Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 25 February, 2009

शिवसेनेशी युतीत अडचण नाही : अडवाणी, मुंबई भाजपातर्फे साडेअकरा कोटी रुपयांची थैली प्रदान

विशेष प्रतिनिधी
मुंबई, दि. २४ : शिवसेनेसह रालोआच्या सर्वच घटकपक्षांसोबत पुन्हा आघाडी होण्यात भाजपला काहीही समस्या नाही. उलट, रालोआ आणखी मजबूत होत आहे, असा निर्वाळा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज दिला.
मुंबई भाजपतर्फे आयोजित सत्कार व थैली अर्पण समारंभात माटुंग्याच्या प्रसिद्ध षण्मुखानंद सभागृहात ते बोलत होते. "हमे कोई प्रॉब्लेम नही' अशा शब्दांत त्यांनी वादाच्या वावड्‌या निकालात काढल्या. पत्रकारांनी बातम्या देण्याचे आपले काम करीत राहावे, असा टोलाही त्यांनी हाणला.
ते म्हणाले की, युती-आघाडीबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्यांचे मूळ मतदारसंघांच्या फेररचनेत आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठे बदल होऊन तेथील राजकीय परिस्थितीत फरक पडला. परिणामी नवे गणित मांडावे लागत आहे. पण त्यात काही फार समस्या येणार नाहीत. जुने मित्र तर राहतीलच; काही नवेही होतील.
प्रगतीसाठी रालोआ
देशाने सर्व क्षेत्रांत प्रगती करावी असे वाटत असेल तर केंद्रात रालोआचे सरकार निवडून द्या, असे मतदारांना आवाहन करताना अडवाणी म्हणाले की, भाजपा कार्यकर्त्यांनीही भारतमातेच्या विजयाचा संकल्प करून कामाला लागावे. कारण, भाजपा जितेगा तो भारत जितेगा, हीच आमची भावना आहे.
विद्यमान संपुआ सरकारने आपल्या काळात सांगण्यासारखे एकही काम केलेले नाही. एवढे निष्क्रिय सरकार प्रथमच देशात झाले, असा आरोप करून ते म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात त्यांना काहीही करता आलेले नाही. सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे, तर दारिद्रयरेषेखालील लोकांची परिस्थिती सुधारण्याऐवजी त्यांच्यात गेल्या ५ वर्षांत आणखी ५ कोटींची भर पडली आहे!
असे सरकार पुन्हा दिल्लीत येऊ नये यासाठी १९७७ सारख्या पराभवाचा धडा त्यांना शिकवा, असे आवाहन करताना अडवाणी म्हणाले की, अर्थकारण, सुरक्षा, भ्रष्टाचार या महत्त्वाच्या आघाड्‌यांवर सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. एकही काम ते नीट करू शकलेले नाही.
अर्धवेळ अर्थमंत्री!
देशावर मंदीचे सावट असताना अर्धवेळ अर्थमंत्र्याकडून कामकाज चालविले जात आहे, याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून ते म्हणाले की, प्रणव मुखर्जी नसते तर या सरकारचे काय झाले असते! ते परराष्ट्र मंत्री आहेत, लोकसभेचे नेते आहेत, कितीतरी मंत्रिगटांचे अध्यक्ष आहेत आणि अर्धवेळ अर्थमंत्रिपदही सांभाळत आहेत. हे काय सुरू आहे?
सरकार वाचविण्यासाठी खासदारांची खुलेआम खरेदी-विक्री करण्याचा लज्जास्पद प्रकार या सरकारच्या काळातच घडला आणि भ्रष्टाचाराने कहर केला, असा आरोप करताना अडवाणी म्हणाले की, वाढता निवडणूक खर्च हे भ्रष्टाचाराचे महत्त्वाचे मूळ आहे. त्यामुळेच, जनतेच्या निधीतून निवडणूक लढण्याची तरतूद आणण्याचा आम्ही गंभीरपणे विचार करणार आहोत.
त्या विचारातूनच भाजपाने निवडणुकीसाठी निधिसंकलनाची मोहीम देशभर राबविली आहे. त्याअंतर्गत आज मिळालेल्या निधीच्या आकड्‌यापेक्षा त्यात योगदान देणारे ४० हजार लोक आणि तो गोळा करण्यासाठी झटणारे ८ हजार कार्यकर्ते मला जास्त महत्त्वाचे वाटतात, असे सांगत त्यांनी, निधीचे ११ कोटींचे लक्ष्य ओलांडल्याबद्दल सर्व संबंधितांविषयी गौरवोद्गार काढले.
मतांचेच राजकारण
दहशतवादाच्या संदर्भात संपुआ सरकार व कॉंग्रेस पक्ष मतपेटीचे राजकारण खेळत आहे, असा आरोप करून अडवाणी म्हणाले की, अफझल गुरूला अजून फाशी न देण्यामागे हेच कारण आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्‌याशी संबंधित पुरेसे सुगावे असतानाही प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही, याचेही कारण तेच.
रामपूर येथील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्‌यातील एका आरोपीने मुंबई हल्ल्‌याचा सुगावा दिला होता. तसेच, हल्ल्‌याच्या १४ दिवस आधी स्वत: पंतप्रधानांनीच संसदेत, समुद्री मार्गाने मुंबईवर ह?ा होण्याची भीती व्यक्त केली होती. तरीही काही कारवाई न होता मुंबईवर ह?ा झालाच, याकडे त्यांनी यासंदर्भात लक्ष वेधले.
सुशासन, सुरक्षा व लोककल्याण हे भाजपाचे लक्ष्य आहे. त्यासाठी आमचे सरकार प्राधान्याने शिक्षण, स्वास्थ्य, प्राथमिक सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देईल, असे सांगून आडवाणी म्हणाले की, राजकीय नेत्यांची प्रतिमा बदलविणे, हेही भाजपाचे एक लक्ष्य आहे. त्यादृष्टीने जनतेला प्रशिक्षित करण्याची संधी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत घेतली पाहिजे.
अडवाणींच्या पंतप्रधानपदासाठी...
रालोआ-भाजपाला केंद्रात सत्तेवर येण्यापासून आणि अडवाणींना पंतप्रधान बनण्यापासून आता कोणीही रोकू शकत नाही. तेव्हा कार्यकर्त्यांनी सर्वस्व झोकून कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी बोलताना केले.
ते म्हणाले की, गेल्या लोकसभेत आम्ही महाराष्ट्रातून १३ खासदार (भाजपाचे) पाठविले होते, यावेळी १८ खासदार नक्की पाठवू. तसेच, केंद्रात सत्तेवर येताच अफझल गुरूला फासावर लटकवू.
अडवाणींना पंतप्रधान करण्याचे ध्येय ठेवूनच भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचारकार्य अधिक जोमाने करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार गोपाळ शेट्टी यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. महिला आघाडी प्रमुख प्रा. मनीषा कायंदे यांनी शेवटी आभार मानले. प्रारंभी अडवाणींच्या हस्ते भाजपाच्या मुंबईतील ६ जिल्हाध्यक्षांचा, आ. शेट्टी व प्रा. कायंदे यांचा, तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्रबुद्धे यांचा पीएच. डी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सभाचित्रे-
* स्लमडॉग मिलिनेयर सिनेमाच्या ऑस्कर यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन करताना आडवाणी म्हणाले की, अ डॉग हॅज कम टू द टॉप! याने जगात आपली मान उंचावली. विशेष असे की, अडवाणींचा सत्कार केला जात असताना पार्श्वभूमीवर याच स्लमडॉगमधील "जय हो' हे गाणे वाजविले जात होते.
* आजच्या मुंबईच्या रकमेसह नागपूरचे ४ कोटी आणि जळगावचे १ कोटी, असा एकूण १६ कोटी रुपयांचा निधी भाजपाला महाराष्ट्रातून आतापर्यंत मिळाला आहे आणि त्याचा योग्य विनियोग केला जाईल, अशी ग्वाही अडवाणींनी दिली.
* विमानतळ ते माटुंगा प्रवासादरम्यान पोलिस एस्कॉर्टचे वाहन बंद पडल्याने अडवाणींना सभास्थळी पोहोचायला बराच उशीर झाला. याबद्दल गडकरी व शेट्टी यांनी राज्य सरकारची चांगली हजेरी घेतली.
* गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या "शेतकरी संघर्ष अभियान' संबंधीच्या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशन अडवाणींच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राजेंद्र फडके लिखित "बूथ प्रमुख कार्यकर्ता' पुस्तिकेचे प्रकाशन, तसेच मुंबई भाजयुमोच्या वेबसाईटचे उदघाटनही अडवाणींनी केले.
* या कार्यक्रमासाठी षण्मुखानंद सभागृह खचाखच भरले होते. त्यातही, विणलेल्या सुती टोप्या घातलेले मुस्लिम बांधव मोठ्‌या संख्येत दिसत होते. भाजपाच्या ध्वजाच्या रंगातील साडी-ब्लाऊज परिधान केलेल्या अनेक महिला कार्यकर्त्याही लक्ष वेधून घेत होत्या.
--------------------------------------------------------------------------------
शहीद तुकाराम ओंबळेंना सभागृहाचे अभिवादन
मुंबई हल्ल्‌यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी करकरे, कामटे, साळस्कर, उन्नीकृष्णन अशी नावे घेताघेता शहीद तुकाराम ओंबळे यांचे नाव आले, तेव्हा क्षणभर थांबत अडवाणी गहिवरले. म्हणाले- सबसे जादा तुकारामको... कारण, फिदायीन (आत्मघातकी) दहशतवादी अद्याप जिवंत सापडलेला नाही. ते शौर्य तुकारामने स्वत:च्या जिवाची बाजी लावून दाखविले आहे.
यावर दाद देत संपूर्ण सभागृहाने टाळ्‌यांचा कडकडाट केला आणि सर्वांनी उभे राहून शहीद ओंबळेंना श्रद्धांजली अर्पण केली.
-------------------------------------------------------------------------------

No comments: