Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 26 February, 2009

'खनिज मालक संघटनेचे मौलिक कार्य', चौपदरी उसगाव पुलाचे लोकार्पण, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन


उसगाव येथे चौपदरी पुलाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री दिगंबर कामत. बाजूला गृहमंत्री रवी नाईक, सभापती प्रतापसिंह राणे, उद्योगपती शिवानंद साळगावकर, मंत्री विश्वजित राणे, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार प्रताप गावस. (छाया: प्रमोद ठाकूर)

तिस्क उसगाव,दि.२५ (प्रतिनिधी): खनिज खाण मालक संघटनेने उसगावमध्ये चौपदरी पूल उभारून राज्यात सामाजिक कार्याचा उत्तुंग आदर्श निर्माण केला आहे.राज्यातील हा पहिलाच चौपदरी पूल आहे.साधनसुविधेच्या बाबतीत गोवा राज्याने भरारी मारली असून गोवा सरकार व खाण मालक संघटना हातात हात घालून आणखीही विकासकामे करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज सायंकाळी उसगाव येथील "द मिनरल ब्रिज ऑफ उसगाव'च्या लोकार्पण समारंभात उद्घाटक या नात्याने केले.
खनिज खाण आस्थापनांवर नेहमी टीका केली जाते. त्यांचे सामाजिक कार्य पाहिले जात नाही. समाजासाठी नेहमी खनिज खाण मालक संघटना योगदान देत असते. मडगाव ते बोरी हा रस्ता चौपदरी करण्याचे काम सुरू आहे. खनिज वाहतुकीसाठी बगलमार्ग ही करण्यात येणार आहेत, असे ते पुढे म्हणाले. त्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच पुलाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
उसगावचा जुना पूल पोर्तुगीजकालीन आहे. गोवा मुक्तिनंतर त्यांची एकदा दुरुस्ती केली आहे. गोव्याच्या विकासात जुन्या उसगाव पुलाचे योगदान भरपूर आहे. याच पुलावरून मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक झाली. खाण मालकांनी हा नवीन पूल बांधल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. शिल्लक राहिलेले जोडरस्ते सरकार बांधणार आहे. गोव्याच्या विकासासाठी आता चार व सहापदरी रस्त्यांची गरज आहे. खाण व्यवसायामुळे परकीय चलन मिळते. चौपदरी रस्ते बांधकाम करताना रस्त्यालगत असलेली घरे, दुकाने मोडण्यात येतील. चौपदरी रस्त्यामुळे खनिज वाहतुकीचे दळणवळण सोपे होईल. खाण कल्याण निधीतून गोव्यासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे यावेळी प्रतापसिंग राणे म्हणाले.
जुन्या अरुंद पुलामुळे विद्यार्थी वर्ग आणि लोकांना सहन करावे लागणार त्रास कमी होणार आहेत. उसगाव तिस्क भागातील लोकांना खनिज ट्रक वाहतुकीमुळे सहन करावा लागणारा त्रास व धूळ प्रदूषणातून वाचविण्यासाठी उसगाव मारवासडा तिस्क असा बगल रस्ता करण्याची योजना असून ह्या रस्त्यासाठी जमीन संपादन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे गृहमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
यावेळी सर्व खनिज खाण आस्थापनांच्या प्रतिनिधीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, ऊर्जा आणि पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेरा, मुख्य सचिव जे.पी. सिंग, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, आमदार प्रताप गावस यांचीही भाषणे झाली. यावेळी उसगावच्या सरपंच सौ. प्रगती गावडे, पाळीच्या सरपंच सौ. शुभेच्छा गावस व्यासपीठावर उपस्थित होत्या.
उसगाव जुन्या पुलाची दुरुस्ती करून प्रवासी बसेस व कार वाहनासाठी खुला करण्यात येईल, असे बांधकाम मंत्री चर्चील आलेमाव म्हणाले.
स्वागत, प्रास्ताविक खाण मालक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर यांनी केले. सूत्रसंचालन पराग रांगणेकर, ग्लेन कलंपरा यांनी केले. आभार प्रदर्शन पी. के. मुखर्जी यांनी केले. उद्या २६ फेब्रुवारीपासून या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू होणार आहे.

No comments: