Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 February, 2009

पत्रकारितेत विवेकबुद्धी महत्त्वाची - राजदीप

डी. डी. कोसंबी कल्पकता महोत्सव

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) ः सध्याच्या युगात प्रसारमाध्यमांनी आपल्या विवेकबुध्दीचा नव्याने शोध घेऊन पत्रकारिता केल्यास भविष्यात प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त होईल, असे प्रतिपादन करताना ज्येष्ठ पत्रकार व "सीएनएन-आयबीएन' वाहिनीचे संपादक तथा गोमंतकीय सुपुत्र राजदीप सरदेसाई यांनी, अन्यथा प्रसारमाध्यमे प्रेक्षक किंवा वाचकांप्रतीचा आपला आदर व विश्वासार्हता गमावून बसतील, असा धोक्याचा इशारा आज येथे दिला.
येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या थोर विचारवंत "दामोदर धर्मानंद कोसंबी कल्पकता महोत्सवाती'ल व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. चार दिवसांच्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याहस्ते उद्घाटन झाले. उद्घाटन सत्रानंतर सरदेसाई यांनी "प्रसारमाध्यमांचा विस्फोट व त्याचे परिणाम' या विषयावर पहिले पुष्प गुंफले.
चौदा वर्षांपूर्वी दूरचित्रवाहिनीच्या क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. साधारणतः १९९५ नंतर या क्षेत्रात अमाप दूरचित्रवाहिन्यांचे पीक आले व त्यामुळे सरकारची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत निघाली. आज देशात नोंदणीकृत असे ४६० चॅनल आहेत. त्याशिवाय कित्येक भागात विविध प्रादेशिक वाहिन्याही आहेत. १९९५ आधी सरकारमान्य बातम्याच दूरदर्शनवर दाखविल्या जायच्या. आज तसे चित्र राहिलेले नाही. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावत असली तरी बातम्यांच्या गुणवत्तेबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जात नाही, असा टोला त्यांनी हाणला.
१९८४ सालचे दिल्लीतील शीख हत्याकांडावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमांची चलती नव्हती. त्यावेळी छपाई प्रसारमाध्यमांच्या एक दोन छायाचित्रावरून घटनेची गंभीरता सारे जग पडताळत होते. आता ती स्थिती राहिलेली नाही. २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यांचे थेट वृत्तांकन साऱ्या जगाला पाहाता आले ते केवळ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमुळेच असे ते म्हणाले. मात्र प्रत्येक जण सर्वांत आधी ब्रेकिंग न्यूज देण्याच्या स्पर्धेत बातम्यांची गुणवत्ता घालवू लागले आहेत. सॅटेलाईट तंत्रज्ञानामुळे सारे जग आता जवळ आले आहे. अशावेळी बातम्यांची गुणवत्ता व विश्वासार्हता जर आपण गमावली तर ते भविष्यात धोकादायक ठरेल असे ते म्हणाले.
दूरचित्रवाहिन्या या खरे तर सरकारचा प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) बनल्या आहेत. त्यांच्यामुळे लोकप्रतिनिधीही अधिक जबाबदार झाले आहेत. मात्र लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्थेच्या जबाबदारीबद्दल सवाल करणाऱ्या प्रसारमाध्यमांनीच आपली जबाबदारी सोडली तर ते कितपत योग्य ठरेल, अशी विचारणाही त्यांनी केली.
अनेक वाहिन्या स्पर्धेच्या नादात आपला दर्जा सांभाळत नसून अनेकवेळा गैर वृत्ते देतात. त्यामुळे देशाने एक स्वायत्त नियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्याची गरज निर्माण झाल्याचे सरदेसाई म्हणाले. चुकीच्या वार्तांकनाविरुद्ध कारवाई म्हणून त्या वाहिनीच्या प्रसारणावर बंदी लादली जाईपर्यंत इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा दर्जा सुधारणे कठीण असल्याचे मत त्यांनी मांडले.
या व्याख्यानमालेच्या उद्घाटन झाल्याचे जाहीर करताना मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की, ही व्याख्यानमाला ही थोर विचारांचा ठाव घेणारी असून अशा व्याख्यानमालेतील विचारांच्या एकत्रित चिंतनाची प्रक्रिया पुढे नेता येते. कला अकादमीचे अध्यक्ष व सभापती प्रतापसिंह राणे यावेळी उपस्थित होते. खचाखच भरलेल्या मंगशकर सभागृहात सरदेसाईंच्या व्याख्यानानंतर त्यांच्याशी थेट प्रश्नोत्तराचे सत्र झाले. आपल्या पत्रकारितेच्या शैलीदार वक्तृत्वाने सरदेसाई यांनी कार्यक्रमात रंग भरला.
दूरचित्रवाहिन्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले व जोपर्यंत बड्या धेंडांना पकडले जात नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराची किड नष्ट होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, सुप्रसिध्द उद्योजक श्रीनिवास धेंपे आदी मान्यवरांनीही या व्याख्यानाला उपस्थिती लावली होती. "गोमन्तक टाइम्स'चे संपादक डेरेक आल्मेदा यांनी सूत्रसंचालन केले. "सुनापरान्त'चे संपादक अनंत साळकर यांनी सरदेसाई यांची ओळख करून दिली.

कामत व राणे प्रामाणिक राजकारणी!

व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना राजदीप सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांवर आपले नियंत्रण मिळविण्यासाठी काही राजकारण्यांनी स्वतःच्या वाहिन्या सुरू केल्याची माहिती दिली. कामत व राणे यांनी तसा प्रयत्न करू नये असा उपरोधिक सल्ला देत मला ते तसे करणार नाहीत याची खात्री आहे असे नमूद करतान ते प्रामाणिक राजकारणी आहेत, असा टोला हाणला. त्यांच्या या टोल्याने खचाखच भरलेले सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

1 comment:

Anonymous said...

kamat aani Ranne Chor aahet.
Aaapla gova tyani lootlela aahe, naahitar Vishawajeetalaa vicha ki rao.