Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 26 February, 2009

सहावा वेतन आयोग लागू न केल्यास तीव्र आंदोलन
२०० नव्या गाड्या सेवेत रुजू करण्याची मागणी
कामगार आयुक्तांसोबत आज ११.३० वाजता चर्चा

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): राज्यातील कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी आज येथील कदंब बसस्थानकासमोर ३५० कर्मचाऱ्यांनी धरणे धरले. दोन दिवसांत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि कॉंग्रेसला येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा कडक इशारा कदंब कामगार संघटनेने यावेळी दिला आहे. याविषयी उद्या दि. २६ रोजी सकाळी ११.३० वाजता येथील श्रमशक्ती भवनातील कामगार आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर संघटना आंदोलनाची पुढील दिशा ठरवेल, अशी माहिती कदंब कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्योकिम फर्नांडिस यांनी दिली.
आज सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू असलेल्या या धरणे आंदोलनात आळीपाळीने कर्मचारी सहभागी झाले होते. सुमारे ३५० च्या संख्येने हे कर्मचारी उपस्थित होते. हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत दररोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू राहील. मात्र या आंदोलनाचा सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. पाचव्या वेतन आयोगापर्यंत केंद्र सरकारचा वेतन आयोग येथील कदंब महामंडळाला लागू होत नव्हते. परंतु पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी सरकारबरोबर झालेल्या करारानुसार केंद्र सरकारचा प्रत्येक वेतन आयोग महामंडळाला लागू करण्याची शिफारस होती. या कारणास्तव सहावा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना लागू कराव व २०० नवीन गाड्या महामंडळाच्या ताफ्यात भरती कराव्यात, या मागण्यांसाठी गेले काही महिन्यांपासून कदंब कर्मचारी आंदोलन करत आहे. त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला आयटकनेही पाठिंबा दिला आहे. महामंडळाचे अध्यक्ष आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले होते. परंतु त्याच्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. तसेच महामंडळाने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही निवेदनाद्वारे विनंती केली होती. याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन कामत यांनी दिले होते. त्यानंतर दोन वेळा कामगार आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आली, परंतु ती बैठक यशस्वी झाली नाही. आता उद्या सकाळी तिसऱ्यांदा बैठक होणार आहे. यामध्ये अंतिम निर्णय न झाल्यास कर्मचारी आंदोलन तीव्र करतील, असा इशारा अध्यक्ष फर्नांडिस यांनी दिला आहे.
यासंदर्भात ज्योकिम फर्नांडिस म्हणाले की, सरकारने पुढे कोणतेही कारण न देता आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा कदंब महामंडळात दोन हजार कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पाच याप्रमाणे धरल्यास १० हजार मतदार होतात. अन्यथा कॉंग्रेसला याचा फटका येत्या लोकसभा निवडणुकीत बसेल.

No comments: