ एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जगज्जेतेपदासाठी ती श्रीलंकेला भिडणार आहे. आशिया खंडातील दोन अव्वल संघांमधील हा सामना दिवस रात्र सत्रात खेळवला जाणार असून केवळ भारत आणि लंकेतीलच नव्हे तर जगभरातील तमाम क्रिकेट रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
श्रीलंकेला हरवून तब्बल २८ वर्षांनंतर भारताला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ माजी विजेता आहे आणि तिसर्‍यांदा अंतिम ङ्गेरीत पोहोचले आहेत. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३ ची स्पर्धा जिंकणार्‍या भारताने २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम ङ्गेरी गाठली होती. अर्जुना रणतुंगाने १९९६ मध्ये श्रीलंकेला ही स्पर्धा जिंकून दिली होती तर वेस्ट इंडीजमध्ये २००७ साली झालेल्या विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती.
ऐतिहासिक लॉडर्सवर शानदार विश्‍वचषक विजय मिळविल्यानंतर तब्बल दोन दशकांनंतर आता कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सेना क्रिकेट महाकुंभाचा विजेत्या होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. उद्या हा प्रतिष्ठेचा असलेला आकर्षक चषक कोण पटकावणार याकडे कोट्यवधी क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे.
दोघांनीही हा चषक प्रत्येकी एकदा पटकाविला आहे. त्यामुळे दुसर्‍यांदा या चषकावर नाव कोरण्याची संधी कोणीही गमावणार नाहीत. साखळी सामन्यात भारत आणि श्रीलंकेला प्रत्येकी एका सामन्यात हार पत्करावी लागली होती. या महासंग्रामात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी विश्‍वचषक जिंकण्याची टीम इंडियाला ही शेवटची संधी आहे. कारण या विक्रमवीराच्या यादीत अनेक विक्रम आहेत. पण त्यात झगमगत्या विश्‍वचषकाचा समावेश नाही.

No comments: