Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 22 February, 2009

दाबोळीचे अस्तित्व टिकून राहणार प्रफुल्ल पटेल

विमानतळाच्या विस्तारीकरणाचा कोनशिला समारंभ
वास्को, दि.२१ (प्रतिनिधी): भारतीय विमान उड्डाण क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे भविष्यात अतिरिक्त विमानतळांची गरज भासणार आहे. यासाठी सरकारकडून भविष्यकाळात पन्नास हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गोव्यात मोपा विमानतळ येणारच मात्र दाबोळी विमानतळाचे अस्तित्व टिकून राहणार असे स्पष्टीकरण देताना राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल करू नका, असा इशारा केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज दिला.
आज सकाळी चिखली येथे क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा कोनशिला समारंभ प्रमुख पाहुणे श्री. पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, पर्यटन मंत्री मिकी पाशेको, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, उपसभापती माविन गुदिन्हो, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दीन, महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा, बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव,डॉ. विल्फ्रेड डिसोझा, राज्यसभा खासदार शांताराम नाईक, मुख्यसचिव जे. पी. सिंग, आमदार नीळकंठ हळर्णकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विमानतळांवर पडणारा अतिरिक्त ताण पाहता दाबोळी येथील विमानतळ बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केल्यावर ते म्हणाले की, २००४ मधील ४५ विमानतळ आणि ११० विमानांच्या तुलनेत आज ८५ विमानतळांवरून ५०० विमाने वाहतूक करत आहेत. साल २०२० पर्यंत देशातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी किमान ४०० विमानतळांची आवश्यकता भासेल.
स्वस्त दरात चांगल्या साधन सुविधा उपलब्ध होत असल्याने विमानतळाची स्थिती एकंदरीत बस स्थानकासारखी झाल्याचे सांगून येणाऱ्या १० वर्षांत या क्षेत्राद्वारे युवा पिढीला एक मोठे रोजगारसंधी उपलब्ध होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या या समारंभानंतर दाबोळीचा विकास हा भारत सरकारचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले असून सरकारच्या वतीने दाबोळी विमानतळ बंद केले जाणार नाही, असेही श्री. पटेल यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कामत यांनी आपल्या भाषणात आजचा दिवस संपूर्ण गोव्यासाठी मुख्य करून दक्षिण गोव्यासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. जनतेने दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाविषयी चिंता करणे सोडून द्यावे, असेही ते म्हणाले. दाबोळी विमानतळावरून उशिरा रात्री गोवा मुंबई विमान सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांकडे केली.
यावेळी दक्षिण गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, उत्तर गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दीन व राज्य सभा खासदार शांताराम नाईक यांची भाषणे झाली. प्रारंभी विमान प्राधिकरणाचे अधिकारी एस. सी. चाटवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच त्यांच्या हस्ते मान्यवरांना भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. दाबोळी विमानतळासाठी उभारण्यात येणाऱ्या एकत्रित टर्मिनल इमारतीमध्ये कोणत्या प्रकारच्या साधनसुविधा असणार याबाबत माहिती देण्यात आली. दाबोळी विमानतळाचे संचालक पॉल मणिक्कम या कार्यक्रमाला उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------
गोव्यात असलेले कॉंग्रेस सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळेच आहे, अन्यथा कॉंग्रेस सत्तेवर येणे कठीण बनले असते. कॉंग्रेस नेत्यांना ज्याप्रमाणे विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातात त्याच पद्धतीने येथील राष्ट्रवादी नेत्यांनाही विश्वासात घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले. कार्यक्रमातील आपल्या भाषणात श्री. पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते राज्यातील सरकारचा हिस्सा असल्याची आठवण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना करून दिली. विकासकामे करतेवेळी राष्ट्रवादी नेत्यांची मर्जी जाणून घ्यावी, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
-------------------------------------------------------------------------
आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरू होताच चर्चिल आलेमाव यांनी व्यासपीठावर येऊन आपले विचार व्यक्त करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली. परंतु, साबांखा मंत्री आलेमाव यांना बोलण्याची संधी न देता कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. "दाबोळी विमानतळ आपल्या प्रयत्नामुळे बचावला' असे जनतेला दाखवून देण्यासाठी त्यांचा हा स्टंट होता, असा सूर यावेळी उपस्थितांमधून ऐकावयास मिळाला.
--------------------------------------------------------------------------------]
दाबोळीच्या विस्तारीत टर्मिनल इमारतीची उभारणी कांच आणि पोलादाच्या साहाय्याने ६१,९५७ चौ.मी. क्षेत्रामध्ये केली जाणार आहे. याद्वारे प्रवाशांसाठी सामान हाताळण्याची व्यवस्था, मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, एस्कालेटर्स, सार्वजनिक ध्वनिवर्धक व्यवस्था, उड्डाणाबाबत माहिती देणारी यंत्रणा, देखरेखीसाठी क्लोज्ड सर्कीट टीव्ही इ. सुविधांचा समावेश असेल. विस्तार काम पूर्ण झाल्यानंतर ताशी २७५० प्रवासी हाताळण्याची क्षमता या विमानतळावर उपलब्ध होणार आहे.

No comments: