Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 28 February, 2009

आर्थिक विकासाचा दर फक्त ५.३ टक्के, २००३ नंतर प्रथमच निचतम पातळी

संपुआचे आर्थिक क्षेत्रातील अपयश उघडकीस
नवी दिल्ली, दि. २७ : चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत देशातील आर्थिक विकासाचा दर ५.३ टक्के इतका घसरला.याचाच अर्थ केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक विकास मंदावला. मागील वर्षी याच कालावधीत विकासाचा दर ८.९ टक्के होता. २००३ नंतर प्रथमच विकास दराने इतकी खालची पातळी गाठली आहे.
आर्थिक विकासाचा दर हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा निदर्शक मानला जातो. यापूर्वी चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत हा दर ७.९ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७.६ टक्के होता. पण, तिसऱ्या तिमाहीत तो घसरून ५.३ टक्क्यांवर आला. अर्थात, तज्ज्ञ मंडळी हा दर घसरण्यासाठी जागतिक मंदी कारणीभूत असल्याचे म्हणत आहेत. पण, या दराने रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारचे दावेही निष्प्रभ ठरविले आहेत. यापूर्वी सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षात विकास दर सात टक्के किंवा त्याच्या वर राहण्याची आशा व्यक्त केली होती. पण, त्यांची आशा फोल ठरली आहे.
तिसऱ्या तिमाहीत कृषी क्षेत्रातील विकास दरात २.२ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. या तिमाहीत खाण उद्योग ५.३ टक्के, हॉस्पिटॅलिटी, परिवहन, दळणवळण ६.८ टक्के, बॅंक, विमा आणि रिऍलिटी ९.५ टक्के आणि सरकारी सेवा १७.३ टक्के अशा समाधानकारक आकड्यांवर राहिले. कृषी क्षेत्रातील नकारात्मक विकास हा एकूणच आर्थिक विकासावर परिणामकारक ठरल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
शेअरबाजारात निरुत्साह
चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील जाहीर झालेल्या विकास दर ५.३ टक्के इतक्या खालच्या स्तरापर्यंत आल्याने आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना उत्साह मावळला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक ६३ अंकांची घसरण दाखवून बंद झाला. ३० शेअर्सवर आधारित निर्देशांक आज दिवसभरात २२७ अंकांनी खाली आला होता. दिवसाच्या मधल्या टप्प्यात तो उसळला आणि दिवसअखेर मात्र त्यात ६३.२५ अंकांची घसरण नोंदविण्यात आली. आज तो ८८९१.६१ वर बंद झाला.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज २२ अंकांची घट नोंदविण्यात आली. आज निफ्टी २७६३.६५ वर बंद झाला. जागतिक मंदीचा फार मोठा परिणाम आतापर्यंत भारतावर पहायला मिळाला नव्हता. पण, आज जाहीर झालेल्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक विकास दराने जागतिक मंदीचा परिणाम दाखवून दिला. देशाच्या विकास दराने गेल्या पाच वर्षातील निचतम पातळी गाठल्याने आज शेअर बाजारांवरही परिणाम दिसून आला. निर्देशांक आणि निफ्टी दोन्हींमध्ये घसरण नोंदविण्यात आली.
आज फायद्यात राहिलेल्या शेअर्समध्ये बॅंकिंग क्षेत्राचा पहिला क्रमांक लागतो. या क्षेत्रातील शेअर्समध्ये १.३१ टक्क्याची वाढ झाली. आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय, एचडीएफसी यांच्या शेअर्सच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली. आज रुपयाच्या किंमतीत झालेली घसरणही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम करणारी ठरली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्स आज ०.६९ टक्क्यांनी खाली आले. सॉफ्टवेअर क्षेत्रातील इन्फोसिस आणि विप्रो या आघाडीच्या कंपन्यांना आज मोठे नुकसान सहन करावे लागले.रिऍलिटी क्षेत्र आज सर्वाधिक तोट्यात राहिले. तेल आणि नैसर्गिक वायू, तंत्रज्ञान, ग्राहकी वस्तू, ऑटो, भांडवली वस्तू, आरोग्य आणि ऊर्जा या सर्वच क्षेत्रातील शेअर्स आज विक्रीच्या दबावाखाली होते. आज बॅंक व्यतिरिक्त औषध आणि धातू क्षेत्र फायद्यात राहिले.

No comments: